रविवार, २४ डिसेंबर, २०२३

अबोला

वैशाखातील दुपार खंजिरासारखी तळपत होती. उन्हाच्या सणक्यानं सगळं गाव निपचित पडलं होतं. वारा वाहत नव्हता. झाडं हलत नव्हती. कुठंच हालचाल नव्हती, गजबज नव्हती. छपरांच्या सावलीला गुरं निवांत होती. भिंतीच्या कडेशी माती उकरून कोंबड्या गपचीप बसल्या होत्या, पाय पोटाशी घेऊन आणि गोल डोळ्यांवर पापण्यांचे पांढरे पडदे ओढून डुलक्या घेत होत्या. डालपाट्याखाली कोंडलेल्या कोकराची धडपड थांबली होती. लिंबाच्या डहाळ्यात बसलेल्या साळुंक्या बोलत नव्हत्या. कावळ्यांची जोडपीही एकमेकांना बिलगून निश्चल बसली होती. कुत्री राडीत बसून ल्हा-ल्हा करीत होती. कुंभाराची गाढवं झाडाच्या सावलीला दिडक्या पायावर उभी होती. सारं खेडं उन्हाच्या तापानं मरगळून गेलं होतं.

रानमेवा

आपल्या घरात सोप्यात मिरी एकटीच गजग्यांनी खेळत होती. रंगीत बांगड्यांचे तुकडे मोजीत होती. गालावर येणारे भुरे केस सावरीत होती. आपल्याशीच काही बडबडत होती. पण तिला करमत नव्हतं. तिचं मन रंगीत काचात, गजग्यांत रमत नव्हतं. परटाची सुबा चार-सहा दिवस घरी येण्याची बंद झाली होती. त्या दोघींचं भांडण झालं नव्हतं. गट्टी फू झाली नव्हती, तरीही सुबा घरी येत नव्हती. कुठं भेटली तर बोलत नव्हती. हसत नव्हती. त्या पोरी एकमेकींपासून का तुटल्या होत्या? त्या जिवलग मैत्रिणी एकमेकींशी का बोलत नव्हत्या? चार-सहा दिवसांपूर्वी मिराच्या आईनं मिरीला बजावलं होतं, “मिरे, परटाच्या पोरीशी खेळू नकोस, तिच्या घरी जाऊ नकोस.”

“का आई?”

“का आणि कशासाठी! खेळत जाऊ नकोस म्हणून सांगितलं ना?”

“पण तिनं काय केलंय?”

“तिनं नाही, तिच्या आईनं केलंय!”

“काय?”

“तुला नाही समजायचं ते सांगून. पण यापुढं तिच्या घरी जाऊ नकोस, समजलं?”

मिरीला मुळीच समजलं नाही. आई कामाला लागली तेव्हा तिच्या ओल्या पदराशी झटत तिनं सारखी भुणभुण लावली.

“सांग ना गं आई–”

ओचा हिसकून रागानं आई विचारी, “काय गं, कार्टे, काय सांगू तुला?”

“सुबाच्या घरी का जायचं नाही?”

“नाही जायचं. तिची आई चांगली नाही.”

“काय करते ती?”

“काय सांगू तुला, माझं कपाळ!”

“सांग ना गं!”

मिरीनं खंदूस घातला, तेव्हा आई चिडली. दात-ओठ खाऊन बोलली, “अगं, कार्टे, नवऱ्याच्या मागं चांगली राहिली नाही तिची आई.”

“म्हणजे काय केलं तिनं?”

“बावा केलान. समजलं?”

तरीही मिरीला काही समजलं नाही. एवढाच अर्थबोध झाला की, सुबाच्या आईनं अशी गोष्ट केली की, जी चांगली समजली जात नाही. एवढ्या बोधानं पूर्णतः नाही तरी तिचं थोडकं समाधान झालं आणि त्याच दिवशी काचकवड्यानं खेळायला आलेल्या सुबाला गाल फुगवून तिनं सांगितलं, “सुबा, तुझ्याशी खेळू नको म्हणून सांगितलंय आपल्या आईनं!”

सुबा परकर चघळत म्हणाली, “का गं, मी का भांडलीया तुझ्याशी?”

“नाही. पण तुझी आई चांगली नाही. तिनं बावा केलाय.”

म्हणजे काय केलं? सुबालाही काही कळलं नाही. पण बामणाच्या मिरीनं आपल्याशी खेळू नये असं काहीतरी आपल्या आईनं केलंय, हे तिला उमगलं आणि त्यामुळं तिचा अपमान झाला. एकाएकी ती रडू लागली. आणि रडतरडतच आपल्या घरी आली.

सुबा रडली म्हणून मिरीही रडली. चिंध्यांची बाहुली उराशी धरून रडली आणि रडता रडताच सोप्यात झोपी गेली.

सुबा घरी गेली आणि तिनं आपल्या आईला विचारलं, “आये, तू बावा का केलास?”

तेव्हा उत्तर देण्याऐवजी तिच्या आईनं फुकणीनं तिची पाठ सडकली. जेवू न घालता उपाशी ठेवली. तिला घरात कोंडून ती बाहेर निघून गेली.

बंद दारावर लाथाबुक्क्या मारून सुबा ओरड-ओरड ओरडली. थुकली, ओकली आणि दमून दाराशेजारी झोपी गेली. चार-सहा दिवसांपूर्वी असा प्रकार घडला आणि त्या मैत्रिणी एकमेकींशी बोलेनाशा झाल्या.

म्हणून मिरी आज एकटीच खेळत होती. तिला करमत नव्हतं. परटाच्या सुबाच्या घरी जावं, असं तिला सारखं वाटत होतं. पण आईच्या माराचं भय जबर होतं. तिनं सांगितलं होतं की, पुन्हा त्या पोरीशी खेळशील तर उलटी टांगून मारीन. अंधाऱ्या खोलीत डांबून घालीन! परटाच्या सुबानं असं काय केलं होतं? तिच्या आईच्या हातून अशी कोणती चूक झाली होती? मिरीला काही कळत नव्हतं. तिला सुबावाचून करमत नव्हतं. एकटीनंच काय खेळायचं?

गजगे गोळा करून मिरी उगीच बसली. बाहेर उन्हाकडे बघवत नव्हतं. डोळे दिपत होते. सगळीकडे उदास शांतता पसरली होती.

मग स्वयंपाकघरातून आई ओरडली, “मिरे, इकडे ये जरा!”

परकर उचलून धरून मिरी आत गेली.

“काय आई?”

फडक्यात बांधलेली थाळी उचलून देत आई म्हणाली, “तुझ्या वडिलांना जेवण देऊन ये जा मळ्यात!”

ओढ्याच्या पलीकडे मळा होता. मिरीचे वडील आंब्याची झाडं राखीत तिथं बसले होते. त्यांना दुपारचं जेवण पोहोचवण्याचं काम मिरीकडं आलं होतं.

उन्ह लागू नये म्हणून आईनं धोतराची घडी पोरीच्या डोक्यावर ठेवली. पायात घालण्यासाठी आपल्या वहाणा दिल्या. आणि ती म्हणाली, “जा, चटकन देऊन ये जा. उशीर झाला आज. भुकेलेले असतील!”

डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी घट्ट पकडून मिरी घराबाहेर पडली. पायातल्या मोठ्या वहाणा ओढीत चालू लागली.

वाट सुबाच्या घरावरून गेली होती. ती आत्ता काय करत असेल? कुणाशी खेळत असेल? पण आपण तिच्या घरी जायचं नाही. तिकडं बघायचंसुद्धा नाही. सुबाची आई वाईट आहे. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं. उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी सुबाच्या घरासमोरून पुढं गेली. तिनं तिकडे वळूनसुद्धा बघितलं नाही!

आपल्या घराच्या उंबऱ्यात खेळ मांडून सुबा बसली होती. तिनं डोळे मोठे करून मिरीला जाताना बघितलं. असल्या उन्हात आपली मैत्रीण एकटीच कुठं गेली? डोक्यावर थाळी घेऊन मळ्यात जेवण पोहोचवायला गेली असावी! तिला भीती नाही का वाटायची एकटीला ? ओढ्यातल्या कवठीखाली भूत आहे. ते तिला खाऊन टाकील, मग आपल्याला मैत्रीण कोण? तिच्या सोबतीला गेलं पाहिजे. पण ती आपल्याशी बोलत नाही. न का बोलेना. आपण न बोलता तिला सोबत जाऊ.

खेळाचा पसारा तसाच टाकून सुबा उठली आणि बाहेर पडली. मिरीच्या मागोमाग जाऊ लागली.

उन्हाच्या सणाक्यानं खालचा फुपोटा तापला होता. त्याचे चटके बसू लागले, तेव्हा पायात काटे मोडल्यासारखी चालू लागली. तोंडानं हाशऽ हूशऽ करू लागली.

मिरीचं तोंड उन्हानं तांबडंलाल झालं. घामाचे ओघळ गालांवर उतरले. डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी धरून, पायापेक्षा दुप्पट मोठ्या वहाणा ओढीत ती चालली होती.

आता त्या दोघींमध्ये केवळ चार-सहा पावलांचं अंतर राहिलं. पावलांचा आवाज, चटके बसल्यामुळे तोंडातून निघालेला आवाज यामुळे मिरीची खात्री झाली की सुबा आपल्यामागून येत आहे. डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच तिनं मागं पाहिलंही.

दोघीही न बोलता चालू लागल्या.

गावाबाहेरचं खंडोबाचं देऊळ आलं, मागं पडलं. ओढ्याचा खडकाळ उतार उतरून दोघीही वाळूत शिरल्या. रुंद पात्र असलेल्या ओढ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. सगळीकडे वैराण वाळू, ती तापलेली.

तापलेल्या हवेचे थर वाळूवरून सळसळत होते. त्याच्याकडे बघत मिरी जात होती. वाळूतून गेलेल्या गाडीची लांबच लांब चाकोरी उठली होती. तिच्यातून मळ्याकडे जात होती.

सुबाचे पाय फार भाजू लागले. तिच्या कानातून कळा येऊ लागल्या. तरी ती ओठावर ओठ दाबून चालतच होती. मैत्रिणीमागून जातच होती.

सुबा आपल्यामागून येत आहे, ही जाणीव मिरीला होती. पलीकडच्या काठावर असलेल्या कवठीच्या झाडावर भूत आहे, त्यानं आपल्याला खाऊ नये म्हणून ती सोबतीला आली आहे, हेही तिला कळलं. कारण आजपर्यंत त्याच कारणासाठी तिनं अनेकदा सुबाला आपल्याबरोबर मळ्यात नेलं होतं.

दोघीही मैत्रिणी ओढ्याच्या मध्यापर्यंत आल्या आणि पुढं चालणारी मिरी एकाएकी थांबली. त्याबरोबर मागून चालणारी सुबाही थांबली. कधी टाचेवर तर कधी चवड्यावर, कधी डावा पाय उचल तर कधी उजवा उचल, असं करीत उभी राहिली. मिरीनं वहाणा काढल्या आणि उघड्या पायानं ती वाळूत उभी राहिली. आणि तिला कळून चुकलं की, वाळू फार तापली आहे. पायात वहाणा असल्याशिवाय अर्धेअधिक चालून येणंदेखील कठीण आहे! मग पायातल्या वहाणा तिनं तिथंच ठेवल्या आणि ती मुकाट्यानं पुढं चालू लागली.

सुबा वहाणांपाशी आली. चटकन तिनं त्या घातल्या. पोळलेले पाय थोडेफार थंड झाले. मोठ्या वहाणा ओढीत ती चालू लागली. अनवाणी चालणाऱ्या मिरीमागोमाग जाऊ लागली. वाळवंट संपलं. कवठीचं मोठं झाड आलं. उंचच्या उंच झाड. त्याच्या एका फांदीवर लाल मानेचं काळं गिधाड बसलं होतं.

दोघींनीही डोळे गच्च मिटून घेतले. तोंडानं राम-राम-राम-राम म्हणणं आवश्यक आहे, असं मिरीला वाटलं. सुवाला तसं सांगणं जरुरीचं होतं. पण हिच्याशी बोलायचं नाही! मग? सुबाऐवजीसुद्धा ती आपणच रामराम म्हणू लागली. कवठीचं झाड मार्ग पडलं. माळरान आलं. वाटेकडेला झाडं-झुडपं होती. त्या सावलीतून दोघी चालू लागल्या. न बोलता, न हसता.

मग मळ्याची हद्द लागली तशी मिरी थांबली. सुबा पुढं झाली. तिच्या पायापाशी आपल्या पायातील वहाणा काढून ठेवून, पुन्हा झाडाच्या सावलीला गेली. आत्ता मळा मिरीचा होता आणि भांडणाच्या नियमाप्रमाणे सुबाला त्याच्यात पाय टाकायचा नव्हता. सावली असल्यामुळे वहाणांची जरुरी नव्हती. मिरीला रानातून जायचं होतं. काटेकुटे बोचण्याचा संभव होता. पुढं ठेवलेल्या वहाणा पायात घालून मिरी मुकाट्यानं बांधावरून जाऊ लागली.

पुढं हिरवीगार आंब्याची झाडं होती. फळांचे घोस लोंबत होते. त्यांची राखण करीत मिरीचे वडील बसले होते. आंब्याच्या खोडाशी पटका उशाला घेऊन टेकले होते.

उन्हाच्या भगभगीतून त्या थंडगार सावलीत येताच, मिरीच्या नाकपुड्या फुगल्या. पाडाला आलेल्या आंब्यांचा सुरेख वास. गार आणि गोड वास आला तो हुंगून वनातल्या परीसारखी ती वडिलांपाशी गेली आणि त्यांना गुंगीतून जागं करीत म्हणाली, “अप्पा, अप्पा, तुमचं जेवण आणलं मी!”

अप्पा डुलकीतून जागे झाले. शेंडी गोंजारीत उठून बसले. पोरीच्या तोंडावरचा धाम धोतरानं पुशीत म्हणाले, “उन लागलं गं माझ्या बाईला. एकटा आलास तू राजा?”

त्यांच्या छातीवर डोकं घुसमडत मिरी म्हणाली, “हो अप्पा!”

खरं तर तिला सुबा आल्याचं सांगायचं होतं. तिच्या आईनं काय वाईट केलंय, तेही विचारायचं होतं. पण अप्पांच्या मिशांची, खाकी रंगाच्या शिकारी कोटाची, जाड आणि केसाळ बोटांची तिला फार भीती होती. फारच. मग ती एकाएकी उठली आणि म्हणाली, “अप्पा, आम्ही जातो!”

“बरं, जा हं!”

मग अप्पांनी धोतराखाली ठेवलेला एक पाडाचा आंबा काढून, मुलीला दिला. हिरव्यापिवळ्या रंगाचा मोठा आंबा, तो ओच्यात घेऊन मिरी परत घरी निघाली. मोठ्या वहाणा ओढत आणि डोक्यावर धोतराची घडी घेऊन.

झाडाच्या सावलीत सुबा उभी राहिली होती. खारोट्यांकडे बघत आणि परकर चोखत. मिरी येताच ती निमूट तिच्यामागं जाऊ लागली. न बोलता, न हसता.

मिरीनं ओच्यातील आंबा काढला आणि तो चोखत-चोखत जाऊ लागली. तिच्यामागोमाग सुबा.

ओढ्याच्या अलीकडे येईतो मिरीनं आंबा चोखला. तो निम्मा राहिला तेव्हा एका दगडावर ठेवला आणि ती सुबाला काहीही न सांगता, वाळूत उतरली.

सुबानं तो आंबा निमूटपणे घेतला आणि चोखत-चोखत ती मिरीच्या मागोमाग जाऊ लागली. पायाला चटके बसत होते आणि तोंडात गोड रस जात होता. कपाळावर घाम येत होता आणि गाल पिवळ्या रसानं माखत होते.

अर्धे वाळवंट संपताच मिरीनं वहाणा काढून ठेवल्या आणि ती पुढं गेली. सुबानं त्या घातल्या आणि मिरीच्या मागोमाग गेली.

दरड संपली. खंडोबाचं देऊळ मागं पडलं. घर आलं. आंब्याची बाठ आणि साल फेकून सुबानं तोंड पुसलं, वहाणा काढून मिरीपुढं ठेवल्या आणि आपल्या घराच्या उंबऱ्यात उभी राहून, ती मैत्रिणीकडे बघत राहिली.

मिरी पाठमोरी चालली होती. तिला वाटत होतं की, सुबाच्या घरी जावं. पण सुबाची आई वाईट होती. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं! उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी पुढं निघून गेली. तिनं मागं वळूनसुद्धा बघितलं नाही.

(‘विवेक’, विजयादशमी विशेषांक, १९५०.)

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४५-५०.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)

---

(पुस्तकामध्ये ही कथा ‘बावा’ या शीर्षकाखाली समाविष्ट केलेली आहे.)


यांसारखे आणखी:
    वाळूचा किल्ला
    एका गोष्टीची गोष्ट


हे वाचले का?

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

देवकथा बोलतात तेव्हा...

कांचीपुरम् किंवा कांची हे नाव आपण अनेकदा ऐकले आहे. कधी तिथल्या बालमजुरांच्या शोषणाबद्दलच्या हकिकती वाचून आपण हळहळलो आहोत, तर कधी तिथून आलेल्या शंकराचार्यांच्या आगमनाच्या, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कधी तिथल्या रेशमी साड्यांचं प्राचीन, सुलक्षणी वैभव पाहताना आपण हरखलो आहोत, तर एखाद्या प्रवाशानं तिथल्या बाजारपेठेबरोबरच तिथल्या मंदिरांचं महत्त्वही आपल्याला ऐकवलं आहे.

जर दक्षिणेत गेलात तर कांचीला एकदा जरूर जा. प्रवासी माणसांचं प्रांजळ कुतूहल आणि उत्सुकता बरोबर घेऊन जा. मदुरा आणि कुंभकोणम्‌सारखंच हे देवळांचं गाव तुम्हाला दिसेल. हे कामाक्षीचं गाव. सारीपाट खेळताना शिवावर पार्वतीनं मात केली आणि आनंदाच्या भरात ती आदिमाया असं काही तरी बोलली की शिवमहेश्वराला ते बोलणं फारच लागलं, मुळातला तो साधाभोळा देव, पण रागावला की पहायला नको. त्यानं गौरीला म्हटलं, ‘कुरूप होशील आणि पृथ्वीवर जाऊन पडशील.’ शाप खरा ठरला आणि पार्वती कांचीला आली. इथं तिनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठे तप मांडलं.

शिव मोठा अहंकारी नवरा निघाला. लहानशा थट्टेतल्या बोलण्यावरून तो इतका रागावला की, त्यानं पार्वतीला कुरूपच करून टाकलं. वर तिनं मांडलेल्या तपानंही त्याचं पुरे समाधान झालं नाही. मग त्यानं आपल्या जटेतून गंगेला खाली उतरवलं. मग नदीला पूर आला आणि पार्वतीचं पूजालिंग पाण्याखाली जाणार, या कल्पनेनं ती भयभीत झाली. पाणी वाढू लागलं तेव्हा स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तिनं लिंग उचलून आपल्या छातीशी धरलं. ते पाहिलं आणि शंकर विरघळला. उतरून खाली आला. मग पुन्हा एकदा जगाच्या माता-पित्यांचा सुंदर विवाहसोहळा कांचीमध्ये साजरा झाला.

त्या सोहळ्याची आठवण कांचीनं कामाक्षीच्या रूपानं जपली आहे. पण कांचीत शिवपार्वतीचीच नव्हेत, इतरही पुष्कळ मंदिरं आहेत. वैष्णवांची आहेत. जैनांची आहेत. बौद्धांचीही आहेत. या मंदिरांभोवती अनेक पुराणकथा गुंफल्या आहेत. त्या ऐकाल तुम्ही. कांचीला गेला तर पुजाऱ्यांकडून ऐकाल, एखाद्या वृद्ध भाविकाकडून ऐकाल आणि ऐकता ऐकता त्या अ-लौकिक अशा देवकथांमधून लौकिक असा एक वेगळाच इतिहास तुमच्यापुढे उभा राहील. धर्माच्या बदलत्या प्रभावांचा कथात्म इतिहास.

लोक आणि अभिजात

उदाहरणार्थ पहा, कांचीमधल्या कच्छपेश्वराची कथा. हे मंदिर शिवाचं. मग इथं कच्छ म्हणजे कासव कुठून आलं? कथा अशी आहे की, विश्वाच्या प्रारंभी ज्योतिर्मय लिंगाच्या रूपात शिवाची इथं वस्ती होती. त्यानं इथूनच सारी सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्म्यासह सरस्वतीला सृष्टीचे आदिदेव म्हणून पद बहाल केले.

मग नंतर एकदा समुद्रमंथन झालं. मेरुपर्वताची रवी समुद्राच्या पोटात फिरू लागली. पृथ्वीगर्भाला धक्का लागू नये, म्हणून कासव होऊन विष्णूनं तिला आधार दिला. पण या आपल्या कृतीचा विष्णूला इतका अहंकार वाटला की, त्यानं अमृत देवासुरांच्या हवाली करण्यासाठी चक्क नकार दिला. त्यानं देवांना आपल्या सामर्थ्याची भीती घातली आणि समुद्रालाही त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा नाइलाजानं साऱ्यांनी शिवाला साकडं घातलं. शिव आला आणि त्यानं सहज विष्णुरूपी कासवाचा नाश केला. त्याला मारून त्याच्या कातड्याची ढाल आपल्या गळ्यातल्या श्वेतमालेत मध्यभागी धारण केली. म्हणून हा शिव कच्छपेश्वर.

पुढे विष्णूलाही आपली चूक उमगली आणि तो कांचीच्या स्वर्णलिंगाला शरण आला. तेव्हा शिवानं उदार अंत:करणानं त्याची पुन्हा वैकुंठात प्रतिष्ठापना केली. या कथेची आठवण देत कच्छपेश्वर कांचीला उभा आहे. ही कथा म्हणजे प्रत्यक्षात काय आहे, असं तुम्हाला वाटतं ?

वर वर पाहता ही एक साधी पुराणकथा आहे: अर्थहीन, भाकड वाटणारी पुराणकथा. पण धर्मेइतिहासाचा मागोवा घेणाऱ्या एखाद्या माणसासाठी ही कथा म्हणजे शैवांनी वैष्णवांवर मिळवलेल्या विजयाचं ते एक स्थानिक स्मारक असल्याचा पुरावा बनून जाईल. शैव-वैष्णवांचे झगडे या देशाच्या भूमीवर पुष्कळ झाले. धर्मप्रभावी अशा इतिहासाच्या एका कालखंडात दक्षिण भूमीवर या झगड्यांशी राजसत्ताही निगडित झाल्या. देवळांच्या रूपानं, दैवतकथांच्या रूपानं या झगड्यांची आणि त्यांतल्या जय-विजयाची नोंद आजही आहे.

आपल्यापुढे खुद्द कांचीत आणखीही दोन देवळांच्या कथा याच प्रकारचा धर्मेतिहास सांगणाऱ्या आहेत. त्यांतही एक कुमरकोट्टमची कथा. हे कुमाराचं म्हणजे कार्तिकेयाचं किंवा सुब्रह्मण्याचं मंदिर म्हणजे कांचीतलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. ब्रह्मदेवानं एकदा स्कंद कार्तिकेयासंबंधी उदासीनता दाखवली, तेव्हा कार्तिकेयानं त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली आणि शेवटी त्याला पोकळ ज्ञानी ठरवून कैदेत टाकलं. शिवाच्या मध्यस्थीनं ब्रह्म्याची सुटका झाली आणि कार्तिकेयानं कांचीत येऊन बापाच्या रागाची शांती व्हावी यासाठी पूजा आणि तप केलं. तेच हे ठिकाण कुमरकोट्टम्, कांचीत शिवाबरोबर शिवपरिवारातल्या इतर दैवताचं स्थान कसं निर्माण झालं आणि महत्त्व कसं वाढलं, याचीच ही स्पष्टीकरणकथा आहे, हे सहज लक्षात येतं.

याहीपेक्षा लक्षणीय आणि पुरेशी बोलकी आहे ती कैलासनाथ मंदिराविषयीची कथा. पल्लव राजा राजसिंहानं बांधलेलं हे शिवमंदिर पुढे महेंद्रवर्मा तृतीय यानं वाढवलं.

या मंदिराची कहाणी पुराण सांगतं ती अशी की, पूर्वी त्रिपूर नावानं तीन राक्षस होऊन गेले. ते मोठे वेदज्ञ आणि शिवभक्त होते. पण शैव उपासनेसंबंधी, आपल्या राक्षसरक्ताचा परिणाम म्हणून की काय, ते थोडे सांशकही होते. ते देवांवर टीका करीत. त्यांना त्रास देत.

यामुळे दुःखी झालेल्या देवांनी महाविष्णूच्या कानी आपलं गाऱ्हाणं घातलं, तेव्हा महाविष्णूनं यज्ञ करून, काही भूतपिशाच्चांना असुरांचा परामर्श घेण्यासाठी रवाना केलं. पण या शिवाच्या सहचरांची काहीही मात्रा त्या राक्षसांवर चालली नाही. मग विष्णूनं आपल्या शरीरातून आदिपुत्त नावाचा एक महापुरुष निर्माण केला. नारदाच्या सहकार्यानं असुरांची मती शिवभक्तीपासून भ्रष्ट करण्याचं काम त्यानं त्या आदिपुत्तावर सोपवलं.

नारद आणि आदिपुत्त यांनी त्या तीन शिवभक्त असुरांच्या मनात शैव सिद्धांताविषयी सतत किल्मिष निर्माण केलं आणि अखेर ते तीनही असूर शिवविरोधी बनले.

विष्णूचं काम साधलं. त्यानं शिवाला म्हटलं की, पहा, हे एके काळचे तुझे भक्त कसे तुझ्या विरोधात मातले आहेत! त्यांचा नाश तूच करायला हवा आणि शिवानं–कांचीपुरात राहणाऱ्या शिवानं त्या तिघांचाही नाश केला. शंकर फक्त हसला आणि तिघंही जळून खाक झाले. मग मात्र नारद आणि आदिपुत्त म्हणजे स्वतः बुद्ध यांना आपण केलेल्या शिवविरोधी कार्याचा पश्चात्ताप झाला. कांचीमध्ये येऊन त्यांनी कैलासनाथाचं एक भव्य मंदिर उभारलं नि पूजा आणि तपाला प्रारंभ केला.

शिव प्रसन्न व्हायला अवकाश लागला नाही. त्यानं त्या दोघांच्याही पापाला क्षमा केली आणि म्हटलं की, ‘खरं तर शिवविरोधी प्रचाराचं काम केलंत, हे पाप अनेक जन्मांचं आहे. पण तुम्ही इथं राहिलात, माझी पूजा मांडलीत, म्हणून तुमचं पाप बरंचसं घटलं आहे. आता इथं एक मुक्तिद्वार बांधा. त्यातून सतत या क्षेत्रात प्रवेश केल्यानं मुक्तीचा मार्ग मोकळा होईल.’

नारद आणि बुद्ध यांनी शिवाज्ञा शिरसावंद्य मानली आणि कांचीपुराचा शिवमहिमा अबाधित गाजत राहिला.

ही कथा म्हणजे शैव संप्रदायानं बौद्धांचा प्रभाव मोडून काढल्याचा स्पष्ट निर्देश करणारी कथा आहे, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. नुकतीच उडुपीला गेले होते. तिथंही तिथल्या चंद्रमौलीश्वराच्या मंदिराची अशीच एक कथा मला ऐकायला मिळाली. शिवाचा प्रभाव मागे सारून विष्णूचा प्रभाव वाढत गेल्याचा निर्देश करणारी ती एक पुराणकथा होती. मुळात उडुपी हे शिवप्रभावाचं स्थान होतं. आतासारखं कृष्ण-स्थान नव्हे. उडुप म्हणजे चंद्र. चंद्रानं इथं शिवोपासना केली, असं सांगतात. म्हणून इथला सर्वात प्राचीन देव शिव-चंद्रमौलीश्वर आहे. या गावाचं दुसरं नाव शिवाली.

पण पुढे म्हणे रामभोज नावाच्या क्षत्रिय राजानं यज्ञस्थळ नांगरताना घडलेल्या नागाच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून नागासनाची पूजा केली आणि त्यावर त्याचा आराध्य देव विष्णू हा शिवरूपात अवतरला. विष्णूनं लिंगरूपात अवतरावं, अशी खुद्द शिवाचीच इच्छा होती.

आता उडुपीला मध्वाचार्यांनी कृष्णमूर्ती स्थापून वैष्णवभक्तीची एक प्रभावी परंपरा निर्माण केल्यानंतर मूळचा शिव हाही विष्णूच असल्याची कथा इथं जन्माला आली नाही तरच नवल...

आपल्याकडच्या पंढरपूरची कहाणीही याहून वेगळी नाही. पांडुरंगाविषयीच्या पुराणकथांपैकी काही कथा अशाच धर्मेतिहासाकडे अभ्यासकाला घेऊन जाणाऱ्या कथा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? पंढरपूरच्या लोहदंड क्षेत्राची आणि दिंडीरवनाची महती सांगण्यासाठी निर्माण झालेली कथाच पहा. लोहदंड आणि दिंडीरवन या नावाचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही कथा रचली गेली, हे स्पष्टच आहे; पण त्याचबरोबर शैव-वैष्णवांच्या धर्मपंथांच्या चढाओढीत शैव संप्रदाय फिका पडून वैष्णव संप्रदायाचं वर्चस्व इथं वाढत राहिल्याचं सूचनही या कथेत दडलं आहे.

कथा अशी आहे की, कृष्णाच्या मांडीवर राधेला पाहून रुसलेली रुक्मिणी कृष्णाला सोडून निघाली ती दिंडीरवनात आली. तिची समजूत घालायला पाठोपाठ कृष्णही आला. ही हकीकत विष्णूचं ध्यान करीत असलेल्या शंकराला पाहून कुतूहल वाटलेल्या पार्वतीला खुद्द शिवानं सांगितली आहे. पार्वतीनं उत्सुकतेनं विचारलं की, ‘रुक्मिणी रुसून आली त्या वनाला दिंडीरवन का म्हणतात ?’ आणि शिवानं तिची कुतूहलपूर्ती करताना सांगितलेली ही कथा आहे.

पूर्वी दिंडीरव नावाच्या राक्षसानं साऱ्या देवांचा छळ मांडला. तेव्हा दुःखी होऊन देवांनी विष्णूची प्रार्थना केली. विष्णू द्रवला आणि चंद्रसेन राजाचा मल्लिकार्जुन नावाचा पुत्र म्हणून जन्म घेऊन त्याने दिंडीरव राक्षसाचा लोखंडी गदेनं वध केला. तो राक्षस मरताना ‘हरे हरे’ म्हणाला. म्हणून विष्णू त्याच्यापुढे प्रकट झाला. त्यानं मागणं मागितलं, ‘देवा, माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावानं हे वन ओळखलं जावं. लोहदंडानं माझा वध झाला, तेव्हा हे क्षेत्र लोहदंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावं. जिथे ती गदा नंतर पाण्यात पडली ते गदातीर्थ व्हावं आणि इथं येणाऱ्यांचा उद्धार व्हावा.’ विष्णूनं ‘तथास्तु’ म्हटलं आणि त्याप्रमाणे सर्व घडलं.

इथला शिव म्हणजे मल्लिकार्जुन हा अशा तर्‍हेनं मूळचा विष्णूच आहे, असं कथा सांगते. मूळचं शिवस्थान वैष्णवांनी आपलंसं केल्याचा हा कसा गमतीदार पुरावा आहे पहा.

पुराणकथांच्या निरर्थक वाटणाऱ्या संभारातून जेव्हा दैवतविज्ञान आणि धर्मेतिहास यांची अशी वेगळी जुळणी होत जाते, तेव्हा परंपरेच्या अभ्यासकांसाठी लोकसंस्कृतीनं पुढे केलेला तो मदतीचा हातच तर असतो.

-oOo-

पुस्तक: लोक आणि अभिजात.
लेखक: अरूणा ढेरे.
प्रकाशक: मंजुल प्रकाशन.
आवृत्ती पहिली.
वर्ष: १९९३.
पृ. १४८-१५२.


हे वाचले का?

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

एका गोष्टीची गोष्ट

“ता-त्या”

“काय बाबा?”

“मला गोष्ट सांगा की!”

“कशाची सांगू?”

अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही.

“वासराची सांगता?”

“तू वासरू कुठं बघितलंस?”

“आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.”

‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’

“सांगा वासराची.”

प्रसंग बाका होता. कारण गोष्ट सांगणं प्राप्तच. नाहीतर लगेच बाबाचा माझ्याविषयीचा आदर कमी होतो. मला पतंगाला कन्नी बांधता येत नाही हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला जबर धक्का बसला होता. त्याची अशी ठाम समजूत आहे की, आपला बाप सर्वज्ञ आहे. त्याला सगळं येतं.

“सांगा ना वासराची.”

बाजार

“एक वासरू होतं.”

“नेहमी आईजवळ असायचं, पण एकदा त्याला वाटलं की, एकटंच बाहेर जाऊन यावं. गाय आणि बाकीची गुरं बांधलेली असायची, पण वासरू मोकळं असायचं. त्यानं कुंपणाबाहेर उडी टाकली आणि पळालं.”

“हं, कुठं गेलं पळत पळत ”

“गावाभोवती जंगल होतं. डोंगर होते. जंगल फार दाट होतं. उंच-उंच झाडं, बुटकी झुडपं, काटेरी जाळ्या, रानटी वेल, गवत. माणसांनासुद्धा नीट पाऊलवाटेनं गेलं तर जाता येई. नाहीतर माणसं चुकत. त्यांना घरी परत येण्यासाठी वाट सापडता सापडत नसे.”

“मग?”

“वासरू एका वाटेनं गेलं. झाडं, पक्षी, फुलं बघत-बघत, उड्या मारत, कोवळं गवत खात असं मजेत खूप दूर गेलं.”

“आईनं हाका नाही का मारल्या?”

“हो, मारल्या; पण तोपर्यंत वासरू लांब गेलं होतं. त्याला हाका ऐकू नाही आल्या.”

आता पुढं काय सांगावं बरं, म्हणून मी थोडा गप्प. एक आशा की, त्याला झोप लागावी. एका मिनिटाची स्तब्धता, पण वासरामागोमाग बाबाही जंगलात शिरलेला होता.

“त्याची दूध प्यायची वेळ झाल्यावर ते परत आईकडे आलं?”

“नाही.”

कारण मग गोष्ट संपलीच की! काहीतरी घडणं आवश्यक होतं. एखादा समरप्रसंग... काय बरं नेमकं घडेल? माझ्याअगोदर बाबालाच सुचलं.

“त्या जंगलात वाघ नव्हते?”

“होते. एक मोठा वाघ होता. तो सावलीला झोपलेला.”

“हं.”

आता समरप्रसंगाला वाव होता. वाघाची व्यक्तिरेखा चांगली गडद हवी. तो कथेतला खलनायक.

“हा वाघ दुष्ट होता. त्याला शेळीची लहान-लहान बाळं, हरणं खायला आवडायची. जाळीत तो झोपला होता आणि एकाएकी त्याला वासराचा वास आला.”

इथं सांगण्यात तपशील चुकला, म्हणून मी थांबलो. वाघ ह्या प्राण्याचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण नसतं.

“हं.”

या हुंकाराबरोबर बाबा जवळ आला. माझा दंड त्यानं धरला. त्याच क्षणी मला वाटलं की, आता पंचाईत आहे. वासरावर काही प्रसंग येता कामा नये. वाघानं तर त्याला खाता उपयोगीच नाही. तपशील चुकला; पुढे चुकता उपयोगी नाही; पण काही नाट्यपूर्ण घडलं पाहिजेच. काय बरं? विचार करायला फुरसत नाहीच.

“हं, पुढे काय झालं?”

“वाघानं डोळे किलकिले करून पाहिलं, तर दूरवरून लहानसं वासरू कान हलवत वाटेनं येतंय. आपल्याकडंच येतंय.”

“पण वासराला नाही का वाघाचा वास आला?”

“कसा येणार?”

वारा वाघाच्या दिशेनं वाहत होता, हा तपशील ह्याला कळणारच नाही.

“वासरू आनंदात होतं. फुलांचे, झाडांचे वास त्याला माहीत होते. वाघाचा वास कसा माहीत असणार? त्यानं तो कधी घेतलाच नव्हता अगोदर. आणि ते मजेत होतं. पुढे वाटेवरच झाडाखाली वाघ झोपलेला आहे, हे त्याला माहीतच नव्हतं. ते सरळ वाघाच्या समोरच आलं.”

“हं.”

दंडावरची छोटी पकड घट्ट झाली. आता घटना, संवाद झाले पाहिजेत आधी. “वाघ उठून उभा राहिला. मोठा, उंच, रंग तांबडा, अंगावर काळे पट्टे, डोळे हिरवे. वासरू धीट होतं. ते वाघाकडे बघत उभं राहिलं. वाघ म्हणाला, ‘थांब, मला फार भूक लागली आहे.’ ”

वाघ बोलेल कसा, हा प्रश्न येणार म्हणून मी थांबलो; पण आला नाही. टेन्स प्रसंगात श्रोत्याला भान राहत नाही, हे खरंच.

“वाघानं जीभ ओठांवरून फिरविली. शेपटी वर-खाली हलवली. तो म्हणाला, ‘मी तुला खाणार.’

“वासरू म्हणालं, ‘खा, पण मी माझ्या आईला सांगून आलो नाही. ती शोधत राहील. तू थोडा थांबशील, तर मी आईला सांगून परत येईन ’

“नक्की?

“हो, देवाची शप्पथ! सुटली बोल.

“बरं जा, आणि लगेच परत ये. वाट सापडेल का?

“हो, सापडेल.”

इथपर्यंत ठीक जमलं.

आता पुढे काय? लबाडी करून वासरू परत आलंच नाही तर? पण त्यानं देवाची शप्पथ घेतली होती. खोटं कसं बोलणार? खोटं बोलणं हे पाप.

“हं, पुढे काय झालं?”

“गेल्या वाटेनं वासरू परत आलं. आई काळजीत होतीच. तिला आनंद झाला.”

“रागावली नाही?”

हा मुद्दा राहिलाच. आई रागावणार, ही गोष्ट सुसंगत होती.

“रागावली थोडी. म्हणाली, ‘असं न सांगता जायचं नाही पुन्हा. लहान आहेस तू.’

“वासरू म्हणालं, ‘नाही जाणार पुन्हा कधी. पण आई, मला वाघ भेटला ’

“बाई गं! आणि रे?’

“तो म्हणाला, मला भूक लागली आहे. मी तुला खाणार. मी म्हणालो, माझी आई शोध करील, तिला विचारून येतो.’

“असं म्हणालास?’

“हो. तो म्हणाला, नाही आलास तर? मी म्हणालो, देवाची शप्पथ येईन.’

“आईनं विचार केला. ती म्हणाली, ‘तू जाऊ नकोस; मी जाते.’ ”

आपली वासराची गोष्ट आता शिवलीलामृतातल्या व्याधहरिणीकडं चालली आहे, हे माझ्या ध्यानात आलं. पुढं आता शेवटपर्यंत सगळं सोपं होतं.

“मग आई गेली. वाघ वाट बघतच होता. ती म्हणाली, ‘माझ्या मुलाऐवजी मी आले आहे.’

“वाघ म्हणाला, ‘मला काय, भूक भागल्याशी कारण. तुला खातो.’

“गाय म्हणाली, “पण मुलाचे वडील माझा शोध करतील. त्यांना विचारून आलं पाहिजे.’ ”

माझ्या गोष्टीनं वेगळीच कलाटणी घेतली होती. वाघाची कॅरॅक्टर सिंपथी खाऊन जात होती.

“वाघ म्हणाला, ‘जा, लवकर विचारून परत ये.’ ”

शिवलीलामृतातली गोष्ट मला आठवेना. बहुधा व्याधाच्या मनात परमेश्वर उभा राहिलेला असणार. इथं त्याचा काही उपयोग नव्हता. आता गोष्ट आपणच तडीला न्यायला पाहिजे. वाघाच्या मनात परमेश्वर उभा राहणं खरं नाही.

“आई गेल्या वाटेनं परत आली. वासराचे वडील होतेच. त्यांना म्हणाली, ‘अहो, तो वाघ म्हणाला की, मला भूक लागलीये. तुला खातो. तर मी म्हणाले, तुम्हाला सांगून परत येते.’

“वडिलांनी विचार केला. म्हणाले, ‘तू जाऊन आपल्या वासराला दूध कोण पाजणार? मी जातो.’ आणि बैल त्या वाटेनं निघाला.”

बाबाला आता वाटलं होतं की, वासरू सुटलं, आई सुटली. वडील लोक शूर असतात. ते वाघाची जिरवणार.

मला प्रश्न पडला की, आता बैलोबा काय करणार? एका बैलाला वाघाची जिरवता येणं शक्य नाही.

“हं पुढं?"

“बैल वाटेनं चालला, चालला. तिकडं वाघ जिभल्या चाटीत उभा होताच. मग बैलानं ठरवलं की, असं चालायचं नाही. वाघाला उद्या भूक लागेल, परवा लागेल. रोज एकाला तो खाईल. त्याला धडा शिकवला पाहिजे. रानात आणखी बैल चरत होते. त्यांच्याकडे तो गेला. सर्वांना एकत्र करून म्हणाला, मला मदत करा. सगळे बैल धष्टपुष्ट होते. त्यांची शिंगं टोकदार, कठीण होती. ते म्हणाले, चला आपण वाघावर हल्ला करू. आणि निघाले. वाघाला आवाज ऐकू येऊ नये म्हणून हळूहळू निघाले. गळ्यातल्या घंटासुद्धा वाजवल्या नाहीत.

“वाघ वाट बघतच होता. त्याला आता फार भूक लागली होती. वासराचे वडील आले की, काही एक न बोलता-सवरता त्यांना खाऊन फस्त करायचं, असं त्यानं ठरवलं होतं.”

मला श्रोत्याचा रिस्पॉन्स कळत नव्हता. बाबा गप्प होता. कदाचित प्रसंग गंभीर म्हणून असेल. कदाचित झोप डोळ्यांवर उतरली असेल. मुद्दामच मी थोडा वेळ थांबलो.

“हं, पुढे?”

“मग सगळ्या बैलांनी वाघाभोवती गोल केला. त्याला घेरून मध्ये घेतला आणि शिंगं रोखून ते त्याच्या अंगावर धावून गेले. बैलांचे डोळे तांबडे-लाल झाले होते. नाकातून फुस्कारे निघत होते.”

पुन्हा दंडावरची पकड घट्ट झाली. रडव्या आवाजात प्रश्न आला, “त्यांनी मारून टाकलं वाघाला?”

घोटाळा माझ्या लक्षात आला. वाघाची कॅरॅक्टर आपण सिंपथेंटिक केली, त्याचा हा परिणाम आहे. ही शोकान्त गोष्ट होता कामा नये. म्हणजे पुन्हा पंचाईत.

“अं? त्या बैलांनी वाघाला मारून टाकलं?”

“छे! मारलं नाहीच. इतके बैल आपल्या अंगावर धावून येताहेत, हे बघताच वाघोबाची घाबरगुंडी उडाली.”

बाबाला एकदम खदखदून हसू आलं. अगदी अनपेक्षित परिणाम !

हसतच प्रश्न : “हो?”

“हो. तो फार घाबरला आणि शेपूट पायात घालून, कान खाली पाडून धूम पळाला.”

मला मिठी मारून पुन्हा मोठ्यांदा हसू.

“हो? घाबरून धूम पळाला?”

“हो आणि ते बघून बैलांना अगदी हसायला आलं. सगळे खाली बसले आणि मोठ्यांदा हसायला लागले तोंड वर करून.”

त्या कोरसएवढं हसू! ते थांबेच ना!

तेवढ्यात पलीकडे असलेल्या खऱ्या आईचा आवाज : “बाबा, पुरे आता. झोपा बघू. ताई तिकडे अभ्यास करतीये ना!”

एकदम शांतता. मग गोष्टीवरच विचार. मला वाटलं, हा झोपला.

तेवढ्यात अगदी हळू आवाजात प्रश्न : “मग तो वाघ उपाशीच राहिला?”

बाप रे! आता कुणाचीही हत्या न होऊ देता ह्या वाघाला खाऊ काय घालावं? काहीही झालं तरी वाघ गवत खाणार नाही. फळं खाणार नाही. दूध पिणार नाही. काय खाईल तो? त्यानं खाल्लं हे पाहिजेच. उपाशी कसा झोपणार? माझ्यापुढे मोठा प्रश्न!

काय? काय? काय?

दोन-तीन मिनिटं शांतता. एकदम सुचलं. तपशील चुकीचा, पण गोष्टीत खपून जाण्याजोगा. हळू आवाजात म्हणालो, “छे! उपाशी कसा राहील? तो गेला आणि एका झुडुपाला मोठं मधाचं पोवळं त्याला दिसलं. सगळ्या मधमाशा मध गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. वाघानं पंजानं ते पोळं ओढून घेतलं आणि पोटभर मध खाल्ला. बरं का बाबा!”

नो रिस्पॉन्स! वासराला झोप लागली होती.

चला, सुटलो!

-oOo-

पुस्तक: बाजार.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती पाचवी, तिसरे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ७३-७८.
(पहिली आवृत्ती: ??? दुसरी आवृत्ती १९९२, अन्य प्रकाशन).

---

(१). पुस्तकामध्ये ही कथा ‘गोष्ट’ या नावाने समाविष्ट आहे.


यांसारखे आणखी:
     वाळूचा किल्ला
    अबोला


हे वाचले का?