बुधवार, १७ मे, २०२३

वारसा आणि विचार

काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे."

कमलनें विचारलें, "कां ?"

शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं.

कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली.

आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्‍यावरची एक रेषासुद्धां बदलली नाहीं- जसा कांहीं एक दगडी पुतळाच - कांही दिसत नाहीं की कांही ऐकू येत नाहीं.

शेषप्रश्न

हा विक्षेप अविनाशला असह्य झाला होता. तो म्हणाला, "माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या."

कमल म्हणाली, "पण माझ्या पतीची परवानगी नाहीं. त्यांची अवज्ञा करणं योग्य का ?" असे बोलून ती हंसूं लागली.

अविनाशलाही हसल्यावांचून राहवले नाहीं. तो म्हणाला, "या बाबतीत तो दोष व्हायचा नाहीं. आम्हां एव्हढ्या लोकांचा मिळून आग्रह आहे. तुम्हीं बोला. "

कमल म्हणाली, “आजचा दिवस धरून आशुबाबूंना मी केवळ दोनच वेळ पाहिलंय. पण एव्हढ्याच वेळांत मला त्यांचा फार लोभ वाटू लागलाय- " असें म्हणून शिवनाथकडे बोट करून ती म्हणाली, "यांनी कां मला दटावलं तें आतां कळलं मला."

स्वतः आशुबाबू तिचें निवारण करून म्हणाले, "पण माझ्या दृष्टीनं तुला संकोच बाळगायचं कांहींच कारण नाहीं. हा बुढ्ढा आशु वैद्य अगदीचं भोळा माणूस आहे बरं कमल. दोनच दिवसांच्या भेटीत तू कांहीतरी ठरवलंस, आणखी दोन दिवस पाहिलंस म्हणजे तुला कळून येईल, की त्याची भीती बाळगण्यासारखी दुसरी कोणतीच चूक नाहीं. अगदी खुशाल बोल. तूं बोलशील तें ऐकायला मला खरोखरच आनंद वाटेल."

कमल म्हणाली, "पण एवढ्यासाठीच तर त्यांनी मला दटावलं. आणि एव्हढ्याचसाठीं अविनाशबाबूच्या प्रश्नाला उत्तर देतांना मला कठिण जातंय. स्त्री-पुरुषांच्या प्रेमाच्या व्यवहाराला मी महत्त्व देत नाहीं, आदर्श म्हणून मानीत नाहीं, असं उत्तर देणं मला खटकतंय."

आता अक्षयने तोंड उघडले. त्याच्या प्रश्नांत थोडीशी खोंच होती. तो म्हणाला, "तुम्ही मानीत नाहीं हें संभवनीय आहे- पण मानतां काय ते तरी आम्हांला ऐकवाल ?"

कमलनें त्याच्याकडे पाहिले पण उत्तर दिलें तें त्याला नव्हतें. ती म्हणाली, "केव्हांतरी एकदां आशुबाबूंनीं आपल्या पत्नीवर प्रेम केलं होतं. आतां ती हयात नाही. आता तिला कांहीं देता येत नाही की तिच्याकडून काही मिळण्याचाही संभव नाहीं. तिला सुखी करता येत नाहीं कीं दुःखही देतां येत नाहीं. ती मुळीं नाहींच. प्रेमाचं स्थान कसलीसुद्धां खूण न ठेवता पुसून गेलंय- आहे काय ती केव्हांतरी एकदां प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. माणूस नाहीं- नुसती आठवण आहे - ही आठवण मनांत सारखी घोळवीत ठेवायची, वर्तमानकाळापेक्षां भूतकालच चिरस्थायी असं समजून आयुष्य कंठायचं, या वृत्तींत कांहीं मोठासा आदर्श आहे असं मला मुळींच वाटत नाही."

कमलच्या तोंडच्या या शब्दांनी आशुबाबूंना पुन्हां धक्का बसला. ते म्हणाले, "कमल, पण आमच्या देशांतल्या विधवांना ही आठवण म्हणजेच काय तो जगायला आधार असतो. पति निवर्तला तरी त्याची नुसती आठवण उराशी कवटाळून ती आपल्या विधवाजीवनाची पवित्रता सांभाळीत असते. सांग- एव्हढं तरी तूं मानतेस का ?"

कमल म्हणाली, "नाही. नांव मोठं दिलं म्हणजे एकादी गोष्ट खरोखरच मोठी होते असं नाही. उलट मी असं म्हणते, या भावनेच्या सक्तीखाली या देशांतल्या विधवांना जबरदस्तीने वैधव्यांत राहायाला भाग पाडले आहे- आपणच सांगा, खोटया गोष्टींवर सत्याचा मुलामा देऊन लोक त्यांना फसवतात असंच नव्हे का? -आपण तसं म्हणाल तर मी नाकबूल करणार नाहीं."

अविनाश म्हणाला, “असंच जर चाललंय, माणूस जर त्यांची फसवणूकच करीत आला असेल, तर विधवेच्या ब्रह्मचर्यात- नको - राहू दे, ब्रह्मचर्याची गोष्ट नाहीं काढीत- पण विधवेच्या आमरण संयमशील जीवनांत अत्यंत पवित्रतेलाही काही महत्त्व द्यायचं नाहीं का?"

कमल हंसली आणि म्हणाली, "अविनाशबाबू, हा पाहा आणखी एक शब्दाचा मोह. 'संयम' हा शब्द वापरतांना आज कित्येक दिवस त्याचं महत्त्व वाढत वाढत एव्हढं अनावर होऊन गेलं आहे, की त्याच्या बाबतीत स्थलकाल, कारण अकारण कुणी पाहातच नाहीं. हा शब्द उच्चारला की माणसाची मान आपोआप त्यापुढं झुकते. पण अवस्थाविशेषानं हा शब्द म्हणजे एक फुसक्या आवाजापेक्षा जास्त नव्हे, असं कबूल करायला कुणा साधारण माणसाला भीती वाटत असली तरी मला वाटत नाहीं. मी त्या जातीतली नाहीं. पुष्कळ लोक कोणतीही एकादी गोष्ट पुष्कळ दिवसांपासून अशीच आहे म्हणून म्हणत असले तरी मी ती हिशेबांत घेत नाहीं. नवर्‍याची स्मृती हृदयाशी कवटाळून दिवस कंठणाऱ्या विधवेची स्वतःसिद्ध पवित्रतेची कल्पना ही खरोखरच पवित्र आहे असं कुणी मला सिद्ध करून दिलं नाहीं, तर ती पवित्रता कबूल करणही मला खटकेल.”

अविनाशला यावर उत्तर सुचेना. क्षणभर वेड्यासारखा पाहात राहिल्यावर तो म्हणाला, "काय बोलतेस हें ?"

अक्षय म्हणाला, "दोन आणि दोन म्हणजे चार होतात हें सुद्धां मला वाटतं आपल्याला सिद्ध करून दाखवलं नाहीं तर आपण कबूल करणार नाहीं?"

कमलनें याचें उत्तर दिलें नाहीं कीं ती रागावलीही नाही. नुसती हंसली.

आणखी एका व्यक्तीला राग आला नाहीं. ते म्हणजे आशुबाबू. खरें पाहिले तर कमलच्या भाषणाने सर्वांपेक्षां जास्त फटका बसला होता तो त्यांना.

अक्षय पुन्हां म्हणाला, "आपल्या या सार्‍या घाणेरड्या कल्पना आम्हां उच्चवर्णीयांत प्रचलित नाहींत. पूर्वीपासून आहेत त्याच समजुती तिथं कायम आहेत."

कमल तशीच हंसतमुखानें उत्तरली, "उच्चवर्णीयांत या समजुती कायम आहेत हें मलाही माहित आहे."

बराच वेळपर्यंत सारे उगीच बसले होते. त्यानंतर म्हणाले "आणखी एक प्रश्न तुला विचारतो कमल. पवित्रता अपवित्रतेसाठी नव्हे पण स्वभावतःच ज्याला यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं- उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस - मणीच्या स्वर्गस्थ आईच्या जागी दुसरी कुणी आणून बसवावी अशी कल्पना सुद्धा माझ्या मनात कधी आली नाहीं त्याचं काय ?"

कमल म्हणाली, "आपण म्हातारे झाला आहांत आशुबाबू.'

आशुबाबू म्हणाले, "आज म्हातारा झालोय हें मी कबूल करतो, पण त्यावेळी कांही म्हातारा नव्हतो- पण त्यावेळी सुद्धा मला असं वाटलं नाहीं कसं ?"

कमल म्हणाली, "त्यावेळीही तुम्ही असेच म्हातारे होता. देहानं नव्हे- मनानं. एकेक माणूसच असा असतो, की तो म्हातारं मन घेऊनच जन्माला येतो. त्या म्हातारपणाच्या पांघरुणाखाली त्याचं थकलेलं विकृत तारुण्य लाजेनं मान खाली पासून कायमचं झाकून राहिलेलं असतं. ते म्हातारं मन खूष होऊन म्हणतं, अहाहा ! हेंच तर उत्तम ! दंगा नाही, गडबड नाहीं-, शांति ती हीच - माणसाच्या जीवनाचं हेंच शेवटचं तत्त्वज्ञान ! किती प्रकारची किती विशेषणं देऊन तो तारीफ करीत असतो. त्या तारिफेच्या दमाक्यानं दोन्ही कान भरून जातात. पण ते त्याच्या जीवनाचं जयवाद्य नव्हे, आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे ही गोष्ट त्याला कळत नाही"

प्रत्येकाला वाटत होते, की यावर एकादें सणसणीत उत्तर द्यावे- बायकांच्या जातीच्या तोंडचे तें उन्मत्त यौवनाचे निर्लज्ज स्तुतिस्तोत्र सर्वांच्या कानांत तापलेल्या रसासारखं जाळीत जात होते. पण उत्तर देण्याजोगे शब्द कुणालाच सुचेनात. यावेळी आशुबाबू शांतपणे म्हणाले, “म्हातार्‍या मनाची तुझी व्याख्या काय आहे कमल ? मला जे वाटतं त्याच्याशी ताडून पहायचंय मला, की ते बरोबर आहे की ते चूक आहे ?"

कमल म्हणाली, “मनाचं वार्धक्य मी त्यालाच म्हणते आशुबाबू की जे पुढे पहायला तयार असत नाही. ज्याचं थकलेलं, जर्जर झालेलं मन भविष्यकालच्या सार्‍या आशांवर तिलांजली देऊन केवळ गतकालच्या आधारावर जिवंत राहू पाहतं- पुढं कांहीं करायचं आहे, काहीं मिळवायचं आहे असा आग्रहच नसतो त्याचा. वर्तमानकाल त्याच्या लेखी नसतोच- त्याला तो अनावश्यक वाटतो- निरर्थक वाटतो. आलाच नाहींसा वाटतो. गतकाल म्हणजेच त्याचं सर्वस्व- त्याचा आनंद- त्याच्या वेदना. तेंच त्याचं मुद्दल. तें मोडून खाऊन त्यावर आयुष्याचे बाकीचे जे कांहीं दिवस असतील ते कसेबसे कंठायची इच्छा असते त्याची. आतां पाहा ना तुम्हींच आशुबाबू, जमतं आहे का हें तुमच्या अनुभवाशीं ?”

आशुबाबू, हंसले आणि म्हणाले, “एकदां केव्हांतरी ताडून पाहीन मी."

ही सारी चर्चा चाललेली असतांना अजितकुमार मात्र एक शब्दही बोलला नव्हता. नुसता टक लावून सारखा कमलच्या तोंडाकडे पहात राहिला होता. इतक्यांत त्याला काय वाटले कोण जाणे, मन आवरणें त्याला अशक्य झाले. तो एकदम बोलला, "माझा एक प्रश्न आहे- असं पहा मिसेस-"

कमल सरळ त्याच्याकडे पहात म्हणाली, "तें ’मिसेस' कशाला ? कमल म्हणून हांक मारा ना मला."

अजित शरमेनें गोरामोरा झाला आणि म्हणाला, "छे, छे. असं कधीं "झालंय ? अशी ही रीत- "

कमल म्हणाली, "अशी ही रीत कसली ? आईबापांनी माझं जें नांव ठेवलं आहे ते कुणीतरी हांक मारण्यासाठी. त्याचा मला कशाला राग यायला हवा ? एकदम मनोरमेच्या चेहर्‍याकडे पाहात ती म्हणाली, "आपलं नांव मनोरमा- मी तशीच हांक मारली तर राग येईल का आपल्याला ?" मनोरमा म्हणाली, "हो, येईल !" ती असें उत्तर देईल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. आशुबाबू तर संकोचाने एवढेसे झाले.

कांहीं वाटलें नाहीं ते कमलला स्वत:ला. ती म्हणाली, "नांव म्हणजे तरी काय- नुसता एक शब्द. पुष्कळांतून एका माणसाला टिपून काढायचं एक साधन. पण संवयीमुळे तेंहि कित्येकांना खटकतं हें ही तितकंच खरं. ते या शब्दाला नाना प्रकारांनी सजवून ऐकण्याची इच्छा धरतात. राजे लोकांचीच गोष्ट घ्या-  त्यांच्या नांवाच्या मागंपुढं कांहींतरी निरर्थक शब्द जोडले जातात- एकदोन श्री जोडल्याशिवाय तो शब्द ते दुसर्‍याला उच्चारू देत नाहीत- नाहींतर त्यांचा अपमान होतो-" असे म्हणून ती हंसत सुटली आणि शिवनाथकडे बोट दाखवून म्हणाली, “-जसे हें. कधी म्हणून 'कमल' म्हटलं नाही यांनी. म्हणतात 'शिवानी' म्हणूनच हांक मारा की ! शब्दही लहान आहे- अन् कळेलही सर्वांना - निदान मला तरी कळेल."

एव्हढी उघड उघड सूचना मिळाल्यावरही अजित बोलला नाहीं कां हेंच कळेना. प्रश्न त्याच्या तोंडच्या तोंडींच राहिला.

त्यावेळी दिवस मावळला होता. मार्गशीर्षातल्या धुरकट आकाशांत मळकट चांदणे दिसून येत होते, तिकडे बापाचे लक्ष वेधून मनोरमा म्हणाली, "दंव पडायला सुरवात झालीय बाबा. आता पुरे. आता तरी उठा."

आशुबाबू म्हणाले, "हा उठलोच पहा पोरी."

अविनाश म्हणाला, "शिवानी नांव फार छान. शिवनाथ गुणी माणूस- त्यामुळे त्यानं नावही दिलंय तें मोठं गोड. स्वतःच्या नांवाशीं तें खिळवलंयही मोठ्या खुबीनं.”

आशुबाबू उसळून उठून म्हणाले, "हा शिवनाथ नव्हे रे अविनाश तो- वरचा !" असे म्हणून त्यांनी आकाशाकडे नजर फेकली आणि म्हटले, “जगाच्या आरंभापासूनचा तो म्हातारा 'भद्रेश्वर दीक्षित' चोहीं बाजूनं पारखून अशी जोडपी जुळवण्यासाठीं आहार निद्रा सुद्धां गमावून जागत बसलाय ! जीते रहो !"

तितक्यांत अक्षय एकदम सरळ होऊन बसला. दोनतीन वेळ मान हालवून, आपले पिचके डोळे शक्य तितके टवकारून म्हणाला, "ठीक आहे- मी आपल्याला एक प्रश्न विचारू का ?"

कमल म्हणाली, "कसला प्रश्न ?'

अक्षय म्हणाला, "आपण तसा कांहीं संकोच बाळगीत नाहीं म्हणून विचारतों ! 'शिवानी' हें नांव मोठं सुंदर आहे- पण शिवनाथबाबूंबरोबर खरोखरच आपलं लग्न झालंय का ?"

आशुबाबूचा चेहरा काळवंडून गेला. ते म्हणाले, "हें काय बोलतां अक्षयबाबू ?"

अविनाश उद्गारला, "तुला काय वेड लागलंय ?”

हरेंद्र म्हणाला, "ब्रूट !"

अक्षय म्हणाला, “तुम्हांला माहित आहे, मी उगीच खोटी भीडभाड घरीत नाहीं."

हरेंद्र म्हणाला, “खऱ्या खोट्या भिडेची चाड तुला नसेल, पण आम्हाला तर आहे !"

कमल मात्र नुसती हंसत होती. जशी कांहीं ही थट्टेची बाबच होती. ती म्हणाली, “एवढं रागवायला कशाला हवं हरेंद्रबाबू ? मी सांगतें अक्षयबाबू- मुळीच कांहीं झालं नाहीं असं नाहीं. लग्नविधीसारखं काहीतरी झालं होतं- जे पहायला आले होते ते मात्र हंसूं लागले. ते म्हणाले, 'हें लग्न म्हणजे लग्नच नव्हे,- ढोंग !' यांना विचारलं तेव्हां हें म्हणाले, की हें लग्न झाल शैवपद्धतीनं. मी म्हटलं, ठीक आहे. कांहींतरी झालं खरं ! शिवाबरोबरचं लग्न जर शैव पद्धतीनं झालं तर मग त्यांत कसला विचार करायचा ?"

तें ऐकून अविनाशला वाईट वाटले. तो म्हणाला, “आपल्या समाजांत आतां शैवविवाह रूड नाहीं. उद्या जर यांना वाटलं, की हें लग्न झालंच नाहीं असं म्हणावं, तर तुला कांहींच पुरावा करता यायचा नाही.'

शिवनाथकडे पाहून कमलनें विचारले, “काय हो, असं कांहीं करणार आहांत वाटतं केव्हातरी ?"

शिवनाथ तसाच उदासवाण्या गंभीर मुद्रेनें बसला होता. त्याने कांहींच उत्तर दिलें नाहीं. तें पाहून हंसण्याच्या मिषाने कपाळावर हात मारून कमल म्हणाली, "हाय रे नशिबा ! झालं नाहीं म्हणून नाकबूल करायला हें जातील, आणि झालं आहे म्हणून इतरांपुढं शाबित करायला मी जाणार आहे होय ? त्यापूर्वी गळ्याला फांस लावायला एकादी दोरीसुद्धां नाहीं का मिळायची ?"

अविनाश म्हणाला, "मिळेल बरं- पण आत्महत्या म्हणजे पाप.' कमल म्हणाली, “पाप कसलं डोंबलाचं ! पण तें व्हायचं नाही. मी आत्महत्या करायला निघेन असं ब्रह्मदेवालासुद्धां वाटायचं नाहीं."

आशुबाबू एकदम म्हणाले, "हें मात्र माणसासारखं बोललीस कमल."

अर्जदाराचा आव आणून कमल त्यांच्याकडे पाहून म्हणाली, "पाहा तर खरं- अविनाशबाबू कशी माझी अब्रू घेताहेत !-" शिवनाथचा निर्देश करून ती म्हणाली "हें जातील मला झिडकारायला, आणि मी काय जाणार आहे माझा स्वीकार करा म्हणून यांच्या गळी पडायला ? सत्य गेलं चुलींत- अन् जे कसलाच विधि मानीत नाहींत त्यांना दोरीनं बांधून ठेवू का मी? मी का करायला जाणार आहे असं कांहीं ?" बोलता बोलतां तिच्या डोळ्यांतून ठिणग्या उडूं लागल्या.

आशुबाबू शांतपणे म्हणाले, "शिवानी, या जगांत सत्यापेक्षां दुसरं कांहीं मोठं नाहीं हें आपणां सर्वांनाच पटतं, पण लग्नविधी म्हणजे कांहीं खोटा नव्हे !"

कमल म्हणाली, “मी कुठं खोटा म्हणतेय ? प्राण जसा सत्य तसाच देहही सत्य- पण प्राण जेव्हां निघून जातो तेव्हां ?"

बापाचा हात धरून ओढीत मनोरमा म्हणाली, "फार दंव पडतंय बाबा. जातां उठलंच पाहिजे. "

"हा उठलोंच ग !"

शिवनाथ एकदम उठून उभा राहून म्हणाला, "चल शिवानी, आतां पुरे झालं. चल."

- oOo -

१. मणी: मनोरमेचे हाक मारण्याचे नाव.

२. गोविंद बल्लाळ देवल यांनी ’जरठ-बाला विवाह’ या विषयावर लिहिलेल्या 'संगीत शारदा' या नाटकातील लग्ने जुळवणारा मध्यस्थ. हा उल्लेख शरच्चंद्रांच्या कादंबरीत अर्थातच नाही. हा वरेरकरांनी जोडलेला मराठी संदर्भ आहे.

पुस्तक: शेषप्रश्न
लेखक: शरच्चंद्र चॅटर्जी (अनुवाद: भा. वि. वरेरकर)
आवृत्ती: तिसरी
प्रकाशक: नवभारत प्रकाशन संस्था
जुलै १९८०.
पृ. ६१-६९.


हे वाचले का?

सोमवार, ८ मे, २०२३

तहान

दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली.

कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई.

सत्तांतर

आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.

या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड पाण्याच्या काठावर होतं. सुमारे साठ पावलांचं अंतर होतं आणि ते अंतर पार करून पाणी पिऊन, परत झाडावर येणं हीच गोष्ट फार जोखमीची होती. साग झाडीच्या कडेवर होता. मागे टेकडी होती आणि गर्द झाडं-झुडपं होती. या जाळकटात दबा धरून कोणीही हिंस्र पशू बसला असण्याची शक्यता होती.

मुडा आपल्या टोळीसह या झाडावर काही वेळ बसला. सर्वांनी आपल्या तीक्ष्ण नजरेनं आजूबाजूचं रान निरखून घेतलं. काही गडबड न करता सगळी टोळी गप्प अशी सागाच्या झाडावर काही वेळ बसून राहिली.

कोणतीही धारिष्ट्याची गोष्ट करताना आणीबाणीचे क्षण अगदी थोडे असतात आणि त्यांना सामोरं जाणं हीच खरी परीक्षा असते.

ही जोखीम घेण्याची जबाबदारी आता सर्व टोळीपैकी फक्त दोघांवर होती- तरणीवर आणि मुडावर. या दोघांपैकी कोणी पुढं झाल्याशिवाय, तहानेनं व्याकूळ झालेल्या वानरांपैकी कोणीही जागचं हलणार नव्हतं.

टोळीतील सर्व जाणती वानरं आता फार गंभीर दिसत होती. मुडा विशेष गंभीर होता. तरणीही विशेष गंभीर होती.

अखेर मुडानं धारिष्ट केलं. तो सरासरा झाडाचं खोड उतरून दाणादाण उड्या घेत उतार उतरला आणि सावधगिरी म्हणून पाण्यापासून पंधरा-वीस पावलं अंतरावर गवतात बसून राहिला.

सगळी वानरं स्तब्ध राहून बघत होती.

बाजूच्या झाडीतून झेपावत काळ आला, तर जिवाच्या करारानं, सगळं बळ एकवटून वाऱ्याच्या वेगानं सुसाट पाठीमागं पळणं आणि उतरला तो साग चपळाईनं पुन्हा चढणं एवढंच मुडाला करता येण्यासारखं होतं. पळण्यावाचून दुसरं कोणतंही संरक्षक हत्यार त्याच्यापाशी नव्हतं. त्याला तीक्ष्ण नख्या नव्हत्या, अक्राळविक्राळ जबडा नव्हता. पोलादी कवच नव्हतं. माथ्यावर जबरदस्त शिंगं नव्हती.

सावकाश असे काही ताणलेले क्षण गेले. काही वावगं घडलं नाही.

मग शेपूट वर करून पावलं टाकत मुडा पाण्याच्या अगदी काठाशी गेला. ओल्या काठाशी जाऊन बसला. त्यानं चौफेर बघून घेतलं. काही धोकादायक असं दिसलं नाही.

पण खरे आणीबाणीचे क्षण इथून पुढे होते. पाणी पिण्यासाठी दोन्ही हात जमिनीला टेकून मुडाला वाकावं लागणार होतं. तोंड लावून पाणी प्यावं लागणार होतं आणि एकवार तोंड पाण्याला लावल्यावर मागून कोण येत आहे, हे त्याला मुळीच समजणार नव्हतं. गंभीरपणानं पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे बघत मुडा बसून होता.

तरणीनं मग धारिष्ट्य केलं. ती सरासरा साग उतरून झेपावत थेट पाण्याकाठी आली आणि मुडाच्या पाठीशी हातभर अंतरावर बसून तिनं चौफेर नजर टाकली. मागून कोणी नकळत येणं फारच कठीण आहे, हे तिला माहीत होतं. कारण अजून सागाच्या झाडावर बसून राहिलेल्या टोळीनं तत्काळ चीत्कार करून तिला सावध केलं असतं.

मागं 'तरणी' आहे, हे बघताच दोन्ही हात गवतात ठेवून मुडा खाली वाकला आणि त्यानं पाण्याला तोंड लावलं.

तब्बल चार-पाच क्षण त्यानं पाण्याला लावलेलं तोंड वर उचललं नाही. मग तीन पोरं धिटावून खाली उतरली आणि मुडाच्या ओळीत पंगतीला बसावी, तशी पाण्याच्या काठी बसली.

आकंठ पाणी पिऊन होताच तत्काळ मुडा उडाला आणि या धोकेबाज पाण्याकाठी क्षणभरही न रेंगाळता सागाकडे धावला.

धीट पोरं मागं बसलेली बघून तरणीनं, मुडानं ज्या जागी पाण्याला तोंड लावलं होतं, त्याच जागी तोंड घातलं. तिचं पाणी पिऊन अजून संपलं नाही, तोवरच एक पोर पुढं होऊन ओणवं झालं. त्यानं पाण्याला तोंड लावलं. दोघं पोरं राखणदारासारखी मागं बसूनच होती.

अशा पद्धतीनं पाणी पिण्याचा हा विधी चांगला अर्धघटका चालू राहिला आणि निर्वेधपणानं पाणी पिऊन सगळी टोळी पुन्हा उड्या ठोकीत पांगली.

- oOo -

पुस्तक: सत्तांतर
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
आवृत्ती बारावी, पुनर्मुद्रण २०२२
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पृ. ९-११.


हे वाचले का?

शनिवार, ६ मे, २०२३

अ‍ॅलिस आणि आरसा

ही अॅलिस आहे.

-मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !"

"होय तर! मग*, तुला काय हवे होते ?"

"आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली.

"मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते."

माणसेः अरभाट आणि चिल्लर

ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाही. तो तिला चुकणार नाही, पण सध्या तरी तो नाही हे खरे. अनेकदा ती विनयशील आहे. पण ती प्रसंगी सावध आणि स्पष्ट देखील आहे.

एकदा जेवायला बसल्यावर टेबलावर एका प्लेटमध्ये मटण आणून ठेवले जाते. तेव्हा राणी त्याची अॅलिसशी ओळख करून देते. मटण देखील प्लेटमधूनच किंचित वाकून तिला नमस्कार करते, आणि अॅलिस सुध्दा तसे करते. मग खाण्यासाठी एक तुकडा कापण्याचा तिचा विचार असतो, तर राणी रागाने म्हणते, "छट्, असे कधी होते की काय ? ज्याची ओळख करून दिली आहे त्याचा तुकडा कापणे हा का शिष्टाचार झाला ? वेटर, मटणाची प्लेट घेऊन जा."

मग पुडिंग येते. तेव्हा घाईघाईने अॅलिस राणीला म्हणते, "आता कृपा करून पुडिंगची ओळख मात्र करून देऊ नको. नाही तर मग पोटात काही सुध्दा जाणार नाही."

Let there be light and there was light, हे सामर्थ्य परमेश्वराचे. त्याखालोखाल सामर्थ्य कलावंताचे. त्याने कागदावर लेखणी टेकताच वादळ घोंगावू लागते, आणि व्याकुळ झालेला लियर माळरानावर भरकटू लागतो. सगळ्यांनी टाकलेला, सगळीकडून हाकलला गेलेला आंधळा इडिपस मृत्यू शोधत अथेन्समधील वनराईकडे चालू लागतो.

अॅलिसचे जग अगदी लहान, कोवळे आहे. पण त्या जगात मात्र ती तितकीच सामर्थ्यशाली आहे. "Let us pretend" म्हणताच तिला वाटेल ते शक्य होते. ती सरळ वर स्टँडवर चढून आरशातून पलीकडे जाऊ शकते. शिवाय काही वेळा तिची जीभ देखील तिखट होते. ती एकदा एका राणीला स्पष्ट सांगते, "मी मुळीच गप्प राहणार नाही. तुला विचारतेय कोण ? तुम्ही सगळीच जण पत्त्याच्या डावातील नुसती पाने आहात..." या तिच्या शब्दांनी मात्र तुटल्याप्रमाणे सगळेच वाऱ्यावर उडतात आणि खाली येऊन तिच्या अंगावर निर्जीव अवस्थेत पडू लागतात.

अॅलिस, तुझ्या बोलण्यात किती अर्थ भरून राहिला आहे, हे तुला नंतर कधी तरी कळून येईल. पण आता हे शब्द एका लहान कोवळ्या वृक्षातून आल्याप्रमाणे वाटतात. पत्त्यातील फक्त पाने... सम्राट व त्यांच्या राण्या, युगप्रवर्तक एक्के आणि दुऱ्या, तिऱ्या असली चिल्लर पाने... सगळीच वाऱ्यावर भरकटत खाली पडतात.

"आता ज्यूरींनी आपला निर्णय सांगावा." राजा म्हणाला. तसे म्हणण्याची त्याची ती विसावी खेप होती.

"छट्‌! असे कधी झालेय का ?" राणी म्हणाली, "ते काही नाही. आधी शिक्षा, मग न्याय- निर्णय!"

"हा काय आचरटपणा आहे ?" अॅलिस रागाने म्हणाली.

"ए, तू जीभ आवरून गप्प बस."

"मी मुळीच गप्प बसणार नाही." अॅलिस जोराने म्हणाली.

--आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तुला चमत्कारिक वाटले, अॅलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षानी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयुष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कुठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशेब होतो. निदान शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगत असता आपली शिक्षा सुरू झालेली असते.

"हा काय आचरटपणा आहे ?" असे पुन्हा एकदा म्हण, अॅलिस. “Let us pretend” म्हणत तू आरशातील घरात सहज गेलीस. तुझ्या स्वच्छ, निर्लेप मनाला इकडची बाजू कोणती, आरशातील बाजू कोणती याची स्पष्ट जाणीव होती. माझे मात्र तसे नाही. काही वेळा खरे जग कोणते, आरशातले कोणते, हेच उमगत नाही. इकडे काही वेळा अशा घटना घडतात की आपण आरशात गेलो की काय, अशी शंका वाटते. तर काही वेळा जर कल्पनेने आरशात गेलो तर क्षणातच अगदी इथल्या जगातील घटनेप्रमाणे काही तरी कठोर विषारी घडते, तेथील तरल वातावरण नष्ट होते आणि पुन्हा मी ठिकाणी येऊन पडतो. अॅलिस, आमची खरी अडचण अशी आहे की, आम्ही इकडे नाही, व पूर्णपणे आरशात नाही; तर मध्येच काचेतच अस्ताव्यस्तपणे अडकून पडलो आहोत. त्यात आमचे आणखी हाल म्हणजे आमच्या बाबतीत एकच आरसा असत नाही. एका मोठ्या आरशासमोर दुसरा एक आरसा असतो. आरशामागील आरशांतील अनेक जगे, आमची अनेक चित्रे. मग त्यात खरी खोली कोणती, आरशातील कोणती, आरशातील कोणता मी खरा, हे काहीच कळत नाही, आणि मी भांबावून जातो.

काही समजतच नाही. काही समजतच नाही.

तू आरशात जाऊन पुन्हा परतलीस. ते कसे करावे, हे कुणी तरी तुला विचारून ठेवायला हवे होते. पण तरी देखील तुझ्या मनात एक शंका राहिलीच. हे सारे स्वप्न तुलाच पडले की तूच दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊन आलीस, याविषयी तुझ्या मनात संशय राहिला. तसला किती तरी जास्त धारदार संशय आम्हांलाही अनेकदा त्रस्त करतो. आम्हांलाच कसली तरी विषारी भयाण स्वप्ने पडत आहेत की आपणच वाट चुकून कुणाच्या तरी भीषण अर्थहीन स्वप्नात हिंडत आहोत, याविषयी भ्रांत वाटू लागते. आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांत असतो काय, किंवा दुसरे येऊन आपल्याला छळत असतात काय ! म्हणजे एकंदरीने "Hell is other people" हेच खरे की काय ?

नदीकाठी गवतावर तू झोपली असता तुला पहिले स्वप्न पडले. म्हणून तू त्या ठिकाणी पुन्हा यावीस, तुला पुन्हा यापुढील स्वप्ने पडत जावीत. ती तू मला ऐकवावीस म्हणजे कदाचित आपल्या हाती काही तरी लागेल, मला काही तरी जास्त समजेल, असे मला फार वाटते, व त्या मोहाने मी त्या ठिकाणी थांबण्याचा विचार करतो. पण ही आशा अगदी फोल आहे, हे मला माहीत आहे. तुझा प्रवास इतरांप्रमाणे पुढेच असतो, व पुढे गेल्यावर तुला उलट मागे येता येणार नाही. फक्त भुते आणि आठवणी यांनाच उलटी पावले असतात. तू पुढे गेल्यावर आणखी एका अॅलिसला स्वप्ने पडतील, हे खरे आहे. पण तोपर्यंत थांबणे मला शक्य होणार नाही. एका जागी स्थिर राहायला किती वेगाने धावावे लागते हे तुला माहीत आहे. तेवढा वेग आता माझ्या पावलांना शक्य नाही.

असल्या बाबतीत कधी अखेरचा शब्द असू शकतो का ? असलाच तर तो कुणाचा असू शकेल ? योगेश्वराचा की भुशुंड काकराजाचा कृष्णशब्द ? की अॅलिसचा कोवळा, नवथर पण धीट निर्णय-- तुम्ही सारीच पत्त्यातील पाने आहात, आणि "मला तुमची कसलीच भीती वाटत नाही" हे शब्द ? काहीच समजत नाही. समजत नाही.

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मीकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठे तरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.

अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही असे म्हणत एक उच्छ्‌वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्‌वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात, 'समजत नाही, समजत नाही, समजत नाही.'

की ’समजत नाही, समजत नाही’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील ? ते देखील समजत नाही.

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १३१-१३४.

 

* पुस्तकामध्ये इथे ’मग’ ऐवजी ’मला’ असा शब्द आहे, जो मला मुद्रणदोष आहे असे वाटते. तसेही एकुणात पुस्तकात मुद्रणदोष नि विरामचिन्हांचे घोटाळे बरेच दिसतात. स्वल्पविरामाचे अत्यंत चुकीचे वापर त्रासदायक वाटतात... अर्थात त्यांच्याकडे लक्ष गेले तर.
 


हे वाचले का?

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वेचताना... : डोह

( माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूंमध्ये दिसणारी उत्क्रांती अथवा क्रांती यांची नोंद घेणारा एक स्तंभ लिहितो आहे. यापूर्वीही या ना त्या संदर्भात माणसाच्या टोळीजीवी अथवा जंगलजीवी ते नागरजीवी या स्थित्यंतराचा मागोवा घेत आलो आहे.त्याला समांतर ’बखर बिम्मची’ या जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावरही एक मालिका लिहितो आहे. हे दोनही चालू असताना या दोन्हींला सांधणारे असे एक जुने पुस्तक पुन्हा एकवार समोर आले आणि त्या अनुषंगाने त्या दोन्ही लेखनांच्या दृष्टिकोनांची सरमिसळ होऊन तयार झालेला हा लेख.)

डोह

जंगलजीवींच्या तुलनेत नागर माणसाचे मूलभूत गरजांशी निगडित संघर्ष बरेच कमी झाले आहेत. जंगलजीवींना अन्न, पाणी नि निवारा या मूलभूत गरजांसाठी सजातीयांशी, अन्य सजीवांशी, निसर्गाशी सर्वांशीच संघर्ष करावा लागत असे. नागर मानवाने श्रमविभागणीचे तत्त्व अंगीकारले आणि मूठभरांनी केलेल्या कामाचे फायदे इतरांमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली. यातून एकुण समाजाची कार्यशक्ती वाढली नि जंगलजीवींहून नागर मानवाचे कार्यकौशल्य अनेक पटींनी वाढले.

आज नागर जीवनात नळाची तोटी उघडली की पाणी मिळते, त्यासाठी घरच्या स्त्रीला घडा घेऊन नदीवर फेर्‍या माराव्या लागत नाहीत. माणसाच्या आहाराचा दीर्घकाळ अविभाज्य भाग असलेले दूध थेट पिशव्यांमधून वा बाटल्यांमधून विकत घेता येते. अन्नसंग्रहासाठी वा शिकारीसाठी करावी लागणारी यातायातही संपून गेली आहे. मूठभर लोकांनी केलेल्या शेतीतून वा पशुपालनातून कितीतरी मोठ्या नागर समाजाला पाकसिद्धीसाठी आवश्यक घटकांचा थेट पुरवठा होतो.

त्यामुळे होते असे की त्यातील वेळ वाचून, पाकसिद्धीला उदरभरणाच्या पातळीवरून ’कलिनरी आर्ट’ नावाने कला नि प्रयोगशीलतेकडे नेण्याइतकी उसंत निर्माण झाली. या दोन्हींबाबत उदासीन राहून अन्य क्षेत्रासाठी वेळ देऊ इच्छिणार्‍यांना पाकसिद्धीच्या जबाबदारीतून मुक्त करणारी, शिजवलेले अथवा तयार अन्न थेट विकणारी दुकाने- होटेल्स नागर अर्थव्यव्स्थेचा अविभाज्य भाग बनली. विसाव्या शतकाच्या अखेरीस पाश्चात्त्य प्रगत राष्ट्रे तर सोडाच पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांतही दैनंदिन आहारासाठी तयार पदार्थच विकत मिळू लागले आहेत...

तसंच उपचारांसाठी आवश्यक असणारी वनौषधी शोधत हिंडण्याची आवश्यकता उरली नाही. ती ही अन्नाप्रमाणेच विकत मिळू लागली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सार्‍या व्यवहाराला एकत्र बांधून घालणारी चलन नावाची संकल्पना उदयाला आली आणि ती माणसाला रोजगार नावाच्या संकल्पनेकडे घेऊन गेली. यातून अक्षरश: शून्य शारीर श्रम करणारे, कोणत्याही व्यापक कार्याचा भाग नसलेलेही निव्वळ वैय्यक्तिक उदीमाच्या आधारे आपल्या अन्नादी गरजांच्या पूर्तीसाठी आवश्यक ते चलन मिळवू लागले आणि त्याच्या विनिमयाने अन्नासारख्या गरजा भागवू लागले आहेत.

या सार्‍या प्रवासामध्ये माणूस हळूहळू निसर्गापासून दूर होत चालला आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीची किंमत निसर्गाने किती मोजली याबाबत तो अधिकाधिक अनभिज्ञ आणि म्हणून बेफिकिर होत गेला आहे. जंगल साफ करून शेती करताना निसर्गाचा एक तुकडा आपण नष्ट केला याबाबत अपराधगंड नसेल कदाचित, पण भान नक्की असे. साफ होण्यापूर्वी अथवा साफ होताना जंगलाच्या त्या तुकड्याने माणसाला नि इतर जिवांना काय काय देऊ केले होते याची समजही माणसाला होती.

पुढे प्रगतीच्या वाटेवर खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची- एका नगराची उभारणी करताना माणूस नुसता बेफिकीरच नव्हे तर शोषकही होत गेला. तसे करत असताना वृक्षसंपदाच नव्हे तर त्यांच्या आश्रयाने राहणार्‍या प्राण्यांचा, मनुष्यांचा अधिवासच आपण नष्ट करत आहोत याची लाज त्याला वाटेनाशी नाही. खांडववनाच्या संहारामध्ये मयासुराच्या कुटुंबाला जीवदान दिल्याचा उल्लेख आहे, तसाच नागवंशाचा संहार केल्याचाही. प्रगतीच्या प्रत्येक वाटेखाली अनेक जिवांच्या जीविताची थडगी गाडलेली असतात याची जाणीव नागर समाजामध्ये संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे. निसर्गाप्रती माणूस संपूर्णपणे असंवेदनशील झालेला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांतून माणसाने आपले अधिवास हे लोखंड, सिमेंट यांतून तयार करायला सुरुवात केली आहे. घराभोवती कचरा वा डास नको म्हणून घराभोवतीच्या झाड-झाडोर्‍याची गच्छंती झाली. त्याची जागा कुंड्यांमध्ये लावलेल्या आटोपशीर नि खुज्या झाडांनी घेतली आहे. निसर्गाचेही बॉन्साय करुन माणसाने त्याला आपला बटीक बनवला आहे.

पुढे थोडे भान आल्यावर, घराच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात झाडे लावणे सक्तीचे झाल्यावरही त्याच्या आजूबाजूला सिमेंट अथवा त्याचे तयार पेव्हिंग ब्लॉक्स टाकून कचरा वरच्यावर उचलून तो कुजणार नाही, मातीच्या जमिनीवर शेवाळ साचणार नाही याची खातरजमा करुन घेतली जाते आहे. यातून त्यात जगणारे कीटक, त्यांना भक्ष्य करणारे पक्षीही माणसापासून दुरावले आहेत. एकमेकांचे तोंडही पाहायला लागू नये म्हणून माणसे दरवाजे बंद करुन बसू लागली आहेत.

मागील शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय माणसाचा निसर्गाशी संबंध येई तो टीव्हीवर पाहिलेल्या चित्रपटतील नायक-नायिकेच्या प्रेमगीताची पार्श्वभूमी म्हणून. आता ते कामही सरळ एखाद्या डान्सबार व हिरवाईचा अंश नसलेल्या परदेशातील एखाद्या रस्त्यावर स्थलांतरित झाले आहे. क्वचित कुणी एखादी निसर्गावरील माहितीपट पाहतो, कुणी पैसेवाला रोकडा मोजून निसर्गाची ’टूर’ करतो. त्याचेही फोटो समाजमाध्यमांवर पडले की त्याचा संबंध संपतो.

त्याहीपलिकडे जाऊन एखादी महानगरी सधन व्यक्ती ’कधीतरी निसर्गाकडे जावं बरं का’ म्हणून वरकड पैसे खर्चून कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या बिल्डरच्या स्कीममध्ये पिटुकले फार्म हाऊस’ बांधतो. वर्षांतून दोन-चार वेळा तिथे जाऊन राहतो (आणि पुन्हा फोटो- बिटो...).

थोडक्यात महानगरी माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान हे केवळ चिकटवहीत चिकटवलेल्या स्टॅंपइतके उरले आहे. 'माझ्याकडे आहे’ एवढे समाधान देण्यापुरता, किंवा एखाद्या सांस्कृतिक या नावाने सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाताना हातावर हलकेच उमटवलेल्या एखाद्या अत्तराच्या थेंबासारखा. या माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान एखाद्या petting zoo सारखे उरले आहे. त्यातील प्राण्यांशी माणसाचा तात्पुरता संपर्क येतो, त्यांच्या सहवासात थोडा वेळ घालवून, त्यांच्याशी कुठलेही नाते न जोडता तो आपल्या आयुष्यात परतून येतो.

पण आपल्या सुदैवाने आपल्या देशाची अमेरिका झालेली नसल्याने महानगरी जगण्याच्या पलिकडे अजून निसर्गजीवीच काय जंगलजीवीही शिल्लक आहेत. त्यांच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान नेहमीच अविभाज्य वगैरे नसेल पण सहजीवन नक्कीच असते. लहानशा गावांत, पाड्या-वसत्यांवर मानवी वसती हीच अजूनही गाय, म्हैस, गाढवे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, कुत्री यांसारख्या प्राण्यांचीही वसती असते.

अनागर जीवनात आसपास असलेल्या झाड-झाडोर्‍याच्या आश्रयाने राहणार्‍या खारींसारखे छोटे जीव, पोपटांसारखे पक्षी तसंच माकडांसारखे प्राणीही त्या जीवसृष्टीचा भाग असतात. छोट्या शहरांतून, दाराशी एखादे फुलझाड असते. अंगण-परसाची चैन परवडणारे घर असेल तर अंगणात तुळस असते, परसात काही भाज्या असतात. पुढील दारी एखादे फळझाड असते, त्याच्यावर एखाद्या पाखराचे घरकुल असते.

स्वत:चे कवतुक करवून घेणारे, माणसाच्या दृष्टिने निरुपयोगी मांजर ही खास नागरी चूष आहे असे मला वाटते. एरवी जमिनीच्या प्रत्येक इंचावर काँक्रीट ओतून जंगलात उंदरांचा कडेकोट बंदोबस्त झाल्यावर मांजरांना फारसे काम उरत नसावे. आणि ठराविक वेळा अन्न थाळीत येते म्हटल्यावर समोर आल्या उंदराची शिकार करण्याची तसदीही ते घेत नसते. त्या अर्थी मांजर हे ही माणसाप्रमाणेच निसर्गापासून, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांपासून दुरावले आहे, नागर झालेले आहे.

नागरी आणि महानगरी आयुष्यात अजून बसूही न लागलेले मूल हाती मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहू लागले आहे. त्याचे कौतुक म्हणून त्याला बंदूक वा बाहुली खेळायला मिळते. पण जिथे आर्थिक सधनता मुलाच्या हाती मोबाईल देण्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि दाराबाहेर काँक्रीटचा पट्टा स्वागताला नसतो अशा छोट्या गावांतील घरातून एखादे लहान मूल रांगत उंबर्‍याबाहेर पाऊल टाकते तेव्हा आसपासच्या सजीव सृष्टीची ओळख होऊ लागते. दोन हात-दोन पाय असलेल्या प्राण्यांशिवाय इतर जीवही जगात असतात त्याची त्याला जाणीव होऊ लागते. उपजत जिज्ञासेनुसार (जी पुढे शिक्षण नि संस्कारांतून मारली जाते आणि तिची जागा आप-परभाव आणि तद्जन्य अस्मितांना बहाल केली जाते) ते भवतालाची ओळख करुन घेऊ लागते.

थेट जंगलजीवी अथवा निसर्गजीवी असणारे त्याच्याशी ओळख करु घेतात त्यातून विविध निरीक्षणे नोंदवत जातात. त्यातून त्यांचे व्यावहारिक ज्ञान विकसित होत जाते. समोर दिसतो आहे तो पायाचा ठसा वाघाचा आहे की वाघिणीचा, ती इथून किती वेळापूर्वी गेली याचे आडाखे बांधण्याइतके- आणि त्या आधाराने आपल्या जीवनाशी निगडित बाबींचे निर्णय घेण्याइतके ते निसर्गाचा भाग असतात.

त्या तुलनेत गाव-पाड्यावरचे मूल जेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते तेव्हा त्यामागे अभ्यासापेक्षा निव्वळ कुतूहल, जिज्ञासाच अधिक असते. दारचा राखणीचा कुत्रा, झाडावर नियमित दिसणारी खार, विशिष्ट वेळेला दारासमोरून जाणारी गाय अथवा शेळ्यांचे खांड, एखाद्या झाडाला फळे धरली की त्यावर येणारी पाखरे, माणसाच्या वसतीमध्ये बिनदिक्कत घुसून गोंधळ माजवणारी माकडे आणि कुठल्याही दाव्याखेरीजही माणसाच्या गुलामीच्या अदृश्य खांबाला बांधल्यासारखे स्थितप्रज्ञ वाटावे असे गाढव... ही सारी त्याच्या आयुष्याचा नि निरीक्षणाचा भाग होऊ लागतात. अशा वयातील मुलांचे नि निसर्गाचे नाते उलगडणारी दोन पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दुसरे म्हणजे जी.ए. कुलकर्णींचे ’बखर बिम्मची’. आणि त्याहीपूर्वी हाती लागलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णीं यांचे ’डोह’.

ही दोनही पुस्तके संस्कारक्षम वयातील मुलांच्या भावविश्वाचे बोट धरून पुढे जातात. बिम्मच्या आयुष्यात येणार्‍या गायीच्या, पिवळ्या पक्ष्याच्या, हत्तीच्या, कुत्र्याच्या पिलाच्या लहान-लहान गोष्टी मांडत जी. ए. त्याचे भावविश्व साकार करतात. त्याचबरोबर त्या गोष्टी एखाद्या बिम्मला वाचून दाखवणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठीही त्यात काही ठेवून देतात. तर ’डोह’मध्ये बिम्महून थोड्या अधिक वयाच्या- अधिक समज असलेल्या मुलाच्या तोंडूनच त्याच्या परिसराची ओळख दुसरे कुलकर्णी करुन देतात. यामध्येही या मुलाने बिम्मप्रमाणेच जगण्यातील जीवसृष्टीशी आपले नाते जोडले आहे. बिम्मप्रमाणे गाय, कुत्रा वगैरे माणसाला जवळच्या असणार्‍या प्राण्यांऐवजी त्यांच्या उपेक्षेचे- अनेकदा भीतीचे- विषय ठरलेल्या सुसर, घुबड आणि वाघळांसारख्या जीवांचीही दखल घेत जातो; वार्‍याच्या, पाण्याच्या प्रवाहाशी समरस होऊ पाहातो.

दोहोंमधील मुलाच्या वयोगटाशिवाय मांडणी आणि दृष्टिकोनाचा थोडा फरक आहे. जी. ए. बिम्मचे छोट्या गोष्टींच्या स्वरूपात मांडतात. तर श्री. वि. ’डोह’साठी आता जवळजवळ अस्तंगत झालेल्या ललित लेख या वाङ्मयप्रकाराची निवड करतात. माटे मास्तर, पु. ग. सहस्रबुद्धे, विद्याधर पुंडलिक आणि अलिकडचे ग्रेस या लेखकांचे ललित लेख माझ्या वाचनात आले आहेत. अनुभव, आस्वाद, विश्लेषण आणि लालित्य अशा विविध अंगांना स्पर्श करत जाणारा हा प्रकार कथनात्म साहित्यामध्ये कथा, कादंबरींच्या गोंगाटामध्ये कोपर्‍यात ढकलला गेला आहे. त्याची बलस्थाने आजचे समीक्षक नीट उलगडू शकतील का अशी मला शंकाच आहे, इतका तो उपेक्षित राहिलेला दिसतो.

एरवी वेचित ब्लॉगसाठी वेचे निवडताना दोन ते तीन पर्यायांतून कुठला निवडावा अशा संभ्रमात मला काही वेळ द्यावा लागतो. परंतु ’डोह’मधील वेचा निवडताना भूमितीमधील दोन बिंदूंतून जाणार्‍या एक आणि एकच रेषेप्रमाणे एकच वेचा- खरेतर पुरा लेख- सहजपणॆ निवडला. या लेखामध्ये निवेदक मुलाने वाघळांचा घेतलेला मागोवा उलगडून दाखवला आहे.

लेखाची सुरुवात निवेदकाच्या वैय्यक्तिक अनुभवांतून होते. त्यातून उल्लेख आलेल्या वाघळांकडे लक्ष वेधले जाते. त्यानंतर वास्तवाच्या नोंदी, दंतकथांचे संदर्भ, रोकड्या व्यावहारिक जगाचे संबंध यांसोबत वाघळांच्या वसतीच्या नि त्यांच्या जगण्याच्या विलक्षण संवेदनशीलतेने टिपलेल्या नोंदी या मार्गे अस्तित्वाच्या विलयापर्यंत केलेला प्रवास विलक्षण आहे. एका लहान मुलाने जगाकडे उलटे लटकून पाहणार्‍या वाघळांकडे इतक्या कुतूहलाने, जिज्ञासेने पाहणे ही देखील आता एक वाघळदृष्टीच म्हणावी लागेल.

- oOo -

(’डोह’मधील एक वेचा इथे. https://vechitchaalalo.blogspot.com/2023/04/blog-post.html )


हे वाचले का?

शनिवार, १ एप्रिल, २०२३

रात्रपाळीचे शेजारी

उंबरातली काळी सोनेरी पाखरे खाल्याने डोळे येत. सुजत. आणि दिवसाही उघडता येत नसत. मग आई मला हलके धरून मोरीपाशी घेऊन येई. ऊनसर पाणी पापण्यांच्या कडांना लावून त्या भिजवी. त्या न दुखवता सोडवून, दिसायला लागेल असे करी.

पण डोळे आल्यावरचे थोरल्या आईचे औषध विलक्षणच होते. दोनदोन दिवस ती अंधारातच बसायला लावी. ऐकले नाही तर डोळ्यात फूल पडून दिसणार नाही, असा धाक दाखवी. नि रात्रीही कंदिलाऐवजी करंजेलाचे थंड दिवे लावून घरात जेवणे होत.

दिवसाच्या अंधारात बसून राहायचे माझे एकाकीपण हलके व्हावे म्हणून आई, " माझे वाघळ काय करते आहे" असे सौम्य हसत मला विचारी. आणि वडाला टांगून घेणाऱ्या वाघळांसारखे आपलेही एक वाघळ झाले आहे असे वाटून माझी भीती उलट मोठी होत जाई. डोळे आल्याचे दुःख वाघळे नेहमी कसे सोसत असतील, समजत नसे.

पण वाघळांचा दिवस रात्री उगवतो असे आई सांगे.

रात्रीचा दिवस असलेली ती विक्षिप्त वाघळे मला उगीचच सारखी आठवत राहत. रात्री त्यांना कसे दिसत असेल यावर मी विचार करत बसे. नि त्यांचे दोन डोळे आपणांला मिळाले तर ते हातात घेऊन, काळोखातही दिसत कसे चालता येईल ते मी मनात चालून पाही.

डोह

आमच्या घरासमोरच्या वडाच्या दाट पानांच्या हिरव्या छताला अगणित वाघळे उलट्या, मिटलेल्या छत्रीसारखी लटकलेली असत. वडाच्या वरच्या पानावळींकडे मी मान अवघडेपर्यंत पाहत राही. उंदरासारखे तोंड. उभार पसरट कान. मागे वाघाच्या पट्ट्यातल्या एका छटेसारखा केसाचा उमदा रंग. दोन्ही बाजूंनी आलेली तेलकट काळीमोर नख्या असलेली पंखे मागे घेऊन ती निपचित डोळे मिटून डुलक्या घेत असत. इतक्या उंच अंतरावरूनही त्यांच्या पोटांचा भाता हलताना दिसे. आणि त्या इतक्या पोटांचे भाते खालवर होत असताना, वडाखालच्या भरून राहिलेल्या निळ्या पोकळीवरही आपणाला न कळणारे काही परिणाम होत असतील असे वाटे.

दुपार गावात पसरून राहिलेली असे. पांढरी फकफकीत दुपार. सूर्य माथ्यावर आलेला असे. उभ्या आटोपशीर झाडांच्या सावल्या पडेनाशा होत. सावल्यांनाही आपले अंग मिळायचे असे.

पण आपल्या अंगाहून वरला विस्तार कितीतरी मोठा असलेल्या वडाची तेवढी खालती दाट सावली पडे. मधून उन्हाचे ठिपके. वडाखाली जाऊन बघावे तेव्हा, मधला एखादा तुकडा त्या संथ नक्षीचा आकार पालटत चालताना दिसे. वडावरचे वाघळ जागा बदलत असे.

दुपारच्या शांततेचा पातळ तुकडा पलटवणारा वाघळांचा आवाज चिरकत येई. आणि एखादे वाघळ, दिसत नसतानाही आपली जागा सोडू लागे. जागा बदलायची त्यांची एक ठराविकच रीत होती. पुराच्या ओल्या गाळ-मातीतून चालताना एक पाय वरती काढायचा नि दुसरा टाकायचा, तशी. पहिले पंख लांबवून पुढे रुतवायचे नि मागले पंख सोडवून तिथे आणायचे.

त्यांचे जागा बदलायचे खेळ सारखे सुरू असत. अंग अवघडले म्हणून. उन्हाची तिरीप आली म्हणून. पण काही वेळा तो खेळ विचित्र वाटे. एकाने जागा बदलली की, पुढले वाघळही चळवळायला लागे. आणि ती रांग दूरवर लांबे. एका वाघळाच्या दिशेने बऱ्याच बाजूंनी वाघळे यायला लागत. एकमेकांना ओचकारत. चिरकत. त्या गोंधळात ते मधले वाघळ चाचपडत उठून दुसरीकडे पिंपळावर नाही तर चिंचेवर जाऊन पडे. आणि उरलेल्या वाघळांना त्याला हुडकता येत नसे.

उन्हाच्या वेळी थोरली आई स्वतःला दोन्ही बाजूंनी पदराच्या शेवांनी वारा घेई, तसे एखादे वाघळ स्वतःला टांगून घेतलेले असताना दोन्ही पंखांनी वारा घेताना दिसे. कधी एकच पंख हलवूनही ते वारा घेत राही.

मोजता न येण्याइतक्या त्या वाघळांच्या जागा जवळजवळ ठरलेल्या असाव्यात. त्यांना जोडणारी रेषा हवेत काढली असती तर ती हवेच्या कागदावरली रेषाकृती, नेहमी तिच्यावरूनच छापून काढल्यासारखी निघाली असती.

वाघळे अगदी जवळून पाहता आली ती देवाच्या आवारातून वरती आलेल्या उंबरावर लटकणारी. दोन वाघळे जोडीने नेहमी तिथे असत. वडापुढची तांबडमाती संपली की देवाच्या आवाराचा दगडी बांधीव तट लागे. खालती खोल डोळे फिरवणारे फरशीचे आवार, दादांच्याबरोबर जीव एकत्र करून मी त्या वाघळांना बघायला तटावर येत असे. माझ्या कुठल्याही उत्सुकतेत दादांचा उत्साह येऊन नेहमी मिसळे.

आणखी एक वाघळ दिवटीच्या मळीतल्या फणसाच्या झाडावर राही. आमच्या गावातल्या त्या एकुलत्या फणसाला ओळखणारे वाघळ इतरांहून वेगळे असले पाहिजे.

वाघळांच्या कळपातून ती वेगळी का राहत होती, त्यांची भांडणे होती की त्या कळपातल्याहून ती अधिक शहाणी होती, हे न सुटणारे प्रश्न होते.

वाघळांची सर्वात मोठी वसाहत वडाच्या विस्तारावर होती. उरलेली वाघळे वडाखालच्या पिंपळावर, जवळच्या चिंचेवर आणि काही डगरीच्या उंबरझाडांच्या अंधारात राहत. वाघळांना बाभळीवर लटकताना मी कचितच पाहिले. बाभळीच्या काट्यांनी पंख फाटण्याची भीतीही त्यांना वाटत असेल.

...संध्याकाळी हळूहळू वाघळांच्या जगाला जाग येऊ लागे. ती पंखे झटकत. त्या आवाजांतून त्यांच्या पंखांच्या वजनदारपणाची जाणीव होई. एक एक उठून वडाला, गावाला फेरी मारायला सुरुवात करी. थोड्या वेळाने नदीवर डगरीला जाऊन थांबले की वाघळेच वाघळे दिसत. प्रकाश मंद होत चाललेल्या त्या वेळी डोहातल्या आभाळात वर गिरकत राहिलेल्या वाघळांची अतिशय स्वच्छ प्रतिबिंबे उमटत. आणि डोह म्हणजे आभाळात उडणाऱ्या वाघळांचे काढलेले एक मोठे चित्र होई.

एक एक वाघळ मुळी न हलणाऱ्या डोहाच्या पाण्याचे पान मधूनच फाडी. ती वाघळांची पाणी प्यायची वेळ असे. वाघळ पाण्याच्या पृष्ठापाशी येई आणि झाप मारून पाण्याचा घुटका घेऊन जात असे. सगळी वाघळे तसेच पाणी पीत.

आणि मग डोहावरली वाघळे, उरलेल्या दिवसाच्या प्रकाशासारखी मोठ्या कळपाने पलीकडल्या भुवनेश्वरीच्या देवळाच्या कळसाच्या दिशेने झपाझप निघून जात. कुठल्या तरी फळांच्या बागांना भिलवडीकडून येणारा वाघळांचा दुसरा थवा त्यांना कळसापाशी आभाळात भेटताना खूपदा दिसे.

वाघळ विमानागत जाते असे शिंगटे नाना सांगे. आमच्या इथली वाघळे आंब्याच्या दिवसात, रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा त्याचाच शोध होता. ती रात्री वडावरून हलली तरी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी दिवस उगवायच्या आत आलेली असत. एक एक वाघळ, जणू आपण रात्री कुठे गेलोच नव्हतो अशा थाटात येऊन वडावर लागत असताना दादांनी मला पहाटे उठवून कितीदा तरी दाखवले होते. ती येऊन वडावर लागत असताना अंथरुणातही आपोआप कळत असे.

वडाखाली वाघळांनी चोथून टाकलेल्या डाळिंबांच्या बिया अधूनमधून पडलेल्या दिसत. आमच्या जवळपास डाळिंबांची इतकी झाडे कु्ठे नव्हतीच. त्यांना कुठे तरी त्या डाळिंबांच्या बागा सापडलेल्या होत्या. कधीकधी खारकांच्या बियाही त्यांच्या तोंडातून खाली पडल्याचे नानाने पाहिलेले असे. आणि वाघळे त्या रात्री परदेशातल्या खारकांच्या बागातून आल्याचे तो ठरवी.

झाडावरले अस्सल फळ पहिल्यांदा वाघळानेच उष्टावलेले असे. वाघळाने खालेला आंबा, पेरू लगेच ओळखता येई. पोपट आणि दुसरे पक्षी वरच्या बाजूवर कुठेही टोच मारून फळ खात. पण वाघळाने ते फळाच्या तळापासून उलटे पोखरत आणलेले असे. फळाची जाणकारी वाघळाइतकी कुणालाच नाही असे नानाचे मत होते.

वाघळे कौलारू घरांच्या आढ्यावर फिरणाऱ्या उंदरांना रात्री घेऊन जात. आणि पावसाळ्यात उमलून आलेल्या पिवळ्या बेडकांवरतीही ताव मारत. रात्री वडावर बॅटरीचा झोत मारून पाहिला म्हणजे वाघळांचा दिवसा भरणारा बाजार उलगून गेलेला दिसे. कधीतरी एखादी वाघळ बरे नसल्याने चिकटून राहिलेली असे तेवढीच. दसऱ्याला दुपारी निघणाऱ्या देवाच्या पालखीला ओवाळायला न जाता घरीच राहिलेल्या एखाद्या आजारी सुवासिनीसारखी.

...थोरल्या आईच्या गोष्टींचे तेव्हा एक वेगळे जगच होते. त्यावेळी प्राणी आणि पक्षी यांची लढाई सुरू झाली होती. एकट्या सापडलेल्या पक्ष्याला प्राणी मारून टाकत होते, आणि एकट्या प्राण्याचीही पक्ष्यांच्या थव्यात तीच गत होती. पण त्या युद्धात वाघळांचे दोन्हीकडून साधत होते. पक्ष्यांच्या हल्याच्या वेळी ते आपले पंख त्यांना फडफडून दाखवत होते. उडून दाखवत होते. आपण पक्षीच असल्याचे पटवून देत होते. आणि प्राण्यांच्या तावडीत सापडले तरी त्याचे बिघडत नव्हते. प्राण्यासारखे, त्याला चोचीऐवजी तोंड होते. स्तनेही होती.

प्राणी आणि पक्षी यांच्यामधले चमत्कारिक मिश्रण असलेल्या त्या वाघळांना इतर पक्ष्यांप्रमाणे कोटी, घरटी करायची यातायात नव्हती. काळोख शोधून कुठेही लटकावे इतके त्यांचे राहणे सोपे होते. आणि वाघळ अंडीही घालत नव्हती. वर निरखून नजर टाकावी तेव्हा कितीतरी वाघळांतल्या माद्यांनी, वानरीसारखे एक एक पिल्लू आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलेले दिसे. चटकन् पाहताना ते, त्या वाघळांना एखादे काळे टोपण बसवल्यासारखे वाटे. पिलाचे तोंड वाघळीच्या तोंडाशी अगदी एक झालेले असे. तिच्या तोंडातून येणारा अन्नरस बरोबर त्या पिलाच्या तोंडात जाई. त्यावरती ते वाढे. तिथून ते थोडे खालती सरकून तिच्या स्तनांनाही लुचे. दूध पिई.

पक्ष्यापासून दुसरा पक्षी होत होता. प्राण्यापासून तसलाच दुसरा प्राणी तयार होत होता. असे सारखे चाललेले होते.

किती तरी पक्ष्यांचे, प्राण्यांचे जन्म होताना मी पाहिले होते. अंडे घालताना. त्यातून पिलू बाहेर फुटताना. आमच्या घरामागे म्हशींना सारखीच रेडके होत आणि पाठीमागच्या शिंगट्यांच्या पडकात खड्डा काढून कुत्र्या वीत असत. पण बायकांच्यासारख्या, वाघळाही विताना कधी दिसल्या नाहीत. त्या रात्रीच वितात असे नाना म्हणे; सांगे की, वाघळीला एका वेळी एकच पिलू होते. तिची पिलू बाहेर यायची जागा, ती लोंबकळत असताना वरच्या बाजूला असते. पिलू बाहेर यायची वेळ तिला आपोआप समजते आणि वाघळी आपल्या पायांनी ते काढून घेऊन छातीशी झेलते.

वाघळींच्या पोटाला चिकटलेल्या लहानशा पोराएवढी, काळ्या तेलकट तकतकीत पंखांची किती तरी पोरे वडाच्या पानांनी झाकोळून गेलेल्या काळोख्या भागात शेणकुटे लावल्यासारखी डसून राहिलेली दिसत. त्यांचे आश्चर्य वाटे. आईबाप नसल्यासारखी ती केविलवाणी वाटत. इतक्या सगळ्यांच्या आया मेल्या की काय कळत नसे. त्यांना त्या अंधारात कुणीतरी कुणीतरी सारखे दगड मारून उठवीत. खूपदा ती दगड मुकाट्याने खात. आणि फारच झाले तर उठून एक आंधळी चक्कर मारून येत. त्यांतले एखादे पोर चुकून आमच्या घरात शिरे. माजघरातल्या सौम्य अंधारात भिरीभिरी फिरू लागे. मग थोरली आई 'ही कुठून चुकली पाकोळी' म्हणत तिला न शिवता घराबाहेर घालवी. पाकोळ्या म्हणजे वाघळीचीच पोरे हा माझा जुना समज होता. पाकोळी दिसते तेवढ्या आकाराहून मोठी न होणारी, वाघळासारखीच पण वेगळी जात आहे हे थोरल्या आईने कितीही सांगितले तरी खरेच वाटत नसे.

...आमच्या नदीचा घाट उतरताना उजव्या हाताला दुसरा, विरूपाक्षाचा बुरूज लागे. त्यावर आटोपशीर अंगाचे एक उंबराचे झाड छाया ढाळी. आणि त्या बुरुजावर कळकट काळ्या गोणपाटाच्या, तणावा देऊन बांधलेल्या झोपडीत शंकऱ्या तांबट वर्षानुवर्षे राहत असे. त्याचा रंग तेलकट, घाणेरडा काळा होता. त्याच्या पायांतले रक्तरस सुकून त्याला त्या चिपाडांनी चालायला यायचे बंद झाले होते. कधीच आंघोळ नसल्याने केसांचे पिवळट, भुरकट लपके झालेले होते. त्याच्या नाकातून सतत पिवळी नाळ वाहत असे. त्याला भयंकर बिड्या ओढायला लागत. सगळे व्यवहार तो तिथेच उरकत होता. आणि तरीही नदीपुढे उघडलेला हिरवा प्रदेश बघत तो जगला होता. त्याच्याभोवती असलेले एक कडे मला नेहमी भीती दाखवत असे. तो कधी तरी नुसते तारवटलेले डोळे झोपडीबाहेर काढी. नदीचे पाणी चढायला लागले की, त्याच्यापेक्षा गावच्या लोकांनाच त्याची अधिक काळजी लागून राही. बुरुजाला पाणी येऊन लागेपर्यंत तो देवळातल्या देवासारखा हलायला तयार नसे. त्याच्या झोपडीच्या कळकाला, गोणपाटाची झोळी करून, त्याची पालखी वरती वडापाशी आणली जाई. आणि पावसाळाभर त्याचा मुक्काम तिथे पडे.

पण तो घाणेरडा शंकऱ्या वाघळाचे तेल काढत असल्याबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्याजवळ एक हिरवाकाळा उभा शिसा होता. त्यात वाघळाचे औषधी तेल ठेवलेले असे. संधिवातासाठी ते तो कुणालाही थोडेसे काढून देई आणि वाघळ मारून मागत असे. शंकऱ्याचे तोंड वाघळासारखेच होते. तो गेल्या जन्मी वाघळ असावा आणि पुढल्या वेळी त्याच जन्माला जाईल असे वाटे. त्याच्या झोपडीची दोन्ही बाजूंची पलखे वाघळाच्या पंखांसारखी दिसत. आणि स्वतः शंकर्‍या वाघळाच्या मधल्या भागासारखा. शंकऱ्या आणि त्याची झोपडी मिळून एक प्रचंड वाघळच होते. तो मेल्यावर, इतकी वाघळे मारण्यापेक्षा त्याचेच खूप तेल निघेल असे वाटे.

...गावातील शांत दुपारी कुणीतरी बंदुका घेऊन येत. आणि वडावरल्या बाघळांवर आवाज टाकत. आवाजाने भेदरूनच कितीतरी वाघळे पटापटा आवारात पडत. वाघळांचे सगळे आंधळे जग जीव गोळा करून आभाळात उघळले जाई. आभाळातल्या उन्हात ती पंखे हलवत राहत. त्यातली पुष्कळ वाघळे मठातल्या पिंपळाकडे जात. काही डोहापलीकडेही. पण त्या रख्ख उन्हांत त्यांना भोवंडून येई. ती लगेच कुठे ना कुठे चिकटू लागत. पुन्हा त्यांच्यावर आवाज निघत.

पोटातली अर्धवट तयार झालेली पिले बाहेर पडून वाघळा गावडत. त्यांत छातीशी लहानसे जिवंत पोर घट्ट चिकटून घेऊन, गोळीने चिंधड्या होऊन खाली आलेली वाघळ मी पाहिली होती— तिच्या रक्ताच्या भळभळत्या आठवणीने वडाखालचे आवार नुसत्या रक्ताच्या लाल पुराने भरून येते आहे असा मला भास होई.

पडलेल्या वाघळांचे पाय धरून ती एका पोत्यात भरली जात. त्यांचे दोन्ही मजबूत पंख पसरून पाहिले की केवढे लांब वाटत. आणि त्यांची माणसासारखे एकसारखे बारीक दात असलेली, रक्तबंबाळ उघडी जिवणी बघवत नसे.

शंकऱ्यासारखा वाघळाचे तेल काढणारा वाघाटे नावाचा माणूस गावात होता. तो कधीही वाघळे विकत घेत असे. वाघळाचे पंख तोडून उरलेला भाग तो शिजवी. एका एका चांगल्या वाघळाचे मापभर तेल पडे. वाघळाच्या शरीराचा बहुतेक भाग चरबीचाच असे, आणि त्यांचे मांसही रुचकर असल्याचे तो सांगे.

आपणहून मरून पडलेली एक वाघळ मी एकदाच पाहिली होती. अवचित दुपारची ती वडाच्या उंचावरून दगडासारखी खाली कोसळली होती. आणि तिच्या तोंडानाकातून बारीक बारीक पांढरी सुते भुळभुळत होती. तिला कुठला तरी विचित्र रोग झाला असावा.

स्वतःबरोबर जगणाऱ्या, वाढणाऱ्यांविषयी कळत नकळत, जी जवळीक आपोआप वाटत असते तशी त्या वाघळांविषयीही माझ्या मनात निर्माण झाली होती.

थोडा वेळही खाली डोके वर पाय करून राहिले तर चेहर्‍याच्या मागील भागात रक्त उतरे. केव्हा सरळ होतो असे होऊन जा. आणि वाघळांना तर तसे शीर्षासन करायची जन्मभर शिक्षा मिळाली होती. स्वत:ची विष्ठा त्यांच्या तोंडात जात होती हे त्याहूनही वाईट होते.

पंक्तिप्रपंच केल्याने बाळाच्या जन्माला गेलेली ती गेल्या जन्मीची माणसे आहेत, असे थोरली आई सांगे...

गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या कुठल्या छटा कुठल्य़ा वाघळांतून दिसताहेत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखाली येत असे.

... थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना, एकाला एक, एकाला एक असे कधीच केले नाही.

- oOo -

पुस्तक: डोह
लेखक: श्रीनिवास विनायक कुलकर्णी
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती सहावी.
वर्ष: जुलै २०११.
पृ. २९-३७.

(लेखाचे मूळ शीर्षक: ’जुन्या जन्मीची माणसे'.)


हे वाचले का?