सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

वेचताना... : शाश्वताचे रंग

सर्वसामान्य व्यक्ती एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते 'आवडले किंवा आवडले नाही किंवा ठीक आहे' अशा तीन सर्वसाधारण श्रेणींमधे प्रतिक्रिया देते. फार थोडे जण त्याबाबत अधिक नेमकेपणाने बोलू शकतात. पुस्तकाबद्दल बोलणे-लिहिणे ही सर्वसाधारणपणे 'समीक्षा' या भारदस्त नावाखाली होते आणि त्याचे लेखकही तसेच भारदस्त साहित्यिक व्यक्तिमत्व असावे लागते. आणि ते लेखनही बहुधा भारदस्त शब्दांची पखरण करत, अप्रचलित अशा परदेशी तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहावे लागते, असा काहीसा समज दिसतो. 

पण या दोन टोकांच्या मधे काहीच नसते का? 'पुस्तक मला जसे दिसले तसे' म्हणजे सर्वस्वी सापेक्ष अशा मूल्यमापनाची परवानगी नाही का? असेल तर असे कुणी लिहिते का आणि लिहीत असेल तर ही मधली स्पेस कशा तर्‍हेने भरली जाते?' असे प्रश्न मला पडले होते.

शाश्वताचे रंग

मग मला पुस्तक-परिचय या निव्वळ वर्तमानपत्री भरताडामुळे बदनाम झालेल्या प्रकाराचा शोध लागला. पण परिचयामधे अनुस्यूत असलेला तटस्थपणाही झुगारून देऊन त्या पुस्तकाशी माझे जे काही नाते प्रस्थापित झाले असेल त्याच्या प्रभावाखाली सर्वस्वी सापेक्ष, माझ्या आकलनापुरते असे मला काही सांगता येणार नाही का? 

मग 'रसग्रहण' आणि 'परिशीलन' या दोन प्रकारांचा शोध लागला. पहिला प्रकार हा काहीसा 'स्वान्त सुखाय' आहे तर दुसर्‍यात अभ्यासाच्या बांधिलकीचा भाग अधिक यावा लागतो असे दिसते. मग 'अशा प्रकारचे लेखन कितपत होते?' हे तपासू जाता हा प्रकार मराठीत अगदीच काही दुर्मिळ नाही असे लक्षात आले. पण दुर्दैव असे की हा प्रकार बरेचदा वर्तमानपत्री स्तंभाच्या स्वरूपात दिसत असल्याने 'लेख' या सबगोलंकार वर्गवारीखाली ढकलून दिला जातो. यात शब्दमर्यादेत करुन दिलेला 'पुस्तक-परिचय' मी जमेस धरत नाही. ज्यात मूळ पुस्तकाबद्दल लिहित असताना वाचक/लेखक स्वतःही डोकावतो असे लेखन मला अभिप्रेत आहे.

असे लेखन दुर्मिळ नसले, तरी अशा प्रकारची पुस्तके मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतील. कविता हा काव्यप्रकार याबाबत जरा सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. अरुणा ढेरेंसारख्या कवयित्रीने इतरांच्या कवितांचे, लोकगीतांचे सुंदर परिशीलन करणारे बरेच लेखन केले आहे नि त्याची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. याशिवाय माझ्या वाचण्यात आलेले 'तो प्रवास सुंदर होता' हे कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचे त्यांचे बंधू के. रं. शिरवाडकर यांनी लिहिलेले साहित्यिक-चरित्र आणि विजय पाडळकर यांनी प्रसिद्ध रशियन कथाकार-नाटककार 'अन्तोन चेखव'वर त्याच फॉर्ममधे लिहिलेले 'कवडसे पकडणारा कलावंत' हे एक पुस्तक.

पण या सार्‍यांचे पूर्वसुरी म्हणावे असे ज्येष्ठ कथाकार विद्याधर पुंडलिक यांनी लिहिलेले 'शाश्वताचे रंग' हे सर्वात उत्तम म्हणावे असे पुस्तक. यात निव्वळ लेखनाबद्दलच नव्हे तर लेखकाबद्दल आणि कपाळावर फुकाची आठी असलेल्या आणि आपण 'मोठे' झालो असे समजणार्‍यांच्या मते केवळ लहानांसाठीच ज्यांच्या फिल्म असतात असे लॉरेन आणि हार्डी यांच्यावरही पुंडलिक मनापासून लिहितात. त्यांच्या सोबत झालेले आपले मैत्र उलगडून दाखवतात. 

या 'अभिजात चक्रम' जोडगोळी खेरीज अभिजाततेच्या कल्पनांना सुरुंग लावणारा डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ, कामूच्या 'आऊटसायडर' मधला पराया, नाटकाच्या क्षेत्रातही नेमके हेच करणार्‍या आयनेस्कोचे 'र्‍हिनसोरस' हे नाटक, टॉलस्टॉयची अना कारेनिना, इतालियन लेखक ग्वेरेसीचे डॉन आणि पेपोन, अफाट कादंबरी लेखक हेमिन्ग्वे हे आणि यांच्यासारख्या परदेशी साहित्यिकांसोबतच बापूसाहेब माट्यांसारख्या देशी विचारवंतांचाही ते वेध घेत आहेत.

डोस्टोव्हस्कीच्या 'क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेंट' मधला रॉस्कोल्निकॉफ आणि खुद्द डोस्टोव्हस्की यांच्यावर त्यांनी 'दिशांताकडून' या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्रयस्थपणे न लिहिता जणू या रॉस्कोल्निकॉफशी संवाद साधतो आहे अशा धाटणीत लिहिल्यामुळे या लेखाला एक सापेक्षतेची आणि आपुलकीची मिती मिळाली आहे. सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने विकृत ठरलेल्या या व्यक्तिमत्वाबद्दल नि त्याच्या भवतालाबाबत आपल्या अनुभवांबद्दल पुंडलिक बोलताहेत.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: दिशांताकडून


हे वाचले का?

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

दिशांताकडून

रॉस्कॉलनिकोफ!

तुला प्रिय म्हणता येत नाही. प्रिय कुणाला म्हणायचं? जिथं एखादं नातं आहे, जवळचा धागा आहे तिथं. असा धागा तुझ्यामाझ्यात कुठं आहे?

त्यामुळे तुझ्याशी काय बोलावं हे कधी नीट कळलं नाही. इतकंच काय, पण असं बोलण्यापूर्वी सुरुवात कोणत्या शब्दात करावी हेसुद्धा बरोबर सुचत नाही.

एके काळी- विशेषतः तरुण वयात - तर तुझ्याशी अशा जिव्हाळ्यानं बोलणं अशक्य होतं!

शाश्वताचे रंग

तुझी कहाणी वाचली ते दोन दिवस अन् दोन रात्री मला अजूनही स्पष्ट आठवतात. छाती सारखी धडधडत होती! वाचताना एका जागी बसवत नव्हतं. हिंदू कॉलनीतल्या माझ्या खोलीत ताठ बसून, अंग आवळून, भिंतीला कसाबसा रेलून, येरझार्‍या घालून मी वाचत होतो. वाचताना एकदासुद्धा आडवा झालो नाही! जेवणखाण अन् चहापाणी करत होतो, पण त्यात कमालीचं नि:संगपण होतं. आपलं डोकं गरगरतंय- आपल्याला भ्रम होणार असं वाटंत होतं.

तुझी कहाणी संपली तेव्हा खोलीत स्वस्थ बसणं मला अशक्य झालं. बाहेर पडलो. दादरच्या हिंदू कॉलनीतले तेव्हाचे गॅसचे थरथरणारे दिवे, सळसळणारी झाडी, धुक्यात तरंगावीत तशी दिसलेली माणसं अन् नुसताच चालणारा मी - माझ्याजवळ माझे पाय आहेत हीच एक संवेदना... अजूनही ते क्षण कापले गेल्यासारखे अन् स्थिर, जागच्या जागी आहेत!

मी माझ्या एका मित्राकडे गेलो. वेळ रात्रीची- बाराची! त्याच्या दारावर थापा मारल्या. त्याने दार उघडले, डोळे चोळत घाबरून विचारले-

"काय रे?"

"काही नाही- सहज आलो होतो. मी इथेच झोपेन आता."

वय तेवीस. एम. ए. चे पहिले वर्ष. मनाची अवस्था काही कारणांमुळे दिशाशून्य. आज आता पन्नाशी ओलांडून पुढे गेलो आहे. विचार-भावनांना थोडासा प्रगल्भपणा आला आहे. तेव्हा वाटणारी तुझ्याबद्दलची भीती जवळ जवळ गेली आहे. पण अजूनही ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. (नाहीतरी काही लोक तुझ्या मानसपित्याला 'अंधारपुत्रांचा जनक' आणि 'वेड्यांच्या इस्पितळाचा शेक्स्पिअर' म्हणतातच!)

तुझी आई! साठीची म्हातारी. 'आपल्या दरिद्री घरात आशेच्या एकाच किरणासारख्या असलेल्या, कॉलेजपर्यंत गेलेल्या या आपल्या तरुण पोराचं काय भयंकर झालं हे?' या चिंतेनं तिचा ऊर कितीतरी वेळा फुटून निघतो. पण सदोदित भीतीने तो कसाबसा सांधून ती तुला जवळ घेते. तुझ्या बहिणीची - 'दुन्या'ची - माया करडी असली तरी कमी नाही. पण तुझ्या विकृत अहंकाराची तिच्याही मनावर अशीच दहशत! तिची तुझ्याबद्दलची माया पाझरली- पण ती शेवटी शेवटी. तुझ्या आईला आणि बहिणीला प्रेमापायी पण तुझ्यासाठीच पाठीशी घेऊन , तुझ्या मागे सतत उभ्या असलेल्या आनंदी अन् मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या त्या राजुमिखिनचीही तीच गत. "मित्रांना मदत करण्यापलीकडे या मूर्ख माणसाला आयुष्यातलं काही समजत नाही." म्हणून तू जळजळीत नजरेनं त्याच्याकडे बघत राहतोस की हा तुझा एकमेव मित्रही तुझ्यापुढे नेहमी दचकलेला असतो- "They all want to be my fairy Gods. They even love me as if they hated. I hate them all!"

पण सोन्या! तुझ्यासारख्या गुन्हेगारावर प्रेम करणारी एकुलती एक ती साधीभोळी गरीब मुलगी! संसाराचा विस्कोट करणार्‍या दारुड्या बापाच्या घरासाठी स्त्रीत्वाचं आणि वेश्येचं दुहेरी दु:ख पत्करलेल्या या मुलीपुढे तू अखेरच्या क्षणी गुडघे टेकतोस आणि म्हणतोस- "In bowing before you, I bow before the entire suffering humanity." पण त्या अंतिम पश्चात्तापाच्या क्षणीही सोन्या तुझ्याजवळ येतच नाही.

"काय म्हणतोय हा? काय म्हणतोय हा?" असं मनातल्या मनात म्हणत ती थरथरत दूरच राहते!

एकाच वेळी मनात भयंकर भीती अन् खोल करुणा निर्माण करणारे तुझ्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व नाही!

तळाशी भीती असलेलं, तुझ्याबद्दलचं प्रचंड कुतूहल अनेकांना आहे. याचं कारण तुझ्या प्रतिमेमागं तुझा मानसपिता डोस्टोव्हस्की आहे!

डोस्टोव्हस्की! (अनेक उद्गारचिन्हे!) एके काळचा लष्करातला अधिकारी. तरुणपणी बापाचा खून झालेला. नेहमी गळ्यापर्यंत कर्जात बुडालेला. त्यापायी अनेक वेळा गळफास घेऊन उभा राहिलेला. जुगार खेळून खेळून पुरा भणंग होऊनही त्याचा भन्नाट कैफ अंगात भिनलेला. पाच वर्षे तुरुंगात खडी फोडलेला. वारंवार येणार्‍या फेफर्‍यांनी सदोदित गळून गेलेला. रोजच्या जगापेक्षाही चित्रविचित्र स्वप्नांच्या गूढ अन् अज्ञात प्रदेशात, त्यातल्या गल्ल्याबोळात अन् दर्‍याखोर्‍यात वारंवार भटकणारा. वधस्तंभापर्यंत जाऊन केवळ एका मिनिटाच्या चुकामुकीने परत जीवनात ढकलला गेलेला. खर्‍या ख्रिश्चन धर्मानं (म्हणजे रशियातील) मानवजातीच्या उद्धाराचं कंकण बांधलेलं आहे अशी माथेफिरू श्रद्धा बाळगणारा...

अशा डोस्टोव्हस्कीनं अनेकांची मती गुंग केली आहे. ख्रिस्ताला पहिला अन् शेवटचा ख्रिश्चन मानणारा, 'सामान्य मानवजातीला आपल्या विराट पंजात दाबून धरणारा एक उंच महामानव पाहिजेच.' असं निडरपणे सांगणारा तो धिप्पाड नित्झे म्हणतो- " माणसाचं खरं मानसशास्त्र मी डोस्टोव्हस्कीकडून शिकलो!" माणसाचं मन वरवर दिसतं तसं नसतं, ते अथांग आहे, ही महासागरी जाणीव ज्याने आम्हाला जास्तीत जास्त भेदकपणे दिली त्या फ्रॉईडने तुझी स्वप्ने आपल्या विश्लेषणासाठी आव्हानपूर्वक निवडली आणि त्या स्वप्नांची पूर्ण गुंतागुंत आपल्याला समजत नाही अशी कबुलीही दिली! (फ्रॉईडचा हा शहाणपणा त्याच्या साहित्य-शाखेतील शिष्यांत मात्र नाही! लेखक-चरित्रातील विकृती आणि गंड शोधून त्याच्या साहित्याचे ते अन्वय लावीत बसलेले असतात- डोक्यातल्या उवा शोधत बसावे तसे!) खुद्द अनेक लहानमोठ्या लेखकांना तुझ्या या मानसपित्याबद्दल एका वेगळ्याच कारणासाठी आदरयुक्त भीती आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातले शिकारी आदिवासी आपल्या धनुष्याची दोरी जास्तीत जास्त ताणली जावी म्हणून आपल्या फुगीर छातीचं तकट छाटीत असत म्हणे! माणसाच्या अनुभवाच्या अफाट प्रदेशाच्या शेवटच्या सीमेपर्यंत आपल्या प्रतिभेचा बाण सणसणत जाऊन पडावा म्हणून या डोस्टोव्हस्कीने आपली छाती तशी छाटून घेतली होती. फार थोड्या लेखकांना स्वतःला असं रक्तबंबाळ करून घेता येतं. पण त्यांनी असं केलं तरी त्यांच्या प्रतिभेचा बाण दूर जाऊन पडेलच अशीही दुर्दैवाने खात्री नसते! कारण जसं जगणं तसंच लिहिलं जाणं हे साहित्यातलं एक अपूर्ण समीकरण आहे. डोस्टोव्हस्कीची छाटलेली छाती अशी की त्याने ते करून दाखवले! त्याचे पाय मातीखालच्या मातीत होते आणि मस्तक आकाशाच्या पलीकडे होते. त्याच्या लेखणीने ही मातीही आणली अन् 'वरचे' ऊनही तिच्यावर चमकले. स्वतः तो विकृतीच्या सळसळत्या नागांशी खेळला आणि त्याच्या लेखणीतही विकृतीचे तेच डंंख आले. अगदी अफलातून अवास्तव जीवन तो जगला आणि त्या दु:खभोगांची अवास्तवता त्याने आपल्या कादंबर्‍यातही इतक्या प्रभावीपणे आणली, की अवास्तवता ही कलेची एक मूलभूत अट आहे हे तुम्हा आम्हाला मान्य करावे लागले.

तर असा हा तुझा मानसपिता! तुझ्यात जे रक्त उतरलं आहे ते या असल्या जबरदस्त बापाचं. साहजिकच त्या रक्तातले काही गुण तुझ्याही रक्तात उतरले.

पण तुझ्याबद्दल अजूनही किंचित भीती वाटण्याचं आणखी एक कारण आहे. माणसाचं आयुष्य अन् समाजजीवन काही काही वेळा असं काही अगतिक, क्रूर आणि असह्य होऊन बसतं की, प्रत्येक साधारण माणसाच्या डोक्यात एक क्षणभरच का होईना, पण खुनाची कल्पना दबा धरून बसते. प्रत्येकाच्या डोक्यात हाती असलेल्या अदृश्य पिस्तुलाचा स्फोट होतो, एखादा सुरा लखलखून जातो किंवा कुर्‍हाडीचे कचकचते घाव घुमत राहतात. भीतीमुळे, तिरस्कारामुळे, संस्कारामुळे शहारून घालवलेला, विसरलेला, शरमेनं दाबलेला अन् विझवलेला हा खुनाचा क्षण तू पकडतोस. इतक्या सामर्थ्यानं, की ती खुनाची भयंकर फँटसीही खरी वाटू लागते. खुनाचे अतिशयोक्त आकार नैसर्गिक वाटू लागतात. खुनाची विकृती ही विलक्षण प्रमाणबद्ध वाटू लागते. आणि मग प्रत्येक संवेदनाक्षम वाचक, डोक्यात लपलेल्या त्या क्षणैक खुनाच्या आठवणीनं तुझ्या मूर्तीमागून चालत राहतो- दुरून का होईना, चालत राहतो!

पंचवीस वर्षांपूर्वी मी तुझ्या मागून चालत आलो तो असा!

- oOo -

पुस्तकः शाश्वताचे रंग
लेखकः विद्याधर पुंडलिक
प्रकाशकः सुपर्ण प्रकाशन
आवृत्ती पहिली (मार्च १९८६)
पृ. ८३ - ८७.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : शाश्वताचे रंग >>
---


हे वाचले का?

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : कबीरा खडा बाजारमें

फेसबुकसारख्या सोशल मीडियावर असेल किंवा एकुणच माणसांच्या समाजात, एक नियम दिसतो की माणसाची ओळख ही प्रामुख्याने त्याच्या समाजाच्या संदर्भातच असते. एखाद्या नवीन व्यक्तीचा परिचय झाला की आडनाव विचारल्याखेरीज नि त्यावरून 'ती कोणत्या समाजाची असेल' याची मनातल्या मनात नोंद केल्या खेरीज बहुतेकांना परस्परांच्या मैत्रीच्या, नात्याच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकणे अवघड होते. 

कबीरा खडा बाजारमें

एकदा एका गटाच्या खोक्यात तिला बसवले की मग तिळा उघड म्हणताच धाडकन शिळा दूर सरून भारंभार खजिना दिसावा तसे त्यांना होते. अधिक काही न विचारता त्या व्यक्तीबाबत बरेच काही आपल्याला समजल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. कारण ज्या गटात त्याला बसवले त्या गटाचे - गृहित! - गुणदोष त्याच्यातही आहेत असे मानले तरी बहुसंख्येला - परस्परविरोधी कारणाने कदाचित - ते मान्य होते... त्या व्यक्तीला मान्य असण्याची गरज नसते.

एकुणच व्यक्ती म्हणून कोणतीही स्वतंत्र आयडेंटिटी तुम्हाला नाकारली जाते, थोडीफार सवलत मिळाली तरी ती दुय्यम मानून बहुतेक प्रसंगी 'आम्ही तुम्हाला दिलेल्या' गटाला, त्याच्या हितसंबंधाला अनुसरून तुम्ही वागले पाहिजे असा समाजाचा हट्ट असतो. तुमचे आचारविचार स्वातंत्र्य वापरून तुम्ही काही वेगळे बोललात वागलात तरी ते खरे नाही, पवित्रा आहे. 'आतून ना आम्ही म्हणतो तस्सेच तुम्ही आहात.' असा ठाम समज बहुतेकांनी करून घेतलेला असतो. गटाच्या भूमिकेशी सुसंगत घेतलेली 'एक' भूमिका तुमची 'खरी भूमिका' असते आणि इतर हजारो प्रसंगी घेतलेली विसंवादी भूमिका हे साऽरे अपवाद असतात असे मानले जाते.

दिनानाथ मनोहरांची 'कबीरा खडा बाजारमें' ही कादंबरी ही दोन सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या 'व्यक्तीं'ची सामाजिक चढाओढीत झालेली फरफट आणि त्या चढाओढींच्या विविध अनुषंगांच्या आधारे उभे राहिलेले विविध व्यक्तींचे चित्रण करते. जात, धर्म, संघटना यांच्या प्रभावाखाली असलेल्या आणि एकाच वेळी परस्परविरोधी दिशांनी खेचल्या जाणार्‍या सामान्यांच्या झगड्याचे वास्तव समोर ठेवते. या कादंबरीबाबत विस्तृतपणे लिहिले जायला हवेच.

-oOo-

या कादंबरीतील एक वेचा: आयडेंटिटी


हे वाचले का?

आयडेंटिटी

कणाद थांबला. त्याने दादांकडे पाहिलं. सुमीकडे पाहिलं. तो जरासा शंकित झाला. आपण जे काही बोलतोय, ते यांना समजतंय का? त्याच्या अनुभवाचा अर्थ लावायचा ते प्रयत्न करताहेत का? काही क्षण द्विधा मनस्थितीत गप्पच राहिला. मग म्हणाला "माणूस जीवनात तसा एकटाच असतो नेहमी. आणि हा एकटेपणा सुसह्य नसतो. त्यावर सतत मात करण्याचा प्रयत्न असतो व्यक्तीचा. पण कित्येक वेळा या एकटेपणाच्या भावनेतून सुटायला तुम्हाला स्वत्वावर मर्यादा घालाव्या लागतात. स्वत्व नाकारावं लागतं. दादा, तुम्ही एकटे पडले आहात. तुम्ही रूढीवादी विचारांचे, आचाराचे नाहीत, म्हणून तुम्ही तुमच्या जातीपासून दुरावला आहात. तुम्ही उच्च जातीशी जमवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तुम्हाला जवळ करतात दुय्यम जातीचे म्हणून, आणि सोयीचे असेल तेव्हाच.

कबीरा खडा बाजारमें

बाहेरच्या समाजात व्यक्तीला जर आयडेंटिटी नसेल ना, तर ती व्यक्ती कुटुंबात अधिकार गाजवायला सुरुवात करते. पण अधिकाराचं नातं हे माणसांचं नातं नसतं. परस्परसन्मान, परस्परसंवाद नसेल तर कुटुंबातील नातंही तकलादू, कचकडी असतं. कदाचित काहीसं आकर्षक दिसेल पाहाणार्‍याला. परंतु जरा धक्का लागताच भंग पावणारं. तुकडे तुकडे होणारं. भारतीय समाजाच्या संदर्भात यावर उपाय आहे- मानवी संबंध आकारात आणा. कुटुंबात असो वा समाजात, वर्चस्ववादी संबंध नाकारा. सर्व लहानमोठ्या, नीचउच्च जातींतील व्यक्तींशी परस्परसन्मानाचं, संवादाचं नातं बांधा. याला काही पर्याय नाही, दादा."

दादा काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात चाललेला गोंधळ त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आता या प्रसंगाचा शेवट कसा करायचा? गजू आताच आला तर किती बरं होईल! कणाद विचार करत होता. सुमीने केलेल्या हालचालीमुळे त्यांच तिच्याकडे लक्ष गेलं. ती पुढे झुकली होती. त्याच्याकडेच रोखून पाहात होती. "कणाद, तुमच्या या त्रयस्थ आणि तटस्थ भूमिकेतून केलेल्या विश्लेषणाला अर्थ निश्चितच आहे. पण आमच्याबद्दल जे विश्लेषण तुम्ही केलं आहे तेच तुम्हालाही लागू पडतंय. दादांचा रोल तर काय, या सर्व नाट्यात दुय्यम होता. पण तुमची भूमिका तर प्रमुख होती. विशेषतः त्यांचा सर्वच डाव तुम्ही विस्कटून टाकला आहे. तुम्हालाही ते बाजूला ढकलून देणारच. केवळ तेवढंच नाही, तर तुम्हाला त्याबद्दल सजाही देणार. तसं सोडणार नाहीत ते तुम्हाला."

कणाद काही क्षण सुमीकडे डोळे विस्फारुन पाहात राहिला. आपलं बालपण आणि तारुण्यही घराच्या चार भिंतीआड घालवलेल्या या बाईला ही समज कुठून लाभलीय? चर्चा, सेमिनार्स, बौद्धिक चर्चासत्रे माहीतही नसलेल्या आणि स्वयंपाकघरात कित्येक वर्षे घालवलेल्या या सुमीला ही दृष्टी कशी मिळालीय?

त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. मग काहीशा हताश स्वरात तो म्हणाला, "बरोबर आहे तुझं म्हणणं सुमी. पण या वाडीतील लोकांमध्ये मला कधीच स्थान नव्हतं. मी ते मिळवायचा प्रयत्नही केलेला नाही. मला त्यांनी सामावून घ्यावं अशी इच्छाच नव्हती माझी. ज्यांना मला 'माझी माणसं' म्हणता येतील अशी माणसं मी शोधली आहेत. हे ते जाणीवपूर्वक करतात असं नसेलही. ते थोडे असतील. पण ते लोक माझे आहेत. त्यामध्ये गजू आहे, बबन आहे, दादा आहेत, तू आहेस, माझी आई आहे, मी तर म्हणतो रंजनाताईही आहेत. त्यामुळे माझी सामाजिक गरज पुरी होते. निदान काही प्रमाणात तरी. सुदैवानं माझं असमाधान, माझी आत्मसंतुष्टता यांना वाट करून देण्यासाठी वयाने लहान, अवलंबून असलेल्या व्यक्तींवर अधिकार गाजवायला मला माझं कुटुंबच नाहीय. तसं कुटुंब असतं तर मी तशा प्रकारचा अधिकार गाजवला नसता अशी खात्री मी ही देऊ शकत नाही, सुमी."

"पण हे तुमचं पर्यायी सामाजिक जीवनही तकलादू असू शकतं. कुणी मनात आणलंच ते ते तोडूही शकतं. या व्यक्तींच्या संबंधांचा पाया ठिसूळ आहे असं नाही वाटंत तुम्हाला?"

तो बोलला नाही बराच वेळ. मग अगदी खोल आवाजात म्हणाला, "बरोबर आहे. आणि ते माझं भावविश्व तुटलं ना, तर मीही पराजितच होईन या लढाईत. पण तात्पुरता सुमा. मी परत परत माझ्याभोवती हे लहानसं का होईना, माझं विश्व शोधून काढेन. त्याला आकार देईन. माझे लोक शोधून काढेन. त्यांच्याशी नव्याने नातं निर्माण करेन. परत परत करत राहीन. अशा परित्यक्त, एकाकी व्यक्तींची या जातीय उतरंड असलेल्या समाजात काही कमी नाहीये. जेव्हा समाजात स्थित्यंतर घडत असतं ना, मन्वंतराचा काळ असतो ना, त्यावेळी समाजापासून तुटलेल्या, अशा व्यक्तींची संख्या वाढते. अशा स्थितीत, अशा एलिअनेटेड व्यक्तींचं सातत्यानं उत्पादन होतंच राहणार आहे सुमा. समाजातील कुठलाही स्तर, कुठलीही जात, कुठलाही वर्ग याला अपवाद नाही. प्रत्येक स्तरात, जातीत अशा व्यक्ती आकारास येतच राहणार. त्यांच्याशी नातं जोडत राहणं हाच उपाय आहे ना यावर?"

- oOo -

पुस्तक: कबीरा खडा बाजारमें
लेखकः दिनानाथ मनोहर
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
आवृत्ती पहिली (फेब्रुवारी २००८)
पृ. २७१-२७३.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : कबीरा खडा बाजारमें >>
---


हे वाचले का?

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : सारे प्रवासी घडीचे

आर.के. नारायण यांनी लिहिलेले 'मालगुडी डेज्' हे पुस्तक प्रचंड गाजले. 'दूरदर्शन'ने त्यावर त्याच नावाची एक मालिकाही केली. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्‍या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्‍या नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले.

सारे प्रवासी घडीचे

मराठीतूनही असाच प्रयोग झाला, पुस्तक म्हणून तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. परंतु मालगुडी डेज् प्रमाणे माध्यमांतराचा कळसाध्याय मात्र त्याला लाभला नाही. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या 'सारे प्रवासी घडीचे' या पुस्तकातून भेटलेली कोकणातील माणसे, त्यांच्या जगण्याचे आधार किंवा त्यांचा अभाव, जातीव्यवस्थेचे ताणेबाणे, पोटाला दोन वेळचे अन्न जेमतेम मिळवत असणार्‍या/नसणार्‍या साध्यासुध्या माणसांचे विलक्षण पीळ, त्यांचे पूर्वग्रह आणि हेवा-असूयादि गुणवैशिष्ट्ये, पुरोगामित्वाच्या तसंच राजकीय स्वातंत्र्याचे वारे वाहात असताना त्यांच्या जगण्यात उठणारे तरंग इ. अनेक अंगांना स्पर्श करत हे पुस्तक पुढे जाते.

याला मी निव्वळ पुस्तक म्हणतो आहे, कथासंग्रह किंवा कादंबरी म्हणत नाही. कारण रूढार्थाने हे दोन्हींमधे बसते किंवा बसत नाहीदेखील. खरंतर या पुस्तकाची अनेक वर्षांनी आठवण झाली ती अशाच फॉर्ममधील गणेश मतकरी यांनी अर्वाचीन, महानगरी समाजावर लिहिलेल्या 'खिडक्या अर्ध्या उघड्या' या पुस्तकामुळे. या फॉर्ममधे म्हटलं तर प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र आहे. त्याच्याकडे एक स्वतंत्र कथा म्हणून पाहता येते. परंतु त्याचबरोबर त्या कथांमधे काही पात्रे सामायिक आहे, अन्य कथांमधे घडलेल्या घटनांचा सांधा तिथे जुळलेला आहे. त्या अर्थी ते कादंबरीच्या जवळ जाते. पण त्याचवेळी एकत्रितपणे एक कादंबरी म्हणून उभे राहात नाही.

पुस्तकाचा घाट पाहिला तर ते माझ्यापुरते ते व्यक्तिप्रधान दिसते, किंवा माझा तसा दृष्टीकोन आहे असे म्हणू. त्यात कथानकाच्या प्रवाहाला तितके ठळक स्थान नाही. दळवींनी एक एक व्यक्ती ठाशीवपणे उभी केली आहे. केवळ उल्लेखाने येऊन गेलेल्या व्यक्तींची संख्या नगण्य. तसंच त्या व्यक्तीसंदर्भात घडलेल्या घटना वा घटनाप्रवाह ध्यानात राहण्याऐवजी तुमच्या मनात उभे राहते ते त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिचित्र. हाफम्याड तात्या, पावट्या, नरु, बाबल्या मडवळ, बागाईतकर मास्तर, अमृते मास्तर, आणि मुख्य म्हणजे आबा आणि बाबुली हे दोन जमीनदार, यांचे नाव घेताच त्यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. या अचाट व्यक्तिरेखा एकदा तरी साकार समोर याव्यात अशी इच्छा मनात उभी राहते.

'सारे प्रवासी घडीचे'ची पुन्हा एकवार आठवण झाल्यावर यातील एखादा वेचा 'वेचित चाललो'साठी घ्यावा असे ठरवले. विकत घेतलेली माझी चौथी प्रतही गायब झाल्याचे ध्यानात आल्यावर एका मित्राकडून घेऊन आलो. जसजसे पुन्हा वाचत गेलो तस तसे यातून एक वेचा निवडणे किती जिकीरीचे आहे हे ध्यानात येऊ लागले.

नक्की काय घ्यायचे? 'आपूच्या शाळेचा पहिला दिवस', 'अंगविक्षेपांसह म्हणायचे गाणे आणि त्यात आलेला विक्षेप', बाबल्या मडवळाचे भकास जिणे, परंपरेबरोबरच अधिकाराचा चतुराईने वापर करून कुळांवर वर्चस्व ठेवून असणारे आबा, बापाचे छत्र हरवलेल्या अत्रंगी नरुचे वारे भरले जगणे, आपद्धर्म म्हणून केशा चांभाराला लोकल बोर्डावर निवडून आणतानाही कटाक्षाने अस्पृश्यता पाळणारे आबा, डॉ. रामदास यांचे पूर्णान्न ...?

एकाहुन एक उतारे निवडले नाहीत, तोवर हा नको दुसरा घेऊ असे डोक्यात येई. अखेर एकुण पुस्तकाचा तोंडवळा बर्‍यापैकी पकडणारा हा उतारा सापडेतो महिना गेला. विस्ताराने मोठा असल्याने दोन ठिकाणी मधले तपशील वगळले आहेत.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: माणसे


हे वाचले का?

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

माणसे

पण दुर्दैवाने या रमण्यालाही भावल्यासारखी नाटकात कामे करायची खाज. एकदा कुठे काम मिळाले म्हणून त्याने भावल्याची मिशी उसनी घेतली. नाटक संपल्यावर काय झाले कोण जाणे, पण झोपायला जायच्या गडबडीत रमण्या मिशी कुठे विसरला. दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा मोफत द्यायच्या अटीवर आणलेली मिशी गहाळ झाली. पण भावल्याने रमण्याची गय केली नाही. प्रथम दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा फस्त केला आणि मग भांडण सुरू केले. ताबडतोब मिशी आणून दे, नाहीतर खटला भरतो अशी त्याने धमकी दिली.

सारे प्रवासी घडीचे

रमण्या काही कोकणाबाहेरचा नव्हता. खटल्याचे आव्हान मिळताच त्याला स्फुरण चढले. चहाला लालभडक अर्क स्वतःच्या आणि दुसर्‍याच्या नरड्यात ओतणारा रमण्या स्वत:च्या मिशीला पीळ देत भांडायला सज्ज झाला. भावल्याने नुसते खटल्याचे नाव काढताच रमण्याने हायकोर्टाचे नाव काढले. एकदा काय व्हायचे ते होऊन जाऊ दे! पर्वा नाही हायकोर्टात जावे लागले तरी. चहाचे खोपट विकीन आणि खटला चालवीन. मिशी तर सोडाच, पण भावल्याला शेंडीचेसुद्धा चार केस देणार नाही अशी प्रतिज्ञा रमण्या भर बाजारात करू लागला. जिवा शिंग्याने दादू गुरवाची कापली तशी शेंडी कापली तशी मिशीसाठी भावल्या आपली शेंडी कापील या भीतीने रमण्याने डोईवर चोवीस तास टोपी चढवली. भावल्याने नाना यत्न केले, पण रमण्याची शेंडी काही हाती लागत नाही हे कळून चुकताच त्याने मारामारीवर प्रकरण आणले. गरम पाण्याचे मडके फुटले, कपबश्यांचा चुरा झाला आणि खोपटाचे बांबू मारामारीसाठी वापरले गेले. अर्थात मारामारी नावापुरतीच! हातात बांबू घेऊन एकमेकांच्या आईबापांवरून शिव्यांचीच उधळपट्टी अधिक झाली. बाजारकरांची तास-दोन तास करमणूक झाली. या भांडणाचे 'संगीत मिशीचा पीळ' असे नाटकी नाव ठेवून बाजारकर मंडळी मोकळी झाली.

असे विक्षिप्त लोक त्या वेळी जागो जागी होते.

रावजीनाना हा नारळाचा व्यापारी. नारळाचा व्यापार चालू असताना तो धर्मभावनेने तुडुंब भरलेला असायचा. श्लोक, अभंग, ओव्या त्याच्या ओठांवरून कधी हलल्या नाहीत. येणार्‍या-जाणार्‍याला त्याने नीतिमत्तेचे चार घोट पाजलेले नाहीत असे झाले नाहीत. तोच रावजीनाना रात्री सामसूम झाली म्हणजे काजळलेला कंदील हातात घेऊन नित्य नेमाने देवळाजवळ राहणार्‍या गंगू भाविणीकडे जायचा. पण गावातले लोक चावट. त्याला मुद्दा आडवे येत आणि विचारीत, "रावजीनाना, रात्री खंय? देवदर्शनाक?" म्हण म्हातारा रावजीनाना त्याहून खट. तो म्हणे, "होय तर! म्हातारपणात देवदर्शनाशिवाय दुसरो धंदो कसलो?" आणि मग झाले गेले गंगेला मिळाले अशा पद्धतीने हुश्श करीत गंगूच्या पडवीत पाय टाकी.

गंगू भावीण हे त्या काळचे मोठे प्रस्थ होते. मी गावात होतो तेव्हा ती पन्नाशीकडे आली होती. पण त्या वयातही मोठी रगेल आणि रंगेल दिसायची. पालखीच्या वेळी नथ घालून आणि शालू नेसून ती चवरी ढाळायची, त्या वेळी ती एखाद्या संस्थानिकाच्या पट्टराणीसारखी दिसायची. एखादी पोरगी जर नटली, थटली म्हणजे 'गंगू भाविणीसारखी नटून थटून जाणार कुठे?' असे तिची आई विचारायची. एखाद्या सुंदर बाईचे वर्णन करायचे झाले तर ते गंगूच्या तुलनेत व्हायचे.

आमचा सख्या होडावडेकर तिच्याकडे नेमाने जायचा. फार पूर्वी माझ्या आजोबांचे तालुक्याच्या गावी तांब्यापितळेचे दुकान होते. त्या दुकानात सख्या नोकर होता. पुढे दुकानाचे दिवाळे वाजल्यावर तो आमच्याकडेच राहू लागला. त्याचे लग्न झालेले नव्हते. त्याला जवळचे असे कुणीच नव्हते. काही किरकोळ कामे करायचा आणि आमच्या घरीच राहायचा. उन्हात बसून राहायचे त्याचे वेड. उन्हात खोबरे, मिरच्या, पापड सुकत टाकले म्हणजे हातात काठी घेऊन राखणदारी करीत उन्हात बसायचा, कावळ्यांना हाकलून लावायचा. मी शाळेत होतो तेव्हा त्याचे वय शंभरीकडे होते. कमरेतून काटकोनात वाकला होता. काठी घेऊन लडबडत लुटूलुटू चालायचा. तासन् तास उन्हात बसायचे एक वेड, आणि तास-दोन-तास गंगू भाविणीकडे जाऊन बसायचे दुसरे वेड. त्याला खायला दिलेला लाडू किंवा आंबा ति मुद्दाम राखून ठेवायचा आणि रोजच्या रोज गंगूला नेऊन द्यायचा. तिथे जायचा नि तास-दोन-तास पडवीत बसून नुसता टकट्क पाहात राहायचा. ती अधूनमधून या ना त्या निमित्ताने आतबाहेर गेली तर स्वतःच्याच डोक्यावर हात आपटीत चरफडायचा. न हलता समोर बसून राहायला सांगायचा. आणि ती समोर बसली की आपली मळकट बुबुळे स्थिर ठेवून तिला बघ बघ बघत राहायचा. पुढे त्याचए पाय सुजले आणि चालणेच अशक्य झाले तेव्हा तो गंगूकडे जायचा थांबला. पण तरीही तो न चुकता मला नेहमी विचारायचा, "आपू, आज देवळाकडे जातलंय?"

"कित्याक?"

"गेलंय तर एक लाडू देतंय तो गंगूकडे नेवन दी."

आम्ही सर्वजण त्याची गंगूवरून चेष्टा करत असू. पण सख्या होडावडेकर कधी लाजला नाही की हसला नाही.

गंगूकडे त्याला भेटणारा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे झिलू केदार. तब्बल पन्नाशीकडला माणूस. अंगाबांध्याने मजबूत. मटण त्याच्या आवडीचे. ज्या ज्या वेळी शक्य असे त्या त्या वेळी दुसर्‍याच्या कोंबड्या तो चोरीत असे. पाण्यात भिजवलेले फडके पटकन कोंबडीवर टाकून तो कोंबडी उचलायचा आणि खांद्यावरल्या पटकुरीत टाकून धूम ठोकायचा. भिजलेले फडके अंगावर पडले की कोंबडी ओरडत नाही. त्यामुळे चोरी झाली तरी कोंबडीची ओरड नाही आणि कोंबडीच्या मालकाचीही ओरड नाही. आमच्याकडे मटण असले म्हणजे तो हमखास आमच्याकडे जेवायला यायचा. मटणाबरोबर आठ-दहा कांदे कराकरा चावून खायचा. पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचा. तो जेवायला आला की सख्या चडफडत राहायचा. त्याला शिव्या द्यायचा आणि झिलू हसायचा. मटणातली नळी उचलून म्हणायचा- "सख्या, फोडतंय ही नळी?" आणि मग सख्या आपली अधांतरी लोंबकळणारी हनुवटी घट्ट आवळून धरायचा.

आणि हाच झिलू केदार एकदा अकस्मात उठला आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला गेला. तुळशीची भली मोठी माळ गळ्यात अडकवून परत आला. त्यानंतर तो अनेकदा आमच्या घरी आला. पण एकदाही जेवला नाही. मटणाच्या घमघमीत वासाने विचलित झाला नाही. कारण चंद्रभागेत स्नान करून मांस, कांदा, लसूण अशा उत्तेजक पदार्थांवर त्याने पाणी सोडले होते. त्यानंतर उभ्या जन्मात तो कांद्या-मटणाला शिवला नाही. गंगूकडे गेला नाही. घरी बसून तो मुलाने वाचलेली ज्ञानेश्वरी वाचायचा आणि रात्री एकतारी छेडीत म्हणायचा- "पाहे तिकडे बापमाय| विठ्ठल रखुमाई||"

झिलू केदार मटण खात नाही, गंगूकडे जात नाही हे सख्याला कळले तेव्हा तो तुच्छतेने हसला. "समोर मासळी दिसत नाय तोवर बगळ्याचा ध्यान!" असे म्हणत सख्याने झिलूला फक्त हिणवले.

पुढे सख्याने डोळे मिटले. ते कळता झिलू धावून आला. गावातला एक जुना माणूस गेला म्हणून डोळे टिपत रडला. "बहू केला फेरा! येथे सापडला थारा||" असे म्हणत त्याने सख्याच्या तिरडीला खांदा दिला.

आमच्या घरी सर्वांना वाटले होते की, गंगू भाविणीकडे अधूनमधून लाडू, आंबे पाठवू असे सांगितले की सख्या पिंड घेईल म्हणून. पण दुपार उलटून गेली तरी कावळा पिंडाला शिवला नाही. शेवटी झिलू पिंडाकडे तोंड करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, "मी जन्मात गंगूकडे जायचंय नाय!-" तसा भुर्रकन कावळा आला नि पिंड घेऊन गेला.

अशी एक एक माणसे जगावेगळी जगली. जगावेगळी मेली. भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली.

पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याचीसुद्धा मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्र्य. मूळची अभिमानी माणसे गरिबीत खितपत पडलेली. त्यामुळे स्वभावात एक प्रकारचा कडवटपणा खोलवर मुरलेला. मन नित्याचे असमाधानी आणि चरफडणारे! मूळचे डोके कुशाग्र पण ते गुंतवायला साधन नाही. त्यामुळे दुसर्‍याच्या गोष्टीत, विशेषतः भानगडीत लक्ष घालणे, त्याच गोष्टींचा रवंथ करणे हे एरवी फुकट जाणारा वेळ घालवायचे एकमेव साधन! कुणी नवखा माणूस आला, कुणी काही निराळे केले की आवाज मारून चर्चा झालीच. त्या मागोमाग टिंगल आलीच. चर्चेसाठी कुठे काही मिळाले नाही तर कुत्र्याने पुरलेले हाड उकरून काढावे तसे काही तरी उकरून काढले जाई.!-

बागाईतकर मास्तरांना लग्न होऊन बरीच वर्षे मूलबाळ झाले नाही, ही बाब असो किंवा हरबा जोशी साठीत असताना त्याच्या तिसरेपणाच्या बायकोला मुलगी झाली ही बाब असो, सारख्याच्य उत्साहाने आणि संशयाने अनेक तर्कवितर्क चालत. इंच-दोन-इंच लांबीची मिशी ती काय, आणि त्यासाठी भावल्या किलिंडर रमण्याशी मारामारी करतो काय, असे म्हणून भावल्याची निर्भर्त्सना करायला जिवा शिंगी जसा तयार असायचा, तसा रावजीनाना या म्हातारपणात गंगू भाविणीकडे जातो म्हणून त्याला आमचा सख्या खुदुखुदू हसायला मोकळा असायचा.
...

हाफम्याड तात्याचा मुलगा दिनक्या. दिनकर हे त्याचे सरळ स्वच्छ नाव. पण त्याला दिनकर कुणीच कधी म्हटले नाही. दिनक्या या नावानेच तो सर्वश्रुत होता. मुंबईतल्या अठ्ठावीस सालच्या संपात दिनक्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो बेकारही झाला होता. पण संपामुळे तो इतका प्रभावित झाला होता की, दोन-चार दिवसांतच कामगारांची सत्ता येणार आणि स्वतःला कुठले तरी प्रमुख पद मिळणार अशा स्वप्नात होता. गावी येताच त्याने नायकाच्या दुकानात आसन ठोकून मार्क्सवादावर छोटेसे वक्तव्य केले. नायकाच्या दुकानावर रिकामटेकड्या बामणांचा अड्डा असायचा. मार्क्सवादानुसार सर्वत्र वर्गविग्रह होऊन कामगार आपली सत्ता स्थापन करणार असे दिनक्याने भविष्य वर्तवताच अंतू मठकर पंचाची कनवट आवळीत उभा राहिला. सारे श्रोते एकमेकांकडे पाहात कुत्सितपणे हसले. तेव्हा अंतू दिनक्याकडे बघत कुरकुरला, "आमका वाटला तुझ्या घराण्यात फक्त एकच हाफम्याड आसा म्हणून!" एवढेच बोलून अंतू बाहेर पडला. बाकीच मुंड्या हलवीत खो खो हसले आणि जागच्या जागी दिनक्याच्या प्रतिपादनाचा विचका उडाला. मार्क्सवादाची इतकी रोकठोक वासलात अन्यत्र कुठे लागली नसेल.

मार्क्सवादी, काँग्रेसवादी असे अनेक प्रकारचे वादी या गावात वेळोवेळी आले आणि गेले. पण कुठलेही वादी येथे रुजले नाहीत. फक्त वादी आणि प्रतिवादी हे दोनच वादी तेवढे मूळ धरून राहिले. दिनक्याने सांगितलेले भांडवलदारांच्या नफ्याचे आकडे लोकांना महत्त्वाचे वाटले नाहीत. कोर्टात पडणार्‍या तारखांचे आकडे आणि फार तर मुंबईहून येणार्‍या मनीऑर्डरवरले आकडे या आकड्यांशिवाय इतर आकड्यांची भुरळ आमच्या गावकर्‍यांना कधी पडली नाही.

वागण्यात थोडे तिरसट असले तरी या लोकांसारखे सनदशीर लोक दुसरीकडे कुठे सापडायचे नाहीत. किरकोळ भांडणे नेहमीचीच असतात. ती नसतात कुठे? पण शिव्याशापांनी न थांबलेली भांडणे कोर्टात जातील. त्यासाठी हाणामारी होणार नाही. देशावरचा शेतकरी कुर्‍हाड घेऊन खून पाडील. एका घावात शिर धडावेगळे करील, पण आमचा गावकरी तसे करणार नाही. सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला लावलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. क्वचित त्याने हात घातला तरी कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही. उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून त्याने मारला तरी तो लागणार नाही! संताप व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई-बहिणीचा उद्धार करणार्‍या शिव्या द्यायच्या. देण्यासारखे असे त्यांच्यापाशी एवढेच!

गांधीवधानंतर सर्वत्र जाळपोळ झाली. ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांची घरे लुटली. पण आमच्या इकडे तसे काही घडले नाही. "गांधीला मारले ते वाईट झाले, वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? ठार कशाला मारले?" एवढीच प्रतिक्रिया आमच्या गावात झाली. पण जाळपोळ किंवा लुटालूट झाली नाही. नाहीतरी लुटायचे तरी काय? लंगोटीवाल्याने पंचाला हात घालायचा?

गावातले नायकाचे भुसारी दुकान हा गावचा सार्वजनिक अड्डा. सगळे रिकामटेकडे गावकरी आणि विशेषतः नेहमीच रिकामे असलेले बामण या दुकानावर येऊन बसायचे. सारी फुकट फौजदारी तिथून चालायची. नायकाचा पोरगा इंग्रजी दुसरीत जाताच त्याने मोरोबा टाककराचे 'पिकॉकबा पेनकर' असे नामाभिधान करून आपले इंग्रजीचे ज्ञान याच अड्ड्यावरून खर्ची घातले होते.

चरखा फिरवून स्वराज्य मिळणार असे गांधींनी म्हणताच 'चरखो फिरवून स्वराज्य गावला असता तर नांगर फिरव् न शेतात पीक आयला नसता?' एवढीच कुत्सित टीका या अड्ड्यावर झाली होती. बेचाळीस साली रातोरात काँग्रेस पुढार्‍यांना पकडल्याचे वाचताच "पिंजर्‍यात रात्रीचे उंदीर जातत तसे गेले मरे!" एवढी अल्पशी हळहळ याच नायकाच्या दुकानात व्यक्त झाली होती. बर्नार्ड शॉने दाढीवर रस सांडीत रत्नागिरीचे हापूस आंबे खाल्ले हे वाचताच कुणाला काही वाटले नाही. उलट 'म्हातारो आंब्याचो बाटो गळ्यात अडकून मेलो नाय ह्या खूप झाला!" असे उद्गार नायकाच्या दुकानावर निघाले होते. नेहरुंची भेट म्हणून पाठवलेले आंबे इंग्लंडच्या राणीला आवडले हे वाचताच "फुकट गावले तर वाय् ट कित्याक?" एवढे अर्थशास्त्रीय सत्य याच अड्ड्यावरून ध्वनित केले गेले होते.
...

शकुनी नाबर हा याच अड्ड्यातला एक सभासद. नायकाला न विचारता बरणीत विक्रीस ठेवलेल्या खोबरेल तेलाची धार हातात घ्यायचा आणि तेल माथ्याला चोळत घरी जायचा. पण नायकाने त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. नाबराच्या घरी पाठवायची साखर मापताना त्यातून तेलाच्या धारेचे वजन आपोआप कमी व्हायचे. तेलाची धार डोक्यावर घेतली नाही तरी साखरेचे माप ढळणारच याची नाबरला खात्री, आणि साखरेचे माप हे ढळले नाही तरी तेलाची धार वाहणारच याची नायकाला खात्री!

सारे काही तिरकस नजरेने पाहायचे हे आमच्या अंगवळणी पडलेले. लहानपणापासून तेच एक बाळकडू!

- oOo -

पुस्तकः सारे प्रवासी घडीचे
लेखकः जयवंत दळवी
प्रकाशकः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती चौदावी (ऑगस्ट २०११)
पृ. १२६ - १३४.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : सारे प्रवासी घडीचे >>
---


हे वाचले का?

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वेचताना... : परिव्राजक

गौतमीपुत्र कांबळे या लेखकाचे 'परिव्राजक' हे पुस्तक मला सुमारे दहा एक वर्षांपूर्वी मिळाले नि जीएप्रेमी असलेला मी त्याच्या प्रेमात पडलो. 

जीएंच्या पाउलखुणा जरी त्या लेखनात दिसत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या वेगळ्या पार्श्वभूमीमुळे, जीएंप्रमाणेच त्यांच्या स्वतंत्र अशा भूमिकेमुळे, दृष्टिकोनामुळे यातील पाचही कथा वारंवार वाचत गेलो. वास्तवाचे नि कल्पिताचे सांधे जोडणार्‍या जीएंच्या दृष्टान्त कथांना वाट पुसतु जात असल्या, तरी सर्वच कथा वेगवेगळ्या असूनही एक सूत्र घेऊन येतात. निव्वळ विचारांबरोबरच तत्त्वज्ञानाचेही अधिष्ठान घेऊन उभ्या राहतात. 

परिव्राजक

जीए आणि कांबळे यांच्यात एक फरक मात्र दिसतो तो म्हणजे कांबळे यांच्या कथा एका निश्चित निरासावर पोचतात, जो बहुधा आशावादी आहे. अर्थात केवळ शेवट आशावादी असणे हे कथांचे श्रेय मी मानत नाही. हा फरक म्हणूनच नोंदवतो आहे.

सर्वच कथांमधे एक सूत्र असे दिसते की एक मुख्य गाभा पकडून साहित्य, संगीत, शिल्पकला यासंदर्भात तो तपासला जातो आहे. अर्थात उच्च कलामूल्य वगैरे हत्यारे घेऊन येणार्‍यांचा भ्रमनिरास होईल (तसा त्यांचा तो बहुधा होतोच, तेच बहुधा त्यांचे साध्य वा हेतूही असतो.) कारण हे तीनही केवळ संदर्भ म्हणून पाहायचे आहेत, त्यात नवनिर्मिती वगैरे शोधायची नाही. हे केवळ कथांच्या पार्श्वभूमीचे काम करत आहेत हे विसरता कामा नये. 

क्षुद्र परंपरांचा बडिवार, त्यांचे अर्थकारण, सत्ताकारण, सर्वसामान्यांची विचारविग्रहाप्रती असलेली उदासीनता, इतिहासाच्या ढिगार्‍याला विचारण्याचे नेमके प्रश्न सोडून केवळ कुतूहल शमवण्याची दिसणारी वृत्ती इ. गोष्टींना स्पर्श करत त्या कथा पुढे जात आहेत. परंतु दुर्दैवाने हे नेमके पकडून एका वेच्यात दाखवता येईल असा वेचा मला निवडणे शक्य झाले नाही हे आधीच कबूल करतो.

या पुस्तकातून मी तीन वेचे निवडले नि टाईप केले. कदाचित उरलेले दोन नंतर प्रकाशितही करेन. पण आज निवडलेला वेचा आहे तो बुद्धाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरचा. तो संवाद आहे. त्यात आक्षेप आहेत, प्रश्न आहेत नि त्यांची उत्तरे आहेत नि एक संभाव्य कारणमीमांसाही.

-oOo-

विशेष आभारः या पुस्तकाची माझी प्रत गहाळ झाल्यामुळे बेचैन असताना मित्रांना साद घातली नि अपेक्षेप्रमाणे एक मित्र पावला. हे पुस्तक मिळवून दिले याबद्दल 'शरद पाटील' या फेसबुकमित्राचेचे आभार.

---
या पुस्तकातील दोन वेचे:
राजपुत्र >>
नातं >>
---


हे वाचले का?

राजपुत्र

... अनीशाने थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूलाच शांत बसलेला नैसर. अनीशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि ती म्हणाली,

'एक विचारू?'

'विचार.'

असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनीशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनीशा काहीच बोलत नाही असे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला,

'विचार, काहीही विचार.'

मग अनीशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली.

परिव्राजक

"... या मूर्तीतील माणसाविषयी ... पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता-पिता म्हातारेच असणार की! मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हातारा पाहिला असे कसे म्हणता येईल? तसेच इतक्या दिवसांत त्याच्या राज्यात एकही मृत्यू झाला नसेल हेही संभवत नाही, किंवा एकही रोगी नसणे हे ही संभवत नाही किंवा एकही दरिद्री नसणे हे ही संभवत नाही. मग त्या एकाच दिवशी ही चारही दृश्ये प्रथमच पाहिली आणि म्हणून तो मानवाच्या या रूपाने इतका व्यथित झाला की त्याने सगळ्याचाच त्याग केला हे सारेच अतार्किक वाटते. आणि म्हणून तू सांगितलेली सगळी कथाच खोटी वाटते."

नैसरने एक क्षणभर अनीशाकडे पाहिले आणि म्हटले,

"खरोखरीच तू फार हुशार आहेस, खरोखरच तुझी शंका बरोबर आहे. पण सत्य हे केवळ तर्कानेच बांधून ठेवण्याइतकं दुबळं आणि मर्यादित असत नाही. मी तुला प्रथम सांगून टाकतो की मी सांगितलेली कथा खोटी नाही, ती खरीच आहे. हे बघ, तुला माहीत असेल की अलिकडेच सर्व जाणत्या जगाने जो एक नियम स्वीकारला तो एका चिंतकाला कसा सुचला? तर... तर त्याने एकदा एका झाडाचे एक फळ जमिनीवर खाली पडताना पाहिले, आणि पटकन त्याला शंका आली की ते फळ वर का गेले नाही, खालीच कसे आले? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने जो सिद्धांत मांडला तो सर्व जगाने स्वीकारला. ... मात्र तेव्हा कोणी शंका घेतली नाही की, त्याने यापूर्वी झाडावरची फळे खाली पडताना पाहिली नव्हती का? का त्यापूर्वी सगळ्या झाडांची फळे आकाशात वर जात होती?"

नैसरच्या स्पष्टीकरणाने अनीशाचे समाधान झाल्यासारखे वाटले तरी तसे तिचे डोळे कबूल करेनात. तेव्हा नैसर म्हणाला,

"अनीशा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. दिसतं खूप आपणाला, पण आपण ते सारेच पाहात नाही. अनेक म्हातारे, अनेक रोगी आणि अनेक प्रेतं, अनेक दरिद्री आज आपल्याला दिसतात. त्यापैकी आपण एकही पाहात नाही. आणि आपण यापैकी आजही जर म्हातारा / रोगी / प्रेत / दरिद्री पाहिला तर घर सोडून जाऊ."

नैसर दुसर्‍याच कोणत्या अपरिचित भाषेत बोलत आहे असे वाटून अनीशा फक्त त्याच्याकडे पाहात होती. नैसर आणखी खुलासा म्हणून सांगत होता.

"दिसणं आणि पाहाणं यात खूप अंतर आहे. एखादा म्हातारा पाहिल्यावर आपण तरुण आहोत याचा अभिमान शिल्लक राहणं म्हणजे त्या म्हातार्‍याच्या म्हातारपणाला न पाहणं होय. येथे तो म्हातारा फक्त आपणाला दिसला एवढाच त्याचा अर्थ. किंवा एखादा रोगी पाहिल्यावर आपण निरोगी आहोत याबद्दलचा गर्व शिल्लक राहात असेल तर तो रोगी फक्त दिसणंच म्हणता येईल, पाहाणं म्हणता येणार नाही. आणि एखादं प्रेत पाहूनही आपण जिवंत आहोत याबद्दलचा अहंकारच केवळ शिल्लक असेल तर ते प्रेतही दिसले असाच अर्थ होईल, पाहिले असे होणार नाही. आणि दरिद्री पाहून आपण धनवान असल्याचा आपणास गर्व होत असेल तर तो दरिद्रीही दिसला असा अर्थ होईल, पाहिला असा होणार नाही."

अनीशा मूक होती. ती नि:शब्द झाली. तिच्या अंगावर झर्रकन काटा उभा राहिला. दुसर्‍या रात्री* नैसरने सांगायला सुरुवात केली की,

"या राजपुत्राने राज्यत्याग केला त्याला आणखी एक कारण घडलं. ते कारणही तितकंच महत्त्वपूर्ण आहे."

नैसर सांगू लागला...

"तर राजपुत्राच्या राज्याच्या शेजारी आणखी एक राज्य होतं. या दोन्ही राज्यांच्या सीमा सतत वाहणार्‍या नदीने निश्चित केल्या होत्या. पण तरीही नदीला उन्हाळ्यात जरा पाणी कमी असे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या शेतीला पाणी देण्यावरून कधी कधी या दोन्ही राज्यात भांडणे होत.

एकदा उन्हाळ्याच्या दिवसात अशीच खूप भांडणे झाली. आणि शेजारच्या राजाने निर्णय घेतला की या समस्येचा कायमचा निकाल लावायचा. पण समस्येचा निकाल लावणे म्हणजे दुसर्‍या बाजूचा निकाल लावणे असाच अर्थ त्यांनी घेतला, आणि शस्त्रांनिशी तयार झाले. राजपुत्राच्या राज्यातही तीच भावना होती, किंबहुना दोन्हीही राज्यांची ही पाण्याची समस्या सोडविण्याची पद्धत एकच होती. आणि ती म्हणजे समस्येला धक्का न लावता दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना संपविण्यास सिद्ध झालेले... "

राजपुत्राला ही पद्धत मान्य नव्हती. तो आपल्या राज्यातील लोकांना, सैनिकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता की, ही पाण्याची समस्या सोडवण्याचा हा मार्ग नव्हे, यामुळे समस्या सुटणार नाही. उलट तिचे स्वरूप अधिक उग्र आणि जटिल बनेल. शस्त्राचा मार्ग बाजूला ठेवा. दोन्ही राज्यातील प्रमुखांनी एकत्र बसावे, चर्चा करावी. त्यातून दोघांनाही हितकारक मार्ग निघेल. तेव्हा सैनिकांचा प्रमुख हा प्रश्न लढूनच सुटू शकेल असं मानणारा होता. तो म्हणाला,

" हे बघ, तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढलं पाहिजे. आता आम्ही सहन करणार नाही. मारू किंवा मरु."

"ते शक्य नाही. शस्त्राचा मार्ग मला पटत नाही."

'तो भित्रा, दुबळा आणि शस्त्र चालविता न येणारा होता काय?' अनीशाने मधेच विचारले. त्यावर नैसर पुढे सांगू लागला,

"नाही, तो निर्भय होता, सशक्त होता आणि विविध प्रकारच्या शस्त्रकलेत तो पारंगत होता. विशेषतः त्याचा विवाह ठरवण्याच्या वेळी त्याने दाखवलेले शस्त्रनैपुण्य श्रेष्ठ दर्जाचे होते."

"... तर सैनिकांचा प्रमुखही पुन्हा पुन्हा राजपुत्राला आपण लढलंच पाहिजे हे पटवून देत होता आणि राजपुत्रही आपली भूमिका सोडून द्यायला तयार नव्हता. "

मतभेद विकोपाला गेले आणि बैठक भरली. राजपुत्राला पुन्हा एकदा सर्वांनी सांगितले की,"

"तुला आमच्याबरोबर शस्त्र धारण केलं पाहिजे. आणि या समस्येच्या कायमस्वरूपी उपायासाठी तुला मारू किंवा मरू या जिद्दीने लढलंच पाहिजे."

त्या समूहाला उद्देशून मग राजपुत्र बोलला,

"मला तुमचा निर्णय अमान्य आहे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगतो. अरे, तुम्ही जरा डोळे उघडून पाहा तरी! मुळात प्रत्येक मनुष्य दु:खी आहे, शिवाय मृत्यू तर सर्वांनाच आहे. असे असूनही तुम्ही एकमेकांना नष्ट करण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू कसे शकता?"

यावर सैनिकांचा प्रमुख शेवटी रागानेच म्हणाला,

"तुला आमच्याबरोबर शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज झालेच पाहिजे, नाही तर हे राज्य सोडून तुला जावे लागेल."

काही वेळ अत्यंत शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. आता राजपुत्रापुढे सरळ सरळ दोन पर्याय होते. एक म्हणजे शस्त्र हातात घेणे आणि माणसांच्याच विरुद्ध लढणे आणि हे शक्य नसेल तर हे राज्य सोडून निघून जाणे.

राजपुत्राने राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीशी विचारविनिमय केला आणि एकट्यानेच गृहत्यागाचा, राज्यत्यागाचा निर्णय घेतला. आणि त्याबरोबर हाही निर्णय घेतला की,

'अपुर्‍या पाण्यात मासे जसे तडफडतात त्याप्रमाणे माणसे दु:खात तडफडत असतानाही एकमेकांशी अगदी मृत्यूच्या दारातही वैर का करतात याचा शोध घेईन आणि त्यावर उपायही शोधीन.'

यावर अनीशा म्हणाली,

"अशाच एका राजाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या पत्नीला एकटीलाच वनवासासाठी म्हणून अरण्यात सोडून दिल्याचे ऐकले होते. आता या तुझ्या राजपुत्राने आपल्या पत्नीला घरीच सोडले. आणि स्वतः अरण्यात निघून गेला. एकूण काय दोघांनीही आपापल्या पत्नींना सोडून दिले की!"

आज प्रथमच अनीशाच्या रूपाने स्त्री बोलत होती. नैसर शांतपणे म्हणाला,

"चुकतेस तू अनीशा. त्या दोघांची वरवर पाहता एकसारखी कृती वाटत असली तरी फरक आहेच. एक तर एक राजा राज्याच्या कर्तव्यापोटी पत्नीला अरण्यात सोडतो. आणि दुसरा एकूण मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राज्य सोडतो."

"... खरंतर राजपुत्रानं गृहत्याग केल्यानंतर खूप दिवस चिंतन केलं आणि माणसंच माणसांशी वैर करून दु:खी का बनतात याचे कारण शोधले. ते कारण नष्ट कसे करता येईल त्यासाठी निश्चित असा मार्ग शोधला. त्यानंतर असंख्य माणसं त्या मार्गानं चालू लागली. कोणत्याही राज्याच्या सीमा या मार्गाला अडवू नाही शकल्या. या मार्गाने चालणार्‍यांना कधीच नाही फुटले पाय, ना वासनेचे ना तृष्णेचे. म्हणूनच या राजपुत्राने सांगितलेल्या मार्गानं जाणार्‍या प्रत्येकालाच तो दोनच पाय असलेले पाहशील."

इच्छा होऊनही तिनं नैसरच्या डोळ्यात नाही पाहिलं. पण पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं तिनं विचारलं,

"मग मला सांग, तुझ्या राजपुत्रानं गृहत्याग करण्याचं खरं कारण कोणतं? ते पहिलं सांगितलंस ते की एक म्हातारा, रोगी, प्रेत आणि दरिद्री पाहिला म्हणून गृहत्याग केला की आता नंतर सांगितलंस ते की पाण्याच्या वादातून त्याला घर नि राज्यही सोडावं लागलं ते?"

नैसरने शांतपणे डोळे मिटले. एक सुस्कारा टाकला आणि हळूहळू डोळे उघडून त्या भव्य मूर्तीत स्वतःचे डोळे हरवून बसला. आणि अनीशाला उद्देशून म्हणाला,

"अनीशा, खरं सांगायचं तर त्या राजपुत्रानं घर आणि राज्य का सोडलं केवळ ते महत्त्वाचं नाहीच. महत्त्वाचं आहे ते घर सोडून त्यानं काय केलं ते. नाहीतर घर सोडणारे सगळेच... डोंगराच्या पोटात जिवंत दगड होऊन बसले असते, अगदी तू आणि मी सुद्धा!"

- oOo -

* क्षणी?

---

पुस्तकः 'परिव्राजक'
लेखकः गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशकः सेक्युलर पब्लिकेशन
दुसरी आवृत्ती (२००९)
(पहिली आवृत्ती: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस,२००४)
पृ. ५७ - ६१.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : परिव्राजक >>
नातं>>
---


हे वाचले का?

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जबाब

पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे.

उद्ध्वस्त धर्मशाळा

तो: फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त... ते सांडून शस्त्रांनी गनिमी युद्धाच्या मदतीनं इथं राजकीय उलथापालथ घडवून आणायची ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा मोठा देश आहे. ह्या सबंध देशाला कार्यप्रवण - कसलंही कार्य, हिंसक काय, अहिंसक काय... करायला फार थोर प्रतिभेचा माणूस पाहिजे. तो मी नव्हे हे मला पक्कं ठाऊक आहे…

बंदुका हाती घेऊनच क्रांती होऊ शकते हे म्हणायला, लोकांना सांगायला ठीक आहे... पण हे सांगणार्‍या माणसाला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्या सांगण्यावर कुणाचा विश्वास कसा बसणार?...

का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? पी. वाय., त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी लिहिण्यात, तिची हुषार मांडणी करण्यात सगळा जन्म जातो! ह्या देशात जितके शब्दकामाठी सांपडतील तितके दुसरीकडे कुठे मिळायचे नाहीत. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्दसुखी माणूस हा भित्रा असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल. स्वतः काय करणार?...

हे ही नाटक थोडावेळ चालतं. मग या शब्दसुख्यांचं प्रचंड नैष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्त्वज्ञ इतिहासजमा होतो. पंचवीस लेख, एकदोन पुस्तकं आणि अगणित भाषणं ह्यापलिकडं त्याच्यापाशी दुसरं काही असंत नाही...

माझ्यापाशीही दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? त्यांची भाषासुद्धा मला समजत नाही. आम्ही या समाजात राहून परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते...

अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घेऊन क्रांती करा असं सांगणं याला काही अर्थ नाही. इतरांचा तर सोडाच पण आमचाच आमच्यावर विश्वास नाही. पी. वाय., हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी कुणाला कशाला शस्त्र घ्यायला सांगीन्...पण असं सांगावसं वाटतं, अगदी जीव ओतून सांगावसं वाटतं - एक मोठा प्रलय घडावा आणि त्यात हे सगळं वाहून जावं असं वाटतं खरं. पर्वतप्राय आग लागावी आणि त्यात आजची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं…

तेव्हढं सांगायची, बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मी ही करू शकेन. पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणेला नुसता आवाज पुरतो... विचारांना आत्मबळ लागतं. ते माझ्यापाशी नाही…

आज आम्ही पराभूत असलोच तर ते त्यामुळं. मग काही नाही. संवयीपोटी चर्चा करतो. मान नेहमी वरती राहावी ह्यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे. त्या शत्रूशी कसं लढावं हे सांगता येत नाही. निदान त्या शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडू नका एवढं सांगतो. मास्तर दुसरं काय सांगणार?...

[दमला आहे. ताण आता अगदी असह्य झाला आहे.]

पी. वाय., आश्चर्य याचं वाटतं की , इतक्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? दहा माणसं ताठ उभं राहून मोडायला शिकतात ह्याची भीती का वाटते? पी. वाय. याचं उत्तर द्या.अगदी प्रामाणिकपणे सांगा. चार अभ्यास मंडळं, एखादं युनियन, एखादी संघटना, दहा-वीस ताठ माणसं यांची तुम्हाला भीती वाटते? पण का?

[जांभेकर आणि क्षीरसागर यांना काही बोलायचे आहे. पी.वाय. दोघांनाही परावृत्त करतात. परिस्थितीचे पुरते नियंत्रण आपल्या हातात आहे हे लक्षात येऊन-]

पी. वाय.: थांबा जांभेकर, तुम्ही नंतर बोला. गोंधळून गेला आहात. आणखी गोंधळात पडू नका.

[जांभेकरांना पी. वाय. च्या आत्मविश्वासाने झपाटून टाकले आहे.]

पी. वाय.: इतकं सगळं लख्ख बोललात आणि अखेरीस अगदी चुकीचा, बालिश प्रश्न विचारलात कुलकर्णी ! सगळं कबूल केलंत आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेलात! नाहीतर हा प्रश्न विचारला नसतात…

आम्ही भीत नाही... अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय…

लढाई जिंकणाराला लढाई कळत नसते. ती कळणारे फक्त दोघं. एक लढाईत पोळणारा आणि दुसरा लढाईपासून पळणारा. श्रीधर विश्वनाथ, मी पळालेला आहे तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळून जायची माझी तयारी नव्हती, तुमची होती…

वांझोटं जळणार्‍यांची भीती इतकीच की त्यांच्यामुळं आमचं पलायन उघड होतं. पळून जाणार्‍यांना ते आवडंत नाही! तेव्हा ही भीती नव्हे. हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं नग्न करणार्‍यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी... ती तुम्हाला द्यावी लागणार आहे…

मला वाईट वाटलं. श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं कारण तुम्ही माझे मित्र आहात…

पण त्याचा इथे काय संबंध? तुमचीही सोय आम्ही करून ठेवली होती. तुमच्यासारख्यांची. 'त्याग', 'तळमळ', 'निरलस कार्य' हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. अट फक्त एक. काम करायचं. पायाला भेगा पडेपर्यंत चालायचं. फक्त लोकांना शत्रू कोण ते सांगायचं नाही. मग तुम्हाला बक्षिसं देण्याचं काम आम्ही केलं असतं. तुमची 'चिंतने' आम्ही पुस्तकरूपात छापली असती. 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' म्हणणारे थोर तत्त्वज्ञ केलं असतं. तुमच्या एकसष्टीला आणि पंचाहत्तरीला मी भाषणे केली असती. तुम्ही बोलला असता. तुमच्या शिष्यांनी तुमचे विचार शब्दांकित केले असते.

अट एकच. आम्ही शत्रू आहोत असं काही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही.

- oOo -

नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण (१९९८)
पृ. ५६ ते ५८.


हे वाचले का?

गुरुवार, २८ जुलै, २०१६

माय

भगीरथ खूप लहान असतानाच त्याची माय चंडी चेटकीण* होऊन गेली होती. मग या झपाटलेल्या चंडीला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलं. कारण अशा लहान मुलांवर करणी करणार्‍या चेटकिणीला मारून टाकता येत नाही. तिला मारलं तर गावातली पोरं जगत नाहीत. मोठ्यांवर चेटूक करणार्‍या डाइनीला जाळून मारून टाकतात, पण अशा 'बॉएन' चेटकिणीला मात्र जिवंत ठेवावं लागतं.

कथा पंचदशी

म्हणूनच चंडीची रवानगी रेल्वेलाईन पलीकडच्या माळरानावर झाली होती. दूरवर एका लहानशा कुडाच्या झोपडीत ती एकटीच रहायची.

भगीरथ मोठा झाला त्याच्या दुसर्‍या मायजवळ. ही यशी नावाची बाई त्याच्याबाबत अगदीच निर्विकार होती. ती ना त्याच्यावर प्रेम करे, ना द्वेष. स्वतःची माय काय चीज असते ते भगीरथला कधी कळलंच नाही. त्यानं फक्त माळरानावरच्या एका छातिम (सप्तपर्णी वृक्ष) वृक्षाखाली एक कुडाची झोपडी तेवढी पाहिली होती आणि त्या झोपडीत चंडी चेटकीण राहते असं ऐकलं होतं.

ही चंडी कुणाची जन्मदात्री असू शकते, असं वाटणंही शक्य नव्हतं. दुरून तिच्या लहानशा झोपडीवर झेंड्यासारखी लाल कापडाची चिंधी उडताना दिसायची. कधी कधी भर चैत्राच्या रणरणत्या दुपारी ती आपल्याच नादात हातातल्या टिनाच्या डबड्यावर काठीनं ढणढण आवाज करत तळ्याकडे जाताना दिसायची. तिच्या मागोमान एक कुत्रं.

चेटकिणीनं कुठंही जाताना टिनाचा आवाज करत जायचं असतं, कारण तिची नजर कुणावरही पडली तरी ताबडतोब ती त्याच्या अंगातलं सगळं रक्त शोषून घेते म्हणे!

म्हणूनच तर तिला एकटं राहावं लागतं. तिच्या टिनाचा आवाज ऐकू आला की सगळे आबालवृद्ध रस्ता सोडून निघून जातात.

एक दिवस, फक्त एकच दिवस, भगीरथनं मलिंदरला, म्हणजे त्याच्या बापाला त्या चेटकिणीशी बोलताना पाहिलं होतं.

"भगीरथ, वर बघू नको, खाली पहा." बापानं धमकावलं होतं.

चेटकीण त्या तळ्याच्या दलदलीतून धपाधप पावलं टाकत तळ्यापलीकडच्या काठाशी येऊन उभी राहिली. भगीरथनं ओझरतं पाहिलं, तळ्यातल्या पाण्यातलं त्या बाईचं प्रतिबिंब - लाल पातळ, रापलेला चेहरा आणि डोक्यावर जटांचा जुडा - आणि तिची ती वखवखीत नजर, जणू भगीरथला डोळ्यांनीच गिळून टाकेल की काय!

नाही, भगीरथनं तिच्याकडं डोळे उचलून पाहिलंच नाही.

भगीरथनं जसं त्या तळ्यातल्या पाण्यात तिचं प्रतिबिंब पाहिलं तसंच तिनंही त्याचं प्रतिबिंब पाहिलं होतं. शहारून भगीरथनं डोळे गच्च गिळून घेतले होते, बापाचं धोतर घट्ट धरून ठेवलं होतं.

"कशाला आली इथं?" भगीरथचा बाप तिच्यावर खेकसला होता.

"डोक्याला लावायला थेंबभर तेल नाही गंगापुत्र, घरात रॉकेल नाही, फार भीती वाटते ते मला एकटीला अंधारात."

चेटकीण रडत होती, पाण्यातल्या छायेत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपकत होतं.

"का बॉ? या शनवारचा शिधा नाही भेटला?"

दर शनिवारी पाळीपाळीनं डोमपाड्यातला एकएक जण टोपली घेऊन जात असे. त्या टोपलीत तांदूळ, डाळ, मीठ, तेल ठेवून ती टोपली झाडापाशी ठेवायची आणि झाडाला साक्षी ठेवून 'यावेळचा शिधा दिला गं' असं ओरडून तिथून पळ ठोकून परत यायचं अशी पद्धत होती.

"भेटला, पण कुत्र्यानं खाऊन टाकला."

"पैसे पायजे का पैसे? घे पैसे-"

"पण मला कोण काय विकत देणार?"

"मीच घेऊन देईन विकत, पण जा आता. चालती हो इथनं-"

"मी एकटी नाही राहू शकत गंगापुत्र."

"मग चेटकीण कशाला झाली? चल नीघ म्हणतो ना-"

भगीरथच्या बापानं तिला हाकलण्यासाठी मूठभर चिखलाचा गोळा उचलला.

"गंगापुत्र, हा बेटा-"

एक गलिच्छ शिवी हासडत भगीरथच्या बापानं चिखलाचा गोळा तिला फेकून मारला - मग पळून गेली ती चंडी चेटकीण.

"बापा, तू चेटकिणीशी बोलला?"

भगीरथ खूप घाबरून गेला होता. चेटकिणीशी बोलणारं माणूस मरून जातं ना. भगीरथला वाटलं, आपला बाप आता मरणार. बापाच्या मरणाच्या कल्पनेनंही त्याच्या अंगातून वीज चमकून गेली. बाप मेला तर ती सावत्र आई आपल्याला घरातून हाकलून देईल हे नक्की.

"अरे बापू, ती चेटकीण असली तरी तुझी माय आहे."

- oOo -

पुस्तकः कथा पंचदशी
लेखक/अनुवादकः महाश्वेता देवी/वीणा आलासे
प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन
प्रथमावृत्ती (जानेवारी २०१२)
पृ. ६४-६६
---

*इथे चेटकीण हा शब्द वापरला आहे, तर याच कथेवर पुढे अमोल पालेकरांनी या कथेवर 'मातीमाय' नावाचा चित्रपट काढला त्यात 'लाव' असा शब्द वापरला आहे.

याच कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या 'रुदाली' या कथेवर त्याच नावाचा हिंदी चित्रपटही निर्माण करण्यात आला आहे.


हे वाचले का?

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

राडीनोगा

मांबा हा आफ्रिकेतला सर्वात भयानक साप मानला जातो. जगातल्या अतिविषारी सापांत त्याचा क्रम बराच वरचा आहे. पूर्ण वाढ झालेल्या 'मांबा'ची लांबी १० फुटांपेक्षा जास्त असते. अतिशय चपळ असलेला हा नाग तितकाच आक्रमकही असतो. तो अतिशय सावध असतो नि आसपास जराशी हालचाल झाली की तो झटकन आक्रमक पवित्रा घेतो. फणा उभारलेली, उघड्या तोंडातून जीभ बाहेर येते आहे, त्यातून येणारे त्याचे फुस्कारे हे दृश्य भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडवते. यास्थितीत तो कुठल्याही दिशेस हल्ला करू शकतो. या वेळची त्याची झेप भयावह असते. घोड्यावर बसलेल्या माणसावरही हल्ला करण्याची क्षमता या झेपेत असते. मांबाचं विष चेताहारी असतं. या विषाचे दोन थेंब शरीरात गेलं की ३० सेकंदात माणूस मरतो.

'मांबा'चा आफ्रिकन जनमानसावर इतका प्रचंड पगडा आहे, की कुणीही माणूस कुठलाही साप बघितला की त्याला 'हिरवा' किंवा 'काळा' मांबा दिसला असं सांगतो. 'हिरवा' नि 'काळा' हे रंग वेगळे असले तरी दोघांचं विष तितकंच विषारी असतं. फक्त काळा मांबा हिरव्या मांबापेक्षा अधिक भयानक दिसतो. पण त्यामुळं आफ्रिकेत वावरणारे 'सापपकडे' अशा मांबाच्या वार्तेकडे दुर्लक्ष करतात.

निसर्गपुत्र

या वेळी कुणीतरी बोशियरला मांबाची बातमी दिली. हा मांबा एका वाळवीच्या वारुळात अडकला होता. मांबा नि इतर साप हे बरेचदा अशा वारुळात विश्रांती घेतात. खाणं किंवा जोडीदार यांच्या शोधात ते बाहेर पडतात नि मग आपल्या ठराविक बिळात परततात. त्यामुळं बोशियर 'नक्की काय आहे?' हे बघायला त्या माणसाबरोबर निघाला.

त्या वारुळाला असंख्य बिळं होती. त्या बिळांमधे स्थानिक लोकांनी दगड भरले होते. आत जर एखादा मोठा साप असेल, तर तो बाहेर पडणं अशक्यच होतं. त्या वारुळाशेजारीच एक स्थानिक आफ्रिकन माणूस उभा होता.रानांवनांत खूप पावसाळे काढलेल्या त्या वृद्धानं त्या सापाचं वर्णन बोशियरला ऐकवलं. या सर्पराजाला आपण नेहमी बघतो, असंही त्यानं सांगितलं. तो मांबाच होता याबद्दल निदान त्या आफ्रिकन माणसाच्या मनात शंका नव्हती. हा मांबा अतिशय चिडका नि आक्रमक होता; नि असा मांबा त्या आफ्रिकनानं उभ्या आयुष्यात बघितलेला नव्हता. हे बोलणं चालू असताना इतर आणखी माणसं जमू लागली.

जवळच्याच तंबाखूच्या मळ्यांत काम करणारे सुमारे शंभराहून अधिक आफ्रिकन शेतमजूर, त्यांच्या पाठोपाठ गोर्‍या मळेवाल्यांचे ट्रक नि गाड्या येऊ लागल्या. या मंडळींनी त्या वारुळापासून दूर सुरक्षित अंतरावर मोक्याच्या जागा पकडून काय घडतंय ते पहायला सुरवात केली. ज्याच्या शेतात हे वारुळ होतं त्या मळेवाल्यानं आपल्या सर्व शेजार्‍यांना निरोप पाठवून हा तमाशा बघायचं आमंत्रण दिलं होतं.

"जगातला सर्वात विषारी साप पकडलेला बघण्यासाठी एवढे प्रेक्षक कुठेच हजर नसतील याची मला खात्री वाटते." असं नंतर बोशियर म्हणाला. बोशियरच्या आणि त्या वारुळाच्याही जवळ एक शस्त्रास्त्रांनी भरलेली मोटर उभी होती. या मोटरीत शॉटगन, पिस्तुलं आदी हत्यारांची रेलचेल होती. जर बोशियरनं साप पकडला तर काही प्रश्नच नव्हता. पण जर चुकून साप बोशियरला चावलाच तर "आम्ही तुला गोळ्या घालून तुझी वेदनांतून सुटका करू नि सूड म्हणून त्या सापालाही गोळ्या घालू." असं आश्वासन त्या मंडळींनी बोशियरला दिलं होतं. त्यांची समजूत घालून त्यांना दूर पिटाळण्यात बोशियरचा बराच वेळ खर्च झाला.

मग बोशियर जमलेल्या प्रेक्षकांकडे वळला. त्याला एका स्वयंसेवकाची मदत हवी होती. बोशियर वारुळ खणत असताना या स्वयंसेवकानं काठी घेऊन त्याच्या शेजारी उभं रहायचं होतं. या मागणीबरोबर तो जमाव शांत झाला. मग त्या सापाला वारुळात अडकवणारा म्हातारा हळूहळू पुढे आला. 'आपण कुठल्याही परिस्थितीत पळून जाणार नाही' असं त्यानं मान्य केलं. तो काठी घेऊन उभा राहिल्यावर बोशियरनं कुदळीनं ते वारुळ फोडायला सुरुवात केली. वाळवीच्या वारुळाचे दोन भाग असतात. त्यातलं बाहेरचं, माती लिंपून घट्टं केलेलं आवरण बोशियरनं फोडलं नि त्याचा पुढचा घाव आतल्या चिकण मातीच्या ओलसर ढेकळात घुसला. ते ढेकूळ बोशियरनं पाडताच वारुळाचा आतला भाग स्पष्ट दिसू लागला. धुरळा बसल्यावर त्या आतल्या भागात वेटोळं घालून बसलेलं ते प्रचंड मोठं धूड, त्याचं बाणासारखं डोकं, काळीभोर चंदेरी किनार असलेली बुबुळं यावरून हा साप मांबाच होता हे स्पष्ट होत होतं. बोशियरनं त्याच्या जंगली आयुष्यात बघितलेल्या मोठ्या सापांत हा मांबा 'सर्वात मोठ्या सापांपैकी एक' होता.

हे पाहताच बोशियरनं कुदळ खाली ठेवली आणि त्या मळ्याच्या मालकाला ढोसून तो साप बघायला जवळ आणलं. साप आपली दुहेरी जीभ बाहेर काढत हे सर्व पहात होता. "तो अतिशय दुष्ट साप होता. माझ्या मनात सापाबद्दल अशी भावना कधीच येत नाही; पण हा साप पाहताच तो घातकी नि दुष्ट आहे याची जाणीव अंगावर शिरशिरी उभी करून जात होती."

त्या शेतकर्‍यानं तो साप बघितला आणि त्याला कापरं भरलं. "हा साप पकडणं अशक्य आहे. मी त्याला गोळी घालतो!" तो बोशियरच्या कानात कुजबुजला. बोशियरलाही तसंच वाटत होतं. पण तरीही त्याला ते पटंत नव्हतं. त्यानं त्या मळेवाल्याला परत ट्रकजवळ सोडलं; आणि तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला. मांबा बोशियरच्या हालचाली एकटक बघत होता. त्या सापाच्या नजरेत एक अनामिक भयकारी शक्ती होती. अशी विखारी नजर त्यापूर्वी बोशियरनं कधीच बघितली नव्हती. बोशियरचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

मग बोशियरनं धीर एकवटून हातातली काठी सापाच्या दिशेनं पुढं सरकवली. साप झटक्यात मागे सरकला. त्याने जबडा वासला नि फुत्कार टाकला. त्या जबड्याच्या निळ्या आवरणावरचे ठिपके बोशियरला स्पष्ट दिसत होते.

"यावेळी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या वृद्धाकडं बघितलं. तो सुद्धा मोहपाशात अडकावा तसा त्या सापाच्या दृष्टीने स्थिरावला होता. ती सापाची नजर होतीच तशी जबरदस्त. पण समोरच्या सापाचं काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे काठीनं त्या सापाचं डोकं दाबून ठेवायाच प्रयत्न करायचं बोशियरनं ठरवलं. दोन तीनदा त्या काठीशी झटापट केल्यावर तो मांबा वारुळाच्या आतल्या भागात निघून गेला. मांबा आत जात असताना बोशियरनं त्याचं शेपूट धरायचा प्रयत्न केला, पण तो कात टाकण्याचा काळ होता; त्यामुळं बोशियरच्या हातात मांबाची मूठभर कात सुटून आली, नि साप आतल्या भागात निघून गेला.

बोशियरनं कुदळ हातात घेतली. आपल्या हातातली काठी त्या म्हातारबुवांच्या हाती दिली नि पुन्हा एकदा तो वारुळ खणण्याचा उद्योग सुरू केला. बराच वेळ अशी उकरा उकर केल्यावर बोशियर त्या वारुळाच्या गाभ्यापर्यंत पोचला. त्याचे वेळी मांबानं डोकं वर काढलं नि त्या धुरळ्यातच तो बोशियरच्या दिशेने झेपावू लागला. बोशियरनं घाई घाईनं त्या वृद्धाच्या हातातली काठी खेचून घेतली. बोशियरच्या आयुष्यातलं सर्पाशी सर्वात घातक युद्ध आता सुरू झालं होतंं. बोशियरच्या डोक्याच्या उंचीची फणा काढून तो मांबा बोशियरच्या दिशेनं झेपावत होता. प्रचंड संतापानं तो फुत्कार सोडत होता. प्रचंड जबडा वासून आपले दात दाखवत तो मांबा बोशियरवर झडप मारायचा. ती झडप चुकवायला बोशियर मग झटकन बाजूला उडी मारायचा. बोशियरला आता तो मांबाच फक्त दिसत होता. आजूबाजूला जमलेले लोक हे सर्व बघताहेत हे बोशियर पूर्णपणे विसरला.

असं होता होता बोशियरला हवी ती संधी मिळाली. त्या मांबानं मारलेली झडप उडी मारून बोशियरनं चुकवली नि त्यावेळेला मांबा तसाच जमिनीवर विसावला. तात्काळ बोशियरनं हातातली काठी त्या मांबाच्या मानेवर दाबली. डोकं उचलायचा मांबाचा प्रयत्न त्यामुळं अयशस्वी ठरला. बोशियरनं मांबाचं मुंडकं आता जमिनीवर दाबून धरलं नि काय घडतंय हे कळायच्या आता त्याची मान पकडली.

मांबा आता भयंकर खवळला. त्यानं शेपटीचे तडाखे बोशियरला हाणले. शेपटीनं बोशियरला विळखे घातले. तो इतकी जोरदार धडपड करत होता, की बहुधा हा मांबा आपल्या हातून सुटणार असं बोशियरला वाटू लागलं. त्यानं खरं म्हणजे दोन्ही हातांनी मांबाची मान पकडली होती, आपली सगळी ताकद एकवटून गच्च पकडली होती. कारण मांबा सुटलाच तर बोशियरचा अवतार त्या क्षणी संपणार होता याची बोशियरला कल्पना होती.

"आता आपला शेवट जवळ आला," असे विचार बोशियरच्या मनात येऊ लागले त्याच सुमारास त्या मांबाचं अंगं लुळं पडलं. तो दमला. त्यानं पराभव मान्य केला याचंच ते चिन्ह होतं. बोशियरनं त्या मांबाला एका कॅन्वासच्या थैलीत बंद केलं.

हळूहळू एक एक करुन ते प्रेक्षक बोशियरजवळ येऊ लागले. आता बोशियरची वाहवा होत होती. एक आफ्रिकन म्हातारी 'त्या सापाचा आत्मा अतिशय दुष्ट होता नि तो साप सामान्य नव्हता' असं सांगत असतानाच जवळच्या झाडीतून एक मनुष्य तिथं आला, नि 'एवढी गर्दी का जमलीय?' म्हणून विचारणा करू लागला.

आता काठी सांभाळणार्‍या वृद्धानं सभेची सूत्र हाती घेतली. त्या दिवशी सकाळी वारूळावर दगड ठेवून ते त्यानं स्वतः कसं बंद केलं इथपासून कथनाला सुरुवात झाली. हळूहळू हे कथन 'साभिनय' बनलं. कधी तो म्हातारा बोशियर बनायचा तर कधी मांबा. त्याच्या भोवती जमलेल्या लोकांचं वर्तुळ बनलं. मात्र या कथेत बोशियरनं साप हवेत असतानाच त्याची मानगूट पकडली होती. त्या बरोबर जमलेल्या सर्वांनी एकच प्रचंड जयजयकार केला नि ते सर्व एक सुरात 'रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा ! रा ऽऽ डी ऽऽ नो ऽऽ गा !' असं ओरडू लागले. राडीनोगा याचा अर्थ 'सापांचा बाप'. त्या दिवसापासून बोशियर 'राडीनोगा' या नव्या नावानं ओळखला जाऊ लागला.

संपूर्ण आफ्रिकेच्या जंगलात 'राडीनोगा'ची कीर्ती पसरली. त्याच्याभोवती जिवंतपणीच दंतकथांचं वलय निर्माण झालं. एकदा तर 'राडीनोगा रागावलाय' या बातमीनं एका गावचा संपूर्ण बाजारच त्या दिवशी बंद करण्यात आला होता.

- oOo -

पुस्तकः निसर्गपुत्र (मूळ पुस्तकः 'द लायटनिंग बर्ड')
लेखक/अनुवादकः लायल् वॉटसन/निरंजन घाटे.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी.
वर्ष: २००२.
पृ. ३१-३३


हे वाचले का?

शनिवार, १६ जुलै, २०१६

धंदा

सरदारजीनं चार आण्याचं नाणं दिलं. झिपर्‍याकडे पाच पैसे यावेळी असणं शक्य नव्हते आणि असते तरी त्यानं भवानीच्या वेळी ते काढले नसते. 'साब, पाच पैसा... छुटा नाय...', त्यानं आवाज केला. सरदारजीनं पुन्हा नुसती मान हालवून 'राहू दे' असं सुचवलं. आज झिपर्‍याचं तकदीर खरोखरंच जोरदार दिसत होतं. पहिल्याच माणसाने भवानी द्यावी आणि भवानीच्या गिर्‍हाईकानं पाच पैसे जादा सोडावे यापेक्षा अधिक मोठा असा शुभशकुन कोणता? झिपर्‍यानं ते नाणं ठोकळ्यावर ठोकलं, कपाळाला लावलं आणि खिशात ठेवलं.

झिपर्‍या

नंतर तर केवळ चमत्कारच घडला. सरदारजीचं संपण्याची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे शेजारच्या माणसानं आपण होऊन आपला बूट पुढे केला. आज झिपर्‍याचा धंदा बरकतीला येणार अशी स्पष्ट लक्षणं दिसंत होती. बाहेर पाऊस असो वा तुफान, असा चमत्कार कधी घडला नव्हता. झिपर्‍यानं त्या दुसर्‍याच्याही बुटाला मऊसूत घोळवून मोठ्या काळजीपूर्वक चमकावून काढलं आणि वीस पैसे खिशात टाकले. कुर्ल्याला गाडी पोचत असतानाच फलाटावरच्या गर्दीनं अंग चेचून निघण्याच्या आधीच झिपर्‍या सफाईनं खाली उतरला आणि धोपटी सावरीत कल्याण बाजूच्या पुलावर चढला. त्याची शोधक नजर इकडे तिकडे फिरत होती... पण त्याला फार काळ शोधावे लागले नाही.

कारण त्या ढगाखाली दडपून गेलेल्या दबल्या सकाळी तेवढ्या गर्दीतही पुलावरून ऐकू येणारे बासरीचे अस्वस्थ सूर कोठून येत होते बरे? त्या खिन्न वातावरणाला सुसंगत असे? एरवी झिपर्‍याला लहानग्या गंजूचं बासरी वाजवणं आवडायचं. आज मात्र हे सूर भलतेच जिव्हारी लागत होते आणि नकोसे वाटत होते. गंजूच्या धोपटीमधे कायम ही लाकडी बासरी असायची. काम नसेल, करमत नसेल, सोबतीला कुणी नसेल किंवा लत लागेल तेव्हा तो कुठल्याही स्टेशनाच्या खांबाला टेकून किंवा पुलाच्या कठड्याला रेलून त्या बासरीतून सूर काढीत रहायचा. गंजू दिसायला अगदीच लहानखोर, बोटं मात्र लांबसडक. त्याला बासरी वाजवणं कुणी शिकवलं नव्हतं. तोच आपण होऊन सिनेमातल्या धून ऐकून ऐकून शिकलेला. पण गंजू काही फक्त सिनेमाची गाणी वाजवायचा असं नव्हे. लहर लागेल तेव्हा तो वाटेल तशी बोटं फिरवायचा. त्यावेळचे सूर मात्र चटका लावणारे असायचे.

सुरांचा माग काढत झिपर्‍यानं गंजूला गाठलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकीत तो म्हणाला, 'ओय फोतर, कायको ये पिरपिर लगाई? जैसा कोई रो रहा हय-'

गंजू ओशाळं हसला आणि त्यानं झटकन आपली बासरी धोपटीत ठेवून दिली. तोवर खुळं हसत नार्‍याही हजर झाला होता आणि दाम्या पूर्वेच्या बाजूनं पूल चढून वर येत होता. जवळ येताच तो ओशाळं हसला आणि सुतकी आवाजात म्हणाला, 'उस्ताद, आज आपली खैर नाय-'

'अबे नय...' झिपर्‍या उसन्या उत्साहानं म्हणाला. एकुण वातावरण बघून त्याचेही हातपाय थंड झाले होते. 'अबे आपलं तं तकदीर उच्चीचं हाये आज. मूर्ताचे दोन गिरायकं. पाठोपाठ. विचारावंच लागलं नाय. आज आपुन धंदा करनार-'

'ओ उस्ताद, कायकू बात मारते-' त्याच्या उसन्याही उत्साहावर पाणी ओतत गंजू बोलला. 'कयसा धंदा बननार आज?'

एव्हाना भरून आलेलं आभाळ खाली ओथंबून आलं होतं. लोंबकळणारे काळे-कभिन्न जड ढग जमिनीवर टेकता की काय असं वाटत होतं. चारी बाजूंनी सन्नाटा दाटून आला होता. उजेड कमी झाला होता.

एकाएकी ढगांचा कडकडाट झाला. विजा चमकल्या. वारे वेगात वाहू लागले आणि मुसळधार पावसाची सर लागली. पाऊस आला ते बरं झालं असं वाटलं एवढा विलक्षण कडक तणाव हवेत आला होता. आता तो तणाव एकावर एक कोसळणार्‍या सरींमधे विरघळून जात होता. छपरावर, जमिनीवर, गाड्यांच्या टपावर वेगानं आदळणार्‍या पावसाच्या टपोर्‍या थेंबांचा एकच नाद रोंरावत होता, एकमेकांचं बोलणंही ऐकू येत नव्हतं. काही वेळानं वाराही वेडावाकडा वाहू लागला. पुलावर सुरक्षित जागी उभे असणार्‍यांनाही पावसाच्या तुषारांचे चारी बाजूंनी चाबकासारखे फटकारे बसू लागले. आता अंग वाचवण्यात काही अर्थ नव्हता. त्याच पुलावरून ते चौघेही कोसळत्या आभाळाकडे बघत नखाशिखांत भिजत उभे राहिले. गंजूचे उदास डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटू लागले आणि त्याच्या नकळत त्याचा हात आपल्या बासरीकडे गेला. पावसाकडे बघत तो उगाच सूर घोळवू लागला. त्या दणक्यात कोणाला ऐकूही येत नव्हतं.

तेवढ्यात डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत पाणी निथळत आहे अशा अवस्थेत पोंब्या आणि असलम आले. तशा अवस्थेतही असलम विडी फुंकत खू: खू: करत होता. पोंब्यानं मात्र आल्या आल्या हर्षभरानं आरोळी ठोकली, 'अहा ऽ ऽ ऽ हा हा ऽ ऽ'... हा .... हा ... आ ऽ ऽ ऽ ऽ हा... हा. हा ... क्या पानी हय, क्या बरसाद हय... अहाहाहा... क्या बादल हय, क्या बिजली हय...'

'और बोल, क्या बंबई हय-' असलमनं त्याची नक्कल करीत आरोळी ठोकली. 'क्या जमाना हय... क्या कमाना हय... वा: वा:'

तेवढ्यात पुन्हा एक वीज कडाडून गेली.

'देखो... देखो... क्या बिजली हय...' दाम्या ओरडला.

'अहाहा ऽ हा... मार डाला', असं ओरडून एक हात कमरेवर ठेवीत आणि एक हात नागासारखा डोलवत पोंब्या आनंदानं नाचू लागला. त्याचं सर्वांग निथळत होतं आणि तो हर्षयुक्त चीत्कार काढीत नाचत होता; ताल धरीत होता - 'हुई-हुई हय-हे... हुई-हुई-हय-हे-- हुई हुई-हा-हा...'

गंजूनं बासरी काढली नि तो तालावर सूर धरू लागला. पाऊस संपण्याची वाट बघत पुलावर उभी असलेली गर्दी हे बघून करमणूक करून घेत होती.

झिपर्‍याही मग त्यात सामील झाला. असलमला तर सिनेमातली हजार गाणी पाठ होती. तो हातवारे करीत गाऊ लागला:

ठैर जरा ओ जानेवाले
बाबू मिस्टर गोरे काले
कबसे बैठे आस लगाये
हम मतवाले पालिशवाले

पोंब्या तसा ठोंब्या होता. पण रंगात येऊन नाचू लागला की धमाल करतो. सिनेमातले नाचणारे त्याच्यापुढे झक मारतील. ब्रेक डान्स, भांगडा, कथ्थक, रॉक, तांडव... काय वाट्टेल तो नाचाचा प्रकार तो मोठ्या लीलेनं करीत असे. आता तर पावसाची नशा चढल्यासारखा हाय हुई करीत तो धमाल वार्‍यासारखा नाचत होता.

ते बघून दाम्याच्याही अंगात स्फुरण आलं. तो ओरडला 'अबे, गांडू... यहाँ क्या कर रह्या... चल नीचे खुले पानी में-' ते सर्व दडदडा जिने उतरून खाली आले. जिन्याखालच्या पानवाल्याच्या कनातीखाली त्यांनी आपल्या धोपट्या टाकल्या आणि आभाळ फाटल्यागत कोसळणार्‍या त्या पावसात उघड्यावर ते नाचू लागले. 'हुई...हुई... हुई... हा-' असा ताल धरत नार्‍या, झिपर्‍या, असलम, पोंब्या आणि दाम्या. गंजू वळचणीला उभा राहून बासरीचे सूर काढत होता. पोंब्या आणि असलम तर व्यावसायिक नर्तक असल्यासारखे मुक्त नाचत होते. पण सर्वात गंमत येत होती नार्‍याची. त्याला काही धड नाचता येत नव्हतं. तो आपले फदाफदा पाय हलवीत होता आणि खुळेपणानं वर हात हेलकावीत पाऊस अंगावर घेत आनंदानं हसत होता. लोकही त्याला हसत होते. मधून मधून तोंडात बोटं खुपसून तालासाठी शीळ घालत होते. वरून पाऊस बरसत होता आणि यांचं हे असं उघड्यावरचं हुंदडणं चालू होतं. काचा गच्चं बंद करून बसलेले ड्रायव्हर्स, रिक्षावाले, आजूबाजूचे दुकानदार आणि छत्र्या न आणल्यानं दुकानांच्या आणि पुलाच्या आडोशाला अडकलेले लोक हसत कौतुकानं या मुक्त पर्जन्यनृत्याकडे बघत होते. दुरून ओरडून दाद देत होते. काही शिट्याही वाजवत होते.

पाच-सहा मिनिटं असा तुफान गोंधळ घातल्यानंतर सारी मुलं थकून पुलाखालच्या आडोशाला आली. पावसाचे वेडेवाकडे सपकारे आता संपले होते. एका स्थिर गतीनं तो आता रिपरिपत कोसळत होता. सरीचा जोर कमी होईल या आशेपोटी दुकानांच्या वळचणींना उभे असलेले लोक कंटाळून आता बाहेर पडू लागले होते. डोक्यावर रुमाल किंवा वर्तमानपत्रांच्या घड्या, ब्रीफकेसेस धरीत धावत-भिजत स्टेशन गाठू लागले होते. रस्त्यांवर छत्र्यांचे ताटवे फुलले होते. फूटपाथच्या कडांना वेगानं पाणी वाढू लागलं होतं. काही ठिकाणी तर रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी आलं होतं. गच्च भरलेल्या बसेस फरारा आवाज करीत लाल पाणी आणि पावसाचे पडदे कापीत होत्या.

मुलं आता गप्प झाली होती. गंजूनं आपली बासरी धोपटीत ठेवून दिली.

अनिर्बंध कोसळणारा पाऊस बघून आलेल्या त्याच्या उधाणाला वाट मिळून गेली होती. आता जेव्हा पाऊस एका सुरात गंभीरपणे बरसू लागला तेव्हा सारी मुलं वळचणीला उभी राहून नुसतीच मिटीमिटी डोळ्यांनी पावसाच्या रेषांकडे बघत उभी राहिली. असलमनं त्याची विडी खिशातून काढली तेव्हा ती पूर्ण भिजून गेली होती. आता अशा या पावसात आपल्या बुटांना पॉलिश करून घेण्याचा वेडेपणा कोण करणार? वळचणीला ठेवलेले सदरे आणि धोपट्याही भिजल्या होत्या. मुलं आपापले शट पिळून काढू लागली. असलमनं पावसात उड्या मारत शेजारचं विडी-सिगारेटचं दुकान गाठलं. ओल्यागार पावसात धुराचा गरम झुरका छातीत जाऊन खळखळून खोकला आला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.

पुलाखालच्या टी-स्टॉलचा मुच्छड मालक डोळे तांबारून या मुलांकडे मिस्किलपणे बघत होता. त्याने यांचा नाच आणि आरडाओरडा पाहिला होता. आत अंधारात स्टोव्हचा फर्रर्र असा आवाज येत होता. त्यावर चहाचं आधण उकळंत होतं. आपल्या मिशीवरून पालथं मनगट फिरवीत मालक उग्रपणे विचारता झाला, 'क्यंव बच्चे लोग, चाय पिओंगे?'

'नय साब, आज तो अभी भवानी बी होनेकी हय... ये बरसात में...'

सगळ्यांना उकळणार्‍या चहाचं आधण दिसत होतं. चहाचा गरम वाफाळ गंध नाकपुड्या सुखवीत होता. अशा बरसत्या ओल्या हवेत चहाला कोण नाही म्हणेल? मुच्छड डाफरला, 'अबे, हम पूछ रहे है, चाय पिओंगे क्या? भवानीकी बात कहाँ आयी? एऽ महादेव... सा गिलास चाय दे आधी हिकडं. जल्दी-'

मोठ्या कृतज्ञतेनं मुलांनी तो फुकटचा गरम गरम चहा पोटात रिचवला. जेव्हा चहा अगदी हवाहवासा वाटत होता आणि खिशात नवा पैसाही नव्हता तेव्हा अचानक तो असा मिळाला यापेक्षा दुसरा चमत्कार कोणता? काही न बोलता मुलांनी आपण होऊन वळचणीवरून धो-धो कोसळणार्‍या स्वच्छ पाण्यानं चहाचे पेले धुवून ठेवले.

चहावाल्याची दुनियादारी बघून असलमला तर भरून आलं. त्याच्या डोक्यावरून अजून पाणी निथळंत होतं. सदरा पूर्ण ओलाच होता आणि गारव्यानं तो थरथरत होता. त्यानं फटाफट चार शिंका दिल्या. एक कोरडी विडी पेटवून पुन्हा एकदा खळखळून खोकला काढला. घशात आलेला मोठा बेडका पावसात थुंकून टाकला आणि तो फिलॉसॉफी मारू लागला.

'देख पोंब्या, मयने कहा था नं? अरे दुनिया काय ऐसी-तैसी चीज नय. अबे, अल्लानं तुमाला पोट दिलं तर पोट भरायची सोय तोच करेल. मानूस उपाशी मरत नाय बघा. कुठून तरी पोटाची सोय होतेच. कोन ना कोन, कुटं तरी मदत करतोच, काय? अल्लाने चोच दिली तो वो दानाबी देताच हय. अब आज देखो, अपना धंदा कहाँ हुवा? आपुन तरी काय करनार. पन या पावसात च्या पाजनारा अल्लानं पाठवलाच की नाय? कुठून तरी येतंच अन्न पोटाला. त्यालाच फिकीर असते. आपुन काय मरनार नय. वो उपरसे सब देखता हय. गरीबोंके तरफ जादा देखता हय. क्यों उस्ताद? देखो, एक पिक्चर याद आया. अम्मीके साथ देखा था. क्या ना उस पिक्चरका? भूल गया. यही कुर्लामें देखा था. पुराना अंग्रेजी पिक्चर था. मगर उसमे डायलाग नहीं था. इतनी हसी आ रही थी, इतनी हसी आ रही थी की बस. अम्मी तो फूटफूटकर हसते हसते रोती थी. तो उस पिक्चर का हीरो था एक गरीब आदमी. उसका एक छोटा लडका. वो दोनो मिलके खाने का मिलाने के लिए अयसी धूम मचाते हय की पूछो मत... तो कहनेका मतलब...'

असलमच्या कथेत आणि तत्त्वज्ञानात कोणाला फारसा रस होता असं नाही. सगळे गप्प राहून ऐकत होते. पण त्यांची नजर होती रस्त्यावरच्या पावसाकडे. वर अंधारून आलेल्या आभाळाकडे. आकाशात करड्या ढगांचा जाड गालिचाच पसरला होता. त्यात कुठे फट दिसत नव्हती. पावसाचा जोर कमी होण्याची लक्षणं नव्हती. आणि जरी आज नंतर पाऊस थांबला तरी धंदा होणं शक्यच नव्हतं.

-oOo-

पुस्तकः 'झिपर्‍या'
लेखकः अरुण साधू
प्रकाशकः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती तिसरी (जून २०१४)
पृ. ४२-४७.


हे वाचले का?

शनिवार, २ जुलै, २०१६

करड्या बछड्याचे जग

भर दुपारच्या प्रखर प्रकाशातून सरपटत गुहेत शिरणारी रानमांजरी बछड्याला दिसली. त्या क्षणी त्याच्या पाठीवरले सारे केस लाट उठल्याप्रमाणे पिंजारत उभे राहिले. समोर मूर्तिमंत भीती उभी आहे हे कळायला अंतःप्रेरणेची गरज नव्हती. आणि ते अपुरं वाटलंच तर दात विचकत तिचं फिस्कारणं आणि मग कर्कश आवाजात ओरडत किंचाळणं कोणाच्याही काळजाचं पाणी करायला पुरेसं होतं.

लांडगा

डिवचल्या गेलेल्या आत्मविश्वासाने करडा बछडा आईशेजारी उभा ठाकला, आवेशाने रानमांजरीवर भुंकला. पण त्याच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता लांडगीने त्याला पाठी ढकललं. अरुंद, बुटक्या प्रवेशद्वारातून आत उडी घेणं रानमांजरीला शक्य नव्हतं. वेड्या रागाने ती सरपटत आत आली आणि लांडगीने झेप घेत तिला खाली चिरडलं. पुढे काय झालं ते बछड्याला नीट दिसलंही नाही. कर्णकर्कश भुंकण्याने, ओरडण्याने, आक्रोशाने गुहा भरून गेली. रानमांजरी तिच्या नखांनी, दातांनी बोचकारत, चावत होती तर लांडगी फक्त दातांनी प्रतिकार करत होती. एक भयंकर झटापट सुरू झाली होती.

एका क्षणी करडा छावाही झेपावला. रानमांजरीच्या मागच्या पायात त्याने दात रुतवले. हिंस्रपणे गुरुगुरतच तो तिच्या पायाला लटकला. त्याच्या वजनामुळे रानमांजरीच्या हालचालींचा वेग मंदावला. त्यामुळे आपली आई वाचली हे त्याला कळलंही नाही. बाजू बदलल्या. पण त्यामुळे तो त्या दोघींच्या वजनाखाली चिरडला. त्याची पकड सुटली. पुढल्याच क्षणी दोन्ही आया एकमेकांपासून दूर झाल्या. परत एकमेकाल भिडण्याआधी रानमांजरीच्या दणकट पंज्याचा फटका बछड्याच्या खांद्यावर बसला. हाडापर्यंत फाडत, मांसाच्या चिंध्या करत तिने बछड्याला गुहेच्या भिंतीवर भिरकावलं. त्या नंतरच्या गर्जनांत बछड्याच्या केविलवाण्या कर्कश किंकाळ्याही मिसळू लागल्या. पण ती झटापट एवढा वेळ चालली होती की रडणं आवरून परत एकदा शौर्याने झेपावण्याची संधी त्याला मिळाली. झटापट संपली तेव्हा परत एकदा रानमांजरीच्या मागल्या पायाला लटकत मिटल्या दातांतून तो हिंस्रपणे गुरगुरत होता.

रानमांजरी ठार झाली, पण लांडगी देखील खूप थकली होती. पहिल्यांदा तिने तिच्या बछड्याला कुरवाळलं, त्याचा जखमी खांदा चाटला. बरंच रक्त वाहून गेल्यामुळे अधिक काही करण्याएवढं त्राण तिच्यात उरलं नव्हतं. सारा दिवस आणि रात्र ती तिच्या वैर्‍याच्या प्रेताशेजारी न हलता पडून राहिली. पाणी प्यायला फक्त नदीवर जायची. तेव्हाही तिच्या हालचाली अगदी हळू व्हायच्या. वेदना तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायची. परत बरं वाटेपर्यंत ते दोघं रानमांजरीचा फडशा पाडत होते. हळूहळू लांडगीच्या जखमा भरल्या. परत एकदा शिकारीसाठी ती बाहेर पडू लागली.

बछड्याचा खांदा अजून अवघडलेला होता. खांद्यावरल्या खोल जखमेमुळंए तो खूप दिवस लंगडत होता. पण आता जग बदललं होतं. आता त्याच्या मनातला कणखरपणा, त्याच्या चालीतील आत्मविश्वास स्पष्ट प्रकट होत होता. रानमांजरीबरोबरच्या लढतीआधी हा कणखरपणा त्याच्यात नव्हता. आता आयुष्याकडे अधिक हिंस्रपणे पाहण्याची ताकद त्याच्यात आली होती. तो लढला होता. वैर्‍याच्या मांसात त्याने दात रुतवले होते. आणि तो अजून जिवंत होता. आता त्याच्या प्रत्येक पावलात आव्हा होतं. त्या आव्हानाला उद्धटपणाचा पुसटसा रंगही होता. तरी अनेक रहस्यं, घाबरवणार्‍या अनाकलनीय घटनांची गुंतागुंत निर्माण करणार्‍या अज्ञाताचं त्याच्यावरलं दडपण जराही कमी झालं नव्हतं.

िकारीला निघालेल्या आईला सोबत करायला त्याने सुरुवात केली. ती सावज कसं पकडते, त्याला ठार कसं करते हे बघता बघता तो ही त्यात भाग घेऊ लागला आणि शिकारीच्या जगातला कायदा त्याला समजला. या जगात दोन प्रकारचे जीव असतात. काही त्याच्यासारखे आणि इतर 'बाकी सारे'. त्याच्यासारख्यांत तो स्वतः आणि त्याची आई होती. दुसर्‍या प्रकारात हलणारे, चालणारे इतर सारे प्राणी होते. या दुसर्‍या प्रकाराचंही त्याने वर्गीकरण केलं होतं. त्याच्यासारखे प्राणी शिकार करून ज्यांचं मांस खातात ते शाकाहारी किंव लहान लहान मांसाहारी प्राणी आणि दुसरे, त्याच्यासारख्यांची शिकार करून खाणारे किंवा त्याच्यासारख्यांकडून मारले जाणारे. आणि मग या वर्गीकरणातून कायदा निर्माण झाला. जीवनाचं उद्दिष्ट मांस होतं. जीवन म्हणजेच मांस होतं. जीवन जीवनावर जगत होतं. जगात खाणारे होते आणि खाद्य ठरणारे होते. कायदा होता 'खा किंवा खाद्य व्हा.' त्याने हा कायदा इतक्या स्पष्टपणे शब्दबद्ध केला नाही, त्याचे नियम अथवा तत्त्वे ठरवली नाहीत. त्याने त्या कायद्याचा विचारही केला नाही. त्या कायद्याचा विचारही न करता तो कायदा जगू लागला.

हा कायदा त्याचा चारही बाजूंना कार्यरत असलेला त्याला दिसत होता. त्याने रानकोंबडीची पिल्लं खाल्ली होती. ससाण्याने त्यांच्या आईलाही खाल्लं. ससाण्याने त्यालाही खाल्लं असतं. मोठं झाल्यावर त्याने ससाण्याला खायचा प्रयत्न केला होता. त्याने रानमांजरीचं पिल्लू खाल्लं होतं. स्वतः खाल्ली गेली नसती तर रानमांजरी त्याला खाणार होती. आणि हे असंच सतत चालू होतं. आजूबाजूला जगणारा प्रत्येक जीव जीवनाचा एक भाग होता. ठार मारणं हा त्याचा जीवनधर्म होता. मांस हेच त्याचं अन्न होतं. जिवंत मांस, वेगाने त्याच्या पुढे धावणारं किंवा हवेत उडणारं, कधी झाडावर चढणारं, नाहीतर जमिनीत दडणारं, काही वेळा सामोरं येऊन त्याच्याशी लढणारं, बाजी पलटून त्याच्या पाठी धावणारं.

करड्या बछड्याने माणसासारखा विचार केला असता तर 'वखवखलेली भूक' एवढाच आयुष्याचा सारांश त्याने काढला असता आणि अनेक प्रकारच्या भुकांनी व्यापलेली जागा म्हणजे जग, असं म्हटलं असतं. पाठलाग करणारी भूक आणि पळणारी भूक, शिकार करणारीम तशी सावज झालेली, खाणारी आणि खाद्य होणारी, आवेशपूर्ण आणि बेशिस्त, आंधळी आणि गोंधळलेली, वखवखून केलेल्या कत्तलीने अंदाधुंदी माजवणारी, दैवाधीन, निर्दय, अनियोजित, अविरत, कधीच न संपणारी भूक!

पण बछड्याचं डोकं माणसासारखं चालत नव्हतं. एवढा सारा गुंतागुंतीचा विचार करणं त्याला शक्य नव्हतं. एका वेळी एकच हेतू त्याच्या मनात यायचा. एका वेळी एकाच आसक्तीमागे धावणं त्याला कळत होतं. मांसाचा कायदा सोडला तर इतरही अगणित कायदे पाळणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. त्यांच जग आश्चर्यांनी भरलेलं होतं. त्याचं उसळतं चैतन्य , त्याच्या शरीराचं झेपावणं हा एक आनंदानुभव होता. मांसामागे धावण्यात चित्तथरारक अनुभव होता. हर्षनिर्भर आत्मानंद होता. त्याचा राग आणि त्याच्या झटापटी त्या आनंदाचाच भाग होता. भीती आणि अद्भुत रहस्ये त्याचं आयुष्य घडवीत होती.

त्याच्या आयुष्यात सुख आणि समाधानही होतं. पोटभर मिळवणं, आळसावून उन्हात लोळणं अशा गोष्टी त्याच्या परिश्रमांचा, धडपडीचा मोबदला होता. खरंतर त्याचे परिश्रम, धडपड मोबदल्यासाठीच होती. त्याच्या आयुष्याचं कारणंच ते होतं. आणि कारणासाठी जगणं कुणालाही आनंदच देतं. त्यामुळे आजूबाजूला वैरभावाने भरलेल्या जगाबद्दल बछड्याची काडीएवढीही तक्रार नव्हती. अतिशय जिवंतपणे, स्वाभिमानाने आणि आनंदाने तो त्याचे जीवन जगत होता.

- oOo -

कादंबरी: 'लांडगा' ('व्हाईट फँग' या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद)
लेखक/अनुवादक: जॅक लंडन/अनंत सामंत
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृ. ६७-७०.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : लांडगा >>


हे वाचले का?

शुक्रवार, १ जुलै, २०१६

वेचित चाललो... कविता



’वेचित चाललो’चे भावंड असलेला ’वेचित चाललो... कविता’ हा स्वतंत्र ब्लॉग आहे. ’वेचित चाललो’ वर ज्याप्रमाणे चित्रे, भाष्यचित्रे, छायाचित्रे, व्हिडिओज यांच्यासह गद्य वेचे संकलित केले आहेत, त्याच धर्तीवर तिथे फक्त कवितांचे संकलन केले आहे. 


परंतु हा ब्लॉग केवळ निमंत्रितांसाठीच खुला आहे. ज्या रसिकांना त्यावर प्रवेश हवा असेल त्यांनी आपले नाव, (आपला पूर्वपरिचय नसल्यास) अल्प परिचय व मुख्य म्हणजे ईमेल अड्रेस ramataram@gmail.com या इमेल अड्रेसवर पाठवून आपली विनंती नोंदवावी.

- oOo -


हे वाचले का?

पराभूत थोरवीच्या शोधात

(प्रस्तावनेतून...)

आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत…

उद्ध्वस्त धर्मशाळा

...त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.

अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्‍यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.

या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठीमागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे…

...हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते की जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही…

ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.

- oOo -

नाटक: 'उद्ध्वस्त धर्मशाळा'
लेखकः गो. पु. देशपांडे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती पहिली, पुनर्मुद्रण(१९९८)
पृ. ८-१०.


हे वाचले का?

बुधवार, २९ जून, २०१६

बहुमत

एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस आपल्या हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला नि त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितले, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता चालू झाली होती.

काजळमाया

"अनादिकालापासून मानससरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला. 'शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवे कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय नि राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एका तरुण कावळ्याने गर्जून सांगितले. परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा तर्‍हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपात स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले "आपलं म्हणणं मला मान्य आहे. मानससरोवर हे हंसांसाठीच आहे. ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट त्या पवित्र परंपरेच्या सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी 'हंस कोण' हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पाहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपणच हंस आहो हे सांगण्यास त्याल प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला "तेव्हा आपण त्या प्रश्नाचा प्रथम निर्णय लावू. येथे उपस्थित सर्वांना आपण एकेक पान आणावयास सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी 'लाल' पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवे पान आणावं."

"पण या ठिकाणी कावळेच संख्येने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द सत्य आहेत. पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात तिथे हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला "पाहिलंत. न्यायनीतीनुसार निर्णय होऊन मी हंस ठरलो आहे. हे इतर सारे माझेच आप्तगण असल्याने अर्थात ते देखील हंसच आहेत. आणि आता आपणच मान्य केलंत की मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेव्हा आता तुम्ही येथून जावं हेच न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. "प्रिया तू खिन्न का?" ती म्हणाली. "पानांच्या राशीने का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल. जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल."

हंस हंसीबरोबर जाण्यासाठी उठून सिद्ध झाला. तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्णगरुडाशी त्याची भेट झाली. त्याने विचारले की "हंस म्हटला की त्याचे मुख मानससरोवराकडे असायचे. पण तू असा विन्मुख होऊन कुठं चाललास?" मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार दिसला.

"मित्रा, मी गरुड आहे की नाही हे पानं गोळा करून ते क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा आणि आपल्या देवदत्त मानससरोवराकडे पाठ वळवू नकोस. उद्या हेच कावळे पानांचे भारे जमा करत माझ्या नंदादेवी कांचनगौरीवर अधिकार सांगू लागतील."

हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण हंस आता प्रज्वलित झाला होता. त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानससरोवरापाशी आली. त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला "मी अत्यंत शांतताप्रिय आहे." त्याचा स्वर खेदापेक्षा दु:खाने कंपित झाला होता. "पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय आणि नि:पक्षपाती निर्णय लागलेला आहे."

आता त्याचा स्वत दु:खापेक्षाही अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञा होताच ते असंख्य कावळे हंस-हंसीवर तुटून पडले व त्यांचे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचा विध्वंस झाला.

पण झाडाच्या ढोलीतून एक खार ती हत्या पहात होती. ती चीत्कारत म्हणाली "गरुडाची गोष्ट निराळी. त्यानं एकदा नखं फिरवली की दहा कावळ्यांच्या चिंध्या होतात. पण तुम्ही झुंजणार कशानं? पांढर्‍या पंखांनी, डौलदार मानेने की माणकांसारख्या चोचीने? प्रतिपक्षाला चांगलीच समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला जाऊच नये.

खारीचा चीत्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि ते सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला.

तात्पर्य काय, स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान-अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहेत. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. दुसरे एक शेष तात्पर्य असे की, तो स्वर मग कितीही तात्त्विक असेना, भोवती कावळे असताना खारीने चीत्कारू नये.

- oOo -

कथासंग्रह: 'काजळमाया'
लेखकः जी. ए. कुलकर्णी.
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२००७)
पृ. २४४-२४६.


हे वाचले का?

मंगळवार, २८ जून, २०१६

एका पानाचा मृत्यू

असंच खचलेलं एक सागवानाचं पान बाजूला लाल मातीवर साचलेल्या पाण्यात पडलं. ऊन आधीपासूनच तिथं पडलेलं होतं. पानानं जागा घेतल्यावर ऊन पानावर. पान पांढरं. बाकीच्या खचलेल्या पानांच्या तुलनेत छोटं. शिरा स्पष्ट. पानाच्या घडबडीत कडा. वरची कड पाण्यात अशी बुडालेली की खरी ती कुठली नि प्रतिबिंब कुठलं ते कळू नये. शेजारी एक काटकी, मळकी. कधीकधी पाटात एखादं पान असं मधेच अडकून पडतं कशाला तरी. दगडाला, फांदीला किंवा असंच कशाला तरी. पण इथं तर पाणी साचलेलंच होतं. आणि पाऊस पडलेला नसल्यामुळं ठप्पच असलेल्या पाण्यात ते पान निवांत.

पान, पाणी नि प्रवाह

हे पान नक्की कुठल्या सागवानाच्या झाडाचं असेल? झाडाला असलेली त्याची गरज संपल्यावर ते गळून गेलं असेल का? झाडानंच त्याला गळायला लावलं असेल का? हे पान पडलं तिथंच कसं पडलं? झाडाला ते कधीपासून फुटायला लागलं नि किती काळ ते झाडावर होतं? ह्या पानाचं मरण कधीपासून सुरू झालं? ह्यातल्या कुठल्याच ऐतिहासिक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. पण सागवानाच्या पानाला तिथं पाण्यात पडताना मी पाहिलं, ते पाहणं तरी नक्की माझ्याकडं होतं. आणि यात माझा काही गुन्हा होता असं मला वाटत नाही.

सागवानाचं लाकूड मजबूत एकदम. त्या मजबूत लाकडाचा अंश राखलेलं ते पान माझ्यासमोर मरायला टेकलेलं. ह्या वाटेवरचे सागवान फार संख्येनं नाहीयेत. त्या एकूण रानात आहेत इतकंच. आणि आहेत तसे बरे. कोण काय त्यांच्या जीवावर उठलेलं दिसलं नाही कधी. अजून इथं जागा आहे. तिथंच एका जागी ते पान पडलं नि एका जागी मी उभा होतो. जवळच होतो आम्ही. मी आणखी जवळ जाऊन पाहिलं. नितळ पाण्यात पडलेलं ते पान सुंदर दिसत होतं. त्या पानासाठी तरी इथल्या झाडांसोबत उभं र्‍हायला हवं होतं. पण मी झाड नव्हतो, त्यामुळं मी एका मर्यादेपलिकडं तिथं उभं राहू शकत नव्हतो. म्हणून मग मी घरी गेलो.

घरी आलो. मी राहातो तो सव्वापाचशे चौरस फुटांचा फ्लॅट एका दुमजली बिल्डिंगमधे आहे. ती बिल्डिंग उभी राहण्यापूर्वी त्या जागी कोण उभं होतं आणि तेव्हा असं एखादं सागवानाचं पान गळून पडलं होतं काय, हे मला कसं कळणार! पण मगाशी मी नितळ पाण्यात पडताना आणि पडल्यावर जे पान पाहात होतो, तेवढं तरी मला कळू शकत होतं. ते पान जोपर्यंत त्या पाण्यात दिसत राहील तोपर्यंत त्या वाटेनं जाऊ ते पाहणं मला भाग होतं.

ऊन पडल्यामुळं पान जास्तीच पांढरंफटक दिसत होतं. त्याच्याकडं एकटक पाहिलं तर वरच्या कडेला भ्रम जास्तच जाणवत होता. ऊन्हामुळं नि पाण्यामुळं असेल ते. ती कडा स्पष्ट-अस्पष्ट होती. माझ्या दोन डोळ्यांनी मी सागवानाचं एक पान पाहात होतो, एवढ तरी नक्की होतं.

आत्ताच्या आत्ता ह्या पानाशेजारी मी मरून पडलो तर काय होईल? थोड्या वेळानं का होईना, माणसं जमतील. ह्या वाटेचा इतिहास पाहता कोणतरी बेवडा पिऊन पडला असेल, असं पहिल्यांदा लोकांना वाटू शकेल. पण मग कधीतरी मेलेला माणूस आहे ते कळेलंच. मग थोड्या वेळानं का होईना, लोकांची थोडी तरी गर्दी होईलच. मग कौटुंबिक किंवा शेजारपाजारचे का होईना, लोक जमतीलच. मग ठरलेल्या जागी नेऊन शरीराची विल्हेवाट लावतीलच. दरम्यान लोकांच्या जरा गप्पा होतील. 'कसा मेला' ते डॉक्टरांमार्फत मधल्यामधे कळून जाईल. काहीही कळलं तरी शेवटची दुसर्‍या माणसांमार्फत शरीराची सुरळीत विल्हेवाट ठरलेली. अगदी असंच होईल असं नाही, पण साधारण असंच. मेल्यानंतरच्या गोष्टीचा अंदाजच बांधता येईल, त्यामुळं 'साधारण असंच'.

पण ह्या पानाची मरणाची वाट वेगळी आहे. कोणी मुद्दाम त्यासाठी जमलेलं नाही. फक्त मी आणि सोबतीनं काही शब्द जमलेत. शब्द असूनही बोलावसं वाटत नाहीये. म्हणून घरी गेलो. लाकडी कपाटातून वही काढली. पहिल्या पानावरच्या पहिल्या ओळीवर पेन टेकवलं नि ठरवलं, त्या पानाचं मरण वाया जाऊ द्यायचं नाही.

पण म्हणजे काय?

म्हणजे बहुतेक पळवाट होती. नक्की काय सांगणार. मेलेल्या पानाचं रोजचं संपत जाणं मी पाहात होतो. सोबतीला शब्द होते. पान मेल्यावर माणसं जमली नाहीत. पण मी मेल्यावर माणसं जमतील. थोडा वेळ तरी, थोडी तरी माणसं जमतील. पर्याय नाही त्यांच्यासमोर सुद्धा. कारण प्रेताची विल्हेवाट तरी लावायला लागेल. तर, माणसं जमतील. माणूस मेल्यावर माणसं जमतात. माणूस मरतानाही माणसं जमतात. माणसाला मारायलाही माणसं जमतात. आणि तशीही माणसं जमतात. तशीही म्हणजे जिवंत असण्यासंबंधीच्या व्यवहारांच्या निमित्तानं. उदाहरणच घ्यायचं झालं तर इथंच पलीकडच्या बाजूला एक जागा आहे, तिचं घेता येईल. तिथं आधी एकदम मोडकळीला आलेल्या चार-पाच कौलारू खोल्या होत्या. वर्षभरापूर्वी तिथं दोन मजल्यांची बिल्डिंग उभी राहिली. आता तिथं जास्ती कुटुंब राहतायत. तिथं कडेला फणसाची झाडं उभी होती, ती आहेत आता त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमधेच. दोन-चार पोफळी होत्या, त्या उडाल्या. चांगली जागा मिळाली ह्या लोकांना. अशी पण राहायच्या सोईसाठी माणसं जमू शकतात.

किंवा तिकडं गोखले नाक्यावर वेगवेगळ्या दुकानांमधे लोक जमतात. काय काय वस्तू, सामान वगैरे घ्यायला. ह्या नाक्याकडं येतात त्या दोन गल्ल्या" मारुती आळी नि राम आळी. मारुती आळीत साधी छोटी मशीद होती, ती आता काळ्या काचा लावलेली पांढर्‍या रंगाच्या बिल्डिंगमधली मशीद होऊ घातलेय. राम आळीत चिर्‍यांचं, कौलारू राम मंदिर होतं, तिथं आता संगमरवरी बांधणीमधलं उंच कळस असलेलं मंदिर आहे. इथं पण लोक जमतात. ह्या आळ्या मेन रोडच्या एका बाजूला आहेत, पलीकडच्या बाजूला एस्टी स्टँड. एस्टी स्टँडवर तर जमतातच जमतात लोक. त्याच मेन रोडला पुढं खाली दर मंगळवारी आठवडा बाजारात तर बरेच लोक जमतात. एवढे लोक ते सागवानाचं पान सापडलं त्या वाटेवर जमत नाहीत.

सागवानाच्या पानाच्या मरणाला माणसं जमत नाहीत. का जमत नाहीत? कदाचित पानाची गोष्ट फुटकळ असेल. मग लोक कशासाठी जमतात. जमून काय करतात?
...

ही पानं जपून ठेवायची मला सवय आहे. सवय, असं म्हटलं तरी जरा लांबचं म्हटल्यासारखं होईल. खरं तर ते आपलं आहेच सोबत, नाकासारखं नि पोटासारखं. अशाच गोष्टींमुळं ते सागवानाचं पानसुद्धा मला दिसलं. मी एकटा होतो तेव्हा नि ते सुद्धा एकटं होतं तेव्हा. ते मरत होतं, मी जिवंत होतो.

-oOo-

कादंबरी: 'पान, पाणी नि प्रवाह'
लेखकः अवधूत डोंगरे
प्रकाशकः प्रफुल्लता प्रकाशन
आवृत्ती पहिली (२०१५) पृ. ९-१२.


हे वाचले का?