बुधवार, २८ जून, २०२३

None was worth my strife...

पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून जावा, तसाच हा प्रकार आहे. पण या प्रक्रियेत माझ्या बाबतीत एक गंमत नेहमीच घडून आली आहे. वस्तू व व्यक्तीच्या संबंधाचा जिथे नेमका व अटळ शेवट होतो तिथूनच माझ्या मनाला पालवी फुटू लागते! मग मानसिक संयोजनात मोठे चढउतार निर्माण होतात. त्याला इलाज नसतो. एकवेळ खूप चतुराई वगैरे दाखवून दुसऱ्यांनी रुजवलेली मुळे काढणे सोपे आहे. पण आपल्या आत्मभोगाच्या पाताळात उगवणारी ही सृष्टी नाहीशी करणे कठीण आहे !

चर्चबेल

अशा वेळी मी पाईप ओढत बसतो. मायक्रोपोलो, थ्री नन्स, विल्स, किंवा हेन्री प्रिन्सचा तंबाखू, माझ्या डोळ्यांसमोर असलेल्या दाट चिंचेच्या झाडाकडे निघून जातो, दुसऱ्या धुराच्या फेरीत त्या झाडाच्या गर्द निळाईचे तरंग माझ्याकडे परत येतात. दोन्हीही धुरांच्या निळसर लाटा सगळ्या खोलीभर पसरतात, आणि त्यावर तरंगणारे एक पावसाळी रेस्टॉरन्ट मला दिसू लागते. धुराच्या मादक लाटांवर त्याला अधांतरी तरंगते पाहणे, ही बाहेरच्या जगाचा आधार नसल्याची जाणीव मला फार प्रिय आहे ! रेस्टॉरन्टच्या काचांवर ओघळणाऱ्या पावसातून जळत्या मेणाप्रमाणे गळणारे माणसांचे चेहरे, त्यांच्या हालचाली माझ्यापासून खूप जवळ असूनही तितक्याच दूर असतात. ही सगळी पाईपची किमया, की माझ्या सुप्त मनाचे दर्शन याचा मला बोध होत नाही.

अशाच एका रेस्टॉरन्टमध्ये मी त्याला पाहिले. त्याचे नाव मला ठाऊक नाही, त्याचे गाव मला ज्ञात नाही. रोज संध्याकाळी रेस्टॉरन्टमध्ये तो नेमाने यायचा. पावसाळी संध्याकाळ त्याला कदाचित खूप भावत असावी! टेबलावर पत्ते पसरून तो रमीचा डाव मांडायचा. तोंडात इटालियन पाईप. नसलेल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी तो बोलायचा, त्याच्याशी उच्छाद मांडताना कधी कधी त्याच्या समोरची काळीभोर कॉफीही निवून जाई. काळोखाला झिडकारून उजव्या अंगाला कलणाऱ्या आल्प्सच्या बर्फशिखराप्रमाणे त्याचे डोळे हसायचे. डावाची एक लय साधून समेवर येताच, मोठ्याने एका इंग्रजी कवितेच्या ओळी तो म्हणायचा; आणि तावदानावर वितळून गोटलेले पावसाचे मेण आपल्या हाताने पुन टाकायचा ! रोजच्या सरावाने एकदा त्या ओळी माझ्या हातात आल्या-

I strove with none for none was worth my strife,
Nature I loved and next to nature Art.
I warmed both hands before the fire of life,
It sinks and I am ready to depart.

त्या ओळींनी तात्काळ माझा ताबा घेतला; पॉलग्रेव्हच्या गोल्डन ट्रेझरीत कर्त्याचे नावही सापडले. डब्ल्यू. एस. लँडोर! एनसायक्लोपीडियात त्याच्या विषयीची माहिती मिळाली. अतिशय मनस्वी व्यक्तित्वाचा हा मनुष्य होता. शाळा-कॉलेजातून अनुचित वर्तनाबद्दल काढून टाकल्याची माहितीही तिथे होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी अपेक्षा बाळगणाऱ्या अधिकार्‍यांनी त्याला परत येऊ देण्याची सवलतही देऊ केली होती; ती मात्र त्याने उद्दामपणाने झिडकारून लावली होती. लँडोरचे इंग्रजी वाङ्मयातील कर्तृत्व प्रसिद्धच आहे. मी झपाटून गेलो होतो, तो कवितेमागील उद्दाम आशयाच्या दिव्य स्पर्शाने ! आशयाचे असे दिव्य स्पर्श सगळ्याच व्यक्तित्वांच्या कुंडलीत जमून येत नाहीत; चंद्रजान्हवीचा स्वामी एखादा ज्ञानेश्वर, भगव्या उदासीचा एखादा रामदास, मूरलँडसच्या ओसाडीत शिल्पबद्ध झालेली एखादी एमिटी ब्राँटे...

मी जगात कोणाशीही भांडलो नाही; तसा प्राणसखा शत्रू मला सापडलाच नाही. निसर्ग व कला यांच्यावर मी प्रेम केले... जीवनाच्या शेकोटीवर हातांना उब मिळविली. शेकोटी विझते आहे आणि आता निघावयास मी सिद्ध आहे... शब्दांतून व्यक्त होणाऱ्या या सरळ अर्थाच्या पलीकडेच मला खरा अर्थ दिसू लागला. पावसाळी रेस्टॉरन्टमध्ये स्वतःलाच प्रतिस्पर्धी करून डाव मांडणारा तो पाईपवाला तर लँडोर नसेल ना ? अशीही कल्पना चाटून गेली. पाईपवाल्याच्या व लँडोरच्या काळात शंभर वर्षांची खिंड उभी होती. पण तसे नसावेच. अँडोरची कविता गुणगुणताना भिंगुरटीप्रमाणे तो स्वतः लँडोर झाला असावा! आणि लँडोर आता, देहातून गेहात, गेहातून विश्वात पसरला असावा !

हृदयस्थ प्रदेशाचे आकाश हाताशी लागले की, आपोआपच जगातील बाह्य संघर्षाची ठिकाणे कोसळून पडतात. संघर्ष व लढाईतील पहिले व शेवटचे प्रतिस्पर्धी आपणच आहोत हे कळून येते. स्वतःला जिंकल्यावर मग कुणाला जिंकायचे ? संतानी हेच अचूक हेरले होते. पण ही लढाई साधी नाही-

किंबहुना पांडवा
हा अग्निप्रवेशु नित नवा
भ्रातारेविण करावा
तो हा योगु

अंतर्दृष्टीचे खरेखुरे चैतन्य लहरू लागल्यावर त्याला समांतर जाणारी कला व निसर्ग आपले सांगाती होऊन जातात. जाणे-येणे ही केवळ उपाधी ठरते. येताना आवाज होत असला तरी जाताना साज झिडकारून देण्याची शक्ती प्राप्त होते ! लँडोरने हा पायासारखा प्राणवेधी आशय नेमका चिमटीत पकडला आहे. असे काही गवसले म्हणजे एखादा सार्त्र अवघड्से नोबेल पारितोषिकही मोठ्या सहजतेने नाकारून जातो !

आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभचिंतन करावयास आलेल्या मित्रांना उद्देशून लँडोरने ही कविता म्हटली. मित्रांना त्याच्या मनस्वी औद्धत्याचे मोठे वैषम्य वाटले असेल! माझ्या पाईपच्या धुरावर तरंगणारे ते पावसाळी रेस्टॉरन्ट व माझ्या मनाला अनाहूतपणे फुटणारी पालवी मात्र इतःपर माझ्या तक्रारीचा विषय राहिली नाही.

-oOo-

पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ७९-८२.


हे स्फुट पुस्तकामध्ये 'डब्ल्यू. एस्. लँडोरची कविता' या शीर्षकाने समाविष्ट केलेले आहे.

हे वाचले का?

रविवार, १८ जून, २०२३

वाळूचा किल्ला

गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती...

समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ?

गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या-

'ने मजसी ने परत मायभूमीला
सागरा, प्राण तळमळला. '

एवढ्यात चिमुकला, गोड आवाज आला, "अहो- "

"का हो?"

"जरा लक्ष ठेवा हं, माझ्या किल्ल्याकडं."

"का? तुम्ही कुठं निघालात किल्ला सोडून?"

त्या तिकडे हात वर करून ती म्हणाली, "मी जरा तिकडे जाऊन येणार आहे.' "

"बरं, लवकर या."

"आले लगेच." असे म्हणून ती चिमुरडी पोर केस उडवीत पळालीसुद्धा. नाव विचारण्यापुरता वेळही तिने मला दिला नाही.

वाळूचा किल्ला

जवळ जाऊन मी तिचा किल्ला पाहिला. सुरेख बांधला होता. चोहोबाजूला चार बुरूज होते. चौफेर भक्कम तट होता. पायऱ्या होत्या, दरवाजे होते. चौफेर खंदक होता आणि त्यात पाणीसुद्धा आणून ओतलेले होते. माझ्यासारख्याने केअरटेकर व्हावे, अशी ही वास्तू होती खरी.

माझ्या मनात आले की, आम्ही वयाने एवढे होतो तेव्हा ओढ्याच्या ओल्या वाळूत पायावर चिमणीची ओबडधोबड कोटी करायला शिकलो होतो. एवढा नीटनेटका किल्ला कोणी आम्हाला कधी शिकवला नाही. किल्ला कधी पाहिलाच नव्हता; पाहिली होती ती चिमणीची कोटीच.

अगदी किल्ल्याशेजारीच ठाण मांडून बसणे बरे दिसणार नाही, म्हणून थोडे अंतर ठेवून बसलो.

खऱ्या-खऱ्या वास्तूचे रक्षण करायचे म्हणजे चोराचिलटांकडून, उगाचच तावदानावर दगड फेकणाऱ्या विध्वंसक पोरांकडून किंवा वादळ, पाऊस, आग ह्यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून. वाळूतच पाया खोदून वाळूने बांधलेल्या ह्या लुटीपुटीच्या वास्तूला मुद्दाम धोका द्यायला येणार कोण, आणि तिचे संरक्षण म्हणजे जोखीम ती काय?

पण, नाही म्हटले तरी जोखीम होतीच.

आत्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेल्या मालकीणबाई परत येऊन एकवार त्यांच्या हाती हा किल्ला सुपूर्द केला की मी सुटलो !

तेवढ्यात कुणाचे तरी भले मोठे कुत्रे धावत आले. एकाएकी थांबले. किल्ल्याजवळ गेले. नाक खाली करून त्याने वास घेतला आणि इकडे-तिकडे बघितले. काही तरी कुकर्म करून, ह्या गोंडस वास्तूला कमीपणा द्यायचा त्याचा इरादा मला स्पष्ट दिसला.

आजूबाजूला दगडधोंडा नव्हताच. मी नुसताच हात उगारला आणि "हां..." म्हणून दरडावणी दिली.

कुत्रे लटकन हलले आणि तोंड फिरवून पुन्हा धुम पळाले.

एक संकट टळले. मी उठून जाऊन किल्ल्याच्या अगदी शेजारी जाऊन बसलो.

मग ध्यानात आले की, खंदकातले पाणी आटून गेले आहे. म्हणजे तिच्या हातात होती तसली रंगीबेरंगी बादली घेऊन पाणी आणणे आले. ते ओतून खंदक भरणे आले. आता बादली कुठून पैदा करावी बरे?

बीचवर दुकान होतेच. म्हटले, एक विकतच घेऊन टाकावी. अर्थात तिची होती त्यापेक्षा लहान. नाहीपेक्षा अपमान केल्यासारखे व्हायचे.

बादली घेऊन टिटवीसारखा समुद्राकडे गेलो. एक डोळा किल्ल्याकडे होताच. जवळपास कोणी नाही, हे बघून ते कुत्रे पुन्हा यायचे. बादली भरून घेऊन आलो आणि सगळा खंदक नीट पाण्याने भरला. ह्या उलाढालीत शर्टाच्या वरच्या खिशातले सिगारेटचे पाकीट खंदकात पडले. सिगारेटी थोड्याफार भिजल्या.

त्या पाकिटातून काढून वाळूवर अंथरल्या आणि ते वाळवण अन् किल्ला राखीत स्वस्थ बसून राहिलो.

आत्ता तिकडे जाऊन येते, म्हणून मालकीणबाई कुठे गुंतल्या होत्या, कुणाला ठाऊक!

आता सूर्याचा तांबडा गोळा पाण्याच्या रेषेवर अगदी वावभर अंतरावर आला होता. दोघे-चौघे कोळी लांबडे जाळे घेऊन समोरच मासे झोळीत होते. जाळे ओढून ते किनाऱ्यावरच्या वाळूत आले. त्यांनी जाळे झाडले. रुपेरी पोटे दाखवीत मासे तडफडू लागले आणि मंडईत ताजी भाजी न्यायला यावे तशी समुद्राकाठी मासे न्यायला आलेल्या गिऱ्हाइकांची, बघ्यांची, मुलांची गर्दी कोळ्यांभावती झाली. आपणही उठून जावे आणि मासे कसले, केवढे आहेत, हे पाहावे- असे मला वाटले. पण किल्ल्यापासून दूर जाणे धोक्याचे होते.

आणखी काही वेळ गेला.

हळूहळू भरती येते आहे, हे माझ्या ध्यानात आले. बापरे! म्हणजे हा किल्ला आता पाण्याखाली जाणार. छे-छे; असे होऊन उपयोगी नाही. काय बरे करावे?

वर किनाऱ्यापाशी असलेल्या तात्पुरत्या हॉटेलापुढे मोकळ्या खोक्यांचा ढीग पाहिल्याचे आठवले. धावत गेलो आणि एक खोके उचलून आणले. दुसरे आणले, तिसरे आणले. वाळूतच जरा पाया घेऊन ह्या खोक्यांची भिंत करून किल्ल्याला आडोसा केला.

फेसाळ पाणी आता अगदी जवळ आले होते. मालकीणबाईंचा अजूनही पत्ता नव्हता. तेवढ्यात हॉटेलातला झिप्रा पोरगा लुंगी सावरीत आलाच.

“काय हो, खोकी आणताय उचलून- काय विचारायची पद्धत आहे की नाही? फुकटचा माल नाही तो ! "

मी खिशातून पाकीट काढीत विचारले, "हा माल मी विकत घेतला, असं समजा. काय किंमत आहे एका खोक्याची ?"

पोरगा गडबडला.

“विक्रीची नाहीत ती. माल आणण्यासाठी लागतात हरघडी. पणजीहून माल आणावा लागतो. उपयोगाची आहेत ती आमच्या!”

"मीही ती उपयोगातच आणतोय!"

माझ्या थंडपणामुळे पोरगा आवेश सोडून खाली उतरला.

त्याने किल्ल्याकडे, पाण्याकडे बघितले. त्याचा चेहरा हसरा झाला. भरतीच्या पाण्यापासून किल्ला वाचवण्यासाठी माझी धडपड चालू आहे, हे त्याच्या ध्यानी आले. म्हणाला, “बरं. काम झालं म्हणजे जागच्या जागी आणून ठेवा!"

"अगदी अवश्य. बिनघोरी राहा तुम्ही.'

पाणी सारखे पुढे-पुढे येत होते आणि ह्या बाईसाहेबांचा पत्ता नव्हता. जाऊन येते म्हणून आपले आई-वडील बसले असतील तिकडं गेल्या असतील आणि कदाचित तिकडेच रमल्या असतील.

हातावर वळलेली सिगारेट ओठांत ठेवून कोणी भटक्या माणूस हिंडत-फिरत आला आणि किल्ल्यापाशी येऊन बघत उभा राहिला.

त्याने मला विचारले, “तू बांधलास?”

"नाही, लहान मुलीनं. मला येत नाही."

"सवय लागते.'

मी उत्सुकतेने विचारलं, “तुला येईल का बांधता ?”

"हां, ह्याच्यापेक्षा फसकलास बांधीन."

"मग मला एक बांधून दे, त्या तिकडे. पाणी तिथं येणार नाही ना?"

"नाही यायचं. चल, बांधतो."

हाताच्या बाह्या सावरून भटक्या तयार झाला. भरतीचे पाणी पोचणार नाही, अशा ठिकाणी बसून कामाला लागला. एखाद्या धंदेवाइकासारखा त्याचा हात चालला होता.

किनाऱ्यावर बरीच मुले हुंदडत होती; पण किल्ल्याच्या मालकिणीचा पत्ता नव्हता. बहुधा ती कोका-कोला किंवा आइस्क्रीम खाण्यात दंग असावी. खोक्याची भिंत काही वेळ किल्ला वाचवू शकली, पण अखेरीला किल्ला पाण्याखाली गेलाच. ती तिन्हीही खोकी मी मालकाकडे पोचवून आलो.

दरम्यान, भटक्याने किल्ला पुरा केला होता. सिगारेट वळण्यासाठी तळहातावर तंबाकू अंथरीत तो रुबाबात बोलला, "बघ बरं, तुझ्या मनासारखा झाला का ?"

"झकास झालाय."

त्याचे आभार मानून मी एक रुपयाची नोट काढून देऊ लागलो. तो म्हणाला, “छ्या! माझ्या पोरानं सांगितलं असतं, तर दिला नसता का बांधून? ठेव पैसे." आणि उलट मला सलाम करून तो निघून गेला.

मी वाट पाहत राहिलो. आता दिवस मावळला होता. हळूहळू किनारा रिकामा होत होता. ही पोर आपल्या आई-बापाबरोबर घरी निघूनही गेली असावी. आपण वाळूचा किल्ला बांधलाय आणि त्याच्या देखभालीसाठी कुणाला तरी बसवून आलोय, ही गोष्ट विसरूनही गेली असेल.

मुलांचे कसे असते, ते आपल्याला ठाऊक नाही का?

ते मघाचेच का आणखी कुठले कोण जाणे, कुत्रे पुन्हा आले आणि किल्ल्याचा वास घेऊन काही कुकर्म न करता निघून गेले. मी त्रयस्थासारखा पाहत होतो.

कुत्र्यामागोमाग लहान मुलांचे एक टोळके आले. किल्ल्याभोवती उभे राहिले. त्यांनी किल्ला नीट पाहिला.

मग ‘होऽ' करून एक पोर किल्ल्यावर नाचले. तशी सगळीच पोरे नाचली. त्यांनी किल्ल्याची नामोनिशाणीसुद्धा ठेवली नाही. आरडाओरडा करीत पोरे पळाली. मी उदासीनच राहिलो.

बघता-बघता अंधार झाला.

किनाऱ्यावर अगदी तुरळक माणसे राहिली.

ती रंगीत बादली हलवीत मी मुक्कामाकडे परतलो.

-oOo-

पुस्तक: वाळूचा किल्ला
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती तिसरी, चौथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. १-५.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)

---


यांसारखे आणखी:
    एका गोष्टीची गोष्ट
    अबोला


हे वाचले का?

सोमवार, १२ जून, २०२३

स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

तो बाहेर पडून चालू लागला तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारली व थांबवले. एका घराच्या कट्टयावरून एक माणूस उतरला व त्याच्याकडे आला. त्याने किंचित आश्चर्याने पाहिले व लगेच त्याला ओळख पटली. तो माणूस. मघाचा व्यापारी होता.

“ मी तुझीच वाट पाहत थांबलो होतो, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, नाही ?” व्यापारी म्हणाला. त्याच्या आवाजात रेशमी कापडाच्या घडीचा मृदुपणा होता. त्याच्या बरोबर चालू लागता त्याने हात मागे एकमेकात अडकवले व तो म्हणाला, “तूही एक प्रवासी आहेस, तू कोठेही जायला मोकळा आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलायला थांबलो होतो. जर तू पायमोकळा आहेस, तर तू एखादे काम स्वीकारशील ? त्यात तुम्हा भरपूर द्रव्य मिळेल, अनेक शहरे पाहता येतील आणि तुझ्यावर कसलीही जबाबदारी राहणार नाही. ”

“म्हणजे अगदी मनाजोगते काम दिसते हे ! ” तो हसून म्हणाला. “ खरे म्हणजे मी प्रवासी नाही, तर एक भटक्या आहे. मला काही काम स्वीकारून स्वतःला बांधून घ्यायचे नाही, कारण मी भटकत असतो तरी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तोंडात लगाम घेऊन चालणार नाही. पण काम तरी कसले, काय आहे ?”

रमलखुणा

“काम असे आहे. मी व्यापारी आहे, तो हिर्‍यामोत्यांचा नाही, तर गुलामांचा आहे. उद्याच सकाळी गुलामांचा एक तांडा कारवा गाठण्यासाठी माझ्या गलबतातून जाणार आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मला एका ताठ तरुण माणसाची फार गरज आहे. मी तुला पाहिले त्यावेळी मला वाटले, हा माणूस आपल्याला मिळाला तर फार बरे होईल. हा माणूस पाहू लागला की याच्या नजरेत कोठे क्षितिज आड येत नाही. ”

पण या शब्दांनी तो आज फार अस्वस्थ झाला. त्याने तुटकपणे विचारले, “पण आपल्यासारख्याच माणसांची खरेदी-विक्री करून पोट जाळण्यात कमीपणा नाही का ?”

“तू हा प्रश्न प्रथमच विचारणार हे मला माहीत होते व त्याच उत्तराची मी तयारी करत होतो.” व्यापारी शांतपणे म्हणाला. “शिवाय, तो प्रश्न विचारणारा तूच काही पहिला नाहीस. इतर वेळी मी हसून गप्प राहत असे. कारण, प्रश्न काय, –कोणीही मूर्ख माणूस प्रश्न विचारू शकतो. पण ज्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत अशी लायकी असणारा हजार-लाखांत एकटाच असतो. त्यात का बरे कमीपणा वाटावा ? मेंढ्या, घोडे, उंट, यांचा व्यापार करण्यात शरम नाही, तर माणसांचाच व्यापार करण्यात कसली शरम आली आहे ? हे प्राणी अगदी क्षुद्र आहेत, माणूस तेवढा उच्च आहे, म्हणून त्याला त्यांची खरेदी-विक्री करण्याचा अधिकार आहे, हे तुला कोणी सांगितले ?

“घोडा माणसाप्रमाणे कृतघ्न नाही. उंट वादळाच्या प्रसंगी मालकाला एकटा टाकत नाही. स्वतःची स्त्री देऊन त्या जनावरांपैकी कोणी मोठेपणा मिरवित नाही. माणूस जेवढा खालच्या पातळीवर उतरू शकतो, तेवढे उतरणारे जनावर तुला माहीत आहे? शिवाय, एखाद्याला हातपाय आहेत, तो पोट भरतो, तो प्रजा निर्माण करतो, केवळ एवढ्यामुळेच का तो तुझ्या बरोबरीचा ठरतो ? मग तर तू वेडा आहेस. काही माणसे खास तुझ्या बरोबरीची नाहीत, आणि हेही लक्षात ठेव, तू स्वतः काही माणसांच्या बरोबरीचा नाहीस. सर्व माणसांत ज्या गोष्टी समान आहेत, त्या फक्त माणसांतच आहेत असे नाही. त्या सगळ्या प्राण्यांतच आहेत. पण ज्या गोष्टींमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्यांच्याबाबत समानता असणे केवळ अशक्य आहे.

“आणि गुलामगिरी तू समजतोस तेवढी दुर्मिळ नाही. धर्मसंस्थापक काहीही खुळचट बोलला तरी ते शब्द गळ्यात अडकवून तुम्ही हजारोंनी गुलाम होता, हजारो वर्षे गुलाम राहता, आणि विशेष म्हणजे ही गुलामगिरी जेवढी प्राचीन, तेवढा तुम्हांला तिचा फार अभिमान वाटतो. तुझा सम्राट सांगेल त्या देशाविरुद्ध तुम्ही आंधळेपणाने तलवारी उगारता ! अरे, तू या देशात जन्मला असतास, तर येथल्यासारखाच पोशाख करायच्या साध्या गुलामगिरीतून सुटायला तुला फार धैर्य दाखवावे लागले असते ! काही गुलामांना तांड्यातांड्याने निरनिराळ्या देशांत विकले जातात. बाकीचे आपल्या घरात राहूनच गुलाम म्हणून मरतात.”

“तुझा तो धंदाच असल्याने तू त्याला असले स्वरूप देत आहेस इतकेच !” तो म्हणाला.

“नाही. तू चुकलास. तो माझा धंदाच असला तरी माझ्या अनेक धंद्यांपैकी तो एक आहे. माझे पोट काही त्यावर अवलंबून नाही. मला संपत्तीचा मोह नाही. तुझ्याएवढे उंच असे दिनारांचे ढीग माझ्या हाताखालून जात असले तरी माझे स्वतःचे घर अगदी साधे आहे. त्यात दरबारी गालिचे नाहीत, आणि माझ्या घरात एकही गुलाम नाही.”

“मग हा धंदा चालू ठेवण्याचे कारण काय ? ” त्याने विस्मयाने विचारले.

“तेच तुला तू जर माझे काम स्वीकारशील तर चांगले समजेल. दीडदोनशे गुलामांवर तुझी सत्ता असेल. तू काय मी काय, आम्ही त्यांना गुलाम केले नाही. ते गुलाम झाल्यावरच आमचा त्यांच्याशी संबंध आला. तेव्हा मनाला कसली टोचणी असण्याची गरज नाही. तुझ्या सत्तेला मर्यादा असणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या जीविताची तुझ्यावर कसलीच जबाबदारी राहणार नाही.

“त्यांतील काही मेले तर तुझा त्यात काहीच दोष नाही असे खुद्द इतर गुलामच तुला सांगतील. जबाबदारी आणि कर्तव्ये यापासून मुक्त असलेली अनिर्बंध सत्ता अत्यंत उन्मादकारी असते. हा नवा अनुभव तुला येईल. ते गुलाम काही वेळा चांगले वागतील पण चांगले वागले की हटकून त्याचे पारितोषिक मिळतेच असे नाही, हे त्यांना माहीत असते. त्यामुळे त्यांचा चांगुलपणा अत्यंत निरपेक्ष असतो. उलट पाठीवर चाबकाचा फटकारा बसला की त्यांना फारसा खेद नसतो, कारण अशा तर्‍हेचे प्रायश्चित्त मिळते, ते आपल्याकडून अपराध झाला म्हणूनच नव्हे, हे देखील त्यांना माहीत असते. तुझी लहर म्हणजेच तुझा न्याय, हेच त्यांच्या मनात पूर्ण ठसलेले असते. मित्रा, तू अगदी देवाप्रमाणे त्यांच्यावर हुकमत गाजवशील ! मद्याच्या नशेत तू बरळलेला एक शब्द म्हणजे धर्म, तू केलेले एखादे अर्थहीन कृत्य म्हणजे न्याय आणि केवळ चाळा म्हणून तू दिलेला आसुडाचा प्रहार म्हणजे कदाचित स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त– असले वातावरण तुला इतर कोणत्या व्यवसायात मिळेल ते तरी सांग !”

“पण हे असे काही कायम चालणार नाही. हे काम म्हणजे झोपलेल्या ज्वालामुखीच्या टोकावर बसल्यासारखे आहे. दीडदोनशे चालती बोलती माणसे– त्यांतील एक माणूस तरी कधीतरी जागा होईल, संतापाने प्रतिकार करील आणि मग तुझे बुडबुड्याचे साम्राज्य फुटून जाईल!” तो म्हणाला.

गुलामांचा व्यापारी किंचित वाकला व मोठमोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, “हे बघ, तुझी सारी उमर आहे त्यापेक्षा जास्त वर्षे मी या धंद्यात काढली आहेत. आणखी एक गोष्ट, मला वाटते, मी तुला सांगितली नाही. मी स्वतः गुलाम म्हणून तांड्यात भटकलो आहे. अरे, तू म्हणतोस ते स्वातंत्र्याचे प्रेम माणसात भूकतहानेप्रमाणे उपजत आणि अखंड नसते. हां, तसे काही प्राण्यांत असू शकेल.”

व्यापाऱ्याने आपल्या एका बोटाकडे पाहत आठवत म्हटले, “ उदाहरणार्थ, डोंगरी ससाणा घे. तू त्याला पाचसात वर्षे खाणेपिणे दे. पण पहिली संधी मिळताच तो तुझे बोट फोडील. तू जर निष्काळजी राहिलास तर तो तुझे डोळे कोचून काढील आणि निघून जाईल. त्यांच्यातला हा निखारा कधीच विझत नाही. काही मुठीएवढी पाखरे असतात, पण ती पिंजऱ्यातच दाण्यांना स्पर्श न करता मरून पडतील. माणसाचे तसे नाही. स्वातंत्र्यप्रेम ही एक मुद्दाम निर्माण केलेली जाणीव आहे, आणि ती सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती सहज मरून जाते. म्हणूनच काही प्रबळ युयुत्सू देश शतकानुशतके दास्यात राहतात. आणि त्या अवधीत प्रजेची संख्या देखील भरमसाट वाढते.

“तू दोन वर्षे एक माणूस माझ्या ताब्यात दे. हातात आसूड न घेता, त्याच्या पायात साखळदंड न घालता मी त्याचा गुलाम करून दाखवीन. मी काय करतो माहीत आहे ? मी या साऱ्यांपेक्षाही भयंकर अस्त्र वापरतो. मी त्यांना चांगले कपडे देतो, खायला भरपूर घालतो, आणि रात्री शांतपणे झोपू देतो. यात जखडलेला माणूस गुलामगिरीतून काय सुटणार ? एकदा मी माझ्या सगळ्या गुलामांना सांगितले, ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल निघून जावे.”

“मग काय, ते तात्काळ नाहीसे झाले असतील नाही ?” त्याने उत्सुकतेने विचारले.

“चुकलास. अवघी तीन माणसे गेली, आणि त्यांतील दोन आठवडाभरातच परतली. कारण काय तुला माहीत आहे! येथे काय, अन्यत्र काय, गुलामगिरी होतीच. निदान या ठिकाणी त्यांच्या भुका तरी निश्चितपणे भागत. आणखी एक गोष्ट घ्यानात घे, ते जरी गेले असते तरी स्वतंत्र झालेच नसते. दुसरी कसलीतरी गुलामगिरी त्यांनी आनंदाने स्वीकारली असती, कारण माणूम गुलाम असतो तो मुख्यत्वेकरून आपल्या मनात ! मग ते कोणत्यातरी प्रमुखामागून आंधळेपणाने गेले असते, मठात राहिले असते, किंवा कोणत्यातरी नव्या प्रेषितामागे मेंढरासारखे हिंडले असते. आपण स्वतंत्र, स्वतः म्हणून जगण्याचे ओझे सगळ्यांनाच पेलते असे का तुला वाटते ? या ठिकाणी सारे ठीक असते. दुसरा कोणीतरी विचार करतो, हुकूम सोडतो, नियम करतो, त्यामुळे स्वतः जगण्याची व त्याचे प्रायश्चित्तही भोगण्याची जबाबदारी आपोआपच नाहीशी होते.

“ही गोष्ट धर्माला देखील फायद्याचीच आहे. जेथे प्रश्न विचारण्याची, स्वतंत्रपणे वागण्याची पूर्ण मुभा आहे, असे किती धर्म आजपर्यंत जगात टिकले आहेत ? प्रत्येक धर्मावर अशी पाटीच लावलेली असते— ‘आपले वृषण येथे फोडून घ्या. तुम्हांला शांती मिळेल !’

“यात शेवटी एकच कठोर सत्य राहते. आपण एकेका शब्दाचे गुलामच राहतो. पण शब्दांसारखी मायावी पिशाच्चे दुसरी नसतील. तेव्हा जर प्रथम कोणती गोष्ट करायचे आपण धैर्य दाखवले पाहिजे तर एकामागोमाग कासवे उलटी करीत गेल्याप्रमाणे शब्द पालथे करीत जायला शिकले पाहिजे, म्हणजे त्यांचे फिकट दुबळे भाग देखील आपणाला दिसतील. प्रत्येक शब्दातच त्याचे विरुद्ध, विरूप दर्शन देखील कोठेतरी दडलेले असते. आणि तू शब्दाचे एकच रूप ध्यानात घेऊन त्याच्यावर विसंबलास की भलत्याच वेळी बरोबर विरुद्ध असे रूप दाखवून तो तुला फशी पाडेल. दीर्घकाल मनात द्वेष बाळगून सूड मिळवून विजय हस्तगत करावा, तर तो क्षण रिकाम्या करवंटीसारखा ठरून जय हाच पराजय ठरतो. मंगल प्रेमाच्या परिपूर्तीत क्षणिक वासनांच्या क्षणिक समाधानाचा लगदा हाताला चिकटतो.

“आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीत जास्त काय आले याची अखेर कबुली असते. स्वातंत्र्याची आपल्या मनाप्रमाणे व्याख्या करून माणूस त्याविषयी बडबडतो, त्या वेळी तो कुंभारकिड्याच्या त्या लहान घरट्यात गुलाम होऊन राहतो; तर आपण गुलाम आहो अशी कठोर जाणीव पूर्णपणे स्वीकारणारा माणूस स्वतंत्र होतो. आणि आपल्या ज्ञानवंतांनी केले आहे काय, तर अमर्याद वाळवंटात असल्या शब्दांची बुजगावणी उभी करून आपण वाळवंटाचा नकाशा केला आहे व प्रवास सहज केला असा तोरा मिरवला आहे. आपण सामान्य माणसे अगतिक होतो; म्हणून दिशा नसली तरी गती तर आहे एवढ्या क्षुल्लक समाधानाने या कासवाच्या पाठीवर बसून प्रवासाला निघतो. ”

-oOo-

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. १२२-१२७.

या वेच्यामध्ये मी लहानसा बदल केला आहे. यात दोन ते तीन दीर्घ परिच्छेद होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदांचे मी दोन-तीन लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


हे वाचले का?