बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल       टोळी ते समाज आणि माणूस       ’देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक       सत्तेचे सोपान       जम्प-कट - २ : अन्नं वै प्राणिनां प्राणा       फुकट घेतला मान       राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (उत्तरार्ध) : सामाजिक संक्रमण       राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (पूर्वार्ध) : माध्यमांतील प्रतिबिंब       मानवी जीवनप्रवासाचा 'जम्प-कट'       भावनांचा प्रवाहो चालला       प्रस्थान ऊर्फ Exit : दोन भाषणांचे नाटक       सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (उत्तरार्ध) : स्वरूप, दर्शन व आकलन       सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष       डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे      

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सापळा

या वेच्यामध्ये मी एक बदल केला आहे. यामध्ये शिकार्‍याच्या जीवनदृष्टीसंबंधी एक दीर्घ विवेचन येते. हा परिच्छेद ’मी इथं दिव्यांचा स्वच्छ प्रकाश निर्माण केला...’ या वाक्याने सुरू होतो आणि "...ही देणगी मला प्राणमोलाची आहे. तेव्हा तुझा निर्णय काय आहे ते सांग." इथे संपतो. पुस्तकात संपूर्ण दोन पाने याने व्यापली आहेत. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरेल. यासाठी मी त्याचे चार ते पाच परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---

रमलखुणा
रमलखुणा

बाहेर रखरखीत ऊन होते, पण या दाट कोंडलेल्या अंधारात कोठे प्रकाशाचा कण नव्हता. हात पुढे करून चाचपडत प्रवासी थोडा पुढे सरकला, पण पायाखालची जमीन काचेची असल्याप्रमाणे निःशब्द, विलक्षण गुळगुळीत भासताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली व तेथूनच मागे वळून निसटावे, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात अनेक ठिकाणी तेजस्वी प्रकाशाचे पंखे उमटले, आणि त्या प्रकाशात भोवती पाहाताच विलक्षण भयाने त्याच्या अंगातील शक्तीच ओसरून गेली. भोवती इंद्रजाल निर्माण झाल्याप्रमाणे त्याच्याच सहस्र आकृती उमटल्या. त्याने बावरून डोळ्यांवर बोटे धरताच कानाकोपऱ्यात अनंत हालचाली झाल्या व प्रकट झालेल्या आकृत्यांनी निरनिराळ्या तर्‍हांनी बोटे उचलली. कारण भोवती सर्वत्र निरनिराळ्या कोनांत बसवलेले, छतापर्यंत पोहोचलेले भव्य आरसे होते. सर्वत्र प्रकाश होता, पण तो नेमका कोठून येत आहे हे समजत नव्हते. आणि या सार्‍यावर धुपाचा गंध असलेल्या धुराचे तलम पदर तरंगत होते. प्रवाशाने सारे धैर्य एकवटले व तो मागे वळून धावला. तोच दोन आरसे सहजपणे त्याच्या समोर सरकले व त्यावर आदळून प्रवासी मागे फेकला गेला.

आता भोवतालच्या आकृतींत शिकाऱ्याचे चित्र हजारपटीने उमटले. तो मोठमोठ्याने हसू लागताच ती चित्रे देखील अनेक तोंडांनी हसू लागली व सारा वाडा त्या हसण्याने भरून गेला.

"आता तो मार्ग बंद झाला !" दूर कोठून तरी शिकारी म्हणाला. “हे आरसे अनेक तर्‍हांनी सरकतात व तुला कुठंही वीसपंचवीस पावलांखेरीज चालता येणार नाही. आज मी इतकी वर्षे या वाड्यात काढली, पण दरक्षणाला हा व्यूह रचणाऱ्या माझ्या गुरूच्या कल्पनाशक्तीची मला धन्यता वाटते ! इथून निघायचा मार्ग माहीत असलेला मीच एकटा उरलो आहे !"

"म्हणजे मला तू कपटानं इथे आणलंस तर !" प्रवासी विषादाने म्हणाला, पण त्याचा आवाज भीतीने दुबळा झाला होता.

“नाही; माझा प्रत्येक शब्द सत्य होता. मी दिलेलं वचन पाळायला पूर्ण तयार आहे." शिकारी म्हणाला. “तुला खायला रुचकर पदार्थ मिळतील. मी सांगितल्याप्रमाणे तुला हरिणाचं, मोराचं मांस देखील मिळेल. एवढंच नाही तर खालच्या तळघरात का होईना, पण तुला जन्मभर ऐषआरामात जगता येईल. पण त्याबद्दल माझी एक लहानशी अट आहे. मला त्यासाठी तुझे डोळे काढावे लागतील."

"काय ? आणि मूठभर अन्नासाठी मी जन्माचा आंधळा होऊ ? अशक्य !" आवेशाने प्रवासी म्हणाला.

आरशांचे कोन बदलले व काही आरसे नीरवपणे सरकले. शिकारी आता जवळच कोठेतरी उभा असल्याचा भास झाला. अनेक ठिकाणांहून त्याचा हात हलला. प्रवाशाकडे बोट रोखून तो म्हणाला,

"साध्या क्षुल्लक गोष्टीविषयी तू वेडेपणा करू नको! मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. डोळे काढताना विशेष यातना होत नाहीत. आणि दृष्टी गेल्यानं काही नुकसानही होणार नाही. उलट तुझी दृष्टी जास्त निवळेल, तुझ्यासमोरील एक आभास कायमचा नाहीसा होईल. एक पायरी चढून तू जास्त खर्‍या गाभ्याकडे येशील. असं पाहा, आता तू डोळे असताना एक वस्तू लाल रंगाची आहे असं म्हणतोस. पण हा लाल रंग म्हणजे काय ? केव्हाचा ? सकाळचा सोनेरी प्रकाश पडला की एक रंग, दुपारी एक रंग ! पाण्यावरच्या छटा कशा झरझर बदलतात, हे तू कधी पाहिलं नाहीस ? मग चांदण्यात पाण्याचा रंग कसा ? आणि सर्वत्र अंधार पडला की तुझा तो रंग कुठं जातो ? अरे वेड्या, या डोळ्यांमुळंच तुझ्याभोवती अनंत फसवी प्रतिबिंब निर्माण होतात आणि मग हे खरं— नव्हे ते खरं, असं म्हणत तू आयुष्य उधळून टाकतोस. आताच बघ, तुझ्या पाठीवर एक मोठी, काळी पाल आहे—

प्रवाशाने चटकन उडी मारली व निरनिराळ्या प्रतिबिंबांत स्वतःकडे निरखून पाहिले. पण पाठीवर काही नाही म्हणताच त्याला हायसे वाटले पण शिकारी मात्र अनावरपणे हसू लागला व त्याच्या हसण्याचा आवाज मंद पसरत असलेल्या धुपाच्या वलयांबरोबर तरंगत राहिला.

"घाबरू नकोस ! इथं पाल, सरडा राहू देच, पण एका चिलटालाही प्रवेश मिळणार नाही !" शिकारी म्हणाला. "पण पाहिलंस? एवढी साधी गोष्ट समजावून घ्यायला देखील तुला प्रतिबिंबालाच विचारावं लागतं. आणि ज्या डोळ्यांनी तू प्रतिबिंबांना शरण जातोस, त्यांना स्वतःचं रूप पाहायला देखील एका प्रतिबिंबाचीच गरज असते. मग तुला काय उपयोग आहे असल्या दुबळ्या फसव्या इंद्रियाचा ?"

"मी इथं दिव्यांचा स्वच्छ प्रकाश निर्माण केला, तो कशासाठी ? माझ्यासाठी नव्हे, तर तुझ्यासाठी. मी स्वतः आता प्रकाशमुक्त असल्यानं त्या रंगीत कारागृहातून सुटलो आहे. पण तू मात्र भोवती पाहा. अनंत रेषेपर्यंत ही प्रतिबिंबांची गर्दी तुला दिसेल. व त्यात देखील एकाचं आणखी एक, त्या दोघांची अनेक, अशी भुतावळ तुला दिसेल. शिवाय तुझा डोळा म्हणजे देखील एक आरसाच ! आरशातील प्रतिबिंब पाहाणारा एक फसवा आरसाच ! आणि या मायाबाजारात एकेक वस्त्र बाजूला करत सत्याकडे जाऊ पाहाणारा तू वेडा तर नाहीस ना? तू कोण आहेस एवढं तरी कधी तुला तुझ्या डोळ्यांनी समजावून दिलं आहे का ? या विविध प्रतिबिंबांपैकी तुझं खरं प्रतिबिंब कोणतं ? ते किती वेळ स्थिर राहतं ? की तू दरक्षणी बदलणाऱ्या प्रतिबिंबाबरोबर नाचरेपणानं स्वतः बदलत असतोस ? या अगणित प्रतिबिंबाची जर बेरीज करता आली, तर त्यातून तू निर्माण होशील का ?

हे झालं तुझ्यासारख्या एका बिंदूप्रमाणं असलेल्या एका व्यक्तीविषयी. मग तुझ्या भोवतालच्या, तुला ज्ञात झालेल्या जगाविषयी तर पाहायलाच नको ! एखाद्या चित्रनळीत किंचित हालचालीनं चित्रं बदलतात, तसं सारं गारुड घडत असतं. आधीच आपण एखाद्या आरशातील पडछाया, आणि खेळ पाहातो तो देखील छायांचाच ! युद्धक्षेत्रावर तुंबळ युद्ध होतं व अठरा अक्षौहिणी सैन्य नाश पावतं. एक असामान्य सुंदरी कुंडलं हलवत डोळे मोडते व तिच्या चेहर्‍यासाठी हजार तारवं समुद्रात ढकलली जातात, आणि आभाळाला भिडलेल्या मनोऱ्यांची नगरं अग्नीत नष्ट होतात. एक सिंहासन वर येतं, दोन साम्राज्यं नष्ट होतात. लक्षावधी घोडे उजाड माळावरून वणव्याच्या लाटेप्रमाणे धावू लागतात व खंड बेचिराख होतात ! प्रतिबिंबांचा प्रतिबिंबांशीच संघर्ष ! आरशातील उत्पात आणि कल्लोळ ! मग या साऱ्यांविषयी कोणीतरी गातं, लिहितं. पुन्हा छायेची आणखी पडछाया ! आणि ते आम्ही भाबडी माणसं वाचतो व त्याची छाया कवटाळून अभिमानाने जगतो.

फेसाच्या एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यात जाताना आपण विश्व पादाक्रांत करीत चाललो आहोत, असं मानणारे आपण किती वेडे आहोत, नाही ? बरं, ही सारी प्रतिबिंबं पायाखाली तुडवून नष्ट करण्याचं तांडवसामर्थ्य तरी आपल्यापैकी एकात आहे ? छट ! उलट, त्या जाळ्यात सापडून संपून जाण्यातच आपल्याला धन्य वाटतं ! पण छायांचं हे विश्व नष्ट करण्याचा एक सोपा मार्ग आपल्या हातात आहे, तो म्हणजे डोळे काढून टाकणं !

माझ्या गुरूनं हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी देखील तुझ्यासारखाच उसळलो होतो. पण आता बघ. माझ्यासमोर गडद काळा पडदा आहे, त्यामुळे वस्तू सूर्यप्रकाशाबरोबर छिनाल होऊन बहुरूपी होत नाहीत. दृष्टी आत वळते. सत्याचं स्वरूप एक आवरण निघाल्याप्रमाणे जास्त उजळ होतं. मला दृष्टी नाही, परंतु मला तुझ्या अतिसूक्ष्म हालचाली देखील जाणवतात; मी किंचित आवाज देखील टिपू शकतो. डोळे असते तर हे सूक्ष्म ध्वनी मला जाणवलेच नसते. जितकी ज्ञानेंद्रिय जास्त तेवढी प्रतिक्रिया खंडित, दुबळी, विस्कळित होते. असा एक काळ यायला हवा, की ध्वनी, स्पर्श, गंध ही देखील पूर्णपणं झिडकारून टाकायला हवी. मनात मग फक्त उत्कट संवेदना, बुद्धीची निरंजन ज्योत यांनीच एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

पण हे फार दूरचं स्वप्न आहे. आज माझा प्रयोग केवळ दृष्टीविषयी आहे. विचार कर आणि निर्णय घे. तुला यातना होणार नाहीत, तुला पुढील आयुष्याची विवंचना पडणार नाही, याचं मी तुला आश्वासन देतो. मला प्रथम इथं आणलं तेव्हा मला असंच वचन मिळालं व ते शेवटपर्यंत पाळलं गेलं. मी देखील शपथ देऊन ते पाळीन. जर समजूतदारपणानं वागलास तर आजचा दिवस दोघांनाही अत्यानंदाचा होईल, कारण तू माझा शंभरावा अतिथी आहेस. इतर वेळी मला एकाकी वाटसरू, गुराखी, धनगर यांच्यावर अवलंबून राहावं लागलं; पण तुझ्या बोलण्याच्या आवाजावरून तू निराळा जाणवतोस. तुझ्या याचनेत देखील ताठरपणा होता. शंभराव्या प्रसंगी तू यावास हे माझं भाग्यच आहे. ही देणगी मला प्राणमोलाची आहे. तेव्हा तुझा निर्णय काय आहे ते सांग."

"छट ! ते कदापी शक्य नाही ! " प्रवासी अनावरपणे ओरडला. पण त्याची दृष्टी समोरील कोपऱ्यात होती. तेथील अंध शिकाऱ्याची आकृती कमी रेखीव पण जास्त गोलाकार होती. प्रवाशाने काळजीपूर्वक आपली फरशी उचलली व वेगाने तिकडे फेकली. पण ती पंधरावीस पावलेही पुढे न जाता एका आरशावर आदळली व खाली पडली.

"म्हणजे तुझ्याजवळ काहीतरी अस्त्र आहे तर!” शिकारी म्हणाला. "पण एक गोष्ट आताच ध्यानात घे. या आरशांवर कसल्याच लोखंडी आयुधांचा परिणाम होत नाही. दुसरं, मी तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहायला वेडा नाही ! असा मी ज्या वेळी तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा असेन, त्यावेळी माझी सुरी प्रथम तुझ्या छातीत रुतून तू आडवा झालेला असशील ! पण तोपर्यंत तुला प्रतिबिंबांशीच लढत राहावं लागेल. आणि वेड्या, प्रतिबिंब फसवी असतात, म्हणून तर ती डोळे असणार्‍यापुढं अमर असतात ! ठीक आहे, जर तू विचार करून हा निर्णय घेतला असशील तर माझा नाइलाज आहे. मी तुला सांगितलं की, मी शिकारी आहे. मी स्वतः हरीण, मोर असल्या क्षुद्र शिकारी करत नाही. मी शिकार करतो ती माणसांची ! सावजाला पूर्ण सावध करून, इशारा देऊन ! आता मात्र तू सावध राहा ! कोणत्याही क्षणी तुझ्या मृत्यूचा क्षण येईल ! तू तयार आहेस ?"

त्याच्या बदललेल्या स्वरातील भयानक कठोरपणा ऐकून प्रवाशाच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने पुढे सरकून आपली फरशी झटकन उचलली व एका कोपर्‍यात आसरा घेतला.

"आता तू पुढं सरकला आहेस, तू तुझं अस्त्र उचलून घेतलं आहेस, पण तुझ्या हालचालीत विलक्षण भय आहे." दुरून कोठेतरी शिकारी म्हणाला. एका आरशातील प्रतिबिंबात सुरी घेतलेला एक हात पुढे होताच अनेक प्रतिबिंबांनी अनुकरण केले. दुसऱ्याच क्षणी एक सुरी वेगाने प्रवाशाच्या दिशेने आली व अगदी त्याच्या गळ्याजवळून सरकून मागच्या आरशावर आदळून खाली पडली. प्रवाशाने कोपर्‍यात अंग आकसले, व भराभर दोन आरसे सरकवून तो सावधपणे उभा राहिला.

"आता तू दोन आरसे सरकवून उजवीकडे आला आहेस व तुझा श्वासोच्छ्‌वास वेगानं होत आहे." शिकारी म्हणाला. त्याच्या शब्दांमागोमाग एक सुरी आली व प्रवाशाच्या कमरेला ओझरता स्पर्श करून पायावर पडली.

प्रवाशाचा पीळ आता सुटत चालला व तो बेभानपणे आरसे सरकवत, काही वेळा त्यांच्या फटींतून, सैरावैरा धावू लागला. त्याचा चेहरा श्रमाने, भीतीने ओलसर झाला व त्याने हातपाय कापू लागले. शिकारी कोठे तरी पुढे सरकला व त्याची आकृती हताश होऊ लागलेल्या प्रवाशाभोवती उमटली. प्रवाशाने श्वास रोखून धरला व हलकेच अंग खाली सरकवत तो जमिनीवर पसरला व स्तब्ध झाला.

"ठीक आहे, तुझं त्राण संपत आलं आहे. मलाही आता घाई नाही. मी वाट पाहीन. तासन्‌तास वाट पाहण्याचा गुण असल्याखेरीज माणूस कधी शिकारी होतच नाही !"

भोवतालची त्याची प्रतिबिंबे नाहीशी झाली व काही आरसे सरकले. प्रवासी अगदी गोठल्याप्रमाणे निश्चल पडून राहिला व त्याने ओलसर चेहरा पुसून घेतला. आता छतावरील आरशातील प्रतिबिंब तेवढेच त्याला पूर्णपणे साक्षी होते. पण या पूर्ण हताश क्षणी त्याचे मन मात्र पूर्ण स्वच्छ होते. येथून सुटण्याचे अनेक मार्ग त्याच्या दृष्टीसमोर आले, पण सगळेच प्रतिबिंबाप्रमाणे क्षणभर दिसून नाहीसे झाले. हात वर करताच विविध पडछायांनी साद देणाऱ्या उंच गुळगुळीत भिंती अगदी वरपर्यंत पोहोचल्या होत्या व त्यावर माशी देखील सरकू शकली नसती. आधारासाठी त्यांच्यात कोठे खिडक्या, कोनाडे, खुंट्या असण्याची शक्यता नव्हती. पण भोवती, वर मार्ग नसला, तरी तो खाली निघणार नाही कशावरून ! त्याला या कल्पनेने किंचित उत्साह वाटला व उठून बसला. पण त्याबरोबर कोपऱ्या-कोपऱ्यात आपणावर पाळत ठेवणारे अनेक पहारेकरी देखील उठून बसले, हे पाहून तो एकदम भेदरला व पुन्हा आडवा झाला. मग त्याला जाणवले— हे पहारेकरी नव्हेत; ही आपलीच चित्रे आहेत ! आपण साधी हालचाल देखील हजार अंगांनी करत आहोत ! त्याने चेहरा पुन्हा कोरडा केला व गुळगुळीत जमिनीवर तीनचार ठिकाणी हलकेच फरशी आपटून पाहिली.

“नाही. तिथं तुला मार्ग मिळणार नाही. तिथे सगळीकडे पाचसहा हात खडक आहे." दूर कुठेतरी हसत शिकारी म्हणाला.

त्याबरोबर श्वास रोखून प्रवासी कोपऱ्यात अडकलेल्या श्वापदाप्रमाणे निश्चल झाला व त्याचे मन मूढ बनले. त्याला वाटले, वधिकाचा नाश करण्यास समर्थ ठरलेली फरशी, निर्जीव प्रतिबिंबांनी वेडावणाऱ्या या आरशांपुढे दुबळी ठरली ! या क्षणी त्यांच्यात खिंडार निर्माण करू शकणारी वस्तू अष्टभुजेच्या रत्नापेक्षाही अमूल्य आहे ! आणि त्या रत्नासाठी आपण अर्धा देश तुडवला, प्रवास केला !

आधी एका कस्तुरीमृगासारख्या स्त्रीसाठी जीव पणाला लावून भ्रमंती केली. नंतर त्या तेजस्वी रत्नासाठी आयुष्य वार्‍यावर सोडले ! म्हणजे परवाचे स्वप्न आज नाही, आजचे स्वप्न आता नाही. उसळत्या तारुण्यात स्त्रीची अभिलाषा; दारिद्र्यात रत्न मूल्यवान; भुकेच्या वेळी रत्नापेक्षा बोर मूल्यवान; आणि आता एका तरी आरशाला तडा पाडू शकेल असले आयुध मूल्यवान ! म्हणजे आपली सारी स्वप्ने म्हणजे फक्त भोवतालच्या स्थितीमुळे आपल्यावर चढलेला बुरखा आहे आणि तो गोळा करत त्यावर जगणारे आपण दोन पायांचे अहंमन्य कीटक ! प्रतिबिंबच का होईना, पण अभंग श्रद्धेने ज्यापुढे हा शरीराचा मांसाच कपटा फेकून द्यावा, असे प्रतिबिंबदेखील आपल्या वाट्याला येत नाही. एखाद्या झगझगीत हिरव्या खड्यासाठी एकदा प्राण पणाला लावावेत, तर एकदा एक निरुपयोगी बीच्या भोवती असलेल्या नखभर गरासाठी ते धपापू लागावेत, आणि आता शून्याच्या तुकड्याप्रमाणे असलेल्या एका हातभर भगदाडासाठी रक्त आटवत बसावे... क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या शेणामेणाच्या वाड्यात नांदणारी आपण माणसे...

प्रवाशाच्या थकलेल्या मनात हलकेच तरंग उमटत होते. बैराग्याच्या गोष्टी, अष्टभुजेमधून निघालेला लाल डोळ्यांचा सर्प, जटाधाऱ्याचे मरत चाललेले डोळे हंसाकृती नौकेतून विहार करताना गळ्याभोवती पडलेला रमणीचा गौर हात व त्यातील पात्रामधील लाल मद्य... सारे काही थेंबाथेंबाने या शून्यतीर्थात विसर्जित होऊ लागले. भोवती सर्वत्र वेडावणारी फसवी प्रतिबिंबे, आपणही कसले तरी प्रतिबिंब; प्रतिबिंबाची अनेकवार वर्तित झालेली पुन्हा प्रतिबिंबेच... ती आपल्या मृत्यूची वाट पाहात आरशातल्या मिंतीतल्या भिंतीतल्या भिंतीतल्या भिंतीतून आपल्याकडे पाहात आहेत...

तो तसाच पडून असता त्याच्या हाताला कसलातरी ओझरता मऊ उष्ण स्पर्श होताच तो चमकला व ताडदिशी उठून बसला. कुत्र्याचे पिल्लू त्याच्याभोव्ती हिंडत एका सांदीतून पुढे जायला मार्ग शोधत होते व त्याच्या गळ्याची दोरी आरशांच्या मागे मागे कोठेतरी गेली होती. त्या घटनेचा अर्थ ध्यानात येताच प्रवाशाच्या अंगात वीज चमकल्यासारखे झाले व त्यांच्या तोंडून नकळत हर्षाचा उद्गार बाहेर पडला.

"प्रवासी, तू एकदम उभा राहिला आहेस. तुझा कसलातरी नवा प्रयत्न आहे. " शिकारी दुरून म्हणाला. "पण लक्षात ठेव, इथून निसटणं सोपं नाही. गेली अनेक वर्षे अत्यंत विचारानं हे स्वप्नं मी रचत आलो आहे. आतापर्यंत मी नव्याण्णव माणसांचे डोळे काढले आहेत; मी शंभराव्या माणसाकडून पराभव स्वीकारणार नाही ! "

शिकार्‍याचे शब्द संपले, तोच त्याच्या मागून वेगाने सुरी आली व कुत्र्याच्या दोरीवर आदळत ती छेदून जमिनीवर पडली. प्रवाशाने प्राणपणाने दोरी घट्ट धरली व तो जमिनीवर आडवा पडला. त्याने एका हाताने कुत्र्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण ते दोन आरशांच्या सांदरीतून निसटले व पलीकडे नाहीसे झाले.

प्रवाशाने दोरी मनगटाला बांधून घेतली व तो तिच्या मागाने हलकेच पुढे सरकू लागला. वाटेत आरसे सरकवताना त्याचा श्वास आपोआप रोखला जाऊ लागला. त्या क्षणी त्याचे शरीर धनुष्याप्रमाणे ताणले जाई व दुसऱ्या क्षणी सैल पडून नीरवपणे पुढे सरकू लागे.

"प्रवासी,—" शिकारी कर्कशपणे ओरडला. त्याच्या आवाजात आता अनिश्चितता होती. "तुझ्याबरोबर आणखी काय आहे ? कोण आहे ?" आता पुन्हा एक सुरी आली, पण ती प्रवाशापासून काही अंतरावर पडली. "या माझ्या वाड्यात काहीतरी अज्ञात हिंडत आहे. इथं एक कीटक शिरणार नाही, अशी चिरेबंद व्यवस्था मी केली होती. तू स्वतःबरोबर काय आणलं आहेत आत ? येथील वातावरण केवळ माणसांचं आहे. त्यांच्या सूक्ष्म हालचालीनं, आवाजानं त्यांच्या सुखदुःखभय इत्यादी भावना मला अत्यंत तरलपणं समजतात. मी सारं आयुष्य त्यासाठी वेचलं आहे. पण आता या कोळ्याच्या जाळ्याला कसले तरी चमत्कारिक, अज्ञात हेलकावे बसत आहेत—"

शिकार्‍याचा आवाज आता वेडावाकडा फाटत असल्याप्रमाणे वाटू लागला, व तो आत्यंतिक निराशेने स्वतःशी हुंदके दडपत असल्याप्रमाणे घोगरा झाला होता. आता तर अनेक आरसे बेभानपणे वेगाने सरकवत असल्याचा सतत आवाज होऊ लागला, व सुर्‍यांचा स्फोट झाल्याप्रमाणे त्या वेगाने ठिकठिकाणी आदळू लागल्या.

आता प्रवाशाचे अंग उतावीळपणे थरथरू लागले, व तो एखाद्या जलचराच्या नीरवतेने पुढे सरकू लागला. दोरी वळत गेली होती तेथील आरसे सरकवत पुढे जाताना तो मोकळी झालेली दोरी मनगटाला गुंडाळत होता. काही वेळाने एक आरसा हलकेच सरकवताच समोर भव्य दरवाजा दिसला, आणि त्याचे सारे शरीर एकदम सैल पडले. त्याने थरथरत्या हातांनी अडणा उचलला. पण दरवाजा उघडताच झालेला कर्कश आवाज एखादा कडाच भंगत असल्याप्रमाणे त्याला प्रचंड वाटला, व त्या भीषण आवाजाने सारा वाडाच कोसळतो की काय, अशी त्याला भीती वाटली.

"म्हणजे तू दरवाजाजवळ पोहोचलास की काय ?” शिकारी दुरून ओरडला. अनेक आरसे वेगाने सरकले व शिकारी धावत येत असल्याप्रमाणे त्याची पावले बाजू लागली. स्फोटाने उडाल्याप्रमाणे प्रवासी बाहेर आला व त्याने बाहेरून कोयंडा अडकवला. पण त्या क्षणी मात्र इतका वेळ प्राणपणाने ताणून कोंडून ठेवलेली त्याची सारी शक्ती ओसरली व तो मरगळलेल्या पावलांनी पायरीवरच घसरला.

येताना आत कोठे तरी शिकाऱ्याने आणखी एक सुरी फेकली, तेव्हा चिरून फुटल्यासारखा आर्त आवाज झाला व लगेच विरून गेला. पण त्या आवाजाने प्रवाशांचे मन मात्र फाटल्यासारखे झाले. अंगात उरलेला एक क्षणाचा दीन आवाज देखील आता सुरीने अंग चिरून कोरून बाहेर काढल्याप्रमाणे कुत्रे ओरडले व कायमचे गप्प झाले.

प्रवाशाला वाटले, हे कुत्रे कुठले, कोणाचे, कुणास ठाऊक ! आपण त्याला एक घास अन्न दिले नाही, की पाण्याचा थेंब पाजवला नाही, पण आपले सारे आयुष्य मात्र त्या मुठीएवढ्या कुत्र्याचे कायमचे ऋणी झाले ! आयुष्यातील ऋणे कधी फेडता येतात का ? मृत्युरेषेपलीकडे जर कुठे आयुष्यातील असल्या ऋणांची मिटवण असलीच, तर आपले काळीज काढून त्याला दिले तरी ते ऋण संपणार नाही !

"एक कुतरडे ! एक भिकार, घाणेरडे कुतरडे !" आतल्या बाजूने दरवाजावर डोके आपटत शिकारी ओरडला व तो मोठ्याने हुंदके देऊ लागला. मोलाची व्हावी अशी शंभरावी शिकार— ती मिळाली एका क्षुद्र कुत्र्याची ! इतकी वर्षे व्यूह रचला, किंचित आवाजानंही माणसांची मनं जोखली; आणि ते सारं नष्ट केलं, ते या लाचार, स्वजातीयांशी वैर करणाऱ्या मलिन जनावरानं ! माझंच चुकलं ! सारं काही संपूर्णपणं चुकलं ! इतकी वर्षे हाडं झिजवल्यावर हलाहल मिळालं काय— तर आपलं सर्वस्वी चुकलं, हे विषारी ज्ञान ! मी सगळं माणसांचंच जग गृहीत धरलं, त्यावर निष्कर्ष बसवले, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण केलं. त्यातच सगळं काही चिरेबंद करून लहानशी फट देखील ठेवली नाही. पण विश्वात मानव हा काही एकटाच जीव नाही हे मला सुचलं नाही, मला सुचलं नाही...”

शिकारी आता मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागला.

- oOo -

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. २६-३५.


हे वाचले का?

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

माकडिणीची कथा

बखर बिम्मची
बखर बिम्मची

नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळाला हात लावत आईने दार उघडले, तर वाणी दुकानदार समोर उभा !

तो म्हणाला, “तुमच्या यादीप्रमाणे सामान आणल आहे मी! उद्या गुरुवार, दुकान बंद. तेव्हा तुमची अडचण नको; म्हणून मीच सगळ्या पिशव्या सायकलीला अडकवून स्वतः आलो. कुठे ठेवू हे सामान?"

"सगळे ठेव माझ्या डोक्यावर!" असे त्याला सांगावे असे आईला फार वाटले. रात्रीचे साडेआठ-नऊ ही का कधी सामान पाठवण्याची वेळ असते ? ती वर वर हसून म्हणाली, " बरं केलंत, नाहीतर घरी पोहे नाहीत, म्हणजे आमचा फार खोळंबा झाला असता !

“ पोहे तेवढेच आणले नाहीत मी, "दुकानदार म्हणाला, "परवा दिवशी नंबरी माल येणार आहे. तेव्हा घेऊन येतो."

आता आईचा वण संपला. तिने सारे सामान घेतले. मग ते निरनिराळ्या डब्यात भरले, व डबे फळ्यांवर ठेवले.

तोपर्यंत दहा वाजले. ती वर आली तेव्हाच अर्धवट झोपेत होती. स्वच्छ पसरलेले, वाट पाहात असलेले अंथरूण बघून तिला फार समाधान वाटले. कोपऱ्यातील कॉटवर बब्बी, बाजूच्या कॉटवर बिम्म, दोघेही अगदी निश्चलपणे पसरली होती, तरी दोन्ही पोरे घड्याळाप्रमाणे खडखडीत जागी आहेत हे तिला पुरेपूर माहीत होते. ती अंथरुणावर पडली व भिंतीकडे तोंड करून तिने डोळे मिटून घेतले. पांघरुणाच्या कडेवरून बब्बीने तिच्याकडे पाहिले. पण बिम्म पांघरूण बाजूला टाकून सरळ उठूनच बसला. नंतर तो आईकडे आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, "आई, आज गोष्ट सांगायची राहिलीच की!"

“हे बघ बाबा ! " डोळे कसेबसे उघडे ठेवत आई म्हणाली, “ आज माझं हाड न हाड दुखतंय अंगात. आता झोप जा. शहाणा ना तू ?"

केवळ सवयीमुळेच बिम्मने मान हलवली. नाहीतरी शहाणा होण्याबाबत त्याचा उत्साह फारच कमी झाला होता. शहाणा व्हायचे म्हणजे पुष्कळशा गमतीच्या गोष्टी करायच्या नसतात, हे त्याला कळून चुकले होते.

"बरं आई, आज तुझी गोष्ट राहू दे, तू उद्या सांग, झालं?" बिम्म म्हणाला. आईला समाधानाचा सुस्कारा टाकायला वेळच मिळाला नाही, कारण तो पुढ़े म्हणाला, “ मग मीच तुला एक गोष्ट सांगतो."

आई एकदम घाबरी झाली. बिम्मची गोष्ट म्हणजे तीत काय येईल, काय येणार नाही, याला काही ताळतंत्र नसे. दिवसभरात घडलेले सारे प्रसंग, रस्त्यात दिसलेली गाय, बब्बीच्या हातून फुटलेला कप, वाळत घातलेले कपडे, मांजर, पोस्टमन, गवळी, चिमण्या, हे सारे तिच्यात येत असे. मध्येच जर एखाद्या कुत्र्याचे ओरडणे ऐकू आले, तर ते देखील गोष्टीत आलेच. शिवाय त्याची गोष्ट नुसती ऐकून घेणे त्याला साफ मंजूर नसे, तर ऐकणाऱ्याने प्रत्येक वाक्याला 'हूं' म्हटले पाहिजे. “जर तू 'हूं' म्हणत नाहीस, तर मी गोष्ट कशी सांगू पुढे?" तो अधीरपणे ओरडे, व झोपलेल्या आईला हलवून जागी करी. त्यालाच जर झोप आली, तरच त्याची गोष्ट थांबत असे, ती कधी संपत नसे; ती तात्पुरती थांबत असे. आणि ती सटवी त्याची झोपदेखील कधी रात्रीचे बारा वाजून गेल्याखेरीज आधी येत नसे. आई उठून बसली व म्हणाली, “मीच एक लहानशी गोष्ट सांगते. ती झाली की अंथरुणावर पडायचं व झोपायचं. कळलं?"

बिम्मने मान हलवताच ती सांगू लागली. “एक होता राजपुत्र-"

“त्याचं नाव काय होतं ?" बिम्मने लगेच विचारले.

“त्याचं नाव गाव गोत्र घेऊन काय करायचंय तुला? तू काय लगेच त्याला पत्र पाठवणार आहेस, की त्याचं लग्न जुळवणार आहेस?" आई चिडून म्हणाली, "आणि आता मध्ये बोललास तर गोष्ट नाही, काही नाही. शिवाय सकाळी एरंडेल घ्यावं लागेल, समजलं?"

बिम्मने ऐसपैस मांडी घातली, व तो निश्चयाने गप्प बसला.

"एक राजपुत्र होता. तो राजवाड्यात राहात असे. एकदा त्याला वाटले आपण बाहेर पडावे, व काहीतरी विकत घ्यावे." येथे बिम्मचे ओठ हलणार असे दिसताच आईने बोट उगारत त्याच्याकडे रागाने पाहिले व तो गप्प राहिला. राजपुत्र राजवाड्यातून बाहेर पडला, तेव्हा त्याला एक गुराखी, एक गाय व वासरू घेऊन चाललेला दिसला. राजपुत्र त्याला म्हणाला, "तुमच्याजवळ दोन गाई आहेत. त्यातील एक मला विकत द्याल काय ?"

गुराखी हसला व म्हणाला, “दिली असती, पण खरे म्हणजे माझ्याजवळ दोन गाई नाहीतच. एकच गाय आहे. ती दुसरी लहान गाय आहे ना, ती आणखी एक गाय नाही, तर ती लहानपणची मोठीच गाय आहे."

राजपुत्राने पाहिले. खरेच ती लहान गाय अगदी मोठ्या गाईसारखीच दिसत होती. तेव्हा तो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने वाटेत त्याला काही मेंढ्या बरोबर घेऊन निघालेला, तांबडा रुमाल बांधलेला एक धनगर भेटला. राजपुत्राने त्याला विचारले, "तुमच्याजवळ इतक्या मेंढ्या आहेत. त्यातील एक मला विकत द्याल का?"

त्यावर धनगरदेखील त्याच्याकडे पाहून हसला. तो म्हणाला, “दिली असती, पण त्या सगळ्या मेंढ्या काही खऱ्या नाहीत."

"खऱ्या नाहीत म्हणजे काय ?" राजपुत्राने विचारले.

“हे बघ, झोप यावी म्हणून पडले असता समोरून मेंढ्या चालल्या आहेत, अशी कल्पना करून त्या मोजत राहिलं की झोप येते, हे तुला माहीत आहे ना? ते पलीकडे झाड आहे, त्याच्या सावलीत चार माणसे आडवी झाली आहेत. त्यातील तांबडा रुमालवाला आहे ना, तो मीच आहे. मी ज्या मेंढ्या मोजत तेथे पडलो आहे, त्याच या सगळ्या मेंढ्या आहेत. मला झोप लागली, किंवा मी डोळे उघडले की, वा सगळया मेंढया नाहीशा होतील. मग असली एक मेंढी घेऊन तू काय करणार ?"

राजपुत्राला ते पटले. त्याने मान हलवली, व तो पुढे गेला.

थोड्या वेळाने त्याला घोड्यावरून येत असलेला एक माणूस दिसला. तो फार घाईत दिसत होता. पण राजपुत्राला तो घोडा इतका आवडला, की त्याने हात वर करून त्याला थांबवले व म्हटले, "तुमचा घोडा फार छान आहे. तुम्ही मला तो विकत द्याल का?" तो माणूस म्हणाला, “दिला असता की! पण हा घोडा माझा नाही. गावातील चौकात हातात तलवार घेतलेला एक टोपीवाला माणूस आहे ना, त्याचा हा घोडा आहे. मला गडबडीने कामाला जायचे आहे, म्हणून मी तो थोडा वेळ त्याच्याकडून मागून घेतला. तो फार तर एक तासभर हवेत पाय पसरून तसाच अंतराळी थांबेल. त्या आधीच घोडा परत आणून त्याच्याखाली पूर्वीप्रमाणे ठेवीन, असे मी कबूल केले आहे बघ. तुला जर घोडा दिला, तर तासभर हवेत राहिल्यावर तो कंटाळून धप्पदिशी खाली पडेल नव्हे ?"

“होय, पडणारच की." राजपुत्र म्हणाला.

आता परत राजवाड्याकडे जावे की काय, असा तो विचार करीत असता गळ्याभोवती दोऱ्या बांधलेली दोन माकडे सोबत घेऊन येत असलेला एक म्हातारा त्याला दिसला. माकडे गंमत करत, उड्या मारत, हुंदडत चालली होती. राजपुत्राने म्हाताऱ्याला विचारले, यांतील एक माकड मला विकत द्याल का?"

म्हाताऱ्याने थोडा विचार केला व म्हटले, "देईन की, पण त्याबद्दल तुला तुझा सोन्याचा सदरा व सोन्याची टोपी द्यावी लागेल. मला राजवाड्यात जाऊन माकडाचा खेळ दाखवायचा आहे. देशील?"

राजपुत्राने सदरा, टोपी काढून त्याला दिली व एका माकडाची दोरी हातात धरून तो परतला. म्हाताऱ्याने सदरा, टोपी माकडावर चढवली, व तो राजवाड्याकडे निघाला.

राजपुत्र माकड घेऊन राजवाड्याकडे आला तेव्हा सोन्याचा सदरा, सोन्याची टोपी घातलेल्या माकडाभोवती खूप गर्दी झालेली त्याला दिसली. सगळी माणसे माकडाला अगदी लवून मुजरा करत होती. खुळी माणसे नेहमीच कपडे, खुर्ची, गादीला नमस्कार करत असतात, पण माकड मात्र पायावर पाय टाकून ऐटीत स्वस्थ बसले होते. म्हाताऱ्याने आरडाओरड करत अनेकदा काठी आपटली, पण माकड मात्र सुस्तच राहिले.

उघड्या अंगाचा राजपुत्र दोरी बांधलेले माकड घेऊन तेथे येताच तेथील पहारेकऱ्याने त्याला हटकले, व दरडावून म्हटले, “चल नीघ येथून. राजवाड्यात "तुला आमंत्रण आहे काय ?" असे तीनदा झाल्यावर राजपुत्र रडकुंडीला आला, व बाहेर येऊन बसला. थोड्या वेळाने म्हातारा आपल्या माकडाला दरदर ओढत त्या ठिकाणी आला, व राजपुत्राच्या शेजारी बसला.

'तुझा सोन्याचा सदरा, तुझी टोपी घे बाबा परत. हे कपडे घातल्यावर माकड एक उडी मारेना. आणि खेळ नाही, तर कोण देईल पैसे ? उपाशी मरू की काय ?

त्याने माकडावरील कपडे उतरवले, तेव्हा ते लगेच टुणटुण उड्या मारू लागले, व काठीवर चढउतार करू लागले. राजपुत्राने आपले माकड परत करताच त्याचा खेळ सुरू झाला. म्हाताऱ्यापुढे माणसे जमली व काहींनी त्याच्यापुढे पैसे टाकले. म्हाताऱ्याने ते गोळा केले, व दोन्ही माकडे घेऊन तो निघून गेला.

राजपुत्राने आपले सोन्याचे कपडे घातले, व तो राजवाड्यात आला. पहारेकऱ्याने त्याला मुजरा केला, व इतरांनी त्याला आत जायला अदबीने वाट करून दिली.

“हं झाली आजची गोष्ट. आता गप्प जाऊन पड व मलादेखील झोपू दे थोडा वेळ!” आई अंथरुणावर लवंडून म्हणाली. मग बिम्म अथरुणावर जाऊन पडला. पण बराच वेळ त्याची चुळबुळ चालू होती. अखेर तो उठून बसला, तेव्हा बब्बीने डोळे उघडले व ती मोठ्या उत्सुकतेने पाहू लागली.

बिम्म आईजवळ आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, “आई-"

"आता आणखी काय काढलंस ?” मोठ्या कष्टाने डोळे उघडत आई म्हणाली.

"आई, खेळ करणारं एक माकड मला आणून देशील?" बिम्मने विचारले.

“खेळ करणारी दोन माकडं कशाला घरात?", आई चिडून म्हणाली, "एक आहे, तर त्यानेच मी हैराण होऊन जाते संध्याकाळपर्यंत! जा आता जाऊन पड. नाहीतर दोरीनं बांधून ठेवीन तुला त्या कॉटला !"

बब्बीने पटकन तोंडावरून पांघरूण घेतले, पण त्याखाली ती बराच वेळ खिदळत होती. तिच्याकडे पाहात आई म्हणाली, “आणि तूदेखील खिदळ खोबरी, आता जर का तिकडून थोडा जरी आवाज आला, तर कान ओढून लांब करून त्यांची गाठ मारून ठेवीन बघ डोक्यावर!"

बिम्म अंथरुणावर येऊन पसरला, डाव्या कुशीवर वळला, पण लगेच उजवी बाजू त्याला जास्त बरी वाटली. पांघरूण हळूच बाजूला करून बब्बी आपल्याकडे पाहात आहे, हे पाहून त्याने तिला वेडावून दाखवले. थोडा वेळ गेला, व त्याची हालचाल जास्तच वाढली. तो उठला व आईजवळ आला. या वेळी तिला जागी करायला जास्त वेळ हलवावे लागले.

"आई !"

"म्हणजे पुन्हा आलास होय? तुझा पायच मोडून देते थांब तुझ्या हातात." ती रागाने म्हणाली, "आता कसली काढली आहेस नवी वरात?"

"खेळ करणारं एक माकड आधीच आहे घरात असं म्हणालीस. ते कुठं आहे?"

बब्बी तर लाही उडाल्याप्रमाणे एकदम फट्ट्‌दिशी हसली. आईने भिंतीकडे तोंड वळवून ओठ घट्ट मिटून घेतले. मग ती म्हणाली, “ते आहे वरच्या मोठ्या कपाटात, आता ते शहाण्यासारखं झोपलं आहे. आता तूदेखील झोप. माझ्यावर एवढे उपकार कर बाबा! "

पुन्हा बिम्म अंथरुणावर पडला. इकडे तिकडे चार पाच वेळा वळल्यावर त्याचे डोळे जड होऊ लागले, व अखेर तो झोपला. तो झोपल्यावर बब्बीचेदेखील लक्ष उडाले, व ती ऐसपैसपणे झोपली.

पण सकाळी उठल्याबरोबर जर मोठ्या कपाटासमोर बिम्म अखंड धरणे धरून बसला, तर आपण काय करायचे ? असा विचार मनात येताच आईचा थरकाप झाला, व तिची झोप थोडा वेळ खाडकन उडाली.

- oOo -

पुस्तक: बखर बिम्मची
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती चौथी.
वर्ष: २०१८.
पृ. ६३-६८.

---

मूळ पुस्तकात ही ’माकडाची कथा’ या नावाने आहे. मी त्याचे शीर्षक हेतुत: बदलले आहे. नीट पाहिले तर ’अथ’पासून ’इति’पर्यंत ही कथा एका ’माकडाच्या पिल्ला’च्या आईचीच आहे. कारण तीही मादीच्या भरवशावर सोडून गेलेल्या बापाच्या माघारी त्याच्या पिलांचा एकट्याने सांभाळ करणारी, एखाद्या माकडिणीची नागर आवृत्ती आहे. आपल्याला ठाऊक असलेली पंचतंत्रातील माकडिणीची कथा वेगळी आहे. ती जिवावर आले की मुलालाही पायाखाली घेण्यारी आहे. या माकडाची आई मात्र कितीही दमली तरी पिलाला जोजवणारी आहे.


हे वाचले का?

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

वेचताना... : जेरुसलेम, एक चरित्रकथा

'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्‍या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव्हंशी अवघड दिसते. त्यातच जिथे संघर्ष असतो तिथे परस्परविरोधी दावे असतात. अशा परिस्थितीत अभ्यासकाचे कार्य अतिशय अवघड होऊन बसते. जेरुसलेम ही नगरी तीन धर्मांचे नि अनेक पंथांचे श्रद्धास्थान असल्याने आणि त्यावरील वर्चस्वासाठी असंख्य झालेल्या लढाया , अगणित माणसांचे गेलेले बळी, साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणावर झालेला विध्वंस यामुळे दुसर्‍या बाजूने तो संवेदनशीलही होऊन बसतो.

'जेरुसलेम: एक चरित्रकथा' ही साम्राज्यांची, सम्राटांची, राजांची त्यांच्या वंशावळीची जंत्री नाही, तो जेरुसलेम या नगरीचा शोध आहे. सुमारे दोन हजार वर्षांचा हा इतिहास सायमन सीबग माँटफिअरी याने कालानुक्रमे मांडला आहे. याचा परिणाम म्हणून काही व्यक्ती, राज्यांचे, सत्तास्थानांचे (उदा. रोममधील पोपची गादी) उल्लेख अचानक उगवल्यासारखे दिसतात. पण त्यांचा जेरुसलेमशी जेव्हा संबंध येतो तेव्हाच ते येतात आणि संदर्भासाठी त्यांची पार्श्वभूमी माफक तळटीपांच्या स्वरूपात येते. सायमनने आपला हा दृष्टीकोन संपूर्ण पुस्तकात काटेकोरपणे जपला आहे.

जेरुसलेम

जेरुसलेम नगरीचा इतिहास हा प्रथम बायबलमधे ग्रथित केलेला आहे. त्यामुळे तिच्या अभ्यासात बायबल हा एक आधार म्हणून वापरले जाणे अपरिहार्य आहे. पण बायबल ज्यातून सिद्ध झाले असे सुरुवातीचे ग्रंथ ढोबळपणे दोन गटांनी लिहिले असे मानले जाते. पहिले 'एल' या कननाईट देवाचे उपासक होते तर दुसरा गट हा याहवेह (यहोवा) या इस्रायली देवाचा उपासक. या दोन गटांनी सांगितलेल्या कहाण्यांमधे अनेक बाबतीत तपशीलात फरक पडत होते. त्यात येणारे विसंगत तपशील, कालानुरूप होत गेलेले - हेतुतः वा अनवधानाने केलेले - बदल यामुळे अभ्यासकाने बायबल सर्वस्वी विश्वासार्ह इतिहास सांगते असे मानून चालत नाही. जेरुसलेमच्या इतिहासाचा वेध घेताना बायबलची चिकित्सा नि अभ्यास अपरिहार्य ठरतो.

अर्वाचीन काळामध्ये जेरुसलेम आपल्याला ठाऊक झाले ते इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात कळीचा मुद्दा झाले तेव्हा. या नगरीला साडेतीन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. ही नगरी कोणत्याची साम्राज्याची राजधानी कधीच नव्हती. किंबहुना जेरुसलेमचे राज्य हे कधी ईजिप्तचे फॅरो, असीरियन राजे, बॅबिलोनियन सम्राट, रोमन, बायझंटाईन सम्राट, पर्शियन, ऑटोमन, माम्लुक, कैरोचे शिया खलिफा, मक्केचे सुनी खलिफा, इस्माईली, सूफी राजे यांच्या अधिपत्याखाली होते. या पलिकडे यावर आर्मेनियन, जॉर्जियन, मंगोल, तार्तार, सीरियन, सुदानी वंशाच्या राजांचे राज्यही अल्पकाळ होते. क्रूसेडच्या काळात इंग्लिश, नॉर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या उत्तर युरोपियन वंशाच्या लोकांनीही इथे काही काळ सत्ता राबवली.

शासन बदलताना बहुतेक वेळा जेरुसलेम उध्वस्त झाले, मोडले, रसातळाला गेले, पुन्हा उभे राहिले, नव्या विध्वंसाला सामोरे गेले. अगणित माणसांची आणि घोड्यांची थडगी या भूमीने वागवली, उध्वस्त होताना पाहिली, स्त्रियांवर अत्याचार होताना पाहिले. भावाने भावाला, आईने मुलीला, बापाने मुलाला दगा देताना पाहिले. जनावरालाही कधी दिली गेली नसेल अशी वागणूक माणसाने माणसाला दिलेली अनुभवली... आणि हे सारे कशासाठी तर 'माझा शांततेचा धर्म खरा की तुझा' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. हा वर वरचा निस्वार्थ हेतू खरवडून काढला तर प्रत्येक शासकाच्या, प्रेषिताच्या मनात दिसते ती सत्ताकांक्षा. बहुसंख्या निर्माण करणे किंवा सत्ता हाती घेऊन तिच्या बळानेच कोण खरे कोण खोटे हे ठरवण्याचा मापदंड जेरुसलेमच्या भूमीत हजारो मैल खोलवर रुतून बसलेला दिसतो.

पण निव्वळ या राजकीय आणि हिंसक इतिहासापलिकडे ज्या तीन धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून या नगरीकडे पाहताना इतिहासाची मांडणी त्या अंगानेही व्हायला हवी. पण कालानुक्रमे इतिहास मांडताना यातील बरेचसे तपशील दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. मूळचे सॉलोमनचे मंदिर, होली सेपलकार चर्च, मागाहुन आलेल्या मुस्लिमांची अल्-अक्सा मशीद यांचा इतिहासही या निमित्ताने सायमनने बर्‍याच तपशीलाने मांडला आहे. 

परंतु राजकीय इतिहासाच्या तपशीलांमधे तो कसाबसा अंग चोरून उभा आहे असे भासते. त्यातही त्यांची उभारणी, विध्वंस आणि फेरउभारणी या चक्रातून जाणे हे एकुण नगरीच्या आणि श्रद्धास्थानांचे भागधेय दर्शवते. ही श्रद्धास्थाने, त्यांच्या अनुषंगाने उभी राहिलेली आर्थिक नि राजकीय ताकद यांची पुरेशी मांडणी झाली असली, तरी पर्यटन हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या या नगरीच्या अन्य उदीम व्यापाराबाबत वा तिथे राहणार्‍या लोकांच्या जीवनशैलीबद्दल फारसे लिहिले गेलेले दिसत नाही.

दुसर्‍या शतकातील जेरुसलेमबाबत लिहिताना सायमन म्हणतो 'ज्यू लोकांना ग्रीकांबद्दल आदर नि तिरस्कार दोन्ही होते. जितांची जेत्यांबद्दल किंवा शोषितांची शोषकांबद्दल असते तशी काहीशी भावना त्यांची होती. एकीकडे ग्रीक हे व्यभिचारी, चारित्र्यहीन आणि अनावश्यक आधुनिकतेकडे झुकलेले आहे असा आक्षेप असूनही जेरुसलेमवासीयांनी त्यांची दिमाखदार, चैनी जीवनशैली स्वीकारलेली होती'. असा एखादा अपवाद वगळता 'नगरीचे चरित्र' म्हणताना अपेक्षित असलेले सामान्य जेरुसलेमवासीयांचे जीवन बव्हंशी दुर्लक्षित राहिलेले दिसते.

धर्मसंस्था आणि श्रद्धा म्हटले की त्यांचे अपरिवर्तनीय, श्रेष्ठ आणि कालातीत असल्याचे गृहितक सर्वसाधारणपणे दिसते. धर्मश्रद्धेच्या जोडीला वंशश्रेष्ठतेचीही जोड अनेकदा दिली गेलेली दिसते. आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी वापरले गेलेले निरनिराळे मार्ग, त्यासाठी प्रसंगी विधिनिषेध न बाळगता अनैतिक मार्गांचा केलेला वापर, इतिहासातील तपशीलात आणि जमिनीवर उभ्या असलेल्या स्मारकांत फेरफार करून श्रेय लाटण्याचे केलेले प्रयत्न, वर्चस्वासाठी एकाच धर्माअंतर्गत पंथाच्या लोकांनी परस्परांवर केलेले अत्याचार, सर्वस्वी नवे निर्माण करण्याची खात्री नसेल तेव्हा जुन्या श्रेष्ठींचे आपणच वारस असल्याचे सिद्ध करण्यासाठी केलेल्या लटपटी चे असंख्य तपशील आणि आपल्या अनेक गृहितकांना सुरुंग लावणारे आधार सायमनने मांडले आहेत. एकुण धर्मसंस्थेच्या वाटचालीचा अभ्यास करणार्‍यांनाही यातून बरेच काही नवे सापडू शकेल.

पवित्र मानले जाणारे जेरुसलेम अक्षरशः अगणित मानवांचे थडगे आहे तसेच ते माणसाने माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचे, बंधुभावाच्या प्रवृत्तीचेही. शांततेच्या धर्माची प्रस्थापना करण्यासाठी हजारो लोकांचे गळे कापणार्‍या तलवारींचे उरुस इथे भरले. रक्तपिपासून, नृशंस लोकांचे खंजीर इथे तळपले, स्वार्थलोलुप धर्माधिकार्‍यांनी माया जमवली, कटकारस्थाने केली, स्वार्थासाठी सम्राटांचे लांगुलचालन केले आणि प्रसंग येताच त्यांना दगाही दिला. प्राकृतिक भूकंपानेही ही नगरी अनेकदा हादरली, उध्वस्त झाली. संपूर्ण मानवी इतिहासाचे दर्शन या एका भूमीच्या इतिहासात आपल्याला घडते आहे. इथे न घडलेल्या अशा सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाच्या घटना अन्य इतिहासात क्वचितच सापडतील इतका हा इतिहास शक्यतांच्या दृष्टीने परिपूर्ण म्हणावा लागेल.

---

सुमारे साडेसातशे पृष्ठे असलेल्या आणि अनेक टीपा असलेल्या या पुस्तकातून एखादा वेचा निवडणे हे शिवधनुष्य उचलण्याइतके अवघड असावे असा सुरुवातीला माझा होरा होता. पण सुदैवाने जेरुसलेमच्या इतिहासाचे लक्षणबिंदू (मार्कर) म्हणता येतील अशा बहुतेक गोष्टी एका जागी देणारा एक उतारा सापडला.

या एकाच उतार्‍यामध्ये काय नाही. वर्तमान सत्ताधार्‍यांच्या पतनासाठी भविष्यवाणीचा, नवजात बालकाचा वापर, धर्मस्थांनांचे आर्थिक नि सक्रीय राजकीय घडामोडींचे केंद्र असणे, त्यातून त्याने एकाच वेळी श्रद्धाळू नि लुटारू यांना आकर्षित करणे, आदर्श भविष्यकाळाची स्वप्नाळू मांडणी, त्यासाठी पारलौकिकाचा आधार घेणॆ, माणसाने माणसाचा ’पुरा तयाचा वंश खणावा’ इतक्या टोकाची केलेली लांडगेतोड... सारे काही यात येते.

जेरुसलेमच्या, तिच्या आसपासच्या भूमीच्या, त्या परिसरात वास्तव्य करणार्‍या विविध वंशांच्या, देव नि प्रेषितांच्या अनुयायांच्या, संघटित बिब्लिकल धर्मांच्या संदर्भातील हा इतिहास जगातील इतर कोणत्याही भूभागाशी निगडित इतिहासाचे प्रतिबिंबच दाखवतो असे माझे मत आहे. धर्मसत्ता ही राजकीय सत्तेच्या आश्रयाने राहते, प्रसंगी स्वत:च राजसत्तेला अंकित करु पाहते. या दोनही सत्ता एकत्रितपणे आर्थिक सत्तेस आपली बटीक बनवून ठेवतात. (आज भांडवलशाही जगात परिस्थिती उलट होऊ लागली आहे.)

कटकारस्थाने, भविष्यवाणी,  पारलौकिक देवांचा आशीर्वाद वा त्यांचा दृष्टान्त वगैरे तद्दन थापाच हत्यार म्हणून वापरुन सत्तेचा सोपान चढणे हा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. धर्म, अर्थ नि राज अशा तीन सत्तांच्या दडपशाहीपुढे ज्यांच्या हितासाठी त्या निर्माण झाल्या त्या सामान्यांचे भरडले जाणारे जिणे हा इतिहासाचा सर्वात कलंकित भाग आहे.

इतिहासातील सर्वात वैभवशाली इतिहास हा बव्हंशी गुलामगिरीच्या वा लुटालुटीच्या कलंकित विटांनी उभारलेला दिसतो. आणि तरीही भूतकालभोगी समाजांमध्ये कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेऐवजी ’महासत्ते’ची संकल्पना अधिक आकर्षक मानली जाते. जेरुसलेमचाच नव्हे तर जगातील बहुतेक भूभागांचा इतिहास हा फारसा प्रेरणादायी नसतो हे माझे मत अधिकाधिक दृढ होत जाते ते त्यामुळे.

या पुस्तकातील एक वेचा : जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या

- oOo -

(या लेखाचा ’---’ या चिन्हांपर्यंतचा भाग हा ’मीमराठीLive’ या वृत्तपत्राच्या २१ जून २०१५च्या अंकात पुस्तक-परिचय म्हणून प्रसिद्ध झाला होता.)


हे वाचले का?

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या

जेरुसलेम
जेरुसलेम: एक चरित्रकथा

इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते.

ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर हस्तिदंती कबुतर सापडलं आहे. बहुतकरून जेरुसलेममधल्या एखाद्या आलिशान घराच्या सजावटीसाठी त्याचा उपयोग करण्यात आला असावा. डेव्हिडच्या नगरीच्या खाली असलेल्या खडकांतल्या तलावाभोवती फिनिशियन मातीत घडवलेले राजेशाही शिक्के सापडले आहेत. त्या शिक्क्यांना 'बुलै' असं नाव होतं. त्या शिक्क्यांवर तत्कालीन जहाजांची चित्रं आहेत. त्याचप्रमाणे पंख असलेला सिंहासनारूढ सूर्य अशी पवित्र चिन्हंसुद्धा आहेत. त्या शिक्क्यांसोबत तिथे १०,००० माशांची हाडंसुद्धा सापडली आहेत. ही हाडं बहुधा समुद्रप्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी भूमध्य समुद्रावरून येताना आणली असावीत; पण काही काळात जेझबेलप्रमाणेच अथालियाही लोकांच्या तिरस्काराचा विषय झाली. तिच्या मूर्तिपूजक धर्मगुरूंनी मंदिरात बाल आणि इतर देवतांची प्रतिष्ठापना केली. सहा वर्षांचा काळ गेल्यावर याहवेहच्या मंदिरप्रमुखाने जेरुसलेममधल्या मातब्बर सरदारांना एका गुप्त बैठकीला बोलवलं आणि छोटा राजकुमार जेहोआश जिवंत असल्याचं त्यांच्यापुढे उघड केलं. मग त्या छोट्या राजकुमारासमोर त्यांनी निष्ठेच्या शपथा घेतल्या. मग मंदिरप्रमुखाने सर्व रक्षकांना मंदिरात अजूनही साठवून ठेवलेले राजा डेव्हिडचे भाले आणि ढाली दिल्या आणि त्या मुलाचा सार्वजनिकरित्या राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी सर्व लोकांनी 'राजा चिरायू होवो' अशा घोषणा दिल्या आणि तुताऱ्या वाजवून जल्लोष केला.

राणीने 'सैनिक आणि प्रजेने घातलेला हा गोंधळ' ऐकला आणि ती राजवाड्यातून तातडीने किल्ल्याच्या शेजारच्या मंदिरात आली. आता ते मंदिरही लोकांनी भरून गेल होतं. राणी ओरडली, 'दगा! दगा!'; पण सैनिकांनी तिला पकडलं आणि पवित्र पर्वतावरून फरफटत खाली नेऊन मंदिराच्या दाराबाहेर तिची हत्या केली. 'बाल' या देवतेची पूजा करणाऱ्या धर्मगुरूंना लोकांनी पकडून मारलं आणि त्या मूर्ती फोडून टाकल्या.

राजा जेहोआशने एकूण चाळीस वर्षं, म्हणजे इसवी सन पूर्व ८०१ सालापर्यंत राज्य केलं. त्यानंतर सिरियन राजाने जेरुसलेमवर हल्ला करून त्याला मंदिराच्या 'खजिन्यातलं सर्व सोनं' द्यायला भाग पाडलं; पण त्या राजाची हत्या झाली. त्यानंतर तीस वर्षांनी इस्राइलच्या एका राजाने जेरुसेलमवर हल्ला केला आणि मंदिर लुटलं. त्यानंतर मंदिराच्या वाढत्या संपत्तीमुळे ते आक्रमकांसाठी एक प्रकारचं आमीषच झालं.

तरीदेखील जेरुसेलमचं दुर्गम वैभव असिरियाच्या वैभवाशी स्पर्धा करू शकत नव्हतं. असिरियाचं साम्राज्य नव्या राजाच्या आधिपत्याखाली स्फूर्तीने भरू लागलं होतं आणि इतर राज्यांना गिळण्यासाठी नरभक्षक श्वापदाप्रमाणे सज्ज झालं होतं. असिरियन लोकांचा प्रतिकार करण्यासाठी इस्राइल आणि अराम-दमास्कसच्या राजांनी युती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ज्यूडाचा राजा आहाझ याने असिरियाविरुद्धच्या युतीत सामील व्हायला नकार दिला तेव्हा इस्राइली आणि सिरियन लोकांनी जेरुसलेमलाच वेढा 'दिला, पण त्यांना नव्याने बांधलेल्या तटरक्षक भिंती तोडता आल्या नाहीत. उलट राजा आहाझने मंदिरातला खजिना आणि मदतीच्या याचनेचं पत्र असिरियाचा राजा तिसरा तिग्लाथ्पिलेसर याला पाठवून दिलं. इसवी सन पूर्व ७३२ साली असिरियन लोकांनी सिरियाचं राज्य स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं आणि इस्राइलचा विध्वंस केला. जेरुसलेममध्ये बसलेला राजा आहाझ मात्र असिरियाला शरण जायचं की लढायच, याची चिंता करत राहिला.

आयझेया: जेरुसलेम, सौंदर्यवती आणि वेश्या

आयझेयाने राजाला सबुरीचा सल्ला दिला: याहवेह जेरुसलेमचं रक्षण करेल. आयझेया हा एक राजकुमार, धर्मगुरू आणि राजकीय सल्लागार होता. राजाला इमॅन्युएल (अर्थ - आपल्यात निवास करणारा ईश्वर) नावाचा एक पुत्र होणार असल्याचं आयझेयाने सांगितलं 'आपल्यामध्ये एक असं मूल जन्म घेईल' जे 'सर्वशक्तिमान ईश्वर, शाश्वत पिता, शांतीचा राजकुमार' असेल, जे 'चिरकाल शांतिपर्व' घेऊन येईल.

'बुक ऑफ आयझेया’ लिहिणारे कमीतकमी दोन लेखक आहेत. त्यातल्या एकाने दुसऱ्यानंतर २०० वर्षांनी त्या ग्रंथात भर टाकली. पहिला आयझेया हा केवळ प्रेषित नव्हता, तर तो दूरदर्शी कवीसुद्धा होता. असिरियन लोकांनी सारंकाही गिळंकृत करण्याचा आक्रमणवादी सपाटा लावला होता, पण त्या दिवसांतही मंदिराच्या विनाशानंतरच्या एका गूढ जेरुसलेममधलं जीवन कसं असेल, याची कल्पना करणारा तो पहिलाच माणूस होता. त्याने लिहून ठेवलंय, 'मला एका उंच सिंहासनावर बसलेला देव दिसला आणि त्याच्या प्रभेने सारं मंदिर भरून गेलेलं होतं... आणि सभागृहात सगळीकडे धूर पसरला होता.'

आयझेयाला 'पवित्र पर्वत' अत्यंत प्रिय होता. त्याच्या नजरेत ती एक लावण्यवती स्त्री होती, 'झायनच्या कन्येची टेकडी, जेरुसलेमची टेकड़ी', कधी सदाचारी, तर कधी वेश्या, सात्विकता आणि संस्कृती नसेल, तर नुसत्या जेरुसलेमवर मालकी असून काहीच अर्थ नाही. सारं काही नष्ट झालं आणि 'जेरुसलेमचा विध्वंस झाला', तरी एक नवं आध्यात्मिक जेरुसलेम अस्तित्वात असेलच. ते जेरुसलेम ’प्रत्येक मानवी निवाऱ्याच्या ठिकाणी वास करेल.' तो शिकवतो: प्रेम आणि दयाभाव; 'सत्कर्म करायला शिका; न्याय करा; पीडितांची पीडा दूर करा; अनाथांचा पुरस्कार करा; विधवांना न्याय मिळवून द्या.' आयझेयाला एक असामान्य साक्षात्कार झाला : 'उंच पर्वतांवर देवाचं वसतिस्थान प्रस्थापित होईल... आणि राष्ट्रांची त्याकडे ओढ असेल.' या दुर्गम आणि कदाचित पूर्णपणे पाडाव झालेल्या नगरीतले कायदे, तिथली जीवनमूल्यं आणि कहाण्या पुन्हा नव्याने जन्म घेतील. 'मग अनेक लोक पुढे येऊन म्हणतील, 'चला रे, आपण देवाच्या पर्वताकडे जाऊ. जेकबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ; आणि तो आपल्याला त्याचा मार्ग दाखवेल...' झायनमधून सगळीकडे देवाचा कायदा प्रस्थापित होईल आणि जेरुसलेममधून देवाची शिकवण सर्वत्र पसरेल. आणि मग तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल.' आयझेयाने एका गूढ कयामतच्या दिवसाचं भविष्य वर्तवलं. जेव्हा एक विधिवत् राजा- एक मसीहा अवतरेल : 'तेव्हा योद्धे त्यांच्या तलवारीचं रूपांतर नांगराच्या फाळात करतील आणि भाल्यांचं रूपांतर तण काढण्याच्या कोयत्यात करतील... त्यानंतर ते कधीही युद्ध करणार नाहीत. त्या दिवशी मृत लोक पुनर्जीवित होतील, 'लांडगे आणि कोकरं एकत्र नांदतील आणि बिबळ्या बकरीच्या पिलासोबत विश्रांती घेईल.'

या तेजस्वी कवितेत कयामतच्या दिवसाच्या ओढीबद्दल प्रथमच लिहिलं गेलं आहे. अगदी आजपर्यंत जेरुसलेमच्या इतिहासात ही ओढ जाणवते. आयझेयाने केवळ ज्यू धर्मालाच नव्हे, तर ख्रिश्चन धर्मालाही आकार दिला. येशू ख्रिस्ताने आयझेयाचा अभ्यास केला होता आणि येशूची शिकवण- मंदिराचा विध्वंस आणि जेरुसलेमची शाश्वत आध्यात्मिक संकल्पना ते तळागाळातल्यांचा कैवार - याच काव्यात्म दृष्टीतून आली आहे. स्वतः येशूकडे आवझेयाने भाकीत केलेला इमॅन्युएल म्हणून पाहिलं गेलं.

राजा आहाझ दमास्कसला गेला आणि त्याने तिग्लाथ्पिलेसरला लवून कुर्निसात केला. परतताना त्याच्यापाशी मंदिरात ठेवण्यासाठी असिरियन पद्धतीचा देव्हारा होता. ज्या वेळी तिग्लाथ्पिलेसर हा राजा इसवी सन पूर्व ७२७ साली मरण पावला त्या वेळी इस्राइल राज्याने उठाव केला, पण असिरियाचा नवा राजा दुसरा सार्गोन याने इस्राइलची राजधानी समारियाला तीन वर्ष वेढा घातला आणि सारं इस्राइलच गिळंकृत केलं. तिथल्या २७,००० लोकांना त्याने असिरियात पाठवून दिलं. या सगळ्या धुमश्चक्रीत इस्राइल या उत्तरेच्या राज्यातल्या बारापैकी एकूण दहा टोळ्या इतिहासातून जवळजवळ नामशेषच झाल्या.

सध्याचे ज्यू लोक उरलेल्या दोन जमातींचे वंशज आहेत. ते ज्यूडाच्या राज्याचे नागरिक या नात्याने जगले. आयझेयाने इमॅन्युएल म्हणून संबोधलेलं मूल म्हणजे राजा हेझेकिया होता. तो प्रेषित नव्हता, तरीही त्याच्याकडे राजकारणासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी सगळ्यात मौल्यवान गुण होता- नशीब! त्याने उभारलेल्या जेरुसलेमचे थोडे थोडे पुरावे अजूनही मिळतात.

असिरियाविरुद्ध बंड करण्यासाठी राजा हेझेकियाने वीस वर्षं वाट पाहिली. प्रथम त्याने मंदिरातल्या मूर्त्या नष्ट केल्या, मंदिरातली कास्य धातूची सर्पमूर्ती तोडली, आणि प्रजेला पासोवर सण साजरा करण्याची आज्ञा दिली. त्याच्या लोकांनी साजरी केलेली पासोवर सणाची ती सुरुवातीच्या काळातली आवृत्ती होती. तेव्हा जेरुसलेम प्रथमच पश्चिमेकडच्या डोंगरावर पसरू लागलं होतं. उत्तरेकडच्या इस्राइल राज्याचा नि:पात झाल्याने जेरुसेलम शहर निर्वासितांनी भरून गेलं. बहुधा त्या निर्वासितांनी त्यांची प्राचीन पोथ्यापुस्तकं सोबत आणली असावीत. त्यात इस्राइलचा पुरातन इतिहास आणि आख्यायिका समाविष्ट असाव्यात. त्याच काळात जेरुसलेममधल्या विद्वानांनी ज्यूडाच्या परंपरा, चालीरीती आणि उत्तरेकडच्या जमातींच्या इस्राइली परंपरा आणि चालीरितींचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच सुमारास ग्रीक लोक होमरचं 'इलियड' हे महाकाव्य लिहून ठेवत होते. याच पोथ्यापुस्तकांमधून पुढे बायबलची निर्मिती झाली.

- oOo -

पुस्तक: जेरुसलेम: एक चरित्रकथा
लेखक: सायमन सीबग माँटफिअरी
अनुवाद: सविता दामले
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
आवृत्ती पहिली.
वर्ष: २०१४.
पृ. ७७-८१.

टीपा:
१. इराण आणि इराकमध्ये राहणारे पुरातन ज्यू लोक त्या दहा जमातींचे वंशज असल्याचा दावा करतात त्या जमातींना अगोदर असिरियन लोकांनी आणि नंतर बॅबिलॉनी लोकांनीसुद्धा त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित केलं. अलीकडेच झालेल्या जनुकीय संशोधनानुसार हे ज्यू लोक खरोखरच इतर ज्यू जमातीपासून २,५०० वर्षांपूर्वी विलग झाले असल्याचं सिद्ध झालं आहे. तरीसुद्धा गायब झालेल्या या इस्राइली जमातींना शोधण्याच्या अनावर ओढीने हजारो काल्पनिक कथांना आणि सिद्धान्ताना जन्म दिलेला आहे. या दहा जमाती अगदी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीसुद्धा 'सापडल्या' आहेत त्यामुळे त्यांत उत्तर अमेरिकेतले मूळचे आदिवासी आणि इंग्रज यांचासुद्धा समावेश झाला आहे.

२. डेव्हिडच्या शहराची तटबंदी आणि मंदिराची टेकडी यांच्या बाहेरच्या परिसरात नवीन उपनगर विस्तारली होती. मोरिया पर्वत आणि पश्चिमेची टेकडी यांच्या मध्ये असलेल्या टायरोपाएन दरीत माख्तेश हे उपनगर बसलं होतं, तर मित्रेश हे उपनगर पश्चिम टेकडीवरच वसलं होतं. आज तिथे ज्यू वस्ती आहे. त्या वेळी शहराच्या भोवताली थडगी बांधून त्यात मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं मरणोत्तर दफन करत असत: 'या थडग्यांत राजाच्या (...) याहू नावाच्या राजदरबारातल्या साहाय्यकाला पुरण्यात आलं आहे.’ सिल्वान गावातल्या एका थडग्यावर असं लिहिलं आहे 'इथे सोनं , चांदी वगैरे काही नाही. फक्त त्याची आणि त्याच्या गुलाम पत्नीची हाडं आहेत जो कुणी हे थडगं उघडेल त्याला शाप लागेल.' पण त्या शापाचा काहीही परिणाम झाला नाही, ते थडगं लुटण्यात आलं. तिथे आजच्या घडीला कोंबड्याचं एक खुराडं आहे, पण प्रत्यक्षात हा राजसेवक हेझेकियाच्या दरबारातला असावा त्याने स्वतः साठी खूपच भव्य कबर बांधून ठेवली होती, म्हणून आयझेयाने त्याच्यावर टीका केली होती. त्या माणसाचं नाव बहुधा शेब्नायाहू असावं.


हे वाचले का?

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट

काही वर्षांपूर्वी 'चाहूल' नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो.

अलिकडेच 'रेगे' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर तो एकच शत्रू, शासक आणि भक्षक असतो, पण या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला तो बाहुबली, त्याचे स्पर्धक आणि त्या दोघांचे सामायिक, मुख्य शत्रू - आणि त्या चित्रपटापुरते बोलायचे तर त्यांच्याच पातळीवरची - पोलिस यंत्रणा असे अनेक शत्रू निर्माण होतात. इच्छा असो अगर नसो, त्यांना सामोरे जावे लागते.

तीन चार वर्षांपूर्वी आपल्याकडे मोठ्या मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा व्यापक आर्थिक, व्यावसायिक आणि (अन्यही) परिणाम घडवणारा निर्णय शासनाने घेतला होता. त्यातून काळा पैसा बाहेर येईल अशी ग्वाही सरकार आणि सरकार समर्थक देत होते. यात काळा पैसा हा रोकड स्वरूपात साठवून ठेवला जातो असा ठाम समज दिसत होता...

हे तीन परिच्छेद वाचल्यावर ’अरे बाबा, पण या तीनही गोष्टींचा परस्परांशी संबंध काय?’ असा प्रश्न बहुतेकांच्या मनात नक्की उमटला असणार. पण थांबा, या तिघांसोबत आणखी एक चौथा लिहितो आणि मग मुद्द्यावर येतो.

अलीकडेच ’ब्रेकिंग बॅड’ नावाच्या एका मालिकेबाबत बराच बोलबाला झाला आहे. एक तथाकथित पांढरपेशी व्यक्ती, एका दुर्धर आजाराने ग्रासलेली; ’केवळ कुटुंबियांच्या भावी आयुष्याची तरतूद करण्यासाठी’ आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा गैरवापर करुन अंमली पदार्थांचे उत्पादन, व्यवसाय करते. त्यासाठी त्याच्या सामाजिक स्तरात कल्पनाही केली जाणार नाही अशा पातळीवरचे गुन्हे करत जाते. 

’केवळ कुटुंबासाठी’ म्हटल्यावर मला हटकून माझ्या आसपासचे अनेक बाप आठवतात. त्यांना पैसे मिळवण्याचा कैफ असतो. यशाची धुंदी हवी असते. विविध प्रकारच्या - समाजात मिरवता येतील अशा - जड वस्तूंचा संग्रह करण्याची लालसा असते. त्यासाठी ते कुटुंबियांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. पण हे सारे करताना, ’हे सगळं कुणासाठी करतो आहे, तुमच्यासाठीच ना?’ असे विचारण्याचा शहाजोगपणाही त्यांच्याकडे असतो.

’ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर मला असाच स्वार्थाला परमार्थाचे रूप देणारा वाटला. गुन्हेगारी मानसिकता, निर्ढावलेपण ही त्याच्यात मुळातच आहे. जगण्याच्या शर्यतीत मागे पडल्याने या ना त्या मार्गाने स्वत:ला सिद्ध करण्याची, यशाने नाही निदान पैशाने तरी सध्या पुढे गेलेल्यांना मागे टाकता येईल या ईर्षेनेच तो सारी नैतिकता गुंडाळून त्यात उतरलेला आहे.

पांढरपेशा समाजात असलेले muscle power (बाहुबल), money power (द्रव्यबळ) आणि अर्थातच political power (राजकीय बळ) या तीन सत्तांबाबत असलेले सुप्त आकर्षण हा एक रोचक मुद्दा आहे. एकाच वेळी ते आकर्षण आणि त्याच वेळी उघडपणे त्यांचा केलेला धिक्कार किंवा त्यांतील ढासळत्या मूल्यांबद्दल केलेला गजर, पण स्वहिताचा मुद्दा येताच अघोषितपणे, वैयक्तिक पातळीवर तडजोड करत त्यांना शरण जाणे- किंवा त्या व्यवस्थेचा भाग होत जाणे हे एकुण पांढरपेशा समाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यांना एकाच वेळी नैतिकतेचा झेंडा मिरवायचा असतो आणि त्याचवेळी त्या नैतिकतेला धाब्यावर बसून मिळणारे फायदेही पदरी पाडून घ्यायचे असतात. त्यातून एक दांभिक रसायन तयार होते आणि ते त्या समाजाचा चेहरा होऊन राहते.

अलीकडे नेटफ्लिक्स’वर ओझार्क नावाची एक मालिका पाहण्यात आली आणि हे सारे आठवत गेले.

Scratch, wampum, dough, sugar, clams, loot, bills, bones, bread, bucks... money! That which separate the 'haves' from 'have nots'.

But what is money? It's everything if you don't have it, right? Half of all American adults have more credit card debt that savings. 25% have no savings at all. And only 15% of the population is on track to fund even one year of retirement. Suggesting what? That middle-class is evaporating? Or the American dream is dead? You won't be sitting there, listening to me, if the latter were true.

You see, I think most people just have a fundamentally flawed view of money! Is it simply agreed upon unit of exchange for goods and services? $3.70 per gallon of milk? Thirty bucks to cut your grass? Or is it an intangible? Security or happiness... peace of mind? Let me propose a third option. Money as a measuring device!

You see, the hard reality is how much money we accumulate in life is not a function of who's the president, or the economy, or bubbles bursting. Or bad breaks or losses. It's about the American work ethic. That one that made us the greatest country on the Earth. It's about bucking the media's opinion as to what constitutes a good parent. Deciding to miss the ball game, the play, the concert, because you have resolved to work and invest in your family's future. And taking responsibility for the consequences of those actions. Patience! Frugality! Sacrifice! When you boil it down, what do these things have in common? Those are choices!

Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!

वर जोडलेला व्हिडिओ ’ओझार्क’च्या पहिल्याच भागाची सुरुवात आहे. पैसा म्हणजे काय याचे सुरेख विवेचन त्यात केले आहे. But what is money? It's everything if you don't have it, right? हे बहुसंख्येच्या मनात पुरेपूर ठसलेले असते. आणि म्हणून जिवंत असेतो, मिळेल तितका, साधेल त्या मार्गाने पैसा मिळवत राहणे हे बहुतेकांचे साध्य होऊन बसते. पण या विवेचनाच्या अखेरीस येणारे वाक्य- "Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!" हेच माझ्या मते पैसा या संकल्पनेचे वास्तविक मूल्य आहे. 

पण आपल्याला त्याचे आकलन होत नसते. झाले तरी त्याला नजरेआड करण्याकडेच बहुसंख्येचा कल असतो. आपण केलेली निवड, घेतलेले निर्णय यांचे दृश्य फलित म्हणजे मिळवलेला पैसा. पण तो निव्वळ पदरी पडला म्हणजे केलेली निवड, घेतलेले निर्णय योग्य वा वाजवी ठरले असे असते का? त्या निर्णयांची फलश्रुती अशी एकरंगी असते का? या प्रश्नांच्या उत्तरांना सामोरे जाणे आवश्यक असते. अनेकदा अप्रिय उत्तरे समोर ठेवणार्‍या या प्रश्नांकडे कानाडोळा करणे बहुसंख्य लोक पसंत करतात. पण कोंबडं झाकल्याने उजाडायचे राहात नाही तसे तुमच्या निर्णयातून निर्माण झालेली परिस्थिती, झालेले आनुषंगिक परिणाम वास्तवाचा भाग होत जात असतात. त्यापासून पळ काढणे बहुतेकांना शक्य होत नसते.

Ozark

तसे पाहिले तर 'ओझार्क' ही एक गुन्हेगार कथा आहे. गुन्हेगारी जगाची कथा म्हणजे सूडाचा प्रवास अथवा ’थेट कृती’चा वापर करुन लढवलेली स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याला हिंसेचा वापर करुन नामोहरम करण्याचे, आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या गोष्टी असतात असा- हिंदी चित्रपट पाहून झालेला, समज असतो. जोडीला रोमान्स, फितुरी असली की मामला अधिक सेलेबल होतो. 

समीक्षकांकडूनही थोड्या दखलीची अपेक्षा असेल तर कुठलेतरी शेक्स्पिअरचे नाटक पकडून त्याचे कथानक अंडरवर्ल्डमध्ये बसवून दिले की सगळेच समाधानी होतात. सदैव अतिसामान्य, विचारशून्य प्रेक्षक समोर ठेवून भांडवली मानसिकतेने चित्रपट आणि मालिकांचे रतीब आपल्याकडे घातलेले दिसतात. लिखित साहित्याचेही फार वेगळे नाही, त्यांची चलनी नाणी थोडी वेगळी आहेत इतकेच.

पण गुन्हेगारी जगाची कथा ही बौद्धिक डावपेचाची, अर्थकारणाची, व्यापार-उदिमाचे जग कवेत घेणारी असू शकते हे फारसे अपेक्षित नाही. त्यात राजकारण आले तरी केवळ भ्रष्ट राजकारण्यांच्या रूपात येते. धोरणात्मक डावपेच, त्यांचे कथानकात स्थान वगैरे तर विसराच. 

’ओझार्क’ने एखाद्या पारंपरिक गुन्हेगार कथेच्या धाटणीपेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. पहिले म्हणजे ते गुन्हेगारीचे जग एका कुटुंबाला - ब्रेकिंग बॅड’ प्रमाणे केवळ कुटुंबप्रमुखाला नव्हे! - केंद्रस्थानी ठेवून पाहिले आहे. दुसरे, दैववादी दृष्टीकोन नाकारुन जगातील प्रत्येक घटिते, बदल हे आपल्या निर्णयांचे, पर्याय-निवडीचे फलित असते या मुद्द्यावर त्यात भर आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्णय एकेकट्याचे असतात, तसेच काही जणांनी मिळून घेतलेले असतात. या सार्‍या निर्णयांचा परस्परांना छेद जातो, त्यांचे संमीलन होते, तेव्हा त्यातून घटिताची दिशा निश्चित होते. कथानकाच्या सुरुवातीला निवेदनरूपात आलेला, वर समाविष्ट केलेला ’पूर्वरंग’ पुढे पदोपदी प्रत्यय यावा इतका बिनचूक बसवला आहे. यात चलन, पैसा म्हणजे पर्याय-निवडीचे मोजमाप असते अशी व्याख्या केलेली आहे.

मार्टिन ऊर्फ ’मार्टी’ बऽर्ड हा आपल्या मित्रासोबत एक गुंतवणूक सल्लागार कंपनी चालवतो आहे. गुंतवणुकीचे विविध मार्ग, त्यातले चढ उतार, डावपेच, तो जाणून आहे. एका टप्प्यावर त्याच्या पार्टनरकडून नव्या गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो. संभाव्य गुंतवणुकीचा आकडा पाहून मित्र हुरळून जातो. पण मार्टी मात्र त्यांच्या सार्‍या बॅलन्सशीट आणि गुंतवणुकीची पुरी माहिती घेतल्याखेरीज त्यांचे अकाउंट स्वीकारण्यास तयार नाही. त्याचा अभ्यास केल्यावर या गुंतवणूकदाराचा दाखवायचा व्यवसाय आणि प्रत्यक्श व्यवसायात फरक आहे आणि त्यांचे आर्थिक नियोजन ढिसाळ तसंच अनेक ठिकाणी संशयास्पद आहे असे त्याला दिसते. त्यावरुन हा प्रचंड गुंतवणुकीचा प्रस्ताव तो नाकारतो. मित्र अवाक् होतो.

पण मार्टीचा निर्णय अचूक असतो. हा प्रस्ताव घेऊन येणारा एका प्रसिद्ध ड्रग कार्टेलचा प्रतिनिधी आहे. मार्टीच्या ज्ञानाने आणि चिकाटीने तो प्रभावित झाला आहे. तो त्याचा पिच्छा सोडत नाही. यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाचे आमिष समोर ठेवून तो विविध प्रकारे त्याला पटवू पाहतो. अखेर मार्टीही हुरळतो. तो प्रस्ताव त्याच्या पत्नीसमोर ठेवतानाही तो ’आपण तो अर्थातच नाकारला’ इथपासून सुरुवात करत, ’पण काय हरकत आहे.’ पर्यंत पोचतो. पत्नीही प्रथम दचकली तरी हळूहळू तिचेही मत अनुकूल होत जाते. 

’शेवटी आपण काय फक्त त्यांचे पैसेच तर हाताळणार आहोत. त्यांच्या गुन्हेगारी विश्वाशी आपले काय देणेघेणे असणार नाही.’, ’एकदम इतके पैसे येतील की आयुष्याची ददात मिटेल.’, ’थोडे वर्षे केले तरी आपल्या गरजा भागवून उरतील इतके पैसे मिळतील.’ अशी ’चार वर्षे अमेरिकेत पैसे मिळवून भारतात परतू’, ’पुढील सात पिढ्या बसून खातील.’ वगैरे प्रचलित तर्कांच्या धर्तीचे तर्क देत दोघेही अखेर त्या चिखलात पहिले पाऊल टाकण्यास तयार होतात. व्यापक, जड, वास्तविक फायद्यासाठी नैतिकतेची पहिली पायरी उतरण्याचा पर्याय ते निवडतात... ’चाहूल’ मधल्या जोडप्याप्रमाणॆ.

Marty

मार्टीचे काम आहे ते ड्रम कार्टेलचा पैसा अधिकृत करण्याचे, ज्याला ’क्लीन करणे’ असे म्हटले जाते. हा रोकड स्वरूपात येणारा काळा पैसा विविध कायदेशीर व्यवसायांमधील गुंतवणुकींच्या माध्यमातून कायदेशीर करणे ही मार्टीची जबाबदारी आहे. ते जाळे त्याने विणले की अंमली पदार्थांच्या विक्रीतून कार्टेलने मिळवलेला पैसा निश्चिंतपणॆ, उघडपणे वापरु शकते. 

'काळा पैसा हा रोकड रूपात कुठेतरी साठवून ठेवलेला असतो' अशा भाबड्या समजात जगणार्‍यांनी या कारणासाठी ओझार्क अवश्य पाहावी. बेकायदेशीर, गुन्हेगारी व्यवसायाचा आधारवड हा असा त्यांच्या पैशाचे ’शुद्धिकरण’ करणारा पांढरपेशा वर्गच असतो, हे 'केवळ दांडगी शारीर-प्रकृती असलेला, दाढी वाढवलेला किंवा हातात कडे घातलेला कुणीही गुंड असतो, समाजविघातक असतो' असे समजणार्‍या भेकड सुखवस्तूंना समजू शकेल. 

त्याअर्थी मार्टी आणि मार्टीसारखे लोक हे समाजाच्या दृष्टीने प्रत्यक्ष गुन्हेगारांपेक्षा मोठे गुन्हेगार मानायला हवेत. कारण ते त्या गुन्हेगारी यंत्रणेला एका व्यवस्थेत रूपांतरित करतात, स्थैर्य देतात. गुन्हेगारांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येईल याची सोय करून देतात. आणि ही व्यवस्था उभी करताना ते पर्यटन स्थळांची सारी अर्थव्यवस्था - ज्यात कसिनो, बार, स्ट्रिप क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ वितरण यांच्यासह तथाकथित सभ्य माणसांच्या जगातील धर्मस्थळे, त्याच्याशी निगडित पुरवठा, निवास आदि व्यवस्था (ज्यातून धर्मस्थळ हे खरे तर पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित केले जाते), तसंच खेळ, चित्रपटादी करमणुकीचे क्षेत्र यांनाही जाळ्यात आणून सोडतात. ही संघटित गुन्हेगारी अखेर सर्वसामान्यांच्या जगण्याची अप्रत्यक्ष नियंत्रक व्यवस्था होऊन बसते...

...आणि हे घडवून आणणार्‍या मार्टीकडे मात्र आपण कुटुंबवत्सल माणूस म्हणून पाहतो. कळत-नकळत त्याच्यासमोर आलेल्या अडचणींनी, त्याच्यावर येणार्‍या संकटांनी अस्वस्थ होतो, त्यांचे निवारण झाले की सुटकेचा निश्वास सोडतो. त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे पॅस्टर मेसन सारख्या सहृदयी व्यक्तीच्या आयुष्याची होणारी धूळदाण नजरेआड करतो, केवळ अपरिहार्य घटित (collateral damage) म्हणून सोडून देतो... आपल्यातही एक मार्टी दडून असल्याचेच ते लक्षण असते.

आजवर आपण पाहिलेल्या बव्हंशी गुन्हेगारी कथांमध्ये आणि ’ओझार्क’मध्ये एक फरक आहे. यातील कथानक हे एका कुटुंबाच्या प्रवासाची कहाणी म्हणून, त्याला केंद्र मानून मांडलेले असल्याने प्रेक्षक त्या कुटुंबाच्या नजरेनेच ते पाहतो आहे. त्यांच्या सुखदु:खाच्या संदर्भातच इतर सर्व गोष्टींचे, घटनांचे मूल्यमापन करतो आहे. 

मार्टीने पैसे जिरवण्यासाठी निवडलेल्या ओझार्कचा इतिहासही रोचक आहे. १९२८ च्या जागतिक मंदीच्या काळात युनिअन इलेक्ट्रिक कंपनीने बांधलेल्या धरणामुळे ओझार्कमधील ते विशाल तळे तयार झाले आहे. मालिकेत असा उल्लेख आहे की रोजगार निर्मितीसाठी (आपल्याकडील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर) बांधले गेले. थोडक्यात पैसा निर्माण करण्यासाठीच त्याची निर्मिती झाली. मार्टी आपल्या धन्याचा पैसा मुरवायला याच तळ्याभोवतीच्या अर्थव्यवस्थेचा वापर करतो आहे, ही संगती उल्लेखनीय आहे. 

त्याचबरोबर पर्यटन स्थळी अंमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे (racket) असणे ओघाने आलेच. त्यामुळे ज्या ड्रग माफियांचा पैसा तिथे जिरतो आहे, त्यांचे स्थानिक स्पर्धकही तिथे आहेत. एका बाजूचा पैसा जिरवण्याचे उपाय शोधता शोधात मार्टी एक एक करुन इतर बेकायदेशीर, धोकादायक, अति-महत्त्वाकांक्षी आणि बेमुर्वत अशा व्यावसायिकांच्या जाळ्यातही गुरफटत जातो आहे. एक प्रश्न सोडवण्यासाठी शोधलेला उपाय त्याच्यासाठी नवी समस्या घेऊन येतो आहे. सुरुवातीच्या काळात, त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयापाठी एक मृत्यू घडतो आहे. त्याला मार्टी थेट जबाबदार नसला तरी त्यांच्या तपासाचा माग पुन्हा पुन्हा त्याच्यापाशी येऊन भिडतो आहे. गुन्हेगारीचे जाळे त्याच्याभोवती एक एक फास टाकत त्याला जखडू लागते आहे.

अंमली पदार्थाचा व्यापार म्हणजे अर्थातच गुन्हेगारी, हिंसा, हत्या हे ओघाने आलेच. पण वर म्हटले तसे हिंसा अथवा हत्या एकरंगी असते असे मात्र नाही. केवळ वर्चस्वाची लढाई म्हणून वा शत्रूचा काटा काढण्यासाठीच हत्या होतात असे मुळीच नाही. हत्यांमध्ये क्षणिक क्षोभातून होणारी हत्या (डार्लिन’ने केलेली ’डेल’ची हत्या), आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अपरिचिताची केलेली हत्या (’बडी’ने केलेली हत्या), कुणाचा परिचिताचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपल्या स्वार्थाआड येऊ नये म्हणून जवळच्या व्यक्तीची केलेली हत्या (रूथने रस आणि बॉयडची केलेली हत्या) फसवणुकीचे प्रायश्चित्त म्हणून केलेली हत्या (ब्रूसची डेलने केलेली हत्या), एखाद्या निरपराध्याची केवळ तिसर्‍याच व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी केलेली हत्या (ब्रूसच्या गर्लफ्रेंडची डेल ने केलेली हत्या), त्याच प्रकारे हत्येचा मागमूस न ठेवता केलेली निरपराध व्यक्तीची हत्या (मेसनच्या पत्नीची स्नेल पती-पत्नींकरवी केली गेलेली अध्याहृत हत्या), आपल्याला हवी ती माहिती अनधिकाराने मागणी केल्याने न देणार्‍या सामान्य व्यक्तीची सहज केलेली हत्या (अ‍ॅटर्नीने डेलच्या खुनाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसाठी केलेली हत्या), आपल्या स्वार्थाला धक्का देणारे कृत्य - दुसर्‍या दबावाने, नाईलाजाने - केल्याबद्दल साथीदाराला दिलेले शासन (स्नेल कुटुंबाने स्ट्रिप-क्लब मालकाची केलेली हत्या) आणि परिस्थितीवश, अपघाताने घडलेली हत्या (मेसनचा मृत्यू) असे विविध हेतू दिसून येतात. हत्या हा सर्वात सोपा निवाडा आहे अशीच त्या जगाची शाळा शिकवते आहे. 'आपण फक्त पैशाचे व्यवहार करणार' म्हणणारा मार्टीच नव्हे तर त्याचे पुरे कुटुंबच त्या यंत्रणेच्या जाळ्यात रुतत जाते, त्यातले काही धागे स्वत:ही विणत जाते. एका टप्प्यावर अनाहुतपणे त्याच्याही हातून हत्या होते, तेव्हाच त्याच्या चेहर्‍यावर पस्ताव्याची पहिली खूण दिसते.

हत्यांच्या विविध जातकुळींप्रमाणॆ विविध जातकुळींचे गुन्हेगार आपल्याला भेटत राहतात. अध्याहृत, समोर न येणारा ड्रग लॉर्ड, त्याच्या व्यवहाराचा चेहरा असलेला डेल, गुन्हेगारीची ओल अंगाला लावून बाहेर आलेला बडी, व्यवसायवृद्धीऐवजी केवळ दहशतीवर खंडणीखोराच्या पातळीवर जगणारा कॉसग्रोव्ह हा त्याचा जुना मित्र, स्थानिक पातळीवर हेरॉईनचे उत्पादन आणि वितरण करणारे स्नेल दांपत्य, ड्रग लॉर्ड्च्या सार्‍या साम्राज्याला कायद्याच्या कचाट्यापासून दूर ठेवणारी त्याची अ‍ॅटर्नी (ही स्त्री आहे हा एक विशेष नोंदवून ठेवण्याजोगा मुद्दा), आणि त्याच्या पैशाला कायदेशीर चलनाच्या स्वरुपात मुरवणारा मार्टी. हे शेवटचे दोघे अस्सल अट्टल पांढरपेशे गुन्हेगार. यांच्याबरोबरच स्थानिक पातळीवर फुटकळ गुन्ह्यांबद्दल कुप्रसिद्ध असलेले लॅंगमोर कुटुंबिय. त्यात तुरुंगात असलेला केड आणि बापाच्या अनुपस्थितीत दोन काका आणि दोन पुतणे यांच्या कुटुंबाची विशीच्या आतच पोशिंदी होऊन बसलेली रूथ हे ही आहेत.

RuthLangmore

मार्टी हा पांढरपेशा जगातला, वैयक्तिक फायद्यासाठी त्याने गुन्हेगारी जगाची साथ धरली आहे. रूथचे नेमके उलट आहे. बौद्धिक बाजूचा पूर्ण अभाव असलेल्या कुटुंबात, गुन्हेगारी जगातच लहानाची मोठी झालेली रूथ मार्टीचे बोट धरून त्यातून बाहेर पडण्याची, पांढरपेशा जगात पाऊल टाकण्याची उमेद बाळगून आहे. 

या मुलीचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे. एका बाजूने ती केड लँगमोर या किरकोळ पण अस्सल दक्षिणी माज असलेल्या आपल्या बापाची मुलगी असल्याने अनेक लहान-मोठे गुन्हे तिच्यावर नोंदवले गेले आहेत. त्या परिसरात तिची ओळख गुन्हेगार म्हणूनच आहे. मार्टी प्रथम नाईलाजाने आणि नंतर तिच्या कामाच्या झपाट्याने तिच्यावर विसंबू लागतो, तेव्हा रूथही थोडी त्याच्यात गुंतत जाते. त्याच्यात आपल्या बापाला पाहू लागते. 

तिचे बापाबद्दलचे नातेही काहीसे व्यामिश्र आहे. कदाचित लहानपणी ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ म्हणणार्‍या बालकाची ती वय वाढलेली आवृत्ती आहे. ती बेगुमान जगणार्‍या बापाकडे एक रोल मॉडेल म्हणून नकळत पाहते आहे. त्याला तुरुंगात भेटायला जाताना आवर्जून मेकप करुन जाणार्‍या रूथच्या त्या आकर्षणात हलकासा जांभळा रंगही मिसळला आहे. 

फुटकळ गुन्हेगारी करणार्‍या बापाहून अधिक बुद्धिमान, अधिक मोठी कामे पार पाडणारा, अनेक बड्या प्लेअर्सना सांभाळत व्यावसायिक वाटचाल करणारा मार्टी तिला अधिक ’बापमाणूस’ वाटू लागला आहे. त्याचबरोबर तिला गुन्हेगारी शिक्का पुसून एक समाजमान्य रोजगार करण्याची संधी त्याच्यामुळेच मिळाली आहे. आपल्या सद्य जीवनातल्या खातेर्‍यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तिला त्याच्या रूपाने दिसतो आहे.

प्रथम मार्टीची हत्या करुन त्याचे पैसे लुटण्याचा प्लान करणारी रूथ नंतर त्यामुळेच त्याच्या हत्त्येचा कट करणार्‍या तिच्या दोन्ही काकांचा काटा निष्ठुरपणे दूर करताना दिसते. तर दुसरीकडे आपल्या चुलत भावंडानाही आपल्या सोबतच या भणंग आयुष्यातून बाहेर काढण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी तिला मार्टीच्या मदतीची गरज आहे.

असे असले तरी ’मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीनुसार ती कुवतीपेक्षा खूप मोठी उडी घेण्याचा प्रयत्न करते आहे, अवास्तव मागणी करते आहे. मार्टीकडून ती मान्य केली न गेल्याने नाराज होते आहे. एकाच वेळी अत्यंत खुनशी, बेडर, निर्ढावलेली ही मुलगी आई-बापांच्या छत्राविना वाढल्याने आणि दोन नालायक काकांमुळे अकाली जबाबदारी अंगावर पडल्याने तशी झाली, की तिच्या गुणसूत्रांतून आलेल्या वारशामुळे हे सांगणे अवघड आहे. 

पण मार्टीला ठार मारण्यास गेलेल्या दोनही काकांचा निष्ठुरपणे मृत्यू घडवून आणल्यानंतर मार्टीच्या सहवासात ती कोसळते. त्याचे बरेवाईट झाले असते या कल्पनेने तिचा थरकाप होतो. एका परक्या व्यक्तीबाबत ही भावना आणि रक्ताच्या नात्यांतील सर्वात जवळच्या व्यक्तींचा सहज खून करणे अशा परस्परविरोधी गुणावगुणांचा तिच्यामध्ये संचय झालेला आहे. 

आपल्याकडे लालसेने, लैंगिक आसक्तीने पाहणार्‍या आजोबाच्या वयाच्या म्हातार्‍याला थेट धडा शिकवण्याचे धाडस, तो बेगुमानपणा तिच्यात आहे; त्याचवेळी घरातील थोडीफार बुद्धी असलेल्या चुलत भावाकडून तिला कर्तृत्वाची अपेक्षा आहे. बापाच्या मृत्यूनंतर बेफिकिर, कडवट बनलेल्या त्याला पाहून तिच्या पोटात कालवाकालव होते. तिला त्याने शिकून मोठे व्हावे नि या खातेर्‍यातून बाहेर पडावे, असे मनापासून वाटते आहे. त्यासाठीच ती मार्टीच्या सहाय्याने आपली आर्थिक स्थिती भक्कम बनवून त्याच्या शिक्षणाची सोय करण्याची धडपड करते आहे... जेमतेम एकोणीस वर्षाच्या या पोरीच्या आयुष्याचा हा सारा गुंता आपलाही जीव घुसमटून टाकणारा आहे.

पण हे दोघे जरी प्रामुख्याने समोर येत असले तरी आधी म्हटल्याप्रमाणॆ या सार्‍या कथानचा केंद्रबिंदू आहे ते मार्टीचे कुटुंब. त्याच्या पत्नीच्या मार्टीसोबतच होणार्‍या नैतिकतेच्या स्खलनाचा उल्लेख वर आला आहेच. ’रेगे’मध्ये पाहिले तसे केवळ पाण्यात एक बुडी मारून बाहेर यावे असे समजणारा अनिरुद्ध रेगे आपण पाण्यात नाही तर Quicksand Pit मध्ये पाऊल टाकले आहे याचा अनुभव घेतो तसेच मार्टीच्या पत्नीचेही होते. रेगेच्या मृत्यूने त्याची ’सुटका’ लवकर होते, पण वेंडी मात्र हळूहळू त्यात रुतत जाते, सक्रीय सहभाग घेऊ लागते... निर्ढावते!

अशा स्थितीत मुलांपासून हे सारे दडवणॆ अर्थातच अशक्य होत जाते. शिकागो सारख्या महानगरातून ओझार्कसारख्या मोसमी व्यावसायिक आणि म्हणून अतिशय कमी वस्तीच्या दक्षिणी(!) गावात बंदुकांची मालकी अपरिहार्य. आणि मुलांना तिचे आकर्षणही सार्वत्रिकच. मुलींना बार्बी नि मुलांना खेळण्यातील बंदूक भेट देणे हा अगदी भारतासारख्या देशातही अलिखित नियम. या आकर्षणातून मार्टीच्या मुलाचा, जोनाचा, खर्‍या बंदुकीपर्यंतचा प्रवास ओघाने आलाच. 

पण शिकारीमध्ये पहिले हरीण ठार मारल्यावर काहीशा संवेदनशील वयातला तो आयुष्यातल्या पहिल्या संभ्रमाचा सामना करतो आहे. एका क्षणी घरात घुसलेल्या पुंडावर बंदूक रोखलेल्या त्याला त्याच्या आईने त्याला हल्ला करणार्‍याला शूट करण्याची नजरेनेच केलेली खूण त्याला आठवते. अशा दोन प्रकारे हत्येचे समर्थन होऊ शकते, नव्हे ’खोटे कधी बोलू नये’ सांगणारी आईच एका प्रसंगात त्याला तसे सुचवते, याची अगदी लहान वयात झालेली जाणीव त्याला हादरवून सोडते आहे

पण असे असतानाही, आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या बापाच्या पावलावर पाऊल टाकत चोरलेले पाच हजार डॉलर  शेल कंपन्यांच्या आडून  तो अगदी सराईतपणे जिरवतो आहे. इतकेच नव्हे तर बाराव्या वर्षी त्याने आत्मसात केलेले हे कौशल्य ’एकदाच वापरु हं’ (!) म्हणत त्याची आईही सहजपणे वापरुन घेते आहे. अचानक नव्या जगात येऊन पडल्याने सैरभैर झालेली मुलगी शार्लट सहजपणे मारुऽवानाच्या सेवनाच्या मार्गे जाते आणि हे समजूनही मार्टी जणू ’मुलगी मोठी झाली की डेटिंग करणार तसेच ड्रग्ज* घेणार’ हे गृहित धरुन त्याबाबत फारसे काही करताना दिसत नाही.

शिकागोमधील एक पांढरपेशे कुटुंब दक्षिणेतील गुन्हेगारी जगात मुरत मुरत जाते...

WendyWithAGun

-oOo-

उपसंहार:

काही आठवणी अथवा संगती या मजेशीर असतात. किचनमध्ये एखादे काम तन्मयतेने करत असताना लिव्हिंग रुममध्ये चालू असलेल्या टीव्हीवर चालू असलेल्या एखाद्या कार्यक्रमातील संवाद कानी पडत असतात. पुढे तेच काम करत असताना टीव्ही बंद असेल किंवा दुसराच कार्यक्रम चालू असेल तरी त्याची दखल न घेता मनात पूर्वी ऐकलेले ते संवाद मनात उमटू लागतात. एखाद्या खेळाडूच्या विक्रमाबद्दल बोलताना त्या नेमक्या क्षणी टीव्हीवर पाहिलेली जाहिरात आठवते. असेच काहीसे मिसौरी म्हटले की माझे होते.

वीणा गवाणकर यांच्या (तब्बल चव्वेचाळीस आवृत्त्या निघालेल्या) ’कार्व्हर’ या पुस्तकात मिसौरीतल्या डायमंड ग्रोव्हचा उल्लेख आहे. तेथील काही शिखरांची चित्रे छोट्या कार्व्हरने अतिशय यथातथ्य चितारल्याची दाद त्याला अपरिचित स्त्रीकडून मिळते असा तो हृद्य प्रसंग आहे. त्यामुळे मिसौरी, ओझार्क यांची माझ्या मनात त्या न पाहिलेल्या सौंदर्याशी सांगड घातली गेली होती. आता ओझार्क पाहिल्यावर ती तुटून गेली आहे. आता ओझार्क म्हटले की मला आपल्या बौद्धिक कौशल्यावर फाजील विश्वास ठेवून, धनलोभाने गुन्हेगारीच्या जाळ्यात गुरफटत जाणारा मार्टीच आठवत राहील. एका आवडलेल्या मालिकेने दिलेला हा नकारात्मक वारसा!

अलीकडचा वास्तववाद हा सौंदर्याची, विश्वासाची, स्निग्ध भावाची, माणुसकीची हत्या केल्यानेच का सिद्ध होतो ; जगण्यातले वास्तव हे सारे असे कुरूपच असते असे या साहित्यिकांना अथवा माध्यम-लेखकांना का वाटते?; वाचकाच्या अथवा प्रेक्षकाच्या तोंडावर हे असे जगण्यातले सडलेपण, ही विरूपता फेकूनच आपल्या लेखनाला दर्जेदार असल्याचे सर्टिफिकेट मिळते असा विश्वास त्यांना का वाटतो?; सद्गुण, निर्मिती, आपुलकी, बांधिलकी हे वास्तव नसते का?... हे मला सतत छळणारे प्रश्न पुन्हा एकवार माझ्यासमोर फेर धरुन नाचू लागतात.

---


हे वाचले का?