रविवार, २४ डिसेंबर, २०२३

अबोला

वैशाखातील दुपार खंजिरासारखी तळपत होती. उन्हाच्या सणक्यानं सगळं गाव निपचित पडलं होतं. वारा वाहत नव्हता. झाडं हलत नव्हती. कुठंच हालचाल नव्हती, गजबज नव्हती. छपरांच्या सावलीला गुरं निवांत होती. भिंतीच्या कडेशी माती उकरून कोंबड्या गपचीप बसल्या होत्या, पाय पोटाशी घेऊन आणि गोल डोळ्यांवर पापण्यांचे पांढरे पडदे ओढून डुलक्या घेत होत्या. डालपाट्याखाली कोंडलेल्या कोकराची धडपड थांबली होती. लिंबाच्या डहाळ्यात बसलेल्या साळुंक्या बोलत नव्हत्या. कावळ्यांची जोडपीही एकमेकांना बिलगून निश्चल बसली होती. कुत्री राडीत बसून ल्हा-ल्हा करीत होती. कुंभाराची गाढवं झाडाच्या सावलीला दिडक्या पायावर उभी होती. सारं खेडं उन्हाच्या तापानं मरगळून गेलं होतं.

रानमेवा

आपल्या घरात सोप्यात मिरी एकटीच गजग्यांनी खेळत होती. रंगीत बांगड्यांचे तुकडे मोजीत होती. गालावर येणारे भुरे केस सावरीत होती. आपल्याशीच काही बडबडत होती. पण तिला करमत नव्हतं. तिचं मन रंगीत काचात, गजग्यांत रमत नव्हतं. परटाची सुबा चार-सहा दिवस घरी येण्याची बंद झाली होती. त्या दोघींचं भांडण झालं नव्हतं. गट्टी फू झाली नव्हती, तरीही सुबा घरी येत नव्हती. कुठं भेटली तर बोलत नव्हती. हसत नव्हती. त्या पोरी एकमेकींपासून का तुटल्या होत्या? त्या जिवलग मैत्रिणी एकमेकींशी का बोलत नव्हत्या? चार-सहा दिवसांपूर्वी मिराच्या आईनं मिरीला बजावलं होतं, “मिरे, परटाच्या पोरीशी खेळू नकोस, तिच्या घरी जाऊ नकोस.”

“का आई?”

“का आणि कशासाठी! खेळत जाऊ नकोस म्हणून सांगितलं ना?”

“पण तिनं काय केलंय?”

“तिनं नाही, तिच्या आईनं केलंय!”

“काय?”

“तुला नाही समजायचं ते सांगून. पण यापुढं तिच्या घरी जाऊ नकोस, समजलं?”

मिरीला मुळीच समजलं नाही. आई कामाला लागली तेव्हा तिच्या ओल्या पदराशी झटत तिनं सारखी भुणभुण लावली.

“सांग ना गं आई–”

ओचा हिसकून रागानं आई विचारी, “काय गं, कार्टे, काय सांगू तुला?”

“सुबाच्या घरी का जायचं नाही?”

“नाही जायचं. तिची आई चांगली नाही.”

“काय करते ती?”

“काय सांगू तुला, माझं कपाळ!”

“सांग ना गं!”

मिरीनं खंदूस घातला, तेव्हा आई चिडली. दात-ओठ खाऊन बोलली, “अगं, कार्टे, नवऱ्याच्या मागं चांगली राहिली नाही तिची आई.”

“म्हणजे काय केलं तिनं?”

“बावा केलान. समजलं?”

तरीही मिरीला काही समजलं नाही. एवढाच अर्थबोध झाला की, सुबाच्या आईनं अशी गोष्ट केली की, जी चांगली समजली जात नाही. एवढ्या बोधानं पूर्णतः नाही तरी तिचं थोडकं समाधान झालं आणि त्याच दिवशी काचकवड्यानं खेळायला आलेल्या सुबाला गाल फुगवून तिनं सांगितलं, “सुबा, तुझ्याशी खेळू नको म्हणून सांगितलंय आपल्या आईनं!”

सुबा परकर चघळत म्हणाली, “का गं, मी का भांडलीया तुझ्याशी?”

“नाही. पण तुझी आई चांगली नाही. तिनं बावा केलाय.”

म्हणजे काय केलं? सुबालाही काही कळलं नाही. पण बामणाच्या मिरीनं आपल्याशी खेळू नये असं काहीतरी आपल्या आईनं केलंय, हे तिला उमगलं आणि त्यामुळं तिचा अपमान झाला. एकाएकी ती रडू लागली. आणि रडतरडतच आपल्या घरी आली.

सुबा रडली म्हणून मिरीही रडली. चिंध्यांची बाहुली उराशी धरून रडली आणि रडता रडताच सोप्यात झोपी गेली.

सुबा घरी गेली आणि तिनं आपल्या आईला विचारलं, “आये, तू बावा का केलास?”

तेव्हा उत्तर देण्याऐवजी तिच्या आईनं फुकणीनं तिची पाठ सडकली. जेवू न घालता उपाशी ठेवली. तिला घरात कोंडून ती बाहेर निघून गेली.

बंद दारावर लाथाबुक्क्या मारून सुबा ओरड-ओरड ओरडली. थुकली, ओकली आणि दमून दाराशेजारी झोपी गेली. चार-सहा दिवसांपूर्वी असा प्रकार घडला आणि त्या मैत्रिणी एकमेकींशी बोलेनाशा झाल्या.

म्हणून मिरी आज एकटीच खेळत होती. तिला करमत नव्हतं. परटाच्या सुबाच्या घरी जावं, असं तिला सारखं वाटत होतं. पण आईच्या माराचं भय जबर होतं. तिनं सांगितलं होतं की, पुन्हा त्या पोरीशी खेळशील तर उलटी टांगून मारीन. अंधाऱ्या खोलीत डांबून घालीन! परटाच्या सुबानं असं काय केलं होतं? तिच्या आईच्या हातून अशी कोणती चूक झाली होती? मिरीला काही कळत नव्हतं. तिला सुबावाचून करमत नव्हतं. एकटीनंच काय खेळायचं?

गजगे गोळा करून मिरी उगीच बसली. बाहेर उन्हाकडे बघवत नव्हतं. डोळे दिपत होते. सगळीकडे उदास शांतता पसरली होती.

मग स्वयंपाकघरातून आई ओरडली, “मिरे, इकडे ये जरा!”

परकर उचलून धरून मिरी आत गेली.

“काय आई?”

फडक्यात बांधलेली थाळी उचलून देत आई म्हणाली, “तुझ्या वडिलांना जेवण देऊन ये जा मळ्यात!”

ओढ्याच्या पलीकडे मळा होता. मिरीचे वडील आंब्याची झाडं राखीत तिथं बसले होते. त्यांना दुपारचं जेवण पोहोचवण्याचं काम मिरीकडं आलं होतं.

उन्ह लागू नये म्हणून आईनं धोतराची घडी पोरीच्या डोक्यावर ठेवली. पायात घालण्यासाठी आपल्या वहाणा दिल्या. आणि ती म्हणाली, “जा, चटकन देऊन ये जा. उशीर झाला आज. भुकेलेले असतील!”

डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी घट्ट पकडून मिरी घराबाहेर पडली. पायातल्या मोठ्या वहाणा ओढीत चालू लागली.

वाट सुबाच्या घरावरून गेली होती. ती आत्ता काय करत असेल? कुणाशी खेळत असेल? पण आपण तिच्या घरी जायचं नाही. तिकडं बघायचंसुद्धा नाही. सुबाची आई वाईट आहे. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं. उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी सुबाच्या घरासमोरून पुढं गेली. तिनं तिकडे वळूनसुद्धा बघितलं नाही!

आपल्या घराच्या उंबऱ्यात खेळ मांडून सुबा बसली होती. तिनं डोळे मोठे करून मिरीला जाताना बघितलं. असल्या उन्हात आपली मैत्रीण एकटीच कुठं गेली? डोक्यावर थाळी घेऊन मळ्यात जेवण पोहोचवायला गेली असावी! तिला भीती नाही का वाटायची एकटीला ? ओढ्यातल्या कवठीखाली भूत आहे. ते तिला खाऊन टाकील, मग आपल्याला मैत्रीण कोण? तिच्या सोबतीला गेलं पाहिजे. पण ती आपल्याशी बोलत नाही. न का बोलेना. आपण न बोलता तिला सोबत जाऊ.

खेळाचा पसारा तसाच टाकून सुबा उठली आणि बाहेर पडली. मिरीच्या मागोमाग जाऊ लागली.

उन्हाच्या सणाक्यानं खालचा फुपोटा तापला होता. त्याचे चटके बसू लागले, तेव्हा पायात काटे मोडल्यासारखी चालू लागली. तोंडानं हाशऽ हूशऽ करू लागली.

मिरीचं तोंड उन्हानं तांबडंलाल झालं. घामाचे ओघळ गालांवर उतरले. डोक्यावरची थाळी दोन्ही हातांनी धरून, पायापेक्षा दुप्पट मोठ्या वहाणा ओढीत ती चालली होती.

आता त्या दोघींमध्ये केवळ चार-सहा पावलांचं अंतर राहिलं. पावलांचा आवाज, चटके बसल्यामुळे तोंडातून निघालेला आवाज यामुळे मिरीची खात्री झाली की सुबा आपल्यामागून येत आहे. डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच तिनं मागं पाहिलंही.

दोघीही न बोलता चालू लागल्या.

गावाबाहेरचं खंडोबाचं देऊळ आलं, मागं पडलं. ओढ्याचा खडकाळ उतार उतरून दोघीही वाळूत शिरल्या. रुंद पात्र असलेल्या ओढ्यात पाण्याचा टिपूस नव्हता. सगळीकडे वैराण वाळू, ती तापलेली.

तापलेल्या हवेचे थर वाळूवरून सळसळत होते. त्याच्याकडे बघत मिरी जात होती. वाळूतून गेलेल्या गाडीची लांबच लांब चाकोरी उठली होती. तिच्यातून मळ्याकडे जात होती.

सुबाचे पाय फार भाजू लागले. तिच्या कानातून कळा येऊ लागल्या. तरी ती ओठावर ओठ दाबून चालतच होती. मैत्रिणीमागून जातच होती.

सुबा आपल्यामागून येत आहे, ही जाणीव मिरीला होती. पलीकडच्या काठावर असलेल्या कवठीच्या झाडावर भूत आहे, त्यानं आपल्याला खाऊ नये म्हणून ती सोबतीला आली आहे, हेही तिला कळलं. कारण आजपर्यंत त्याच कारणासाठी तिनं अनेकदा सुबाला आपल्याबरोबर मळ्यात नेलं होतं.

दोघीही मैत्रिणी ओढ्याच्या मध्यापर्यंत आल्या आणि पुढं चालणारी मिरी एकाएकी थांबली. त्याबरोबर मागून चालणारी सुबाही थांबली. कधी टाचेवर तर कधी चवड्यावर, कधी डावा पाय उचल तर कधी उजवा उचल, असं करीत उभी राहिली. मिरीनं वहाणा काढल्या आणि उघड्या पायानं ती वाळूत उभी राहिली. आणि तिला कळून चुकलं की, वाळू फार तापली आहे. पायात वहाणा असल्याशिवाय अर्धेअधिक चालून येणंदेखील कठीण आहे! मग पायातल्या वहाणा तिनं तिथंच ठेवल्या आणि ती मुकाट्यानं पुढं चालू लागली.

सुबा वहाणांपाशी आली. चटकन तिनं त्या घातल्या. पोळलेले पाय थोडेफार थंड झाले. मोठ्या वहाणा ओढीत ती चालू लागली. अनवाणी चालणाऱ्या मिरीमागोमाग जाऊ लागली. वाळवंट संपलं. कवठीचं मोठं झाड आलं. उंचच्या उंच झाड. त्याच्या एका फांदीवर लाल मानेचं काळं गिधाड बसलं होतं.

दोघींनीही डोळे गच्च मिटून घेतले. तोंडानं राम-राम-राम-राम म्हणणं आवश्यक आहे, असं मिरीला वाटलं. सुवाला तसं सांगणं जरुरीचं होतं. पण हिच्याशी बोलायचं नाही! मग? सुबाऐवजीसुद्धा ती आपणच रामराम म्हणू लागली. कवठीचं झाड मार्ग पडलं. माळरान आलं. वाटेकडेला झाडं-झुडपं होती. त्या सावलीतून दोघी चालू लागल्या. न बोलता, न हसता.

मग मळ्याची हद्द लागली तशी मिरी थांबली. सुबा पुढं झाली. तिच्या पायापाशी आपल्या पायातील वहाणा काढून ठेवून, पुन्हा झाडाच्या सावलीला गेली. आत्ता मळा मिरीचा होता आणि भांडणाच्या नियमाप्रमाणे सुबाला त्याच्यात पाय टाकायचा नव्हता. सावली असल्यामुळे वहाणांची जरुरी नव्हती. मिरीला रानातून जायचं होतं. काटेकुटे बोचण्याचा संभव होता. पुढं ठेवलेल्या वहाणा पायात घालून मिरी मुकाट्यानं बांधावरून जाऊ लागली.

पुढं हिरवीगार आंब्याची झाडं होती. फळांचे घोस लोंबत होते. त्यांची राखण करीत मिरीचे वडील बसले होते. आंब्याच्या खोडाशी पटका उशाला घेऊन टेकले होते.

उन्हाच्या भगभगीतून त्या थंडगार सावलीत येताच, मिरीच्या नाकपुड्या फुगल्या. पाडाला आलेल्या आंब्यांचा सुरेख वास. गार आणि गोड वास आला तो हुंगून वनातल्या परीसारखी ती वडिलांपाशी गेली आणि त्यांना गुंगीतून जागं करीत म्हणाली, “अप्पा, अप्पा, तुमचं जेवण आणलं मी!”

अप्पा डुलकीतून जागे झाले. शेंडी गोंजारीत उठून बसले. पोरीच्या तोंडावरचा धाम धोतरानं पुशीत म्हणाले, “उन लागलं गं माझ्या बाईला. एकटा आलास तू राजा?”

त्यांच्या छातीवर डोकं घुसमडत मिरी म्हणाली, “हो अप्पा!”

खरं तर तिला सुबा आल्याचं सांगायचं होतं. तिच्या आईनं काय वाईट केलंय, तेही विचारायचं होतं. पण अप्पांच्या मिशांची, खाकी रंगाच्या शिकारी कोटाची, जाड आणि केसाळ बोटांची तिला फार भीती होती. फारच. मग ती एकाएकी उठली आणि म्हणाली, “अप्पा, आम्ही जातो!”

“बरं, जा हं!”

मग अप्पांनी धोतराखाली ठेवलेला एक पाडाचा आंबा काढून, मुलीला दिला. हिरव्यापिवळ्या रंगाचा मोठा आंबा, तो ओच्यात घेऊन मिरी परत घरी निघाली. मोठ्या वहाणा ओढत आणि डोक्यावर धोतराची घडी घेऊन.

झाडाच्या सावलीत सुबा उभी राहिली होती. खारोट्यांकडे बघत आणि परकर चोखत. मिरी येताच ती निमूट तिच्यामागं जाऊ लागली. न बोलता, न हसता.

मिरीनं ओच्यातील आंबा काढला आणि तो चोखत-चोखत जाऊ लागली. तिच्यामागोमाग सुबा.

ओढ्याच्या अलीकडे येईतो मिरीनं आंबा चोखला. तो निम्मा राहिला तेव्हा एका दगडावर ठेवला आणि ती सुबाला काहीही न सांगता, वाळूत उतरली.

सुबानं तो आंबा निमूटपणे घेतला आणि चोखत-चोखत ती मिरीच्या मागोमाग जाऊ लागली. पायाला चटके बसत होते आणि तोंडात गोड रस जात होता. कपाळावर घाम येत होता आणि गाल पिवळ्या रसानं माखत होते.

अर्धे वाळवंट संपताच मिरीनं वहाणा काढून ठेवल्या आणि ती पुढं गेली. सुबानं त्या घातल्या आणि मिरीच्या मागोमाग गेली.

दरड संपली. खंडोबाचं देऊळ मागं पडलं. घर आलं. आंब्याची बाठ आणि साल फेकून सुबानं तोंड पुसलं, वहाणा काढून मिरीपुढं ठेवल्या आणि आपल्या घराच्या उंबऱ्यात उभी राहून, ती मैत्रिणीकडे बघत राहिली.

मिरी पाठमोरी चालली होती. तिला वाटत होतं की, सुबाच्या घरी जावं. पण सुबाची आई वाईट होती. वाईट आईच्या मुलीशी बोललं की, पाप लागतं! उन्हानं लाल झालेले गोरे गाल फुगवून मिरी पुढं निघून गेली. तिनं मागं वळूनसुद्धा बघितलं नाही.

(‘विवेक’, विजयादशमी विशेषांक, १९५०.)

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४५-५०.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)

---

(पुस्तकामध्ये ही कथा ‘बावा’ या शीर्षकाखाली समाविष्ट केलेली आहे.)


यांसारखे आणखी:
    वाळूचा किल्ला
    एका गोष्टीची गोष्ट


हे वाचले का?

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

देवकथा बोलतात तेव्हा...

कांचीपुरम् किंवा कांची हे नाव आपण अनेकदा ऐकले आहे. कधी तिथल्या बालमजुरांच्या शोषणाबद्दलच्या हकिकती वाचून आपण हळहळलो आहोत, तर कधी तिथून आलेल्या शंकराचार्यांच्या आगमनाच्या, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कधी तिथल्या रेशमी साड्यांचं प्राचीन, सुलक्षणी वैभव पाहताना आपण हरखलो आहोत, तर एखाद्या प्रवाशानं तिथल्या बाजारपेठेबरोबरच तिथल्या मंदिरांचं महत्त्वही आपल्याला ऐकवलं आहे.

जर दक्षिणेत गेलात तर कांचीला एकदा जरूर जा. प्रवासी माणसांचं प्रांजळ कुतूहल आणि उत्सुकता बरोबर घेऊन जा. मदुरा आणि कुंभकोणम्‌सारखंच हे देवळांचं गाव तुम्हाला दिसेल. हे कामाक्षीचं गाव. सारीपाट खेळताना शिवावर पार्वतीनं मात केली आणि आनंदाच्या भरात ती आदिमाया असं काही तरी बोलली की शिवमहेश्वराला ते बोलणं फारच लागलं, मुळातला तो साधाभोळा देव, पण रागावला की पहायला नको. त्यानं गौरीला म्हटलं, ‘कुरूप होशील आणि पृथ्वीवर जाऊन पडशील.’ शाप खरा ठरला आणि पार्वती कांचीला आली. इथं तिनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठे तप मांडलं.

शिव मोठा अहंकारी नवरा निघाला. लहानशा थट्टेतल्या बोलण्यावरून तो इतका रागावला की, त्यानं पार्वतीला कुरूपच करून टाकलं. वर तिनं मांडलेल्या तपानंही त्याचं पुरे समाधान झालं नाही. मग त्यानं आपल्या जटेतून गंगेला खाली उतरवलं. मग नदीला पूर आला आणि पार्वतीचं पूजालिंग पाण्याखाली जाणार, या कल्पनेनं ती भयभीत झाली. पाणी वाढू लागलं तेव्हा स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तिनं लिंग उचलून आपल्या छातीशी धरलं. ते पाहिलं आणि शंकर विरघळला. उतरून खाली आला. मग पुन्हा एकदा जगाच्या माता-पित्यांचा सुंदर विवाहसोहळा कांचीमध्ये साजरा झाला.

त्या सोहळ्याची आठवण कांचीनं कामाक्षीच्या रूपानं जपली आहे. पण कांचीत शिवपार्वतीचीच नव्हेत, इतरही पुष्कळ मंदिरं आहेत. वैष्णवांची आहेत. जैनांची आहेत. बौद्धांचीही आहेत. या मंदिरांभोवती अनेक पुराणकथा गुंफल्या आहेत. त्या ऐकाल तुम्ही. कांचीला गेला तर पुजाऱ्यांकडून ऐकाल, एखाद्या वृद्ध भाविकाकडून ऐकाल आणि ऐकता ऐकता त्या अ-लौकिक अशा देवकथांमधून लौकिक असा एक वेगळाच इतिहास तुमच्यापुढे उभा राहील. धर्माच्या बदलत्या प्रभावांचा कथात्म इतिहास.

लोक आणि अभिजात

उदाहरणार्थ पहा, कांचीमधल्या कच्छपेश्वराची कथा. हे मंदिर शिवाचं. मग इथं कच्छ म्हणजे कासव कुठून आलं? कथा अशी आहे की, विश्वाच्या प्रारंभी ज्योतिर्मय लिंगाच्या रूपात शिवाची इथं वस्ती होती. त्यानं इथूनच सारी सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्म्यासह सरस्वतीला सृष्टीचे आदिदेव म्हणून पद बहाल केले.

मग नंतर एकदा समुद्रमंथन झालं. मेरुपर्वताची रवी समुद्राच्या पोटात फिरू लागली. पृथ्वीगर्भाला धक्का लागू नये, म्हणून कासव होऊन विष्णूनं तिला आधार दिला. पण या आपल्या कृतीचा विष्णूला इतका अहंकार वाटला की, त्यानं अमृत देवासुरांच्या हवाली करण्यासाठी चक्क नकार दिला. त्यानं देवांना आपल्या सामर्थ्याची भीती घातली आणि समुद्रालाही त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा नाइलाजानं साऱ्यांनी शिवाला साकडं घातलं. शिव आला आणि त्यानं सहज विष्णुरूपी कासवाचा नाश केला. त्याला मारून त्याच्या कातड्याची ढाल आपल्या गळ्यातल्या श्वेतमालेत मध्यभागी धारण केली. म्हणून हा शिव कच्छपेश्वर.

पुढे विष्णूलाही आपली चूक उमगली आणि तो कांचीच्या स्वर्णलिंगाला शरण आला. तेव्हा शिवानं उदार अंत:करणानं त्याची पुन्हा वैकुंठात प्रतिष्ठापना केली. या कथेची आठवण देत कच्छपेश्वर कांचीला उभा आहे. ही कथा म्हणजे प्रत्यक्षात काय आहे, असं तुम्हाला वाटतं ?

वर वर पाहता ही एक साधी पुराणकथा आहे: अर्थहीन, भाकड वाटणारी पुराणकथा. पण धर्मेइतिहासाचा मागोवा घेणाऱ्या एखाद्या माणसासाठी ही कथा म्हणजे शैवांनी वैष्णवांवर मिळवलेल्या विजयाचं ते एक स्थानिक स्मारक असल्याचा पुरावा बनून जाईल. शैव-वैष्णवांचे झगडे या देशाच्या भूमीवर पुष्कळ झाले. धर्मप्रभावी अशा इतिहासाच्या एका कालखंडात दक्षिण भूमीवर या झगड्यांशी राजसत्ताही निगडित झाल्या. देवळांच्या रूपानं, दैवतकथांच्या रूपानं या झगड्यांची आणि त्यांतल्या जय-विजयाची नोंद आजही आहे.

आपल्यापुढे खुद्द कांचीत आणखीही दोन देवळांच्या कथा याच प्रकारचा धर्मेतिहास सांगणाऱ्या आहेत. त्यांतही एक कुमरकोट्टमची कथा. हे कुमाराचं म्हणजे कार्तिकेयाचं किंवा सुब्रह्मण्याचं मंदिर म्हणजे कांचीतलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. ब्रह्मदेवानं एकदा स्कंद कार्तिकेयासंबंधी उदासीनता दाखवली, तेव्हा कार्तिकेयानं त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली आणि शेवटी त्याला पोकळ ज्ञानी ठरवून कैदेत टाकलं. शिवाच्या मध्यस्थीनं ब्रह्म्याची सुटका झाली आणि कार्तिकेयानं कांचीत येऊन बापाच्या रागाची शांती व्हावी यासाठी पूजा आणि तप केलं. तेच हे ठिकाण कुमरकोट्टम्, कांचीत शिवाबरोबर शिवपरिवारातल्या इतर दैवताचं स्थान कसं निर्माण झालं आणि महत्त्व कसं वाढलं, याचीच ही स्पष्टीकरणकथा आहे, हे सहज लक्षात येतं.

याहीपेक्षा लक्षणीय आणि पुरेशी बोलकी आहे ती कैलासनाथ मंदिराविषयीची कथा. पल्लव राजा राजसिंहानं बांधलेलं हे शिवमंदिर पुढे महेंद्रवर्मा तृतीय यानं वाढवलं.

या मंदिराची कहाणी पुराण सांगतं ती अशी की, पूर्वी त्रिपूर नावानं तीन राक्षस होऊन गेले. ते मोठे वेदज्ञ आणि शिवभक्त होते. पण शैव उपासनेसंबंधी, आपल्या राक्षसरक्ताचा परिणाम म्हणून की काय, ते थोडे सांशकही होते. ते देवांवर टीका करीत. त्यांना त्रास देत.

यामुळे दुःखी झालेल्या देवांनी महाविष्णूच्या कानी आपलं गाऱ्हाणं घातलं, तेव्हा महाविष्णूनं यज्ञ करून, काही भूतपिशाच्चांना असुरांचा परामर्श घेण्यासाठी रवाना केलं. पण या शिवाच्या सहचरांची काहीही मात्रा त्या राक्षसांवर चालली नाही. मग विष्णूनं आपल्या शरीरातून आदिपुत्त नावाचा एक महापुरुष निर्माण केला. नारदाच्या सहकार्यानं असुरांची मती शिवभक्तीपासून भ्रष्ट करण्याचं काम त्यानं त्या आदिपुत्तावर सोपवलं.

नारद आणि आदिपुत्त यांनी त्या तीन शिवभक्त असुरांच्या मनात शैव सिद्धांताविषयी सतत किल्मिष निर्माण केलं आणि अखेर ते तीनही असूर शिवविरोधी बनले.

विष्णूचं काम साधलं. त्यानं शिवाला म्हटलं की, पहा, हे एके काळचे तुझे भक्त कसे तुझ्या विरोधात मातले आहेत! त्यांचा नाश तूच करायला हवा आणि शिवानं–कांचीपुरात राहणाऱ्या शिवानं त्या तिघांचाही नाश केला. शंकर फक्त हसला आणि तिघंही जळून खाक झाले. मग मात्र नारद आणि आदिपुत्त म्हणजे स्वतः बुद्ध यांना आपण केलेल्या शिवविरोधी कार्याचा पश्चात्ताप झाला. कांचीमध्ये येऊन त्यांनी कैलासनाथाचं एक भव्य मंदिर उभारलं नि पूजा आणि तपाला प्रारंभ केला.

शिव प्रसन्न व्हायला अवकाश लागला नाही. त्यानं त्या दोघांच्याही पापाला क्षमा केली आणि म्हटलं की, ‘खरं तर शिवविरोधी प्रचाराचं काम केलंत, हे पाप अनेक जन्मांचं आहे. पण तुम्ही इथं राहिलात, माझी पूजा मांडलीत, म्हणून तुमचं पाप बरंचसं घटलं आहे. आता इथं एक मुक्तिद्वार बांधा. त्यातून सतत या क्षेत्रात प्रवेश केल्यानं मुक्तीचा मार्ग मोकळा होईल.’

नारद आणि बुद्ध यांनी शिवाज्ञा शिरसावंद्य मानली आणि कांचीपुराचा शिवमहिमा अबाधित गाजत राहिला.

ही कथा म्हणजे शैव संप्रदायानं बौद्धांचा प्रभाव मोडून काढल्याचा स्पष्ट निर्देश करणारी कथा आहे, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. नुकतीच उडुपीला गेले होते. तिथंही तिथल्या चंद्रमौलीश्वराच्या मंदिराची अशीच एक कथा मला ऐकायला मिळाली. शिवाचा प्रभाव मागे सारून विष्णूचा प्रभाव वाढत गेल्याचा निर्देश करणारी ती एक पुराणकथा होती. मुळात उडुपी हे शिवप्रभावाचं स्थान होतं. आतासारखं कृष्ण-स्थान नव्हे. उडुप म्हणजे चंद्र. चंद्रानं इथं शिवोपासना केली, असं सांगतात. म्हणून इथला सर्वात प्राचीन देव शिव-चंद्रमौलीश्वर आहे. या गावाचं दुसरं नाव शिवाली.

पण पुढे म्हणे रामभोज नावाच्या क्षत्रिय राजानं यज्ञस्थळ नांगरताना घडलेल्या नागाच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून नागासनाची पूजा केली आणि त्यावर त्याचा आराध्य देव विष्णू हा शिवरूपात अवतरला. विष्णूनं लिंगरूपात अवतरावं, अशी खुद्द शिवाचीच इच्छा होती.

आता उडुपीला मध्वाचार्यांनी कृष्णमूर्ती स्थापून वैष्णवभक्तीची एक प्रभावी परंपरा निर्माण केल्यानंतर मूळचा शिव हाही विष्णूच असल्याची कथा इथं जन्माला आली नाही तरच नवल...

आपल्याकडच्या पंढरपूरची कहाणीही याहून वेगळी नाही. पांडुरंगाविषयीच्या पुराणकथांपैकी काही कथा अशाच धर्मेतिहासाकडे अभ्यासकाला घेऊन जाणाऱ्या कथा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? पंढरपूरच्या लोहदंड क्षेत्राची आणि दिंडीरवनाची महती सांगण्यासाठी निर्माण झालेली कथाच पहा. लोहदंड आणि दिंडीरवन या नावाचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही कथा रचली गेली, हे स्पष्टच आहे; पण त्याचबरोबर शैव-वैष्णवांच्या धर्मपंथांच्या चढाओढीत शैव संप्रदाय फिका पडून वैष्णव संप्रदायाचं वर्चस्व इथं वाढत राहिल्याचं सूचनही या कथेत दडलं आहे.

कथा अशी आहे की, कृष्णाच्या मांडीवर राधेला पाहून रुसलेली रुक्मिणी कृष्णाला सोडून निघाली ती दिंडीरवनात आली. तिची समजूत घालायला पाठोपाठ कृष्णही आला. ही हकीकत विष्णूचं ध्यान करीत असलेल्या शंकराला पाहून कुतूहल वाटलेल्या पार्वतीला खुद्द शिवानं सांगितली आहे. पार्वतीनं उत्सुकतेनं विचारलं की, ‘रुक्मिणी रुसून आली त्या वनाला दिंडीरवन का म्हणतात ?’ आणि शिवानं तिची कुतूहलपूर्ती करताना सांगितलेली ही कथा आहे.

पूर्वी दिंडीरव नावाच्या राक्षसानं साऱ्या देवांचा छळ मांडला. तेव्हा दुःखी होऊन देवांनी विष्णूची प्रार्थना केली. विष्णू द्रवला आणि चंद्रसेन राजाचा मल्लिकार्जुन नावाचा पुत्र म्हणून जन्म घेऊन त्याने दिंडीरव राक्षसाचा लोखंडी गदेनं वध केला. तो राक्षस मरताना ‘हरे हरे’ म्हणाला. म्हणून विष्णू त्याच्यापुढे प्रकट झाला. त्यानं मागणं मागितलं, ‘देवा, माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावानं हे वन ओळखलं जावं. लोहदंडानं माझा वध झाला, तेव्हा हे क्षेत्र लोहदंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावं. जिथे ती गदा नंतर पाण्यात पडली ते गदातीर्थ व्हावं आणि इथं येणाऱ्यांचा उद्धार व्हावा.’ विष्णूनं ‘तथास्तु’ म्हटलं आणि त्याप्रमाणे सर्व घडलं.

इथला शिव म्हणजे मल्लिकार्जुन हा अशा तर्‍हेनं मूळचा विष्णूच आहे, असं कथा सांगते. मूळचं शिवस्थान वैष्णवांनी आपलंसं केल्याचा हा कसा गमतीदार पुरावा आहे पहा.

पुराणकथांच्या निरर्थक वाटणाऱ्या संभारातून जेव्हा दैवतविज्ञान आणि धर्मेतिहास यांची अशी वेगळी जुळणी होत जाते, तेव्हा परंपरेच्या अभ्यासकांसाठी लोकसंस्कृतीनं पुढे केलेला तो मदतीचा हातच तर असतो.

-oOo-

पुस्तक: लोक आणि अभिजात.
लेखक: अरूणा ढेरे.
प्रकाशक: मंजुल प्रकाशन.
आवृत्ती पहिली.
वर्ष: १९९३.
पृ. १४८-१५२.


हे वाचले का?

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

एका गोष्टीची गोष्ट

“ता-त्या”

“काय बाबा?”

“मला गोष्ट सांगा की!”

“कशाची सांगू?”

अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही.

“वासराची सांगता?”

“तू वासरू कुठं बघितलंस?”

“आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.”

‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’

“सांगा वासराची.”

प्रसंग बाका होता. कारण गोष्ट सांगणं प्राप्तच. नाहीतर लगेच बाबाचा माझ्याविषयीचा आदर कमी होतो. मला पतंगाला कन्नी बांधता येत नाही हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला जबर धक्का बसला होता. त्याची अशी ठाम समजूत आहे की, आपला बाप सर्वज्ञ आहे. त्याला सगळं येतं.

“सांगा ना वासराची.”

बाजार

“एक वासरू होतं.”

“नेहमी आईजवळ असायचं, पण एकदा त्याला वाटलं की, एकटंच बाहेर जाऊन यावं. गाय आणि बाकीची गुरं बांधलेली असायची, पण वासरू मोकळं असायचं. त्यानं कुंपणाबाहेर उडी टाकली आणि पळालं.”

“हं, कुठं गेलं पळत पळत ”

“गावाभोवती जंगल होतं. डोंगर होते. जंगल फार दाट होतं. उंच-उंच झाडं, बुटकी झुडपं, काटेरी जाळ्या, रानटी वेल, गवत. माणसांनासुद्धा नीट पाऊलवाटेनं गेलं तर जाता येई. नाहीतर माणसं चुकत. त्यांना घरी परत येण्यासाठी वाट सापडता सापडत नसे.”

“मग?”

“वासरू एका वाटेनं गेलं. झाडं, पक्षी, फुलं बघत-बघत, उड्या मारत, कोवळं गवत खात असं मजेत खूप दूर गेलं.”

“आईनं हाका नाही का मारल्या?”

“हो, मारल्या; पण तोपर्यंत वासरू लांब गेलं होतं. त्याला हाका ऐकू नाही आल्या.”

आता पुढं काय सांगावं बरं, म्हणून मी थोडा गप्प. एक आशा की, त्याला झोप लागावी. एका मिनिटाची स्तब्धता, पण वासरामागोमाग बाबाही जंगलात शिरलेला होता.

“त्याची दूध प्यायची वेळ झाल्यावर ते परत आईकडे आलं?”

“नाही.”

कारण मग गोष्ट संपलीच की! काहीतरी घडणं आवश्यक होतं. एखादा समरप्रसंग... काय बरं नेमकं घडेल? माझ्याअगोदर बाबालाच सुचलं.

“त्या जंगलात वाघ नव्हते?”

“होते. एक मोठा वाघ होता. तो सावलीला झोपलेला.”

“हं.”

आता समरप्रसंगाला वाव होता. वाघाची व्यक्तिरेखा चांगली गडद हवी. तो कथेतला खलनायक.

“हा वाघ दुष्ट होता. त्याला शेळीची लहान-लहान बाळं, हरणं खायला आवडायची. जाळीत तो झोपला होता आणि एकाएकी त्याला वासराचा वास आला.”

इथं सांगण्यात तपशील चुकला, म्हणून मी थांबलो. वाघ ह्या प्राण्याचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण नसतं.

“हं.”

या हुंकाराबरोबर बाबा जवळ आला. माझा दंड त्यानं धरला. त्याच क्षणी मला वाटलं की, आता पंचाईत आहे. वासरावर काही प्रसंग येता कामा नये. वाघानं तर त्याला खाता उपयोगीच नाही. तपशील चुकला; पुढे चुकता उपयोगी नाही; पण काही नाट्यपूर्ण घडलं पाहिजेच. काय बरं? विचार करायला फुरसत नाहीच.

“हं, पुढे काय झालं?”

“वाघानं डोळे किलकिले करून पाहिलं, तर दूरवरून लहानसं वासरू कान हलवत वाटेनं येतंय. आपल्याकडंच येतंय.”

“पण वासराला नाही का वाघाचा वास आला?”

“कसा येणार?”

वारा वाघाच्या दिशेनं वाहत होता, हा तपशील ह्याला कळणारच नाही.

“वासरू आनंदात होतं. फुलांचे, झाडांचे वास त्याला माहीत होते. वाघाचा वास कसा माहीत असणार? त्यानं तो कधी घेतलाच नव्हता अगोदर. आणि ते मजेत होतं. पुढे वाटेवरच झाडाखाली वाघ झोपलेला आहे, हे त्याला माहीतच नव्हतं. ते सरळ वाघाच्या समोरच आलं.”

“हं.”

दंडावरची छोटी पकड घट्ट झाली. आता घटना, संवाद झाले पाहिजेत आधी. “वाघ उठून उभा राहिला. मोठा, उंच, रंग तांबडा, अंगावर काळे पट्टे, डोळे हिरवे. वासरू धीट होतं. ते वाघाकडे बघत उभं राहिलं. वाघ म्हणाला, ‘थांब, मला फार भूक लागली आहे.’ ”

वाघ बोलेल कसा, हा प्रश्न येणार म्हणून मी थांबलो; पण आला नाही. टेन्स प्रसंगात श्रोत्याला भान राहत नाही, हे खरंच.

“वाघानं जीभ ओठांवरून फिरविली. शेपटी वर-खाली हलवली. तो म्हणाला, ‘मी तुला खाणार.’

“वासरू म्हणालं, ‘खा, पण मी माझ्या आईला सांगून आलो नाही. ती शोधत राहील. तू थोडा थांबशील, तर मी आईला सांगून परत येईन ’

“नक्की?

“हो, देवाची शप्पथ! सुटली बोल.

“बरं जा, आणि लगेच परत ये. वाट सापडेल का?

“हो, सापडेल.”

इथपर्यंत ठीक जमलं.

आता पुढे काय? लबाडी करून वासरू परत आलंच नाही तर? पण त्यानं देवाची शप्पथ घेतली होती. खोटं कसं बोलणार? खोटं बोलणं हे पाप.

“हं, पुढे काय झालं?”

“गेल्या वाटेनं वासरू परत आलं. आई काळजीत होतीच. तिला आनंद झाला.”

“रागावली नाही?”

हा मुद्दा राहिलाच. आई रागावणार, ही गोष्ट सुसंगत होती.

“रागावली थोडी. म्हणाली, ‘असं न सांगता जायचं नाही पुन्हा. लहान आहेस तू.’

“वासरू म्हणालं, ‘नाही जाणार पुन्हा कधी. पण आई, मला वाघ भेटला ’

“बाई गं! आणि रे?’

“तो म्हणाला, मला भूक लागली आहे. मी तुला खाणार. मी म्हणालो, माझी आई शोध करील, तिला विचारून येतो.’

“असं म्हणालास?’

“हो. तो म्हणाला, नाही आलास तर? मी म्हणालो, देवाची शप्पथ येईन.’

“आईनं विचार केला. ती म्हणाली, ‘तू जाऊ नकोस; मी जाते.’ ”

आपली वासराची गोष्ट आता शिवलीलामृतातल्या व्याधहरिणीकडं चालली आहे, हे माझ्या ध्यानात आलं. पुढं आता शेवटपर्यंत सगळं सोपं होतं.

“मग आई गेली. वाघ वाट बघतच होता. ती म्हणाली, ‘माझ्या मुलाऐवजी मी आले आहे.’

“वाघ म्हणाला, ‘मला काय, भूक भागल्याशी कारण. तुला खातो.’

“गाय म्हणाली, “पण मुलाचे वडील माझा शोध करतील. त्यांना विचारून आलं पाहिजे.’ ”

माझ्या गोष्टीनं वेगळीच कलाटणी घेतली होती. वाघाची कॅरॅक्टर सिंपथी खाऊन जात होती.

“वाघ म्हणाला, ‘जा, लवकर विचारून परत ये.’ ”

शिवलीलामृतातली गोष्ट मला आठवेना. बहुधा व्याधाच्या मनात परमेश्वर उभा राहिलेला असणार. इथं त्याचा काही उपयोग नव्हता. आता गोष्ट आपणच तडीला न्यायला पाहिजे. वाघाच्या मनात परमेश्वर उभा राहणं खरं नाही.

“आई गेल्या वाटेनं परत आली. वासराचे वडील होतेच. त्यांना म्हणाली, ‘अहो, तो वाघ म्हणाला की, मला भूक लागलीये. तुला खातो. तर मी म्हणाले, तुम्हाला सांगून परत येते.’

“वडिलांनी विचार केला. म्हणाले, ‘तू जाऊन आपल्या वासराला दूध कोण पाजणार? मी जातो.’ आणि बैल त्या वाटेनं निघाला.”

बाबाला आता वाटलं होतं की, वासरू सुटलं, आई सुटली. वडील लोक शूर असतात. ते वाघाची जिरवणार.

मला प्रश्न पडला की, आता बैलोबा काय करणार? एका बैलाला वाघाची जिरवता येणं शक्य नाही.

“हं पुढं?"

“बैल वाटेनं चालला, चालला. तिकडं वाघ जिभल्या चाटीत उभा होताच. मग बैलानं ठरवलं की, असं चालायचं नाही. वाघाला उद्या भूक लागेल, परवा लागेल. रोज एकाला तो खाईल. त्याला धडा शिकवला पाहिजे. रानात आणखी बैल चरत होते. त्यांच्याकडे तो गेला. सर्वांना एकत्र करून म्हणाला, मला मदत करा. सगळे बैल धष्टपुष्ट होते. त्यांची शिंगं टोकदार, कठीण होती. ते म्हणाले, चला आपण वाघावर हल्ला करू. आणि निघाले. वाघाला आवाज ऐकू येऊ नये म्हणून हळूहळू निघाले. गळ्यातल्या घंटासुद्धा वाजवल्या नाहीत.

“वाघ वाट बघतच होता. त्याला आता फार भूक लागली होती. वासराचे वडील आले की, काही एक न बोलता-सवरता त्यांना खाऊन फस्त करायचं, असं त्यानं ठरवलं होतं.”

मला श्रोत्याचा रिस्पॉन्स कळत नव्हता. बाबा गप्प होता. कदाचित प्रसंग गंभीर म्हणून असेल. कदाचित झोप डोळ्यांवर उतरली असेल. मुद्दामच मी थोडा वेळ थांबलो.

“हं, पुढे?”

“मग सगळ्या बैलांनी वाघाभोवती गोल केला. त्याला घेरून मध्ये घेतला आणि शिंगं रोखून ते त्याच्या अंगावर धावून गेले. बैलांचे डोळे तांबडे-लाल झाले होते. नाकातून फुस्कारे निघत होते.”

पुन्हा दंडावरची पकड घट्ट झाली. रडव्या आवाजात प्रश्न आला, “त्यांनी मारून टाकलं वाघाला?”

घोटाळा माझ्या लक्षात आला. वाघाची कॅरॅक्टर आपण सिंपथेंटिक केली, त्याचा हा परिणाम आहे. ही शोकान्त गोष्ट होता कामा नये. म्हणजे पुन्हा पंचाईत.

“अं? त्या बैलांनी वाघाला मारून टाकलं?”

“छे! मारलं नाहीच. इतके बैल आपल्या अंगावर धावून येताहेत, हे बघताच वाघोबाची घाबरगुंडी उडाली.”

बाबाला एकदम खदखदून हसू आलं. अगदी अनपेक्षित परिणाम !

हसतच प्रश्न : “हो?”

“हो. तो फार घाबरला आणि शेपूट पायात घालून, कान खाली पाडून धूम पळाला.”

मला मिठी मारून पुन्हा मोठ्यांदा हसू.

“हो? घाबरून धूम पळाला?”

“हो आणि ते बघून बैलांना अगदी हसायला आलं. सगळे खाली बसले आणि मोठ्यांदा हसायला लागले तोंड वर करून.”

त्या कोरसएवढं हसू! ते थांबेच ना!

तेवढ्यात पलीकडे असलेल्या खऱ्या आईचा आवाज : “बाबा, पुरे आता. झोपा बघू. ताई तिकडे अभ्यास करतीये ना!”

एकदम शांतता. मग गोष्टीवरच विचार. मला वाटलं, हा झोपला.

तेवढ्यात अगदी हळू आवाजात प्रश्न : “मग तो वाघ उपाशीच राहिला?”

बाप रे! आता कुणाचीही हत्या न होऊ देता ह्या वाघाला खाऊ काय घालावं? काहीही झालं तरी वाघ गवत खाणार नाही. फळं खाणार नाही. दूध पिणार नाही. काय खाईल तो? त्यानं खाल्लं हे पाहिजेच. उपाशी कसा झोपणार? माझ्यापुढे मोठा प्रश्न!

काय? काय? काय?

दोन-तीन मिनिटं शांतता. एकदम सुचलं. तपशील चुकीचा, पण गोष्टीत खपून जाण्याजोगा. हळू आवाजात म्हणालो, “छे! उपाशी कसा राहील? तो गेला आणि एका झुडुपाला मोठं मधाचं पोवळं त्याला दिसलं. सगळ्या मधमाशा मध गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. वाघानं पंजानं ते पोळं ओढून घेतलं आणि पोटभर मध खाल्ला. बरं का बाबा!”

नो रिस्पॉन्स! वासराला झोप लागली होती.

चला, सुटलो!

-oOo-

पुस्तक: बाजार.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती पाचवी, तिसरे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ७३-७८.
(पहिली आवृत्ती: ??? दुसरी आवृत्ती १९९२, अन्य प्रकाशन).

---

(१). पुस्तकामध्ये ही कथा ‘गोष्ट’ या नावाने समाविष्ट आहे.


यांसारखे आणखी:
     वाळूचा किल्ला
    अबोला


हे वाचले का?

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मूल्य

आता अंधारू लागले होते, पण खरी रात्र पडली नव्हती. कोठे काही तरी खावे असे तीव्रपणे वाटण्याइतकी भूक त्याला अद्याप लागली नव्हती. तेव्हा आणखी थोडा वेळ कोठे घालवावा याचा त्याला विचार पडला. पण मद्यागारांच्या बाजूलाच सुर्‍या-कट्यारींचे एक दुकान पाहताच त्याला बरे वाटले. तो सहजपणे तिथे गेला व बाहेर रुंद, मोठ्या खिडकीत टांगलेल्या कट्यारींकडे पाहू लागला.

“तुला कट्यार हवी का ? मग आत ये. आत पुष्कळ नमुने आहेत.” कोणीतरी त्याला जाड भरदार स्वरात म्हणाले. दारात एक धिप्पाड माणूस उभा होता. त्याने उघड्या अंगावर अरुंद पाळ्यांचे नुसते एक कातडी जाकीट अडकवल्याने त्यांची रुंद केसाळ छाती पूर्णपणे उघडी होती व तिच्यावर पावशेराएवढा अजस्र ताईत होता.

“छे, खरे म्हणजे मला काहीच विकत घ्यायचे नाही.” तो किंचित विरमून म्हणाला. “ मी पुष्कळ भटकलो आहे. प्रत्येक देशाचे अन्न निराळे, त्याप्रमाणे त्याची हत्यारे देखील निराळी असतात. म्हणून मी पाहत होतो इतकेच.”

माणूस मोठ्याने हसला व आत येण्याची खूण करून दारातून बाजूला झाला. “ आमचे खरे शौकीन गिर्‍हाईक असेच असते. आमची हत्यारे ही दररोजच्या उपयोगाची नाहीतच. घरी काकडी चिरायची अडचण पडली म्हणून सुरी घेण्यासाठी कोणी माझ्या दुकानात येणार नाही. "

यांचा पडदा बाजूला करून तो आत आला तेव्हा ती विस्तार पाहून तो भांबावून गेला. उजव्या व डाव्या बाजूंना विस्तृत दालने होती व तेथे जमिनीवर बसून कारागीर सोन्याचांदीची कोरीव काम करीत होते. या माणसाने पलीकडे हात दाखवला व म्हटले, “आज सुट्टी आहे. म्हणून तुला येथे गर्दी दिसणार नाही. पलीकडे भट्ट्या आहेत. तलवारी खर्‍या तिथे जन्माला येतात. पण तुला तिथे उभे राहवले नसते. आपण उजवीकडे जाऊ. त्या ठिकाणी अमीर-उमराव, राजपुत्र यांच्यासाठी घडवलेल्या सोन्याचांदीच्या मुठीच्या रत्नखचित तलवारी आहेत. निदान पाहून तरी घे त्या.”

तो नाखुषीने रेंगाळला व म्हणाला, “मला तलवारी पाहायला आवडेल; दागदागिने नाही ! रत्नखचित, जडावाच्या तलवारी करायच्या काय घेऊन ? खरे म्हणजे जेथे मूठ संपते, तेथेच खरी तलवार सुरू होते!”

रमलखुणा

तो धिप्पाड माणूस, खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी जमिनीवर लाल वस्त्र झटक्याने पसरावे त्याप्रमाणे हसला व त्याने जबरदस्त हातोड्याप्रमाणे वाटणारा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तो म्हणाला, “हे मात्र तू लाखातले बोललास, खरे म्हणजे जर तू तिकडे जाऊ या असे उत्साहाने म्हणाला असतास, तर मी तुला पाचदहा मिनिटांतच बाहेर घालवले असते. मखमली, जरतारी म्यान, झगमगणारी मूठ हेच त्यांना मुख्य पाहिजे असते, कारण कोठे तलवार गाजवायला बसली आहेत ती फोपशी बाळे? त्यांना तलवारीचे पाते शेणाचे असले तरी चालते.”

“थूः !” त्याच्यामागेच कोणीतरी तिरस्काराने आवाज करताच तो दचकला व त्याने वळून पाहिले. तेथेच एका बाजूला गालिच्यावर एक वृद्ध बसला आहे हे त्याला दिसलेच नव्हते. उभ्या गुडघ्यात डोके खाली करीत पाठ वाकवून तो टिकल्या-टिकल्या डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहत होता. माणसाचा चेहरा सुकून इतका मांसहीन झालेला त्याने कधी पाहिलाच नव्हता.

“हा माझा बाप. आणि हो, माझे नाव याकीर. ” तो माणूस म्हणाला. “तो दहाव्या वर्षापासून तलवारी करीत असे. त्याचा आग्रह निराळाच आहे. आता आम्ही जे काम करून येथे मांडतो, ते एखाद्या कुंटिणीच्या कामासारखे बेशरम, बाजारी आहे, असे तो मला वरचेवर म्हणतो. त्याच्या पद्धतीने काम करायला लागले की बघायलाच नको. वर्षात एक तलवार होणार आणि तिला गिर्‍हाईक मिळायचे नाही. टीचभर सोन्याच्या तुकड्यावर दहा वर्षे राबत बसायचे दिवस गेले, आता कुलवंत काम टिकत नाही, हे त्याला कधी उमगलेच नाही. गेली वीस वर्षे तो असा बसून आहे, आणि दररोज पाचदा तरी मला म्हणतो, 'थू :’ ”

याकीर सांगत होता, पण त्याच्या आवाजात त्याच्या देहाशी पूर्ण विसंगत वाटावे असे कोवळे कौतुक होते.

याकीरने त्याला मुद्दाम शेजारीच असलेल्या आपल्या दालनात आणले व आग्रहाने बसवून लाल द्राक्षांची बशी त्याच्यापुढे सरकवली. तेथील भिंतीवर सर्वत्र उघड्या तलवारी टांगलेल्या होत्या. त्यांपैकी काही जरी पुराण्या दिसत होत्या तरी त्यांच्या स्वच्छ पात्यांवर मात्र कसलीच मरगळ दिसत नव्हती.

“पिढ्यान् पिढ्या आम्ही हा धंदा करतो. फक्त तलवारी आणि कट्यारी. चिलखत, शिरस्त्राण, अंगजाळी काही नाही. ती कामे लोहारांची!” याकीर अभिमानाने म्हणाला. “आम्ही तयार केलेल्या काही तलवारी आम्ही मुद्दाम जतन केल्या आहेत.” त्याने भितीवरील एक तलवार उचलली व त्याच्यापुढे धरली.

“ही पाहिलीस ? या तलवारीला फारशी धार नसते. कारण ती खुपसण्यासाठी असते. स्नीड लोकांची ही तलवार. ती माणसे लढताना कुस्ती खेळत असल्याप्रमाणे अंगावर उड्या घेतात व पोटात तलवार खुपसतात. ही अर्धचंद्राकार तलवार सिथियनांची. शिरच्छेद करणारी. हिच्या बाहेरच्या धारेवरचा प्रकाश जरी पाहिलास तरी डोळ्यांवर ओरखडे पडतील. ”

याकीरने मखमली कापडाचा एक तुकडा हवेत फेकला व तो खाली येत असता त्यातून ती तलवार हलकेच फिरवली. तेव्हा पाकळ्या उमलल्याप्रमाणे तुकड्याचे दोन भाग झाले व सावकाश खाली उतरले. त्यांतील एक उचलून त्याला दाखवत याकीर म्हणाला, कडा पाहून घे. एक सूत बोंदरे दिसणार नाही तुला !"

“थूः !” वृद्ध चिडून म्हणाला, “बाजारबसवीचे काम !”

याकीर किंचित हसला व पुढे म्हणाला, “एका बाजूने दाते असलेली ही तलवार मनरशाह वापरत असे. पोटातून बाहेर येताना सारा कोथळा बाहेर घेऊन येते. पण तू अॅटिकसची तलवार पाहायला हवी. त्याची म्हणजे खरोखर त्याची नव्हे, तर तशीच घडवलेली. त्याची खरी तलवार तो मेल्यावर त्याच्याबरोबर थडग्यात गेली. एका नदीचे पात्र मुद्दाम वळवून कोरड्या जागी त्याचे थडगे बांधले आणि मग पुन्हा नदी वर सोडून दिली. म्हणजे अॅटिकसचे थडगे देखील कोठे आहे याचा आम्हाला पत्ता नाही. अशी होती त्याची तलवार.”

याकीरने जवळजवळ पुरुषभर उंच अशी अजस्र तलवार उचलली व त्याच्यापुढे आणली. त्याच्या दोन्ही हातांना देखील ती अवजड वाटली.

“अरे, अॅटिकस होताच तसा जबरदस्त ! तो दोन्ही हातात धरून तलवार फिरवू लागला की कलिंगडी पडल्याप्रमाणे डोकी जमिनीवर पडत. एका प्रहाराने घोड्याची मान तोडणारा स्पिरॅकस काय, आज या नगरात आहे. पण हत्तीचे मुंडके एका घावाने वेगळे करणारा अॅटिकस हा एकटाच.” याकीरने तलवार उचलून भिंतीवर अडकवली व म्हटले, “पण गड्या, असल्या लढण्यात कौशल्य नाही. ते खाटीककाम झाले. पण तुला त्याच्या भावाची– अँटोनिकसची तलवार दाखवतो.” पण यावर याकीर भिंतीवर टांगलेल्या तलवारीकडे न जाता भिंतीत तिजोरीप्रमाणे बसवलेल्या एका कपाटाकडे गेला. ते उघडून त्याने एक गोलाकार पेटी काढली व म्हटले, “ही आहे अँटोनिकसची तलवार !”

याकीर आपली थट्टा करीत आहे असे त्याला वाटले व तो थोडा अस्वस्थ झाला. “आणि ही तलवार घेऊन तो शत्रुसैनिकांबरोबर चक्रीदगड खेळत होता वाटते ?” त्याने उपरोधाने विचारले.

याकीर हसून म्हणाला, “मी तुझी थट्टा करीत नाही. त्या एकट्याचीच तलवार अशी पेटीत गुंडाळून ठेवता येत असे. पाहिलेस ?” त्याने पेटीचे झाकण उघडताच आतील पाते सळसळून झगझगीत झाले व अधीर झाल्याप्रमाणे लवलवू लागले. “अँटोनिकसचे कौशल्य पाहायला मी त्या वेळी जन्मायला हवे होते.” याकीर म्हणाला, “त्याने आपल्या गीतांनी जास्त स्त्रिया जिंकल्या की तलवारीने, हे सांगता येते कठीण आहे. या तलवारीने तो शत्रूच्या चेहऱ्यावर ओरखडा न काढता त्याची दाढी छाटत असे. एकदा त्याने एका हूण सरदाराच्या कानांतील कुंडलेच तेवढी सफाईने तोडली होती. ही तलवार नाही. तलवार जास्त शुद्ध होत जात शेवटी निखळ, केवळ धार उरावी तशी आहे ती. अधीर, अतृप्त, उसळती धार !”

“त्याला आता माझे काम दाखव.” वृद्ध घोगरेपणाने म्हणाला व त्याने निव्वळ हाडे उरलेला हात लांब करून आकड्यासारखे झालेले बोट कपाटाकडे दाखवले.

याकीरने एक निःश्वास सोडला. तो हसत म्हणाला, “अखेर ते येणारच हे मला माहीत होते.” त्याने अँटोनिकसची तलवार पेटीत गुंडाळून ठेवली व आत हात घालून एक कट्यार बाहेर काढली. तिच्यावर फुला-फुलांची कातडी पिशवी होती, पण तिच्यावर ठिकठिकाणी पापुद्रे उलटले होते. तिला सांबाराच्या शिंगाची साधी मूठ होती. आणि तिचा देखील एके ठिकाणी टवका उडाला होता. याकीरने एका कापडाने पिशवी पुसली व काही न बोलता त्याच्याकडे दिली. कोणत्याही बाजारात मूठभर पितळी नाण्यांना मिळणारी असली गावठी कट्यार तो मुद्दाम आपणाला का दाखवत आहे हे त्याला समजेना. काही न बोलता त्याने याकीरकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

“स्त्रीची किंमत तिच्या मिठीवरून करू नको; तलवारीची किंमत तिच्या मुठीवरून करू नको, अशी आमच्यात एक म्हण आहे. जरा उघडून तरी पाहा.” याकीर म्हणाला.

त्याने कट्यार बाहेर काढली आणि त्या तेजस्वी, वजनदार, गडदनिळ्या पात्याकडे पाहताच त्याचे भानच हरपले व विस्मयाने त्याने आवंढा गिळला. त्याने कट्यारीची मूठ पकडली व हात सरळ ताठ करून तिच्याकडे पाहिले. जातिवंत शस्त्र पाहताच एखाद्या योद्धयाला किंवा शिकाऱ्यालाच जाणवणाऱ्या धुंद आनंदाने त्याचे अंग मोहोरले, आणि एखादा नाहीसा झालेला अवयव परत येऊन पुन्हा शरीराशी एकजीव होऊन गेला असे वाटून त्याचे डोळे चमकले.

“हे पाते इतके नितळ, निळे आहे, ते फक्त लोखंडाचे आहे ?” त्याने बावरून विचारले. एखाद्या चिरतरुण देवकन्येने समुद्रस्नानासाठी पूर्ण विवस्त्र होऊन पाण्यात उतरावे त्याप्रमाणे ते पाते दिसत होते व त्यातील देदीप्यमान ज्योत जाणवत होती.

“लोखंडाचे नव्हे, अस्सल पोलादाचे आहे.” कमरेवर हात ठेवत याकीर म्हणाला, “माझ्या बापाने आयुष्यातले काम थांबवले, त्या वेळी त्याने केलेली ही शेवटची कट्यार आहे. निव्वळ स्वतःच्या आनंदासाठी केलेली. एखादा मूर्तिकार संगमरवरी मूर्ती घडवतो, शिल्पी मंदिर रचतो, तशी केलेली ही माझ्या बापाची शेवटची कट्यार. त्यानंतर त्याने हातोड्याला हात लावला नाही की भट्टीचा जाळ अंगावर घेतला नाही. आम्ही दूर दऱ्याखोऱ्यांतील माणसे ! माझा बाप येथे येईपर्यंत त्याने मेणा पाहिला नव्हता, समुद्र पाहिला नव्हता, आणि रेशमी वस्त्र म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हते. पण पिढ्यान् पिढ्या आम्ही शस्त्रे करत होतो, शस्त्रे जमवत होतो. पोलादाला आकार देण्यासाठीच आमच्यात पुरुष जन्माला येत, आणि अशा पुरुषाशी लग्न करण्यासाठीच मुली जन्म घेत.

“ हे शस्त्रकाम म्हणजे एक धार्मिक व्रत असे, विधी असे. कारागिराने आधी महिनाभर गहू व दूध याखेरीज काही आहार घ्यायचा नसे. पोलाद प्रथम सात दिवस मोराच्या रक्तात भिजत ठेवायचे. मग भट्टीत तापवून त्यास दिवसभर ठोके द्यायचे. तो तुकडा पसरून लांब झाला की तो दुमडून पुन्हा एक करावा लागे. त्यानंतर चौदा दिवस तो हरणाच्या रक्तात भिजत ठेवून मग पुन्हा एक दिवस भट्टीकाम. शेवटच्या तीन दिवसांसाठी चित्त्याचे रक्त लागे, पण शेवटच्या दिवशी जे काम करावे लागे, त्याच्या ताणाने पोलादी हात असलेली माणसे देखील चिरडून जात. आमच्या गावाशेजारी एक लहान नदी खडकावरून उडी घेते व खाली लहानसा डोह आहे. हिवाळ्यात या ठिकाणी इतकी थंडी असते की अंगातली हाडे आतल्या आत पिचू लागतात. कडेच्या दिवशी पोलाद त्या डोहाशेजारीच तापवावे लागे. मग ते थंड बर्फाळ वाऱ्यात फिरवून थंड करायचे, मग पुन्हा तापवून डोहाच्या पाण्यात थंड करायचे. असे हे सूर्यास्त होईपर्यंत चाले. त्याच रात्री मग पात्याला सहाण लावली की सकाळी पात्याकडे पाहताना धुराने काळ्या केलेल्या काचेतून पाहावे लागे. नाहीतर डोळे जळून जातील. आता बोल, असल्या तलवारी, कट्यारी मी आज करत बसू ? रक्ताने भरलेल्या बुधल्यांचा वास अद्याप माझ्या नाकातून जात नाही, पण मी आता मोरा-हरणांचे रक्त शोधत हिंडू ? आणि शेवट काय, तर असल्या कट्यारीला आज बाजारात एक दिनार किंमत यायची नाही !”

“थू:!” वृद्ध चिडून म्हणाला. “एडक्या ! तिला कट्यार, कट्यार म्हणू नको! तू उद्या वाघाला देखील पट्ट्यापट्टयाचे मोठे गावठी मांजर म्हणशील ! तिला सेरिपी म्हण.”

“सेरिपी ?” तो गांधळून म्हणाला व अकस्मात भयाने त्याचे सर्वांग थरथरले. सापाचे डोके अचानक पकडल्याप्रमाणे त्याचा हात थरथरला व नकळत पुन्हा त्याच्या तोंडून उच्चार झाला, “सेरिपी!”

“होय, आमच्या जमातीतील तो एक जुना शब्द आहे.” याकीर म्हणाला.

“म्हातार्‍याला चिडवण्यासाठी मी मुद्दामच वरचेवर कट्यार, कट्यार म्हणतो. ” त्याने डोळे मिचकावले.

पण त्याचे याकीरकडे लक्ष नव्हते. त्या पात्याच्या निळ्या मोहिनीने तो खिळल्यासारखा होऊन तिच्याकडे पाहत राहिला होता. ते एकदा हाताला चिकटल्यावर त्याला आता विभक्त करणे केवळ अशक्य आहे असे त्याला वाटले. त्याने एकदम विचारले, “तू ही विकत देतोस ? काय किंमत आहे त्याची?”

“थूः !” वृद्ध संतापाने म्हणाला. “म्हणे, विकत देतोस ? ती आता माझ्याबरोबर माझ्या शेजारी मातीत जाईल. विक तुझी आई !”

वारुळाप्रमाणे त्याच्या मनावर चढलेला बधिरपणा एकदम खाडकन उतरला व रक्त उसळून तो संतापाने वृद्धाकडे वळला. पण याकीरने त्याचा दंड पकडला व हळूच म्हटले, “म्हाताऱ्याचा आता जिभेवर ताबा नाही. त्याला माफ कर.” त्याने त्याला वळवले व बाहेर चलण्याविषयी खूण केली. त्या दालनाच्या मागच्या दाराने बाहेर आल्यावर तेथे थोडी मोकळी जागा होती व तेथील कुंपणाचे फाटक ओलांडले की रस्त्यावर जाता येत होते. लगेच दारात जमिनीत पुरलेला एक लाकडी खांब होता व त्याला पिवळी चोच व काळे अंग असलेला एक अगदी लहान सुबक पक्षी असलेला पिंजरा अडकवला होता. जाताना याकीर तेथे थांबला व त्याने एक बोट पिंजयाला धरताच पक्षी दांडीवरून उतरला व आपली सोन्याची चोच त्यावर हलकेच घासू लागला.

मोकळ्या हवेत आल्यावर त्याला बरे वाटले, पण पिशवीत ठेवलेली कट्यार परत करण्यास मात्र त्याची बोटे तयार होईनात. तेव्हा त्याने उतावीळपणे विचारले, “विकतोस ही कट्यार ? मी वीस दिनार देईन.”

त्याचा हात सोडून याकीर भितीला टेकून उभा राहिला. “विकायला माझी ना नाही. गेली वीस वर्षे ती तशीच पडून आहे. आणि तिच्या खऱ्या किंमतीला आता गिर्‍हाईक देखील मिळणार नाही. पण मी ती विकेन ते तुझ्या दिनारांसाठी नव्हे. नाण्यांची किमत कोणाला ? ज्यांच्याजवळ तितकी नाणी नाहीत त्यांना ! नाहीतर सोन्यासारख्या बडेजावी धातूचा काहीसुद्धा उपयोग नाही. मला जर विचारशील तर पोलादाचे एक पाते सोन्याच्या डोंगरापेक्षा अब्रूदार असते. मी ज्याप्रमाणे शस्त्रे गोळा करतो, त्याप्रमाणे अंगठ्याही गोळा करतो. तुझ्याकडे माझे प्रथम लक्ष गेले ते तरी तुझ्या बोटात ती अंगठी आहे म्हणून. तसली अंगठी मी पूर्वी एकदाच पाहिली होती, पण ती त्यावेळी समुद्रातून बाहून आलेल्या एका प्रेताच्या हातावर होती. ती अंगठी तू मला देशील तर कट्यार तुझीच आहे. ”

त्या शब्दांनी तो जागच्या जागी स्तंभित झाला व त्याची जीभ निर्जीव झाली. हातातील अंगठीकडे पाहताच त्याला सगळ्याचा विसर पडला. ही अंगठी अशा परक्या मुलखात परक्याला देऊन टाकायची? मग त्या नारिंगाच्या बागेतील भेटीचे काय ? तसल्या सुगंधी आठवणी सहजासहजी आयुष्यावरून उतरवता येतात का ?

तिला बागेत भेटायला बोलावून आपला निर्णय सांगण्यापूर्वी त्याने सतत विचार केला होता, बेचैन मनाने समुद्रकाठ अवेळी तुडवला होता, आणि आता माघार घेणे केवळ अशक्य आहे याची पूर्ण जाणीव झाल्यावरच त्याने निर्णय घेतला होता. आपण मुलख सोडून जाणार हे सांगताच ती संतापली नाही की चिरडून गेल्याप्रमाणे ती हुंदकेही देऊ लागली नाही.

“हे असे होणार हे मी एक महिन्यापूर्वीच जाणले होते.” ती म्हणाली होती. “तुझ्या मनाची असह्य वेदना माझ्यापासून लपवून ठेवण्यासाठी तू फार प्रयत्न केलेस, तरी मी मात्र ती केव्हाच ओळखली होती. ठीक आहे. त्या बाबतीतील निर्णय अखेर तुझा तुलाच घेतला पाहिजे, कारण असला क्षण इतका एकाकी असतो, की तेथे आता मला देखील कसले स्थान नाही हे मला माहीत आहे. पण नंतर कधीतरी, भविष्यकाळात, तुझ्या मनातील वादळ शांत झाल्यावर, तुझी पावले इकडे वळव.” तिने मग आपली अंगठी काढून त्याच्या बोटात घातली होती. “ही अंगठी मी तुला आठवणीसाठी देत नाही. असल्या गोष्टींनीच ज्याची आठवण राहू शकते ते आठवण ठेवण्याच्या किमतीचे नसतेच. ही तुझ्याजवळ असली की तू कधीतरी इकडे परत येशील असे मला वाटते इतकेच.मी आता जाते.”

मागे एकदाही न पाहता ती निघून गेली होती. तिने एकदाही, देठ वळवून कमळ इकडे फिरावे त्याप्रमाणे हात उंचावून बोटे हलवली नव्हती. तिच्या टाचा हिवाळ्यात पिसे लालसर होऊ लागलेल्या लहान मधपक्ष्याच्या छातीसारख्या होत्या. तिच्या अनवाणी टाचा आता असले दोन पक्षी अदबीने लवत मागच्या मागे सरकून निघून गेल्याप्रमाणे गर्द झाडीत निघून गेल्या, आणि चंद्राचा प्रकाश झाडांमधून पाझरताच त्याला जमिनीच्या स्पर्शामुळेच वास मिळाल्याप्रमाणे आता राईत नारिंगाच्या फुलांचा गंध असलेले चांदणे मात्र उरले. काही वेळा लहान मुलीप्रमाणे हट्टी व लहरी, हरणाप्रमाणे लाघवी, तर अनेकदा वार्‍याप्रमाणे लाडिकपणे सतावणारी अशी ती नाटकी– पण आता ती एकदम बदलून आडोशातील ज्योतीप्रमाणे शांत होऊन निघून गेली.

तिची ही अंगठी देऊन टाकायची ? आत मृत्यूच्या जिभेसारखी भीषण शस्त्रे, स्वतःची इतकी सुखदुःखे घेऊन जाणारी माणसे घोळक्यात एकाकी हिंडत असता पूर्ण निर्विकार राहिलेला हा परक्या देशातला परका हमरस्ता— येथे, या ठिकाणी ही चांदण्याचे शिंपण झालेली, नारिंगाच्या फुलांच्या वासाची अंगठी देऊन टाकायची ?

कस पाहण्यासाठी दगड पुढे यावा त्याप्रमाणे आयुष्यात असा एक क्षण समोर येऊन रोखठोक उभा राहतो. अशा वेळी कोण निर्णय घेत असते ? मग काही माणसे सुरक्षित सुखी घरदार टाकून, खेळण्यासारखी लहान गलबते अमर्याद सागरात टाकून अनावर ओढीने कोठेतरी वेड्याप्रमाणे निघून जातात. आभाळाला भिडलेल्या पर्वतशिखरांवर जाण्याची ईर्ष्या स्वीकारतात. कधी आपल्या गावाची वेस न ओलांडलेला माणूस दोन मदारीच्या उंटांचा मोर, हस्तिदंत, खडीसाखर, केशर आणि दालवीन लावून चाललेला कारवा पाहताच आपल्या माणसांचा निरोप देखील न घेता त्याच्याबरोबर चालू लागतो, आणि बगदाद, समर्कंद, इस्पहान, तास्कंद, सिकियांग, पेकीन असल्या जादूच्या रस्त्याने भटकत कोठेतरी दिक्कालापलीकडे विरून जातो. किंवा एखादा माणूस जगाकडे पाठ वळवून अंधार्‍या प्रयोगशाळेत, निरनिराळे हजार द्रव उकळत, जे अद्याप माहीत नाही ते माहीत करून घेण्यासाठी प्रचंड थडग्यातील जिवंत प्रेताचे एकाकी, हिणवलेले, वाळीत टाकलेले आयुष्य खुषीने जगतो. असल्या क्षणी निर्णय घेणारा कोण असतो ? आणि तो कशाच्या आधारे निर्णय घेतो ?

असल्या हकीकती ऐकल्या की मागे त्याला वाटे, कसली ही वेडी माणसे ! अंगणातल्या झाडाची सावली सोडून परमुलखात रखरखीत ऊन पीत हिंडणारी ही माणसे ! पण त्याच्या स्वतःच्याच आयुष्यात अंगावरील कवच फोडणारा असा क्षण आला होता तेव्हा त्याला त्यांचे वेड उमगले होते व तो स्वतःशी म्हणाला होता— त्यात आणखी मी एक ! त्याने कोणाचाही निरोप घेतला नाही, आपली म्हणून एक वस्तू उचलली नाही, आणि हिवाळ्याचा प्रवास सुरू करणाऱ्या पाखराप्रमाणे तो निघाला होता. नारिंगांच्या राईमधून वळताना त्याला वेदना झाल्या नाहीत असे नाही. पण आता त्याला वाटले, आपण मुद्दाम सन्मुख झालो तेव्हा हा क्षण अटळच होता. आणि एकदा तिकडे पाठ वळवल्यानंतर तिच्या अंगठीकडे पाठ वळवणे इतक्या यातनेचे का व्हावे बरे ?

त्याच्या मनातील खळबळ थांबली. त्याने झटदिशी अंगठी काढली व याकीरला दिली. याकीरने ती हातात घेऊन तिच्यावरील माणकाचे झाकण उघडले. त्या खाली किंचित पोकळी होती व त्यात अत्तराचा वाळलेला फाया होता. याकीरने त्याचा किंचित वास घेतला व तांबड्या भिंतीसारखा त्याचा चेहरा सुगंधी वार्‍यात हरवल्यासारखा झाला.

“ यास्मिनचा वास !” कोवळ्या आवाजात तो म्हणाला. “ माझ्या धर्मात चार गोष्टी सांगितल्या आहेत, तुला माहीत आहे ? मेहेंदी वापरावी, दात स्वच्छ ठेवावेत, बायको आणावी, आणि अत्तरांचा शौक करावा. यांतील एक मला या जन्मी जमणार नाही. बायकोकडून कधी लगाम घेणार नाही हा याकीर. मित्रा, सराईमध्ये थोडा वेळ राहून निघून जायचे असते; तेथे घरटे करायचे नसते ! ”

“तू मला कट्यार दिलीस खरी.” तो म्हणाला, " पण तुझा बाप– त्याला काय सांगणार तू?”

याकीर थोडा पुढे झाला व हलक्या आवाजात म्हणाला. “खरे सांगू ! केव्हा एकदा ही कट्यार घरातून जाते असे मला झाले होते. ती तुझ्याजवळ आहे तोपर्यंत घरात पैसा यायचा नाही, असे आई मला सतत म्हणे. ते थोडे खरे होते की काय असे मला अलीकडे वाटू लागले होते. आणि आता बापाचे काय‘– अगदी थोड्या दिवसांचे राहणे उरले आहे त्याचे. मी तुला दुसरी पिशवी देईन. या पिशवीत एखादी गावठी कट्यार घालून त्याला दाखवले तरी चालेल. तू ते पाहिलेस की नाही कुणास ठाऊक ! तो पूर्णपणे आंधळा आहे.

“आणखी एक सांगतो. ही कट्यारच काय, मला हे सगळेच एकदा फुंकून टाकायचे आहे. बापाच्या धाग्यामुळे मी इतके दिवस येथे गुलाम होऊन पडलो, पण नंतर मात्र माझा पाय तेथे राहायचा नाही. इतके दिवस मी तलवारी केल्या; आता मला तलवार वापरायची आहे. हातात तलवार व खाली परीच्या दातासारखा शुभ्र अरबी घोडा– यासारखे आयुष्य नाही. ज्या ठिकाणी गुराखी हिरे घेऊन खेळत असत ते अर्शियासारखे साम्राज्य गेले. नव्या, रुंद, विलक्षण नावाच्या नद्या ओलांडून आम्ही हूण लोकांना चिरडले– आणि त्या वेळी मी कोठे होतो ? तर या ठिकाणी तलवारी बडवत होतो ! पण अद्यापही साम्राज्ये आहेत. अर्शियाच्या पलीकडे अनॉलियम आहे. वानिशिया आहे. हाताला मनगट असले की तलवारीला क्षितिज नाही. हे सारे माझ्या देशासाठी, माझ्या लोकांसाठी, असे मात्र समजू नको. तसले ओझे घेऊन युद्ध भूमीवर हा याकीर जाणार नाही. तसले वेड असते ते माणसाच्या मनात; तलवारीच्या नव्हे. आणि युद्ध लढले जाते ते मनाने नव्हे तर तलवारीने. तलवारीला कसली आली आहे सदसद्विवेकबुद्धी ! निव्वळ सज्जन, सद्गुणी आहे म्हणून यशस्वी झालेला एक तरी दिग्विजयी तू मला दाखवू शकतोस ? आणि पराभूत झालेले का सगळे एकजात भेकड, दरोडेखोर होते ? पण गुणगान कोणाचे, जयजयकार कोणाचा तर विजयी झालेल्यांचा ! एक लक्षात ठेव. तलवार विजयी झाली तर सारे सद्गुण बटिकांच्या घोळक्याप्रमाणे मागे लागून येतात.

“युद्ध म्हणजे पंचवीस हजारांनी दहा माणसांना चिरडणे नव्हे किंवा कपटाने पाठीत खंजीर खुपसणे नव्हे. हत्ती ढकलून उंदीर चिरडण्याला मी युद्ध म्हणत नाही. तर समोरासमोर आपल्या तोलाचा प्रतिस्पर्धी असावा. त्याला मारण्याची तुला जेवढी संधी आहे, तेवढीच तुला मारण्याची संधी त्याला असली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यात एकाचा मृत्यू अटळ असला पाहिजे. तो किंवा मी ! मृत्यू परीक्षक असल्याखेरीज लढणे म्हणजे जनानखान्यातील गुलामांनी एकमेकांशी केलेले आचरट चाळेच होत. कदाचित शिकारीत मी फार सुखी झालो असतो. शिकार म्हणजे सशासांबरांची नव्हे– तर वाघ-सिंहांची, उन्मत्त झालेल्या हत्तींची शिकार ! मृत्यू त्यांच्या विक्राळ डोळ्यांत हजर असतो. मग तो तेथून उतरून आपल्याकडे येतो, की मागे सरून आपल्या करवी त्या प्राण्याचाच नाश करतो, हे नंतर ठरवले जाते. पण मला येथे वाघसिंह मिळणार कोठे ? हां, तर सांगत होतो, तोलामोलाचा सावध शत्रू समोर असावा आणि मग संग्रामही अशा दिलदारपणे करावा की आपली तलवार त्याच्या गळ्यात रुतली असतानाही अगदी कडव्या दुष्मनाने सुद्धा म्हणावे, ‘अरे, हा माझा वैरी जर माझा दोस्त असता तर माझ्या भाग्याचा स्वर्गाला हेवा वाटला असता. पण मला त्याच्या खालोखाल भाग्य मिळाले आहे. माझ्या वाट्याला असा नेकीचा वैरी आला !’

“हे सगळे माझ्या चालत आलेल्या धर्माप्रमाणे पाप आहे. पण गड्या, प्रत्येक मनुष्य स्वतःच एक धर्मसंस्थापक असतो. तोच संस्थापक आणि तोच अनुयायी, आणि पहिली निष्ठा या स्वतःच्या धर्माशी असते. शत्रूच्या रक्तातून पांढरा घोडा धावत असता त्याचे पाय गुडघ्यापर्यंत लाल व्हावेत— बस्स, हा माझा स्वर्ग आहे ! हां, कधीतरी दुसऱ्या एखाद्या याकीरचा घोडा माझ्या रक्तात नाचूनही लाल होईल– आणि तो देखील माझ्या स्वर्गाचाच एक भाग आहे. कोणाचे मांस काय, रक्त काय, कधी वर जात नाही. ते खाली जमिनीकडेच जाते. ते कसे खाली टाकायचे, एवढेच फार तर आपणास ठरवता येते. म्हणजे एकंदरीने काय, जर तू पुन्हा कधी भटकत इकडे आलास तर याकीर तुला येथे दिसणार नाही. तो कदाचित जिवंतही असणार नाही. तो, त्याची तलवार, आणि आता ही अंगठी असतील परक्या आभाळाखाली, परक्या मातीवर, किंवा कोण जाणे, परक्या मातीत ! ”

-oOo-

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. ९६-१०७.

या वेच्यामधील शेवटच्या परिच्छेदामध्ये मी लहानसा बदल केला आहे. हा परिच्छेद म्हणजे दीर्घ असे भाषण होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदाचे मी चार लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


हे वाचले का?

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दोन गुलमोहर

वाटा_चर्चबेल

ग्रेसचे ‘चर्चबेल’ वाचून बराच काळ लोटला. त्यातील काही अनुभव अधूनमधून मनाच्या तळातून पृष्ठभागावर येत असतात.

अलीकडे विशिष्ट हेतूने व्यंकटेश माडगूळकरांची बरीच पुस्तके आणली. त्यातील ‘वाटा’मध्ये त्यांनी गुलमोहरावर एक सुरेख लेख लिहिला आहे. तो वाचून चर्चबेलमधला ग्रेसचा गुलमोहर आठवला.

रोचक बाब म्हणजे या दोन लेखकांच्या मूलभूत प्रवृत्तीचे प्रतिबिंब या दोन लेखांत उमटलेले आहे. ग्रेस अंतर्मुख, त्यांच्या मनाच्या तळाशी जे रसायन मंदपणे उकळते त्याला वाट पुसतु जाणारे; तर माडगूळकर जगण्यातील अनुभवांकडे चालत जाणारे, त्यांना वेचून आपली पोतडी भरत जाणारे. ग्रेसचा गुलमोहर त्यांनी साक्षीभावाने अनुभवलेला, नेणिवेत मुळे रोवणारा; गाडगूळकरांचा क्रियाशील आमंत्रणानंतरही निसटून जाणारा.

एकापाठोपाठ वाचण्यासाठी हे दोनही लेख इथे एकाच पोस्टमध्ये समाविष्ट केले आहेत.


लहानपणी दहा-बारा वर्षांचा असताना मी कांचनवाडीला गेलो होतो. कांचनवाडीला नदी नाही आणि डोंगरही नाही. मला आवडणाऱ्या खेड्याच्या चित्रात किमानपक्षी एखादी नदी, नाहीतर पाण्याचा नदीसदृश प्रवाह, डोंगर आणि देऊळ असावयास पाहिजेतच. त्याशिवाय मी खेड्याचे अस्तित्व कल्पनेच्या पातळीवरही गृहीत धरू शकत नाही. खेडे असो की नगर, त्यांच्या आकर्षणांच्या भौतिक आणि लौकिक दृश्यांवरून अनुभूतीचा उत्कट प्रदेश माझ्या मनोभूमीत रुजत नाही. शहर, नगर आणि खेडे यांच्या अनुभूतीच्या सौंदर्याचे माझे निकष थोडे वेगळे आहेत.

चर्चबेल

सूर्योदय आणि सूर्यास्ताची भिन्न भिन्न अंशांतून, भिन्न भिन्न कोनांतून परावर्तित होणारी आभा हाच तो निकष होय! एखाद्या अत्याधुनिक शहरातील सूर्योदय मी माझ्या पद्धतीने स्वीकारतो, भोगतो. व्हिक्टोरियन पद्धतीच्या एखाद्या टुमदार बंगल्यावरून उतरणारी संध्याकाळची सूर्यशोभा तुम्ही पाहिली आहे काय ? मी पाहिली आहे. केरळात. सूर्याची मंद, कोमट, हळुवार आणि थकलेली किरणे फादर ग्रीनच्या खिडकीवरून जायची, त्यावेळी फादर ग्रीन ख्रिस्ताच्या मूर्तीसमोरील मेणबत्तीच्या निळसर काचा स्वच्छ करीत उभे असायचे. पठाणांप्रमाणे असलेल्या त्यांच्या तांबूस देखण्या दाढीवर अस्तगामी सूर्याचे चिमूटभर ऊन कितीतरी वेळ रंगाळत राहायचे...

ज्या खेडयात नदी नाही, डोंगर नाही, देऊळ नाही, तिथली सूर्ययात्रा निष्पर्ण पारावर भरलेल्या बाजारासारखी मला वाटते; कोरडी आणि भगभगीत. डोंगरामागून सूर्य यावा आणि देवळातील झांझरत्या घाटेने कातर होऊन नदीच्या पाण्यात बुडून जावा म्हणजे प्राणांच्या चिद्विलासात उभ्या असलेल्या माझ्या खेड्याची दिवेलागण होऊ लागते !

कांचनवाडीचा स्वीकार एक खेडे म्हणून मला करता आला नाही तो एवढ्याच करता. मला वाटते, आपल्या सगळ्यांच्याच स्वीकार नकाराच्या तर्‍हा कमी-अधिक फरकाने याच रेषेवरून जात असाव्यात. ती रात्र चैत्र पौर्णिमेची होती. निदान असावी असे वाटते. नीटसे आठवत नाही. मध्ये पुष्कळ वर्षे निघून गेलीत. पण अंगावरून वाहून गेलेला चांदण्याचा लोळ मात्र अजूनही कायम आहे; माझ्या देहात. आमच्या घराशेजारी असलेल्या गोशाळेपासून साधारणपणे एक-दोन फर्लांगावर तीन एकरांचे एक शेत होते. त्या शेतात फक्त गुल्मोहराचीच झाडे दिसत होती. सोन्याच्या मऊशार लगडीसारख्या जमिनीत कोणत्या महाभागाने ती गुल्मोहराची नगरी वसवली होती देव जाणे! परवा कलकत्त्याला गेलो होतो. तेथील रेड रोड पाहिला. अंदाजे मैल दीड मैल रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना गुल्मोहराची झाडे दिसत होती. तांबड्या, शेंदरी आणि लाल फुलांच्या झुबक्यांनी लगडलेली. उन्हाची मधोमध उमटलेली दीर्घ अरुंद वाट सोडून मी गुल्मोहराच्या छायावाटेने रेड रोडला अनेकदा पांथस्थ झालो. या रेड रोडवरची उन्हाची दीर्घ वाटही तशी कमी सुखकारक नाही. हुगळीच्या पाण्यावरून निघालेल्या वायुलहरी इथपर्यंतही सोबत करतात ! कोणास ठाऊक, कदाचित आडभागाला असल्यामुळे असेल म्हणा पण हा रेड रोड मला कमालीचा निर्मनुष्य आढळला. अशा निर्मनुष्य वाटेवरून तुम्ही घोड्यांच्या गाडीत बसून एकट्यानेच कधी गेलात काय ? एका काळोख्या रात्री, या रेड रोडवरून मी घोडागाडीत बसून गेलो आहे. तान्यांनी खचलेल्या आकाशाच्या दृष्टिदग्ध पार्श्वभूमीचे अनंत किरण, हातातील अंगठीत बसविलेल्या रत्नाप्रमाणे गुल्मोहराच्या लाल, शेंदरी, तांबड्या झुबक्यांवर किणकिणत असतात आणि घोड्यांच्या मंदपणे सरकणाऱ्या टापांचे अपूर्व विश्व अधिक मूलगामी, अधिक गूढ़ होत जाते... अशा वेळी टॉलस्टॉलच्या ॲनाप्रमाणे आपणही घोडागाडीत एकटेच असतो आणि अंतर कापीत येणारा मॉस्कोच्या विक्राळ स्टेशनचा शूळ आपल्या ललाटावर रोखलेला असतो. काळोखी चांदण्यातील गुल्मोहराचे झुबकेदार रंगविश्व घोड्यांच्या टापांत उतरले की आपणही तक्रार न करता म्हणून जातो—

Why not put out the light when
there is nothing more to look at...

गुल्मोहराच्या नगरीत शिरताच एरव्ही सौम्य भासणारे चैत्रचांदणे मला एकदम भडक वाटू लागले. नंतर चूक लक्षात आली. गुल्मोहराच्या रंगधारांचा एक भाग म्हणजे चैत्रचांदणे होते. हा भडकपणा मात्र कोणत्याही स्थूल अर्थाचे निवेदन करणारा नव्हता. कांचनवाडीतील गुल्मोहराची चित्कळा मला भडक वाटली यांचे कारण गुल्मोहर हा एक भडक रंगाचा वृक्ष आहे, ही जाणीवच माझ्या संवेदनांना स्पर्शन गेली नव्हती. ही किमया चांदण्यामुळे तर घडून आली नव्हती ना ? किमयागार शक्तिमंत असावा लागतो. चैत्रचांदण्याच्या वेलीत हे बळ कुठचे असणार ? गुल्मोहराची विशाल झाडे, त्यांचे संघ चंद्रकिरणांचे पाणी शोषून घेत होते आणि मग परतलेले चांदणे आपला निळसरपणा सोडून लालभडक होऊन जात होते. मात्र गुल्मोहरी त्वचेचा आभास जोगवा नाकारणाऱ्या हट्टी भिक्षूप्रमाणे अभंग होता. माझ्या प्राणांत चांदण्यांची टिंबे, गुल्मोहराच्या भडक रंगाचे थेंब, की काळोखाची पिसे उमलत होती हेच कळेनासे झाले होतं. गुल्मोहर आणि मोर यांच्यात केवळ उच्चारसाम्यच नाही. आणखीही दुसरे नाते आहे. मोर हा प्राणी मला त्याच्या भडक आणि वेतासारख्या तंगणामुळेच आवडतो. गुल्मोहरही भडक आहे. रामायणातील श्रावणाची कथा काय थोडी भडक आहे ? तिचा भडकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? मोर शिल्लक राहणार नाही; गुल्मोहराच्या झाडांचे आयुष्य नष्ट होईल आणि वाल्मीकीच्या प्रतिभेला होणारी जखम कधीही भरून येणार नाही. श्रावण काळोखाच्या तळ्यात आपल्या आई-वडिलांच्या तहानेचे पात्र बुडवितो आहे; बुडबुडणाऱ्या आवाजाचे चैत्रचांदणे दशरथाच्या प्रत्यंचेला ताणीत आहे आणि गुल्मोहराने आपल्या जीवनग्रंथींचा रस एकवटून सजविलेले रक्तदार बहरांचे लालभडक संगीत श्रावणाच्या काळजात रुतले आहे... श्रावणाच्या वृद्ध मातापित्यांची हाक वाऱ्याने उधळलेल्या मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे माझ्या सर्वागभर पसरली आहे...

पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ९-११.

-oOo -


अगदी लहान वयापासून मी काही महत्त्वाकांक्षा बाळगून होतो आणि त्या पुर्‍या करायच्याच असा दृढनिश्चय मी मनोमनी केलेला होता. अगदी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण एक उत्तम बंदूक घ्यायची आणि रानोमाळ भरपूर भटकायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली आपण अशी एक छान लायब्ररी करायची आणि त्या लायब्ररीतल्या टेबलाशी लिहिण्यासाठी खुर्ची ठेवायची, ती गर्रकन फिरणारी, मागे रेलणारी अशी. शिवाय या लायब्ररीच्या खोलीतून समोर पाहिले की, मखमली फुलांनी लहडलेला गुलमोहर दिसला पाहिजे.

माझा मी मिळवू लागलो आणि पहिल्या दोन-तीन वर्षातच मी बंदूक घेऊन टाकली. आपल्या आवडत्या लेखकांची पुस्तके खरेदी करणेही सुरू केले. पण स्वतःचे घर, लायब्ररीसाठी स्वतंत्र खोली, फिरती खुर्ची आणि गुलमोहोर हे व्हायला वयाची पस्तिशी उलटली!

घर बांधून होताच प्रथम मी गुलमोहोराचे रोपटे पैदा केले आणि एका कोपऱ्यावर लावूनही टाकले.

वाटा

काय असेल ते असो, बागेत बाकीची एवढी झाडे लावली, पण त्यात हा गुलमोहोरच तेवढा वेड्यासारखा वाढला. त्याला मोठे होण्याची घाईच झाली होती. पांच-एक वर्षांत चांगला ताडमाड वाढून वृक्ष म्हणावा एवढा झाला. फांद्यांचा प्रचंड विस्तार दिसू लागला. येणारे-जाणारे विचारू लागले, "काय हो, प्लॉट घेतला तेव्हा हा गुलमोहर होता वाटतं?"

"छे, नंतर लावला. "

"हो? अरे वा! छान वाढला हं.

कोणी जाणत्याने धोक्याची सूचनाही दिली- इमारतीपासून दहा फुटांच्या आत मोठा वृक्ष असू नये. त्याच्या मुळ्या इमारत अधू करतात. मी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. अद्यापि फुलावर आला नव्हता, तरी हा पुष्ट गुलमोहर माझ्या लेखनाच्या खोलीवर छत्र धरावे, असा पसरलेला होता. पाखरांच्या पंखाप्रमाणे असलेली त्याची हिरवीकंच पाने डोळ्यांना आल्हाद देत होती. बुलबुल, मैना, साळुंखी असले अपूर्वाईचे पक्षी त्याच्या थंडगार छायेला आले आणि मंजुळ शब्द करू लागले की, माझ्या दारी हा कल्पवृक्ष उभा आहे, असे मला वाटे. अंगणात त्याची सावली होतीच, पण आजूबाजूच्या झाडांमुळे, घरामुळे तो बराचसा रस्त्यावरही झुकला होता. भर उन्हात त्याची थंडगार छाया रस्त्यावर पडे. आजूबाजूच्या बांधकामावर काम करणारे मजूर, बाया, मुले-बाळे विसाव्यासाठी या छायेत येऊन बसत. हात उशाला घेऊन निवांत झोपही काढत. कधीमधी एखादी कोरी करकरीत गाडी वा सावलीला ठेवलेली दिसे. आतल्या सीटवर ड्रायव्हर थंड झोपलेला असे.

संध्याकाळ झाली, थोडा काळोख पडला की, इतरत्र निऑन ट्यूब्जनी उजळून टाकलेल्या या रस्त्यावर, गुलमोहोराची गडद छाया सुरेख आणि सोयीस्कर जग म्हणून प्रेमिकांच्या कामाला येई. सारखे मागे-पुढे पाहात कोणी मुलगी, कोणी मुलगा या-त्या दिशेने येऊन पटकन सावलीत शिरत. आमच्या गुलमोहोराखाली एक नवे गाणे जन्माला येई.

वयाने पाच वर्षाचा झाला आणि एका मार्च महिन्यात याची पाने गळाली. वळसेदार फांद्यांचे आकार स्पष्ट दिसू लागले. मग पोपटी रंगाच्या कळ्यांचे घोस फांद्यांवर आणि फांद्यांच्या टोकाशी दिसू लागले. रोज शेकडो कळ्या उमलू लागल्या आणि बघता-बघता शेंदरी रंगाच्या फुलांनी गुलमोहराचा प्रचंड विस्तार गजबजून गेला. ऐन एप्रिल महिन्यात तर दृष्टी ठरेना एवढा हा वृक्ष फुलला.

हा पत्ता पाखरांना कसा लागला कोण जाणे, पण गडद मोरपंखी रंगाच्या फुलचुक्या, बुलबुल, मैना, कावळे यांची तोबा गर्दी होऊ लागली. कधी न दिसणारी धनछडी आणि भारद्वार ही पाखरेसुद्धा आमच्या दारी दिसू लागली.

वैभव पाहिले की, त्याभोवती मागतकऱ्यांचा वेढा पडावा, हे साहजिकच आहे. फांद्या खूप खाली होत्या. त्यामुळे रस्त्याने जाता-येता पोरीबाळी डहाळे मोडून घरी नेत. गुलमोहराची फुले नुसती पाहावीतच, झाडापासून तोडून नेऊन त्याचा काही उपयोग नाही. ती माळता येत नाहीत. फुलदाणीत ठेवता येत नाहीत का देवाला वाहता येत नाहीत, हे त्यांना कोणी सांगावे? लहान पोरे तर फुले हाताशी येत नाहीत, हे लक्षात येताच धोंडे मारीत. धोंडे मारून झाडावरची फुले पाडावीत, असे या बालकांच्या मनात कसे येई कोण जाणे! (आपण म्हणतो, पण लहान मुलेही स्वभावाने क्रूरच असतात. मांजराचे शेपूट ओढावे, कुत्र्याला धोंडा मारावा, फुलपाखराला काटा टोचावा अशी बुद्धी त्यांना होते.)

गुलमोहरावर अशी बेसुमार फुले फुलत होती. रस्त्यावर आणि बागेत कोमेजल्या पाकळ्यांचा सडा पडत होता. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या पायांखाली मखमली पायघड्या घातल्या जात होत्या.

बरे, एकदा बहार आल्यावर थांबावे की नाही! काही हातचे राखले तर बिघडते का?

पण हा वेडा जुलै महिन्यात पुन्हा एकदा फुलला. आमच्या गुलमोहराला मोठे होण्याचे जसे वेड होते, तसे सतत पुन्हा-पुन्हा फुलण्याचेही होते.

वाळल्या फुलांचे आणि पानांचे ढीग जेव्हा छपरावर साठू लागले, तेव्हा आमच्या माळीबोवांनी विचारले, “साहेब, हा तर पत्र्यावर गेला. आत आलेल्या या दोन फांद्या तोडल्या पाहिजेत. बाहेर रस्त्यावर वाढून द्या खुशाल."

मी चालढकल केली. चांगले वाढलेले झाड तोडावे का? पण फांद्यांचे वाढणे शबिच ना. मनात सारखे येऊ लागले की, वाऱ्या वादळात कधी फांदी मोडली, तर माझ्या अभ्यासिकेचा कपाळमोक्ष होईल.

मग एकवार घट्ट मनाने मी फांद्या तोडायची परवानगी दिली. हत्तीच्या पायाएवढ्या जाडीच्या दोन लांबलचक फांद्या छाटल्या गेल्या आणि गुलमोहराचे रूपाचे बेरूपच झाले! माझ्या मनाला ही गोष्ट फार लागली.

कोणतेही झाड म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक कलापूर्ण बांधकामच असते. खोडाची जाडी, जागोजाग फुटलेल्या फांद्या, डहाळ्या, वरचा पानांचा विस्तार, एकंदर उंची, झाडाला मिळालेला तोल, आकार, जमिनीतल्या मुळ्यांची जाडी आणि विस्तार हे सगळे जर लक्षपूर्वक पाहिले; तर यामागे उत्तम रचना आहे. हे ध्यानात येते. एखाद-दुसरी फांदी जरी आपण तोडली, तरी हा सगळा तोल बिघडतोच.

आमचा गुलमोहर सालोसाल फुलत होता. पण त्याचे रूप आता पूर्वीसारखे देखणे राहिले नव्हते.

पुढे काही वर्षांनी कुठे जमिनीखालचा नळ फुटला आणि घरातले पाणी बंद झाले. खाजगी प्लंबर बोलावून आणला. त्याने बागेत थोडी उकराउकर केली आणि सांगितले की, हे काम म्युनिसिपालटीच्या परवानगीवाचून करता येणार नाही. कारण नळ रस्त्याखाली फुटला आहे.

झाले! मी इकडे तिकडे याला त्याला फोन केले आणि फुटलेला नळ दुरुस्त करण्याचे काम कोणाचे, त्याचा तपास लावून त्यांना वर्दी दिली. तीन-चार दिवस घरात पाण्याचा ठणठणाट झाला. शेवटी म्युनिसिपालटीचे एक साहेब आणि तीन-चार मजूर आले. त्यांनी रस्ता उकरला. तो नेमका गुलमोहराच्या बुडाशी. बाहेरच्या रस्त्यापासून तो आमच्या पाण्याच्या मीटरपर्यंत दहा-बारा फूट खोल चर खणावा लागला. गुलमोहराच्या बुडाशी प्रचंड खोदाखोद झाली. त्याच्या लहान-मोठ्या मुळ्या छाटून छाटून हा एवढा ढीग घातला गेला. नळाच्या वर-खाली जेवढ्या म्हणून मुळ्या होत्या, त्या तोडल्या गेल्या.

त्या दोन फांद्या गेल्या. मुळ्या गेल्या. गुलमोहराने हाय घेतली. पुढचा पावसाळा चांगला होऊनही पूर्वीसारखा तो जोमाने फुटला नाही. गडद हिरवा असा पानांचा रंग विटका झाला. पानांचा आकारही आकसला. मार्च महिन्यात थोड्या कळ्या आल्या, थोडी फुले उमलली. आमच्या गुलमोहराचे सारे वैभव नाहीसे झाले. आता आपले भरत आले, असे त्याच्या मनानेच घेतले असावे.

पुढच्या वर्षी पाने झडली. ती पुन्हा येतील, म्हणून मी वाट पाहिली; पण पाने आली नाहीत, कळ्या आल्या नाहीत, फुले फुलली नाहीत.

मी मनात म्हणालो, 'गुलमोहर वठला की काय?"

ही शंका खरी ठरली. एवढा प्रचंड गुलमोहर वठून गेला. त्याचा सांगाडा तेवढा उभा राहिला. एखाद-दुसरा होला भर दुपारच्या वेळी त्याच्या निष्पर्ण डहाळीवर बसून खित्रपणे घुमू लागला.

मला आशा होती की, अजूनही फुटेल. लोक म्हणाले, "अहो, वठलेले झाड दारात असू नये. हे काढून टाका!"

मी म्हणालो, "राहू दे, वठले तरी शोभा आहे."

कोणी एक डबाबाटलीवाला एके दिवशी दुपारी आला आणि म्हणाला, "साहेब, रद्दी नाही, तर नाही, हे झाड तरी मला द्या. दहा रुपये देऊन माझं मी तोडून वाहून नेतो "

मी म्हणालो, "नाही द्यायचं.'

ऑस्ट्रेलियात मी पाहिले होते- एका सुंदर बांधलेल्या घरात अगदी प्रवेशद्वारातच एक वठलेले लहान झाड तसेच्या तस्से उभे केलेले होते. ते किती कलापूर्ण दिसत होते. मी मनात म्हणालो, 'हा गुलमोहर मी असाच माझ्या अभ्यासिकेत ठेवेन.'

चार-आठ दिवस गावाला गेलो. परत येऊन पाहतो, तर गुलमोहरचा सगळा विस्तार तोडलेला. घरच्या मालकिणीने परस्पर निर्णय घेऊन माळीबाबांना सांगितले होते, "तुम्ही हे झाड तोडा आणि सर्पण न्या."

विस्तार नाहीसा झाला; तरी बारा-एक फूट उंचीचे खोड, तीन फांद्या असे हे झाड अद्याप माझ्या दारात उभे आहे. तसेच मुळातून काढून अभ्यासिकेत उभे करावे का? दिल्लीला 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' या संस्थेत, अल्काझी या थोर नाट्यशास्त्रज्ञाची ऑफिसची खोली आहे. तिच्यात असे उभे केलेले झाड मी पाहिले आहे. पण माझा गुलमोहर फार प्रचंड आकाराचा आहे.

आता असे करावे- सरळ बुंधा आहे तो मधोमध चिरावा. चार तुकडे करावेत. सिमेंटने ओतलेले पाय करून हे चार-चार फुटांचे तुकडे त्यावर टाकावेत आणि बागेत बसण्यासाठी त्याचे बाक करावेत.

मी असेच करेन. या गुलमोहराचे सर्पण कदापि होऊ देणार नाही! इतके दिवस लक्षात आले नाही, या पावसाळ्यात आले- वठलेल्या गुलमोहराच्यापासून पाच-एक फुटावर, कोयनेल कुंपणाच्या अडचणीतून डोके वर काढून गुलमोहराचे एक पोर उठले आहे. रुजून किती काळ झाला कोण जाणे, पण आजच ते माझ्या उंचीचे झाले आहे.

असो! गुलमोहराचा वंश बुडाला असे जे वाटत होते, ते खरे नाही! जगले वाचले, तर हेही पोर पाच वर्षात ताडमाड वाढून फुलाने बहरू लागेल.

-oOo -

पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. १३-१६.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

माकडे, माऊली आणि तिच्या मुली

चित्रे आणि चरित्रे

गुडालबाईची ही माकडं सर्वांत जास्त हुशार, चिंपॅन्झी जातीची. दिसायला भीतिदायक आणि शक्तीनं दांडगी (एकेका पूर्ण वाढलेल्या माकडाला तीन पुरुषांचं बळ असतं.), तीही वर्षानुवर्षं जंगलात स्वैर राहिलेली. माणसांचा वारा त्यांना माहीत नाही. आपण म्हणतो, माकडं शाकाहारी असतात. फळं, कोवळा पाला, कोंब, धान्यधुन्य– असलं काहीबाही खातात. शाखामृगच ते! पण ही समजूत निदान चिपॅन्झीच्या बाबतीत तरी खोटी. ती केवळ शाकाहारी नाहीत; अधून-मधून त्यांना कच्चं मांस खायला आवडतं. गोम्बे स्ट्रीम ह्या भागातही चिंपॅन्झी माकडं दंगाधोपा करून एखादं हरिण किंवा रानडुकराचं पोर अचानकपणे पकडत आणि बोल-बोल म्हणता त्याचा फन्ना उडवत.

बाबून माकडं, तांबडी कोलोबस माकडं, निळी माकडं, तांबड्या शेपटीची माकडं– ही लहान जातीची माकडंसुद्धा त्यांचा घास होत. गोम्बे स्ट्रीम भागात गुडालबाई जाण्याच्या आधीच दोन आफ्रिकन बाळं ह्या माकडांनी पळवली होती. एका पोराची सुटका झाल्यावर दिसून आलं की, त्यांचं थोडंसं अंग माकडांनी खाऊन टाकलं आहे. म्हणजे, नरमांसही त्यांना वर्ज्य नव्हतं.

बाईंना मात्र ही गोष्ट आश्चर्याची वाटलेली नाही. त्यांनी लिहिलं आहे :

‘चिपॅन्झी माकडं माणसांची पोरं धरून खातात, ही गोष्ट काही लोकांना फार भयानक वाटते. पण त्यात विशेष काय आहे? चिपॅन्झींना माणसं ही बाबून माकडासारखीच एक जात वाटते. आणि चिंपॅन्झी माकडं पकडून त्यांची शिकार करून काही लोक खातात, ही डेलिकसी समजली जाते; हे भयानक का नाही?’


अगदी लहानपणापासून जेनला वन्य प्राण्यांबद्दल आकर्षण होतं. ही पोर एक वर्षाची असताना आईनं खेळणं म्हणून तिला कापडी बाहुलं दिलं. ते होतं भलंमोठं. केसाळ, काळंभोर असं चिपॅन्झी माकडाचं पोर. लंडनच्या प्राणिसंग्रहालयातली माकडीण पहिल्यांदाच व्याली होती आणि ज्युबिली नावाचं केसाळ पोर तिला झालं होतं. अशी खेळणी बाजारात लगोलग आली होती. पोरीला असलं खेळणं देऊ नका, ती भीती घेईल, असं शेजारपाजारणींनी जेनच्या आईला बजावलं; पण तसं काही झालं नाही. हे भयानक खेळणं जेनला फार आवडलं. कुठंही जाताना ती त्याला काखोटीला मारून घेऊन जाई. त्याच्यावाचून तिला चैन पडत नसे.

अगदी लहानपणीच एके दिवशी जेन घरातून नाहीशी झाली. कुठं गेली, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. घबराट झाली. शोधाशोध झाली, तरीही सापडली नाही. शेवटी रडवेल्या आईनं पोलिसांत वर्दी दिली. आणि पाच तासांनंतर ही पोर कोंबड्यांच्या खुराड्यातून बाहेर येताना दिसली. इतका वेळ तिथं बसून ती कोंबडी गुळगुळीत अंडी कशी घालते, ते बघत होती म्हणे!

(…)(१)

सगळी प्राथमिक तयारी झाली. पण ‘किगोमा’ ह्या भागातले सरकारी अधिकारी एका गोष्टीला अजिबात राजी होईनात. एक युरोपियन बाई जंगलात एकटी राहील कशी? तिच्या सोबतीला कोणी तरी गोरं माणूस पाहिजे. ते नसलं, तर आम्ही परवानगी देणार नाही, म्हणून ते हटून बसले. चांगलीच पंचाईत झाली. काय करावं?

शेवटी जेनची आई म्हणाली, “अगं, निराश का होतेस? मी राहीन तिथं तुझ्या सोबतीला.”

मग सगळा प्रश्न सुटला.

ह्या माय-लेकी प्रथम किगोमा ह्या लहानशा गावी गेल्या आणि तिथून लाँचनं ‘गोम्बे स्ट्रीम रिझर्व्ह’ला यायला निघाल्या. सरोवरातल्या स्वच्छ निळ्या पाण्यातून बोट चालू लागताच जेन मनात म्हणाली, ‘बहुतेक ही लाँच बुडेल किंवा मी एकटी सरोवरात पडेन आणि सुसरी मला खातील...’

पण तसं झालं नाही. लाँचमधे उभी राहून, सरोवराच्या पूर्व बाजूनं दूरवर पसरलेल्या टेकड्या जेननं पाहिल्या. अडीच हजार फूट उंचीच्या ह्या टेकड्या, जंगलतोडीमुळं कुठं कुठं उघड्या दिसत होत्या. ठिकठिकाणच्या दऱ्यांतून मात्र दाट झाडी होती. सात मैल प्रवास होताच डोंगराचं रूप एकदम बदललं. दाट जंगलानं भरून गेलेले उंच डोंगर दिसले. किनाऱ्यावर कुठं कुठं ठिपक्यांप्रमाणं कोळ्यांच्या झोपड्या दिसल्या. कधी न पाहिलेलं ते दाट जंगल बघून जेनची आई घाबरून गेली. सोबतीला असलेला अधिकारी मनात म्हणाला, ‘सहा महिन्यांच्या आत ह्या बाया गाशा गुंडाळून नाही पळाल्या, तर नाव बदला माझं !’

(…)

पुढं आजार आला, मलेरियासारखा. जेन आणि बरोबर आलेली तिची आई आजारी पडली. त्यात तीन महिने गेले. जेन लवकर बरी झाली. आईला बराच काळ अंथरुणावर पडून राहावं लागलं.

(…)

मग एका-एका चिपॅन्झीला जेन ओळखू लागली. कोणाचा चेहरा पाहून कोणी तरी ओळखीचं माणूस आठवलं की, त्याचं नाव ती त्या माकडाला देई.

एक म्हातारा टकल्या नर होता तिशी-चाळिशीतला. (प्राणिसंग्रहालयातला एक चिपॅन्झी सत्तेचाळीस वर्ष जगला, अशी नोंद आहे.) त्याच्या मानेवर, दोन्ही खांद्यांवरही केस नव्हते. जेननं त्याला नाव दिलं: ‘मिस्टर मॅक ग्रेगोर.’ हा नेहमी जेनला भीती दाखवायचा. भयानक ओरडायचा. झाडावर चढून डहाळी जोरजोरानं हलवायचा, डोकं हलवायचा आणि झाडीत शिरून दिसेनासा व्हायचा.

एक होती प्लाव, बेढब नाकाची आणि फाटक्या कानाची. तिला दोन वर्षाचं पोर होतं. त्याचं नाव फिफी. आईच्या पाठुंगळी बसून ते हिंडायचं. तिच्यापेक्षा मोठा होता पोरगा. सहा-एक वर्षांचा असावा, तो फिगन. आपली आई आणि धाकटी बहीण यांच्या भोवती-भोवती तो असायचा.

–आणि दोघं जण होते. एक गोलिथ आणि दुसरा डेव्हिड. बायबलमधली ही नावं जेननं त्यांना दिली होती. गोलिथ तरणा आणि पहिलवानासारखा सुदृढ बांध्याचा होता. त्याचं वजन शंभर पौंड असावं. डेव्हिडला पांढरी दाढी होती. तो स्वभावानं शांत होता. तो जेनला जवळून निरीक्षण करू द्यायचा.

ह्या डेव्हिड मे बिअर्डमुळं जेनला महत्त्वाचे दोन शोध लागले. तो तिला एकदा डुकराचं पोर खाताना दिसला. चिंपॅन्झी शिकार करून मांस खातात, हे तोपर्यंत तिला माहीत नव्हतं.

– आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात थोडासा पाऊस पडून गेल्यावर गवत उगवलं होतं. डोंगरांचे उतार हिरव्यागार गवतानं आणि रंगीबेरंगी फुलांनी भरून गेले होते. ह्या दरीतून त्या दरीत असे खूप भटकूनही जेनला काही बघायला मिळालं नव्हतं, ती वैतागली होती. ओल्या झाड-झाडोऱ्यांतून चालून ओलीचिंब झाली होती. एवढ्यात साठ-एक फुटांवर उंच गवतात काही हालचाल तिला दिसली. दुर्बिणीतून बघितलं, तर हा डेव्हिड होता.

तांबड्या मातीच्या वारुळाशेजारी तो बसला होता. जेननं नीट न्याहाळून पाहिलं, तर गवताची लांब काडी घेऊन त्यानं ती वारुळाच्या बिळात खाली घातली, बाहेर काढली आणि तिच्या टोकाला जे लागलं होतं, ते वेचून खाल्लं. साठ फुटांवरून त्यानं काय खाल्लं, हे दिसलं नाही; पण त्यानं अकलेनं साधनाचा उपयोग केला, हे तिला कळलं.

एक तासभर त्याचा हा उद्योग चालला होता. डेव्हिड निघून गेल्यावर जेन वारुळापाशी गेली आणि गवताची गाडी तिनं एका बिळात खुपसली. लगेच तिला जाणवलं, की काडीला ओढ लागली आहे. काडी बाहेर काढताच तिला चिकटलेल्या अनेक वाळवी तिला दिसल्या. लहान-मोठ्या डोक्याच्या शिपाई वाळवी होत्या. काही कामकरी होत्या.


पुढं निरीक्षणात जेनला दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. एका माकडानं बी फोडण्यासाठी दगड वापरला. आणखी एकदम दिसलं की, जमिनीच्या आत पोळं लागलं आहे. माकडं त्या भोकात काड्या खुपसताहेत आणि त्यांना लागलेला मध चोखताहेत.

जेन लिहिते, 'आजवर माणसाची व्याख्या विशिष्ट पद्धतीची साधनं, हत्यारं बनवून त्याचा वापर करणारा प्राणी अशी होती. आता एक तर ही व्याख्या बदलली पाहिजे, नाही तर चिंपॅन्झीला माणूस म्हटलं पाहिजे.'

हा शोध फार महत्त्वाचा होता. जेननं लगेच तो तारनं डॉ. लुईंना कळविला.

ह्या शोधामुळंच अमेरिकेतील नॅशनल जिऑग्राफी सोसायटीने जेनला आणखी एक वर्ष अभ्यास करण्यासाठी ग्रँट दिली.

जेनला पहिल्या पाच महिन्यांत आईची फार मदत झाली. तिची आई आजूबाजूच्या खेडुतांना औषधं देई आणि त्यांच्याशी मैत्री करी. त्यामुळं मुक्काम सुसह्य झाला. पुढं आई इंग्लंडला निघून गेली. जेन एकटीच राहिली. रात्री कॅपमध्ये शेकोटी पेटल्यावर फक्त दिव्याभोवताली जमलेले कीटक खाण्यासाठी नेहमी येणारा मोठा बेडूकच तिच्या सोबतीला राहिला.

(…)

जेन दिवसभर डोंगरात अठरा महिने काम करीत राहिली. पहाटे साडेपाचलाच गजर लावून ती जागी होई. ब्रेडचा तुकडा आणि कॉफीचा कप घेऊन डोंगरात जाई. जंगलात भटकताना अन्नाची गरजच तिला भासली नाही. डोंगरमाथ्यावर पाणी होतं आणि तिथं केलेल्या कॉफीला विशेष चव होती. अंधार पडायला लागल्यावर ती खाली उतरे आणि कँपवर आल्यावर दिवसभर जे पाहिलं, त्याची टिपणं करीत रात्री उशिरापर्यंत जागे. साहजिकच, अंगावरची चरबी झडली आणि जेन फार वाळलेली दिसू लागली.

दरम्यान, चिपॅन्झीचे फोटोग्राफ घेण्यास तिची बहीण ज्युडी आली. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीला हवे होते, म्हणून.

जेनची कळा बघून ती हादरून गेली. आपली बहीण अंगानं सुधारावी, म्हणून ती रोज काहीबाही चांगलंचुंगलं, गोडधोड करून ठेवू लागली; पण जेनला काही इच्छा नसे. कस्टर्ड, पॉरिज, हॉर्लिक्स वाया जाऊ नये, म्हणून ज्युडीच दोघींच्या वाटचं खाऊ लागली. त्यामुळं ती फार लठ्ठ झाली.

डिसेंबर महिन्यात कँप संपवावा लागला, कारण लुईनं जेनचं नाव पीएच.डी. साठी केंब्रिज विद्यापीठात दिलं होतं. तिला अॅडमिशनही मिळाली होती. बी.ए. ही पदवी नसतानासुद्धा पीएच.डी. करणारे जे अगदी थोडे विद्यार्थी होते, त्यांपैकी एक जेन होती. 'वन्य प्राण्यांच्या सवयी' हा तिचा पीएच.डी.चा विषय होता.


नैरोबीला ह्या दोन्ही बहिणींना लुई भेटला आणि लगोलग त्यानं जेनच्या आईला तार केली :

‘Girls arrived safely Stop One thin one fat’

‘दोन्ही मुली सुखरूप पोचल्या. एक लुकडी– एक जाडी’

-oOo-

पुस्तक: चित्रे आणि चरित्रे .
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती चौथी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२१.
पृ. ६४-६५, ६७-६८, ६९, ७१, ७१-७३, ७५.

(पहिली आवृत्ती: १९८३).


(१) मूळ पुस्तकामध्ये (…) इथे काही मजकूर आहे, या वेच्यासाठी निवडलेल्या सूत्राशी सुसंगत नसल्याने तो वगळलेला आहे.


हे वाचले का?

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

वीरभूषण, ग्लाड आणि आपण

एखाद्या पुस्तकातील वेचे इथे समाविष्ट करत असताना काही वेळा त्या वेच्याबाबत, पुस्तकाबाबत अथवा त्याचा धागा पकडून केलेल्या स्वतंत्र विचार-विश्लेषणावर आधारित ’वेचताना’ या मालिकेतील लेख इथे लिहित असतो. ’थॅंक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील वेचे इथे शेअर करताना ’वेचताना...’ हा जोडलेखही शेअर केला आहे. परंतु मला तो थोडा अपुरा वाटतो आहे.

हा लेख प्रामुख्याने ती कादंबरी, लेखक आणि तिचे अन्य कलाकृतींमध्ये दिसलेले प्रतिबिंब याभोवतीच केंद्रित आहे. त्यामध्ये ग्लाड या पात्राच्या मनोभूमिकेकडे मी अधिक बारकाईने पाहिले आहे. त्या कादंबरीकडे नि त्यातील दोनही प्रमुख पात्रांकडे तुम्ही-आम्ही कसे पाहावे याबाबत त्यात काही लिहिलेले नाही. त्या कादंबरीची आणि त्यावर आधारित नाटकाचा जनमानसावर तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव पाहता त्याबाबत स्वतंत्रपणे लिहिणे मला आवश्यक वाटले.

कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. ’वेचताना...’ या जोडलेखामध्ये म्हटल्याप्रमाणे यातील संघर्ष आहे तो ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.

यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. ’वेचताना...’ लेखात उल्लेख केल्याप्रमाणॆ महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.

थँक यू, मिस्टर ग्लाड

’थॅंक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ’वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...

...’हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! म्हणजे असं पाहा, की वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या वैचारिक निष्ठेतून केली आहे असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे जेलर ग्लाड ’पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी ’ असणार्‍या वीरभूषणकडे तो ’मला न पटणार्‍या’ विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून पाहू शकतो.

ग्लाड ’बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ’पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्‍यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?

माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे 'मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी' नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.

निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे- दंडनीय आहे असे म्हटले तरी चालेल.

मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (सुपर-सिस्टम) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते. (या मुद्द्याचा थोडा उहापोह रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेल्या ’व्यवस्थांची वर्तुळे’ या लेखामध्ये केला आहे.)

मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्‍या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ’पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.

दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ’न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. 'फाशी देणे योग्य आहे का?' ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.

यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्‍या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.

जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ’न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्‍या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्‍यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!

त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली - ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.

ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ’माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ’आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा ग्लाडचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.

’वेचताना...’ या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.

वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे- म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.

हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ’पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्‍या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.

याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्वकल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो, पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.

या सार्‍याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्‍या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.

-oOo -

संबंधित लेखन:
वेचताना... : थँक यू, मिस्टर ग्लाड >>
शरीरम् धनसंपदा >>
नो थँक्यू, मिस्टर ग्लाड >>
---


हे वाचले का?

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

चढ आणि उतार

माझ्या घरापासून अगदी पाच-दहा मिनिटांच्या वाटेवर टेकडी आहे. मनात आले की, तिच्यावर जाता येते, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! विशेषत: मुंबईला कामासाठी गेलो, म्हणजे माझे हे भाग्य मला फार ठळकपणे जाणवते.

सुंदर पहाट होते. हातात लहानशी काठी आणि खिशात दुर्बीण घेऊन मी बाहेर पडतो. बालभारतीच्या पाठीमागे जी टेकडी आहे, तिच्या पायथ्याशी येऊन जरा मागे वळून बघतो, पुणे शहर अजून पुरते जागे झालेले नसते. अजून रस्ते वाहू लागलेले नसतात. पूर्व दिशेला लाली मात्र चढलेली दिसते. मी उत्साहाने टेकडी चढू लागतो.

अगदी परवा-परवा या टेकडीवर छान झाडी होती. पूरग्रस्त लोकांची वस्ती झाली, खिंड झाली, रस्ता झाला आणि टेकडीवरची अनेक झाडे सर्पणासाठी जाळली गेली. कडुनिंबाचे चांगले जाणते झाड कोणीतरी घाव घालून तोडत आहे, हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. उघड्याबंब अंगाने धोतराचा काचा मारून झाड तोडणाऱ्या माणसापाशी त्याचे इमानी कुत्रे असत. दोन पोरे तोडलेल्या ढलप्या कवळे भरभरून नेत आहेत, असे दिसते. हे सगळे बघूनही 'बाबा रे, का तोडतो आहेस झाड? तू कोण? हे झाड कुणाच्या मालकीचे आहे?' असे त्या लाकूडतोड्याला हटकण्याचे धाडस मात्र कधीही माझ्याकडून झालेले नाही. तो पूरग्रस्त आहे आणि त्या वस्तीतल्या गरीब बापड्या लोकांना रोजची भाजी-भाकरी शिजविण्याला सर्पण विकत आणण्याची शक्ती जर नसेल, तर त्यांनी काय करावे?

फिरणे, हवा खाणे, निसर्गसौंदर्य चाखणे हे चोचले गरिबांना परवडण्यासारखे नाहीत, वगैरे सगळे मला माहीतच आहे. शिवाय माणसाने जमाना ओळखावा आणि गप्प बसावे, हे मध्यमवर्गीय शहाणपण मला वारसाहक्काने मिळालेले आहेच. असो.

घाव घालून अधू केलेली झाडे, विस्तार तोडून उरलेले आणि तरीही ढलप्यांसाठी कोयत्या-कुऱ्हाडीचे घाव घेऊन तांबडेलाल झालेले खुंट मला जागोजागी दिसतात. तोडून फरफटत नेलेल्या खोडांचे फरकाटे खडकावरून उठलेले असतात. पण या दृश्याकडे दुर्लक्ष करून मी हवा खात हिंडतो.

वाटा

टेकडीच्या माथ्यावर आणि अंगाखांद्यावर मला ओळखीच्या अनेक वनस्पती दिसतात. दगडीपाल्याचा हिरवाकंच वेल आणि त्यावर उमटलेली लांब देठांची पिवळी फुले दिसतात. कोरफडीचे आळे दिसते. सराट्याचे वेल दिसतात. काळमाशीचे गड्डे दिसतात. या सगळ्यांचे औषधी गुण मला बाळपणीच रामोशांच्या आणि धनगरांच्या गुराखी पोरांबरोबर राने तुडविताना माहीत झालेले आहेत. ऋतुकालमानानुसार या वनस्पतींचे दर्शन होते, तेव्हा मला बरे वाटते. गावाकडचा माणूस भेटावा, तसा आनंद होतो. या लहानसान वनस्पतींबरोबरच फुललेल्या कडुनिंबाचा आणि मुरमुट्याचा गंध, भिजल्या गवताचा आणि माळरानाचा वास हेही मला कसल्यातरी जुन्या आठवणी करून देतात. चालता-चालता वाटेवरच्या धुळीत गुंडी किड्यांनी केलेल्या सुरेख गदी दिसतात. अंगावरच्या कपड्यातले एखादे सूत ओढून त्याची लहान गुंडी या गदीत टाकावी आणि घसरून गदीत पडणाऱ्या भक्ष्याची वाट पाहात मातीखाली दडून राहिलेल्या किड्यांचे दर्शन घडते का बघावे, म्हणून मी थबकतो. कधी हात लावला की, अंगाचे वेटोळे करणारे पैसा किडे दिसतात. कधी माळसरडे दिसतात, कधी खारीची पोरे दिसतात. बघावे तेवढे थोडेच असते.

टेकडीच्या परिसरातली बरीच पाखरे आता माझ्या माहितीची झाली आहेत. अमुक ठिकाणी तमका भेटेल, तमुक ठिकाणी तो हा चरत असेल, असे माझे अंदाज सहसा खोटे ठरत नाहीत. पाखरे उडतात, तेव्हा ती दिवसभरात दूरदूरची राने धुंडत असतील, असे आपल्याला वाटते. पण ते काही खरे नाही. त्यांचेही जग एवढेएवढेसेच असते.

पायथ्याच्या माळरानावर मला तुरेवाले आणि बिनतुरेवाले चंडोल हमखास दिसतात. कधी चार-सहाच्या घोळक्यांनी ते चरत असतात. डोळ्याला दुर्बीण लावून त्यांना अगदी छान न्याहाळता येते. थोडी पोटे भरली की, त्यांना गाण्याची लहर येते. एखादे पाखरू अगदी ठिपका होईस्तोवर उंच उडते. क्षणभर जागच्या जागी थांबते आणि सुरेख गाणे गाऊन सारे आसमंत भारून टाकते. हे स्वर कानी येतात, तेव्हा मला शाळेची एकाकी वाट आठवते. माडगूळ ते आटपाडी हे पाच मैलांचे अंतर भल्या सकाळी तुडविताना सगळ्या वाटेवर चंडोलांचे गाणे माझा श्रमपरिहार करीत असे.

पायथ्याशी हिंडताना पांढरपोट्या दयाळाचे सुस्वर कानी पडतात. तो कुठे आहे, हे मला बरोबर माहीत आहे. वेताळ टेकडी आणि बालभारतीच्या पाठीची टेकडी या दोहोंमध्ये, आत गेलेला थोडा दडणीचा जो भाग आहे, तिथे उंच शेलाटा, एकाकी कडुनिंब आहे. त्याच्या टोकाशी बसून हा दयाळ रोज सकाळी गातो. 'हे एवढे रान माझे आहे. इथला स्वामी मी आहे,' एवढाच त्याचा गाण्याचा आशय असावा. आणखी एक कोणीतरी 'पीऽबीऽ चिक्ऽऽ पीऽ बीऽ' एवढेच कडवे सारखे गात असतो. बराच तपास करूनही त्याची-माझी दृष्टभेट अद्याप झालेली नाही.

गुराख्यांनी पाडलेल्या पायवाटेने मी वेताळ टेकडीच्या दिशेने चढू लागतो आणि वाटेवरच कुठे माना काढून, माझ्या हालचालींवर डोळा ठेवून असलेली तित्तिराची एक जोडी अगदी शेजारी गेल्यावर, भुर्रकन भरारी घेऊन पार पलीकडे असलेल्या घायपातीच्या लहानशा बेटात जाऊन पडते. त्यांना दुर्बिणीने टिपण्याचा माझा बेत अजून सफल झालेला नाही. प्रत्येक खेपेला, त्यांनीच मला आधी हेरलेले असते. बेटे चूप बसतात आणि मी अगदी चार फुटांवर गेलो की, एक-दोन-तीन म्हणून एकदम भरारी घेतात.

माथ्यावर पोहोचले की, चोहोकडे सुरेख रान आणि डोक्यावर निळे आभाळ दिसते. अजून कोणी फिरकलेले नसते. कडेची एखादी पायवाट धरून चालू लागले की, तांबूस पाठी, पांढरी पोटे आणि त्यांवर बारीक काळे ठिपके असलेल्या मुनियाचा भलामोठा थवा भेटतो. चांगल्या शे-सव्वाशे चिमण्या असतात. गवतात चिमणचारा वेचण्याच्या नादात त्यांना पुष्कळदा माझी चाहूल लागत नाही. मी बघत असती आणि त्या चरत असतात. हळूहळू आमच्यातले अंतर कमी होत जाते. दुर्बिणीतून झोपेतले बाळ सटवाईने घाबरवावे, तशा त्या भुर्रकन घोळक्यानेच उडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एवढे एवढे ठिपके खाली-वर होताना दिसतात. जमिनीवर मुक्या राहणाऱ्या मुनिया अधांतरी होताच बोलू लागतात. बारीक घुंगरमाळांचा आवाज रुणझुणावा, तसे त्यांचे बोल कानी येतात.

थोडे पलीकडे मेंढीफार्मच्या वरच्या बाजूला कशी कोण जाणे, पण अजून थोडी झाडी राहिलेली आहे. अगदी अलीकडे भल्या सकाळी कोणीतरी बुझवलेले एक भेकर सुसाट पाळताना मी खालून पाहिले होते, ते याच ठिकाणी. इथे मुरमुटीसारखी दिसणारी बरीच झाडे आहेत. ती फुलावर असली, म्हणजे अनेक फुलचोख्या डहाळ्यांशी झोंबताना दिसतात. त्यांच्या अस्वस्थ हालचाली अगदी निवांतपणे आपल्याला बघता येतात.

या झाडीत घुसून एखाद्या बुंध्याशी उभे राहून कान दिले की, नाना आवाज येतात. बुलबुल बोलत असतात. खाटीक, ल्हाने कोतवाल, मुके राघू आणि मठ्ठपणे बसलेले कावळे दिसतात. झाडांच्या बुंध्याच्या खांबातून वाकडे-तिकडे घसरत आपण सावकाश खाली उतरू लागावे.

शेपट्या हलवीत डहाळीवर बसलेले कोतवाल दिसतात, मेंढी फार्ममधल्या मेंढ्या चरणीसाठी बाहेर केव्हा येतात आणि त्यांच्या खुरांनी उडविलेले टोळ, किडे मटकावीत आपण त्यांच्याच पाठीवर बसून फेरफटका कधी घेतो, याची वाटच ते बघत असतात.

मधेच हवेत कोलांटी मारून एखादा मुका राघू पुन्हा साळसुदासारखा डहाळीवर येऊन बसतो, तेव्हा खुशाल समजावे की, त्याने उडता पतंग मटकावला. तुम्ही कधी पाण्यावर तरंगत जाणारा घोडा बघितला आहे का? नक्षीदार पंखांचा आणि लांब करवेदार शेपटाचा? बाळपणी आम्ही हलक्या हाताने हा पकडीत असू आणि त्याच्या शेपटीला लांब दोरा बांधून त्याचा पतंग उडवीत असू. एकदा असला भलामोठा घोडा मुक्या राघूने अधांतरीच पकडला. चांगला दीड इंच लांबीचा आणि फताड्या पंखांचा. रंगाने चकचकीत गुलाबी होता. हिरव्या मुक्या राघूने आपल्या दाभण चोचीने त्याला पकडले आणि फांदीवर येऊन बसल्यावर त्याच्या ध्यानी आले- 'अरे, हा तर लहान तोंडी मोठा घास आहे.' घोडा अजून धडपडतच होता. खरे तर चिमणी आकाराच्या मुक्या राघूने त्याला सोडून मोकळे व्हावयाचे. पण नाही! त्याने जोरजोराने त्याला फांदीवर आपटून पुरे केले आणि मग मोठ्या हिमतीने गिळले. पोट टम् झाले असावे. कारण मान आत घेऊन शेपटी खालीवर करीत तो कितीतरी वेळ जागचा हलला नाही. मला तर वाटले की, आता दिवस मावळेपर्यंत यांची बेगमी झाली.

असे बघत-बघत आपण मेंढी फार्मच्या फाटकाशी पोहोचतो. 'कुत्र्यापासून सावध' अशी पाटी इथे आहे. पण अनेक वेळा सावध राहूनही मला इथे कधी कुत्रे दिसलेले नाहीत. वतन गेले नाव राहिले, असा प्रकार असावा. याच उतारावर कधी नव्हे तो एकदा मला चित्तूर तुरगताना दुरून दिसला होता. फारच चपळाईने त्याने मला झुकांडी दिली. अस्मानी उडाला की पाताळी दडला, हेसुद्धा कळले नाही.

एवढा पल्ला मारून तळाशी उतरेपर्यंत दिवस वर आलेला असतो. रोजचे व्यवहार सुरू झालेले असतात. मेंढी फार्मवरची गुरे डोंगर वेचू लागलेली असतात.. पूरग्रस्त वस्तीवरची माणसे लोटा परेडसाठी डोंगराच्या दिशेने निघालेली दिसतात. कुठे उंच खडकावर स्वच्छ हवेत जोर-बैठका मारून हेल्थ कमविणाऱ्या पोरांच्या आकृती दिसू लागतात. मग दुर्बीण डोळ्याला लावून बघावे, असा भाग आता संपला, असे समजून मी नाकासमोर बघत परतीची वाट तुडवू लागतो.

अजून माळरानच असते. ते संपून खिंड येईपर्यंत काहीबाही दिसतच असते. रानवट दयाळची जोडी एकापाठोपाठ नाचताना दिसते. भांडखोर साळुंक्या कुस्ती खेळताना दिसतात. तारेवर बसून 'किलकिल्या' ओरडलेला ऐकू येतो. कधी बालभारतीच्या आसमंतात शेपूट नाचवून ओरडणारा शिंपीही दिसतो.

पुढे मात्र माणसे भेटू लागतात. कुत्रेवाली, मफलरवाली, छत्रीवाली...
कामगार, शाळकरी पोरे, भांडीवाल्या बाया, वडार, सायकली, रिक्षा, स्कूटर्स...

आता पाहण्यासारखे काही नसते. सपाट गुळगुळीत डांबरी रस्ता.

तरतरीत शरीराने आणि उल्हसित मनाने हाती काठी फिरवीत मी घराशी पोहोचतो. गरम चहाचा पत्तिगंध !

’वनस्पतिशास्त्र किंवा तत्सम एखाद्या शास्त्रातील विशिष्ट कामात मी गुंतलेलो नाही. परंतु जगलो वाचलो, तर निसर्गाबद्दल सांगण्यासारखे मात्र माझ्यापाशी पुष्कळच असेल.' असे तो आधुनिक ऋषी थोरो म्हणाला होता. बापडा पन्नाशीच्या आतच देवाघरी गेला. माझी उमेद एवढीच आहे की, जगलो वाचलो तर निसर्गापासून थोडा अधिक आनंद मी मिळवेन आणि तो तिळगुळासारखा वाटेन!

-oOo -

पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. ५६-५९.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?