बुधवार, १७ जुलै, २०२४

नकार : एक दैवी गुण

जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून!

आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो.

मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करावयाचे मान्य करतो आणि एस.टी.चा प्रवास सोडून एक तासभर भाषण देण्याचा मूर्खपणा आपण का केला, म्हणून पश्चात्ताप पावतो. हे मी का बरे पुनःपुन्हा करतो? काय आहे त्यात ? ना प्रसिद्धी, ना वैभव, ना चैन, ना मिळकत! पंच्याऐंशी मैल जायचे, दोन दिवस घालवायचे, हजार-बाराशेच्या समुदायापुढे बडबडायचे आणि परत यायचे - हा एवढा उपद्व्याप कशासाठी?

आता नटाकडून लेख मागविणारे लोक, लेखकाने व्याख्यान द्यावे असे म्हणणारच; त्यांना काय दोष द्यावा? पण आपण त्यांच्या आग्रहाला का बळी पडावे?

पांढर्‍यावर काळे

मी नकार देतो, तो आपला दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि स्वतः त्रास भोगू नये, या विचाराने. एखाद्या ठिकाणी मी जातो; तेव्हा ते गाव, तो हॉल, समोर बसलेले श्रोते, अध्यक्ष आणि स्वत: आपण– या सर्वांचाच मला विलक्षण राग आलेला असतो. मला पक्के माहीत आहे की, मी काही चांगला वक्ता नाही. भाषणाला उभा राहिलो की, एकीकडून मी बुजलेला असतो आणि उद्धटही असतो. मी वाक्ये विसरतो, गोंधळतो, खोकतो, खाकरतो ‘आणि, व, मग’ या शब्दांचा उच्चार पुनःपुन्हा करतो. सांगण्यासारखे मौलिक असे माझ्यापाशी काही नसते. श्रोत्यांना हसविण्याच्या खटाटोपात मी स्वतःचेच हसे करून घेत असतो आणि मला हेही माहीत आहे की, जेव्हा-जेव्हा मी एखाद्या गावी भाषण करतो, तेव्हा-तेव्हा बहुधा माझ्या शंभर ते दीडशे वाचकांना मी कायमचा मुकतो.

याचे मला दुःख होत नाही. कारण मी वक्ता नाहीच. हां, आता श्रोत्यांना सांगण्यासारखे असे माझ्यापाशी काही असते, त्याच्या जोडीला उत्तम आवाज असता, भव्य व्यक्तिमत्त्व असते; तर मी टेबलाशी बसून लिहिण्यापेक्षा वक्ताच झालो नसतो का? पुढारी नसतो का झालो, किंवा रंगभूमीवर नट म्हणून नसतो का प्रसिद्धी पावलो?

मला निवांत जागा, थोडे कोरे कागद, बऱ्यापैकी पेन द्या आणि उत्तम काम घ्या, स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. मला हॉल, टेबल-खुर्ची, अध्यक्ष, मायक्रोफोन अन् श्रोतृसमुदाय द्या आणि माझे काम बघून स्वतःच्या तोंडात मारून घ्या; पश्चात्ताप पावा!

आता पूर्वीप्रमाणे लिहिताना आपण 'प्रिय वाचक', 'रसिक वाचकहो' वगैरे संबोधून लिहीत नाही. तरीसुद्धा लिहिताना आपल्या डोळ्यांपुढे प्रिय आणि रसिक वाचकवर्ग असतोच. तो आहे, हे आपल्याला ठाऊक असते. पण मी जेव्हा भाषणासाठी कुठे उभा राहतो, तिथे हा वाचकवर्ग मला दिसत नाही. ते कोणी वेगळेच लोक असतात. वेळ घालवायला दुसरी काही जागा नाही म्हणून जमलेले. या लेकाच्याची पच्ची कशी होते, ते पाहण्यासाठी आलेले. त्यांत आपण या वर्षीं नवा चेहरा मिळविला, एवढेच समाधान मिळवून, लांब चेहऱ्याने बसलेले कार्यवाह असतात. ‘काय बेटा बोलतोय!’ असे मनाशी म्हणणारे अध्यक्ष असतात.

सभेला सुरुवात होते. परिचय करून देणारे श्रोत्यांना सांगतात– आजच्या आपल्या पाहुण्यांचे मी फारसे काही वाचले नाही, पण ते लोकप्रिय लेखक आहेत आणि आज आपल्या कानांना तासभर उत्तम भाषणाची मेजवानी मिळणार आहे. मी फार वेळ घेत नाही. आपण उत्सुक आहात ते पाहुण्यांचे शब्द ऐकण्यासाठी वगैरे... आणि दुष्टपणे आपल्याकडे बघून हसून खाली बघतात.

मी उभा राहतो. टिंगलबाज कुजबुज, हसू कानांवर येते. आपल्याकडे रोखलेले हजार-बाराशे डोळे दिसतात आणि मी मनाशी प्रतिज्ञा उच्चारतो, ‘आता पुन्हा कधीही हा मूर्खपणा करणार नाही– ही शेवटची वेळ!’

समजा श्रोत्यांमध्ये काही खरोखरीच चांगले, अगत्यशील, ऐकून घेण्याच्या इच्छेने आलेले लोक असले; तरीसुद्धा त्यांना व्याख्यानरूपे सांगण्यासारखे माझ्यापाशी काही नसते. याच तेवढ्या लोकांना बाजूला घेऊन बसावे आणि गप्पा माराव्यात, असे मला वाटते. म्हणजे असे की, लोकांना माझ्यात रस नसला, तर आपण बोलून त्यांना का बेजार करावे, म्हणून मी नाउमेद असतो. एकूण, सगळा वैतागच असतो.

उत्तम वक्ता असला... माझ्या बरोबरीच्या लेखकांत दोघे-चौघे आहेत... की, तो स्वतःच्या व्यक्तित्वावर, आवाजावर खूश असतो. केवढ्या आत्मविश्वासाने तो उठून उभा राहतो. कसलेल्या योद्धाप्रमाणे एकवार श्रोत्यांवर नजर फिरवितो. पहिल्या दहा-पाच वाक्यांतच तो नाठाळ घोड्यावर स्वार व्हावे; तसा श्रोत्यांच्या मनावर स्वार होतो आणि मग सुखाने दऱ्या-खोरीसुद्धा फिरतो. तो स्वतः रंगतो, श्रोत्यांना रंगवितो. याउलट वाईट वक्ता उभा राहताना हैराणच असतो. त्याचा आवाज, डोळे, चेहरा– सगळेच असे असते की, पहिल्या पाच-दहा मिनिटांतच श्रोते हैराण होतात. सगळे अवघड आणि अशुद्ध होऊन जाते!

माझ्या मनात येते की, मी आणि माझ्यासारखेच दहा-बारा वाईट वक्ते तेवढे सहज मिळतील– यांनी जर मनावर घेतले व गावोगावी वाङ्मय मंडळे, साहित्य परिषदा, स्नेहसंमेलने गाजवून सोडली, तर एक-दोन वर्षांच्या आत या महाराष्ट्र देशात केवढा तरी दरारा निर्माण होईल! यापुढे कोणा लेखकाला कधी व्याख्यानाची म्हणून गळ घालायची नाही, असा निश्चय सर्व लोक करतील. समस्त लेखकांची एका वार्षिक आपत्तीतून सुटका होईल आणि असेच जर वर्षानुवर्षे चालू राहिले, तर ‘लेखकवक्ता’ ही जात नामशेष होऊन जाईल. सुख आणि शांततेचे राज्य सर्वत्र पसरेल. माझ्यासारखे अनेक लेखक आणि श्रोते समाधान पावतील. खरे तर माझ्या पूर्वीच्या पिढीतील लेखकांनी हे करायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, म्हणून मला दोन ठिकाणी जावेच लागणार होते. मी हे पांढऱ्यावर काळे केले, म्हणून काही ते लोक क्षमा करणार नाहीत. समारंभ रहित करणार नाहीत. मला जावेच लागेल. सुटका नाहीच!

समोर श्रोते असतील– प्राथमिक शाळेतील मुले, ट्रेनिंग कॉलेजच्या मुली, अध्यापक आणि अध्यापिका, पालक आणि प्रौढ आया असतील. परिचय करून देणारे काही तरी बोलतील. मी माझ्या खुर्चीत अवघडलेल्या अवस्थेत बसून असेन. मनातून भयंकर धास्तावलेला.

शेवटी मी उठेन... बोलू लागेन....

अरेरे! मी त्या दोन लोकांना होकार का दिला? मी अत्यंत निर्धाराने नाही का म्हणालो नाही?

‘चुकणे’ हा माणसाचा स्वभाव आहे आणि ‘नकार’ देणे, हा दैवी गुण आहे.

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ५८-६१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा