सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ’पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला.

YouAreNotOneOfUs

निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्‍यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात.

एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घालणार्‍या सेना, ब्रिगेड वा संघटनांचा गल्ली-बोळांत ढेकणांसारखा बुजबुजाट झालेला दिसतो. माध्यमेही त्यांच्या त्या अस्मितेच्या गळूला, त्या नकारात्मतेला मूळ कलाकृतीपेक्षा अधिक वाव देणारी आहेत. ’हिंद देशके निवासी सभी जन एक है’ वगैरे म्हटले तरी माझे कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझी ओसाडवाडी, माझी भकासगल्ली जग्गात भारी आहे असा बहुतेकांचा समज असतो... आणि ’आपला तो नाही’ हा गैरसमजही असतो.

पहिल्या लेखांकाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या प्रतिज्ञेमधील "सारे भारतीय माझे बांधव आहेत." आणि "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे." हे भारतीय नागरिक केव्हाच विसरले आहेत. ’माझ्या धर्माचे, माझ्या जातीचे, माझ्या उपजातीचे, माझ्या गावाचे लोक, माझ्या -धार्मिक वा राजकीय- बुवाचे स्वयंघोषित अनुयायी वा मानसिक गुलाम हेच फक्त माझे भाईबंद आहेत’ अशी नवी प्रार्थना चॅनेल्सवरुन, भाट छपाई माध्यमांतून, व्हॉट्सअ‍ॅपवरुन घोकून घेतली जात आहे. भरीला याची कणभरही लाज वाटू देऊ नका असे बिनदिक्कतपणे सांगणारे नेते पैशाला पासरी झाले आहेत.

विडंबनकार रामदास फुटाणे यांनी आसपासची ढासळती राजकीय नि आर्थिक नैतिकता, उग्र होत जाणार्‍या धार्मिक, जातीय अस्मिता आणि विखंडित होत जाणार्‍या समाजावर भाष्य करताना या प्रतिज्ञेचे विडंबन केले होते.

-: भारत कधी कधी माझा देश आहे :-

भारत कधी कधी माझा देश आहे.
आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. 
माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 
त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. 
माझ्या जातीचा,माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे...
माझा देश माझा खाऊ आहे. 
खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताची जुंपणार आहे. 
जुंपल्या नंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. 
पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील.
 
त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील... 
खुर्चीवर बगळे बसतील. 
पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ, "हम सब एक है, 
हिंदू-मुस्लीम भाई भाई,
हिंदू-सिख भाई भाई, 
हिंदू-इसाई भाई भाई, 
हिंदू-बौद्ध भाई भाई, 
हिंदू-जैन भाई भाई 
जमलेच तर... हिंदू-हिंदू सुद्धा भाई भाई".
 
तोपर्यंत मित्रानो मला माझ्याच स्वातंत्र्याची तहान आहे
या देशापेक्षा मीच महान आहे.
मी माझ्यासाठीच जगतो, 
मी माझ्यासाठीच मरतो. 
आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो.
 
तेव्हा- 
माझा जयजयकार असो, 
माझ्या धर्माचा जयजयकार असो, 
माझ्या पंथाचा जयजयकार असो,
माझ्या प्रांताचा जयजयकार असो. 
झालाच तर... कधी कधी... 
माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.

- रामदास फुटाणे
 

- oOo -

साधारण दोन-तीन दशकापूर्वीपर्यंत ’राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द परवलीचा होता. आता त्याची जागा ’राष्ट्रभक्ती’ या शब्दाने घेतली आहे. दोन्हींत महत्वाचा फरक आहे. पहिल्यामध्ये परस्पर-बांधिलकी आहे, तर दुसर्‍यामध्ये केवळ समान आदर्शापुढे झुकणारी भक्ती आहे. त्या भक्ति-विषयाची ठेकेदारी बळकावणारे तिचे पौरोहित्य करून सामान्यांनी तिच्या चरणी अर्पण केलेला मलिदा ओरपत आहेत. आणि जे झुकत नाहीत त्यांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद-छद्म-झुंड आदि सर्व वैध-अवैध मार्गानी ही खुजी मंडळी आपली उंची वाढल्याचा आभास निर्माण करत आहेत.

बांधिलकीची अपेक्षा आता निष्ठेच्या अपेक्षेत रूपांतरित झाली आहे. आणि निष्ठेला, अस्मितेला छेद देण्यासाठी मग जातीय अस्मितेची विषवल्लीही वेगाने वाढू लागली आहे. माणसांना बांधिलकी ऐवजी अस्मिता, द्वेष यांचा आधार घ्यावासा वाटतो आहे. देशाची, देशप्रेमाची उभारणी ही बांधिलकीपेक्षा द्वेषावर अधिक होते आहे. यातील विसंगती समजून घेण्याची बहुतेकांची इच्छा नाही नि कुवतही. माणसे मानसिकदृष्ट्या एका बाजूने भीती आणि ती दडपण्यासाठी आवंतून आणलेल्या अभिनिवेशी त्वेषाने इतकी भारली आहेत, की सर्वांचे आदर्श हळूहळू रचनात्मक कृती करणार्‍यांपेक्षा प्रासंगिक शूरवीरांकडे अधिक सरकले आहेत.

डॉ. आंबेडकरांसारखा चतुरस्र बुद्धिमान माणूस शोषित वर्गाला पुरेसा वाटत नाही. त्यांच्या ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ या सशक्त दृष्टिकोनापेक्षा प्रासंगिक, कर्मकांडसदृश विद्रोह त्यांना अधिक आकर्षक वाटतो. त्यासाठी इतिहासातून आपले शूरवीर उचलण्याची गरज वाटते. इतर जातींनीही आप-आपल्या जातीतील संतांचे बोट सोडून इतिहास खंगाळून आपापले वीर शोधून काढले आहेत. धनगरांच्या कार्यक्रमांतून सर्वकल्याणकारी अहिल्याबाईंची जागा हळूहळू रणझुंजार मल्हाररावांनी घेतली.

फार कशाला, प्राचीन कालापासून स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणार्‍या ब्राह्मणांनीही आपल्या संघटनेचा आदर्श म्हणून त्या जातीतील असंख्य बुद्धिमंताऐवजी क्षत्रिय-निर्दालक परशुराम निवडला. त्यामागे प्राचीनतेचा अट्टाहास तर आहेच, त्याचबरोबर याला ब्राह्मण जातीअंतर्गत कोकणस्थांचा वरचष्मा स्थापन करण्याचा मार्ग (कोकणस्थ-> कोकण-> अपरांत-> निर्माता-> परशुराम अशा बादरायण संबंधाने) म्हणूनही पाहता येते. म्हणजे गटातल्या गटातही उपगटांची कुरघोडीही कमी नसते. माणसे बुद्धिला, रचनात्मक, निर्मितीक्षम कामांपेक्षा, अस्मितेला, त्यांच्या झेंड्यांना, सतत भावना दुखावण्याला, इतर गटांवर दात धरून राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत.

कोरोनासारख्या अभूतपूर्व आणिबाणीच्या काळातही कोणतीही नवी माहिती, नवी घटना ही कायम अस्मिता-द्वेषांच्या चष्म्यातून पाहिली जात होती. केंद्राचे काम चांगले, राज्याचे वाईट आणि पुन्हा मनपाचे चांगले असे एका गटाचे मत होते. तर उलट बाजूच्या मंडळींच्या दृष्टिने केंद्रातील सरकारचे वाईट, राज्यातले काम चांगले नि मनपाचे पुन्हा वाईट अशी भूमिका होती. गटाशी बांधिलकी राखण्यासाठी तर्काच्या अशा माकडउड्या मारल्या जातात.

बरं या विधानांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसतो. आपल्या बाजूच्या विरोधकांवर आग ओकणे, शक्य त्या माध्यमांतून जळजळीत द्वेष पसरवणे, इतकेच ’माझे देशबांधव’ आता करु लागले आहे. माणसे बुद्धीचा कमीतकमी वापर करुन केवळ अस्मिता-द्वेषांच्या पार्ट्या पाडून खेळ खेळू लागली आहेत. याला व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुकसारख्या माध्यमांतून निरर्गलपणे होणारा स्वार्थानुकूल अफवांचा संघटित प्रसार भरपूर हातभार लावतो.

LetsFightYouAndME

समाजकारणाने नि राजकारणाने जसे या विघटनवादाला खतपाणी घातले, तसेच भांडवलशाहीने आणलेल्या धंदेवाईकतेनेही. चॅनेलवर साधकबाधक चर्चा होण्यापेक्षा शाब्दिक लठ्ठालठ्ठी झालेली त्यांच्या मालकांना हवी असते. कारण मग तो व्हिडिओ समाजमाध्यमांतून फिरतो. त्याला त्या चॅनेलच्या वेबसाईटवर वा यू-ट्यूब चॅनेलवर भरपूर हिट्स मिळतात. आणि इंटरनेटच्या जमान्यात हिट्स/क्लिक्स = पैसा हे गणित असल्याने मालक खुश होतात. साधकबाधक, विषयाला धरुन पण उद्बोधक चर्चा झाली तर त्यातून चॅनेल मालकांना पैसा मिळत नाही. म्हणून चर्चेमध्ये अद्वातद्वा बोलणारे, एकमेकांवर हेत्वारोप करणारे वगैरे चर्चक अधिक प्रेमाने बोलावले जातात. ’आमच्या बाजूच्याने विरोधी बाजूच्या चर्चकाची आरडाओरडा करुन बोलती कशी बंद केली’ म्हणून खुश होत अल्पबुद्धी समाजमाध्यमी तो व्हिडिओ ’व्हायरल’ करतात.

हे पुरेसे नसते म्हणून चर्चेचे पक्षपाती सूत्रसंचालक कोणत्या बाजूला टीआरपी अधिक मिळेल (आणि त्यांचे मालक कुण्या पक्षाकडून अधिक मलिदा मिळेल) याचा अंदाज घेऊन ती बाजू घेऊन लढतात. स्वत:च बोलावून आणलेल्या विरोधी मुद्दे मांडणार्‍यांचा अपमान करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात. त्यांना दूषणे देणार्‍या अन्य सहभागी चर्चकांच्या उद्धटपणाकडे काणाडोळा करुन ती बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरतात.

चर्चांपलिकडे अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमातही गुणवत्ता अथवा सर्जनशीलतेपेक्षाही ’खपाऊ’ मालालाच प्राधान्य असते. त्यातून माध्यमे लोकानुनयी होतात. खासगी माध्यमे ’आम्हाला कुठे यातून पैसा मिळतो? आम्ही हे का करावे? हे आमचे काम नाही, कारण आम्ही व्यावसायिक आहोत, नफा मिळवणे हे आमचे एक आणि एकच साध्य आहे. त्यापलिकडे समाजाचे आम्ही काहीही देणे लागत नाही.’ अशी भूमिका घेऊन उभी असतात. यातून बहुसंख्येच्या मनोरंजनाच्या संकल्पनेत न बसणारे विषय बाद होऊन जातात. जिथे विज्ञानासारख्या आवश्यक विषयाला कणभर जागा मिळत नाही, तिथे समाजहिताची भूमिका घेऊन केलेल्या प्रबोधनप्रधान कार्यक्रमांची उत्तरक्रिया केव्हाच होऊन गेली आहे.

तीन-चार दशकांपूर्वी चॅनेलमाध्यमांचा सुळसुळाट होण्यापूर्वी ’दूरदर्शन’ हे शासन-संचालित एकमेव चॅनेल कार्यरत होते. त्याची आर्थिक बाजू शासनाने सांभाळलेली असल्याने म्हणा की मिळू शकणारा शेवटचा पैसाही प्रेक्षकाकडून वसूल केला पाहिजे असा बाणा घेऊन जन्मलेली मॅनेजमेंट नावाच्या सर्वविषय-अर्धशिक्षित आणि स्वयंघोषित सर्वज्ञ जमात उदयाला आलेली नसल्याने कार्यक्रमांचे विषय, दिशा आणि मांडणी ही अद्याप सर्जनशील व्यक्तींच्या हाती होती.

त्याचबरोबर शासकीय मालकी असल्याने शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसारही त्यातून होत असे. प्रबोधन-प्रचार-मनोरंजन अशा तीनही प्रकारांना त्यात समान महत्व होते. पंचवार्षिक योजनेतील धोरणांबद्दल, तिच्या यशाबद्दल प्रचार होत होता, तसेच कुटुंब-नियोजनासंबंधी जनजागृती करण्यासाठी लाल-त्रिकोण, सर्वशिक्षा अभियान यांसारख्या जनहिताच्या योजनांबद्दल करमणुकींच्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच प्रबोधनाचे कार्यही केले जात होते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात त्याचा विध्वंस न करता आपण सारे सहप्रवासी आहोत ही भावना ’राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेच्या आधारे रुजवण्याचा प्रयत्न केला जात असे.

’मिले सुर मेरा तुम्हारा’, ’सौ रागिनियोंसे सजा भारत’ किंवा ’सारा ’भारत ये कहे’ सारखी गाणी सादर करण्याची ना शासनाला गरज वाटते ना जनतेला. व्यावसायिकांनी तर ’यात नफा नाही’ या नावाखाली केव्हाच हात वर केले आहेत. कुणी पदरमोड करुन कुणी केलीच, तरी तरी तिला प्रस्थापित माध्यम मिळत नाही. आणि मिळालीच, तर गणपतीबाप्पासमोरच किंवा कृष्णभक्तीचा आव आणत ’चिकनी चमेली’ किंवा ’जलेबीबाई’बरोबर नाचण्यात धुंद झालेल्या प्रेक्षकांचे त्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही.

यात भर म्हणून अगम्यताप्रेमी, उन्नतनासिका समीक्षक अशा लघुपटांना, गीतांना ’प्रचारकी’ म्हणून नाके मुरडू लागतात. आणि त्यांच्या पारंब्यांना लटकून कणभर सरस सामाजिक स्थान मिळवून सामान्यांपेक्षा अर्धी पायरी वर राहण्याची धडपड करणारे त्यांचे भाट त्यांची री ओढत तो समज पसरवण्याचे काम जोमाने करत राहतात.

राष्ट्रभक्तीची संकल्पना आणि म्हणून राजकारण, सामाजिक विचार, एवढेच काय कलासमीक्षाही शत्रूलक्ष्यी होत गेली आहे. काय स्वीकारार्ह यापेक्षा काय त्याज्य याची चर्चा अधिक करु लागली आहे. याला अर्थातच अनियंत्रित माध्यमांचा सुळसुळाट हे एक कारण आहे. कोणतीही जबाबदारी न घेता बेफाट विधाने करणे आता सोपे झाले आहे. अशा बेफाट बेमुर्वत विधानांचे पीक प्रचंड वेगाने नि व्याप्तीने वाढते आहे. त्याला आव्हान देऊन त्यातील फोलपणा सिद्ध करताना साधकबाधक विचार करु शकणार्‍या, तारतम्याला अजूनही तिलांजली न दिलेल्यांची दमछाक होते आहे. यातून काही जण सरळ विचार बंद करुन ’मुख्य धारेत’ प्रवेश करुन त्या प्रवाहाबरोबर वाहात जाणे पसंत करु लागले आहेत.

एखादा बागुलबुवा तयार करुन त्याच्या विरोधात आपला एक गट तयार करणे याला आता प्राधान्य मिळू लागले आहे. राष्ट्रवादी विचार तर बांधिलकीला संपूर्ण त्यागून केवळ शत्रूलक्ष्यी मांडणी करणार्‍यांनी अपहृत केलेला आहे. आणि त्यांचे विरोधक 'त्यांना विरोध की राष्ट्रवाद या संकल्पनेला विरोध' या संभ्रमात भरकटत चालले आहेत.

अगदी सामाजिक न्यायाचा विचार करणारेही असाच विचार करु लागले आहेत. ’त्यांच्या’ व्यासपीठावर जायचे नाही हा अलिखित नियम तर झालाच आहे, पण बहुतेक वेळा आपल्याशी एकमत असलेल्या एखाद्याने जरा न पटणारे मत मांडले, की लगेच ’तो छुपा तिकडचा’ म्हणून त्याला पलीकडे ढकलण्याची त्यांची अहमहमिका एकुण समाजाच्या हिताची तर नाहीच, पण आपलेच वर्तुळ आपल्या सोयीचे लहान करत नेणारी आहे. "पुण्यात शुक्रवारातले पुरोगामी नारायणपेठेतल्या पुरोगाम्यांच्या वार्‍याला उभे राहात नाहीत, आणि नव्या पेठेतले पुरोगामी या दोघांना हाताच्या अंतरावर ठेवत असतात" असे मी गंमतीने म्हणत असतो.

प्रत्येक जाती/धर्म/गट/प्रदेश यांतील एकांगी मतांचे अनेक लोक प्रबळ होऊ लागले आहेत. ते त्या त्या गटाचे नेतृत्व बळकावून बसले आहेत. यातील ब्राह्मणांच्या मते देशाची दुरवस्था ही ’साल्या आरक्षणवाल्यां’मुळे किंवा आमच्या गुणवत्तेला डावलून पुढे जाणार्‍या ’फुकट्यां’मुळे आहे. पोरवडा वाढवून हे लोक बहुमताच्या आधारे आम्हा अल्पसंख्यांकांची मुस्कटदाबी करतात अशी यांची तक्रार असते. त्यामुळे बहुमताला झुगारुन उभी राहणारी हुकूमशाही यांची लाडकी असते. सत्तर वर्षे लोकशाही रुजलेल्या देशात हुकूमशाहीच्या अनुभवाअभावी तिचा अर्थ समजण्याइतकी समज त्यांच्याच विकसित झालेली नाही. नव्या व्यवस्थेमध्ये गुणवत्ते(?)नुसार ’आपले’ राज्य येईल अशी यांना भाबडी आशा असते.

म्हणून महाराष्ट्रात फडणवीस मुखमंत्री होताच मनातल्या मनात ’आनंद पोटात माझ्या माईना’ गात गात ’राज्याला प्रथमच णला ण म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला’ असे विधान हे लोक समाजमाध्यमातून फिरवू लागतात. आणि असा तद्दन खोटा दावा करताना, बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान आणि नंतर मुख्यमंत्री, तर सेनेचे मनोहर जोशी हे युतीचे मुख्यमंत्री होते हे सोयीस्कररित्या विसरून जातात. कारण त्यातही पुन्हा खेर काँग्रेसचे नि जोशी सेनेचे; त्या तुलनेत भाजप/संघ अधिक शुद्ध धारेतला ब्राह्मणी असल्याने त्यांच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक अधिक हे ओघाने आले.

उलट दिशेने आंबेडकरी म्हणवणार्‍यांतील एकांगी मंडळींच्या मत ’हे सारे ब्राह्मणांचे (पाठभेद: ब्राह्मण्यवादाचे) पाप आहे'. एका आंबेडकरी विचारवंताने तिच्या एका लेखाची सुरुवातच मुळी ’देशात जे जे सगळे वाईट आहे ते ब्राह्मण्यवादाचे आहे असे मानले जाते’ या विधानाने केलेली माझ्या वाचण्यात आली आणि मी गार पडलो होतो. संगणकावर प्रोग्रामिंग करणार्‍यांना ’गार्बेज कलेक्टर’ नावाची संकल्पना माहित असेल. संगणकाच्या स्मरणमंजुषेचा कोणत्याही प्रोग्राम/ प्रणालीला नको असलेला, टाकाऊ भाग हा गार्बेज कलेक्टरमध्ये सामावला जातो. ब्राह्मण्य/ब्राह्मण हे असे गार्बेज कलेक्टर आहेत अशीच तिची व्याख्या दिसली.

थोडक्यात ब्राह्मण्यवाद- कंसात ब्राह्मण- हे सार्‍या पापाचे मूळ आहेत असा यांचा दावा आहे. ’पूर्वी अस्पृश्य म्हटले गेलेले पददलित हे नरकाची खाण, मागील जन्मातील अध:पतित’ असे म्हणणार्‍या ब्राह्मणी अतिरेकी दाव्यातील दुराग्रही एकांगीपणाशी मला याचे साधर्म्य दिसते. पण यापैकी कुणालाही सांगायला गेलात तर एकमेकांकडे बोट दाखवून ’त्यांना आधी सांगा’ म्हणून झटकून टाकले जाईल याची खात्री बाळगा.

त्याचप्रमाणे मुस्लिम अतिरेकी व्यक्तींची मानसिकता ’पूर्वी आम्ही सत्ताधारी जमात होतो. त्यामुळे हिंदू ही गुलाम नि आम्ही सत्ताधारी जमात आहोत. फक्त इस्लामच्या तत्वांचे तंतोतंत पालन केले की आम्ही पुन्हा त्या वैभवशाली भूतकाळात होतो तसे सत्ताधारी होऊ’ अशी आहे. हा समज ’आम्ही भूतकाळात कधीतरी जगाचे राजे होतो आणि ही साली लोकशाही जाऊन (अन्य जातींपेक्षा आम्ही बुद्धिमान या अहंकारातून) बुद्धिमंतांची म्हणजे ’आमची’ हुकूमशाही केव्हा येईल' याकडे डोळे लावून बसलेल्या ब्राह्मणांच्या समजाइतकाच भाबडा नि हास्यास्पद आहे. हिंदुत्ववाद्यांनी जसा आपला अतिरेकी विचार एकुण हिंदू समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, तसाच  मुस्लिमधर्मीय माथेफिरुंनी त्यांच्याही आधी तो सामान्य मुस्लिमांत रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

’एक व्यक्ती एक मत’ तत्वावरील लोकशाही प्रस्थापित झाल्यावर मोजक्या ठिकाणी असलेले ब्राह्मण प्राबल्य वगळता सर्वत्र त्या त्या राज्यातील क्षत्रिय/शेतकरी जमातींनी राजकीय आणि म्हणून आर्थिक (आणि उलटही) वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पूर्वीच्या ब्राह्मण वा मुस्लिमांप्रमाणेच ’आता आपण कायमस्वरुपी सत्ताधारी जमात झालो आहोत’ असा समज त्यांच्यातही प्रबळ होऊ लागला. केशवसुतांच्या ’आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?’ या कवितेच्या चालीवर "आम्ही कोण म्हणुनि काय पुसता, आम्ही नेते सर्वांचे । देवाने दिधले असे भोगव्य सारे आमुच्याच गोतावळ्या॥" असा या क्षत्रिय म्हणवणार्‍या जमातींचा समज होऊ लागला होता.

पण ब्रिटिश सत्तेच्या काळात उद्योगधंदे आणि बूर्ज्वा रोजगाराला चालना मिळाली. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यावर सेवाक्षेत्राने मोठी झेप घेतली. त्यातून अर्थकारणातला शेतीचा हिस्सा कमी होत गेला. शिवाय पिढ्यान्‌ पिढ्या त्यांच्या जमिनी विभाजित होत गेल्यामुळेही त्यांच्या आर्थिक आणि पर्यायाने राजकीय सत्तेचा आधार असलेला शेती-व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होऊ लागला.

त्याचवेळी 'शिक्षण, आरक्षण आणि रोजगार यातून आलेले आर्थिक स्थैर्य वा प्रस्थापित झालेले सामाजिक स्थान यामार्गे तथाकथित खालच्या जमाती आपल्या मांडीला मांडी लावून बसू लागल्या आहेत नि सर्वच क्षेत्रातील आपला वाटा कमी होत चालला आहे' हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले, तेव्हा विविध राज्यांतून या जमातींनी तो वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून सर्वत्र आर्थिक, राजकीय आरक्षणाची मागणी सुरु झाली आहे. राजस्थानात गुर्जर, पंजाब/हरयानामध्ये जाट आणि महाराष्ट्रामध्ये मराठा या जमातींची आंदोलने यातूनच उभी राहिली आहेत.

विभागणीच्या धर्म वा जात या रेषाही पुरेशा न वाटून गाव/शहर/शिक्षणसंस्था यांच्या आधारेही गट पाडले जातात. कोणत्याही वस्तुनिष्ठ, संख्याशास्त्रीय पुराव्याखेरीज प्रत्येक गटाचे अध्याहृत असे गुण नि अवगुण मानून त्या आधारे शाब्दिक लढाया नि माफक राजकारणही केले जाते. हे सारे गट-धार्जिणे अतिरेकी नेहमीच ’त्यांना सांगा की’ या हुकमी तर्काचा आधार घेतात. जोवर समोरच्या गटात अतिरेकी विचाराची वा अन्य-गट-द्वेष्टी एक तरी व्यक्ती दाखवता येते, तोवर तीच त्या गटाची प्रातिनिधिक असल्याची मखलाशी करत ते आपल्या अतिरेकी मानसिकतेचे समर्थन करत राहतात.

या सार्‍या जात/धर्म अस्मितेच्या मंडळींना नाके मुरडणारे नि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारेही यांच्याहून वेगळे नाहीत. हिंदुत्ववाद्यांच्या मते मुस्लिम देशाच्या सर्व सामाजिक समस्यांचे (आणि राजकीय पातळीवर काँग्रेस) मूळ आहे, ब्राह्मणांच्या मते ’आरक्षण’ आणि ते लाटणारे ’फुकटे’ हे देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे, स्वयंघोषित शोषितांचे ठेकेदार म्हणतात, ’ब्राह्मण्य (मनात: ब्राह्मण) हे सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे गुन्हेगार’... तसेच अनेक पुरोगामी मंडळी ’मध्यमवर्ग’ (म्हणजे कोण?) हा सर्व समस्यांचे मूळ मानतो. कुठलाही कार्यकारणभाव दाखवता येत नसला तरीही या वर्गाला ओढून आणून त्यावर खापर फोडत बसतात. यात डाव्या म्हणवणार्‍यांचा समावेश अधिक आहे.

मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक गट आपापले पारलौकिक तसंच भौतिक देवबाप्पा शोधत असतो आणि सोबतीला त्याच्या भलामणीसाठी सार्‍या पापांची कचरापेटी म्हणून वापरता येईल असा एक तथाकथित सैतानही शोधून ठेवत असतो. मग त्यांचे सारे विचार ’चांगले सारे बाप्पाचे, वाईट सारे सैतानाचे’ या सोप्या निवाड्याभोवती फिरत राहतात. त्या संकुचित विचारवर्तुळाच्या बाहेर जाण्याची गरज त्यांना वाटेनाशी होते. त्यांच्या जगण्याला तेवढे पुरेसे असते.

कोणत्याच समाजगटात सर्वच व्यक्ती सर्वस्वी निर्दोष असणे अशक्य आहे हे उघड आहेच. शिवाय मुळात दोष कशाला म्हणावे यातही प्रचंड सापेक्षता असते. ’आमच्या गटावर अन्याय केला’ हे गृहितकही समोरच्या गट वा व्यक्तिचा दोष म्हणून जाहीर करता येतेच. थोडक्यात परस्परविरोधी अतिरेकी हे ’एकमेका साह्य करु’ भूमिकेतच असतात. त्यांना एकमेकांची मदतच होत असते. महाभारतातही दुर्योधन पांडवांकडे बोट दाखवून शंभर कौरवांची एकता राखू शकला आहे. एरवी नव्व्याण्णव बंधू असता कुरु साम्राज्य अखंड राखणे त्याला अशक्यच होते. आता राष्ट्रीय एकात्मतेसारख्या व्यापक बांधिलकीऐवजी लहान गट करुन त्या गटापुरती अस्मितेची मोट बांधणे लोक अधिक पसंत करतात, आणि त्या गटाच्या आधारे बार्गेनिंग करुन राजकीय, आर्थिक तसंच सामाजिक सत्तेमधील आपापला चिमुकला वाटा हस्तगत करुन स्वत:ला धन्य समजत असतात.

अस्मिता अर्थात आयडेंटिटी ही एकाच वेळी समावेशक (inclusive) आणि विभाजक(exclusive) हवी असते. त्यातून आपला ’देवतुल्य’ पक्ष आणि ’त्यांचा’ राक्षसपक्ष अशी सोपी विभागणी करता येते, ज्यातून कुणाच्या हाती हात द्यायचा नि कुणाच्या 'माथा हाणू काठी' करायचे हे अनायासे निश्चित होऊन जाती. त्यामुळे राष्ट्रवादातील राष्ट्रीय एकात्मतेची हाक असो वा मार्क्सवाद्यांची जागतिक बंधुभावाची हाक असो, सर्वसामान्यांना ती पुरेशी वाटत नसते. म्हणून मग कम्युनिस्ट म्हणवणारेही कळीच्या मुद्द्यांवर आपापल्या जातींच्या वळचणीला गेलेले दिसतात. तसंच ’हिंदू सारा एक’ म्हणणारे सामाजिक-आर्थिक पातळीवर मागे राहिलेल्या वा ठेवलेल्या हिंदूंच्या उत्थानाची जबाबदारी न घेता, "आम्ही अधिक लायक म्हणून आम्ही पुढे गेलो" असा दावा करतात. यासाठी हर्बर्ट स्पेन्सरच्या ’सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या एकांगी दाव्याचा आधार घेतात, आणि ज्याचे अखंड कीर्तन ते करत असतात त्या अखंड(!) हिंदू समाजात ’आपण आणि ते’ अशी निर्लज्ज विभागणी करुन ठेवतात.

स्वातंत्र्याच्या व्याख्येमध्ये जसे ’कशाचे स्वातंत्र्य’ या बरोबरच ’कशापासून स्वातंत्र्य’ असे दोन भाग पडतात. त्याच धर्तीवर तसेच अस्मितेच्या, आयडेंटिटीच्या भुकेचे ’आपण कोण’ आणि ’आपल्याहून वेगळे कोण’ असे दोन भाग पडतात. आणि जे आपल्याहून वेगळे ते आपल्याहून मुळातच दुय्यम किंवा दुसर्‍या बाजूने शोषक, किंवा लायकी नसता पुढे गेलेले, असे गृहितक बळावू लागते. थोडक्यात राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेच्या अनुपस्थितीत वेगळेपण हे विभागणीकडे, वैराकडे वाटचाल करू लागते.

या सार्‍या धुमश्चक्रीमध्ये देश हा देव्हार्‍यात ठेवलेला देव म्हणून शिल्लक राहिला आहे. श्रावणात एखाद्या देवाच्या नावे उपवास धरावा तसे किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या श्राद्धाचे पिंड घातल्यासारखे फेसबुक, व्हॉट्स-अ‍ॅप, ट्विटर वगैरे समाजमाध्यमांतून देशभक्तीच्या डरकाळ्यांच्या पिपाण्या वाजवल्या की पुरते. मग देवाला नैवेद्य दाखवून आपापली ताटे वाढायला घ्यावीत तसे आपण स्वत:च्या स्वार्थी आयुष्यात सहज परतून येतो. ’तू मोठा देशभक्त की मी’ या अहमहमिकेतून मग राष्ट्रभक्तीचे जास्तीज जास्त मेसेजेस कोण फॉरवर्ड करतो, कोण सर्वात उंच झेंडा उभारतो, कोण जास्तीत जास्त विरोधकांना राष्ट्रद्रोही म्हणून गुण मिळवतो याची स्पर्धा चालू होते. देशाच्या अवनतीचे खापत अन्य धर्म/जात/राज्य/विभाग यावर फोडून काहीही ठोस कृती न करताही आपला गट आणि पर्यायाने आपण अधिक राष्ट्रभक्त ठरतो असे बहुसंख्येला वाटू लागले आहे.

पण देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्या देशातील समाज, माणसे, संस्कृती, भाषा या सार्‍याचा समुच्चय. जेव्हा त्यातील एखाद्या अनुषंगाचा तुम्ही तिरस्कार करता तेव्हा तुम्ही देशभक्त असूच शकत नाही, भले बारा महिने तुमचा फेसबुक-डीपी तिरंगा दाखवू दे, भले जगातील सर्वात जास्त देशभक्तीपर मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड केलेले असू देत, भले इतर कुणाहीपेक्षा जास्त देशद्रोही तुम्ही शोधून काढलेले असू देत. भले त्याच्यासारखे अनेक जण एकत्र येऊन तशी घोषणा करत असले तरीही ज्याच्या मनात बांधिलली नव्हे तर द्वेष आहे तो देशभक्त असूच शकत नाही.

या परिस्थितीत बदल कसा होणार हे आज सांगणे फार अवघड आहे. जंगलाला लागलेली आग किती पसरेल, किती जिवांचा बळी घेऊन, किती झाडांची राख करुन शांत होईल हे सांगणे जसे अवघड, तसेच हे ही. मुळात आग लागली आहे हेच वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगी नागरिकांना अमान्य असेल, त्यातही आपलाही वाटा आहे हे समजून घेण्यास सर्व गट आणि गटबांधिल व्यक्ती तयार नसतील, तर त्या आगीचे निर्दालन करण्याची सुरुवातही होणे अवघड आहे. अशा वेळी तिच्या अंताचे भविष्य वर्तवणे मूर्खपणाचेच ठरेल.

(समाप्त)

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता  << मागील भाग
---

मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्‍या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्‍या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता.

पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या.

साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट क्षेत्राने सामाजिक विषयांवरील चित्रपटांचे बोट सोडून ’अ‍ॅंग्री यंग मॅन’भोवती कथानके विणायला सुरुवात केली.

सामाजिक चित्रपटांमध्ये पारंपरिक संदर्भात का होईना पण नेमक्या भूमिका असणार्‍या अभिनेत्रींना आता या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ची जोडीदार इतकेच स्थान मिळू लागले. पुस्तकांची जागा नियतकालिकांनी घेतली आणि तिथेही हिंदी चित्रपटसृष्टीतील खमंग गॉसिप्स कोणताही विधिनिषेध न बाळगता विकली जाऊ लागली. हळूहळू हे कृतकवीर तरुणाईचे आदर्श होऊ लागले. मग आता प्रबोधनाचे माध्यमही त्यांना शरण जाणे अपरिहार्य होऊन बसले.

समाजातील मनोरंजनाचे केंद्र दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटांकडे सरकत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवरही उलथापालथ होत होती. मुस्लिम धर्मियांमधील ’तोंडी तलाक’ संदर्भातील मैलाचा दगड मानला गेलेल्या प्रसिद्ध ’शाहबानो खटल्याचा निकाल १९८५ मध्ये आला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा आरोप करत मुस्लिम धर्मियांमधील एका मोठा गटाने आंदोलन सुरू केले. त्या दबावासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ साली संसदेत कायदा करुन या निकालास रद्दबातल केले.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसवरचा ’मुस्लिमधार्जिणेपणाचा’ आरोप अधिक जोरकसपणे करता येऊ लागला. यातून जनमतामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी आजवर धार्मिक, पौराणिक कार्यक्रमांना कटाक्षाने दूर ठेवलेल्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतावर आधारित मालिका दाखवण्याची सूचना राजीव गांधींनी केली. १९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण दूरदर्शनच्या पडद्यावर राज्य करु लागले.

या दोन निर्णयांमुळे दोन्ही धर्मियांमध्ये कट्टरपंथी मंडळींचा वरचष्मा होऊ लागला. आणि त्याला छेद देण्यासाठी एकतेचा घोष ’राष्ट्रीय एकात्मता’ असा बदलून घेण्यात आला. पुन्हा राजीवजींच्याच प्रेरणेने जयदीप समर्थ (प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे बंधू) यांनी हा प्रस्ताव दूरदर्शनकडे नेला. १९८८ साली ’मिले सुर मेरा तुम्हारा’ हा संगीत-पट ’लोकसेवा संचार परिषद’ या सस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. यात प्रथमच मानवी एकतेचा, बांधिलकीचा गजर मर्यादित करुन केवळ ’देशबांधवांच्या एकतेचा’ पुकारा करण्यात आला.

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा

(कॉशुर)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(ਪੰਜਾਬੀ)
ਤੇਰਾ ਸੁਰ ਮਿਲੇ ਮੇਰੇ ਸੁਰ ਦੇ ਨਾਲ
ਮਿਲਕੇ ਬਣੇ ਇਕ ਨਾਵਾਂ ਸੁਰ ਤਾਲ

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

(سنڌي)

معهڳنجو سعر تعهڳنجي ساان پٿاارا مڳلي جادينه
گييت اساانجو مادهعر تاراانو باني تادينه (اُردُو‎)
سر کا دریا بہ کے ساگر میں میل

(ਪੰਜਾਬੀ)
ਬਾਦਲਾਂ ਦਾ ਰੂਪ ਲੈਕੇ
ਬਰਸਾਂ ਹੌਲੇ ਹੌਲੇ

(தமிழ்)
இசைந்தால் நம் இருவரின் சுரமும் நமதாகும்
திசை வேறு ஆனாலும் ஆழிசை ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவதுபோல் இசை...
நம் இசை

(ಕನ್ನಡ)
ನನ್ನ ಧ್ವನಿಗೆ ನಿನ್ನ ಧ್ವನಿಯ,
ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯ

(తెలుగు)
నా స్వరము నీ స్వరము సంగమ్మమై
మన స్వరంగా అవతరించెయ్

(മലയാളം)
എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും
ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി

(বাংলা)
তোমার সুর মোদের সুর
সৃষ্টি করুক ঐক্যসুর (2x)
সৃষ্টি করুক ঐক্যতান

(অসমীয়া)
সৃষ্টি হউক ঐক্যতান

(ଓଡିଆ)
ତୁମ ମୋର ସ୍ୱର ର ମିଲନ
ସୃଷ୍ଟି କରେ ଚାଲୁ ଚତନ

(ગુજરાતી)
મળે સૂર જો તારો મારો
બને આપણો સૂર નિરાળો

(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा (3x)
तो सुर बने हमारा (2x)
---
LyricsTranslate.Com येथून साभार.

या संगीतपटाची संगीत-कल्पना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची होती. भारतीय रागसंगीतामध्ये हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीं संगीतांच्या रागविस्ताराच्या दृष्टिकोनात फरक असला तरी मूळ रागकल्पना कर्नाटक संगीतामधूनच आलेली असल्याने काही रागांमध्ये साम्यही दिसते. या दोन्ही प्रवाहांचे प्रातिनिधित्व करणार्‍या, जिला सदासुहागन रागिणी म्हटले जाते त्या भैरवीला मुख्य आधार म्हणून घेत रागसंगीतामधील इतर काही रांगांच्या छटा अधेमध्ये वापरण्यात आल्या.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यात हिंदी, असमी, तमिल, तेलगु, कश्मीरी, पंजाबी, हरयाणवी, सिन्धी, उर्दू, कन्नड़, मलयालम, बंगाली, उडीया, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांमधली कडवी समाविष्ट करण्यात आली. प्रत्यक्ष पडद्यावर दोन भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि विदुषी लता मंगेशकर यांच्यासह बालमुरली कृष्ण (यांनी गायलेला तुकडा माझ्या मते यातील सर्वोत्कृष्ट म्हणावा लागेल. कितीहि उद्विग्न मनाला शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे), कविता कृष्णमूर्ती यांच्यासारखे गायकांसोबतच जावेद अख्तर, नरेन्द्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय यांच्यासारखे कवीही हजेरी लावून गेले.

वर म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासारख्या तारे-तारकांसह हरीष पटेल, वीरेन्द्र सक्सेना यांच्यासारख्या सहकलाकारांचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकामुळे क्रिकेटचाही सुवर्णकाळ चालू होत होता. त्यातूनही सय्यद किरमाणी, अरुण लाल यांच्यासारखे खेळाडू चमकून गेले. इतर खेळांतूनही काही जणांची निवड केली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि तत्कालिन कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांचाही समावेश केला गेला होता.

२०१० साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ’झूम टीव्ही’ चॅनेलने या संगीतपटाची पुनर्निर्मिती (Redux) केली. त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने याचीच एक आवृत्तीही प्रसारित केली होती. पुढेही वेळोवेळी अनेक गायक नि गायिकांनी या गाण्याला ’कव्हर’ केले आहे. युवा मराठी गायिका आर्या आंबेकर हिने २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी गायलेल्या या गीताचा हा व्हिडिओ.

पुढच्याच वर्षी (१९८९) मध्ये ’बजे सरगम हर तरफ से’ हा आणखी एक संगीत-पट निर्माण करण्यात आला. यात बॉलिवुडी तारकांचा चमचमाट नव्हता. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ मध्ये भारताचे भौगोलिक वैविध्याचे दर्शन प्राधान्याने घडवले होते. ’बजे सरगम’ मध्ये भारतातील विविध संगीत, नृत्य परंपरांचा अंतर्भाव करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला होता. ’मिले सुर...’ ने भैरवी रागाला आधार-स्वर मानून संगीताची मांडणी केली होती तर ’बजे सरगम...’ साठी देस रागाची निवड करण्यात आली होती.

’मिले सुर...’ मध्ये केवळ गायक, गायन आणि अभिनेते यांचाच समावेश होता. ’बजे सरगम’ने पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. रामनारायण यांच्यासारखे तंतुवाद्यवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखे बासरीवादक, उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखे तबलावादक, अशा वाद्यवादकांचाही समावेश केला होता.

यासोबतच ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी, कथ्थक नर्तकी शोभना नारायण यांच्यासह कथकली, कुचिपुडी, मोहिनिअट्टम्‌, भरतनाट्यम्‌ आणि मणिपुरी नृत्यांचाही समावेश केला होता.

त्यानंतर बराच काळ अशा स्वरुपाचे कार्यक्रम नव्याने तयार झालेले दिसत नाहीत. परंतु १९९२ मध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाला, नि त्यापाठोपाठ दंगली उसळल्या. देशात पुन्हा एकवार हिंदू-मुस्लिम द्वेषाचे तांडव सुरू झाले. अशा वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा पुन्हा एकवार बुलंद करण्याची गरज वाटू लागली. हा खाली दिलेला संगीत-पट (म्हणा की गीत म्हणा) हे १९९३ मध्ये चित्रित करण्यात आले. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ प्रमाणे यातही त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवुडी अभिनेत्यांचा समावेश होता. यात आणखी एक महत्वाचा बदल असा होता की आता या बंधुभावाची शिकवण बालपणापासूनच बिंबवायला हवी हे ध्यानात घेऊन हे गीत त्या पिढीलाच उद्देशून लिहिले गेले होते.

सुन सुन सुन मेरे नन्हे सुन,
सुन सुन सुन मेरे मुन्ने सुन
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सुन सुन सुन मेरी नन्ही सुन,
सुन सुन सुन मेरी मुन्नी सुन
प्यार की गंगा बाहे देश मे एका रहे

ख़त्म काली रात हो, रोशनी की बात हो
दोस्ती की बात हो, ज़िन्दगी की बात हो
बात हो इंसान की, बात हिन्दुस्तान की
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

अब न दुश्मनी पले, अब न कोई घर जले
अब नही उजड़े सुहाग, अब नही फैले ये आग
अब न हो बच्चे अनाथ, अब न हो नफ़रत की घात
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सारे बच्चे बच्चिया, सारे बूढ़े और जवां, यानी सब हिंदुस्तान
एक मंजिल पर मिले एक साथ फिर चले
एक साथ फिर रहे, एक साथ फिर कहे... फिर कहे...
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे...
देश मे एका रहे, सारा भारत ये कहे
सारा भारत ये कहे, देश मे एका रहे

---

हे गीत मी अनेकदा पाहिले नि ऐकले होते. परंतु बर्‍याच काळाने त्याच्याबद्दल एक रंजक माहिती मला मिळाली. त्यानुसार ’सारा भारत ये कहे’ (१९९३) हे गीत संजय दत्त अभिनीत ’खलनायक’ या शीर्षकाच्या चित्रपटातील आहे. हे ऐकून मला धक्काच बसला होता.

’नायक नहीं खलनायक हूँ मैं’ हे त्यातील गाणे आणि एकुणच कथानक गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप झाल्याने तो वादग्रस्त ठरला होता. एकुणच बॉलिवुडी मसालापट परंपरेतील असलेल्या या चित्रपटात हे गाणे अगदीच अस्थानी दिसले असावे. कदाचित असेही असेल की मूळ कथेमुळे चित्रपट वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी हे गाणे नंतर समाविष्ट करण्यात आले असावे. प्रत्यक्षात सिनेमागृहांतून दाखवलेल्या प्रतीमध्ये हे होते की नाही मला ठाऊक नाही. परंतु दूरदर्शनवर मात्र त्याचे प्रसारण अनेकदा पाहण्यात आले.

’सारा भारत ये कहे’ नंतरचा काळ हा भारताचा संक्रमणकाळ ठरला. मनमोहन सिंग प्रथम अर्थमंत्री नि नंतर प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यांचा बोलबाला सुरू झाला. हिंदी चित्रपटांनी 'खलनायक’ची परंपरा स्वीकारून गुन्हेगारी, बटबटीत शृंगार, चोख मनोरंजन करणारे विनोद आदींची कास धरून ’अर्थस्य हि पुरुषो दास:’ ही म्हण तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली. खासगी चॅनेलच्या वावटळीमध्ये ’दूरदर्शन’ एका कोपर्‍यात फेकले गेले. तांत्रिक, आर्थिक प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू झाली. देशाचा आर्थिक विकास ज्याने होतो ते ते सारे समर्थनीय ठरू लागले. त्यासाठी ज्याचा उपयोग नाही ते सारे निरुपयोगी ठरून बाहेर फेकले गेले.

या दरम्यान रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला आणि सामाजिक समता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर धार्मिक अस्मितांसोबतच जातीय अस्मिताही धारदार होऊ लागल्या. देशभर मोकाट सुटलेल्या अस्मिता-सांडांच्या धुमाळीमध्ये ’राष्ट्रीय एकात्मता’ नावाची गाय परागंदा झाली.

त्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी प्रसिद्ध गायक पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पुन्हा एकवार या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 'भारत को एक सलाम’ शीर्षकाखाली नवा संगीत-पट निर्माण केला. ’सौ रागिनियों से सजा भारत अनोखा राग है’ या गीताभोवती हा संगीत-पट उभा आहे. परंतु त्याच्या गीताचे बोल पाहिले तर यात भारतीय भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक वैशिष्ट्यांबद्दल काहीच उल्लेख नाही. एखाद्या देवाची स्तुती करणारी आरती असावी असे ते गीत लिहिले आहे. (दुर्दैवाने याचा लेखक कोण हे समजू शकले नाही.)

'देश हा आपणा सर्वांना जोडणारा समान धागा' या व्याख्येपासून सुरुवात करुन ’तुम्हा-आम्हा नागरिकांपासून वेगळा असा काहीतरी एक 'देश नावाचा देव नि आपण त्याचे भक्त’ इथपर्यंतचा प्रवास इथे पुरा झाला आहे.

सौ रागिनियों से सजा,
भारत अनोखा राग है।
ये प्यार का संगीत है।
ये शांती का गीत है।
ये एकता का राग है।
भारत अनोखा राग है ॥१॥

भारत के इस तारे पे,
गूँजे है जो जो रागिनी।
सब मिल गाएँ एक धुन बानी।
इस धुन पे नारा एक है।
इसका तराना एक है।
ये राग सबका राग है।
भारत अनोखा राग है ॥२॥

जय हिंद, जय हिंद।
जय जय जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।

इस देश की रीत एक है।
हैं धडकने एक ताल में।
सुर अनगिनत गीत है।
ये देश सबका देश है।

क्या बोल हैं, क्या राग है।
सब गाएँ ऐसा राग है।
बहुरूपमें अनुराग है।
सौ रागिनियों से सजा।
भारत अनोखा राग है ॥३॥

जय हिंद, जय हिंद, जय हिंद...

हे गीत अनेक गायक-गायिकांनी गायले आहे. यात संगीतमार्तंड पं. जसराज, आपल्याला प्रामुख्याने चित्रपटगीत-गायक म्हणून ठाऊक असलेले कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गायक पं. येसूदास, शंकर महादेवन यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, जगजित सिंग आणि अनूप जलोटा यांचा समावेश होता. जावेद अख्तर यांच्यासारखे कवी, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्रीही हजेरी लावून गेल्या आहेत.

'भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणत १९६३ मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेचा संगीत-प्रवास २०१३ साली ’भारत अनोखा राग है’ पाशी थांबला. एकात्मतेला श्रद्धांजली वाहून देशभक्तीचा गजर सुरू झाला आणि कोण अधिक देशभक्त याची चढाओढ सुरू झाली

१९९२ मध्ये आलेल्या स्पर्धाव्यवस्थेने देशभक्तीमध्ये स्पर्धा रुजवली. त्या व्यवस्थेत अपरिहार्यपणे गुणवत्तेपेक्षा उपलब्धतेला महत्त्व येऊन, स्वत:च्या गुणवत्तेपेक्षा इतरांमधील तिच्या अभावाची चर्चा होते. तेच देशभक्तीच्या क्षेत्रातही होऊ लागले. ’सारा भारत ये कहे’ मधील संस्कार आणि आता व्हॉट्स-अ‍ॅप सारख्या अनियंत्रित माध्यमांतून होणार प्रचार यातील फरक स्पष्ट दिसू लागला आहे. त्या गीतामध्ये बालकांवर केलेले बांधिलकीचे संस्कार कुठे आणि आज देशभक्तीच्या नावाखाली त्यांच्या मनात रुजवला जात असलेला द्वेष कुठे.

हातात हात घालून चालणारे नागरिक आता हात सोडून शेजार्‍याच्या पुढे राहण्यासाठी जिवाच्या आकांताने धावू लागले. प्रसंगी दुसर्‍याची धाव खंडित करण्यासाठी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडूही लागले. ’सारे भारतीय माझे बांधव आहेत’ पासून ’आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत’ पर्यंत मजल आपण मारली आहे.

(क्रमश:)

- oOo -

पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत


हे वाचले का?

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. ही प्रतिज्ञा प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. १९६२ मध्ये लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम्‌ मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले.

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन,
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे. 

यातील ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्या वाक्यामध्येच समतेचे तत्त्व अधोरेखित केले होते. पुढेही विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे’ म्हणताना एकाच परंपरेचे श्रेष्ठत्व लादण्याचा प्रयत्न करणार नाही हे मान्य केले होते. देशाबरोबरच देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे वचन दिले जात होते. वैय्यक्तिक कल्याण आणि समृद्धी ही देश नि देशबांधवांच्या समृद्धीशी जोडण्यात आली होती. एकुणात भ्रातृभाव, बांधिलकी हा देशबांधवांना जोडणारा धागा असेल असे यातून मान्य करण्यात आले होते. ’राष्ट्रीय एकात्मता’ ही संज्ञा तेव्हापासून परवलीची होऊन गेली होती. चित्रपटांतून, माहितीपटांतून इतकेच नव्हे तर जाहिरातींमधूनही या राष्ट्रीय एकात्मतेचा धागा ठळक करण्यात येत असे.

तो काळ तसा तंत्रज्ञानाच्या बाल्यावस्थेचा होता. १९५९ मध्ये सुरू झालेले ’दूरदर्शन’ हे सरकारी मालकीचे एकमेव चॅनेल बातम्या, मनोरंजन, माहिती याबरोबरच संस्काराचे, प्रबोधनाचेही कार्य करत असे. ज्याला बहुसंख्य लोक आजही केवळ मनोरंजनाचे साधन समजतात त्या चलच्चित्रांच्या (Animation) माध्यमाचा वापरही यासाठी करुन घेतला जात होता. दूरदर्शनवर भीमसैन यांनी तयार केलेल्या अनेकता में एकता (१९७४) (रिमास्टर्ड: https://www.youtube.com/watch?v=csI3yilRPcY) किंवा एकता का वृक्ष (१९७२) यासारखे चलच्चित्र लघुपट राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना सोप्या स्वरूपात रुजवू पाहात होते.

याशिवाय देशोदेशी तयार झालेले अशाच स्वरूपाचे प्रबोधनात्मक चलच्चित्रपटही स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन दाखवले जात. इतालियन-अमेरिकन लेखक नि चित्रकार लिओ लिओनी याने जगण्याशी निगडित अनेक संकल्पना समजावणारी अनेक सचित्र पुस्तके प्रकाशित केली होती. त्यातील फिश इज फिश, अ कलर ऑफ हिज ओन, इंच-बाय-इंच, लिटल ब्लू अ‍ॅंड लिटल यलो, गोष्टी जमवणार्‍या उंदराच्या गोष्टींतून शब्दांचे सामर्थ्य, कथनात्म साहित्याचे माणसाच्या आयुष्यातील स्थान अधोरखित करणारा  फ़्रेडरिक (त्याच्या कथेमध्ये उंदरांचा देव उंदीरच असतो ! ) ,  यांसारख्या काही पुस्तकांवरुन चलच्चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील स्विम्मी (१९७१) हा एकतेचा संदेश देणारा लघुपट सर्वाधिक गाजला.

आज आपल्यापैकी किती जण माहितीपट अर्थात डॉक्युमेंटरीज पाहतात? त्यातूनही प्राणिजीवनावरील माहितीपट वगळले तर माहितीपट पाहणारे अक्षरश: मूठभर उरतील. 'फिल्म्स डिविजन इंडिया’ ही संस्था ’राष्ट्रीय एकात्मता’ या एकाच विषयावर नव्हे तर काही सामाजिक व आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे अनेक चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट तयार करत असे. दूरदर्शनच्या एकाधिकारकाळात ते दूरदर्शनवरुन दाखवले जात (आज किती चॅनेल्स त्या दाखवतात?) तसंच चित्रपटगृहांमधून चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक-दोन माहितीपट दाखवले जात असत. यात अनुबोधपटांचाही समावेश असे.

यात कुटुंबनियोजनाची गरज, पंचवार्षिक योजनेची गरज आणि माहिती देणारा ’अ ग्रेट प्रॉब्लेम’, कुटुंबनियोजनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शासनाने चालवलेल्या ’लाल त्रिकोण अभियानाअंतर्गत अ‍ॅंगल ऑफ द ट्रॅंगल, अफवाविरोधी प्रबोधनासाठी गुब्बारा, दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीबाबत इंडियन ट्रॅफिक, स्वच्छतेचा संदेश देणारा हायजीन: द वे ऑफ लाईफ़, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा मीना लाल त्रिकोण अभियानाप्रमाणे ’हम दो हमारे दो’ कॅपेनच्या प्रचारासाठी अँगल ऑफ द ट्रँगल, द क्रेडल (पाळणा) असे विविध अशा अनुबोधपट दूरदर्शनने तयार केले होते. यात जी. के. गोखले हे प्रमुख चलच्चित्रकार आणि भीमसैन (खुराना) हे निर्माते-दिग्दर्शक यांचा मोठा वाटा होता.

एकता का वृक्ष (१९७२) हा आणखी एक चलच्चित्रपट बराच लोकप्रिय झाला होता. या सार्‍यांमध्ये सामायिक मुद्दा होता तो बांधिलकीचा. विविधतेतून एकता, परस्पर-बांधिलकी हे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे मूलाधार होते.

पुढे चलच्चित्रांचा हात सोडून प्रबोधन चित्रपटांकडे सरकले आणि मिले सुर मेरा तुम्हारा (१९८८) बजे सरगम हर तरफ से (१९८९) सौ रागिनियोंसे सजा (२०१३) असे अनुबोधपट निर्माण झाले. पण नीट पाहिले तर इथे बांधिलकीचा हात सुटून देवत्वस्वरूप देशाप्रती बांधिलकीच नव्हे, तर समर्पणभाव रुजवणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेची जागा देशभक्तीने घेतली. आणि त्यातून प्रथम ’कोण अधिक देशभक्त’ची अहमहमिका सुरू झाली आणि ती ’कोण अधिक देशद्रोही’ पर्यंत येऊन पोहोचली. लहान मुलांच्या म्हटलेल्या चलच्चित्रांमध्ये असलेला सुज्ञभाव मोठ्यांकडे सूत्रे येताच नाहीसा झाला.

(क्रमश:)

---

१. सुप्रसिद्ध हिंदी कवी पं. विनयचंद्र मौद्गल्य यांच्या ’हिंद देश के निवासी’ या कवितेमधील पहिले कडवे 'एक, अनेक और एकता' या अनुबोधपटाच्या शेवटी समाविष्ट केले आहे.

        पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत


हे वाचले का?