रविवार, २८ जानेवारी, २०२४

चिमण्या - ३ : निरोप

<< या सदराच्या निमित्ताने...
<< मागील भाग: चिमण्या - २ : दुरावा
---

गेल्या एप्रिलमध्ये मी माझ्या पुण्याच्या घरात आजारी पडलो. पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे मला अनेक दिवस कॉटवर पडून राहावे लागले. पायाच्या पायी मी सर्व बाजूंनी लंगडा झालो. या काळात मला चालता येत नव्हते. झोप लागत नव्हती. दिवसभर वेदना सोशीत मी अंथरुणावर पडून असे.

या वर्षी उन्हाळा फार होता. झोपायच्या खोलीतून मी माझे अंथरूण लिहायच्या खोलीत आणले होते. दारातील मनरंजनीच्या वेलाची फुलांनी डवरलेली तांबडीलाल डहाळी बघत, बहरलेल्या मोगऱ्याचा सुवास हुंगीत मी कॉटवर पडलो असताना एके दिवशी माझ्या घरात चिमण्यांची पाच-सहा जोडपी शिरली आणि सगळे घर धुंडू लागली. त्यांच्या दंग्याने घर भरून गेले!

मला मोठा आनंद झाला! कितीतरी दिवसांनी ही मंडळी पुन्हा माझ्याकडे आली होती. पण हे घर काही आमच्या जुन्या घराप्रमाणे चिमण्यांना सोयीस्कर नव्हते. येथे तुळया, खांडे नव्हती. कलचा नव्हत्या. दगडमातीच्या भिंती नव्हत्या. चिमण्यांनी जागा कुठे पसंत करावी आणि घर कुठे बांधावे ? भिंतीवर टांगलेल्या तसबिरीच्या मागे राहणे त्यांनी पसंत केले असते, पण माझ्या घरात फार मोठ्या तसबिरी नव्हत्या आणि भिंतीची उंचीही अगदी मामुली होती. विजेचे दिवे भितीला लागून असत, तर त्याच्या थरडीमागे त्यांनी इमला बांधला असता, पण इथे सगळे दिवे अधांतरी लोंबते होते. अंथरुणावर पडल्या-पडल्या मी चिमण्यांना सोयीस्कर अशी जागा बघितली, पण कुठेही जागा म्हणून नव्हती. भाडेकरूंच्याच नव्हे, तर चिमण्यांच्याही दृष्टीने आपले राहते घर फार गैरसोयीचे आहे, फार दिवसांनी आलेल्या चिमण्या निराश होऊन परत जातील, असे मला वाटू लागले.

दोन-तीन दिवस चिमण्यांनी सगळ्या घराची कसून तपासणी केली. घर बांधण्यालायक इथे प्लॉट नाही, अशी खात्री झाल्यावर त्या निघून गेल्या. खिडकीतून होणाऱ्या त्यांच्या भराऱ्या थांबल्या. बडबड ऐकू येईनाशी झाली. माझे अडीच खोल्यांचे घर पुन्हा ओके ओके वाटू लागले.

चार दिवस गेले. माझ्या उशाशी, डाव्या बाजूला भिंतीत कपाट होते. आणि उशाला तर खिडकी होती. भिंतीतील कपाट पुस्तकांनी भरलेले होते. कपाटावर अर्धवर्तुळाकार कोनाडा होता. त्यात मी माझा चित्रकलेचा लाकडी फळा ठेवलेला होता. एका चिमण्याच्या जोडप्याने कलेच्या आश्रयाने राहायचे ठरवले आणि भराभर बांधकाम सुरू झाले. अंथरुणावर पडल्या पडल्या एका अंगावर होऊन, मी हे बांधकाम पाहत होतो. ऐन उन्हातान्हात नवराबायको राबत होती. चोचीतून काड्यादोरे घेऊन येत होती, फळ्याखाली शिरत होती. बाराएकचा सुमार झाला की, माझ्या उशाच्या खिडकीत बसून ती दोघेही अंमळ विसावा घेत. हळू आवाजात पुढचे बेत बोलत. मधूनच चिमणा उडून जाई. एखादी काडी घेऊन येई. उन्ह इतकं होतं की, कधी-कधी ती दोन्हीही पाखरे आपल्या चिमण्या चोची उघडून धापा टाकीत गप बसून राहत. पण त्यांच्या कामात खंड पडला नाही. बांधकाम अर्धवट राहिले नाही.

रानमेवा

फळ्याआडचे बांधकाम केव्हा पुरे झाले ते मला कळले नाही. पण चिमण्यांच्या चोचीतून काड्या दिसेनात. चिमणा एकटाच असा खिडकीत बसू लागला तेव्हा मी ओळखले की, घर पुरे झाले आहे, आणि मी जसा बाबीच्या वेळेला प्रसूतीगृहाच्या व्हरांड्यात बापुडवाणा होऊन उभा होतो, तसा हा चिमणा आपल्या घराबाहेर उभा होता. आणखी काही दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या माझ्या कानांवर नाजूक चिवचिव आली. चिमणीची सुटका झाली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होती. मग चिमणा एकटाच बाहेर काम करू लागला, बाळांना आणि बाळाच्या आईला खायला घेऊन येऊ लागला. पुढे बाळंतीणही हळूहळू घराबाहेर पडू लागली. पण बाळाच्या वडिलांप्रमाणे ती फार उशीरपर्यंत बाहेर राहत नसे. वरचेवर घराच्या दाराशी बसून, ती मुलांना हाका मारी–

“बाळांनो झोपला का रे? बाळांनो भूक लागली का रे?”

आईची हाक येताच मुले आतून ‘आई... आई’ करून ओरडत. त्यांचे ओरडणे कानी आल्यावर आईचे भित्रे मन निवांत होई. मग आत शिरून पोरांच्या वेढ्यात गुंतून न राहता, ती किडामुंगी टिपण्यासाठी पुन्हा बाहेर पडे. मुलांचा आवाज बंद होई.

मी वाट पाहत होतो. आता लवकरच मुले बाहेर पडतील, माझ्या एवढ्याशा घरात त्यांचे हिंडणे-फिरणे सुरू होईल. बाळांचे आईबाप त्यांना उडण्याचे धडे देतील. मुले घाबरून रडतील. मग आई म्हणेल–

“रडायचं नाही राजा, शहाणा ना तू, हं उचल पंख. हे बघ अस्से उचलायचे. उचललेस, आता हलव असे.”

“मला भीती वाटते.”

आई इतका सोशिकपणा आणि माया नसलेला बाप थोडा रागवेल आणि मुलांना दरडावील, “भीती कशाची वाटते? फाजील कुठला ! लोकांची मुलं बघ कशी भराभर उडतात. भागुबाई, म्हणे मला भीती वाटते!”

मग आई म्हणेल, “दटावू नका हो त्याला. दटावण्यानं जास्तच घाबरेल तो. हलव राजा पंख.”

“मी नाही जा. मला भीती वाटते.”

बाप आणखी रागावेल. “काही लाड नकोत. पडलास म्हणून काही पाय मोडत नाही. लागेल थोडेसे. कांगावा कशाला करतोस उगीच ?”

मग मुलगा उडेल आणि धडपडून पडेल. त्याचे अंग भितीवर आपटेल. मग आईबाप त्याला पोटाशी धरून समजावतील.

पडे-झडे माल वाढे! पडत-झडतच ही मुले उडायला शिकतील आणि मी जसा पुण्याला आलोय तशा कुठे तरी जातील. आपल्या आईबापांना बोटभर चिठ्ठी पाठवायची आठवणदेखील त्यांना कधी होणार नाही.

मी असे भविष्य रंगवीत होतो, पण झाले वेगळेच. मुले मोठी होऊन घराबाहेर पडायच्या आतच तो नाजूक आवाज एके दिवशी बंद झाला. चिमणा चिमणी दाणा घेऊन येईनात. रिकाम्या चोचीने घरट्याबाहेर बसून, चिमणी ओरडू लागली आणि चिमणा खिडकीत उगीच बसू लागला. मला काही कळेना. मी बायकोला म्हणालो, “विमल, चिमण्यांची पोरं ओरडेनात का ग?"

घरकामातून सवड मिळेल तशी विमल माझ्यापाशी बसत होती आणि चिमण्यांचे कुशल माझ्याकडून ऐकत होती. ती पोरे आणि ते नवराबायकोचे जोडपे हे कुटुंब तिच्याही चांगल्या परिचयाचे झाले होते. बाबीने पिले पाहण्याचा हट्ट धरला, तेव्हा तिला खांद्यावर उचलून तिने चिमणीचे घर दाखवले होते. पिले दिसली नाहीत. पण माझ्या मनगटी घड्याळाची टिकऽ टिकऽ कान लावून ऐकावी, तसे चिमण्यांच्या मुलांचे बारीक चिवचिवणे बाबीने कान देऊन ऐकले होते.

ती पोरे ओरडत नाहीत म्हणताच विमल म्हणाली, “ऊन फार आहे हो. झोपली असतील गप.”

“छे; गं, आज सबंध दिवसात मी त्यांचा आवाज ऐकला नाही. बघ तरी.”

विमल पायाशी स्टूल घेऊन वर चढली. वाकून पाहिले तरी चिमण्यांचे घर दिसेना. मी कॉटवर उठून बसून विचारीत होतो, “दिसतात का गं? आहेत?” लांबून पाहून दिसेना, तेव्हा विमलने हलक्या हाताने फळा उचलला आणि एकदम दचकून ती ओरडली, “अगं आई गं!”

“का गं, काय झालं? नाहीत पिलं?”

“आहे, ओंजळभर लाल मुंग्या लागल्यात इथं. मुंग्यांनी खाल्ली की हो बिचारी पोरं!”

मी गप्प झालो.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४१-४४.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा

कथा महाभारतातली आहे. उद्योगपर्वाच्या एकशे सहाव्या अध्यायात आलेली आहे. ती प्रक्षिप्त आहे का, हे मला माहीत नाही. त्याची जरुरीही मला वाटत नाही. महाभारत म्हणून या ग्रंथात जेवढे आणि जसे उपलब्ध आहे तेवढे आणि तसे निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेला मी व्यास असे नाव देते, इतकेच. ती कथा कुणा एका व्यासाने लिहिली असेल किंवा वेगळ्याच कुणी मागाहून ती महाभारतात मिसळून दिली असेल. त्या कथेतले सामाजिक वास्तव कदाचित् महाभारतकालीन असेल, कदाचित् पूर्वकालीन असेल आणि ते महाभारत-काळात किंवा भारतोत्तर काळात कुणी तरी कथाबद्ध करून भारतात घातले असेल किंवा कदाचित् ती उत्तरकालीन भरही असेल. ज्या कुणी ती कथा लिहिली त्याने एका सामाजिक वास्तवाची ठिणगी तिच्यात पकडली आहे, असे मात्र मला वाटते.

कथा आहे श्रीकृष्ण-शिष्टाईच्या वेळी कौरवसभेत सांगितली गेलेली. पांडवांना राज्य न देण्याचा आपला दुराग्रह दुर्योधन सोडीत नाही, असे पाहिल्यावर अनेक ज्येष्ठांनी त्याला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महर्षी नारदांनी त्याला वेड्या हट्टाचा परिणाम कसा भयंकर होतो, हे समजावण्यासाठी विश्वामित्रशिष्य गालवाची एक गोष्ट सांगितली. महाभारतकारांच्या लेखी ती माधवीची नव्हे, तर गालवाची गोष्ट आहे. नारदांच्या लेखीही ती गालवाचीच गोष्ट आहे. अर्थातच कथेचा गाभा गालवाने केलेल्या वेड्या हट्टाचा आहे, अतिरेकी आग्रहाचा आहे. माधवी तर कथालेखक आणि कथानिवेदक दोघांच्याही दृष्टीने नगण्य आहे.

काळोख आणि पाणी

गालव विश्वामित्राचा एकनिष्ठ शिष्य. गुरूच्या कठीण काळात त्याने गुरूची सेवा न कंटाळता, एकाग्रपणे केली. प्रसन्न होऊन विश्वामित्राने त्याला स्वगृही परतण्याची अनुज्ञा दिली; पण गुरुदक्षिणा दिल्यावाचून जाणे गालवाला बरे वाटेना. त्याने पुन्हा पुन्हा विश्वामित्राला आग्रह केला. प्रथम सौम्यपणे त्याला समजावणारा विश्वामित्र अखेर गालवाच्या अतिरेकी हट्टाने रागावला आणि त्याने मोठी विचित्र गुरुदक्षिणा मागितली : ज्यांचा एक कान काळा आहे, असे पांढरेशुभ्र आठशे घोडे !

गालव पडला गरीब ऋषिकुमार. असे दुर्मिळ प्रकारचे आठशे घोडे तो कुठून आणणार ? त्याला आपल्या हट्टाची शिक्षा फार महागात पडली. अगदी हतबल होऊन तो शोक करू लागला. एवढ्यात पक्षिराज गरुड तिथे आला. तो गालवाचा मित्र होता. त्याने गालवाची व्यथा ऐकली आणि घोडे किंवा ते मिळवण्याइतके द्रव्य कुणाकडून तरी मिळवून आणण्याचा उपाय त्याने गालवाला सुचवला. इतकेच नव्हे, तर तो स्वतः गालवाला घेऊन द्रव्यसंपादनासाठी निघाला.

इथे या कथेत गरुडाबरोबरच एका चिमुकल्या उपकथेचाही प्रवेश झाला, पण तिच्याबद्दलचे सारे नंतर ! गालवाला घेऊन गरुड निघाला तो नहुषपुत्र ययातीकडे आला. ययाती मोठा दानशूर आणि उदारचरित राजा. पण त्याच्याजवळ त्या प्रकारचे घोडे नव्हते अन् ते दुसरीकडून विकत घेण्यासाठी गालवाला धन द्यावे म्हटले, तर तेवढे धन त्याच्या कोषात नव्हते.

वस्तुस्थिती अशी होती, पण गालवासारख्या ब्राह्मणाला तसेच रिकाम्या हाती परत पाठवणे ययातीला पटेना. कारण अतिथीला विन्मुख पाठवणे हे शास्त्राने सर्वांत मोठे पाप मानलेले. तसे केले, तर वंशच्छेदाचे भय ! राजाने विचार करून गालवाला म्हटले, ‘माझ्याजवळ प्रत्यक्ष द्रव्य नाही, पण जिच्यामुळे तुला हवी ती गोष्ट मिळू शकेल अशी वस्तू मी तुला देतो.’

तत्तु दास्यामि यत्कार्यमिदं सम्पादयिष्यति |
अभिगम्य हताशो हि निवृत्तो दहते कुलम् ||

ती वस्तू खरोखरच इष्टफळ देणारी होती. तिचे नाव होते माधवी. ही माधवी म्हणजे ययातीची स्वतःचीच मुलगी होती. त्यामुळे तिच्यावर ययातीचाच पूर्ण अधिकार होता. शिवाय ती अल्पवयीन होती. तेव्हा ययातीला तिचे भाग्य ठरवण्याचा हक्कही होता आणि ते त्याचे कर्तव्यही होते. आणि पुन्हा माधवी ही अशी वस्तू होती की, जी बापाच्या कीर्तीत भरच घालील. वय लहान, तरी गुणी. स्वतःच्या आईबापांचे आणि नवऱ्याच्या आईबापांचे असे चार वंश कायम राखणारे मायपोट तिच्याजवळ होते. देवांनाही हेवा वाटावा असे सुलक्षणी वागणे होते अन् मनुष्यमात्रांना मोह घालणारे रूपही होते. हे सारे ज्या वस्तूत एकवटले आहे, तिच्या बदल्यात आठशे घोडेच काय, आख्खी साम्राज्ये सुद्धा गालवाला मिळू शकणार होती. नव्हे ययातीची– माधवीच्या बापाची तशी खात्रीच होती.

अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा राज्यमपि ध्रुवम् |
किं पुनः श्यामकर्णानां हयानां द्वे चतुश्शते ||

ययातीने गालवाला आपली मुलगी दिली. फक्त त्याने एक लहानशी अट घातली. त्याने म्हटले की, माधवीच्या ठायी होणाऱ्या पुत्रावर तो माझा वंशवर्धन, माझा नातू म्हणून माझा हक्क असावा. अन् ययातीचे हे मागणे अगदी योग्य होते. कारण पुत्र हाच तर वंशाचा दिवा. मुलगी झाली तरी वंश चालवण्यासाठी पुत्रच हवा. मुलीचे काम पुत्रोत्पत्तीचे. तिला खाऊपिऊ घातले, तिला वाढवली ती कशासाठी ? अतिथी विन्मुख गेला असता, तर वंशच्छेद झाला असता, पण रूपगुणसंपन्न माधवी होती म्हणून गालवाची सोय झाली. आता अतिथीने माझीही सोय पहावी, असे राजाला वाटले, तर गैर नव्हते. शिवाय त्यात गालवाचा काहीच तोटा नव्हता. माधवीच्या बदल्यात त्याला इष्ट वस्तू मिळाली, तर राजालाही इष्ट ते द्यायला त्याची हरकत ती काय असायची ?

अशा प्रकारे विनिमयाची योजना निश्चित करून ययाती आणि गालव दोघेही संतुष्ट झाले. अन् मग गालव माधवीला घेऊन निघाला. तो प्रथम गेला हर्यश्व राजाकडे. अयोध्येचा हा राजा मोठा संपन्न आणि समृद्ध राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते, एवढीच एक उणीव. गालवाने माधवीचा प्रस्ताव राजापुढे मांडला. माधवीला पाहून राजा अक्षरशः काममोहित झाला. ती होतीच तशी. जे अवयव उन्नत हवेत ते उन्नत, जे बारीक हवेत ते बारीक, जे आरक्त हवेत ते आरक्त अशी ती अप्रतिम देहसौंदर्याची खाण ! तिला भोगावे आणि तिच्या ठायी पुत्रोत्पत्ती करावी, म्हणून हर्यश्व उत्सुक बनला.

पण त्याच्याजवळ गालवाला पाहिजेत तसले घोडे मात्र दोनशेच होते. मग त्याने तोड काढली. माधवी त्याला पाहिजेच होती. त्याने म्हटले की, ‘निदान एक पुत्र जन्माला येईपर्यंत हिला माझ्याकडे ठेव आणि नंतर दुसऱ्याकडे घेऊन जा. उरलेले घोडे दुसऱ्याकडून मिळव !’

माधवीला स्वतःलाही ही योजना पटली, किंबहुना तिनेच ती स्पष्ट मांडली. तिचे लहान वय आणि तिला लाभलेले देहलावण्य पाहता हर्यश्वाकडे तिला ज्या गोष्टीसाठी आणले होते, त्या गोष्टीचे तीव्र आकर्षण कदाचित् तिच्या मनात जागे झाले असेल. कदाचित् कथेच्या निर्मात्याला माधवीचा रुकार आवश्यक वाटला असेल. ते काहीही असो, तिने रुकार दिला खरा. शिवाय प्रत्येक प्रसूतीनंतर पुन्हा कुमारी होण्याचा वरही तिला असल्याचे तिने सांगितले. हा वर केवढा उपयुक्त होता ! गालवाला त्यामुळे केवढा दिलासा मिळाला असेल ! कारण एकदा हर्यश्वाने वापरल्यानंतर इतर वस्तूंप्रमाणे माधवीचे मूल्य यत्किंचितही कमी होणार नव्हते ! अक्षत कुमारी भोगण्याची इतर राजांची स्वाभाविक इच्छा माधवीच्या बाबतीत नेहमीच पुरी होऊ शकणार होती !

माधवी हर्यश्वाजवळ राहिली. तिला वसू नावाचा एक मुलगाही झाला. ठरलेली मुदत पुरी होताच गालव तिथे आला आणि हर्यश्वाच्या संपत्तीचा किंवा आपल्या संततीचाही मुळीच लोभ न धरता, पुन्हा कुमारी बनून माधवी गालवाबरोबर निघाली. मग गालव तिला घेऊन दिवोदास राजाकडे आला. माधवीची बहुधा जरा काळजीच वाटत होती त्याला. तिच्या नाजुक शरीराला हे सारे कसे झेपणार, असे त्याला वाटत असेल आणि ती हर्यश्वात मनाने गुंतली असेल की काय, असेही पुसटसे वाटून गेले असेल. म्हणून त्याने माधवीला मोठ्या स्नेहाने म्हटले,

महावीर्यो महीपालः काशीनामीश्वरः प्रभुः |
दिवोदास इति ख्यातो भैमसेनिर्नराधिपः ||
शनैरागच्छ, मा शुचः |
धार्मिकः संयमे युक्तः सत्ये चैव जनेश्वरः ||
तत्र गच्छावहे भद्रे |

‘तू फार कोवळी आहेस. ये. हळूहळू जाऊ. अणि मी तुला भलत्या पुरुषाकडे नेत नाहीये. दिवोदास फार धार्मिक आणि संयमी म्हणून प्रसिद्ध आहे.’

दिवोदासाने माधवीची हकिकत पूर्वीच ऐकली होती. त्यामुळे त्याने गालवाचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. पण तोही हर्यश्वाप्रमाणे. दोनशे घोड्यांच्या बदल्यात आणि एका पुत्रोत्पत्तीपर्यंत. माधवीला प्रतर्दन नावाचा मुलगा झाला. तोवर ती दिवोदासाजवळ राहिली आणि पुन्हा एकदा त्याच्या वैभवाचा लोभ सोडून गालवाबरोबर निघाली.

भोजनगरीचा राजा उशीनर हा तिचा तिसरा मालक बनला. गालवाला आता अधिक ठिकाणी फिरण्याचा आणि अधिक काळ घालवण्याचा बहुधा कंटाळा आला. त्याने उशीनराला चारशे घोड्यांच्या बदल्यात, दोन पुत्रांच्या जन्मासाठी माधवी देऊ केली, पण उशीनराचा नाइलाज होता. त्याच्याजवळही तसले दोनशेच घोडे होते. मग उशीनरापासून माधवी शिबी नावाचा मुलगा (पुढे जो शिबी राजा म्हणून प्रख्यात झाला) प्रसवली आणि नंतर गालव सहाशे घोडे आणि माधवीला घेऊन पुढे निघाला. एवढ्यात त्याला गरुड भेटला अन् त्याने पृथ्वीच्या पाठीवर एक कान काळा असलेले शुभ्र घोडे फक्त सहाशेच आहेत, अशी माहिती गालवाला दिली. पण आता गालवाला फार चिंता करण्याचे कारण नव्हते. उरलेल्या दोनशे घोड्यांच्या बदल्यात माधवी काही काळ विश्वामित्राकडे राहू शकत होती. तोच उपाय गरुडाने गालवाला सुचवला. गालवाने तसेच केले.

विश्वामित्राने माधवीला पाहिले अन् तो चकित झाला.‘अरे, त्या सहाशे अश्वांसाठी एवढी वणवण कशाला केलीस ?’ तो गालवाला म्हणाला, ‘हिला जर पहिल्याने माझ्याकडेच आणले असतेस, तर मीच चार पुत्र होईपर्यंत हिला ठेवून घेतली असती. मलाही चार वंशवर्धक मुलगे मिळाले असते !’

पण गालवाच्या हातून गोष्ट तर घडून गेली होती. मग विश्वामित्राकडे माधवी राहिली. अष्टक नावाचा एक मुलगा तिला झाला आणि घोड्यांची किंमत ज्याची त्याने वसूल करून पुरी झाली. आता सर्वांची तृप्ती झाली होती. ज्यांनी ज्यांनी घोडे दिले, त्या तीनही राजांना काही काळ माधवीचा भोग मिळाला, शिवाय एकेक पुत्र मिळाला. विश्वामित्राला घोडे तर मिळालेच, शिवाय माधवीच्या उपभोगासह एक पुत्रही मिळाला.

मग गालवाने माधवी पुन्हा आणून तिच्या बापाच्या म्हणजे ययातीच्या स्वाधीन केली. त्याने माधवीची स्तुतीही केली. चार मुलग्यांना जन्म देऊन तिने आपल्या पित्याचे, तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करणाऱ्या चार पुरुषांचे आणि गालवाचेही तारण केले, असे त्याला वाटले, तर नवल नाही.

भलता हट्ट धरणाऱ्या गालवाला त्या एका हट्टापायी किती काळ, किती श्रम पडले, हे सांगण्यासाठी नारदांनी दुर्योधनाला ही गोष्ट सभेत सांगितली आणि तिचा उत्तरार्ध ‘रमणीय’ आणि ‘बोधप्रद’ असा होता, म्हणून तो पुढचा कथाभागही सहज ओघात सांगून टाकला.

पुढे काय झाले की, माधवीचे लग्न करायचे ययातीने ठरवले. चार जणांपासून तिला मुले झाली म्हणून काय झाले ? तिला पुन्हा अक्षत कुमारी होण्याचा वर नव्हता का ? मग माधवीला तिच्या भावांनी सजवलेल्या रथात बसवले अन् सारीकडे हिंडवले. पण माधवीला एकही राजपुरुष पती म्हणून नको होता. तिने ‘वन’ हाच आपला पती निवडला अन् वनवास स्वीकारला.

माधवी आनंदाने वनात तपश्चर्या करीत राहिली. पुढे तिचा बाप ययाती स्वर्गात गेला आणि तिथे अभिमानापायी आपला पुण्यक्षय करून बसला. त्याला स्वर्गातून पृथ्वीवर परतण्याची वेळ आली. तो खाली आला तो थेट माधवीपासून जन्मलेल्या त्याच्या चार नातवांच्या यज्ञधूमाच्या वाटेनेच. त्याची ओळख पटली, तेव्हा त्याच्या नातवांनी त्याला पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी आपले पुण्य देऊ केले. सहज म्हणून तिथे आलेल्या माधवीनेही आपले पुण्य दिले. गालवाने थोडासा हिस्सा दिला अन् ययाती पुनश्च स्वर्गात जाऊन सुखाने राहू शकला.

अशी ही माधवीची संपूर्ण गोष्ट. खरे म्हणजे माधवीकरिता ती सांगितली गेलेलीच नाही, हे जाणवले, तेव्हा मी प्रथम थोडी दुखले. मला वाटले की, कुंतीची जीवनकथा शेवटी तिचीच जीवनकथा आहे; द्रौपदीची आयुष्यकहाणी तिची म्हणूनच सांगितली गेली आहे; पण इथे या माधवीचा स्वतःच्या आयुष्यावर निदान गोष्टीपुरता देखील अधिकार नाही. ती गोष्ट शेवटी गालवाचीच आहे. स्त्रीला सहज साधेपणाने वस्तू म्हणून वापरणाऱ्या पुरुषजातीच्या प्रतिनिधीची आहे.

पण नंतर जसजशी कथा वाचत पुढे आले, तेव्हा ते पहिले दुखलेपण किती तरी क्षुल्लक ठरले. कथेतल्या माधवीचा श्वास हळूहळू माझ्या छातीत भरून येऊ लागला. तिचे गरम रक्त माझ्या धमनीतून वाहायला लागले आणि त्या सगळ्या घटना-प्रसंगांचा एक प्रचंड दाबच माझ्यावर आला. माधवीचे शरीर उपभोग्य वस्तू म्हणून वापरण्याच्या त्या सगळ्या व्यापारी उद्योगातला ओंगळपणा ज्या धर्माच्या आणि शास्त्राच्या नावाखाली चालला होता, त्या धर्मशास्त्राने तर मला अक्षरशः भिंतीशी दाबून, कोंडून धरावे तसे गुदमरून टाकले.

सुरुवातीला माझ्यात दाटून आला तो प्रचंड भावनिक क्षोभ ! तो माधवीच्या व्यक्तिगत दुःखाचा होता. अगदी अल्पवयीन अशी ती कोवळी सुंदर मुलगी ! तिला नुकते नुकते शरीराचे धर्म समजू लागले असतील. वासनांचे सुरेख ऐंद्रिय उमाळे तिच्यात नव्याने जन्मू लागले असतील. ती तशीच बापाच्या आज्ञेवरून कुणा अनोळखी ब्राह्मणामागून चालत एका राजपुरुषाच्या पुढ्यात उभी राहिली असणार. तिच्या इच्छा, तिच्या गरजा पुरत्या समजायच्या आतच तिच्या बापाने तिला खरेदी-विक्रीच्या व्यवहारातले चलन बनवले. तिला लग्न होईपर्यंत बापाचेच नशीब होते. बापाने ज्याच्या हाती दिले, त्याच्याबरोबर ती हर्यश्वाकडे आली. तिने हर्यश्वाकडे रहायला अनुकूलताही दर्शविली.

का बरं ? का नाही तिने त्या सौद्याला नाही म्हटले ? हे एरवी मी तीव्रपणे स्वतःशी उद्गारले असते; पण आता माझ्यातला माधवीभाव जेव्हा पुरेसा जागा झालेला होता, तेव्हा मला सहज जाणवू लागल्या कोवळ्या, नैसर्गिक आकर्षणाच्या छटा ! माधवीजवळ, त्या अनाघ्रात कुमारीजवळ असेल थोडे कुतूहल, थोडी उत्सुकता, थोडे आकर्षण ! किंवा नसेलही तसे काही. ती मुकी आणि अनभिज्ञही असेल, पण तिची संमती कथानिवेदकाला किंवा कथेच्या निर्मात्यालाच आवश्यक वाटली असेल. जशी प्रत्येक पुरुषाला त्याला हव्याशा असलेल्या शरीरभोगाच्या वेळी स्त्रीची अनुकूलता सदैव असायला हवी असते, तशी माधवीची अनुकूलता त्याने निर्माणही केली असेल.

किंवा मुळातली माधवी असेलही कुणी वनकन्या, एखाद्या भटक्या आदिवासी टोळीप्रमुखाची मुलगी, जिच्या जमातीत एका बाईला अनेकांनी वापरणे हे गैर मानले नसेल पुरुषांनी आणि सवयीने स्त्रियांनीही. कोण जाणे काय असेल, पण माधवी हर्यश्वाकडे राहिली. नंतर आणखी दोघांकडे आणि मग विश्वामित्राकडेही. तिच्या मनाच्या आणि शरीराच्या अवस्थेचा पुसट देखील उच्चार कथेने केलेला नाही. विश्वामित्राने विचित्र गुरुदक्षिणा मागितल्यावर खचून गेलेल्या गालवाचा शोक कथेत विस्ताराने वर्णन केला आहे, पण माधवीचे दुःख किंवा सुख सांगणारी एकही ओळ नाही. एकही शब्द नाही.

कदाचित् हर्यश्वाकडून निघालेली माधवी शरीराने थकली असेल. तिच्या अल्पवयीन शरीराला, प्रौढ राजाचा शृंगार सोसलाही नसेल. तिच्या मनात एक उदास दुःख भरून राहिले असेल. गालव तिला म्हणाला, ‘तू फार कोवळी आहेस. आपण हळूहळू चालू. तू दुःख करू नको. हा दुसरा दिवोदास फार चांगला आणि इंद्रियदमन करणारा आहे.’ म्हणजे काय ? माधवी समागमाच्या त्या पहिल्या अनुभवातून खचली असेल, चुरमडली असेल, असे मानायला मला इथे जागा सापडली आणि गालव-ययातीच्या जातीबद्दलचा तीव्र संताप मनात जन्मण्याआधीच माझ्यातली माधवी स्वतःविषयीच्या करुणेने भरून गेली.

ज्या ज्या राजांनी तिला वापरले, त्यांतल्या एकाही महाभागाचे मन तिच्यात गुंतले नाही आणि तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केल्यावाचून एकही जण राहिला नाही. अगदी विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षीही ह्या गोष्टीला अपवाद नाही.

तिचा बाप ययाती. त्याची थोरवी काय सांगावी ? त्याने आपल्या वंशच्छेदाच्या भीतीने, अतिथि-सत्काराच्या गरजेने सरळ माधवी दुसऱ्याला देऊन टाकली. तिचे मूल्य सांगून देऊन टाकली. शिवाय तिच्या वंशावर आपला हक्क सांगितला आणि पुढे त्याचा पुण्यक्षय झाल्यावर पुन्हा स्वर्गारूढ होण्यासाठी तो हक्क त्याला उपयोगीही पडला.

माधवीच्या आयुष्याचे मात्र काय झाले ? गालवाचे काम झाल्यावर ती चार मुलांची आई पुन्हा आपल्या बापाकडे परत आली. कुमारी म्हणून पुन्हा बापाने आणि भावांनी तिचे लग्न करून द्यायचा घाट घातला. पण तिच्याशी कोण लग्न करणार ? मला वाटते की, तिला शोधूनही नवरा मिळाला नसेल आणि तिला भावांनी वनात सोडून दिले असेल. किंवा तिलाच पुरुषजातीचा एवढा वीट आला असेल की, तिने स्वतःच वनवासाचा आग्रह धरला असेल किंवा ती वनकन्याच असेल अन् आपल्या जमातीत परतली असेल.

कोण जाणे काय असेल ! उदास आणि विरक्त होऊन जाण्याइतके भयानक तिने भोगलेच होते, हे तर नक्की. माधवीचे हे व्यक्तिगत दुःख माझ्या मनात माझे होऊनच जिवंत झाले, तेव्हा मला माझ्या स्त्रीत्वाची लाजच बाजारात उघड्यावर मांडली गेल्यासारखे वाटले. मला वाटले की, काळाच्या ओघात बाईमाणूस कितीही पुढे जगत आले, तरी हे दुःख जराही कमी व्हायचे नाही. तसेच जळते राहील. संस्कृतीच्या हृदयात ठिणगीसारखे राहूनच जाईल. माझी करुणा अशी स्वतःविषयीची होती. ज्या सामाजिक वास्तवाने बाईला वस्तूपण दिले, त्या पुरुष- प्रभावी वास्तवाविषयीही होती.

- oOo -

पुस्तक: काळोख आणि पाणी.
लेखक: अरुणा ढेरे.
प्रकाशक: सुरेश एजन्सी.
आवृत्ती पहिली.
वर्ष: नोव्हेंबर १९९१.
पृ. १२६-१३३.

---

पोस्टकर्त्याची टीप:
खुद्द वडिलांनी, एका ब्राह्मणकुमाराने, क्षत्रिय राजांनी, एवढेच नव्हे तर विश्वामित्रासारख्या सृष्टिनिर्मात्या ऋषीनेही जिच्याकडे एक क्रयवस्तू, एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले त्या माधवीच्या विदीर्ण आयुष्याने, तिच्या वेदनेने प्रसिद्ध हिन्दी कवी चन्द्रप्रकाश गोयल यांना विलक्षण व्यथित केले. त्या असंवेदनशील, शोषक पुरुषांच्या जातीत जन्मल्याची अपराधभावना घेऊन त्यांनी माधवीप्रती आपली क्षमायाचना ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्यातून रुजू केली आहे. इतके विलक्षण संवेदनशील काव्य अर्वाचीन काळात रचले गेले नसावे. माझ्या मते त्याला अर्वाचीन महाकाव्याचा दर्जा द्यायला हवा. आपल्या सुदैवाने प्रसिद्ध मराठी कवयित्री आसावरी काकडे यांनी ‘बोल माधवी’ या शीर्षकाखाली ते मराठीमध्ये आणले आहे. तो अनुवादही अतिशय तरल नि यथातथ्य उतरलेला आहे. त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

संबंधित लेखन: आपलं आपलं दु:ख


हे वाचले का?

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

चिमण्या - २ : दुरावा

<< या सदराच्या निमित्ताने...
<< मागील भाग: चिमण्या - १ : सहजीवन
---

यावेळी मी इरेला पेटलो होतो. वेड लागले तरी बेहत्तर पण एकाही चिमणीला मी घरात येऊ देणार नव्हतो. वेड लागणार नाही तर आणखी काय होईल ? चिमण्यांवर पाळत ठेवण्याचे काम म्हणजे साधे प्रकरण नाही. आतापर्यंत मी त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. कारण स्पष्ट आहे– त्यांच्यासंबंधीच्या मला बिलगून असलेल्या काव्यमय कल्पनांमुळे. परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा वळविला तो थेट माझ्या ऑईलपेन्टवाल्या फोटोकडेच.

मुख्य म्हणजे हा माझा फोटो मला अती प्रिय आहे. क्षणाक्षणाला चिमणा-चिमणीचा जोडीने प्रवेश, सोबत प्रतिसाद देणाऱ्या चार-दोन सोबतिणी, शिवाय जिवाला पिसाळून टाकणारा त्यांचा चिवचिवाट तो वेगळाच ! गवताच्या काड्या, कापसाचे लहान-मोठे तंतू, कागदाचे कपटे आदींचा नाजुक प्रपंच त्यांनी माझ्या डोक्यावर थाटायला सुरुवात केली होती. आतापावेतो माझी पुस्तके, बाहुल्या, फ्लॉवरपॉट्स आदींचाच त्यांनी उपयोग केला होता. म्हणून त्यांचा उपद्रव मी लक्षातच घेतला नव्हता. पण आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्याविरुद्ध कट केल्याप्रमाणे वाटत होता! ऑईलपेन्टवाल्या फोटोच्या संदर्भात मला तटस्थ राहणे अशक्य होते.

चर्चबेल

प्रथम मी दारे, खिडक्या बंद करून बसलो. फक्त तावदानांवर त्यांच्या चोचींचे आवाज उमटू लागले. त्यानेही मी अस्वस्थ झालो. शिवाय दारे-खिडक्या बंद केल्याने गुदमरल्यासारखे वाटू लागले, मग मी व्हेन्टिलेटर्स उघडले. आमच्या घराचे व्हेन्टिलेटर्स थेट व्हिक्टोरियन एजमधील आहेत. लँडलॉर्ड लंडनला वगैरे जाऊन आले म्हणून घराची ही शोभा ! थोड्याच वेळात अगदी माझ्या नाकासमोरून एक चिमणी सुर्रदिशी उडून गेली. पंखांच्या फडफडीतून गळलेले धुळीचे कण माझ्या सर्वांगावर, आणि नाकाला झोंबलेली दुर्गंधी यामुळे मी कासावीस झालो. एक निळ्या रंगाचा कापडाचा तुकडा तिने आपल्या नवीन घरट्यात– म्हणजेच माझ्या डोक्यावर ठेवून दिला. आता काय करावे ?

पुन्हा दारे- खिडक्या उघडल्या आणि हातात काठी घेऊन त्यांच्या पाळतीवर बसलो. त्या येताना दिसल्या की, मी काठी फिरवून त्यांना पिटाळून लावीत असे. कंटाळा आला. असे किती वेळ करणार ? मग फोटोवरील त्यांचे घरकुलच निपटून काढले. बाहेर चिमण्यांचा आक्रोश ऐकू येत होता. त्या दिवशी पुन्हा मात्र त्या माझ्या फोटोकडे फिरकल्या नाहीत. मीही निश्चिंत झालो.

संध्याकाळी बाळू वैद्य आला. त्याचे आयुष्य लष्करात संपलेले. चिमण्यांच्या उपद्रवाची कथा मी त्याला निवेदन केली. ‘अगदी मी सुद्धा त्यांच्या त्रासाने हैराण झालो होतो !’ बाळू म्हणाला. ‘मग काय केले म्हणतोस ?’ ‘एअर गन वेऊन दारात बसलो. दहा-पाच चिमण्या खलास केल्या. पुढच्यांची आवक थांबली.’ बाळूच्या पराक्रमाने मी शहारलो. हे म्हणजे, चिमण्यांचा खून वगैरे फारच होते!

दुसर्‍या दिवशी पहाटेपासूनच चिमण्यांनी मोडलेले घरकुल बांधण्याचा परिपाठ सुरू केला. आता यांची कशी सोय लावावी या विवंचनेत मला चटकन एक गोष्ट आठवली. चिमण्यांची घरटी उपटून अंगणात जाळली म्हणजे पुन्हा त्या वास्तूत त्या येतच नाहीत. एवढा साधा उपाय आपल्याला ठाऊक असूनही नेमक्या वेळी आठवला नाही, म्हणून मी स्वतःवरच चरफडलो. ऐन दुपारी त्यांनी अर्धवट रचलेले घरटे मी उपटून काढले आणि खुशाल अंगणात आणून पेटवून दिले; ओंजळभर वाळलेले गवत जळायला कितीसा वेळ लागणार ?

दुसऱ्या दिवशी एकही चिमणी घरात नाही. एका जीवघेण्या कटकटीतून मुक्त झाल्याचा आनंद मला झाला. थोड्या वेळाने मात्र मीच परत अस्वस्थ होत असल्याची मला जाणीव होऊ लागली. चिमण्या अंगणात नाहीत ? घरात नाहीत ? म्हणजे काय ? तेवढ्यात कुत्र्याच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी चरकलो. त्यांचे घरकुल आपण पेटवून दिले म्हणून आपल्यावर त्यांनी बहिष्कार तर टाकला नाही ना ? माणसांनी टाकलेले बहिष्कार मी समजू शकतो. मी ते पचविलेही आहेत. परंतु चिमण्यांनी टाकलेला बहिष्कार पान खाऊन तोंडावर थुंकण्यासारखा मला वाटला ! माणसांच्या संस्कृतीत निर्दयतेचेही पश्चात्तापाने, नव्हे क्षमा केल्याने परिमार्जन होऊ शकते. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जीवनक्रमात अशी एखादी सोय नसेल काय ? संतापाच्या भरात गवताच्या निर्जीव काड्या पेटविताना मला काहीच वाटले नाही. घर उद्ध्वस्त केल्याची, जाळल्याची कल्पना मात्र आता माझा पाठलाग करू लागली. काडीकाडीने रचलेले घरटे जाळून टाकणे आणि एअरगनने चिमण्यांचे खून पाडणे यातल्या क्रौर्यातील भेदाची सीमारेषाच मला दिसेना !

अजूनही झोपेच्या वेळी छोट्या मंडळींना चिऊ-काऊची गोष्ट सांगताना माझे शब्द निसरडे होतात. माझ्यातल्यां विसंगतीने मला कुरतडायला सुरुवात केली.

माझ्या अंगणात
चिमण्यांची किलबिल
हळू पाय टाका
भुर्रऽ उडुनी जातील

इथे माझ्या गळ्याला कोरड पडली. पायाच्या आवाजाने उडून जाणारे पक्षी; नव्हे बालगोपालांच्या किलबिलाटाने उसळणाऱ्या एका घराचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यांवर तरंगू लागले; आणि मी चिमण्यांच्या घराला आग लावली होती !!

‘धानाइसाशी कवडा’ खेळणाऱ्या चक्रधरांची कथुली मला आठवली. त्याच वंशातील एका घरकुलाची मी वाताहत लावली होती! समोर औदुंबर दिसत होता. त्याच्या कानात वाऱ्याने गुणगुणलेल्या ओळी मला इथे मोठ्याने ऐक येऊ लागल्या–

तृण कोटरात
चिमण्यांची शाळा
घेउनि निजला
औदुंबर...

चिमण्यांनी आपल्या अंगणात, आपल्या घरात यायलाच पाहिजे ! त्यांचा बहिष्कार ? कल्पनाच असह्य होती. मी हातात मूठभर तांदूळ घेऊन अंगणात टाकले; पण शुकशुकाट; एकही चिमणी नाही. कमालीचा अस्वस्थ झालो. त्यांना घरटी बांधायला सुलभ जावे म्हणून माझ्या फोटोवर खर्ड्याचा एक डबाही ठेवून पाहिला. चिमण्या नाहीत! याच महापुरुषाने आपले घरटे उद्ध्वस्त केले हे कदाचित त्या विसरल्या नसतील म्हणून माझा फोटोच मी तिथून हलविला. कुठून तरी चिवचिव आवाज आला. साऱ्या शक्ती एकवटून मी उभा राहिलो. एक अनोळखी चिमणी माझ्या दारात उभी होती. क्षणभरच– आणि चिमण्यांचा एक कळप झंझावातासारखा आला व तिलाही आपल्यात गुंडाळून माझ्या– हो, माझ्याच दारावरून उडून गेला.

-oOo -

पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ५-८.

---

पुढील भाग >> चिमण्या - ३ : निरोप     


हे वाचले का?

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

बेकी म्हणे...

मला माझ्यासारख्याच विक्षिप्तांबद्दल नेहमीच कुतूहल असते. मग ‘बिग बँग थिअरी’ बघताना मी स्वत:ला शेल्डन कूपरशी रिलेट करुन मी ही त्याच्यासारखाच बुद्धिमान असल्याचा समज करुन घेतो. किंवा ‘डॉक मार्टिन’मधल्या डॉ. मार्टिन इलिंगहॅमसारखा मी ही ‘ill mannered’ असलो तरी ‘well meaning' माणूस असल्याचा ग्रह करून घेतो. आपल्यासारखी काही गुणवैशिष्ट्ये दाखवणार्‍या व्यक्तींचे इतर गुणही आपल्यात आहेत हा –सोयीचा– भ्रम फारच सार्वत्रिक आहे. एखाद्या गटाशी जोडून घेत त्या गटाच्या गुणांचे क्रेडिट अनायासे पदरी पाडून घेणारेच बहुसंख्य असतात. पण ते जाऊ दे.

चित्रपट, मालिका वगैरे पाहताना विषय, मांडणी, आकलनाला वाव आणि अखेर पदरी काय पडेल (What will I take home?) या विचाराने मी निवड करत असतो. एकाच धाटणीचे– गणिती भाषेत मांडून पाहिले तर काही पूर्वसुरींचे अवतार, पुनर्मांडणी सदृश दिसत असतील अशांवर मी फुली मारत असतो. शेक्स्पीअरच्या कुठल्याशा नाटकातील पात्रांची नावे घेत पुन्हा अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्ष मांडून पैसा वसूल करणार्‍यांची चलाखी मी साफ उधळून लावतो, तसंच केवळ तेच ते कंबरेखालचे विनोद विकून पैसे कमवू पाहणार्‍या इंग्रजी मालिकांनाही मी झटकून टाकतो. ‘करमणूक म्हणून जर काही पाहात असू तर त्यात पुन्हा डोक्याला ताप का करा’ म्हणत थ्रिलर हा प्रकारही मी बाजूला ठेवतो. करमणूक म्हणूनच काही पाहायचे असेल तर, त्यांनी मेंदूत काही जागा व्यापू नये, बाकी शून्यच राहावी म्हणून काही वेळा ज्यांना ‘फील गुड’ म्हणतात अशा काही मालिका वा चित्रपटांची निवड करतो. मेंदूत असलेल्या गुंत्यामध्ये भर पडून आपल्या विचारांचे विषय भरकटू नयेत असा हेतू यामागे असतो. पण गंमत अशी की अशा केवळ करमणुकीतूनही काही तरी डोक्यात रुजून जाते... पण सजगपणे पाहिले तरच.

सुरुवातीलाच उल्लेख केलेली ‘डॉक मार्टिन’ ही तशीच एक मालिका. डॉ. मार्टिन इलिंगहॅम हा एक निष्णात हृदयरोग तज्ज्ञ आहे. लंडनसारख्या महानगरामध्ये एका प्रथितयश रुग्णालयाचा तो आधारस्तंभ आहे. आपल्या विषयाशी केवळ प्रामाणिकच नव्हे तर त्यातील अक्षरश: किडा म्हणावा असा हा डॉक्टर. अगदी लहान-लहान लक्षणांवरून बिनचूक निदान– अनेकदा तर आजाराचा त्रास होण्यापूर्वी, आगाऊच (आणि अनेकदा आगाऊपणेही) करताना दिसतो. सारे आयुष्य त्याचसाठी समर्पित राखलेले असल्याने मार्टिन इतरांशी जेवढ्यास तेवढा संपर्क राखणारा आहे. त्यातच आडपडदा न ठेवता, आडवळणे न घेता, समोरच्या व्यक्तीच्या संभाव्य प्रतिक्रियेचा, मान-अपमानाचा विचारही न करता रोकठोक आणि मोजके बोलणारा हा डॉक्टर साहजिकच माणूसघाणा म्हणून प्रसिद्ध असतो.

एका उपचारादरम्यान आलेल्या अनुभवातून या प्रथितयश सर्जनला चक्क ‘रक्तगंड’ (hemophobia) होतो– रक्त पाहिले की त्याला उलटी होऊ लागते. असे विपरीत घडल्याने त्याचे सर्जन म्हणून स्थान अर्थातच धोक्यात येते. त्या मनोगंडावर उपचार असा नाहीच. त्याला सामोरे जात, हळू-हळू पुन्हा एकवार रक्ताशी जुळवून घेणे हाच एक मार्ग आहे. परंतु हा दीर्घकालीन उपाय आहे. आणि तो यशस्वी होत नाही तोवर त्याला पर्यायी व्यवसायाची निवड करण्याशिवाय गत्यंतर नाही.

आता ज्याला वैद्यकीय ज्ञानापलिकडे काही फारसे ज्ञात नाही, इतर कशांतही त्याला रस नाही, अशा व्यक्तीला पर्यायी व्यवसाय करणे जवळजवळ अशक्यच. मग वैद्यकीय क्षेत्रातच पण रक्ताचा थेट संपर्क येणार नाही म्हणून साधा बाह्योपचार तज्ज्ञ (physician) म्हणून काम करण्याचा निर्णय तो घेतो. आता ‘जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणे’ अवघड असल्याने तो तूर्त लंडनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. यात आपली ही समस्या आपले कार्यक्षेत्र असलेल्या लंडनमध्ये याची फारशी प्रसिद्ध होऊ नये– जेणेकरून या मानसिक आजारातून बाहेर आल्यानंतर परतून येण्यास सोपे जावे, हा हेतूही असतो. लंडनसारख्या अफाट विस्ताराच्या महानगरातून तो थेट ज्या गावातील संपूर्ण वैद्यकीय जबाबदारी एकच डॉक्टर शिरी वाहातो अशा एका लहानशा गावात येऊन पोहोचतो.

पोर्ट वेन (Port Wenn) हे समुद्रकिनार्‍याजवळ डोंगरउतारावर वसलेले लहानसे निसर्गरम्य गाव. मार्टिनच्या आत्येचा तिथे लहानसा मळा आहे. त्या निसर्गरम्य परिसरात त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित होतील आणि आत्येची सोबत असल्याने अगदीच अपरिचित वाटणार नाही असा त्याचा होरा असतो. विशेष म्हणजे तेथील औषधोपचार केंद्राचा उल्लेख ‘सर्जरी’(१) असाच होत राहतो. मार्टिन हा ‘माजी सर्जन’ ते केंद्र सांभाळू लागतो. महानगरी व्यवस्थेच्या तुलनेत सर्वस्वी भिन्न, अधिक घट्ट अशा त्या समाजव्यवस्थेमध्ये सामावण्यास त्याला नि तेथील लोकांना येणार्‍या अडचणींतून मार्ग काढत, कोणतेही भावनिक बंध न जोडता (अपवाद एकच– पण तो ही तुम्हा-आम्हा बॉलिवुडी संस्कारात वाढलेल्यांच्या दृष्टीने अगदीच अन-रोमँटिकच म्हणावा असा) हा डॉक्टर हळूहळू त्या समाजाचा अविभाज्य भाग होऊन जातो. त्याचे वादातीत निदान-कौशल्य, तसंच व्यवसाय व सामाजिक बांधिलकीचे विविध प्रसंग मांडत ही मालिका पुढे सरकत जाते.

या मालिकेतील एक भाग– खरंतर त्यातील एक पात्र नि तिच्या संदर्भातील घटनाक्रम मात्र नको नको म्हणता माझ्या डोक्यात बस्तान बसवून आहे. माझ्या अंदाजाने याला आपल्याकडील सद्यस्थिती नि त्यातून मलाही आलेले काही अनुभवही कारणीभूत असावेत.

बेकी वीड(२) ही दहा-एक वर्षांची शाळकरी मुलगी. तिचे पोट बिघडले आहे. म्हणून तिची आई मार्टिनकडे घेऊन आली आहे. डॉक्टर प्राथमिक चौकशी करू लागतो. पोटदुखी सुरु होण्याच्या आदल्या रात्री तेथील एका छोट्या रेस्तरांमध्ये आपण चिकन खाल्ल्याचे सांगून ती विचारते, ‘त्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तर पोट दुखत नसेल?’ ‘ती शक्यता आहेच.’ मितभाषी असलेला मार्टिन उत्तर देतो. आपल्या अनारोग्याचे आपणच अचूक निदान केल्याच्या समाधानात बेकी त्यापुढे मार्टिन काय सांगतो वा विचारतो आहे याकडे फारसे लक्ष देत नाही. तिच्या दृष्टीने निवाडा झालेला आहे.

ही बेकी तिच्या शाळेतर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या शाला-पत्रकाची संपादिका आहे. मुलांना लेखनासाठी उद्युक्त करावे, त्यांच्या त्या कौशल्याला वळण लावावे या हेतूने हे छोटेखानी वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात असते. यात मुलांनी आपल्या भवतालाच्या, अनुभवाच्या, आकलनाच्या आधारे लिहावे आणि त्यांच्या त्या लेखनावर एखाद्या शिक्षकाने, मुख्याध्यापकाने सूचना करून ते अधिकाधिक चांगले होईल या दृष्टीने मुलांना प्रोत्साहन दिले जात असते. नुकत्याच आलेल्या अनुभवाच्या आधारे आणि तिने स्वत:च केलेले– आणि तिच्या मते मार्टिनने मान्य केलेले – निदान जमेस धरून ती त्या रेस्तरांच्या दर्जाबद्दल कडाडून टीका करणारा एक लेख झोकात लिहून टाकते.

पण ज्यांनी बेकीचा लेख वाचून त्याबाबत सूचना कराव्यात नि नंतर त्याच्या छपाईला परवानगी देणे अपेक्षित असते त्या मुख्याध्यापिकाबाईंना त्या दिवशी वृत्तपत्राचा तो अंक तपासून पाहायला वेळ मिळत नाही. इतका जोरदार लेख लिहिल्याने केव्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवू म्हणून उतावीळ झालेल्या बेकीबाई त्वेषाने स्वत:च तो अंक छापून गांवभर वाटूनही टाकतात. त्या लेखामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत तो रेस्तरांवाला मुख्याध्यापिकेचे डोके खाऊ लागतो.

गावात डॉक्टर एकच असला तरी रेस्तरां अथवा खाद्यगृहांचे एकाहुन अधिक पर्याय उपलब्ध होते. विषबाधा हा शब्द वाचून शब्दश: ‘विषाची परीक्षा का घ्या’ असा विचार करून गावकरी तिकडे फिरकेनासे झाले, तर रेस्तरांच्या व्यवसायावर तिच्या त्या तथाकथित विषबाधेच्या बातमीचा अनिष्ट परिणाम होणार होता. मुळातच मूठभर लोकसंख्या असलेल्या गावातील ते रेस्तरां बंद पडण्याची शक्यता होती. याची जाणीव बेकीची मुख्याध्यापिका तिला करून देते, तेव्हा उद्धटपणे ‘मग बरंच होईल की.’ म्हणून ती चालती होते. पुढे मार्टिनवर तिने केलेला उद्धटपणाचा आरोप ऐवजी तिलाच अधिक लागू पडताना दिसतो.

दरम्यान इकडे बेकीच्या स्टूल-टेस्टचा रिपोर्ट येतो. ज्यातून अन्नातून विषबाधा नव्हे तर तिला अल्सरचा त्रास असल्याने निष्पन्न होते. हे ऐकल्यावर बेकी उखडून ‘पण तूच म्हणालास की मला विषबाधा झाल्याने पोट दुखते आहे.’ त्यावर आपल्या मितभाषी नि रोकठोक भाषेत मार्टिन म्हणतो, “मी ‘शक्य आहे’ म्हणालो होतो. शक्यता(possibility) म्हणजे निदान(diagnosis) सोडा, संभाव्यताही (probability) नव्हे.” यानंतर तिच्या आईकडे वळून तो म्हणतो, “या तीन मधील फरक (निदान) तुम्हाला समजत असावा.” दुसर्‍या दिवशी बेकी ‘मार्टिन हा अत्यंत उद्धट असून डॉक्टर म्हणून त्याची निदाने बहुतेक वेळा अर्धवट माहितीवर केलेली असतात.’ वगैरे जोरदार टीका करणारा लेख लिहून टाकते.

मार्टिनचा वैयक्तिक स्वभाव कसाही असला तरी त्याचे निदानकौशल्य वादातीत असल्याचा अनुभव एव्हाना बहुतेक गावकर्‍यांना आलेला असल्याने या टीकेने मार्टिनचे फार काही बिघडण्याजोगे नाही. एरवीही इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर दहा वर्षांच्या मुलीचे मत मोठ्यांकडून फारसे गांभीर्याने घेतले जाणारही नसते. त्यामुळे मार्टिनच्या दृष्टीने तो लेख वा टीका अदखलपात्र असते. त्याबाबत त्याच्या स्वभावानुसार तो एका शद्बात प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. त्याच्या बाजूने विचार केला तर हाच लेख एखाद्या प्रतिष्ठित बातमीदार/पत्रकाराने लिहिला असता तरी आपल्या स्वभावानुसार त्याने त्याला फारशी किंमत दिली नसती.

या घटनाक्रमाला अनेक कंगोरे आहेत. त्यात लहान लहान आरसे दिसतात ज्यामध्ये मला माझ्या आसपासच्या परिस्थितीचे, व्यक्तींचे, समाजघटकांचे प्रतिबिंब दिसते. या सार्‍या घटनाक्रमाचे केंद्र असणारी बेकी माझ्या आसपासच्या ‘गुगलपंडित’ जनतेचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटते. लक्षणांच्या आधारे गुगल करून आपल्या आरोग्याच्या समस्येचे निदान स्वत:च करणार्‍या, त्या आधारे तज्ज्ञांच्या आकलन/निदानाला आव्हान देणार्‍या, भवतालच्या परिस्थितीच्या आकलनासाठी तज्ज्ञांच्या कुवतीपेक्षा ‘चार लोक काय म्हणतात’ याला अधिक महत्त्व देणार्‍या, तज्ज्ञांच्या कुवतीवर बेदरकारपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या, नव्हे त्यांचा थेट निवाडाच करून टाकणार्‍या समाजगटाचे.

मार्टिन हा स्वत:मध्ये गुरफटलेला तज्ज्ञ आहे. त्याचे ज्ञान नि निदान बहुतेक वेळा बिनचूक ठरत असले, तरी त्याचा अहंगंड त्याच्यामध्ये नाही. परंतु तो नम्रही नाही. ‘आपण डॉक्टर आहोत, तेव्हा निदान नि उपचार हे आपले काम नि जबाबदारी आहे; तर रुग्णांनी आपण सांगू त्यानुसार कृती करणे नि त्यामार्फतच आपल्या अनारोग्यातून बाहेर येणे अपेक्षित आहे.’ हे गृहित धरून त्यानुसार तो रोकठोक वागतो आहे. लंडनसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात एक प्रथितयश सर्जन म्हणून काम करत असताना, त्याच्या भवतालचा वेगवान आयुष्य जगणारा महानगरी समाज, त्याचे स्वत:चे सामाजिक स्थान आणि त्याचे कार्यबाहुल्य या तीनही गोष्टींचा विचार करता ही त्याची प्रवृत्ती त्या परिसंस्थेमध्ये उपयुक्तच ठरत होती.

परंतु समुद्रकिनार्‍यावरचे, डोंगर उतारावरचे ते लहानसे गाव नि लंडनसारखे महानगर यांतील समाजजीवन सर्वस्वी वेगळे आहे. मोजक्या लोकसंख्येच्या त्या गावात नवीन व्यक्ती अवतीर्ण झाली आली आहे याचे अप्रूप असते. मग तिच्याशी संवाद साधणे, तिला समजून घेणे, जमल्यास आपलेसे करणे हा तेथील लोकांसाठी अंगवळणी पडलेला भाग आहे. साहजिकच ‘नवा डॉक्टर आहे तरी कसा’ याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे. पण हा डॉक्टर काम सोडून चार लोकांत मिसळत नाही हे लगेचच ध्यानात येते. मग त्याला भेटण्यासाठी कोणताही आजार नसूनही आजारपणाची बतावणी करत त्याच्या आरोग्यकेंद्रावर हजेरी लावण्याची चढाओढ सुरू होते. तपासणीच्या निमित्ताने शिरकाव करून घेत हळूहळू त्याच्याशी संवाद वाढवता येईल असा लोकांचा समज असतो. पण रोकठोक स्वभावाचा हा डॉक्टर सरळ, ‘तुला काही धाड भरलेली नाही. उगाच माझा वेळ वाया घालवू नकोस.’ म्हणून त्यांना बाहेर काढतो.

पण अशा रोकठोकपणाला अहंकार समजण्याची प्रवृत्ती बहुसंख्य सामान्य समजुतीच्या माणसांची असते हे मार्टिनच्या गावीच नाही. रुग्णांच्या आरोग्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन त्याबाबत विस्ताराने त्यांना समजावावे, गैरसमजांपासून परावृत्त करण्यावर थोडा वेळ खर्च करायला हवा हे त्याला ठाऊक नाही. त्याच्याबाबतचा गैरसमज नि लंडन नि ते गाव यांतील समाजरचनेतील फरकाबाबत त्याचे अज्ञान वा बेफिकीरी यांतून बेकीसारख्या स्वत:च्या आकलनाबद्दल फाजील आत्मविश्वास असणार्‍यांना त्याच्यावर टीका करण्यास वाव मिळत जातो.

नुकतेच व्यवस्थित बोलू लागलेले, स्वत:च्या हाताने खाणे खाऊ लागलेले मूल त्या नि त्यासारख्या इतर स्वावलंबी कृतींबाबत पालकांकडून, मोठ्यांकडून कौतुक मिळवू लागले, की त्याला आपण आपल्या पालकांप्रमाणेच सर्वस्वी स्वावलंबी झाल्याचे– हल्लीच्या पिल्लांच्या भाषेत ‘बिग’ झाल्यासारखे वाटू लागते. मग त्याच्या शारीर वा कौशल्याधारित कुवतीला न झेपणारे कामही त्याला स्वत: करून आई-वडिलांकडून प्रशंसा पदरी पाडून घ्यायची असते. ‘मी करतो/करते’ असे म्हणून मदत करू पाहणार्‍या आई-वडिलांना ते धुडकावून लावू लागते.

असाच एक टप्पा असतो तो पौगंडावस्थेचा. या वयात मुलांना आता ‘आपल्याला जगण्यातले आवश्यक ते बहुतेक सारे समजू लागले आहे’ असा गंड निर्माण होऊ लागतो. मग दुराग्रहाने मोठ्यांच्या सल्ल्याच्या विपरीत कृती करण्याची ऊर्मी निर्माण होते. मनुष्यप्राण्याच्या जीवनातील बंडखोर प्रवृत्ती विकसित होण्याचा हा काळ असतो. बेकी या पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे तिच्या ठायी ती बंडखोरी उमलून येऊ लागलेली आहे.

त्या इटुकल्या शालापत्रकाची पत्रकार/लेखिका म्हणून मिळालेली ती लहानशी सत्ता तिच्या त्या वयातील बेदरकार वृत्तीला खतपाणी घालते आहे. आपली समज चूक असू शकेल अशी शंकाही न घेता ती दणादण निवाडे लिहून मोकळी होते आहे. यातून रेस्तरांची, डॉक्टरची चार जणांतील पत घसरेल का? त्यातून गावांतील एकमेव डॉक्टरबाबत अविश्वास निर्माण होऊन लोक त्याच्याकडे जाणे टाळू लागतील का? त्यातून आरोग्याचे प्रश्न बळावतील का? असा विचारही तिला करावासा वाटत नाही. आपल्याला चार वाक्ये लिहिता येतात नि ती छापण्याचे माध्यम आपल्या हाती आहे म्हणजे कुणाचेही मूल्यमापन करण्याची कुवतही आपल्याकडे आहे असा तिचा भ्रम आहे.

मी बेकीकडे पाहतो तेव्हा मला समाजमाध्यमांवर बेदरकारपणे व्यक्त होणारी माणसांची आठवण होते; तसंच हाती इंटरनेट आहे म्हणजे निव्वळ लक्षणांवरून आपण आपल्या अनारोग्याची कारणमीमांसा वा निदान स्वत:च करू शकतो असे समजणार्‍या ‘गुगलवैद्यां’ची. इतकेच नव्हे, तर केवळ एखादे माध्यम हाती आहे म्हणजे त्यामार्फत ‘आपण म्हणू तेच वास्तव’ हे सिद्ध करण्याचा मुजोरपणा करणारी भारतीय माध्यमे - प्रामुख्याने चॅनेलमाध्यमे - आठवतात. फार कशाला, बेकीच्या शाळेतील त्या शालापत्रकाइतक्याच इटुकल्या स्वयं-संचालित संस्थळ-माध्यमांवर दणादण लेख लिहून आपल्या पूर्वग्रह, आकस, ईर्षा यांचा प्रसार करणारे स्वयंघोषित गल्ली-पत्रकारही आठवतात.

बेकी अपरिपक्व वयातील असल्याने आपल्याकडे असलेल्या माहितीमध्ये तिला ज्ञानाचा, आकलनाचा भास होतो आहे. भारतीय माध्यमांमध्ये मात्र परिपक्व बुद्धीची माणसे असूनही, वास्तवाचे नेमके आकलन होण्यासाठी पुरेशी यंत्रणा सोबत असूनही, ते हेतुत: छद्मवास्तवाचा प्रचार-प्रसार करताना दिसतात. रेस्तरांबद्दल अथवा मार्टिनवर टीका करताना वैयक्तिक अनुभवातून आलेला निखळ राग एवढी एकच प्रेरणा बेकीकडे आहे. माध्यमे मात्र चोख स्वार्थ, आर्थिक-राजकीय बलवंतांसमोरील लाचारी अशा विविध प्रेरणांमुळे विशिष्टांच्या चारित्र्यहननाच्या सुपार्‍या घेताना दिसतात.

बेकी दहा वर्षांची आहे. साहजिकच वय वाढेल तशी अनुभव नि वैचारिक प्रगतीच्या वाटे जात तिची समज सुधारण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे म्हणतो आहे! पण पुन्हा... संभाव्यतेचे काय? ती संभाव्यता तिचे वास्तविक अनुभव, इतरांमार्फत झालेले संस्कार, तिची आकलनक्षमता आणि या सार्‍याला मिळणारा वाव अशा अनेक घटकांवर अवलंबून असेल. शक्यता ते संभाव्यता या प्रवासाची वाट ही नेहमी अनुभवाच्या(data) मार्गे जात. बेकीला हे अद्याप ठाऊक नसेल, मात्र बेकीच्या आईने पक्के ध्यानात ठेवायला हवे.

पण वय उतरणीला लागूनही तिच्याच मानसिकतेचे राहिलेल्या माध्यमी बेकी वा बेकहॅम(३) यांचे काय?

- oOo -

(१). मालिका ब्रिटिश पार्श्वभूमीवरील आहे. ब्रिटिश इंग्रजी भाषेमध्ये सर्जरी याचा अर्थ शस्त्रक्रियाशास्त्र– म्हणजे वैद्यकशास्त्राची एक शाखा असा आहे, त्याचप्रमाणे एखाद्या डॉक्टरच्या अथवा चिकित्सालयाच्या रुग्ण-तपासणीसाठी वापरल्या जाणार्‍या खोलीला अथवा स्थानालाही– विशेषत: लहान गावांमध्ये– सर्जरी असेच म्हटले जाते.

(२). तिच्या आडनावाचे स्पेलिंग Wead आहे हं, Weed नाही. पण इतक्या लहानशा सत्ताकेंद्राची नशा ज्या तीव्रतेने तिला चढते ते पाहता त्या वीडकडे पटकथालेखकाला अंगुलिनिर्देश करावासा वाटला असावा असा माझा होरा आहे.

(३). डेविड बेकहॅम हा प्रसिद्ध ब्रिटिश फुटबॉलपटू. त्याच्यासारखा फुटबॉल खेळता यावा या ध्येयाने झपाटलेल्या एका ब्रिटिश-इंडियन मुलीची कथा सांगणारा `Bend It Like Beckham' नावाचा चित्रपट २००२ मध्ये येऊन गेला. समाजमाध्यमी बेकहॅमही मुद्द्याचा चेंडू मन मानेल तसा ‘वळवून’ आपला ‘गोल’ साध्य करण्यात पटाईत असतात


हे वाचले का?

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

चिमण्या - १ : सहजीवन

<< या सदराच्या निमित्ताने...
---

जवळजवळ दहा वर्षांपूर्वी मी माझे खेडे सोडले आणि अनेक माणसांचा, वास्तूंचा, पशुपक्ष्यांचा संबंध तुटला. प्रत्यक्ष सहवास राहिला नाही, तरी आठवणी राहिल्या. जसाजसा काळ जातो आहे, तशातशा या आठवणीही पुसट होत जात आहेत. आणखी काही वर्षांनी त्यापैकी काही आठवणी राहणारही नाहीत, कुणी सांगावे?

मी खेडं सोडलं आणि घर-चिमण्यांशी असलेला माझा संबंधही तुटला. शहरात चिमण्या नाहीत असे नाही. माणसांची जिथे जिथे वस्ती आहे, तिथे चिमण्या असतातच, पण शहरात चिमण्या-कावळ्यांकडे ध्यान कुठे जाते? सदैव कलकल करणाऱ्या, वेगडे-बागडे रूप असलेल्या चिमण्यांपेक्षा ध्यान वेधणाऱ्या कितीतरी अन्य गोष्टी शहरात असतात. चिमण्यांकडे पाहतो कोण? आणि पाहण्याइतपत फुरसत तरी आहे कुणाला?

माडगूळला आमच्या जुन्या घरी चिमण्या फार होत्या. इतक्या की, सारे घर चिमण्यांचे आहे आणि आम्ही आपले त्यात पाहुणे म्हणून राहत आहो असे वाटावे. माझ्या लहान भावंडांना दूधभात चाखताना, माझ्या आईला कधी ‘ये गं चिऊ, ये गं चिऊ’, अशा हाका मारून कल्पनेतल्या चिमण्यांना बोलवावे लागत नसे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक चिमण्या घरात वावरत असत.

रानमेवा

फाल्गुन महिन्यात खळी होत ज्वारीच्या पोत्यांनी घरे भरत. त्या सुगीला आमचा वाटेकरी गुडदी कणसांचा एक भला थोरला झुंबडा आणून सोप्याच्या दर्शनी भागावर टांगीत असे. पाणी ठेवण्यासाठी मातीचा एक परळही या कणसांच्या शेजारी टांगलेला असे. सुगीला आलेले धान्य आम्ही वर्षभर पुरवीत असू, पण या दंगेखोर चिमण्या ज्वारीच्या दाण्यांनी भरलेला हा झुंबडा महिन्याभरात संपवून टाकीत. हा खाऊ घरचाच आहे, तो पुरवून-पुरवून असा नडीअडीला खावा, एरवी बाहेर हिडूनच पोटे भरावी असा विचार काही या बायांना सुचत नसे. महिन्याभरातच कणसांचा झुंबडा त्या ओरबाडीत, दाणान्‌दाणा त्या टिपून खात आणि श्रावणात व्हंडीची खळी होईपर्यंत, चिमण्यांनी दाणा झोडपून नेलेल्या त्या पिशा वाऱ्याने हेलकावे खात राहत.

जुन्या घराच्या आतील चौकात बाजीनानांनी लावलेले कडुलिंबाचे झाड होते. त्यावर चिमण्यांची वस्ती असे. पहाटे माझे वडील जागे होऊन अंथरुणावर बसत. अंगावर धाबळी घेऊन, ‘उठा-उठा हो सकळिक, वाचे वदा गजमुख,’ भूपाळी म्हणत. या वेळी कोंबडे, कावळे जागे होऊन बोलत असत, साळुंक्या कुलकुलत असत, व्हले हुंकारत असत. पण चिमण्या अद्याप गुडूप झोपून असत. आम्हा मुलांप्रमाणेच चिमण्यांनाही लवकर उठण्याचा कंटाळा येई. वडिलांच्या भूपाळ्या होत. आईचे शेर-पायली दळून होई. अंगणात सडा-सम्मार्जन होई. दिवस उगवे आणि मग चिमण्या हळूहळू जाग्या होत. जाग आली तरी आम्ही अंथरुणात लोळत असू. चिमण्याही अंग फुगवून डहाळ्यातून बसून राहत. आळस झाडून लगेच उठावे आणि पोटापाण्याच्या उद्योगाला लागावे, हे त्यांच्या हातून होत नसे.

दिवस थोडासा वर आला आणि पूर्वेकडे ताड असलेल्या नव्या सोप्याच्या भितीवर कोवळी उन्हे पडली की, चिमण्या झाड सोडून खाली येत. पाडव्या दिवशी गुढी उभारण्यासाठी म्हणून ठेवलेली एक भली मोठी आणि उंच अशी काठी आमच्या घरी होती. पाडवा झाला की, ती काठी नव्या सोप्यात पानपट्टीला लागून आडवी टांगलेली असे. धुणी वाळत घालण्यासाठी तिचा उपयोग होई. निंबावरून खाली उतरलेल्या चिमण्या या काठीवर येऊन बसत. गळ्यापाशी काळ्या रंगाचा छान ठिपका असलेले आणि विटकरी रंगाचा कोट घातलेले चिमणे सकाळी-सकाळीच मोठ्या रंगाला येत. शेजारी बसलेल्या चिमण्यांना धक्के मारीत. चिमण्या बापड्या संकोचाने बाजूला सरत. हळू आवाजात नापसंती बोलून दाखवीत, पण चिमणे दांडगावा करीत. जास्तच धक्के मारीत आणि कानडी भाषेत मोठमोठ्याने काही-काही बोलत. चिमण्यांना सारे सोसून घ्यावे लागे. त्या काठीवरून इकडे-तिकडे सरत, कुरकुरत, आपसात कुलुकुलु बोलत पिसे चोची साफ करीत.

चिमण्यांचा हा खेळ चाललेला असे, तेव्हा काठीची सावली सोप्याच्या भितीवर पडलेली असे. शाडूने सारवलेल्या भिंतीवर सावल्यांचा सिनेमा दिसे. लांबलचक काठी आणि तिच्यावर बसलेल्या पाच-पन्नास चिमण्या, त्यांचे हलणे, धक्के मारणे आणि चोचीत चोची घालणे, सगळे पाहताना मोठी गंमत वाटे. सिनेमातल्या चिमण्या धरून ठेवाव्या असे वाटे. आपली पांढरी पोटे उन्हाला देऊन चिमण्या काठीवर बसत. उन्हें खाऊन झाली की, त्यांना भूक लागे. याच सुमारास आम्हालाही लागे. शिळी भाकरी, कांदा आणि ताजे ताक घेऊन आम्ही भावंडे सोप्याच्या उन्हाला न्याहरी करायला बसलो म्हणजे काही चिमण्या दोन पायांवर उड्या मारीत ताटासमोर येत, माना वाकड्या करून ताटाकडे, आमच्या तोंडाकडे बघत. मग त्यांना भाकरीचा चुरा द्यायला नको का?

जुन्या सोप्यात धान्याची पोते रचून ठेवलेली असत. पाच-पंचवीस चिमण्या त्यांच्यावर गर्दी करत. चोचीने टोचून-टोचून गोणपाटाला भोके पाडीत आणि धान्य खात. खाताना बोलणेही चालूच असे. काही चिमण्या माजघरात शिरत. तांदळाची रोळी उघडी दिसली की, तोल संभाळीत रोळीच्या काठावर बसून तांदूळ चोरीत. करंडीत, सुपात भाजी दिसली की, तिचे कोवळे शेंडे खुडत. कुठेही तोल संभाळीत बसावे, सारखे बडाबडा बोलावे, दिसेल ते चुटूपुटू टिपावे असा त्यांचा सपाटा चाले. अंगणात, सोप्यात, माजघरात, स्वयंपाकघरात, परसात सगळीकडे त्यांचा दंगा चालू राही. जसे काही पेंढार सुटले आहे!

जेवणे होऊन तिसरा प्रहर होत आला तरी त्यांचा दंगा काही बंद होत नसे. मग त्यांची पांढरी पोटे भरत. आडावरच्या डोणेवर बसून पाणी पिणे होई. चिमण्या फिरून सोप्यात येत. धान्य खाल्ले, पाणी प्यायल्यावर मग थोडे निवांत बसावे की नाही? पण नाही! मग भर्रऽ भर्रऽ इकडे-तिकडे भरारी घे असा खेळ सुरू होई. ज्या जागी एक बसे त्याच जागी दुसरीला बसायला हवे असे आणि एका जागी आल्या की दोघींचे जमत नसे. पंखांचा फडफडाट आणि चोचींची वटवट अखंड चालू राही. शिवाशिवीला, मारामारीला, भांडणाला ऊत येई. जेवणे झाल्यावर घोंगडी जेने अंथरूण मोठी माणसे थोडी लवंडत. आम्हालाही धाकदपटशा दाखवून झोपवीत. सगळीकडे कसे शांत असे, पण चिमण्यांचा दंगा काही थांबत नसे. त्यांच्या वटवटीने, मुलांच्यावर सहसा न ओरडणारे माझे वडीलसुद्धा त्रासून जात. धोतराचा सोगा हवेत उडवीत चिमण्यांना तंबी देत– “शुकऽऽ शुकऽऽ काय गलका मांडलाय ? जरा स्वस्थ पडू द्या!”

पण एवढे बोलून चिमण्या कुठे ऐकायला ! टाळ्या वाजवाव्या, काठ्या वाजवाव्या तेव्हा कुठे खुंट्या, कोनाडे, भानवटी सोडून या बाहेर पळत. पण घटकाभरच. बोलल्याची काही लाज नसे. पुनः एकीपाठीमागे एक अशा भरारत गोंधळ करत पाच-पंचवीस जणी आत येत. पुन्हा पहिल्यापेक्षा दुप्पट दंगा सुरू होई.

संध्याकाळी चार-साडेचार झाले की, पुन्हा खाण्यासाठी शोधाशोध सुरू होई. काही बाप्ये, बाया बाहेर पडत. गावातली घरे, लोकांची अंगणे, गावाशेजारी राने धुंडून संध्याकाळी सहा-साडेसहा झाले की, गुरांच्या आधी या घरी परत येत. लिंबावर झुंबड उडे. जणू काही चंपाषष्ठीची खंडोबाची यात्रा भरली आहे, असा आवाज होत राही. निंबाची डहाळीन्‌ डहाळी हलून निघे. ‘मी इथे बसणार, तू तिथे बैस, ही माझी जागा आहे. ती तुझी जागा आहे,’ अशी तू-मीची भाषा चांगलीच घंटा-अर्धा घंटा चाले आणि मग कसे शांत होई. गलग्याला, भांडणाला कंटाळून काही चिमण्या घरात येत. खुंटीवर किंवा कडापाटाच्या हलकड्यांतून डोळे मिटून बसून राहत. याचवेळी आमची निजानीज होई. अंथरुणावर पडल्या पडल्या आमच्यापैकी एखाद्याची नजर खुंटीवर फुगून बसलेल्या चिमण्याकडे जाई. अंथरुणे सोडून आम्ही त्या उद्योगालाही लागत असू. बहुतेक वेळा हा उद्योग फळाला येत नसे. कधी चिमणा गुंगारा देई तर कधी आई ओरडे– ‘नका रे चांडाळांनो, मुक्या पाखराला त्रास देऊ. रात्री त्यांचे डोळे जातात.’

आई आमच्यावर ओरडे, पण मांजरावर ओरडत नसे. आमचे मांजर दिवसभर चिमण्यांवर टिपून असे. दोन्ही वेळचा दूध-भात खाऊनही त्याची चिमण्यांवरची वासना उडत नसे. पण चिमण्याही त्याला ओळखून असत. सोप्यात, अंगणात नाचताना आपण खाण्यात गर्क आहोत, कोपऱ्यात दबून असलेल्या मांजरांकडे आपले काही ध्यान नाही असा बहाणा त्या करत. पण खरे तर, त्यांचे पक्के ध्यान असे. तिन्ही त्रिकाळ त्या सावध राहत. त्यामुळे मांजराचा बेत सारखा फसे. दिवसाउजेडी तर चिमण्या मांजराचे काही जमूच देत नसत. रात्री अंधारात मात्र कधीमधी मांजराला संधी सापडे. जमिनीवरून कोनाड्यात आणि कोनाड्यातून खुंटीवरच्या चिमणीवर हा कठीण बेत कधी एखाद्या रात्री पार पडे आणि दुसरे दिवशी नको त्या ठिकाणी माझ्या आईला चिमण्यांची पिसे दृष्टीला पडत. कधी रात्रीच्या वेळी एकदम ध्यानीमनी नसताना लिंबावर झोपी गेलेल्या चिमण्या फर्रकन उडत आणि दुसऱ्या दिवशी मनीची दूध भातावरची वासना उडे!

आमची पासोडी आणि मनीची उडी चुकवावी या बुद्धीने काही चिमण्यांनी परसातल्या आडात घरे केली होती, पण पाण्याचा तरी विश्वास धरावा का? दर दोन-तीन महिन्यांनी पाण्याला वास येई आणि उपसा करावा लागे. काही वेळा आडाच्या जुन्या बांधकामात साप शिरून चिमण्यांवर संकट येई. चार-दोन चिमण्या कामी येत.

परसात आम्ही अंघोळी करून वाहणारे सांडपाणी पाहून चिमण्यांनाही अंघोळ करण्याची लहर येई, ओढ्यात पाण्याची धार कमी असली की, माणसे जशी खाली वाकून ओंजळीने पाणी पाठीवर उडवतात, तशा या चिमण्या धारेला बसत आणि पंखाने पाणी उडवून अंगावर घेत. रोजच्या रोज त्या काही अंघोळ करत नसत, पण जेव्हा करत तेव्हा मात्र अगदी आनंदाने करत. पाऊस अंगावर घेत. लहान मुले जशी काळ्यामाळ्या करतात, हसतात, ओरडतात तशी त्यांची सांडपाण्यात अंघोळ चाललेली असे. मुलांप्रमाणे चिमण्यांना मातीत खेळणेही आवडे. घर सारवण्यासाठी पांढरीच्या मातीचा ढीग अंगणात पडला की, चिमण्या खुशाल त्या ढिगावर खेळत. सारे अंग मातीने भरवून घेत. डोक्यात पसापसा माती घालून घेत. सांडपाण्यात अंघोळ करताना जितका होई, तितकाच आनंद त्यांना माती घालून घेताना होई.

कोठी करणे आणि पोरे घालणे या बाबतीत चिमण्यांचा काही ठरावीक काळ आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण वर्षभर हा उद्योग चालत असावा. माझ्या आठवणीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात चिमण्या घरे बांधण्याची धांदल करीत. पुष्कळशी इतर पाखरे आपली घरे बांधण्याची धांदल करीत. पुष्कळशी इतर पाखरे आपली घरे झाडावर बांधतात, पण चिमण्यांचा माणसाशी घरोबा जास्त. माणसांनी बांधलेल्या घरातच जागा पाहून त्या आपलीही घरे उठवतात. योग्य जागा पाहून बांधलेल्या माणसांच्या घरातसुद्धा चिमण्यांना काही लवकर चांगलीशी जागा सापडत नाही. भानवटी, तुळ्यातील मोक्याच्या जागा हेरण्यातच त्यांचा फार वेळ जातो.

काही- काही जोडपी घर बांधण्यासाठी अशी चमत्कारिक जागा पसंत करतात की, बोलून सोय नाही. या जागी घर होणार नाही, हे त्या बापड्यांच्या ध्यानीच येत नाही. गावभर हिंडून सुतळ्यांचे तुकडे, वाखाच्या बटा, कोंबड्यांची पिसे, कापूस असले काहीबाही चोचीत आणून ते त्या अयोग्य जागी हवे तसे ठेवण्याचा त्यांचा वेडा प्रयत्न चालू राहतो आणि इमला काही उठत नाही. पुष्कळसे घरबांधणीचे साहित्य वाया जाते. चिमण्यांची घरबांधणी सुरू झाली की, नवा सोपा झाडताना असे कितीतरी घरबांधणीचे सामान माझ्या आईच्या केरसुणीवरून बाहेर जाई आणि उकिरड्यावर पडे!

पुष्कळशी इतर पाखरे घरबांधणीच्या शास्त्रांत पारंगत असतात. सुगरणीचा हात तर याबाबतीत कुणीच धरू शकणार नाही. आपले घर त्या असे देखणे आणि डौलदार बांधतात की, भल्या भल्या गवंड्यांनी तोंडात बोटे घालावीत. या चिमण्या म्हणजे सुगरणीच्याच जातभाई, पण यांना घरे कशी बांधावीत हे मुळीच कळत नाही. 'एक होती चिमणी, एक होता कावळा,' या प्रसिद्ध शिशुकथेतील चिमणीने मेणाचे घर बांधून पावसाळ्यात निर्वासित झालेल्या कावळ्याला जागा दिली, हे काही खरे वाटत नाही. घरबांधणीचे शास्त्र चिमण्यांना माहीतच नाही! त्यांनी ते सुगरणीकडून शिकले पाहिजे.

एप्रिल-मेमध्ये घरे बांधण्याचा सपाटा सुरू होई. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही घरे वरचेवर ढासळत. चिमणा चिमणी अतोनात कष्ट करत आणि मग कधीतरी गुपचूप चिमणी आपल्या लहान घरट्यात तीन चिमणी अंडी घाली. ऐसपैस घरातील अंडी नीट राहत, पण अडचणीत अपुऱ्या जागेत बांधलेल्या घरातील अंडी आपल्या आई-बापांच्या धक्क्याने वरून खाली पडत आणि फुटून जात. लवकरच तुळ्यातून बारीक चिवचिव ऐकायला येई. मुलांना खाण्याजोगे अन्न शोधण्यात चिमणा चिमणी दिवसभर गर्क राहत. लहान आळ्या चोचीत पकडून आणाव्या, घराबाहेर बसून डोकेच तेवढे आत घालावे, पोरांनी 'मला-मला' म्हणून दंगा करावा, कुणीतरी एकानेच सगळे मटकवावे आणि इतरांनी चिमण्या चोची वासून रडत राहावे. मग चिमणीने पुन्हा बाहेर जाऊन काही घेऊन यावे. असा प्रकार चालू राही. चिमण्यांची बाळे हळूहळू वाढू लागत.

कधीमधी एखादे चळवळे पोरही अंड्याप्रमाणे टपकन खाली पडे आणि मरून जाई. एखादे टणक पोर वरून पडूनही जिवंत राही. पंख न फुटलेला तो लालभडक मांसाचा गोळा चोच वासून आमच्याकडे बघे. चिमणा चिमणी वारंवार आमच्या डोक्यावरून घिरट्या घालत. त्या पोराला पाणी पाजून पुन्हा घरट्यात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असू आणि त्या प्रयत्नात ते बापडे पोर मरून जाई. काही पोरे मोठी होऊन घरातून खाली उतरत. आई-बाप त्यांना उडावे कसे हे शिकवत. पोरे भीत आणि बदाबद खाली पडत. बऱ्याच प्रयत्नाने त्यांना उडायला येई. उडायला येऊ लागले आणि पंखात चांगले बळ आले की, ती मुले आई-बापांना विसरत आणि दाही दिशांना उडून जात. आपापला संसार थाटीत. आपापली पोटे भरीत. मग पुन्हा त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण काही होत नसे.

जोपर्यंत मी माझ्या जुन्या घरात होतो, माझ्या पंखांत बळ आले नव्हते, तोपर्यंत हा प्रकार मी पाहत होतो. पुढे ते जुने घरही गेले, तो निंबही गेला आणि माझा चिमण्यांशी असलेला संबंधही तुटला!

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ३६-४१.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)

---

पुढील भाग >> चिमण्या - २ : दुरावा    


हे वाचले का?

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

वेचताना... : चिमण्या

आँधी आई ज़ोर शोर से,
डालें टूटी हैं झकोर से।
उड़ा घोंसला अंडे फूटे,
किससे दुख की बात कहेगी!
अब यह चिड़िया कहाँ रहेगी?

हमने खोला अलमारी को,
बुला रहे हैं बेचारी को।
पर वो चीं-चीं कर्राती है
घर में तो वो नहीं रहेगी!

घर में पेड़ कहाँ से लाएँ,
कैसे यह घोंसला बनाएँ!
कैसे फूटे अंडे जोड़ें,
किससे यह सब बात कहेगी!
अब यह चिड़िया कहाँ रहेगी?

- महादेवी वर्मा

दीड-एक वर्षांपूर्वी आरे वनक्षेत्रातील झाडे रातोरात कापल्यावर होऊ लागलेल्या टीकेचा प्रतिवाद करताना एक मित्र म्हणाला, ‘एकशेचाळीस कोटींच्या जनतेला जगवण्यासाठी विकास हवा. त्यासाठी आवश्यक ते सारे केले पाहिजे.’ हे म्हणत असताना गरजेपेक्षा कैकपट कमवून बसलेला हा मित्र विकासाच्या प्रत्येक पेटीतला अतिशय मोठा हिस्सा हा गरजा आधीच भागलेल्यांनी बळकावलेला असतो, हे सोयीस्कररित्या विसरला. स्वत:च्या गरजा भागल्यानंतरही विकासाचा अधिकाधिक वाटा आपल्याकडे वळवून घेणार्‍या त्याच्यासारख्यांमुळेच एकशेचाळीस कोटींमधील बहुसंख्येच्या गरजा दुर्लक्षितच राहात असतात, हे समजून घेण्याची त्याची तयारी नव्हती.

एवढेच नव्हे, तर त्याच्यासारखे विकासाचे हे लाभधारक याच असंतुष्ट गरीबांचे सैन्य अग्रदल (vanguards) म्हणून पुढे करत आणखी विध्वंसक विकासाची मागणी रेटत असतात. आणि त्याआधारे विकासाची नवी पेटी तयार होते तेव्हा त्यातीलही मोठा भाग पुन्हा आपल्या पदरी पाडून घेत असतात. यातून एकशेचाळीस कोटींतील बहुसंख्येच्या गरजा अपुर्‍याच ठेवून, आणखी वाढवून, आणखी महाग करून, त्यांच्यामध्ये नव्या असंतोषाची पेरणी करतात– जेणेकरुन विध्वंसक विकासाची मागणी शांत होणार नाही याची खातरजमाच करून घेत असतात.

खरे तर एकशेचाळीस कोटींना पुरेल इतकी साधनसामुग्री निसर्गातून घेतली जाते, मानवाकडून कृत्रिमरित्या निर्माणही केली जाते आहे. या मित्रासारख्यांनी आपल्या गरजाच नव्हे तर पुरेशी चैन करूनही उरणार्‍या पैसा व साधनसामुग्रीबाबत असणार्‍या ‘आणखी हवे, आणखी हवे’ या आपल्या हपापलेपणाला आवर घातला तर सर्वांच्या गरजा सहज भागू शकतात हे वास्तव आहे. त्यासाठी ‘गरजांच्या प्रमाणात वाजवी वितरण’ करणार्‍या धोरणाची नि आपल्या अनिर्बंध लालसेला, स्वार्थाला लगाम घालण्याची गरज आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि याची जाणीव प्रशासन, धोरणकर्त्यांनी रुजवणे गरजेचे आहे. पण सर्व उत्पादनासह वितरणच नव्हे तर सामाजिक, न्यायिक जबाबदार्‍याही खासगी क्षेत्राच्या खांद्यावर देण्याची धोरणे राबवणारी सरकारी इतकी किचकट जबाबदारी अंगावर घेऊ इच्छित नाहीत ही भारतासह बहुतेक देशांची शोकांतिका आहे.

आरेमधील झाडे तोडणे याचा अर्थ केवळ काही सुटी झाडे तोडण्याइतका नसतो. वनक्षेत्रातील जमिनीचा एक तुकडा म्हणजे एक परिसंस्था असते. ती परस्परांवर आधारित असे जीवन जगणार्‍या असंख्य सजीवांचा जीवनाधार असते. ती झाडे तोडणे याचा अर्थ झाडांसोबतच त्या सार्‍या जीवांची हत्या करणे असाच असतो. अर्थात ‘विकासफिरू’ माणसाला याचे काही सोयरसुतक नसते. काही वर्षांपूर्वी या मुद्द्याबाबत बोलणे चालू असताना स्वत:ला अ‍ॅन रँडवादी म्हणवणारा कट्टर भांडवलशाही समर्थक एक मित्र म्हणाला होता, ‘बट ह्यूमन फर्स्ट, राईट? आपण बलवान प्राणी आहोत तर आपण प्राणिसृष्टीवर राज्य करणारच. सृष्टीचा हाच नियम नाही का?’

या व्यक्ती अजूनही प्राचीन टोळी मानसिकतेमध्येच जगत असतात. भौतिक प्रगतीसोबतच माणसाने सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक प्रगती केल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नसते. हे लोक हर्बर्ट स्पेन्सरच्या ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या तत्त्वाचा आधार घेत असतात. स्पेन्सरच्या या अर्धवट विधानाचा आधार घेत असताना ‘बलाचा संघर्ष’ हे उत्क्रांतीचे एकमेव आधारतत्त्व नसून परस्पर-सहकाराचे तत्त्वही तिचा मूलाधार असते हे ते विसरतात... बहुतेक भांडवलशाही समर्थक विसरत असतात. क्वार्टरली रिपोर्ट्स आणि त्यात दाखवावे लागणारे नफ्याचे वाढते आकडे हा एकमेव निकष ठेवून विकासाचे आराखडे आखले जात असताना, गुणवत्तेसह पर्यावरण, नातेसंबंध, सामाजिक सौहार्द वगैरे बाबी वेगाने दुय्यम होऊन जात आहेत.

पण ही मानसिकता केवळ भांडवलशाही समर्थकांमध्येच आहे असे नव्हे. स्वत:ला सर्वसमावेशक कल्याणकारी मार्गाचे अध्वर्यू समजणारे कम्युनिस्टही यात मागे नाहीत. डाव्या राजवटी या नेहमीच एकाधिकारशाही राबवत असल्याने सत्ताधार्‍यांच्या आकलनाच्या कुवतीनुसार वा लहरीनुसार त्यांची धोरणे आखली जाताना दिसतात. निसर्गाविरोधातील सर्वात नृशंस म्हणता येईल अशी मोहिम चीनमध्ये माओ राजवटीमध्ये राबवली गेली. त्याच्या ’ग्रेट लीप फॉरवर्ड’ या संकल्पनेअंतर्गत माणसाचे शत्रू ठरवलेल्या उंदीर, डास, माश्या आणि चिमणी यांचे निर्दालन करण्याची मोहिम (four pests campaign) राबवली.

‘चिमण्या धान्य खातात आणि दुष्काळाच्या काळात शेतातील प्रत्येक दाणा माणसासाठीच असला पाहिजे’ अशी गर्जना माओने केली होती. या ‘ह्युमन फर्स्ट’ धोरणाला अनुसरून चिमण्या, त्यांची अंडी, पिले यांना हरप्रयत्नाने नष्ट केले गेले. या प्रयत्नात अडाणी नागरिकांनी इतर पक्ष्यांचाही संहार केला. त्याचा परिणाम म्हणून अनेक किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. पाठोपाठ आलेल्या टोळधाडीने पक्षी खातील त्याहून कैकपट अधिक धान्य स्वाहा केले. टोळांवर ताव मारणारे पक्षी दुर्मीळ झाल्याने त्यांच्या झुंडींना मोकळे रान मिळाले होते. आता त्यांचे निर्दालन करण्याची जास्तीची जबाबदारी माणसावर येऊन पडली. आणि ही मोहिम चिमण्या निर्दालन मोहीमेहून कैकपट किचकट ठरली. निसर्गचक्राचे, पर्यावरणाचे, विज्ञानाचे पुरेसे ज्ञान नसलेले आणि स्वत:च्या समजुतीबाबत फाजील आत्मविश्वास असणारे नेते असले की काय घडते याचे उत्तर उदाहरण म्हणून या मोहिमेकडे बोट दाखवले जाते.

माओच्या चार पावले पुढे टाकत ‘ज्यातून पैसा निर्माण होतो ते सारे समर्थनीय’ असा बाणा घेऊन आपले धोरण-प्रमुख आणि नागरी, सुखवस्तू मंडळी वाटचाल करत आहेत. यातून निसर्ग, जीवनशैली, आरोग्य या जगण्याच्या महत्त्वाच्या पैलूंच्या संदर्भात आपण काय किंमत मोजतो याची फिकीर त्यांना राहिलेली नाही. एकोणीसाव्या शतकाच्या अंतापर्यंत माणसाने पुनर्भरण न करता ओरबाडलेला निसर्ग आणि केवळ गेल्या एका शतकात ओरबाडलेला निसर्ग याचे प्रमाण भयानकरित्या व्यस्त आहे. हे जसे प्रगतीचे लक्षण आहे तसेच आपण भावी पिढ्यांच्या वाट्याचे बरेच काही स्वाहा करत असल्याचे लक्षणही. परंतु बहुसंख्य मनुष्यप्राणी याबाबत अनभिज्ञ आहेत. ज्यांना त्याचे थोडेफार भान आहे त्यांनी ‘पुढच्या पिढ्यांची चिंता आपण करण्याचे कारण नाही’ असे समजून त्यांनी तिकडे डोळेझाक करण्याचा सोपा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या कर्माने वाढलेल्या गरजा, महागाई यांच्या पूर्तीसाठी अल्प-उत्पन्न गटातील लोक, अनागरी लोकही नाईलाजाने त्यांच्या मागोमाग फरफटत जात आहेत.

शहरीकरण आणि तंत्रज्ञान हे नव्या जगाचे मूलमंत्र होऊ लागले आहेत. त्यांचे फायदे नाकारता येत नाहीत हे खरे असले, तर सुरुवातीला दिलेल्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे ‘विकासासाठी आवश्यक ते सर्व करावे लागेल’ असे विकासाचे मोकाट मॉडेल वापरणे नक्कीच धोकादायक आहे. त्याचे निसर्ग, पर्यावरण आणि पर्यायाने भविष्यातील मानव-पिढ्यांवर यांचे काय परिणाम होतील याचे दाखले आताच मिळू लागले आहेत. कुठे अतिवृष्टी, कुठे अकाली वृष्टी, कॅलिफोर्नियासारख्या सुजलाम्‌ सुफलाम्‌ प्रदेशात निर्माण झालेली पाणीटंचाई, भारतासारख्या मोसमी पावसाच्या प्रदेशात आता जवळजवळ बारमाही पडणारा पाऊस, दिल्लीमध्ये प्रत्येक हिवाळ्यामध्ये निर्माण होणारी प्रदूषणजन्य आणिबाणी... अशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. परंतु निसर्गाशी शून्य संबंध येणार्‍या आणि देशातील धोरणात्मक व्यवस्था बव्हंशी ज्यांच्या ताब्यात आहे अशा नागरी माणसाला त्याबाबत फारसे काही करावे असे वाटत नाही. किंबहुना भांडवलशाही प्रसारमाध्यमांतून होणारा ‘पर्यावरण-हानी ही दंतकथा आहे’ हा भाडोत्री प्रचार सोयीस्कर ढाल म्हणून वापरणे आता त्याच्या अंगवळणी पडले आहे.

भरपूर शेती-उत्पादन नि पिकांची नासाडी करणारी पाखरे असतात तशीच तिच्यावरील किडींचे निर्दालन करणारी पाखरेही असतात याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. रासायनिक कीडनाशकांनी किडीबरोबर त्यांचा वंशविच्छेदही होत जातो. त्यातून त्यांनी नियंत्रणात ठेवलेल्या काही किडींचा प्रादुर्भाव वेगाने होतो. पण त्यातून नव्या कीटकनाशकांसाठी बाजारपेठही उपलध होते असे हे भांडवलशाही समर्थक तत्परतेने सांगतील. ‘निसर्गाचे देणे असलेल्या अनेक वनस्पतीजन्य पदार्थांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या परागीभवनाच्या प्रक्रियेसाठी मधमाशांसारखे कीटक मुख्य भूमिकेत असतात' हे विसरून आपल्या परिसरातून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग माणसाने बांधलेला दिसतो.

गेल्या तीन-चार दशकांत तंत्रज्ञानाने नागरी जीवन आमूलाग्र बदलले. इंटरनेट आणि मोबाईल यांनी जगाचा वेग कल्पनातीत वाढवला. त्यातून येऊ लागलेल्या संपत्तीला काँक्रीटच्या घरट्यांची आवश्यकता वेगाने वाढू लागली. त्यातून नागरी जगामध्ये झाडांसह सर्व अन्य सजीवांची पीछेहाट सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृपेने काँक्रीटच्या गृहप्रकल्पांमध्ये एखाद-दोन झाडांना राखीव जागा देण्यात आली. तेवढ्यावर संतुष्ट राहावे असे त्यांना बजावण्यात आले. अवाढव्य व्याप्तीच्या गृहप्रकल्पांमध्ये शोभिवंत हरळीचे पट्टे ऊर्फ लॉन राखले जाऊ लागले. परंतु त्यावरही कीटकनाशके फवारून कीटकांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला. त्यावर जगणारे पक्षी अन्न नि निवारा या दोनही गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्याने माघार घेऊ लागले.

आपल्या भवतालाकडे डोळसपणे पाहिले तर अनेक बदल दिसून येतात. नागरी मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय वसत्यांकडे पाहिले तर केवळ घराचीच नव्हे तर आसपासची जमीनही काँक्रीट, इंटरलॉकिंग ब्लॉक्स, सिमेंटचा कोबा आदी मार्गाने सारवून निर्जीव करून टाकलेली असते. गेल्या दशकभरात सिमेंट कंपन्यांच्या रेट्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यांचे भयानक वेगाने काँक्रीटीकरण सुरु केलेले आहे. या प्रचंड काँक्रीटच्या थरामुळे शहरांचे सरासरी तपमानही वाढू लागले आहे. या दोहोंचा एकत्रित परिणाम म्हणून जमिनीवरील कीटकांच्या परिसंस्था नाहीशा झाल्या आहे. त्यांतून त्यांच्यावर जगणार्‍या पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा पडू लागला आहे.

त्यातच अर्धवट डोक्याच्या– स्वत:ला जीवप्रेमी समजणार्‍यांच्या जमातींच्या कृपेने आयते अन्न खाणारे कबुतरांसारखे पक्षी शिरजोर होऊन त्यांचा दादागिरीपुढे उरल्यासुरल्या छोट्या पक्ष्यांना माघार घ्यावी लागली आहे. जिचे नावच House-Sparrow अर्थात घर-चिमणी असे ठेवण्यात आले– इतक्या मुबलक प्रमाणात नि सहज आढळणारा पक्षी भारतातील शहरांतून दिसेनासा झाल्याचे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ध्यानात आले आणि पर्यावरणवादी मंडळींनी त्यावर आवाज उठवण्यास सुरुवात केली.

पण अर्वाचीन मानव हा टोळीमानवापेक्षाही अधिक कर्मकांड-प्रधान आयुष्य जगणारा प्राणी आहे. केवळ धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर अन्य क्षेत्रातही तो आपल्या भावना व्यक्त करण्याचे कर्मकांड निर्माण करतो आणि तेवढे उरकले की आपण आपली जबाबदारी पार पाडली असे समजून पुन्हा आपल्या विध्वंसक, स्वार्थी जगण्याकडे परतून जात असतो.

एक दिवस ‘मिच्छामि दुक्कडम्‌’ म्हणून पापक्षालनाचे कर्मकांड उरकले की उरलेले दिवस त्याच चुका नव्याने करण्यास तो मोकळा होतो; होळीच्या दिवशी मनातील सारे क्लेष, वैषम्य, द्वेष जाळून टाकताना केलेला गालीप्रदान कार्यक्रम संपला की द्वेषाचे, ईर्षेचे नवे अंकुर रुजवायला सुरुवात करतो; ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा, तिचा वापर करा’ म्हणत एक दिवसाचा ‘बस डे’ साजरा करून झाला– आणि वृत्तपत्रांत व समाजमाध्यमांवर फोटो प्रसिद्ध करून झाले– की दुसर्‍या दिवशी पुन्हा कारमधून एकेकटे प्रवास करायला सुरुवात होते; नुकत्याच घडलेल्या कुठल्याशा गुन्ह्याबद्दल समाजमाध्यमांवर जोरदार निषेध, आगपाखड करून झाली की अन्य प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, संघटनेच्या, राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या त्याच गुन्ह्याबद्दल ‘हा आमच्याविरोधात कट आहे’ म्हणत कोडगे समर्थन सुरू होते... अशा वेळी पर्यावरण या सर्वांच्या सामूहिक अज्ञानाचा विषय असलेल्या क्षेत्राबाबत तसेच घडते यात नवल नाही.

चिमणीबद्दलच्या जागरुकतेचे जवळजवळ असेच झालेले दिसते. २०१० या वर्षापासून २० मार्च हा दिवस ‘चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. तो अक्षरश: साजराच केला जाताना दिसतो. गेल्या आठ-दहा वर्षांत मी पाहिले तर यादिवशी काय होते? चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी खोके, बॉक्स ठेवा वगैरे अवैज्ञानिक सल्ले दिले जातात. पक्ष्यांसाठी गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये पाणी ठेवण्याचा तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त पण त्यापूर्वी पक्षी पुरेशा संख्येने आहेत हे गृहित धरणारा, नि म्हणून एक प्रकारे मर्यादित उपयुक्त असा सल्ला पुन्हा पुन्हा दिला जातो. चिऊ-काऊच्या कविता हाताशी धरून वृत्तपत्रीय लेख पाडले जातात. समाजमाध्यमी जगात डीपीवर चिमणीचे चित्र ठेवले जाते...

एक वर्षी आलेल्या बातमीमध्ये ‘...स्पॅरो पार्टीज, स्पॅरो पिकनिक, स्पॅरो प्रोसेशन, बर्ड वॉक्स, स्पॅरो वॉक्स हे कार्यक्रम सोशल मीडियावर घेतले जातील. आयोजनकर्त्यांनी त्यांचा कार्यक्रम संकेतस्थळावर टाकल्यानंतर तो गुगल मॅप व सोशल मीडियावर दिसू लागेल. कार्यक्रमाच्या यजमानांना प्रशस्तिपत्रही दिले जाणार आहे...’ हे वाचून माणसाची एकुण कर्मकांडप्रधान आणि ‘वेचावी बहुतांची लाईके’ प्रवृत्ती पुन्हा दिसून येते.

प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी मोजमाप म्हणून निर्माण केलेल्या ‘कार्बन फूटप्रिंट’ संकल्पनेचे क्रयवस्तूमध्ये रूपांतर करून ‘कार्बन क्रेडिट्स’ची उत्पादन(?) आणि विक्री करण्याची भन्नाट संकल्पना व भांडवलशाही आणि तिच्या समर्थकांचीच. यातून मन:पूत प्रदूषण करून चार पैसे फेकून इतर कुणाकडून क्रेडिट्स जमा करून आपला प्रदूषण ताळेबंद समतोल करण्याची सोय, प्रदूषणकारी उद्योगांना उपलब्ध झाली. त्यासाठी प्रामुख्याने कार्बन क्रेडिट्सचे उत्पादन उद्योग चालवण्याची सुपीक कल्पनाही यातूनच निर्माण झाली. मूळ हेतूला हरताळ फासून नवे कर्मकांड, नवी क्रयवस्तू शोधत भोगाची नवनवी दालने उघडण्याचे अर्वाचीन मानवाचे कौशल्य वादातीत आहे.

त्यातून पीछेहाटीचा, अस्तंगत होण्याचा धोका समोर असणार्‍या चिमण्या किंवा एकुणात विरत चाललेल्या प्राणिजीवनाने पुन्हा उभारी घ्यायची असेल तर त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन नि राजकीय इच्छाशक्ती (विशेषत: निसर्ग-शत्रू असलेल्या उद्योगांच्या व्यावसायिकांसमोर गुडघे न टेकण्याइतपत ताठ कणा) असण्याची गरज आहे. आजवर याबाबत एकच उदाहरण दिसते आहे. चिमण्यांच्या (आणि एकुणच पक्ष्यांच्या) घटत्या संख्येसाठी दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत होतात असे निश्चित करण्यात आले. (अर्थात तज्ज्ञांमध्ये मतभेद असतात तसे त्याबाबतही आहेत, यात विकासफिरू तज्ज्ञांचा समावेश असणे ओघाने आलेच.)

पहिले म्हणजे शेतात फवारली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि दुसरे मोबाईल टॉवर्समधून होणारा किरणोत्सार. या दोहोंमुळे पक्ष्यांच्या अंड्याचे कवच पातळ राहणे. त्यात पिलू विकसित होण्यास पुरेसे जीवद्रव्य समाविष्ट नसणे वगैरे गोष्टींचा उहापोह करण्यात येत असतो. त्याआधारे केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने ‘मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जना’चा प्रदूषणकारी गोष्टींच्या सूचीमध्ये समावेश केला.

२०१० मध्येच सरकारने मोबाइल हँडसेट व टॉवर्ससाठी नवे नियम जाहीर केले. २०१० मध्येच सरकारने मोबाइल हँडसेट व टॉवर्ससाठी नवे नियम जाहीर केले. त्यानुसार टॉवर्समधून होणार्‍या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाची मर्यादा २ वॉट‌्‍स प्रति कि.ग्रा. वरून १.६ वॉट‌्‍स प्रति कि.ग्रा. इतकी कमी करण्यात आली. एक किलोमीटर अंतराच्या आत नव्या टॉवर्सना मनाई करण्यात आली. परंतु शेती हा दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होत चाललेला व्यवसाय असल्याने त्या क्षेत्रात रासायनिक कीटकनाशकांच्या संदर्भात कडक निर्णय करणे सरकारला शक्य होत नाही. सेंद्रिय कीटकनाशकांची परिणामकारकता रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत बरीच उणी असल्याने शेतकरीही त्याबाबत हतबल झालेला दिसतो.

काही दशकांपूर्वी वनक्षेत्रातील पर्यावरण व जीवसाखळी पुनरुज्जीवित करण्यासाठी, राखण्यासाठी एक सर्वंकष धोरण ‘प्रोजेक्ट टायगर’ नावाने आखले गेले त्याच धर्तीवर चिमणीबाबत किंवा पक्ष्यांच्या घटत्या संख्येबाबत करावे लागेल. वनक्षेत्राबाबत बदल करणे तुलनेने सोपे होते कारण तिथे सर्वभक्षी नि विकासफिरू मानवाचा स्वार्थ फार अडकलेला नव्हता. पक्ष्यांबाबत नि एकुण पर्यावरणाबाबत आज काही आमूलाग्र बदल करायचे तर सुरुवातीला दिलेल्या दोन विकासफिरु उदाहरणांप्रमाणे बहुसंख्येची ढाल पुढे करून विरोध केला जातो. त्याला उद्योग-व्यावसायिकांची, बिल्डर्सची आणि त्यांच्या भाट संशोधक-तज्ज्ञांची साथ लाभत असते. त्यामुळे चिमणी दूर गेल्याचे दु:ख करण्यापलिकडे – आणि ‘चिमणी डे’ साजरे करण्यापलिकडे – फारसे काही करणे आपल्या हाती उरलेले नाही.

- oOo -

रानमेवा_चर्चबेल

चिमणीसंदर्भातील आपल्या या प्रवासाचे प्रतिबिंब उमटलेले दोन ललित-लेख माझ्या वाचण्यात आले. चतुरस्र लेखक व्यंकटेश माडगूळकर बालपण खेड्यात व्यतीत करून पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेले. त्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणच्या अनुभवांच्या आधारे ‘रानमेवा’ या संग्रहामध्ये एक लेख लिहिला आहे आहे. दुसरा लेख ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ मधील आहे. या दोनही लेखांचे शीर्षक लेख ‘चिमण्या’ असेच आहे . या दोहोंमध्ये मिळून मानव-चिमणी संबंधातील सहजीवन, दुरावा आणि निरोप असे तीन टप्पे मला दिसले. हे तीन वेचे ‘चिमण्या’ या एका सदरामध्ये इथे प्रसिद्ध करतो आहे. यातील पहिला नि तिसरा वेचा माडगूळकरांच्या लेखातील आहे तर दुसरा ग्रेस यांचा. हे तीनही लेख एक-एका आठवड्याच्या अंतराने प्रकाशित केले जातील.

चिमण्या - १ : सहजीवन
चिमण्या - २ : दुरावा
चिमण्या - ३ : निरोप

---

टीप:
कवितांच्या जगातील चिमणीचा वेध घेणारा प्रा. नीला कोर्डे यांचा दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला लेख:  'या चिमण्यांनो, या गं या '


हे वाचले का?

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

‘लॉरेन्स आला रेऽऽ आलाऽ’ अर्थात माध्यम-कुंई

मिरानशाह हे आरएएफचं(१) हिंदुस्तानातलं सर्वांत लहान ठाणं अफगाण सीमेपासून दहा मैलांवर होतं. पठाणांचे तिथं वारंवार हल्ले होत असत. काटेरी तारांच्या कुंपणानं वेढलेल्या भूभागावर विटा आणि माती यांनी उभारलेल्या गढीवजा वास्तूला मिरानशाह फोर्ट म्हणत. आजूबाजूचा प्रदेश डोंगराळ होता.

मिरानशाह इथं आरएएफचे सव्वीसजण आणि पाचशे हिंदुस्तानी जवान राहत. मात्र हे दोन्ही गट गढीत वेगवेगळ्या कक्षांत राहत असल्यानं त्यांचा एकमेकांशी क्वचितच संबंध येई.

आरएएफच्या लोकांचं काम म्हणजे विमानाच्या धावपट्टीची देखभाल करणं. दिवसा त्यांना काटेरी कुंपणाच्या बाहेर जाण्यास मज्जाव होता, तसाच रात्री गढीबाहेर जाण्यास. रोज रात्री कडक पहारा आणि सर्चलाइटच्या झोतांची अविरत दिवाळी असे.

लॉरेन्सनंच म्हटल्याप्रमाणे, आरएएफचे लोक आणि हिंदुस्तानी यांचा संपर्क नसल्यानं मिरानशाहमध्ये माणसांचा आवाज नसे, पक्ष्यांचा नसे आणि जनावरांचाही नसे. अपवाद एकच. रोज रात्री सर्चलाइट्स सुरू झाल्यावर दहाच्या सुमारास कोल्ह्यांची मात्र पाचेक मिनिटं ‘कुई-मैफल’ चाले.

मिरानशाहमधली नीरव शांतता खूपच गूढ आणि काहीशी अभद्रानं सावटलेली वाटे.

लॉरेन्सला इथलं जवळजवळ एकांतवासाचं वातावरण मानवण्यासारखं होतं. त्यानं ट्रेंचार्डना धाडलेल्या पत्रात आपला सेवाकाल आणखी पाच वर्षांनी वाढवून देण्याची विनंती केली आणि ती मान्यही झाली. परंतु इंग्लंडमधल्या त्याच्या कित्येक मित्रांना ही गोष्ट मुळीच रुचली नाही. ते बिचारे त्याला इंग्लंडमध्ये परत आणण्याचा सारखा प्रयत्न करत होते.

अफवाच अफवा चोहीकडे...

कराचीतल्या नोकरीत लॉरेन्स रुळत चालला होता. पण वर्ष उलटण्याच्या आतच एकाएकी त्याच्यावरून एक वादळ निर्माण झालं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ते किती प्रचंड स्वरूप धारण करणार आणि त्यात फॉरेन ऑफिस, इंडिया ऑफिस, हिंदुस्तानचे व्हाइसरॉय, काबूलमधले ब्रिटिश मंत्री, चीफ ऑफ एअर स्टाफ, आरएएफची परदेशातली तीन ठाणी, शाही नौदल तसंच दोन ब्रिटिश संसद सदस्य गुंतले जाणार, याची त्या वेळी कुणालाच कल्पना नव्हती.

हे वादळ निर्माण केलं होतं, वृत्तपत्रांनी. त्यामुळं ब्रिटिश सरकारची फारच मोठी पंचाईत होऊन बसली.

पण या साऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या लॉरेन्सला मात्र त्याची काहीच गंधवार्ता नव्हती.

लॉरेन्स ऑफ अरेबिया

काही दिवसांपासून त्याच्याविषयी अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. त्याला लांबच्या आणि जवळजवळ एकाकी ठिकाणी पाठवण्यात आलं आहे, त्यामागं नक्कीच काहीतरी राजकीय हेतू असल्याच्या या वावड्या होत्या. इराकमधल्या परिस्थितीच्या संदर्भातील लॉरेन्स आणि ट्रेंचार्ड यांच्यातल्या पत्रव्यवहाराची कुणाला तरी कुणकुण लागली असण्याची शक्यता होती.

लॉरेन्स पश्चिम आशियातला गुंता सोडवण्याच्या कामात गढला आहे, अशा आशयाची एक वृत्तकथा जुलैमध्ये ‘न्यू यॉर्क सन’ या वृत्तपत्रानं छापून एकूण प्रकरणाची नांदी केली. सध्या तो येमेनमध्ये असल्याचाही त्यानं हवाला दिला. वस्तुतः तो मिरानशाहच्या कुंपणाबाहेरही पडला नव्हता.

सप्टेंबरमध्ये ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’नं तर वेगळाच सनसनाटी जावईशोध लावला. त्यानं छापलं, की लॉरेन्स मुसलमान फकिराचा वेश धारण करून हेरगिरी करत वावरतो आणि एतद्देशीय बायका दृष्टनिवारणार्थ आपल्या मुलांना त्याच्याकडे घेऊन येतात.

अशाच प्रकारचं एक वृत्त त्याच महिन्यात लंडनच्या ‘ईव्हनिंग न्यूज’मध्ये झळकलं. त्यात पुढं आणखी पुस्ती जोडली होती, की लॉरेन्स अमृतसरमध्ये एका अज्ञात ठिकाणी राहत असून तिथल्या कम्युनिस्टांच्या हालचालींचा वेध घेत आहे.

अफवांचं नुसतं पेवच फुटलं. कुणी म्हणत, की तो अफगाणिस्तानात राहून ब्रिटिश सरकारसाठी अफगाण जीवनशैलीचा अभ्यास करत आहे(२); तिथल्या लोकांची मतं, विचार जाणून घेत आहे. कुणी छातीठोकपणे लिहिलं, की अफगाणिस्तानात जाण्याआधी सध्या लॉरेन्स पुश्तू भाषेचे धडे गिरवण्यात व्यस्त आहे. ‘न्यू यॉर्क हेरल्ड ट्रिब्यून’नं दावा केला, की लॉरेन्स सरहद्द ओलांडून अरब वेशात अफगाणिस्तानात गेला आहे. तिथं तो म्हणे, ग्रेट ब्रिटन आणि अमीर अमानुल्ला यांच्यातल्या तहाबाबतची बोलणी करणार आहे.

हिंदुस्तानी वर्तमानपत्रंही आता इंग्लिश वृत्तपत्रांच्या सुरात सूर मिळवू लागली. हिंदुस्तानी राष्ट्रीय चळवळीचे एक नेते लाला लजपत राय यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी लॉरेन्स फकिराच्या वेशात उपस्थित होता, असं एका पत्रानं छापलं. त्यामुळं तो वास्तवात हिंदुस्तानी स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांवर नजर ठेवण्याची हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्याची सोव्हिएत श्रेष्ठींना आयतीच संधी मिळाली.

नोव्हेंबर १९२७ मध्ये अफगाणिस्तानात शिनवारी जमातीच्या लोकांनी बंड पुकारलं. तिथं जवळजवळ यादवी युद्धाचीच परिस्थिती निर्माण झाली. लॉरेन्सचं अर्थातच याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. पण १६ डिसेंबर १९२८ च्या ‘एम्पायर न्यूज’ या ब्रिटिश साप्ताहिकात एक वृत्तकथा प्रसिद्ध झाली आणि तिनं खळबळ उडवून दिली.

या वृत्तकथेचा लेखक होता, कुणी डॉ. फ्रान्सिस हॅवलॉक. त्याच्याबद्दल संपादकीय टिपेत दिलेल्या माहितीनुसार तो वैद्यकीय सेवाव्रती (मेडिकल मिशनरी) असून नुकताच अफगाणिस्तानातून लंडनला परतला होता. त्याच्या वृत्तकथेचा एकूण सारांश असा—

“नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कर्नल लॉरेन्स याचं अफगाणिस्तानात आगमन झालं. या मुक्कामात त्याचं राजेसाहेब, पोलीस-प्रमुख आणि युद्धमंत्री यांच्याशी खलबत झालं. त्यानंतर तो लागलीच जसा आला, तसाच निघून गेला... इथल्या पर्वतामधल्या कुठल्यातरी अज्ञात गुहेत एक हाडकुळा माणूस वावरताना दिसतो. त्याच्या एकूण वेशावरून तो फकीर वाटतो. पण तो आहे कर्नल लॉरेन्स. ब्रिटिश साम्राज्यातला सर्वांत गूढ, रहस्यमय माणूस. पूर्वेकडला ब्रिटिशांचा अग्रदूत... सध्याची लढाई द्वेषप्रसारक आणि शांतताप्रसारक यांच्यातली आहे... ट्रेबिट्स्क लिंकनपाशी (माजी हेर, माजी ब्रिटिश खासदार, चीनमधला सोव्हिएत सरकारचा हस्तक) सोनं आणि रायफली आहेत. डोंगरी लोकांना दोन्ही आवडतात. लॉरेन्सकडे काय आहे, ते ठाऊक नाही. मात्र रुपेरी जिव्हेची त्याला जन्मजात देणगी आहे.”

ही वृत्तकथा म्हणजे मुद्दाम रचलेली एक भाकडकथाच होती. हिंदुस्तान सरकारनं डॉ. फ्रान्सिस हॅवलॉक याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अशी कुणीही व्यक्ती अस्तित्वात असल्याचं आढळून आलं नाही. शेवटी ‘एम्पायर न्यूज’ला त्या वृत्तकथेत काहीच तथ्य नसल्याचं जाहीर करणं भाग पडलं. पण तिनं निर्माण केलेला हाहाकार थांबवण्यास आता बराच उशीर होऊन गेला होता.

डॉ. हॅवलॉकची वृत्तकथा ‘फ्री प्रेस मेल सर्व्हिस’ नामक यंत्रणेद्वारा तारेनं हिंदुस्तानात येऊन पोचली. तिथं ती मोठ्या प्रमाणात प्रसृत झाली. लॉरेन्स हिंदुस्तानी राष्ट्रीय चळवळीतल्या लोकांवर नजर ठेवून हेरगिरी करत असल्याच्या संशयाला अधिकच बळकटी आली. लोकांत प्रक्षोभ माजला. लाहोरमध्ये एका खऱ्याखुऱ्या फकिराला तो लॉरेन्सच असल्याच्या संशयावरून संतप्त जमावानं बेदम मारहाण केली.

अफगाण सरकारला संशय

आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे काबूलमधल्या ब्रिटिश प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखाचा एकूण प्रकरणातला हस्तक्षेप. त्यानं ३ जानेवारी १९२९ रोजी या संदर्भात हिंदुस्तान सरकारला सविस्तर तार केली. तारेचा गोषवारा असा—

“लॉरेन्स ‘शॉ’ या नावानं अफगाण सरहद्दीलगतच्या एका तळावर कारकून म्हणून काम करत असल्याच्या माहितीनं त्याच्याविषयीच्या अफवांना अधिक बळ मिळालं. त्यामुळं तर अफगाण सरकारचा संशय अधिकच दृढ झाला आहे. त्या सरकारला वाटतं, की तो आपल्याविरुद्ध काहीतरी गुप्त कटकारस्थान करतो आहे. या संशयाबाबत आगीत तेल ओतण्याचं काम तुर्की, रशियन आणि अर्थातच फ्रेंच राजदूतांनी चालवलं आहे(३). अफवांचा आता कितीही इन्कार केला, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. प्राप्त परिस्थितीत एकच मार्ग दिसतो. तो म्हणजे आरएएफला विनंती करून लॉरेन्सला लवकरात लवकर सरहद्दीपासून लांब कुठेतरी पाठवण्यात यावं.”

हिंदुस्तान सरकारचं या संदर्भात हिंदुस्तानातल्या आरएएफचा प्रमुख जॉफ्री सामंड याच्याशी बोलणं झालं. दुसऱ्याच दिवशी सामंडनं एकूण प्रकरण ट्रेंचार्डना कळवलं. त्याच्या तारेचा आशय असा–

“हिंदुस्तानातल्या शांतताभंगाच्या, दहशतवादी घटनांशी गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्सचं नाव जोडलं जात आहे. देशी वर्तमानपत्रांत तर अलीकडे म्हटलं गेलं आहे, की लाहोरमधल्या बॉम्बस्फोटाच्या मागं लॉरेन्सच आहे... अफगाणिस्तानात कटकटी सुरू झाल्यापासून ही पत्रं रशियन प्रचारमोहिमेच्या आहारी जाऊन सांगू लागली आहेत, की शिनवारींच्या बंडामागंही लॉरेन्सच असून त्यासाठीच तो मिरानशाह इथं मुक्काम ठोकून आहे. आपण अर्थातच एका अधिकृत निवेदनाद्वारे या साऱ्याचा स्पष्ट इन्कार केला आहे...

“परराष्ट्र कार्यालयाशी झालेल्या चर्चेत त्यांनी लॉरेन्सला परत मायदेशी पाठवून देण्यावर भर दिला. मला हे वेडेपणाचं वाटतं. मी माझी हरकत नोंदवली. लॉरेन्सला शाही हवाई दलात राहण्याचा पूर्ण हक्क आहे... ते काहीही असलं, तरी परराष्ट्र सचिवांनी मला कळवलं आहे, की अफगाणिस्तानातल्या बंडामागं आपणच (ब्रिटिश) असून लॉरेन्स त्याचं नियोजन करतो आहे, अशी जोरदार प्रचारमोहीम काबूलमध्ये उघडण्यात आली आहे. त्यामुळं परराष्ट्र सचिवांना वाटतं, की अशा एकूण परिस्थितीत लॉरेन्सनं हिंदुस्तानात कुठंही राहणं आपल्याला गैरसोयीचं, अडचणीत आणणारं ठरेल. आपण या बाबतीतले आपले विचार कृपया कळवावेत.”

एकंदरीत अरबस्तानात लॉरेन्सनं जो काही लौकिक संपादन केला होता, त्याचं जणू भूतच परत त्याच्या मानगुटीवर बसू पाहत होतं. दूरान्वयानंही त्याचा ज्याच्याशी सुतराम संबंध नव्हता, अशा गोष्टींत तो नाहक ओढला गेला होता आणि त्याचा काहीही दोष नसताना त्याला हिंदुस्तानबाहेर घालवून देण्याचा घाट घातला जात होता.

हिंदुस्तानातून उचलबांगडी

बाहेरच्या जगात आपल्यावरून चाललेल्या या एकंदर घटनांची लॉरेन्सला अर्थात काहीच कल्पना नव्हती. मिरानशाहमधला त्याचा जीवनक्रम सुशेगाद चालला होता. फावल्या वेळात (आणि तो भरपूरच होता.) होमरच्या ‘ओडिसी’च्या भाषांतराचं त्याचं काम चालूच होतं. मनात फक्त एकच धाकधूक होती. आर्थिक काटकसरीच्या कारणावरून हिंदुस्तान सरकार १९२९ च्या वसंतात मिरानशाहचं ठाणं बंद करण्याचं ठरवत होतं.

सामंडची तार मिळताच ट्रेंचार्डनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लागलीच हालचालींना सुरुवात केली. त्यांनी सामंडला उत्तर पाठवलं–

“लॉरेन्सला आपण हिंदुस्तानबाहेर हलवलं काय किंवा न हलवलं काय किंवा काहीही केलं, तरी त्याच्याविषयीचा प्रचार हा चालूच राहणार आणि लोक काही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हिंदुस्तानातून त्याची बदली करण्यास मी मान्यता देतो. तेव्हा तुम्ही जरा लॉरेन्सला एक गोष्ट विचारून पाहाल काय? त्याला एडनला जायला आवडेल काय? का सोमालीलँडला दोघातिघांच्या छोट्या गटात काम करायला आवडेल? का सिंगापुरात वर्षभरासाठी? का लंडनलाच परतायला? माझ्याकडून शक्य होईल, तेवढी मदत त्याला करायची आहे.”

८ जानेवारीस लॉरेन्सला तातडीनं विमानानं मिरानशाहहून प्रथम लाहोरला नेण्यात आलं. तिथं त्याला सामंडचं पत्र मिळालं. त्यात मध्यंतरीच्या सर्व घडामोडींची थोडक्यात माहिती देऊन ट्रेंचार्डचे पर्याय त्याच्यापुढं ठेवण्यात आले होते. लॉरेन्सनं इंग्लंडला परतणं पसंत केलं. त्याप्रमाणे त्याच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. १२ जानेवारी रोजी लॉरेन्स मुंबईहून ‘एस. एस. राजपुताना’ या बोटीनं हिंदुस्तान सोडून निघाला.

त्यानं हिंदुस्तान सोडला, तरीही अफगाणिस्तानातील त्याच्या तथाकथित कारवायांविषयीच्या वृत्तपत्रीय बातम्या-चर्चाची गुर्‍हाळं काही थांबली नव्हती. इतकंच नव्हे, तर मुंबईहून बोटीनं इंग्लंडला रवाना झाला, तो लॉरेन्स नसून त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा डमी असल्याचीही अफवा उठवण्यात आली. एकानं तर त्याहीपुढं जाऊन लॉरेन्सच्या पुढच्या पुस्तकाचं नाव ‘रिव्होल्ट इन अफगाणिस्तान’(४) असल्याचं जाहीर करून टाकलं. एका जर्मन वृत्तपत्राच्या प्रतिभाशाली वार्ताहरानं ‘आतली बातमी’ म्हणून सांगून टाकलं, की अफगाणिस्तानात लॉरेन्स ही एकूणच कथा बनावट असून लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रिव्होल्ट इन द डेझर्ट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्माण केलेला एक स्टंट आहे(५).

भर समुद्रातलं नाट्य

‘एस. एस. राजपुताना’वर फारसे उतारू नव्हते. लॉरेन्सला दुसऱ्या वर्गाची स्वतंत्र केबिन देण्यात आली होती. तिच्यातून तो क्वचितच बाहेर पडे. बराचसा वेळ तो ‘ओडिसी’च्या भाषांतराच्या कामातच घालवी. त्याचा वेळ छान मजेत जात होता.

वाटेत पोर्ट सैदला त्याची बोट कोळसा भरण्यासाठी थांबली. लॉरेन्सला बोट सोडून किनाऱ्यावर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आरएएफचा एक अधिकारी बोटीवर चढला आणि त्यानं त्याला ट्रेंचार्ड यांचं एक पत्र दिलं. पत्रात लॉरेन्ससाठी काही सूचना होत्या–

“तुझ्या आगमनासरशी वर्तमानपत्रांचे लोक तुला गाठून तुझी मुलाखत तसंच तुझी छायाचित्रं घेण्याचा प्रयत्न करतील, अशी मला भीती वाटते. तू त्यांना मुलाखत देण्याचं शक्य तेवढं टाळ. प्लायमाउथला तू बोटीतून उतर. तुझी भेट घेण्यासाठी मी कुणाला तरी पाठवत आहे. तो माणूस साध्या कपड्यातला असेल. प्लायमाउथपासून तू रजेवर जाऊ शकतोस. मात्र लवकरात लवकर मला येऊन भेट.”

लॉरेन्स इंग्लंडला पोचताक्षणीच टपून बसलेले वार्ताहर त्याला हेरून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याशिवाय राहणार नाहीत, हे आधीच हेरून हवाई मंत्रालयानं त्याला वाटेत प्लायमाउथलाच उतरवून एका नौदल अधिकाऱ्यानं लाँचमधून किनाऱ्यावर न्यायचं, अशी योजना आखली.

२ फेब्रुवारीला बोट प्लायमाउथला आल्यावर विंग कमांडर सिडनी स्मिथनं तिच्यात प्रवेश केला. त्याला मिळालेला आदेश अगदी साधासरळ होता. “लॉरेन्सला लवकरात लवकर आणि गुपचूप लंडनला घेऊन ये.”

स्मिथ आणि लॉरेन्स यांचा पूर्वपरिचय होता. स्मिथनं लॉरेन्सला ट्रेंचार्ड यांचं पत्र दिलं. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी दिलेले दोन पौंडही. पत्रात ट्रेंचार्डनी त्याबद्दल लिहिलं होतं, “नवी घडी बसवताना तुला याची गरज असेल, नसेल. पण मी देत आहे. तुला वाटेल, तेव्हा तू ते परत करू शकतोस.”

स्मिथच्या संदर्भात त्यांनी लिहिलं होतं, “वार्ताहरांपासून मी तुझा बचाव करू शकत नाही. ते काम स्मिथ करील. तो तुला ‘राजपुताना’पासून रेल्वेपर्यंत बिनबोभाट घेऊन जाईल आणि तुझी इच्छा असल्यास या दोन टप्प्यांत कुठंही असलेल्या वार्ताहरांना तो हुलकावणी देईल.”

पण सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे सुशेगाद व्हायच्या नव्हत्या. प्लायमाउथ बंदरात ‘राजपुताना’ थांबली असताना तिच्या दुसऱ्या बाजूनं लॉरेन्सला दोरखंडाच्या शिडीवरून खाली उतरवून आधीच बोटीपाशी आणून ठेवलेल्या मोटर-बोटीतून गुपचूप स्टेशनकडे घेऊन जायचं, असा बेत होता. पण कसा कुणास ठाऊक, काहीतरी शिजतंय, असा वार्ताहरांना वास लागला होता. हवाई मंत्रालय एकूण ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत होतं, त्यामुळं वार्ताहरांचं कुतूहल एकदम चाळवलं गेलं होतं.

हिंदुस्तानात जे काही घडत होतं, त्याच्याशी जर का लॉरेन्सचा संबंध नाही, तर मग त्याच्या पुनरागमनाबाबत एवढी गुप्तता का, असा प्रश्न साहजिकच वार्ताहरांच्या मनात निर्माण झाला. तेही मग सर्वतोपरी मागावर राहून प्लायमाउथला छोट्या नावांतून समुद्रात घुटमळत होते. लॉरेन्स शिडीवरून खाली उतरताना एका नावेतल्या ‘डेली मिरर’च्या छायाचित्रकाराला दिसला. लॉरेन्सच्या अंगावरच्या आरएएफच्या निळ्या गणवेशावरून त्यानं त्याला लागलीच ओळखलं. तो कॅमेरा सज्ज करेपर्यंत लॉरेन्स मोटर-बोटीत बसला होता. छायाचित्रकाराला तो तिथून वेगानं निघून जातानाची छायाचित्रं मिळाली.

फार्सिकल पाठलाग

इथून तडक प्लायमाऊथ स्टेशनवर जाऊन लंडनची ट्रेन पकडायची घाई करण्यापेक्षा आधी कॅटवॉटरला जाऊन शांतपणे न्याहारी उरकून घ्यावी, या विंग कमांडर स्मिथच्या सूचनेस लॉरेन्सनं संमती दिली. त्याप्रमाणे पोटपूजा आटोपून दोघे न्यूटन अॅबट स्टेशनवर गेले आणि तिथून लंडनला निघणारी पहिलीच गाडी त्यांनी पकडली. इथपर्यंत ठीक होतं.

पण तेवढ्यातच प्लायमाउथवरून लंडनला निघालेली ट्रेन स्टेशनात आली. स्मिथ आणि लॉरेन्स बसले होते, तो डबा वेगळा करण्यात येऊन प्लायमाउथच्या गाडीला जोडण्यात आला. नेमक्या त्याच गाडीत प्लायमाउथहून लंडनला परतणारे काही वार्ताहर होते. निळ्या गणवेशातली लॉरेन्सची छोटी मूर्ती त्यांनी लागलीच ओळखली.

पुढचं स्टेशन येताच या वार्ताहरांनी पटापट गाडीतून उड्या मारून आधी तिथलं तार ऑफिस गाठलं आणि लंडनमधल्या आपापल्या कार्यालयांना अखेर लॉरेन्स सापडल्याचं ‘सनसनाटी’ वृत्त देऊन टाकलं. पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची स्मिथला चांगलीच कल्पना आली.

पॅडिंग्टनला पोहोचल्यावर तो आपल्या परीनं लॉरेन्सला वार्ताहरांच्या ससेमिऱ्यापासून दूर राखण्याचा प्रयत्न करू लागला. पण दस्तुरखुद्द लॉरेन्समहाशयांची मात्र एकूण प्रकारानं चांगलीच करमणूक होत असल्याचं त्याला दिसून आलं.

एका वार्ताहरानं लॉरेन्सला गाठून विचारलं, “तुमचं नाव शॉ आहे काय?”

“अर्थातच नाही!” लॉरेन्स जोरजोरात मान हलवून म्हणाला, “आपलं तर नाव स्मिथ आहे!”

वैतागलेल्या स्मिथनं मग खट्याळ लॉरेन्सला सरळ टॅक्सीत घातलं आणि ते निघाले. पण वार्ताहर एकदा गवसलेल्या सावजाला आता सहजासहजी थोडंच सोडणार! मग एखाद्या फार्सिकल कॉमेडीत शोभावा असा पाठलाग सुरू झाला. त्यात आणखी विशेष म्हणजे लॉरेन्सचा टॅक्सी ड्रायव्हर गाडी इतकी हळू चालवत होता, की वार्ताहरांच्या टॅक्सीला पाठलागात काहीच अडचण आली नाही. आपल्या ड्रायव्हरला लाच दिली गेल्याचा स्मिथनं मागाहून निष्कर्ष काढला.

लॉरेन्सला आधी सगळीच गंमत वाटत होती. पण मग लवकरच त्याला चिंताही वाटू लागली... या असल्या अतिशयोक्त प्रसिद्धीनं आरएएफमधल्या आपल्या नोकरीवर तर गदा येणार नाही ना?

वार्ताहरांपासून सुटका करून घेणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर विंग कमांडर स्मिथनं ठरवलं, की क्रॉम्वेल स्ट्रीटवर असलेल्या आपल्या मेहुणीच्या फ्लॅटचा तात्पुरता आसरा घ्यायचा. लॉरेन्सही कबूल झाला. पण फ्लॅटपाशी टॅक्सी थांबताच स्मिथची घाई करण्याची सूचना दुर्लक्षून तो अगदी वेळ काढत काढत खाली उतरला. तोवर मागच्या टॅक्सीतले वार्ताहर उतरून त्याच्याभोवती गोळा झाले. लॉरेन्सला सगळी मौजच मौज वाटत होती. स्मिथनं मग काहीसं खेचतच त्याला फ्लॅटवर नेलं.

राजकीय क्षेत्रात खळबळ

दरम्यानच्या काळात लंडनच्या राजकीय क्षेत्रात लॉरेन्सच्या परदेशातील एकूण ‘प्रतापां’वरून बरीच खळबळ माजली होती. कुणालाही त्या संदर्भात नेमकी काहीच माहिती नसल्यानं तर गोंधळ अधिकच वाढला होता. मजूर पक्षानं लॉरेन्सविषयक अफवांचा राजकीय लाभ उठवणं, आगीत तेल ओतणं चालूच ठेवलं होतं. अफवांवर विश्वास ठेवून बेफाम झालेल्या जमावानं लॉरेन्सच्या प्रतिमेचं दहन केलं. २८ जानेवारी रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाचे खासदार अर्नेस्ट थर्टल यांनी आरएएफमधल्या लॉरेन्सच्या खोट्या नावाखाली झालेल्या भरतीचा प्रश्न उपस्थित केला. हवाई खात्याचे मंत्री सर सॅम्युएल हॉर यांना त्यास तोंड द्यावं लागलं. त्याबद्दलचा त्यांचा वैताग समजण्यासारखा होता. कारण हवाई दलातल्या लॉरेन्सच्या पुनर्नियुक्तीबद्दल ते सतत विरोधच दर्शवत आले होते आणि आता त्यांनाच या वादंगात ओढलं जात होतं. सदनात लॉरेन्सविषयी अनेक प्रश्नांचा भडिमार होत होता. हे प्रकरण लवकर निवण्याची चिन्हं दिसत नव्हती.

दुसऱ्या दिवशी सॅम्युएल हॉरनी या प्रश्नांना उत्तर म्हणून पुढील आशयाचं एक निवेदन केलं–

“कर्नल लॉरेन्स याची लष्करातून हवाई दलात शॉ या नावानं बदली झाली असली, तरी त्याची खरी ओळख ठाऊक होती. आपल्याला याच नव्या नावानं ओळखलं जावं असं त्याला वाटलं आणि त्या नावानं हवाई दलाच्या सेवेत त्याला स्वीकारताना काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही.”

शापुरजी सकलातवालांची प्रश्नावली

लंडनला येऊन दाखल झाल्यावर लॉरेन्स दुसऱ्या दिवशी, रविवारी विंग कमांडर स्मिथ याच्यासह ट्रेंचार्ड यांच्या घरी त्यांना भेटायला गेला. आपण पुढं काय करायचं, याची त्याला चर्चा करायची होती. कॅटवॉटर इथं विंग कमांडर सिडनी स्मिथ याच्या हाताखाली आपली कायमची नेमणूक केली जावी, ही लॉरेन्सची सूचना चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रेंचार्ड यांनी लागलीच मान्य केली.

त्याच दिवशीच्या ‘संडे पिक्टोरिअल’च्या अंकात लॉरेन्सची आदल्या दिवशी प्लायमाउथ इथं घेतली गेलेली छायाचित्रं झळकली.

दुसऱ्या दिवशी, सोमवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लॉरेन्सनं अर्नेस्ट थर्टल यांची भेट घ्यायचं ठरवलं.

संसदेत थर्टल विचारत असलेल्या प्रश्नांचं एकूण स्वरूप पाहून त्याला थोडी चिंता वाटू लागली होती. आपण हेर असल्यानंच आपण वेगळं नाव धारण करत आहोत, असं सूचित होईल की काय, याची त्याला मुळीच चिंता नव्हती. चिंता होती, ती आपल्या जन्मरहस्याची. थर्टलनी नावाबाबत जोर लावून अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न केल्यास आपला अनौरसपणा षट्कर्णी होईल, अशी त्याला भीती वाटत होती.

लॉरेन्सनं थर्टलना काहीही न लपवता आपलं जन्मरहस्य सांगून टाकलं. लॉरेन्सच्या प्रामाणिकपणानं थर्टल चांगलेच प्रभावित झाले आणि इतःपर या संदर्भात संसदेत अधिक प्रश्न न विचारण्याचं त्यांनी मान्य केलं. पण थर्टल आणि पक्षीय सहकारी गप्प बसले, तरी शापुरजी सकलातवाला नामक एक पारशी कम्युनिस्ट खासदार काही गप्प बसायला तयार नव्हते. दोनच दिवसांनी त्यांनी परराष्ट्र सचिव सर ऑस्टिन चेम्बरलेन यांच्याकडे लॉरेन्ससंबंधित एक प्रश्नावलीच दिली.

हिंदुस्तानच्या वायव्य सरहद्दीवर अजूनही लॉरेन्सच्या गुप्त कारवाया चालूच असून एअरक्राफ्टमन शॉचा वेश धारण केलेला दुसराच कुणीतरी डमी इंग्लंडला पाठवण्यात आला आहे, असं सूचित करणारा सकलातवालांचा प्रश्न उपस्थित झाल्यावर सारं हाऊस ऑफ कॉमन्स हास्यकल्लोळात बुडून गेलं. बिनबुडाच्या अफवा पसरवण्यात आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्या गाडून टाकण्याकडेच अधिक ध्यान दिल्यास जागतिक शांततेसाठी ते अधिक उपकारक ठरेल, असं चेंबरलेननी सकलातवालांना सुनावलं.

हा सारा वृत्तांत ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये छापून आला. त्यानंतर मात्र लॉरेन्सच्या ‘हिंदुस्तान आणि अफगाणिस्तान पर्वा'वरची जाहीर चर्चा थांबली.

लॉरेन्सभोवती निर्माण झालेलं एकूण गूढतेचं वलय हे जसं या अफवांना कारणीभूत आहे, तशीच त्या वेळची एकंदर राजकीय अस्थिर परिस्थितीही. लॉरेन्सविषयीच्या गोष्टी अतिशयोक्त करून पसरवण्यात ब्रिटनच्या शत्रूचा जितका वाटा होता, तितकाच धंदेवाईक तसंच विशिष्ट राजकीय दृष्टिकोन असणाऱ्या वृत्तपत्रांचाही. त्यातही खास करून ‘डेली न्यूज’अधिक कुत्सित आणि खोडसाळ होतं. त्यानं अफवांची टाकसाळच उघडली होती. बहुतांश त्याच्यामुळेच सरकारला लॉरेन्सची गुपचूप बदली करणं भाग पडलं.

मात्र आपला काहीही अपराध नसताना हिंदुस्तानातून आपली उचलबांगडी करण्यात आली, ही गोष्ट नाही म्हटलं तरी लॉरेन्सच्या मनाला लागलीच!

(‘हिंदुस्तानी वादळ’ या प्रकरणातून )

- oOo -

पुस्तक: लॉरेन्स ऑफ अरेबिया
लेखक: यशवंत रांजणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
आवृत्ती: दुसरी
वर्ष: २०१३.
पृ: २४५- २५४.
---

पोस्टकर्त्याच्या टीपा:

(१). RAF : Royal Air-Force

(२). ब्रिटिशांसाठी नव्हे तर स्वत:च्या अभ्यासाचा भाग म्हणून आणि अंगभूत जिज्ञासेची परिणती म्हणून त्याने अरब जीवनपद्धतीचा केलेला अभ्यास नि त्यांचे त्या जीवनशैलीशी नि तेथील जनतेशी समरस होणे यातून त्याचे अरब उठावातील नेतृत्व उभे राहिले होते. यात ब्रिटिश धोरणांचा थेट संबंध नव्हता. परंतु त्याच धर्तीवर आता लॉरेन्सचा अन्यत्र वापर होत असल्याचा समज बळावत चालला होता. त्यातून अशा समजांना खतपाणी मिळत होते. त्याचबरोबर महायुद्धाच्या अखेरीस त्याचा तेथील सहभाग संपल्यानंतर तो नाव बदलून खुद्द ब्रिटिश हवाई दलातच कनिष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून काम करत राहिल्याचे उघड झाल्यावर या सार्‍या दंतकथांना मोकाट रान मिळाले.

(३). पहिल्या महायुद्धाअखेरीस विजेत्या दोस्त राष्ट्रांच्या ‘शांतता परिषदे’मध्ये युद्धोत्तर सीमा आखणीदरम्यान लॉरेन्सने अरबांनी जिंकलेला प्रदेश त्यांच्याच ताब्यात राहायला हवा असे जोरदार प्रतिपादन केले. त्यासाठी ब्रिटन, अमेरिका यांचा पाठिंबाही मिळवला होता. यातून सीरिया, लेबनॉनवर हक्क सांगू लागलेल्या फ्रेंचांचा त्याच्यावर मोठा रोष निर्माण झालेला होता. अरब उठाव हा ऑटोमन साम्राज्याच्या– म्हणजे तुर्कांच्या विरोधात असल्याने ते अरबांचे आणि पर्यायाने लॉरेन्सचे शत्रू होतेच. या महायुद्धाखेरीस नव्यानेच उदयाला आलेल्या ‘सोव्हिएत रशिया’ या महासत्तेला ब्रिटिश-फ्रेंच युतीच्या विरोधात युरपमध्ये हातपाय पसरायचे असल्याने तेही तुर्कांच्या सुरात सूर मिसळू लागले होते.

(४). ‘Revolt in Desert’ या शीर्षकाखाली आपल्या अरेबियातील वास्तव्य आणि अरब उठावातील सहभाग यावर लॉरेन्स त्यावेळी पुस्तक लिहित होता.

(५). वास्तविक १९३१ मध्ये प्रसारित झालेला या नावाचा चित्रपट नि लॉरेन्सची कथा वा पुस्तक यांचा काहीही संबंध नाही असे दिसते.


हे वाचले का?