शनिवार, २७ एप्रिल, २०२४

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती

नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील.
---

मंतरलेले बेट

चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक नवा करमणुकीचा प्रकार आला– ‘सफ्रेजेट्स’. सफ्रेजेट्स या बाया होत्या. पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क स्त्रियांना असलेच पाहिजेत, असा आग्रह असलेल्या बाया. आतापर्यंत बायकांनी नोकरीधंद्यात हलके-हलके शिरकाव करून घेतलाच होता. त्यांची प्रगती सावकाश पण नेमकी होत होती. पुरुषांच्या बरोबरीला त्या आल्याच होत्या. फक्त मतदानाचा हक्क तेवढा अद्याप त्यांना मिळालेला नव्हता.

काही प्रांतांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला होता. पण आमच्या इथे लोकमत विरुद्ध होते. पुरुष आणि बायकांमधला आणि पुन्हा बायका-बायकांमधला झगडा अनेक वर्षे चाललेला होता. जवळजवळ सगळी पुरुषमंडळी आणि बहुतेक बायका म्हणत की, ‘बायकांना मतदानाचा हक्क पाहिजे. ही ओरड मूर्खपणाची आहे’. वरचा वर्ग या चळवळीची चेष्टा करी. अगदी खालचा वर्ग सरळसरळ विरुद्धच होता. मध्यमवर्गापैकी बरेच लोक म्हणत की, या मागणीत आम्हाला तरी काही रास्त दिसत नाही. पण या प्रत्येक वर्गात थोडे, अगदी थोडे लोक असे होते की, ते या मागणीला पाठिंबा देत आणि स्त्रियांच्या हक्कासाठी नेकीने झगडत.

या बायांनी पूर्वी पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सफ्रेजेट्स चळवळीतल्या बायांशी हातमिळवणी केली. आपले म्हणणे पुढे मांडण्याची एकही संधी या बाया सोडत नसत. स्पष्टच सांगायचे तर, हा एक तापच होऊन बसला होता. बघावे तेव्हा, बघावे तिथे यांचे काहीतरी चालू असे. कुठे पिकेटिंग कर, कुठे पत्रके वाट, मोर्चे ने, सभा घे, रस्त्यांच्या कोपऱ्यावर उभे राहून व्याख्याने झोड; काही ना काही चालूच.

मी काही वेळा त्यांच्या सभा ऐकत असे. त्यांचे बोलणे मुद्देसूद आणि पटण्यासारखे असे. पण सभेला जमलेले श्रोते ऐकून न घेता हुटाहूट करीत. गमतीची गोष्ट अशी की हुटाहूट करणारे, हुल्लड माजविणारे प्रेक्षक म्हणजेही स्त्रियाच असत.

सगळे या चळवळीच्या विरुद्धच होते. राजकीय पुढारी म्हणत, बायकांचे काम घर सांभाळणे आहे. चर्च म्हणे, स्त्रियांना मतदानाचा हक्क असणे ही गोष्ट नीतिबाह्य आहे. स्त्रियांना हा हक्क मिळाला तर त्यांचे घरसंसारावरचे लक्ष उडेल आणि कुटुंबसंस्थेवर आघात होईल.


पण जग विरुद्ध गेले तरी बायांनी धीर सोडला नाही. त्या झगडत राहिल्या. दरवर्षी लोकांना कळावे म्हणून त्या साउथ अॅव्हेन्यूवरून मिरवणुका काढीत. देखावा मोठा बघण्याजोगा असे. बघ्यांची तुफान गर्दी होई. चळवळीच्या म्होरक्या बाया भाड्याने आणलेल्या घोड्यांवर स्वार होऊन मिरवणुकीच्या आघाडीवर राहत. त्यांच्या मागे स्त्रियांचे पायदळ असे. नाना तऱ्हेचे फलक, निशाणे, खुणा हातात धरून हे पायदळ चालत असे. पण या मिरवणुकीचा खरा बघण्याजोगा भाग म्हणजे भेदरट नवरे, भाऊ, मुलगे आणि मित्र यांचा दटावून आणलेला घोळका; तो पिछाडीला असे.

अशी मिरवणूक आली रे आली की, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले बघे, हुर्यो करून अंड्यांचा, भाजीपाल्याचा मारा मिरवणुकीवर करीत. पण बाया लक्ष देत नसत. त्यांचा लढा उच्च ध्येयासाठी होता आणि तो देताना अशा फालतू गोष्टी घडणारच. पण पिछाडीला असलेल्या बाप्यांना ध्येयाबद्दल आस्था नसावी. कारण एकाएकी होणाऱ्या अंड्यांच्या मारामुळे अवसान जाऊन त्यांचा घोळका मिरवणुकीतून बाजूला पळत असे.

ही मंडळी भिऊन पळू लागली म्हणजे सगळ्या जमावाचा अगदी तोल सुटे.

या बाया हक्कासाठी झगडत असताना दुसऱ्या बाया अब्रूरक्षणासाठी झगडत होत्या. विजेच्या शोधामुळे बायकांची अब्रू धोक्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. युरोपातल्या कुणा शास्त्रज्ञाने ‘एक्स-रे’ शोधून काढला होता. ही काही यंत्र अमेरिकेत आली होती. त्यांच्यावर घेतलेले फोटो वर्तमानपत्रात छापलेले सर्वांनी बघितले होते. ‘क्ष’ किरणांमुळे ‘आतले’ दिसते हे माहीत झाले होते.

साहजिकच अशी एक जोरदार अफवा परसली की अशी यंत्रे ज्याच्याकडे आहेत ते लोक खिडकीशी बसून रस्त्यावरून आल्या-गेल्या स्त्रियांची, कपड्याआतली अंगे बघतात हे फार वाईट आहे, स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे.


आगबंबवाले, पोलीस आमच्या दुकानात येऊन म्हणत, “छे, छे, विज्ञानानं भलताच टप्पा गाठला.”

“माझं म्हणणं आहे , हा ‘क्ष’ किरणांचा शोधच मुळी बुडवून टाकावा.”

“अहो, ही काय नीती झाली! या फाजील यंत्रापासून जनतेचं रक्षण केलं पाहिजे.”


मग नवीन प्रकारच्या काचोळ्या बाजारात आल्या. काचोळ्या बनविणारा एक कारखानदार पुढे येऊन म्हणाला की, अमेरिकेतील स्त्रीजातीच्या अब्रूचे रक्षण आम्ही करू. जाहिरात करकरून त्याने एक ‘क्ष’ किरणालासुद्धा दाद न देणारी काचोळी शोधून काढली. या पद्धतीच्या काचोळ्या घालून बिनधोक रस्त्याने चालावे, ‘क्ष’ किरणच काय पण आणखी त्यापलीकडचे किरण आले, तरी ते मुळी या काचोळ्यांतून आरपार जाणे शक्यच नाही, अशी हमी या कारखानदाराने दिली

- oOo -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ५८-६०.

---
संबंधित लेखन:

वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा >>
स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>
---


हे वाचले का?

रविवार, २१ एप्रिल, २०२४

धारयते इति धर्मः ?

दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले.

आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि भोगत राहण्यासाठी! जीवनाचा हाच अर्थ आहे, श्वासोच्छ्वासाची हीच परिणती आहे, प्राणिमात्राची ही गरज आहे, हाच धर्म आहे. ‘धारयते इति धर्मः।’ मग स्वतःला सर्वश्रेष्ठ (म्हणजे जास्तीत जास्त भोग घेऊ शकणारा का?) प्राणी म्हणवून घेण्याचा गर्व माणसात कुठून, कधी आणि कां शिरला? या कलीच्या अस्तित्वाच्या जाणिवेतूनच आपल्या पूर्वजांनी आपल्या या युगाला ‘कलियुग’ हे नाव दिलं का? मग बाकीच्या युगांचं प्रयोजनच काय? बाकीची युगं हा केवळ कल्पनाविलासच आहे की त्यामागे दुसरा काही अर्थ लपलेला आहे?

मनातलं अवकाश

मनुष्यप्राण्यातल्या या गर्वाच्या स्पर्शानं, वातावरणच कां चांदणंदेखील धुरकट होऊन जातं, फुलं कोमेजायला लागतात, तेज मावळायला लागतं, कोरडं कोरडं वाटायला लागतं. ओलावा संपत येतो, नाती ठिसूळ होऊ लागतात. आपापल्या पायांखाली मातीचे वेगवेगळे ढिगारे आणि डोक्यावर तुटक्याफुटक्या आकाशाचे तुकडे! चहूकडून त्या गर्वाने पोखरलेलं अर्थहीन अस्तित्व! एरवीही या उघड्या-नागड्या जगात तसे आपण एकटे एकटेच असतो, आपापल्या स्वर्गाची निर्मिती करण्यात स्वतःला गुंतवत राहतो. हा स्वर्ग तरी मग कसला? अनेकदा जणू बलात्कारातून जन्माला आलेला, विरजलेलं, पराभूत आयुष्य जगत राहणारा!

‘शिंग फुकिले रणी, वाजतात चौघडे / सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे’ अशी गाणी म्हणत, ४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या त्या सैन्यात भरती झालेलं माझ्यासारखीचं तारुण्य नेत्यांमागून सीमेपर्यंत उत्साहात जाऊन पोहोचलं, प्राणपणाने लढलं. ते स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीत क्षणभर नाचलं-बागडलं आणि मग मागे वळून पाहताना त्याला प्रश्न पडला, ‘हेच का स्वातंत्र्य?’

अचानक सुरेश भटांची ओळ आठवली,

हेच का स्वातंत्र्य, ज्याचे गीत आम्ही गाइले ?
हेच का ते प्रेत, ज्याला रक्त आम्ही पाजिले?

युद्धानंतर दोन्हीकडच्या तरुण सैनिकांना या एकाच प्रश्नाने जाग येणार होती, तर मग ते एकमेकांशी लढले कशाला? नेत्यांच्या राज्याभिषेकाचे सोहळे दुरून फक्त पाहायला आणि धारातीर्थी पडलेल्या भाऊबंदांचे उद्ध्वस्त संसार पाहून केवळ अश्रू ढाळायला?

धर्म म्हणजे विशिष्ट वागणुकीच्या चौकटीत जगण्याची सक्ती. धर्म, राष्ट्र असल्या नावांनी मनुष्यजातीची विभागणी करताना नेहमीच चुकीचे निकष लावले गेले. खरं तर दोन्हीकडच्या नेत्यांचा धर्म एक असतो आणि दोन्ही सैन्यांचा धर्मही एकच असतो. नेत्यांच्या पदरी मान-सन्मान पडतात आणि सैन्यांच्या पदरी दुर्भाग्य! तरीही ते सैनिक शहाणे होत नाहीत, डोळे उघडून वास्तवाकडे पाहत नाहीत. लढण्याच्या धुंदीत आपण एकमेकांना, स्वधर्मीयांनाच मारत असतो, आणि ‘नेते’ नामक परधर्मीयांना सत्ताधारी बनवून स्वतःच्या पदरी हे भोग ओढवून घेतो, हेच त्यांना दिसत नाही, कळत नाही, उमगत नाही.

आपण आपला धर्म म्हणून जे काही गोंजारले, जीवनमूल्यं म्हणून ज्यासाठी जिवाचा इतका आटापिटा केला, ते सगळंच्या सगळं धिक्कारावं लागण्याएवढं मोठं दुःख दुसरं कोणतं असेल? असह्य यातना याहून मोठी कोणती असेल?

एकेकाळच्या मराठे-मुसलमानांच्या किंवा अरब-तुर्की लोकांच्या झालेल्या लढायांचा इतिहास पाहिला तर काय दिसते? अरबांच्या जीवनात किंवा व्यक्तित्वात काळा-पांढरा, लाल, निळा असे ठळक रंग फक्त असत. त्यात भेसळ किंवा छटा यांना स्थान नव्हतं. बाह्यरूप आणि अंतरंग असा भेदभाव नव्हता. खरं तरी किंवा खोटं तरी, शत्रू तरी किंवा मित्र तरी, बस्स! एक घाव, दोन तुकडे. कीस काढत बसणं, शब्दच्छल वगैरे बारकावे नव्हते. कल्पनाविश्व नावाची चीजच नव्हती. मृत्यू ही त्यांच्या दृष्टीनं नैसर्गिक गोष्ट होती, पण आत्महत्या ही संकल्पना त्यांच्या आवाक्याबाहेरची होती.

इतर प्राण्यांसारखाच एक मनुष्यप्राणी! समाज, संस्कृती वगैरे कल्पनाही त्यांच्या आवाक्याबाहेरच्याच होत्या. वनस्पती सृष्टी म्हणजे उभी असलेली जिवंत झाडं तरी किंवा सुकून जमिनीवर पडलेली, त्या झाडांची हाडं तरी. आपण खुशाल त्यांना ‘लाकडं’ म्हणतो. हीच एकेकाळी, अगदी परवा-परवापर्यंत जिवंत होती, बहरून ताठ उभी होती, श्वासोच्छ्वास करीत होती, याची जाणीवही आपल्या मनात शिल्लक राहिलेली नसते.

खरं तर प्राणिसृष्टीच्या आधीची वनस्पती सृष्टी. म्हणजे एका अर्थी हे आपले पूर्वज. पण याचं किती म्हणून विस्मरण आपल्याला व्हावं! झाडं तोडणं, पाडणं, जाळणं वगैरे कृतीमागे कोणतीही पापभावना आपल्या मनात उद्भवत नाही. याचा अर्थ इतिहासाचं आपलं ज्ञानही उथळच आहे. मनुष्यप्राण्यांची एकेकट्यांची कुटुंब, मग त्यांच्या टोळ्या, मग छोटी-मोठी राज्यं, त्यांची आपापली सत्तापिपासा आणि द्वेष-मत्सरापोटी एकमेकांशी झडलेली युद्धे वगैरेंची जमेल तेवढी सुसंगती जमवत केलेली टिपणं म्हणजे आपला इतिहास. सर्वसामान्यांच्या दृष्टीनं, शालेय शिक्षणातलाही एक दुय्यम विषय. त्याच्या खास अभ्यासानं फार तर एखाद्याला त्या विषयाचा प्राध्यापक होण्याची संधी लाभेल. पण रोजच्या जीवनात त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची आपल्याला गरजच भासत नसते. माणसाच्या इतिहासाचीही आपल्याला गरज नसते, तर जीवसृष्टीच्या इतिहासाचा प्रश्नच कुठे उद्भवणार?

बुद्धिबळाच्या खेळात राजा वजिरापासून प्याद्यांपर्यंत माणसंही असतात आणि हत्ती-घोडे-उंट अशी जनावरंही असतात. राजाचं बळ खरं तर सर्वांत अधिक, पण छोटी छोटी प्यादी किंवा ती जनावरं त्याला शह देऊन अडचणीत आणू शकतात. म्हणूनच हा बुद्धिबळातला शर्यतीचा पट ज्या कुणी कल्पिला, त्याने मित्र आणि शत्रू ढळढळीत काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगात स्पष्ट केले आणि त्यांची त्यांची फौजही त्यांच्याच रंगात अगदी समबळाची तयार केली. खेळ संपला की क्षणापूर्वी ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू होत्या, त्या पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या, एकाच खोक्यात कशाही वेड्यावाकड्या भरून ठेवल्या जातात. मग कधीतरी पुन्हा खेळण्याची बुद्धी होईपर्यंत त्यांना पटावर नाचवली जाणारी कृत्रिम लाकडी खेळणी यापलीकडे किंमत तर नसतेच, पण प्याद्यापासून राजापर्यंतचा दर्जाही नसतो, निश्चित स्थानही नसते. कुणालाही कुणाच्याही पायाशी लोळण घेत पडून राहावं लागतं. खेळ चालू असतानाच्या त्या कुरुक्षेत्रावरच्या फौजांचं निर्जीव अस्तित्व हाच त्यांचा धर्म. सर्वांचा एकच धर्म– ‘सोंगट्या’ हाच !

काळ्या सोगट्या आणि गोऱ्या सोंगट्या हे भाऊबंद, एकमेकांचे कौरव-पांडवांसारखे शत्रू. त्यांचं एकमेकांविरुद्ध चालणारं युद्ध ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’च व्हायला हवं. विनोबांनी गीतेचं मराठीत भाषांतर करताना ‘त्या पवित्र कुरुक्षेत्री’ अशी सुरुवात केली आहे. धुऊन पुसून स्वच्छ केलेली, काटेकोर, विचारपूर्वक स्वतःवर लादून घेतलेली बंधनं, म्हणजेच आपला धर्म! तो पवित्र आहे याची ज्याने-त्याने सदैव जाण ठेवली पाहिजे, हेच यातून सूचित होतं. जगणं म्हणजे श्वास आणि उच्छ्वास यांचा मेळ आणि खेळ. तोच त्यांचा धर्म. त्या धर्माचं बंधन त्यांनी सोडणं म्हणजेच मृत्यू ओढवून घेणं.

या धर्माची व्याप्ती वाढत गेली, तशा त्यात अनेक जाती निर्माण झाल्या. पण त्या त्या जातींनाही विशिष्ट बंधनं ही होतीच. त्या बंधनात आनंदानं जगणं म्हणजेच धर्मपालन करणं. ती बंधनं मोडणं-तोडणं, विसरणं किंवा त्यातून पळवाटा काढण म्हणजे अधर्मच.

याचा अर्थ आपला धर्म म्हणजे आपल्या जीवनाला लाभलेली जन्मजात चौकट. त्या चौकटीचं खेळाचं मैदान करणारा निपजू शकतो, तसंच वैराण वाळवंटही! काटेरी कुंपणाचं मळकट जळकट ओसाड रानही सर्वसामान्यांच्या बाबतीत असे ढोबळ प्रांत अस्तित्वात येतात. त्या त्या प्रांतातली समर्थ माणसं सगळी एकाच स्वभावाची नसतात. सुस्वभावी, उदारमतवादी माणूस आपला प्रांत समृद्ध, बळकट, आनंदी करू शकतो. पण तोच स्वार्थी किंवा अविचारी असेल, तर प्रजेला दुबळी आणि दुःखीही करू शकतो. सामान्य माणसं यालाच ‘नशीब’ म्हणून ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी जगत राहतात. पण या असमर्थातही क्वचित एखादा बंडखोर जन्माला येतो. सुख-दुःखाला वाचा फोडतो, झोपी गेलेल्यांना जागे करून आपले अनुयायी तयार करतो. मग ‘अरे’ला ‘कारे’ पासून महायुद्धापर्यंत कोणत्याही थराला हा वणवा पसरत जाऊ शकतो. नेत्याची त्यागभावना, सत्त्वशीलता असे गुण, किंवा खुमखुमी, स्वार्थ, उन्मत्तपणा वगैरे दोष, कोणतीही ठिणगी अशा वणव्यांना कारणीभूत होऊ शकते. जगाच्या इतिहासात असे वणवे ठिकठिकाणी अधूनमधून भडकत गेलेले, कुवतीनुसार पसरत गेलेले आणि हळूहळू विझूनही गेलेले आपण पाहतो.

या इतिहासात अनेक कालखंड असतात. लहान-मोठे. त्या त्या काळच्या संस्कृतीचे, आता मातीमोल झालेले ढिगारे. ढिगारा म्हटलं की प्रथम कळसाकडेच लक्ष जातं. त्या त्या कळसावरचं अलिखित नाव डोळ्यांपुढे तरळू लागतं. हे ढिगारे केवळ शुद्ध मातीचेच नसतात. इतरही अनेक धातूंचे कण त्यात कमी-अधिक प्रमाणात मिसळले गेलेले असल्याचं लक्षात यायला लागतं. अगदी कथिलासारख्या सामान्य धातूपासून ते शंभरनंबरी सोन्यापर्यंतच्या अनेक धातूंचे कण. त्या त्या ढिगाऱ्यात कोणकोणते धातू किती किती प्रमाणात आहेत, याचा अचूक अंदाज करून प्रतवारी ठरवणं, क्रमवारी निश्चित करणं वगैरे कामं विद्वान संशोधक करतच असतात. पण या प्रयोगशाळेतल्या क्रमवारीतून मिळालेलं ज्ञान फक्त परीक्षतल्या प्रश्नांना उत्तरं देण्यापुरतंच मर्यादित राहत. प्रत्यक्ष जीवन जगताना आपण निवडतो ती किंवा आपल्यावर जन्मजात लादली गेलेली असते ती विचारप्रणालीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. जगण्याचे हे वेगवेगळे मार्ग म्हणजेच धर्म ना? ‘धर्मनिरपेक्षता’ किंवा 'मानवतावाद' हे देखील शेवटी त्या त्या आचरणपद्धतीचे धर्मच ना?

त्या त्या धर्मासाठी त्या त्या वेळी असंख्यांनी बलिदान केलंही आणि बळी घेतलेही. या कृतीतून आपण अमर होणार, या कल्पनेतून ते मृत्यूला सामोरे गेले. असा जीवन-मरणाचा प्रश्न आला की प्राणच पणाला लागतो. कारणं वेगळी, पण परिणाम एकच– मृत्यू हाच. ओढवून घेतलेला मृत्यू, नैसर्गिक नव्हे. याला वेडाचार म्हणता येईल का? तीही माणसंच होती!

सहसा आई-वडिलांची जात किंवा धर्म, तोच मुलांचा, कुटुंबाचा धर्म मानला जातो. सुजाण झाल्यापासूनच्या वयात अनेकदा तर्‍हेतर्‍हेचे फॉर्म्स भरण्याचे प्रसंग आले. अगदी रेशनकार्डासाठीच्या फॉर्मापासून त्या त्या परीक्षेला बसण्यासाठीच्या फॉर्मापर्यंतचे अनेक. त्या त्या वेळी ‘जात’ अगर ‘धर्म’ या शब्दांपुढे मी ‘मानवता’ अगर ‘माणुसकी’ असंच लिहीत आले. आता आता माझ्या लक्षात येऊ लागलं की, त्या वेळी मी बरीचशी अप्रगल्भ होते. वय, वाचन, अनुभव जसजसे वाढत गेले तसतसं लक्षात येऊ लागलं की, मनुष्यप्राणी हा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राहिलेलाच नाही. आमची संस्कृतीची व्याख्या फार वरवरची आहे. तिला फारशी खोली नाही लिहिण्या-वाचण्यातून, ऐकण्या-पाहण्यातून जमवलेल्या माहितीचा साठा, त्यातून बनवलेली आपली मतं म्हणजे आमचं ज्ञान. आपल्या घरातली पुस्तकांची कपाटं आणि आपलं डोकं त्यानेच भरून गेलंय. ते ज्ञान कपड्यांसारखं आण्ण हवं तेव्हा वापरू शकतो. पण आपल्या रक्तात मुरून, आपला ‘स्वभाव’ बनून राहण्यासाठी यातलं कितीसं खर्ची पडलं? त्यातून आपला स्वभावधर्म कितीसा उन्नत झाला? किती प्रगल्भ, समृद्ध झाला? मानवता किंवा माणुसकी हा माझा धर्म आहे, असं अभिमानाने सांगावं असे सहचरी भाव या शब्दांना घट्ट चिकटून राहिले आहेत का? यातलं सत्य किंवा वस्तुस्थिती किती आणि अज्ञान आणि स्वतःचीच होत असलेली फसवणूक किती ?

‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला’ हे ऐकायला, गायला, अनुसरायला फार कठीण नसतं. जीवन त्या मार्गानेच जाऊ लागतं. हा टप्पा तसा बराच मोठा असतो. तो पार करताना शेवटी शेवटी लक्षात येऊ लागतं, ‘उरला दिवस अल्प, घोडे थकुन चूर’.

अजून किती अंतर काटायचं बाकी आहे? आणि झाला हा प्रवास सुखासमाधानाचा झाला की अतृप्तीचा? मागे वळून पाहत हिशोब मांडत बसायचं, की पुढला अंदाज घेऊन कमी कष्टाचा मार्ग शोधून काढायचा? असे विचार मनात येतात याचाच अर्थ, आपणही इतिहासजमा होण्याच्या मार्गाला लागलो आहोत ही जाणीव.

महात्मा गांधींनी ‘सत्य आणि अहिंसा’ हा धर्म सांगितला. त्यातलं ‘सत्य’ मी समजू शकते, पण ‘अहिंसा’ मात्र मला कळू शकत नाही. आपण श्वास घेतो, चालतो, खातो-पितो, म्हणजे जगताना नकळत का होईना, किती तरी जीव बळी पडतच असतात ना? म्हणजे इथे, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हाच खरा धर्म असावा असं पटू लागतं.

-oOo-

पुस्तक: मनातलं अवकाश.
लेखिका: सुनीता देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली.
वर्ष: २००६.
पृ. २२-२७.

---

१. मूळ लेखाचे शीर्षक: धर्म
२. मूळ लेख पूर्वप्रकाशन: लोकसत्ता, दिवाळी २००४.


हे वाचले का?

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)

<< पूर्वार्ध

शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही.

मंतरलेले बेट

ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.”

त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत.

कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या उतरून येई आणि बूटजोडी बांधा म्हणे. अशा गिऱ्हाइकाचे काम करण्यात शिलरना आनंद होई. एकीकडे हात चालत, दुसरीकडे तोंड चाले. जर्मनीमधल्या आपल्या बाळपणीच्या कितीतरी आठवणी त्यांनी मला सांगितल्या. या आठवणी सांगता-सांगता ते हसत, मीही हसे.

एके दिवशी त्यांनी मला कैसरच्या वेळी आपल्याला मिलिटरीत नोकरी कशी करावी लागली ते सांगितले, “मी एकटाच नव्हतो. सगळ्यांनाच भरती व्हावे लागे. तुम्हा अमेरिकेतल्या लोकांना ते माहीत नाही. जर्मनीतच काय युरोपमधल्या सगळ्या झार देशात मुलगा ठरावीक वयाचा झाला की, त्यानं मिलिटरीत भरती झालंच पाहिजे.”

“किती वर्ष?”

“तीन.”

“मग तुम्हाला पसंत नव्हतं?”

“हॅट.” शिलर ओरडले.

आणि हातांतला हातोडा त्यांनी असा जोराने आदळला की, त्याचा दांडाच मोडला.

हळूहळू मला कळले की, मिलिटरीच्या नोकरीचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आहे. सैनिकांची सगळी जात आणि सैन्यातले अधिकारी यांच्याबद्दल ते फार तिटकाऱ्याने बोलत. पुनःपुन्हा म्हणत, “साध्या शिपायांना तिथे डुकरापेक्षा जास्त वाईट वागवितात.”

“बरं मग ही नोकरी पुरी झाल्यावर तुम्ही काय केलं?”

“मग मी स्वतंत्र होतो. जवळ होते नव्हते ते सगळे पैसे खर्चून, हॅम्बर्गला गेलो आणि अमेरिकेचं तिकीट काढलं. जातो म्हणून सांगायला घरीसुद्धा गेलो नाही. म्हणालो, तुम्ही आणि तुमचा कैसर."

मिस्टर शिलर भलतेच रागाने बोलत. कैसरबद्दलसुद्धा. का ते मला कळावयाचे नाही. मी म्हणे, “पण कैसर भला माणूस आहे.”

“भला माणूस! हे वर्तमानपत्रांत वाचावं. डुक्कर आहे डुक्कर.”

मला धक्काच बसला. एखाद्या राज्यकर्त्याविषयी इतक्या अनादराने कोणी बोलताना मी प्रथमच ऐकत होतो. एखादा बूट बनविणारा आपल्या धंद्यात चांगला वाकबगार असला, तरी त्याला मुकुटधारी राज्यकर्त्याला अशा शिव्या देण्याचा हक्क असतो का, हे मला ठाऊक नव्हते.

“तुला ते कळायचे नाही. तू अमेरिकन मुलगा आहेस. माझ्या देशात कुणाला स्वातंत्र्य नाही; वाटतं ते बोलता येत नाही तिथे. प्रत्येकाची नोंद असते, मोजदाद असते. पोलिसांना, मिलिटरीला तुमच्याबद्दल सगळी माहिती असते. आणि तुमचा बाप अमुक होता, म्हणून तुम्ही अमुक असलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात ना, शेतकरी व्हा. तुमची आहे ही स्थिती कायम; तिच्यात सुधारणा अशक्य. आणि तुमची स्थिती कशीही असली तरी तुमच्यावर मालकी कैसरची. स्वातंत्र्य मुळीच नाही.”

राग नाहीसा झाला तसे मिस्टर शिलर अमेरिकेसंबंधी बोलू लागले. काम खूप करावं लागत असलं तरी त्यांना इथे मनासारखे वागता येत होते. पाहिजे तिथे जावे, वाटेल ते बोलावे. कुणी त्रास दिला नव्हता. योग्य वेळी त्यांना इथे लहानसे दुकानही थाटता आले होते, चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. मिस्टर शिलरनी बांधलेले बूट सगळ्या न्यूयॉर्कमध्ये उत्तम होते.


मिस्टर शिलर असे एखादे दिवशीच बोलत. एरवी वेगवेगळ्या विषयांवर बोलत. कधी माणूस आणि जीवनमूल्ये यावर बोलत. रोजच्या जीवनासंबंधी बोलत, माणसामाणसांतल्या नात्यासंबंधी बोलत. फार अवघड विषयांवर ते अगदी सोप्या शब्दांत बोलत. अशिक्षित असूनही त्यांना पुष्कळ समजत होते. फक्त एक गोष्ट त्यांना समजत नव्हती, मलाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांना समजत नव्हते की, त्यांच्यासारख्या कसबी कामसू माणसाची पिळवणूक बोस्टनमधल्या फॅक्टऱ्या का करतात? आपल्याला या असल्या एकच खिडकी असलेल्या तळघरात का राहावे लागते?

“शिक्षा झालेला कैदी असल्यासारखे वाटतं मला, पण तरीही मी स्वतंत्र आहे.”

तळघरातच दुकान घालून असलेल्या आणखी एका कसबी माणसाची ओळख होईपर्यंत मी शिलरकडे जात होतो. हा माणूस इंग्लिश होता, आणि त्याचे नाव होते मिस्टर कॉर्बेट.

शिलर आणि कॉर्बेट या दोघा दुकानदारांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते आणि तरीही ते वेगवेगळे होते. दोघेही तरुणवयात अमेरिकेस आले होते. एके काळी या दोघा कसबी कारागिरांना भाव होता आणि आता मात्र ते बाजूला पडले होते. शिलरना यंत्रामुळे बाजूला पडावे लागले होते आणि कॉर्बेटना आपल्या वयामुळे. शिलरची जागा यंत्राने घेतली होती. आणि ‘स्टाइनवे पियानो फॅक्टरी’त अनेक वर्षे काम केल्यानंतर वयाला पन्नास वर्षे झाली, म्हणून कॉर्बेटना काढून टाकून त्यांची जागा एका तरुण माणसाला देण्यात आली होती.

शिलरप्रमाणे कॉर्बेट बोलके नव्हते. जेव्हा बोलत तेव्हाही कल्पकता, तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा त्यांना गंध नाही असे दिसे. पण माणूस दयाळू होता; मैत्रीला चांगला होता. लाकडाच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे उपयोग याविषयी त्यांनी मला कितीतरी माहिती दिली. केवळ वासावरून नवे तोडलेले लाकूड कसे ओळखावे हे शिकविले. आपली सगळी हत्यारे आणि त्यांचा उपयोग मला समजावून दिला. रंधा मारताना, तक्ते तयार करताना, जोडकाम करताना मला तासन् तास बघत बसू दिले. कॉर्बेटच्या रंध्याचा, हातोडीचा आवाज ऐकताना सुख होई; पण हे आवाज नेहमी नेहमी ऐकायला मिळत नसत.

कॉर्बेटना फार थोडे काम मिळे. कॉर्बेटच्या दुकानात बसून मला सुतारकामाबद्दल बरेच कळले. मिस्टर शिलरप्रमाणेच कॉर्बेटही बदलत्या काळाचे बळी आहेत, हेही कळले. ही केवळ दोन माणसे होती. असे इतर अनेक जण अमेरिकेत आले असतील. जिच्या शोधासाठी ते इथे आले, ती संधी त्यांना दिसली न दिसली तोवर काढून घेतली गेली असेल.

आपोआप संपण्याच्या अगोदरच ज्यांचे प्राण विझविले गेलेत, स्मशानभूमी नेमस्त न होताच ज्यांना आपली प्रेते उचलून चालावे लागत आहे, अशा या लोकांचा विचार येताच माझे मन व्यथित होई.


पण मिस्टर शिलर, कॉर्बेट आणि इतर हजारो लोक यांची ही स्थिती कुणाच्याच ध्यानात येत नव्हती असे नाही. वॉशिंग्टनमध्ये थिओडोर रुझवेल्ट प्रेसिडेन्ट होते. हे गृहस्थ बुद्धिमान होते. अमेरिकेपुढील समस्या त्यांना माहीत होत्या; ते काही इलाज करीत होते.

रुझवेल्ट प्रेसिडेन्ट झाले ते योगायोगाने. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध गाजवून परत आल्यावर १८९८ साली न्यूयॉर्क स्टेटचे ते गव्हर्नर म्हणून निवडले गेले; पण सहा महिनेच त्यांनी काम केले. राजकारणातील बड्या धेंडांना रुझवेल्ट हे प्रामाणिक आणि हट्टी वाटले. ते कुणाकडून हुकूम घेत नसत; आपण काम करणार ते लोककल्याणासाठीच असा त्यांचा आग्रह होता. साहजिकच बड्या धेंडांनी ठरविले की, त्यांचा ‘राजकीय खून’ करायचा. मग त्यांनी व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून रुझवेल्टना मॅकिन्लेबरोबर नेमून घेतले. व्हाइस प्रेसिडेन्ट केल्यामुळे रुझवेल्टच्या हाती काही अधिकार राहणार नाही आणि आपल्याला हवे ते कायदेकानून पास करून घेण्यात त्यांचा अडथळाही येणार नाही, असा त्यांचा डाव होता.

अशा तर्‍हेने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला थिओडोर रुझवेल्ट व्हाइस प्रेसिडेन्ट झाले, पण नंतर सहा महिन्यांनी बफेलो येथे प्रेसिडेन्ट मॅकिन्लेचा खून झाला आणि रुझवेल्ट युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेन्ट झाले. या वेळी त्यांचे वय बेचाळीस वर्षांचे होते.


प्रेसिडेन्ट रुझवेल्ट हे मोहक व्यक्तिमत्वाचे आणि उदंड ताकदीचे गृहस्थ होते. त्यांच्यापाशी उत्साह होता. लढा देण्याची त्यांना आवडच होती. सर्वसामान्य अमेरिकन माणसाच्या हक्कासाठी सुरुवातीपासून त्यांनी लढा दिला. ते लहान लोकांचे ‘उस्ताद’ बनले. लोकांनी अगदी सुरुवातीपासून त्यांच्यावर विश्वास टाकला; हा माणूस आपला आहे, हे त्यांना माहीत होते.

सामाजिक सुधारणा ही अमेरिकेची वाढती गरज आहे, हे थिओडोर रुझवेल्टनी पुरेपूर ओळखले. मोठे उद्योगधंदे, उद्योगपती आणि इतर करोडपती गुन्हेगार यांच्यावर दोषारोप करताना ते अगदी तुटून पडत.

काँग्रेसला दिलेल्या आपल्या पहिल्या संदेशात त्यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना हक्क मिळावेत या गोष्टीचा कैवार घेतला आणि जनहिताविरुद्ध असलेल्या कॉर्पोरेशनना जोरदार तंबी दिली. हा पहिला सलामीचा तडाखा होता आणि त्या क्षणापासून सुधारणेविषयीची त्यांची जिद्द मंद झाली नाही, अमेरिकेतील मोठे उद्योगधंदे नामशेष व्हावेत, करावेत असा त्यांचा हेतू नव्हता; तर सर्व देशाला त्यांना फायद्यासाठी फक्त शिस्तीत आणावयाचे होते. कारण रुझवेल्टना स्वच्छ दिसत होते की, हे जर झाले नाही, तर उद्योगधंदे स्वतः नामशेष होतीलच, पण आपल्याबरोबर अमेरिकेलाही नामशेष करतील.

बेंड फोडणारे वाङ्मय प्रसिद्ध होण्याची जी लाट उसळली होती, तिने प्रेसिडेन्ट रुझवेल्टना राजकीय सुधारणेची प्रेरणा दिली. यू.एस. स्टील कॉर्पोरेशन, दि युनायटेड स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी, कोळसा खाणी, रेल्वे-रस्ते, मांसधंदे आणि इतर भानगडखोर यांच्यावर रुझवेल्टने खटले भरले, चौकशा केल्या. एकटी स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी घेतली, तर तिला २९,०००,००० डॉलर्स दंड झाला.

प्रेसिडेन्टनी आहुती टाकून प्रदीप्त केलेला हा ‘दंडयज्ञ’ पुरा पेटला आणि देशातले अनेक जण अस्वस्थ झाले. वाममार्गाने मिळालेल्या सत्तेपैकी एक तनसडीसुद्धा देण्याची या लोकांची तयारी नव्हती, पावलापावलांवर त्यांनी रुझवेल्टशी लढा दिला, त्यांची बदनामी केली, पण अमेरिकन जनतेचे ते ‘टेढी रुझवेल्ट’च राहिले आणि १९०४मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने प्रेसिडेन्ट म्हणून निवडले गेले.

प्रेसिडेन्ट रुझवेल्ट यांच्या कारकिर्दीत देशाची नीतिमत्ता बळावली. लोकांना ते हवे होते. उद्योगधंदेवाले फार मोकळे सुटले होते. लोकांचे हित पाहण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करणे भाग पडले, ‘दि शेरमन अॅन्टीट्रस्ट अॅक्ट’ अमलात आला. निर्भेळ खाद्यपदार्थ आणि औषधे यासंबंधीचा कायदा पास झाला. फसवी लेबले डकवून भेसळयुक्त खाद्यपदार्थाचे बंद डबे विकण्यास कंपन्यांना आता मुभा नव्हती. मांसविक्रेते, औषधे तयार करणारे कारखाने यांनाही सक्त कायदेकानून लागू करण्यात आले. वाईट मांस आणि खोटी औषधे बाजारपेठेत येणार नाहीत, असा बंदोबस्त झाला, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती छापणे, हा गुन्हा मानला गेला.


एकूण हा काळ मोठा उलाढालीचा होता. काय चालले आहे, हे समजण्याइतपत मी कळता झालेलो होतो. सत्य काय हे बऱ्याच प्रमाणात मला समजले.

पण घडत असलेल्या गोष्टीचा खराखुरा अर्थ आणि महत्त्व कळून येण्यास आणखी काही काळ जावा लागला, इतिहास निकोप करणाऱ्या या घटना घडत असताना त्यांचे महत्व आम्हाला कळले नाही, आपल्या काव्यात घडून येणाऱ्या बदलाचा अर्थ समजण्यासाठी द्रष्टेपणा लागतो. आमच्यापैकी बहुतेक जणांना या बदलाची पुरेशी जाणीवच नव्हती.


हा काळ किती महत्त्वाचा होता, हे पुढे कळून आले. सर्वसामान्य अमेरिकन माणसाचे पाऊल पुढे पडले होते, ते याच काळात. त्यांच्यावतीने सरकार धावून आले. संरक्षक कायदेकानून झाले; हक्कांचे संरक्षण झाले ते याच काळात. सर्वसामान्य माणूस खरा स्वतंत्र झाला. हे मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा त्याने कधीही गमावले नाही आणि लोकशाही बळकट बनली.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ९३-९८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---


हे वाचले का?

रविवार, ७ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)

नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले.

मंतरलेले बेट

वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे.

‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुकानांतसुद्धा. अर्थातच हॅडले या गृहस्थांना सर्व प्रश्नांबद्दल काही बोलायचे असे. त्यांच्या बोलण्यावर आजोबा असे काही भडकत की, त्या दोघांचे वाद माझ्या कायमचे स्मरणात राहिले. बरे, त्या दोघांची खडाजंगी माझ्या पथ्यावरच पडली. या सर्व प्रश्नांबाबत माझ्या मनात अगत्य निर्माण झाले.

आता मजा अशी की, आजोबा आणि हॅडले या दोघांचे बहुतेक सर्व प्रश्नांबाबत एकमत होई. त्यांच्यात मतभेद होई, तो सुधारणा कोणत्या पद्धतीने व्हावी याबाबतीत. आठ-नऊ वर्षांच्या कोवळ्या मुलांनी कापडाच्या गिरणीत बारा तास मशीनशी काम करणे मुळीच योग्य नाही, हे आजोबांना मान्य होते. याहीपुढे जाऊन ते म्हणत की, अमेरिकेत लहान मुलांकडून असे कामच करून घेऊ नये. कामगार स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा असावा आणि लायक कामगारांना जीवनमानास आवश्यक इतके वेतन मिळाले पाहिजे, हेही त्यांना मान्य होते. अशा मुद्द्यांवर आजोबांचे आणि हॅडले यांचे एकमत होई. पण उपाययोजनेबाबत त्या दोघांच्यात मतभेद होई. आजोबा म्हणत, “उद्योगपतींना योग्य वेळी या समस्यांचे आकलन होईल, आणि ते आवश्यक त्या सुधारणा करतील.”

हॅडले या मुद्द्यावर वाद घालीत. ते म्हणत, “कामगार वर्ग संघटित होऊन त्यांची युनियन झाली तरच धडगत आहे. एरवी हे उद्योगपती जागे व्हायचे नाहीत, त्यांची मने हलायची नाहीत. संपत्तीच्या लोभाने आंधळे झालेले लोक हे! त्यांना काय? संघटनेची शक्ती त्यांना दाखविली पाहिजे. संघटनेशिवाय तरणोपाय नाही. संघटित होऊनच केवळ भागणार नाही, इंचाइंचावर लढा दिला पाहिजे, फार वर्ष जावी लागतील हे व्हायला.”

आणि काय चालले आहे याची जाणीव आजोबांना व्हावी, म्हणून हॅडलेसाहेब औद्योगिक क्रांतीवर बोलत. यंत्राच्या आगमनामुळे कामगार कसा उखडला गेला आहे, त्यामुळे काय समस्या उभ्या राहिल्या आहेत, याचे अत्यंत काळजीपूर्वक विवरण करीत. या समस्या लवकर सुटणाऱ्या नाहीत, कारण इथून पुढे तर यंत्रांना फार महत्त्व येणार आहे, असे सांगत. त्यांच्या मते उद्योगपती लोभी असले तरी त्यांना दोष देता येणार नाही. परिस्थितीचा फायदा कोणीही घेणारच. माणूसस्वभाव जमेला धरला तर मॉर्गन, रॉकफेलर्स, कार्नेजी आणि फ्रिक हे उद्योगपती खुशीने शरणागती पत्करणार नाहीत. कामगारांनी लढा हा दिलाच पाहिजे.

‘लढा’ हा शब्दप्रयोग आजोबांना पसंत नव्हता. कशाही परिस्थितीत शांतात राखलीच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

आता लढ्याबद्दल माझे मत वेगळे होते. शिवाय हॅडले बोलत, त्यापैकी बऱ्याच गोष्टी मला काही वावग्या वाटल्या नाहीत. मी आता कळता झालो होतो, हायस्कूलमध्ये जाऊ लागलो होतो. रोज सकाळी मला आठवण होई की, मला स्वतंत्र करील असे सत्य कुठे तरी दडलेले आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मी शोधू लागलो, पुष्कळ वाचन करू लागलो.

लहानपणी मला चित्रांची पुस्तके फार आवडत, डोरीची चित्रे असलेले डान्टेचे ‘इन्फर्नो’ होते, तसली. या पुस्तकातील मजकूर मी कधी वाचला नाही, पण नरकयातनांची चित्रे बघत तासन् तास घालिवले. उलट आता मी पुस्तकांतले शब्द वाचू लागलो. चित्रे असली तरी ती माझ्या कामाची नव्हती. माझ्या वाचनाला पद्धत अशी काही नव्हती. ‘हुकु चुचु टोला’ असे चाले. हाती पडेल ते सगळे मी वाचून काढी, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके – सगळे !

‘काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ शेवटी तळघरातून कसा निसटला, हे मी वाचले. आणि न्यूयॉर्कमधले घरकामाचे गडी महिन्याला सोळा डॉलर मिळवितात हेही माहीत करून घेतले. डॉन क्विक्झोट आणि यांकी यांच्यासमवेत आपल्या बायकांचे रक्षण करीत आणि पवनचक्क्यांवर हल्ले चढवीत, मी जुन्या स्पेनमधून प्रवास केला. शेरलॉक होम्सबरोबर मी रहस्यभेद केले, आणि जे गुल्ड व जिम फिस्क या दोन करोडपतींनी लबाडी करून सोनेबाजार आपल्या फायद्यासाठी कसा राबविला; आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत कशी घबराट निर्माण झाली हेही जाणून घेतले. अमेरिकेतील कामगार आपले कामाचे तास दहा, बारा किंवा जास्त तासांवरून आठ तासांवर आणण्यासाठी मागणी करीत आहेत यासंबंधी मी वाचन केले. कामगार कामावर असताना झालेल्या अपघाताबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही संघटना झगडत आहेत, यासंबंधीही वाचले. ‘ट्रेझर आयलंड’, ‘डॉक्टर जेकेल अँड हाइड’ आणि ‘दि कॉल ऑफ वाइल्ड’ ही पुस्तकेही मी वाचून काढली. बेकारी भत्ता आणि म्हातारपणाबद्दल पेन्शनची मागणी करणाऱ्या ‘एक्सट्रीमिस्ट्स’ संबंधी, कामगार संघटना करणाऱ्या ‘एजिटेटर्स’ संबंधी ‘क्रॅकपॉट्स’ आणि ‘होपलेस आयडियालिस्ट्स’ संबंधीही वाचन केले. मी ‘डेव्हिड हर्म’ वाचले आणि जे. पी. मॉर्गन या माणसाने सिव्हिल वॉरच्या वेळी दोष असलेल्या बंदुका सरकारला विकून नफा कसा मिळविला हेही वाचले.


मी माझ्या कल्पित कथांत सत्यकथा मिसळल्या. सगळ्यांतले थोडेथोडे वाचले आणि तरीही वाचण्याचे पुष्कळ बाकी राहिले. गाजलेल्या अशा जुन्या शेकडो पुस्तकांबरोबरच चालू अस्थिर काळाचे दर्शन घडविणारी रोज नवी-नवी अशी पुस्तके सारखी बाहेर पडत होतीच की. १९०१ मध्ये ‘हिस्टरी ऑफ टम्मानी हॉल’ हे न्यूयॉर्क सिटी पोलीसमधल्या अनाचाराला वाचा फोडणारे गुस्ताव मेयर्सचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्याच वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या फ्रॅन्क नोरीस नावाच्या एका तरुण लेखकाने ‘दि ऑक्टोपस’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. अमेरिकेतील रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांची नरडी कशी दाबली जात आहेत, याचा स्फोट या पुस्तकात केला होता. या पुस्तकामुळे रेल्वेची चौकशी सुरू झाली. १९०३ मध्ये याच लेखकाने ‘दि पिट्’ नावाचे पुस्तक लिहिले. शिकागो धान्य-बाजारात चाललेल्या लबाडीचा स्फोट या पुस्तकात केला होता. शिकागो धान्य बाजाराचीसुद्धा चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे मोठी खळबळ उडाली. चौकशीत बाहेर आलेल्या गोष्टीमुळे लोकांत विलक्षण घबराट झाली.

१९०४ साली इडा टरवेल नावाच्या बाईने ‘स्टँडर्ड ऑइल कंपनीचा इतिहास’ प्रसिद्ध केला. त्यातही कंपनीच्या कारभारात अनाचार कसा आहे, हे तिने लोकांपुढे मांडले. न्यूयॉर्कमधल्या लिंकन स्टीफन्स या तरुण पत्रकाराने ‘शेम ऑफ दि सिटीज’ हे पुस्तक लिहून सर्व देशभर असलेल्या नगरपालिकांतून कसा भ्रष्टाचार चालला आहे हे दाखवून दिले. १९०६ साली ‘द जंगल’ या पुस्तकाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अॅप्टन सिंक्लेअरने या पुस्तकात शिकागोमधल्या मांसधंद्यात चाललेला भ्रष्टाचार उघड केला होता. लगेच याही प्रकरणाची चौकशी झाली. देशाबाहेरच्या वर्तमानपत्रांतूनसुद्धा या चौकशीच्या बातम्या झळकल्या.

ही सगळीच पुस्तके मी काही वाचली नव्हती, पण त्याच्यासंबंधी वर्तमानपत्रांत आलेला मजकूर वाचला होता. शिवाय आमच्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस या पुस्तकांवर चर्चा करी– मिस्टर हॅडले आणि त्यांच्याबरोबर पोलीस, बंबवाले, इतर गिर्‍हाइकेही. नाना मते मांडली जात, अंत नसलेली चर्चा होई. छापलेल्या शब्दांत केवढे सामर्थ्य असते, याची जाणीव मला आयुष्यात प्रथमच होत होती.

पुढच्या काही वर्षात आणखी अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. कथालेखनाने लोकप्रियता मिळविलेल्या जॅक लंडन या लेखकाने १९०७ साली ‘दि आयर्न हिल’ हे पुस्तक लिहिले. पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षात अमेरिका कशी असेल याचे चित्रण त्याने या पुस्तकात केले होते. सगळा देश मक्तेदारीच्या कह्यात गेला आहे, लोकशाही संस्था आणि घटनेने दिलेली स्वातंत्र्ये धुडकावून लावली गेली आहेत, असे हे चित्र होते. या पुस्तकाचा लोकांच्या मनावर फार खोल ठसा उमटला; त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. परिस्थिती भीतीदायक होती.

१९१० मध्ये ‘हिस्टरी ऑफ दि ग्रेट फॉरच्युन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. गुस्तोव मेयर्सच्या या पुस्तकाने सेज, व्हेन्डरबिल्ट फ्रिक, कार्नेजी, हिल या नावांविषयी असलेल्या आदराच्या फाडून टिरगाण्या केल्या. पानापानांतून सत्यकथा देऊन या पुस्तकाने सिद्ध केले होते की अनाचार, बनवाबनवी, बेकायदेशीर कृत्ये, लबाडी केल्यामुळे यांचे नशीब फळफळले होते.

या पुस्तकांबरोबरच इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली. पण काळाचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकांबद्दलच लोक बोलत. अमेरिकन जीवनाचा एक हिडीस भाग या पुस्तकांनी लोकांना दाखविला होता. आता करोडपतींबद्दल आदर राहिला नव्हता. शंकास्पद मार्गांनी पैसा केलेल्या कॉर्नेजीसारख्या माणसाने ‘सार्वजनिक वाचनालया’ला देणगी म्हणून दिली, तर त्या गोष्टीकडे आम्ही संशयाने बघू लागलो. आम्हाला अमेरिका स्वतंत्र झालेली हवी होती. अमेरिकन जनतेची मालकी असलेली अमेरिका आम्हाला हवी होती. मूठभर लबाड लोकांची मालकी असलेली अमेरिका नव्हे.

पुस्तके लिहून अनाचाराला वाचा फोडणाऱ्या या काळात सत्ता हातात ठेवणाऱ्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या विरुद्ध लोकमत गेले होते. लोक आणि उद्योगधंदे या दोन्हींचे नाते जोडले जाईल, असे काही लोकांना हवे होते. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधी लोकांच्या मनात असलेला आदर पार नाहीसा झाला. विश्वास उडाला तो उडालाच. मग काही मोठ्या धंदेवाल्यांनी जनता-संपर्क अधिकारी नेमले आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

या काळात कामगार अधिक स्पष्टवक्ते बनले. त्यांच्या संघटना निर्माण झाल्या. शक्तिशाली बनत गेल्या. या यंत्रयुगात आपल्याला कुठे जागा आहे, हे माणूस शोधत होता. उद्योगधंद्यांशी आपले चांगले नाते असावे, अशी त्याची धडपड होती. आर्थिक सत्ता बळकावून बसलेले लोक ती हातची सोडायला तयार नव्हते, त्यामुळे अनेक जोरदार झगडे झाले.


या सगळ्यामुळे आमचे आजोबा मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मते अशा चळवळींमुळे समाज बिघडतो. पण मिस्टर हॅडलेंचे मत उलटे होते. ते म्हणत, हे सगळे बऱ्यासाठीच चालले आहे. उद्योगधंदे, यंत्रे वाईट नाहीत; त्यांच्यामुळे माणूस रगडला जाणार नाही, एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे. माणसांनी जर यंत्रांना आपल्यावर स्वार होऊ दिले, तर भाषणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य यांचा उपयोग काय?

आजोबांना हे बोलणे मुळीच पसंत नव्हते, पण मला मात्र मिस्टर हॅडलेंचे म्हणणे पटे. कारण पुष्कळशा गोष्टी मी वाचल्या होत्या. शिवाय अगदी आमच्याच शेजारी स्वातंत्र्य गमावून बसलेली दोन माणसे माझ्या पाहण्यात आली. हे घडले ते आजोबांच्या पायामुळे.

- (पूर्वार्ध समाप्त) -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ८७-९१.

       << उत्तरार्ध

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती>>
---


हे वाचले का?

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा

मंतरलेले बेट

मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ (पुन्हा एकदा ढापले गेल्याने) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले.

मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी (पुढे २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धराशायी झालेले सुप्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ जिथे उभे होते त्या) मॅनहटन बेटावरील एका लहान मुलाने आपल्या आयुष्यासंबंधी केलेल्या स्मरण-नोंदी (memoirs) असे त्याचे स्वरूप आहे.

सहज म्हणून वाचता वाचता असे ध्यानात आले की नोंद घेणार्‍याचे वय हा महत्त्वाचा, दखलपात्र मुद्दा आहे तसेच तो कालखंडही. हा कालखंड कालगणनेनुसार जसा एक महत्त्वाचा टप्पा आहे तसेच अमेरिकेच्या इतिहासाच्या दृष्टीनेही. सामाजिक, आर्थिक नि राजकीय अशा तीनही आघाड्यांवर या कालखंडात मोठी उलथापालथ घडून आली. त्या घटनेचा साक्षीदार असलेला हा मुलगा या बदलत्या काळाच्या नोंदी समोर ठेवतो आहे. लेखनाच्या वेळी वय नि अनुभवाने अधिक पुढे सरकलेल्या मॅन्युअलच्या भाषेचे नि दृष्टिकोनाचे अस्तर जरी त्याला चिकटलेले दिसत असले, तरी त्याने घेतलेल्या नोंदी नि त्यांची केलेली टिपणे महत्त्वपूर्ण अशीच आहेत.

एकोणीसावे शतक अस्तंगत होत असतानाचा हा काळ आहे. या शतकाच्या अखेरीस नियतीवादी, पारलौकिकवादी भयभीत होऊन जगबुडीच्या भाकितांचे हाकारे उठवत शिकारीच्या कळपासारखे स्वत:च भयभीत होऊन सैरावैरा धावत होते, इतरांच्याही मनात भीतीची रुजवणूक करत होते. दुसरीकडे औद्योगिक क्रांतीचा वेग वाढलेला असल्याने भौतिक आयुष्यात वेगाने बदल घडत होते. मेणबत्त्यांची जागा गॅसबत्त्यांनी घेतली होती, तारेमार्फत येणार्‍या विजेचे जाळे विणले जात होते. घोडागाड्या अस्तंगत होऊन मोटार कार्सचा बोलबाला सुरू झाल्याने रस्त्यावर घोड्याच्या लीदीऐवजी जाळलेल्या पेट्रोलियम इंधनांचा वास अधिक प्रकर्षाने जाणवू लागला होता.

राजकीय पातळीवर पाहिले तर क्यूबाच्या प्रश्नावर स्पेनने अमेरिकेशी संघर्ष उभा केला होता. आशिया, आफ्रिका खंडांतून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रिटनच्या, चीनच्या, रशियाच्या राजेरजवाड्यांच्या साम्राज्यांना हादरे बसू लागले होते. अशा काळात, एका घटस्फोटित आई-बापांचा, न्यूयॉर्कमधील केवळ दुसर्‍याच वकील स्त्रीचा हा आठ-दहा वर्षांचा मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहताना अनुभवलेल्या या संक्रमणाचे आपल्या बुद्धीने झालेले आकलन नोंदवत जातो आहे.

मागील शतकात झालेल्या फ्रेंच क्रांतीनंतर ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना मूळ धरू लागली होती. जगण्यातील विविध पैलूंमध्ये तिचे प्रतिबिंब कसे पडते, तिची कोणती अनुषंगे प्रकर्षाने दिसतात याचा मागोवा घेतला जात होता. सैद्धांतिक पातळीवर जरी ‘कशापासून स्वातंत्र्य’ नि ’कशाचे स्वातंत्र्य’ या दोनच पैलूंचा विचार होत असला तरी व्यावहारिक पातळीवर तिचे अनेक पदर तपासले जात होते. राजकीय स्वातंत्र्य हस्तगत केलेल्या अमेरिकेमध्ये आता आर्थिक स्वातंत्र्याची वाट महामार्गाला येऊन मिळाली होती. ‘जुन्या वाटेवरचे सारेच पांथस्थ या महामार्गाची वाट चालू शकतात, की काही मूठभरांनी या महामार्गांवर टोल नाकी उभारून विकासाची गंगा केवळ आपल्याच वावरात वळवून नेली आहे?’ असा प्रश्न सामान्यांना पडू लागला होता.(हा प्रश्न सनातन आहे, तो कधीच कालबाह्य होणार नाही.)

या कादंबरीमध्ये ‘स्वातंत्र्य’ याच शीर्षकाचे एक प्रकरण आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचे माहेरघर मानल्या गेलेल्या देशातील व्यवस्थेला स्वार्थलोलुप भांडवलशहांनी बटीक केले असल्याचा हा काळ आहे. काही स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींनी चिकाटीने ही काळी बाजू प्रकाशात आणली होती. त्याच वेळी अमेरिकेला सामान्यांबद्दल कळकळ असलेला एक नेता लाभल्यामुळेच तिला ‘कम्युनिस्टांचा कावा’ अथवा ‘देशद्रोही लोकांचे कटकारस्थान’ म्हणून झटकून न टाकता त्या मोकाट भांडवलशाहीवर अंकुश निर्माण करण्यात आले. त्यातून कागदोपत्री असणारे आर्थिक स्वातंत्र्य सर्वसामान्यांच्या दारी येऊ शकले.

आज एकविसाव्या शतकात अमेरिकाच काय परंतु भारतासारख्या देशांतही अर्थव्यवस्था ही सामान्यांची काळजी करण्यापेक्षा उद्योगव्यावसायिकांचीच बटीक होऊन राहिली आहे. अमेरिकेला लाभला तसा रुझवेल्ट आपल्या देशात कुठे दिसत नाही. एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासाची व्याख्याही रुझवेल्टपेक्षा एखाद्या निक्सन, बुश वा ट्रूमनच्या व्याख्येशी अधिक मिळतीजुळती आहे.

माध्यमस्फोटानंतर जग जवळ आल्यानंतर सर्वसामान्य माणसेही मूलभूत गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था मागण्याऐवजी महासत्ता मागू लागली आहेत. नि ती देईन असे आश्वासन देणार्‍या कुण्याही हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यासमोर मान नि खांदे झुकवून उभी राहू लागली आहे. सामान्यांच्या गरजा कोणत्या हे ही भांडवलशाही माध्यमेच सांगू लागली आहेत. अर्धपोटी जनतेला आपल्या मेंदूवरचे अदृश्य साखळदंड जाणवतही नाहीत अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार नि निवारा या मूलभूत गरजांपेक्षा महासत्ता, धर्मवर्चस्व, वंशवाद हे जनतेच्या मनात अधिक प्रकर्षाने उमटणारे मुद्दे आहेत. तंत्रज्ञानामार्फत आलेली मनोरंजनाची भूल माणसाच्या विचाराला वास्तव पाहूच देत नाही अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थेला पवित्र (sacrosanct) न मानता तिला जाब विचारणार्‍यांची संख्या नगण्य आहे. जे आहेत ते समाजाच्या दृष्टीने शत्रू ठरत आहेत. व्यवस्था आपल्यासाठी आहे, आपण तिच्यासाठी नव्हे याचे भान हरवलेले लोक व्यवस्थेमार्फत काहीतरी अचाट चमत्कार घडून त्या मार्फत आपले सारे दैन्य दूर होईल अशा आशाळभूत आशेने तिच्यावर आंधळी निष्ठा ठेवून आहेत. तर धनदांडगे त्या व्यवस्थेला पायतळी ठेवून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण मुळातून वाचायला हवे.

- oOo -

संबंधित लेखन:
स्वातंत्र्य या मुद्द्यावर या नोंदींमध्ये जे सापडते त्यातून एक प्रातिनिधिक वेचा निवडण्याची इच्छा होती. परंतु त्याची व्याप्ती नि विषय ध्यानात घेता असा वेचा सापडू शकला नाही. मग उलट दिशेने ‘काय वगळता येईल?’ असा विचार करून पाहिला. त्यातही फारसे काही सापडले नाही. अगदी थोडा भाग वगळून शिल्लक राहिलेला लेख दोन भागांत पोस्ट करायचे ठरवले. एकाचे दोन भाग करताना आणखी काही भाग वगळता आला. आता हे दोन भाग मिळून एक दृष्टिकोन मांडतात असे मला वाटते.

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध) >>
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध) >>

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती >>
---


हे वाचले का?

बुधवार, १३ मार्च, २०२४

माझा बाप

देशपांडे मास्तर आरोग्यशास्त्र शिकवीत होते. पावसाळ्यात रात्री बेडूक ओरडावा तसा त्यांचा आवाज वाटत होता. मी पुस्तक पुढे धरून झोप घेत होतो.

देशपांडे मास्तर फारच गंभीर होते. क्वचित ते विनोद करीत, पण तोदेखील गंभीर असे. ते आरोग्यशास्त्र शिकवू लागले की, माझे डोळे जड होऊन मिटू लागत. मग पुस्तक पुढे धरून मी बसल्या बसल्या बैलासारखा झोप घेई. कधी कधी हे मास्तरांच्या ध्यानात येई. पुस्तक खाली ठेवून ते दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर चोळत आणि गंभीरपणे म्हणत,

“तेलीबुवा, उठा. डोळ्याला पाणी लावून या आणि मग बसा.”

मुले माझ्याकडे बघून हसत. मी मुकाट्याने उठून बाहेर जाई. शाळेच्या विहिरीतून बादलीभर पाणी काढी. तोंड धुऊन पुन्हा जाग्यावर येऊन बसे. पण हे क्वचित, मी एरवी झोपलो आहे हे ध्यानी येऊनही ते शांतपणे शिकवीत राहात. तास संपल्याचे टोले पडताच पुस्तक मिटून निघून जात.

आरोग्यशास्त्राच्या आड थोडा वेळ मला छान झोप लागली आणि एकाएकी देशपांडे मास्तरांनी विचारले,

“तेलीबुवा, तुम्ही टोचून घेतलं आहे का ?”

मी खडबडून जागा झालो. बावरून उभा राहिलो. देशपांडे मास्तरांनी प्रश्न पुन्हा विचारला, पण त्याचा रोख माझ्या ध्यानात आला नाही.

गंभीर आवाजात मास्तर पुन्हा म्हणाले,

“तुमच्या अंगरख्याच्या बाह्या वर करा.”

मला काही कळले नाही. पण मी बाह्या वर केल्या.

“देवी काढल्या आहेत का ?”

माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने उठून ‘नाही’ असे उत्तर दिले. मग मी मानेनं नकार दिला.

मुलं एकमेकांशी कुजबुजू लागली. बाह्या वर करून एकमेकांचे दंड बघू लागली.

मास्तरांनी आपले नाक गोंजारले आणि दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले. काही निर्णय घेण्याअगोदर ते बहुधा असे करीत. मग त्यांनी घड्याळात बघितले. तास संपायला थोडा अवकाश होता. टेबलापाशी बसून त्यांनी काही लिहिले आणि तो कागद माझ्या हाती देऊन सांगितले,

“आपल्या वडिलांना हे द्या!”

माणदेशी माणसं

शाळा सुटताच मी बरोबरीच्या मुलांशी न भांडता सरळ घराकडे निघाले. चार मैलांचे अंतर तोडून माझ्या खेड्यात आलो. घरात येताच तो कागद आईच्या हाती देऊन म्हणालो, “मास्तरांनी हे नानाला दिलं आहे!”

ती शेजारच्या खेड्यात तेल विकण्यासाठी जाण्याची तयारी करीत होती. गिऱ्हाइकांनी घाणे काढण्यासाठी दिलेल्या करड्यातून काही करडे, वेळूने विणलेल्या टोपलीत घालून त्यात पिवळ्याधमक तेलाच्या चरव्या ठेवल्या होत्या. मी गेलो तेव्हा चुंबळ डोक्यावर ठेवून पाटी उचलू लागायला कोणी मिळते का हे ती बघत होती.

तेलाने भरलेले आपले हात काळजीपूर्वक नेसत्या लुगड्याला पुसून तिने माझ्या हातातला कागद घेतला. तो उघडला. उलटापालटा केला. एखाद्या लहान मुलासारखा दिसणारा तिचा चेहरा चिंतातुर झाला. हलक्या आवाजात तिने विचारले, “काय सांगितलंय् हेच्यात ?”

“माझ्या हाताला टोचलं पाहिजे ? ”

“अग बाई ! कशासाठी रे माझ्या लेकरा ?”

“मास्तर सांगतात म्हणून. शाळेतल्या पोरांनी घेतलं आहे!” आईने मला आपल्याजवळ ओढून घेतले. माझ्या टाळूवरून, तोंडावरून हात फिरवला आणि समजावणीच्या स्वरात ती बोलली,

“शाळा शिकायची तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे. बाहेर गेलाय् तुझा बाप. आल्यावर दाखव त्याला !”

मग मी पाटीला हात लावला आणि माझी आई तेल विकण्यासाठी निघून गेली.

काही वेळाने माझा बाप आला. कमरेच्या धोतराखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचे अंग उन्हाने करपून गेले होते. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते. पण त्यांच्यावर टोचल्याचे वण नव्हते.

कोनाड्यातील चिलीम-तंबाखू घेऊन तो उंबऱ्यापाशी दोन पायांवर बसला आणि चिलीम भरत आपल्या राठ आवाजात बोलला,

“कधी आला रे तू शाळेतून ?”

मी काही न बोलता मास्तरांनी दिलेली चिठ्ठी त्याच्या हवाली केली. तेव्हा भरलेली चिलीम पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट यांमध्ये उभी धरून त्याने चिठ्ठी दोन्ही हातांनी उघडली. मास्तरांनी लिहिलेली अक्षरे लावायला त्याला बराच उशीर लागला.

श्री. नरसू तेली यांना
स. न. वि. वि.

आपला मुलगा चि. रामू याला देवीची लस टोचून घेतली नसल्याचे आज माझ्या ध्यानात आले. लहानपणी टोचून घेण्याचे काही कारणाने राहून गेले असावे. पण आता अवश्य घ्यावे. साथ आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतलेली बरी. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.

मग माझ्या बापाचा चेहरा थोडा गंभीर झाला. मला जवळ बोलावून त्याने अंगरख्याच्या गुंड्या काढायला लावल्या. माझ्या छातीला, गळ्याला हात लावून बघितला आणि मग ती चिठ्ठी फाडून टाकून तो गरजला,

“गाढव आहे तुझा मास्तर ! तुला काही सुद्धा झालं नाही. टोचायचं का म्हणून ? डॉक्टरचं घर भरायला आम्ही काय जहागिरदार लागून गेलोय्‌. सांग त्याला, मला धाड सुद्धा झाली नाही म्हणून !‍”

मी म्हणालो, “जे काय असंल ते लिहून द्या. ”

यावर डाफरून तो बोलला, “बरं देईन. जा विस्तू घेऊन ये आतला ! ”

मी उलथन्यावर विस्तू घेऊन आलो. तो चटकन् बोटांनी उचलून त्याने चिलमीवर ठेवला. त्याच्या हाताला पोळत कसे नाही हे कोडे मला नेहमीचेच होते. खमंग वास सुटला. नाकातोंडातून काळा करडा धूर सोडीत, कोंडल्या आवाजात त्याने मला पुन्हा सांगितले,

“मला दौत, टाक, कागद दे.”

माझा बाप लिहिण्यावाचण्यापुरते शिकला होता. लिहिण्याचे साहित्य देताच पालथी मांडी घालून त्याने बराच वेळ विचार केला, आणि मला विचारले,

“मास्तरला पत्र लिहिताना मायना काय लिहितात रे?”

तो अडल्यामुळे मला विचारतो आहे हे मला कळले. पण मलाही मायना येत नव्हता. मी ठोकून दिले,

“पण तो काही तुझा मास्तर नाही नाना, साधा मायना लिही!”

मग दौतीत टाक बुडवावा आणि काय लिहावे हे निश्चित करीपर्यंत तो वाळावा असे बरेच वेळा झाल्यावर वाकड्यातिकड्या अक्षरात त्याने खालील मजकूर लिहिला.

रा. रा. मास्तरसाहेब यांना वाकडेवाडीहून नरसू बाबाजी तेली याचा राम राम. लिहिण्यास कारण की, चिठ्ठी मुलानं दिली. आपण काळजी करण्याचे कारण नाही; आता त्याचे अंग गरम लागत नाही. आपला संशय आला तो ताप नसावा. टोचण्याचे कारण नाही.

नरसू बाबाजी तेली.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच ती चिठ्ठी मी देशपांडे मास्तरांपाशी दिली. ती वाचता वाचता त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. लगेच तळवे चोळून त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहिली.

श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.

आपला काही गैरसमज झालेला दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने लस टोचून घेणे आवश्यक आहे. मुलाचा शिक्षक या नात्याने मला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुळीच हयगय न करता टोचून घ्यावे. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.

ही चिठ्ठी घेऊन मी घरी आलो तेव्हा घराबाजूला रोवलेला आमचा घाणा चालला होता; डोळ्याला झापडे बांधलेला म्हातारा बैल गोल फिरत होता. आणि घाण्यावर कुणीच बसलेले नव्हते. मी जाऊन बसलो. गोल फिरताना पोटात खळगा पडतो आणि बरे वाटते. बाष्पाची लाट म्हशीसारखा आवाज करीत होती. पेंड खाण्यासाठी कावळे भराऱ्या मारीत होते.

लगेच नाना आला. नित्याप्रमाणे तो उघडाच, पण धोतराभोवती तरडाचा एक धडपा गुंडाळला होता.

घाण्यापाशी घेऊन त्याने लाट हलवली. अर्धवट ठेचलेले करडे हात घालून सारखे केले आणि तेलकट हात तरटाला पुसून म्हटले,

“हं, काय म्हणाला तुझा मास्तर ?”

मी उत्तरादाखल चिठ्ठी दिली. उन्हाच्या तिरपेला जाऊन तो ती लावू लागला. मी तेलाने चपचपलेली ती पेंड खात होतो आणि घाण्याबरोबर फिरत होतो.

चिठ्ठी वाचून होताच नानाने दंडाला धरून मला पुढे खेचले आणि बैलाला मारण्याचा आसुड माझ्या पाठीवर उडवला. तो म्हणाला,

“गाढवीच्या, शाळा नको म्हणून आजारी असल्याचं सोंग करतोस; मास्तरला फसवतोस ? हां ?”

मी ओय्‌ ओय्‌ करीत पळालो. चाबूक उगारून नानाही माझ्या मागे लागला. मी गल्लीबोळातून पळालो. बापाच्या पुढे पळण्याची माझी ताकद नव्हती, पण कावळे पेंड खातील म्हणून तो उलवकर परत फिरला.

मग मी उशीरा घरी परत आलो. गावच्या ओढ्याप्रमाणे नानाचा राग लवकर ओसरतो हे मला ठाऊक होते. शाळेला जायला निघताच त्याने दुसरी चिठ्ठी माझ्यापाशी दिली. तिच्यात खाली दिलेला मजकूर होता.

रा. रा. देशपांडे मास्तरसाहेब यांना नरसू तेल्याचा राम राम. लिहिण्यास कारण की, तुम्ही पुन्हा टोचण्यास लिहिले आहे. आपले रास्त आहे, शाळा चुकविण्यासाठी आपण आजारी आहो असे त्याने लबाड सांगितल्याचे दिसते. त्याबद्दल मी त्याला ठोकला आहे. पुन्हा तो काही बोलणार नाही. कळावे.

आपला,
नरसू बाबाजी तेली,
वाकडेवाडीकर.

हा घोटाळा आणखी किती काळ चालणार आहे असे वाटून मी फार पंचायतीत पडलो. माझा बाप फारच हेकेखोर माणूस होता. जन्माला आल्यापासून आजतागायत तो कधी आजारी पडला नव्हता. त्याने कधीही औषध घेतले नव्हते. मग तो पोराला टोचून कसा घेणार !

देशपांडे मास्तरांनी चिठ्ठी वाचली. आणि कधी नव्हे तो त्यांचा चेहरा रागेजला दिसू लागला. नेहमी ते मला अहो जाहो बोलवीत, पण आज म्हणाले,

“तुला काही अक्कल आहे का ?”

मी होय नाही अशी मान हलवली.

“मग बापाला नीट समजावले का नाही ! ”

“पण मलाही नीट समजले नाही !”

हे ऐकून नाक गोंजारीत मास्तर स्वतःशीच पुटपुटले,

“ साधी गोष्ट. मला कळत नाही की, तुम्ही लोक इतके अडाणी कसे. बरं मी पुन्हा चिठ्ठी लिहितो !”

त्या दिवशी देशपांडे मास्तर मला सारखे प्रश्न विचारीत होते. त्यांनी मला मुळीच झोपू दिले नाही. शाळा सुटताच सगळी मुले माझ्याभोवती गोळा झाली. माझ्या अंगरख्याच्या बाह्या वर करून त्यांनी वण आहेत का नाही ते बघितले, आणि ओरडा केला,

“ तेलीबुवा, तुम्ही टोचून घ्या, हुर्यो ! ” कुणीसे म्हटले.

“टोचून घ्या तेलीबुवा, नाही तर ठोक्याच्या तपेलीसारखे तोंड होईल!”

“ मेहेरबानी तेवढ्यावर निभावले तर, नाही तर जीवे मराल!”

मुलांनी माझी पाठपुरवणी केली. ती सगळी मुकाट सहन करून मी घरी आलो आणि चिठ्ठी नानाला दिली.

कडू तेलाच्या दिव्यापाशी बसून त्याने ती लावली.

श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.

आपला गैरसमज झालेला दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की, तुमचा मुलगा आता आजारी आहे. त्याने तशी बतावणीही माझ्यापाशी केली नाही. पण तालुक्यात देवीची साथ आहे. तिला आवर घालण्यासाठी टोचून घेणे आवश्यक आहे, म्हणून मी आग्रह धरला. माझ्या चिठ्ठया पुन्हा एकवार नीट वाचल्या तर ही गोष्ट तुमच्या नजरेस येईल. सरकारी दवाखान्यात मोफत टोचण्याची व्यवस्था आहे. फार त्रासही होणार नाही. मुलाचा शिक्षक या नात्याने मला ही खबरदारी घेणं आवश्यक वाटलं. आशा आहे की, झाला गैरसमज दूर होऊन आपण टोचून घेण्याची तजवीज कराल. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे.

चिठ्ठी वाचून होताच ती दिव्यावर धरून जाळीत नाना बोलला, “सुया होचून कुठं साथी जातात काय ? गाढव लोक ? मी कधीही काही टोचून घेतलं नाही. साथी आल्या अन् गेल्या. मी अजून जगलोय् ना ? माझा बाप, माझा आजा कुणी टोचलं नव्हतं. बाप अठ्याण्णव वर्षे जगला, आजा शंभर आणि वर तीन ! मास्तरला अक्कल नाही. सुयाबिया टोचणार असतील तर तू शाळेत जाऊ नकोस. आपला धंदा कर. ”

माझी आई इतका वेळ गप्प होती ती हळूच म्हणाली,

“पण चार यत्ता शिकू द्या त्याला. शाळा शिकायची, शहाणं व्हायचं तर टोचून घेतलं पाहिजे. मार सोसला पाहिजे. ”

त्यावर नाना ओरडला, “काय गरज नाही. कितवीत आहेस रे पोरा तू आता ?”

“मराठी चौथीत.”

“बास झालं. बापापेक्षा दोन पायऱ्या पुढं गेलास. आज मी चिठ्ठी देतो ती वाचूनही मास्तर टोचून घे म्हणाला तर पुन्हा शाळेची पायरी चढू नकोस.”

आणि त्यानं चिठ्ठी लिहिली.

राजमान्य राजश्री मास्तरसाहेब यांसी, राम राम.

पत्र लिहिण्यास कारण की, माझा गैरसमज झालेला नाही. मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही, आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्ती कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकविण्याचे करा. कळावे.

आपला,
नरसू तेली.

ही चिठ्ठी घेऊन जेव्हा मी शाळेला निघालो तेव्हा मला फार भीती वाटत होती. माझी शाळा खलास झाली असे वाटत होते. धुळीने भरलेल्या वाटेने जड दप्तर वागवीत चाललो असताना मी या विचाराने अगदी व्याकुळ झालो होतो. घाण्यावर बसण्यापेक्षा मला शाळेत बसणे जास्त आवडत होते.

आणि भरभर चालून दमगीर झालेली माझी आई डोक्यावर तेलाची पाटी घेऊन माझ्या मागून आली. ती निश्चयाने म्हणाली,

“ चल, आपण दवाखान्यात जाऊन टोचून घेऊ. तू कळ सोसशील का ?”

मी म्हणालो, “सोशीन, पण नानाला कळलं तर?”

“त्यांच्यादेखत विव्हळू नकोस.”

“ नाही. पण तो सुजलेला हात बघील. टोचल्यावर हात सुजतो.”

“ त्यांच्यादेखत उघडा होऊ नकोस. आणि एकदा टोचल्यावर काय करणार आहे तो ? चल.”

चिठ्ठी फाडून टाकून आम्ही दवाखान्यात गेलो. मात्र टोचताना आईने डोळे पदराने झाकून घेतले. मी तोंड फिरवून कळ सोसली.

माझ्या बापाला मी टोचून घेतल्याचे कळले नाही. साथ संपली तेव्हा तो फुशारकीने मला म्हणाला,

“ सांग तुझ्या मास्तरला मी अजून जिवंत आहे म्हणून आणि म्हणावं माझा बापही आहे. गाढव साले. देवाशपथ मी सांगतो, पोरा तुझा तो मास्तरच एके दिवशी साथीत पटकन् मरेल !”

यावर माझ्याकडे बघून आई गालात हसली.

- oOo -

पुस्तक: माणदेशी माणसं
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली,अकरावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २००८.
पृ. १२७ - १३४.


हे वाचले का?

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

स्वप्न-वास्तव-सत्ता(१)

“थोड्या वेळाने टोपलीवरील झाकण उघडले. तो क्षण दिव्य होता. ज्या क्षणी स्वप्न सत्य म्हणून जन्माला येते, आणि लालसेचा उगम म्हणजेच तृप्ती ठरते असा दुर्लभ क्षण ! मी पाहिलेली स्त्री शय्येवर राजवस्त्रांत होती. आणि तिच्या शरीरावर तर आता रत्नप्रकाशाचा उत्सव होता. आता तिने नागमुकुट कपाळावर ठेवला होता. तिच्या डोळ्यांत मात्र अथांग विषण्णता होती. पण तिचा गोरापान गळा व त्याच्याखालील रत्नमाला शोभणारा थोडा प्रदेश पूर्वीइतकाच उन्मादक, खुणावणारा होता. गळ्‍याशी धरून तिने मला धीटपणे उचलले, व आपल्या उरावर धरत मृदू शब्दांत म्हटले, ‘ये, आता तूच माझा सखा आहेस. एक देदिप्यमान साम्राज्य मावळत असता तूच त्याला आता निरोप दे.’

“त्यावर आयुष्यभर जपलेल्या वासनेने मी त्या गौर अंगावर दंश केला व पुन्हा पुन्हा दंश केले. त्या त्या ठिकाणी निळसर वर्तुळे पसरली, आणि अखेर शय्येवर पसरलेला राजवस्त्रांतील तिचा देह संपूर्णपणे सावळा होऊन ती पूर्णपणे माझी झाली. परिपूर्तीनंतर जी श्रांतता येते, सुख पूर्ण झाल्यावर जी आर्द्रता राहते, त्यांच्यामुळे मी इतका संथ झालो की येथे येईपर्यंत ऊन झगमगू लागले. पण हे अंधारे विवर, त्यातील सडलेली हवा, आणि त्यातच निर्जीवपणे जगणारे तुम्ही हे पाहिल्यावर माझ्यात सामर्थ्य आले. माझ्या सुखाला तुलना नाही इतके ते परिपूर्ण होतेच. पण तुमच्यासमोर आता त्यावर ईर्ष्येची झळाळी चढली आहे.”

सांजशकुन

जमलेल्या सापांत अस्वस्थ हालचाल झाली. कारण आता त्यांच्यात मत्सर निर्माण झाला होता. पण कोणीतरी बोलावे म्हणून त्यांनी तरुण सापास डिवचले. तो म्हणाला, “हा सारा तुझा भ्रम आहे, आणि त्या भरात तू असले काही असंबद्ध बडबडत आहेस. तूच काही एकटा बाहेर हिंडलेला नाहीस. मी देखील बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. या ठिकाणी नागमुकुट घालणारी कोणी स्त्री नाही हे मी स्वानुभवाने सांगू शकतो.”

त्याच्या शब्दांवर इतर सापांचा विश्वास बसला, व त्या भ्रमिष्टाने असल्या मूर्खपणाने आपणाला फसविण्याचा प्रयत्न करावा याचा त्यांना विलक्षण संताप आला. हे सगळे त्या वृद्ध प्रमुख सापाला जाणवले. तो म्हणाला, “माझे दीर्घ आयुष्य तर बहुतेक बाहेरच गेले. आताच मी शरीर थकल्यावर येथे बंदिस्त झालो आहे. अशा तर्‍हेची स्त्री तर नाहीच, एवढेच नव्हे, तर ती असणे देखील शक्य नाही. कोणती स्त्री सापाला उचलून आपल्या उराला दंश करून घेईल, विषाचा आनंदाने स्वीकार करेल ? असल्या कपटाला आपण काय प्रायश्चित देतो हे तर तुम्हाला माहीत आहेच.”

त्याच्या अनुमोदनाची वाटच पाहत असल्याप्रमाणे तरुण साप वेगाने पुढे आला, व स्वतःच्याच स्वप्नात तृप्त असलेल्या सापात दात रुतवून त्याने त्यास बाहेर काढले. त्याक्षणी इतर साप त्याच्यावर तुटून पडले, व थोड्याच वेळात तो साप दुर्बल होऊन निर्जीव झाला. त्या गर्दीत काहीच करायला न मिळालेला वीतभर असलेला एक लहान साप पुढे झाला, व त्याने मृत सापात दात रोवून फरफटत नेले, व दूरच्या त्या स्मशानात टाकून दिले.

सारे साप पुन्हा विसावल्यावर प्रमुख साप तरुण सापाला म्हणाला, “मला थोडा वेळ मोकळ्या हवेत जायचे आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल. आपण खडकाच्या टोकावर जाऊ. त्या ठिकाणी जाऊन मला किती तरी वर्षे झाली.” आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहता तो खडकाकडे सरकू लागला.

त्याच्या शब्दांनी तरुण साप भयचकित झाला. मागच्या बाजूचा खडक जणू जमिनीपासून वर उडून जाण्याच्या सतत प्रयत्नात असल्याप्रमाणे सरळ उंचच्या उंच गेला होता. तरुण सापाने नम्रपणे म्हटले, “पण खडकाच्या टोकापर्यंत जाणे या वयात तुम्हाला निभावेल का ? परत उतरताना तुमच्या वृद्ध शरीराला वजन तोलणार नाही.”

“तसा प्रसंग येणार नाही,” वृद्ध साप तुटकपणे म्हणाला.

वृद्ध साप अत्यंत कष्टाने वर चढून आला. पण त्याला इतके शिणल्यासारखे वाटत होते की काही काळ तो स्वस्थ पडून राहिला. या ठिकाणी वाऱ्याचा जोर विलक्षण होता, आणि सूर्य तर येथून हातभरच उंच दिसत होता. उन्हाच्या तापापासून वाचण्यासाठी त्यांनी एका पसरट झुडुपाचा आधार घेतला, आणि तरुण साप त्या जराग्रस्त शरीराकडे पाहत थांबला.

“आणखी एक भ्रमिष्ट आपल्यातून गेला हे बरे झाले. एका सुंदर स्त्रीने म्हणे त्याला उचलून घेतले, व त्याच्याकडून दंश करून घेतला,” तो तिरस्काराने म्हणाला.

“तो भ्रमिष्ट नव्हता, सुदैवी होता,” वृद्ध साप म्हणाला, “तिने स्वतः दंश करवून घेतला की नाही हे मला सांगता येणार नाही, पण त्याचे त्या स्त्रीचे वर्णन एवढे सत्य होते की ती गोष्टदेखील त्याने प्रत्यक्ष घडल्यामुळेच सांगितली असावी. तशी स्त्री असणे केवळ शक्यच नाही, तर ती प्रत्यक्षात अस्तित्वात होतीच. कारण मी तिला स्वतः पाहिले आहे.

“मला स्वतःला त्या महालातील प्रत्येक सुबक खांब, प्रत्येक खिडकी माहीत आहे; कारण मी माझे बरेचसे आयुष्य तेथेच घालवले आहे. ती स्त्री खरोखरच एक सम्राज्ञी आहे. मी तिला राजवस्त्रांत पाहिले आहे; त्याच आरशासमोर दासी तिच्या केसांचा शृंगार करताना; हंसाकृती नावेत ती नदीप्रवाहावर विहार करताना; ती शय्येवर शांतपणे अर्धवस्त्रात झोपली असताना, प्रथम दुधाने, नंतर सुगंधी पाण्याने विवस्त्र स्नान करताना– मी अनेकदा तिला पाहिले आहे. त्याने सांगितलेली तीच तापल्या तारेसारखी वासना माझ्यातही निर्माण झाली होती, आणि त्याच उत्कटतेने मीही ती जोपासली होती. हे बघ, माझे शरीर विकल झाले आहे. त्या वेळचा माझा जोम नाहीसा झाला, आणि दंशात देखील पूर्वीचा विखार राहिला नाही. त्यावेळची एकच एक गोष्ट पूर्वींच्याच धगीने राहिली. ती म्हणजे तिच्याविषयी वाटत आलेली ही आसक्ती !”

“पण तुम्हीच त्याची हत्या करण्याची सूचना केलीत ना ?” तरुण सापाने विस्मयाने विचारले.

“होय, मीच तशी सूचना केली,” वृद्ध साप शांतपणे म्हणाला, “आता मी तुला जे सांगितले ते आधी सांगून देखील मी तुला त्याची हत्याच करण्याचा सल्ला दिला असता. परंतु ते मला तुला सगळ्यांच्या समोर सांगायचे नव्हते, म्हणून तर मी तुला येथे आणले. मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घे. उद्या तू प्रमुख होशील. तुला त्या सापांवर सत्ता गाजवायची आहे. सत्ता आणि स्वप्ने एकत्र नांदू शकत नाहीत. अशा तर्‍हेने स्वप्न बाळगून राहणारा साप तुझ्या सत्तेखाली सौम्यपणे राहील असे का तुला वाटते? अशा तर्‍हेने मनाला पंख फुटले की ते संपत्ती काय, सत्ता काय, त्यांच्या जाळ्यात राहू शकत नाही. तेव्हा ज्या ज्या वेळी तुला अशा स्वप्नांची बीजे दिसू लागतील, त्या त्या वेळी तू सत्ताधारी या नात्याने ती निष्ठुरपणे ठेचून काढली पाहिजेस. या गोष्टीचा तू स्वतःला कधी विसर पडू देऊ नकोस.

“परंतु त्याच वेळी आणखी एक गोष्ट तू ध्यानात धरायला हवी. तू सत्ताधार्‍याप्रमाणेच एक व्यक्ती देखील आहेस, आणि अशा एखाद्या वेड्या, विलक्षण, दिवसाच्या आभाळात रात्रीच्या चांदण्या पाहणाऱ्या स्वप्नाखेरीज व्यक्तीच्या जीवनाला मात्र प्राण नाही. तेव्हा स्वतःच्या आयुष्यात मात्र तू असल्या स्वप्नाला फार कोवळेपणाने जपले पाहिजेस. लक्षात ठेव, असले स्वप्न सत्तेने किंवा बळाने निर्माण करता येत नाही. ज्याप्रमाणे असल्या स्वप्नावर कसली सत्ता चालत नाही, त्याप्रमाणे कोणी त्यांना अटकाव देखील करू शकत नाही. परंतु त्यांची देणगी भयंकर असते, मन सतत जळत राहते, रक्ताचे पाणी होते. जणू हे आधीच पुरेसे नसल्याप्रमाणे, असले स्वप्न येते, ते सोबत अशक्यतेची छाया घेऊनच. सहजासहजी प्राप्त होणाऱ्या, हात उंच करताच आवाक्यात येणाऱ्या स्वप्नांसारखे मलीन, क्षुद्र या जगात काहीच नसेल. जर असले एखादे स्वप्न तुझ्या आयुष्यात आलेच तर त्याचा ताप, त्याची अशक्यता, यांसह तू त्याचे आतल्या मनात कृतज्ञतेने स्वागतच कर; नाहीतर आपली निवड झाली नाही, असे स्वीकारून समजूतदारपणा दाखव.”

वृद्ध साप सरकत खडकाच्या अगदी कडेला आल्या, व दूरवर पाहत त्याने विचारलं, “तुला येथून काय दिसते?”

तरुण सापाने मागे राहूनच म्हटले, “समुद्राला मिळताना समुद्राएवढी झालेली नदी आता इतकी अरुंद दिसते, की माझ्या अंगाने मी ऐलतीर पैलतीर पसरू शकेन असे मला वाटते. शहरातील सारे भव्य प्रासाद आता खेळण्यांप्रमाणे दिसतात, आणि माझे घर तर मला येथून दिसतच नाही. ते इतके खाली दूर राहिले या विचाराने माझ्या मनाचा थरकाप होतो.”

“होय, तो देखील एक दृष्टिकोणच म्हणायचा, ” वृद्ध साप मान हलवत म्हणाला. “ती भूमी म्हणजे तर आपला आसरा आहे. आपला जन्म, मृत्यू, आपले आयुष्य सारे तिच्यावरच तिच्याखाली घडते. तरीदेखील जमिनीवर राहणाऱ्याने वर जाऊन ती कशी दिसते हे मधूनमधून पाहणे जरूर असते. आपले घर इतके खाली राहिले, असे म्हणण्याऐवजी आपण इतके उंच आलो असे देखील तुला म्हणता आले असते. म्हणजे एकंदरीने तुझ्या बाबतीत स्वप्नाबद्दल इशारा देण्याची फारशी गरज दिसत नाही. ती बाधा तुला होणार नाही. कारण त्याबाबतीत तू सुरक्षित दिसतोस. एखाद्या स्वप्नाने झपाटून जाण्याची आशा म्हण, अगर भीती म्हण तुला कधी त्रस्त करणार नाही. याला देखील एक प्रकारचे सुखच म्हणणारे प्राणी तुला भेटतीलही. तू आता खाली जा. इतर साप तुझी वाट पाहत असतील. ”

“आणि तुम्ही? तुम्हाला उतरताना तर विशेष मदत लागेल,” तरुण साप म्हणाला.

“नाही. कारण मी परतणार नाही,” वृद्ध सापाने निश्चयाने म्हटले, “माझे एकुलते एक स्वप्न आता भंगून अशक्यच झाले हे तू पाहिलेसच, आणि आज ना उद्या सत्ता देखील माझ्याकडून तुझ्याकडे जाणारच. सत्ता नाही आणि स्वप्नही नाही. तर मग मी कोण उरलो आहे? तर आता मी निव्वळ एक कात आहे, आणि टाकलेल्या कातेचे काय करायचे असते हे मला आणि तुला माहीत नाही, तर माहीत असणार कोणाला ?”

त्यावर तरुण साप काही बोलण्याआधीच वृद्ध साप पुढे सरकला, व त्याने आपले जीर्ण हताश शरीर उन्हाने धगधगलेल्या खालच्या खडकावर फेकून दिले.

- oOo -

पुस्तक: सांजशकुन
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, दुसरे पुनर्मुद्रण.
वर्ष १९९९. पृ. २५-३५.

---

(१). भासाच्या ‘स्वप्नवासवदत्ता’ या नाटकाच्या शीर्षकाशी अनायासे साधर्म्य दिसते आहे. परंतु कथाभाग सर्वस्वी भिन्न आहेत.


हे वाचले का?

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

साहित्याचे भवितव्य

नुकताच एका युवकाने (हा शब्द अलीकडे आला. मागे ‘पोरसवदा’ म्हणत.) मला प्रश्न विचारला, “लेखक व्हावं, असं मला फार वाटतं. मी प्रथम काय करू?” मी गंभीरपणे म्हणालो, “फेरविचार.”

“म्हणजे?”

“लेखन करून त्यावरच आपला चरितार्थ चालवावा, अशी तुमची जर योजना असेल; तर हा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही फेरविचार करावात, हे बरं, कारण मला तरी इथून पुढे साहित्याचं भवितव्य फारसं उज्ज्वल दिसत नाही. मी हे अगदी मनापासून बोलतो; काही तरी चमकदार बोलावं म्हणून नाही.”

पांढर्‍यावर काळे

‘आम्हां घरी धन, शब्दांचे भांडार’ किंवा ‘हे शब्द-सृष्टीचे ईश्वर,’ हा शब्दाचा महिमा जाऊन आता देखाव्याला महत्त्व प्राप्त होत आहे. दृष्टीची मागणी आधी पुरी करावी, ही बालवाडीत उपयोगात आणावयाची पद्धत आता सर्वत्र लागू होत आहे.

रंगीबेरंगी चित्रपट, रंगीबेरंगी नाटके, लोकनाट्ये, खेळ, नाच हे सगळं इतक्या भडक देखाव्याने दाखविले जात असताना, तीन-चारशे पानांची लठ्ठ कादंबरी घेऊन वाचत कोण बसेल? आणि बसू म्हटले, तरी तेवढी निवांत जागा त्याला मिळेल का? सतत होणाऱ्या नाना आवाजांची आपल्याला आता इतकी सवय झाली आहे की थोडी शांतता असली की, तिथे मुलांना असुरक्षित वाटते. मग ती रेडिओ लावतात. बिनाकाच्या पार्श्वसंगीतावर त्यांचा अभ्यास शांतपणे होतो. बागेत, टेकडीवर कुठेही गेले तरी ट्रान्झिस्टर सोबतीला हवा. (पुढे आता अशी वेळ येईल की, बटण फिरवून शांतता ओतणारे यंत्र शोधून काढणे अत्यंत निकडीचे होईल. मग आज घरातील एखादी खोली जशी वातानुकूल करून घेतात, तशी श्रीमंतलोक आपली घरे शांततामय करून घेतील.)

वाचताना ताप घेऊन शब्दांपासून किंवा कल्पनाविलासापासून आनंद घेण्यापेक्षा डोळ्यांनी देखावा पाहून खूश होणे सोपे आणि सहजसाध्य असते. मी लहानपणी पुस्तकात डोके घालून जेवढा बसत असे, तेवढी माझी मुले आता बसत नाहीत. मी ‘पंचतंत्र’, ‘हितोपदेश’ वाचले. ही मुले आता ‘फान्टम बुक्स’ वाचतात. यांची पुस्तके चित्रमय असतात, मजकूर उगीच तोंडी लावण्यापुरता असतो. मासिकेसुद्धा भरपूर चित्रे, रंगीत फोटो देणारी तेवढी चिकार खपतात, नुसता मजकूर देणारी मरून जातात. (जिज्ञासूंनी मराठी नियतकालिकांचा इतिहास पाहावा.)

सिनेमाचे खेळ रोज तीन या प्रमाणात पंचवीस, पन्नास आठवडे होतात; नाटकाचे सहासहाशे प्रयोग होतात, लोकनाट्ये पाचशे प्रयोगांनंतरसुद्धा पहिल्या प्रयोगाइतकी रंगतात. आता एका प्रयोगाला किमान पाचशे प्रेक्षक तरी असतील? पण पुस्तकाची पाच लाखांची आवृत्ती कधी काळी निघाली आहे का? तीन कोटी मराठी भाषकांच्या या कल्याणकारी राज्यात दोन हजारांची आवृत्ती खपायला तीन ते पाच वर्षे लागतात, असे ललित वाङ्मयाचे प्रकाशक म्हणतात आणि आमच्या रॉयल्टीचा हिशेबही तेच सांगतो.

मधून-मधून काही पुस्तके तडाखेबंद खपतात आणि आपल्याला वाटते की, साहित्याला आता बरे दिवस आले. पण या खपामागील कारणे पुष्कळदा वाङ्मयबाह्यही असावीत. स्वस्त पुस्तकयोजनेत लोक पुस्तके घेतात. ती वाचण्यासाठी की, दहा रुपयांची वस्तू पाच रुपयांत खरेदी केली, हा आनंद उपभोगण्यासाठी? गेल्याच वर्षी एका लोकप्रिय इंग्रजी मासिकाने सुमारे साडे-तीनशे पृष्ठांच्या पुस्तकाची जाहिरात केली. त्यांनी पाठविलेल्या कार्डावर केवळ ‘बरोबर’ची खूण करून ते पोस्टात टाकायचे आणि सोबतचा भाग्यक्रमांक मात्र आपल्यापाशी कापून ठेवून द्यायचा. लगेच तुम्हाला अडुसष्ट रुपये किमतीचे एक रंगीत फोटोंचे आणि बेतास-बात मजकुराचे पुस्तक व्ही.पी.ने येईल. ते घ्यावयाचे आणि आपल्या नशिबाचा खेळ पाहायचा. हा भाग्यक्रमांक लागला, तर तुम्हाला नवी मोटारगाडी किंवा रेकॉर्डप्लेअर मिळेल. हे जरी नाही मिळाले, तरी काही ना काही भेट तरी प्रत्येक ग्राहकाला मिळेलच.

माझी खात्री आहे की, अडुसष्ट रुपये किमतीच्या या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या असतील. कारण माझ्या परिचयाच्या अनेक घरांत मी ते पुस्तक पाहिले. या सर्वांनी वाचण्यासाठी का ते पुस्तक घेतले होते?

एखादा चित्रपट पाहायचा चुकला की, चुटपुट लागते. नाटक बघायचे राहून गेले की, हळहळ वाटते. खूप चाललेले लोकनाट्य आपणच तेवढे अजून पाहिले नाही, याचे दुःख होते. पण एखादी उत्तम कादंबरी, कथासंग्रह किंवा कवितासंग्रह वाचला नाही, म्हणून कोणी हळहळताना दिसत नाही. नाटक-सिनेमाच्या तिकीटखिडकीशी रांगा लागतात तशा पुस्तकभांडाराच्या दाराशी लागलेल्या कोणी पाहिलेल्या नाहीत.

शिक्षणाचे क्षेत्र सारखे वाढत आहे. नवे वाचक निर्माण होत आहेत, असे आपण मानतो. पण हे वाचक खरेच वाचतात का? काय वाचतात? का ते फक्त पाहतात? शब्दांची जादू पाहण्यासाठी आतला डोळा उघडावा लागतो. उलट, आहेत त्या डोळ्यांनी सिनेमा, नाटक, खेळ, नाच पाहणे सोपे. हे सगळे डोळ्यांना खिळवून ठेवणारे कसे होईल, हा विचारच प्रामुख्याने होतो आहे. (मराठी रंगभूमी आता सुतारांच्या आणि आतारांच्या ताब्यात गेली आहे, असे नुकतेच कोणी म्हटले होते.) शब्द गळले, आपल्या पदरचे बोलले तरी चालेल; पण नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना उत्तम पाहिजे. चित्रपटाचे कथानक हे दुय्यम महत्त्वाचे; खरे महत्त्व गेवा कलरला, उत्तम फोटोग्राफीला आणि भव्य सेटिंग्जना, भव्य पोस्टर्सनी, भव्य जाहिरातींनी लोकांचे लक्ष वेधून त्यांच्या डोळ्यांना मेजवानी द्यायची, असा हा मामला असतो.

...आणि आता आपल्या देशात टेलिव्हिजन येणार म्हणून शहाजणे वाजू लागली आहेत. तो हां हां म्हणता येईलही. (परदेशी मदत आहे म्हणे!) आधी काळा-पांढरा येईल, मग रंगीत येईल. मोठा रुंद पडदा, रंगीत दृश्ये... मुलेबाळे त्यावर तुटून पडतील आणि उद्याची पिढी ही डोळ्यांनी पाहणाऱ्यांची होईल. आजवर जे ऐकायला मिळत होते, ते पाहायला मिळेल. हरएक चीज डोळ्यांनी पाहावी; डोक्याला ताप नाही.

टेलिव्हिजन करमणूक म्हणून प्रथम येतो आणि पुढे आजार होतो, असा पाश्चात्त्य देशांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे वाचन आणि विचार करण्याची सवय लोपते, असेही ते लोक मानतात. हे सगळे आता फार दूर नाही, लवकरच ते घडणार आहे. सगळे युग डोळ्यांनी पाहण्याचे!

कथा, कादंबऱ्या, कविता वाचील कोण? मग ज्याप्रमाणे लघुनिबंध गेला, नाट्यछटा गेली, महाकाव्ये गेली; तसा प्रकार होईल. कथा-कादंबरीची जरुरीही राहणार नाही. ते प्रकार पुराणवस्तुसंग्रहालयात मांडले जातील.

माझे एक लेखक मित्र म्हणतात, “या पिढीतले मराठी साहित्यिक हे मोगल शहाजाद्यांसारखे आहेत. वडिलांचा खून करून त्यांना गादी हवी असते.” पण यापुढच्या काळात साहित्यिक-गादी राहणार आहे का?

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ७९-८१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

रविवार, २८ जानेवारी, २०२४

चिमण्या - ३ : निरोप

<< या सदराच्या निमित्ताने...
<< मागील भाग: चिमण्या - २ : दुरावा
---

गेल्या एप्रिलमध्ये मी माझ्या पुण्याच्या घरात आजारी पडलो. पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे मला अनेक दिवस कॉटवर पडून राहावे लागले. पायाच्या पायी मी सर्व बाजूंनी लंगडा झालो. या काळात मला चालता येत नव्हते. झोप लागत नव्हती. दिवसभर वेदना सोशीत मी अंथरुणावर पडून असे.

या वर्षी उन्हाळा फार होता. झोपायच्या खोलीतून मी माझे अंथरूण लिहायच्या खोलीत आणले होते. दारातील मनरंजनीच्या वेलाची फुलांनी डवरलेली तांबडीलाल डहाळी बघत, बहरलेल्या मोगऱ्याचा सुवास हुंगीत मी कॉटवर पडलो असताना एके दिवशी माझ्या घरात चिमण्यांची पाच-सहा जोडपी शिरली आणि सगळे घर धुंडू लागली. त्यांच्या दंग्याने घर भरून गेले!

मला मोठा आनंद झाला! कितीतरी दिवसांनी ही मंडळी पुन्हा माझ्याकडे आली होती. पण हे घर काही आमच्या जुन्या घराप्रमाणे चिमण्यांना सोयीस्कर नव्हते. येथे तुळया, खांडे नव्हती. कलचा नव्हत्या. दगडमातीच्या भिंती नव्हत्या. चिमण्यांनी जागा कुठे पसंत करावी आणि घर कुठे बांधावे ? भिंतीवर टांगलेल्या तसबिरीच्या मागे राहणे त्यांनी पसंत केले असते, पण माझ्या घरात फार मोठ्या तसबिरी नव्हत्या आणि भिंतीची उंचीही अगदी मामुली होती. विजेचे दिवे भितीला लागून असत, तर त्याच्या थरडीमागे त्यांनी इमला बांधला असता, पण इथे सगळे दिवे अधांतरी लोंबते होते. अंथरुणावर पडल्या-पडल्या मी चिमण्यांना सोयीस्कर अशी जागा बघितली, पण कुठेही जागा म्हणून नव्हती. भाडेकरूंच्याच नव्हे, तर चिमण्यांच्याही दृष्टीने आपले राहते घर फार गैरसोयीचे आहे, फार दिवसांनी आलेल्या चिमण्या निराश होऊन परत जातील, असे मला वाटू लागले.

दोन-तीन दिवस चिमण्यांनी सगळ्या घराची कसून तपासणी केली. घर बांधण्यालायक इथे प्लॉट नाही, अशी खात्री झाल्यावर त्या निघून गेल्या. खिडकीतून होणाऱ्या त्यांच्या भराऱ्या थांबल्या. बडबड ऐकू येईनाशी झाली. माझे अडीच खोल्यांचे घर पुन्हा ओके ओके वाटू लागले.

चार दिवस गेले. माझ्या उशाशी, डाव्या बाजूला भिंतीत कपाट होते. आणि उशाला तर खिडकी होती. भिंतीतील कपाट पुस्तकांनी भरलेले होते. कपाटावर अर्धवर्तुळाकार कोनाडा होता. त्यात मी माझा चित्रकलेचा लाकडी फळा ठेवलेला होता. एका चिमण्याच्या जोडप्याने कलेच्या आश्रयाने राहायचे ठरवले आणि भराभर बांधकाम सुरू झाले. अंथरुणावर पडल्या पडल्या एका अंगावर होऊन, मी हे बांधकाम पाहत होतो. ऐन उन्हातान्हात नवराबायको राबत होती. चोचीतून काड्यादोरे घेऊन येत होती, फळ्याखाली शिरत होती. बाराएकचा सुमार झाला की, माझ्या उशाच्या खिडकीत बसून ती दोघेही अंमळ विसावा घेत. हळू आवाजात पुढचे बेत बोलत. मधूनच चिमणा उडून जाई. एखादी काडी घेऊन येई. उन्ह इतकं होतं की, कधी-कधी ती दोन्हीही पाखरे आपल्या चिमण्या चोची उघडून धापा टाकीत गप बसून राहत. पण त्यांच्या कामात खंड पडला नाही. बांधकाम अर्धवट राहिले नाही.

रानमेवा

फळ्याआडचे बांधकाम केव्हा पुरे झाले ते मला कळले नाही. पण चिमण्यांच्या चोचीतून काड्या दिसेनात. चिमणा एकटाच असा खिडकीत बसू लागला तेव्हा मी ओळखले की, घर पुरे झाले आहे, आणि मी जसा बाबीच्या वेळेला प्रसूतीगृहाच्या व्हरांड्यात बापुडवाणा होऊन उभा होतो, तसा हा चिमणा आपल्या घराबाहेर उभा होता. आणखी काही दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या माझ्या कानांवर नाजूक चिवचिव आली. चिमणीची सुटका झाली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होती. मग चिमणा एकटाच बाहेर काम करू लागला, बाळांना आणि बाळाच्या आईला खायला घेऊन येऊ लागला. पुढे बाळंतीणही हळूहळू घराबाहेर पडू लागली. पण बाळाच्या वडिलांप्रमाणे ती फार उशीरपर्यंत बाहेर राहत नसे. वरचेवर घराच्या दाराशी बसून, ती मुलांना हाका मारी–

“बाळांनो झोपला का रे? बाळांनो भूक लागली का रे?”

आईची हाक येताच मुले आतून ‘आई... आई’ करून ओरडत. त्यांचे ओरडणे कानी आल्यावर आईचे भित्रे मन निवांत होई. मग आत शिरून पोरांच्या वेढ्यात गुंतून न राहता, ती किडामुंगी टिपण्यासाठी पुन्हा बाहेर पडे. मुलांचा आवाज बंद होई.

मी वाट पाहत होतो. आता लवकरच मुले बाहेर पडतील, माझ्या एवढ्याशा घरात त्यांचे हिंडणे-फिरणे सुरू होईल. बाळांचे आईबाप त्यांना उडण्याचे धडे देतील. मुले घाबरून रडतील. मग आई म्हणेल–

“रडायचं नाही राजा, शहाणा ना तू, हं उचल पंख. हे बघ अस्से उचलायचे. उचललेस, आता हलव असे.”

“मला भीती वाटते.”

आई इतका सोशिकपणा आणि माया नसलेला बाप थोडा रागवेल आणि मुलांना दरडावील, “भीती कशाची वाटते? फाजील कुठला ! लोकांची मुलं बघ कशी भराभर उडतात. भागुबाई, म्हणे मला भीती वाटते!”

मग आई म्हणेल, “दटावू नका हो त्याला. दटावण्यानं जास्तच घाबरेल तो. हलव राजा पंख.”

“मी नाही जा. मला भीती वाटते.”

बाप आणखी रागावेल. “काही लाड नकोत. पडलास म्हणून काही पाय मोडत नाही. लागेल थोडेसे. कांगावा कशाला करतोस उगीच ?”

मग मुलगा उडेल आणि धडपडून पडेल. त्याचे अंग भितीवर आपटेल. मग आईबाप त्याला पोटाशी धरून समजावतील.

पडे-झडे माल वाढे! पडत-झडतच ही मुले उडायला शिकतील आणि मी जसा पुण्याला आलोय तशा कुठे तरी जातील. आपल्या आईबापांना बोटभर चिठ्ठी पाठवायची आठवणदेखील त्यांना कधी होणार नाही.

मी असे भविष्य रंगवीत होतो, पण झाले वेगळेच. मुले मोठी होऊन घराबाहेर पडायच्या आतच तो नाजूक आवाज एके दिवशी बंद झाला. चिमणा चिमणी दाणा घेऊन येईनात. रिकाम्या चोचीने घरट्याबाहेर बसून, चिमणी ओरडू लागली आणि चिमणा खिडकीत उगीच बसू लागला. मला काही कळेना. मी बायकोला म्हणालो, “विमल, चिमण्यांची पोरं ओरडेनात का ग?"

घरकामातून सवड मिळेल तशी विमल माझ्यापाशी बसत होती आणि चिमण्यांचे कुशल माझ्याकडून ऐकत होती. ती पोरे आणि ते नवराबायकोचे जोडपे हे कुटुंब तिच्याही चांगल्या परिचयाचे झाले होते. बाबीने पिले पाहण्याचा हट्ट धरला, तेव्हा तिला खांद्यावर उचलून तिने चिमणीचे घर दाखवले होते. पिले दिसली नाहीत. पण माझ्या मनगटी घड्याळाची टिकऽ टिकऽ कान लावून ऐकावी, तसे चिमण्यांच्या मुलांचे बारीक चिवचिवणे बाबीने कान देऊन ऐकले होते.

ती पोरे ओरडत नाहीत म्हणताच विमल म्हणाली, “ऊन फार आहे हो. झोपली असतील गप.”

“छे; गं, आज सबंध दिवसात मी त्यांचा आवाज ऐकला नाही. बघ तरी.”

विमल पायाशी स्टूल घेऊन वर चढली. वाकून पाहिले तरी चिमण्यांचे घर दिसेना. मी कॉटवर उठून बसून विचारीत होतो, “दिसतात का गं? आहेत?” लांबून पाहून दिसेना, तेव्हा विमलने हलक्या हाताने फळा उचलला आणि एकदम दचकून ती ओरडली, “अगं आई गं!”

“का गं, काय झालं? नाहीत पिलं?”

“आहे, ओंजळभर लाल मुंग्या लागल्यात इथं. मुंग्यांनी खाल्ली की हो बिचारी पोरं!”

मी गप्प झालो.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४१-४४.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा

कथा महाभारतातली आहे. उद्योगपर्वाच्या एकशे सहाव्या अध्यायात आलेली आहे. ती प्रक्षिप्त आहे का, हे मला माहीत नाही. त्याची जरुरीही मला वाटत नाही. महाभारत म्हणून या ग्रंथात जेवढे आणि जसे उपलब्ध आहे तेवढे आणि तसे निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेला मी व्यास असे नाव देते, इतकेच. ती कथा कुणा एका व्यासाने लिहिली असेल किंवा वेगळ्याच कुणी मागाहून ती महाभारतात मिसळून दिली असेल. त्या कथेतले सामाजिक वास्तव कदाचित् महाभारतकालीन असेल, कदाचित् पूर्वकालीन असेल आणि ते महाभारत-काळात किंवा भारतोत्तर काळात कुणी तरी कथाबद्ध करून भारतात घातले असेल किंवा कदाचित् ती उत्तरकालीन भरही असेल. ज्या कुणी ती कथा लिहिली त्याने एका सामाजिक वास्तवाची ठिणगी तिच्यात पकडली आहे, असे मात्र मला वाटते.

कथा आहे श्रीकृष्ण-शिष्टाईच्या वेळी कौरवसभेत सांगितली गेलेली. पांडवांना राज्य न देण्याचा आपला दुराग्रह दुर्योधन सोडीत नाही, असे पाहिल्यावर अनेक ज्येष्ठांनी त्याला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महर्षी नारदांनी त्याला वेड्या हट्टाचा परिणाम कसा भयंकर होतो, हे समजावण्यासाठी विश्वामित्रशिष्य गालवाची एक गोष्ट सांगितली. महाभारतकारांच्या लेखी ती माधवीची नव्हे, तर गालवाची गोष्ट आहे. नारदांच्या लेखीही ती गालवाचीच गोष्ट आहे. अर्थातच कथेचा गाभा गालवाने केलेल्या वेड्या हट्टाचा आहे, अतिरेकी आग्रहाचा आहे. माधवी तर कथालेखक आणि कथानिवेदक दोघांच्याही दृष्टीने नगण्य आहे.

काळोख आणि पाणी

गालव विश्वामित्राचा एकनिष्ठ शिष्य. गुरूच्या कठीण काळात त्याने गुरूची सेवा न कंटाळता, एकाग्रपणे केली. प्रसन्न होऊन विश्वामित्राने त्याला स्वगृही परतण्याची अनुज्ञा दिली; पण गुरुदक्षिणा दिल्यावाचून जाणे गालवाला बरे वाटेना. त्याने पुन्हा पुन्हा विश्वामित्राला आग्रह केला. प्रथम सौम्यपणे त्याला समजावणारा विश्वामित्र अखेर गालवाच्या अतिरेकी हट्टाने रागावला आणि त्याने मोठी विचित्र गुरुदक्षिणा मागितली : ज्यांचा एक कान काळा आहे, असे पांढरेशुभ्र आठशे घोडे !

गालव पडला गरीब ऋषिकुमार. असे दुर्मिळ प्रकारचे आठशे घोडे तो कुठून आणणार ? त्याला आपल्या हट्टाची शिक्षा फार महागात पडली. अगदी हतबल होऊन तो शोक करू लागला. एवढ्यात पक्षिराज गरुड तिथे आला. तो गालवाचा मित्र होता. त्याने गालवाची व्यथा ऐकली आणि घोडे किंवा ते मिळवण्याइतके द्रव्य कुणाकडून तरी मिळवून आणण्याचा उपाय त्याने गालवाला सुचवला. इतकेच नव्हे, तर तो स्वतः गालवाला घेऊन द्रव्यसंपादनासाठी निघाला.

इथे या कथेत गरुडाबरोबरच एका चिमुकल्या उपकथेचाही प्रवेश झाला, पण तिच्याबद्दलचे सारे नंतर ! गालवाला घेऊन गरुड निघाला तो नहुषपुत्र ययातीकडे आला. ययाती मोठा दानशूर आणि उदारचरित राजा. पण त्याच्याजवळ त्या प्रकारचे घोडे नव्हते अन् ते दुसरीकडून विकत घेण्यासाठी गालवाला धन द्यावे म्हटले, तर तेवढे धन त्याच्या कोषात नव्हते.

वस्तुस्थिती अशी होती, पण गालवासारख्या ब्राह्मणाला तसेच रिकाम्या हाती परत पाठवणे ययातीला पटेना. कारण अतिथीला विन्मुख पाठवणे हे शास्त्राने सर्वांत मोठे पाप मानलेले. तसे केले, तर वंशच्छेदाचे भय ! राजाने विचार करून गालवाला म्हटले, ‘माझ्याजवळ प्रत्यक्ष द्रव्य नाही, पण जिच्यामुळे तुला हवी ती गोष्ट मिळू शकेल अशी वस्तू मी तुला देतो.’

तत्तु दास्यामि यत्कार्यमिदं सम्पादयिष्यति |
अभिगम्य हताशो हि निवृत्तो दहते कुलम् ||

ती वस्तू खरोखरच इष्टफळ देणारी होती. तिचे नाव होते माधवी. ही माधवी म्हणजे ययातीची स्वतःचीच मुलगी होती. त्यामुळे तिच्यावर ययातीचाच पूर्ण अधिकार होता. शिवाय ती अल्पवयीन होती. तेव्हा ययातीला तिचे भाग्य ठरवण्याचा हक्कही होता आणि ते त्याचे कर्तव्यही होते. आणि पुन्हा माधवी ही अशी वस्तू होती की, जी बापाच्या कीर्तीत भरच घालील. वय लहान, तरी गुणी. स्वतःच्या आईबापांचे आणि नवऱ्याच्या आईबापांचे असे चार वंश कायम राखणारे मायपोट तिच्याजवळ होते. देवांनाही हेवा वाटावा असे सुलक्षणी वागणे होते अन् मनुष्यमात्रांना मोह घालणारे रूपही होते. हे सारे ज्या वस्तूत एकवटले आहे, तिच्या बदल्यात आठशे घोडेच काय, आख्खी साम्राज्ये सुद्धा गालवाला मिळू शकणार होती. नव्हे ययातीची– माधवीच्या बापाची तशी खात्रीच होती.

अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा राज्यमपि ध्रुवम् |
किं पुनः श्यामकर्णानां हयानां द्वे चतुश्शते ||

ययातीने गालवाला आपली मुलगी दिली. फक्त त्याने एक लहानशी अट घातली. त्याने म्हटले की, माधवीच्या ठायी होणाऱ्या पुत्रावर तो माझा वंशवर्धन, माझा नातू म्हणून माझा हक्क असावा. अन् ययातीचे हे मागणे अगदी योग्य होते. कारण पुत्र हाच तर वंशाचा दिवा. मुलगी झाली तरी वंश चालवण्यासाठी पुत्रच हवा. मुलीचे काम पुत्रोत्पत्तीचे. तिला खाऊपिऊ घातले, तिला वाढवली ती कशासाठी ? अतिथी विन्मुख गेला असता, तर वंशच्छेद झाला असता, पण रूपगुणसंपन्न माधवी होती म्हणून गालवाची सोय झाली. आता अतिथीने माझीही सोय पहावी, असे राजाला वाटले, तर गैर नव्हते. शिवाय त्यात गालवाचा काहीच तोटा नव्हता. माधवीच्या बदल्यात त्याला इष्ट वस्तू मिळाली, तर राजालाही इष्ट ते द्यायला त्याची हरकत ती काय असायची ?

अशा प्रकारे विनिमयाची योजना निश्चित करून ययाती आणि गालव दोघेही संतुष्ट झाले. अन् मग गालव माधवीला घेऊन निघाला. तो प्रथम गेला हर्यश्व राजाकडे. अयोध्येचा हा राजा मोठा संपन्न आणि समृद्ध राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते, एवढीच एक उणीव. गालवाने माधवीचा प्रस्ताव राजापुढे मांडला. माधवीला पाहून राजा अक्षरशः काममोहित झाला. ती होतीच तशी. जे अवयव उन्नत हवेत ते उन्नत, जे बारीक हवेत ते बारीक, जे आरक्त हवेत ते आरक्त अशी ती अप्रतिम देहसौंदर्याची खाण ! तिला भोगावे आणि तिच्या ठायी पुत्रोत्पत्ती करावी, म्हणून हर्यश्व उत्सुक बनला.

पण त्याच्याजवळ गालवाला पाहिजेत तसले घोडे मात्र दोनशेच होते. मग त्याने तोड काढली. माधवी त्याला पाहिजेच होती. त्याने म्हटले की, ‘निदान एक पुत्र जन्माला येईपर्यंत हिला माझ्याकडे ठेव आणि नंतर दुसऱ्याकडे घेऊन जा. उरलेले घोडे दुसऱ्याकडून मिळव !’

माधवीला स्वतःलाही ही योजना पटली, किंबहुना तिनेच ती स्पष्ट मांडली. तिचे लहान वय आणि तिला लाभलेले देहलावण्य पाहता हर्यश्वाकडे तिला ज्या गोष्टीसाठी आणले होते, त्या गोष्टीचे तीव्र आकर्षण कदाचित् तिच्या मनात जागे झाले असेल. कदाचित् कथेच्या निर्मात्याला माधवीचा रुकार आवश्यक वाटला असेल. ते काहीही असो, तिने रुकार दिला खरा. शिवाय प्रत्येक प्रसूतीनंतर पुन्हा कुमारी होण्याचा वरही तिला असल्याचे तिने सांगितले. हा वर केवढा उपयुक्त होता ! गालवाला त्यामुळे केवढा दिलासा मिळाला असेल ! कारण एकदा हर्यश्वाने वापरल्यानंतर इतर वस्तूंप्रमाणे माधवीचे मूल्य यत्किंचितही कमी होणार नव्हते ! अक्षत कुमारी भोगण्याची इतर राजांची स्वाभाविक इच्छा माधवीच्या बाबतीत नेहमीच पुरी होऊ शकणार होती !

माधवी हर्यश्वाजवळ राहिली. तिला वसू नावाचा एक मुलगाही झाला. ठरलेली मुदत पुरी होताच गालव तिथे आला आणि हर्यश्वाच्या संपत्तीचा किंवा आपल्या संततीचाही मुळीच लोभ न धरता, पुन्हा कुमारी बनून माधवी गालवाबरोबर निघाली. मग गालव तिला घेऊन दिवोदास राजाकडे आला. माधवीची बहुधा जरा काळजीच वाटत होती त्याला. तिच्या नाजुक शरीराला हे सारे कसे झेपणार, असे त्याला वाटत असेल आणि ती हर्यश्वात मनाने गुंतली असेल की काय, असेही पुसटसे वाटून गेले असेल. म्हणून त्याने माधवीला मोठ्या स्नेहाने म्हटले,

महावीर्यो महीपालः काशीनामीश्वरः प्रभुः |
दिवोदास इति ख्यातो भैमसेनिर्नराधिपः ||
शनैरागच्छ, मा शुचः |
धार्मिकः संयमे युक्तः सत्ये चैव जनेश्वरः ||
तत्र गच्छावहे भद्रे |

‘तू फार कोवळी आहेस. ये. हळूहळू जाऊ. अणि मी तुला भलत्या पुरुषाकडे नेत नाहीये. दिवोदास फार धार्मिक आणि संयमी म्हणून प्रसिद्ध आहे.’

दिवोदासाने माधवीची हकिकत पूर्वीच ऐकली होती. त्यामुळे त्याने गालवाचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. पण तोही हर्यश्वाप्रमाणे. दोनशे घोड्यांच्या बदल्यात आणि एका पुत्रोत्पत्तीपर्यंत. माधवीला प्रतर्दन नावाचा मुलगा झाला. तोवर ती दिवोदासाजवळ राहिली आणि पुन्हा एकदा त्याच्या वैभवाचा लोभ सोडून गालवाबरोबर निघाली.

भोजनगरीचा राजा उशीनर हा तिचा तिसरा मालक बनला. गालवाला आता अधिक ठिकाणी फिरण्याचा आणि अधिक काळ घालवण्याचा बहुधा कंटाळा आला. त्याने उशीनराला चारशे घोड्यांच्या बदल्यात, दोन पुत्रांच्या जन्मासाठी माधवी देऊ केली, पण उशीनराचा नाइलाज होता. त्याच्याजवळही तसले दोनशेच घोडे होते. मग उशीनरापासून माधवी शिबी नावाचा मुलगा (पुढे जो शिबी राजा म्हणून प्रख्यात झाला) प्रसवली आणि नंतर गालव सहाशे घोडे आणि माधवीला घेऊन पुढे निघाला. एवढ्यात त्याला गरुड भेटला अन् त्याने पृथ्वीच्या पाठीवर एक कान काळा असलेले शुभ्र घोडे फक्त सहाशेच आहेत, अशी माहिती गालवाला दिली. पण आता गालवाला फार चिंता करण्याचे कारण नव्हते. उरलेल्या दोनशे घोड्यांच्या बदल्यात माधवी काही काळ विश्वामित्राकडे राहू शकत होती. तोच उपाय गरुडाने गालवाला सुचवला. गालवाने तसेच केले.

विश्वामित्राने माधवीला पाहिले अन् तो चकित झाला.‘अरे, त्या सहाशे अश्वांसाठी एवढी वणवण कशाला केलीस ?’ तो गालवाला म्हणाला, ‘हिला जर पहिल्याने माझ्याकडेच आणले असतेस, तर मीच चार पुत्र होईपर्यंत हिला ठेवून घेतली असती. मलाही चार वंशवर्धक मुलगे मिळाले असते !’

पण गालवाच्या हातून गोष्ट तर घडून गेली होती. मग विश्वामित्राकडे माधवी राहिली. अष्टक नावाचा एक मुलगा तिला झाला आणि घोड्यांची किंमत ज्याची त्याने वसूल करून पुरी झाली. आता सर्वांची तृप्ती झाली होती. ज्यांनी ज्यांनी घोडे दिले, त्या तीनही राजांना काही काळ माधवीचा भोग मिळाला, शिवाय एकेक पुत्र मिळाला. विश्वामित्राला घोडे तर मिळालेच, शिवाय माधवीच्या उपभोगासह एक पुत्रही मिळाला.

मग गालवाने माधवी पुन्हा आणून तिच्या बापाच्या म्हणजे ययातीच्या स्वाधीन केली. त्याने माधवीची स्तुतीही केली. चार मुलग्यांना जन्म देऊन तिने आपल्या पित्याचे, तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करणाऱ्या चार पुरुषांचे आणि गालवाचेही तारण केले, असे त्याला वाटले, तर नवल नाही.

भलता हट्ट धरणाऱ्या गालवाला त्या एका हट्टापायी किती काळ, किती श्रम पडले, हे सांगण्यासाठी नारदांनी दुर्योधनाला ही गोष्ट सभेत सांगितली आणि तिचा उत्तरार्ध ‘रमणीय’ आणि ‘बोधप्रद’ असा होता, म्हणून तो पुढचा कथाभागही सहज ओघात सांगून टाकला.

पुढे काय झाले की, माधवीचे लग्न करायचे ययातीने ठरवले. चार जणांपासून तिला मुले झाली म्हणून काय झाले ? तिला पुन्हा अक्षत कुमारी होण्याचा वर नव्हता का ? मग माधवीला तिच्या भावांनी सजवलेल्या रथात बसवले अन् सारीकडे हिंडवले. पण माधवीला एकही राजपुरुष पती म्हणून नको होता. तिने ‘वन’ हाच आपला पती निवडला अन् वनवास स्वीकारला.

माधवी आनंदाने वनात तपश्चर्या करीत राहिली. पुढे तिचा बाप ययाती स्वर्गात गेला आणि तिथे अभिमानापायी आपला पुण्यक्षय करून बसला. त्याला स्वर्गातून पृथ्वीवर परतण्याची वेळ आली. तो खाली आला तो थेट माधवीपासून जन्मलेल्या त्याच्या चार नातवांच्या यज्ञधूमाच्या वाटेनेच. त्याची ओळख पटली, तेव्हा त्याच्या नातवांनी त्याला पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी आपले पुण्य देऊ केले. सहज म्हणून तिथे आलेल्या माधवीनेही आपले पुण्य दिले. गालवाने थोडासा हिस्सा दिला अन् ययाती पुनश्च स्वर्गात जाऊन सुखाने राहू शकला.

अशी ही माधवीची संपूर्ण गोष्ट. खरे म्हणजे माधवीकरिता ती सांगितली गेलेलीच नाही, हे जाणवले, तेव्हा मी प्रथम थोडी दुखले. मला वाटले की, कुंतीची जीवनकथा शेवटी तिचीच जीवनकथा आहे; द्रौपदीची आयुष्यकहाणी तिची म्हणूनच सांगितली गेली आहे; पण इथे या माधवीचा स्वतःच्या आयुष्यावर निदान गोष्टीपुरता देखील अधिकार नाही. ती गोष्ट शेवटी गालवाचीच आहे. स्त्रीला सहज साधेपणाने वस्तू म्हणून वापरणाऱ्या पुरुषजातीच्या प्रतिनिधीची आहे.

पण नंतर जसजशी कथा वाचत पुढे आले, तेव्हा ते पहिले दुखलेपण किती तरी क्षुल्लक ठरले. कथेतल्या माधवीचा श्वास हळूहळू माझ्या छातीत भरून येऊ लागला. तिचे गरम रक्त माझ्या धमनीतून वाहायला लागले आणि त्या सगळ्या घटना-प्रसंगांचा एक प्रचंड दाबच माझ्यावर आला. माधवीचे शरीर उपभोग्य वस्तू म्हणून वापरण्याच्या त्या सगळ्या व्यापारी उद्योगातला ओंगळपणा ज्या धर्माच्या आणि शास्त्राच्या नावाखाली चालला होता, त्या धर्मशास्त्राने तर मला अक्षरशः भिंतीशी दाबून, कोंडून धरावे तसे गुदमरून टाकले.

सुरुवातीला माझ्यात दाटून आला तो प्रचंड भावनिक क्षोभ ! तो माधवीच्या व्यक्तिगत दुःखाचा होता. अगदी अल्पवयीन अशी ती कोवळी सुंदर मुलगी ! तिला नुकते नुकते शरीराचे धर्म समजू लागले असतील. वासनांचे सुरेख ऐंद्रिय उमाळे तिच्यात नव्याने जन्मू लागले असतील. ती तशीच बापाच्या आज्ञेवरून कुणा अनोळखी ब्राह्मणामागून चालत एका राजपुरुषाच्या पुढ्यात उभी राहिली असणार. तिच्या इच्छा, तिच्या गरजा पुरत्या समजायच्या आतच तिच्या बापाने तिला खरेदी-विक्रीच्या व्यवहारातले चलन बनवले. तिला लग्न होईपर्यंत बापाचेच नशीब होते. बापाने ज्याच्या हाती दिले, त्याच्याबरोबर ती हर्यश्वाकडे आली. तिने हर्यश्वाकडे रहायला अनुकूलताही दर्शविली.

का बरं ? का नाही तिने त्या सौद्याला नाही म्हटले ? हे एरवी मी तीव्रपणे स्वतःशी उद्गारले असते; पण आता माझ्यातला माधवीभाव जेव्हा पुरेसा जागा झालेला होता, तेव्हा मला सहज जाणवू लागल्या कोवळ्या, नैसर्गिक आकर्षणाच्या छटा ! माधवीजवळ, त्या अनाघ्रात कुमारीजवळ असेल थोडे कुतूहल, थोडी उत्सुकता, थोडे आकर्षण ! किंवा नसेलही तसे काही. ती मुकी आणि अनभिज्ञही असेल, पण तिची संमती कथानिवेदकाला किंवा कथेच्या निर्मात्यालाच आवश्यक वाटली असेल. जशी प्रत्येक पुरुषाला त्याला हव्याशा असलेल्या शरीरभोगाच्या वेळी स्त्रीची अनुकूलता सदैव असायला हवी असते, तशी माधवीची अनुकूलता त्याने निर्माणही केली असेल.

किंवा मुळातली माधवी असेलही कुणी वनकन्या, एखाद्या भटक्या आदिवासी टोळीप्रमुखाची मुलगी, जिच्या जमातीत एका बाईला अनेकांनी वापरणे हे गैर मानले नसेल पुरुषांनी आणि सवयीने स्त्रियांनीही. कोण जाणे काय असेल, पण माधवी हर्यश्वाकडे राहिली. नंतर आणखी दोघांकडे आणि मग विश्वामित्राकडेही. तिच्या मनाच्या आणि शरीराच्या अवस्थेचा पुसट देखील उच्चार कथेने केलेला नाही. विश्वामित्राने विचित्र गुरुदक्षिणा मागितल्यावर खचून गेलेल्या गालवाचा शोक कथेत विस्ताराने वर्णन केला आहे, पण माधवीचे दुःख किंवा सुख सांगणारी एकही ओळ नाही. एकही शब्द नाही.

कदाचित् हर्यश्वाकडून निघालेली माधवी शरीराने थकली असेल. तिच्या अल्पवयीन शरीराला, प्रौढ राजाचा शृंगार सोसलाही नसेल. तिच्या मनात एक उदास दुःख भरून राहिले असेल. गालव तिला म्हणाला, ‘तू फार कोवळी आहेस. आपण हळूहळू चालू. तू दुःख करू नको. हा दुसरा दिवोदास फार चांगला आणि इंद्रियदमन करणारा आहे.’ म्हणजे काय ? माधवी समागमाच्या त्या पहिल्या अनुभवातून खचली असेल, चुरमडली असेल, असे मानायला मला इथे जागा सापडली आणि गालव-ययातीच्या जातीबद्दलचा तीव्र संताप मनात जन्मण्याआधीच माझ्यातली माधवी स्वतःविषयीच्या करुणेने भरून गेली.

ज्या ज्या राजांनी तिला वापरले, त्यांतल्या एकाही महाभागाचे मन तिच्यात गुंतले नाही आणि तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केल्यावाचून एकही जण राहिला नाही. अगदी विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षीही ह्या गोष्टीला अपवाद नाही.

तिचा बाप ययाती. त्याची थोरवी काय सांगावी ? त्याने आपल्या वंशच्छेदाच्या भीतीने, अतिथि-सत्काराच्या गरजेने सरळ माधवी दुसऱ्याला देऊन टाकली. तिचे मूल्य सांगून देऊन टाकली. शिवाय तिच्या वंशावर आपला हक्क सांगितला आणि पुढे त्याचा पुण्यक्षय झाल्यावर पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी तो हक्क त्याला उपयोगीही पडला.

माधवीच्या आयुष्याचे मात्र काय झाले ? गालवाचे काम झाल्यावर ती चार मुलांची आई पुन्हा आपल्या बापाकडे परत आली. कुमारी म्हणून पुन्हा बापाने आणि भावांनी तिचे लग्न करून द्यायचा घाट घातला. पण तिच्याशी कोण लग्न करणार ? मला वाटते की, तिला शोधूनही नवरा मिळाला नसेल आणि तिला भावांनी वनात सोडून दिले असेल. किंवा तिलाच पुरुषजातीचा एवढा वीट आला असेल की, तिने स्वतःच वनवासाचा आग्रह धरला असेल किंवा ती वनकन्याच असेल अन् आपल्या जमातीत परतली असेल.

कोण जाणे काय असेल ! उदास आणि विरक्त होऊन जाण्याइतके भयानक तिने भोगलेच होते, हे तर नक्की. माधवीचे हे व्यक्तिगत दुःख माझ्या मनात माझे होऊनच जिवंत झाले, तेव्हा मला माझ्या स्त्रीत्वाची लाजच बाजारात उघड्यावर मांडली गेल्यासारखे वाटले. मला वाटले की, काळाच्या ओघात बाईमाणूस कितीही पुढे जगत आले, तरी हे दुःख जराही कमी व्हायचे नाही. तसेच जळते राहील. संस्कृतीच्या हृदयात ठिणगीसारखे राहूनच जाईल. माझी करुणा अशी स्वतःविषयीची होती. ज्या सामाजिक वास्तवाने बाईला वस्तूपण दिले, त्या पुरुष- प्रभावी वास्तवाविषयीही होती.

- oOo -

पुस्तक: काळोख आणि पाणी.
लेखक: अरुणा ढेरे.
प्रकाशक: सुरेश एजन्सी.
आवृत्ती पहिली.
वर्ष: नोव्हेंबर १९९१.
पृ. १२६-१३३.

---

पोस्टकर्त्याची टीप:
खुद्द वडिलांनी, एका ब्राह्मणकुमाराने, क्षत्रिय राजांनी, एवढेच नव्हे तर विश्वामित्रासारख्या सृष्टिनिर्मात्या ऋषीनेही जिच्याकडे एक क्रयवस्तू, एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले त्या माधवीच्या विदीर्ण आयुष्याने, तिच्या वेदनेने प्रसिद्ध हिन्दी कवी चन्द्रप्रकाश गोयल यांना विलक्षण व्यथित केले. त्या असंवेदनशील, शोषक पुरुषांच्या जातीत जन्मल्याची अपराधभावना घेऊन त्यांनी माधवीप्रती आपली क्षमायाचना ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्यातून रुजू केली आहे. इतके विलक्षण संवेदनशील काव्य अर्वाचीन काळात रचले गेले नसावे. माझ्या मते त्याला अर्वाचीन महाकाव्याचा दर्जा द्यायला हवा. आपल्या सुदैवाने प्रसिद्ध मराठी कवयित्री आसावरी काकडे यांनी ‘बोल माधवी’ या शीर्षकाखाली ते मराठीमध्ये आणले आहे. तो अनुवादही अतिशय तरल नि यथातथ्य उतरलेला आहे. त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

संबंधित लेखन: आपलं आपलं दु:ख


हे वाचले का?