शुक्रवार, १७ मे, २०२४

आज धारानृत्य चाले...

महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे.

जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘चित्रे आणि चरित्रे’ या पुस्तकामध्ये ‘साहसी संशोधक: जेन गुडाल(१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे.(२)


चित्रे आणि चरित्रे

एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उंबराच्या झाडावर चरणाऱ्या चिंपॅन्झींचा कळप न्याहाळत जेन आपल्या नेहमीच्या डोंगरावरच्या शिळेवर बसली होती. झाडावर डेव्हिड होता. गॉलिथ होता. काही माद्या होत्या. काही तरुण नर होते, पोरं होती. आणि एकाएकी वादळ सुरू झालं. कडाड्ङ्कड् अशी जोराची वीज झाली. धो-धो पाऊस कोसळू लागला.

माकडं झाडाखाली उतरली. उघड्यावर आली. एकापाठोपाठ एक अशा गवताळ गवंडावर चढली. पुन्हा वीज चमकली. त्यासरशी एक नर दोन पायांवर उभा राहिला. हलू-झुलू लागला. तालात पाय टाकू लागला. पावसाच्या, वाऱ्याच्या आवाजातूनही त्यानं मारलेल्या उंच आरोळ्या ऐकू येत होत्या. मग एकाएकी उतारावरून धावत तो तीस यार्डावर असलेल्या त्या मघाच्या उंबराकडं आला. आपला घसरतीचा वेग सावरण्यासाठी एका लहान झाडाचा बुंधा धरून त्याच्याभोवती फिरला. डहाळीवर उडी मारून पावसात गप्प बसून राहिला.

त्याच्या मागोमाग आणखीही नर उभे राहिले. झाडावर चढून त्यांनी डहाळ्या वर-खाली हलविल्या. त्याच गतीत एकानं मोठी डहाळी तोडली. ती ओढत-ओढत चढ उतरला. हे त्याचं वर्षा-नृत्य बघत जेन बसून होती. वरच्यावर काळ्या आभाळात विजा लवत होत्या. माद्या-पोरं डहाळ्यांतून गप्प बसून होती आणि नर झुलत होते. फांद्या हलवीत होते, पळत होते. आनंदानं किंचाळत होते. डोक्यावर पॉलिथिन घेऊन जेन पाहत होती. तिला वाटलं, अश्मयुगात माणसानंही अशाच पद्धतीनं पंचमहाभूतांना आव्हान दिलं असेल!

पुढं सबंध दहा वर्षांच्या काळात तिला हे वर्षा-नृत्य फक्त दोनदा बघायला मिळालं.(३)


हे चिम्पान्झी पावसाचे हे असे स्वागत किती शतकांपासून करत आहेत हे कुणाला निश्चित सांगता येईल असे वाटत नाही. परंतु मानवी इतिहासामध्ये आदिम जमातींमधून पर्जन्य-नृत्यांचे दाखले मिळतात. ही पर्जन्य-नृत्ये दोन प्रकारची दिसतात.

पहिला प्रकार ‘पर्जन्य-स्वागत’ असते. हे पर्जन्याचे आगमन झाल्यानंतर, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी केलेले नृत्य असते. आजच्या मानवी जगात ‘नृत्य’ या शब्दाला जी एक पठडी, एक चौकट अध्याहृत असते तितके औपचारिक नृत्य तेव्हा अपेक्षित नाही. लहान मुलांनी आनंदाने पहिल्या पावसात उंडारावे, साचलेल्या पाण्यात थयथया पाय आपटावेत, आकाशाकडे तोंड करुन पावसाच्या धारा थेट तोंडावर झेलाव्यात... जसे सुचेल तसे त्या वर्षावाचे स्वागत करावे असे काहीसे सुरुवातीला घडत असावे. जेन गुडाल यांनी पाहिलेले हे नृत्य असेच आनंद साजरा करणार्‍या काही मोजक्या कृतींचा समुच्चय इतपतच होते. त्यात विशिष्ट कृतींची पुनरावृत्ती होते म्हणून त्याला नृत्य म्हणायचे इतकेच. जे अनायासे लाभले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आनंद घेण्याचा उद्देश असतो इतकेच.

‘अनायासे लाभले, ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याने हवे तेव्हा ते मिळायला हवे’ अशी भावना प्राण्यांच्या तुलनेत अधिक वेगाने बौद्धिक प्रगती दाखवणार्‍या मानवाच्या मनात निर्माण झाली. जे जेव्हा ते मिळत नाही तेव्हा थेट निसर्गाशी रुजवात करून आपली मागणी नोंदवण्याची सुरुवात मानवानेच केली. त्यासाठी पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच त्याने ‘पर्जन्य-आवाहन नृत्य’ करण्यास सुरुवात केली. हा पर्जन्य-नृत्याचा दुसरा प्रकार.

हे नृत्य ओढ दिलेल्या पावसाला आवाहन करणारे असते. याची सुरुवात मानवाने आप, तेज, वायु आदि प्राकृतिक घटकांचे दैवतीकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली तेव्हाच झाली असावी. पर्जन्याला केलेले आवाहन पुढे पर्जन्यदेवतच्या आराधनेमध्ये, तिला बोललेल्या नवसामध्ये, कबूल केलेल्या पापक्षालनामध्ये अथवा घातलेल्या साकड्यामध्ये रूपांतरित झाले असावे.

मानवी इतिहासामध्ये शेतीचा शोध हा निसर्गासंबंधामध्ये मानवी स्वार्थाची, अधिकारापलिकडे जाऊन सत्ता प्रस्थापित करणारी पहिली कृती होती. तोवर अन्न-संग्राहक (gatherer) असणारा माणूस असा उद्दामपणे निसर्गाला आपण आखून दिलेल्या भूमीच्या चौकटीतच अन्न देण्यास भाग पाडू लागला. विसाव्या शतकामध्ये त्याहीपुढे जाऊन अधिकाराला हक्कामध्ये रूपांतरित करण्यासाठी मानवाने कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र विकसित केले आहे. दुबईसारख्या राष्ट्रात केव्हा पाऊस पडावा याचे नियोजनच केले जाते... त्यांनी नुकतेच त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. नागर आयुष्यात अस्तंगत झालेल्या पर्जन्य-स्वागत नृत्याप्रमाणेच आता पर्जन्य-आवाहन नृत्याचे नवस-साकड्यादी अवशेषही हळूहळू माघार घेतील असे दिसते आहे.

सुरुवातीला माडगूळकरांच्या लेखात आलेले चिम्पान्झींच्या पर्जन्य-स्वागत नृत्याचे वर्णन दिले आहे. या प्रसंगावरून मला जी.एं.च्या ‘कळसूत्र’(४) या कथेमध्ये वर्णन केलेले पर्जन्य-नृत्य आठवते. इथे ‘देहसूक्त’ या शीर्षकाखाली ते शेअर केले आहे. जेनने अनुभवलेले– पर्जन्याच्या आगमनानंतर केलेले वर्षा-नृत्य आहे, तर हे पर्जन्य-आवाहन-नृत्य आहे. मानवसदृश प्राणी ते मानव या स्थित्यंतरादरम्यान माणसाचे पावसाशी असलेले नाते कसकसे विकसित होत गेले यावर ‘बिम्मच्या पतंगावरून’ या मालिकेमध्ये पाऊस या लेखामध्ये आधीच लिहिले आहे.

मानवी जीवनप्रवासाचा विचार केला तर जेनने अनुभवलेले नृत्य वा आनंद-अनुभव हा मानवपूर्व मानवसदृश प्राण्यांचा आहे. जी.एं.च्या कथेतील वर्णन हे टोळी करुन राहणार्‍या पण मानव-पदास पोहोचलेल्या आदिम मानवी प्रजातीचा आहे. तिसरे एक वर्षानृत्य माझ्या हाती लागले. हे महानगरी माणसाच्या आयुष्यातील आहे, मानवी जीवनप्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरचे आहे.

माणूस नागर झाला नि त्याचे जिणे निसर्गापासून दूर सरकत गेले. कार्यविभागणीमुळे मानवी प्रगतीला वेग आला असला, तरी त्यामुळेच आपल्या उपभोगाचे साधन निसर्गातील कशा-कशाच्या वापरातून, नाशातून सिद्ध होते याकडे त्याचे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागले. संपूर्ण महानगरी झालेल्या आयुष्यात तर हे अज्ञान नि ही बेफिकिरी इतकी वाढली, की आपल्या चैनीसाठी निसर्गातील कोण-कोणत्या गोष्टींचा नाश होतो आणि उपभोगोत्तर कचरा निसर्गाची कशी हानी करतो याचे भान नाहीसे झाले. उपभोगाची क्षमता नि साधने सतत वाढती राहायला हवीत या प्रमाथी आवेगाने महानगरी माणूस उर फुटेतो धावत असतो. विश्रांती घेणे, संतुष्ट राहणे या कृतींना या जगात महत्त्वाकांक्षाहीन आणि म्हणून नव-पाप मानले जाते.

झिपर्‍या

पण याच जगात असेही जीव अजून प्रचंड संख्येने आहेत ज्यांच्याबाबत हे धावणे अपरिहार्य असते. इतरांसाठी गरजा भागवणे म्हणजे चार पावलांचे अंतर पार करणे असेल, तर यांच्या दृष्टीने पूर्ण अंतराची मॅरेथॉन असते. दैनंदिन गरजांसाठीच इतकी उरस्फोड करत असताना निसर्गाकडे वगैरे पाहणे त्यांना परवडत नसते. असे असूनही नागरी माणसामध्ये आदिम मानवाची, त्याचाही पूर्वज असलेल्या त्या वानरांची असोशी उद्या चूल पेटवण्यासाठी दडपून ठेवलेल्या निखार्‍यासारखी पहुडलेली असते. विशेषत: महानगरी आयुष्याची नि संस्कार नामक जुनाट वाकळीची झूल अंगावर घेऊन नंदीबैलासारखे आयुष्य जगण्यास सुरुवात करण्यापूर्वी– कदाचित, नितळ दृष्टी असलेल्या लहान मुलांमध्ये ती अधिक असते.

अशाच चार मुलांच्या टोळीने ‘पाऊस म्हणजे रोजगाराचा सत्यानाश’ हे भान झुगारून देऊन केलेले अफाट स्वागत मला अरुण साधूंच्या ‘झिपर्‍या’ मध्ये सापडले. तो सारा प्रसंग मी ही अक्षरश: जगलो इतके ते वर्णन प्रत्ययकारी आहे. (या ‘झिपर्‍या’वर पुढे चित्रपटही येऊन गेला. माझा सुस्त स्वभाव नि मराठी चित्रपटांचे अल्पजीवी असणे यामुळे पाहायचा राहून गेला. त्यामुळे त्यात हे शब्दचित्र किती ताकदीने उतरले आहे मला ठाऊक नाही.)

साधूंसारखा माणूस कुठलीच पठडी मानत नाही. या अफाट माणसानेच ‘सिंहासन’सारखी राजकारणाचा वेध घेणारी कादंबरी दिली, ‘मुंबई दिनांक’ मधून महानगरी व्यक्तींच्या वैय्यक्तिक आयुष्याकडे सूक्ष्मदर्शकातून पाहिले, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या जिण्याचा मागोवा घेणारी ‘मुखवटे’ लिहिली, ‘त्रिशंकू’मधून विलक्षण आत्ममग्न व्यक्तीच्या मनोव्यापाराचा वेध घेतला... विज्ञानकथा, कादंबर्‍याही लिहिल्या. एकाहुन एक अव्वल! इतकेच काय ‘फिडेल, चे आणि क्रांती’ तसंच ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’ सारखी क्यूबा नि चीन सारख्या देशांतील संक्रमणकाळाचा पट मांडणारे लेखनही केले.

‘झिपर्‍या’मधून महानगरी जीवनातील उपेक्षित वर्गातीलही तळाचे स्थान ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा स्वयंरोजगार करणार्‍या मुलांचे आयुष्य उलगडले आहे. बालकामगार ही मानवी प्रगतीच्या नागरी टप्प्यावरील उत्पत्ती. त्यातही इतरांकडे रोजगार करणार्‍यांना शिळ्या-विटक्या भाकरीचे, पाव-उसळीच्या तुकड्याची थोडीफार शाश्वती असते. स्वयंरोजगार करणार्‍यांना ती ही नाही. इतक्या विपन्नावस्थेत राहूनही पहिल्या पावसाचे अप्रूप असलेली ही मुले तो आनंद उस्फूर्तपणे नि बेभानपणे कसा साजरा करतात याचे वर्णन या वेच्यामध्ये आहे. त्या बेभान जगातून बाहेर येतानाच त्या पावसाचा दुसरा अर्थ आऽ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो. ती विसंगती अक्षरश: अंगावर येते इतकी साधूंनी ती जिवंत केली आहे.

‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणत घरच्या सुरक्षित जगातून तो आनंद साजरा करणार्‍या मुलांचे नि पहिला कैफ उतरताच ‘जा रे जा रे पावसा, हाती नाही पैसा’ म्हणावे का अशा संभ्रमात पडलेल्या झिपर्‍या, पोंब्या, गंजू, असलम, नार्‍या, दाम्या यांचे जग निराळे. महानगरी जीवनानेच भरपूर रुंद केलेली एक दरी या दोहोंमध्ये आहे आहे.

- oOo -

(१). त्यातील एक वेचा ‘माकडे, माऊली आणि मुली’ इथे ‘वेचित चाललो...’वर आधीच शेअर केला आहे.
(२). ‘चित्रे आणि चरित्रे’ - व्यंकटेश माडगूळकर, पृ. ७३-७४.
(३). You-Tube वर ‘Chimpanzee Rain Dance’ असे शोधले तर जेनच्या अनुभवाशी मिळतेजुळते व्हिडिओ सापडतात. हा त्यातलाच एक.
Chimpanzee Rain Dance - Mahale National Park
(४). पुस्तक: काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी (पॉप्युलर प्रकाशन)

---

‘झिपर्‍या’ या कादंबरीतील वेचा: धंदा >>


हे वाचले का?

गुरुवार, ९ मे, २०२४

वेचताना...: जिज्ञासामूर्ती

‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं.

मण्यांची माळ

काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्‍या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे चित्रित केलेले काही माहितीपट पाहण्यात आले नि तिच्या अफाट कामाची प्रचिती येत गेली.

पण पुढे असे लक्षात आले, की असली अफाट जिज्ञासा नि समर्पणभाव घेऊन जगलेली ही एकच नाही. डायान फॉसी नामे आणखी एक माऊली गोरिला या अन्य वानर प्रजातीशी याच धर्तीवर जोडली गेली आहे हे प्रथम समजले. त्यानंतर ‘गोरिलाज्‌ इन द मिस्ट’ (१९८८) या नावाचा चित्र-कम्‌-चरित्रपटही पाहण्यात आला. निव्वळ जिज्ञासा, दस्तऐवजीकरण या पलिकडे जाऊन गोरिलांच्या पंजांशी संबंधित अंधश्रद्धांमुळे होणारी तस्करी रोखण्यातही तिने स्वत:ला झोकून दिले नि बलिदानही.

इजा झाला, बिजा झाला नि तिजाही. या दोन आफ्रिकन वानरगणांच्या सोबतच ओरोंग-ऊ-थँग या आशियाई प्रजातीचा अभ्यास करणारी बिरुटे गाल्डिकास या स्त्रीचीही ओळख झाली. दुर्दैवाने जेवढी प्रसिद्धी जेनला मिळाली, तेवढी डायानला मिळाली नाही. बिरुटेचे नावही– वानरकुलाचे अभ्यासक वगळता इतर कुणाच्या – कानावर पडले असण्याची शक्यता नाही.

संस्कृती, संस्कार नि कर्मकांड यांचे अवजड खोगीर पाठीवर घालण्यापूर्वीचे स्त्री नि पुरुष पाहिले तर स्त्रियांमध्ये जिज्ञासा वा उकलक्षमता अधिक असते असे माझे प्रथमपासून मत आहे. (त्याला अनेक कारणे आहेत, पण त्याबद्दल इथे बोलणे अस्थानी होईल.) संभावित समाजाने अंगावर घातलेली कौटुंबिक नि नागरी आयुष्याची झूल उतरवून या तीन माऊल्यांनी आपले आयुष्य मानवसदृश प्राण्यांचे जगणे समजून घेण्यात व्यतीत केले नि त्यायोगे त्यांच्या नि मनुष्यप्राण्याच्या जीवनप्रवासाची अनेक कोडी उकलली. कुण्या देव नावाच्या अदृश्य प्राण्याने लेंड्या टाकाव्यात तशी माणसे पृथ्वीवर टाकली असे समजणार्‍यांना यातील परिश्रम, त्याचे मूल्य समजू शकणार नाही, पण जिज्ञासेचा अंशमात्रही ज्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे त्यांच्या दृष्टीने या तिघींचे आयुष्य नक्कीच अभ्यासनीय आहे.

बंगळुरच्या भारतीय विज्ञान संस्थेतील ‘सेंटर फॉर इकलॉजिकल सायन्सेस’मध्ये तेव्हा कार्यरत असलेल्या मित्रवर्य मिलिंद कोलटकर याच्याशी या तीन माऊल्यांबद्दल बरेच बोललो. पुढच्या भेटीत त्याने एक पुस्तक माझ्या हाती ठेवले. हे पुस्तक होते लुई लीकी या मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकावरचे. हा या ‘तीन मुलींचा बाप’– अशा अर्थाने की या तिघींच्या कार्याची संकल्पना, प्रेरणा, नि संपूर्ण पाठबळ त्याचे होते. आपले सारे आयुष्य एक-एका प्रजातीच्या अभ्यासाला वाहून घेणार्‍या या मुलींचा हा आधारस्तंभ.

या मुलींच्या अभ्यासाने, अनुभवाने नि त्यांच्यासह इतरांनी त्यांतून निर्माण केलेल्या आकलनामागचा दृष्टिकोन भूतकालभोगी भारतात कधीकाळी रुजेल याबद्दल माझ्या मनात फारशी आशा कधीच नव्हती. भारतातील एक-दोन प्रमुख निसर्ग-माहितीपट निर्मात्यांची किंवा एकुणात ‘वर्तमानातील कुठल्याही दोन भारतीय शास्त्रज्ञांची - मिसाईलचे तंत्रज्ञ नव्हे- नावे सांगा’ असे आव्हान दिले तर किती जण उत्तीर्ण होतील. मी स्वत:च पहिला अनुत्तीर्ण असेन.

अलिकडच्या काळात पुतळे, देवळे, शेण, संस्कृती(?) तुम्ही-आम्ही, भूतकालातले तुमचे वीर वि, आमचे वीर यात अधिकाधिक रमू लागलेल्या समाजात हे प्रमाण आणखीनच घटत चालले आहे. आलेला प्रत्येक हिंदी चित्रपट, मग हॉलिवूड चित्रपट, मग ओटीटी मालिका, मग के-सीरिज या मार्गाने प्रगती(?) करत असलेला आपला दर्शक/प्रेक्षक कधीच एखाद्या निसर्गपटाबद्दल बोलताना दिसत नाही. डेविड अटेनबरो या अफाट माणसाने बीबीसीसाठी जे अलौकिक कार्य (अर्थात तांत्रिक चमूच्या मदतीनेच, त्याचा उल्लेख अत्यावश्यकच) करुन ठेवले आहे, त्याबाबत किती जणांना ठाऊक आहे? जगण्याशी जोडलेल्या गोष्टींकडे पाठ फिरवून सर्वस्वी काल्पनिक, अतर्क्य, अनेकदा अवास्तव कथानकांत रमणारे लोक जिज्ञासेपेक्षा मनोरंजनाला अधिक प्राधान्य देतात हे उघड आहे.

अशा समाजामध्ये या तीन माऊल्यांबद्दल उदासीनता असणे ओघानेच आले. दत्तगुरुंच्या जन्माच्या धर्तीवर या त्रिमूर्तीचे एखादे मंदिर बांधले, तर कदाचित नवस बोलण्यासाठी काही जणांचे पाय तिकडे वळतील. पण त्याने त्यांच्यातील जिज्ञासा नि समर्पणभाव यांच्यात संक्रमित होईल असे मात्र नाही. जनकल्याणकारी राजा विठोबालाही विष्णूचा अवतार करुन दिव्यत्वाच्या बेडीमध्ये अडकवून टाकणारा समाज त्या त्रिमूर्तीलाही कुण्या देवाचा अवतार जाहीर करून उपास्य बनवून टाकेल. (अर्थात भारतीय समाजात स्त्री देवांचे मार्केट डाऊन असल्याने फार प्रसिद्धी मिळणार नाही. ऐंशीच्या दशकात वेगाने वाढलेले संतोषी मातेचे प्रस्थ संपूर्णपणे अस्तंगत झाले आहे हे याचे उत्तम उदाहरण.)

अशा वेळी मराठीमध्ये सर्वसामान्यांसाठी यांच्यावर कुणी लिहील ही शक्यता नगण्यच होती. तेव्हा आपणच या चौघांबाबत– निदान तिघींबाबत, एकत्रित एक लेख लिहावा असे तेव्हाच ठरवले होते... माझ्या अनेक संकल्पांप्रमाणे ते ही वाहून गेले. काही वर्षांपूर्वी व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘चित्रे आणि चरित्रे’मध्ये जेनबद्दल लिहिलेला एक लेख वाचण्यात आला होता. त्यातील एक वेचा माकडे, माऊली आणि तिच्या मुली इथे ‘वेचित चाललो...’ वर शेअर केलेला आहे. पण इतर दोघींची दखल घेतलेली माझ्या पाहण्यात नाही. (अभ्यासकांच्या क्षेत्रात घेतली असेल.)

सुदैवाने काही वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांडेंचे ‘मण्याची माळ’ हाती पडले नि सुखद धक्का बसला. बाईंची कुशाग्र बुद्धी, संवेदनशीलता, आदर-आपुलकी, जिज्ञासा नि चिंतन या सार्‍यांचे दर्शन त्यांच्या तीनही पुस्तकांतून दिसते. त्यांच्या ‘मनातलं अवकाश’मधील एक वेचा मी आधीच इथे शेअर केला आहे. या तीन माऊल्यांबद्दल, मायेनेच लिहिलेल्या लेखातील एक वेचा इथे शेअर करतो आहे.

-oOo-

सुनीताबाईंच्या लेखातील वेचा: जिज्ञासामूर्ती

---

संबंधित लेखन:
माकडे, माऊली आणि मुली


हे वाचले का?

जिज्ञासामूर्ती

संशोधनकार्यात दोन दृष्टिकोन असतात: एक म्हणजे, सृष्टीवरच्या प्राणिमात्रांचं जीवन नैसर्गिकच राहावं, मात्र त्याचं गणित समजलं तर आपलं स्वतःचं जीवन अधिक समृद्ध होईल, म्हणून शोधकार्याला महत्त्व देणारे सत्प्रवृत्त संशोधक असतात. लुई लीकी हा अशांपैकी एक. रॉबर्ट यर्क्स हा अर्थातच दुसऱ्या प्रकारच्या संशोधकांत मोडतो.

आपल्या अगतिक समाजजीवनाच्या सीमा ओलांडून, मनुष्यप्राण्यांपासून दूरच्या रानावनांत, घनदाट जंगलात, डोंगर कपारीत वास्तव्याला जावं आणि तिथल्या प्राणिमात्रांच्या नैसर्गिक जीवनप्रवाहात तीळमात्रही ढवळाढवळ न करता, उत्क्रान्तीच्या माळेतला आजच्या घडीला शेवटून दुसरा, म्हणजे माणसाच्या आधीचा मणी जो माकड, त्याच्या जातीचे गोरिला, ओरँगऊटँग, चिंपँझी हे जे तीन प्राणी आहेत, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा असाही प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. हे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातली दरी ओलांडता येते का, नातं शोधता येतं का, यांना जोडणारा धागा कुठे सापडतो का, हे पाहण्यासाठी लुई लीकी (Louis Leakey) या शास्त्रज्ञाने तीन सुशिक्षित तरुण मुलींची योजना केली.

वैयक्तिक गरजा अत्यल्प असलेल्या, कष्टांची पर्वा नसलेल्या, संशोधन- कार्यातच रस असलेल्या या निर्भय मुलींना त्याने बापाची माया दिली आणि या कार्यासाठी लागणारं आर्थिक आणि मनुष्यबळही पुरवलं. आवश्यक तिथे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या काहीशा जगावेगळ्या जीवनक्रमाला आधार दिला. या संशोधनासाठी लागणारा खर्च स्वतःच्या आणि जगभरातील इतर संस्था आणि व्यक्ती यांच्या मदतीने उभा केला. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक आणि शिक्षणोत्सुक विद्यार्थी दिले. या मुलींनी या आधारावर स्वतःला झोकून देत केलेल्या कामाचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.

मण्यांची माळ

या तिघींमधली जेन गुडॉल (Jane Goodall) हिने चिपँझीचा, डियॅन फॉसी (Dian Fossey) हिने गोरिलांचा आणि बिरुटे गाल्डिकास (Birute Galdikas) हिने ओरँगऊटँगचा अभ्यास केला. त्यासाठी आनंदाने वनवास स्वीकारला. रूढार्थाने संसारावर, घरादारावर, आर्थिक उन्नतीवर, सुखोपभोगांवर, थोडक्यात सर्वस्वावर पाणी सोडलं आणि आपलं हे जगावेगळं आणि ‘सुसंस्कृत’ जगाबाहेरचं कार्यक्षेत्र निवडून त्या त्या ‘पर’देशात आयुष्यभराच्या वास्तव्याला म्हणून प्रस्थान ठेवलं.

जेन गुडॉलने ऐन तारुण्यात इंग्लंडहून निघून आफ्रिकेत टांझानियामधल्या गोंबेच्या डोंगरकपारीत तीस वर्ष वास्तव्य केलं. या तीसेक वर्षांच्या काळात अधूनमधून ती इंग्लंडला आणि इतरत्रही अल्पावधीसाठी जाऊन यायची. कधी मीटिंग्जसाठी, कधी आपल्या संशोधन-विषयावर व्याख्यानं देण्यासाठी, कधी तिच्या कार्यावरच्या लघुपटांच्या शूटिंगच्या दृष्टीने, तर कधी पीएच०डी०च्या प्रबंध लेखनासाठी. सुरुवातीची काही वर्ष आपल्या आईसह ती गोंबेला राहिली. इंग्लंडमध्ये घरदार असलेली ही सुशिक्षित मुलगी आफ्रिकेच्या जंगलात तंबू टाकून राहते, रोज सकाळी एक-दोन सँडविच, कॉफीचा थर्मास आणि दुर्बीण घेऊन डोंगर चढून जाते आणि उंचावरच्या काहीशा सपाट जागेतल्या एका खडकावर बसून, चिंपँझी कुठे दिसतात का, याचा शोध घेते.

कळप करून राहणाऱ्या या प्राण्याच्या मोठमोठ्या समूहातल्या प्रत्येकाला पुढे ती त्यांना तिने ठेवलेल्या नावाने ओळखू लागते. आपण केवळ निरीक्षणासाठी इथे आलो आहोत, आपल्यापासून त्या प्राण्यांना कसलाच उपद्रव होणार नाही, हे सिद्ध करण्याचा स्वतःहून कोणताही प्रयत्न न करता ती त्यांच्या जीवनक्रमाचा, हालचालींचा, सवयींचा, आपापसांतल्या नात्यागोत्यांचा आणि इतर प्राण्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा, मनुष्य प्राण्याबद्दलची जवळीक-दुरावा-प्रेमद्वेष-भीती वगैरे अनेक भावना जाणून घेण्याचा, खाण्यापिण्याच्या आणि लैंगिक गरजांचा, सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षणांतून शोध घेते. संध्याकाळनंतर तंबूत परतल्यावर दिव्यापाशी बसून आपल्या निरीक्षणाची टिपणं करते.

विशिष्ट चिंपँझी मादी, तिची मुलं, नातवंडं, सर्वांना ती व्यक्तिशः ओळखत असते, पण या ओळखीची जाणीव स्वतःहून त्यांच्यावर न लादण्याची तिनं घेतलेली खबरदारीच तिचा अंगभूत सुसंस्कृतपणा सिद्ध करते. जणू ती स्वतःही, त्या जंगलात न जन्मलेला पण तिथे वस्तीला आलेला एक कुणी आपल्यासारखा प्राणीच असावा इतक्या अलिप्ततेने सुरुवातीची काही वर्ष गेल्यावर हळूहळू काही चिंपँझी तिला गृहीत धरू लागतात, निर्धास्तपणे तिच्या जवळपास वावरतात. तिला आपल्यातलीच मानतात. तिच्या ओळखीच्या एका चिंपँझी टोळीप्रमुखाचं नाव तिने ‘डेव्हिड ग्रे बियर्ड’ ठेवलं होतं. चांगली उंचीपुरी, पण शिडशिडीत अंगलटीची जेन ही त्या धिप्पाड ग्रे बियर्ड डेव्हिडलाही बहुधा आपल्या छोट्या बहिणीसारखी वाटू लागली असावी. जेन एकदा भर दुपारी झऱ्याकाठी एका झाडाखाली सावलीत बसली असताना हा डेव्हिडही तिच्या शेजारी येऊन बसला.

त्या झाडावरून नुकतंच पडलेलं फळ उचलून गंमत म्हणून तिने स्वतःच्या तळहातावर त्याच्यापुढे धरलं. त्याने त्या फळाकडे पाहिलं, पण ते उचललं नाही. तिने मग ते त्याला देण्यासाठी स्वतःचा हात आणखी थोडा पुढे केला. मग मात्र त्याने एकदा त्या फळाकडे, मग तिच्याकडे निरखून पाहिलं, ते फळ स्वीकारलं आणि तिचा हातही अलगद आपल्या हातात घेतला. ती मात्र निश्चलच बसून राहिलेली पाहिल्यावर त्याने तिचा हात सोडून दिला आणि आधी स्वीकारलेलं ते फळही जमिनीवर टाकून दिलं. जणू धिक्कारलं. चिंपँझी आणि माणूस या दोन प्राण्यांमधला उत्क्रान्तीचा कोट्यवधी वर्षांचा कालावधी त्या एका क्षणात लुप्त झाला. हा आपला पूर्वज आणि आपण यांतलं एकमेकांतलं नातं तिला त्या क्षणी जाणवून गेलं. शास्त्रोक्त अभ्यासातून निघणाऱ्या निष्कर्षापेक्षा खूप मोलाचा असा हा तिच्या प्रत्यक्ष अनुभवातून प्रतीत झालेला परस्परांच्या-चिंपँझी आणि माणूस यांच्या नात्याचा साक्षात्कार त्या क्षणी जेनला झाला. ‘स्पर्शाची भाषा स्पर्शालाच कळावी’ म्हणतात, तशी ती कळून गेली.

लुई लीकीच्या या तीन मानसकन्यांपैकी सर्वाधिक गाजलं गेलं आणि समृद्ध झालं ते जेनचंच जीवन, असंच म्हणावं लागेल. पण इतर दोघींचं शोधकार्यही तितक्याच तोलामोलाचं आहे. डियान फॉसीने गोरिलांचं निरीक्षणसुद्धा खूप बारकाईने केलं. लहानसहान गोष्टींबद्दलही सगळे तपशील तिनं नोंदवले, खूप टिपणं तयार केली. कळपातल्या प्रत्येकाचं वेगळेपण कशात आहे, याचा शोध घेताना त्यांच्या नाकपुड्यांवरच्या सुरकुत्यांपासून पाऊलखुणांपर्यंत प्रत्येकाच्या वैशिष्ट्यांची मोजमापं, आकडेवारी, आकृत्या, सर्व तहऱ्यांनी तपशीलवार माहिती जमा केली. एक प्राणी या दृष्टीने माणसंही सर्वसाधारणपणे सारखीच दिसतात. पण प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा किंवा सही जाणकाराला बरोबर ओळखता येते. संशोधन कार्यात असे तपशील फार महत्त्वाचे असतात. त्यातून संशोधकाचं स्वतःचं शिक्षणही होतं आणि उत्क्रान्तीतला फार महत्त्वाचा शोधप्रवासही होतो.

ओढ असेल तर चाल सुरू होते आणि मग वाटा सापडू लागतात, मदत करणारे भेटतात. मुळात आपण निरपेक्ष असलो तर नवं नवं दिसत जातं. त्यांतून आणखी नवं सुचत जातं. या साऱ्यासाठी द्यावा लागणारा काळ आणि किंमत वगैरेचा विचार किंवा हिशेब करत बसलं तर हातून काहीच कार्य होणार नाही. एखाद्या कार्यात झोकून देणं आणि त्यातच रंगून जाणं, तेच जीवनाचं सर्वस्व होणं, हीच शोधकार्याची गरज असते आणि अशा मजबूत पायावर ठाम असताना अनेकदा अनपेक्षित फळ पदरी पडून जातं.

लुई लीकीच्या या तिन्ही मानसकन्यांचे शोध म्हणजे वैयक्तिक अनुभवांतून काढलेले निष्कर्ष किवा अंदाज आहेत. व्यक्तिसापेक्षच. त्या-त्या प्राण्यांप्रमाणे या तिघींचीही त्या-त्या प्राण्यातली मानसिक गुंतवणूक, त्यासाठी मोजलेली किंमत, कुवत, दृष्टिकोन, कार्यक्षेत्राच्या नैसर्गिक मर्यादा, स्वतःची शारीरिक शक्ती वगैरेची चौकट या शोधकार्याला आहेच; पण या चौकटीमुळेच येणारा घरगुतीपणा, जिवंतपणा, निर्भय प्रामाणिकपणा आपल्याला खिळवून टाकतो. असले अनुभव माझ्यासारख्या सामान्य माणसांची उत्सुकता टिकवून धरतात. आपले हे तीन संभाव्य पूर्वज आणि त्यांच्यावर अपरंपार माया करणाऱ्या या तीन बाया यांच्याशी आपलं नातं नकळतच जोडलं जातं आणि त्यांच्या अनुभवांशी आपण समरस होतो. आपल्या या कायाकल्पाचा आपल्याला अभिमानही वाटू लागतो.

डियॅन फॉसी ही दमेकरी असूनही सतत धूम्रपान करणारी बाई, जेन गुडॉलसारखीच आफ्रिकेच्या डोंगराळ (आणि छोट्या-मोठ्या ज्वालामुखींच्या) प्रदेशात सतत चढउतार करत गोरिला या प्राण्यावरचे शोधकार्य चालू ठेवते. सर्व आव्हानांना तोंड द्यायला खुषीने पुढे सरसावते आणि हिरिरीने हे काम करत असताना तिच्या या लाडक्या प्राण्यांचा– गोरिलांचा व्यापार करणाऱ्या माणसांच्या टोळ्यांविरुद्ध झुंजही देत राहते. गोरिला हे तर आपणा मनुष्यप्राण्याचे ‘पूर्वज’ आहेत. कोणत्याही परिस्थितीत या वडीलधाऱ्यांचा आदर आणि सांभाळ करणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्या गोरिलांना अमानुष वागणूक देणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी डियॅनची धारणा होती. गोरिला या मानवाच्या पूर्वजापेक्षा, माणूस हा गोरिलाचा वंशज किती स्वार्थी आणि दुष्ट असू शकतो, याचा धक्कादायक अनुभव आपल्याला डियॅन फॉसीच्या कार्याबद्दलची माहिती वाचताना येतो.

छोट्या छोट्या गोरिलांना बेकायदेशीररीत्या पकडून त्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्यांविरुद्ध जिद्दीने लढा द्यायला उभ्या राहिलेल्या, गोरिलांच्या लहान लहान पोरांचे हात, पाय तारांनी बांधून विक्रीच्या दृष्टीने त्यांना कोंडवाड्यात डांबून ठेवणाऱ्या माणसांचेही असेच हाल करायला हवेत असं मनापासून मानणाऱ्या, आजारी गोरिलांना स्वतःच्या घरात आणून ठेवून त्यांच्यावर औषधोपचार आणि त्यांची सेवा-शुश्रूषा करणाऱ्या, दिवसाचे चोवीस तास फक्त गोरिलांचाच विचार करणाऱ्या, त्यांनाच सर्वस्व मानणाऱ्या डियॅनचा एका रात्री तिचे डोके फोडून शेवटी खून केला जातो आणि तो मारेकरी शेवटपर्यंत अज्ञातच राहतो, याचा अर्थ काय समजायचा?

गोरिला या प्राण्याने मात्र तिला कधीही दगा दिला नाही. ते सदैव तिचे मित्रच होऊन राहिले. जेन गुडॉलला ‘डेव्हिड ग्रे बियर्ड’ या चिंपँझीचा आला तसाच, अगदी तसाच अनुभव एकदा डियॅन फॉसीला ‘डिजिट’ या गोरिलाचा आला. तीही तिच्या गोरिलांना नावाने ओळखत असे. तिचा लाडका डिजिट नावाचा गोरिला वयात आल्यावर तोही त्याच्या टोळीचा प्रमुख झाला, पोशिंदा, संरक्षणकर्ता झाला. एकदा धो-धो पाऊस कोसळत असताना, आपल्या टोळीच्या मागावर कुणी तरी येत आहे याची जाणीव होताच हा टोळीप्रमुख डिजिट भरपावसात एकदम संरक्षक पवित्रा घेऊन सामोरा आला आणि ही तर आपली मैत्रीण डियन, आपली टोळी सुरक्षित आहे ना याची खात्री करून घ्यायला अपरात्रीही निघालेली आहे, हे लक्षात येताच त्याने आपल्या आवडत्या रानटी सेलरीच्या शेगांची डहाळी तोडून, तिच्या शेंगा काढून सोलून डियॅनला अर्पण केल्यासारख्या तिच्या पायाशी ठेवल्या आणि पाठ फिरवून तो निघून गेला. अशीच आणखी एकदा अनिश्चित हवामानात, ऊन-पाऊस-चिखल-खाचखळग्यांतून ही आजारी डियॅन आपल्या गोरिलांची खबरबात घ्यायला हिंडत असताना थकून झाडाखाली थोडी विसावली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवल्याची तिला जाणीव झाली. तिने मागे वळून पाहिले तर तो आश्वासक हात लाडक्या डिजिटचाच होता. त्याने तिला खांद्यावर थोपटले आणि मग तिच्या शेजारी जाऊन बसला; आणि तिनेही मग त्याच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून घेतले.

बिरुटे गाल्डिकास (Birute Galdikas) ची कथा मात्र याहून वेगळी आहे. माणसाचा पूर्वज चिंपँझीच याची जेन गुडॉलला खात्री होती. डियॅन फॉसीच्या मते, हा पूर्वज गोरिलाच आहे, हे निश्चित होतं. तर बिरुटे गाल्डिकास ही ओरँगऊटँग हाच माणसाचा पूर्वज आणि तो इंडोनेशियात ‘रेन फॉरेस्ट’मध्येच आहे याची खात्री असल्यानं चक्क तिथेच जाऊन राहिली.

‘रेन फॉरेस्ट’मधली पहाट म्हणजे निरनिराळे किडे, बेडूक, हरतर्‍हेचे पशुपक्षी यांच्या एकात एक मिसळलेल्या आवाजांनी फुलणाऱ्या आणि सडणाऱ्या उग्र फळा-फुलांच्या दर्पांनी, उष्ण दमट हवेने अरण्याच्या श्वासांनी निःश्वासांनी गच्च भरलेली. स्वर्ग आणि नरक यांचा एकाच वेळी प्रत्यय देणारी. अगदी सकाळी सकाळी तुम्ही घामाने निथळत असता. पायाखालची वाट काट्याकुट्यांनी आणि दगड-गोट्यांनी, चिखलाने भरलेली असते. कुठल्या झाडाची फांदी कधी डोक्यावर कोसळेल, सांगता येणार नाही. फणसासारखी मोठ्ठाली काटेरी अति पक्व फळं पायाखाली आली काय किंवा चालता चालता डोक्यावर पडली काय, आपण बरबटून जातो. अंगाला काटे टोचतात. आपल्याला रक्तबंबाळ करतात. किडे, मुंग्या, हरतर्‍हेच्या माशा, कोळी, जळवा, असले असंख्य क्षुल्लक वाटणारे प्राणी आणि छोटी छोटी झाडंझुडपं भयानक उन्हाळ्याने आणि त्या दमट हवेने होत्याची नव्हती बनून जातात. असल्या इतर अरण्यांचं तीन-चार वर्षांचं आयुष्य हे ‘रेन फॉरेस्ट’ सहा-सात महिन्यांत जगून संपवतं. इतक्या वेगाने इथलं जीवनचक्र फिरत असतं. इंग्लंडसारख्या प्रगत देशात नैसर्गिक (कलम केलेले वगैरे, कृत्रिम नव्हे.) वनस्पतीचे जे नमुने आढळतात त्याच्या वीसपट तरी तर्‍हेच्या वनस्पती, पशु-पक्षी या रेन फॉरेस्टमध्ये असतील. ओरँगऊटँग तर फक्त इथेच असल्याने बिरुटे गाल्डिकासने संशोधनासाठी हे ठिकाण निवडलं आणि उभं आयुष्य त्या जंगलावर आणि त्या ओरँगऊटँगवर प्रेम केलं.

जंगलात दिवसाचा अंक संपताच रात्रीचा पडदा पटकन पडतो. तिथलं दिवसाचं जग आणि रात्रीचं जग ही अगदी स्वतंत्र विश्वच असतात. काळोखातल्या हालचाली, कुजबूजही आणि प्रसंगी आरोळ्याही दिवसापेक्षा अगदी वेगळ्या सुरातल्या असतात. अभयारण्यात आजही ते ते प्राणी आपापलं नैसर्गिक जीवन जगताहेत. आपापला वंश वाढवताहेत. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रान्तीच्या काळात संपर्क नसलेल्या पूर्वजांसारखं आपलं त्यांच्याशी असलेलं नातं आपण विसरलो आहोत. पण आयुष्यात एखादा क्षण असा येतो, की हा मधल्या काळाचा पडदा अचानक नाहीसा होतो आणि हे गुप्त धनाचं घबाड आपल्याला लाभून जातं, आपल्याला थक्क करतं.

बिरुटे गाल्डिकास इंडोनेशियात या शोधकार्यासाठी कायम वास्तव्याला जाऊन राहिली. तत्पूर्वी याच कामासाठी तिथे काही दिवसांसाठी दोन-चार महिन्यांसाठी क्वचित एखाद-दुसऱ्या वर्षासाठीही काही संशोधक जाऊन आले होते; नाही असं नाही. पण युरोप-अमेरिकेच्या तुलनेने फारच मागासलेला, आर्थिकदृष्ट्याही फार गरीब असलेला, लाचलुचपत सरकारी कामांतली दिरंगाई वगैरेंत भारतीयांनाही लाजवील असा कारभार असलेला हा देश बिरुटेने वयाच्या ऐन पंचविशीतच कायम वास्तव्यासाठी निवडला. केवळ ओरँगऊटँग या प्राण्यावरच्या आपल्या शोधकार्यासाठी! आपल्या नवऱ्यासह ती या कामासाठी निघाली त्या वेळी स्वतःच्या पाठीवरून नेता येईल इतकंच सामान, म्हणजे दोन मोठाल्या पिशव्या फक्त त्यांनी घेतल्या होत्या. जरुरीपुरते चार कपडे, दोन पावसाळी टोप्या, दोन-चार भांडीकुंडी, मोजमापांची थोडी साधनं, वह्या, कागद-पेन्सिली, एक फ्लॅश लाइट, बस्स!

इतर प्राण्यांत मिसळायला राजी नसलेला, फणसासारखं ते भयानक वासाचं ‘डुरियान’ फळ आवडीने खाणारा, शक्यतो झाडावरच राहणारा आणि रोज रात्री एखादी फांदी आणि काही पानं यांची नवी गादी करून झाडावरच झोपणारा अशा या ओरँगऊटँग प्राण्याबद्दल बिरुटेला आपल्या पूर्वजांबद्दल, वडीलधाऱ्यांबद्दल असावी तशी खूप आदराची भावना होती. ती मायेने त्यांचा उल्लेख करताना ‘ओरोंग-ऊ-थँग’ असा करी. या प्राण्याचे डोळे हे हुबेहूब माणसाच्या डोळ्यांसारखेच आहेत आणि ते प्राणी आपल्याशी त्या डोळ्यांनी संवाद साधू शकतात, असं तिचं निर्विवाद मत होतं.

पूर्वजांच्या अशा ऋणांची फेड करणं केव्हाही शक्यच नाही, तेव्हा निदान आपल्या या भावनेला थोडं तरी मूर्त स्वरूप द्यांवं म्हणूनच जणू तिने इंडोनेशियासारखा संशोधनकार्याला सर्वार्थाने तापदायक असलेला देशही आपला मानला आणि तिथल्या या प्राण्याला सुरक्षित असा आपला संसार थाटला. पहिली तीन-चार वर्ष तर मनुष्य-वस्तीपासून खूप दूर झोपडीवजा, पावसाळ्यात गळणारं अनेक गैरसोयींनी परिपूर्ण असं घरच या नवरा-बायकोच्या वाट्याला आलं होतं. रानातला लाकूडफाटा गोळा करून जे काही मिळेल ते अन्न चुलीवर शिजवून, कधी कधी टिण्डफूड, तर कधी ते डुरियान किंवा केळंबिळं खाऊनच त्यांनी भूक भागवली.

त्यांच्या त्या झोपडीत म्हणा किंवा तंबूत म्हणा, त्यांच्या सोबतीला आजारी असलेली किवा पोरकी, चोरटा व्यापार करणाऱ्यांकडून छापा घालून सरकारने परत मिळवलेली तिच्या त्या ‘ओरोंग-ऊ-थँग’ची पोरं असत. त्यांचं संगोपन करतानाच, काट्याकुट्यांनी ओरखडे आलेल्या छोट्या-मोठ्या जखमा झालेल्या स्वतःच्या शरीराची मलमपट्टी करण्याचं कामही अनेकदा करावं लागे. रानात चालताना कपड्यांत शिरून अंगाला डसलेल्या आणि रात्री तंबूत परतेपर्यंत रक्त पिऊन टर्र झालेल्या जळवाही अनेकदा त्यांना स्वतःच्या अंगावर सापडत. एकदा रात्री तर आपल्या पायाशी काही तरी हुळहुळल्यासारखं वाटल्याने तिने दिवा लावला तेव्हा चक्क वेटोळं घातलेला एक नागच डोलताना दिसला. तत्पूर्वी तिला तो डसला नव्हता हे नशीबच म्हणायचं.

रानातल्या आपल्या राज्यात आपल्या नकळत शिरणाऱ्या मनुष्यप्राण्याला घाबरवून सोडण्यासाठी म्हणा किंवा तोंड देण्यासाठी म्हणा, झाडावरून् त्यांच्या अंगावर शी-सू करणं, मोठाल्या फांद्या तोडून किंवा ओंडके हातात घेऊन त्यांना झोडपण्याचा प्रयत्न करणं असले प्रतिकारात्मक उपायही या ओरँगऊटँगला अवगत असतात. अशा शोधकार्यात मृत्यू किती जवळपास वावरत असतो, याचा प्रत्यय अनेक संशोधकांना आला असणारच. तो मृत्यू प्रत्यक्ष वाट्याला आलेल्या कित्येक हुतात्म्यांच्या बलिदानावरच माणसाची ज्ञानलालसा आणि सतत प्रगत होणारं संशोधनकार्य मूळ धरून उभं आहे.

असं शोधकार्य हे खरं तर व्यक्तिनिरपेक्ष, निव्वळ सत्य असायला हवं. पण जिवंत प्राण्यांवर संशोधन करीत असताना सहवासाने म्हणा किंवा कशामुळे कोण जाणे, पण नकळतच तो संशोधक त्या प्राण्यांत काहीसा गुंततोच. ते ते प्राणीही काही काळाने माणसाबद्दलची भीती कमी झाल्याने आपला विश्वास संपादन करतात. शेवटी आपण सगळे प्राणी, ‘प्राण’ हा नश्वर असतो या खोल जाणिवेने कधी ना कधी काहीसे सैल होतो आणि एकमेकांबद्दल विश्वास बाळगून जगण्याच्या प्रयोगात सामील व्हायला तयार होतो.

ओरोंग-ऊ-थँग या माणसाच्या पूर्वजाचा अभ्यास करताना इंडोनेशियात वास्तव्याला आलेल्या बिरुटेच्या कामाचा व्याप हळूहळू इतका सर्वदूर वाढत गेला की, जणू एखाद्या दरीने जबडा पसरून मोठ्ठी जांभई द्यावी तसा तिच्या कामाचा, तिच्यावरच्या जबाबदारीचा आवाका होऊन राहिला. प्रचंड. तिनेच स्वतः वर ओढवून घेतलेला. त्यातून तिला आलेला एक अनुभव कुणालाही पटेल असा साधासुधा आणि खराखुरा आहे. माणसाची जात ही पराकोटीची स्वार्थी आणि प्रसंगी अत्यंत उद्धट आहे, पण व्यक्तिशः माणूस मात्र फार चांगला मित्र असू शकतो. याचाच अर्थ माणूस हा अद्याप प्राणीच, म्हणजे उन्नत पशूच आहे आणि पशू हेच माणसाचे पूर्वज आहेत, हा अनुभव हाच या संशोधनाचा मथितार्थ.

दगडाचे हळूहळू झिजून गोटे व्हावे तसे अनुभवांतून तावूनसुलाखून निघालेल्या बिरुटेच्या बोलांना गोलाई आली होती. तिचे शब्द कुणालाही दुखवत नसत. ते गद्य संगीतासारखे वाटत. त्याबरोबरच हेही जाणवे की, त्यांची पाळेमुळे खोल मातीला घट्ट धरून शुद्ध जीवनरसावरच पोसली जाताहेत. दीड कोटी वर्षांपूर्वीचे आपले आणि ओरोंग-ऊ-थँगचे पूर्वज एकच असावे. प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, सुखदुःख, भूक, चव असे बरेचसे अनुभव दोघांचेही सारखेच असावे. क्वचित एकान्ताची आवडही, मैत्रीची एकनिष्ठता किंवा बांधिलकीही, लागेबांधेही, बहुधा आठवणीही.

बिरुटेही तिच्या संशोधनात ओरोंग-ऊ-थँगच्या टोळीतील प्रत्येकाला तिने ठेवलेल्या नावाने ओळखत होती. स्वतःच्या बाळाला जोजवत आपल्या घराजवळच उभ्या असलेल्या बिरुटेच्या समोर एकदा राल्फ नावाचा ओरोंग-ऊ-थँग तंबूत जायला म्हणून येताना तिला दिसला. ती न डगमगता त्या वाटेत बाळाला घेऊन तशीच ठाम उभी राहिली. चौदा-पंधरा फुटांवर आल्यावर राल्फ थांबला आणि ‘वाटेतली दूर हो’ असं उर्मटपणाने सांगावं तसं हनुवटी उचलून मानेनं त्यानं तिला खुणावलं. तो इतका नजीक होता, तिच्या हातात तान्हं मूल होतं. तरीही जीवाचा धीर करून ती तशीच त्याच्यासमोर उभी राहिलेली पाहून राल्फनं तिच्या डोळ्याला डोळा दिला आणि मागे वळून तो निघून गेला. हे धिप्पाड जनावर एखाद्या समंजस माणसासारखं आपल्याशी वागलेलं पाहून तिचे डोळे भरून आले. घाबरून पळून तरी जाणं किंवा हल्ला तरी करणं या दोनच गोष्टी जाणणाऱ्या या प्राण्याच्या त्या कृतीतून तिच्याबद्दलची त्याची भावना स्पष्ट झाली.

भली माणसं तरी याहून वेगळं काय करतात? परस्परांतलं नातं ते हेच नव्हे का? त्यानंतर एकदा ती कॅम्पपासून खूप दूर रानात फिरत असताना, एका झाडावर हा राल्फ एका ओरोंग-ऊ-थँग मादीशी, त्या क्षणीच्या त्याच्या प्रेयसीशी लाडीगोडी करत असताना तिला दिसला. ओरोंग-ऊ-थँग प्राण्यांचा नर-मादी समागम खरं तर तिला पाहायचाच होता. तिच्या शोधकार्याच्या दृष्टीने असे सगळे तपशील महत्त्वाचे होते. पण या राल्फशी आपलं जोडलं गेलेलं नातं, त्याने आपल्या बाबतीत दाखवलेला समंजसपणा आठवून तीही त्या क्षणी त्या जोडीकडे पाठ फिरवून तिथून निघून गेली. राल्फ तिचा मित्र झाला होता ना? मग एखादा ओरोंग-ऊ-थँग अशा परिस्थितीत जसा वागला असता तसंच वागणं तिला प्रशस्त वाटलं. प्राण्यांशी दोस्ती करायची तर माणसाचे नियम त्यांच्यावर लादून चालणार नाही. ती बळजबरी होईल, ते प्रेम नव्हे, तो समजूतदारपणा नव्हे.

पण बिरुटेचा सर्वांत जास्त जीव जडला होता तो सुपिन्हा (Supinah) या ओरोंग-ऊ-थँग मादीवर. सुपिन्हाच्या योनिमार्गाला एकदा जखम झाली आणि पुढे ती जखम चिघळून त्यात किडे पडले. मग त्यापोटी तिचं छोटंसं ऑपरेशनही करावं लागलं. ऑपरेशनच्या वेळी भूल तर द्यावीच लागते, पण सुपिन्हावर त्या भुलीचा व्हावा तसा परिणाम होईना आणि तिला आवश्यक ती गुंगी येईना. त्या वेळी सुपिन्हाच्या केसांतून फणी फिरवत, मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, रडणाऱ्या लहान मुलाची आपण समजूत घालतो तशी सुपिन्हाशी गोडऽगोड बोलत बिरुटे कावऱ्याबावऱ्या झालेल्या सुपिन्हाला समजावत होती. ओरोंग-ऊ-थँगच्या अशक्त किंवा आजारी अर्भकांची ती खूप काळजी घ्यायची.

तिचं सगळं घरच तिने जणू दत्तक घेतलेल्या ओरोंग-ऊ-थँग अर्भकांनी भरलं होतं. एखाद्या अनाथाश्रमासारखं. हे घर सदैव अस्ताव्यस्त असे. ७०-८० छोट्या-छोट्या ओरँग-ऊ-थँगचा तिथे धुडगूस चाले. मोडतोड, उलथापालथ, आपापसांतले खेळ आणि मारामाऱ्या, कोणत्याही भांड्यात तोंड घालणं, कशातही थुंकून ठेवणं. त्या घराला घरपणाच राहिला नाही. वैवाहिक जीवनात जो काही एकान्त, काही गलबला असतो, त्यातला एकान्त क्षणभरही लाभेना झाला. फक्त ओरँग-ऊ-थँग याशिवाय दुसरा कसलाच विषयही आणि विचारही शिल्लक राहिला नाही. तेव्हा शेवटी तिच्या जोडीने तिच्या या कार्याला संपूर्ण वाहून घेतलेला तिचा नवरा रॉड हादेखील थकला. त्याची सहनशक्ती संपली आणि शेवटी तिला सोडून तो निघून गेला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

त्यानंतर दोन वर्षांनी तिने तिच्या कामात तिला मदत करणाऱ्या पाक बोहाप (Pak Bohap) या इंडोनेशियन माणसाशी लग्न केलं. हा नवरा मुलगा तिच्याहून वयाने सातेक वर्षांनी लहान तर होताच; पण त्याची उंची, वजन, शरीरयष्टी काहीच तिच्या थोराडपणाला साजेसं नव्हतं. त्याला इंग्रजी येत नव्हतं. पण त्याच्याशी लग्न झाल्यावर तिच्या कामात तिला होणारा इंडोनेशियन सरकारी अधिकाऱ्यांचा जाच मात्र जवळ जवळ संपला. आणि पोरक्या ओरँग-ऊ-थँगचं पालनपोषण करून ते पुरेसे मोठे झाल्यावर स्वतंत्र जीवन जगायला त्यांना जंगलात सोडण्याच्या या जोडप्याच्या कार्यातले अडथळे दूर झाले.

लुई लीकीच्या या तिन्ही मानसकन्यांनी आपापल्या परीने माकडाच्या जातीतले गोरिला, ओरँग-ऊ-थँग आणि चिंपँझी या तीन प्राण्यांपैकी माणसाचा पूर्वज निश्चित कोण, ते शोधून काढण्याच्या कार्याला आपापलं आयुष्य वाहिलं आणि आपण सांगतो तोच नेमका माणसाचा पूर्वज आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यातून नेमकं काय सिद्ध झालं, ते माझ्या तरी लक्षात आलं नाही. पण त्या तिघींनीही त्या-त्या प्राण्यावर आणि त्या-त्या प्राण्यांनीही या तिघींवर जिवाभावाने प्रेम केलं ही गोष्ट निर्विवाद. त्यांच्या जीवनक्रमाबद्दल आणि शोधकार्याबद्दल वाचत असताना स्वतः तो लुई लीकी आणि त्याच्या या तीन मानसकन्या यांच्यावरून आपला स्वतःचा जीव ओवाळून टाकावा अशी भावना आपल्या मनात रेंगाळत राहते, हेही तितकंच खरं.

-oOo -

पुस्तक: मण्यांची माळ
लेखिका: सुनीता देशपांडे
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती तिसरी
वर्ष: २००४
पृ. ८६-९४.

---

संबंधित लेखन:
वेचताना...: जिज्ञासामूर्ती
माकडे, माऊली आणि तिच्या मुली


हे वाचले का?