शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

वेचताना... : जेरुसलेम, एक चरित्रकथा

'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्‍या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव्हंशी अवघड दिसते. त्यातच जिथे संघर्ष असतो तिथे परस्परविरोधी दावे असतात. अशा परिस्थितीत अभ्यासकाचे कार्य अतिशय अवघड होऊन बसते. जेरुसलेम ही नगरी तीन धर्मांचे नि अनेक पंथांचे श्रद्धास्थान असल्याने आणि त्यावरील वर्चस्वासाठी असंख्य झालेल्या लढाया , अगणित माणसांचे गेलेले बळी, साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणावर झालेला विध्वंस यामुळे दुसर्‍या बाजूने तो संवेदनशीलही होऊन बसतो.

'जेरुसलेम: एक चरित्रकथा' ही साम्राज्यांची, सम्राटांची, राजांची त्यांच्या वंशावळीची जंत्री नाही, तो जेरुसलेम या नगरीचा शोध आहे. सुमारे दोन हजार वर्षांचा हा इतिहास सायमन सीबग माँटफिअरी याने कालानुक्रमे मांडला आहे. याचा परिणाम म्हणून काही व्यक्ती, राज्यांचे, सत्तास्थानांचे (उदा. रोममधील पोपची गादी) उल्लेख अचानक उगवल्यासारखे दिसतात. पण त्यांचा जेरुसलेमशी जेव्हा संबंध येतो तेव्हाच ते येतात आणि संदर्भासाठी त्यांची पार्श्वभूमी माफक तळटीपांच्या स्वरूपात येते. सायमनने आपला हा दृष्टिकोन संपूर्ण पुस्तकात काटेकोरपणे जपला आहे.

जेरुसलेम

जेरुसलेम नगरीचा इतिहास हा प्रथम बायबलमधे ग्रथित केलेला आहे. त्यामुळे तिच्या अभ्यासात बायबल हा एक आधार म्हणून वापरले जाणे अपरिहार्य आहे. पण बायबल ज्यातून सिद्ध झाले असे सुरुवातीचे ग्रंथ ढोबळपणे दोन गटांनी लिहिले असे मानले जाते. पहिले 'एल' या कननाईट देवाचे उपासक होते तर दुसरा गट हा याहवेह (यहोवा) या इस्रायली देवाचा उपासक. या दोन गटांनी सांगितलेल्या कहाण्यांमधे अनेक बाबतीत तपशीलात फरक पडत होते. त्यात येणारे विसंगत तपशील, कालानुरूप होत गेलेले - हेतुतः वा अनवधानाने केलेले - बदल यामुळे अभ्यासकाने बायबल सर्वस्वी विश्वासार्ह इतिहास सांगते असे मानून चालत नाही. जेरुसलेमच्या इतिहासाचा वेध घेताना बायबलची चिकित्सा नि अभ्यास अपरिहार्य ठरतो.

अर्वाचीन काळामध्ये जेरुसलेम आपल्याला ठाऊक झाले ते इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात कळीचा मुद्दा झाले तेव्हा. या नगरीला साडेतीन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. ही नगरी कोणत्याची साम्राज्याची राजधानी कधीच नव्हती. किंबहुना जेरुसलेमचे राज्य हे कधी ईजिप्तचे फॅरो, असीरियन राजे, बॅबिलोनियन सम्राट, रोमन, बायझंटाईन सम्राट, पर्शियन, ऑटोमन, माम्लुक, कैरोचे शिया खलिफा, मक्केचे सुनी खलिफा, इस्माईली, सूफी राजे यांच्या अधिपत्याखाली होते. या पलिकडे यावर आर्मेनियन, जॉर्जियन, मंगोल, तार्तार, सीरियन, सुदानी वंशाच्या राजांचे राज्यही अल्पकाळ होते. क्रूसेडच्या काळात इंग्लिश, नॉर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या उत्तर युरोपियन वंशाच्या लोकांनीही इथे काही काळ सत्ता राबवली.

शासन बदलताना बहुतेक वेळा जेरुसलेम उध्वस्त झाले, मोडले, रसातळाला गेले, पुन्हा उभे राहिले, नव्या विध्वंसाला सामोरे गेले. अगणित माणसांची आणि घोड्यांची थडगी या भूमीने वागवली, उध्वस्त होताना पाहिली, स्त्रियांवर अत्याचार होताना पाहिले. भावाने भावाला, आईने मुलीला, बापाने मुलाला दगा देताना पाहिले. जनावरालाही कधी दिली गेली नसेल अशी वागणूक माणसाने माणसाला दिलेली अनुभवली... आणि हे सारे कशासाठी तर 'माझा शांततेचा धर्म खरा की तुझा' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. हा वर वरचा निस्वार्थ हेतू खरवडून काढला तर प्रत्येक शासकाच्या, प्रेषिताच्या मनात दिसते ती सत्ताकांक्षा. बहुसंख्या निर्माण करणे किंवा सत्ता हाती घेऊन तिच्या बळानेच कोण खरे कोण खोटे हे ठरवण्याचा मापदंड जेरुसलेमच्या भूमीत हजारो मैल खोलवर रुतून बसलेला दिसतो.

पण निव्वळ या राजकीय आणि हिंसक इतिहासापलिकडे ज्या तीन धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून या नगरीकडे पाहताना इतिहासाची मांडणी त्या अंगानेही व्हायला हवी. पण कालानुक्रमे इतिहास मांडताना यातील बरेचसे तपशील दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. मूळचे सॉलोमनचे मंदिर, होली सेपलकार चर्च, मागाहुन आलेल्या मुस्लिमांची अल्-अक्सा मशीद यांचा इतिहासही या निमित्ताने सायमनने बर्‍याच तपशीलाने मांडला आहे. 

परंतु राजकीय इतिहासाच्या तपशीलांमधे तो कसाबसा अंग चोरून उभा आहे असे भासते. त्यातही त्यांची उभारणी, विध्वंस आणि फेरउभारणी या चक्रातून जाणे हे एकुण नगरीच्या आणि श्रद्धास्थानांचे भागधेय दर्शवते. ही श्रद्धास्थाने, त्यांच्या अनुषंगाने उभी राहिलेली आर्थिक नि राजकीय ताकद यांची पुरेशी मांडणी झाली असली, तरी पर्यटन हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या या नगरीच्या अन्य उदीम व्यापाराबाबत वा तिथे राहणार्‍या लोकांच्या जीवनशैलीबद्दल फारसे लिहिले गेलेले दिसत नाही.

दुसर्‍या शतकातील जेरुसलेमबाबत लिहिताना सायमन म्हणतो 'ज्यू लोकांना ग्रीकांबद्दल आदर नि तिरस्कार दोन्ही होते. जितांची जेत्यांबद्दल किंवा शोषितांची शोषकांबद्दल असते तशी काहीशी भावना त्यांची होती. एकीकडे ग्रीक हे व्यभिचारी, चारित्र्यहीन आणि अनावश्यक आधुनिकतेकडे झुकलेले आहे असा आक्षेप असूनही जेरुसलेमवासीयांनी त्यांची दिमाखदार, चैनी जीवनशैली स्वीकारलेली होती'. असा एखादा अपवाद वगळता 'नगरीचे चरित्र' म्हणताना अपेक्षित असलेले सामान्य जेरुसलेमवासीयांचे जीवन बव्हंशी दुर्लक्षित राहिलेले दिसते.

धर्मसंस्था आणि श्रद्धा म्हटले की त्यांचे अपरिवर्तनीय, श्रेष्ठ आणि कालातीत असल्याचे गृहितक सर्वसाधारणपणे दिसते. धर्मश्रद्धेच्या जोडीला वंशश्रेष्ठतेचीही जोड अनेकदा दिली गेलेली दिसते. आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी वापरले गेलेले निरनिराळे मार्ग, त्यासाठी प्रसंगी विधिनिषेध न बाळगता अनैतिक मार्गांचा केलेला वापर, इतिहासातील तपशीलात आणि जमिनीवर उभ्या असलेल्या स्मारकांत फेरफार करून श्रेय लाटण्याचे केलेले प्रयत्न, वर्चस्वासाठी एकाच धर्माअंतर्गत पंथाच्या लोकांनी परस्परांवर केलेले अत्याचार, सर्वस्वी नवे निर्माण करण्याची खात्री नसेल तेव्हा जुन्या श्रेष्ठींचे आपणच वारस असल्याचे सिद्ध करण्यासाठी केलेल्या लटपटी चे असंख्य तपशील आणि आपल्या अनेक गृहितकांना सुरुंग लावणारे आधार सायमनने मांडले आहेत. एकुण धर्मसंस्थेच्या वाटचालीचा अभ्यास करणार्‍यांनाही यातून बरेच काही नवे सापडू शकेल.

पवित्र मानले जाणारे जेरुसलेम अक्षरशः अगणित मानवांचे थडगे आहे तसेच ते माणसाने माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचे, बंधुभावाच्या प्रवृत्तीचेही. शांततेच्या धर्माची प्रस्थापना करण्यासाठी हजारो लोकांचे गळे कापणार्‍या तलवारींचे उरुस इथे भरले. रक्तपिपासून, नृशंस लोकांचे खंजीर इथे तळपले, स्वार्थलोलुप धर्माधिकार्‍यांनी माया जमवली, कटकारस्थाने केली, स्वार्थासाठी सम्राटांचे लांगुलचालन केले आणि प्रसंग येताच त्यांना दगाही दिला. प्राकृतिक भूकंपानेही ही नगरी अनेकदा हादरली, उध्वस्त झाली. संपूर्ण मानवी इतिहासाचे दर्शन या एका भूमीच्या इतिहासात आपल्याला घडते आहे. इथे न घडलेल्या अशा सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाच्या घटना अन्य इतिहासात क्वचितच सापडतील इतका हा इतिहास शक्यतांच्या दृष्टीने परिपूर्ण म्हणावा लागेल.

---

सुमारे साडेसातशे पृष्ठे असलेल्या आणि अनेक टीपा असलेल्या या पुस्तकातून एखादा वेचा निवडणे हे शिवधनुष्य उचलण्याइतके अवघड असावे असा सुरुवातीला माझा होरा होता. पण सुदैवाने जेरुसलेमच्या इतिहासाचे लक्षणबिंदू (मार्कर) म्हणता येतील अशा बहुतेक गोष्टी एका जागी देणारा एक उतारा सापडला.

या एकाच उतार्‍यामध्ये काय नाही. वर्तमान सत्ताधार्‍यांच्या पतनासाठी भविष्यवाणीचा, नवजात बालकाचा वापर, धर्मस्थांनांचे आर्थिक नि सक्रीय राजकीय घडामोडींचे केंद्र असणे, त्यातून त्याने एकाच वेळी श्रद्धाळू नि लुटारू यांना आकर्षित करणे, आदर्श भविष्यकाळाची स्वप्नाळू मांडणी, त्यासाठी पारलौकिकाचा आधार घेणॆ, माणसाने माणसाचा ’पुरा तयाचा वंश खणावा’ इतक्या टोकाची केलेली लांडगेतोड... सारे काही यात येते.

जेरुसलेमच्या, तिच्या आसपासच्या भूमीच्या, त्या परिसरात वास्तव्य करणार्‍या विविध वंशांच्या, देव नि प्रेषितांच्या अनुयायांच्या, संघटित बिब्लिकल धर्मांच्या संदर्भातील हा इतिहास जगातील इतर कोणत्याही भूभागाशी निगडित इतिहासाचे प्रतिबिंबच दाखवतो असे माझे मत आहे. धर्मसत्ता ही राजकीय सत्तेच्या आश्रयाने राहते, प्रसंगी स्वत:च राजसत्तेला अंकित करु पाहते. या दोनही सत्ता एकत्रितपणे आर्थिक सत्तेस आपली बटीक बनवून ठेवतात. (आज भांडवलशाही जगात परिस्थिती उलट होऊ लागली आहे.)

कटकारस्थाने, भविष्यवाणी, पारलौकिक देवांचा आशीर्वाद वा त्यांचा दृष्टान्त वगैरे तद्दन थापाच हत्यार म्हणून वापरुन सत्तेचा सोपान चढणे हा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. धर्म, अर्थ नि राज अशा तीन सत्तांच्या दडपशाहीपुढे ज्यांच्या हितासाठी त्या निर्माण झाल्या त्या सामान्यांचे भरडले जाणारे जिणे हा इतिहासाचा सर्वात कलंकित भाग आहे.

इतिहासातील सर्वात वैभवशाली इतिहास हा बव्हंशी गुलामगिरीच्या वा लुटालुटीच्या कलंकित विटांनी उभारलेला दिसतो. आणि तरीही भूतकालभोगी समाजांमध्ये कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेऐवजी ’महासत्ते’ची संकल्पना अधिक आकर्षक मानली जाते. जेरुसलेमचाच नव्हे तर जगातील बहुतेक भूभागांचा इतिहास हा फारसा प्रेरणादायी नसतो हे माझे मत अधिकाधिक दृढ होत जाते ते त्यामुळे.

(या लेखाचा ’---’ या चिन्हांपर्यंतचा भाग हा ’मीमराठीLive’ या वृत्तपत्राच्या २१ जून २०१५च्या अंकात पुस्तक-परिचय म्हणून प्रसिद्ध झाला होता.)

- oOo -

‘जेरुसलेम: एक चरित्रकथा’ या पुस्तकातील एक वेचा : जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या


हे वाचले का?

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या

इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते.

जेरुसलेम

ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर हस्तिदंती कबुतर सापडलं आहे. बहुतकरून जेरुसलेममधल्या एखाद्या आलिशान घराच्या सजावटीसाठी त्याचा उपयोग करण्यात आला असावा. डेव्हिडच्या नगरीच्या खाली असलेल्या खडकांतल्या तलावाभोवती फिनिशियन मातीत घडवलेले राजेशाही शिक्के सापडले आहेत. त्या शिक्क्यांना 'बुलै' असं नाव होतं. त्या शिक्क्यांवर तत्कालीन जहाजांची चित्रं आहेत. त्याचप्रमाणे पंख असलेला सिंहासनारूढ सूर्य अशी पवित्र चिन्हंसुद्धा आहेत. त्या शिक्क्यांसोबत तिथे १०,००० माशांची हाडंसुद्धा सापडली आहेत. ही हाडं बहुधा समुद्रप्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी भूमध्य समुद्रावरून येताना आणली असावीत; पण काही काळात जेझबेलप्रमाणेच अथालियाही लोकांच्या तिरस्काराचा विषय झाली. तिच्या मूर्तिपूजक धर्मगुरूंनी मंदिरात बाल आणि इतर देवतांची प्रतिष्ठापना केली. सहा वर्षांचा काळ गेल्यावर याहवेहच्या मंदिरप्रमुखाने जेरुसलेममधल्या मातब्बर सरदारांना एका गुप्त बैठकीला बोलवलं आणि छोटा राजकुमार जेहोआश जिवंत असल्याचं त्यांच्यापुढे उघड केलं. मग त्या छोट्या राजकुमारासमोर त्यांनी निष्ठेच्या शपथा घेतल्या. मग मंदिरप्रमुखाने सर्व रक्षकांना मंदिरात अजूनही साठवून ठेवलेले राजा डेव्हिडचे भाले आणि ढाली दिल्या आणि त्या मुलाचा सार्वजनिकरित्या राज्याभिषेक केला. त्या प्रसंगी सर्व लोकांनी 'राजा चिरायू होवो' अशा घोषणा दिल्या आणि तुताऱ्या वाजवून जल्लोष केला.

राणीने 'सैनिक आणि प्रजेने घातलेला हा गोंधळ' ऐकला आणि ती राजवाड्यातून तातडीने किल्ल्याच्या शेजारच्या मंदिरात आली. आता ते मंदिरही लोकांनी भरून गेल होतं. राणी ओरडली, 'दगा! दगा!'; पण सैनिकांनी तिला पकडलं आणि पवित्र पर्वतावरून फरफटत खाली नेऊन मंदिराच्या दाराबाहेर तिची हत्या केली. 'बाल' या देवतेची पूजा करणाऱ्या धर्मगुरूंना लोकांनी पकडून मारलं आणि त्या मूर्ती फोडून टाकल्या.

राजा जेहोआशने एकूण चाळीस वर्षं, म्हणजे इसवी सन पूर्व ८०१ सालापर्यंत राज्य केलं. त्यानंतर सिरियन राजाने जेरुसलेमवर हल्ला करून त्याला मंदिराच्या 'खजिन्यातलं सर्व सोनं' द्यायला भाग पाडलं; पण त्या राजाची हत्या झाली. त्यानंतर तीस वर्षांनी इस्राइलच्या एका राजाने जेरुसेलमवर हल्ला केला आणि मंदिर लुटलं. त्यानंतर मंदिराच्या वाढत्या संपत्तीमुळे ते आक्रमकांसाठी एक प्रकारचं आमीषच झालं.

तरीदेखील जेरुसेलमचं दुर्गम वैभव असिरियाच्या वैभवाशी स्पर्धा करू शकत नव्हतं. असिरियाचं साम्राज्य नव्या राजाच्या आधिपत्याखाली स्फूर्तीने भरू लागलं होतं आणि इतर राज्यांना गिळण्यासाठी नरभक्षक श्वापदाप्रमाणे सज्ज झालं होतं. असिरियन लोकांचा प्रतिकार करण्यासाठी इस्राइल आणि अराम-दमास्कसच्या राजांनी युती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ज्यूडाचा राजा आहाझ याने असिरियाविरुद्धच्या युतीत सामील व्हायला नकार दिला तेव्हा इस्राइली आणि सिरियन लोकांनी जेरुसलेमलाच वेढा 'दिला, पण त्यांना नव्याने बांधलेल्या तटरक्षक भिंती तोडता आल्या नाहीत. उलट राजा आहाझने मंदिरातला खजिना आणि मदतीच्या याचनेचं पत्र असिरियाचा राजा तिसरा तिग्लाथ्पिलेसर याला पाठवून दिलं. इसवी सन पूर्व ७३२ साली असिरियन लोकांनी सिरियाचं राज्य स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं आणि इस्राइलचा विध्वंस केला. जेरुसलेममध्ये बसलेला राजा आहाझ मात्र असिरियाला शरण जायचं की लढायच, याची चिंता करत राहिला.

आयझेया: जेरुसलेम, सौंदर्यवती आणि वेश्या

आयझेयाने राजाला सबुरीचा सल्ला दिला: याहवेह जेरुसलेमचं रक्षण करेल. आयझेया हा एक राजकुमार, धर्मगुरू आणि राजकीय सल्लागार होता. राजाला इमॅन्युएल (अर्थ - आपल्यात निवास करणारा ईश्वर) नावाचा एक पुत्र होणार असल्याचं आयझेयाने सांगितलं 'आपल्यामध्ये एक असं मूल जन्म घेईल' जे 'सर्वशक्तिमान ईश्वर, शाश्वत पिता, शांतीचा राजकुमार' असेल, जे 'चिरकाल शांतिपर्व' घेऊन येईल.

'बुक ऑफ आयझेया’ लिहिणारे कमीतकमी दोन लेखक आहेत. त्यातल्या एकाने दुसऱ्यानंतर २०० वर्षांनी त्या ग्रंथात भर टाकली. पहिला आयझेया हा केवळ प्रेषित नव्हता, तर तो दूरदर्शी कवीसुद्धा होता. असिरियन लोकांनी सारंकाही गिळंकृत करण्याचा आक्रमणवादी सपाटा लावला होता, पण त्या दिवसांतही मंदिराच्या विनाशानंतरच्या एका गूढ जेरुसलेममधलं जीवन कसं असेल, याची कल्पना करणारा तो पहिलाच माणूस होता. त्याने लिहून ठेवलंय, 'मला एका उंच सिंहासनावर बसलेला देव दिसला आणि त्याच्या प्रभेने सारं मंदिर भरून गेलेलं होतं... आणि सभागृहात सगळीकडे धूर पसरला होता.'

आयझेयाला 'पवित्र पर्वत' अत्यंत प्रिय होता. त्याच्या नजरेत ती एक लावण्यवती स्त्री होती, 'झायनच्या कन्येची टेकडी, जेरुसलेमची टेकड़ी', कधी सदाचारी, तर कधी वेश्या, सात्विकता आणि संस्कृती नसेल, तर नुसत्या जेरुसलेमवर मालकी असून काहीच अर्थ नाही. सारं काही नष्ट झालं आणि 'जेरुसलेमचा विध्वंस झाला', तरी एक नवं आध्यात्मिक जेरुसलेम अस्तित्वात असेलच. ते जेरुसलेम ’प्रत्येक मानवी निवाऱ्याच्या ठिकाणी वास करेल.' तो शिकवतो: प्रेम आणि दयाभाव; 'सत्कर्म करायला शिका; न्याय करा; पीडितांची पीडा दूर करा; अनाथांचा पुरस्कार करा; विधवांना न्याय मिळवून द्या.' आयझेयाला एक असामान्य साक्षात्कार झाला : 'उंच पर्वतांवर देवाचं वसतिस्थान प्रस्थापित होईल... आणि राष्ट्रांची त्याकडे ओढ असेल.' या दुर्गम आणि कदाचित पूर्णपणे पाडाव झालेल्या नगरीतले कायदे, तिथली जीवनमूल्यं आणि कहाण्या पुन्हा नव्याने जन्म घेतील. 'मग अनेक लोक पुढे येऊन म्हणतील, 'चला रे, आपण देवाच्या पर्वताकडे जाऊ. जेकबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ; आणि तो आपल्याला त्याचा मार्ग दाखवेल...' झायनमधून सगळीकडे देवाचा कायदा प्रस्थापित होईल आणि जेरुसलेममधून देवाची शिकवण सर्वत्र पसरेल. आणि मग तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल.' आयझेयाने एका गूढ कयामतच्या दिवसाचं भविष्य वर्तवलं. जेव्हा एक विधिवत् राजा- एक मसीहा अवतरेल : 'तेव्हा योद्धे त्यांच्या तलवारीचं रूपांतर नांगराच्या फाळात करतील आणि भाल्यांचं रूपांतर तण काढण्याच्या कोयत्यात करतील... त्यानंतर ते कधीही युद्ध करणार नाहीत. त्या दिवशी मृत लोक पुनर्जीवित होतील, 'लांडगे आणि कोकरं एकत्र नांदतील आणि बिबळ्या बकरीच्या पिलासोबत विश्रांती घेईल.'

या तेजस्वी कवितेत कयामतच्या दिवसाच्या ओढीबद्दल प्रथमच लिहिलं गेलं आहे. अगदी आजपर्यंत जेरुसलेमच्या इतिहासात ही ओढ जाणवते. आयझेयाने केवळ ज्यू धर्मालाच नव्हे, तर ख्रिश्चन धर्मालाही आकार दिला. येशू ख्रिस्ताने आयझेयाचा अभ्यास केला होता आणि येशूची शिकवण- मंदिराचा विध्वंस आणि जेरुसलेमची शाश्वत आध्यात्मिक संकल्पना ते तळागाळातल्यांचा कैवार - याच काव्यात्म दृष्टीतून आली आहे. स्वतः येशूकडे आवझेयाने भाकीत केलेला इमॅन्युएल म्हणून पाहिलं गेलं.

राजा आहाझ दमास्कसला गेला आणि त्याने तिग्लाथ्पिलेसरला लवून कुर्निसात केला. परतताना त्याच्यापाशी मंदिरात ठेवण्यासाठी असिरियन पद्धतीचा देव्हारा होता. ज्या वेळी तिग्लाथ्पिलेसर हा राजा इसवी सन पूर्व ७२७ साली मरण पावला त्या वेळी इस्राइल राज्याने उठाव केला, पण असिरियाचा नवा राजा दुसरा सार्गोन याने इस्राइलची राजधानी समारियाला तीन वर्ष वेढा घातला आणि सारं इस्राइलच गिळंकृत केलं. तिथल्या २७,००० लोकांना त्याने असिरियात पाठवून दिलं. या सगळ्या धुमश्चक्रीत इस्राइल या उत्तरेच्या राज्यातल्या बारापैकी एकूण दहा टोळ्या इतिहासातून जवळजवळ नामशेषच झाल्या.

सध्याचे ज्यू लोक उरलेल्या दोन जमातींचे वंशज आहेत. ते ज्यूडाच्या राज्याचे नागरिक या नात्याने जगले. आयझेयाने इमॅन्युएल म्हणून संबोधलेलं मूल म्हणजे राजा हेझेकिया होता. तो प्रेषित नव्हता, तरीही त्याच्याकडे राजकारणासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी सगळ्यात मौल्यवान गुण होता- नशीब! त्याने उभारलेल्या जेरुसलेमचे थोडे थोडे पुरावे अजूनही मिळतात.

असिरियाविरुद्ध बंड करण्यासाठी राजा हेझेकियाने वीस वर्षं वाट पाहिली. प्रथम त्याने मंदिरातल्या मूर्त्या नष्ट केल्या, मंदिरातली कास्य धातूची सर्पमूर्ती तोडली, आणि प्रजेला पासोवर सण साजरा करण्याची आज्ञा दिली. त्याच्या लोकांनी साजरी केलेली पासोवर सणाची ती सुरुवातीच्या काळातली आवृत्ती होती. तेव्हा जेरुसलेम प्रथमच पश्चिमेकडच्या डोंगरावर पसरू लागलं होतं. उत्तरेकडच्या इस्राइल राज्याचा नि:पात झाल्याने जेरुसेलम शहर निर्वासितांनी भरून गेलं. बहुधा त्या निर्वासितांनी त्यांची प्राचीन पोथ्यापुस्तकं सोबत आणली असावीत. त्यात इस्राइलचा पुरातन इतिहास आणि आख्यायिका समाविष्ट असाव्यात. त्याच काळात जेरुसलेममधल्या विद्वानांनी ज्यूडाच्या परंपरा, चालीरीती आणि उत्तरेकडच्या जमातींच्या इस्राइली परंपरा आणि चालीरितींचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच सुमारास ग्रीक लोक होमरचं 'इलियड' हे महाकाव्य लिहून ठेवत होते. याच पोथ्यापुस्तकांमधून पुढे बायबलची निर्मिती झाली.

- oOo -

पुस्तक: जेरुसलेम: एक चरित्रकथा
लेखक: सायमन सीबग माँटफिअरी
अनुवाद: सविता दामले
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
आवृत्ती पहिली.
वर्ष: २०१४.
पृ. ७७-८१.

टीपा:
१. इराण आणि इराकमध्ये राहणारे पुरातन ज्यू लोक त्या दहा जमातींचे वंशज असल्याचा दावा करतात त्या जमातींना अगोदर असिरियन लोकांनी आणि नंतर बॅबिलॉनी लोकांनीसुद्धा त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित केलं. अलीकडेच झालेल्या जनुकीय संशोधनानुसार हे ज्यू लोक खरोखरच इतर ज्यू जमातीपासून २,५०० वर्षांपूर्वी विलग झाले असल्याचं सिद्ध झालं आहे. तरीसुद्धा गायब झालेल्या या इस्राइली जमातींना शोधण्याच्या अनावर ओढीने हजारो काल्पनिक कथांना आणि सिद्धान्ताना जन्म दिलेला आहे. या दहा जमाती अगदी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीसुद्धा 'सापडल्या' आहेत त्यामुळे त्यांत उत्तर अमेरिकेतले मूळचे आदिवासी आणि इंग्रज यांचासुद्धा समावेश झाला आहे.

२. डेव्हिडच्या शहराची तटबंदी आणि मंदिराची टेकडी यांच्या बाहेरच्या परिसरात नवीन उपनगर विस्तारली होती. मोरिया पर्वत आणि पश्चिमेची टेकडी यांच्या मध्ये असलेल्या टायरोपाएन दरीत माख्तेश हे उपनगर बसलं होतं, तर मित्रेश हे उपनगर पश्चिम टेकडीवरच वसलं होतं. आज तिथे ज्यू वस्ती आहे. त्या वेळी शहराच्या भोवताली थडगी बांधून त्यात मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं मरणोत्तर दफन करत असत: 'या थडग्यांत राजाच्या (...) याहू नावाच्या राजदरबारातल्या साहाय्यकाला पुरण्यात आलं आहे.’ सिल्वान गावातल्या एका थडग्यावर असं लिहिलं आहे 'इथे सोनं, चांदी वगैरे काही नाही. फक्त त्याची आणि त्याच्या गुलाम पत्नीची हाडं आहेत जो कुणी हे थडगं उघडेल त्याला शाप लागेल.' पण त्या शापाचा काहीही परिणाम झाला नाही, ते थडगं लुटण्यात आलं. तिथे आजच्या घडीला कोंबड्याचं एक खुराडं आहे, पण प्रत्यक्षात हा राजसेवक हेझेकियाच्या दरबारातला असावा त्याने स्वतः साठी खूपच भव्य कबर बांधून ठेवली होती, म्हणून आयझेयाने त्याच्यावर टीका केली होती. त्या माणसाचं नाव बहुधा शेब्नायाहू असावं.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : जेरुसलेम: एक चरित्रकथा >>
---


हे वाचले का?

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट

काही वर्षांपूर्वी 'चाहूल' नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो.

अलिकडेच 'रेगे' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर तो एकच शत्रू, शासक आणि भक्षक असतो, पण या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला तो बाहुबली, त्याचे स्पर्धक आणि त्या दोघांचे सामायिक, मुख्य शत्रू - आणि त्या चित्रपटापुरते बोलायचे तर त्यांच्याच पातळीवरची - पोलिस यंत्रणा असे अनेक शत्रू निर्माण होतात. इच्छा असो अगर नसो, त्यांना सामोरे जावे लागते.

तीन चार वर्षांपूर्वी आपल्याकडे मोठ्या मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा व्यापक आर्थिक, व्यावसायिक आणि (अन्यही) परिणाम घडवणारा निर्णय शासनाने घेतला होता. त्यातून काळा पैसा बाहेर येईल अशी ग्वाही सरकार आणि सरकार समर्थक देत होते. यात काळा पैसा हा रोकड स्वरूपात साठवून ठेवला जातो असा ठाम समज दिसत होता...

हे तीन परिच्छेद वाचल्यावर ’अरे बाबा, पण या तीनही गोष्टींचा परस्परांशी संबंध काय?’ असा प्रश्न बहुतेकांच्या मनात नक्की उमटला असणार. पण थांबा, या तिघांसोबत आणखी एक चौथा लिहितो आणि मग मुद्द्यावर येतो.

अलीकडेच ’ब्रेकिंग बॅड’ नावाच्या एका मालिकेबाबत बराच बोलबाला झाला आहे. एक तथाकथित पांढरपेशी व्यक्ती, एका दुर्धर आजाराने ग्रासलेली; ’केवळ कुटुंबियांच्या भावी आयुष्याची तरतूद करण्यासाठी’ आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा गैरवापर करुन अंमली पदार्थांचे उत्पादन, व्यवसाय करते. त्यासाठी त्याच्या सामाजिक स्तरात कल्पनाही केली जाणार नाही अशा पातळीवरचे गुन्हे करत जाते.

’केवळ कुटुंबासाठी’ म्हटल्यावर मला हटकून माझ्या आसपासचे अनेक बाप आठवतात. त्यांना पैसे मिळवण्याचा कैफ असतो. यशाची धुंदी हवी असते. विविध प्रकारच्या - समाजात मिरवता येतील अशा - जड वस्तूंचा संग्रह करण्याची लालसा असते. त्यासाठी ते कुटुंबियांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. पण हे सारे करताना, ’हे सगळं कुणासाठी करतो आहे, तुमच्यासाठीच ना?’ असे विचारण्याचा शहाजोगपणाही त्यांच्याकडे असतो.

’ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर मला असाच स्वार्थाला परमार्थाचे रूप देणारा वाटला. गुन्हेगारी मानसिकता, निर्ढावलेपण ही त्याच्यात मुळातच आहे. जगण्याच्या शर्यतीत मागे पडल्याने या ना त्या मार्गाने स्वत:ला सिद्ध करण्याची, यशाने नाही निदान पैशाने तरी सध्या पुढे गेलेल्यांना मागे टाकता येईल या ईर्षेनेच तो सारी नैतिकता गुंडाळून त्यात उतरलेला आहे.

पांढरपेशा समाजात असलेले muscle power (बाहुबल), money power (द्रव्यबळ) आणि अर्थातच political power (राजकीय बळ) या तीन सत्तांबाबत असलेले सुप्त आकर्षण हा एक रोचक मुद्दा आहे. एकाच वेळी ते आकर्षण आणि त्याच वेळी उघडपणे त्यांचा केलेला धिक्कार किंवा त्यांतील ढासळत्या मूल्यांबद्दल केलेला गजर, पण स्वहिताचा मुद्दा येताच अघोषितपणे, वैयक्तिक पातळीवर तडजोड करत त्यांना शरण जाणे- किंवा त्या व्यवस्थेचा भाग होत जाणे हे एकुण पांढरपेशा समाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यांना एकाच वेळी नैतिकतेचा झेंडा मिरवायचा असतो आणि त्याचवेळी त्या नैतिकतेला धाब्यावर बसून मिळणारे फायदेही पदरी पाडून घ्यायचे असतात. त्यातून एक दांभिक रसायन तयार होते आणि ते त्या समाजाचा चेहरा होऊन राहते.

अलीकडे नेटफ्लिक्स’वर ओझार्क नावाची एक मालिका पाहण्यात आली आणि हे सारे आठवत गेले.

Scratch, wampum, dough, sugar, clams, loot, bills, bones, bread, bucks... money! That which separate the 'haves' from 'have nots'.

But what is money? It's everything if you don't have it, right? Half of all American adults have more credit card debt that savings. 25% have no savings at all. And only 15% of the population is on track to fund even one year of retirement. Suggesting what? That middle-class is evaporating? Or the American dream is dead? You won't be sitting there, listening to me, if the latter were true.

You see, I think most people just have a fundamentally flawed view of money! Is it simply agreed upon unit of exchange for goods and services? $3.70 per gallon of milk? Thirty bucks to cut your grass? Or is it an intangible? Security or happiness... peace of mind? Let me propose a third option. Money as a measuring device!

You see, the hard reality is how much money we accumulate in life is not a function of who's the president, or the economy, or bubbles bursting. Or bad breaks or losses. It's about the American work ethic. That one that made us the greatest country on the Earth. It's about bucking the media's opinion as to what constitutes a good parent. Deciding to miss the ball game, the play, the concert, because you have resolved to work and invest in your family's future. And taking responsibility for the consequences of those actions. Patience! Frugality! Sacrifice! When you boil it down, what do these things have in common? Those are choices!

Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!

वर जोडलेला व्हिडिओ ’ओझार्क’च्या पहिल्याच भागाची सुरुवात आहे. पैसा म्हणजे काय याचे सुरेख विवेचन त्यात केले आहे. But what is money? It's everything if you don't have it, right? हे बहुसंख्येच्या मनात पुरेपूर ठसलेले असते. आणि म्हणून जिवंत असेतो, मिळेल तितका, साधेल त्या मार्गाने पैसा मिळवत राहणे हे बहुतेकांचे साध्य होऊन बसते. पण या विवेचनाच्या अखेरीस येणारे वाक्य- "Money is not peace of mind. Money is not happiness. Money is, at its essence... that measure of a man's choices!" हेच माझ्या मते पैसा या संकल्पनेचे वास्तविक मूल्य आहे.

पण आपल्याला त्याचे आकलन होत नसते. झाले तरी त्याला नजरेआड करण्याकडेच बहुसंख्येचा कल असतो. आपण केलेली निवड, घेतलेले निर्णय यांचे दृश्य फलित म्हणजे मिळवलेला पैसा. पण तो निव्वळ पदरी पडला म्हणजे केलेली निवड, घेतलेले निर्णय योग्य वा वाजवी ठरले असे असते का? त्या निर्णयांची फलश्रुती अशी एकरंगी असते का? या प्रश्नांच्या उत्तरांना सामोरे जाणे आवश्यक असते. अनेकदा अप्रिय उत्तरे समोर ठेवणार्‍या या प्रश्नांकडे कानाडोळा करणे बहुसंख्य लोक पसंत करतात. पण कोंबडं झाकल्याने उजाडायचे राहात नाही तसे तुमच्या निर्णयातून निर्माण झालेली परिस्थिती, झालेले आनुषंगिक परिणाम वास्तवाचा भाग होत जात असतात. त्यापासून पळ काढणे बहुतेकांना शक्य होत नसते.

Ozark

तसे पाहिले तर 'ओझार्क' ही एक गुन्हेगार कथा आहे. गुन्हेगारी जगाची कथा म्हणजे सूडाचा प्रवास अथवा ’थेट कृती’चा वापर करुन लढवलेली स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याला हिंसेचा वापर करुन नामोहरम करण्याचे, आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या गोष्टी असतात असा- हिंदी चित्रपट पाहून झालेला, समज असतो. जोडीला रोमान्स, फितुरी असली की मामला अधिक सेलेबल होतो.

समीक्षकांकडूनही थोड्या दखलीची अपेक्षा असेल तर कुठलेतरी शेक्स्पिअरचे नाटक पकडून त्याचे कथानक अंडरवर्ल्डमध्ये बसवून दिले की सगळेच समाधानी होतात. सदैव अतिसामान्य, विचारशून्य प्रेक्षक समोर ठेवून भांडवली मानसिकतेने चित्रपट आणि मालिकांचे रतीब आपल्याकडे घातलेले दिसतात. लिखित साहित्याचेही फार वेगळे नाही, त्यांची चलनी नाणी थोडी वेगळी आहेत इतकेच.

पण गुन्हेगारी जगाची कथा ही बौद्धिक डावपेचाची, अर्थकारणाची, व्यापार-उदिमाचे जग कवेत घेणारी असू शकते हे फारसे अपेक्षित नाही. त्यात राजकारण आले तरी केवळ भ्रष्ट राजकारण्यांच्या रूपात येते. धोरणात्मक डावपेच, त्यांचे कथानकात स्थान वगैरे तर विसराच.

’ओझार्क’ने एखाद्या पारंपरिक गुन्हेगार कथेच्या धाटणीपेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. पहिले म्हणजे ते गुन्हेगारीचे जग एका कुटुंबाला - ब्रेकिंग बॅड’ प्रमाणे केवळ कुटुंबप्रमुखाला नव्हे! - केंद्रस्थानी ठेवून पाहिले आहे. दुसरे, दैववादी दृष्टीकोन नाकारुन जगातील प्रत्येक घटिते, बदल हे आपल्या निर्णयांचे, पर्याय-निवडीचे फलित असते या मुद्द्यावर त्यात भर आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्णय एकेकट्याचे असतात, तसेच काही जणांनी मिळून घेतलेले असतात. या सार्‍या निर्णयांचा परस्परांना छेद जातो, त्यांचे संमीलन होते, तेव्हा त्यातून घटिताची दिशा निश्चित होते. कथानकाच्या सुरुवातीला निवेदनरूपात आलेला, वर समाविष्ट केलेला ’पूर्वरंग’ पुढे पदोपदी प्रत्यय यावा इतका बिनचूक बसवला आहे. यात चलन, पैसा म्हणजे पर्याय-निवडीचे मोजमाप असते अशी व्याख्या केलेली आहे.

मार्टिन ऊर्फ ’मार्टी’ बऽर्ड हा आपल्या मित्रासोबत एक गुंतवणूक सल्लागार कंपनी चालवतो आहे. गुंतवणुकीचे विविध मार्ग, त्यातले चढ उतार, डावपेच, तो जाणून आहे. एका टप्प्यावर त्याच्या पार्टनरकडून नव्या गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो. संभाव्य गुंतवणुकीचा आकडा पाहून मित्र हुरळून जातो. पण मार्टी मात्र त्यांच्या सार्‍या बॅलन्सशीट आणि गुंतवणुकीची पुरी माहिती घेतल्याखेरीज त्यांचे अकाउंट स्वीकारण्यास तयार नाही. त्याचा अभ्यास केल्यावर या गुंतवणूकदाराचा दाखवायचा व्यवसाय आणि प्रत्यक्श व्यवसायात फरक आहे आणि त्यांचे आर्थिक नियोजन ढिसाळ तसंच अनेक ठिकाणी संशयास्पद आहे असे त्याला दिसते. त्यावरुन हा प्रचंड गुंतवणुकीचा प्रस्ताव तो नाकारतो. मित्र अवाक् होतो.

पण मार्टीचा निर्णय अचूक असतो. हा प्रस्ताव घेऊन येणारा एका प्रसिद्ध ड्रग कार्टेलचा प्रतिनिधी आहे. मार्टीच्या ज्ञानाने आणि चिकाटीने तो प्रभावित झाला आहे. तो त्याचा पिच्छा सोडत नाही. यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाचे आमिष समोर ठेवून तो विविध प्रकारे त्याला पटवू पाहतो. अखेर मार्टीही हुरळतो. तो प्रस्ताव त्याच्या पत्नीसमोर ठेवतानाही तो ’आपण तो अर्थातच नाकारला’ इथपासून सुरुवात करत, ’पण काय हरकत आहे.’ पर्यंत पोचतो. पत्नीही प्रथम दचकली तरी हळूहळू तिचेही मत अनुकूल होत जाते.

’शेवटी आपण काय फक्त त्यांचे पैसेच तर हाताळणार आहोत. त्यांच्या गुन्हेगारी विश्वाशी आपले काय देणेघेणे असणार नाही.’, ’एकदम इतके पैसे येतील की आयुष्याची ददात मिटेल.’, ’थोडे वर्षे केले तरी आपल्या गरजा भागवून उरतील इतके पैसे मिळतील.’ अशी ’चार वर्षे अमेरिकेत पैसे मिळवून भारतात परतू’, ’पुढील सात पिढ्या बसून खातील.’ वगैरे प्रचलित तर्कांच्या धर्तीचे तर्क देत दोघेही अखेर त्या चिखलात पहिले पाऊल टाकण्यास तयार होतात. व्यापक, जड, वास्तविक फायद्यासाठी नैतिकतेची पहिली पायरी उतरण्याचा पर्याय ते निवडतात... ’चाहूल’ मधल्या जोडप्याप्रमाणॆ.

Marty

मार्टीचे काम आहे ते ड्रम कार्टेलचा पैसा अधिकृत करण्याचे, ज्याला ’क्लीन करणे’ असे म्हटले जाते. हा रोकड स्वरूपात येणारा काळा पैसा विविध कायदेशीर व्यवसायांमधील गुंतवणुकींच्या माध्यमातून कायदेशीर करणे ही मार्टीची जबाबदारी आहे. ते जाळे त्याने विणले की अंमली पदार्थांच्या विक्रीतून कार्टेलने मिळवलेला पैसा निश्चिंतपणॆ, उघडपणे वापरु शकते. 

'काळा पैसा हा रोकड रूपात कुठेतरी साठवून ठेवलेला असतो' अशा भाबड्या समजात जगणार्‍यांनी या कारणासाठी ओझार्क अवश्य पाहावी. बेकायदेशीर, गुन्हेगारी व्यवसायाचा आधारवड हा असा त्यांच्या पैशाचे ’शुद्धिकरण’ करणारा पांढरपेशा वर्गच असतो, हे 'केवळ दांडगी शारीर-प्रकृती असलेला, दाढी वाढवलेला किंवा हातात कडे घातलेला कुणीही गुंड असतो, समाजविघातक असतो' असे समजणार्‍या भेकड सुखवस्तूंना समजू शकेल.

त्याअर्थी मार्टी आणि मार्टीसारखे लोक हे समाजाच्या दृष्टीने प्रत्यक्ष गुन्हेगारांपेक्षा मोठे गुन्हेगार मानायला हवेत. कारण ते त्या गुन्हेगारी यंत्रणेला एका व्यवस्थेत रूपांतरित करतात, स्थैर्य देतात. गुन्हेगारांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येईल याची सोय करून देतात. आणि ही व्यवस्था उभी करताना ते पर्यटन स्थळांची सारी अर्थव्यवस्था - ज्यात कसिनो, बार, स्ट्रिप क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ वितरण यांच्यासह तथाकथित सभ्य माणसांच्या जगातील धर्मस्थळे, त्याच्याशी निगडित पुरवठा, निवास आदि व्यवस्था (ज्यातून धर्मस्थळ हे खरे तर पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित केले जाते), तसंच खेळ, चित्रपटादी करमणुकीचे क्षेत्र यांनाही जाळ्यात आणून सोडतात. ही संघटित गुन्हेगारी अखेर सर्वसामान्यांच्या जगण्याची अप्रत्यक्ष नियंत्रक व्यवस्था होऊन बसते...

...आणि हे घडवून आणणार्‍या मार्टीकडे मात्र आपण कुटुंबवत्सल माणूस म्हणून पाहतो. कळत-नकळत त्याच्यासमोर आलेल्या अडचणींनी, त्याच्यावर येणार्‍या संकटांनी अस्वस्थ होतो, त्यांचे निवारण झाले की सुटकेचा निश्वास सोडतो. त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे पॅस्टर मेसन सारख्या सहृदयी व्यक्तीच्या आयुष्याची होणारी धूळदाण नजरेआड करतो, केवळ अपरिहार्य घटित (collateral damage) म्हणून सोडून देतो... आपल्यातही एक मार्टी दडून असल्याचेच ते लक्षण असते.

आजवर आपण पाहिलेल्या बव्हंशी गुन्हेगारी कथांमध्ये आणि ’ओझार्क’मध्ये एक फरक आहे. यातील कथानक हे एका कुटुंबाच्या प्रवासाची कहाणी म्हणून, त्याला केंद्र मानून मांडलेले असल्याने प्रेक्षक त्या कुटुंबाच्या नजरेनेच ते पाहतो आहे. त्यांच्या सुखदु:खाच्या संदर्भातच इतर सर्व गोष्टींचे, घटनांचे मूल्यमापन करतो आहे.

मार्टीने पैसे जिरवण्यासाठी निवडलेल्या ओझार्कचा इतिहासही रोचक आहे. १९२८ च्या जागतिक मंदीच्या काळात युनिअन इलेक्ट्रिक कंपनीने बांधलेल्या धरणामुळे ओझार्कमधील ते विशाल तळे तयार झाले आहे. मालिकेत असा उल्लेख आहे की रोजगार निर्मितीसाठी (आपल्याकडील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर) बांधले गेले. थोडक्यात पैसा निर्माण करण्यासाठीच त्याची निर्मिती झाली. मार्टी आपल्या धन्याचा पैसा मुरवायला याच तळ्याभोवतीच्या अर्थव्यवस्थेचा वापर करतो आहे, ही संगती उल्लेखनीय आहे.

त्याचबरोबर पर्यटन स्थळी अंमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे (racket) असणे ओघाने आलेच. त्यामुळे ज्या ड्रग माफियांचा पैसा तिथे जिरतो आहे, त्यांचे स्थानिक स्पर्धकही तिथे आहेत. एका बाजूचा पैसा जिरवण्याचे उपाय शोधता शोधात मार्टी एक एक करुन इतर बेकायदेशीर, धोकादायक, अति-महत्त्वाकांक्षी आणि बेमुर्वत अशा व्यावसायिकांच्या जाळ्यातही गुरफटत जातो आहे. एक प्रश्न सोडवण्यासाठी शोधलेला उपाय त्याच्यासाठी नवी समस्या घेऊन येतो आहे. सुरुवातीच्या काळात, त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयापाठी एक मृत्यू घडतो आहे. त्याला मार्टी थेट जबाबदार नसला तरी त्यांच्या तपासाचा माग पुन्हा पुन्हा त्याच्यापाशी येऊन भिडतो आहे. गुन्हेगारीचे जाळे त्याच्याभोवती एक एक फास टाकत त्याला जखडू लागते आहे.

अंमली पदार्थाचा व्यापार म्हणजे अर्थातच गुन्हेगारी, हिंसा, हत्या हे ओघाने आलेच. पण वर म्हटले तसे हिंसा अथवा हत्या एकरंगी असते असे मात्र नाही. केवळ वर्चस्वाची लढाई म्हणून वा शत्रूचा काटा काढण्यासाठीच हत्या होतात असे मुळीच नाही. हत्यांमध्ये क्षणिक क्षोभातून होणारी हत्या (डार्लिन’ने केलेली ’डेल’ची हत्या), आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अपरिचिताची केलेली हत्या (’बडी’ने केलेली हत्या), कुणाचा परिचिताचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपल्या स्वार्थाआड येऊ नये म्हणून जवळच्या व्यक्तीची केलेली हत्या (रूथने रस आणि बॉयडची केलेली हत्या) फसवणुकीचे प्रायश्चित्त म्हणून केलेली हत्या (ब्रूसची डेलने केलेली हत्या), एखाद्या निरपराध्याची केवळ तिसर्‍याच व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी केलेली हत्या (ब्रूसच्या गर्लफ्रेंडची डेल ने केलेली हत्या), त्याच प्रकारे हत्येचा मागमूस न ठेवता केलेली निरपराध व्यक्तीची हत्या (मेसनच्या पत्नीची स्नेल पती-पत्नींकरवी केली गेलेली अध्याहृत हत्या), आपल्याला हवी ती माहिती अनधिकाराने मागणी केल्याने न देणार्‍या सामान्य व्यक्तीची सहज केलेली हत्या (अ‍ॅटर्नीने डेलच्या खुनाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसाठी केलेली हत्या), आपल्या स्वार्थाला धक्का देणारे कृत्य - दुसर्‍या दबावाने, नाईलाजाने - केल्याबद्दल साथीदाराला दिलेले शासन (स्नेल कुटुंबाने स्ट्रिप-क्लब मालकाची केलेली हत्या) आणि परिस्थितीवश, अपघाताने घडलेली हत्या (मेसनचा मृत्यू) असे विविध हेतू दिसून येतात. हत्या हा सर्वात सोपा निवाडा आहे अशीच त्या जगाची शाळा शिकवते आहे. 'आपण फक्त पैशाचे व्यवहार करणार' म्हणणारा मार्टीच नव्हे तर त्याचे पुरे कुटुंबच त्या यंत्रणेच्या जाळ्यात रुतत जाते, त्यातले काही धागे स्वत:ही विणत जाते. एका टप्प्यावर अनाहुतपणे त्याच्याही हातून हत्या होते, तेव्हाच त्याच्या चेहर्‍यावर पस्ताव्याची पहिली खूण दिसते.

हत्यांच्या विविध जातकुळींप्रमाणॆ विविध जातकुळींचे गुन्हेगार आपल्याला भेटत राहतात. अध्याहृत, समोर न येणारा ड्रग लॉर्ड, त्याच्या व्यवहाराचा चेहरा असलेला डेल, गुन्हेगारीची ओल अंगाला लावून बाहेर आलेला बडी, व्यवसायवृद्धीऐवजी केवळ दहशतीवर खंडणीखोराच्या पातळीवर जगणारा कॉसग्रोव्ह हा त्याचा जुना मित्र, स्थानिक पातळीवर हेरॉईनचे उत्पादन आणि वितरण करणारे स्नेल दांपत्य, ड्रग लॉर्ड्च्या सार्‍या साम्राज्याला कायद्याच्या कचाट्यापासून दूर ठेवणारी त्याची अ‍ॅटर्नी (ही स्त्री आहे हा एक विशेष नोंदवून ठेवण्याजोगा मुद्दा), आणि त्याच्या पैशाला कायदेशीर चलनाच्या स्वरुपात मुरवणारा मार्टी. हे शेवटचे दोघे अस्सल अट्टल पांढरपेशे गुन्हेगार. यांच्याबरोबरच स्थानिक पातळीवर फुटकळ गुन्ह्यांबद्दल कुप्रसिद्ध असलेले लॅंगमोर कुटुंबिय. त्यात तुरुंगात असलेला केड आणि बापाच्या अनुपस्थितीत दोन काका आणि दोन पुतणे यांच्या कुटुंबाची विशीच्या आतच पोशिंदी होऊन बसलेली रूथ हे ही आहेत.

RuthLangmore

मार्टी हा पांढरपेशा जगातला, वैयक्तिक फायद्यासाठी त्याने गुन्हेगारी जगाची साथ धरली आहे. रूथचे नेमके उलट आहे. बौद्धिक बाजूचा पूर्ण अभाव असलेल्या कुटुंबात, गुन्हेगारी जगातच लहानाची मोठी झालेली रूथ मार्टीचे बोट धरून त्यातून बाहेर पडण्याची, पांढरपेशा जगात पाऊल टाकण्याची उमेद बाळगून आहे.

या मुलीचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे. एका बाजूने ती केड लँगमोर या किरकोळ पण अस्सल दक्षिणी माज असलेल्या आपल्या बापाची मुलगी असल्याने अनेक लहान-मोठे गुन्हे तिच्यावर नोंदवले गेले आहेत. त्या परिसरात तिची ओळख गुन्हेगार म्हणूनच आहे. मार्टी प्रथम नाईलाजाने आणि नंतर तिच्या कामाच्या झपाट्याने तिच्यावर विसंबू लागतो, तेव्हा रूथही थोडी त्याच्यात गुंतत जाते. त्याच्यात आपल्या बापाला पाहू लागते.

तिचे बापाबद्दलचे नातेही काहीसे व्यामिश्र आहे. कदाचित लहानपणी ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ म्हणणार्‍या बालकाची ती वय वाढलेली आवृत्ती आहे. ती बेगुमान जगणार्‍या बापाकडे एक रोल मॉडेल म्हणून नकळत पाहते आहे. त्याला तुरुंगात भेटायला जाताना आवर्जून मेकप करुन जाणार्‍या रूथच्या त्या आकर्षणात हलकासा जांभळा रंगही मिसळला आहे.

फुटकळ गुन्हेगारी करणार्‍या बापाहून अधिक बुद्धिमान, अधिक मोठी कामे पार पाडणारा, अनेक बड्या प्लेअर्सना सांभाळत व्यावसायिक वाटचाल करणारा मार्टी तिला अधिक ’बापमाणूस’ वाटू लागला आहे. त्याचबरोबर तिला गुन्हेगारी शिक्का पुसून एक समाजमान्य रोजगार करण्याची संधी त्याच्यामुळेच मिळाली आहे. आपल्या सद्य जीवनातल्या खातेर्‍यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तिला त्याच्या रूपाने दिसतो आहे.

प्रथम मार्टीची हत्या करुन त्याचे पैसे लुटण्याचा प्लान करणारी रूथ नंतर त्यामुळेच त्याच्या हत्त्येचा कट करणार्‍या तिच्या दोन्ही काकांचा काटा निष्ठुरपणे दूर करताना दिसते. तर दुसरीकडे आपल्या चुलत भावंडानाही आपल्या सोबतच या भणंग आयुष्यातून बाहेर काढण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी तिला मार्टीच्या मदतीची गरज आहे.

असे असले तरी ’मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीनुसार ती कुवतीपेक्षा खूप मोठी उडी घेण्याचा प्रयत्न करते आहे, अवास्तव मागणी करते आहे. मार्टीकडून ती मान्य केली न गेल्याने नाराज होते आहे. एकाच वेळी अत्यंत खुनशी, बेडर, निर्ढावलेली ही मुलगी आई-बापांच्या छत्राविना वाढल्याने आणि दोन नालायक काकांमुळे अकाली जबाबदारी अंगावर पडल्याने तशी झाली, की तिच्या गुणसूत्रांतून आलेल्या वारशामुळे हे सांगणे अवघड आहे.

पण मार्टीला ठार मारण्यास गेलेल्या दोनही काकांचा निष्ठुरपणे मृत्यू घडवून आणल्यानंतर मार्टीच्या सहवासात ती कोसळते. त्याचे बरेवाईट झाले असते या कल्पनेने तिचा थरकाप होतो. एका परक्या व्यक्तीबाबत ही भावना आणि रक्ताच्या नात्यांतील सर्वात जवळच्या व्यक्तींचा सहज खून करणे अशा परस्परविरोधी गुणावगुणांचा तिच्यामध्ये संचय झालेला आहे.

आपल्याकडे लालसेने, लैंगिक आसक्तीने पाहणार्‍या आजोबाच्या वयाच्या म्हातार्‍याला थेट धडा शिकवण्याचे धाडस, तो बेगुमानपणा तिच्यात आहे; त्याचवेळी घरातील थोडीफार बुद्धी असलेल्या चुलत भावाकडून तिला कर्तृत्वाची अपेक्षा आहे. बापाच्या मृत्यूनंतर बेफिकिर, कडवट बनलेल्या त्याला पाहून तिच्या पोटात कालवाकालव होते. तिला त्याने शिकून मोठे व्हावे नि या खातेर्‍यातून बाहेर पडावे, असे मनापासून वाटते आहे. त्यासाठीच ती मार्टीच्या सहाय्याने आपली आर्थिक स्थिती भक्कम बनवून त्याच्या शिक्षणाची सोय करण्याची धडपड करते आहे... जेमतेम एकोणीस वर्षाच्या या पोरीच्या आयुष्याचा हा सारा गुंता आपलाही जीव घुसमटून टाकणारा आहे.

पण हे दोघे जरी प्रामुख्याने समोर येत असले तरी आधी म्हटल्याप्रमाणॆ या सार्‍या कथानचा केंद्रबिंदू आहे ते मार्टीचे कुटुंब. त्याच्या पत्नीच्या मार्टीसोबतच होणार्‍या नैतिकतेच्या स्खलनाचा उल्लेख वर आला आहेच. ’रेगे’मध्ये पाहिले तसे केवळ पाण्यात एक बुडी मारून बाहेर यावे असे समजणारा अनिरुद्ध रेगे आपण पाण्यात नाही तर Quicksand Pit मध्ये पाऊल टाकले आहे याचा अनुभव घेतो तसेच मार्टीच्या पत्नीचेही होते. रेगेच्या मृत्यूने त्याची ’सुटका’ लवकर होते, पण वेंडी मात्र हळूहळू त्यात रुतत जाते, सक्रीय सहभाग घेऊ लागते... निर्ढावते!

अशा स्थितीत मुलांपासून हे सारे दडवणॆ अर्थातच अशक्य होत जाते. शिकागो सारख्या महानगरातून ओझार्कसारख्या मोसमी व्यावसायिक आणि म्हणून अतिशय कमी वस्तीच्या दक्षिणी(!) गावात बंदुकांची मालकी अपरिहार्य. आणि मुलांना तिचे आकर्षणही सार्वत्रिकच. मुलींना बार्बी नि मुलांना खेळण्यातील बंदूक भेट देणे हा अगदी भारतासारख्या देशातही अलिखित नियम. या आकर्षणातून मार्टीच्या मुलाचा, जोनाचा, खर्‍या बंदुकीपर्यंतचा प्रवास ओघाने आलाच.

पण शिकारीमध्ये पहिले हरीण ठार मारल्यावर काहीशा संवेदनशील वयातला तो आयुष्यातल्या पहिल्या संभ्रमाचा सामना करतो आहे. एका क्षणी घरात घुसलेल्या पुंडावर बंदूक रोखलेल्या त्याला त्याच्या आईने त्याला हल्ला करणार्‍याला शूट करण्याची नजरेनेच केलेली खूण त्याला आठवते. अशा दोन प्रकारे हत्येचे समर्थन होऊ शकते, नव्हे ’खोटे कधी बोलू नये’ सांगणारी आईच एका प्रसंगात त्याला तसे सुचवते, याची अगदी लहान वयात झालेली जाणीव त्याला हादरवून सोडते आहे

पण असे असतानाही, आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या बापाच्या पावलावर पाऊल टाकत चोरलेले पाच हजार डॉलर शेल कंपन्यांच्या आडून तो अगदी सराईतपणे जिरवतो आहे. इतकेच नव्हे तर बाराव्या वर्षी त्याने आत्मसात केलेले हे कौशल्य ’एकदाच वापरु हं’ (!) म्हणत त्याची आईही सहजपणे वापरुन घेते आहे. अचानक नव्या जगात येऊन पडल्याने सैरभैर झालेली मुलगी शार्लट सहजपणे मारुऽवानाच्या सेवनाच्या मार्गे जाते आणि हे समजूनही मार्टी जणू ’मुलगी मोठी झाली की डेटिंग करणार तसेच ड्रग्ज* घेणार’ हे गृहित धरुन त्याबाबत फारसे काही करताना दिसत नाही.

शिकागोमधील एक पांढरपेशे कुटुंब दक्षिणेतील गुन्हेगारी जगात मुरत मुरत जाते...

WendyWithAGun

-oOo-

उपसंहार:

काही आठवणी अथवा संगती या मजेशीर असतात. किचनमध्ये एखादे काम तन्मयतेने करत असताना लिव्हिंग रुममध्ये चालू असलेल्या टीव्हीवर चालू असलेल्या एखाद्या कार्यक्रमातील संवाद कानी पडत असतात. पुढे तेच काम करत असताना टीव्ही बंद असेल किंवा दुसराच कार्यक्रम चालू असेल तरी त्याची दखल न घेता मनात पूर्वी ऐकलेले ते संवाद मनात उमटू लागतात. एखाद्या खेळाडूच्या विक्रमाबद्दल बोलताना त्या नेमक्या क्षणी टीव्हीवर पाहिलेली जाहिरात आठवते. असेच काहीसे मिसौरी म्हटले की माझे होते.

वीणा गवाणकर यांच्या (तब्बल चव्वेचाळीस आवृत्त्या निघालेल्या) ’कार्व्हर’ या पुस्तकात मिसौरीतल्या डायमंड ग्रोव्हचा उल्लेख आहे. तेथील काही शिखरांची चित्रे छोट्या कार्व्हरने अतिशय यथातथ्य चितारल्याची दाद त्याला अपरिचित स्त्रीकडून मिळते असा तो हृद्य प्रसंग आहे. त्यामुळे मिसौरी, ओझार्क यांची माझ्या मनात त्या न पाहिलेल्या सौंदर्याशी सांगड घातली गेली होती. आता ओझार्क पाहिल्यावर ती तुटून गेली आहे. आता ओझार्क म्हटले की मला आपल्या बौद्धिक कौशल्यावर फाजील विश्वास ठेवून, धनलोभाने गुन्हेगारीच्या जाळ्यात गुरफटत जाणारा मार्टीच आठवत राहील. एका आवडलेल्या मालिकेने दिलेला हा नकारात्मक वारसा!

अलीकडचा वास्तववाद हा सौंदर्याची, विश्वासाची, स्निग्ध भावाची, माणुसकीची हत्या केल्यानेच का सिद्ध होतो ; जगण्यातले वास्तव हे सारे असे कुरूपच असते असे या साहित्यिकांना अथवा माध्यम-लेखकांना का वाटते?; वाचकाच्या अथवा प्रेक्षकाच्या तोंडावर हे असे जगण्यातले सडलेपण, ही विरूपता फेकूनच आपल्या लेखनाला दर्जेदार असल्याचे सर्टिफिकेट मिळते असा विश्वास त्यांना का वाटतो?; सद्गुण, निर्मिती, आपुलकी, बांधिलकी हे वास्तव नसते का?... हे मला सतत छळणारे प्रश्न पुन्हा एकवार माझ्यासमोर फेर धरुन नाचू लागतात.

---


हे वाचले का?

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

जागी झालेली मुले

काही वर्षांपूर्वी जीएंचे ’बखर बिम्म’ची वाचत असताना अचानक असं लक्षात की ’हां. हा एक माणूस काल्पनिका, परीकथा, पालक किंवा लाडू खाऊन ढिश्शुम करणारे हीरो वगैरे निव्वळ कल्पनासंचाराच्या पलिकडे जाऊन बिम्मच्या वास्तव-कल्पनेच्या तीरावरच्या जगाला भिडू पाहतो आहे. त्याला बिम्म समजला असेल, तर कदाचित त्याच्यामार्फत आपल्यालाही समजेल. मग एखाद्या बिम्म वा बब्बीचे म्हणणे मला अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल.’ पण हाती येतो येतो आहे म्हणत असताना बिम्म निसटला नि गेली सात-आठ वर्षे कुठे तरी दडून बसला आहे.

बिम्मची काल पुन्हा आठवण झाली. याचे कारण म्हणजे बिम्मसारख्याच कुण्या एका बब्बीचा फोटो मिळाला. बिम्मला आपली भाषा सापडली होती, हिला आपली अभिव्यक्तीही सापडली असावी असे वाटू लागले. बिम्मची भाषा त्याच्या आईला समजत असली, तरी त्यातील अभिव्यक्तीबाबत ती सर्वस्वी अज्ञानी होती. पतंगाऐवजी स्वत:च मांजाला लटकून उडण्यातली गंमत तिला समजत असली, तरी त्यामागची आकांक्षा तिला समजली नव्हती. कुलुपाची किल्ली तिला ठाऊक होती, पण बिम्मसारखा ’या किल्लीचं कुलूप कुठे आहे?’ असा उलट प्रश्न तिला पडला नव्हता. कदाचित तिला तो हास्यास्पदही वाटला असेल. त्यामुळे बहुतेक वेळा बिम्मच्या चौकसतेला काहीतरी थातुरमातुर उत्तरे देऊन ती त्याला वाटेला लावत असे.

पण सर्वच आया अशा नसतात. एखाद्या सुज्ञ आईला असे वाटू शकते की, ’आपल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा आहे. त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजत नसेल कदाचित, पण ते निरर्थक नसेल. माझ्या नि त्याच्या भाषेमध्ये एखादा पूल उभा राहील तेव्हा ते कदाचित मला समजेलही. पण तोपर्यंत मला त्याची/तिची अभिव्यक्ती जपायला हवी. संस्कार, शिक्षण, परंपरा या नावाखाली तिला मारून-मुटकून माझ्या पठडीमध्ये बसवण्याचा अट्टाहास करता कामा नये” अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांतील जेनी सोरी ही अशीच एक आई.

२० जानेवारी २०१७ या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २१ जानेवारीला त्यांच्या वंशवादी, स्त्रीविरोधी वगैरे मागास मानसिकतेचा विरोध करण्यासाठी अमेरिकेतील स्त्रीवादी संघटनांनी देशव्यापी निदर्शने आयोजित केली होती. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील मूर्‌सविल येथे राहणारी जेनी सोरी आणि तिचा नवरा सॅम हे दोघे त्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी जवळच्या शार्लट शहरी जाणार होते. तिथे नेण्यासाठी निषेध-फलक, घोषणा-फलक आपणच तयार करावेत असे दोघांनी ठरवले. डायनिंग टेबलवर पुठ्ठ्याचे तुकडे पसरून त्यावर घोषणा रंगवणे चालू होते.

The Woke Baby
Sam Sowry with his daughter, 'The Woke Baby'

इतक्यात जेनीच्या नऊ वर्षांच्या मुलाला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला, ’आई आपल्या हातात जसे हे फलक असतील तसेच माझ्या छोट्या बहिणीच्याही हाती देण्यासाठी फलक तयार करायला हवेत ना?’ जेनी थबकली. इतक्यात त्या दोघांची दृष्टी टेबलखाली बसलेल्या तिच्या मुलीवर पडली. तिथे पडलेल्या एका पुठ्ठ्याच्या तुकड्यावर मन लावून ती काहीतरी लिहित होती. विविध रंगांचे खडू घेऊन बरेच तिने काही लिहिले होते.

अद्याप दोन वर्षांचीही नसलेल्या त्या छोटीला मुळाक्षरेही लिहिणे शक्य नव्हतेच. पण ’तिने जे लिहिले, त्यात तिला जे म्हणायचे आहे त्याचे प्रतिबिंब पडले असेल’ असे जेनीला वाटले. ’आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जसे आपल्याला आहे, तसेच तिलाही असायला हवे. या निमित्ताने त्या वयातील मुलांच्या विचारक्षमतेचाही आपण आदर करायला हवा' असे तिला वाटले. आपल्या अभिव्यक्तीचा एक भाग, एक तुकडा तिच्या हाती देण्यापेक्षा तिच्या हाती तिच्याच विचारांची अभिव्यक्ती दिसणे अधिक सयुक्तिक आहे’ असे तिने ठरवले. म्हणून दुसर्‍या दिवशी स्वत: रंगवलेला तो फलक घेऊनच ती छोटी आपल्या आईसोबत निदर्शनांमध्ये सामील झाली.

सर्व काही फोटोच्या पुराव्याने शाबीत करण्याच्या जमान्यामध्ये जेनीनेही निदर्शनांचे फोटो काढले. त्यात सॅमच्या खांद्यावर बसलेल्या त्या छोटीचा हा फोटोही होता. त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्या दोघांचा मित्र असलेल्या शॉन लेन्ट याने ते आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले. अल्पावधीतच सॅमच्या खांद्यावर बसून स्वत:च रंगवलेला फलक घेतलेल्या त्या छोटीचा तो फोटो समाजमाध्यमांतून वेगाने पसरला. एकट्या शॉनच्या अकाऊंटवरून तो सुमारे वीस हजार वेळा शेअर करण्यात आला आणि बारा हजारहून अधिक लाईक्सचा धनी झाला.

जेनीच्या या छोटीचे लोकांनी Woke Baby असे नामकरण केले. Woke या शब्दाचा भाषिक अर्थ ’जागा झालेला’ असा असला, तरी सामाजिक संदर्भात त्याचा अर्थ ’वांशिक पूर्वग्रह, भेदाभेद आणि त्यांतून उगवणार्‍या शोषणाविरोधात जागरुक असलेला/असलेली’. युरपिय वंशाच्या गोर्‍यांच्या वर्चस्वाखालील अमेरिकेत आफ्रिकन, लॅटिनो आणि आशियाई वंशीयांच्या विरोधात होणारा भेदाभेद आणि अत्याचार यांच्या विरोधात हा शब्द विशेषत्वाने वापरला जातो.

समाजमाध्यमांत कोणत्याही बाबतीत असंख्य प्रकारची मते व्यक्त केली जात असतात. त्या परंपरेला अनुसरून काहींनी जेनीवर प्रसिद्धीलोलुपतेचा आरोप केला, कुणी निदर्शनांच्या ठिकाणी इतक्या लहान मुलीला नेऊन धोक्यात घातल्याबद्दल टीका केली. त्यावर जेनी म्हणते, "मला या कृतीतून काहीच संदेश वगैरे द्यायचा नाही. माझ्या मुलीच्या वयातील मुलांची मानसिकता ध्यानात घेता, कुठल्याही कौटुंबिक कामांत त्यांना सहभागी करुन न घेणे हा त्यांना त्यांच्या लहानशा जगातील मोठाच भेदभाव वाटू शकतो. तिला तसे वाटू नये, याच हेतूने मी तिला तो फलक घेऊन निदर्शनांमध्येही सामील करून घेतले."

मुळात ही निदर्शने ट्रम्प यांच्या काही असंवेदनशील विधानांचा निषेध करण्यामुळे आयोजित केलेली असल्याने, राजकीय भूमिकेतून अनेक रिपब्लिकन समर्थकांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला. पुढे एका प्रसिद्ध पोर्टलशी बोलताना जेनी म्हणाली, "मोठी झाल्यावर आमची मुले आमचीच राजकीय भूमिका स्वीकारतील की नाही हे मला अर्थातच ठाऊक नाही. परंतु ’ते जी भूमिका स्वीकारतील ती चारचौघात ठामपणे मांडण्याइतके धैर्य त्यांच्यामध्ये असायला हवे’ असे आम्हा दोघांना वाटते. या निदर्शनांमध्ये सामील होण्यातून मिळालेला अनुभव त्यांना उपयोगी पडेल असे आम्हाला वाटले."

JJKim
Jeff Kim with his son JJ

योगायोगाने शार्लटमधील त्याच निदर्शनांमधून आणखी एका Woke Baby चा फोटो प्रसिद्ध झाला. या मुलाचे नाव होते जेजे किम. जेजेची आई प्रिस्का किम हिने या निदर्शनांसाठी वॉशिंग्टन गाठण्याचे नियोजन केले होते. पण नंतर तिला वाटले की ’स्त्री-सक्षमीकरण हा स्त्रियांबरोबरच - किंबहुना त्याहून अधिक - पुरुषांनी समजून घेण्याचा विषय आहे’. म्हणून तिने आपल्या पतीलाही सोबत येण्याची विनंती केली. हे दोघे जेजेसह शार्लटमधील निदर्शनांतच सहभागी झाले. 

ज्याप्रमाणे जेनीच्या मुलाला आपल्या बहिणीच्याही हाती फलक हवा असे वाटले, तसेच प्रिस्काच्या बहिणीलाही असे वाटले की, ’आपल्या भाच्याला आपण या सार्‍या घडामोडीचा भाग आहोत असे वाटायला हवे.’ म्हणून तिने ’I love naps, but I stay woke.’ अशी घोषणा लिहून एक छोटा फलक त्याच्या हाती दिला होता.

या दोन जोडप्यांमध्ये आणखी एक समान दुवा होता. सॅम आणि प्रिस्का हे दोघेही ज्यांना ’पहिल्या पिढीचे स्थलांतरित’ म्हणतात अशा आई-वडिलांची अपत्ये. सॅमचे आई-वडिल व्हिएतनामवरुन स्थलांतरित झालेले, तर प्रिस्काची आई कोरियन. त्यामुळे त्या दोघांनाही त्या वांशिक भेदाभेदाचा सामना लहानपणापासून करावा लागला. त्यापलिकडे स्त्री असल्यामुळे प्रिस्काला ’ओरिएन्टल फ्लावर’ वगैरे शेरेबाजीलाही सामोरे जावे लागले होते. या विषमतेविरोधात ते स्वत: जसे उभे आहेत तसेच आपल्या मुलांनीही उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्या मार्गावर चालताना या woke babysना आपल्या सोबत घेतले आहे, त्यांना अधिक दूरचे दिसावे म्हणून खांद्यावर घेतले आहे.

जेनी प्रमाणेच प्रिस्कालाही तिच्या मुलाला निदर्शनांत सहभागी करून घेतल्याबाबत जाब विचारण्यात आला होता. प्रश्नकर्त्यांना तिने एकाच वाक्यात उत्तर दिले होते. ती म्हणाली, “A viral picture lasts for a day, but I hope JJ’s fight for human rights will last a lifetime.”

- oOo-

लेखासोबत जोडलेले फोटो https://www.charlottemagazine.com/येथून साभार.

जेनी आणि सॅम यांच्या विनंतीनुसार त्यांच्या दोनही मुलांची नावे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली नाहीत.


हे वाचले का?

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ’पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला.

YouAreNotOneOfUs

निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्‍यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात.

एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घालणार्‍या सेना, ब्रिगेड वा संघटनांचा गल्ली-बोळांत ढेकणांसारखा बुजबुजाट झालेला दिसतो. माध्यमेही त्यांच्या त्या अस्मितेच्या गळूला, त्या नकारात्मतेला मूळ कलाकृतीपेक्षा अधिक वाव देणारी आहेत. ’हिंद देशके निवासी सभी जन एक है’ वगैरे म्हटले तरी माझे कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझी ओसाडवाडी, माझी भकासगल्ली जग्गात भारी आहे असा बहुतेकांचा समज असतो... आणि ’आपला तो नाही’ हा गैरसमजही असतो.

पहिल्या लेखांकाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या प्रतिज्ञेमधील "सारे भारतीय माझे बांधव आहेत." आणि "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे." हे भारतीय नागरिक केव्हाच विसरले आहेत. ’माझ्या धर्माचे, माझ्या जातीचे, माझ्या उपजातीचे, माझ्या गावाचे लोक, माझ्या -धार्मिक वा राजकीय- बुवाचे स्वयंघोषित अनुयायी वा मानसिक गुलाम हेच फक्त माझे भाईबंद आहेत’ अशी नवी प्रार्थना चॅनेल्सवरुन, भाट छपाई माध्यमांतून, व्हॉट्सअ‍ॅपवरुन घोकून घेतली जात आहे. भरीला याची कणभरही लाज वाटू देऊ नका असे बिनदिक्कतपणे सांगणारे नेते पैशाला पासरी झाले आहेत.

विडंबनकार रामदास फुटाणे यांनी आसपासची ढासळती राजकीय नि आर्थिक नैतिकता, उग्र होत जाणार्‍या धार्मिक, जातीय अस्मिता आणि विखंडित होत जाणार्‍या समाजावर भाष्य करताना या प्रतिज्ञेचे विडंबन केले होते.

-: भारत कधी कधी माझा देश आहे :-

भारत कधी कधी माझा देश आहे.
आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. 
माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 
त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. 
माझ्या जातीचा,माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे...
माझा देश माझा खाऊ आहे. 
खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताची जुंपणार आहे. 
जुंपल्या नंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. 
पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील.
 
त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील... 
खुर्चीवर बगळे बसतील. 
पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ, "हम सब एक है, 
हिंदू-मुस्लीम भाई भाई,
हिंदू-सिख भाई भाई, 
हिंदू-इसाई भाई भाई, 
हिंदू-बौद्ध भाई भाई, 
हिंदू-जैन भाई भाई 
जमलेच तर... हिंदू-हिंदू सुद्धा भाई भाई".
 
तोपर्यंत मित्रानो मला माझ्याच स्वातंत्र्याची तहान आहे
या देशापेक्षा मीच महान आहे.
मी माझ्यासाठीच जगतो, 
मी माझ्यासाठीच मरतो. 
आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो.
 
तेव्हा- 
माझा जयजयकार असो, 
माझ्या धर्माचा जयजयकार असो, 
माझ्या पंथाचा जयजयकार असो,
माझ्या प्रांताचा जयजयकार असो. 
झालाच तर... कधी कधी... 
माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.

- रामदास फुटाणे
 

- oOo -

साधारण दोन-तीन दशकापूर्वीपर्यंत ’राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द परवलीचा होता. आता त्याची जागा ’राष्ट्रभक्ती’ या शब्दाने घेतली आहे. दोन्हींत महत्वाचा फरक आहे. पहिल्यामध्ये परस्पर-बांधिलकी आहे, तर दुसर्‍यामध्ये केवळ समान आदर्शापुढे झुकणारी भक्ती आहे. त्या भक्ति-विषयाची ठेकेदारी बळकावणारे तिचे पौरोहित्य करून सामान्यांनी तिच्या चरणी अर्पण केलेला मलिदा ओरपत आहेत. आणि जे झुकत नाहीत त्यांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद-छद्म-झुंड आदि सर्व वैध-अवैध मार्गानी ही खुजी मंडळी आपली उंची वाढल्याचा आभास निर्माण करत आहेत.

बांधिलकीची अपेक्षा आता निष्ठेच्या अपेक्षेत रूपांतरित झाली आहे. आणि निष्ठेला, अस्मितेला छेद देण्यासाठी मग जातीय अस्मितेची विषवल्लीही वेगाने वाढू लागली आहे. माणसांना बांधिलकी ऐवजी अस्मिता, द्वेष यांचा आधार घ्यावासा वाटतो आहे. देशाची, देशप्रेमाची उभारणी ही बांधिलकीपेक्षा द्वेषावर अधिक होते आहे. यातील विसंगती समजून घेण्याची बहुतेकांची इच्छा नाही नि कुवतही. माणसे मानसिकदृष्ट्या एका बाजूने भीती आणि ती दडपण्यासाठी आवंतून आणलेल्या अभिनिवेशी त्वेषाने इतकी भारली आहेत, की सर्वांचे आदर्श हळूहळू रचनात्मक कृती करणार्‍यांपेक्षा प्रासंगिक शूरवीरांकडे अधिक सरकले आहेत.

डॉ. आंबेडकरांसारखा चतुरस्र बुद्धिमान माणूस शोषित वर्गाला पुरेसा वाटत नाही. त्यांच्या ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ या सशक्त दृष्टिकोनापेक्षा प्रासंगिक, कर्मकांडसदृश विद्रोह त्यांना अधिक आकर्षक वाटतो. त्यासाठी इतिहासातून आपले शूरवीर उचलण्याची गरज वाटते. इतर जातींनीही आप-आपल्या जातीतील संतांचे बोट सोडून इतिहास खंगाळून आपापले वीर शोधून काढले आहेत. धनगरांच्या कार्यक्रमांतून सर्वकल्याणकारी अहिल्याबाईंची जागा हळूहळू रणझुंजार मल्हाररावांनी घेतली.

फार कशाला, प्राचीन कालापासून स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणार्‍या ब्राह्मणांनीही आपल्या संघटनेचा आदर्श म्हणून त्या जातीतील असंख्य बुद्धिमंताऐवजी क्षत्रिय-निर्दालक परशुराम निवडला. त्यामागे प्राचीनतेचा अट्टाहास तर आहेच, त्याचबरोबर याला ब्राह्मण जातीअंतर्गत कोकणस्थांचा वरचष्मा स्थापन करण्याचा मार्ग (कोकणस्थ-> कोकण-> अपरांत-> निर्माता-> परशुराम अशा बादरायण संबंधाने) म्हणूनही पाहता येते. म्हणजे गटातल्या गटातही उपगटांची कुरघोडीही कमी नसते. माणसे बुद्धिला, रचनात्मक, निर्मितीक्षम कामांपेक्षा, अस्मितेला, त्यांच्या झेंड्यांना, सतत भावना दुखावण्याला, इतर गटांवर दात धरून राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत.

कोरोनासारख्या अभूतपूर्व आणिबाणीच्या काळातही कोणतीही नवी माहिती, नवी घटना ही कायम अस्मिता-द्वेषांच्या चष्म्यातून पाहिली जात होती. केंद्राचे काम चांगले, राज्याचे वाईट आणि पुन्हा मनपाचे चांगले असे एका गटाचे मत होते. तर उलट बाजूच्या मंडळींच्या दृष्टिने केंद्रातील सरकारचे वाईट, राज्यातले काम चांगले नि मनपाचे पुन्हा वाईट अशी भूमिका होती. गटाशी बांधिलकी राखण्यासाठी तर्काच्या अशा माकडउड्या मारल्या जातात.

बरं या विधानांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसतो. आपल्या बाजूच्या विरोधकांवर आग ओकणे, शक्य त्या माध्यमांतून जळजळीत द्वेष पसरवणे, इतकेच ’माझे देशबांधव’ आता करु लागले आहे. माणसे बुद्धीचा कमीतकमी वापर करुन केवळ अस्मिता-द्वेषांच्या पार्ट्या पाडून खेळ खेळू लागली आहेत. याला व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुकसारख्या माध्यमांतून निरर्गलपणे होणारा स्वार्थानुकूल अफवांचा संघटित प्रसार भरपूर हातभार लावतो.

LetsFightYouAndME

समाजकारणाने नि राजकारणाने जसे या विघटनवादाला खतपाणी घातले, तसेच भांडवलशाहीने आणलेल्या धंदेवाईकतेनेही. चॅनेलवर साधकबाधक चर्चा होण्यापेक्षा शाब्दिक लठ्ठालठ्ठी झालेली त्यांच्या मालकांना हवी असते. कारण मग तो व्हिडिओ समाजमाध्यमांतून फिरतो. त्याला त्या चॅनेलच्या वेबसाईटवर वा यू-ट्यूब चॅनेलवर भरपूर हिट्स मिळतात. आणि इंटरनेटच्या जमान्यात हिट्स/क्लिक्स = पैसा हे गणित असल्याने मालक खुश होतात. साधकबाधक, विषयाला धरुन पण उद्बोधक चर्चा झाली तर त्यातून चॅनेल मालकांना पैसा मिळत नाही. म्हणून चर्चेमध्ये अद्वातद्वा बोलणारे, एकमेकांवर हेत्वारोप करणारे वगैरे चर्चक अधिक प्रेमाने बोलावले जातात. ’आमच्या बाजूच्याने विरोधी बाजूच्या चर्चकाची आरडाओरडा करुन बोलती कशी बंद केली’ म्हणून खुश होत अल्पबुद्धी समाजमाध्यमी तो व्हिडिओ ’व्हायरल’ करतात.

हे पुरेसे नसते म्हणून चर्चेचे पक्षपाती सूत्रसंचालक कोणत्या बाजूला टीआरपी अधिक मिळेल (आणि त्यांचे मालक कुण्या पक्षाकडून अधिक मलिदा मिळेल) याचा अंदाज घेऊन ती बाजू घेऊन लढतात. स्वत:च बोलावून आणलेल्या विरोधी मुद्दे मांडणार्‍यांचा अपमान करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात. त्यांना दूषणे देणार्‍या अन्य सहभागी चर्चकांच्या उद्धटपणाकडे काणाडोळा करुन ती बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरतात.

चर्चांपलिकडे अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमातही गुणवत्ता अथवा सर्जनशीलतेपेक्षाही ’खपाऊ’ मालालाच प्राधान्य असते. त्यातून माध्यमे लोकानुनयी होतात. खासगी माध्यमे ’आम्हाला कुठे यातून पैसा मिळतो? आम्ही हे का करावे? हे आमचे काम नाही, कारण आम्ही व्यावसायिक आहोत, नफा मिळवणे हे आमचे एक आणि एकच साध्य आहे. त्यापलिकडे समाजाचे आम्ही काहीही देणे लागत नाही.’ अशी भूमिका घेऊन उभी असतात. यातून बहुसंख्येच्या मनोरंजनाच्या संकल्पनेत न बसणारे विषय बाद होऊन जातात. जिथे विज्ञानासारख्या आवश्यक विषयाला कणभर जागा मिळत नाही, तिथे समाजहिताची भूमिका घेऊन केलेल्या प्रबोधनप्रधान कार्यक्रमांची उत्तरक्रिया केव्हाच होऊन गेली आहे.

तीन-चार दशकांपूर्वी चॅनेलमाध्यमांचा सुळसुळाट होण्यापूर्वी ’दूरदर्शन’ हे शासन-संचालित एकमेव चॅनेल कार्यरत होते. त्याची आर्थिक बाजू शासनाने सांभाळलेली असल्याने म्हणा की मिळू शकणारा शेवटचा पैसाही प्रेक्षकाकडून वसूल केला पाहिजे असा बाणा घेऊन जन्मलेली मॅनेजमेंट नावाच्या सर्वविषय-अर्धशिक्षित आणि स्वयंघोषित सर्वज्ञ जमात उदयाला आलेली नसल्याने कार्यक्रमांचे विषय, दिशा आणि मांडणी ही अद्याप सर्जनशील व्यक्तींच्या हाती होती.

त्याचबरोबर शासकीय मालकी असल्याने शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसारही त्यातून होत असे. प्रबोधन-प्रचार-मनोरंजन अशा तीनही प्रकारांना त्यात समान महत्व होते. पंचवार्षिक योजनेतील धोरणांबद्दल, तिच्या यशाबद्दल प्रचार होत होता, तसेच कुटुंब-नियोजनासंबंधी जनजागृती करण्यासाठी लाल-त्रिकोण, सर्वशिक्षा अभियान यांसारख्या जनहिताच्या योजनांबद्दल करमणुकींच्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच प्रबोधनाचे कार्यही केले जात होते. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात त्याचा विध्वंस न करता आपण सारे सहप्रवासी आहोत ही भावना ’राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेच्या आधारे रुजवण्याचा प्रयत्न केला जात असे.

’मिले सुर मेरा तुम्हारा’, ’सौ रागिनियोंसे सजा भारत’ किंवा ’सारा ’भारत ये कहे’ सारखी गाणी सादर करण्याची ना शासनाला गरज वाटते ना जनतेला. व्यावसायिकांनी तर ’यात नफा नाही’ या नावाखाली केव्हाच हात वर केले आहेत. कुणी पदरमोड करुन कुणी केलीच, तरी तरी तिला प्रस्थापित माध्यम मिळत नाही. आणि मिळालीच, तर गणपतीबाप्पासमोरच किंवा कृष्णभक्तीचा आव आणत ’चिकनी चमेली’ किंवा ’जलेबीबाई’बरोबर नाचण्यात धुंद झालेल्या प्रेक्षकांचे त्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही.

यात भर म्हणून अगम्यताप्रेमी, उन्नतनासिका समीक्षक अशा लघुपटांना, गीतांना ’प्रचारकी’ म्हणून नाके मुरडू लागतात. आणि त्यांच्या पारंब्यांना लटकून कणभर सरस सामाजिक स्थान मिळवून सामान्यांपेक्षा अर्धी पायरी वर राहण्याची धडपड करणारे त्यांचे भाट त्यांची री ओढत तो समज पसरवण्याचे काम जोमाने करत राहतात.

राष्ट्रभक्तीची संकल्पना आणि म्हणून राजकारण, सामाजिक विचार, एवढेच काय कलासमीक्षाही शत्रूलक्ष्यी होत गेली आहे. काय स्वीकारार्ह यापेक्षा काय त्याज्य याची चर्चा अधिक करु लागली आहे. याला अर्थातच अनियंत्रित माध्यमांचा सुळसुळाट हे एक कारण आहे. कोणतीही जबाबदारी न घेता बेफाट विधाने करणे आता सोपे झाले आहे. अशा बेफाट बेमुर्वत विधानांचे पीक प्रचंड वेगाने नि व्याप्तीने वाढते आहे. त्याला आव्हान देऊन त्यातील फोलपणा सिद्ध करताना साधकबाधक विचार करु शकणार्‍या, तारतम्याला अजूनही तिलांजली न दिलेल्यांची दमछाक होते आहे. यातून काही जण सरळ विचार बंद करुन ’मुख्य धारेत’ प्रवेश करुन त्या प्रवाहाबरोबर वाहात जाणे पसंत करु लागले आहेत.

एखादा बागुलबुवा तयार करुन त्याच्या विरोधात आपला एक गट तयार करणे याला आता प्राधान्य मिळू लागले आहे. राष्ट्रवादी विचार तर बांधिलकीला संपूर्ण त्यागून केवळ शत्रूलक्ष्यी मांडणी करणार्‍यांनी अपहृत केलेला आहे. आणि त्यांचे विरोधक 'त्यांना विरोध की राष्ट्रवाद या संकल्पनेला विरोध' या संभ्रमात भरकटत चालले आहेत.

अगदी सामाजिक न्यायाचा विचार करणारेही असाच विचार करु लागले आहेत. ’त्यांच्या’ व्यासपीठावर जायचे नाही हा अलिखित नियम तर झालाच आहे, पण बहुतेक वेळा आपल्याशी एकमत असलेल्या एखाद्याने जरा न पटणारे मत मांडले, की लगेच ’तो छुपा तिकडचा’ म्हणून त्याला पलीकडे ढकलण्याची त्यांची अहमहमिका एकुण समाजाच्या हिताची तर नाहीच, पण आपलेच वर्तुळ आपल्या सोयीचे लहान करत नेणारी आहे. "पुण्यात शुक्रवारातले पुरोगामी नारायणपेठेतल्या पुरोगाम्यांच्या वार्‍याला उभे राहात नाहीत, आणि नव्या पेठेतले पुरोगामी या दोघांना हाताच्या अंतरावर ठेवत असतात" असे मी गंमतीने म्हणत असतो.

प्रत्येक जाती/धर्म/गट/प्रदेश यांतील एकांगी मतांचे अनेक लोक प्रबळ होऊ लागले आहेत. ते त्या त्या गटाचे नेतृत्व बळकावून बसले आहेत. यातील ब्राह्मणांच्या मते देशाची दुरवस्था ही ’साल्या आरक्षणवाल्यां’मुळे किंवा आमच्या गुणवत्तेला डावलून पुढे जाणार्‍या ’फुकट्यां’मुळे आहे. पोरवडा वाढवून हे लोक बहुमताच्या आधारे आम्हा अल्पसंख्यांकांची मुस्कटदाबी करतात अशी यांची तक्रार असते. त्यामुळे बहुमताला झुगारुन उभी राहणारी हुकूमशाही यांची लाडकी असते. सत्तर वर्षे लोकशाही रुजलेल्या देशात हुकूमशाहीच्या अनुभवाअभावी तिचा अर्थ समजण्याइतकी समज त्यांच्याच विकसित झालेली नाही. नव्या व्यवस्थेमध्ये गुणवत्ते(?)नुसार ’आपले’ राज्य येईल अशी यांना भाबडी आशा असते.

म्हणून महाराष्ट्रात फडणवीस मुखमंत्री होताच मनातल्या मनात ’आनंद पोटात माझ्या माईना’ गात गात ’राज्याला प्रथमच णला ण म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला’ असे विधान हे लोक समाजमाध्यमातून फिरवू लागतात. आणि असा तद्दन खोटा दावा करताना, बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान आणि नंतर मुख्यमंत्री, तर सेनेचे मनोहर जोशी हे युतीचे मुख्यमंत्री होते हे सोयीस्कररित्या विसरून जातात. कारण त्यातही पुन्हा खेर काँग्रेसचे नि जोशी सेनेचे; त्या तुलनेत भाजप/संघ अधिक शुद्ध धारेतला ब्राह्मणी असल्याने त्यांच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक अधिक हे ओघाने आले.

उलट दिशेने आंबेडकरी म्हणवणार्‍यांतील एकांगी मंडळींच्या मत ’हे सारे ब्राह्मणांचे (पाठभेद: ब्राह्मण्यवादाचे) पाप आहे'. एका आंबेडकरी विचारवंताने तिच्या एका लेखाची सुरुवातच मुळी ’देशात जे जे सगळे वाईट आहे ते ब्राह्मण्यवादाचे आहे असे मानले जाते’ या विधानाने केलेली माझ्या वाचण्यात आली आणि मी गार पडलो होतो. संगणकावर प्रोग्रामिंग करणार्‍यांना ’गार्बेज कलेक्टर’ नावाची संकल्पना माहित असेल. संगणकाच्या स्मरणमंजुषेचा कोणत्याही प्रोग्राम/ प्रणालीला नको असलेला, टाकाऊ भाग हा गार्बेज कलेक्टरमध्ये सामावला जातो. ब्राह्मण्य/ब्राह्मण हे असे गार्बेज कलेक्टर आहेत अशीच तिची व्याख्या दिसली.

थोडक्यात ब्राह्मण्यवाद- कंसात ब्राह्मण- हे सार्‍या पापाचे मूळ आहेत असा यांचा दावा आहे. ’पूर्वी अस्पृश्य म्हटले गेलेले पददलित हे नरकाची खाण, मागील जन्मातील अध:पतित’ असे म्हणणार्‍या ब्राह्मणी अतिरेकी दाव्यातील दुराग्रही एकांगीपणाशी मला याचे साधर्म्य दिसते. पण यापैकी कुणालाही सांगायला गेलात तर एकमेकांकडे बोट दाखवून ’त्यांना आधी सांगा’ म्हणून झटकून टाकले जाईल याची खात्री बाळगा.

त्याचप्रमाणे मुस्लिम अतिरेकी व्यक्तींची मानसिकता ’पूर्वी आम्ही सत्ताधारी जमात होतो. त्यामुळे हिंदू ही गुलाम नि आम्ही सत्ताधारी जमात आहोत. फक्त इस्लामच्या तत्वांचे तंतोतंत पालन केले की आम्ही पुन्हा त्या वैभवशाली भूतकाळात होतो तसे सत्ताधारी होऊ’ अशी आहे. हा समज ’आम्ही भूतकाळात कधीतरी जगाचे राजे होतो आणि ही साली लोकशाही जाऊन (अन्य जातींपेक्षा आम्ही बुद्धिमान या अहंकारातून) बुद्धिमंतांची म्हणजे ’आमची’ हुकूमशाही केव्हा येईल' याकडे डोळे लावून बसलेल्या ब्राह्मणांच्या समजाइतकाच भाबडा नि हास्यास्पद आहे. हिंदुत्ववाद्यांनी जसा आपला अतिरेकी विचार एकुण हिंदू समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, तसाच  मुस्लिमधर्मीय माथेफिरुंनी त्यांच्याही आधी तो सामान्य मुस्लिमांत रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

’एक व्यक्ती एक मत’ तत्वावरील लोकशाही प्रस्थापित झाल्यावर मोजक्या ठिकाणी असलेले ब्राह्मण प्राबल्य वगळता सर्वत्र त्या त्या राज्यातील क्षत्रिय/शेतकरी जमातींनी राजकीय आणि म्हणून आर्थिक (आणि उलटही) वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पूर्वीच्या ब्राह्मण वा मुस्लिमांप्रमाणेच ’आता आपण कायमस्वरुपी सत्ताधारी जमात झालो आहोत’ असा समज त्यांच्यातही प्रबळ होऊ लागला. केशवसुतांच्या ’आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?’ या कवितेच्या चालीवर "आम्ही कोण म्हणुनि काय पुसता, आम्ही नेते सर्वांचे । देवाने दिधले असे भोगव्य सारे आमुच्याच गोतावळ्या॥" असा या क्षत्रिय म्हणवणार्‍या जमातींचा समज होऊ लागला होता.

पण ब्रिटिश सत्तेच्या काळात उद्योगधंदे आणि बूर्ज्वा रोजगाराला चालना मिळाली. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यावर सेवाक्षेत्राने मोठी झेप घेतली. त्यातून अर्थकारणातला शेतीचा हिस्सा कमी होत गेला. शिवाय पिढ्यान्‌ पिढ्या त्यांच्या जमिनी विभाजित होत गेल्यामुळेही त्यांच्या आर्थिक आणि पर्यायाने राजकीय सत्तेचा आधार असलेला शेती-व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होऊ लागला.

त्याचवेळी 'शिक्षण, आरक्षण आणि रोजगार यातून आलेले आर्थिक स्थैर्य वा प्रस्थापित झालेले सामाजिक स्थान यामार्गे तथाकथित खालच्या जमाती आपल्या मांडीला मांडी लावून बसू लागल्या आहेत नि सर्वच क्षेत्रातील आपला वाटा कमी होत चालला आहे' हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले, तेव्हा विविध राज्यांतून या जमातींनी तो वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून सर्वत्र आर्थिक, राजकीय आरक्षणाची मागणी सुरु झाली आहे. राजस्थानात गुर्जर, पंजाब/हरयानामध्ये जाट आणि महाराष्ट्रामध्ये मराठा या जमातींची आंदोलने यातूनच उभी राहिली आहेत.

विभागणीच्या धर्म वा जात या रेषाही पुरेशा न वाटून गाव/शहर/शिक्षणसंस्था यांच्या आधारेही गट पाडले जातात. कोणत्याही वस्तुनिष्ठ, संख्याशास्त्रीय पुराव्याखेरीज प्रत्येक गटाचे अध्याहृत असे गुण नि अवगुण मानून त्या आधारे शाब्दिक लढाया नि माफक राजकारणही केले जाते. हे सारे गट-धार्जिणे अतिरेकी नेहमीच ’त्यांना सांगा की’ या हुकमी तर्काचा आधार घेतात. जोवर समोरच्या गटात अतिरेकी विचाराची वा अन्य-गट-द्वेष्टी एक तरी व्यक्ती दाखवता येते, तोवर तीच त्या गटाची प्रातिनिधिक असल्याची मखलाशी करत ते आपल्या अतिरेकी मानसिकतेचे समर्थन करत राहतात.

या सार्‍या जात/धर्म अस्मितेच्या मंडळींना नाके मुरडणारे नि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारेही यांच्याहून वेगळे नाहीत. हिंदुत्ववाद्यांच्या मते मुस्लिम देशाच्या सर्व सामाजिक समस्यांचे (आणि राजकीय पातळीवर काँग्रेस) मूळ आहे, ब्राह्मणांच्या मते ’आरक्षण’ आणि ते लाटणारे ’फुकटे’ हे देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे, स्वयंघोषित शोषितांचे ठेकेदार म्हणतात, ’ब्राह्मण्य (मनात: ब्राह्मण) हे सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे गुन्हेगार’... तसेच अनेक पुरोगामी मंडळी ’मध्यमवर्ग’ (म्हणजे कोण?) हा सर्व समस्यांचे मूळ मानतो. कुठलाही कार्यकारणभाव दाखवता येत नसला तरीही या वर्गाला ओढून आणून त्यावर खापर फोडत बसतात. यात डाव्या म्हणवणार्‍यांचा समावेश अधिक आहे.

मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक गट आपापले पारलौकिक तसंच भौतिक देवबाप्पा शोधत असतो आणि सोबतीला त्याच्या भलामणीसाठी सार्‍या पापांची कचरापेटी म्हणून वापरता येईल असा एक तथाकथित सैतानही शोधून ठेवत असतो. मग त्यांचे सारे विचार ’चांगले सारे बाप्पाचे, वाईट सारे सैतानाचे’ या सोप्या निवाड्याभोवती फिरत राहतात. त्या संकुचित विचारवर्तुळाच्या बाहेर जाण्याची गरज त्यांना वाटेनाशी होते. त्यांच्या जगण्याला तेवढे पुरेसे असते.

कोणत्याच समाजगटात सर्वच व्यक्ती सर्वस्वी निर्दोष असणे अशक्य आहे हे उघड आहेच. शिवाय मुळात दोष कशाला म्हणावे यातही प्रचंड सापेक्षता असते. ’आमच्या गटावर अन्याय केला’ हे गृहितकही समोरच्या गट वा व्यक्तिचा दोष म्हणून जाहीर करता येतेच. थोडक्यात परस्परविरोधी अतिरेकी हे ’एकमेका साह्य करु’ भूमिकेतच असतात. त्यांना एकमेकांची मदतच होत असते. महाभारतातही दुर्योधन पांडवांकडे बोट दाखवून शंभर कौरवांची एकता राखू शकला आहे. एरवी नव्व्याण्णव बंधू असता कुरु साम्राज्य अखंड राखणे त्याला अशक्यच होते. आता राष्ट्रीय एकात्मतेसारख्या व्यापक बांधिलकीऐवजी लहान गट करुन त्या गटापुरती अस्मितेची मोट बांधणे लोक अधिक पसंत करतात, आणि त्या गटाच्या आधारे बार्गेनिंग करुन राजकीय, आर्थिक तसंच सामाजिक सत्तेमधील आपापला चिमुकला वाटा हस्तगत करुन स्वत:ला धन्य समजत असतात.

अस्मिता अर्थात आयडेंटिटी ही एकाच वेळी समावेशक (inclusive) आणि विभाजक(exclusive) हवी असते. त्यातून आपला ’देवतुल्य’ पक्ष आणि ’त्यांचा’ राक्षसपक्ष अशी सोपी विभागणी करता येते, ज्यातून कुणाच्या हाती हात द्यायचा नि कुणाच्या 'माथा हाणू काठी' करायचे हे अनायासे निश्चित होऊन जाती. त्यामुळे राष्ट्रवादातील राष्ट्रीय एकात्मतेची हाक असो वा मार्क्सवाद्यांची जागतिक बंधुभावाची हाक असो, सर्वसामान्यांना ती पुरेशी वाटत नसते. म्हणून मग कम्युनिस्ट म्हणवणारेही कळीच्या मुद्द्यांवर आपापल्या जातींच्या वळचणीला गेलेले दिसतात. तसंच ’हिंदू सारा एक’ म्हणणारे सामाजिक-आर्थिक पातळीवर मागे राहिलेल्या वा ठेवलेल्या हिंदूंच्या उत्थानाची जबाबदारी न घेता, "आम्ही अधिक लायक म्हणून आम्ही पुढे गेलो" असा दावा करतात. यासाठी हर्बर्ट स्पेन्सरच्या ’सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या एकांगी दाव्याचा आधार घेतात, आणि ज्याचे अखंड कीर्तन ते करत असतात त्या अखंड(!) हिंदू समाजात ’आपण आणि ते’ अशी निर्लज्ज विभागणी करुन ठेवतात.

स्वातंत्र्याच्या व्याख्येमध्ये जसे ’कशाचे स्वातंत्र्य’ या बरोबरच ’कशापासून स्वातंत्र्य’ असे दोन भाग पडतात. त्याच धर्तीवर तसेच अस्मितेच्या, आयडेंटिटीच्या भुकेचे ’आपण कोण’ आणि ’आपल्याहून वेगळे कोण’ असे दोन भाग पडतात. आणि जे आपल्याहून वेगळे ते आपल्याहून मुळातच दुय्यम किंवा दुसर्‍या बाजूने शोषक, किंवा लायकी नसता पुढे गेलेले, असे गृहितक बळावू लागते. थोडक्यात राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेच्या अनुपस्थितीत वेगळेपण हे विभागणीकडे, वैराकडे वाटचाल करू लागते.

या सार्‍या धुमश्चक्रीमध्ये देश हा देव्हार्‍यात ठेवलेला देव म्हणून शिल्लक राहिला आहे. श्रावणात एखाद्या देवाच्या नावे उपवास धरावा तसे किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या श्राद्धाचे पिंड घातल्यासारखे फेसबुक, व्हॉट्स-अ‍ॅप, ट्विटर वगैरे समाजमाध्यमांतून देशभक्तीच्या डरकाळ्यांच्या पिपाण्या वाजवल्या की पुरते. मग देवाला नैवेद्य दाखवून आपापली ताटे वाढायला घ्यावीत तसे आपण स्वत:च्या स्वार्थी आयुष्यात सहज परतून येतो. ’तू मोठा देशभक्त की मी’ या अहमहमिकेतून मग राष्ट्रभक्तीचे जास्तीज जास्त मेसेजेस कोण फॉरवर्ड करतो, कोण सर्वात उंच झेंडा उभारतो, कोण जास्तीत जास्त विरोधकांना राष्ट्रद्रोही म्हणून गुण मिळवतो याची स्पर्धा चालू होते. देशाच्या अवनतीचे खापत अन्य धर्म/जात/राज्य/विभाग यावर फोडून काहीही ठोस कृती न करताही आपला गट आणि पर्यायाने आपण अधिक राष्ट्रभक्त ठरतो असे बहुसंख्येला वाटू लागले आहे.

पण देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्या देशातील समाज, माणसे, संस्कृती, भाषा या सार्‍याचा समुच्चय. जेव्हा त्यातील एखाद्या अनुषंगाचा तुम्ही तिरस्कार करता तेव्हा तुम्ही देशभक्त असूच शकत नाही, भले बारा महिने तुमचा फेसबुक-डीपी तिरंगा दाखवू दे, भले जगातील सर्वात जास्त देशभक्तीपर मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड केलेले असू देत, भले इतर कुणाहीपेक्षा जास्त देशद्रोही तुम्ही शोधून काढलेले असू देत. भले त्याच्यासारखे अनेक जण एकत्र येऊन तशी घोषणा करत असले तरीही ज्याच्या मनात बांधिलली नव्हे तर द्वेष आहे तो देशभक्त असूच शकत नाही.

या परिस्थितीत बदल कसा होणार हे आज सांगणे फार अवघड आहे. जंगलाला लागलेली आग किती पसरेल, किती जिवांचा बळी घेऊन, किती झाडांची राख करुन शांत होईल हे सांगणे जसे अवघड, तसेच हे ही. मुळात आग लागली आहे हेच वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगी नागरिकांना अमान्य असेल, त्यातही आपलाही वाटा आहे हे समजून घेण्यास सर्व गट आणि गटबांधिल व्यक्ती तयार नसतील, तर त्या आगीचे निर्दालन करण्याची सुरुवातही होणे अवघड आहे. अशा वेळी तिच्या अंताचे भविष्य वर्तवणे मूर्खपणाचेच ठरेल.

(समाप्त)

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता  << मागील भाग
---

मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्‍या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्‍या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता.

पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या.

साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट क्षेत्राने सामाजिक विषयांवरील चित्रपटांचे बोट सोडून ’अ‍ॅंग्री यंग मॅन’भोवती कथानके विणायला सुरुवात केली.

सामाजिक चित्रपटांमध्ये पारंपरिक संदर्भात का होईना पण नेमक्या भूमिका असणार्‍या अभिनेत्रींना आता या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ची जोडीदार इतकेच स्थान मिळू लागले. पुस्तकांची जागा नियतकालिकांनी घेतली आणि तिथेही हिंदी चित्रपटसृष्टीतील खमंग गॉसिप्स कोणताही विधिनिषेध न बाळगता विकली जाऊ लागली. हळूहळू हे कृतकवीर तरुणाईचे आदर्श होऊ लागले. मग आता प्रबोधनाचे माध्यमही त्यांना शरण जाणे अपरिहार्य होऊन बसले.

समाजातील मनोरंजनाचे केंद्र दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटांकडे सरकत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवरही उलथापालथ होत होती. मुस्लिम धर्मियांमधील ’तोंडी तलाक’ संदर्भातील मैलाचा दगड मानला गेलेल्या प्रसिद्ध ’शाहबानो खटल्याचा निकाल १९८५ मध्ये आला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा आरोप करत मुस्लिम धर्मियांमधील एका मोठा गटाने आंदोलन सुरू केले. त्या दबावासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ साली संसदेत कायदा करुन या निकालास रद्दबातल केले.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसवरचा ’मुस्लिमधार्जिणेपणाचा’ आरोप अधिक जोरकसपणे करता येऊ लागला. यातून जनमतामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी आजवर धार्मिक, पौराणिक कार्यक्रमांना कटाक्षाने दूर ठेवलेल्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतावर आधारित मालिका दाखवण्याची सूचना राजीव गांधींनी केली. १९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण दूरदर्शनच्या पडद्यावर राज्य करु लागले.

या दोन निर्णयांमुळे दोन्ही धर्मियांमध्ये कट्टरपंथी मंडळींचा वरचष्मा होऊ लागला. आणि त्याला छेद देण्यासाठी एकतेचा घोष ’राष्ट्रीय एकात्मता’ असा बदलून घेण्यात आला. पुन्हा राजीवजींच्याच प्रेरणेने जयदीप समर्थ (प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे बंधू) यांनी हा प्रस्ताव दूरदर्शनकडे नेला. १९८८ साली ’मिले सुर मेरा तुम्हारा’ हा संगीत-पट ’लोकसेवा संचार परिषद’ या सस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. यात प्रथमच मानवी एकतेचा, बांधिलकीचा गजर मर्यादित करुन केवळ ’देशबांधवांच्या एकतेचा’ पुकारा करण्यात आला.

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा

(कॉशुर)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(ਪੰਜਾਬੀ)
ਤੇਰਾ ਸੁਰ ਮਿਲੇ ਮੇਰੇ ਸੁਰ ਦੇ ਨਾਲ
ਮਿਲਕੇ ਬਣੇ ਇਕ ਨਾਵਾਂ ਸੁਰ ਤਾਲ

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

(سنڌي)

معهڳنجو سعر تعهڳنجي ساان پٿاارا مڳلي جادينه
گييت اساانجو مادهعر تاراانو باني تادينه (اُردُو‎)
سر کا دریا بہ کے ساگر میں میل

(ਪੰਜਾਬੀ)
ਬਾਦਲਾਂ ਦਾ ਰੂਪ ਲੈਕੇ
ਬਰਸਾਂ ਹੌਲੇ ਹੌਲੇ

(தமிழ்)
இசைந்தால் நம் இருவரின் சுரமும் நமதாகும்
திசை வேறு ஆனாலும் ஆழிசை ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவதுபோல் இசை...
நம் இசை

(ಕನ್ನಡ)
ನನ್ನ ಧ್ವನಿಗೆ ನಿನ್ನ ಧ್ವನಿಯ,
ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯ

(తెలుగు)
నా స్వరము నీ స్వరము సంగమ్మమై
మన స్వరంగా అవతరించెయ్

(മലയാളം)
എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും
ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി

(বাংলা)
তোমার সুর মোদের সুর
সৃষ্টি করুক ঐক্যসুর (2x)
সৃষ্টি করুক ঐক্যতান

(অসমীয়া)
সৃষ্টি হউক ঐক্যতান

(ଓଡିଆ)
ତୁମ ମୋର ସ୍ୱର ର ମିଲନ
ସୃଷ୍ଟି କରେ ଚାଲୁ ଚତନ

(ગુજરાતી)
મળે સૂર જો તારો મારો
બને આપણો સૂર નિરાળો

(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा (3x)
तो सुर बने हमारा (2x)
---
LyricsTranslate.Com येथून साभार.

या संगीतपटाची संगीत-कल्पना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची होती. भारतीय रागसंगीतामध्ये हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीं संगीतांच्या रागविस्ताराच्या दृष्टिकोनात फरक असला तरी मूळ रागकल्पना कर्नाटक संगीतामधूनच आलेली असल्याने काही रागांमध्ये साम्यही दिसते. या दोन्ही प्रवाहांचे प्रातिनिधित्व करणार्‍या, जिला सदासुहागन रागिणी म्हटले जाते त्या भैरवीला मुख्य आधार म्हणून घेत रागसंगीतामधील इतर काही रांगांच्या छटा अधेमध्ये वापरण्यात आल्या.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यात हिंदी, असमी, तमिल, तेलगु, कश्मीरी, पंजाबी, हरयाणवी, सिन्धी, उर्दू, कन्नड़, मलयालम, बंगाली, उडीया, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांमधली कडवी समाविष्ट करण्यात आली. प्रत्यक्ष पडद्यावर दोन भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि विदुषी लता मंगेशकर यांच्यासह बालमुरली कृष्ण (यांनी गायलेला तुकडा माझ्या मते यातील सर्वोत्कृष्ट म्हणावा लागेल. कितीहि उद्विग्न मनाला शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे), कविता कृष्णमूर्ती यांच्यासारखे गायकांसोबतच जावेद अख्तर, नरेन्द्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय यांच्यासारखे कवीही हजेरी लावून गेले.

वर म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासारख्या तारे-तारकांसह हरीष पटेल, वीरेन्द्र सक्सेना यांच्यासारख्या सहकलाकारांचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकामुळे क्रिकेटचाही सुवर्णकाळ चालू होत होता. त्यातूनही सय्यद किरमाणी, अरुण लाल यांच्यासारखे खेळाडू चमकून गेले. इतर खेळांतूनही काही जणांची निवड केली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि तत्कालिन कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांचाही समावेश केला गेला होता.

२०१० साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ’झूम टीव्ही’ चॅनेलने या संगीतपटाची पुनर्निर्मिती (Redux) केली. त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने याचीच एक आवृत्तीही प्रसारित केली होती. पुढेही वेळोवेळी अनेक गायक नि गायिकांनी या गाण्याला ’कव्हर’ केले आहे. युवा मराठी गायिका आर्या आंबेकर हिने २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी गायलेल्या या गीताचा हा व्हिडिओ.

पुढच्याच वर्षी (१९८९) मध्ये ’बजे सरगम हर तरफ से’ हा आणखी एक संगीत-पट निर्माण करण्यात आला. यात बॉलिवुडी तारकांचा चमचमाट नव्हता. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ मध्ये भारताचे भौगोलिक वैविध्याचे दर्शन प्राधान्याने घडवले होते. ’बजे सरगम’ मध्ये भारतातील विविध संगीत, नृत्य परंपरांचा अंतर्भाव करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला होता. ’मिले सुर...’ ने भैरवी रागाला आधार-स्वर मानून संगीताची मांडणी केली होती तर ’बजे सरगम...’ साठी देस रागाची निवड करण्यात आली होती.

’मिले सुर...’ मध्ये केवळ गायक, गायन आणि अभिनेते यांचाच समावेश होता. ’बजे सरगम’ने पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. रामनारायण यांच्यासारखे तंतुवाद्यवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखे बासरीवादक, उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखे तबलावादक, अशा वाद्यवादकांचाही समावेश केला होता.

यासोबतच ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी, कथ्थक नर्तकी शोभना नारायण यांच्यासह कथकली, कुचिपुडी, मोहिनिअट्टम्‌, भरतनाट्यम्‌ आणि मणिपुरी नृत्यांचाही समावेश केला होता.

त्यानंतर बराच काळ अशा स्वरुपाचे कार्यक्रम नव्याने तयार झालेले दिसत नाहीत. परंतु १९९२ मध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाला, नि त्यापाठोपाठ दंगली उसळल्या. देशात पुन्हा एकवार हिंदू-मुस्लिम द्वेषाचे तांडव सुरू झाले. अशा वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा पुन्हा एकवार बुलंद करण्याची गरज वाटू लागली. हा खाली दिलेला संगीत-पट (म्हणा की गीत म्हणा) हे १९९३ मध्ये चित्रित करण्यात आले. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ प्रमाणे यातही त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवुडी अभिनेत्यांचा समावेश होता. यात आणखी एक महत्वाचा बदल असा होता की आता या बंधुभावाची शिकवण बालपणापासूनच बिंबवायला हवी हे ध्यानात घेऊन हे गीत त्या पिढीलाच उद्देशून लिहिले गेले होते.

सुन सुन सुन मेरे नन्हे सुन,
सुन सुन सुन मेरे मुन्ने सुन
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सुन सुन सुन मेरी नन्ही सुन,
सुन सुन सुन मेरी मुन्नी सुन
प्यार की गंगा बाहे देश मे एका रहे

ख़त्म काली रात हो, रोशनी की बात हो
दोस्ती की बात हो, ज़िन्दगी की बात हो
बात हो इंसान की, बात हिन्दुस्तान की
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

अब न दुश्मनी पले, अब न कोई घर जले
अब नही उजड़े सुहाग, अब नही फैले ये आग
अब न हो बच्चे अनाथ, अब न हो नफ़रत की घात
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सारे बच्चे बच्चिया, सारे बूढ़े और जवां, यानी सब हिंदुस्तान
एक मंजिल पर मिले एक साथ फिर चले
एक साथ फिर रहे, एक साथ फिर कहे... फिर कहे...
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे...
देश मे एका रहे, सारा भारत ये कहे
सारा भारत ये कहे, देश मे एका रहे

---

हे गीत मी अनेकदा पाहिले नि ऐकले होते. परंतु बर्‍याच काळाने त्याच्याबद्दल एक रंजक माहिती मला मिळाली. त्यानुसार ’सारा भारत ये कहे’ (१९९३) हे गीत संजय दत्त अभिनीत ’खलनायक’ या शीर्षकाच्या चित्रपटातील आहे. हे ऐकून मला धक्काच बसला होता.

’नायक नहीं खलनायक हूँ मैं’ हे त्यातील गाणे आणि एकुणच कथानक गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप झाल्याने तो वादग्रस्त ठरला होता. एकुणच बॉलिवुडी मसालापट परंपरेतील असलेल्या या चित्रपटात हे गाणे अगदीच अस्थानी दिसले असावे. कदाचित असेही असेल की मूळ कथेमुळे चित्रपट वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी हे गाणे नंतर समाविष्ट करण्यात आले असावे. प्रत्यक्षात सिनेमागृहांतून दाखवलेल्या प्रतीमध्ये हे होते की नाही मला ठाऊक नाही. परंतु दूरदर्शनवर मात्र त्याचे प्रसारण अनेकदा पाहण्यात आले.

’सारा भारत ये कहे’ नंतरचा काळ हा भारताचा संक्रमणकाळ ठरला. मनमोहन सिंग प्रथम अर्थमंत्री नि नंतर प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यांचा बोलबाला सुरू झाला. हिंदी चित्रपटांनी 'खलनायक’ची परंपरा स्वीकारून गुन्हेगारी, बटबटीत शृंगार, चोख मनोरंजन करणारे विनोद आदींची कास धरून ’अर्थस्य हि पुरुषो दास:’ ही म्हण तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली. खासगी चॅनेलच्या वावटळीमध्ये ’दूरदर्शन’ एका कोपर्‍यात फेकले गेले. तांत्रिक, आर्थिक प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू झाली. देशाचा आर्थिक विकास ज्याने होतो ते ते सारे समर्थनीय ठरू लागले. त्यासाठी ज्याचा उपयोग नाही ते सारे निरुपयोगी ठरून बाहेर फेकले गेले.

या दरम्यान रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला आणि सामाजिक समता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर धार्मिक अस्मितांसोबतच जातीय अस्मिताही धारदार होऊ लागल्या. देशभर मोकाट सुटलेल्या अस्मिता-सांडांच्या धुमाळीमध्ये ’राष्ट्रीय एकात्मता’ नावाची गाय परागंदा झाली.

त्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी प्रसिद्ध गायक पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पुन्हा एकवार या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 'भारत को एक सलाम’ शीर्षकाखाली नवा संगीत-पट निर्माण केला. ’सौ रागिनियों से सजा भारत अनोखा राग है’ या गीताभोवती हा संगीत-पट उभा आहे. परंतु त्याच्या गीताचे बोल पाहिले तर यात भारतीय भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक वैशिष्ट्यांबद्दल काहीच उल्लेख नाही. एखाद्या देवाची स्तुती करणारी आरती असावी असे ते गीत लिहिले आहे. (दुर्दैवाने याचा लेखक कोण हे समजू शकले नाही.)

'देश हा आपणा सर्वांना जोडणारा समान धागा' या व्याख्येपासून सुरुवात करुन ’तुम्हा-आम्हा नागरिकांपासून वेगळा असा काहीतरी एक 'देश नावाचा देव नि आपण त्याचे भक्त’ इथपर्यंतचा प्रवास इथे पुरा झाला आहे.

सौ रागिनियों से सजा,
भारत अनोखा राग है।
ये प्यार का संगीत है।
ये शांती का गीत है।
ये एकता का राग है।
भारत अनोखा राग है ॥१॥

भारत के इस तारे पे,
गूँजे है जो जो रागिनी।
सब मिल गाएँ एक धुन बानी।
इस धुन पे नारा एक है।
इसका तराना एक है।
ये राग सबका राग है।
भारत अनोखा राग है ॥२॥

जय हिंद, जय हिंद।
जय जय जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।

इस देश की रीत एक है।
हैं धडकने एक ताल में।
सुर अनगिनत गीत है।
ये देश सबका देश है।

क्या बोल हैं, क्या राग है।
सब गाएँ ऐसा राग है।
बहुरूपमें अनुराग है।
सौ रागिनियों से सजा।
भारत अनोखा राग है ॥३॥

जय हिंद, जय हिंद, जय हिंद...

हे गीत अनेक गायक-गायिकांनी गायले आहे. यात संगीतमार्तंड पं. जसराज, आपल्याला प्रामुख्याने चित्रपटगीत-गायक म्हणून ठाऊक असलेले कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गायक पं. येसूदास, शंकर महादेवन यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, जगजित सिंग आणि अनूप जलोटा यांचा समावेश होता. जावेद अख्तर यांच्यासारखे कवी, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्रीही हजेरी लावून गेल्या आहेत.

'भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणत १९६३ मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेचा संगीत-प्रवास २०१३ साली ’भारत अनोखा राग है’ पाशी थांबला. एकात्मतेला श्रद्धांजली वाहून देशभक्तीचा गजर सुरू झाला आणि कोण अधिक देशभक्त याची चढाओढ सुरू झाली

१९९२ मध्ये आलेल्या स्पर्धाव्यवस्थेने देशभक्तीमध्ये स्पर्धा रुजवली. त्या व्यवस्थेत अपरिहार्यपणे गुणवत्तेपेक्षा उपलब्धतेला महत्त्व येऊन, स्वत:च्या गुणवत्तेपेक्षा इतरांमधील तिच्या अभावाची चर्चा होते. तेच देशभक्तीच्या क्षेत्रातही होऊ लागले. ’सारा भारत ये कहे’ मधील संस्कार आणि आता व्हॉट्स-अ‍ॅप सारख्या अनियंत्रित माध्यमांतून होणार प्रचार यातील फरक स्पष्ट दिसू लागला आहे. त्या गीतामध्ये बालकांवर केलेले बांधिलकीचे संस्कार कुठे आणि आज देशभक्तीच्या नावाखाली त्यांच्या मनात रुजवला जात असलेला द्वेष कुठे.

हातात हात घालून चालणारे नागरिक आता हात सोडून शेजार्‍याच्या पुढे राहण्यासाठी जिवाच्या आकांताने धावू लागले. प्रसंगी दुसर्‍याची धाव खंडित करण्यासाठी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडूही लागले. ’सारे भारतीय माझे बांधव आहेत’ पासून ’आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत’ पर्यंत मजल आपण मारली आहे.

(क्रमश:)

- oOo -

पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत


हे वाचले का?

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. ही प्रतिज्ञा प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. १९६२ मध्ये लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम्‌ मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले.

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन,
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे. 

यातील ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्या वाक्यामध्येच समतेचे तत्त्व अधोरेखित केले होते. पुढेही विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे’ म्हणताना एकाच परंपरेचे श्रेष्ठत्व लादण्याचा प्रयत्न करणार नाही हे मान्य केले होते. देशाबरोबरच देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे वचन दिले जात होते. वैय्यक्तिक कल्याण आणि समृद्धी ही देश नि देशबांधवांच्या समृद्धीशी जोडण्यात आली होती. एकुणात भ्रातृभाव, बांधिलकी हा देशबांधवांना जोडणारा धागा असेल असे यातून मान्य करण्यात आले होते. ’राष्ट्रीय एकात्मता’ ही संज्ञा तेव्हापासून परवलीची होऊन गेली होती. चित्रपटांतून, माहितीपटांतून इतकेच नव्हे तर जाहिरातींमधूनही या राष्ट्रीय एकात्मतेचा धागा ठळक करण्यात येत असे.

तो काळ तसा तंत्रज्ञानाच्या बाल्यावस्थेचा होता. १९५९ मध्ये सुरू झालेले ’दूरदर्शन’ हे सरकारी मालकीचे एकमेव चॅनेल बातम्या, मनोरंजन, माहिती याबरोबरच संस्काराचे, प्रबोधनाचेही कार्य करत असे. ज्याला बहुसंख्य लोक आजही केवळ मनोरंजनाचे साधन समजतात त्या चलच्चित्रांच्या (Animation) माध्यमाचा वापरही यासाठी करुन घेतला जात होता. दूरदर्शनवर भीमसैन यांनी तयार केलेल्या अनेकता में एकता (१९७४) (रिमास्टर्ड: https://www.youtube.com/watch?v=csI3yilRPcY) किंवा एकता का वृक्ष (१९७२) यासारखे चलच्चित्र लघुपट राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना सोप्या स्वरूपात रुजवू पाहात होते.

याशिवाय देशोदेशी तयार झालेले अशाच स्वरूपाचे प्रबोधनात्मक चलच्चित्रपटही स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन दाखवले जात. इतालियन-अमेरिकन लेखक नि चित्रकार लिओ लिओनी याने जगण्याशी निगडित अनेक संकल्पना समजावणारी अनेक सचित्र पुस्तके प्रकाशित केली होती. त्यातील फिश इज फिश, अ कलर ऑफ हिज ओन, इंच-बाय-इंच, लिटल ब्लू अ‍ॅंड लिटल यलो, गोष्टी जमवणार्‍या उंदराच्या गोष्टींतून शब्दांचे सामर्थ्य, कथनात्म साहित्याचे माणसाच्या आयुष्यातील स्थान अधोरखित करणारा  फ़्रेडरिक (त्याच्या कथेमध्ये उंदरांचा देव उंदीरच असतो ! ) ,  यांसारख्या काही पुस्तकांवरुन चलच्चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील स्विम्मी (१९७१) हा एकतेचा संदेश देणारा लघुपट सर्वाधिक गाजला.

आज आपल्यापैकी किती जण माहितीपट अर्थात डॉक्युमेंटरीज पाहतात? त्यातूनही प्राणिजीवनावरील माहितीपट वगळले तर माहितीपट पाहणारे अक्षरश: मूठभर उरतील. 'फिल्म्स डिविजन इंडिया’ ही संस्था ’राष्ट्रीय एकात्मता’ या एकाच विषयावर नव्हे तर काही सामाजिक व आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे अनेक चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट तयार करत असे. दूरदर्शनच्या एकाधिकारकाळात ते दूरदर्शनवरुन दाखवले जात (आज किती चॅनेल्स त्या दाखवतात?) तसंच चित्रपटगृहांमधून चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक-दोन माहितीपट दाखवले जात असत. यात अनुबोधपटांचाही समावेश असे.

यात कुटुंबनियोजनाची गरज, पंचवार्षिक योजनेची गरज आणि माहिती देणारा ’अ ग्रेट प्रॉब्लेम’, कुटुंबनियोजनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शासनाने चालवलेल्या ’लाल त्रिकोण अभियानाअंतर्गत अ‍ॅंगल ऑफ द ट्रॅंगल, अफवाविरोधी प्रबोधनासाठी गुब्बारा, दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीबाबत इंडियन ट्रॅफिक, स्वच्छतेचा संदेश देणारा हायजीन: द वे ऑफ लाईफ़, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा मीना लाल त्रिकोण अभियानाप्रमाणे ’हम दो हमारे दो’ कॅपेनच्या प्रचारासाठी अँगल ऑफ द ट्रँगल, द क्रेडल (पाळणा) असे विविध अशा अनुबोधपट दूरदर्शनने तयार केले होते. यात जी. के. गोखले हे प्रमुख चलच्चित्रकार आणि भीमसैन (खुराना) हे निर्माते-दिग्दर्शक यांचा मोठा वाटा होता.

एकता का वृक्ष (१९७२) हा आणखी एक चलच्चित्रपट बराच लोकप्रिय झाला होता. या सार्‍यांमध्ये सामायिक मुद्दा होता तो बांधिलकीचा. विविधतेतून एकता, परस्पर-बांधिलकी हे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे मूलाधार होते.

पुढे चलच्चित्रांचा हात सोडून प्रबोधन चित्रपटांकडे सरकले आणि मिले सुर मेरा तुम्हारा (१९८८) बजे सरगम हर तरफ से (१९८९) सौ रागिनियोंसे सजा (२०१३) असे अनुबोधपट निर्माण झाले. पण नीट पाहिले तर इथे बांधिलकीचा हात सुटून देवत्वस्वरूप देशाप्रती बांधिलकीच नव्हे, तर समर्पणभाव रुजवणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेची जागा देशभक्तीने घेतली. आणि त्यातून प्रथम ’कोण अधिक देशभक्त’ची अहमहमिका सुरू झाली आणि ती ’कोण अधिक देशद्रोही’ पर्यंत येऊन पोहोचली. लहान मुलांच्या म्हटलेल्या चलच्चित्रांमध्ये असलेला सुज्ञभाव मोठ्यांकडे सूत्रे येताच नाहीसा झाला.

(क्रमश:)

---

१. सुप्रसिद्ध हिंदी कवी पं. विनयचंद्र मौद्गल्य यांच्या ’हिंद देश के निवासी’ या कवितेमधील पहिले कडवे 'एक, अनेक और एकता' या अनुबोधपटाच्या शेवटी समाविष्ट केले आहे.

        पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत


हे वाचले का?