बुधवार, १७ जुलै, २०२४

नकार : एक दैवी गुण

जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून!

आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो.

मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करावयाचे मान्य करतो आणि एस.टी.चा प्रवास सोडून एक तासभर भाषण देण्याचा मूर्खपणा आपण का केला, म्हणून पश्चात्ताप पावतो. हे मी का बरे पुनःपुन्हा करतो? काय आहे त्यात ? ना प्रसिद्धी, ना वैभव, ना चैन, ना मिळकत! पंच्याऐंशी मैल जायचे, दोन दिवस घालवायचे, हजार-बाराशेच्या समुदायापुढे बडबडायचे आणि परत यायचे - हा एवढा उपद्व्याप कशासाठी?

आता नटाकडून लेख मागविणारे लोक, लेखकाने व्याख्यान द्यावे असे म्हणणारच; त्यांना काय दोष द्यावा? पण आपण त्यांच्या आग्रहाला का बळी पडावे?

पांढर्‍यावर काळे

मी नकार देतो, तो आपला दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि स्वतः त्रास भोगू नये, या विचाराने. एखाद्या ठिकाणी मी जातो; तेव्हा ते गाव, तो हॉल, समोर बसलेले श्रोते, अध्यक्ष आणि स्वत: आपण– या सर्वांचाच मला विलक्षण राग आलेला असतो. मला पक्के माहीत आहे की, मी काही चांगला वक्ता नाही. भाषणाला उभा राहिलो की, एकीकडून मी बुजलेला असतो आणि उद्धटही असतो. मी वाक्ये विसरतो, गोंधळतो, खोकतो, खाकरतो ‘आणि, व, मग’ या शब्दांचा उच्चार पुनःपुन्हा करतो. सांगण्यासारखे मौलिक असे माझ्यापाशी काही नसते. श्रोत्यांना हसविण्याच्या खटाटोपात मी स्वतःचेच हसे करून घेत असतो आणि मला हेही माहीत आहे की, जेव्हा-जेव्हा मी एखाद्या गावी भाषण करतो, तेव्हा-तेव्हा बहुधा माझ्या शंभर ते दीडशे वाचकांना मी कायमचा मुकतो.

याचे मला दुःख होत नाही. कारण मी वक्ता नाहीच. हां, आता श्रोत्यांना सांगण्यासारखे असे माझ्यापाशी काही असते, त्याच्या जोडीला उत्तम आवाज असता, भव्य व्यक्तिमत्त्व असते; तर मी टेबलाशी बसून लिहिण्यापेक्षा वक्ताच झालो नसतो का? पुढारी नसतो का झालो, किंवा रंगभूमीवर नट म्हणून नसतो का प्रसिद्धी पावलो?

मला निवांत जागा, थोडे कोरे कागद, बऱ्यापैकी पेन द्या आणि उत्तम काम घ्या, स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. मला हॉल, टेबल-खुर्ची, अध्यक्ष, मायक्रोफोन अन् श्रोतृसमुदाय द्या आणि माझे काम बघून स्वतःच्या तोंडात मारून घ्या; पश्चात्ताप पावा!

आता पूर्वीप्रमाणे लिहिताना आपण 'प्रिय वाचक', 'रसिक वाचकहो' वगैरे संबोधून लिहीत नाही. तरीसुद्धा लिहिताना आपल्या डोळ्यांपुढे प्रिय आणि रसिक वाचकवर्ग असतोच. तो आहे, हे आपल्याला ठाऊक असते. पण मी जेव्हा भाषणासाठी कुठे उभा राहतो, तिथे हा वाचकवर्ग मला दिसत नाही. ते कोणी वेगळेच लोक असतात. वेळ घालवायला दुसरी काही जागा नाही म्हणून जमलेले. या लेकाच्याची पच्ची कशी होते, ते पाहण्यासाठी आलेले. त्यांत आपण या वर्षीं नवा चेहरा मिळविला, एवढेच समाधान मिळवून, लांब चेहऱ्याने बसलेले कार्यवाह असतात. ‘काय बेटा बोलतोय!’ असे मनाशी म्हणणारे अध्यक्ष असतात.

सभेला सुरुवात होते. परिचय करून देणारे श्रोत्यांना सांगतात– आजच्या आपल्या पाहुण्यांचे मी फारसे काही वाचले नाही, पण ते लोकप्रिय लेखक आहेत आणि आज आपल्या कानांना तासभर उत्तम भाषणाची मेजवानी मिळणार आहे. मी फार वेळ घेत नाही. आपण उत्सुक आहात ते पाहुण्यांचे शब्द ऐकण्यासाठी वगैरे... आणि दुष्टपणे आपल्याकडे बघून हसून खाली बघतात.

मी उभा राहतो. टिंगलबाज कुजबुज, हसू कानांवर येते. आपल्याकडे रोखलेले हजार-बाराशे डोळे दिसतात आणि मी मनाशी प्रतिज्ञा उच्चारतो, ‘आता पुन्हा कधीही हा मूर्खपणा करणार नाही– ही शेवटची वेळ!’

समजा श्रोत्यांमध्ये काही खरोखरीच चांगले, अगत्यशील, ऐकून घेण्याच्या इच्छेने आलेले लोक असले; तरीसुद्धा त्यांना व्याख्यानरूपे सांगण्यासारखे माझ्यापाशी काही नसते. याच तेवढ्या लोकांना बाजूला घेऊन बसावे आणि गप्पा माराव्यात, असे मला वाटते. म्हणजे असे की, लोकांना माझ्यात रस नसला, तर आपण बोलून त्यांना का बेजार करावे, म्हणून मी नाउमेद असतो. एकूण, सगळा वैतागच असतो.

उत्तम वक्ता असला... माझ्या बरोबरीच्या लेखकांत दोघे-चौघे आहेत... की, तो स्वतःच्या व्यक्तित्वावर, आवाजावर खूश असतो. केवढ्या आत्मविश्वासाने तो उठून उभा राहतो. कसलेल्या योद्धाप्रमाणे एकवार श्रोत्यांवर नजर फिरवितो. पहिल्या दहा-पाच वाक्यांतच तो नाठाळ घोड्यावर स्वार व्हावे; तसा श्रोत्यांच्या मनावर स्वार होतो आणि मग सुखाने दऱ्या-खोरीसुद्धा फिरतो. तो स्वतः रंगतो, श्रोत्यांना रंगवितो. याउलट वाईट वक्ता उभा राहताना हैराणच असतो. त्याचा आवाज, डोळे, चेहरा– सगळेच असे असते की, पहिल्या पाच-दहा मिनिटांतच श्रोते हैराण होतात. सगळे अवघड आणि अशुद्ध होऊन जाते!

माझ्या मनात येते की, मी आणि माझ्यासारखेच दहा-बारा वाईट वक्ते तेवढे सहज मिळतील– यांनी जर मनावर घेतले व गावोगावी वाङ्मय मंडळे, साहित्य परिषदा, स्नेहसंमेलने गाजवून सोडली, तर एक-दोन वर्षांच्या आत या महाराष्ट्र देशात केवढा तरी दरारा निर्माण होईल! यापुढे कोणा लेखकाला कधी व्याख्यानाची म्हणून गळ घालायची नाही, असा निश्चय सर्व लोक करतील. समस्त लेखकांची एका वार्षिक आपत्तीतून सुटका होईल आणि असेच जर वर्षानुवर्षे चालू राहिले, तर ‘लेखकवक्ता’ ही जात नामशेष होऊन जाईल. सुख आणि शांततेचे राज्य सर्वत्र पसरेल. माझ्यासारखे अनेक लेखक आणि श्रोते समाधान पावतील. खरे तर माझ्या पूर्वीच्या पिढीतील लेखकांनी हे करायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, म्हणून मला दोन ठिकाणी जावेच लागणार होते. मी हे पांढऱ्यावर काळे केले, म्हणून काही ते लोक क्षमा करणार नाहीत. समारंभ रहित करणार नाहीत. मला जावेच लागेल. सुटका नाहीच!

समोर श्रोते असतील– प्राथमिक शाळेतील मुले, ट्रेनिंग कॉलेजच्या मुली, अध्यापक आणि अध्यापिका, पालक आणि प्रौढ आया असतील. परिचय करून देणारे काही तरी बोलतील. मी माझ्या खुर्चीत अवघडलेल्या अवस्थेत बसून असेन. मनातून भयंकर धास्तावलेला.

शेवटी मी उठेन... बोलू लागेन....

अरेरे! मी त्या दोन लोकांना होकार का दिला? मी अत्यंत निर्धाराने नाही का म्हणालो नाही?

‘चुकणे’ हा माणसाचा स्वभाव आहे आणि ‘नकार’ देणे, हा दैवी गुण आहे.

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ५८-६१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

बुधवार, १० जुलै, २०२४

लेखकजिज्ञासायोग

(आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...)

माणसेः अरभाट आणि चिल्लर

काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ?

तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्या पावलात एका भिल्लाने मारलेला बाण लवकरच शिरणार आहे अशा निद्रिस्त महापुरुषास– –या सगळ्यांना तू आधीच मारले आहेस. सामान्य माणसे मरतात, थोरांचा अवतार संपतो. पण दोघांनाही मृत्यू समान असतो. त्याला तूच जबाबदार आहेस. मग हे सारे निर्माण तरी कशासाठी केलेले ?

आम्हांला जन्माला न येण्याचे कधी स्वातंत्र्य होते का ? जगण्यातील पाप-पुण्याचे जे नियम तुला मान्य आहेत, त्यांची आम्हांला कसली तरी जाण होती का ? आणि शेवटी मरण तरी न स्वीकारण्याचे आम्हांला स्वातंत्र्य आहे का ?

“अर्जुना, तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे. तू नाममात्र हो.” एवढे अमर्याद सामर्थ्य असणाऱ्याला कोणाची तरी नाममात्र म्हणून का बरे गरज वाटावी ? आणखी एक गोष्ट आहे. प्रत्येक जीव जन्माला येत असतानाच आपल्या मृत्यूचे गाठोडे सोबत घेऊन येत असतो. तो जगत असतानाच एकेक कण मरत असतो. मग मी सगळ्यांना आधीच मारले आहे, ही शेखी कशासाठी ? जन्मलेल्या जिवाला मी मरणमुक्त केले आहे असे एखादे तुझे उदाहरण असेल तर ते प्रौढीने सांग. जे अटळ आहे, ते आपण घडवणार आहो, हे कसले सांगणे आहे ?

बरे, सगळेच जण नाममात्र असतील तर त्यांना श्रेय व दोष तरी का द्या ? मग पुण्य, पाप ठरवायचे ते तरी कशाच्या आधारावर ? त्यांत तरी काही सुसंगती आहे का ? अश्वत्थामा नाममात्र होता का ? तुझ्याच सांगण्यावर त्याने नारायणास्त्र एका अजात बालकाकडे वळवले, तर त्याला रक्तपिती झाली. का अगदी जवळची काही लाडकी माणसे तेवढीच नाममात्र म्हणून पाप-पुण्यमुक्त असतात, आणि नतद्रष्ट माणसे आपल्या कर्माची फळे भोगतात ?

नरो वा कुंजरोच्या वेळी धर्मराजाने वकिली चलाखीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली. कदाचित त्या वेळी देखील तुझीच सूचना असावी. त्या वेळी तो अप्रत्यक्षरीत्या का होईना, द्रोणाचार्याच्या मृत्यूला कारणीभूत झाला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले, ते कशाबद्दल ? तर खोटे बोलल्याबद्दल. आणि ते कसले ? तर त्याची करंगळी गळून पडली. एखाद्याने टाइम बाँब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशांची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे. द्रोणाचार्यानी आंगठा मागून एकलव्याला नामशेष केले, म्हणून कदाचित करंगळी देऊन धर्मराजाने अद्दल घडवली असेल ?

कोणत्याही कारणामुळे करंगळी गळून पडणे ही काय शिक्षा झाली ? एखाद्या खेडेगावातील शाळेत अगदी बिगर यत्तेत आलेल्या बुजऱ्या लहान मुलांखेरीज कुणाचेच करंगळीशिवाय काही अडत नाही. तो जर नाममात्र असेल, तर त्याला तेवढी देखील शिक्षा नको. नाममात्र नसेल तर त्याला याहून जास्त शिक्षा हवी. पार्शियालिटी अंपायर, पार्शियालिटी अंपायर...

जर आम्ही सगळेच नाममात्र आहोत, तर काचेच्या नळीतून सरकणाऱ्या पाऱ्याच्या थेंबाप्रमाणे आम्हांला निर्लेप जाऊ दे. मग पापाचे प्रायश्चित्त नको, आणि पुण्याचे कसले श्रेय नको. आणि जर तू साऱ्याचाच उद्भव आहेस, तर आम्ही असे सदोष आणि अपूर्णच जन्माला आलो हे तुला माहीत नाही का ? आणि आम्ही तसे तडकलेले, हिणकस झालो, याची जबाबदारी तुझीच नाही का ? तू केलेल्या बाहुल्या सगळ्या भेगाळलेल्या झाल्या म्हणून युगानुयुगे त्या बाहुल्याच का तू झोडपत राहणार ?

आकाश भेदून येणारा, ज्वालामुखीच्या स्फोटातून प्रकट होणारा, संतप्त सागरांच्या गर्जनेतून अवतरणारा भयंकारी विश्वशब्द इतका अतिमानवी असतो की तो आमच्यासारख्या क्षुद्रांना ऐकूच येत नाही, आम्हांला त्याचे व्याकरण कळत नाही, की त्याचा अर्थबोध होत नाही. तो शब्द भयचकित करणारा असतो, पण त्यात कशाचेही उत्तर असतं नाही.

“–तू अत्यंत उध्दट, मूढ आहेस. तू येथून चालता हो, येथे पाऊल टाकण्याची तुझी योग्यता नाही. तू बाहेर जा, तू चालता हो, चालता हो.”

योगेश्वरा, बाहेर हाकलला जाणे, चालता हो असे शब्द ऐकणे मला नवीन नाही. ते माझ्या अंगवळणी पडले आहे. जेथे विश्वरूप प्रकट होते, त्या ठिकाणी तर माझ्यासारख्या संस्कारहीन व्रात्याला थारा देखील मिळणार नाही, हे मला प्रथमपासूनच माहीत होते. तेव्हा येथून हाकलला जाण्यात मला आश्चर्य नाही, की वैषम्य नाही.

माझ्या रानगडद अज्ञानाकडे तू दुर्लक्ष कर. पण तू दिवस, महिना, वर्ष या मापनातील काळ आहेस, फसवणाऱ्यांमधील द्यूत आहेस. मग कदाचित तू माझ्या अज्ञानातील मध्यबिंदू असशील. जर तेथे तू असशील तर ते किती अमर्याद आहे, हे तुला माहीत असणारच. तू जर तेथे नसशील, तर तू जेथे नाहीस, असे ते एक अद्वितीय स्थान असेल. मग ते सर्वस्वी माझे असल्याने मला त्याविषयी विशेष ओढच असणार, नाही का ?

तू मला हाकलले आहेसच. मी जातोच, पण जाण्यापूर्वी एकच. हे अज्ञान आहे, म्हणूनच मी अस्तित्वात आहे. ज्ञानानंतर माझे मीपण राहणारच नाही. एक थेंब सागरात मिळून जावा त्याप्रमाणे ते नाहीसे होईल. आतापर्यंत तरी मला असले विसर्जन मोहवणारे वाटत आलेले नाही. म्हणून एकच प्रार्थना आहे. माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. “O Lord, Protect my doubt...”

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १२२-१२५.

---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.


हे वाचले का?

शुक्रवार, ३१ मे, २०२४

आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु

गाळीव इतिहास

मुकुंदराज

गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे.

मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे भाषा चालू होत्या. त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देत.

राक्षसी भाषेच्या पहिलीच्या पुस्तकात धडा होता :

Raakshasi Bhaashaa
मूळ पुस्तकातून साभार.

काका उठा
जबडा उघडा
हा रामा आला
त्याचा फडशा पाडा.

फडशा, जबडा, टांग, नरडे, गटागटा हे शब्द मराठीत राक्षसी भाषेतूनच आले. त्याशिवाय मग पैशाची भाषा सुरू झाल्यावर मोबदला, मानधन, अनुदान, पारितोषिके, परीक्षक, प्रश्नपत्रिका वगैरे शब्दांची भर पडली. त्या त्या अनुषंगाने संतापनिदर्शक शब्दांचीही भर पडली. वशिला, वजन, सरकारदरबार, गटबाजी, इ० इ०.

सगळीकडे मराठीच मराठी

एकदा सगळे कोश तयार झाल्यावर मग सगळीकडे मराठीच मराठी झाले. आणि एकदा इतके मराठी शब्द साचल्यावर ते मोकळे करणे प्राप्तच होते, म्हणून ग्रंथरचनेला सुरुवात झाली. काही दिवस सगळेच ग्रंथरचना करण्यात गढल्यामुळे घोटाळे होऊ लागले. म्हणून मग प्रत्येकाला निरनिराळी कामे नेमून दिली. ब्राह्मण, सोनार, न्हावी, कासार, लोहार, साळी, कोष्टी, शिंपी, सुतार वगैरे एकदा मराठीत तयार केले आणि मग त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाला जुंपले. पूर्वी शिंप्याकडे बाराबंदी शिवावयाला कुणी टाकत नसे. कारण 'बाराबंदी' हा शब्द मराठीत नव्हता. एकदा वस्त्रकोश तयार झाल्याबरोबर शिंपी भराभर शिवू लागले.(३) ब्राह्मण वगळले तर बाकीच्यांच्या मराठीची उत्तम सोय झाली. पण ब्राह्मण मात्र संस्कृतचे पंडित. त्यामुळे त्यांची मराठी संस्कृतभ्रष्ट किंवा धेडगुजरीसारखी 'धेडगीर्वाणी' असावयाची. इतरांचे प्यूअर मराठी असल्यामुळे त्यांच्यातले व्यवहार व्यवस्थित झाले. ब्राह्मणांचे वांधे आले. त्यांचे ते अधूनमधून मराठी घातलेले संस्कृत कुणाला बोललेले कळेना.

Kshaur Re Naapitaa
मूळ पुस्तकातून साभार.

एलिचपूरच्या एका पोथीत एक ब्राह्मण-नापित संवाद आहे :

ब्राह्मण : नापिता, क्षौर करावें एवं ईप्सा. (अपभ्रष्ट मराठी.)
नापित : काय म्हन्तोस रे बामना? तिच्यामारी. (४)
ब्राह्मण : (अभिनयें वर्तवीत) क्षौर रे नापिता.
नापित : हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबावा! च्या**... सरळ बोलायला काय हुतं रे *ड**... (पुढचे शब्द आपल्याला लागत नाहीत; पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील!)

वरील उदाहरणावरून स्पष्ट होईल की, मराठीच्या अज्ञानामुळे ब्राह्मण लोकांना गावगाड्यातल्या इतरांशी व्यवहार अवघड झाला. गावात गप्पा माराव्या म्हटले तर तीच तीच भटजी मंडळी. एका भूर्जपत्रावर पाचव्या शतकातल्या धोंडुभट्ट नामक ब्राह्मणाने स्पष्ट लिहिले आहे : “कस्मद्संगें वार्तालापावें इति अस्मद्...” पुढील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. तात्पर्य, बोलावयाला कोणी नाही, म्हणून ब्राह्मणांनी लिहावयाला सुरुवात केली आणि ह्यातून संस्कृत अपभ्रष्ट ग्रांथिक मराठी आणि चारचौघांची शुद्ध मराठी असे भेद पडले. इतर नुसते बोलत, त्यामुळे त्यांना वाचावयाची गरज नव्हती. हे लिहीत, त्यामुळे वाचावयाला शिकले. परिणामी लेखन-वाचन हे ब्राह्मणांकडे राहून इतर सर्व महत्त्वाची कामे इतरांकडे गेली. इतर शेती पिकवीत असताना ब्राह्मण शब्द पिकवीत होते. ते गवताचे भारे रचीत, हे कवितांचे भारे रचीत होते. त्यांतील बहुतेक ग्रंथ लिहिल्याचेच पुरावे आहेत, वाचल्याचे नाहीत. पण साहित्याच्या इतिहासात त्यांची नावे घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. नामस्मरणाचे आपल्या संस्कृतीत फार माहात्म्य आहे.

विवेकसिंधु

मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ काहीसा विवेकासंबंधी आहे आणि थोडासा सिंधूसंबंधी आहे. मुकुंदराजाला संस्कृत कळत असले तरी त्याच्या शारंगधर राजाची सेकंड लँग्वेज पाली किंवा अर्धमागधी असल्यामुळे हा ग्रंथ मराठीत लिहिला गेला. नाहीतर शारंगधर राजाच्या समाजकल्याण खात्याने तो बक्षीसपात्र ठरवला नसता. अर्थात मुकुंदराजाला त्याची पर्वा नव्हती. तसा तो विवेकी असल्यामुळे जयंतपाळ नावाच्या व्यापाऱ्याकडून त्याने आधीच रिसर्च-ग्रांट मिळवली होती. मुकुंदराजाने स्वच्छ लिहिले आहे, जयंतपाळाने पाळलेला मी लेखक आहे : “नृसिंहाचा बल्लाळू । तेयाचा कुमरू जयंतपाळू । तेणें करविला हो रोळू । ग्रंथरचनेचा ॥” त्या काळातले लेखक आपल्याला ग्रंथ लिहावयाला कोणे पैसे दिले हे स्पष्ट सांगत असत. हल्ली आपल्याला कोण पाळतो ते सांगत नाहीत. तेही एक बरेच. तात्पर्य काय, आश्रय हवा. मुकुंदराजाची एक समाधी जोगाईच्या आंब्यास दाखवितात आणि आणखी एक समाधी नागपूर प्रांतात बैतूलजवळ खेडले ह्या गावी दाखवितात. आपण दोन्हीही पाहाव्या. (दुसऱ्याच्या खर्चाने जमल्यास उत्तम.) त्यानंतर (म्हणजे ‘विवेकसिंधु’ लिहिल्यानंतर; दोन समाध्या घेतल्यानंतर नव्हे.) मुकुंदराजाने ‘परमामृत’, ‘पवनविजय’ आणि ‘मूलस्तंभ’ हे ग्रंथ लिहिले, असे काही विद्वानांचे मत आहे; आणि हे ग्रंथ त्याने लिहिले नाहीत असे इतर काही विद्वानांचे मत' आहे.

हेमाडपंत

मुकुंदराजानंतर हेमाडपंत नावाचा ग्रंथकार झाला. ह्या गृहस्थाला ग्रंथ लिहावयाला वेळ केव्हा मिळत असे कळत नाही. देवगिरीच्या शासकीय राजस्व मंत्रणालयात तो नोकरीला होता व चढत चढत ‘श्रीकरणाधिप’ म्हणजे राजस्वप्रसचिव किंवा सर्वसाधारण लोक ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात त्या हुद्द्यावर होता. ह्या गृहस्थाने मोडी शोधून काढून महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांतल्या पोरांच्या आणि इतिहासंशोधकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. एकदा मोडी गिरवावयाचे खर्डे काढकाढून पाठीच्या कण्याला आणि मांडीला रग लागल्यामुळे वैतागून परतणाऱ्या शाळेतल्या पोरांनी सचिवालयावर मोर्चा नेला आणि “मोडी मोडो, मोडी मोडो”, “हेमाडपंत खर्डाबाद, हेमाडपंत खर्डाबाद” अशा घोषणा दिल्या. हेमाडपंताला उपरती झाली. काम सुचेना. समोर फायलींवर फायली साचू लागल्या. त्यावरून त्याला कल्पना सुचली आणि दगडावर दगड रचून तो देवळे बांधीत सुटला. त्यांना हेमाडपंती देवळे म्हणतात. मोडी लिपीला ‘पिशाच्च लिपी’ म्हणत असत ते उगीच नाही. लिहावयास सोपे व वाचावयास अत्यंत तापदायक असे हे मोडी लेखन शाळाखात्याने बंद केले. स्वातंत्र्यानंतर सुखाची एवढीच एक झुळूक अंगावरून गेली. आता फक्त लिहावयाला सोपे आणि वाचावयाला मोडीसारखाच वैताग आणणारे म्हणजे वैताग-काव्य आणि सौंदर्यशास्त्रावरचे लेख. मोडी ही आधुनिक दुर्बोधतेची सख्खी आई नसली तरी खापरपणजी खास आहे!

त्या वेळी महाराष्ट्राची राजस्थानी देवगिरी ही होती. देवगिरीला कागदांचे व शाईचे कारखाने होते. काळ्या शाईला मषी म्हणत. हा म्हशीचा अपभ्रंश आहे. कागद व शाई स्वस्त असल्यामुळे तेथे घरोघरी ग्रंथलेखन होऊ लागले. साहित्यिकांना अनुदाने देता देता रामदेवराव यादव टेकीला आला व लवकरच राज्य बुडाले. तलवारी टाकून लेखण्या धरल्या की असे होते. “रामदेवरावाची राज्यसभा मराठी ग्रंथकारांनी गजबजलेली असे,” असे महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी लिहिले आहे. चालू राज्यकर्त्यांनी या परिस्थितीची दखल घेऊन, साहित्यिकांची बक्षिसे बंद केली आहेत, ती रूढी चालू ठेवावी. रामदेवराव यांनी साहित्यिकांचे जे फाजील लाड केले त्यामुळे साहित्यिक चढले आणि देवगिरी पडली. रामदेवराव मेले आणि अनेक पंत चढले. मेलेल्याला मारण्यात काही अर्थ नाही म्हणून हे प्रकरण आम्ही इथेच मिटवीत आहो.

---

लेखकाच्या टीपा:

(१). लेखकाला मोबदला काय मिळत होता ह्याविषयी कुठेही शिलालेख अगर भूर्जपत्र वगैरेचा काहीमात्र पुरावा नाही. कुठल्याशा शाहिराला दरबारात काव्यगायन केल्याबद्दल म्हणे शिवाजीमहाराजांनी सोन्याचा तोडा दिला होता. काव्यगायनवाले पहिल्यापासून वस्ताद. पैशाशिवाय तोंड नाय उघडायचे!

(२). बरोबर आहे म्हटले की प्रकरण अर्ध्या पानात खलास. पैसे पानावर ठरले आहेत. प्रिय कंपोझिटर, हे वाक्य जुळवताना शब्दांची आलटापालट करावी, म्हणजे अर्थ फक्त आमच्या जातवाल्यांक तितको कळतलो– समजलां मां? थ्याँक्यु.

(३). हल्ली मराठी कोश नसल्यामुळे प्रगती साफ खुंटली आहे, एकदाचा तो विश्वकोश झाला की आपण नवे विश्व उभारू शकू.

(४). हे यादवकालीन शुद्ध मराठी आहे.

(५). परीक्षेच्या पेपरात ह्यांपैकी कुठलेही मत लिहिले तरी तपासणारे विद्वान ज्या मताचे निघतील त्यावर काय ते मार्क पडणार. म्हणून उत्तराच्या सुरवातीला मुकुंदराजाने हे ग्रंथ लिहिले आहेत असे लिहावे आणि शेवटल्या परिच्छेदात लिहिले नाहीत असे लिहावे.

(६). पूर्वी म्हशीचासुद्धा अपभ्रंश करीत. हल्ली फक्त दिलीप चित्रे इंग्लिश वाङ्‌मयाचा करतात.

- oOo-

पुस्तक: मराठी वाङ्‌मयाचा गाळीव इतिहास
लेखक: पु. ल. देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली, चौदावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१६.
१०-१५.

---

लेखाचे मूळ शीर्षक: ग्रंथकर्तृत्वाची सुरुवात


हे वाचले का?

शनिवार, २५ मे, २०२४

छोटीशीच आहे फौज आपुली

मनुष्यप्राणी हा सर्वांत बुद्धिमान प्राणी हे तर खरेच. पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमीअधिक बुद्धी असतेच. स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातला जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा, मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पागले तोवर माशांनीही समजूतदारपणा दाखवला.

पण यंत्रयुगातला मानव जेव्हा वेगवेगळी स्फोटके, हत्यारे शोधून काढून पाण्याखालच्या साम्राज्यात घुसखोरी करून, कधी गंमत म्हणून तर कधी शिकार म्हणून, कधी भौतिक शोधातली आव्हाने स्वीकारावी आणि शौर्य गाजवावे म्हणून स्वतःचे बुद्धिश्रेष्ठत्व सिद्ध करायला लागला, तेव्हा माशांनाही मग विचार करणे भाग पडले असावे. स्वतःच्या मर्यादांचा त्यांनी अंदाज घेतला. स्वसंरक्षणाचे नवे मार्ग शोधून काढले. त्या त्या हत्याराच्या विध्वंसक शक्तीचीही एक कमाल मर्यादा असते. पाण्यातल्या शिकारीसाठी जे जे नवे शस्त्र माणूस निर्माण करत गेला, त्या त्या शस्त्राच्या पल्ल्याचा अंदाज घेऊन, त्या शिकारीचा सुगावा लागताच त्या शस्त्राच्या कक्षेच्या पलीकडे सुरक्षित अंतरावर झटकन निसटून जावे हे श्रेयस्कर, इतकी अक्कल माशांनाही आहे हे आता सिद्ध झाले आहे.

‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे एकमेकांसाठीचे नाते सर्वत्रच, अगदी रानावनातही असतेच. पण जगण्याच्या या मर्यादा उल्लंघण्यासाठी नसतात. जन्ममरणाचा, जीवसृष्टीतल्या हारजितीचा हा खेळ अखंडित राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी त्या मैदानावर उतरणाऱ्याने त्या खेळाचे नियम पाळायलाच हवेत. विज्ञानाचा पायाही गणिती काटेकोर विचारसरणीवर रचलेला आहे. या गणिताचे नियम मोडले तर तो पायाच डळमळेल आणि कळसासकट सारा मनोराच जमीनदोस्त होईल.

सोयरे सकळ

शिवाय वैज्ञानिक प्रगती याचा अर्थ कमीत कमी श्रमांत नवनवे, जास्तीत जास्त सुखोपभोग झटपट घेता येण्याच्या सोयी निर्माण होणे हाच नव्हे. प्रत्येक गोष्टीच्या जोडीने तिचे सहचारी भावही येतातच. नवे शोधही याला अपवाद नाहीत. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीकडेही आपण डोळस दृष्टिकोनातून पाहायला हवे. ती योग्य दिशेनेच होत आहे ना याची सतत खात्री करून घ्यायला हवी. कोणताही मोह, अगदी प्रगतीचाही मोह आपल्या सदसद्विवेकबुद्धीवरही मात करत नाही ना या बाबतीत कायम जागरूकता हवी. ही चिकित्सक दृष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी ना?

कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर युरोपातून माणसांचे लोंढेच्या लोंढे अमेरिकेत स्थायिक व्हायला आले. तिथल्या जमिनीवर, निसर्गसंपत्तीवर आक्रमण करून त्यांनी आपली श्रीमंती वाढवायला सुरवात केली. ही संपत्तीची हाव वाढतच गेली आणि मग ‘गोल्ड रश’ सुरू झाला. सोन्याच्या खाणींच्या दिशेने या गोऱ्या लोकांनी आपले मोर्चे वळवले. मैलोन्‌मैल प्रवास करत हे लोक त्या मार्गाने निघाले. 

वाटेत त्यांना तिथल्या आद्य रहिवाशांच्या अनेक वस्त्या लागल्या, अनेक डोंगरदऱ्या, राने, अरण्ये लागली. तिथले ते रेड इंडियन आदिवासी हे आपल्यासारखे गौरवर्णी नाहीत म्हणजे ते आपल्याहून दुय्यम, हीन, त्यांची संस्कृतीही हीनच, असे या लोकांनी गृहीतच धरले. आपला वर्ण गोरा, आपली यांत्रिक प्रगती अधिक, आपली हत्यारे अधिक समर्थ, लेखनवाचनादी कलांत आपण प्रगत, म्हणजे आपली संस्कृतीही श्रेष्ठच, असे मानून या गोऱ्या लोकांनी तिथल्या आदिवासीना कस्पटासमान लेखून त्यांच्यावर आक्रमण केले. केवळ शिकारीचा मझा लुटायला म्हणून वाटेतल्या रानातले प्राण्यांचे कळपच्या कळप बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केले. निष्कारण मारून टाकलेल्या त्या प्राण्यांचे ढीग कुजू लागले आणि सर्वत्र रोगराई पसरू लागली. तिथल्या आदिवासीना त्या गोऱ्या प्रवाशांच्या या कृतीचा अर्थच कळेना.

शिकार हा त्यांच्याही जीवनाचा अविभाज्य भाग होताच; पण त्यांची शिकार वेगळी होती, अपरिहार्य होती, त्यामुळे बळीचा मान राखून ती केली जाई. रानातला एक बैल मारला की त्याचे मांस खाण्यासाठी, कातडे पोशाखासाठी, हाडे, शिंगे वगैरे ही अवजारे, हत्यारे आदींसाठी, केस दोरखंड करण्यासाठी, असा पायाच्या नखापासून मेंदूच्या कवटीपर्यंत त्या प्राण्याचा उपयोग केला जाई. ही शिकार हा त्या लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असा जीवनक्रम होता. केवळ गमतीसाठी दुसऱ्याचा जीव घेण्याची ती बेपर्वाई नव्हती. प्रथम मारलेला प्राणी संपला, आता अन्नवस्त्रासाठी वगैरे दुसरा प्राणी मारण्यावाचून गत्यंतर नाहीसे झाले, म्हणजे त्यानंतरच ते दुसऱ्या प्राण्याच्या शिकारीला निघत. त्यामुळे गरज नसताना, निव्वळ खेळ म्हणून हत्यारे चालवून वन्य प्राण्यांची गोऱ्या लोकांनी चालविलेली ती कत्तल पाहून, हे इतके असंस्कृत लोक इथे आले तरी कुठून तेच त्या आदिवासी रेड इंडियन लोकांना कळेना.

मनुष्यप्राणी आणि मनुष्येतर जीवसृष्टी यांच्यातले नाते हे शत्रुत्वाचे, परकेपणाचेच कशासाठी राहायला हवे? निष्कारण हिंसा हा माणसाच्या सुखाचा, आनंदनिर्मितीचा आवश्यक घटक आहे का? आपल्यातल्या विध्वंसक शक्तींचे मोकाट प्रदर्शन हेच स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्य सिद्ध करण्याचे एकमेव साधन असायला हवे का? बुद्धिमत्तेप्रमाणेच संस्कृती हेही माणसाचेच व्यवच्छेदक लक्षण आहे ना? मग त्या मागनिच आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा आनंद आपण कां गमावायचा? परिणामी विध्वंसक ठरणाऱ्या बुद्धिजन्य कर्तृत्वापेक्षा सुसंस्कृतपणाचा अभिमान आपण कां बाळगायचा नाही?

जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर दि ग्रेट या पराक्रमी राजाने सुरवातीच्या काळात आजूबाजूचे अनेक देश जिंकून काबीज केले. त्यांतल्या पराजित पर्शियन लोकांची संस्कृती या ग्रीक संस्कृतीपेक्षा वेगळी होती. नुसती वेगळी असणे यात नवल काही नाही. पण ती ती संस्कृती ज्या नैतिक मूल्यांवर आधारलेली असते, त्या मूल्यांच्या तुलनात्मक श्रेष्ठत्वावर सर्व काही अवलंबून असते. दोन्ही देशांतून वाहणारी एकच नदी घेतली तरी त्या नदीशी त्या त्या देशबांधवांचे नाते कोणते आहे हे पाहून त्या त्या देशाची संस्कृती जोखता येते. ग्रीक लोक नदीत उड्या टाकत, पोहत, काठाशी वाहत्या पाण्यात कपडे, घोडे, भांडीकुंडी धूत, नदीचे पाणी अशुद्ध करत. पर्शियन लोकांना कळेना की हे जेते असले तरी या ग्रीकांना सुसंस्कृत कां म्हणावे?

ते पर्शियन लोक स्वतःही नदीचेच पाणी वापरत. तीच तर त्यांची जीवनदात्री होती. नदीचे पाणी ते भरून नेत आणि मग ते आपल्या गरजेप्रमाणे वापरत. पण जी आपल्याला पाण्यासारखी अत्यावश्यक गोष्ट अनंतहस्ते विनामूल्य पुरवते, त्या नदीबद्दल डोळस कृतज्ञतेची भावना ठेवणे ही त्या पर्शियन लोकांची सांस्कृतिक गरज होती. पाणी स्वच्छ राखले काय किंवा घाण केले काय, नदी थोडीच तक्रार करणार? ती तशीच वाहत राहणार. पण प्रवाहाच्या पुढल्या प्रवासात तिथल्या काठावरच्या लोकांच्या वाट्याला येणारे पाणी गढूळ, अस्वच्छ होत असेल तर आधीच्या किंवा वरच्या प्रदेशातल्या रहिवाशांच्या निष्काळजी, बेपर्वा, असंस्कृत आचारांचेच ते प्रतीक नव्हे का? आपण असे अविवेकी वागणे हे आपल्यालाच अशोभनीय आहे याची सततची जाणीव ठेवणे हेच सुसंस्कृतपणाचे लक्षण. मग तरीही माणसे अशा बेपर्वाईने कां वागतात? मला वाटते, याचे कारण एकच असावे की बेपर्वाईने वागणे हे अधिक सोपे असते. विचार करायचा त्रास कोण घेते? पण मग प्रश्न असा येतो की विचार न करताच वागणाऱ्या मनुष्यप्राण्याला बुद्धिमान प्राणी कां म्हणायचे?

कुणी म्हणेल, कारस्थाने रचायला, स्वार्थ साधायलाही बुद्धी लागतेच. मग असा माणूसही बुद्धिमानच नव्हे का? किंवा अत्यंत शक्तिशाली विध्वंसक शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्यांना आपण बुद्धिहीन म्हणायचे का? हा प्रश्न एका अर्थी बरोबर आहे. कृत्य हे बरे, वाईट दोन्ही तर्‍हेचे असू शकते. फळ रसरशीत, मधुर असते तसे सडके, किडकेही फळ असते. समर्थांनी ‘श्रेष्ठ धारिष्ट्य जीवीं धरावें’ म्हटले आहे. धारिष्ट्याप्रमाणेच बुद्धीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन्ही प्रकारची असते. किंबहुना असे म्हणणे अधिक अचूक ठरेल की बुद्धी हीही त्या नदीच्या पाण्यासारखी फक्त ‘असते’. आपण तिला कोणती दिशा देतो, तिचा कसा वापर करतो त्यावर तिचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व अवलंबून असते.

गेल्या महायुद्धात हिरोशिमावर बाँब टाकून स्वतःच्या विध्वंसक शक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे शेवटी जिंकले. त्याहून अधिक विध्वंसक अस्त्र जर त्या क्षणी शत्रुपक्षाला लाभले असते तर या जयाचे पारडे फिरले असते. याचा अर्थ, शेवटी जय झाला तो अणुबाँबचा, त्या काळातल्या सर्वश्रेष्ठ विध्वंसक शक्तीचा.

या अणुबाँबची कल्पना करणाऱ्या आणि त्याचा शोध लावणाऱ्या थोर थोर शास्त्रज्ञांनी युद्धोत्तर काळात केलेले लिखाण आणि व्यक्त केलेले विचार पाहिले की लक्षात येते, त्या सगळ्यांना स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप झाला. विज्ञानाचा असा उपयोग त्यांना अभिप्रेत नव्हता. विध्वंसक शस्त्रास्त्रे ही विध्वंसच करणार हे साधे गणित या एवढ्या मोठ्या बुद्धिमंतांना सुरवातीलाच कळले कसे नाही? असा प्रश्न पडतो आणि वाटते, माणूस लहान असो अगर मोठा, त्याच्या बुद्धीला ज्वर चढला की तिची चाल बिघडते, ती भरकटते आणि मग तिच्या आधारावर उभा असलेला साराच डोलारा कोसळू लागतो.

बुद्धिभ्रम झाला की आपला सदसद्विवेक काम करीनासा होतो. ‘बळी तो कान पिळी’ किंवा ‘समर्थ असतो तोच टिकून राहतो’ हा तर निसर्गाचाच नियम आहे आणि टिकून राहण्याची इच्छा हीही नैसर्गिकच आहे. तेव्हा स्वतःचे सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करणे ही स्वाभाविक प्रवृत्तीच असते. मग हे वाढवलेले सामर्थ्य सिद्ध करून दाखवणे आलेच. अशा वेळी आपले शरीर, मन, कल्पनाशक्ती, बुद्धी, कर्तृत्व, ऐश्वर्य, सत्ता वगैरे अनेक शक्तींचे बळ इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करत राहणे हेच जीविताचे प्रयोजन होऊन बसते. सारा प्रवास त्याच दिशेने होत राहतो. तीच एक नशा चढते आणि ती आपल्या सर्वस्वाचा कब्जा घेते.

हे सगळे संकुचित स्वार्थापोटीच होते असे नाही. जात, धर्म, राष्ट्र, विशिष्ट राजकीय विचारसरणी– अशा अनेक विशाल संकल्पनाही माणसाला त्या दिशेने प्रवास करायला प्रवृत्त करतात. अमली पदार्थांसारख्याच या अमली संकल्पना किंवा मतप्रणालीही भल्याभल्यांच्या बुद्धिभ्रमाला कारणीभूत होताना दिसतात. एकीकडून अशा कुठल्या तरी विचारसरणीचा असर, दुसरीकडून विज्ञानाच्या प्रगतीच्या झेपेतून सतत प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या आमच्या गरजा, अशा रेट्यातून माणसाची संवेदनाशक्तीच बोथट होऊ लागली आहे. अशा वेळी प्रश्न आहे तो हा, की सर्वांत बुद्धिमान प्राणी जो माणूस, त्याने ‘हा रस्ता अटळ आहे, माझ्या मना बन दगड’ हे सूक्त वाच्यार्थाने घेऊन टणक दगड बनत जायचे की ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे सूक्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून फुलत जायचे?

स्वार्थाबरोबरच परमार्थाची, संकुचिततेबरोबरच विश्वात्मकतेची जाणीव ही बुद्धिमान अशा मनुष्यप्राण्यातच दिसून येते. जीवसृष्टीच्या चक्रात आजच्या घडीला मनुष्यप्राणी हा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल तो केवळ या जाणिवेचा ठेवा फक्त माणसालाच लाभला आहे म्हणून. या प्रसादाचा कृतज्ञतेने स्वीकार करण्यातला निरामय आनंद लुटायच्या श्रेयस्कर मार्गाने जायचे की प्रवाहपतित व्हायचे ते जो तो आपापल्या परीने ठरवणार आणि शेवटी यांतले कोणते पारडे जड होते त्यावर एकूण जीवनप्रवाहाची दिशा अवलंबून राहणार.

आजच्या घडीचे चित्र असे आहे की हा अविचाराचा आणि मोहाचा प्रचंड लोढा इतक्या वेगाने फोफावत येत आहे की त्यात मूठभर सदसद्विवेकी आणि संवेदनाशील माणसे तग धरू शकणार नाहीत हे स्पष्टच दिसतेय. अशा वेळी अनिलांची ‘प्रेम आणि जीवन’ ही कविता आठवते. परस्परांच्या प्रेमात पडलेली तरुण मुलगा आणि मुलगी, त्यांच्या मीलनाला चहूबाजूंनी होणारा विरोध पाहून घाबरतात, आत्महत्या करतात. त्यांना उद्देशून कवी म्हणतो, जिवाभावाने प्रेम करणे ही गोष्ट मुळात इतकी दुर्मिळ आहे, की अशी तुमच्यासारखी माणसे फार थोडी आहेत. ‘छोटीशीच आहे फौज आपुली’. अशा वेळी त्यातली दोन माणसेदेखील कमी होणे म्हणजे फार मोठे, न परवडणारे नुकसान आहे. ‘जगणें आहे धर्म सर्वांचा, प्रेमी जनांचें तें कर्तव्य आहे’.

याच चालीवर म्हणावे वाटते, सोयरे सकळ हा जीवसृष्टीचा धर्म आहे, पण जागृत माणसाचे ते कर्तव्यही आहे.

(‘सोयरे सकळ’ या लेखातून)

-oOo -

पुस्तक: सोयरे सकळ
लेखिका: सुनीता देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी
वर्ष: २००३
पृ. ५७- ६१.

---
टीप: मोबाईलच्या लहान पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत म्हणून मजकुरात अथवा वाक्यांच्या क्रमात कोणताही बदल न करता, काहीही न वगळता, भर न घालता मूळ लेखातील एक-दोन मोठे परिच्छेद लहान परिच्छेदांत विभागले आहेत.


हे वाचले का?

शुक्रवार, १७ मे, २०२४

वेचताना... : आज धारानृत्य चाले...

महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे.

जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘चित्रे आणि चरित्रे’ या पुस्तकामध्ये ‘साहसी संशोधक: जेन गुडाल(१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे.(२)


चित्रे आणि चरित्रे

एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उंबराच्या झाडावर चरणाऱ्या चिंपॅन्झींचा कळप न्याहाळत जेन आपल्या नेहमीच्या डोंगरावरच्या शिळेवर बसली होती. झाडावर डेव्हिड होता. गॉलिथ होता. काही माद्या होत्या. काही तरुण नर होते, पोरं होती. आणि एकाएकी वादळ सुरू झालं. कडाड्ङ्कड् अशी जोराची वीज झाली. धो-धो पाऊस कोसळू लागला.

माकडं झाडाखाली उतरली. उघड्यावर आली. एकापाठोपाठ एक अशा गवताळ गवंडावर चढली. पुन्हा वीज चमकली. त्यासरशी एक नर दोन पायांवर उभा राहिला. हलू-झुलू लागला. तालात पाय टाकू लागला. पावसाच्या, वाऱ्याच्या आवाजातूनही त्यानं मारलेल्या उंच आरोळ्या ऐकू येत होत्या. मग एकाएकी उतारावरून धावत तो तीस यार्डावर असलेल्या त्या मघाच्या उंबराकडं आला. आपला घसरतीचा वेग सावरण्यासाठी एका लहान झाडाचा बुंधा धरून त्याच्याभोवती फिरला. डहाळीवर उडी मारून पावसात गप्प बसून राहिला.

त्याच्या मागोमाग आणखीही नर उभे राहिले. झाडावर चढून त्यांनी डहाळ्या वर-खाली हलविल्या. त्याच गतीत एकानं मोठी डहाळी तोडली. ती ओढत-ओढत चढ उतरला. हे त्याचं वर्षा-नृत्य बघत जेन बसून होती. वरच्यावर काळ्या आभाळात विजा लवत होत्या. माद्या-पोरं डहाळ्यांतून गप्प बसून होती आणि नर झुलत होते. फांद्या हलवीत होते, पळत होते. आनंदानं किंचाळत होते. डोक्यावर पॉलिथिन घेऊन जेन पाहत होती. तिला वाटलं, अश्मयुगात माणसानंही अशाच पद्धतीनं पंचमहाभूतांना आव्हान दिलं असेल!

पुढं सबंध दहा वर्षांच्या काळात तिला हे वर्षा-नृत्य फक्त दोनदा बघायला मिळालं.(३)


हे चिम्पान्झी पावसाचे हे असे स्वागत किती शतकांपासून करत आहेत हे कुणाला निश्चित सांगता येईल असे वाटत नाही. परंतु मानवी इतिहासामध्ये आदिम जमातींमधून पर्जन्य-नृत्यांचे दाखले मिळतात. ही पर्जन्य-नृत्ये दोन प्रकारची दिसतात.

पहिला प्रकार ‘पर्जन्य-स्वागत’ असते. हे पर्जन्याचे आगमन झाल्यानंतर, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी केलेले नृत्य असते. आजच्या मानवी जगात ‘नृत्य’ या शब्दाला जी एक पठडी, एक चौकट अध्याहृत असते तितके औपचारिक नृत्य तेव्हा अपेक्षित नाही. लहान मुलांनी आनंदाने पहिल्या पावसात उंडारावे, साचलेल्या पाण्यात थयथया पाय आपटावेत, आकाशाकडे तोंड करुन पावसाच्या धारा थेट तोंडावर झेलाव्यात... जसे सुचेल तसे त्या वर्षावाचे स्वागत करावे असे काहीसे सुरुवातीला घडत असावे. जेन गुडाल यांनी पाहिलेले हे नृत्य असेच आनंद साजरा करणार्‍या काही मोजक्या कृतींचा समुच्चय इतपतच होते. त्यात विशिष्ट कृतींची पुनरावृत्ती होते म्हणून त्याला नृत्य म्हणायचे इतकेच. जे अनायासे लाभले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आनंद घेण्याचा उद्देश असतो इतकेच.

‘अनायासे लाभले, ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याने हवे तेव्हा ते मिळायला हवे’ अशी भावना प्राण्यांच्या तुलनेत अधिक वेगाने बौद्धिक प्रगती दाखवणार्‍या मानवाच्या मनात निर्माण झाली. जे जेव्हा ते मिळत नाही तेव्हा थेट निसर्गाशी रुजवात करून आपली मागणी नोंदवण्याची सुरुवात मानवानेच केली. त्यासाठी पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच त्याने ‘पर्जन्य-आवाहन नृत्य’ करण्यास सुरुवात केली. हा पर्जन्य-नृत्याचा दुसरा प्रकार.

हे नृत्य ओढ दिलेल्या पावसाला आवाहन करणारे असते. याची सुरुवात मानवाने आप, तेज, वायु आदि प्राकृतिक घटकांचे दैवतीकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली तेव्हाच झाली असावी. पर्जन्याला केलेले आवाहन पुढे पर्जन्यदेवतच्या आराधनेमध्ये, तिला बोललेल्या नवसामध्ये, कबूल केलेल्या पापक्षालनामध्ये अथवा घातलेल्या साकड्यामध्ये रूपांतरित झाले असावे.

मानवी इतिहासामध्ये शेतीचा शोध हा निसर्गासंबंधामध्ये मानवी स्वार्थाची, अधिकारापलिकडे जाऊन सत्ता प्रस्थापित करणारी पहिली कृती होती. तोवर अन्न-संग्राहक (gatherer) असणारा माणूस असा उद्दामपणे निसर्गाला आपण आखून दिलेल्या भूमीच्या चौकटीतच अन्न देण्यास भाग पाडू लागला. विसाव्या शतकामध्ये त्याहीपुढे जाऊन अधिकाराला हक्कामध्ये रूपांतरित करण्यासाठी मानवाने कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र विकसित केले आहे. दुबईसारख्या राष्ट्रात केव्हा पाऊस पडावा याचे नियोजनच केले जाते... त्यांनी नुकतेच त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. नागर आयुष्यात अस्तंगत झालेल्या पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच आता पर्जन्य-आवाहन नृत्याचे नवस-साकड्यादी अवशेषही हळूहळू माघार घेतील असे दिसते आहे.

सुरुवातीला माडगूळकरांच्या लेखात आलेले चिम्पान्झींच्या पर्जन्य-स्वागत नृत्याचे वर्णन दिले आहे. या प्रसंगावरून मला जी.एं.च्या ‘कळसूत्र’(४) या कथेमध्ये वर्णन केलेले पर्जन्य-नृत्य आठवते. इथे ‘देहसूक्त’ या शीर्षकाखाली ते शेअर केले आहे. जेनने अनुभवलेले– पर्जन्याच्या आगमनानंतर केलेले वर्षा-नृत्य आहे, तर हे पर्जन्य-आवाहन-नृत्य आहे. मानवसदृश प्राणी ते मानव या स्थित्यंतरादरम्यान माणसाचे पावसाशी असलेले नाते कसकसे विकसित होत गेले यावर ‘बिम्मच्या पतंगावरून’ या मालिकेमध्ये पाऊस या लेखामध्ये आधीच लिहिले आहे.

मानवी जीवनप्रवासाचा विचार केला तर जेनने अनुभवलेले नृत्य वा आनंद-अनुभव हा मानवपूर्व मानवसदृश प्राण्यांचा आहे. जी.एं.च्या कथेतील वर्णन हे टोळी करुन राहणार्‍या पण मानव-पदास पोहोचलेल्या आदिम मानवी प्रजातीचा आहे. तिसरे एक वर्षानृत्य माझ्या हाती लागले. हे महानगरी माणसाच्या आयुष्यातील आहे, मानवी जीवनप्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरचे आहे.

माणूस नागर झाला नि त्याचे जिणे निसर्गापासून दूर सरकत गेले. कार्यविभागणीमुळे मानवी प्रगतीला वेग आला असला, तरी त्यामुळेच आपल्या उपभोगाचे साधन निसर्गातील कशा-कशाच्या वापरातून, नाशातून सिद्ध होते याकडे त्याचे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागले. संपूर्ण महानगरी झालेल्या आयुष्यात तर हे अज्ञान नि ही बेफिकिरी इतकी वाढली, की आपल्या चैनीसाठी निसर्गातील कोण-कोणत्या गोष्टींचा नाश होतो आणि उपभोगोत्तर कचरा निसर्गाची कशी हानी करतो याचे भान नाहीसे झाले. उपभोगाची क्षमता नि साधने सतत वाढती राहायला हवीत या प्रमाथी आवेगाने महानगरी माणूस उर फुटेतो धावत असतो. विश्रांती घेणे, संतुष्ट राहणे या कृतींना या जगात महत्त्वाकांक्षाहीन आणि म्हणून नव-पाप मानले जाते.

झिपर्‍या

पण याच जगात असेही जीव अजून प्रचंड संख्येने आहेत ज्यांच्याबाबत हे धावणे अपरिहार्य असते. इतरांसाठी गरजा भागवणे म्हणजे चार पावलांचे अंतर पार करणे असेल, तर यांच्या दृष्टीने पूर्ण अंतराची मॅरेथॉन असते. दैनंदिन गरजांसाठीच इतकी उरस्फोड करत असताना निसर्गाकडे वगैरे पाहणे त्यांना परवडत नसते. असे असूनही नागरी माणसामध्ये आदिम मानवाची, त्याचाही पूर्वज असलेल्या त्या वानरांची असोशी उद्या चूल पेटवण्यासाठी दडपून ठेवलेल्या निखार्‍यासारखी पहुडलेली असते. विशेषत: महानगरी आयुष्याची नि संस्कार नामक जुनाट वाकळीची झूल अंगावर घेऊन नंदीबैलासारखे आयुष्य जगण्यास सुरुवात करण्यापूर्वी– कदाचित, नितळ दृष्टी असलेल्या लहान मुलांमध्ये ती अधिक असते.

अशाच चार मुलांच्या टोळीने ‘पाऊस म्हणजे रोजगाराचा सत्यानाश’ हे भान झुगारून देऊन केलेले अफाट स्वागत मला अरुण साधूंच्या ‘झिपर्‍या’ मध्ये सापडले. तो सारा प्रसंग मी ही अक्षरश: जगलो इतके ते वर्णन प्रत्ययकारी आहे. (या ‘झिपर्‍या’वर पुढे चित्रपटही येऊन गेला. माझा सुस्त स्वभाव नि मराठी चित्रपटांचे अल्पजीवी असणे यामुळे पाहायचा राहून गेला. त्यामुळे त्यात हे शब्दचित्र किती ताकदीने उतरले आहे मला ठाऊक नाही.)

साधूंसारखा माणूस कुठलीच पठडी मानत नाही. या अफाट माणसानेच ‘सिंहासन’सारखी राजकारणाचा वेध घेणारी कादंबरी दिली, ‘मुंबई दिनांक’ मधून महानगरी व्यक्तींच्या वैय्यक्तिक आयुष्याकडे सूक्ष्मदर्शकातून पाहिले, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या जिण्याचा मागोवा घेणारी ‘मुखवटे’ लिहिली, ‘त्रिशंकू’मधून विलक्षण आत्ममग्न व्यक्तीच्या मनोव्यापाराचा वेध घेतला... विज्ञानकथा, कादंबर्‍याही लिहिल्या. एकाहुन एक अव्वल! इतकेच काय ‘फिडेल, चे आणि क्रांती’ तसंच ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’ सारखी क्यूबा नि चीन सारख्या देशांतील संक्रमणकाळाचा पट मांडणारे लेखनही केले.

‘झिपर्‍या’मधून महानगरी जीवनातील उपेक्षित वर्गातीलही तळाचे स्थान ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा स्वयंरोजगार करणार्‍या मुलांचे आयुष्य उलगडले आहे. बालकामगार ही मानवी प्रगतीच्या नागरी टप्प्यावरील उत्पत्ती. त्यातही इतरांकडे रोजगार करणार्‍यांना शिळ्या-विटक्या भाकरीचे, पाव-उसळीच्या तुकड्याची थोडीफार शाश्वती असते. स्वयंरोजगार करणार्‍यांना ती ही नाही. इतक्या विपन्नावस्थेत राहूनही पहिल्या पावसाचे अप्रूप असलेली ही मुले तो आनंद उस्फूर्तपणे नि बेभानपणे कसा साजरा करतात याचे वर्णन या वेच्यामध्ये आहे. त्या बेभान जगातून बाहेर येतानाच त्या पावसाचा दुसरा अर्थ आऽ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो. ती विसंगती अक्षरश: अंगावर येते इतकी साधूंनी ती जिवंत केली आहे.

‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणत घरच्या सुरक्षित जगातून तो आनंद साजरा करणार्‍या मुलांचे नि पहिला कैफ उतरताच ‘जा रे जा रे पावसा, हाती नाही पैसा’ म्हणावे का अशा संभ्रमात पडलेल्या झिपर्‍या, पोंब्या, गंजू, असलम, नार्‍या, दाम्या यांचे जग निराळे. महानगरी जीवनानेच भरपूर रुंद केलेली एक दरी या दोहोंमध्ये आहे आहे.

- oOo -

(१). त्यातील एक वेचा ‘माकडे, माऊली आणि मुली’ इथे ‘वेचित चाललो...’वर आधीच शेअर केला आहे.
(२). ‘चित्रे आणि चरित्रे’ - व्यंकटेश माडगूळकर, पृ. ७३-७४.
(३). You-Tube वर ‘Chimpanzee Rain Dance’ असे शोधले तर जेनच्या अनुभवाशी मिळतेजुळते व्हिडिओ सापडतात. हा त्यातलाच एक.
Chimpanzee Rain Dance - Mahale National Park
(४). पुस्तक: काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी (पॉप्युलर प्रकाशन)

---

‘झिपर्‍या’ या कादंबरीतील वेचा: धंदा >>


हे वाचले का?