बुधवार, १७ मे, २०२३

वारसा आणि विचार

काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे."

कमलनें विचारलें, "कां ?"

शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं.

कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली.

आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्‍यावरची एक रेषासुद्धां बदलली नाहीं- जसा कांहीं एक दगडी पुतळाच - कांही दिसत नाहीं की कांही ऐकू येत नाहीं.

शेषप्रश्न

हा विक्षेप अविनाशला असह्य झाला होता. तो म्हणाला, "माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या."

कमल म्हणाली, "पण माझ्या पतीची परवानगी नाहीं. त्यांची अवज्ञा करणं योग्य का ?" असे बोलून ती हंसूं लागली.

अविनाशलाही हसल्यावांचून राहवले नाहीं. तो म्हणाला, "या बाबतीत तो दोष व्हायचा नाहीं. आम्हां एव्हढ्या लोकांचा मिळून आग्रह आहे. तुम्हीं बोला. "

कमल म्हणाली, “आजचा दिवस धरून आशुबाबूंना मी केवळ दोनच वेळ पाहिलंय. पण एव्हढ्याच वेळांत मला त्यांचा फार लोभ वाटू लागलाय- " असें म्हणून शिवनाथकडे बोट करून ती म्हणाली, "यांनी कां मला दटावलं तें आतां कळलं मला."

स्वतः आशुबाबू तिचें निवारण करून म्हणाले, "पण माझ्या दृष्टीनं तुला संकोच बाळगायचं कांहींच कारण नाहीं. हा बुढ्ढा आशु वैद्य अगदीचं भोळा माणूस आहे बरं कमल. दोनच दिवसांच्या भेटीत तू कांहीतरी ठरवलंस, आणखी दोन दिवस पाहिलंस म्हणजे तुला कळून येईल, की त्याची भीती बाळगण्यासारखी दुसरी कोणतीच चूक नाहीं. अगदी खुशाल बोल. तूं बोलशील तें ऐकायला मला खरोखरच आनंद वाटेल."

कमल म्हणाली, "पण एवढ्यासाठीच तर त्यांनी मला दटावलं. आणि एव्हढ्याचसाठीं अविनाशबाबूच्या प्रश्नाला उत्तर देतांना मला कठिण जातंय. स्त्री-पुरुषांच्या प्रेमाच्या व्यवहाराला मी महत्त्व देत नाहीं, आदर्श म्हणून मानीत नाहीं, असं उत्तर देणं मला खटकतंय."

आता अक्षयने तोंड उघडले. त्याच्या प्रश्नांत थोडीशी खोंच होती. तो म्हणाला, "तुम्ही मानीत नाहीं हें संभवनीय आहे- पण मानतां काय ते तरी आम्हांला ऐकवाल ?"

कमलनें त्याच्याकडे पाहिले पण उत्तर दिलें तें त्याला नव्हतें. ती म्हणाली, "केव्हांतरी एकदां आशुबाबूंनीं आपल्या पत्नीवर प्रेम केलं होतं. आतां ती हयात नाही. आता तिला कांहीं देता येत नाही की तिच्याकडून काही मिळण्याचाही संभव नाहीं. तिला सुखी करता येत नाहीं कीं दुःखही देतां येत नाहीं. ती मुळीं नाहींच. प्रेमाचं स्थान कसलीसुद्धां खूण न ठेवता पुसून गेलंय- आहे काय ती केव्हांतरी एकदां प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. माणूस नाहीं- नुसती आठवण आहे - ही आठवण मनांत सारखी घोळवीत ठेवायची, वर्तमानकाळापेक्षां भूतकालच चिरस्थायी असं समजून आयुष्य कंठायचं, या वृत्तींत कांहीं मोठासा आदर्श आहे असं मला मुळींच वाटत नाही."

कमलच्या तोंडच्या या शब्दांनी आशुबाबूंना पुन्हां धक्का बसला. ते म्हणाले, "कमल, पण आमच्या देशांतल्या विधवांना ही आठवण म्हणजेच काय तो जगायला आधार असतो. पति निवर्तला तरी त्याची नुसती आठवण उराशी कवटाळून ती आपल्या विधवाजीवनाची पवित्रता सांभाळीत असते. सांग- एव्हढं तरी तूं मानतेस का ?"

कमल म्हणाली, "नाही. नांव मोठं दिलं म्हणजे एकादी गोष्ट खरोखरच मोठी होते असं नाही. उलट मी असं म्हणते, या भावनेच्या सक्तीखाली या देशांतल्या विधवांना जबरदस्तीने वैधव्यांत राहायाला भाग पाडले आहे- आपणच सांगा, खोटया गोष्टींवर सत्याचा मुलामा देऊन लोक त्यांना फसवतात असंच नव्हे का? -आपण तसं म्हणाल तर मी नाकबूल करणार नाहीं."

अविनाश म्हणाला, “असंच जर चाललंय, माणूस जर त्यांची फसवणूकच करीत आला असेल, तर विधवेच्या ब्रह्मचर्यात- नको - राहू दे, ब्रह्मचर्याची गोष्ट नाहीं काढीत- पण विधवेच्या आमरण संयमशील जीवनांत अत्यंत पवित्रतेलाही काही महत्त्व द्यायचं नाहीं का?"

कमल हंसली आणि म्हणाली, "अविनाशबाबू, हा पाहा आणखी एक शब्दाचा मोह. 'संयम' हा शब्द वापरतांना आज कित्येक दिवस त्याचं महत्त्व वाढत वाढत एव्हढं अनावर होऊन गेलं आहे, की त्याच्या बाबतीत स्थलकाल, कारण अकारण कुणी पाहातच नाहीं. हा शब्द उच्चारला की माणसाची मान आपोआप त्यापुढं झुकते. पण अवस्थाविशेषानं हा शब्द म्हणजे एक फुसक्या आवाजापेक्षा जास्त नव्हे, असं कबूल करायला कुणा साधारण माणसाला भीती वाटत असली तरी मला वाटत नाहीं. मी त्या जातीतली नाहीं. पुष्कळ लोक कोणतीही एकादी गोष्ट पुष्कळ दिवसांपासून अशीच आहे म्हणून म्हणत असले तरी मी ती हिशेबांत घेत नाहीं. नवर्‍याची स्मृती हृदयाशी कवटाळून दिवस कंठणाऱ्या विधवेची स्वतःसिद्ध पवित्रतेची कल्पना ही खरोखरच पवित्र आहे असं कुणी मला सिद्ध करून दिलं नाहीं, तर ती पवित्रता कबूल करणही मला खटकेल.”

अविनाशला यावर उत्तर सुचेना. क्षणभर वेड्यासारखा पाहात राहिल्यावर तो म्हणाला, "काय बोलतेस हें ?"

अक्षय म्हणाला, "दोन आणि दोन म्हणजे चार होतात हें सुद्धां मला वाटतं आपल्याला सिद्ध करून दाखवलं नाहीं तर आपण कबूल करणार नाहीं?"

कमलनें याचें उत्तर दिलें नाहीं कीं ती रागावलीही नाही. नुसती हंसली.

आणखी एका व्यक्तीला राग आला नाहीं. ते म्हणजे आशुबाबू. खरें पाहिले तर कमलच्या भाषणाने सर्वांपेक्षां जास्त फटका बसला होता तो त्यांना.

अक्षय पुन्हां म्हणाला, "आपल्या या सार्‍या घाणेरड्या कल्पना आम्हां उच्चवर्णीयांत प्रचलित नाहींत. पूर्वीपासून आहेत त्याच समजुती तिथं कायम आहेत."

कमल तशीच हंसतमुखानें उत्तरली, "उच्चवर्णीयांत या समजुती कायम आहेत हें मलाही माहित आहे."

बराच वेळपर्यंत सारे उगीच बसले होते. त्यानंतर म्हणाले "आणखी एक प्रश्न तुला विचारतो कमल. पवित्रता अपवित्रतेसाठी नव्हे पण स्वभावतःच ज्याला यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं- उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस - मणीच्या स्वर्गस्थ आईच्या जागी दुसरी कुणी आणून बसवावी अशी कल्पना सुद्धा माझ्या मनात कधी आली नाहीं त्याचं काय ?"

कमल म्हणाली, "आपण म्हातारे झाला आहांत आशुबाबू.'

आशुबाबू म्हणाले, "आज म्हातारा झालोय हें मी कबूल करतो, पण त्यावेळी कांही म्हातारा नव्हतो- पण त्यावेळी सुद्धा मला असं वाटलं नाहीं कसं ?"

कमल म्हणाली, "त्यावेळीही तुम्ही असेच म्हातारे होता. देहानं नव्हे- मनानं. एकेक माणूसच असा असतो, की तो म्हातारं मन घेऊनच जन्माला येतो. त्या म्हातारपणाच्या पांघरुणाखाली त्याचं थकलेलं विकृत तारुण्य लाजेनं मान खाली पासून कायमचं झाकून राहिलेलं असतं. ते म्हातारं मन खूष होऊन म्हणतं, अहाहा ! हेंच तर उत्तम ! दंगा नाही, गडबड नाहीं-, शांति ती हीच - माणसाच्या जीवनाचं हेंच शेवटचं तत्त्वज्ञान ! किती प्रकारची किती विशेषणं देऊन तो तारीफ करीत असतो. त्या तारिफेच्या दमाक्यानं दोन्ही कान भरून जातात. पण ते त्याच्या जीवनाचं जयवाद्य नव्हे, आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे ही गोष्ट त्याला कळत नाही"

प्रत्येकाला वाटत होते, की यावर एकादें सणसणीत उत्तर द्यावे- बायकांच्या जातीच्या तोंडचे तें उन्मत्त यौवनाचे निर्लज्ज स्तुतिस्तोत्र सर्वांच्या कानांत तापलेल्या रसासारखं जाळीत जात होते. पण उत्तर देण्याजोगे शब्द कुणालाच सुचेनात. यावेळी आशुबाबू शांतपणे म्हणाले, “म्हातार्‍या मनाची तुझी व्याख्या काय आहे कमल ? मला जे वाटतं त्याच्याशी ताडून पहायचंय मला, की ते बरोबर आहे की ते चूक आहे ?"

कमल म्हणाली, “मनाचं वार्धक्य मी त्यालाच म्हणते आशुबाबू की जे पुढे पहायला तयार असत नाही. ज्याचं थकलेलं, जर्जर झालेलं मन भविष्यकालच्या सार्‍या आशांवर तिलांजली देऊन केवळ गतकालच्या आधारावर जिवंत राहू पाहतं- पुढं कांहीं करायचं आहे, काहीं मिळवायचं आहे असा आग्रहच नसतो त्याचा. वर्तमानकाल त्याच्या लेखी नसतोच- त्याला तो अनावश्यक वाटतो- निरर्थक वाटतो. आलाच नाहींसा वाटतो. गतकाल म्हणजेच त्याचं सर्वस्व- त्याचा आनंद- त्याच्या वेदना. तेंच त्याचं मुद्दल. तें मोडून खाऊन त्यावर आयुष्याचे बाकीचे जे कांहीं दिवस असतील ते कसेबसे कंठायची इच्छा असते त्याची. आतां पाहा ना तुम्हींच आशुबाबू, जमतं आहे का हें तुमच्या अनुभवाशीं ?”

आशुबाबू, हंसले आणि म्हणाले, “एकदां केव्हांतरी ताडून पाहीन मी."

ही सारी चर्चा चाललेली असतांना अजितकुमार मात्र एक शब्दही बोलला नव्हता. नुसता टक लावून सारखा कमलच्या तोंडाकडे पहात राहिला होता. इतक्यांत त्याला काय वाटले कोण जाणे, मन आवरणें त्याला अशक्य झाले. तो एकदम बोलला, "माझा एक प्रश्न आहे- असं पहा मिसेस-"

कमल सरळ त्याच्याकडे पहात म्हणाली, "तें ’मिसेस' कशाला ? कमल म्हणून हांक मारा ना मला."

अजित शरमेनें गोरामोरा झाला आणि म्हणाला, "छे, छे. असं कधीं "झालंय ? अशी ही रीत- "

कमल म्हणाली, "अशी ही रीत कसली ? आईबापांनी माझं जें नांव ठेवलं आहे ते कुणीतरी हांक मारण्यासाठी. त्याचा मला कशाला राग यायला हवा ? एकदम मनोरमेच्या चेहर्‍याकडे पाहात ती म्हणाली, "आपलं नांव मनोरमा- मी तशीच हांक मारली तर राग येईल का आपल्याला ?" मनोरमा म्हणाली, "हो, येईल !" ती असें उत्तर देईल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. आशुबाबू तर संकोचाने एवढेसे झाले.

कांहीं वाटलें नाहीं ते कमलला स्वत:ला. ती म्हणाली, "नांव म्हणजे तरी काय- नुसता एक शब्द. पुष्कळांतून एका माणसाला टिपून काढायचं एक साधन. पण संवयीमुळे तेंहि कित्येकांना खटकतं हें ही तितकंच खरं. ते या शब्दाला नाना प्रकारांनी सजवून ऐकण्याची इच्छा धरतात. राजे लोकांचीच गोष्ट घ्या-  त्यांच्या नांवाच्या मागंपुढं कांहींतरी निरर्थक शब्द जोडले जातात- एकदोन श्री जोडल्याशिवाय तो शब्द ते दुसर्‍याला उच्चारू देत नाहीत- नाहींतर त्यांचा अपमान होतो-" असे म्हणून ती हंसत सुटली आणि शिवनाथकडे बोट दाखवून म्हणाली, “-जसे हें. कधी म्हणून 'कमल' म्हटलं नाही यांनी. म्हणतात 'शिवानी' म्हणूनच हांक मारा की ! शब्दही लहान आहे- अन् कळेलही सर्वांना - निदान मला तरी कळेल."

एव्हढी उघड उघड सूचना मिळाल्यावरही अजित बोलला नाहीं कां हेंच कळेना. प्रश्न त्याच्या तोंडच्या तोंडींच राहिला.

त्यावेळी दिवस मावळला होता. मार्गशीर्षातल्या धुरकट आकाशांत मळकट चांदणे दिसून येत होते, तिकडे बापाचे लक्ष वेधून मनोरमा म्हणाली, "दंव पडायला सुरवात झालीय बाबा. आता पुरे. आता तरी उठा."

आशुबाबू म्हणाले, "हा उठलोच पहा पोरी."

अविनाश म्हणाला, "शिवानी नांव फार छान. शिवनाथ गुणी माणूस- त्यामुळे त्यानं नावही दिलंय तें मोठं गोड. स्वतःच्या नांवाशीं तें खिळवलंयही मोठ्या खुबीनं.”

आशुबाबू उसळून उठून म्हणाले, "हा शिवनाथ नव्हे रे अविनाश तो- वरचा !" असे म्हणून त्यांनी आकाशाकडे नजर फेकली आणि म्हटले, “जगाच्या आरंभापासूनचा तो म्हातारा 'भद्रेश्वर दीक्षित' चोहीं बाजूनं पारखून अशी जोडपी जुळवण्यासाठीं आहार निद्रा सुद्धां गमावून जागत बसलाय ! जीते रहो !"

तितक्यांत अक्षय एकदम सरळ होऊन बसला. दोनतीन वेळ मान हालवून, आपले पिचके डोळे शक्य तितके टवकारून म्हणाला, "ठीक आहे- मी आपल्याला एक प्रश्न विचारू का ?"

कमल म्हणाली, "कसला प्रश्न ?'

अक्षय म्हणाला, "आपण तसा कांहीं संकोच बाळगीत नाहीं म्हणून विचारतों ! 'शिवानी' हें नांव मोठं सुंदर आहे- पण शिवनाथबाबूंबरोबर खरोखरच आपलं लग्न झालंय का ?"

आशुबाबूचा चेहरा काळवंडून गेला. ते म्हणाले, "हें काय बोलतां अक्षयबाबू ?"

अविनाश उद्गारला, "तुला काय वेड लागलंय ?”

हरेंद्र म्हणाला, "ब्रूट !"

अक्षय म्हणाला, “तुम्हांला माहित आहे, मी उगीच खोटी भीडभाड घरीत नाहीं."

हरेंद्र म्हणाला, “खऱ्या खोट्या भिडेची चाड तुला नसेल, पण आम्हाला तर आहे !"

कमल मात्र नुसती हंसत होती. जशी कांहीं ही थट्टेची बाबच होती. ती म्हणाली, “एवढं रागवायला कशाला हवं हरेंद्रबाबू ? मी सांगतें अक्षयबाबू- मुळीच कांहीं झालं नाहीं असं नाहीं. लग्नविधीसारखं काहीतरी झालं होतं- जे पहायला आले होते ते मात्र हंसूं लागले. ते म्हणाले, 'हें लग्न म्हणजे लग्नच नव्हे,- ढोंग !' यांना विचारलं तेव्हां हें म्हणाले, की हें लग्न झाल शैवपद्धतीनं. मी म्हटलं, ठीक आहे. कांहींतरी झालं खरं ! शिवाबरोबरचं लग्न जर शैव पद्धतीनं झालं तर मग त्यांत कसला विचार करायचा ?"

तें ऐकून अविनाशला वाईट वाटले. तो म्हणाला, “आपल्या समाजांत आतां शैवविवाह रूड नाहीं. उद्या जर यांना वाटलं, की हें लग्न झालंच नाहीं असं म्हणावं, तर तुला कांहींच पुरावा करता यायचा नाही.'

शिवनाथकडे पाहून कमलनें विचारले, “काय हो, असं कांहीं करणार आहांत वाटतं केव्हातरी ?"

शिवनाथ तसाच उदासवाण्या गंभीर मुद्रेनें बसला होता. त्याने कांहींच उत्तर दिलें नाहीं. तें पाहून हंसण्याच्या मिषाने कपाळावर हात मारून कमल म्हणाली, "हाय रे नशिबा ! झालं नाहीं म्हणून नाकबूल करायला हें जातील, आणि झालं आहे म्हणून इतरांपुढं शाबित करायला मी जाणार आहे होय ? त्यापूर्वी गळ्याला फांस लावायला एकादी दोरीसुद्धां नाहीं का मिळायची ?"

अविनाश म्हणाला, "मिळेल बरं- पण आत्महत्या म्हणजे पाप.' कमल म्हणाली, “पाप कसलं डोंबलाचं ! पण तें व्हायचं नाही. मी आत्महत्या करायला निघेन असं ब्रह्मदेवालासुद्धां वाटायचं नाहीं."

आशुबाबू एकदम म्हणाले, "हें मात्र माणसासारखं बोललीस कमल."

अर्जदाराचा आव आणून कमल त्यांच्याकडे पाहून म्हणाली, "पाहा तर खरं- अविनाशबाबू कशी माझी अब्रू घेताहेत !-" शिवनाथचा निर्देश करून ती म्हणाली "हें जातील मला झिडकारायला, आणि मी काय जाणार आहे माझा स्वीकार करा म्हणून यांच्या गळी पडायला ? सत्य गेलं चुलींत- अन् जे कसलाच विधि मानीत नाहींत त्यांना दोरीनं बांधून ठेवू का मी? मी का करायला जाणार आहे असं कांहीं ?" बोलता बोलतां तिच्या डोळ्यांतून ठिणग्या उडूं लागल्या.

आशुबाबू शांतपणे म्हणाले, "शिवानी, या जगांत सत्यापेक्षां दुसरं कांहीं मोठं नाहीं हें आपणां सर्वांनाच पटतं, पण लग्नविधी म्हणजे कांहीं खोटा नव्हे !"

कमल म्हणाली, “मी कुठं खोटा म्हणतेय ? प्राण जसा सत्य तसाच देहही सत्य- पण प्राण जेव्हां निघून जातो तेव्हां ?"

बापाचा हात धरून ओढीत मनोरमा म्हणाली, "फार दंव पडतंय बाबा. जातां उठलंच पाहिजे. "

"हा उठलोंच ग !"

शिवनाथ एकदम उठून उभा राहून म्हणाला, "चल शिवानी, आतां पुरे झालं. चल."

- oOo -

१. मणी: मनोरमेचे हाक मारण्याचे नाव.

२. गोविंद बल्लाळ देवल यांनी ’जरठ-बाला विवाह’ या विषयावर लिहिलेल्या 'संगीत शारदा' या नाटकातील लग्ने जुळवणारा मध्यस्थ. हा उल्लेख शरच्चंद्रांच्या कादंबरीत अर्थातच नाही. हा वरेरकरांनी जोडलेला मराठी संदर्भ आहे.

पुस्तक: शेषप्रश्न
लेखक: शरच्चंद्र चॅटर्जी (अनुवाद: भा. वि. वरेरकर)
आवृत्ती: तिसरी
प्रकाशक: नवभारत प्रकाशन संस्था
जुलै १९८०.
पृ. ६१-६९.


हे वाचले का?

सोमवार, ८ मे, २०२३

तहान

दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली.

कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई.

सत्तांतर

आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.

या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड पाण्याच्या काठावर होतं. सुमारे साठ पावलांचं अंतर होतं आणि ते अंतर पार करून पाणी पिऊन, परत झाडावर येणं हीच गोष्ट फार जोखमीची होती. साग झाडीच्या कडेवर होता. मागे टेकडी होती आणि गर्द झाडं-झुडपं होती. या जाळकटात दबा धरून कोणीही हिंस्र पशू बसला असण्याची शक्यता होती.

मुडा आपल्या टोळीसह या झाडावर काही वेळ बसला. सर्वांनी आपल्या तीक्ष्ण नजरेनं आजूबाजूचं रान निरखून घेतलं. काही गडबड न करता सगळी टोळी गप्प अशी सागाच्या झाडावर काही वेळ बसून राहिली.

कोणतीही धारिष्ट्याची गोष्ट करताना आणीबाणीचे क्षण अगदी थोडे असतात आणि त्यांना सामोरं जाणं हीच खरी परीक्षा असते.

ही जोखीम घेण्याची जबाबदारी आता सर्व टोळीपैकी फक्त दोघांवर होती- तरणीवर आणि मुडावर. या दोघांपैकी कोणी पुढं झाल्याशिवाय, तहानेनं व्याकूळ झालेल्या वानरांपैकी कोणीही जागचं हलणार नव्हतं.

टोळीतील सर्व जाणती वानरं आता फार गंभीर दिसत होती. मुडा विशेष गंभीर होता. तरणीही विशेष गंभीर होती.

अखेर मुडानं धारिष्ट केलं. तो सरासरा झाडाचं खोड उतरून दाणादाण उड्या घेत उतार उतरला आणि सावधगिरी म्हणून पाण्यापासून पंधरा-वीस पावलं अंतरावर गवतात बसून राहिला.

सगळी वानरं स्तब्ध राहून बघत होती.

बाजूच्या झाडीतून झेपावत काळ आला, तर जिवाच्या करारानं, सगळं बळ एकवटून वाऱ्याच्या वेगानं सुसाट पाठीमागं पळणं आणि उतरला तो साग चपळाईनं पुन्हा चढणं एवढंच मुडाला करता येण्यासारखं होतं. पळण्यावाचून दुसरं कोणतंही संरक्षक हत्यार त्याच्यापाशी नव्हतं. त्याला तीक्ष्ण नख्या नव्हत्या, अक्राळविक्राळ जबडा नव्हता. पोलादी कवच नव्हतं. माथ्यावर जबरदस्त शिंगं नव्हती.

सावकाश असे काही ताणलेले क्षण गेले. काही वावगं घडलं नाही.

मग शेपूट वर करून पावलं टाकत मुडा पाण्याच्या अगदी काठाशी गेला. ओल्या काठाशी जाऊन बसला. त्यानं चौफेर बघून घेतलं. काही धोकादायक असं दिसलं नाही.

पण खरे आणीबाणीचे क्षण इथून पुढे होते. पाणी पिण्यासाठी दोन्ही हात जमिनीला टेकून मुडाला वाकावं लागणार होतं. तोंड लावून पाणी प्यावं लागणार होतं आणि एकवार तोंड पाण्याला लावल्यावर मागून कोण येत आहे, हे त्याला मुळीच समजणार नव्हतं. गंभीरपणानं पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे बघत मुडा बसून होता.

तरणीनं मग धारिष्ट्य केलं. ती सरासरा साग उतरून झेपावत थेट पाण्याकाठी आली आणि मुडाच्या पाठीशी हातभर अंतरावर बसून तिनं चौफेर नजर टाकली. मागून कोणी नकळत येणं फारच कठीण आहे, हे तिला माहीत होतं. कारण अजून सागाच्या झाडावर बसून राहिलेल्या टोळीनं तत्काळ चीत्कार करून तिला सावध केलं असतं.

मागं 'तरणी' आहे, हे बघताच दोन्ही हात गवतात ठेवून मुडा खाली वाकला आणि त्यानं पाण्याला तोंड लावलं.

तब्बल चार-पाच क्षण त्यानं पाण्याला लावलेलं तोंड वर उचललं नाही. मग तीन पोरं धिटावून खाली उतरली आणि मुडाच्या ओळीत पंगतीला बसावी, तशी पाण्याच्या काठी बसली.

आकंठ पाणी पिऊन होताच तत्काळ मुडा उडाला आणि या धोकेबाज पाण्याकाठी क्षणभरही न रेंगाळता सागाकडे धावला.

धीट पोरं मागं बसलेली बघून तरणीनं, मुडानं ज्या जागी पाण्याला तोंड लावलं होतं, त्याच जागी तोंड घातलं. तिचं पाणी पिऊन अजून संपलं नाही, तोवरच एक पोर पुढं होऊन ओणवं झालं. त्यानं पाण्याला तोंड लावलं. दोघं पोरं राखणदारासारखी मागं बसूनच होती.

अशा पद्धतीनं पाणी पिण्याचा हा विधी चांगला अर्धघटका चालू राहिला आणि निर्वेधपणानं पाणी पिऊन सगळी टोळी पुन्हा उड्या ठोकीत पांगली.

- oOo -

पुस्तक: सत्तांतर.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती बारावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ९-११.

(पहिली आवृत्ती: १९८२. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

शनिवार, ६ मे, २०२३

अ‍ॅलिस आणि आरसा

ही अॅलिस आहे.

-मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !"

"होय तर! मग*, तुला काय हवे होते ?"

"आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली.

"मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते."

माणसेः अरभाट आणि चिल्लर

ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाही. तो तिला चुकणार नाही, पण सध्या तरी तो नाही हे खरे. अनेकदा ती विनयशील आहे. पण ती प्रसंगी सावध आणि स्पष्ट देखील आहे.

एकदा जेवायला बसल्यावर टेबलावर एका प्लेटमध्ये मटण आणून ठेवले जाते. तेव्हा राणी त्याची अॅलिसशी ओळख करून देते. मटण देखील प्लेटमधूनच किंचित वाकून तिला नमस्कार करते, आणि अॅलिस सुध्दा तसे करते. मग खाण्यासाठी एक तुकडा कापण्याचा तिचा विचार असतो, तर राणी रागाने म्हणते, "छट्, असे कधी होते की काय ? ज्याची ओळख करून दिली आहे त्याचा तुकडा कापणे हा का शिष्टाचार झाला ? वेटर, मटणाची प्लेट घेऊन जा."

मग पुडिंग येते. तेव्हा घाईघाईने अॅलिस राणीला म्हणते, "आता कृपा करून पुडिंगची ओळख मात्र करून देऊ नको. नाही तर मग पोटात काही सुध्दा जाणार नाही."

Let there be light and there was light, हे सामर्थ्य परमेश्वराचे. त्याखालोखाल सामर्थ्य कलावंताचे. त्याने कागदावर लेखणी टेकताच वादळ घोंगावू लागते, आणि व्याकुळ झालेला लियर माळरानावर भरकटू लागतो. सगळ्यांनी टाकलेला, सगळीकडून हाकलला गेलेला आंधळा इडिपस मृत्यू शोधत अथेन्समधील वनराईकडे चालू लागतो.

अॅलिसचे जग अगदी लहान, कोवळे आहे. पण त्या जगात मात्र ती तितकीच सामर्थ्यशाली आहे. "Let us pretend" म्हणताच तिला वाटेल ते शक्य होते. ती सरळ वर स्टँडवर चढून आरशातून पलीकडे जाऊ शकते. शिवाय काही वेळा तिची जीभ देखील तिखट होते. ती एकदा एका राणीला स्पष्ट सांगते, "मी मुळीच गप्प राहणार नाही. तुला विचारतेय कोण ? तुम्ही सगळीच जण पत्त्याच्या डावातील नुसती पाने आहात..." या तिच्या शब्दांनी मात्र तुटल्याप्रमाणे सगळेच वाऱ्यावर उडतात आणि खाली येऊन तिच्या अंगावर निर्जीव अवस्थेत पडू लागतात.

अॅलिस, तुझ्या बोलण्यात किती अर्थ भरून राहिला आहे, हे तुला नंतर कधी तरी कळून येईल. पण आता हे शब्द एका लहान कोवळ्या वृक्षातून आल्याप्रमाणे वाटतात. पत्त्यातील फक्त पाने... सम्राट व त्यांच्या राण्या, युगप्रवर्तक एक्के आणि दुऱ्या, तिऱ्या असली चिल्लर पाने... सगळीच वाऱ्यावर भरकटत खाली पडतात.

"आता ज्यूरींनी आपला निर्णय सांगावा." राजा म्हणाला. तसे म्हणण्याची त्याची ती विसावी खेप होती.

"छट्‌! असे कधी झालेय का ?" राणी म्हणाली, "ते काही नाही. आधी शिक्षा, मग न्याय- निर्णय!"

"हा काय आचरटपणा आहे ?" अॅलिस रागाने म्हणाली.

"ए, तू जीभ आवरून गप्प बस."

"मी मुळीच गप्प बसणार नाही." अॅलिस जोराने म्हणाली.

--आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तुला चमत्कारिक वाटले, अॅलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षानी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयुष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कुठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशेब होतो. निदान शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगत असता आपली शिक्षा सुरू झालेली असते.

"हा काय आचरटपणा आहे ?" असे पुन्हा एकदा म्हण, अॅलिस. “Let us pretend” म्हणत तू आरशातील घरात सहज गेलीस. तुझ्या स्वच्छ, निर्लेप मनाला इकडची बाजू कोणती, आरशातील बाजू कोणती याची स्पष्ट जाणीव होती. माझे मात्र तसे नाही. काही वेळा खरे जग कोणते, आरशातले कोणते, हेच उमगत नाही. इकडे काही वेळा अशा घटना घडतात की आपण आरशात गेलो की काय, अशी शंका वाटते. तर काही वेळा जर कल्पनेने आरशात गेलो तर क्षणातच अगदी इथल्या जगातील घटनेप्रमाणे काही तरी कठोर विषारी घडते, तेथील तरल वातावरण नष्ट होते आणि पुन्हा मी ठिकाणी येऊन पडतो. अॅलिस, आमची खरी अडचण अशी आहे की, आम्ही इकडे नाही, व पूर्णपणे आरशात नाही; तर मध्येच काचेतच अस्ताव्यस्तपणे अडकून पडलो आहोत. त्यात आमचे आणखी हाल म्हणजे आमच्या बाबतीत एकच आरसा असत नाही. एका मोठ्या आरशासमोर दुसरा एक आरसा असतो. आरशामागील आरशांतील अनेक जगे, आमची अनेक चित्रे. मग त्यात खरी खोली कोणती, आरशातील कोणती, आरशातील कोणता मी खरा, हे काहीच कळत नाही, आणि मी भांबावून जातो.

काही समजतच नाही. काही समजतच नाही.

तू आरशात जाऊन पुन्हा परतलीस. ते कसे करावे, हे कुणी तरी तुला विचारून ठेवायला हवे होते. पण तरी देखील तुझ्या मनात एक शंका राहिलीच. हे सारे स्वप्न तुलाच पडले की तूच दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊन आलीस, याविषयी तुझ्या मनात संशय राहिला. तसला किती तरी जास्त धारदार संशय आम्हांलाही अनेकदा त्रस्त करतो. आम्हांलाच कसली तरी विषारी भयाण स्वप्ने पडत आहेत की आपणच वाट चुकून कुणाच्या तरी भीषण अर्थहीन स्वप्नात हिंडत आहोत, याविषयी भ्रांत वाटू लागते. आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांत असतो काय, किंवा दुसरे येऊन आपल्याला छळत असतात काय ! म्हणजे एकंदरीने "Hell is other people" हेच खरे की काय ?

नदीकाठी गवतावर तू झोपली असता तुला पहिले स्वप्न पडले. म्हणून तू त्या ठिकाणी पुन्हा यावीस, तुला पुन्हा यापुढील स्वप्ने पडत जावीत. ती तू मला ऐकवावीस म्हणजे कदाचित आपल्या हाती काही तरी लागेल, मला काही तरी जास्त समजेल, असे मला फार वाटते, व त्या मोहाने मी त्या ठिकाणी थांबण्याचा विचार करतो. पण ही आशा अगदी फोल आहे, हे मला माहीत आहे. तुझा प्रवास इतरांप्रमाणे पुढेच असतो, व पुढे गेल्यावर तुला उलट मागे येता येणार नाही. फक्त भुते आणि आठवणी यांनाच उलटी पावले असतात. तू पुढे गेल्यावर आणखी एका अॅलिसला स्वप्ने पडतील, हे खरे आहे. पण तोपर्यंत थांबणे मला शक्य होणार नाही. एका जागी स्थिर राहायला किती वेगाने धावावे लागते हे तुला माहीत आहे. तेवढा वेग आता माझ्या पावलांना शक्य नाही.

असल्या बाबतीत कधी अखेरचा शब्द असू शकतो का ? असलाच तर तो कुणाचा असू शकेल ? योगेश्वराचा की भुशुंड काकराजाचा कृष्णशब्द ? की अॅलिसचा कोवळा, नवथर पण धीट निर्णय-- तुम्ही सारीच पत्त्यातील पाने आहात, आणि "मला तुमची कसलीच भीती वाटत नाही" हे शब्द ? काहीच समजत नाही. समजत नाही.

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मीकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठे तरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.

अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही असे म्हणत एक उच्छ्‌वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्‌वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात, 'समजत नाही, समजत नाही, समजत नाही.'

की ’समजत नाही, समजत नाही’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील ? ते देखील समजत नाही.

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १३१-१३४.

 

* पुस्तकामध्ये इथे ’मग’ ऐवजी ’मला’ असा शब्द आहे, जो मला मुद्रणदोष आहे असे वाटते. तसेही एकुणात पुस्तकात मुद्रणदोष नि विरामचिन्हांचे घोटाळे बरेच दिसतात. स्वल्पविरामाचे अत्यंत चुकीचे वापर त्रासदायक वाटतात... अर्थात त्यांच्याकडे लक्ष गेले तर.
 


हे वाचले का?