बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

वीरभूषण, ग्लाड आणि आपण

एखाद्या पुस्तकातील वेचे इथे समाविष्ट करत असताना काही वेळा त्या वेच्याबाबत, पुस्तकाबाबत अथवा त्याचा धागा पकडून केलेल्या स्वतंत्र विचार-विश्लेषणावर आधारित ’वेचताना’ या मालिकेतील लेख इथे लिहित असतो. ’थॅंक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील वेचे इथे शेअर करताना ’वेचताना...’ हा जोडलेखही शेअर केला आहे. परंतु मला तो थोडा अपुरा वाटतो आहे.

हा लेख प्रामुख्याने ती कादंबरी, लेखक आणि तिचे अन्य कलाकृतींमध्ये दिसलेले प्रतिबिंब याभोवतीच केंद्रित आहे. त्यामध्ये ग्लाड या पात्राच्या मनोभूमिकेकडे मी अधिक बारकाईने पाहिले आहे. त्या कादंबरीकडे नि त्यातील दोनही प्रमुख पात्रांकडे तुम्ही-आम्ही कसे पाहावे याबाबत त्यात काही लिहिलेले नाही. त्या कादंबरीची आणि त्यावर आधारित नाटकाचा जनमानसावर तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव पाहता त्याबाबत स्वतंत्रपणे लिहिणे मला आवश्यक वाटले.

कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. ’वेचताना...’ या जोडलेखामध्ये म्हटल्याप्रमाणे यातील संघर्ष आहे तो ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.

यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. ’वेचताना...’ लेखात उल्लेख केल्याप्रमाणॆ महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.

थँक यू, मिस्टर ग्लाड

’थॅंक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ’वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...

...’हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! म्हणजे असं पाहा, की वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या वैचारिक निष्ठेतून केली आहे असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे जेलर ग्लाड ’पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी ’ असणार्‍या वीरभूषणकडे तो ’मला न पटणार्‍या’ विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून पाहू शकतो.

ग्लाड ’बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ’पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्‍यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?

माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे 'मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी' नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.

निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे- दंडनीय आहे असे म्हटले तरी चालेल.

मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (सुपर-सिस्टम) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते. (या मुद्द्याचा थोडा उहापोह रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेल्या ’व्यवस्थांची वर्तुळे’ या लेखामध्ये केला आहे.)

मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्‍या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ’पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.

दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ’न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. 'फाशी देणे योग्य आहे का?' ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.

यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यकी तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्‍या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.

जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ’न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्‍या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्‍यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!

त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली - ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.

ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ’माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ’आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा ग्लाडचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.

’वेचताना...’ या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.

वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे- म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.

हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ’पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्‍या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.

याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्वकल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो, पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.

या सार्‍याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्‍या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.

-oOo -


हे वाचले का?

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

चढ आणि उतार

माझ्या घरापासून अगदी पाच-दहा मिनिटांच्या वाटेवर टेकडी आहे. मनात आले की, तिच्यावर जाता येते, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! विशेषत: मुंबईला कामासाठी गेलो, म्हणजे माझे हे भाग्य मला फार ठळकपणे जाणवते.

सुंदर पहाट होते. हातात लहानशी काठी आणि खिशात दुर्बीण घेऊन मी बाहेर पडतो. बालभारतीच्या पाठीमागे जी टेकडी आहे, तिच्या पायथ्याशी येऊन जरा मागे वळून बघतो, पुणे शहर अजून पुरते जागे झालेले नसते. अजून रस्ते वाहू लागलेले नसतात. पूर्व दिशेला लाली मात्र चढलेली दिसते. मी उत्साहाने टेकडी चढू लागतो.

अगदी परवा-परवा या टेकडीवर छान झाडी होती. पूरग्रस्त लोकांची वस्ती झाली, खिंड झाली, रस्ता झाला आणि टेकडीवरची अनेक झाडे सर्पणासाठी जाळली गेली. कडुनिंबाचे चांगले जाणते झाड कोणीतरी घाव घालून तोडत आहे, हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. उघड्याबंब अंगाने धोतराचा काचा मारून झाड तोडणाऱ्या माणसापाशी त्याचे इमानी कुत्रे असत. दोन पोरे तोडलेल्या ढलप्या कवळे भरभरून नेत आहेत, असे दिसते. हे सगळे बघूनही 'बाबा रे, का तोडतो आहेस झाड? तू कोण? हे झाड कुणाच्या मालकीचे आहे?' असे त्या लाकूडतोड्याला हटकण्याचे धाडस मात्र कधीही माझ्याकडून झालेले नाही. तो पूरग्रस्त आहे आणि त्या वस्तीतल्या गरीब बापड्या लोकांना रोजची भाजी-भाकरी शिजविण्याला सर्पण विकत आणण्याची शक्ती जर नसेल, तर त्यांनी काय करावे?

फिरणे, हवा खाणे, निसर्गसौंदर्य चाखणे हे चोचले गरिबांना परवडण्यासारखे नाहीत, वगैरे सगळे मला माहीतच आहे. शिवाय माणसाने जमाना ओळखावा आणि गप्प बसावे, हे मध्यमवर्गीय शहाणपण मला वारसाहक्काने मिळालेले आहेच. असो.

घाव घालून अधू केलेली झाडे, विस्तार तोडून उरलेले आणि तरीही ढलप्यांसाठी कोयत्या-कुऱ्हाडीचे घाव घेऊन तांबडेलाल झालेले खुंट मला जागोजागी दिसतात. तोडून फरफटत नेलेल्या खोडांचे फरकाटे खडकावरून उठलेले असतात. पण या दृश्याकडे दुर्लक्ष करून मी हवा खात हिंडतो.

वाटा

टेकडीच्या माथ्यावर आणि अंगाखांद्यावर मला ओळखीच्या अनेक वनस्पती दिसतात. दगडीपाल्याचा हिरवाकंच वेल आणि त्यावर उमटलेली लांब देठांची पिवळी फुले दिसतात. कोरफडीचे आळे दिसते. सराट्याचे वेल दिसतात. काळमाशीचे गड्डे दिसतात. या सगळ्यांचे औषधी गुण मला बाळपणीच रामोशांच्या आणि धनगरांच्या गुराखी पोरांबरोबर राने तुडविताना माहीत झालेले आहेत. ऋतुकालमानानुसार या वनस्पतींचे दर्शन होते, तेव्हा मला बरे वाटते. गावाकडचा माणूस भेटावा, तसा आनंद होतो. या लहानसान वनस्पतींबरोबरच फुललेल्या कडुनिंबाचा आणि मुरमुट्याचा गंध, भिजल्या गवताचा आणि माळरानाचा वास हेही मला कसल्यातरी जुन्या आठवणी करून देतात. चालता-चालता वाटेवरच्या धुळीत गुंडी किड्यांनी केलेल्या सुरेख गदी दिसतात. अंगावरच्या कपड्यातले एखादे सूत ओढून त्याची लहान गुंडी या गदीत टाकावी आणि घसरून गदीत पडणाऱ्या भक्ष्याची वाट पाहात मातीखाली दडून राहिलेल्या किड्यांचे दर्शन घडते का बघावे, म्हणून मी थबकतो. कधी हात लावला की, अंगाचे वेटोळे करणारे पैसा किडे दिसतात. कधी माळसरडे दिसतात, कधी खारीची पोरे दिसतात. बघावे तेवढे थोडेच असते.

टेकडीच्या परिसरातली बरीच पाखरे आता माझ्या माहितीची झाली आहेत. अमुक ठिकाणी तमका भेटेल, तमुक ठिकाणी तो हा चरत असेल, असे माझे अंदाज सहसा खोटे ठरत नाहीत. पाखरे उडतात, तेव्हा ती दिवसभरात दूरदूरची राने धुंडत असतील, असे आपल्याला वाटते. पण ते काही खरे नाही. त्यांचेही जग एवढेएवढेसेच असते.

पायथ्याच्या माळरानावर मला तुरेवाले आणि बिनतुरेवाले चंडोल हमखास दिसतात. कधी चार-सहाच्या घोळक्यांनी ते चरत असतात. डोळ्याला दुर्बीण लावून त्यांना अगदी छान न्याहाळता येते. थोडी पोटे भरली की, त्यांना गाण्याची लहर येते. एखादे पाखरू अगदी ठिपका होईस्तोवर उंच उडते. क्षणभर जागच्या जागी थांबते आणि सुरेख गाणे गाऊन सारे आसमंत भारून टाकते. हे स्वर कानी येतात, तेव्हा मला शाळेची एकाकी वाट आठवते. माडगूळ ते आटपाडी हे पाच मैलांचे अंतर भल्या सकाळी तुडविताना सगळ्या वाटेवर चंडोलांचे गाणे माझा श्रमपरिहार करीत असे.

पायथ्याशी हिंडताना पांढरपोट्या दयाळाचे सुस्वर कानी पडतात. तो कुठे आहे, हे मला बरोबर माहीत आहे. वेताळ टेकडी आणि बालभारतीच्या पाठीची टेकडी या दोहोंमध्ये, आत गेलेला थोडा दडणीचा जो भाग आहे, तिथे उंच शेलाटा, एकाकी कडुनिंब आहे. त्याच्या टोकाशी बसून हा दयाळ रोज सकाळी गातो. 'हे एवढे रान माझे आहे. इथला स्वामी मी आहे,' एवढाच त्याचा गाण्याचा आशय असावा. आणखी एक कोणीतरी 'पीऽबीऽ चिक्ऽऽ पीऽ बीऽ' एवढेच कडवे सारखे गात असतो. बराच तपास करूनही त्याची-माझी दृष्टभेट अद्याप झालेली नाही.

गुराख्यांनी पाडलेल्या पायवाटेने मी वेताळ टेकडीच्या दिशेने चढू लागतो आणि वाटेवरच कुठे माना काढून, माझ्या हालचालींवर डोळा ठेवून असलेली तित्तिराची एक जोडी अगदी शेजारी गेल्यावर, भुर्रकन भरारी घेऊन पार पलीकडे असलेल्या घायपातीच्या लहानशा बेटात जाऊन पडते. त्यांना दुर्बिणीने टिपण्याचा माझा बेत अजून सफल झालेला नाही. प्रत्येक खेपेला, त्यांनीच मला आधी हेरलेले असते. बेटे चूप बसतात आणि मी अगदी चार फुटांवर गेलो की, एक-दोन-तीन म्हणून एकदम भरारी घेतात.

माथ्यावर पोहोचले की, चोहोकडे सुरेख रान आणि डोक्यावर निळे आभाळ दिसते. अजून कोणी फिरकलेले नसते. कडेची एखादी पायवाट धरून चालू लागले की, तांबूस पाठी, पांढरी पोटे आणि त्यांवर बारीक काळे ठिपके असलेल्या मुनियाचा भलामोठा थवा भेटतो. चांगल्या शे-सव्वाशे चिमण्या असतात. गवतात चिमणचारा वेचण्याच्या नादात त्यांना पुष्कळदा माझी चाहूल लागत नाही. मी बघत असती आणि त्या चरत असतात. हळूहळू आमच्यातले अंतर कमी होत जाते. दुर्बिणीतून झोपेतले बाळ सटवाईने घाबरवावे, तशा त्या भुर्रकन घोळक्यानेच उडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एवढे एवढे ठिपके खाली-वर होताना दिसतात. जमिनीवर मुक्या राहणाऱ्या मुनिया अधांतरी होताच बोलू लागतात. बारीक घुंगरमाळांचा आवाज रुणझुणावा, तसे त्यांचे बोल कानी येतात.

थोडे पलीकडे मेंढीफार्मच्या वरच्या बाजूला कशी कोण जाणे, पण अजून थोडी झाडी राहिलेली आहे. अगदी अलीकडे भल्या सकाळी कोणीतरी बुझवलेले एक भेकर सुसाट पाळताना मी खालून पाहिले होते, ते याच ठिकाणी. इथे मुरमुटीसारखी दिसणारी बरीच झाडे आहेत. ती फुलावर असली, म्हणजे अनेक फुलचोख्या डहाळ्यांशी झोंबताना दिसतात. त्यांच्या अस्वस्थ हालचाली अगदी निवांतपणे आपल्याला बघता येतात.

या झाडीत घुसून एखाद्या बुंध्याशी उभे राहून कान दिले की, नाना आवाज येतात. बुलबुल बोलत असतात. खाटीक, ल्हाने कोतवाल, मुके राघू आणि मठ्ठपणे बसलेले कावळे दिसतात. झाडांच्या बुंध्याच्या खांबातून वाकडे-तिकडे घसरत आपण सावकाश खाली उतरू लागावे.

शेपट्या हलवीत डहाळीवर बसलेले कोतवाल दिसतात, मेंढी फार्ममधल्या मेंढ्या चरणीसाठी बाहेर केव्हा येतात आणि त्यांच्या खुरांनी उडविलेले टोळ, किडे मटकावीत आपण त्यांच्याच पाठीवर बसून फेरफटका कधी घेतो, याची वाटच ते बघत असतात.

मधेच हवेत कोलांटी मारून एखादा मुका राघू पुन्हा साळसुदासारखा डहाळीवर येऊन बसतो, तेव्हा खुशाल समजावे की, त्याने उडता पतंग मटकावला. तुम्ही कधी पाण्यावर तरंगत जाणारा घोडा बघितला आहे का? नक्षीदार पंखांचा आणि लांब करवेदार शेपटाचा? बाळपणी आम्ही हलक्या हाताने हा पकडीत असू आणि त्याच्या शेपटीला लांब दोरा बांधून त्याचा पतंग उडवीत असू. एकदा असला भलामोठा घोडा मुक्या राघूने अधांतरीच पकडला. चांगला दीड इंच लांबीचा आणि फताड्या पंखांचा. रंगाने चकचकीत गुलाबी होता. हिरव्या मुक्या राघूने आपल्या दाभण चोचीने त्याला पकडले आणि फांदीवर येऊन बसल्यावर त्याच्या ध्यानी आले- 'अरे, हा तर लहान तोंडी मोठा घास आहे.' घोडा अजून धडपडतच होता. खरे तर चिमणी आकाराच्या मुक्या राघूने त्याला सोडून मोकळे व्हावयाचे. पण नाही! त्याने जोरजोराने त्याला फांदीवर आपटून पुरे केले आणि मग मोठ्या हिमतीने गिळले. पोट टम् झाले असावे. कारण मान आत घेऊन शेपटी खालीवर करीत तो कितीतरी वेळ जागचा हलला नाही. मला तर वाटले की, आता दिवस मावळेपर्यंत यांची बेगमी झाली.

असे बघत-बघत आपण मेंढी फार्मच्या फाटकाशी पोहोचतो. 'कुत्र्यापासून सावध' अशी पाटी इथे आहे. पण अनेक वेळा सावध राहूनही मला इथे कधी कुत्रे दिसलेले नाहीत. वतन गेले नाव राहिले, असा प्रकार असावा. याच उतारावर कधी नव्हे तो एकदा मला चित्तूर तुरगताना दुरून दिसला होता. फारच चपळाईने त्याने मला झुकांडी दिली. अस्मानी उडाला की पाताळी दडला, हेसुद्धा कळले नाही.

एवढा पल्ला मारून तळाशी उतरेपर्यंत दिवस वर आलेला असतो. रोजचे व्यवहार सुरू झालेले असतात. मेंढी फार्मवरची गुरे डोंगर वेचू लागलेली असतात.. पूरग्रस्त वस्तीवरची माणसे लोटा परेडसाठी डोंगराच्या दिशेने निघालेली दिसतात. कुठे उंच खडकावर स्वच्छ हवेत जोर-बैठका मारून हेल्थ कमविणाऱ्या पोरांच्या आकृती दिसू लागतात. मग दुर्बीण डोळ्याला लावून बघावे, असा भाग आता संपला, असे समजून मी नाकासमोर बघत परतीची वाट तुडवू लागतो.

अजून माळरानच असते. ते संपून खिंड येईपर्यंत काहीबाही दिसतच असते. रानवट दयाळची जोडी एकापाठोपाठ नाचताना दिसते. भांडखोर साळुंक्या कुस्ती खेळताना दिसतात. तारेवर बसून 'किलकिल्या' ओरडलेला ऐकू येतो. कधी बालभारतीच्या आसमंतात शेपूट नाचवून ओरडणारा शिंपीही दिसतो.

पुढे मात्र माणसे भेटू लागतात. कुत्रेवाली, मफलरवाली, छत्रीवाली...
कामगार, शाळकरी पोरे, भांडीवाल्या बाया, वडार, सायकली, रिक्षा, स्कूटर्स...

आता पाहण्यासारखे काही नसते. सपाट गुळगुळीत डांबरी रस्ता.

तरतरीत शरीराने आणि उल्हसित मनाने हाती काठी फिरवीत मी घराशी पोहोचतो. गरम चहाचा पत्तिगंध !

’वनस्पतिशास्त्र किंवा तत्सम एखाद्या शास्त्रातील विशिष्ट कामात मी गुंतलेलो नाही. परंतु जगलो वाचलो, तर निसर्गाबद्दल सांगण्यासारखे मात्र माझ्यापाशी पुष्कळच असेल.' असे तो आधुनिक ऋषी थोरो म्हणाला होता. बापडा पन्नाशीच्या आतच देवाघरी गेला. माझी उमेद एवढीच आहे की, जगलो वाचलो तर निसर्गापासून थोडा अधिक आनंद मी मिळवेन आणि तो तिळगुळासारखा वाटेन!

-oOo -

पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. ५६-५९.


हे वाचले का?

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

सहकार आणि संघर्ष

दुसरी एक मजेची गोष्ट मी सारखी पाहत होतो. म्हशींच्या मागे, पुढे गायबगळे सारखे टपून होते. या थोराड जनावरांच्या चारीही पायांनी आणि त्यांच्या मुस्कटांनी गवतातून उडणारे टोळ, गवळणीसारखे कीटक, अळ्या, सरडे, उंदरं, बेडकं असं त्यांचं खाद्य फार शोधाशोध न करता आयतं त्यांना मिळत होतं. म्हशी पुढं सरकल्या की, उडण्याची तकलीफ न घेता हे पांढरेधोट बगळे वाहनात बसून मजेनं जावं, तसं त्यांच्या पाठीवर, शिंगावर बसून जात होते आणि यात काही गैर आहे, ही पाखरं आपला भलताच फायदा उठवीत आहेत, असं म्हशींना वाटत नव्हतं. पाखरांची चालण्याची शक्ती ती किती? म्हणून ते या वाहनांचा उपयोग करून घेत असावेत. हेच बगळे गेंड्याच्या भोवतीही गर्दी करून होते. हरणाच्या पाठीवर लहान साळुक्या होत्या, काळे कोतवाल होते. जनावरं खाली बसून चरत होती आणि ही लहान पाखरं त्यांच्या पाठीवर बसून होती. एखादा लठ्ठ टोळ दिसला की, तेवढ्यापुरती गिरकी घेऊन त्याला मटकावत होती आणि पुन्हा पाठीवर बसत होती. उंचावर असल्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवता येत होती. माना वेळावून ती दाही दिशांना बघू शकत होती. कुठं धोका जाणवला की, ओरडून ओरडून गेंड्यांना, हरणांना, म्हशींना इशारा देत होती. हिरव्यागार गवतातून अचानक फर्रकन तीन-चार पांढरेधोट बगळे उडत आणि जरा पुढं जाऊन बघावं, तर निळ्या पाण्यात डुंबणारा काळाधोप गेंडा दिसे! पाठीवरचे बगळे असे उडताच तो सावध होऊन उठलेला असे. ही लहान पाखरं जनावरांच्या पाठीवरूनच सफर करतात असं नाही, तर चार-पाच फूट उंचीचा बस्टार्ड पक्षी जेव्हा गवतातून चालतो, तेव्हा त्याच्या पाठीवर बसूनसुद्धा कोतवालासारखा एखादा लहानगा पक्षी आपण हत्तीवरून जावं, तसा जातो. वाहनाचा आनंद माणसानंच घ्यावा, असं थोडंच आहे!

जंगलातील दिवस

रान काढून सावज उठवण्याचं काम मोठी जनावरं करतात आणि ही पाखरं आपली शिकार साधतात. मोठी जनावरंही पाखरांचं हे अंगाखांद्यावरचं खेळणं सहन करतात. कारण जिथं शिगं, खूर, शेपूट पोहोचत नाही अशा अवघड जागी चिकटून रक्त पिणारे त्यांच्या अंगावरचे लहान लहान कीटक ही पाखरं मटकावून त्यांना सुख देतात. माझा अंदाज आहे की, लहानसहान बलुतेदार पूर्वी जसे एकएक मोठा शेतकरी, आपलं कूळ म्हणून धरून ठेवीत, तशी ही पाखरंही एकच कूळ धरून ठेवत असावीत. मैना-साळुंक्यांच्याच कुळातला एक पक्षी oxpeckers असं करतो. आफ्रिकेतल्या गेंड्याशी आणि रानम्हशी-रेड्यांशी त्याचं असं कूळ-बलुतेदाराचं नातं असतं. मोठ्या कळपांपैकी एकच जनावर तो धरून असतो. सगळा जन्म तिथंच काढतो. रेड्याच्या पाठीवरच त्याचं सगळं खाणं, मादी शोधून तिच्याशी प्रियाराधन करणं, हनिमून! जे जगाच्या पाठीवर माणसं करतात, ते सगळं तो रेड्याच्या, गेंड्याच्या पाठीवर करतो. त्याच्या पायाची नखं चांगली धारदार आणि जनावराच्या कातडीशी लटकण्याजोगी पकड असणारी असतात. तोल सावरायला उपयोगी पडेल, अशी लांब, ताठ शेपटी असते. आखूड, सपाट अशी चोच असते. तिचा कात्रीसारखा उपयोग करून तो अडचणीत शिरून बसलेल्या गोचड्या, गोमाश्या खतो आणि समोर धोका दिसला की, वारंवार ओरडून, आपल्या कुळाच्या डोक्याभोवती चकरा घेऊन त्याला सावध करतो.

कुणातरी हुशार फोटोग्राफरनं घेतलेला एक उत्तम फोटोग्राफ पाहिलेला मला आठवतो. आफ्रिकेतल्या जंगलात प्रचंड शिंगांचा आणि गलेलठ्ठ मानेचा मोठा काळवीट वाहत्या धारेत उभा राहून पाणी पितो आहे आणि त्याच्या हनुवटीला उलट लटकून दोन oxpeckers ही पाणी पिताहेत.

असं हे गुण्यागोविंदानं नांदणं असतं. वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप शांततामय सहजीवनाचे चाहते असतात. मारामारीसाठी मारामारी सहसा होत नाही. कधी होते, ती मादींच्या पायी नरानरांतच! तीही जीव घेण्याच्या इराद्याने नाही, तर फक्त मी बलिष्ठ आहे, हे सिद्ध करण्यासाठी! रक्तपात असा घडत नाही.

आणखी लठ्ठालठ्ठी होते ती हद्दी सांभाळण्यासाठी. ही भांडणं विशेष करून पाखरांत होतात. ही माझी हद्द, ही तुझी हद्द ही जिद्द पक्ष्यांत फार असते.

साध्या मैना बघा. नळावर बाया भांडतात, तशा त्वेषाने भांडतात. एकमेकींच्या अंगावर धावून जातात. लाथा झाडतात, मारतात. एकमेकींचे केस ओढतात.

मैना कशाला, साध्या घरचिमण्या भांडताना बघा! मोठं बघण्यालायक भांडण असतं. ही भांडणं हद्दीवरून होतात. खेड्यापाड्यांत शेताचा बांध रेटण्यावरून जशा हाणामार्‍या होतात, त्यापैकीच हाही प्रकार!

रानातली जनावरंही आपापल्या हद्दी ठरवून टाकतात आणि आपल्या हद्दीत दुसरा कोणी आल्याचं त्यांना मुळीच खपत नाही. कोल्हे, लांडगे, खोकड आपली हद्द जाहीर व्हावी म्हणून झाडांच्या खोडांवर, दगडांवर मुताची तुरतुरी सोडतात. गव्यासारखे दांडगे प्राणी शिंगानं झाडांच्या साली फाडून ठेवतात. आपल्या हद्दीतल्या झाडावर आपला वास ठेवण्यासाठी नरगवा आपल्याच मूत्रात लोळतो. त्या चिखलानं अंग भरवून घेऊन ते झाडाच्या बुंध्याला घासतो. आपल्याकडच्या हरणांच्या डोळ्यापाशी वासाची अशी एक ग्रंथी असते. ती ग्रंथी झाडांच्या फांद्यांना घासून ते आपला वास तिथं लावून ठेवतात. परहद्दीतल्या नरानं तो वास घ्यावा आणि समजावं की, हे रान दुसऱ्याच्या मालकीचं आहे. मग त्यानं दांडगावा करून मारामारी करावी, जय मिळवावा किंवा पराजय पत्करून माघार घ्यावी.

काही जनावरं आवाज उठवून आपली हद्द जाहीर करतात. पक्षी आवाज करतात, ते केवळ मादी धावत यावी म्हणून नव्हे; तर आपल्या हद्दीची खूण म्हणून! अर्थात बारा महिने तेरा काळ आपली हद्द सगळेच सांभाळत नाहीत. वर्षातले काही महिनेच ही बांधांची आखणी होते. एरवी कोणी कुठंही हिंडतो. हरणाच्या बाबतीत जेव्हा नर माजावर येतात, तेव्हाच माद्यांच्या कळपात शिरतात. एरवी वर्षभर माद्या- पोरं एका कळपानं आणि नर एका कळपानं असे हिंडतात. कळपानं राहणं एवढंच संरक्षण!

- oOo -

पुस्तक: जंगलातील दिवस.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती नववी.
वर्ष: २०२२.
पृ. २१-२५.


हे वाचले का?

शनिवार, १५ जुलै, २०२३

विकेंद्रीकरण: एक आकलन

प्रास्ताविक: आज १५ जुलै, गुरुवर्य कुरुंदकरांची जयंती.

माझ्या आयुष्याच्या ज्या वळणावर स्थैर्य समोर दिसते आहे, भविष्याच्या खिडकीतून पैसा, घर, संपत्ती, गाडी, उच्च पद, परदेशवारी इ. इ. साचेबद्ध जगणे समोर दिसते आहे अशा वळणावर कुरुंदकर मला सापडले. विचारांचे इंद्रिय जागे करणारे, एखाद्या मुद्द्याच्या अनेक बाजू बारकाईने तपासून त्यांचे गुण-दोष मांडणारे; अखेर त्यातील एक निवडावी लागते तेव्हा 'ती का निवडली' याचे विवेचन करतानाही त्यातील दोषांना नाकारण्याच्या दांभिकपणा न करण्याचे बजावणारे गुरुवर्य कुरुंदकर हे पहिले. त्यानंतर आणखी काही जणांची यात भर पडली तरी अग्रपूजेचा मान कुरुंदकरांचाच. त्या अर्थी माझ्या आयुष्यांत नि मोडक्यातोडक्या विचारांत त्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे.

शिवछत्रपतींप्रमाणेच अल्पायुषी ठरल्याने त्यांचे कार्य अपुरे राहिले असले, तरी मिळालेल्या आयुष्यात त्यांनी वैचारिक साहित्यात जी भर घातली ती अनमोल आहे. डावे नि उजवे यांनी - वेगवेगळ्या कारणासाठी - त्यांना दूर ठेवल्याने सुदैवाने त्यांचा देव बनला नाही. पण कुठल्याच कळपात सामील न होता आपल्या जिज्ञासेला स्वतंत्रच ठेवू पाहणार्‍या, आपल्या धडावरचे डोके वापरू इच्छिणार्‍या व्यक्तीला कुरुंदकर हे वाटाडे म्हणून नक्कीच सहाय्यभूत होतील. आज त्यांच्या स्मृतींचे स्मरण म्हणून हा एक वेचा..

---

विकेंद्रीकरणाचा आग्रहाने पुरस्कार करणाऱ्या जगातील सर्व विचारवंतांचे स्वरूप उदात्त अर्थाने धार्मिक होते. ख्रिश्चन धर्मात असणारी प्रेमाची, सेवेची, संयमाची, त्यागाची आणि साधेपणाची मोहिनी जशी युरोपीय विचारवंतांच्या मनावर होती, तशी संयमवैराग्याच्या कल्पनेची मोहिनी गांधीजींच्याही मनावर होतो. सर्वच धार्मिक विचारवंत भूतकाळात केव्हा तरी एकदा सत्ययुग होऊन गेले, असे कळत-नकळत गृहीत करीत असतात. त्या सुखमय समाधानी सत्ययुगाकडे पुन्हा एकदा जाण्याची या विचारवंतांना ओढ लागलेली असते. सर्व प्रकृतीचा जन्मदाता परमेश्वर असल्यामुळे प्राकृतिक अवस्था मनाच्या समाधानाला व नीतिमत्तेच्या उभारणीला पोषक आहे, असा यांचा ग्रह झालेला असतो.

लॉकच्या 'सामाजिक करारा'त राजसंस्थेच्या उदयापूर्वी जीवन सुखी व समाधानी गृहीतच केलेले होते. रूसोनेही प्राकृतिक अवस्थेतील जीवनात असणारे स्वाभाविक सुख व समाधान गृहीत केलेले होते. हे एका प्राकृतिक अवस्थेचे आकर्षक रंग मनामध्ये आकार धारण करू लागले, म्हणजे यांत्रिक सुधारणेला दूर असणारे खेडे आकर्षक वाटू लागते. ग्रामीण जीवनात वास्तविकतः नसलेला पण यांच्या कल्पनेने रंगविलेला साधेपणा, भोळेपणा, प्रेमळपणा त्यांना साद घालीत असतो. जे जीवन प्रकृतीला जितके जवळ असेल, तितके ते भौतिक संस्कृतीला, तसेच मानसिक संस्कृतीला दूर असेल. प्राकृतिक जीवनात प्रेरणा आणि वासना बलवान असल्यामुळे स्वार्थ व आक्रमण अधिक निर्भयपणे आविष्कृत होत असेल, यांची या मनाला कल्पनाही सहन होत नाही. ग्रामीण भागात अनेकदा सामूहिक रीया पूर्वनियोजित सार्वजनिक खून होतात, हे सत्य मान्य करण्याची या मनाची तयारी नसते.

जागर

माणूस हा मूलतः चांगला आहे, तो मूलतः नीतिमान व सद्गुणी आहे, ही गांधीजींच्या विचारातील आनुषंगिक कल्पना नाही. 'मूलतः सद्गुणी' ही भाषाशैली अधिक प्राकृतिक म्हणजे अधिक चांगुलपणा असणारी, अधिक नैतिक या गृहीताचा आविष्कार असते. येथून तेथून सर्वांचा आत्मा एक असून अज्ञानाचे कवच फोडले, की मूळ गाभा सच्चिदानंदरूप आहे, हे आत्म्याचे धार्मिक तत्त्वज्ञान एक वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य करावे. म्हणजे मग माणसाचे मूलभूत चांगलेपण एक वादरहित सिद्धान्त वाटू लागते, आणि मग प्रकृतीकडे अधिक जवळ सरकण्याची कल्पना समर्थनीय होते. लॉक, रूसो यांनी कल्पिलेले 'करारा’पूर्वीचे जीवन आणि गांधीजींच्या कल्पनेतले रामराज्य दोहोंचेही स्वरूप राजकारणातल्या रोमँटिसिझमचे आहे. कवितेतल्या रोमँटिसिझमचीही रूसोतच जन्मभूमी होती.

गांधीजींच्या अनुयायांचे नेहमीच दोन गट राहिले. एक गट काँग्रेस पक्षाच्या राजकारणात अग्रभागी होता. याही गटाने विकेंद्रीकरणाच्या कल्पनेला तोंडाने सतत होकार भरला. पण या मंडळींना विकेंद्रीकरणाची कल्पना मनातून कधीच पटलेली नव्हती. युरोपच्या समाजजीवनाच्या अभ्यासामुळे केंद्रीकरणाचे धोके या मंडळींना दिसत होते. पण मनातून कुठेतरी केंद्रीकरणाच्या गरजाही जाणवत होत्या. भांडवलदारांना प्रचंड उत्पादन करून प्रचंड नफा मिळवायचा असतो, हा भाग खोटा नव्हे. विज्ञान नवनवी विकसित यंत्रे अस्तित्वात आणते, हेही खोटे नव्हे. पण या दोन्ही बाबी एकत्र आल्या, तरी केंद्रीकरण समाजीवनात साकार होऊ शकत नाही.

मार्क्सने कितीही जरी सांगितले, तरी Surplus (सरप्लसची ) निर्मिती उत्पादनप्रक्रियेत नसते, ती उत्पादनाच्या जोडीला चालू असणाऱ्या खपाच्या प्रक्रियतेही असते. भांडवलदार प्रचंड उत्पादन करून प्रचंड नफा मिळविण्याची जिद्द मनात धरू शकतो. कारण हे उत्पादन खपणार आहे, याची त्याला खात्री असते. खपाची हमी- वेगळ्या शब्दांनी सांगायचे, तर बाजारात असणारी मालाची मागणी- केंद्रीकरणाचा खरा आधार असते. अशी मागणी नसती, तर वैज्ञानिक शोध प्रयोगशाळेत शुद्धज्ञान म्हणून पडून राहिले असते. उत्पादनाला बाजारात मागणी असते. कारण अधिक उत्पादन ही समाजाची गरज असते. सामाजिक गरजेच्या पोटी अर्थव्यस्था केंद्रित होत जाते, आणि ही गरज सर्वच समाजात असते. मागासलेल्या समाजात ज्या वेळी पहिल्यांदा हक्क प्राप्त होऊ लागतात, त्या वेळी मागणीचे स्वरूप नेहमीच वाढलेले असते.

आधुनिकीकरणाशिवाय देश संघटित व केंद्रित करता येणार नाही. देश संघटित आणि केंद्रित करायचा असेल, तर उत्पादनव्यवस्थेचे केंद्रीकरण टळणार नाही, हेही या जाणत्या नेत्यांना दिसत होते. युरोपमध्येही राष्ट्रवादाच्या जाणिवा आणि केंद्रीकरणाच्या जाणिवा हातात हात घालून वाढले्ल्या दिसतात. लक्षावधी चौरस मैल अस्ताव्यस्त पसरलेला एखादा भूप्रदेश एकराष्ट्रीयत्वाच्या जाणिवेने केंद्रित करायचा असेल, राष्ट्र म्हणून संघटित व्हायचे असेल, तर केंद्रीकरण वाढले पाहिजे. आधुनिक उत्पादनही वाढले पाहिजे. ही गरज सर्वांना दिसत होती. प्राचीन भारताच्या इतिहासात भारतीय समाजाचा फुटीरपणा, विस्कळितपणा हाच ठिकठिकाणी पराभवाला कारणीभूत झालेला आहे. विकेंद्रीकरणामुळे जीवनातला विस्कळितपणा वाटतो, फुटीरपणा वाढतो. हे घट्ट देण्यास कोणत्याच जागरूक नेत्याची तयारी नव्हती. आणि केंद्रीकरणामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा जो संकोच होतो, तोही या नेत्यांना नको होता. या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल, या दृष्टीने काँग्रेसपक्षाच्‍या राजकारणात अग्रभागी असणान्या मंडळींनी सदैव प्रयत्न केला. इतिहासात नडलेला फुटीरपणा नको, आपण बलवान संघटित राष्ट्र झाले पाहिजे, पण केंद्रीकरणातील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच- म्हणजे नवी गुलामी - नको, ही विचार करण्याची दिशा तेव्हाही बरोबर होती, आजही बरोबर आहे, असे मला वाटते.

गांधीजींच्या अनुयायांचा दुसरा गट पूर्णपणे मनाने गांधीजींशी समरस झालेला असा होता. राजकीय वस्तुस्थितीचे आकलन या गटाला कधीच झाले नाही, याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही. कारण ही मंडळी एका स्वप्नातच जगणारी होती. अजूनही त्याच स्वप्नरंजन संपलेले नाही. काव्यात काय, अगर राजकारणात काय, रोमँटिक मंडळींचा एक गट असतोच. संस्कृतीच्या ध्येयजीवनात रोमँटिसिझमचे महत्व अमान्य करून चालणार नाही. प्रेरक ध्येयवाद, चोखंदळ सौदर्यदृष्टी, व्यक्तीचे हक्क, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा उद्घोष व पुरस्कार रोमँटिसिझम नेहमीच करीत असतो. ते त्याचे एक सामर्थ्यस्थान आहे. या सामर्थ्यस्थानाबरोबर त्याच्या काही मर्यादा आहेत. राजकीय तत्त्वज्ञान व्यवहार्य आणि शक्य असावे लागते; नसता त्या तत्त्वज्ञानाला व्यवस्थित कार्यक्रमच प्राप्त होत नाही, हे रोमँटिक मंडळींना समजावून सांगणे फार कठीण आहे. सार्वजनिक जीवनात निर्भेळ विकेंद्रीकरण हक्कांची जागृती झाल्यानंतर शक्य नसते. समाज विविध उत्पादनाची वाढ मागत असताना त्यातून केंद्रीकरण अटळ असते, व फुटीरपणा, विस्कळितपणा राष्ट्र म्हणून अस्तित्वाला हानिकारक असतो, हे या स्वप्नाळूंना कुणीही झाले, तरी समजावून कसे सांगणार? जेथे भूदानाची चळवळ ही चिनी आक्रमणाविरुद्ध भारताच्या संरक्षणाची सर्वात मोठी व्यवस्था आहे, या ठिकाणापासून विचार मांडण्यास आरंभ होतो, तेथे वस्तुवाद बोलून काय उपयोग ?

केंद्रीकरणातील धोके सर्वाच्याच डोळ्यांसमोर उघड होते. विकेंद्रीकरणाची कल्पना स्वयंसिद्ध व निर्भेळ चांगली, असे समजून तिचा खोटा जयघोष करणे कुणालाही इष्ट नसले, तरी संपत्तीचे केंद्रीकरण अनंतकाळ चालू ठेवणे, तसे ठेवता येणे शक्य नसते. ९९ टक्के जनतेला सातत्याने दरिद्री ठेवावे, व एक टक्काही नसणार्‍या काही मूठभरांच्या हाती सर्वांची पिळवणूक करण्याच हक्क कायमचा द्यावा, ही कल्पना हितसंबंध गुंतलेल्यांच्याखेरीज इतर कुणी मान्य करणे शक्य नव्हते. आशिया-अफ्रिकेत राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा नुसता स्वातंत्र्याचा प्रश्न नाही, तो भाकरीचाही प्रश्न आहेच, असे पं. नेहरू वारंवार म्हणतच असत. स्वातंत्र्यलढ्याच्याच काळात राष्ट्रीय स्वातंत्र्याला समाजवादी आशय देण्याची प्रक्रिया चालत आलेली होती. पण हा झाला ध्येयवादाचा भाग. जे देशाला स्वातंत्र्य मिळवू निघाले होते, त्यांच्यासमोर देश या नावाची कोणतीही केवळ अमूर्त कल्पना नव्हती, तर देशाच्या स्वातंत्र्यात सर्व हाडामाणसांच्या स्वातंत्र्याचा आशय गृहीतच होता.

पण ध्येयवादाला वास्तवाच्या गतिसूत्राची अजून एक बाजू आहे. अर्थशास्त्रदृष्टयाच पिळणुकीवर आधारलेली समाजरचना एका मर्यादेनंतर रुद्धगती होत असते. एकीकडे कारखाने वाढतात, आणि प्रचंड संपत्ती काही जणांच्या हातात केंद्रित होते. दुसरीकडे प्रचंड मानवसमूह दरिद्री व उद्ध्वस्त होतो. सर्व समाजाचे शोषक व शोषित या दोन गटांत विभाजन होते, असे आपण म्हणतो. मध्यमवर्ग ही संक्रमणकाळाची निर्मिती असून तो मावळत जातो, व आर्थिक संघर्ष निर्णायक अवस्थेला येऊन पोहोचतो, ही सर्वच समाजवाद्यांची एक लाडकी कल्पना आहे. पण प्रत्यक्षात असे कधी घडू शकत नाही. संपत्तीचे केंद्रीकरण होण्यासाठीसुद्धा उत्पादनाची विक्री व्हावी लागत असते. भांडवलशाही समाजाच्या आरंभावस्थेत एकीकडे संपत्ती वाटते, तर दुसरीकडे दारिद्र्य वाढते, ही गोष्ट खरी आहे. पण कोणत्याही अर्थव्यवस्थेत हे शाश्वत काळ टिकणार सत्य असू शकत नाही. कारण काही काळानंतर दारिद्र्याच्या विकासाबरोबर समाजाच्या क्रयशक्तीच र्‍हास होऊ लागतो व र्‍हास मंदीच्या फटक्याच्या रूपाने दिसू लागतो. म्हणून भांडवलशाही समाजव्यवस्थेलासुद्धा दुसर्‍या टप्प्यात स्वतःवर काही बंधने लादून घ्यावी लागतात. जनतेच्या क्रयशक्तीचा विकास करण्याची जबाबदारी स्वतः जगण्यासाठी म्हणून का होईना, पण भांडवलशाहीला घ्यावीच लागते.

- oOo -

पुस्तक: जागर.
लेखक: नरहर कुरुंदकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती तिसरी.
वर्ष: १९९४.
पृ. ९५-९९.

या वेच्यामध्ये मी लहानसा बदल केला आहे. यात दोन ते तीन दीर्घ परिच्छेद होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदांचे मी दोन-तीन लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


हे वाचले का?

सोमवार, १० जुलै, २०२३

पिकासोचे घुबड

जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो ह्यालाही असा शिकारखाना पाळण्याची हौस होती. त्याच्याकडे पिवळ्या रंजन रंगाचे, कुलूकुलू बोलणारे कनारी पक्षी होते. कबुतरे होती. ‘टुर्टलडव्हज्' जातीची पाखरे होती. आपल्या मित्रांच्या हेतूबद्दल पाब्लोला जसा संशय असे, तसा या मित्रांबद्दल नसे.

डोहातील सावल्या

म्युझियममधल्या कोपऱ्यात सापडलेले एक जखमी घुबड त्याला कोणा मित्राने आणून दिले. ह्या घुबडाचा एक पंजा दुखावलेला होता. काही दिवस मलमपट्टी केल्यावर तो बरा झाला. मग या घुबडासाठी सुरेख पिंजरा आणून इतर पक्ष्यांबरोबर पाब्लोने त्यालाही पाळले.

घरातली सगळी माणसे ह्या दिवाभीताशी प्रेमाने वागत. येता-जाता त्याच्या पिंजर्‍याशी जाऊन बोलत. पण घुबड फार माणूसघाणे होते. ते सर्वांकडे रखारखा बघत असे. सगळे पाळीव पक्षी स्वयंपाकघरात होते. पाब्लो किंवा फ्रान्सवाद (विकासची तरुण मैत्रीण) की कोणी स्वयंपाकघरात गेले की, कनारी चिवचिवाट करत, कबुतरे घुमू लागत, टुर्टलडव्हज् हसू लागत; पण हे घुबड मात्र ढम्म बसून असे. कधी त्याचा आवाज उमटलाच, तर गुरगुरणे असे.

ह्या माणूसघाण्या घुबडाच्या अंगाला फार घाण येई. उंदराशिवाय ते कशालाही चोच लावीत नसे. पाब्लोच्या स्टुडिओत पुष्कळ उंदीर घुडगूस घालीत. बिचारी फ्रान्सवाद रोज अनेक सापळे स्टुडिओत लावून ठेवी आणि उंदीर सापडला रे सापडला की, ह्या उर्मट घुबडाला आणून घाली. आता कोणताही प्राणी - अगदी प्राणिसंग्रहालयातील वाघसुद्धा खाद्य पुढ्यात आले की त्याच्यावर लगेच तुटून पडतो. पण हे घुबड खाद्याकडे आणि ते आणून घालणार्‍या फ्रान्सवादकडेही संपूर्ण दुर्लक्ष करी.

घुबडाला दिवसा दिसत नाही, असा एक समज आहे. पण तो काही खरा नाही. ह्या घुबडाला छान दिसत असे. पण दिसून न दिसल्यासारखे दाखविण्यातच त्याला प्रौढी वाटे. फ्रान्सवाद जरा कुठे स्वयंपाकघराबाहेर गेली रे गेली की, दरम्यानच्या काळात घुबडाला घातलेला उंदीर नाहीसा होई.

काही तासांनंतर केसाची लहानशी गुठळी घुबडच बाहेर टाकी; ती पाहून समजावे की, उंदराचे काय झाले.

पाब्लोला बघून घुबड गुरगुरले की, हा साठ वर्षे उलटून गेलेला जगप्रसिद्ध चित्रकार त्याला उलट चार इरसाल शिव्या मोजी. का, तर हा आपल्यापेक्षा वरचढ आहे. हे घुबडाला कळावे. आपण एक असभ्य झालो तर हा दहा होईल, याची खात्री त्याला पटावी. अशा शिव्या मोजल्यानंतर पिकासो आपले बोट बळेच घुबडापुढे धरी. घुबड चावा घेई. पण चित्रकाराची बोटे चांगली टणक होती, त्यांना इजा होत नसे.

पुढे काही दिवसांनी घुबडाने चावणे सोडून दिले. पाब्लोने त्याच्या डोक्यावर खाजवले, तरी ते गप्प राहू लागले. बोट पुढे केले की, चावण्याऐवजी त्याच्यावर बसू लागले.

या घुबडाचे एक सुरेख शिल्प पिकासोने केले. हे नुसते घुबडाचे शिल्प नाही, तर ’त्याच’ घुबडाचे आहे.

कबुतरे घुमायची, पण टुर्टलडव्हज् खरेच हसायची, राखी, फिक्कट गुलाबी रंगाची ही लहान पाखरे होती.

पाब्लो आणि फ्रान्सवाद स्वयंपाकघरात जेवणाच्या टेबलावर येऊन बसली की, बऱ्याच वेळा पाब्लोला लहर यायची. एखाद्या फिलॉसॉफरसारखे त्याचे स्वगत भाषण सुरू व्हायचे. मग ही पाखरे मालकाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत राहत. बोलता-बोलता पिकासो मुद्द्यावर आला की, ही टुर्टलडव्हज् एकदम फिदीफिदी हसणे सुरू करीत.

पिकासो म्हणे, “ही पाखरे तत्त्ववेत्त्याच्या कामाची आहेत. मनुष्यप्राण्याच्या सगळ्या वचनांना एक मूर्खपणाची बाजू पण असते. माझं सुदैव म्हणून ही पाखरं इथं आहेत. ज्या-ज्या वेळी आपण फार विद्वत्तापूर्वक बोललो असा गर्व मला होतो, तेव्हा ही माझी टर उडवतात आणि गर्वहरण करतात."

-oOo -

पुस्तक: डोहातील सावल्या.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२०.
पृ. ३७-३९.


हे वाचले का?

बुधवार, २८ जून, २०२३

None was worth my strife...

पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून जावा, तसाच हा प्रकार आहे. पण या प्रक्रियेत माझ्या बाबतीत एक गंमत नेहमीच घडून आली आहे. वस्तू व व्यक्तीच्या संबंधाचा जिथे नेमका व अटळ शेवट होतो तिथूनच माझ्या मनाला पालवी फुटू लागते! मग मानसिक संयोजनात मोठे चढउतार निर्माण होतात. त्याला इलाज नसतो. एकवेळ खूप चतुराई वगैरे दाखवून दुसऱ्यांनी रुजवलेली मुळे काढणे सोपे आहे. पण आपल्या आत्मभोगाच्या पाताळात उगवणारी ही सृष्टी नाहीशी करणे कठीण आहे !

चर्चबेल

अशा वेळी मी पाईप ओढत बसतो. मायक्रोपोलो, थ्री नन्स, विल्स, किंवा हेन्री प्रिन्सचा तंबाखू, माझ्या डोळ्यांसमोर असलेल्या दाट चिंचेच्या झाडाकडे निघून जातो, दुसऱ्या धुराच्या फेरीत त्या झाडाच्या गर्द निळाईचे तरंग माझ्याकडे परत येतात. दोन्हीही धुरांच्या निळसर लाटा सगळ्या खोलीभर पसरतात, आणि त्यावर तरंगणारे एक पावसाळी रेस्टॉरन्ट मला दिसू लागते. धुराच्या मादक लाटांवर त्याला अधांतरी तरंगते पाहणे, ही बाहेरच्या जगाचा आधार नसल्याची जाणीव मला फार प्रिय आहे ! रेस्टॉरन्टच्या काचांवर ओघळणाऱ्या पावसातून जळत्या मेणाप्रमाणे गळणारे माणसांचे चेहरे, त्यांच्या हालचाली माझ्यापासून खूप जवळ असूनही तितक्याच दूर असतात. ही सगळी पाईपची किमया, की माझ्या सुप्त मनाचे दर्शन याचा मला बोध होत नाही.

अशाच एका रेस्टॉरन्टमध्ये मी त्याला पाहिले. त्याचे नाव मला ठाऊक नाही, त्याचे गाव मला ज्ञात नाही. रोज संध्याकाळी रेस्टॉरन्टमध्ये तो नेमाने यायचा. पावसाळी संध्याकाळ त्याला कदाचित खूप भावत असावी! टेबलावर पत्ते पसरून तो रमीचा डाव मांडायचा. तोंडात इटालियन पाईप. नसलेल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी तो बोलायचा, त्याच्याशी उच्छाद मांडताना कधी कधी त्याच्या समोरची काळीभोर कॉफीही निवून जाई. काळोखाला झिडकारून उजव्या अंगाला कलणाऱ्या आल्प्सच्या बर्फशिखराप्रमाणे त्याचे डोळे हसायचे. डावाची एक लय साधून समेवर येताच, मोठ्याने एका इंग्रजी कवितेच्या ओळी तो म्हणायचा; आणि तावदानावर वितळून गोटलेले पावसाचे मेण आपल्या हाताने पुन टाकायचा ! रोजच्या सरावाने एकदा त्या ओळी माझ्या हातात आल्या-

I strove with none for none was worth my strife,
Nature I loved and next to nature Art.
I warmed both hands before the fire of life,
It sinks and I am ready to depart.

त्या ओळींनी तात्काळ माझा ताबा घेतला; पॉलग्रेव्हच्या गोल्डन ट्रेझरीत कर्त्याचे नावही सापडले. डब्ल्यू. एस. लँडोर! एनसायक्लोपीडियात त्याच्या विषयीची माहिती मिळाली. अतिशय मनस्वी व्यक्तित्वाचा हा मनुष्य होता. शाळा-कॉलेजातून अनुचित वर्तनाबद्दल काढून टाकल्याची माहितीही तिथे होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी अपेक्षा बाळगणाऱ्या अधिकार्‍यांनी त्याला परत येऊ देण्याची सवलतही देऊ केली होती; ती मात्र त्याने उद्दामपणाने झिडकारून लावली होती. लँडोरचे इंग्रजी वाङ्मयातील कर्तृत्व प्रसिद्धच आहे. मी झपाटून गेलो होतो, तो कवितेमागील उद्दाम आशयाच्या दिव्य स्पर्शाने ! आशयाचे असे दिव्य स्पर्श सगळ्याच व्यक्तित्वांच्या कुंडलीत जमून येत नाहीत; चंद्रजान्हवीचा स्वामी एखादा ज्ञानेश्वर, भगव्या उदासीचा एखादा रामदास, मूरलँडसच्या ओसाडीत शिल्पबद्ध झालेली एखादी एमिटी ब्राँटे...

मी जगात कोणाशीही भांडलो नाही; तसा प्राणसखा शत्रू मला सापडलाच नाही. निसर्ग व कला यांच्यावर मी प्रेम केले... जीवनाच्या शेकोटीवर हातांना उब मिळविली. शेकोटी विझते आहे आणि आता निघावयास मी सिद्ध आहे... शब्दांतून व्यक्त होणाऱ्या या सरळ अर्थाच्या पलीकडेच मला खरा अर्थ दिसू लागला. पावसाळी रेस्टॉरन्टमध्ये स्वतःलाच प्रतिस्पर्धी करून डाव मांडणारा तो पाईपवाला तर लँडोर नसेल ना ? अशीही कल्पना चाटून गेली. पाईपवाल्याच्या व लँडोरच्या काळात शंभर वर्षांची खिंड उभी होती. पण तसे नसावेच. अँडोरची कविता गुणगुणताना भिंगुरटीप्रमाणे तो स्वतः लँडोर झाला असावा! आणि लँडोर आता, देहातून गेहात, गेहातून विश्वात पसरला असावा !

हृदयस्थ प्रदेशाचे आकाश हाताशी लागले की, आपोआपच जगातील बाह्य संघर्षाची ठिकाणे कोसळून पडतात. संघर्ष व लढाईतील पहिले व शेवटचे प्रतिस्पर्धी आपणच आहोत हे कळून येते. स्वतःला जिंकल्यावर मग कुणाला जिंकायचे ? संतानी हेच अचूक हेरले होते. पण ही लढाई साधी नाही-

किंबहुना पांडवा
हा अग्निप्रवेशु नित नवा
भ्रातारेविण करावा
तो हा योगु

अंतर्दृष्टीचे खरेखुरे चैतन्य लहरू लागल्यावर त्याला समांतर जाणारी कला व निसर्ग आपले सांगाती होऊन जातात. जाणे-येणे ही केवळ उपाधी ठरते. येताना आवाज होत असला तरी जाताना साज झिडकारून देण्याची शक्ती प्राप्त होते ! लँडोरने हा पायासारखा प्राणवेधी आशय नेमका चिमटीत पकडला आहे. असे काही गवसले म्हणजे एखादा सार्त्र अवघड्से नोबेल पारितोषिकही मोठ्या सहजतेने नाकारून जातो !

आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभचिंतन करावयास आलेल्या मित्रांना उद्देशून लँडोरने ही कविता म्हटली. मित्रांना त्याच्या मनस्वी औद्धत्याचे मोठे वैषम्य वाटले असेल! माझ्या पाईपच्या धुरावर तरंगणारे ते पावसाळी रेस्टॉरन्ट व माझ्या मनाला अनाहूतपणे फुटणारी पालवी मात्र इतःपर माझ्या तक्रारीचा विषय राहिली नाही.

-oOo-

पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ७९-८२.


हे स्फुट पुस्तकामध्ये 'डब्ल्यू. एस्. लँडोरची कविता' या शीर्षकाने समाविष्ट केलेले आहे.

हे वाचले का?

रविवार, १८ जून, २०२३

वाळूचा किल्ला

गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती...

समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ?

गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या-

'ने मजसी ने परत मायभूमीला
सागरा, प्राण तळमळला. '

एवढ्यात चिमुकला, गोड आवाज आला, "अहो- "

"का हो?"

"जरा लक्ष ठेवा हं, माझ्या किल्ल्याकडं."

"का? तुम्ही कुठं निघालात किल्ला सोडून?"

त्या तिकडे हात वर करून ती म्हणाली, "मी जरा तिकडे जाऊन येणार आहे.' "

"बरं, लवकर या."

"आले लगेच." असे म्हणून ती चिमुरडी पोर केस उडवीत पळालीसुद्धा. नाव विचारण्यापुरता वेळही तिने मला दिला नाही.

वाळूचा किल्ला

जवळ जाऊन मी तिचा किल्ला पाहिला. सुरेख बांधला होता. चोहोबाजूला चार बुरूज होते. चौफेर भक्कम तट होता. पायऱ्या होत्या, दरवाजे होते. चौफेर खंदक होता आणि त्यात पाणीसुद्धा आणून ओतलेले होते. माझ्यासारख्याने केअरटेकर व्हावे, अशी ही वास्तू होती खरी.

माझ्या मनात आले की, आम्ही वयाने एवढे होतो तेव्हा ओढ्याच्या ओल्या वाळूत पायावर चिमणीची ओबडधोबड कोटी करायला शिकलो होतो. एवढा नीटनेटका किल्ला कोणी आम्हाला कधी शिकवला नाही. किल्ला कधी पाहिलाच नव्हता; पाहिली होती ती चिमणीची कोटीच.

अगदी किल्ल्याशेजारीच ठाण मांडून बसणे बरे दिसणार नाही, म्हणून थोडे अंतर ठेवून बसलो.

खऱ्या-खऱ्या वास्तूचे रक्षण करायचे म्हणजे चोराचिलटांकडून, उगाचच तावदानावर दगड फेकणाऱ्या विध्वंसक पोरांकडून किंवा वादळ, पाऊस, आग ह्यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून. वाळूतच पाया खोदून वाळूने बांधलेल्या ह्या लुटीपुटीच्या वास्तूला मुद्दाम धोका द्यायला येणार कोण, आणि तिचे संरक्षण म्हणजे जोखीम ती काय?

पण, नाही म्हटले तरी जोखीम होतीच.

आत्ता जाऊन येते, म्हणून सांगून गेलेल्या मालकीणबाई परत येऊन एकवार त्यांच्या हाती हा किल्ला सुपूर्द केला की मी सुटलो !

तेवढ्यात कुणाचे तरी भले मोठे कुत्रे धावत आले. एकाएकी थांबले. किल्ल्याजवळ गेले. नाक खाली करून त्याने वास घेतला आणि इकडे-तिकडे बघितले. काही तरी कुकर्म करून, ह्या गोंडस वास्तूला कमीपणा द्यायचा त्याचा इरादा मला स्पष्ट दिसला.

आजूबाजूला दगडधोंडा नव्हताच. मी नुसताच हात उगारला आणि "हां..." म्हणून दरडावणी दिली.

कुत्रे लटकन हलले आणि तोंड फिरवून पुन्हा धुम पळाले.

एक संकट टळले. मी उठून जाऊन किल्ल्याच्या अगदी शेजारी जाऊन बसलो.

मग ध्यानात आले की, खंदकातले पाणी आटून गेले आहे. म्हणजे तिच्या हातात होती तसली रंगीबेरंगी बादली घेऊन पाणी आणणे आले. ते ओतून खंदक भरणे आले. आता बादली कुठून पैदा करावी बरे?

बीचवर दुकान होतेच. म्हटले, एक विकतच घेऊन टाकावी. अर्थात तिची होती त्यापेक्षा लहान. नाहीपेक्षा अपमान केल्यासारखे व्हायचे.

बादली घेऊन टिटवीसारखा समुद्राकडे गेलो. एक डोळा किल्ल्याकडे होताच. जवळपास कोणी नाही, हे बघून ते कुत्रे पुन्हा यायचे. बादली भरून घेऊन आलो आणि सगळा खंदक नीट पाण्याने भरला. ह्या उलाढालीत शर्टाच्या वरच्या खिशातले सिगारेटचे पाकीट खंदकात पडले. सिगारेटी थोड्याफार भिजल्या.

त्या पाकिटातून काढून वाळूवर अंथरल्या आणि ते वाळवण अन् किल्ला राखीत स्वस्थ बसून राहिलो.

आत्ता तिकडे जाऊन येते, म्हणून मालकीणबाई कुठे गुंतल्या होत्या, कुणाला ठाऊक!

आता सूर्याचा तांबडा गोळा पाण्याच्या रेषेवर अगदी वावभर अंतरावर आला होता. दोघे-चौघे कोळी लांबडे जाळे घेऊन समोरच मासे झोळीत होते. जाळे ओढून ते किनाऱ्यावरच्या वाळूत आले. त्यांनी जाळे झाडले. रुपेरी पोटे दाखवीत मासे तडफडू लागले आणि मंडईत ताजी भाजी न्यायला यावे तशी समुद्राकाठी मासे न्यायला आलेल्या गिऱ्हाइकांची, बघ्यांची, मुलांची गर्दी कोळ्यांभावती झाली. आपणही उठून जावे आणि मासे कसले, केवढे आहेत, हे पाहावे- असे मला वाटले. पण किल्ल्यापासून दूर जाणे धोक्याचे होते.

आणखी काही वेळ गेला.

हळूहळू भरती येते आहे, हे माझ्या ध्यानात आले. बापरे! म्हणजे हा किल्ला आता पाण्याखाली जाणार. छे-छे; असे होऊन उपयोगी नाही. काय बरे करावे?

वर किनाऱ्यापाशी असलेल्या तात्पुरत्या हॉटेलापुढे मोकळ्या खोक्यांचा ढीग पाहिल्याचे आठवले. धावत गेलो आणि एक खोके उचलून आणले. दुसरे आणले, तिसरे आणले. वाळूतच जरा पाया घेऊन ह्या खोक्यांची भिंत करून किल्ल्याला आडोसा केला.

फेसाळ पाणी आता अगदी जवळ आले होते. मालकीणबाईंचा अजूनही पत्ता नव्हता. तेवढ्यात हॉटेलातला झिप्रा पोरगा लुंगी सावरीत आलाच.

“काय हो, खोकी आणताय उचलून- काय विचारायची पद्धत आहे की नाही? फुकटचा माल नाही तो ! "

मी खिशातून पाकीट काढीत विचारले, "हा माल मी विकत घेतला, असं समजा. काय किंमत आहे एका खोक्याची ?"

पोरगा गडबडला.

“विक्रीची नाहीत ती. माल आणण्यासाठी लागतात हरघडी. पणजीहून माल आणावा लागतो. उपयोगाची आहेत ती आमच्या!”

"मीही ती उपयोगातच आणतोय!"

माझ्या थंडपणामुळे पोरगा आवेश सोडून खाली उतरला.

त्याने किल्ल्याकडे, पाण्याकडे बघितले. त्याचा चेहरा हसरा झाला. भरतीच्या पाण्यापासून किल्ला वाचवण्यासाठी माझी धडपड चालू आहे, हे त्याच्या ध्यानी आले. म्हणाला, “बरं. काम झालं म्हणजे जागच्या जागी आणून ठेवा!"

"अगदी अवश्य. बिनघोरी राहा तुम्ही.'

पाणी सारखे पुढे-पुढे येत होते आणि ह्या बाईसाहेबांचा पत्ता नव्हता. जाऊन येते म्हणून आपले आई-वडील बसले असतील तिकडं गेल्या असतील आणि कदाचित तिकडेच रमल्या असतील.

हातावर वळलेली सिगारेट ओठांत ठेवून कोणी भटक्या माणूस हिंडत-फिरत आला आणि किल्ल्यापाशी येऊन बघत उभा राहिला.

त्याने मला विचारले, “तू बांधलास?”

"नाही, लहान मुलीनं. मला येत नाही."

"सवय लागते.'

मी उत्सुकतेने विचारलं, “तुला येईल का बांधता ?”

"हां, ह्याच्यापेक्षा फसकलास बांधीन."

"मग मला एक बांधून दे, त्या तिकडे. पाणी तिथं येणार नाही ना?"

"नाही यायचं. चल, बांधतो."

हाताच्या बाह्या सावरून भटक्या तयार झाला. भरतीचे पाणी पोचणार नाही, अशा ठिकाणी बसून कामाला लागला. एखाद्या धंदेवाइकासारखा त्याचा हात चालला होता.

किनाऱ्यावर बरीच मुले हुंदडत होती; पण किल्ल्याच्या मालकिणीचा पत्ता नव्हता. बहुधा ती कोका-कोला किंवा आइस्क्रीम खाण्यात दंग असावी. खोक्याची भिंत काही वेळ किल्ला वाचवू शकली, पण अखेरीला किल्ला पाण्याखाली गेलाच. ती तिन्हीही खोकी मी मालकाकडे पोचवून आलो.

दरम्यान, भटक्याने किल्ला पुरा केला होता. सिगारेट वळण्यासाठी तळहातावर तंबाकू अंथरीत तो रुबाबात बोलला, "बघ बरं, तुझ्या मनासारखा झाला का ?"

"झकास झालाय."

त्याचे आभार मानून मी एक रुपयाची नोट काढून देऊ लागलो. तो म्हणाला, “छ्या! माझ्या पोरानं सांगितलं असतं, तर दिला नसता का बांधून? ठेव पैसे." आणि उलट मला सलाम करून तो निघून गेला.

मी वाट पाहत राहिलो. आता दिवस मावळला होता. हळूहळू किनारा रिकामा होत होता. ही पोर आपल्या आई-बापाबरोबर घरी निघूनही गेली असावी. आपण वाळूचा किल्ला बांधलाय आणि त्याच्या देखभालीसाठी कुणाला तरी बसवून आलोय, ही गोष्ट विसरूनही गेली असेल.

मुलांचे कसे असते, ते आपल्याला ठाऊक नाही का?

ते मघाचेच का आणखी कुठले कोण जाणे, कुत्रे पुन्हा आले आणि किल्ल्याचा वास घेऊन काही कुकर्म न करता निघून गेले. मी त्रयस्थासारखा पाहत होतो.

कुत्र्यामागोमाग लहान मुलांचे एक टोळके आले. किल्ल्याभोवती उभे राहिले. त्यांनी किल्ला नीट पाहिला.

मग ‘होऽ' करून एक पोर किल्ल्यावर नाचले. तशी सगळीच पोरे नाचली. त्यांनी किल्ल्याची नामोनिशाणीसुद्धा ठेवली नाही. आरडाओरडा करीत पोरे पळाली. मी उदासीनच राहिलो.

बघता-बघता अंधार झाला.

किनाऱ्यावर अगदी तुरळक माणसे राहिली.

ती रंगीत बादली हलवीत मी मुक्कामाकडे परतलो.

-oOo-

पुस्तक: वाळूचा किल्ला
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती तिसरी, चौथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. १-५.

---


हे वाचले का?

सोमवार, १२ जून, २०२३

स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

तो बाहेर पडून चालू लागला तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारली व थांबवले. एका घराच्या कट्टयावरून एक माणूस उतरला व त्याच्याकडे आला. त्याने किंचित आश्चर्याने पाहिले व लगेच त्याला ओळख पटली. तो माणूस. मघाचा व्यापारी होता.

"मी तुझीच वाट पाहत थांबलो होतो, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, नाही ?" व्यापारी म्हणाला. त्याच्या आवाजात रेशमी कापडाच्या घडीचा मृदुपणा होता. त्याच्या बरोबर चालू लागता त्याने हात मागे एकमेकात अडकवले व तो म्हणाला, "तूही एक प्रवासी आहेस, तू कोठेही जायला मोकळा आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलायला थांबलो होतो. जर तू पायमोकळा आहेस, तर तू एखादे काम स्वीकारशील ? त्यात तुम्हा भरपूर द्रव्य मिळेल, अनेक शहरे पाहता येतील आणि तुझ्यावर कसलीही जबाबदारी राहणार नाही."

"म्हणजे अगदी मनाजोगते काम दिसते हे ! "तो हसून म्हणाला. " खरे म्हणजे मी प्रवासी नाही, तर एक भटक्या आहे. मला काही काम स्वीकारून स्वतःला बांधून घ्यायचे नाही, कारण मी भटकत असतो तरी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तोंडात लगाम घेऊन चालणार नाही. पण काम तरी कसले, काय आहे ? "

रमलखुणा

"काम असे आहे. मी व्यापारी आहे, तो हिर्‍यामोत्यांचा नाही, तर गुलामांचा आहे. उद्याच सकाळी गुलामांचा एक तांडा कारवा गाठण्यासाठी माझ्या गलबतातून जाणार आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मला एका ताठ तरुण माणसाची फार गरज आहे. मी तुला पाहिले त्यावेळी मला वाटले, हा माणूस आपल्याला मिळाला तर फार बरे होईल. हा माणूस पाहू लागला की याच्या नजरेत कोठे क्षितिज आड येत नाही."

पण या शब्दांनी तो आज फार अस्वस्थ झाला. त्याने तुटकपणे विचारले, "पण आपल्यासारख्याच माणसांची खरेदी-विक्री करून पोट जाळण्यात कमीपणा नाही का ?"

"तू हा प्रश्न प्रथमच विचारणार हे मला माहीत होते व त्याच उत्तराची मी तयारी करत होतो." व्यापारी शांतपणे म्हणाला. “शिवाय, तो प्रश्न विचारणारा तूच काही पहिला नाहीस. इतर वेळी मी हसून गप्प राहत असे. कारण, प्रश्न काय-- कोणीही मूर्ख माणूस प्रश्न विचारू शकतो. पण ज्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत अशी लायकी असणारा हजार-लाखांत एकटाच असतो. त्यात का बरे कमीपणा वाटावा ? मेंढ्या, घोडे, उंट, यांचा व्यापार करण्यात शरम नाही, तर माणसांचाच व्यापार करण्यात कसली शरम आली आहे ? हे प्राणी अगदी क्षुद्र आहेत, माणूस तेवढा उच्च आहे, म्हणून त्याला त्यांची खरेदी-विक्री करण्याचा अधिकार आहे, हे तुला कोणी सांगितले ?"

"घोडा माणसाप्रमाणे कृतघ्न नाही. उंट वादळाच्या प्रसंगी मालकाला एकटा टाकत नाही. स्वतःची स्त्री देऊन त्या जनावरांपैकी कोणी मोठेपणा मिरवित नाही. माणूस जेवढा खालच्या पातळीवर उतरू शकतो, तेवढे उतरणारे जनावर तुला माहीत आहे? शिवाय, एखाद्याला हातपाय आहेत, तो पोट भरतो, तो प्रजा निर्माण करतो, केवळ एवढ्यामुळेच का तो तुझ्या बरोबरीचा ठरतो ? मग तर तू वेडा आहेस. काही माणसे खास तुझ्या बरोबरीची नाहीत, आणि हेही लक्षात ठेव, तू स्वतः काही माणसांच्या बरोबरीचा नाहीस. सर्व माणसांत ज्या गोष्टी समान आहेत, त्या फक्त माणसांतच आहेत असे नाही. त्या सगळ्या प्राण्यांतच आहेत. पण ज्या गोष्टींमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्यांच्याबाबत समानता असणे केवळ अशक्य आहे."

"आणि गुलामगिरी तू समजतोस तेवढी दुर्मिळ नाही. धर्मसंस्थापक काहीही खुळचट बोलला तरी ते शब्द गळ्यात अडकवून तुम्ही हजारोंनी गुलाम होता, हजारो वर्षे गुलाम राहता, आणि विशेष म्हणजे ही गुलामगिरी जेवढी प्राचीन, तेवढा तुम्हांला तिचा फार अभिमान वाटतो. तुझा सम्राट सांगेल त्या देशाविरुद्ध तुम्ही आंधळेपणाने तलवारी उगारता ! अरे, तू या देशात जन्मला असतास, तर येथल्यासारखाच पोशाख करायच्या साध्या गुलामगितून सुटायला तुला फार धैर्य दाखवावे लागले असते ! काही गुलामांना तांड्यातांड्याने निरनिराळ्या देशांत विकले जातात. बाकीचे आपल्या घरात राहूनच गुलाम म्हणून मरतात."

" तुझा तो धंदाच असल्याने तू त्याला असले स्वरूप देत आहेस इतकेच !" तो म्हणाला.

" नाही. तू चुकलास. तो माझा धंदाच असला तरी माझ्या अनेक धंद्यांपैकी तो एक आहे. माझे पोट काही त्यावर अवलंबून नाही. मला संपत्तीचा मोह नाही. तुझ्याएवढे उंच असे दिनारांचे ढीग माझ्या हाताखालून जात असले तरी माझे स्वतःचे घर अगदी साधे आहे. त्यात दरबारी गालिचे नाहीत, आणि माझ्या घरात एकही गुलाम नाही.”

"मग हा धंदा चालू ठेवण्याचे कारण काय ? " त्याने विस्मयाने विचारले.

" तेच तुला तू जर माझे काम स्वीकारशील तर चांगले समजेल. दीडदोनशे गुलामांवर तुझी सत्ता असेल. तू काय मी काय, आम्ही त्यांना गुलाम केले नाही. ते गुलाम झाल्यावरच आमचा त्यांच्याशी संबंध आला. तेव्हा मनाला कसली टोचणी असण्याची गरज नाही. तुझ्या सत्तेला मर्यादा असणार नाही त्याचप्रमाणे त्यांच्या जीविताची तुझ्यावर कसलीच जबाबदारी राहणार नाही."

"त्यांतील काही मेले तर तुझा त्यात काहीच दोष नाही असे खुद्द इतर गुलामच तुला सांगतील. जबाबदारी आणि कर्तव्ये यापासून मुक्त असलेली अनिर्बंध सत्ता अत्यंत उन्मादकारी असते. हा नवा अनुभव तुला येईल. ते गुलाम काही वेळा चांगले वागतील पण चांगले वागले की हटकून त्याचे पारितोषिक मिळतेच असे नाही, हे त्यांना माहीत असते. त्यामुळे त्यांचा चांगुलपणा अत्यंत निरपेक्ष असतो. उलट पाठीवर चाबकाचा फटकारा बसला की त्यांना फारसा खेद नसतो, कारण अशा तर्‍हेचे प्रायश्चित्त मिळते, ते आपल्याकडून अपराध झाला म्हणूनच नव्हे, हे देखील त्यांना माहीत असते. तुझी लहर म्हणजेच तुझा न्याय, हेच त्यांच्या मनात पूर्ण ठसलेले असते. मित्रा, तू अगदी देवाप्रमाणे त्यांच्यावर हुकमत गाजवशील ! मद्याच्या नशेत तू बरळलेला एक शब्द म्हणजे धर्म, तू केलेले एखादे अर्थहीन कृत्य म्हणजे न्याय आणि केवळ चाळा म्हणून तू दिलेला आसुडाचा प्रहार म्हणजे कदाचित स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त- असले वातावरण तुला इतर कोणत्या व्यवसायात मिळेल ते तरी सांग !"

"पण हे असे काही कायम चालणार नाही. हे काम म्हणजे झोपलेल्या ज्वालामुखीच्या टोकावर बसल्यासारखे आहे. दीडदोनशे चालती बोलती माणसे- त्यांतील एक माणूस तरी कधीतरी जागा होईल, संतापाने प्रतिकार करील आणि मग तुझे बुडबुड्याचे साम्राज्य फुटून जाईल!" तो म्हणाला.

गुलामांचा व्यापारी किंचित वाकला व मोठमोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, “हे बघ, तुझी सारी उमर आहे त्यापेक्षा जास्त वर्षे मी या धंद्यात काढली आहेत. आणखी एक गोष्ट, मला वाटते, मी तुला सांगितली नाही. मी स्वतः गुलाम म्हणून तांड्यात भटकलो आहे. अरे, तू म्हणतोस ते स्वातंत्र्याचे प्रेम माणसात भूकतहानेप्रमाणे उपजत आणि अखंड नसते. हां, तसे काही प्राण्यांत असू शकेल. " व्यापाऱ्याने आपल्या एका बोटाकडे पाहत आठवत म्हटले.

“ उदाहरणार्थ, डोंगरी ससाणा घे. तू त्याला पाचसात वर्षे खाणेपिणे दे. पण पहिली संधी मिळताच तो तुझे बोट फोडील. तू जर निष्काळजी राहिलास तर तो तुझे डोळे कोचून काढील आणि निघून जाईल. त्यांच्यातला हा निखारा कधीच विझत नाही. काही मुठीएवढी पाखरे असतात, पण ती पिंजऱ्यातच दाण्यांना स्पर्श न करता मरून पडतील. माणसाचे तसे नाही. स्वातंत्र्यप्रेम ही एक मुद्दाम निर्माण केलेली जाणीव आहे, आणि ती सतत जागी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर ती सहज मरून जाते. म्हणूनच काही प्रबळ युयुत्सू देश शतकानुशतके दास्यात राहतात. आणि त्या अवधीत प्रजेची संख्या देखील भरमसाट वाढते.

"तू दोन वर्षे एक माणूस माझ्या ताब्यात दे. हातात आसूड न घेता, त्याच्या पायात साखळदंड न घालता मी त्याचा गुलाम करून दाखवीन. मी काय करतो माहीत आहे ? मी या साऱ्यांपेक्षाही भयंकर अस्त्र वापरतो. मी त्यांना चांगले कपडे देतो, खायला भरपूर घालतो, आणि रात्री शांतपणे झोपू देतो. यात जखडलेला माणूस गुलामगिरीतून काय सुटणार ? एकदा मी माझ्या सगळ्या गुलामांना सांगितले, ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल निघून जावे."

"मग काय, ते तात्काळ नाहीसे झाले असतील नाही ?” त्याने उत्सुकतेने विचारले.

"चुकलास. अवघी तीन माणसे गेली, आणि त्यांतील दोन आठवडाभरातच परतली. कारण काय तुला माहीत आहे! येथे काय, अन्यत्र काय, गुलामगिरी होतीच. निदान या ठिकाणी त्यांच्या भुका तरी निश्चितपणे भागत."

"आणखी एक गोष्ट घ्यानात घे, ते जरी गेले असते तरी स्वतंत्र झालेच नसते. दुसरी कसलीतरी गुलामगिरी त्यांनी आनंदाने स्वीकारली असती, कारण माणूम गुलाम असतो तो मुख्यत्वेकरून आपल्या मनात ! मग ते कोणत्यातरी प्रमुखामागून आंधळेपणाने गेले असते, मठात राहिले असते, किंवा कोणत्यातरी नव्या प्रेषितामागे मेंढरासारखे हिंडले असते. आपण स्वतंत्र, स्वतः म्हणून जगण्याचे ओझे सगळ्यांनाच पेलते असे का तुला वाटते ? या ठिकाणी सारे ठीक असते. दुसरा कोणीतरी विचार करतो, हुकूम सोडतो, नियम करतो, त्यामुळे स्वतः जगण्याची व त्याचे प्रायश्चित्तही भोगण्याची जबाबदारी आपोआपच नाहीशी होते."

"ही गोष्ट धर्माला देखील फायद्याचीच आहे. जेथे प्रश्न विचारण्याची, स्वतंत्रपणे वागण्याची पूर्ण मुभा आहे, असे किती धर्म आजपर्यंत जगात टिकले आहेत ? प्रत्येक धर्मावर अशी पाटीच लावलेली असते-'आपले वृषण येथे फोडून घ्या. तुम्हांला शांती मिळेल !' "

"यात शेवटी एकच कठोर सत्य राहते. आपण एकेका शब्दाचे गुलामच राहतो. पण शब्दांसारखी मायावी पिशाच्चे दुसरी नसतील. तेव्हा जर प्रथम कोणती गोष्ट करायचे आपण धैर्य दाखवले पाहिजे तर एकामागोमाग कासवे उलटी करीत गेल्याप्रमाणे शब्द पालथे करीत जायला शिकले पाहिजे, म्हणजे त्यांचे फिकट दुबळे भाग देखील आपणाला दिसतील. प्रत्येक शब्दातच त्याचे विरुद्ध, विरूप दर्शन देखील कोठेतरी दडलेले असते. आणि तू शब्दाचे एकच रूप ध्यानात घेऊन त्याच्यावर विसंबलास की भलत्याच वेळी बरोबर विरुद्ध असे रूप दाखवून तो तुला फशी पाडेल. दीर्घकाल मनात द्वेष बाळगून सूड मिळवून विजय हस्तगत करावा, तर तो क्षण रिकाम्या करवंटीसारखा ठरून जय हाच पराजय ठरतो. मंगल प्रेमाच्या परिपूर्तीत क्षणिक वासनांच्या क्षणिक समाधानाचा लगदा हाताला चिकटतो."

"आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीत जास्त काय आले याची अखेर कबुली असते. स्वातंत्र्याची आपल्या मनाप्रमाणे व्याख्या करून माणूस त्याविषयी बडबडतो, त्या वेळी तो कुंभारकिड्याच्या त्या लहान घरट्यात गुलाम होऊन राहतो; तर आपण गुलाम आहो अशी कठोर जाणीव पूर्णपणे स्वीकारणारा माणूस स्वतंत्र होतो. आणि आपल्या ज्ञानवंतांनी केले आहे काय, तर अमर्याद वाळवंटात असल्या शब्दांची बुजगावणी उभी करून आपण वाळवंटाचा नकाशा केला आहे व प्रवास सहज केला असा तोरा मिरवला आहे. आपण सामान्य माणसे अगतिक होतो; म्हणून दिशा नसली तरी गती तर आहे एवढ्या क्षुल्लक समाधानाने या कासवाच्या पाठीवर बसून प्रवासाला निघतो."

-oOo-

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. १२२-१२७.

या वेच्यामध्ये मी लहानसा बदल केला आहे. यात दोन ते तीन दीर्घ परिच्छेद होते. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरते.त्यामुळे या परिच्छेदांचे मी दोन-तीन लहान परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.

---


हे वाचले का?

बुधवार, १७ मे, २०२३

वारसा आणि विचार

काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे."

कमलनें विचारलें, "कां ?"

शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं.

कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली.

आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्‍यावरची एक रेषासुद्धां बदलली नाहीं- जसा कांहीं एक दगडी पुतळाच - कांही दिसत नाहीं की कांही ऐकू येत नाहीं.

शेषप्रश्न

हा विक्षेप अविनाशला असह्य झाला होता. तो म्हणाला, "माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या."

कमल म्हणाली, "पण माझ्या पतीची परवानगी नाहीं. त्यांची अवज्ञा करणं योग्य का ?" असे बोलून ती हंसूं लागली.

अविनाशलाही हसल्यावांचून राहवले नाहीं. तो म्हणाला, "या बाबतीत तो दोष व्हायचा नाहीं. आम्हां एव्हढ्या लोकांचा मिळून आग्रह आहे. तुम्हीं बोला. "

कमल म्हणाली, “आजचा दिवस धरून आशुबाबूंना मी केवळ दोनच वेळ पाहिलंय. पण एव्हढ्याच वेळांत मला त्यांचा फार लोभ वाटू लागलाय- " असें म्हणून शिवनाथकडे बोट करून ती म्हणाली, "यांनी कां मला दटावलं तें आतां कळलं मला."

स्वतः आशुबाबू तिचें निवारण करून म्हणाले, "पण माझ्या दृष्टीनं तुला संकोच बाळगायचं कांहींच कारण नाहीं. हा बुढ्ढा आशु वैद्य अगदीचं भोळा माणूस आहे बरं कमल. दोनच दिवसांच्या भेटीत तू कांहीतरी ठरवलंस, आणखी दोन दिवस पाहिलंस म्हणजे तुला कळून येईल, की त्याची भीती बाळगण्यासारखी दुसरी कोणतीच चूक नाहीं. अगदी खुशाल बोल. तूं बोलशील तें ऐकायला मला खरोखरच आनंद वाटेल."

कमल म्हणाली, "पण एवढ्यासाठीच तर त्यांनी मला दटावलं. आणि एव्हढ्याचसाठीं अविनाशबाबूच्या प्रश्नाला उत्तर देतांना मला कठिण जातंय. स्त्री-पुरुषांच्या प्रेमाच्या व्यवहाराला मी महत्त्व देत नाहीं, आदर्श म्हणून मानीत नाहीं, असं उत्तर देणं मला खटकतंय."

आता अक्षयने तोंड उघडले. त्याच्या प्रश्नांत थोडीशी खोंच होती. तो म्हणाला, "तुम्ही मानीत नाहीं हें संभवनीय आहे- पण मानतां काय ते तरी आम्हांला ऐकवाल ?"

कमलनें त्याच्याकडे पाहिले पण उत्तर दिलें तें त्याला नव्हतें. ती म्हणाली, "केव्हांतरी एकदां आशुबाबूंनीं आपल्या पत्नीवर प्रेम केलं होतं. आतां ती हयात नाही. आता तिला कांहीं देता येत नाही की तिच्याकडून काही मिळण्याचाही संभव नाहीं. तिला सुखी करता येत नाहीं कीं दुःखही देतां येत नाहीं. ती मुळीं नाहींच. प्रेमाचं स्थान कसलीसुद्धां खूण न ठेवता पुसून गेलंय- आहे काय ती केव्हांतरी एकदां प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. माणूस नाहीं- नुसती आठवण आहे - ही आठवण मनांत सारखी घोळवीत ठेवायची, वर्तमानकाळापेक्षां भूतकालच चिरस्थायी असं समजून आयुष्य कंठायचं, या वृत्तींत कांहीं मोठासा आदर्श आहे असं मला मुळींच वाटत नाही."

कमलच्या तोंडच्या या शब्दांनी आशुबाबूंना पुन्हां धक्का बसला. ते म्हणाले, "कमल, पण आमच्या देशांतल्या विधवांना ही आठवण म्हणजेच काय तो जगायला आधार असतो. पति निवर्तला तरी त्याची नुसती आठवण उराशी कवटाळून ती आपल्या विधवाजीवनाची पवित्रता सांभाळीत असते. सांग- एव्हढं तरी तूं मानतेस का ?"

कमल म्हणाली, "नाही. नांव मोठं दिलं म्हणजे एकादी गोष्ट खरोखरच मोठी होते असं नाही. उलट मी असं म्हणते, या भावनेच्या सक्तीखाली या देशांतल्या विधवांना जबरदस्तीने वैधव्यांत राहायाला भाग पाडले आहे- आपणच सांगा, खोटया गोष्टींवर सत्याचा मुलामा देऊन लोक त्यांना फसवतात असंच नव्हे का? -आपण तसं म्हणाल तर मी नाकबूल करणार नाहीं."

अविनाश म्हणाला, “असंच जर चाललंय, माणूस जर त्यांची फसवणूकच करीत आला असेल, तर विधवेच्या ब्रह्मचर्यात- नको - राहू दे, ब्रह्मचर्याची गोष्ट नाहीं काढीत- पण विधवेच्या आमरण संयमशील जीवनांत अत्यंत पवित्रतेलाही काही महत्त्व द्यायचं नाहीं का?"

कमल हंसली आणि म्हणाली, "अविनाशबाबू, हा पाहा आणखी एक शब्दाचा मोह. 'संयम' हा शब्द वापरतांना आज कित्येक दिवस त्याचं महत्त्व वाढत वाढत एव्हढं अनावर होऊन गेलं आहे, की त्याच्या बाबतीत स्थलकाल, कारण अकारण कुणी पाहातच नाहीं. हा शब्द उच्चारला की माणसाची मान आपोआप त्यापुढं झुकते. पण अवस्थाविशेषानं हा शब्द म्हणजे एक फुसक्या आवाजापेक्षा जास्त नव्हे, असं कबूल करायला कुणा साधारण माणसाला भीती वाटत असली तरी मला वाटत नाहीं. मी त्या जातीतली नाहीं. पुष्कळ लोक कोणतीही एकादी गोष्ट पुष्कळ दिवसांपासून अशीच आहे म्हणून म्हणत असले तरी मी ती हिशेबांत घेत नाहीं. नवर्‍याची स्मृती हृदयाशी कवटाळून दिवस कंठणाऱ्या विधवेची स्वतःसिद्ध पवित्रतेची कल्पना ही खरोखरच पवित्र आहे असं कुणी मला सिद्ध करून दिलं नाहीं, तर ती पवित्रता कबूल करणही मला खटकेल.”

अविनाशला यावर उत्तर सुचेना. क्षणभर वेड्यासारखा पाहात राहिल्यावर तो म्हणाला, "काय बोलतेस हें ?"

अक्षय म्हणाला, "दोन आणि दोन म्हणजे चार होतात हें सुद्धां मला वाटतं आपल्याला सिद्ध करून दाखवलं नाहीं तर आपण कबूल करणार नाहीं?"

कमलनें याचें उत्तर दिलें नाहीं कीं ती रागावलीही नाही. नुसती हंसली.

आणखी एका व्यक्तीला राग आला नाहीं. ते म्हणजे आशुबाबू. खरें पाहिले तर कमलच्या भाषणाने सर्वांपेक्षां जास्त फटका बसला होता तो त्यांना.

अक्षय पुन्हां म्हणाला, "आपल्या या सार्‍या घाणेरड्या कल्पना आम्हां उच्चवर्णीयांत प्रचलित नाहींत. पूर्वीपासून आहेत त्याच समजुती तिथं कायम आहेत."

कमल तशीच हंसतमुखानें उत्तरली, "उच्चवर्णीयांत या समजुती कायम आहेत हें मलाही माहित आहे."

बराच वेळपर्यंत सारे उगीच बसले होते. त्यानंतर म्हणाले "आणखी एक प्रश्न तुला विचारतो कमल. पवित्रता अपवित्रतेसाठी नव्हे पण स्वभावतःच ज्याला यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं- उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस - मणीच्या स्वर्गस्थ आईच्या जागी दुसरी कुणी आणून बसवावी अशी कल्पना सुद्धा माझ्या मनात कधी आली नाहीं त्याचं काय ?"

कमल म्हणाली, "आपण म्हातारे झाला आहांत आशुबाबू.'

आशुबाबू म्हणाले, "आज म्हातारा झालोय हें मी कबूल करतो, पण त्यावेळी कांही म्हातारा नव्हतो- पण त्यावेळी सुद्धा मला असं वाटलं नाहीं कसं ?"

कमल म्हणाली, "त्यावेळीही तुम्ही असेच म्हातारे होता. देहानं नव्हे- मनानं. एकेक माणूसच असा असतो, की तो म्हातारं मन घेऊनच जन्माला येतो. त्या म्हातारपणाच्या पांघरुणाखाली त्याचं थकलेलं विकृत तारुण्य लाजेनं मान खाली पासून कायमचं झाकून राहिलेलं असतं. ते म्हातारं मन खूष होऊन म्हणतं, अहाहा ! हेंच तर उत्तम ! दंगा नाही, गडबड नाहीं-, शांति ती हीच - माणसाच्या जीवनाचं हेंच शेवटचं तत्त्वज्ञान ! किती प्रकारची किती विशेषणं देऊन तो तारीफ करीत असतो. त्या तारिफेच्या दमाक्यानं दोन्ही कान भरून जातात. पण ते त्याच्या जीवनाचं जयवाद्य नव्हे, आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे ही गोष्ट त्याला कळत नाही"

प्रत्येकाला वाटत होते, की यावर एकादें सणसणीत उत्तर द्यावे- बायकांच्या जातीच्या तोंडचे तें उन्मत्त यौवनाचे निर्लज्ज स्तुतिस्तोत्र सर्वांच्या कानांत तापलेल्या रसासारखं जाळीत जात होते. पण उत्तर देण्याजोगे शब्द कुणालाच सुचेनात. यावेळी आशुबाबू शांतपणे म्हणाले, “म्हातार्‍या मनाची तुझी व्याख्या काय आहे कमल ? मला जे वाटतं त्याच्याशी ताडून पहायचंय मला, की ते बरोबर आहे की ते चूक आहे ?"

कमल म्हणाली, “मनाचं वार्धक्य मी त्यालाच म्हणते आशुबाबू की जे पुढे पहायला तयार असत नाही. ज्याचं थकलेलं, जर्जर झालेलं मन भविष्यकालच्या सार्‍या आशांवर तिलांजली देऊन केवळ गतकालच्या आधारावर जिवंत राहू पाहतं- पुढं कांहीं करायचं आहे, काहीं मिळवायचं आहे असा आग्रहच नसतो त्याचा. वर्तमानकाल त्याच्या लेखी नसतोच- त्याला तो अनावश्यक वाटतो- निरर्थक वाटतो. आलाच नाहींसा वाटतो. गतकाल म्हणजेच त्याचं सर्वस्व- त्याचा आनंद- त्याच्या वेदना. तेंच त्याचं मुद्दल. तें मोडून खाऊन त्यावर आयुष्याचे बाकीचे जे कांहीं दिवस असतील ते कसेबसे कंठायची इच्छा असते त्याची. आतां पाहा ना तुम्हींच आशुबाबू, जमतं आहे का हें तुमच्या अनुभवाशीं ?”

आशुबाबू, हंसले आणि म्हणाले, “एकदां केव्हांतरी ताडून पाहीन मी."

ही सारी चर्चा चाललेली असतांना अजितकुमार मात्र एक शब्दही बोलला नव्हता. नुसता टक लावून सारखा कमलच्या तोंडाकडे पहात राहिला होता. इतक्यांत त्याला काय वाटले कोण जाणे, मन आवरणें त्याला अशक्य झाले. तो एकदम बोलला, "माझा एक प्रश्न आहे- असं पहा मिसेस-"

कमल सरळ त्याच्याकडे पहात म्हणाली, "तें ’मिसेस' कशाला ? कमल म्हणून हांक मारा ना मला."

अजित शरमेनें गोरामोरा झाला आणि म्हणाला, "छे, छे. असं कधीं "झालंय ? अशी ही रीत- "

कमल म्हणाली, "अशी ही रीत कसली ? आईबापांनी माझं जें नांव ठेवलं आहे ते कुणीतरी हांक मारण्यासाठी. त्याचा मला कशाला राग यायला हवा ? एकदम मनोरमेच्या चेहर्‍याकडे पाहात ती म्हणाली, "आपलं नांव मनोरमा- मी तशीच हांक मारली तर राग येईल का आपल्याला ?" मनोरमा म्हणाली, "हो, येईल !" ती असें उत्तर देईल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. आशुबाबू तर संकोचाने एवढेसे झाले.

कांहीं वाटलें नाहीं ते कमलला स्वत:ला. ती म्हणाली, "नांव म्हणजे तरी काय- नुसता एक शब्द. पुष्कळांतून एका माणसाला टिपून काढायचं एक साधन. पण संवयीमुळे तेंहि कित्येकांना खटकतं हें ही तितकंच खरं. ते या शब्दाला नाना प्रकारांनी सजवून ऐकण्याची इच्छा धरतात. राजे लोकांचीच गोष्ट घ्या-  त्यांच्या नांवाच्या मागंपुढं कांहींतरी निरर्थक शब्द जोडले जातात- एकदोन श्री जोडल्याशिवाय तो शब्द ते दुसर्‍याला उच्चारू देत नाहीत- नाहींतर त्यांचा अपमान होतो-" असे म्हणून ती हंसत सुटली आणि शिवनाथकडे बोट दाखवून म्हणाली, “-जसे हें. कधी म्हणून 'कमल' म्हटलं नाही यांनी. म्हणतात 'शिवानी' म्हणूनच हांक मारा की ! शब्दही लहान आहे- अन् कळेलही सर्वांना - निदान मला तरी कळेल."

एव्हढी उघड उघड सूचना मिळाल्यावरही अजित बोलला नाहीं कां हेंच कळेना. प्रश्न त्याच्या तोंडच्या तोंडींच राहिला.

त्यावेळी दिवस मावळला होता. मार्गशीर्षातल्या धुरकट आकाशांत मळकट चांदणे दिसून येत होते, तिकडे बापाचे लक्ष वेधून मनोरमा म्हणाली, "दंव पडायला सुरवात झालीय बाबा. आता पुरे. आता तरी उठा."

आशुबाबू म्हणाले, "हा उठलोच पहा पोरी."

अविनाश म्हणाला, "शिवानी नांव फार छान. शिवनाथ गुणी माणूस- त्यामुळे त्यानं नावही दिलंय तें मोठं गोड. स्वतःच्या नांवाशीं तें खिळवलंयही मोठ्या खुबीनं.”

आशुबाबू उसळून उठून म्हणाले, "हा शिवनाथ नव्हे रे अविनाश तो- वरचा !" असे म्हणून त्यांनी आकाशाकडे नजर फेकली आणि म्हटले, “जगाच्या आरंभापासूनचा तो म्हातारा 'भद्रेश्वर दीक्षित' चोहीं बाजूनं पारखून अशी जोडपी जुळवण्यासाठीं आहार निद्रा सुद्धां गमावून जागत बसलाय ! जीते रहो !"

तितक्यांत अक्षय एकदम सरळ होऊन बसला. दोनतीन वेळ मान हालवून, आपले पिचके डोळे शक्य तितके टवकारून म्हणाला, "ठीक आहे- मी आपल्याला एक प्रश्न विचारू का ?"

कमल म्हणाली, "कसला प्रश्न ?'

अक्षय म्हणाला, "आपण तसा कांहीं संकोच बाळगीत नाहीं म्हणून विचारतों ! 'शिवानी' हें नांव मोठं सुंदर आहे- पण शिवनाथबाबूंबरोबर खरोखरच आपलं लग्न झालंय का ?"

आशुबाबूचा चेहरा काळवंडून गेला. ते म्हणाले, "हें काय बोलतां अक्षयबाबू ?"

अविनाश उद्गारला, "तुला काय वेड लागलंय ?”

हरेंद्र म्हणाला, "ब्रूट !"

अक्षय म्हणाला, “तुम्हांला माहित आहे, मी उगीच खोटी भीडभाड घरीत नाहीं."

हरेंद्र म्हणाला, “खऱ्या खोट्या भिडेची चाड तुला नसेल, पण आम्हाला तर आहे !"

कमल मात्र नुसती हंसत होती. जशी कांहीं ही थट्टेची बाबच होती. ती म्हणाली, “एवढं रागवायला कशाला हवं हरेंद्रबाबू ? मी सांगतें अक्षयबाबू- मुळीच कांहीं झालं नाहीं असं नाहीं. लग्नविधीसारखं काहीतरी झालं होतं- जे पहायला आले होते ते मात्र हंसूं लागले. ते म्हणाले, 'हें लग्न म्हणजे लग्नच नव्हे,- ढोंग !' यांना विचारलं तेव्हां हें म्हणाले, की हें लग्न झाल शैवपद्धतीनं. मी म्हटलं, ठीक आहे. कांहींतरी झालं खरं ! शिवाबरोबरचं लग्न जर शैव पद्धतीनं झालं तर मग त्यांत कसला विचार करायचा ?"

तें ऐकून अविनाशला वाईट वाटले. तो म्हणाला, “आपल्या समाजांत आतां शैवविवाह रूड नाहीं. उद्या जर यांना वाटलं, की हें लग्न झालंच नाहीं असं म्हणावं, तर तुला कांहींच पुरावा करता यायचा नाही.'

शिवनाथकडे पाहून कमलनें विचारले, “काय हो, असं कांहीं करणार आहांत वाटतं केव्हातरी ?"

शिवनाथ तसाच उदासवाण्या गंभीर मुद्रेनें बसला होता. त्याने कांहींच उत्तर दिलें नाहीं. तें पाहून हंसण्याच्या मिषाने कपाळावर हात मारून कमल म्हणाली, "हाय रे नशिबा ! झालं नाहीं म्हणून नाकबूल करायला हें जातील, आणि झालं आहे म्हणून इतरांपुढं शाबित करायला मी जाणार आहे होय ? त्यापूर्वी गळ्याला फांस लावायला एकादी दोरीसुद्धां नाहीं का मिळायची ?"

अविनाश म्हणाला, "मिळेल बरं- पण आत्महत्या म्हणजे पाप.' कमल म्हणाली, “पाप कसलं डोंबलाचं ! पण तें व्हायचं नाही. मी आत्महत्या करायला निघेन असं ब्रह्मदेवालासुद्धां वाटायचं नाहीं."

आशुबाबू एकदम म्हणाले, "हें मात्र माणसासारखं बोललीस कमल."

अर्जदाराचा आव आणून कमल त्यांच्याकडे पाहून म्हणाली, "पाहा तर खरं- अविनाशबाबू कशी माझी अब्रू घेताहेत !-" शिवनाथचा निर्देश करून ती म्हणाली "हें जातील मला झिडकारायला, आणि मी काय जाणार आहे माझा स्वीकार करा म्हणून यांच्या गळी पडायला ? सत्य गेलं चुलींत- अन् जे कसलाच विधि मानीत नाहींत त्यांना दोरीनं बांधून ठेवू का मी? मी का करायला जाणार आहे असं कांहीं ?" बोलता बोलतां तिच्या डोळ्यांतून ठिणग्या उडूं लागल्या.

आशुबाबू शांतपणे म्हणाले, "शिवानी, या जगांत सत्यापेक्षां दुसरं कांहीं मोठं नाहीं हें आपणां सर्वांनाच पटतं, पण लग्नविधी म्हणजे कांहीं खोटा नव्हे !"

कमल म्हणाली, “मी कुठं खोटा म्हणतेय ? प्राण जसा सत्य तसाच देहही सत्य- पण प्राण जेव्हां निघून जातो तेव्हां ?"

बापाचा हात धरून ओढीत मनोरमा म्हणाली, "फार दंव पडतंय बाबा. जातां उठलंच पाहिजे. "

"हा उठलोंच ग !"

शिवनाथ एकदम उठून उभा राहून म्हणाला, "चल शिवानी, आतां पुरे झालं. चल."

- oOo -

१. मणी: मनोरमेचे हाक मारण्याचे नाव.

२. गोविंद बल्लाळ देवल यांनी ’जरठ-बाला विवाह’ या विषयावर लिहिलेल्या 'संगीत शारदा' या नाटकातील लग्ने जुळवणारा मध्यस्थ. हा उल्लेख शरच्चंद्रांच्या कादंबरीत अर्थातच नाही. हा वरेरकरांनी जोडलेला मराठी संदर्भ आहे.

पुस्तक: शेषप्रश्न
लेखक: शरच्चंद्र चॅटर्जी (अनुवाद: भा. वि. वरेरकर)
आवृत्ती: तिसरी
प्रकाशक: नवभारत प्रकाशन संस्था
जुलै १९८०.
पृ. ६१-६९.


हे वाचले का?

सोमवार, ८ मे, २०२३

तहान

दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली.

कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई.

सत्तांतर

आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.

या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड पाण्याच्या काठावर होतं. सुमारे साठ पावलांचं अंतर होतं आणि ते अंतर पार करून पाणी पिऊन, परत झाडावर येणं हीच गोष्ट फार जोखमीची होती. साग झाडीच्या कडेवर होता. मागे टेकडी होती आणि गर्द झाडं-झुडपं होती. या जाळकटात दबा धरून कोणीही हिंस्र पशू बसला असण्याची शक्यता होती.

मुडा आपल्या टोळीसह या झाडावर काही वेळ बसला. सर्वांनी आपल्या तीक्ष्ण नजरेनं आजूबाजूचं रान निरखून घेतलं. काही गडबड न करता सगळी टोळी गप्प अशी सागाच्या झाडावर काही वेळ बसून राहिली.

कोणतीही धारिष्ट्याची गोष्ट करताना आणीबाणीचे क्षण अगदी थोडे असतात आणि त्यांना सामोरं जाणं हीच खरी परीक्षा असते.

ही जोखीम घेण्याची जबाबदारी आता सर्व टोळीपैकी फक्त दोघांवर होती- तरणीवर आणि मुडावर. या दोघांपैकी कोणी पुढं झाल्याशिवाय, तहानेनं व्याकूळ झालेल्या वानरांपैकी कोणीही जागचं हलणार नव्हतं.

टोळीतील सर्व जाणती वानरं आता फार गंभीर दिसत होती. मुडा विशेष गंभीर होता. तरणीही विशेष गंभीर होती.

अखेर मुडानं धारिष्ट केलं. तो सरासरा झाडाचं खोड उतरून दाणादाण उड्या घेत उतार उतरला आणि सावधगिरी म्हणून पाण्यापासून पंधरा-वीस पावलं अंतरावर गवतात बसून राहिला.

सगळी वानरं स्तब्ध राहून बघत होती.

बाजूच्या झाडीतून झेपावत काळ आला, तर जिवाच्या करारानं, सगळं बळ एकवटून वाऱ्याच्या वेगानं सुसाट पाठीमागं पळणं आणि उतरला तो साग चपळाईनं पुन्हा चढणं एवढंच मुडाला करता येण्यासारखं होतं. पळण्यावाचून दुसरं कोणतंही संरक्षक हत्यार त्याच्यापाशी नव्हतं. त्याला तीक्ष्ण नख्या नव्हत्या, अक्राळविक्राळ जबडा नव्हता. पोलादी कवच नव्हतं. माथ्यावर जबरदस्त शिंगं नव्हती.

सावकाश असे काही ताणलेले क्षण गेले. काही वावगं घडलं नाही.

मग शेपूट वर करून पावलं टाकत मुडा पाण्याच्या अगदी काठाशी गेला. ओल्या काठाशी जाऊन बसला. त्यानं चौफेर बघून घेतलं. काही धोकादायक असं दिसलं नाही.

पण खरे आणीबाणीचे क्षण इथून पुढे होते. पाणी पिण्यासाठी दोन्ही हात जमिनीला टेकून मुडाला वाकावं लागणार होतं. तोंड लावून पाणी प्यावं लागणार होतं आणि एकवार तोंड पाण्याला लावल्यावर मागून कोण येत आहे, हे त्याला मुळीच समजणार नव्हतं. गंभीरपणानं पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे बघत मुडा बसून होता.

तरणीनं मग धारिष्ट्य केलं. ती सरासरा साग उतरून झेपावत थेट पाण्याकाठी आली आणि मुडाच्या पाठीशी हातभर अंतरावर बसून तिनं चौफेर नजर टाकली. मागून कोणी नकळत येणं फारच कठीण आहे, हे तिला माहीत होतं. कारण अजून सागाच्या झाडावर बसून राहिलेल्या टोळीनं तत्काळ चीत्कार करून तिला सावध केलं असतं.

मागं 'तरणी' आहे, हे बघताच दोन्ही हात गवतात ठेवून मुडा खाली वाकला आणि त्यानं पाण्याला तोंड लावलं.

तब्बल चार-पाच क्षण त्यानं पाण्याला लावलेलं तोंड वर उचललं नाही. मग तीन पोरं धिटावून खाली उतरली आणि मुडाच्या ओळीत पंगतीला बसावी, तशी पाण्याच्या काठी बसली.

आकंठ पाणी पिऊन होताच तत्काळ मुडा उडाला आणि या धोकेबाज पाण्याकाठी क्षणभरही न रेंगाळता सागाकडे धावला.

धीट पोरं मागं बसलेली बघून तरणीनं, मुडानं ज्या जागी पाण्याला तोंड लावलं होतं, त्याच जागी तोंड घातलं. तिचं पाणी पिऊन अजून संपलं नाही, तोवरच एक पोर पुढं होऊन ओणवं झालं. त्यानं पाण्याला तोंड लावलं. दोघं पोरं राखणदारासारखी मागं बसूनच होती.

अशा पद्धतीनं पाणी पिण्याचा हा विधी चांगला अर्धघटका चालू राहिला आणि निर्वेधपणानं पाणी पिऊन सगळी टोळी पुन्हा उड्या ठोकीत पांगली.

- oOo -

पुस्तक: सत्तांतर.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती बारावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ९-११.


हे वाचले का?

शनिवार, ६ मे, २०२३

अ‍ॅलिस आणि आरसा

ही अॅलिस आहे.

-मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !"

"होय तर! मग*, तुला काय हवे होते ?"

"आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली.

"मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते."

माणसेः अरभाट आणि चिल्लर

ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाही. तो तिला चुकणार नाही, पण सध्या तरी तो नाही हे खरे. अनेकदा ती विनयशील आहे. पण ती प्रसंगी सावध आणि स्पष्ट देखील आहे.

एकदा जेवायला बसल्यावर टेबलावर एका प्लेटमध्ये मटण आणून ठेवले जाते. तेव्हा राणी त्याची अॅलिसशी ओळख करून देते. मटण देखील प्लेटमधूनच किंचित वाकून तिला नमस्कार करते, आणि अॅलिस सुध्दा तसे करते. मग खाण्यासाठी एक तुकडा कापण्याचा तिचा विचार असतो, तर राणी रागाने म्हणते, "छट्, असे कधी होते की काय ? ज्याची ओळख करून दिली आहे त्याचा तुकडा कापणे हा का शिष्टाचार झाला ? वेटर, मटणाची प्लेट घेऊन जा."

मग पुडिंग येते. तेव्हा घाईघाईने अॅलिस राणीला म्हणते, "आता कृपा करून पुडिंगची ओळख मात्र करून देऊ नको. नाही तर मग पोटात काही सुध्दा जाणार नाही."

Let there be light and there was light, हे सामर्थ्य परमेश्वराचे. त्याखालोखाल सामर्थ्य कलावंताचे. त्याने कागदावर लेखणी टेकताच वादळ घोंगावू लागते, आणि व्याकुळ झालेला लियर माळरानावर भरकटू लागतो. सगळ्यांनी टाकलेला, सगळीकडून हाकलला गेलेला आंधळा इडिपस मृत्यू शोधत अथेन्समधील वनराईकडे चालू लागतो.

अॅलिसचे जग अगदी लहान, कोवळे आहे. पण त्या जगात मात्र ती तितकीच सामर्थ्यशाली आहे. "Let us pretend" म्हणताच तिला वाटेल ते शक्य होते. ती सरळ वर स्टँडवर चढून आरशातून पलीकडे जाऊ शकते. शिवाय काही वेळा तिची जीभ देखील तिखट होते. ती एकदा एका राणीला स्पष्ट सांगते, "मी मुळीच गप्प राहणार नाही. तुला विचारतेय कोण ? तुम्ही सगळीच जण पत्त्याच्या डावातील नुसती पाने आहात..." या तिच्या शब्दांनी मात्र तुटल्याप्रमाणे सगळेच वाऱ्यावर उडतात आणि खाली येऊन तिच्या अंगावर निर्जीव अवस्थेत पडू लागतात.

अॅलिस, तुझ्या बोलण्यात किती अर्थ भरून राहिला आहे, हे तुला नंतर कधी तरी कळून येईल. पण आता हे शब्द एका लहान कोवळ्या वृक्षातून आल्याप्रमाणे वाटतात. पत्त्यातील फक्त पाने... सम्राट व त्यांच्या राण्या, युगप्रवर्तक एक्के आणि दुऱ्या, तिऱ्या असली चिल्लर पाने... सगळीच वाऱ्यावर भरकटत खाली पडतात.

"आता ज्यूरींनी आपला निर्णय सांगावा." राजा म्हणाला. तसे म्हणण्याची त्याची ती विसावी खेप होती.

"छट्‌! असे कधी झालेय का ?" राणी म्हणाली, "ते काही नाही. आधी शिक्षा, मग न्याय- निर्णय!"

"हा काय आचरटपणा आहे ?" अॅलिस रागाने म्हणाली.

"ए, तू जीभ आवरून गप्प बस."

"मी मुळीच गप्प बसणार नाही." अॅलिस जोराने म्हणाली.

--आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तुला चमत्कारिक वाटले, अॅलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षानी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयुष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कुठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशेब होतो. निदान शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगत असता आपली शिक्षा सुरू झालेली असते.

"हा काय आचरटपणा आहे ?" असे पुन्हा एकदा म्हण, अॅलिस. “Let us pretend” म्हणत तू आरशातील घरात सहज गेलीस. तुझ्या स्वच्छ, निर्लेप मनाला इकडची बाजू कोणती, आरशातील बाजू कोणती याची स्पष्ट जाणीव होती. माझे मात्र तसे नाही. काही वेळा खरे जग कोणते, आरशातले कोणते, हेच उमगत नाही. इकडे काही वेळा अशा घटना घडतात की आपण आरशात गेलो की काय, अशी शंका वाटते. तर काही वेळा जर कल्पनेने आरशात गेलो तर क्षणातच अगदी इथल्या जगातील घटनेप्रमाणे काही तरी कठोर विषारी घडते, तेथील तरल वातावरण नष्ट होते आणि पुन्हा मी ठिकाणी येऊन पडतो. अॅलिस, आमची खरी अडचण अशी आहे की, आम्ही इकडे नाही, व पूर्णपणे आरशात नाही; तर मध्येच काचेतच अस्ताव्यस्तपणे अडकून पडलो आहोत. त्यात आमचे आणखी हाल म्हणजे आमच्या बाबतीत एकच आरसा असत नाही. एका मोठ्या आरशासमोर दुसरा एक आरसा असतो. आरशामागील आरशांतील अनेक जगे, आमची अनेक चित्रे. मग त्यात खरी खोली कोणती, आरशातील कोणती, आरशातील कोणता मी खरा, हे काहीच कळत नाही, आणि मी भांबावून जातो.

काही समजतच नाही. काही समजतच नाही.

तू आरशात जाऊन पुन्हा परतलीस. ते कसे करावे, हे कुणी तरी तुला विचारून ठेवायला हवे होते. पण तरी देखील तुझ्या मनात एक शंका राहिलीच. हे सारे स्वप्न तुलाच पडले की तूच दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊन आलीस, याविषयी तुझ्या मनात संशय राहिला. तसला किती तरी जास्त धारदार संशय आम्हांलाही अनेकदा त्रस्त करतो. आम्हांलाच कसली तरी विषारी भयाण स्वप्ने पडत आहेत की आपणच वाट चुकून कुणाच्या तरी भीषण अर्थहीन स्वप्नात हिंडत आहोत, याविषयी भ्रांत वाटू लागते. आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांत असतो काय, किंवा दुसरे येऊन आपल्याला छळत असतात काय ! म्हणजे एकंदरीने "Hell is other people" हेच खरे की काय ?

नदीकाठी गवतावर तू झोपली असता तुला पहिले स्वप्न पडले. म्हणून तू त्या ठिकाणी पुन्हा यावीस, तुला पुन्हा यापुढील स्वप्ने पडत जावीत. ती तू मला ऐकवावीस म्हणजे कदाचित आपल्या हाती काही तरी लागेल, मला काही तरी जास्त समजेल, असे मला फार वाटते, व त्या मोहाने मी त्या ठिकाणी थांबण्याचा विचार करतो. पण ही आशा अगदी फोल आहे, हे मला माहीत आहे. तुझा प्रवास इतरांप्रमाणे पुढेच असतो, व पुढे गेल्यावर तुला उलट मागे येता येणार नाही. फक्त भुते आणि आठवणी यांनाच उलटी पावले असतात. तू पुढे गेल्यावर आणखी एका अॅलिसला स्वप्ने पडतील, हे खरे आहे. पण तोपर्यंत थांबणे मला शक्य होणार नाही. एका जागी स्थिर राहायला किती वेगाने धावावे लागते हे तुला माहीत आहे. तेवढा वेग आता माझ्या पावलांना शक्य नाही.

असल्या बाबतीत कधी अखेरचा शब्द असू शकतो का ? असलाच तर तो कुणाचा असू शकेल ? योगेश्वराचा की भुशुंड काकराजाचा कृष्णशब्द ? की अॅलिसचा कोवळा, नवथर पण धीट निर्णय-- तुम्ही सारीच पत्त्यातील पाने आहात, आणि "मला तुमची कसलीच भीती वाटत नाही" हे शब्द ? काहीच समजत नाही. समजत नाही.

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मीकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठे तरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.

अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही असे म्हणत एक उच्छ्‌वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्‌वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात, 'समजत नाही, समजत नाही, समजत नाही.'

की ’समजत नाही, समजत नाही’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील ? ते देखील समजत नाही.

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १३१-१३४.

 

* पुस्तकामध्ये इथे ’मग’ ऐवजी ’मला’ असा शब्द आहे, जो मला मुद्रणदोष आहे असे वाटते. तसेही एकुणात पुस्तकात मुद्रणदोष नि विरामचिन्हांचे घोटाळे बरेच दिसतात. स्वल्पविरामाचे अत्यंत चुकीचे वापर त्रासदायक वाटतात... अर्थात त्यांच्याकडे लक्ष गेले तर.
 


हे वाचले का?

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वेचताना... : डोह

( माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूंमध्ये दिसणारी उत्क्रांती अथवा क्रांती यांची नोंद घेणारा एक स्तंभ लिहितो आहे. यापूर्वीही या ना त्या संदर्भात माणसाच्या टोळीजीवी अथवा जंगलजीवी ते नागरजीवी या स्थित्यंतराचा मागोवा घेत आलो आहे.त्याला समांतर ’बखर बिम्मची’ या जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावरही एक मालिका लिहितो आहे. हे दोनही चालू असताना या दोन्हींला सांधणारे असे एक जुने पुस्तक पुन्हा एकवार समोर आले आणि त्या अनुषंगाने त्या दोन्ही लेखनांच्या दृष्टिकोनांची सरमिसळ होऊन तयार झालेला हा लेख.)

डोह

जंगलजीवींच्या तुलनेत नागर माणसाचे मूलभूत गरजांशी निगडित संघर्ष बरेच कमी झाले आहेत. जंगलजीवींना अन्न, पाणी नि निवारा या मूलभूत गरजांसाठी सजातीयांशी, अन्य सजीवांशी, निसर्गाशी सर्वांशीच संघर्ष करावा लागत असे. नागर मानवाने श्रमविभागणीचे तत्त्व अंगीकारले आणि मूठभरांनी केलेल्या कामाचे फायदे इतरांमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली. यातून एकुण समाजाची कार्यशक्ती वाढली नि जंगलजीवींहून नागर मानवाचे कार्यकौशल्य अनेक पटींनी वाढले.

आज नागर जीवनात नळाची तोटी उघडली की पाणी मिळते, त्यासाठी घरच्या स्त्रीला घडा घेऊन नदीवर फेर्‍या माराव्या लागत नाहीत. माणसाच्या आहाराचा दीर्घकाळ अविभाज्य भाग असलेले दूध थेट पिशव्यांमधून वा बाटल्यांमधून विकत घेता येते. अन्नसंग्रहासाठी वा शिकारीसाठी करावी लागणारी यातायातही संपून गेली आहे. मूठभर लोकांनी केलेल्या शेतीतून वा पशुपालनातून कितीतरी मोठ्या नागर समाजाला पाकसिद्धीसाठी आवश्यक घटकांचा थेट पुरवठा होतो.

त्यामुळे होते असे की त्यातील वेळ वाचून, पाकसिद्धीला उदरभरणाच्या पातळीवरून ’कलिनरी आर्ट’ नावाने कला नि प्रयोगशीलतेकडे नेण्याइतकी उसंत निर्माण झाली. या दोन्हींबाबत उदासीन राहून अन्य क्षेत्रासाठी वेळ देऊ इच्छिणार्‍यांना पाकसिद्धीच्या जबाबदारीतून मुक्त करणारी, शिजवलेले अथवा तयार अन्न थेट विकणारी दुकाने- होटेल्स नागर अर्थव्यव्स्थेचा अविभाज्य भाग बनली. विसाव्या शतकाच्या अखेरीस पाश्चात्त्य प्रगत राष्ट्रे तर सोडाच पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांतही दैनंदिन आहारासाठी तयार पदार्थच विकत मिळू लागले आहेत...

तसंच उपचारांसाठी आवश्यक असणारी वनौषधी शोधत हिंडण्याची आवश्यकता उरली नाही. ती ही अन्नाप्रमाणेच विकत मिळू लागली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सार्‍या व्यवहाराला एकत्र बांधून घालणारी चलन नावाची संकल्पना उदयाला आली आणि ती माणसाला रोजगार नावाच्या संकल्पनेकडे घेऊन गेली. यातून अक्षरश: शून्य शारीर श्रम करणारे, कोणत्याही व्यापक कार्याचा भाग नसलेलेही निव्वळ वैय्यक्तिक उदीमाच्या आधारे आपल्या अन्नादी गरजांच्या पूर्तीसाठी आवश्यक ते चलन मिळवू लागले आणि त्याच्या विनिमयाने अन्नासारख्या गरजा भागवू लागले आहेत.

या सार्‍या प्रवासामध्ये माणूस हळूहळू निसर्गापासून दूर होत चालला आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीची किंमत निसर्गाने किती मोजली याबाबत तो अधिकाधिक अनभिज्ञ आणि म्हणून बेफिकिर होत गेला आहे. जंगल साफ करून शेती करताना निसर्गाचा एक तुकडा आपण नष्ट केला याबाबत अपराधगंड नसेल कदाचित, पण भान नक्की असे. साफ होण्यापूर्वी अथवा साफ होताना जंगलाच्या त्या तुकड्याने माणसाला नि इतर जिवांना काय काय देऊ केले होते याची समजही माणसाला होती.

पुढे प्रगतीच्या वाटेवर खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची- एका नगराची उभारणी करताना माणूस नुसता बेफिकीरच नव्हे तर शोषकही होत गेला. तसे करत असताना वृक्षसंपदाच नव्हे तर त्यांच्या आश्रयाने राहणार्‍या प्राण्यांचा, मनुष्यांचा अधिवासच आपण नष्ट करत आहोत याची लाज त्याला वाटेनाशी नाही. खांडववनाच्या संहारामध्ये मयासुराच्या कुटुंबाला जीवदान दिल्याचा उल्लेख आहे, तसाच नागवंशाचा संहार केल्याचाही. प्रगतीच्या प्रत्येक वाटेखाली अनेक जिवांच्या जीविताची थडगी गाडलेली असतात याची जाणीव नागर समाजामध्ये संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे. निसर्गाप्रती माणूस संपूर्णपणे असंवेदनशील झालेला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांतून माणसाने आपले अधिवास हे लोखंड, सिमेंट यांतून तयार करायला सुरुवात केली आहे. घराभोवती कचरा वा डास नको म्हणून घराभोवतीच्या झाड-झाडोर्‍याची गच्छंती झाली. त्याची जागा कुंड्यांमध्ये लावलेल्या आटोपशीर नि खुज्या झाडांनी घेतली आहे. निसर्गाचेही बॉन्साय करुन माणसाने त्याला आपला बटीक बनवला आहे.

पुढे थोडे भान आल्यावर, घराच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात झाडे लावणे सक्तीचे झाल्यावरही त्याच्या आजूबाजूला सिमेंट अथवा त्याचे तयार पेव्हिंग ब्लॉक्स टाकून कचरा वरच्यावर उचलून तो कुजणार नाही, मातीच्या जमिनीवर शेवाळ साचणार नाही याची खातरजमा करुन घेतली जाते आहे. यातून त्यात जगणारे कीटक, त्यांना भक्ष्य करणारे पक्षीही माणसापासून दुरावले आहेत. एकमेकांचे तोंडही पाहायला लागू नये म्हणून माणसे दरवाजे बंद करुन बसू लागली आहेत.

मागील शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय माणसाचा निसर्गाशी संबंध येई तो टीव्हीवर पाहिलेल्या चित्रपटतील नायक-नायिकेच्या प्रेमगीताची पार्श्वभूमी म्हणून. आता ते कामही सरळ एखाद्या डान्सबार व हिरवाईचा अंश नसलेल्या परदेशातील एखाद्या रस्त्यावर स्थलांतरित झाले आहे. क्वचित कुणी एखादी निसर्गावरील माहितीपट पाहतो, कुणी पैसेवाला रोकडा मोजून निसर्गाची ’टूर’ करतो. त्याचेही फोटो समाजमाध्यमांवर पडले की त्याचा संबंध संपतो.

त्याहीपलिकडे जाऊन एखादी महानगरी सधन व्यक्ती ’कधीतरी निसर्गाकडे जावं बरं का’ म्हणून वरकड पैसे खर्चून कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या बिल्डरच्या स्कीममध्ये पिटुकले फार्म हाऊस’ बांधतो. वर्षांतून दोन-चार वेळा तिथे जाऊन राहतो (आणि पुन्हा फोटो- बिटो...).

थोडक्यात महानगरी माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान हे केवळ चिकटवहीत चिकटवलेल्या स्टॅंपइतके उरले आहे. 'माझ्याकडे आहे’ एवढे समाधान देण्यापुरता, किंवा एखाद्या सांस्कृतिक या नावाने सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाताना हातावर हलकेच उमटवलेल्या एखाद्या अत्तराच्या थेंबासारखा. या माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान एखाद्या petting zoo सारखे उरले आहे. त्यातील प्राण्यांशी माणसाचा तात्पुरता संपर्क येतो, त्यांच्या सहवासात थोडा वेळ घालवून, त्यांच्याशी कुठलेही नाते न जोडता तो आपल्या आयुष्यात परतून येतो.

पण आपल्या सुदैवाने आपल्या देशाची अमेरिका झालेली नसल्याने महानगरी जगण्याच्या पलिकडे अजून निसर्गजीवीच काय जंगलजीवीही शिल्लक आहेत. त्यांच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान नेहमीच अविभाज्य वगैरे नसेल पण सहजीवन नक्कीच असते. लहानशा गावांत, पाड्या-वसत्यांवर मानवी वसती हीच अजूनही गाय, म्हैस, गाढवे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, कुत्री यांसारख्या प्राण्यांचीही वसती असते.

अनागर जीवनात आसपास असलेल्या झाड-झाडोर्‍याच्या आश्रयाने राहणार्‍या खारींसारखे छोटे जीव, पोपटांसारखे पक्षी तसंच माकडांसारखे प्राणीही त्या जीवसृष्टीचा भाग असतात. छोट्या शहरांतून, दाराशी एखादे फुलझाड असते. अंगण-परसाची चैन परवडणारे घर असेल तर अंगणात तुळस असते, परसात काही भाज्या असतात. पुढील दारी एखादे फळझाड असते, त्याच्यावर एखाद्या पाखराचे घरकुल असते.

स्वत:चे कवतुक करवून घेणारे, माणसाच्या दृष्टिने निरुपयोगी मांजर ही खास नागरी चूष आहे असे मला वाटते. एरवी जमिनीच्या प्रत्येक इंचावर काँक्रीट ओतून जंगलात उंदरांचा कडेकोट बंदोबस्त झाल्यावर मांजरांना फारसे काम उरत नसावे. आणि ठराविक वेळा अन्न थाळीत येते म्हटल्यावर समोर आल्या उंदराची शिकार करण्याची तसदीही ते घेत नसते. त्या अर्थी मांजर हे ही माणसाप्रमाणेच निसर्गापासून, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांपासून दुरावले आहे, नागर झालेले आहे.

नागरी आणि महानगरी आयुष्यात अजून बसूही न लागलेले मूल हाती मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहू लागले आहे. त्याचे कौतुक म्हणून त्याला बंदूक वा बाहुली खेळायला मिळते. पण जिथे आर्थिक सधनता मुलाच्या हाती मोबाईल देण्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि दाराबाहेर काँक्रीटचा पट्टा स्वागताला नसतो अशा छोट्या गावांतील घरातून एखादे लहान मूल रांगत उंबर्‍याबाहेर पाऊल टाकते तेव्हा आसपासच्या सजीव सृष्टीची ओळख होऊ लागते. दोन हात-दोन पाय असलेल्या प्राण्यांशिवाय इतर जीवही जगात असतात त्याची त्याला जाणीव होऊ लागते. उपजत जिज्ञासेनुसार (जी पुढे शिक्षण नि संस्कारांतून मारली जाते आणि तिची जागा आप-परभाव आणि तद्जन्य अस्मितांना बहाल केली जाते) ते भवतालाची ओळख करुन घेऊ लागते.

थेट जंगलजीवी अथवा निसर्गजीवी असणारे त्याच्याशी ओळख करु घेतात त्यातून विविध निरीक्षणे नोंदवत जातात. त्यातून त्यांचे व्यावहारिक ज्ञान विकसित होत जाते. समोर दिसतो आहे तो पायाचा ठसा वाघाचा आहे की वाघिणीचा, ती इथून किती वेळापूर्वी गेली याचे आडाखे बांधण्याइतके- आणि त्या आधाराने आपल्या जीवनाशी निगडित बाबींचे निर्णय घेण्याइतके ते निसर्गाचा भाग असतात.

त्या तुलनेत गाव-पाड्यावरचे मूल जेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते तेव्हा त्यामागे अभ्यासापेक्षा निव्वळ कुतूहल, जिज्ञासाच अधिक असते. दारचा राखणीचा कुत्रा, झाडावर नियमित दिसणारी खार, विशिष्ट वेळेला दारासमोरून जाणारी गाय अथवा शेळ्यांचे खांड, एखाद्या झाडाला फळे धरली की त्यावर येणारी पाखरे, माणसाच्या वसतीमध्ये बिनदिक्कत घुसून गोंधळ माजवणारी माकडे आणि कुठल्याही दाव्याखेरीजही माणसाच्या गुलामीच्या अदृश्य खांबाला बांधल्यासारखे स्थितप्रज्ञ वाटावे असे गाढव... ही सारी त्याच्या आयुष्याचा नि निरीक्षणाचा भाग होऊ लागतात. अशा वयातील मुलांचे नि निसर्गाचे नाते उलगडणारी दोन पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दुसरे म्हणजे जी.ए. कुलकर्णींचे ’बखर बिम्मची’. आणि त्याहीपूर्वी हाती लागलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णीं यांचे ’डोह’.

ही दोनही पुस्तके संस्कारक्षम वयातील मुलांच्या भावविश्वाचे बोट धरून पुढे जातात. बिम्मच्या आयुष्यात येणार्‍या गायीच्या, पिवळ्या पक्ष्याच्या, हत्तीच्या, कुत्र्याच्या पिलाच्या लहान-लहान गोष्टी मांडत जी. ए. त्याचे भावविश्व साकार करतात. त्याचबरोबर त्या गोष्टी एखाद्या बिम्मला वाचून दाखवणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठीही त्यात काही ठेवून देतात. तर ’डोह’मध्ये बिम्महून थोड्या अधिक वयाच्या- अधिक समज असलेल्या मुलाच्या तोंडूनच त्याच्या परिसराची ओळख दुसरे कुलकर्णी करुन देतात. यामध्येही या मुलाने बिम्मप्रमाणेच जगण्यातील जीवसृष्टीशी आपले नाते जोडले आहे. बिम्मप्रमाणे गाय, कुत्रा वगैरे माणसाला जवळच्या असणार्‍या प्राण्यांऐवजी त्यांच्या उपेक्षेचे- अनेकदा भीतीचे- विषय ठरलेल्या सुसर, घुबड आणि वाघळांसारख्या जीवांचीही दखल घेत जातो; वार्‍याच्या, पाण्याच्या प्रवाहाशी समरस होऊ पाहातो.

दोहोंमधील मुलाच्या वयोगटाशिवाय मांडणी आणि दृष्टिकोनाचा थोडा फरक आहे. जी. ए. बिम्मचे छोट्या गोष्टींच्या स्वरूपात मांडतात. तर श्री. वि. ’डोह’साठी आता जवळजवळ अस्तंगत झालेल्या ललित लेख या वाङ्मयप्रकाराची निवड करतात. माटे मास्तर, पु. ग. सहस्रबुद्धे, विद्याधर पुंडलिक आणि अलिकडचे ग्रेस या लेखकांचे ललित लेख माझ्या वाचनात आले आहेत. अनुभव, आस्वाद, विश्लेषण आणि लालित्य अशा विविध अंगांना स्पर्श करत जाणारा हा प्रकार कथनात्म साहित्यामध्ये कथा, कादंबरींच्या गोंगाटामध्ये कोपर्‍यात ढकलला गेला आहे. त्याची बलस्थाने आजचे समीक्षक नीट उलगडू शकतील का अशी मला शंकाच आहे, इतका तो उपेक्षित राहिलेला दिसतो.

एरवी वेचित ब्लॉगसाठी वेचे निवडताना दोन ते तीन पर्यायांतून कुठला निवडावा अशा संभ्रमात मला काही वेळ द्यावा लागतो. परंतु ’डोह’मधील वेचा निवडताना भूमितीमधील दोन बिंदूंतून जाणार्‍या एक आणि एकच रेषेप्रमाणे एकच वेचा- खरेतर पुरा लेख- सहजपणॆ निवडला. या लेखामध्ये निवेदक मुलाने वाघळांचा घेतलेला मागोवा उलगडून दाखवला आहे.

लेखाची सुरुवात निवेदकाच्या वैय्यक्तिक अनुभवांतून होते. त्यातून उल्लेख आलेल्या वाघळांकडे लक्ष वेधले जाते. त्यानंतर वास्तवाच्या नोंदी, दंतकथांचे संदर्भ, रोकड्या व्यावहारिक जगाचे संबंध यांसोबत वाघळांच्या वसतीच्या नि त्यांच्या जगण्याच्या विलक्षण संवेदनशीलतेने टिपलेल्या नोंदी या मार्गे अस्तित्वाच्या विलयापर्यंत केलेला प्रवास विलक्षण आहे. एका लहान मुलाने जगाकडे उलटे लटकून पाहणार्‍या वाघळांकडे इतक्या कुतूहलाने, जिज्ञासेने पाहणे ही देखील आता एक वाघळदृष्टीच म्हणावी लागेल.

- oOo -

(’डोह’मधील एक वेचा इथे. https://vechitchaalalo.blogspot.com/2023/04/blog-post.html )


हे वाचले का?