शनिवार, ३० जानेवारी, २०२१

क्रियेविण वाचाळता सार्थ आहे

माणूस हा प्राणिकुलातील एकमेव विचारशील प्राणी आहे असे म्हटले जाते... पण ते केवळ मानवी अहंकाराने लिप्त असलेले विधान आहे असे माझे मत आहे! अन्य प्राण्यांचा विचार माणसांच्या विचारवाटेवर जात नसल्याने, माणसाला जाणवत नाही इतकेच. म्हणजे कदाचित हे विधान मानवी अज्ञानाचे निदर्शकही असू शकेल.

पण एक गोष्ट आहे जी निर्विवादपणे मानवजातीची निर्मिती आहे, आणि ती म्हणजे विनोद! अगदी ’परिहासविजल्पिता’पासून ’अति झालं नि हसू आलं’ पर्यंत विनोदाच्या अनेक छटा माणसाच्या आयुष्यात सापडतात. चिंपांझीमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेचे अनेक पैलू दिसतात. (अन्य काही मर्कटकुलातही!). पण त्यांच्यातही एक चिंपांझी काही हातवारे करुन दुसर्‍याला काही सांगतो आहे, आणि ते ऐकून दुसर्‍याची हसून हसून पुरेवाट झाली आहे असे दिसत नाही. त्यांच्या काही कृती या माफक परपीडेतून मनोरंजन करण्यापर्यंत पोचल्या असल्या, तरी भाषिक अथवा कृतीप्रधान विनोदापर्यंत अजून तरी पोचलेल्या दिसत नाही...

बघा, विनोदाबद्दल बोलता बोलता गंभीर होत गेलो. आजचा विषय विनोदाचा असल्याने आणि सुरुवात मर्कटकुलाच्या चावटलीलांपासून झालेली असल्याने प्रथम हा वात्रट वानर पाहा.

ते दोनही वाघ अजून बच्चे आहेत हे त्याला माहित असल्याने आणि झाडावर आपण सुरक्षित आहोत याची खात्री असल्याने या परपीडेतून तो आनंद घेतो आहे. दुबळी, भेकड माणसेही जात-धर्मादि कळपात सुरक्षितता शोधून बाहेरील एकट्या-दुकट्याला टोचून आपले शौर्य दाखवण्यात धन्यता मानतात याची जाताजाता आठवण करुन देतो.

हे माकड स्वत: जरी या कृतीचा आनंद घेत असले, तरी ते वाघबच्चे मात्र पीडित आहेत. विनोद हे मनोरंजनाचे असे साधन असते ज्यात सर्वांनाच तो आनंद घेता यायला हवा. यातून मग माणसाने कृत्रिम मनोरंजनाचा शोध लावला. उपस्थितांपैकी कुणाचाही थेट संबंध असलेल्या, नसलेल्या भौगोलिक, पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा पार्श्वभूमीवरचे किस्से छोटे विनोद म्हणून, गोष्ट म्हणून, नाटक म्हणून सादर करत त्यातील आनंद वाटून घेण्याची पद्धत सुरु झाली.

पण असे हेतुत: केलेले विनोद वा मनोरंजनच का, काही वेळा हेतू संघर्षाचा नि त्यातून मनोरंजन निर्माण होणे ही गंमतही घडते. सुरुवातीला उल्लेख केलेली ’अति झालं नि हसू आलं’ ही म्हण अशाच स्वरुपाच्या घटनांमधून निर्माण झालेली आहे. नाटक, चित्रपटादि मनोरंजनाच्या माध्यमांतून विनोदाचा हा प्रकारही अनेकदा हाताळला जातो. 

हा पहिला व्हिडिओ आहे ’हंगामा’ नावाच्या बॉलिवूड चित्रपटातला. ’संशयकल्लोळ’ या प्रसिद्ध मराठी संगीत नाटकाच्या कथानकावर बेतलेल्या चित्रपटातला हा प्रसंग मात्र सर्वस्वी नवा आहे.

हा प्रसंग पाहिला की मला हटकून फेसबुकसारख्या सोशल मीडियामधून सुरक्षित अंतरावरून शौर्य दाखवणार्‍यांची आठवण होत असते. तिथे अत्यंत अश्लाघ्य भाषेत परस्परांवर गरळ ओकणारे समोरासमोर आले की कमालीचे सहिष्णु होतात.

वास्तविक समोरचा दोन ठोसे देण्याइतक्या अंतरावर आला, की त्यांची सुरक्षिततेची जाणीव पळून जाते नि मूळ भित्रा स्वभावच उघडा पडत असतो. पण दोनही बाजू आपला भेकडपणा मान्य करण्याऐवजी ’त्या फेसबुकवर ना, आपल्यातलं जनावर जागं होतं. समोरासमोर आपण कसे गुण्यागोविंदाने राहतो.’ म्हणून आपल्या दोषांचे खापर तिसर्‍यावरच फोडून ’हिंदी-चीनी भाई भाई’ चा नारा लावतात.

भेकडपणासोबतच आलेला हा अप्रामाणिकपणा! हे हत्यार समाजकारण आणि अर्थातच राजकारणातही पुरेपूर वापरले जाते. ’आम्हाला आमच्या नेत्याबद्दल आक्षेप नाही, पण त्याच्या भोवतालची चौकडी/बडवे यांच्या कारवायांमुळे आम्ही पक्ष सोडत आहोत.’ हे असेच एकाच वेळी स्वार्थी, भित्रे आणि अप्रामाणिक विधान...

अरेच्या, हा आणखी एक फाटा फुटला. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ. वरील प्रसंगात नंदू (आफताब शिवदासानी) आणि जीतू(अक्षय खन्ना) यांच्यात झालेल्या ’बांधावरच्या’ किंवा ’नळावरच्या’ भांडणासारखाच आणखी एक प्रसंग मला सापडला तो अलीकडे गाजलेल्या ’द बिग बॅंग थिअरी’ या मालिकेत.

’वय वाढून बसलेली बुद्धिमान बालके’ असे ज्यांचे वर्णन करता येईल अशा चौकडीभोवती ही मालिका फिरते. यातील हावर्ड आणि राज या तिशीच्या दोन वैज्ञानिकांमध्ये (हावर्ड हा फक्त एंजिनियर आहे, वैज्ञानिक नाही - इति शेल्डन) ’आपण दोघे सुपर हीरो झालो, तर मुख्य हीरो कोण आणि त्याचा दुय्यम साथीदार कोण?’ या मुद्द्यावर जुंपली आहे. या मुद्द्याचा सोक्षमोक्ष थेट कुस्ती खेळूनच लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांचा हा सामना पाहा. फेसबुक वा एकुणात सोशल मीडियावरील भांडणांची आठवण होते की नाही सांगा.

पश्चातबुद्धीने (post-facto) यांना ’लुटुपुटूचे’ म्हणता येईल. असे हे सामने एका प्रकारे मानवी आयुष्यात उपयुक्तही ठरतात. माणसाच्या मनात स्नेह, प्रेमादि गुण आहेत तसे द्वेष, हिंसेसारखे दुर्गुणही. अशा लुटुपुटूच्या लढायाच या दुर्गुणांचा निचरा करण्यास मदत करतात. (गॉसिप अथवा गावगप्पा हे एकप्रकारे सामाजिक बंध बळकट करण्यास मदत करतात असा एक दावा आहे त्याचप्रमाणे.) 

ज्या देशात खेळांना भरपूर प्रोत्साहन दिले जाते त्या देशात अशांतता माजण्याचे प्रमाण कमी राखता येते असे म्हटले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत खेळांना, विशेषत: बास्केटबॉल, फुटबॉल (हा आपल्याकडील फुटबॉलपेक्षा सर्वस्वी वेगळा, पायाला चेंडूचा क्वचित स्पर्श होणार खेळ), रग्बी आदि मैदानी खेळांना अधिक प्रोत्साहन दिले जाते. त्यातून तरुणांच्या अंगातील रग, बंडखोरी, वर्चस्ववादी वृत्ती यांचे शमन व्हावे अशी अपेक्षा असते. सोविएट युनियनच्या उदयानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांमध्ये त्या देशाचा बोलबाला झाला तो नेमक्या याच धोरणामुळे. असे लुटुपुटूचे वाग्युद्ध हाच हेतू मर्यादित प्रमाणावर साध्य करीत असते.

जयवंत दळवींच्या ’सारे प्रवासी घडीचे’ मध्ये कोकणांतील त्या गावातील लोकांबद्दल दळवी म्हणतात,

सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला अडकवलेल्या कोयत्याला  हात घालणार नाही. क्वचित त्याने हात घातला तरी कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही. उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून त्याने मारला तरी तरी तो लागणार नाही! संताप व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई-बहिणींचा उद्धार करणार्‍या शिव्या द्यायच्या. देण्यासारखे असे त्यांच्यापाशी एवढेच!

गांधीवधानंतर सर्वत्र जाळपोळ झाली. ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांची घरे लुटली. पण आमच्या इकडे तसे काही घडले नाही. "गांधीला मारले ते वाईट झाले. वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? ठार कशाला मारले." इतकीच प्रतिक्रिया आमच्या गावात झाली.

थोडक्यात संतापाचे, रागाचे, त्राग्याचे शब्दांनी विरेचन करुन आयुष्याची गाडी पुन्हा सौहार्दाच्या मार्गावर नेण्याची पद्धत तिथे आहे. मानसिक हिंसेचे अशारीर विरेचन हे शिव्यांचे महत्व न जाणता उलट 'शिवी दिली' म्हणून परस्परांचे गळे कापणारा समाज सुसंस्कृत कसा म्हणता येईल? असो.

अखेरीस 'शब्देविण संवादु' मनोरंजनातही संवेदनशीलता बेमालूम मिसळून देणार्‍या चार्ली चॅप्लिन नामक बादशहाचा उल्लेख अपरिहार्य आहे. हे त्याचं मानाचं पान त्याला देऊ करतो.

हा प्रसंग त्याच्या ’सिटी लाईट्स’मधला आहे. हा प्रसंग इतका गाजला की त्याची नक्कल पुढे अनेक चित्रपटांतून केलेली दिसते. आपल्याकडे 'बॉम्बे टु गोवा’(१९७२) मधील मेहमूद आणि युसुफ खानची तथाकथित बॉक्सिंग मॅच आठवून पाहा. त्या नकलेमध्ये ग्लोव्हज् मध्ये दगड भरण्याचा प्रसंग चार्लीच्याच ’द चॅम्पियन’ या चित्रपटातून उलचलेला आहे.

इथे आर्थिक गरज भागवण्यासाठी, नाईलाजाने चार्ली बॉक्सिंगच्या रिंगणात उतरलेला आहे. त्याअर्थी हा संघर्ष लुटुपुटूचा मुळीच नाही. त्यातून त्याच्या मनातील कोणत्याही दुर्गुणाचे विरेचन होणारे नाही, उलट सद्भावाच्या पोषणासाठी त्याला त्या संघर्षाला सामोरे जाणे भाग पडले आहे. आणि अननुभवी असलेल्या, बॉक्सिंग म्हणेज ठोसे मारणे यापलिकडे काहीही ठाऊक नसलेल्या चार्लीची ही ’बाउट’, बॉक्सिंगसारख्या हिंसक खेळालाही विनोदाची एक झालर जोडून देते आहे...

- oOo -

१. पुस्तक: ’सारे प्रवासी घडीचे’
लेखक: जयवंत दळवी.
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
पंधरावी आवृत्ती (जुलै २०१४).
पृ १३२.


हे वाचले का?

रविवार, १७ जानेवारी, २०२१

वेचताना... : आर्त

जगभरातील संस्कृतींमध्ये कितीही वैविध्य असले, तरी त्यात पुरुषप्रधानता हा समान दोष आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि निसर्गापासून दुरावत गेलेल्या, तथाकथित प्रगत समाजांमध्ये ती अधिकच घट्ट झालेली दिसते. स्त्रीने जन्मत: बापाचे कुलनाम स्वीकारायचे आणि लग्नानंतर पतीचे हा प्रघात खूप प्राचीन आहे. अमेरिकेसारख्या तरुण आणि सर्वथा प्रगत राष्ट्रातही निदान जोडनाव लावण्याची पद्धत रूढ आहे.

हा पुरुषी वर्चस्वाचा संस्कार घरातील मुलांनाही वारशाने मिळावा, हे ओघाने आलेच. त्यातच घरच्या पुरुषाचे असलेले स्थान वारशाने मिळवण्याची पुढच्या पिढीची धडपड, घरच्या स्त्रीला अर्थातच मागे सारून घरच्या पुरुषाशी नाळ जोडू पाहात असते. ’मूल आईचे की बापाचे?’ या प्रश्नाला ’फळ बीजाचे की क्षेत्राचे?’ या पर्यायी प्रश्नाशी समानार्थी मानत मूळ प्रश्नाचे निर्णायक उत्तर या समाजव्यवस्थांनी देऊन, तो प्रश्न आता रद्दबातल ठरवला आहे.

श्री. ना. पेंडसेंच्या ’रथचक्र’मध्ये कर्तृत्वशून्य नवर्‍यामुळे मोठ्या कुटुंबात सदैव अवहेलना आणि दुय्यम स्थान सहन करत, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष करत, लक्षुंबाई आपल्या दोनही मुलांच्या प्रगतीची वाट सुकर करत जाते. परंतु घरची जबाबदारी सोडून संन्यासी होण्यासाठी परागंदा झालेला नवरा जेव्हा भगवी छाटी घालून परत येतो, तेव्हा त्याचे सामाजिक स्थान आणि अर्थात बीज-बांधिलकी यातून मुले आईपेक्षाही बापालाच अधिक धार्जिणी होताना दिसतात. बापाच्या आध्यात्मिक स्थानातून मिळणार्‍या सामाजिक मानाचा वारस म्हणून आपला वाटा घेणे मातृऋणांहून अधिक श्रेयस्कर मानतात.

महेश मांजरेकरांच्या ’अस्तित्व’मध्येही अदिती पंडितचा मुलगा, आपले जन्मरहस्य जाणूनही, जैविक नसलेल्या आपल्या पित्यालाच धार्जिणा होत आईचा अधिक्षेप करतो. कारण या नामधारी बापाचे सामाजिक-आर्थिक स्थान त्याला अधिक सुरक्षित आयुष्य देऊ करते आहे. त्या तुलनेत त्याची आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेली आई, तिचे स्वत्व जाणून त्याला मान देणारा आणि तिला समजून घेणारा, पण सामाजिक-आर्थिक ताकद नसलेला त्याचा जैविक बाप, हे दोघे अजिबातच उपयुक्त ठरणारे नाहीत...

आई म्हणून, गुरू म्हणून आयुष्याची पहिली वीस वर्षे ज्या आईने घडवले तिला दूर सारत, बापाचा सांगीतिक वारसा मिळवण्याची धडपड करणारा, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ’जन्म’ या कथेमधला सत्यजित बापाचे आध्यात्मिक मान, सामाजिक-आर्थिक स्थान वारशाने मिळवू पाहणार्‍या या पुढच्या पिढीचाच एक भाग दिसतो.

आर्त

पण वरील दोन उदाहरणांतील पुढच्या पिढीसमोर असलेल्या परिस्थितीपेक्षा थोड्या अधिक व्यामिश्र परिस्थितीचा तो सामना करतो आहे. याचे कारण वरील दोन उदाहरणांमध्ये आई-वडिलांची कार्यक्षेत्रे म्हणा अथवा मुलांच्या जीवनातील स्थान म्हणा, हे सर्वस्वी वेगळे आहे. त्यांत सामायिकता नाही. पण सत्यजितची अम्मा ही आई आहे तशीच एक प्रथितयश वादक आहे, त्याला घडवणारी गुरु आहे. जाणकार रसिकांच्या मनात अव्वल स्थान असले, तरीही प्रसिद्धी पराङ्मुख आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर जाहीर कार्यक्रमांना तिलांजली देत केवळ गुरु हे स्थान स्वीकारून व्रतस्थ झालेली आहे.

त्याउलट वडील श्रोत्यांमधला प्रेक्षकही ओळखून आहेत. प्रसंगी कलेची बांधिलकी दुय्यम मानत ’प्लेईंग टु द गॅलरी’चे तत्त्व वापरत प्रसिद्धीचा झोत चोखपणे आपल्यावर राखणारे आहेत. कलेचे संस्कार अम्माकडून घेतलेल्या सत्यजितला वडिलांचे हे सामाजिक स्थान खुणावते आहे. ते वारशाने आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा आहे., ’नाथांचा मुलगाही त्यांच्याइतकाच उत्तम वादक आहे.’ असे उद्गार त्याला ऐकायचे आहेत.

व्रतस्थ कलासाधना आणि कलेचा बाजार मांडून मिळवलेले मान-सन्मान व आर्थिक स्थैर्य यात त्याला निवड करायची आहे. ही निवड केवळ कलेच्या दोन दृष्टिकोनांतली तर आहेच, पण जगात माणसाच्या सर्वात जिवाभावाच्या असणार्‍या दोन व्यक्तींमध्येही - आई नि वडील - करायची आहे. या निवडीचा ताण त्याच्यावर येतो आहे. नकार आणि स्वीकाराच्या या ताणांमध्ये खेचला जाऊन तो विरत विरत जातो आहे.

ही कथा वाचत असताना मला राहून राहून प्रसिद्ध सूरबहारवादक विदुषी अन्नपूर्णा देवी आणि आणि त्यांचे पती, प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांची आठवण होत होती. आणि ही कथा त्यांच्याच जीवनावर बेतलेली असावी असं वाटत होतं. थोडा शोध घेता तो तर्क खरा आहे असे दिसून आले.

अन्नपूर्णादेवी यांनी सूरबहार हे घुमारेदार आवाज असलेले आणि गतीपेक्षा ठहराव/विस्तार याला अनुकूल असलेले वाद्य निवडले. पण त्यांचे वडील बाबा अल्लाऊद्दिन खाँ हे मैहर घराण्याचे प्रसिद्ध सरोदिये. गजेंद्रगडकर यांनी त्यांचे हे वाद्य अन्नपूर्णादेवी ऊर्फ अम्मा यांच्या हाती दिले आहे. (जे प्रत्यक्षात त्यांचे बंधू अली अकबर खान यांनी स्वीकारले.) सूरबहार या वाद्याच्या प्रकृतीबरोबरच वारशाने मिळालेली धृपद अंगाची शैली अन्नपूर्णादेवींनी स्वीकारली. तर बाबांचे शिष्य असलेले पं. रविशंकर यांनी ख्यालगायकीची बढत करण्यास अधिक उपयुक्त अशी सतार स्वीकारली.

रविशंकर यांच्यापासून दूर झाल्यानंतर अन्नपूर्णादेवींनी सार्वजनिक कार्यक्रमातून निवृत्ती घेतली आणि केवळ गुरुचीच भूमिका स्वीकारली. पं. निखिल बॅनर्जी, कार्तिककुमार, इन्द्रनील भट्टाचार्य यांच्यासारखे सतारवादक, भाचा आशिष खान (अली अकबर खाँ यांचा मुलगा) सारखा सरोदवादक आणि पं. हरिप्रसाद चौरासिया तसंच नित्यानंद हळदीपूर यांच्यासारखे प्रख्यात बासरीवादक यांसारखे शिष्य घडवले.

जाताजाता एक रोचक नोंद करुन ठेवायला हवी. धृपद ही पारंपरिक हिंदुस्तानी गायकी, प्रामुख्याने देवळांतून, ईशस्तुतीच्या स्वरुपात गायली जाणारी. याउलट याच गायकीच्या चार अंगांपैकी दोनच अंगे स्वीकारून मुस्लिम गायक-नायकांनी अधिक लवचिक अशा ख्यालगायकीचा विकास केला. एक मुस्लिम स्त्री धृपदाशी बांधिलकी राखून प्रसिद्धीच्या बाजारापासून दूर राहते आहे, तर मुस्लिम गायकांनी रूढ केलेली गायकी रविशंकरांसारखा एक हिंदू स्वीकारून पुढे जातो आहे. इथे दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ची आठवण होते. त्यातील अल्ताफ हुसेन खाँ बरेलीवाले आणि पं. भानुशंकर यांच्यातील स्पर्धा खरेतर या दोन गायकींमधलीच आहे. (पुढे त्याच नावाच्या चित्रपटात त्याला सद्यस्थितीत बोकाळलेल्या बटबटीत हिंदू-मुस्लिम संघर्ष स्वरुपात सादर करुन त्याची पुरी माती केली गेली.)

’जन्म’ या कथेमधील सत्यजित हे पात्र या दांपत्याचा मुलगा शुभेंद्र -शुभो- शंकर याच्यावर बेतलेले आहे. आयुष्याचा सुरुवातीचा काही काळ आईकडूनच गुरु म्हणून तालीम घेतल्यानंतर त्याला वडिलांची कीर्ती नि वारसा खुणावू लागला. रविशंकरांच्या आमंत्रणावरुन तो तडकाफडकी अमेरिकेला त्यांच्याकडे निघून गेला. पुढे त्यांच्यासोबत काही कार्यक्रमही केले. पण सतत वडिलांच्या छायेत राहिल्याने त्याचे स्वतंत्र असे स्थान निर्माणच होऊ शकले नाही. या दरम्यान तब्बल वीस वर्षे त्याने आईशी संपर्क ठेवला नव्हता असे म्हटले जाते.

पुढे वीस वर्षांनी भारतात परतल्यानंतर इथे आपले स्थान निर्माण करण्यात त्याला अपयश आले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात पं. रविशंकर यांच्यासोबत वादन करत असताना त्याचे वादन अनेकदा बेसूर झाल्याची टीका झाली. त्यानंतर त्याने कलेपासून संन्यास घेतला. पुढे अल्पशा आजाराने वयाच्या पन्नाशीतच त्याचा मृत्यू झाला. मोठ्या झाडाच्या सावलीत खुरटलेले झाड अखेरीस वठून गेले.

कथेतील इथे निवडलेला उतारा हा या पार्श्वभूमीला तर समोर ठेवतोच, पण त्याचबरोबर सत्यजितची दुभंग मानसिकता उलगडत जातो. जिथे असतो ते नकोसे होते, आणि जे प्राप्य ते साध्य झाल्यावर जे सोडून आलो त्यातील गमावलेल्या संचिताची खंत उफाळून येणे हे दोनही टोकांवर सत्यजित अनुभवत राहातो. वारशाने मिळालेल्या दोन तेजांमधले कोणते स्वीकारावे हा अत्यंत अवघड निर्णय घेत असताना, ती जबाबदारी न पेलून काळवंडत जातो.

- oOo -

‘आर्त’ या पुस्तकातील एक वेचा: प्रत्यय


अन्नपूर्णादेवींबद्द्ल अधिक वाचनासाठी:
१. https://en.wikipedia.org/wiki/Annapurna_Devi
२. https://thewire.in/the-arts/annapurna-devi-the-timeless-legendary-guru
३. https://www.thehindu.com/entertainment/music/remembering-guru-ma-annapurna-devi/article32803151.ece
४. https://scroll.in/article/898174/how-annapurna-devi-withdrew-from-public-performances-because-of-a-jealous-ravi-shankar


हे वाचले का?

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

प्रत्यय

शर्माजींचा तबला घुमू लागला. बाईंनी हात करून थांबवलं त्यांना. वाद्याला नमस्कार डोळे मिटले.

पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||

आसावरीची आलापी सुरू झाली. समेवर येतानाची कोमल रिषभावरची डोळे पाणावतील अशी सत्यजितची आर्त मिंड... सरोद घेतलेल्या बाईचं रूपही एखाद्या पवित्र नदीच्या सात्त्विक प्रवाहासारखे भासणारं... सत्यजित रंगात आला. आसावरीत तो शिरल्यावर बाई अवचितपणे थांबल्या.

सत्यजितची रुंद लांब बोटं... नागाने सण्णकन काढलेल्या फण्यासारखा त्याचा टण्णकार. शेवटच्या लयीची बढ़त... तो घामाघूम होऊन थांबला. समाधानाने बाईंकडे पाहिलं. बाईंनी डोळे मिटलेले... स्तब्धच त्या.

आर्त

'अम्मा... " सत्यजितच्या आवाजात अधीरता. बाईनी डोळे उघडले. म्हणाल्या, "आज मी काही बोलणार नाही. तू तुझं परीक्षण करायचं."
शर्माजीचा संथ ठेका चालू होता. धा धिं धिं धा...
सत्यजित काही क्षण विचार करत राहिला. हळूहळू शर्माजीही थांबले.

"नाही... " तो म्हणाला. "नाही जमला मला आसावरी."
"कां असं वाटलं?" बाईनी उत्सुकतेने विचारलं,
"अम्मा, दादांचं ऐकलं की असंच वाटतं. वाटतं, मी कधी आणि कसा पोहोचेन तिथपर्यंत?"

"शर्माजी, जरा चहाचे बघता?" बाईंनी सुचवलं. शर्माजी आत गेल्यावर बाई त्याला म्हणाल्या,
"लहान वा मोठे गायक-वादक ऐकलेच पाहिजेत. आपण कुठे आहोत ते कळतं त्यामुळे. पण त्यांची - आपली तुलना ती नसते. कधी ती करूही नये."
सत्यजित हातातल्या त्याच्या जवाकडे बघत ऐकत होता. "हो, तू सांगितले आहेस मला... प्रत्येक कलावंताच्या मस्तकावर कलेने ठेवलेला हात वेगळा असतो."
"आणि जित, आपल्याकडे जे संचित आहे कलेचं, ते सांभाळणं जास्त महत्त्वाचं. मग? हे तर मी तुला नेहमीच सांगते."

सत्यजित आता अस्वस्थ झालेला.

'अम्मा खरं म्हणजे तुला आवडत नाही मी दादांकडे गेलो की." तो म्हणाला.
"का? मी तुला अडवलंय कधी की म्हटलय तसं?" बाईनी थेट विचारलं. काहीसं लागलंच त्यांना ते.
"नाही, अम्मा... मी काहीतरीच म्हणून गेलो.'' तो अपराधीपणे म्हणाला
"आश्चर्य वाटलं. मी तर तुला नेहमी सांगते, दादांचं ऐकशील ते त्यातलं चांगलं काय आहे, ते समजून ऐक. तयारी बघ. किती जिवाच्या कराराने, जीव ओतून ते वाजवतात ते बघ. तरी तू म्हणतोस मी-"
"सॉरी म्हटलं नं अम्मा... पण अम्मा, मला त्रास फार व्हायला लागला आहे अलीकडे."
कसला? विचारेपर्यंतच बाईच्या ते लक्षात आलं होतं. "कायम अम्मा, लोक काही ना काही बोलतातच. इतकी वर्ष मी दुर्लक्षच करतोय- पण..."
"काय बोलतात तर हेच ना, तुझे दादा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मला तुझ्या दादांचा हेवा वाटतो, हे तर मीही ऐकत आलेच की." त्या थोड्याशा हसल्या. "तुझ्या मनाला ते लागत आलंय इतकी वर्ष, ते काय मला समजत नव्हतं?"
मग त्या परत हसल्या. म्हणाल्या,
"मला नकोच होती लोकप्रियता. कलेवरची माझी निष्ठा मी नितान्त जपली तेवढी. तिला परिपूर्ण रूप देण्याचाच प्रयत्न ठेवला. नाव कमावलं की यशस्वी झालो, हे गणित मी कधी मानलं नाही." पण त्या थांबल्या. हेदेखील किती वेळा सांगत राहायचं? आपली निष्ठा आपणच सांगायची म्हणजे..."

शर्माजी चहा ठेवून गेले.

"तर आता तुझ्या आसावरीबद्दल बोलते." बाई सत्यजितला चहा देत म्हणाल्या. "तुला जमला नाही आसावरी हे तुझंच निरीक्षण! पण ते खरं आहे. कारण माझ्या मते, तू 'आसावरी च्या गाभ्यापर्यंत पोहोचलासच नाहीस."
"म्हणजे अम्मा- "
"म्हणजे तू दादांची शैली उचलू पाहत होतास. अलीकडे तुझं असं होऊ लागलय. तू दादांना ऐकून आलास की जास्त. प्रभाव पडतो आपल्यावर कुणाचा ना कुणाचा, पण अनुकरण नाही करू.'
"तेच ना." सत्यजित रागाने म्हणाला. "तुला नाही आवडत दादांना मी भेटलो की. तू सांग ना स्पष्ट मग," तो उखडला होता. मग उठून ताडताड तो निघून गेला. हेही आता ठरून गेलं आहे. अबोल राहायचं नाहीतर टोकाचा संताप- बाईंच्या मनात आलं.

"निघू ना मी?" शर्माजी विचारत होते. बाईंनी तंद्रीत त्यांच्याकडे पाहिलं.
"जरा बोलायचंय तुमच्याशी." त्या म्हणाल्या. "मी आणि नाथ वेगळे झालो. या दहाएक वर्षात चुकूनही माझ्या तोडून नाथांबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल टीकेचा शब्दही निघाला नाही. मनातसुद्धा नाही. तो त्यांचा मार्ग होता. माझा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा, असं मी मानलं. मग आज..."
"तुम्ही गुरू आहांत सत्यजितच्या." शर्माजी म्हणाले. "ही टीका थोडीच आहे? सावध केलंत तुम्ही त्याला. नाथांबद्दल अनादर राहू दे. एक हळहळ वाटते तुम्हांला अजूनही."
बाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. म्हणाल्या,
"जितला फार ओढा आहे नाथाचा. लहानपणापासून. ते दूर गेले म्हणून तो अजूनच वाढत गेला. किती आतल्या गाठीचा होत गेला सत्यजित मग. कुणात मिसळायचा नाही. अबोलही होत गेला. भित्राही झाला बराच."
"बाई, स्पष्ट बोलू का?"
"कायम वडीलकीचा आधार देत आलात मला. असं का विचारता?
"तसं नाही." शर्माजी ओशाळवाणे हसले. "बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे सुचवून पाहिलं मी. नाथांकडे सत्यजितचं येणं-जाणं टाळायला हवं होतं. अहो, नाथांचं व्यक्तिमत्त्वच जबरदस्त! शिवाय ते प्रसिद्धीचं वलय... सामान्य लोक आकर्षित होतात. सत्यजित तर... "
"म्हणूनच तर नाही अडवलं मी. आधीच आपल्या इतक्या जवळच्या माणसाचा सहवास दुणावला की ओढ जास्तच वाढते. दुसरं, त्याच्या मनात माझ्याबद्दल एक अढी मात्र बसली असती."
"तुम्ही कायम समतोल दृष्टी ठेवून विचार करता- वागता. पाहत आलोय इतकी वर्ष. तुमची कलेवरची ती भक्ती, तो ध्यासही. फार कमी असतात असे तुमच्यासारखे कलाकार. लोक म्हणू देत; पण ते जाणतात नाथांपेक्षाही तुम्ही-' .
“शर्माजी-" बाईंनी अडवलं. "खूप ऐकली की ती तुलना, उघड उघड, दबकी... नाथांची बायको पण बरी वाजवते की! मुख्य म्हणजे स्त्री असूनही? तीही सरोद?'- जाऊ दे ते सगळं."
"सत्यजितला जाऊ दिलंत नाथांकडे ते एकवेळ मान्य केलं बाई, तरी नाथांनी मात्र तुमच्याबद्दल आजदेखील-"
बाईंनी पापण्या मिटून मूकपणेच त्यांना थांबवलं.
"आयुष्यातून जातात माणसं... वाटतं त्या त्या वेळी, घडीच विस्कटली. पण कधी आयुष्याचं उद्दिष्ट त्यामुळेच स्पष्टही होतं. निदान माझं झालं." बाई म्हणाल्या.

सकाळचं मृदू ऊन आता राकट, उग्र होऊ लागल होत. एक कवडसा रोज या घरावर हक्कच असल्यासारखा आत येई. दिवसभर त्याचं हलकंसं हलत राहणं, बाहेरचं ऊन ती गडद होवो. पण हा कवडसा मात्र सौम्यसा... शर्माजींचे लक्ष कवडशावरच होते. ते उठले.

"काळजी वाटते शर्माजी, ती वेगळीच. मोकळेपणाने जित नाही बोलत. पण तो कला पुरती हाती येण्यापूर्वीच नाव, कीर्तीच्या मागे तर लागणार नाही?"
"अहो, तसा तो तुमचाही मुलगा आहेच की." शर्माजी म्हणाले.
हो. म्हणून विश्वासही वाटतो आतून. माझ्या गुरुजींसारखा. गुरूची विद्या म्हणजे एक विश्वासही. त्यांच्या स्वरांतूनच तो आपोआप सोपवला जातो शिष्यापर्यंत." त्या समाधानाने इसल्या, "आणि आत्मप्रत्यय हो गोष्ट तर सावधच करणारी प्रत्येक कलावंताला..."

- oOo -

पुस्तक: 'आर्त’
लेखक: मोनिका गजेंद्रगडकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती दुसरी (२००९)
पृ. १२१ - १२४.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : आर्त >>
---


हे वाचले का?

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

किनारा तुम्हां पामरांना

शाळेत असताना कुसुमाग्रजांची ’कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता अभ्यासाला होती. पायाखालची स्थिर जमीन सोडून उधाणत्या दर्याचे आव्हान स्वीकारत त्याच्याशी झुंज घेणारा दर्यावर्दी आणि त्याचे सहकारी यांच्या प्रवृत्तीचे शब्दचित्र तिने उभे केले होते.

’कोट्यवधि जगतात जिवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती'

असे म्हणताना एक बोट सागराकडे करत ’किनारा तुला पामराला’ म्हणत त्याच्या छातीवर बेगुमानपणे चढाई करणार्‍या, त्याला चिरडत जाणार्‍या त्या खलाशांचे ते चित्र शाळकरी वयात मनोहारी वाटावे असेच होते.

याच जातकुळीचे एक गीत अलिकडेच मो’आना या डिस्ने स्टुडिओज निर्मित चलच्चित्रपटात पाहायला मिळाले. ’Away Away, we know the way' म्हणत समुद्राला आव्हान देणारे हे दर्यावर्दी पॉलिनेशियन बेटसमूहांपैकी 'मोतुन्युई' बेटांवरील रहिवासी, 'आम्ही सतत नवनव्या बेटांचा शोध घेत पुढे जातो’ म्हणणारे, ’निर्मितो नव क्षितिजे’ म्हणणार्‍या कोलंबसाच्याच जातकुळीचे.

Tatou o tagata folau vala'auina 
Le atua o le sami tele e o mai
Ua la ava'e le lu'itau e lelei
Tapenapena
  
(We are voyagers summoned by 
the mighty gods,
Of this mighty ocean to come,
We take up the good challenge,
Get ready.)

Aue, aue
Nuku i mua
Te manulele e tataki e
Aue, aue
Te fenua te malie
Nae ko hakilia kaiga e
  
( Oh! oh! 
There is land up ahead,
A bird in flight to take us there,
Oh! oh!
This beautiful land,
The place I was looking for, 
we will make our home.)

We read the wind and the sky
When the sun is high
We sail the length of sea
On the ocean breeze
At night we name every star
We know where we are
We know who we are, who we are

Away! Away!
We set a course to find
A brand new island everywhere we roam,
Away! Away!
We keep our island in our mind
And when it's time to find home,
We know the way.

Away! Away!
We are explorers reading every sign
We tell the stories of our elders
In a never-ending chain,
Oh! Oh!
This beautiful land,
The place I was looking for,
We know the way.  
	

पण सर्व प्रकारच्या अनिर्बंधतेला बंधन घालणारा निसर्ग सर्वशक्तिमान असतो याचे प्रत्यंतर त्यांना लवकरच येते. डेमन्स अथवा समुद्री सैतानांचे थैमान चालू होते. (बहुधा तेथील वातावरण बदलते, वादळांची, धुवांधार पावसाची वारंवारता वाढली, ऋतुचक्रात बदल होतो, ज्याच्याशी जुळवून घेणे मोतुन्युई जमातीला अवघड होत जाते.) एकामागोमाग एकेक जहाजे समुद्रावरुन नाहीशी होतात, परतेनाशी होतात. 

गमावल्या सुहृदांच्या मृत्यूने धास्तावलेली, हतबल झालेली ती दर्यावर्दी जमात ’टु युअर टेन्ट्स’ म्हणत माघार घेते, भूमीबद्ध होण्याचा निर्णय घेते. त्यांची जहाजे कायमची नांगरुन पडतात. इतकेच नव्हे तर ती नजरेस पडली तर पुढील पिढ्यांमध्ये समुद्राबद्दलचे आकर्षण उफाळून येण्याची शक्यताही खुडून काढण्यासाठी एका विशाल गुहेमध्ये ती दडवून ठेवली जातात. आणि पुढील पिढ्यांमध्ये समुद्राची दहशत रुजवली जाते. ( यासंदर्भात एके काळी वणिक संस्कृती असलेल्या भारतात समुद्रपर्यटनबंदीसारखे आत्मघाती नीतिनियम केल्याबद्दल धार्मिक मुखंडांवर सावरकरांनी केलेली कठोर टीका आठवते.) 

टोळीप्रमुखाच्या वृद्ध आईमधील मूळ जमातीचे रक्त तेवढे जिवंत असते. पण समाजातील इतरांच्या मतापेक्षा वेगळी मते असणार्‍याचे जे व्हायचे तेच तिचेही होते. समाजापासून फटकून राहणार्‍या, आत्ममग्न अशा तिला ’वेडी’ आजी म्हटले जाऊ लागते...

’कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.’ असं विधान व. पु. काळेंच्या एका कथेत वाचल्याचं आठवतं. याचा व्यत्यासही तितकाच खरा असावा, निदान मोतुनुईवरील जमातीबाबत तरी होता. रक्तात गगनभरारीचं वेड असेल, तर ते पूर्णत: विझवता येत नाही किंवा पिंजर्‍यात बांधून घालता येत नाही. अनेक पिढ्या रक्तात रुजलेली समुद्र वेंधण्याची आस पुढच्या पिढीमध्ये पुन्हा अंकुरते. वेड्या आजीकडून हा वारसा टोळीप्रमुखाच्या छोट्या मुलीकडे- मो’आनाकडे, संक्रमित होतो.

नुकतेच पाय फुटलेली टोळीप्रमुखाची छोटी मुलगी मो’आना जेव्हा प्रथमच किनार्‍याकडे येते, तेव्हा त्या उधाणत्या समुद्राच्या दर्शनाने तिच्या विस्फारल्या डोळ्यात दिसणारी चमक रक्तातील गगनभरारीचे वेड दाखवून जाते.

पण तिची नाळ केवळ समुद्राच्या असीम विस्ताराशीच नव्हे तर त्यातील जीव-जिवारांशीही जोडली गेली आहे. समुद्राने तिच्याकडे भेट म्हणून पाठवलेला गुलाबी शंख घेण्यासाठी ती जेव्हा पाण्याकडे जाते त्याचवेळी घरट्यातून बाहेर पडलेले कासवाचे पिलू शिकारी पक्ष्यांपासून बचाव करत समुद्राकडे धाव घेत असते. हा प्रसंग इतक्या लहान वयातला, पण भविष्यात तिच्यासमोर उभ्या ठाकणार्‍या आव्हानाचे सूचन करुन जातो. इतक्या लहान वयातच तिला कासवाचे पिलू वाचवायचे की तो देखणा शंख उचलायचा याचा निर्णय करावा लागतो. आणि त्याक्षणी ती जो निर्णय घेते तो तिच्या पुढील आयुष्याची दिशा निश्चित करणारा असतो.

ज्या नेमक्या क्षणी तिला हा निर्णय घ्यायचा आहे त्या क्षणी तिच्या मनातील संभ्रम चलच्चित्रकारांनी अतिशय सुरेख चितारला आहे. डावा हात लांबवून शंख उचलू पाहणार्‍या मो’आनाची नजर झाडीआडून बाहेर पडणार्‍या पिलाकडे असते. आणि निवडीचा संभ्रम ज्याक्षणी तिच्या मनात येतो त्या क्षणी तिचा उजवा हात अस्वस्थपणे कसा हलतो तो आवर्जून पाहावा. जेव्हा ते पिलू सुखरुपपणे समुद्रात पोहोचते त्या परिपूर्तीच्या क्षणी तिच्या तोंडून आलेला समाधानाचा सुस्कारा ऐका आणि त्या क्षणी होणारी तिची हाता-पायांची हालचालही नीट पाहा.

शब्दांविना अभिनय फारसा दाखवू न शकणार्‍या हाडामांसाची माणसांना, एका पात्राची वट्टं आठ ते बारा स्थिरचित्रे सोबतीला घेऊन बाल हीरोंची बालिश चलच्चित्रे तयार करणार्‍यांना एवढा छोटा प्रसंगही बरेच काही शिकवू शकेल.

तिचा निर्णय पक्का होतो आणि वाळूवर समुद्राच्या दिशेने उमटत गेलेल्या तिच्या पाऊलखुणांमधून तो तुम्हा-आम्हालाही समजून जातो.

मागील पिढ्यांनी साफ बुजवून टाकलेला समुद्रओढीचा झरा तिला आता मोकळा करायचा आहे. त्यासाठी त्या संपूर्ण माघारीस कारणीभूत असलेली परिस्थिती बदलायची आहे. मागच्या पिढ्यांनी गाडून टाकलेला दर्यावर्दी स्वभाव पुन्हा सोबत घेऊन तिला हे घडवायचे आहे.

पण हतवीर्य होऊन बसलेली मागची पिढी तिला साह्यभूत होणे तर सोडाच, पण त्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे. अपवाद फक्त एकच ... वेड्या(?) आजीचा. आपल्या दर्यावर्दी भूतकाळाची ओळख तिनेच या छोट्या मुलीला करुन दिली आहे. आपल्या रक्तातील ओढीशी प्रामाणिक राहण्याचा सल्लाही. त्यामुळे स्वीकृत कार्य हे मो’आनाला केवळ स्वत:चा- आणि कदाचित समुद्राचा, भरवसा धरुनच पूर्ततेपर्यंत न्यायचे आहे.

इथे पुन्हा कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकरांच्याच प्रसिद्ध ’नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांचं हे प्रसिद्ध स्वगत आठवते.

... या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस तुमचा आमचा बाप , त्यानं चिरुन काढलं स्वत:चं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत , सा-या पृथ्वीच्या नि:शब्दावर मात करीत तो ओरडला : कुणी आहे का ? दशदिशांतून उत्तर आलं : मी आहे......... आणि माझ्यातही तूच आहेस ! या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक नवीन विश्व ज्यात मर्कटांची झाली माणसं , अक्षरांचे झाले मंत्र , स्वराचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर ! ...

ईश्वराच्या जागी ति’फिटी ही देवता कल्पिली तर गणपतरावांचे हे बोल मो’आनाला लागू पडतात. तिनेही स्वत:चा भरवसा धरुन सागर लंघून, उसळत्या लाव्हाचा सामना केला. ति’फितीला भिडली आणि आपल्या स्निग्ध स्पर्शाने तिच्यातील रक्तवर्णी धग शांत करुन हिरव्या स्वप्नाला वाट मोकळी करुन दिली. सार्‍या जगावर पसरलेल्या काजळीला जणू एका फुंकरीने उडवून देत खालचा जीवनस्रोत मोकळा करुन दिला. 

पण यासाठी दशदिशांतून साद येण्याची गरज नव्हती. एकट्या समुद्राची हाक तिला पुरेशी ठरली. छातीमध्ये कोंडलेल्या तुफानाला दार उघडून मोकळे करण्यास साह्यकर्ती झाली.

But the voice inside sings a different song
What is wrong with me?

म्हणत ती आपल्या आतल्या आवाजाची साद ऐकू लागली. त्यातून स्वत:च्या निर्णयाबद्दलचा, संभाव्य कृतीबाबतचा संभ्रम ’हाऊ फार आय विल गो’ या गाण्यातून उलगडत गेला.

I've been staring at the edge of the water
'Long as I can remember
Never really knowing why

I wish I could be the perfect daughter
But I come back to the water
No matter how hard I try

Every turn I take
Every trail I track
Every path I make
Every road leads back
To the place I know where I cannot go
Where I long to be

See the line where the sky meets the sea?
It calls me
And no one knows
How far it goes
If the wind in my sail on the sea stays behind me
One day I'll know
If I go, there's just no telling how far I'll go

I know everybody on this island
Seems so happy on this island
Everything is by design
I know everybody on this island
Has a role on this island
So maybe I can roll with mine

I can lead with pride
I can make us strong
I'll be satisfied if I play along
But the voice inside sings a different song
What is wrong with me?

See the light as it shines on the sea?
It's blinding
But no one knows
How deep it goes

And it seems like it's calling out to me
So come find me
And let me know
What's beyond that line?
Will I cross that line?

And the line where the sky meets the sea
It calls me
And no one knows
How far it goes
If the wind in my sail on the sea stays behind me
One day I'll know
How far I'll go.

डिस्ने नायिका केवळ स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजुक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्‍या उद्धाराची वाट पाहणार्‍या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्‍या असतात असे नाही. प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेणार्‍या मूलानसारख्या असतात, समुद्राचे उधाण बेगुमानपणे अंगावर घेत त्याच्यावर चढाई करणार्‍या मो’आना सारख्याही असतात. कधी एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेल्या दोन जमातींमध्ये समेट घडवणार्‍या पोकाहोन्ताससारख्या शांतिदूतही असतात.

एक उल्लेखनीय बाब म्हणजे या सार्‍या स्वतंत्र बाण्याच्या डिस्ने प्रिन्सेस या बिगर-युरपिय वंशाच्या आहेत. मूलान चिनी आहे, मो’आना समोअन वंशाची आहे तर पोकाहोन्तास ही नेटिव-अमेरिकन आहे. अगदी युवराज्ञी असून रस्त्यावरच्या फाटक्या पोराला जोडीदार म्हणून निवडण्याइतके स्वातंत्र्य घेणारी जॅस्मिन अरब-वंशाची आहे.

मो’आनाची कथा मूळची कुठल्या प्रदेशातील, तिची भाषा कुठली, मावी खरोखरच डेमिगॉड म्हणजे देवमानव होता का?, या (दंत)कथेचा काळ कोणता, वगैरे गोष्टींचा पाठपुरावा अनेक चाहत्यांनी केलेला दिसतो. माणसाच्या मनातील ही जिज्ञासा हे कुतूहल मला आश्वासक वाटते. (जाताजाता: पॉलिनेशियन बेटसमूहांपैकी हवाई बेटांमधील दुसर्‍या क्रमांकाच्या बेटाला ’मावी’चे नाव दिले आहे.

एरवी नवनवे वादंग निर्माण करुन त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठीच इतिहासाची उकराउकर करणार्‍यांची किंवा चित्रपटाच्या कथानक वा सादरीकरणाऐवजी त्यातील मुख्य अभिनेत्या... नव्हे नट-नट्यांच्या ’लुक्स’ किंवा खासगी आयुष्यातील भानगडी अधिक चवीने चघळणार्‍यांची भाऊगर्दी असलेल्या समाजात अशी अपेक्षा अस्थानीच आहे.

'हे-हे' नावाचा एक निर्बुद्ध कोंबडा मो’आनाचा सोबती आहे. त्याला चालू लागण्याची प्रेरणा झाली की चालू लागतो. चालू लागण्यापूर्वी समोर जमीन आहे की पाणी, पुढे जाण्यास मोकळी जागा आहे की अडथळा आहे याचा कणभरही विचार न करता चालू लागतो. भिंतीवर धडकला की वळून उलट दिशेने चालू लागतो, तिथे धडक बसली की पुन्हा मूळ दिशेने. दोनही बाजूला धडका खाऊनही आता 'तिसरी दिशा शोधायला हवी' याचा विचारच त्याच्याकडे नाही. समोर दगड आहे की खाणे, ते आपल्या तोंडासमोर आहे की बाजूला याची फिकीर न करता भुकेची प्रेरणा झाली की खाली झुकून दाणे टिपत राहायचे... समोर खाणे असो वा नसो. 

थोडक्यात हा कोंबडा एकप्रकारे परंपराप्रिय, बदलाचा विचारही मनाला शिवू न देणार्‍या माणसाचेच प्रतीक आहे. प्रत्येक प्रागतिक व्यक्तिला अशा विचारांध समाजाला सोबत घेऊन जावे लागते, त्याच्या विफल कृतीच्या जागी फलदायी कृती रुजवावी लागते. आणि हा नेहमीच 'थॅंकलेस जॉब’ किंवा श्रेयहीन कर्तृत्व असते, हे त्या प्रागतिक व्यक्तीने कायमच गृहित धरुन चालायचे असते. कारण त्या कृतीचे मूल्यमापन करण्याची कुवत आणि कृतज्ञ राहण्याची दानत अशा कोंबड्यांमध्ये असत नाही.

तुम्ही आम्ही मो’आनाचे नव्हे तर या 'हे-हे'चेच सहोदर म्हणून अधिक शोभतो का याचा विचार एकदा जरुर करायला हवा.

-oOo-

मेटाडेटा ऊर्फ फोलपटमसाला प्रेमींसाठी:

Auli'i_Cravalho

’अवे अवे’च्याही आधी मला ’हाऊ फार आय विल गो’ पाहायला मिळाले होते. यातील गायिकेच्या आवाजाचा पोत पाहता ही युरपिय वा अन्य परिचित पार्श्वभूमीची नसावी असा तर्क मी केला. विकीच्या कृपेने तिच्याबाबत माहितीही मिळाली. क्लोई ही नेटिव हवाई वंशाची तर ’अवे अवे’चा गायक ओपेताया फो’ई हा समोअन. दोघेही पॉलिनेशिअन!

गंमत म्हणजे या क्लोईचा जो फोटो विकीवर आहे त्यात तिने छानपैकी एक चाफ्याचे फूल माळलेले आहे. (छोट्या मो’आनानेही लालसर चाफ्याचे फूळ माळलेले आहे. ही फॅशन दोघींपैकी कुणी कुणाला दिली माहित नाही.) बिगर युरपिय किंवा तथाकथित मागास समाजात हे निसर्ग-नाते अधिक बळकट असलेले दिसते. प्रगतीच्या वाटा तंत्रज्ञानाची कास धरतात तेव्हाच निसर्गाचा हात सोडून देताना दिसतात.

अधिक माहितीसाठी:

https://www.tahiti-infos.com/The-true-origins-of-Disney-princess-Moana_a142314.html
https://www.bustle.com/articles/196387-the-translation-of-we-know-the-way-from-moana-makes-perfect-sense


हे वाचले का?

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

ट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न

'याकूब मेमन'च्या फाशीच्या सुमारास 'फाशीची शिक्षा असावी का नसावी?' या तात्त्विक प्रश्नावर चर्चा चालू असताना 'ती नसावी' अशी बाजू मी मांडत होतो.

पुढे पुरावे खोटे वा अपुरे होते, वकील आणि न्यायाधीश यांनी कदाचित त्यांची संगती योग्य तर्‍हेने लावली नव्हती, असे समोर आले तर घेतला जीव परत देता येत नसतो. व्यवस्थेने एखादा जीव हिरावून घेणे हा उलट फिरवता न येणारा निर्णय असतो. न्यायालयांच्या उतरंडीत वरच्या न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा फिरवलेला निर्णय आपण अनेकदा पाहात असतो. त्यामुळे ही शक्यता नगण्य अजिबात नाही. पुरावे, माणसांची तसेच व्यवस्थांची निर्णयक्षमता, यांना मर्यादा असतात, त्यात पूर्वग्रहांचे हीण मिसळलेले असते आणि म्हणून या सार्‍यांमधे पुनरावलोकनाची, पुनर्विचाराची शक्यता शिल्लक ठेवावी लागते.

तपशीलातले लहानसे बदलही परिस्थितीच्या आकलनावर मोठे परिणाम घडवू शकतात असा तर्क मी देत असतानाच नेमकी योगायोगाने सुबोध जावडेकर यांनी लिहिलेली ’गेम’ नावाची कथा वाचण्यात आली. माणसाच्या निर्णयक्षमतेबाबतच्या मर्यादा, उपलब्ध पर्याय, निर्णयाभोवतालची परिस्थिती यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणारी विलक्षण परिस्थिती समोर मांडत वाचकाला गुंग करून टाकत कल्पत-वास्तवाचे, सत्या-सत्यतेचे, निर्णयप्रक्रियेबद्दलचे अनेक प्रश्न ती आपल्यासमोर उभे करते.

पूर्वी ऐकलेलं समस्यापूर्तीचं एक कोडं आहे. शक्यतांचा पर्यायांचा विचार करत निर्णय घेण्याची आवश्यकता ठसवण्यासाठी ते वापरले जाते. मॅनेजमेंटच्या, टीम बिल्डिंगच्या, निर्णयप्रक्रियेच्या ट्रेनिंगमधे याचा वापर केला जातही असावा.

प्रसंग असा आहे की तुम्ही रेल्वे रुळांजवळ पोचला आहात. समोरच्या रुळांवर काही मुले खेळताहेत. तुम्हाला दूरवरून गाडी येताना दिसते आहे जी त्या पाचांच्या अगदी जवळ पोचली आहे. पण तिकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. गाडीचा वेग पाहता तुम्ही धावत गेलात तरी त्या मुलांपासून हाकेच्या अंतरावर पोचून त्यांना ओरडून इशारा देण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही हे ध्यानात येते आहे.

पण अचानक तुमच्या लक्षात येते की तुमच्या जवळच रुळ बदलण्यासाठीची लिवर आहे, जी खेचून तुम्ही येणार्‍या गाडीचे रूळ बदलू शकता. गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्या शेजारी वापरात नसलेला एक मार्ग आहे. तुमच्या जवळची लिवर सांधा बदलून त्या मार्गावर गाडी नेण्यास सहाय्य करू शकते. पण त्या मार्गावरही एक मुलगा एकटाच खेळत बसला आहे. तुमच्यासमोर आता प्रश्न आहे की तुम्ही तो सांधा बदलून गाडी दुसर्‍या मार्गावर न्याल का?

या प्रश्नाला कसे सामोरे जाता त्यावरून तुमचे उत्तर बदलत जाते. उदाहरणार्थ तुम्ही केवळ पाच विरूद्ध एक असा संख्येचा विचार केला तर तुम्ही गाडीचे रूळ बदलण्याचा निर्णय घ्याल. परंतु हा केवळ संख्यात्मक विचार झाला. गुणात्मक बाजूने पाहिले तर गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्यावर खेळणारी मुले ही बेफिकीर आहेत, तिथे खेळणे हे चूक आहे हे त्यांना समजायला हवे. याउलट वापरात नसलेल्या मार्गावर खेळणारा मुलगा हा सुज्ञ आहे. त्याने सुरक्षित जागा निवडली आहे. तेव्हा पाच बेफिकीर व्यक्तींना वाचवण्यासाठी तुम्ही एका सुज्ञाचा बळी देत आहात. आता या पार्श्वभूमीवर आपला निर्णय वेगळा असेल का? एखादा तरीही संख्यात्मक विचारांपाशी ठाम राहू शकतो. पण त्याच्यासाठी पुढची समस्या आहे.

जो वापरात नाही, ज्याची देखभाल होत नाही अशा जुन्या मार्गावर गाडी गेल्यास तिला अपघात होण्याची शक्यता वाढते. यातून ती रुळावरून घसरली तर कदाचित त्या खेळणार्‍या मुलांच्या संख्येहूनही अधिक बळी जाऊ शकतात. आता निव्वळ संख्यात्मक निकषांवरही तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. ही शक्यता नव्याने ध्यानात घेतली तर निर्णय तोच राहील का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

या मूळ समस्येचा गाभा घेऊन जावडेकरांनी 'गेम' लिहिली आहे. या समस्येमधील शक्यता या त्या खेळाच्या पायर्‍या - लेवल्स - आहेत. प्रत्येक लेवलवर एक एक समस्या देऊन त्यासंबंधी तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे परिणामही ताबडतोब तुम्हाला समोर दिसताहेत.

पुढल्या हाका

पहिली लेवल वर दिलेल्या मूळ समस्येशी बरेचसे नाते सांगणारी. इथे खेळणार्‍या मुलांऐवजी पाच जणांना रुळाला बांधून ठेवले आहे. पर्यायी रूळ वापरात नसल्याचा तपशील इथे नाही, किंबहुना त्या रुळाबद्दल कोणतेच निश्चित असे विधान त्यात नाही. तेव्हा त्याबद्दलची पूर्ण अनिश्चितता हा एक भाग त्यात गृहित धरला आहे. तो वापरातला असेल वापर बंद केलेलाही.

पण त्याहीपूर्वी या 'गेम'ची इन्ट्रोडक्शन देणारी 'झीरो' लेवल आहे. ज्यात फक्त गाडी आणि ती येत असलेल्या रुळावर बांधलेली माणसे आहेत. तुमच्या जवळच ती लिवर तुम्हाला दिसते आहे. बस इतकेच. ती लिवर गाडी येत असलेल्या रुळालाच जोडलेली आहे का, ती अजून वापरात आहे का, ती खेचल्याने गाडी येणार्‍या रुळाचाच सांधा बदलतो का, त्या सांध्याची सध्याची स्थिती रुळ बदलण्याची आहे की आता ज्या रुळावरून गाडी येते आहे ती कायम ठेवणारी आहे असे अनेक प्रश्न कथेतील खेळाडूसमोर आहेत.

म्हणजे आपण गाडीचे रुळ बदलून तिला पाच जणांना जिथे बांधून ठेवले आहे त्या रुळावरून बाहेर काढणार आहोत की उलट त्यावरच वळवणार आहोत याची त्याला कल्पना नाही. आणि तरीही त्याला लिवर ओढावी की ओढू नये हा निर्णय घ्यावा लागणार आहे. लिवर ओढली नाही आणि गाडी त्या पाचांच्या चिंधड्या उडवत गेली तर शक्य असूनही आपण त्यांचा जीव न वाचवल्याची बोच त्याला सलत राहणार आहे (तो तितपत संवेदनशील आहे असे मानू या). आणि लिवर ओढूनही तेच घडेल ही शक्यताही आहेच, कारण सांध्याची सध्याची स्थिती त्याला ठाऊक नाही.

जगण्यात अशा प्रश्नांना सतत सामोरे जावे लागते, पण शक्यतांच्या भाषेत विचार करण्याची आपल्याला सवय नसते आणि चुकल्या निर्णयाची अपरिहार्यता नशीब किंवा नियती नावाच्या 'रिसायकल बिन' ऊर्फ कचरापेटीत टाकून देऊन आपण आपली जबाबदारी झटकून टाकत असतो. फाशी द्यावी की नाही याचा निर्णय फाशी जाणारा याकूब आहे की जयसिंह आहे की मिलिंद आहे यावर अवलंबून ठेवत असतो. थोडक्यात तो प्रश्न आपल्या दृष्टीने नैतिकतेचा नव्हे तर गटाच्या बांधिलकीचा आणि विकृत सूडभावनेचा असतो.

’गेम’मधील खेळाडू धीर करून लिवर ओढतो आणि गाडीची दिशा बदलून ती शेजारील रुळावरून धडधडत निघून जाते. रुळावर बांधून ठेवलेल्यांचे प्राण वाचतात. गेमच्या पुढच्या - पहिल्या - लेवलवर पुन्हा तेच चित्र दिसते आहे. खेळाडू मागचा निर्णय आठवून बेफिकीरपणे पुन्हा लिवर ओढायला जातो.

इतक्यात त्याच्या ध्यानात येते की आता पलिकडचा रुळ मोकळा नाही, तिथे एका माणसाला बांधून ठेवले आहे. निर्णयाची पार्श्वभूमी बदलली आहे! निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्णयही कसा, कुण्या जीवांच्या जन्ममरणाचा अधिकारच त्याच्या हाती आला आहे. अधिकाराबरोबरच ती जबाबदारीही (अधिकार देणारी व्यवस्था अधिकाराला जोडून काही जबाबदार्‍या, काही कर्तव्येही नेमून देत असते याची जाणीव बहुतेकांना नसतेच) त्याला जाणवते आहे. 

वर दिलेल्या मूळ समस्येला तो सामोरा जातो आहे, संख्येच्या आधारे निर्णय घ्यावा की कसे. समजा ती पाच माणसे गुन्हेगार असतील ताणि तो एकटा निरपराध, सर्वसामान्य माणूस असेल तर? तर मग केवळ पाचांना वाचवण्यासाठी त्याला मारण्याचा निर्णय योग्य कसा ठरेल? या सार्‍या तणावातून तो अखेर एकट्या माणसाला ठार मारण्याचा निर्णय घेतो (बहुतेक लोक संख्येआधारेच निर्णय करतात) आणि धडधडत जाणारी गाडी त्या माणसाच्या चिंधड्या करत जाताना त्याचा गेम पडदा (monitor) त्याला दाखवतो.

हे दृश्य प्रत्यक्ष पाहणे हे महत्त्वाचे आहे. तो मृत्यू आता केवळ शक्यता राहिलेला नाही तर वास्तव - गेममधील जगातील का होईना - झाले आहे आणि त्याचा खेळाडूच्या मनावर परिणाम होतो आहे.त्याच्या पुढच्या स्टेजवरील निर्णयाला या निर्णयाच्या परिणामाची पार्श्वभूमी राहणार आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.

पुढच्या लेवलवर पुन्हा तेच दृश्य दिसते, फक्त एक फरक असतो. दुसर्‍या रुळावर कुणा माणसाला बांधून ठेवलेले नसते तर तिथे एक लहान मूल रांगत असते. आता पुन्हा एकवार निर्णयाच्या आवर्तात फेकला गेलेला खेळाडू अपेक्षेप्रमाणे पाच जणांपेक्षा लहान मुलाला वाचवण्याचा निर्णय घेतो.

आता निर्णयामागचा विचार संख्येचा नाही, तो गुणात्मकही नाही. रांगते लहान मूल पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या तुलनेत शून्य गुण-कौशल्ये घेऊन उभे असते. त्याच्या अस्तित्वावर अन्य कुणाचे अस्तित्वही अवलंबून नाही. ते पाच जण आणखी काही जणांचे पोशिंदे असू शकतात. यांचा मृत्यू आणखी काही आयुष्यांची वाट खडतर करणार आहेत. तरीही खेळाडू त्या पाचांऐवजी त्या लहान मुलाला वाचवण्याचा निर्णय घेतो आहे.

यात काही जणांना 'वर्तमान आणि भविष्य' अशी तुलना दिसू शकेल. कुणी असा विचार करील की त्या पाचांचा वाट्याला आजवर बरेच आयुष्य आले आहे, ते लहान मूल या जगात येऊन फारसा काळ झालेला नाही. म्हणून त्या पाचांऐवजी जगण्याची संधी मिळण्याचा त्याचा हक्क अधिक आहे. खेळाडूने इतका विचार केलेला दिसत नाही. पण त्याच्या निर्णयावर त्याहुनही अधिक प्रभाव आहे तो आपल्या भावनिक जडणघडणीचा, संस्कारांचा, उत्क्रांतीच्या वाटे आपल्या रक्तात रुजलेल्या पुढच्या पिढीच्या रक्षणाच्या प्रेरणेचा.

खेळाडू लिवर न खेचता गाडी आहे त्याच मार्गावरून पुढे जाऊ देतो आणि त्या पाच जणांच्या अंगावरून धडधडत गेलेली गाडी आणि तिच्यामागे झालेला रक्तामांसाचा चिखल त्याला पहावा लागतो. गाडी जसजशी जवळ येते तसे त्याचे ध्यान मरु घातलेले ते पाच जीव आणि त्याना चिरडायला येत असलेली ती गाडी यांच्यावर केंद्रित होते आहे.

या दरम्यान त्याचे मुलाकडे दुर्लक्ष होते आणि ते मूलही दरम्यान रूळ ओलांडून नेमके पहिल्या रुळावरच पोचते आणि त्या पाचांबरोबर त्याचाही मृत्यू खेळाडूला पहावा लागतो. इथे प्रथमच वास्तव स्थिर नसते तर ते बदलत असते आणि निर्णयाची अंमलबजावणी होईतो तो निरुपयोगी वा क्वचित घातकही होऊन बसतो याची जाणीव त्याला होते.

इतक्यात खेळाडूच्या लक्षात येतं की अरे हा तर गेम आहे. ही दुसरी लेवल तो पुन्हा खेळू शकतो. (एरवी आयुष्यात असा ’सेकंड चान्स’ आपल्याला मिळत नाही. त्याचाही अतिरिक्त ताण निर्णयावर परिणाम घडवत असतो.) तेव्हा तो पहिल्या लेवलला रिसेट करून दुसरी लेवल पुन्हा खेळू लागतो. यावेळी त्याला पुढे काय होणार ठाऊक असल्याने तो लिवर खेचून गाडी मूल रांगत असलेल्या रुळावर वळवतो. पण... आता ते मूल रांगत दुसर्‍या रुळावर जात नाही आणि त्याचा मृत्यू पुन्हा एकवार खेळाडूला पहावा लागतो.

वास्तव नुसतेच अस्थिर असते असे नव्हे तर ते 'नियत' देखील नसते याचे भान खेळाडूला ही लेवल देऊन जाते. कदाचित यामुळेच आणखी एकदा लेवल रीसेट करून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न तो करताना दिसत नाही. उलट एकाचा बळी देऊन पाचांचे प्राण वाचवल्याचे समाधान करून घेतो. यावेळी संख्येचा विचार हा निर्णयापूर्वी केलेला विचार नाही, ती त्याची पश्चातबुद्धी आहे. पहिल्या लेवलवर निर्णयाचे 'कारण' म्हणून आलेला विचार आता 'समर्थन' म्हणून समोर येतो आहे. ही घडल्या गोष्टीचे समर्थन करण्याची, आपल्या निर्णय योग्यच असल्याचा समज करून घेण्याची ही प्रवृत्ती सनातन आहे, झाल्या परिणामांची भरपाई होणे शक्य नसेल तर भविष्यातील मन:स्वास्थ्याच्या दृष्टीने अपरिहार्यही.

कदाचित त्याची संवेदनशीलता, त्याची हवे ते घडवण्याची इच्छा इतकी प्रबळ नसावी की रीसेट करून हवा तो परिणाम घडेतो ती लेवल खेळत रहावी. प्रश्न इतरांच्या जीवनमरणाचा असला नि उत्तराचे पर्याय आपल्या हाती असले तरी योग्य ते उत्तर सापडेपर्यंत ते तपासत राहण्याइतकी चिकाटी आपल्यात नसते. पण त्यात जर स्वार्थ किंवा आपण स्वतः गुंतलेले असू तर...?

जर समोर दिसणार्‍या त्या लहान मुलाच्या जागी आपले स्वतःचे मूल दिसत असते तर खेळाडूने आणखी एकवार, नव्हे पुन्हा पुन्हा लेवल रीसेट करून ते मूल वाचण्याचा परिणाम साध्य केला असता का? गेममधे का होईना आपलेच मूल चिंधड्या होऊन मृत्यूच्या स्वाधीन होताना त्याला पाहवले असते का? निदान या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार विचार करण्याची गरज आहे असे नाही.

तिसर्‍या लेवलवर या दृश्यात सांधा बदलणारी लिवर दिसतच नाही, गाडी तर येतच असते. तितक्यात त्याला एक जाडा माणूस त्या रुळालगत चाललेला दिसतो. सांधा बदलणे शक्य नसल्याने तो त्या जाड्या माणसाला रुळावर ढकलून गाडी 'डी-रेल' होईल, घसरेल असा विचार करून त्या निरपराध जाड्याला त्याच्या केविलवाण्या हाकांना न जुमानता त्या रुळांवर ढकलून देतो. गाडी डी-रेल होते, पाच माणसांचे जीव वाचतात. (इथे मोठा अपघात होऊन गाडीतील काही बळी जातील अशी एक शक्यता पुढच्या टप्प्यात येऊ शकली असती. पण जावडेकरांनी तो धागा जोडून घेतलेला नाही.)

याआधीच्या टप्प्यावर निर्णय त्याचा असला तरी मधे लिवर, रुळांचे सांधे वगैरे अन्य व्यवस्थांचा सहभाग होता. अपेक्षित परिणाम न घडता तर खेळाडूबरोबरच या यंत्रणांवरही त्याची जबाबदारी येत असते. त्यांनी योग्य तर्‍हेने किंवा अपेक्षित काम करणे वा न करणे हे खेळाडूच्या निर्णयाव्यतिरिक्त परिणाम निश्चित करणारे आणखी एक कारण असू शकते. पण इथे मात्र आपल्या कृतीच्या बर्‍यावाईट परिणामाला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. इतकेच नव्हे तर त्याने एका व्यक्तीचा स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष खून केलेला आहे. खेळाडू हा प्रथमच त्या गेमचा भाग बनतो आहे.

पुढच्या लेवलवर पुन्हा तीच स्थिती, गाडी येते आहे, लिवर गायब आहे. आता पुन्हा बाजूला कुणी माणूस असेल त्याला ढकलावे म्हणून खेळाडू पुढे होतो. पण त्याला दिसते की आता तिथे जाडा माणूस नाही, खेळाडूच्या इमारतीत राहणारी कुणी एक देखणी स्त्री त्याच्या जागी दिसते आहे.

ही स्त्री काहीशी सैल स्वभावाची, छानछोकीने राहणारी, सर्वांना हवीशी वाटणारी; जिच्याबद्दल अभिलाषा असावी पण प्राप्ती न झाल्याने चारित्र्यहीन असल्याचा ग्रह करून घ्यावा अशी. तिला रुळावर ढकलून देऊन तिने आपल्याला वश न झाल्याबद्दल तिचा सूड - गेममधे का होईना - घेता येईल या हेतूने खेळाडू सर्वशक्तीनिशी तिला रुळावर ढकलून देतो नि तिचा जीव घेतो. जाड्या माणसाचा जीव घेताना त्याचा स्वार्थ कुठेही नव्हता, आता स्त्रीला मारताना मात्र त्याचा निर्णय वैयक्तिक सूडाने प्रेरित झालेला होता.

या सार्‍या खेळात समोर घडू पाहणार्‍या संभाव्य मृत्यूबाबत खेळाडू संवेदनशील आहे, तो टाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या पलिकडे जाऊन त्याबाबत निव्वळ हतबल, किंकर्तव्यमूढ होऊन बसलेला साक्षीदार ही एक वास्तविक शक्यता शिल्लक राहते.

त्याहीपुढे जाऊन आजच्या तंत्रप्रधान जगात संवेदनशीलतेला श्रद्धांजली वाहून मरत्यांना वाचवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीवही नसणारा, हा सारा प्रसंग बेमुर्वतपणे मोबाईल कॅमेर्‍याने शूट करणारा नि सोशल मीडियावर तो वीडीओ 'व्हायरल' करणारा खेळाडू ही एक नवी शक्यताही जोडून द्यायला हवी.

पार्श्वभूमीतला लहानसा बदलही जुन्या निर्णयाला आव्हान देत असतो, वास्तवाची आपल्याला वाटते तितकी आपली जाण निर्दोष नसते, वास्तव बदलत असते, ते नियत नसते; आपला निर्णय समोरच्या व्यक्तीनुसार बदलतो, संख्येनुसार बदलतो. तो निर्णय घेणार्‍याच्या वैयक्तिक हिताहिताची, स्वार्थाची मिसळण झाली तर आणखीनच वेगळ्या वाटेने जातो.

वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना हा गेम वास्तवाचे नवे रंग दाखवत जातो, माणसाच्या निर्णयक्षमतेची एक प्रकारे खिल्ली उडवत जातो आणि अखेरीस वास्तव - कल्पिताच्या सीमारेषा पुसून टाकत वेगळ्याच मितीमधे घेऊन जातो.

---

जावडेकरांनी कथाबद्ध केलेली ही नैतिकतेची समस्या पुढे ’द गुड प्लेस’ या मालिकेत प्रत्यक्ष साकार केलेली पाहायला मिळाली. तिथे तिचे आणखी काही आयामही समाविष्ट केलेले आहेत. पण ’गेम’ आणि ’द गुड प्लेस’ मधील ट्रॉली प्रॉब्लेम यात किंचित फरक आहे. गेममध्ये खेळाडू हा रेल्वेच्या बाहेर, रुळांजवळ उभा आहे तर ट्रॉली प्रॉब्लेममध्ये तो स्वत:च त्या ट्रॉलीचा ड्रायव्हर आहे. या बदलामुळे दोघांसमोरील नैतिकतेच्या समस्येतही फार फरक पडत नाही.

त्या मालिकेतच उल्लेख आल्याप्रमाणे हा प्रसिद्ध ’ट्रॉली प्रॉब्लेम’ ब्रिटिश तत्त्वज्ञ फिलिपा फूट (Philippa Foot) यांनी १९६७ मध्ये मांडला होता. 'द गुड प्लेस’ मध्ये यावर माफक चर्चा, ती घटना प्रत्यक्ष साकार होणे आणि त्यानंतर शिल्लक राहणारा नैतिकतेचा आणखी एक पेच अशा तीन टप्प्यात येते. ते तीनही प्रसंग एकामागे एक पाहणे उद्बोधक ठरते. हे तीनही प्रसंग तीन व्हिडिओंच्या मार्फत इथे जोडले आहेत.

-oOo-

कथा: गेम
लेखकः सुबोध जावडेकर
पुस्तकः पुढल्या हाका
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती पहिली (२०११)
पृ. ३७-४९


हे वाचले का?