शनिवार, २७ एप्रिल, २०२४

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती

नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.)

अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील.
---

मंतरलेले बेट

चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक नवा करमणुकीचा प्रकार आला– ‘सफ्रेजेट्स’. सफ्रेजेट्स या बाया होत्या. पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क स्त्रियांना असलेच पाहिजेत, असा आग्रह असलेल्या बाया. आतापर्यंत बायकांनी नोकरीधंद्यात हलके-हलके शिरकाव करून घेतलाच होता. त्यांची प्रगती सावकाश पण नेमकी होत होती. पुरुषांच्या बरोबरीला त्या आल्याच होत्या. फक्त मतदानाचा हक्क तेवढा अद्याप त्यांना मिळालेला नव्हता.

काही प्रांतांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला होता. पण आमच्या इथे लोकमत विरुद्ध होते. पुरुष आणि बायकांमधला आणि पुन्हा बायका-बायकांमधला झगडा अनेक वर्षे चाललेला होता. जवळजवळ सगळी पुरुषमंडळी आणि बहुतेक बायका म्हणत की, ‘बायकांना मतदानाचा हक्क पाहिजे. ही ओरड मूर्खपणाची आहे’. वरचा वर्ग या चळवळीची चेष्टा करी. अगदी खालचा वर्ग सरळसरळ विरुद्धच होता. मध्यमवर्गापैकी बरेच लोक म्हणत की, या मागणीत आम्हाला तरी काही रास्त दिसत नाही. पण या प्रत्येक वर्गात थोडे, अगदी थोडे लोक असे होते की, ते या मागणीला पाठिंबा देत आणि स्त्रियांच्या हक्कासाठी नेकीने झगडत.

या बायांनी पूर्वी पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सफ्रेजेट्स चळवळीतल्या बायांशी हातमिळवणी केली. आपले म्हणणे पुढे मांडण्याची एकही संधी या बाया सोडत नसत. स्पष्टच सांगायचे तर, हा एक तापच होऊन बसला होता. बघावे तेव्हा, बघावे तिथे यांचे काहीतरी चालू असे. कुठे पिकेटिंग कर, कुठे पत्रके वाट, मोर्चे ने, सभा घे, रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून व्याख्याने झोड; काही ना काही चालूच.

मी काही वेळा त्यांच्या सभा ऐकत असे. त्यांचे बोलणे मुद्देसूद आणि पटण्यासारखे असे. पण सभेला जमलेले श्रोते ऐकून न घेता हुटाहूट करीत. गमतीची गोष्ट अशी की हुटाहूट करणारे, हुल्लड माजविणारे प्रेक्षक म्हणजेही स्त्रियाच असत.

सगळे या चळवळीच्या विरुद्धच होते. राजकीय पुढारी म्हणत, बायकांचे काम घर सांभाळणे आहे. चर्च म्हणे, स्त्रियांना मतदानाचा हक्क असणे ही गोष्ट नीतिबाह्य आहे. स्त्रियांना हा हक्क मिळाला तर त्यांचे घरसंसारावरचे लक्ष उडेल आणि कुटुंबसंस्थेवर आघात होईल.


पण जग विरुद्ध गेले तरी बायांनी धीर सोडला नाही. त्या झगडत राहिल्या. दरवर्षी लोकांना कळावे म्हणून त्या साउथ अॅव्हेन्यूवरून मिरवणुका काढीत. देखावा मोठा बघण्याजोगा असे. बघ्यांची तुफान गर्दी होई. चळवळीच्या म्होरक्या बाया भाड्याने आणलेल्या घोड्यांवर स्वार होऊन मिरवणुकीच्या आघाडीवर राहत. त्यांच्या मागे स्त्रियांचे पायदळ असे. नाना तऱ्हेचे फलक, निशाणे, खुणा हातात धरून हे पायदळ चालत असे. पण या मिरवणुकीचा खरा बघण्याजोगा भाग म्हणजे भेदरट नवरे, भाऊ, मुलगे आणि मित्र यांचा दटावून आणलेला घोळका; तो पिछाडीला असे.

अशी मिरवणूक आली रे आली की, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले बघे, हुर्यो करून अंड्यांचा, भाजीपाल्याचा मारा मिरवणुकीवर करीत. पण बाया लक्ष देत नसत. त्यांचा लढा उच्च ध्येयासाठी होता आणि तो देताना अशा फालतू गोष्टी घडणारच. पण पिछाडीला असलेल्या बाप्यांना ध्येयाबद्दल आस्था नसावी. कारण एकाएकी होणाऱ्या अंड्यांच्या मारामुळे अवसान जाऊन त्यांचा घोळका मिरवणुकीतून बाजूला पळत असे.

ही मंडळी भिऊन पळू लागली म्हणजे सगळ्या जमावाचा अगदी तोल सुटे.

या बाया हक्कासाठी झगडत असताना दुसऱ्या बाया अब्रूरक्षणासाठी झगडत होत्या. विजेच्या शोधामुळे बायकांची अब्रू धोक्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. युरोपातल्या कुणा शास्त्रज्ञाने ‘एक्स-रे’ शोधून काढला होता. ही काही यंत्र अमेरिकेत आली होती. त्यांच्यावर घेतलेले फोटो वर्तमानपत्रात छापलेले सर्वांनी बघितले होते. ‘क्ष’ किरणांमुळे ‘आतले’ दिसते हे माहीत झाले होते.

साहजिकच अशी एक जोरदार अफवा परसली की अशी यंत्रे ज्याच्याकडे आहेत ते लोक खिडकीशी बसून रस्त्यावरून आल्या-गेल्या स्त्रियांची, कपड्याआतली अंगे बघतात हे फार वाईट आहे, स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे.


आगबंबवाले, पोलीस आमच्या दुकानात येऊन म्हणत, “छे, छे, विज्ञानानं भलताच टप्पा गाठला.”

“माझं म्हणणं आहे , हा ‘क्ष’ किरणांचा शोधच मुळी बुडवून टाकावा.”

“अहो, ही काय नीती झाली! या फाजील यंत्रापासून जनतेचं रक्षण केलं पाहिजे.”


मग नवीन प्रकारच्या काचोळ्या बाजारात आल्या. काचोळ्या बनविणारा एक कारखानदार पुढे येऊन म्हणाला की, अमेरिकेतील स्त्रीजातीच्या अब्रूचे रक्षण आम्ही करू. जाहिरात करकरून त्याने एक ‘क्ष’ किरणालासुद्धा दाद न देणारी काचोळी शोधून काढली. या पद्धतीच्या काचोळ्या घालून बिनधोक रस्त्याने चालावे, ‘क्ष’ किरणच काय पण आणखी त्यापलीकडचे किरण आले, तरी ते मुळी या काचोळ्यांतून आरपार जाणे शक्यच नाही, अशी हमी या कारखानदाराने दिली

- oOo -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ५८-६०.

---
संबंधित लेखन:

वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा >>
स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>
---


हे वाचले का?

रविवार, २१ एप्रिल, २०२४

धारयते इति धर्मः ?

दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले.

आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि भोगत राहण्यासाठी! जीवनाचा हाच अर्थ आहे, श्वासोच्छ्वासाची हीच परिणती आहे, प्राणिमात्राची ही गरज आहे, हाच धर्म आहे. ‘धारयते इति धर्मः।’ मग स्वतःला सर्वश्रेष्ठ (म्हणजे जास्तीत जास्त भोग घेऊ शकणारा का?) प्राणी म्हणवून घेण्याचा गर्व माणसात कुठून, कधी आणि कां शिरला? या कलीच्या अस्तित्वाच्या जाणिवेतूनच आपल्या पूर्वजांनी आपल्या या युगाला ‘कलियुग’ हे नाव दिलं का? मग बाकीच्या युगांचं प्रयोजनच काय? बाकीची युगं हा केवळ कल्पनाविलासच आहे की त्यामागे दुसरा काही अर्थ लपलेला आहे?

मनातलं अवकाश

मनुष्यप्राण्यातल्या या गर्वाच्या स्पर्शानं, वातावरणच कां चांदणंदेखील धुरकट होऊन जातं, फुलं कोमेजायला लागतात, तेज मावळायला लागतं, कोरडं कोरडं वाटायला लागतं. ओलावा संपत येतो, नाती ठिसूळ होऊ लागतात. आपापल्या पायांखाली मातीचे वेगवेगळे ढिगारे आणि डोक्यावर तुटक्याफुटक्या आकाशाचे तुकडे! चहूकडून त्या गर्वाने पोखरलेलं अर्थहीन अस्तित्व! एरवीही या उघड्या-नागड्या जगात तसे आपण एकटे एकटेच असतो, आपापल्या स्वर्गाची निर्मिती करण्यात स्वतःला गुंतवत राहतो. हा स्वर्ग तरी मग कसला? अनेकदा जणू बलात्कारातून जन्माला आलेला, विरजलेलं, पराभूत आयुष्य जगत राहणारा!

‘शिंग फुकिले रणी, वाजतात चौघडे / सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे’ अशी गाणी म्हणत, ४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या त्या सैन्यात भरती झालेलं माझ्यासारखीचं तारुण्य नेत्यांमागून सीमेपर्यंत उत्साहात जाऊन पोहोचलं, प्राणपणाने लढलं. ते स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीत क्षणभर नाचलं-बागडलं आणि मग मागे वळून पाहताना त्याला प्रश्न पडला, ‘हेच का स्वातंत्र्य?’

अचानक सुरेश भटांची ओळ आठवली,

हेच का स्वातंत्र्य, ज्याचे गीत आम्ही गाइले ?
हेच का ते प्रेत, ज्याला रक्त आम्ही पाजिले?

युद्धानंतर दोन्हीकडच्या तरुण सैनिकांना या एकाच प्रश्नाने जाग येणार होती, तर मग ते एकमेकांशी लढले कशाला? नेत्यांच्या राज्याभिषेकाचे सोहळे दुरून फक्त पाहायला आणि धारातीर्थी पडलेल्या भाऊबंदांचे उद्ध्वस्त संसार पाहून केवळ अश्रू ढाळायला?

धर्म म्हणजे विशिष्ट वागणुकीच्या चौकटीत जगण्याची सक्ती. धर्म, राष्ट्र असल्या नावांनी मनुष्यजातीची विभागणी करताना नेहमीच चुकीचे निकष लावले गेले. खरं तर दोन्हीकडच्या नेत्यांचा धर्म एक असतो आणि दोन्ही सैन्यांचा धर्मही एकच असतो. नेत्यांच्या पदरी मान-सन्मान पडतात आणि सैन्यांच्या पदरी दुर्भाग्य! तरीही ते सैनिक शहाणे होत नाहीत, डोळे उघडून वास्तवाकडे पाहत नाहीत. लढण्याच्या धुंदीत आपण एकमेकांना, स्वधर्मीयांनाच मारत असतो, आणि ‘नेते’ नामक परधर्मीयांना सत्ताधारी बनवून स्वतःच्या पदरी हे भोग ओढवून घेतो, हेच त्यांना दिसत नाही, कळत नाही, उमगत नाही.

आपण आपला धर्म म्हणून जे काही गोंजारले, जीवनमूल्यं म्हणून ज्यासाठी जिवाचा इतका आटापिटा केला, ते सगळंच्या सगळं धिक्कारावं लागण्याएवढं मोठं दुःख दुसरं कोणतं असेल? असह्य यातना याहून मोठी कोणती असेल?

एकेकाळच्या मराठे-मुसलमानांच्या किंवा अरब-तुर्की लोकांच्या झालेल्या लढायांचा इतिहास पाहिला तर काय दिसते? अरबांच्या जीवनात किंवा व्यक्तित्वात काळा-पांढरा, लाल, निळा असे ठळक रंग फक्त असत. त्यात भेसळ किंवा छटा यांना स्थान नव्हतं. बाह्यरूप आणि अंतरंग असा भेदभाव नव्हता. खरं तरी किंवा खोटं तरी, शत्रू तरी किंवा मित्र तरी, बस्स! एक घाव, दोन तुकडे. कीस काढत बसणं, शब्दच्छल वगैरे बारकावे नव्हते. कल्पनाविश्व नावाची चीजच नव्हती. मृत्यू ही त्यांच्या दृष्टीनं नैसर्गिक गोष्ट होती, पण आत्महत्या ही संकल्पना त्यांच्या आवाक्याबाहेरची होती.

इतर प्राण्यांसारखाच एक मनुष्यप्राणी! समाज, संस्कृती वगैरे कल्पनाही त्यांच्या आवाक्याबाहेरच्याच होत्या. वनस्पती सृष्टी म्हणजे उभी असलेली जिवंत झाडं तरी किंवा सुकून जमिनीवर पडलेली, त्या झाडांची हाडं तरी. आपण खुशाल त्यांना ‘लाकडं’ म्हणतो. हीच एकेकाळी, अगदी परवा-परवापर्यंत जिवंत होती, बहरून ताठ उभी होती, श्वासोच्छ्वास करीत होती, याची जाणीवही आपल्या मनात शिल्लक राहिलेली नसते.

खरं तर प्राणिसृष्टीच्या आधीची वनस्पती सृष्टी. म्हणजे एका अर्थी हे आपले पूर्वज. पण याचं किती म्हणून विस्मरण आपल्याला व्हावं! झाडं तोडणं, पाडणं, जाळणं वगैरे कृतीमागे कोणतीही पापभावना आपल्या मनात उद्भवत नाही. याचा अर्थ इतिहासाचं आपलं ज्ञानही उथळच आहे. मनुष्यप्राण्यांची एकेकट्यांची कुटुंब, मग त्यांच्या टोळ्या, मग छोटी-मोठी राज्यं, त्यांची आपापली सत्तापिपासा आणि द्वेष-मत्सरापोटी एकमेकांशी झडलेली युद्धे वगैरेंची जमेल तेवढी सुसंगती जमवत केलेली टिपणं म्हणजे आपला इतिहास. सर्वसामान्यांच्या दृष्टीनं, शालेय शिक्षणातलाही एक दुय्यम विषय. त्याच्या खास अभ्यासानं फार तर एखाद्याला त्या विषयाचा प्राध्यापक होण्याची संधी लाभेल. पण रोजच्या जीवनात त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची आपल्याला गरजच भासत नसते. माणसाच्या इतिहासाचीही आपल्याला गरज नसते, तर जीवसृष्टीच्या इतिहासाचा प्रश्नच कुठे उद्भवणार?

बुद्धिबळाच्या खेळात राजा वजिरापासून प्याद्यांपर्यंत माणसंही असतात आणि हत्ती-घोडे-उंट अशी जनावरंही असतात. राजाचं बळ खरं तर सर्वांत अधिक, पण छोटी छोटी प्यादी किंवा ती जनावरं त्याला शह देऊन अडचणीत आणू शकतात. म्हणूनच हा बुद्धिबळातला शर्यतीचा पट ज्या कुणी कल्पिला, त्याने मित्र आणि शत्रू ढळढळीत काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगात स्पष्ट केले आणि त्यांची त्यांची फौजही त्यांच्याच रंगात अगदी समबळाची तयार केली. खेळ संपला की क्षणापूर्वी ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू होत्या, त्या पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या, एकाच खोक्यात कशाही वेड्यावाकड्या भरून ठेवल्या जातात. मग कधीतरी पुन्हा खेळण्याची बुद्धी होईपर्यंत त्यांना पटावर नाचवली जाणारी कृत्रिम लाकडी खेळणी यापलीकडे किंमत तर नसतेच, पण प्याद्यापासून राजापर्यंतचा दर्जाही नसतो, निश्चित स्थानही नसते. कुणालाही कुणाच्याही पायाशी लोळण घेत पडून राहावं लागतं. खेळ चालू असतानाच्या त्या कुरुक्षेत्रावरच्या फौजांचं निर्जीव अस्तित्व हाच त्यांचा धर्म. सर्वांचा एकच धर्म– ‘सोंगट्या’ हाच !

काळ्या सोगट्या आणि गोऱ्या सोंगट्या हे भाऊबंद, एकमेकांचे कौरव-पांडवांसारखे शत्रू. त्यांचं एकमेकांविरुद्ध चालणारं युद्ध ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’च व्हायला हवं. विनोबांनी गीतेचं मराठीत भाषांतर करताना ‘त्या पवित्र कुरुक्षेत्री’ अशी सुरुवात केली आहे. धुऊन पुसून स्वच्छ केलेली, काटेकोर, विचारपूर्वक स्वतःवर लादून घेतलेली बंधनं, म्हणजेच आपला धर्म! तो पवित्र आहे याची ज्याने-त्याने सदैव जाण ठेवली पाहिजे, हेच यातून सूचित होतं. जगणं म्हणजे श्वास आणि उच्छ्वास यांचा मेळ आणि खेळ. तोच त्यांचा धर्म. त्या धर्माचं बंधन त्यांनी सोडणं म्हणजेच मृत्यू ओढवून घेणं.

या धर्माची व्याप्ती वाढत गेली, तशा त्यात अनेक जाती निर्माण झाल्या. पण त्या त्या जातींनाही विशिष्ट बंधनं ही होतीच. त्या बंधनात आनंदानं जगणं म्हणजेच धर्मपालन करणं. ती बंधनं मोडणं-तोडणं, विसरणं किंवा त्यातून पळवाटा काढण म्हणजे अधर्मच.

याचा अर्थ आपला धर्म म्हणजे आपल्या जीवनाला लाभलेली जन्मजात चौकट. त्या चौकटीचं खेळाचं मैदान करणारा निपजू शकतो, तसंच वैराण वाळवंटही! काटेरी कुंपणाचं मळकट जळकट ओसाड रानही सर्वसामान्यांच्या बाबतीत असे ढोबळ प्रांत अस्तित्वात येतात. त्या त्या प्रांतातली समर्थ माणसं सगळी एकाच स्वभावाची नसतात. सुस्वभावी, उदारमतवादी माणूस आपला प्रांत समृद्ध, बळकट, आनंदी करू शकतो. पण तोच स्वार्थी किंवा अविचारी असेल, तर प्रजेला दुबळी आणि दुःखीही करू शकतो. सामान्य माणसं यालाच ‘नशीब’ म्हणून ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी जगत राहतात. पण या असमर्थातही क्वचित एखादा बंडखोर जन्माला येतो. सुख-दुःखाला वाचा फोडतो, झोपी गेलेल्यांना जागे करून आपले अनुयायी तयार करतो. मग ‘अरे’ला ‘कारे’ पासून महायुद्धापर्यंत कोणत्याही थराला हा वणवा पसरत जाऊ शकतो. नेत्याची त्यागभावना, सत्त्वशीलता असे गुण, किंवा खुमखुमी, स्वार्थ, उन्मत्तपणा वगैरे दोष, कोणतीही ठिणगी अशा वणव्यांना कारणीभूत होऊ शकते. जगाच्या इतिहासात असे वणवे ठिकठिकाणी अधूनमधून भडकत गेलेले, कुवतीनुसार पसरत गेलेले आणि हळूहळू विझूनही गेलेले आपण पाहतो.

या इतिहासात अनेक कालखंड असतात. लहान-मोठे. त्या त्या काळच्या संस्कृतीचे, आता मातीमोल झालेले ढिगारे. ढिगारा म्हटलं की प्रथम कळसाकडेच लक्ष जातं. त्या त्या कळसावरचं अलिखित नाव डोळ्यांपुढे तरळू लागतं. हे ढिगारे केवळ शुद्ध मातीचेच नसतात. इतरही अनेक धातूंचे कण त्यात कमी-अधिक प्रमाणात मिसळले गेलेले असल्याचं लक्षात यायला लागतं. अगदी कथिलासारख्या सामान्य धातूपासून ते शंभरनंबरी सोन्यापर्यंतच्या अनेक धातूंचे कण. त्या त्या ढिगाऱ्यात कोणकोणते धातू किती किती प्रमाणात आहेत, याचा अचूक अंदाज करून प्रतवारी ठरवणं, क्रमवारी निश्चित करणं वगैरे कामं विद्वान संशोधक करतच असतात. पण या प्रयोगशाळेतल्या क्रमवारीतून मिळालेलं ज्ञान फक्त परीक्षतल्या प्रश्नांना उत्तरं देण्यापुरतंच मर्यादित राहत. प्रत्यक्ष जीवन जगताना आपण निवडतो ती किंवा आपल्यावर जन्मजात लादली गेलेली असते ती विचारप्रणालीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. जगण्याचे हे वेगवेगळे मार्ग म्हणजेच धर्म ना? ‘धर्मनिरपेक्षता’ किंवा 'मानवतावाद' हे देखील शेवटी त्या त्या आचरणपद्धतीचे धर्मच ना?

त्या त्या धर्मासाठी त्या त्या वेळी असंख्यांनी बलिदान केलंही आणि बळी घेतलेही. या कृतीतून आपण अमर होणार, या कल्पनेतून ते मृत्यूला सामोरे गेले. असा जीवन-मरणाचा प्रश्न आला की प्राणच पणाला लागतो. कारणं वेगळी, पण परिणाम एकच– मृत्यू हाच. ओढवून घेतलेला मृत्यू, नैसर्गिक नव्हे. याला वेडाचार म्हणता येईल का? तीही माणसंच होती!

सहसा आई-वडिलांची जात किंवा धर्म, तोच मुलांचा, कुटुंबाचा धर्म मानला जातो. सुजाण झाल्यापासूनच्या वयात अनेकदा तर्‍हेतर्‍हेचे फॉर्म्स भरण्याचे प्रसंग आले. अगदी रेशनकार्डासाठीच्या फॉर्मापासून त्या त्या परीक्षेला बसण्यासाठीच्या फॉर्मापर्यंतचे अनेक. त्या त्या वेळी ‘जात’ अगर ‘धर्म’ या शब्दांपुढे मी ‘मानवता’ अगर ‘माणुसकी’ असंच लिहीत आले. आता आता माझ्या लक्षात येऊ लागलं की, त्या वेळी मी बरीचशी अप्रगल्भ होते. वय, वाचन, अनुभव जसजसे वाढत गेले तसतसं लक्षात येऊ लागलं की, मनुष्यप्राणी हा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राहिलेलाच नाही. आमची संस्कृतीची व्याख्या फार वरवरची आहे. तिला फारशी खोली नाही लिहिण्या-वाचण्यातून, ऐकण्या-पाहण्यातून जमवलेल्या माहितीचा साठा, त्यातून बनवलेली आपली मतं म्हणजे आमचं ज्ञान. आपल्या घरातली पुस्तकांची कपाटं आणि आपलं डोकं त्यानेच भरून गेलंय. ते ज्ञान कपड्यांसारखं आण्ण हवं तेव्हा वापरू शकतो. पण आपल्या रक्तात मुरून, आपला ‘स्वभाव’ बनून राहण्यासाठी यातलं कितीसं खर्ची पडलं? त्यातून आपला स्वभावधर्म कितीसा उन्नत झाला? किती प्रगल्भ, समृद्ध झाला? मानवता किंवा माणुसकी हा माझा धर्म आहे, असं अभिमानाने सांगावं असे सहचरी भाव या शब्दांना घट्ट चिकटून राहिले आहेत का? यातलं सत्य किंवा वस्तुस्थिती किती आणि अज्ञान आणि स्वतःचीच होत असलेली फसवणूक किती ?

‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला’ हे ऐकायला, गायला, अनुसरायला फार कठीण नसतं. जीवन त्या मार्गानेच जाऊ लागतं. हा टप्पा तसा बराच मोठा असतो. तो पार करताना शेवटी शेवटी लक्षात येऊ लागतं, ‘उरला दिवस अल्प, घोडे थकुन चूर’.

अजून किती अंतर काटायचं बाकी आहे? आणि झाला हा प्रवास सुखासमाधानाचा झाला की अतृप्तीचा? मागे वळून पाहत हिशोब मांडत बसायचं, की पुढला अंदाज घेऊन कमी कष्टाचा मार्ग शोधून काढायचा? असे विचार मनात येतात याचाच अर्थ, आपणही इतिहासजमा होण्याच्या मार्गाला लागलो आहोत ही जाणीव.

महात्मा गांधींनी ‘सत्य आणि अहिंसा’ हा धर्म सांगितला. त्यातलं ‘सत्य’ मी समजू शकते, पण ‘अहिंसा’ मात्र मला कळू शकत नाही. आपण श्वास घेतो, चालतो, खातो-पितो, म्हणजे जगताना नकळत का होईना, किती तरी जीव बळी पडतच असतात ना? म्हणजे इथे, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हाच खरा धर्म असावा असं पटू लागतं.

-oOo-

पुस्तक: मनातलं अवकाश.
लेखिका: सुनीता देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली.
वर्ष: २००६.
पृ. २२-२७.

---

१. मूळ लेखाचे शीर्षक: धर्म
२. मूळ लेख पूर्वप्रकाशन: लोकसत्ता, दिवाळी २००४.


हे वाचले का?

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)

<< पूर्वार्ध

शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही.

मंतरलेले बेट

ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.”

त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत.

कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या उतरून येई आणि बूटजोडी बांधा म्हणे. अशा गिऱ्हाइकाचे काम करण्यात शिलरना आनंद होई. एकीकडे हात चालत, दुसरीकडे तोंड चाले. जर्मनीमधल्या आपल्या बाळपणीच्या कितीतरी आठवणी त्यांनी मला सांगितल्या. या आठवणी सांगता-सांगता ते हसत, मीही हसे.

एके दिवशी त्यांनी मला कैसरच्या वेळी आपल्याला मिलिटरीत नोकरी कशी करावी लागली ते सांगितले, “मी एकटाच नव्हतो. सगळ्यांनाच भरती व्हावे लागे. तुम्हा अमेरिकेतल्या लोकांना ते माहीत नाही. जर्मनीतच काय युरोपमधल्या सगळ्या झार देशात मुलगा ठरावीक वयाचा झाला की, त्यानं मिलिटरीत भरती झालंच पाहिजे.”

“किती वर्ष?”

“तीन.”

“मग तुम्हाला पसंत नव्हतं?”

“हॅट.” शिलर ओरडले.

आणि हातांतला हातोडा त्यांनी असा जोराने आदळला की, त्याचा दांडाच मोडला.

हळूहळू मला कळले की, मिलिटरीच्या नोकरीचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आहे. सैनिकांची सगळी जात आणि सैन्यातले अधिकारी यांच्याबद्दल ते फार तिटकाऱ्याने बोलत. पुनःपुन्हा म्हणत, “साध्या शिपायांना तिथे डुकरापेक्षा जास्त वाईट वागवितात.”

“बरं मग ही नोकरी पुरी झाल्यावर तुम्ही काय केलं?”

“मग मी स्वतंत्र होतो. जवळ होते नव्हते ते सगळे पैसे खर्चून, हॅम्बर्गला गेलो आणि अमेरिकेचं तिकीट काढलं. जातो म्हणून सांगायला घरीसुद्धा गेलो नाही. म्हणालो, तुम्ही आणि तुमचा कैसर."

मिस्टर शिलर भलतेच रागाने बोलत. कैसरबद्दलसुद्धा. का ते मला कळावयाचे नाही. मी म्हणे, “पण कैसर भला माणूस आहे.”

“भला माणूस! हे वर्तमानपत्रांत वाचावं. डुक्कर आहे डुक्कर.”

मला धक्काच बसला. एखाद्या राज्यकर्त्याविषयी इतक्या अनादराने कोणी बोलताना मी प्रथमच ऐकत होतो. एखादा बूट बनविणारा आपल्या धंद्यात चांगला वाकबगार असला, तरी त्याला मुकुटधारी राज्यकर्त्याला अशा शिव्या देण्याचा हक्क असतो का, हे मला ठाऊक नव्हते.

“तुला ते कळायचे नाही. तू अमेरिकन मुलगा आहेस. माझ्या देशात कुणाला स्वातंत्र्य नाही; वाटतं ते बोलता येत नाही तिथे. प्रत्येकाची नोंद असते, मोजदाद असते. पोलिसांना, मिलिटरीला तुमच्याबद्दल सगळी माहिती असते. आणि तुमचा बाप अमुक होता, म्हणून तुम्ही अमुक असलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात ना, शेतकरी व्हा. तुमची आहे ही स्थिती कायम; तिच्यात सुधारणा अशक्य. आणि तुमची स्थिती कशीही असली तरी तुमच्यावर मालकी कैसरची. स्वातंत्र्य मुळीच नाही.”

राग नाहीसा झाला तसे मिस्टर शिलर अमेरिकेसंबंधी बोलू लागले. काम खूप करावं लागत असलं तरी त्यांना इथे मनासारखे वागता येत होते. पाहिजे तिथे जावे, वाटेल ते बोलावे. कुणी त्रास दिला नव्हता. योग्य वेळी त्यांना इथे लहानसे दुकानही थाटता आले होते, चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. मिस्टर शिलरनी बांधलेले बूट सगळ्या न्यूयॉर्कमध्ये उत्तम होते.


मिस्टर शिलर असे एखादे दिवशीच बोलत. एरवी वेगवेगळ्या विषयांवर बोलत. कधी माणूस आणि जीवनमूल्ये यावर बोलत. रोजच्या जीवनासंबंधी बोलत, माणसामाणसांतल्या नात्यासंबंधी बोलत. फार अवघड विषयांवर ते अगदी सोप्या शब्दांत बोलत. अशिक्षित असूनही त्यांना पुष्कळ समजत होते. फक्त एक गोष्ट त्यांना समजत नव्हती, मलाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांना समजत नव्हते की, त्यांच्यासारख्या कसबी कामसू माणसाची पिळवणूक बोस्टनमधल्या फॅक्टऱ्या का करतात? आपल्याला या असल्या एकच खिडकी असलेल्या तळघरात का राहावे लागते?

“शिक्षा झालेला कैदी असल्यासारखे वाटतं मला, पण तरीही मी स्वतंत्र आहे.”

तळघरातच दुकान घालून असलेल्या आणखी एका कसबी माणसाची ओळख होईपर्यंत मी शिलरकडे जात होतो. हा माणूस इंग्लिश होता, आणि त्याचे नाव होते मिस्टर कॉर्बेट.

शिलर आणि कॉर्बेट या दोघा दुकानदारांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते आणि तरीही ते वेगवेगळे होते. दोघेही तरुणवयात अमेरिकेस आले होते. एके काळी या दोघा कसबी कारागिरांना भाव होता आणि आता मात्र ते बाजूला पडले होते. शिलरना यंत्रामुळे बाजूला पडावे लागले होते आणि कॉर्बेटना आपल्या वयामुळे. शिलरची जागा यंत्राने घेतली होती. आणि ‘स्टाइनवे पियानो फॅक्टरी’त अनेक वर्षे काम केल्यानंतर वयाला पन्नास वर्षे झाली, म्हणून कॉर्बेटना काढून टाकून त्यांची जागा एका तरुण माणसाला देण्यात आली होती.

शिलरप्रमाणे कॉर्बेट बोलके नव्हते. जेव्हा बोलत तेव्हाही कल्पकता, तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा त्यांना गंध नाही असे दिसे. पण माणूस दयाळू होता; मैत्रीला चांगला होता. लाकडाच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे उपयोग याविषयी त्यांनी मला कितीतरी माहिती दिली. केवळ वासावरून नवे तोडलेले लाकूड कसे ओळखावे हे शिकविले. आपली सगळी हत्यारे आणि त्यांचा उपयोग मला समजावून दिला. रंधा मारताना, तक्ते तयार करताना, जोडकाम करताना मला तासन् तास बघत बसू दिले. कॉर्बेटच्या रंध्याचा, हातोडीचा आवाज ऐकताना सुख होई; पण हे आवाज नेहमी नेहमी ऐकायला मिळत नसत.

कॉर्बेटना फार थोडे काम मिळे. कॉर्बेटच्या दुकानात बसून मला सुतारकामाबद्दल बरेच कळले. मिस्टर शिलरप्रमाणेच कॉर्बेटही बदलत्या काळाचे बळी आहेत, हेही कळले. ही केवळ दोन माणसे होती. असे इतर अनेक जण अमेरिकेत आले असतील. जिच्या शोधासाठी ते इथे आले, ती संधी त्यांना दिसली न दिसली तोवर काढून घेतली गेली असेल.

आपोआप संपण्याच्या अगोदरच ज्यांचे प्राण विझविले गेलेत, स्मशानभूमी नेमस्त न होताच ज्यांना आपली प्रेते उचलून चालावे लागत आहे, अशा या लोकांचा विचार येताच माझे मन व्यथित होई.


पण मिस्टर शिलर, कॉर्बेट आणि इतर हजारो लोक यांची ही स्थिती कुणाच्याच ध्यानात येत नव्हती असे नाही. वॉशिंग्टनमध्ये थिओडोर रुझवेल्ट प्रेसिडेन्ट होते. हे गृहस्थ बुद्धिमान होते. अमेरिकेपुढील समस्या त्यांना माहीत होत्या; ते काही इलाज करीत होते.

रुझवेल्ट प्रेसिडेन्ट झाले ते योगायोगाने. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध गाजवून परत आल्यावर १८९८ साली न्यूयॉर्क स्टेटचे ते गव्हर्नर म्हणून निवडले गेले; पण सहा महिनेच त्यांनी काम केले. राजकारणातील बड्या धेंडांना रुझवेल्ट हे प्रामाणिक आणि हट्टी वाटले. ते कुणाकडून हुकूम घेत नसत; आपण काम करणार ते लोककल्याणासाठीच असा त्यांचा आग्रह होता. साहजिकच बड्या धेंडांनी ठरविले की, त्यांचा ‘राजकीय खून’ करायचा. मग त्यांनी व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून रुझवेल्टना मॅकिन्लेबरोबर नेमून घेतले. व्हाइस प्रेसिडेन्ट केल्यामुळे रुझवेल्टच्या हाती काही अधिकार राहणार नाही आणि आपल्याला हवे ते कायदेकानून पास करून घेण्यात त्यांचा अडथळाही येणार नाही, असा त्यांचा डाव होता.

अशा तर्‍हेने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला थिओडोर रुझवेल्ट व्हाइस प्रेसिडेन्ट झाले, पण नंतर सहा महिन्यांनी बफेलो येथे प्रेसिडेन्ट मॅकिन्लेचा खून झाला आणि रुझवेल्ट युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेन्ट झाले. या वेळी त्यांचे वय बेचाळीस वर्षांचे होते.


प्रेसिडेन्ट रुझवेल्ट हे मोहक व्यक्तिमत्वाचे आणि उदंड ताकदीचे गृहस्थ होते. त्यांच्यापाशी उत्साह होता. लढा देण्याची त्यांना आवडच होती. सर्वसामान्य अमेरिकन माणसाच्या हक्कासाठी सुरुवातीपासून त्यांनी लढा दिला. ते लहान लोकांचे ‘उस्ताद’ बनले. लोकांनी अगदी सुरुवातीपासून त्यांच्यावर विश्वास टाकला; हा माणूस आपला आहे, हे त्यांना माहीत होते.

सामाजिक सुधारणा ही अमेरिकेची वाढती गरज आहे, हे थिओडोर रुझवेल्टनी पुरेपूर ओळखले. मोठे उद्योगधंदे, उद्योगपती आणि इतर करोडपती गुन्हेगार यांच्यावर दोषारोप करताना ते अगदी तुटून पडत.

काँग्रेसला दिलेल्या आपल्या पहिल्या संदेशात त्यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना हक्क मिळावेत या गोष्टीचा कैवार घेतला आणि जनहिताविरुद्ध असलेल्या कॉर्पोरेशनना जोरदार तंबी दिली. हा पहिला सलामीचा तडाखा होता आणि त्या क्षणापासून सुधारणेविषयीची त्यांची जिद्द मंद झाली नाही, अमेरिकेतील मोठे उद्योगधंदे नामशेष व्हावेत, करावेत असा त्यांचा हेतू नव्हता; तर सर्व देशाला त्यांना फायद्यासाठी फक्त शिस्तीत आणावयाचे होते. कारण रुझवेल्टना स्वच्छ दिसत होते की, हे जर झाले नाही, तर उद्योगधंदे स्वतः नामशेष होतीलच, पण आपल्याबरोबर अमेरिकेलाही नामशेष करतील.

बेंड फोडणारे वाङ्मय प्रसिद्ध होण्याची जी लाट उसळली होती, तिने प्रेसिडेन्ट रुझवेल्टना राजकीय सुधारणेची प्रेरणा दिली. यू.एस. स्टील कॉर्पोरेशन, दि युनायटेड स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी, कोळसा खाणी, रेल्वे-रस्ते, मांसधंदे आणि इतर भानगडखोर यांच्यावर रुझवेल्टने खटले भरले, चौकशा केल्या. एकटी स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी घेतली, तर तिला २९,०००,००० डॉलर्स दंड झाला.

प्रेसिडेन्टनी आहुती टाकून प्रदीप्त केलेला हा ‘दंडयज्ञ’ पुरा पेटला आणि देशातले अनेक जण अस्वस्थ झाले. वाममार्गाने मिळालेल्या सत्तेपैकी एक तनसडीसुद्धा देण्याची या लोकांची तयारी नव्हती, पावलापावलांवर त्यांनी रुझवेल्टशी लढा दिला, त्यांची बदनामी केली, पण अमेरिकन जनतेचे ते ‘टेढी रुझवेल्ट’च राहिले आणि १९०४मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने प्रेसिडेन्ट म्हणून निवडले गेले.

प्रेसिडेन्ट रुझवेल्ट यांच्या कारकिर्दीत देशाची नीतिमत्ता बळावली. लोकांना ते हवे होते. उद्योगधंदेवाले फार मोकळे सुटले होते. लोकांचे हित पाहण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करणे भाग पडले, ‘दि शेरमन अॅन्टीट्रस्ट अॅक्ट’ अमलात आला. निर्भेळ खाद्यपदार्थ आणि औषधे यासंबंधीचा कायदा पास झाला. फसवी लेबले डकवून भेसळयुक्त खाद्यपदार्थाचे बंद डबे विकण्यास कंपन्यांना आता मुभा नव्हती. मांसविक्रेते, औषधे तयार करणारे कारखाने यांनाही सक्त कायदेकानून लागू करण्यात आले. वाईट मांस आणि खोटी औषधे बाजारपेठेत येणार नाहीत, असा बंदोबस्त झाला, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती छापणे, हा गुन्हा मानला गेला.


एकूण हा काळ मोठा उलाढालीचा होता. काय चालले आहे, हे समजण्याइतपत मी कळता झालेलो होतो. सत्य काय हे बऱ्याच प्रमाणात मला समजले.

पण घडत असलेल्या गोष्टीचा खराखुरा अर्थ आणि महत्त्व कळून येण्यास आणखी काही काळ जावा लागला, इतिहास निकोप करणाऱ्या या घटना घडत असताना त्यांचे महत्व आम्हाला कळले नाही, आपल्या काव्यात घडून येणाऱ्या बदलाचा अर्थ समजण्यासाठी द्रष्टेपणा लागतो. आमच्यापैकी बहुतेक जणांना या बदलाची पुरेशी जाणीवच नव्हती.


हा काळ किती महत्त्वाचा होता, हे पुढे कळून आले. सर्वसामान्य अमेरिकन माणसाचे पाऊल पुढे पडले होते, ते याच काळात. त्यांच्यावतीने सरकार धावून आले. संरक्षक कायदेकानून झाले; हक्कांचे संरक्षण झाले ते याच काळात. सर्वसामान्य माणूस खरा स्वतंत्र झाला. हे मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा त्याने कधीही गमावले नाही आणि लोकशाही बळकट बनली.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ९३-९८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---


हे वाचले का?

रविवार, ७ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)

नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले.

मंतरलेले बेट

वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे.

‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुकानांतसुद्धा. अर्थातच हॅडले या गृहस्थांना सर्व प्रश्नांबद्दल काही बोलायचे असे. त्यांच्या बोलण्यावर आजोबा असे काही भडकत की, त्या दोघांचे वाद माझ्या कायमचे स्मरणात राहिले. बरे, त्या दोघांची खडाजंगी माझ्या पथ्यावरच पडली. या सर्व प्रश्नांबाबत माझ्या मनात अगत्य निर्माण झाले.

आता मजा अशी की, आजोबा आणि हॅडले या दोघांचे बहुतेक सर्व प्रश्नांबाबत एकमत होई. त्यांच्यात मतभेद होई, तो सुधारणा कोणत्या पद्धतीने व्हावी याबाबतीत. आठ-नऊ वर्षांच्या कोवळ्या मुलांनी कापडाच्या गिरणीत बारा तास मशीनशी काम करणे मुळीच योग्य नाही, हे आजोबांना मान्य होते. याहीपुढे जाऊन ते म्हणत की, अमेरिकेत लहान मुलांकडून असे कामच करून घेऊ नये. कामगार स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा असावा आणि लायक कामगारांना जीवनमानास आवश्यक इतके वेतन मिळाले पाहिजे, हेही त्यांना मान्य होते. अशा मुद्द्यांवर आजोबांचे आणि हॅडले यांचे एकमत होई. पण उपाययोजनेबाबत त्या दोघांच्यात मतभेद होई. आजोबा म्हणत, “उद्योगपतींना योग्य वेळी या समस्यांचे आकलन होईल, आणि ते आवश्यक त्या सुधारणा करतील.”

हॅडले या मुद्द्यावर वाद घालीत. ते म्हणत, “कामगार वर्ग संघटित होऊन त्यांची युनियन झाली तरच धडगत आहे. एरवी हे उद्योगपती जागे व्हायचे नाहीत, त्यांची मने हलायची नाहीत. संपत्तीच्या लोभाने आंधळे झालेले लोक हे! त्यांना काय? संघटनेची शक्ती त्यांना दाखविली पाहिजे. संघटनेशिवाय तरणोपाय नाही. संघटित होऊनच केवळ भागणार नाही, इंचाइंचावर लढा दिला पाहिजे, फार वर्ष जावी लागतील हे व्हायला.”

आणि काय चालले आहे याची जाणीव आजोबांना व्हावी, म्हणून हॅडलेसाहेब औद्योगिक क्रांतीवर बोलत. यंत्राच्या आगमनामुळे कामगार कसा उखडला गेला आहे, त्यामुळे काय समस्या उभ्या राहिल्या आहेत, याचे अत्यंत काळजीपूर्वक विवरण करीत. या समस्या लवकर सुटणाऱ्या नाहीत, कारण इथून पुढे तर यंत्रांना फार महत्त्व येणार आहे, असे सांगत. त्यांच्या मते उद्योगपती लोभी असले तरी त्यांना दोष देता येणार नाही. परिस्थितीचा फायदा कोणीही घेणारच. माणूसस्वभाव जमेला धरला तर मॉर्गन, रॉकफेलर्स, कार्नेजी आणि फ्रिक हे उद्योगपती खुशीने शरणागती पत्करणार नाहीत. कामगारांनी लढा हा दिलाच पाहिजे.

‘लढा’ हा शब्दप्रयोग आजोबांना पसंत नव्हता. कशाही परिस्थितीत शांतात राखलीच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

आता लढ्याबद्दल माझे मत वेगळे होते. शिवाय हॅडले बोलत, त्यापैकी बऱ्याच गोष्टी मला काही वावग्या वाटल्या नाहीत. मी आता कळता झालो होतो, हायस्कूलमध्ये जाऊ लागलो होतो. रोज सकाळी मला आठवण होई की, मला स्वतंत्र करील असे सत्य कुठे तरी दडलेले आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मी शोधू लागलो, पुष्कळ वाचन करू लागलो.

लहानपणी मला चित्रांची पुस्तके फार आवडत, डोरीची चित्रे असलेले डान्टेचे ‘इन्फर्नो’ होते, तसली. या पुस्तकातील मजकूर मी कधी वाचला नाही, पण नरकयातनांची चित्रे बघत तासन् तास घालिवले. उलट आता मी पुस्तकांतले शब्द वाचू लागलो. चित्रे असली तरी ती माझ्या कामाची नव्हती. माझ्या वाचनाला पद्धत अशी काही नव्हती. ‘हुकु चुचु टोला’ असे चाले. हाती पडेल ते सगळे मी वाचून काढी, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके – सगळे !

‘काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ शेवटी तळघरातून कसा निसटला, हे मी वाचले. आणि न्यूयॉर्कमधले घरकामाचे गडी महिन्याला सोळा डॉलर मिळवितात हेही माहीत करून घेतले. डॉन क्विक्झोट आणि यांकी यांच्यासमवेत आपल्या बायकांचे रक्षण करीत आणि पवनचक्क्यांवर हल्ले चढवीत, मी जुन्या स्पेनमधून प्रवास केला. शेरलॉक होम्सबरोबर मी रहस्यभेद केले, आणि जे गुल्ड व जिम फिस्क या दोन करोडपतींनी लबाडी करून सोनेबाजार आपल्या फायद्यासाठी कसा राबविला; आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत कशी घबराट निर्माण झाली हेही जाणून घेतले. अमेरिकेतील कामगार आपले कामाचे तास दहा, बारा किंवा जास्त तासांवरून आठ तासांवर आणण्यासाठी मागणी करीत आहेत यासंबंधी मी वाचन केले. कामगार कामावर असताना झालेल्या अपघाताबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही संघटना झगडत आहेत, यासंबंधीही वाचले. ‘ट्रेझर आयलंड’, ‘डॉक्टर जेकेल अँड हाइड’ आणि ‘दि कॉल ऑफ वाइल्ड’ ही पुस्तकेही मी वाचून काढली. बेकारी भत्ता आणि म्हातारपणाबद्दल पेन्शनची मागणी करणाऱ्या ‘एक्सट्रीमिस्ट्स’ संबंधी, कामगार संघटना करणाऱ्या ‘एजिटेटर्स’ संबंधी ‘क्रॅकपॉट्स’ आणि ‘होपलेस आयडियालिस्ट्स’ संबंधीही वाचन केले. मी ‘डेव्हिड हर्म’ वाचले आणि जे. पी. मॉर्गन या माणसाने सिव्हिल वॉरच्या वेळी दोष असलेल्या बंदुका सरकारला विकून नफा कसा मिळविला हेही वाचले.


मी माझ्या कल्पित कथांत सत्यकथा मिसळल्या. सगळ्यांतले थोडेथोडे वाचले आणि तरीही वाचण्याचे पुष्कळ बाकी राहिले. गाजलेल्या अशा जुन्या शेकडो पुस्तकांबरोबरच चालू अस्थिर काळाचे दर्शन घडविणारी रोज नवी-नवी अशी पुस्तके सारखी बाहेर पडत होतीच की. १९०१ मध्ये ‘हिस्टरी ऑफ टम्मानी हॉल’ हे न्यूयॉर्क सिटी पोलीसमधल्या अनाचाराला वाचा फोडणारे गुस्ताव मेयर्सचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्याच वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या फ्रॅन्क नोरीस नावाच्या एका तरुण लेखकाने ‘दि ऑक्टोपस’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. अमेरिकेतील रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांची नरडी कशी दाबली जात आहेत, याचा स्फोट या पुस्तकात केला होता. या पुस्तकामुळे रेल्वेची चौकशी सुरू झाली. १९०३ मध्ये याच लेखकाने ‘दि पिट्’ नावाचे पुस्तक लिहिले. शिकागो धान्य-बाजारात चाललेल्या लबाडीचा स्फोट या पुस्तकात केला होता. शिकागो धान्य बाजाराचीसुद्धा चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे मोठी खळबळ उडाली. चौकशीत बाहेर आलेल्या गोष्टीमुळे लोकांत विलक्षण घबराट झाली.

१९०४ साली इडा टरवेल नावाच्या बाईने ‘स्टँडर्ड ऑइल कंपनीचा इतिहास’ प्रसिद्ध केला. त्यातही कंपनीच्या कारभारात अनाचार कसा आहे, हे तिने लोकांपुढे मांडले. न्यूयॉर्कमधल्या लिंकन स्टीफन्स या तरुण पत्रकाराने ‘शेम ऑफ दि सिटीज’ हे पुस्तक लिहून सर्व देशभर असलेल्या नगरपालिकांतून कसा भ्रष्टाचार चालला आहे हे दाखवून दिले. १९०६ साली ‘द जंगल’ या पुस्तकाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अॅप्टन सिंक्लेअरने या पुस्तकात शिकागोमधल्या मांसधंद्यात चाललेला भ्रष्टाचार उघड केला होता. लगेच याही प्रकरणाची चौकशी झाली. देशाबाहेरच्या वर्तमानपत्रांतूनसुद्धा या चौकशीच्या बातम्या झळकल्या.

ही सगळीच पुस्तके मी काही वाचली नव्हती, पण त्याच्यासंबंधी वर्तमानपत्रांत आलेला मजकूर वाचला होता. शिवाय आमच्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस या पुस्तकांवर चर्चा करी– मिस्टर हॅडले आणि त्यांच्याबरोबर पोलीस, बंबवाले, इतर गिर्‍हाइकेही. नाना मते मांडली जात, अंत नसलेली चर्चा होई. छापलेल्या शब्दांत केवढे सामर्थ्य असते, याची जाणीव मला आयुष्यात प्रथमच होत होती.

पुढच्या काही वर्षात आणखी अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. कथालेखनाने लोकप्रियता मिळविलेल्या जॅक लंडन या लेखकाने १९०७ साली ‘दि आयर्न हिल’ हे पुस्तक लिहिले. पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षात अमेरिका कशी असेल याचे चित्रण त्याने या पुस्तकात केले होते. सगळा देश मक्तेदारीच्या कह्यात गेला आहे, लोकशाही संस्था आणि घटनेने दिलेली स्वातंत्र्ये धुडकावून लावली गेली आहेत, असे हे चित्र होते. या पुस्तकाचा लोकांच्या मनावर फार खोल ठसा उमटला; त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. परिस्थिती भीतीदायक होती.

१९१० मध्ये ‘हिस्टरी ऑफ दि ग्रेट फॉरच्युन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. गुस्तोव मेयर्सच्या या पुस्तकाने सेज, व्हेन्डरबिल्ट फ्रिक, कार्नेजी, हिल या नावांविषयी असलेल्या आदराच्या फाडून टिरगाण्या केल्या. पानापानांतून सत्यकथा देऊन या पुस्तकाने सिद्ध केले होते की अनाचार, बनवाबनवी, बेकायदेशीर कृत्ये, लबाडी केल्यामुळे यांचे नशीब फळफळले होते.

या पुस्तकांबरोबरच इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली. पण काळाचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकांबद्दलच लोक बोलत. अमेरिकन जीवनाचा एक हिडीस भाग या पुस्तकांनी लोकांना दाखविला होता. आता करोडपतींबद्दल आदर राहिला नव्हता. शंकास्पद मार्गांनी पैसा केलेल्या कॉर्नेजीसारख्या माणसाने ‘सार्वजनिक वाचनालया’ला देणगी म्हणून दिली, तर त्या गोष्टीकडे आम्ही संशयाने बघू लागलो. आम्हाला अमेरिका स्वतंत्र झालेली हवी होती. अमेरिकन जनतेची मालकी असलेली अमेरिका आम्हाला हवी होती. मूठभर लबाड लोकांची मालकी असलेली अमेरिका नव्हे.

पुस्तके लिहून अनाचाराला वाचा फोडणाऱ्या या काळात सत्ता हातात ठेवणाऱ्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या विरुद्ध लोकमत गेले होते. लोक आणि उद्योगधंदे या दोन्हींचे नाते जोडले जाईल, असे काही लोकांना हवे होते. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधी लोकांच्या मनात असलेला आदर पार नाहीसा झाला. विश्वास उडाला तो उडालाच. मग काही मोठ्या धंदेवाल्यांनी जनता-संपर्क अधिकारी नेमले आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

या काळात कामगार अधिक स्पष्टवक्ते बनले. त्यांच्या संघटना निर्माण झाल्या. शक्तिशाली बनत गेल्या. या यंत्रयुगात आपल्याला कुठे जागा आहे, हे माणूस शोधत होता. उद्योगधंद्यांशी आपले चांगले नाते असावे, अशी त्याची धडपड होती. आर्थिक सत्ता बळकावून बसलेले लोक ती हातची सोडायला तयार नव्हते, त्यामुळे अनेक जोरदार झगडे झाले.


या सगळ्यामुळे आमचे आजोबा मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मते अशा चळवळींमुळे समाज बिघडतो. पण मिस्टर हॅडलेंचे मत उलटे होते. ते म्हणत, हे सगळे बऱ्यासाठीच चालले आहे. उद्योगधंदे, यंत्रे वाईट नाहीत; त्यांच्यामुळे माणूस रगडला जाणार नाही, एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे. माणसांनी जर यंत्रांना आपल्यावर स्वार होऊ दिले, तर भाषणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य यांचा उपयोग काय?

आजोबांना हे बोलणे मुळीच पसंत नव्हते, पण मला मात्र मिस्टर हॅडलेंचे म्हणणे पटे. कारण पुष्कळशा गोष्टी मी वाचल्या होत्या. शिवाय अगदी आमच्याच शेजारी स्वातंत्र्य गमावून बसलेली दोन माणसे माझ्या पाहण्यात आली. हे घडले ते आजोबांच्या पायामुळे.

- (पूर्वार्ध समाप्त) -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ८७-९१.

       << उत्तरार्ध

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---


हे वाचले का?

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा

मंतरलेले बेट

मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ (पुन्हा एकदा ढापले गेल्याने) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले.

मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी (पुढे २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धराशायी झालेले सुप्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ जिथे उभे होते त्या) मॅनहटन बेटावरील एका लहान मुलाने आपल्या आयुष्यासंबंधी केलेल्या स्मरण-नोंदी (memoirs) असे त्याचे स्वरूप आहे.

सहज म्हणून वाचता वाचता असे ध्यानात आले की नोंद घेणार्‍याचे वय हा महत्त्वाचा, दखलपात्र मुद्दा आहे तसेच तो कालखंडही. हा कालखंड कालगणनेनुसार जसा एक महत्त्वाचा टप्पा आहे तसेच अमेरिकेच्या इतिहासाच्या दृष्टीनेही. सामाजिक, आर्थिक नि राजकीय अशा तीनही आघाड्यांवर या कालखंडात मोठी उलथापालथ घडून आली. त्या घटनेचा साक्षीदार असलेला हा मुलगा या बदलत्या काळाच्या नोंदी समोर ठेवतो आहे. लेखनाच्या वेळी वय नि अनुभवाने अधिक पुढे सरकलेल्या मॅन्युअलच्या भाषेचे नि दृष्टिकोनाचे अस्तर जरी त्याला चिकटलेले दिसत असले, तरी त्याने घेतलेल्या नोंदी नि त्यांची केलेली टिपणे महत्त्वपूर्ण अशीच आहेत.

एकोणीसावे शतक अस्तंगत होत असतानाचा हा काळ आहे. या शतकाच्या अखेरीस नियतीवादी, पारलौकिकवादी भयभीत होऊन जगबुडीच्या भाकितांचे हाकारे उठवत शिकारीच्या कळपासारखे स्वत:च भयभीत होऊन सैरावैरा धावत होते, इतरांच्याही मनात भीतीची रुजवणूक करत होते. दुसरीकडे औद्योगिक क्रांतीचा वेग वाढलेला असल्याने भौतिक आयुष्यात वेगाने बदल घडत होते. मेणबत्त्यांची जागा गॅसबत्त्यांनी घेतली होती, तारेमार्फत येणार्‍या विजेचे जाळे विणले जात होते. घोडागाड्या अस्तंगत होऊन मोटार कार्सचा बोलबाला सुरू झाल्याने रस्त्यावर घोड्याच्या लीदीऐवजी जाळलेल्या पेट्रोलियम इंधनांचा वास अधिक प्रकर्षाने जाणवू लागला होता.

राजकीय पातळीवर पाहिले तर क्यूबाच्या प्रश्नावर स्पेनने अमेरिकेशी संघर्ष उभा केला होता. आशिया, आफ्रिका खंडांतून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रिटनच्या, चीनच्या, रशियाच्या राजेरजवाड्यांच्या साम्राज्यांना हादरे बसू लागले होते. अशा काळात, एका घटस्फोटित आई-बापांचा, न्यूयॉर्कमधील केवळ दुसर्‍याच वकील स्त्रीचा हा आठ-दहा वर्षांचा मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहताना अनुभवलेल्या या संक्रमणाचे आपल्या बुद्धीने झालेले आकलन नोंदवत जातो आहे.

मागील शतकात झालेल्या फ्रेंच क्रांतीनंतर ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना मूळ धरू लागली होती. जगण्यातील विविध पैलूंमध्ये तिचे प्रतिबिंब कसे पडते, तिची कोणती अनुषंगे प्रकर्षाने दिसतात याचा मागोवा घेतला जात होता. सैद्धांतिक पातळीवर जरी ‘कशापासून स्वातंत्र्य’ नि ’कशाचे स्वातंत्र्य’ या दोनच पैलूंचा विचार होत असला तरी व्यावहारिक पातळीवर तिचे अनेक पदर तपासले जात होते. राजकीय स्वातंत्र्य हस्तगत केलेल्या अमेरिकेमध्ये आता आर्थिक स्वातंत्र्याची वाट महामार्गाला येऊन मिळाली होती. ‘जुन्या वाटेवरचे सारेच पांथस्थ या महामार्गाची वाट चालू शकतात, की काही मूठभरांनी या महामार्गांवर टोल नाकी उभारून विकासाची गंगा केवळ आपल्याच वावरात वळवून नेली आहे?’ असा प्रश्न सामान्यांना पडू लागला होता.(हा प्रश्न सनातन आहे, तो कधीच कालबाह्य होणार नाही.)

या कादंबरीमध्ये ‘स्वातंत्र्य’ याच शीर्षकाचे एक प्रकरण आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचे माहेरघर मानल्या गेलेल्या देशातील व्यवस्थेला स्वार्थलोलुप भांडवलशहांनी बटीक केले असल्याचा हा काळ आहे. काही स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींनी चिकाटीने ही काळी बाजू प्रकाशात आणली होती. त्याच वेळी अमेरिकेला सामान्यांबद्दल कळकळ असलेला एक नेता लाभल्यामुळेच तिला ‘कम्युनिस्टांचा कावा’ अथवा ‘देशद्रोही लोकांचे कटकारस्थान’ म्हणून झटकून न टाकता त्या मोकाट भांडवलशाहीवर अंकुश निर्माण करण्यात आले. त्यातून कागदोपत्री असणारे आर्थिक स्वातंत्र्य सर्वसामान्यांच्या दारी येऊ शकले.

आज एकविसाव्या शतकात अमेरिकाच काय परंतु भारतासारख्या देशांतही अर्थव्यवस्था ही सामान्यांची काळजी करण्यापेक्षा उद्योगव्यावसायिकांचीच बटीक होऊन राहिली आहे. अमेरिकेला लाभला तसा रुझवेल्ट आपल्या देशात कुठे दिसत नाही. एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासाची व्याख्याही रुझवेल्टपेक्षा एखाद्या निक्सन, बुश वा ट्रूमनच्या व्याख्येशी अधिक मिळतीजुळती आहे.

माध्यमस्फोटानंतर जग जवळ आल्यानंतर सर्वसामान्य माणसेही मूलभूत गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था मागण्याऐवजी महासत्ता मागू लागली आहेत. नि ती देईन असे आश्वासन देणार्‍या कुण्याही हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यासमोर मान नि खांदे झुकवून उभी राहू लागली आहे. सामान्यांच्या गरजा कोणत्या हे ही भांडवलशाही माध्यमेच सांगू लागली आहेत. अर्धपोटी जनतेला आपल्या मेंदूवरचे अदृश्य साखळदंड जाणवतही नाहीत अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार नि निवारा या मूलभूत गरजांपेक्षा महासत्ता, धर्मवर्चस्व, वंशवाद हे जनतेच्या मनात अधिक प्रकर्षाने उमटणारे मुद्दे आहेत. तंत्रज्ञानामार्फत आलेली मनोरंजनाची भूल माणसाच्या विचाराला वास्तव पाहूच देत नाही अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थेला पवित्र (sacrosanct) न मानता तिला जाब विचारणार्‍यांची संख्या नगण्य आहे. जे आहेत ते समाजाच्या दृष्टीने शत्रू ठरत आहेत. व्यवस्था आपल्यासाठी आहे, आपण तिच्यासाठी नव्हे याचे भान हरवलेले लोक व्यवस्थेमार्फत काहीतरी अचाट चमत्कार घडून त्या मार्फत आपले सारे दैन्य दूर होईल अशा आशाळभूत आशेने तिच्यावर आंधळी निष्ठा ठेवून आहेत. तर धनदांडगे त्या व्यवस्थेला पायतळी ठेवून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण मुळातून वाचायला हवे.

- oOo -

संबंधित लेखन:
स्वातंत्र्य या मुद्द्यावर या नोंदींमध्ये जे सापडते त्यातून एक प्रातिनिधिक वेचा निवडण्याची इच्छा होती. परंतु त्याची व्याप्ती नि विषय ध्यानात घेता असा वेचा सापडू शकला नाही. मग उलट दिशेने ‘काय वगळता येईल?’ असा विचार करून पाहिला. त्यातही फारसे काही सापडले नाही. अगदी थोडा भाग वगळून शिल्लक राहिलेला लेख दोन भागांत पोस्ट करायचे ठरवले. एकाचे दोन भाग करताना आणखी काही भाग वगळता आला. आता हे दोन भाग मिळून एक दृष्टिकोन मांडतात असे मला वाटते.

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती >>
---


हे वाचले का?