सोमवार, २४ मे, २०२१

स्त्री-सबलतेचा जाहिरनामा

गोनीदांच्या ’जैत रे जैत’ मधील वेचा शेअर करताना चिंधीबद्दल म्हटलं होतं की भारतीय साहित्यात अशी कणखर नि स्वयंपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा क्वचितच आढळते. जगभरातील बहुतेक नागर संस्कृतींनी आणि त्यांना वेटाळून राहिलेल्या संघटित धर्मांनी स्त्रीला दुय्यम स्थान देऊन तिला जखडून टाकले आहे. अनागर संस्कृतीचा वारसा सांगणारी चिंधी आणि जिला कोणत्या एका संस्कृतीचा वारसाच नाही अशी शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल, या दोघी या परिघाबाहेर असल्यामुळेच तथाकथित नागर संस्कृतीच्या जाचातून सुटू शकल्या असाव्यात.

डिस्ने स्टुडिओजच्या प्रिन्सेसची- नायिकांची मांदियाळी पाहिली, तर त्यातही कॉकेशन अथवा गोर्‍या वंशाच्या स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजुक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्‍या उद्धाराची वाट पाहणार्‍या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्‍या असतात.

तथाकथित संस्कृतींनी आखून दिलेल्या रेषेला ओलांडून पुरुषी एकाधिकारशाही असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकणार्‍या त्यांच्या नायिका मात्र अन्य वंशाच्या आहेत. चिनी वंशाची मूलान अवघड प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेते. समोअन-पॉलिनेशिअन वंशाची मो’आना समुद्राचे उधाण बेगुमानपणे अंगावर घेत हरवलेल्या जीवनदृष्टीला अंधश्रद्धेच्या जाचातून मोकळी करते. पोकहोन्ताससारखी नेटिव अमेरिकन एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेल्या दोन जमातींमध्ये समेट घडवणारी शांतिदूत ठरते आणि अरेबियन वंशाची जॅस्मिन युवराज्ञी असून रस्त्यावरच्या फाटक्या पोराला जोडीदार म्हणून निवडण्याइतके स्वातंत्र्य घेते आहे.

जॅस्मिन-अलादिनच्या कथेवर डिस्ने स्टुडिओने यापूर्वी चलच्चित्र- म्हणजे अ‍ॅनिमेशन स्वरूपात ’अलादिन’(१९९२), ’रिटर्न ऑफ जफ़र’ (१९९४), ’अलादिन अ‍ॅंड द किंग ऑफ थीव्ज’(१९९६) हे चित्रपट आणि अलादिन (१९४-९५) ही मालिका सादर केली आहे. दोन वर्षांपूर्वी (२०१९) त्यांनी विल स्मिथ या प्रसिद्ध अभिनेत्याला सोबत घेऊन त्याच कथेवर ’अलादिन’ हा चित्रपट तयार केला होता. चित्रपट जरी मागच्या चलच्चित्रपटांपेक्षा (माझ्या मते) बराच डावा उतरला असला तरी त्यातील जॅस्मिनचे हे गाणे मात्र चांगलेच लक्षात राहिले.

[Verse 1]
Here comes a wave meant to wash me away
A tide that is taking me under
Swallowing sand, left with nothing to say
My voice drowned out in the thunder

[Pre-Chorus]
But I can't cry
And I can't start to crumble
Whenever they try
To shut me or cut me down

[Chorus]
I can't stay silenced
Though They  want keep me quiet
And I tremble when you try it
All I know is I won't go speechless

[Verse 2]
Written in stone
Every rule, every word
Centuries old and unbending
"Stay in your place
Better seen and not heard"
Well, now that story is ending

[Pre-Chorus]
'Cause I
I cannot start to crumble
So come on and try
Try to shut me, cut me down

[Chorus]
I won't be silenced
You can't keep me quiet
Won't tremble when you try it
All I know is I won't go speechless, speechless

Let the storm in
I cannot be broken
No, I won't live unspoken
'Cause I know that I won't go speechless

[Bridge]
Try to lock me in this cage
I won't just lay me down and die
I will take these broken wings
And watch me burn across the sky
Hear the echo saying:

[Chorus]
I won't be silenced
Though you wanna see me tremble when you try it
All I know is I won't go speechless, speechless

'Cause I'll breathe
When they try to suffocate me
Don't you underestimate me
'Cause I know that I won't go speechless

[Outro]
All I know is I won't go speechless, speechless 
	

पूर्वी Family Reunion नावाची एक विनोदी मालिका पाहात होतो. त्यातील नको तिथे बोलणार्‍या आपल्या नातवाला दम देताना आजी म्हणते, 'In my days, children were seen but not heard. And those which are heard are not seen.' त्या गर्भित धमकीवरची त्या नातवाची प्रतिक्रिया पाहून त्यावर खळखळून हसलो होतो. पण इथे संदर्भ बदलताच तेच वाक्य... "Better seen and not heard" किती भेदक भासते. अनेक शतकांच्या नि अनेक समाज/संस्कृतींमधील स्त्रियांचे स्थान त्या एका वाक्यातून व्यक्त होते आहे.

हे गाणे म्हणजे सर्वच समाजात शोषित असलेल्या स्त्रीच्या सबलतेचा जाहीरनामाच आहे. चिंधी आणि कमलच्या पावलावर पाऊल टाकत यातील जॅस्मिन पुरुषप्रधान समाजाला ’मी मूक राहणार नाही’ असे ठणकावून सांगते आहे. तुमच्या दबावाखाली मी ढासळणार नाही, कोसळणार नाही असा आत्मविश्वास ती व्यक्त करते आहे. स्वत:च्या ताकदीचे भान तिला असल्याचे ती स्पष्टपणे सांगते आहे.

’आपली पायरी सांभाळ’ म्हणत दुय्यम स्थान देणार्‍या संस्कृतीला मी आता जुमानणार नाही असा निर्धार तिने केला आहे. संस्कृतीचे ठेकेदार मला मागे खेचण्याचा, गाडून टाकण्याचा प्रयत्न करतील, पण ते अयशस्वीच होतील, असा विश्वास तिला आहे. माझी मुस्कटदाबी ते करु शकत नाहीत; निर्भयपणे, मोकळेपणाने जगण्याचा माझा हक्क ते हिरावून घेऊ शकत नाहीत, असा उद्घोष तिने केला आहे.

’उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.’ मध्ये गुरफटलेल्या भारतीय स्त्रीलाही जॅस्मिनप्रमाणे ’मूक राहणार नाही, भिणार नाही, ढासळणार नाही की मोडणार नाही.’ हा नवा वसा घेण्याची गरज आहे.

- oOo -

मूळ चित्रपटातील वर शेअर केलेले गाणे दृश्य बाजूने जरा आक्रस्ताळे भासते.गाण्याच्या शब्दातील ठामपणा, निग्रह, आत्मविश्वास उलगडण्याऐवजी एखाद्या लाडावलेल्या मुलीचा आक्रस्ताळा हट्ट पाहिल्याचा भास होतो. पण चित्रपटाच्या पूर्व-जाहिरातीसाठी अधिकृतरित्या प्रसिद्ध केला गेलेला व्हिडिओ त्यामानाने बराच सुसह्य आहे. तो इथे जोडतो आहे.

पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ यांतील गाण्याच्या शब्दरचनेत थोडा फरक आहे. चित्रपटातील गाण्यात पहिल्या कडव्याच्या प्री-कोरसमध्ये दोनदा can't असा शब्द आहे तर या दुसर्‍या व्हिडिओमध्ये तो won't अस बदलून घेतला आहे, जो अधिक सयुक्तिक आहे.

Can't मध्ये असलेली शरणागत, हताशेच्या भावनेची छटा Won't मुळे निर्धारात रूपांतरित होते. याशिवाय शेवटच्या कडव्यातील ’'Cause I'll breathe...’ ने सुरु होणार्‍या प्री-कोरसच्या चार ओळी इथे पहिल्या कडव्यालाही जोडून घेतल्या आहेत.

व्हिडिओ एडिटिंगचे तंत्र अगदी सुलभ झाल्यापासून वेगवेगळ्या व्हिडिओज्‌ची सरमिसळ करुन नवा व्हिडिओ तयार करण्याचा प्रघात पडला आहे. इन्स्टाग्राम,टिकटॉक यांच्यासारख्या माध्यमांतून पाहायला मिळणार्‍या अतिलघुपटांमध्ये प्रामुख्याने विनोदनिर्मितीसाठी हा कारभार केला जातो. पण क्वचित याचा एखादा सर्जनशील अवतारही पाहायला मिळतो.

या नव्या अलादिन (२०१९) मधील नओमी स्कॉटच्या या गाण्यातील शब्द नि त्यातील भावांना अनुसरून १९९२ मध्ये आलेल्या त्याच नावाच्या चलच्चित्रपटातील (Animation film) प्रसंगांची साखळी तयार करुन 'Unofficially Regal' या यूट्यूब चॅनेलवर हा नवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील कौशल्य दाद देण्याजोगे आहे.


हे वाचले का?

रविवार, २३ मे, २०२१

तडा

उन्हाळा सुरू झाला.

डोंगरावरला महादेव पुन्हा म्हातारा झाला. त्याच्या अंगावरलं लांबलांब गवत सगळं वाळून गेलं. भरारा वारा सुटे. त्याच्या लाटांबरोबर ते ठिकच्या ठिकाणी आपटू लागलं. महादेवाच्या डुईवरल्या झाडाची पानं गळून पडली. नाग्या उसासून म्हणाला,

'अरं माज्या देवा ! कशी रं तुजी दशा !'

जैत रे जैत

नागलीवरीच्या कणग्या पार मोकळ्या झाल्या. आढ्याच्या लगीला टांगून ठेवलेल्या, क्वचित कुठं दिसणाऱ्या मकईच्या माळाही दिसेनाश्या झाल्या. भात कधीच गुप्त झालं होतं. जेमतेम बी बियाणाची डालगी शेणानं लिंपून ठेवलेली शिल्लक राहिली. कुठं कुणाकडं तर तीही फुटली. जगू वाचू तर वाढीदिढीनं आणून पेरू. पोटाला अन्न तर पाहिजे !

ठाकर जवानांच्या छातीच्या फासळ्या दिसायला लागल्या. गालफडं बसली. मोसमात तीनतीनदा भाताची भुगणी सफै केलेल्या ठाकरांच्या मुखी एका वेळी पेज लागणंही कठीण झालं. मग त्यांनी फासे अन् वाघुरा बाहेर काढल्या. शेतातली कामं जेमतेम उरकली, की ठाकरगडी पाखरांच्या अन सशांच्या मागे धावू लागले. त्यांनी मारलेले फेकलेले धोंडे जाळ्याजाळ्यांतून अडकू लागले. जाळ्यात बसलेले ससे बावरे होऊन पळू लागले. आरडाओरड्यानं रानं गर्जून गेली.

थोरल्या भगताचं ठीक चाललं होतं. उन्हाळा लागला असला, तरी भुताखेतांची काही काशीयात्रेसाठी प्रस्थान ठेवलं नव्हतं. ती झाडांना धरीत होती. झाडं घुमत होती. भगताच्या हातच्या छड्या खात होती. कोंबड्या अंड्यांची निवदबोणी देत होती. भुतं तेवढ्यावर संतुष्ट होऊन झाडं सोडून मुक्कामावर जात होती. भगताच्या घरी सुपं भरभरून कोंडाकणी पोचत होती. नाग्या पेज पीत होता. रात्रंदिवस ढोल घेऊन बसत होता. कधी नानापरीचे चमत्कारिक परण काढीत होता. कधी ढोलाच्या खोडावर डोकं टेकून रितेपणात बुडून जात होता.

तो सशाघोरपडींच्या शिकारीला जात नव्हता. पाखरांमागे धावत नव्हता. मासळीसाठी ओढाखोड्यातली डबकी उपशीत नव्हता. असा तो बामणावाणी पुन्येवंत व्हायला धडपडत होता, तरी ठाकरांच्या गळ्यातला तन्मणी होता. त्याला हजार अपराध माफ होते. त्याच्या ढोल वाजवण्यावरून अवघा राहाळ ओवाळून जात होता.

भुत्या अन् चौघेजण तीन ससे अन् दोनतीन पाखरं मारून परतले. भुत्या एकदम थांबून म्हणाला,

"काय रं? लई दिसात नाच झाला नही !"
"गडी शिकारीमागं पांगलेले !"
"नाग्याचा ढोल आइकला का सगळे जमा होत्याल."
"आज हूंद्या !"
"हूंद्या आज !"

परतता परतता भुत्यानं नाग्याला निरोप दिला. नाग्या थरारला. सांज होताच तो ढोल घेऊन भुत्याच्या अंगणात जाऊन बसला. अंगणाच्या मधुमध बसून त्यान ढोलावर कांडकं टाकलं, तशी ठाकरवाडी सजग झाली.

आज नाग्यानं निराळंच वाजवणं काढलं होतं.

उन्हाळी वाहुटळी रहाळभर हिंडू लागल्या, अन् त्यांनी नाग्याला झपाटलं. वाहुटळी गरगरत निघून जात. रितेपण मागं ठेवून. एक पोकळी. एक उदासी. ती उदासी बाणासारखी नाग्याच्या हिरद्यात शिरे. त्याला वाटे. काही करू नये. हात वर उचलावेत. मोकळं व्हावं. वाहुटळीमागं धावत सुटावं. धाडकन जाऊन लिंगोबाच्या डोंगरावर आदळावं. देवाला विचारावं, असं का? हे भकासपण का? ही चहूबाजूंनी दाटलेली, भाजू घातलेल्या शेतातल्या धुराची काळोखी का? ही वाहुटळीतली पानं गरगरत वर का चढतात? पुन्हा पंख तुटल्या पाखरांसारखी खाली का गळतात ? वेळूच्या बेटातून भिरभिरणारा वारा काय बोलतो ? पानझड झालेल्या सागाच्या धुडांशी तो का झुंजतो ? ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या घारी या दिवसात काय निरखतात ? गगन दिवसा उंच का जातं ? रातचं खाली का येतं ?

अशा मनीच्या वाहुटळीनं तो अगदी गांगरून गेला होता. नाचाचं आवतण मिळताच त्याची जाडी बोटं फुरफुरू लागली. भुत्याच्या अंगणात त्यानं ढोलावर कांडकं टाकलं अन् काही चमत्कारिक वाजवलं.

कांडक्यानं धुमपुडावर संथ लयीत एकेक दमदार ठोका. उजव्या हातानं घुमित्कार. ढोल गंभीरवाणा बोलू लागला. डाव्या हाताचे ठोके तसेच सुरू. उजवीकडलं पूड शोकगीतं गाऊ लागलं. कळ थेट मनाला भिडू लागली. अस्वस्थ ठाकर गोळा झाले. त्यांनी घुंगरांच्या माळांच्या ढिगातली एकेक माळ उचलली. पायाभवती गुंडाळली, अन् मुकाट्यानं डाव्या ठोक्याबरोबर पाऊल टाकीत ढोलाभवती फिरू लागले. दोन्ही हात सैल सोडून.

काय नाचावं ते उमगेना. तोंडातून शब्द फुटेना. एरवी ठाकरगीत अन् ढोल असं दोघांचं राज्य चाले. आज एकटाच ढोल उदासवाणा घुमू लागला. गाणं सुचेना झालं. भुत्या अगदी गोंधळून गेला. काठीच्या आधारानं उभा असलेला सुंभा कातावून म्हणाला,

"तसं गप गप रं का?"

पावलं टाकणं न थांबवता भुत्या म्हणाला,
"सुसत न्हाई गानं!"
"गा की कुंचंबी !"
ढोलाकडे हात करून भुत्यानं म्हटलं,
" हा वाजविना ! थांबूबी द्येत नहीं- गाऊंबी देत नहीं-"

नाचियांनी धरलेल्या रांगेतून आत शिरून संभा नाग्याजवळ बसत म्हणाला,
"ए नया भगत ! का रे तसलं ते वाजविनं ?

नाग्यानं डोळे उघडून एकदा केवळ सुंभाकडे बघितलं, अन्‌ पुन्हा ते मिटून घेतले.

वाजवण्यातली आर्त वाढली. जणू वाजवणारा सगळ्या सृष्टीशी एकाकार झालाय़्‌. उन्हाळ्यामुळं तिचं हृदय फुटतंय. उकलतंय. दोन शकलं होताहेत. तो आर्त भाव याच्या उरी उमटला आहे. उजव्या हातावाटे तो पुडावर वाजतो आहे. बारीक, सुक्षम होऊन. नाचियांची मनं कलबलताहेत. खच्चून आरडावंस वाटत पण शब्द काही फुटत नाही. चेतना केवळ पायात उरली आहे. ते गतिमंत झाले आहेत. डाव्या पुडाच्या ठोक्याबरोबर भुईवर पडताहेत. पुन्हा आपोआप उचलले जाताहेत. ठोका वाजताक्षणी भुईखाली उतरताहेत.

सगळे ठाकर गप्प. नाचियेही, बघियेही. निवळ ढोलाचा वा घुंगरांचा. अशी जादू होऊन गेली. जणू कुणी मंतर घातला आहे.

रात्रीचं पाऊल पुढं पडत चाललं. नाच मात्र होता तिथंच थबकला. स्वतःभोवती फिरणाऱ्या भोवऱ्यासारखा. काही गावं, हा भावही मनीच्या मनी मुरला. जणू दारू खाल्ल्यासारखे झुलत ठाकर नाचिये नुसते गोल गोल फिरत राहिले-

ती आरोळी फुटली-
“ धावा रे ! भगताला सरपानं खाल्ला !"

थोरला भगत औशीद द्यायला शेजारच्या पाड्यावर गेला होता. तिथून परतताना अंधारात त्याचा नागावर पाय पडला. नागानं करायचं ते केलं. फणा उंच करून पिंडरीला दोन ठिकाणी कडाडून डसला. भगतानं बोंब ठोकली. ढोलाचं वाजवणं ऐकून वाडीकडे निघालेल्या चारदोन ठाकरांनी ती ऐकली. त्यांनी भगताला खांद्यावर उचललं. धावत वाडीकडे निघाले. नाग्याजवळ पोचले, तंवर भगत काळानिळा पडला होता.

नाग्याचं वाजवणं हादरलं. त्यानं डोळे उघडले. क्षणभर त्याला अर्थबोध झालाच नाही. पण कुणी मारलेली हाक त्यानं ऐकली-
" नांग्या ! तुजा बा !"

तसा तो उठून एकदम उडालाच. ठाकरांनी घेरलेल्या बावर कोसळला. थोरल्या भगताला झंडू फुटला होता. अंग थरथरत होते. दातांच्या फटीतून रक्त वाहात होतं. कुणी धरून नाग्याला मागं ओढलं. म्हणालं,
"आरं, त्याला नांगानं खाल्ला रे !"

नाही नाही ! नाग्या पुण्यवंत होतोय. तो पडवळ खात नाही. उंदीर खात नाही. मोराला तोंड लावीत नाही. खोटं बोलत नाही. कुण्या बाईबापडीकडे ढुंकूनही पाहात नाही. कडक साधना चालली आहे त्याची. त्याच्या बाला नाग चावणार नाही. तो चावू शकत नाही.

पिसाटासारखा नाग्या उठला. उधळत तो दरड उतरून निघाला. खाली लवणात हिरडीखाली नागदेवाचा धोंडा होता. त्याच्यासमोर जाऊन बसला. धोंड्यावर डोस्कं आदळू लागला. आक्रंदू लागला,

"अरे नांगदेवा, कंदी तुज्यासंबूरून नमिस्कार केल्याबिना गेला नहीं ! तुजी सम्दी पालना केली. माज्या बानंबी ! मींबी ! तू बाला डसू नको !"

नाग्यानं त्या धोंड्याला गच्च मिठी मारली. धोंडाछाती एक केली. अगदी श्वास कोंडू आला, तरी धोंडा सोडला नाही. जणू तो त्या धोंड्याशी एक होणार. दगड छातीत रुतवून घेणार-

तोवर रडू फुटलं. सगळा कालवा झाला. ठाकरांनी धावू धावू झाडपाल्याचं औषध आणलं. भगताला चाटवलं. पण तो काहीही उपाय करण्यापलीकडे पोचला होता. त्यानं एकदा चहूदिशांना नाग्याला शोधलं, अन् आयशीच्या मांडीत मान कलथी केली. तिनं हंबरडा फोडला.

तो हंबरडा नाग्याची छाती चरचरा चिरीत गेला. त्याच्या विश्वासाला एक बारीकसा तडा गेला. धोंड्यापासून दूर सरून तो आक्रंदला,

"नागद्येवा रे ! त्वा माजा बा खाल्ला चण्डाळा !"

- oOo -

पुस्तक: ’जैत रे जैत’
लेखक: गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९६५) पाचवे पुनर्मुद्रण (२०११)
पृ. ५९-६३.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : जैत रे जैत >>
द्विधा >>
---


हे वाचले का?

शुक्रवार, २१ मे, २०२१

वेचताना... : जैत रे जैत

माणूस प्रथम निसर्गजीवी होता, तो निसर्गाच्या सोबतीने राहात होता. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तो निसर्गाकडून घेई. तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निसर्गातून घेताना हा आपला हक्क नाही याचे त्याला भान होते. केवळ जगण्याची गरज म्हणून आपण ते काढून नेतो, हे तो विसरत नसे. म्हणून त्याबद्दल निसर्गाकडे आपली कृतज्ञता रुजू करत असे.

जैत रे जैत

गो. नी. दाण्डेकरांच्या ‘जैत रे जैत’मधला ठाकरांचा नाग्या जळणासाठी फांदी तोडण्यासाठी झाडदेवाची अनुमती मागतो, केवळ वाळलेलीच फांदी तोडेन, ओली तोडणार नाही असे वचन देतो. त्या झाडावरच्या पोळ्यातील माश्यांची माफी मागतो. नागदेवाच्या पाया पडतो. वाघदेवाला त्याचे देणे देत जातो. पावसाला सुरुवात झाल्यावर अन्नाचा तुटवडा असतानाही ठाकर गडी निसर्गाला ओरबाडण्याची घाई करत नाहीत. पावसाचा पहिला भर ओसरल्यावर, भादव्यातच भारंगी, कुर्डू, तरोटा वगैरे भाज्यांना हात घालतात. आणि ती खाण्यापूर्वी देवांच्या, पितरांच्या नावे घास सोडतात नि मगच तिला तोंड लावतात.

नाग्याच्या वाडीत उंदीर फार झाले म्हणून त्यांना मारतानाही एखादा वृद्ध तरुणांना सबुरीचा सल्ला देतो. ‘धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ हे अनुभवजन्य शहाणपण आहे. ‘तोही देवाघरचा जीव. भाताचा एकेक दाणा वेचून आणतात. रानातल्या बिळांमधून साठवतात. त्यांचा मागोवा घेत बिळं खोदली की पायलीपसा धान्य मिळतं. त्यासाठी कष्ट कसलेच करायचे नाहीत. तेवढं बीळ उकरलं की झालं,’ अशी पुस्ती तो जोडतो. यात स्वार्थाबरोबरच तो ही देवाघरचा जीव म्हणजे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिकार केवळ त्रास कमी करण्यापुरती वा अन्न गोळा करण्यापुरती करावी अशी त्याची धारणा आहे.

गॉड्स मस्ट बी क्रेझी’ नावाच्या सुरेख चित्रपटातील बुशमेन आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हरणाची शिकार करतो. ते पडल्यावर प्रथम हात जोडून त्याची माफी मागतो. ‘माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मांसाची गरज म्हणून मला तुला मारावे लागते आहे. एरवी माझे तुझ्याशी कोणतेही शत्रुत्व नाही.’ असे त्याला सांगतो.

आफ्रिकेतील जंगलवासींमध्ये प्रत्येक टोळीचे एक आराध्य दैवत असते. हे दैवत निसर्गातील एखादा प्राणी, पक्षी वा सजीव असतो. त्यातून त्या त्या टोळीकडून त्या एका प्राण्याची शिकार केली जात नाही, त्याला संरक्षण दिले जाते. यातून त्या प्राण्याचा निर्वंश होणे टळते. विविध प्राण्यांना, पक्ष्यांना वेगवेगळ्या टोळ्यांकडून संरक्षण मिळाल्याने निसर्गाचा तोल राखला जातो. ही खरी संस्कृती म्हणायची! इथून पुढे मानव-समाजाचा जो ‘विकास’ झाला किंवा जी ‘प्रगती’ झाली त्यातून जे रसायन तयार झाले त्यात हा संस्कृतीचा अंश लयाला गेला.

जोवर सर्व उत्पादन माणूस केवळ शारीरबळ नि कौशल्याआधारे करत होता, तोवर निसर्गातून तो किती घेईल याला मर्यादा होत्या. हाताने होईल तितकेच काम तो करु शकत होता, आणि त्या कामाला आवश्यक तितकेच निसर्गातून काढून आणत होता. आणि माणूस काढून नेईल त्याहून कैकपट अधिक निसर्ग पुन्हा निर्माण करत होता. स्वयंचलित अथवा वेगवान यांत्रिक उत्पादन सुरू झाल्यावर उत्पादनक्षमता अफाट वाढली, त्याला लागणार्‍या कच्च्या मालाची गरज वाढली आणि त्याच्या पूर्ततेसाठी निसर्गाला ओरबाडण्याचा वेगही वाढला. या अफाट वेगवान आयुष्यात माणसाला निसर्गाची माफी मागून, मागणी करुन सामुग्री जमा करण्याची फुरसद आणि इच्छा दोन्ही उरली नाही. आणि त्या विनाशाच्या वेगाने पुनर्भरण करण्याची शक्तीही निसर्गात नव्हती.

वेगवान आणि यांत्रिक उत्पादकतेने समाजात आणखी एक बदल घडवला तो म्हणजे माणूस नागरी आयुष्याकडे- आणि म्हणून निसर्गापासून दूर सरकला. निसर्गापासून दूर वा त्याचा विध्वंस करुन उत्पादनकेंद्रे, व्यवस्थापनकेंद्रे आदींची उभारणी करून त्याभोवती मानवी समाजाची वस्ती आकाराला येऊ लागली. या नागर, पांढरपेशा आयुष्याची नाळ निसर्गातील फारच थोड्या मनुष्येतर सजीवांशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील देव-संकल्पनांचा संदर्भही निसटत गेला आणि देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले. जगण्याशी त्याची नाळ तुटली आणि स्वर्ग-नरक, मृत्यूपूर्व नि पश्चात जीवन, पूर्वजन्माचे ओझे वगैरे संकल्पनांच्या आधारे त्याचा विस्तार होत गेला.

देव-संकल्पना निसर्गापासून दुरावली नि माणसाच्या मनातील तिचा धाकही नाहीसा झाला. निसर्गातील नागाचा नि वाघाचा, नागदेव नि वाघदेव होऊन त्याची पूजा करणे, त्याला मान देणे, त्याच्या वाटेस जाणे टाळणे हा ‘जगा नि जगू द्या’ दृष्टीकोन मागे पडून वर्चस्ववादी वृत्ती वाढली. नागापासून दूर राहण्यापेक्षा त्याला ठार मारण्याचे उपाय सहजपणे योजले जाऊ लागले. वाघनखे गळ्यात घालून शौर्याचा आव आणला जाऊ लागला. औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यातील उत्पादनांसाठी आवश्यक कच्च्या मालासाठी कोणत्याही माणूस निसर्गाची अनिर्बंध लांडगेतोड करु लागला.

‘गरजेनुसार उत्पादन ऐवजी उत्पादनानुसार गरज’ निर्माण करण्याची उफराटी युगत सापडलेल्या भांडवलशाहीने तर आपल्या मांडणीतून, जमाखर्चातून, ताळेबंदातून निसर्गाच्या नावे काही शिल्लक टाकणेही सोडून दिले. देवत्व देणे तर सोडा, ‘निसर्ग आपल्या हक्काचा आहे, हवे तितके नि हवे तेव्हा ओरबाडून घेणे हा आपला हक्कच असल्याचे’ माणूस आता समजू लागला. ‘माणसाचे हित... नव्हे स्वार्थ सर्वोच्च. त्यासाठी निसर्गाला वाटेल तसे ओरबाडले तरी चालेल. ‘कंपनीचा नफा वाढला पाहिजे, क्वार्टरली टार्गेटस अचिव व्हायला हवीत’ ही मानसिकता आकाराला येऊ लागली.

देवत्व हे निसर्गाकडून अध्याहृताकडे सरकले आणि ब्राह्मणांच्या इंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णू, त्यांचे अवतार वगैरे संकल्पनारूप देवांचे महत्व वाढू लागले. हे सर्व देव मानवी तोंडावळा असणारे आहेत. पुढे निसर्गाशी निगडित देवांचे या देवांशी वा त्यांच्या अवताराशी अभिन्नत्व प्रतिपादन करत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे करण्यात आले. उदा. पावसाचा देव असलेल्या वरुणाचे कार्य यथावकाश इंद्राच्या झोळीत टाकून त्याचे महत्व कमी करण्यात आले.

धनगरांचा कल्याणकारी राजा, बहुजनांचा देव असलेला विठोबाला विष्णूचा अवतार घोषित करून पदुबाई(पद्मावती), तुळसा यांना मागे सारून विठोबा-रखुमाईचा घोष होऊ लागला. इतकेच काय तुळशीच्या लग्नात विष्णूला वर करुन त्यांचे अभिन्नत्व आणखी अधोरेखित केले गेले. माध्यमांचे महत्व फार प्राचीन काळी ओळखणार्‍या ब्राह्मणांनी त्याचा चोख वापर करुन आपली देव-संकल्पना रुजवली, विस्तारत नेली. ‘पुन्येवंत’ होऊ पाहणार्‍या नाग्याच्या मनात जोशीभटाने सरकवली तशीच इतरांच्या मनात अलगद सरकवून दिली.

ठाकराच्या जमातीत जन्माला आलेला नाग्या पुन्येवंत होण्याच्या इर्षेने ‘बाम्हून’ होऊ पाहतो आहे. (पुढे चिंधी त्याला समजावून सांगताना पुन्येवान होण्याचा ब्राह्मणाचा मार्ग हा एकच नाही असे सांगते. तिला जे उमगले ते त्याला समजलेले नाही.) नाग्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासाने ब्राह्मणाला मार्ग विचारतो, तेव्हा ब्राह्मणाचे हे देव त्या ठाकराच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू लागतात. प्रथिनांचा हुकमी साठा असणारे आणि ज्यांना मारण्याने अन्नधान्याची नासाडीही टाळता येते असे उंदीर ‘गणपतीचे वाहन’ म्हणून आहारातून वर्ज्य करावेत असे ब्राह्मण सांगतो. चविष्ट मांसासाठी सठीसहामासी खाल्ले जाणारे मोरही ‘सरस्वतीचे वाहन’ म्हणून नाग्याला वर्ज्य करावे लागतात.

इथे मेख अशी आहे की तर ब्राह्मणांच्या देव-संकल्पनेत यांना देवांचे साहाय्यक म्हणून दुय्यम स्थान दिले जाते. ‘देवाचे वाहन ही संकल्पनाच निसर्गातील काही जीवांचे आणि पर्यायाने त्यांना देवत्व देणार्‍या समाजगटांचे दुय्यमत्व अधोरेखित करण्यासाठी जन्मली असावी का?’ असा प्रश्न मला पडलेला आहे. या वर्चस्ववादी प्रवृत्तीचा पुढचा टप्पा अस्पृश्यता, गुलामगिरीमध्ये रूपांतरित झाला असावा.

‘पुन्येवंत’ होण्याच्या कल्पनेच्या आहारी जाऊन नाग्या ब्राह्मणी आचाराविचारांना स्वीकारु पाहतो आहे. मुळात पाप-पुण्य ही संकल्पनाच नागर माणसाने मानवी तोंडवळ्याचे देव स्वीकारल्यानंतर, संघटित धर्मांचा उदय झाल्यानंतर निर्माण झाली आहे. ब्राह्मणी व्यवस्था ही भारतातील तिची आधार व्यवस्था आहे.

पण दुसरीकडे निसर्गाबद्दल चौकसवृत्ती त्याच्यात ठासून भरली आहे. त्यामुळे त्याला निसर्गाशी निगडित अनेक प्रश्न पडतात. सुरुवातीलाच दहा-बारा वर्षांचा नाग्या बाला प्रश्न विचारुन भंडावून सोडतो. लिंगोबाच्या डोंगरानं बोट का उचललं असेल असा प्रश्न त्याला पडतो. मग तो डोंगर नाही महादेव आहे, ध्यानस्थ बसलेला असं बानं सांगताच त्यावर त्याचे आणखी प्रश्न सुरु होतात.

पुढे पुनवेच्या राती डोंगरारूपी महादेव जागा होऊन फेरफटका मारून येतो हे ऐकताच, ‘पण परत ध्यानस्थ बसताना त्याचा तो ढवळा बईल, त्याच्या गळ्यातील ती पोळ्यांची माळ पुन्हा सगळं नेमकं जागच्याजागी कसं बसतं’ याचं कुतूहल त्याला घेरुन राहतं. ते कुतूहल शमवण्यासाठी आपण पुन्येवंत व्हावं नि पुनवेच्या राती ते आचीर स्वत:च्या नजरेनं पाहावं असा ध्यास तो घेतो. पुढेही प्रत्येक टप्प्यावर तो अशा विविध प्रश्नांना सामोरा जातो, त्यातून उद्भवणारा संभ्रम त्याला वेटाळून राहतो. निसर्गजीवी ठाकर आणि अनुत्पादक कार्य करणारे असल्याने सर्वस्वी परोपजीवी ब्राह्मण अशा दोन संस्कृतींच्या या टकरीमध्ये दामटी वळली गेलेला नाग्या सदैव द्विधा मनस्थितीमध्ये जगतो.

आधी पुन्येवंत होण्याच्या ईर्षेने जपलेली श्रद्धा; मग त्या श्रद्धेचा मान राखला न गेल्याने केलेला विद्रोह, त्यातून केलेला सूडाचा निर्धार... मग पुन्हा चौकस बुद्धीने लहान्या माश्यांच्या पोळ्याशी तद्रूप होत असतानाच त्यांच्यामध्ये आतडे गुंतून गेल्याने दुसर्‍या दिशेने घेतलेला हेलकावा... पण ‘लहान असो वा आगमाशी शेवटी एकाच जातीची असल्याने आपल्या शत्रूच’ असा सर्वंकष सूडाचा मानवी स्वभाव पुन्हा उफाळून येणं... नवे प्रश्न, नवे संभ्रम यातून नाग्याचा प्रवास होत राहातो. त्याचा सूड एकरेषीय अथवा एकदिश प्रवास करत नाही. नागमोडी चालीने, दोन पावले पुढे एक पाऊल मागे असाच त्याचा प्रवास आहे.

या संभ्रमाचा उगम त्याच्या पुन्येवंत होण्याच्या ध्यासामध्ये आणि त्या ध्यासादरम्यान त्याने स्वीकारलेल्या ब्राह्मणी मूल्यांच्या त्याच्या मूळ जन्मदत्त मूल्यांशी झालेल्या संघर्षामध्ये आहे. त्यातून त्याचे प्रश्न त्याच्या जगण्याशी निगडित असलेल्या वस्तू, व्यक्ती, सजीव-निर्जीवापासून निसटून पाहतापाहता श्रद्धेसारख्या, देवासारख्या अध्याहृताकडे सरकू लागतात. पुन्येवंत होण्याच्या प्रयत्नात तो अधिकाधिक जीवनविन्मुख होत जातो. अध्यात्माच्या, अध्याहृताच्या, देवाच्या, श्रद्धेच्या अधीन झालेले कृतीची प्रेरणा आणि निर्णयाचा भार त्या देव नावाच्या संकल्पनेवर टाकून निश्चिंत आणि म्हणून बरेचदा कृतिशून्य होतात. उलट त्यापासून दूर, जगण्याशी एकरुप झालेले त्यातील झगड्यांची तोड काढण्याची जबाबदारी स्वीकारून अधिक कृतिप्रवण होऊ शकतात, चिंधीसारखे!

सतत जीवनसंमुख असणारी चिंधी नाग्याला आपलेसे करण्याच्या ध्यासाने अधिकच क्रियाशील होते. ती जोडीदार स्वत: निवडते, त्याला मिळवण्यासाठी सर्वस्व झोकून देते. आपल्याहून लहान असलेल्या नाग्याला ‘बाला’ म्हणत असताना ती त्याची आई होते, प्रेयसी होते. त्याचबरोबर ती त्याच्या देवीमाशीवरील सूडाच्या कामातील बरोबरीची साथीदार आहे. गावात जेव्हा लोक नाग्याविरोधात बोलतात, तेव्हा त्याची बाजू भक्कमपणे मांडणारी त्याची सहकारी/वकील/सचिवही आहे. अगदी ‘ललितेकलाविधौ’ नसली तरी गृहिणी, सचिव, मिता, प्रियशिष्या... नव्हे माताच आहे. उलट नाग्याच तिचा शिष्य म्हणावा लागेल.

पुन्येवंत होण्यासाठी ब्राह्मणाप्रमाणे वागू पाहणार्‍या नाग्याला “ बांम्हून पुन्येवंत हुतो, त्याची रीत येगली. आपली रीत येगली, सूर्याचा चालना येगला. चांदव्याचा येगला. चांदनीचा येगला. गिर्‍या*चा वेगला. समदा येक कसा आसंल ?” असे समजावणारीही तीच आहे.

वाचता वाचता असं ध्यानात येतं की कादंबरीत नाग्याच्या मित्रांचा उल्लेख आहे पण चिंधीच्या मैत्रिणींचा नाही (हे हेतुत: की पुरुष लेखकाचे कल्पनादारिद्र्य?). तिला आई नाही. एकुणात तिच्या आयुष्यात स्त्रीसहवास फारसा नाही. कदाचित सदैव दारुच्या नशेत राहणार्‍या बापासोबत राहिल्यानेच ती स्वत:च्या बळावर जगण्यास शिकली असावी.

चिंधी हे भारतीय साहित्यातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. इतके स्वयंपूर्ण, कणखर स्त्री व्यक्तिमत्व- ते ही कथानकाच्या दृष्टीने मध्यवर्ती, क्वचितच पाहायला मिळते. गंमत अशी असते की असे व्यक्तिमत्व बहुधा समाजाच्या मुख्य प्रवाहातील, धुरिण समाजातील नसते. चिंधी ठाकरांची लेक, तर शरत्‌चंद्रांच्या ‘शेषप्रश्न’मधील कमल ही अ‍ॅंग्लो-इंडियन आहे. विस्तारभयास्तव दोघींची सविस्तर तुलना करण्याचा मोह टाळतो आहे. पण एक उदाहरण पुरेसे होईल.

चिंधी नकोसे लग्न ठामपणे नाकारते. ते मोडण्यासाठी त्यासाठी तिच्या बाने घेतलेले वधूशुल्क परत करावे लागणार म्हणून राब राब राबते. पै-पैसा जोडून नवर्‍याचे देणे फेडून टाकते नि मग ज्याच्यावर जीव जडला त्या नाग्याकडे जाते.

‘शेषप्रश्न’मध्ये शिवनाथ कमलशी कुठल्याशा अगम्य पद्धतीने लग्न करतो. काळजीत पडलेले आशुबाबू ‘असल्या लग्नातून तो सहजपणे निसटून जाऊ शकेल’ अशी धोक्याची जाणीव करुन देऊ पाहतात. पण ‘त्याचा जायचा निर्णय झालाच असेलच, तर मी तरी त्याला जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न का करेन?’ असा रोकठोक प्रश्न कमल विचारते. नाते हे दोघांना हवे असते तेव्हाच अर्थपूर्ण असते. ज्याक्षणी एकाकडून त्यातील सहभाग संपतो, तेव्हाच ते संपते हे उमजलेली नि खंत, दु:ख वा अकांडतांडव न करता त्या तुटल्या नात्याला मागे सोडून ताठ मानेने पुढे जाणारी कमल चिंधीच्याच जातकुळीची.

ज्याप्रमाणे नाग्या अनुभवाच्या आधारे देवाला आव्हान देऊ पाहतो त्याचप्रमाणे चिंधीही. ‘सर्व देवांचा-देवीमाशीचाही, मान राखूनही नाग्याचा डोळा तिने का फोडला?’ या प्रश्नावर भुत्या म्हणतो, “देवानी मारला, तो साह्यला पायजे !” (देवसंकल्पनेला कर्मसिद्धांताची पळवाट इथेच येऊन मिळते.) पण चिंधी उसळून म्हणते, “वाईट वकटा केला नही, तरी मारनार, असा कसा हा देव ? देव कसला, हा तर खईस !”

देव जर कल्याणकारी आहे तर खरेतर त्याने चूकही पोटात घ्यायला हवी. इथे तर त्यांचा सार्‍यांना मान राखूनही नाग्याच्या वाट्याला दु:ख आले आहे. आपली सर्वकल्याणकारी देवाच्या संकल्पनेची वास्तवाशी सांगड बसत नाही हे नाग्या नि चिंधी दोघेही मान्य करत आहेत. याचा अर्थ ते अश्रद्ध आहेत असा नाही. देवाने केलेल्या अन्यायाबद्दल ते त्याला जाब विचारु पाहात आहेत, त्याच्या न्यायबुद्धीला आव्हान देत आहेत इतकेच.

या कादंबरीची ओळख झाली ती त्यावर निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटामुळे. पण मला चित्रपटापासून कादंबरीपर्यंत पोचण्यास दोन दशके जावी लागली. दृश्य बाजू असल्याचा फायदा मिरवणार्‍या चित्रपटानंतर वाचूनही कादंबरी काकणभर नव्हे तर मणभर सरस असल्याची भावना निर्माण झाली. प्रेक्षकांच्या मागास भावनांशी तडजोड करण्याच्या नादात चित्रपटाने काही महत्वाचे तपशील पातळ केले हे जाणवले. त्याबद्दल रमतारामाच्या विश्रांतीस्थळी थोडे लिहिले आहे.

‘गोनीदां’ची ‘जैत रे जैत’ एका संभ्रमित पण निर्धार जपणार्‍या पुरुषाची नि त्याच्या पाठीशी ठाम उभ्या असलेल्या त्याच्या अस्तुरीची कथा आहे. यात नाग्याचा सूड जरी सूत्र म्हणून येत असला, तरी दोघांच्या आयुष्यातील काही हळवे, काही कोवळे क्षणही गोनीदांनी सुरेख रंगवले आहेत. सूडाचे नियोजन करण्यासाठी महादेवाच्या डोंगरावरील पठारावर हे दोघे प्रथम पोचतात तो प्रसंग त्यांनी अतिशय तरलतेने रंगवला आहे. चिंधीनेही तो अलगद पकडून ठेवला आहे.

- oOo -

*विमान

---

या कादंबरीचा प्रतिनिधी म्हणून वेचा निवडणे हे सर्वाधिक दुष्कर काम होते. विविध टप्प्यांवर येणारी वळणे, दिसणारी व्यक्तिमत्वे, घडणार्‍या घटना यांत कुणाला प्राधान्य द्यावे याचा निवाडा अवघड होता. नाग्याचे निसर्गाशी एकरुप होणे असेल, चिंधीने त्याला एकटा गाठून रोकठोकपणे ‘तू पायजेस’ म्हणणे असेल, नाग्याचे मोहोळावर जीव जडवून बसणे असेल, लिंगोबाच्या डोंगरावरील पठारावरच्या मोहक निसर्गसौंदर्यावर लुब्ध झालेले नाग्या-चिंधीचे जोडपे असो, की बाच्या मृत्यूनंतर नाग्याच्या श्रद्धेला गेलेला पहिला तडा असेल... असे अनेक प्रसंग नि टप्पे उल्लेखनीय आहेत.

दोन संस्कृतींच्या टकरीत सापडलेल्या, स्वत:ची सूडभावना नि नैसर्गिक असलेली आपुलकीची भावना यांच्या संघर्षात संभ्रमित झालेला नाग्या हाच प्रातिनिधिक मानून द्विधा हा वेचा निवडला आहे.

दुसरा वेचा कथानकातील नाग्याच्या मनातील प्रश्नांचे काहूर, त्याची अस्वस्थता मांडणारा. या प्रसंगाअखेर त्याच्या श्रद्धेला पहिला ‘तडा’ गेला आहे.


हे वाचले का?

बुधवार, १९ मे, २०२१

द्विधा

एका कड्यालगतच्या पिंपुर्णीवर एक नाजुकसं पोळं लोंबत होतं. मात्र ते आग्यामाश्यांचं नव्हतं. बारक्या मधमाश्यांचं. ते पाहताच नाग्या भानावर आला. निरखून निरखून त्याकडे पाहू लागला.

एका बारक्या फांदीवर पोळं लटकलेलं होतं. भुरक्या तांबूस रंगाचं. माझ्या लांबून लांबून येत होत्या. थोडा वेळ बाहेर थांबून अलगद पोळ्यावर बसत होत्या. मग त्या हळूच छिद्रांमध्ये शिरत होत्या. छिद्रातल्या माश्या ढुंगणाकडून बाहेर निघून क्षणभर आपले पंख साफ करीत होत्या. मग त्या उडून जात होत्या. असा सारखा त्यांचा उद्योग चालला होता.

पोळं मोठं सुबक होतं. असं बसक्या गाडग्याएवढं. काना नव्हता की कोपरा नव्हता. दो अंगांनी ते गोल होतं. किंचित लोंबतं. माश्यांच्या येण्याजाण्यानं ते जिवंत झालं होतं.

जैत रे जैत

त्या इवल्या इवल्या मेहेनती माश्यांचं ते घर होतं. त्या रानभर हिंडून मध आणीत होत्या. कुठून कुठून कसला कसला. हिरडीचा अन् कारवीचा. मोहाचा अन् घाणेरीचा. बेहड्याचा अन् कुड्याचा. तो पोळ्याच्या वरच्या भागात असलेल्या कांद्यांत साठवीत होत्या. सारखे त्यांचे परिश्रम चालले होते. उसंत नव्हती. जणू कुणी त्यांना रोजानं घातलं होतं.

नाग्या अलगद पिंपुर्णीवर चढला. पोळं चार सहा हातांवर राहिलं. तिथून तो पोळ्याकडे निरखून पाहू लागला. सारखी धांदल सुरू होती. कुणाला क्षणाचीही फुरसत नव्हती.

नाग्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यानं चारदहादा पोळी काढली होती. चुडीत पेटवून खाली धरायचं. मधमाश्या कंदरावून निघून जातात. खालचा भाग तोडून टाकून द्यायचा. कांदा तेवढा मुठीत धरून तांब्यात पिळायचा. गोळा राहील तो मेण म्हणून वापरण्यासाठी घरी न्यायचा. बोटं चाटून टाकायची. कधी तांब्यातला मध नागलीच्या भाकरीसंग खायचा. जास्त गोळा झाला, तर वर फडकं बांधून पेठेत विकायला घेऊन जायचा. एवढाच ठाकरांचा अन् पोळ्यांचा संबंध.

जो जो नाग्या जवळून न्याहाळू लागला, तो तो त्याला मोठं आश्चर्य वाटलं. अचंब्यानं त्याच मन अगदी भरून गेलं. या माश्या इतकी धावाधाव का करतात? कोण त्यांना कामाला धाडतं? पोळ्यावर कुणाची मालकी ? कोण मजुरी देत ? अन्‌ या गप्पा टप्पा करायला का थांबत नाहीत ?

माणसं पायांवर पाय टाकून गोष्टी सांगत बसतात. तास‍न्‌ तास. विड्या फुंकीत. सूर काढकाढून ती कधीकाळीच्या कथा आठवून आठवून सांगतात. दोघं बसली. की तिसरं तिथं खिळतं. चौथं चिकटतं. अशी गप्पांची अंडी घालीत माणसं पहरच्या प्रहर एका जागी बसतात.

माश्या का बसत नाहीत ? की त्यांना थकवा येत नाही ? त्यांचे हातपाय दुखत नाहीत ? की कधी त्यांना दुखणंबाणं होत नाही ?

तो मोठा अचंबा करीत राहिला. तो त्याला दिसलं, की फांदीवर हळू हळू एक सरडा पुढे सरतो आहे. आता हा सरडा पोळ्याजवळ कशासाठी येतो आहे ? मध खाण्यासाठी? की गंमत पाहण्यासाठी? आपल्यासारखं त्याच्याही मनी पोळ्याविषयी कौतुक दाटलं आहे ?

सरड्याचा वेग कमी होत होत थांबला. पोळ्यापासून हाता दीड हातावर ति तो निचळ, चौपायांवर चिकटून बसला. जणू त्याला झोप लागली आहे. सरडा नाहीच तो. एक दगड आहे. किंवा फांदीचाच एक भाग आहे.

माश्या बुजणं बंद झाले. त्या त्याच्या अंगावरून पलीकडे जाऊ लागल्या. असं सगळं निवांत झालं. नुसती सरड्याच्या डोळ्यांची उघडझाप तेवढी सुरू होती. दिसे न दिसे अशी.

एक माशी पोळ्यावरून उडाली. सरड्याच्या जवळ आली. क्षणभर ती घोटाळली. पण मग ती निर्धास्त मनानं सरड्याजवळ पोचली. विजेसारखी सरड्याची जीभ बाहेर धावली, अन्‌ माशीला वेटाळून पुन्हा तोंडात गडप झाली !

"अरे चण्डाळा ! यासाठी बसला होता काय तू टप धरून?"

नाग्या रागेजला. तो खाली उतरला. एक काटूक उचलून पुन्हा वर चढला, अन् त्याने ते सरड्याच्या पोटाखाली घालून त्याला ताइदिशी उडवून दिलं. सरडा खालच्या खडकावर आपटला, अन्‌ तरतरत खबदाडीत निघून गेला. ‍नाग्यानं म्हटलं,

"मुर्दाडा, ये त खरी पुन्हा! तोडीतोच तुजा मुंडका !"

पुन्हा तो फांदीवर तसाच अवघडून पोळ्याचं कौतुक करीत राहिला. पाय दुखेपर्यंत. शेवटी पायांना कळ लागली, तेव्हा तो खाली उतरला, अन पुन्हा पुन्हा पोळ्याकडे पाहत उगवतीकडे चालला.

चालता चालता तो थबकला. कसं झालं हे? आपला तर मधमाश्यांवर लोभ जडला !

छे छे ! मधमाश्या आपल्या दावेदार. आग्या असो की गावरान असोत. त्यांच्याच भाईबंद त्या. त्यांनी आपलं अंग फोडून काढलं. डोळा कामातून गेला. त्यांचा आपला उभा दावा. अन् मग या लहानग्या पोळ्यावर प्रीत काय करून बसलो आपण ?

नाग्याला वणव्यात सापडल्यासारखं झालं. झाडोऱ्यातून तो बाहेर पडला. उघड्यावर आला. पाठीशी महादेव होता. आकाशावेरी पोचलेला. डाव्या हाताच्या कोपऱ्यात खाली दूर आपटं होतं. आकाशात दिवस पेटत होता. खाली नाग्या जळत होता.

एका धोंड्यावर बसला तो. पायातळीचे खडे वेचून उगीच लवणात भिरकावू लागला. पुन्हा जखम वाहू लागली. आपलं काय चुकलं ? माश्यांनी आपल्याला का फोडावं ? मक्याच्या ओळींमधून तण शोधून काढावं, तसं त्यानं आपलं सगळं वागणं विचरलं. समोर मांडलं. शोधशोधून पाहिलं. काही कुठं चूक दिसेना.

एकदम त्याला धक्का बसला. की कुणी देवीमाशी आहे हेच खोटं ? बानं उगीच आपल्याला थाप मारली ? तेवढ्या त्या थापेवर भरवसून आपण त्या महादेवाच्या गळ्याखालच्या पोळ्याशी वैर घेतो आहोत? अगदी भयाभया झालं. पार वेड लागायची पाळी आली. वर ऊन्ह तापत होतं. खाली नाग्या भाजून निघत होता.

ताडकन तो उठला, अन् तरातरा चालत महादेवाच्या तोंडासमोर जाऊन उभा राहिला. वर पाहिलन्, तर महादेव आपला डोळे मिटून ध्यानात मगन झालेला !

चिडून नाग्या म्हणाला,

"द्येवा रे, तुजी मज्जा !
डोला तिरका करायला नको, का उघडून बगाय नको ! कुनी कुनाला फोडून खावु का काना करू !
तुला ठावा नहीं का रे ? त्या दिशी मी तुज्या पाया पडला हुता मग तुझ्या कवतिकाच्या देवीमाशीला नमिस्कार केला हुता, असा सगल्यावरून ववालून गेला हुता. काय कुनाचा ठिवला नहीं !
तरी तुज्या देखत डोला माश्यांनी मला फोडला!
तू बी खोटा, तुझी देवीमाशीबी लबाड !
कशाला रं बसला ध्येन धरून ? इकडे जग करू काय तरी ! येकमेकाचा मला कापू का रघात शिवू ! छातीवर पाय देऊ का खापलून काढू! तुजा ध्येन काय भंगायचा नही !"

नाग्या असा मनानं रिकामा झाला, भकास. मग महादेवाकडे पाहात दोन्ही हात डोक्यावर ठेवून उभा राहिला. किती वेळ ते त्याचे त्यालाच कळलं नाही. बोटं तशीच एकमेकांत गुंतलेली. बुधल्याच्या ढोलीतून राहणार्‍या घारी त्याच्यावरनं झेपावून पलीकडे निघून गेल्या. किती पारवे उडाले. किती सातभाई. नाग्या तरच खुंटासारखा उभा.

- oOo -

पुस्तक: ’जैत रे जैत’
लेखक: गो. नी. दाण्डेकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९६५) पाचवे पुनर्मुद्रण (२०११)
पृ. १०४-१०७.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : जैत रे जैत >>
तडा >>
---


हे वाचले का?

गुरुवार, १३ मे, २०२१

माशा मासा खाई

वन्यजीवपर्यटन म्हटले की माणसे असोशीने दोन गोष्टी पाहण्यासाठी जंगलात जातात. पहिले म्हणजे अर्थातच वाघोबाचे दर्शन घेणे... आणि त्याचे स्वकॅमेर्‍याने घेतलेले फोटो समाजमाध्यमांवर, व्हॉट्सअ‍ॅपमार्फत अनेकांना पाठवून कृतकृत्य होणे. आणि दुसरा, क्वचित सफल होत असलेला, उद्देश म्हणजे एखाद्या शिकारी प्राण्याने केलेली शिकार ’याचि देही याची कॅमेरा’ पाहणे.

शिकार म्हटले की सिंह, वाघ, कोळसुंदे या शिकारी प्राण्यांनी केलेली शिकार पाहायचा योग येतो. भारतात चित्ता नामशेष झाला आहे. बिबट्या हा सर्वात धूर्त मांजरवर्गीय प्राणी समजला जातो. तो वाघ-सिंहाप्रमाणे उघड्या जागेवर शिकार करण्यापेक्षा झाडीच्या आडोशाचा परिणामकारक रीतीने वापर करतो. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या तयारीची पूर्वकल्पना येणे अवघड असल्याने, ते दृश्य पाहायला मिळणे दुष्कर. त्यासाठी अभ्यासकाची चिकाटी नि वेळ हवा. सामान्य पर्यटकाला बिबट्या तसा लाभत नाही.

शिकार म्हटले, की शिकारी आणि शिकार- म्हणजे त्यांच्ये भक्ष्य, हे दोन वर्ग बरेचसे स्पष्ट दिसतात. शिकारी जमातींमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, चित्ते वगैरे मार्जारकुलातले प्राणी, तसंच लांडगे, कोल्हे, कोळसुंदे वगैरे श्वानकुलातले प्राणी, स्वत:चाच असा स्वतंत्र प्रवर्ग असलेले तरस आणि त्यांच्या शिकार अथवा भक्ष्य वर्गामध्ये काळवीट, चितळ, विल्डबीस्ट अथवा नीलगाय वगैरे सारंग-कुरंगवर्गीय प्राणी, सशांसारखे छोटे प्राणी, रानडुक्कर वगैरे प्राणी अंतर्भूत होतात. आकाशाचा अधिवास केलेल्या पक्ष्यांमध्ये ससाणे, घारी, गरूड वगैरे शिकारी तर इतर लहान पक्षी, त्यांची अंडी तसंच काही छोटे जमिनीवरचे प्राणी हे त्यांचे भक्ष्य. उभयचरांमध्ये मगर-सुसरींसारखे सर्वभक्षी शिकारी. जलचरांमध्ये ही विभागणी तेवढी काटेकोर नसावी. (शीर्षकात वापरलेली एका गाण्याची ओळ याचेच निदर्शक आहे.)

एखादा मांसाहारी प्राणी क्वचितच दुसर्‍या प्राण्याची शिकार होत असावा. बहुतेक शिकारी/मांसाहारी प्राण्यांना भक्कम दात, जबडा, नखे वगैरे शिकारीला सहाय्यभूत असणारे शारीर अवयव मिळालेले असतात. त्याचा शिकारीला जसा उपयोग होतो, तसेच एखाद्या मोठ्या शिकार्‍याने केलेला हल्ला परतवून लावण्यासाठीही होऊ शकतो. त्यामुळे बहुधा मोठे शिकारीही छोट्या शिकारी प्राण्याच्या वाटेस फारसे जात नसावेत. अपवाद पिलांचा, कारण ती शारीरदृष्ट्या दुबळी असल्याने सहज शिकार होऊ शकतात.

या सार्‍या जीव-मृत्युच्या खेळात एक बडा शिकारी दुसर्‍या बड्या शिकार्‍याची शिकार झाल्याचे क्वचितच दिसून येते. हा व्हिडिओ अशाच एका शिकारीचा आहे. समाजमाध्यमांतून प्रथम बराच फिरला. नंतर त्यांच्या मागे फरफटत जाणार्‍या तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही आपापल्या संस्थळांवर तो प्रसिद्ध केला.

व्हिडिओच्या पहिल्या काही सेकंदातच झालेली ही शिकार तुम्हाला स्तंभित करते. अगदी पुन्हा पाहतानाही हाच अनुभव पुनरावृत्त होतो. याचे कारण शिकार्‍याचे चापल्य अलौकिक आहे. मागच्या क्षणात कुठेही नसलेला हा शिकारी, पुढच्याच क्षणात आपल्या भक्ष्याच्या नरडीवर घट्ट पकड घेतलेला दिसतो. पाहणारा या वेगाने स्तिमित होतो. त्याच्या पुढच्या क्षणी काय घडले हे ध्यानात आल्यावर झाल्या घटनेने व्यथितही होतो.

पर्यटकांना सफरीवर घेऊन आलेला गाईडही विलक्षण दु:खी झालेला दिसतो. तो म्हणतो ’ही अतिशय दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे’. दोन क्षणांपूर्वी पाणी पीत असलेला पूर्ण वाढ झालेला चित्त्याचा नर पाण्याखाली दिसेनासा होताच सर्वसामान्य पर्यटक नि व्हिडिओचे प्रेक्षक हळहळतात. माझी प्रतिक्रियाही नेमकी तशीच झाली. पण...

...'आपण बहुसंख्येच्या बाजूला आहोत म्हणजे आपले वर्तन बरोबर आहे' असे समजणार्‍यांपैकी मी नाही. आपल्याच विचारांना, दृष्टीकोनाला, निर्णयांना चिकित्सेच्या दगडावर घासून पाहण्याची सवय असल्याने, विचाराचा लंबक चटकन मध्यभागी येऊन स्वत:लाच आव्हान देऊ लागला. पुढच्याच क्षणी माझ्या या प्रतिक्रियेचे माझे मलाच आश्चर्य वाटले. आश्चर्य यासाठी, की याच चित्त्याने एखाद्या हरणाच्या पाडसाची शिकार केलेला व्हिडिओ मी पाहिला असता, किंवा प्रत्यक्ष भेटीत ती घटना पाहिली असती, तर मला इतकाच तीव्र धक्का बसला असता का?

व्हिडिओमधील गाईडही त्या चित्त्याच्या मृत्यूबद्दलचा आपला शोक लपवू शकलेला नाही. त्याने तर वाघ-सिंहांसारख्या बड्या शिकार्‍याने केलेल्या अनेक शिकारी यापूर्वी पाहिल्या असतील. त्यातून त्याचे मन बरेचसे निर्ढावले असेल. असे असूनही त्या चित्त्याच्या मृत्यूचा त्याला चांगलाच धक्का बसलेला आहे. एका अर्थी त्याच्या संवेदना जिवंत आहेत हे चांगले लक्षण आहे. पण त्याच्या... नि माझ्याही संवेदना अशा पक्षपाती (selective) का आहेत हा प्रश्न मला छळतो आहे.

जुन्या नराला हुसकावून देऊन सिंहिणींच्या टोळीवर वर्चस्व प्रस्थापित केल्यावर, त्या लवकर मीलनोत्सुक व्हाव्यात म्हणून नव्या सिंहाने त्यांच्या बछड्यांना ठार मारलेले पाहून जितकी हळहळ होते, तितकीच हळहळ एखाद्या हरणाच्या टोळीच्या मागे लागलेल्या चित्त्याने मागे पडलेल्या एखाद्या लहान पाडसाचे नरडे पकडल्यावर होते का? पर्यटकांप्रमाणे ती शिकार मी एन्जॉय करणार नाही हे खरे, पण नव्या सिंहाने हत्या करुन टाकलेले बछड्याचे शव पाहून मला जितके वाईट वाटेल, त्याच्या दशांशाने त्या पाडसाबद्दल का वाटत नसावे? 

अगदी शाकाहाराला संघटित धर्माचे रूप देऊ पाहणार्‍यांनीही आपल्या मनात डोकावून पाहात या प्रश्नाचे उत्तर द्यायला हरकत नाही. तोंडाने काहीही म्हणोत, पण माझी खात्री आहे माझ्या उत्तराहून त्यांचे उत्तरही वेगळे नसेल. काही जीव हे इतर जिवांची शिकार होण्यासाठीच जन्मले आहेत, हा निवाडा आपल्या नेणिवेत सहज रुजलेला असल्याचे हे लक्षण आहे. ’अजापुत्रो बलिं दद्द्यात, देवो दुर्बल घातक:’ हे सु(?)भाषित तंतोतंत खरे आहे. एकदा हे रुजले, की माणसांमधलेही 'काही गट, काही जमाती या मूलत:च दुय्यम आहेत, श्रेष्ठ जमातींची सेवा करण्यासाठीच जन्मलेल्या आहेत' हा समजही हळूहळू रुजवता येतो. आपल्या शोषक अजेंड्याला धूर्त माणसे निसर्गातून समर्थन शोधतात ते असे.

अलिकडेच एका लेखात मी नागरी समाजातील व्यक्तींचा, माध्यमांचा हा उच्चवर्गीयधार्जिणेपणा अधोरेखित केला होता. एखाद्या मोठ्या कलाकाराच्या, खेळाडूच्या उतारवयात आलेल्या विपन्नावस्थेची बातमी होते, त्याच्यासाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले जाते. लोकांना त्याच्यावर गुदरलेल्या त्या प्रसंगाचे अतिशय वाईट वाटते, नि ते मदतीस धावून जातात. 

वास्तविक पाहता जर ती व्यक्ती प्रसिद्ध असेल, यशस्वी असेल, तर वृद्धावस्थेत आलेल्या विपन्नावस्थेला बव्हंशी तीच जबाबदार असते. त्यात समाजाचा दोष नसतो, त्यामुळे समाजाने ती निवारावी असे बंधन समाजावर असण्याचे कारण नाही. त्याच्या कार्यक्षम आणि यशस्वी काळात समाजाने त्याला/तिला यथायोग्य मोबदला आधीच दिलेला असतो. त्याचे नियोजन आणि वापर यात गफलत करुन जर ती यशस्वी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कोलमडली, तर ते दुर्दैवी आहे हे खरेच. त्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून तिला साहाय्य करावे हे ही चूक नाहीच. पण तो तिचा हक्क नाही, हे मात्र विसरता कामा नये.

माझा आणखी एक मुद्दा असा आहे, की अशा बातम्या चालवणारी चॅनेल माध्यमे, वृत्तपत्रे, व्हॉट्सअ‍ॅप-सैनिक, फेसबुक नि ट्विटर-योद्धे अशीच मोहिम आर्थिक अडचणीत सापडलेल्या एखाद्या मजुरासाठी चालवतात का? चित्त्याची शिकार अति-दु:खदायक, पण हरणाच्या पाडसाची शिकार फेसबुक वा इन्स्टाग्रामवरच्या स्वप्रसिद्धीचे साधन, असे का? बिस्मिल्लांची आर्थिक अडचण राष्ट्रीय माध्यमांची बातमी होते. पैसे नाहीत म्हणून भलीमोठी जखम बरी करण्यासाठी केवळ हळद किंवा चुन्यावर भरवसा ठेवून बसलेल्या मजुराकडे त्याचा ठेकेदारही ढुंकून बघत नाही. मोडल्या पायाने रोजगार बुडून घरी बसलेल्या त्याला एकवेळचे जेवणही हे सारे जागरुक नागरिक पोचते करत नाहीत.

त्याचप्रमाणे या आज बळी गेलेल्या चित्त्याने याआधी काही इतर प्राण्यांची शिकार केली असेल, जिवंत राहता तर आणखी काही शिकारी केल्या असत्या. जिवंत राहण्यासाठी अन्न हवे, आणि अन्न हवे तर शिकार करायला हवी, या नियमाने तो बाध्य होताच. मी जर हे समजू शकतो, तर मगरीलाही मी तोच न्याय लागू केला पाहिजे. या मगरीने या चित्त्याऐवजी याच चापल्याने एखाद्या नीलगायीची वा काळवीटाची शिकार केली असती, तर मी जितक्या संवेदनशीलतेने वा तटस्थपणे मी ती पाहू शकतो, तितक्याच संवेदनशीलतेने वा तटस्थपणे मी या चित्त्याचा मृत्यूही पाहायला हवा. पण तसे घडत नाही.

भागवतामध्ये गजेंद्रमोक्षाची प्रसिद्ध कथा आहे. अगस्ति-शापाने गजेंद्र नावाच्या हत्तीमध्ये रुपांतरित झालेला राजा इंद्रदुम्न आणि देवल ऋषींच्या शापाने मगर झालेला हुहू हा गंधर्व यांच्यात सरोवराकाठी झालेला संघर्ष हजारो वर्षे चालल्याचा उल्लेख आहे. (हीच कथा- बहुधा पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या पुस्तकात, विष्णूचे द्वारपाल असलेल्या जय-विजयांच्या संदर्भातही वाचली होती.) सरोवरात राहणारी ही मगर पाणी पिण्यास आलेल्या या हत्तीचा पाय पकडते आणि (वरील व्हिडिओतील चित्त्याप्रमाणे) त्याला पाण्यात खेचून नेऊ पाहते. पाण्यामध्ये मगरीचे बळ वाढते तर हत्ती जमिनीवर बलवान. त्यामुळे तो तिला पाण्याबाहेर खेचू पाहतो. दोघांचा हा संघर्ष हा तुल्यबळांचा असल्याने हजारो वर्षे चालतो.

अखेर दुबळ्या पडू लागलेल्या गजेंद्राला विष्णू साहाय्य करतो. (कथा भागवतात असल्याने हे अपेक्षितच.) फक्त तिथेही गंमत पाहा. गजेन्द्राचा उ:शाप म्हणजे मगरीची हत्या... चुकलो, निर्दालन करुन विष्णू त्याचे संरक्षण करतो. हुहूलाही उ:शाप असतो की विष्णूच्या हातूनच त्याला नक्ररूपातून मुक्ती मिळेल.

चमत्कार नि भक्तीचे आवरण दूर करुन पाहिले तर हत्तीचे संरक्षण आणि मगरीची हत्या एवढेच वास्तव शिल्लक राहते. दोन प्राण्यांच्या उ:शाप-क्रियेतील फरक ध्यानात घेण्याजोगा. माणसाच्या मनात असलेले हत्तीबद्दलचे ममत्व आणि मगरीबद्दलची भीती याचाच हा आविष्कार म्हणता येईल. विष्णू हा माणसाचाच देव असल्याने माणसाने त्यालाही आपलेच गुण चिकटवले तर नवल नाही.

या कथेमधला शेवटचा विष्णूचा सहकार्याचा भाग वगळला, तर पुराणकथालेखकाने कोणत्याही एका प्राण्याला धार्जिणे न होता रंगवलेला मगर आणि हत्ती या तुल्यबळांचा संघर्ष हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याने वास्तवाचे हे भान राखले, समतोल राखला. तसाच समतोल हरीण-पाडस नि चित्ता प्राण्यांची शिकार होताना पाहणार्‍या प्रेक्षकांना आणि पर्यटकांना राखता यायला हवा. अन्यथा आपली संवेदनशीलताही केवळ बलवंताची बटीक आहे हे मान्य करावे लागेल.

- oOo -

१. ’सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटातील पहिला प्रसंग एक मानदंड बनला आहे. युद्धाची विफलता, दिशाहीनता आणि क्रौर्य याचे स्तिमित करणारे दर्शन घडवणारा, एक प्रकारे शांततावादी दृष्टिकोन रुजवू पाहणारा हा दीर्घ प्रसंग पुढील कथानकाला एक उत्तम पूर्वरंगही देऊन जातो. (आपल्याकडे रोरावत येणार्‍या रणगाड्यावर कोर्‍या चेहर्‍याने, आपल्या लहानशा पिस्तुलातून एक एक गोळी झाडत संभाव्य मृत्यूला शांतपणे सामोरा जाणारा कॅप्टन मिलर, हा दुसरा उल्लेखनीय प्रसंग.)

पण हा प्रसंग पडद्यावर साकार होत असताना, एका सैनिकाने दुसर्‍यावर केलेला वार, एकमेकांची केलेली हत्या, रक्तमांसाच्या चिखलात पडलेली भर, हे पाहात असताना दिङ्मूढ होण्याऐवजी, प्रत्येक वाराबरोबर, प्रत्येक हत्येसरशी ’अरे उडवला बघ’, ’हाण तेच्यायला’ वगैरे उद्गार काढत मृत्यूचे ते तांडव ’एन्जॉय’ करणारा शेजार मला चित्रपटगृहात लाभला होता. असल्या संवेदनाहीन समाजात आपण जन्मलो याची त्यावेळी प्रथमच शरम वाटली होती. पुढे अशा घटनांची वारंवारता वाढत गेल्यावर, आपणही निर्ढावण्याऐवजी त्या समाजापासून दूर राहणेच श्रेयस्कर असते यावर शिक्कामोर्तब करत गेलो.

२. यावरुन मला सावंतांच्या 'मृत्युंजय'मधील एक प्रसंग आठवतो. कादंबरी असल्याने मूळ महाभारत कथेमध्ये आपल्या कल्पनाविस्ताराने लेखकाने घातलेली ही भर आहे. (तसेही महाभारत हा मूठभर इतिहासाचा(?) अनेक लेखकांनी केलेला कल्पनाविस्तारच आहे.) कौरव नि पांडव द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असताना एका यज्ञासाठी बळी म्हणून प्राणी आणण्याचे काम ते आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवतात. त्यात कर्ण एका वाघालाच पकडून घेऊन येतो. द्रोणाचार्य वाघ हा 'यज्ञीय पशू' नसल्याचे सांगून त्याला पुन्हा सोडून येण्यास भाग पाडतात. त्याचवेळी इतर शिष्यांनी पकडून आणलेले बोकड, हरीण, ससे, रानडुक्कर वगैरे प्राणी मात्र बळींच्या यादीत समाविष्ट केले जातात. अशा प्रसंगातूनच ’अजापुत्रो बलिं दद्द्यात, देवो दुर्बल घातक:’ ही म्हण प्रचलित झाली आहे.


हे वाचले का?

बुधवार, १२ मे, २०२१

पुन्हा लांडगा...

(वेचित चाललो... वर नुकतेच ’लांडगा आला रेऽ आला’ आणि ’लांडगा’ या अनुक्रमे जगदीश गोडबोले आणि अनंत सामंत अनुवादित पुस्तकांवरचे दोन लेख प्रसिद्ध केले आहेत. ’इजा झाला, बिजा झाला, आता तिजाही पुरा करु’ असं म्हणून बराच काळ बाजूला ठेवलेल्या या लघुपटाबद्दलही लिहून मोकळा झालो.)

’जीवो जीवस्य जीवनम्’ या एकमेव नैसर्गिक नियमानुसार प्राणी आपली भूक भागवण्यासाठी एखाद्या भक्ष्य प्राण्याला वा पुनरुत्पादनासाठी जोडीदार मिळवताना एखाद्या स्पर्धकाला ठार मारत असतात. या पलिकडे अन्य कोणत्याही कारणासाठी ते एकमेकांची हत्या करीत नाहीत. पण तांत्रिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत झाल्यावर माणूस स्वत:ला प्राणिजगतातील अजेय सम्राट समजू लागला. ट्रम्पकाकांच्या ’अमेरिका फर्स्ट’ या अलिकडील घोषणेचा पूर्वावतार म्हणजे ’ह्यूमन फर्स्ट’ अशी अलिखित घोषणाच त्याने केली.

पण माणसाच्या बौद्धिक विकासदरम्यान त्याच्या डोक्यात जे अनेक बिघाडही उत्पन्न झाले, त्यात ’शौर्य दाखवण्याची खाज’ हा एक अतिशय प्रबळ असा बिघाड निर्माण झाला. या बिघाडाला व्यापक हितासाठी वापरुन अवगुणाचे सद्गुणात रूपांतर करणारे फारच थोडे. उरलेले सारे आपल्याहून दुबळा जीव शोधून त्याच्यावर रुबाब गाजवून आपले तथाकथित शौर्य मिरवतात. पतीने पत्नीवर, कारकुनाने शिपायावर, बापाने मुलावर, दांडगटाने दुबळ्या वर्गमित्र वा मैत्रिणीवर दाखवलेला रुबाब हा ’दुबळ्याचे शौर्य’ प्रवर्गातलाच. 

पतीला/बापाला बाहेर त्याच्या रोजगाराठिकाणी फटकावले जात असता तो कुत्र्याने मागील पायात शेपूट दडवून शरणागती पत्करावी तसे वागत असतो. कारकुनाला चुकीच्या कारणाने वा आकसाने त्याचा साहेब मेमो देतो, तेव्हा बहुतेक वेळा त्याविरुद्ध ब्र काढत नसतो. शाळेतला ’दादा’ म्हणवून घेणारा, बाहेर वयाने मोठ्या दांडगटासमोर चड्डी ओली करत असतो. त्याचप्रमाणे कुत्रे, हाकारे, मचाण, बंदुका वगैरे बाह्य आयुधांनी सुरक्षित करुन घेऊन माणसे आपले तथाकथित शौर्य जनावराच्या डोक्यावर पाय देऊन काढलेला फोटो किंवा शिकार केलेल्या प्राण्याचे पेंढा भरलेले डोके घरात टांगून ठेवून साजरे करत असतात. एरवी या शूरवीरांपैकी बहुतेक सर्व प्रत्यक्ष जंगलात जाऊन स्वबळावर शिकार करण्याची हिंमत दाखवत नसतात.

बंदुकांसारखे हत्यार मदतीला आल्यामुळे सुरक्षित अंतरावरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करणे शक्य झाल्याने, मांसाहारामध्ये चवबदल म्हणून, माणसाने अनेक प्रकारच्या प्राण्यांची आपल्या भक्ष्यांच्या यादीत भर घातली. यामुळे आणि शिकार हा खेळ झाल्यापासून माणसाने अनेक प्राण्यांना आयुष्यातून उठवले आहे. केवळ भुकेसाठी अन्यजातीय प्राण्याची शिकार करणार्‍या प्राण्यांना पाऽर मागे टाकून, माणसाने केलेल्या अनिर्बंध शिकारीतून अनेक जाती, अस्तंगत झाल्या अथवा होऊ घातल्या आहेत. 

अमेरिकेत स्थानिक माणसांची भरपूर शिकार करुन वरवर ’हक्काची भूमी’ म्हणत त्यांना अप्रत्यक्षरित्या खुल्या तुरुंगात डांबल्यावर, गोर्‍या अमेरिकनांनी आपला मोर्चा प्राण्यांकडे वळवला. आपला शिकारीचा कंड जिरवण्यासाठी एकेकाळी आपल्याकडील पारव्यांसारखे अक्षरश: प्रचंड संख्येने असलेल्या ’पॅसेंजर पिजन’ या पक्ष्याचा वंशविच्छेद घडवून आणला. 

भारतातही वीत-दीडवीत लांबीरुंदीच्या संस्थानांच्या ’राजां’च्या शिकार आणि कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा टाकून पाळण्याच्या हौसेने चित्त्यांचा निर्वंश घडवून आणला. लांडग्याची शेपूट आणून देणार्‍यास या संस्थानिक-राजांनी देऊ केलेले रोख बक्षीस मिळवण्यासाठी शिकार्‍यांनी अनेक जंगलातून लांडगा पार नाहीसा करुन टाकला.

योगायोगाने कालच गोनीदांची ’जैत रे जैत’ वाचत होतो. एका प्रसंगी ठाकरवाडीत उंदरांचा उच्छाद सुरु होतो. मग ढोलिया नाग्याला पुढे घालून उंदरांना घरातून ढोलाच्या दणदणाटाने हुसकावून त्यांची शिकार केली जाते. जोशात आलेल्या तरुणांना एक वृद्ध सबुरीचा सल्ला देतो. ’धाईस उंद्र र्‍हाऊ द्या जिते. पार बेणं काढून टाकू नका.’ 

हे अनुभवजन्य शहाणपण आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत धान्याचे विखुरलेले कण वेचून वाढणारे हे जीव एकरकमी मूठभर तयार अन्न म्हणून उपलब्ध होतात. अन्नाची जरी नासाडी करत असले, तरी दुसरीकडे तो हक्काचा प्रथिनांचा स्रोत असतो. पण हे शहाणपण बंदुकीच्या जोरावर शौर्य दाखवणार्‍यांकडे क्वचितच दिसते. त्या बंदुकीने दिलेली सुरक्षिततेची भावना शौर्याला बहुतेकवेळा क्रौर्याच्या सीमारेषा ओलांडून जाण्यास उद्युक्त करते.

मांसाहारासाठी माणसाला असलेली मांसाची गरज पशुपालनातून सहजपणे भागवली जाऊ लागल्यावर, शिकार ही आता केवळ हौस म्हणूनच शिल्लक राहिली आहे. पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्यांचा बोलबाला सुरु झाला, माणसाच्या जगात नैतिकतेचा प्रभाव वाढला, तेव्हा या रक्तपिपासूंची परिस्थिती थोडी अवघड झाली.

पण माणूस आणि जनावरात एक महत्वाचा फरक आहे. ’तू नाही तुझ्या बापाने उष्टावले असेल माझे पाणी’ म्हणत कोकराची हत्या करणार्‍या लांडग्याची गोष्ट माणसांमध्येच सांगितली जाते. कारण ही खरेतर लांडग्याची नव्हे तर माणसाचीच गोष्ट आहे. नकोशा झालेल्या आपल्याच जातीच्या लोकांना माणूस कम्युनिस्ट, जिहादी, काफीर, राष्ट्रद्रोही, प्रतिक्रांतिवादी, भांडवलशाहीचा हस्तक, पाकिस्तानी, अर्बन नक्षलवादी वगैरे जाहीर करुन त्यांचे निर्दालन करतो नि आपली सत्तेची वाट सुकर करतो.

त्याच धर्तीवर बिबटे, कोल्हे, लांडगे आदिंना हरणासारख्या भक्ष्य प्राण्यांच्या वेगाने घटत्या संख्येचे कारण, नरभक्षक वगैरे असल्याची भुमका उठवून त्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी उजळमाथ्याने आपला शिकारीचा षौक पुरा करुन घेतो. प्रत्यक्षात माणसाच्या अनिर्बंध कत्तलीने झपाट्याने रोडावलेल्या कॅरिबूंच्या रोडावल्या संख्येचे खापर लांडग्यांवर फोडून त्या निमित्ताने त्यांचीच लांडगेतोड कॅनडामध्ये केली गेली हे फर्ले मोवॅटने त्याच्या ’नेव्हर क्राय वुल्फ’ मध्ये नोंदवून ठेवले आहे. 

शिकारीची परवानगी मिळावी, म्हणून सरकारवर या ना त्या प्रकारे खर्‍याखोट्या माहितीचा भडिमार केला जातो. रोगट अथवा वृद्ध झालेल्या पाळीव जनावराची स्वत:च हत्या करुन, त्याचे खापर वाघ, बिबट्या अथवा कोळसुंद्यावर फोडून, सरकारी नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्याचे प्रकार आपल्या देशात भरपूर होतात. यातून वन्यजीवांबद्दलची माणसांच्या मनातील प्रतिमा अधिकाधिक नृशंस होत जाते.

लांडग्यांबद्दल तर आदिम काळापासून माणसाच्या मनात प्रचंड भीती आहे. वाघ-सिंहांना घाबरत नाही इतका माणूस लांडग्यांना घाबरतो. याची एकाहुन अधिक कारणे आहेत. वाघ-सिंहादि मोठी जनावरे जितकी मोठी शिकार करु शकतात, तितकी मोठी शिकार संख्याबळाच्या आधारे लांडगेही करु शकतात. वाघ-सिंहांपासून दूर राहणे तुलनेने सोपे आहे, कारण माणसाच्या बाबतीत हे प्राणी तसे भिडस्त आहेत. त्या तुलनेत- कदाचित संख्याबळाच्या आधारे राहात असल्याने, लांडगे त्या तुलनेत अधिक निर्भीड आहेत. संख्येने अधिक असल्यानेही वाघ-सिंहापेक्षा धोका होण्याची शक्यता त्यांच्याकडूनच अधिक असतो. 

बहुतेक शिकारी प्राणी या अंधाराचा फायदा घेऊन शिकार करत असले, तरी लांडग्यांमध्ये आणि इतर शिकारी प्राण्यांत असलेला एक महत्वाचा फरक आहे. शिकारीला सज्ज झालेले लांडगे जो सामूहिक स्वर लावतात त्याने आसपासच्या भक्ष्यांप्रमाणे माणसांच्या मनातही धडकी भरते. माणूस नागरी झाला तरी कुत्र्यांचे रडणे- त्यातही रात्रीचे अधिक- त्याला अजूनही भेसूर, अपशकुनी वाटते त्यामागे नेणिवेत रुजलेली ही आदिम भीतीच असते.

हे कमी म्हणून की काय, अनेक ललित लेखकांनी आपल्या कलाकृतींमधून रक्तपिपासू माणसांना (व्हॅंपायर) लांडग्याच्या रूपात रंगवल्याने त्यांच्याबद्दलची भीती अधिकच गडद होत गेली. त्यामुळे विविध संस्थानातून, राज्यांतून, राष्ट्रांतून लांडग्याची शिकार बक्षीसपात्र ठरत होती. यातून झाले इतकेच की अनेक भूभागातून लांडगे नामशेष होत गेले. आणि त्याचा त्या त्या परिसंस्थेवर काय परिणाम झाला याची फिकीर करण्याची रक्तपिपासू माणसाला कधी गरज वाटली नाही. ज्यांना वाटली, आणि त्यातील धोके ज्यांनी सांगायला सुरुवात केले त्यांना ’अर्बन नक्षलवादी’प्रमाणेच रक्तपिपासूंचे सभ्य समर्थक असे म्हणून खोडून टाकले गेले. लांडग्यांचे नैसर्गिक परिसंस्थेतील स्थान, त्यांच्या नाहीसे होण्याने झालेले नुकसान, याचा शास्त्रशुद्ध अभ्यासच न झाल्याने त्यांच्या निर्दालनाच्या धोरणाविरोधातील आवाज क्षीणच राहिले होते.

पण निसर्ग-अभ्यासक आणि संरक्षकांनी लांडगा ही प्रजाती देखील आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे, हे आकडेवारीनिशी पटवून द्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या रक्षणाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरिकेतील पहिले अभयारण्य असलेल्या ’यलोस्टोन नॅशनल पार्क’मधून अस्तंगत झालेल्या लांडग्यांच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तिथे चौदा लांडगे बाहेरुन आणून सोडले गेले. असला अगोचरपणाचा प्रयोग करणारे मूर्खच असणार असे सामान्यांचे मत होते हे उघड आहे.

पण या एका बदलाने त्या अभयारण्याचा झालेला कायापालट खुद्द जीवशास्त्रज्ञांनाही अनपेक्षित होता. लांडग्यांसारख्या शिकारी प्राण्याच्या आगमनामुळे झडून चाललेली तेथील परिसंस्था (Ecosystem) कशी वेगाने पुनर्जात झाली यावर अनेक अभ्यासकांनी लिहिले आहे. त्याबद्दल एकाहुन अनेक लघुपट तयार केले आहेत.

या प्रयोगाच्या यशानंतर अन्यत्रही तो राबवण्यात आला. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील आइल-रोयाल या बेटावरील प्राणिजीवनात लांडग्यांचा पुन्हा समावेश करण्याच्या प्रक्रियेवरील हा एक लघुपट.

भारतात ’वन्यजीव संरक्षण कायदा’ झाला नि अभयारण्यांमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची उभारणी झाली. ’वाघासारखा रक्तपिपासू प्राणी का वाचवायचा?’ असा प्रश्न सामान्यांना पडला होता. तेव्हा 'वाघ वाचवणे याचा अर्थ अन्न-साखळीत सर्वात वर असलेल्या या वाघोबाला वाचवायचे, तर खालची सारी उतरंडच वाचवावी लागते. यामुळे एक परिपूर्ण जीवसृष्टी त्या अभयाण्यांमध्ये जपता येईल' याबाबत जनजागृती करण्यात आली होती. आजवर वन्यजीवशास्त्रज्ञांनी ही केवळ तर्कसंगती मांडून दाखवली होती. यलोस्टोनमध्ये सोडलेले लांडगे आणि तेथील परिसंस्थेचा झपाट्याने झालेला विकास यात हा परस्परसंबंध प्रत्यक्षात अनुभवता आला.

केवळ वाघ अथवा लांडगा यांच्यामुळे एक नैसर्गिक परिसंस्था उभी असते, वा त्यांच्या अस्तंगत होण्याचे तिचा तोल बिघडून तेथील जीव-जिवाराचे आयुष्यही धोक्यात येते असे नाही. बीव्हर, व्हेल आणि वॉर्नर ब्रदर्सच्या लूनी-टून्स या प्रसिद्ध कार्टून मालिकेने लोकप्रिय केलेल्या 'टास्मानियन डेव्हिल' या प्राण्यामुळेही जैविक परिसंस्था कशा उभारी घेतात यावरील व्हिडिओही उपलब्ध आहेत.

1.How Beavers Engineer The Land
2. How Whales Change Climate
3. How Devils Heal Forests

विज्ञानाच्या अभ्यासात शक्यतांचा विचार करावा लागतो तसाच आक्षेपांचाही. राजकारणात घडते त्याप्रमाणे आक्षेप घेणार्‍यावर हेत्वारोप करुन त्याला धुडकावून लावता येत नसते. त्यामुळे लांडगे अस्तंगत झाल्यामुळे यलोस्टोनच्या जीवसृष्टीवर झालेला प्रतिकूल परिणाम त्यांना पुन्हा त्या अधिवासात सोडल्याने दूर झाला असला, तरी उद्या त्यातून त्यांची संख्या अमाप वाढली तर होणार्‍या प्रतिकूल परिणामांची शक्यताही विचारात घ्यावी लागणारच आहे

याशिवाय या गोळाबेरीज प्रगतीसोबतच काही विशिष्ट जीवांवर लांडग्यांचे आगमन प्रमाणाबाहेर धोकादायक परिणाम घडवणारे नाही यावरही लक्ष ठेवावे लागते. कारण लांडगे जसे जीवसृष्टीचा भाग आहेत तसेच इतर प्राणीही. कितीही क्षुद्र असला तरी त्याचे जीवसृष्टीतील साखळीमध्ये काही एक स्थान असते. आणि एखाद्या जिवाचा निर्वंश केल्याने ती साखळी कशी तुटत जाईल याचे पूर्वानुमान नेहमीच लावता येते असे नाही.

पण एकुणात जीवसृष्टी शिकारी-भक्ष्य संख्येचा तोल नैसर्गिकरित्या साधते यावर शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. विपुल भक्ष्यामुळे लांडग्यांची संख्या वाढली, की भक्ष्य प्राण्यांची संख्या रोडावते, नि पुन्हा अन्नाचा तुटवडा होऊन लांडग्यांच्या संख्येवर नियंत्रण येते. 'नेव्हर क्राय वुल्फ' या पुस्तकात सुकाळाच्या काळात लांडग्यांची वीण अधिक पिलांची असते, तर अन्नाच्या तुटवड्याच्या काळात त्यात कमी पिले जन्माला येतात, असे निरीक्षण फर्ले मोवॅटने नोंदवलेले आहे. 

आपल्याहून दुबळ्यांची निरर्थक वा स्वार्थप्रेरित हत्या करण्यारा माणूस बंदुकीच्या जोरावर तिथले शिकारी-भक्ष्य गुणोत्तर बिघडवत नाही, किंवा एखादी सर्वव्यापी मोठी नैसर्गिक आपत्ती येत नाही, तोवर यलोस्टोनमधील लांडगे आणि इतर जीवसृष्टी अशीच बहरत राहील अशी आशा करायला हरकत नाही.

- oOo -

या मुद्द्याशी निगडित आणखी काही व्हिडिओ:

1. Another one on Wolves in Yellowstone National Park
2. Beaver Lodge Construction Squad | Attenborough | BBC Earth
3. Reintroduction of Beavers in the San Pedro


हे वाचले का?

सोमवार, १० मे, २०२१

वेचताना... : लांडगा

’Every man for himself’ ही माणसाने फार पुढे, म्हणजे भाषेच्या उगमानंतर प्रचलित केलेली उक्ती, नैसर्गिक न्याय म्हणून जीवसृष्टीच्या बाल्यावस्थेतच प्रस्थापित झालेली होती. एका जातीचे प्राणी, एकेकटे वा कळपाने जगत असताना अन्य जातीय प्राण्यांशी फार जवळीक साधत नसत.

शेतीचा शोध हा माणसाला अन्य प्राण्यांपासून सर्वस्वी वेगळ्या वाटेने घेऊन गेला असला, तरी त्यापूर्वी माणूसही अनेक प्राण्यांपैकी एक होता, आणि अन्य वानरकुलातील प्राण्यांप्रमाणेच मिश्राहारी होता. मांसाहाराची गरज भागवण्यासाठी त्याला शिकार करण्याची गरज भासे.

लांडगा

पण माणूस हा मुळात दुबळा जीव आहे. त्याला वाघसिंहादि शिकारी प्राण्यांची मजबूत ताकद वा जबडा नाही, शिकारी पक्ष्यांप्रमाणे भक्ष्यावर घट्ट पकड मिळवता येईल अशा नख्याही नाहीत, की भक्ष्याचा शरीराचा भेद करुन त्याचे मांस खाण्यास साहाय्यक होईल अशी भक्कम चोचही नाही.

मानवी समाजात दुबळी आणि त्या दुर्बलतेने सतत मागे राहावी लागणारी माणसे कुढी होतात, कडवट होतात. अशी माणसे थेट वर्चस्व प्रस्थापित करता न आल्याने, आपले महत्त्व वाढवण्यासाठी कटकारस्थानांचा आधार घेतात. कदाचित म्हणूनच प्राचीन काळी माणसाच्या मनात छद्मविचाराचा प्रादुर्भाव अधिक झाला असावा. त्यातून त्याने थेट शिकारीपेक्षा सापळे लावणे, जनावराला फसवून खड्ड्यात पाडून शिकार करणे वगैरे मार्ग अवलंबले असावेत.

याशिवाय दुसर्‍या प्राण्याने केलेली शिकार परस्पर हिसकावून घेण्याचे तंत्र बहुधा तरसाकडून वा गिधाडांकडून आत्मसात केले असेल. एड्रियन बोशिअर या भटक्याच्या आफ्रिका सफारीमध्ये त्याने स्वत: हा प्रयोग करुन चित्त्याकडून शिकारीचा एक तुकडा हस्तगत केल्याचे लायल् वॉटसन यांची त्याच्यावर लिहिलेल्या ‘लायटनिंग बर्ड’ या पुस्तकात नमूद केले आहे. (निरंजन घाटे यांनी या पुस्तकाचा ‘निसर्गपुत्र’ नावाने मराठी अनुवाद केला आहे.)

माणसाला पुढील दोन पायांचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने करता येऊ लागल्यावर, धारदार वा अणकुचीदार दगड, हाडे यांचा हत्यारासारखा वापर करण्याचे तंत्र अवगत झाल्यावर, अन्नासाठी तो शिकारीवर अधिक अवलंबून राहू लागला असेल. पुढे भाल्यांसारखी, बाणांसारखी बाह्य आयुधे विकसित केल्यावर तो हळूहळू परोपजीवी (gatherer) पासून शिकारी(hunter) म्हणून अधिक वावरु लागला असेल. यादरम्यानच एकट्या-दुकट्याला पाडाव करता येत नाही अशा मोठ्या जनावराची शिकार सामूहिकपणे करण्याचे तंत्र माणसाने लांडगे, कोळसुंदे यांच्यासारख्या झुंडीने शिकार करणार्‍या प्राण्यांकडून आत्मसात केले असेल.

कॉनरॅड लोरेन्झ नावाच्या एका वर्तनवैज्ञानिकाने (ethologist) ‘Man Meets Dog’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या प्रसिद्ध पुस्तकाच्या ‘How It May Have Started’ या पहिल्या प्रकरणात त्याने माणूस आणि कुत्रा यांच्या सहजीवनाच्या वाटचालीची एक काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. त्या त्याने एका मानवी टोळीने केलेल्या शिकारीच्या उच्छिष्टांवर जगत त्यांच्या मागे मागे फिरणार्‍या कोल्ह्यांच्या टोळीचा उल्लेख केला आहे. या कोल्ह्यांच्या टोळीमुळे पुढे चाललेल्या माणसांच्या टोळीचे मागील बाजूच्या संभाव्य धोक्यांपासून एक प्रकारे संरक्षण होत होते. एखादा शिकारी प्राणी दिसला, की या ‘राखणदार’ टोळीमध्ये जो हलकल्लोळ होई, त्यामुळे पुढे असलेली माणसे आधीच सावध होत.

काही कारणाने ही टोळी दूर गेल्यानंतर हा मागचा 'पहारा’ गायब झाला. त्यामुळे धोक्याची जाणीव वाढलेल्या माणसांच्या टोळीचा नायक अखेर आपल्या मांसाच्या साठ्यातील एक तुकडा कोल्ह्यांसाठी मागे सोडतो, त्यांना आपल्या पाठीमागे येण्यास उद्युक्त करतो. मानवी जीवनाच्या त्या टप्प्यावर, आपल्या शिकारीचा वाटा टोळीबाहेरच्या माणसालाच नव्हे, तर एका जनावराला देण्याचा हा प्रसंग- काल्पनिक म्हटला तरी, अभूतपूर्वच म्हणावा लागेल.

यातून हळूहळू या दोन टोळ्यांत देवाणघेवाण सुरु होते. जखमी शिकारीचा माग काढण्यासाठी केवळ नजरेवर अवलंबून असलेल्या माणसाला कोल्ह्यांच्या तीव्र घ्राणेंद्रियांची साथ मिळाल्यामुळे निसटून गेलेल्या अनेक शिकारींचा माग यशस्वी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढते. माणसाळलेल्या या कोल्ह्यांचे- म्हणजे कुत्र्यांचे, शिकारी माणसाच्या आयुष्यात साहाय्यक म्हणून स्थान निश्चित होत गेले.

कुत्र्याशी युती केल्यानंतर माणसाची ही शिकारक्षमता आणखी सुधारली. कारण आता या शिकारींमध्ये कुत्र्यांच्या माग काढण्याच्या क्षमतेचा वापर करुन घेता येऊ लागला. माणसाचे घ्राणेंद्रिय बरेच दुबळे असते. सोबत असलेला कुत्रा ही कमतरता भरून काढतो. याशिवाय त्यांच्या भुंकण्यातून, आवाजाच्या त्या कल्लोळातून शिकार होऊ घातलेल्या प्राण्याची गती नि विचारशक्ती कुंठित करण्याचा, त्याला ‘स्तंभित’ करण्याचा डाव साधता येतो.

बदल्यात कुत्र्याचे रानटी, अनिश्चित आयुष्य संपून त्याला आहाराची शाश्वती आणि मोठ्या शिकारी जनावरांपासून संरक्षण माणसाकडून मिळू लागले. नैसर्गिक न्यायापलिकडे जाऊन झालेली ही पहिली आंतर’जातीय’ युती म्हणता येईल. या युतीने इतर प्राणिजगतावर अधिराज्य प्रस्थापित केले.

तसे पाहिले तर, उंच झाडावर असल्याने वाढलेल्या नजरेच्या पल्ल्याचा फायदा मिळाल्याने जमिनीवरील प्राण्यांपेक्षा शिकारी जनावर आधी पाहणारी, किचकिच करुन पठारावरील हरणांना सावध करणारी माकडे आहेत. अगदी शहरात, मर्यादित प्राणिजीवनातही येणारा अनुभव म्हणजे, मांजर दिसताच कल्लोळ माजवणार्‍या खारी किंवा साळुंक्या ऊर्फ इंडियन मैनाही आहेत. पण हा ‘बाहेरुन दिलेला पाठिंबा’ म्हणता येईल, ही युती नव्हे.

लोरेन्झच्या गोष्टीमध्ये जरी केवळ कोल्ह्यांचा उल्लेख असला, तरी आजच्या कुत्र्यांच्या प्रजातीमध्ये कोल्ह्यांबरोबरच लांडग्यांचा वंशही प्रकर्षाने दिसतो. एकुणात कुत्र्यांचे कोल्ह्यांपासून उत्क्रांत झालेले नि लांडग्यांपासून उत्क्रांत झालेले, असे दोन वंश मानले जातात.

योगायोग म्हणजे जॅक लंडनच्या ‘व्हाईट फँग’या या पुस्तकाच्या पहिल्याच प्रसंगात लोरेन्झच्या कोल्ह्यांच्या टोळीप्रमाणेच लांडग्यांची एक टोळी दोन माणसांच्या प्रवासात त्यांच्या पाठोपाठ प्रवास करताना दिसते. हा प्रसंग दीर्घ आहे, पुस्तकाचा जवळजवळ सहावा हिस्सा त्याने व्यापला आहे. यातही अन्नासाठी हे लांडगे माणसांपाठोपाठ फिरत आहेत. फरक इतकाच की ही माणसे शिकारी नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या उरलेल्या अन्नाचा वाटा या लांडग्यांना मिळण्याची आशा नाही. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे रानात अन्नाचा प्रचंड तुटवडा आहे. आणि म्हणून शिकारीसाठी ‘सावज’ असणारे चार कुत्रे नि दोन माणसे यांच्या या ‘टोळी’चा अथवा कळपाचा ते पाठलाग करत आहेत. भूक भागवण्यासाठी प्रसंगी दोन पायाच्या त्या माकडांची शिकार करण्याचा त्यांचा निर्धार झाला आहे !

हा प्रसंग इतका प्रत्ययकारी आहे की, संवेदना किंचितही जिवंत असलेल्या वाचकाला तो मुळापासून हादरवून सोडतो, माणसाचे दुबळेपण अधोरेखित करतो. जिवावर उदार झालेले प्राणी माणसाच्या बंदुका नि तत्सम प्रगत आयुधांनाही न जुमानता, आपल्या संख्याबळाच्या आधारे त्याच्यावर सहज मात करु शकतात, याची जाणीव वाचकाला अस्वस्थ करुन सोडते. आर्थिक, तांत्रिक प्रगती माणसाचे जीवित अधिक सुरक्षित करते या भ्रमातून बाहेर येण्यास उद्युक्त करते. अप्रगत, रानटी जमातीचे संख्याबळ हे मूठभर प्रगत जमातीचे अस्तित्व सहज पुसून टाकू शकते, याचे भान माणसाने ठेवावे याची आठवण हा प्रसंग करुन देतो. प्रगतीपेक्षाही वर्चस्व अथवा सत्तेला अधिक महत्व देणारे धर्माधिकारी वा धर्माधिष्ठित संघटना माणसाला कायम अज्ञ, असंस्कृतच ठेवून त्यांना टोळीच्याच मानसिकतेमध्ये का ठेवू इच्छितात याचे इंगित इथे सापडते.

स्वत:ला ‘श्रीमंतांचा पक्षपाती’ म्हणवून घेणार्‍या एका कट्टर भांडवलशाही समर्थक मित्राशी वादविवाद झाला होता. त्यात ‘श्रीमंतांना गरीबांची गरज नाही’, ‘अधिकच नव्हे, तर जास्तीतजास्त पैसे मिळवणे हा श्रीमंतांचा हक्क आहे’, ‘गरीबांना सगळे फुकट मिळते’ वगैरे मुद्दे तो रेटत होता. मग मीही लोरेन्झप्रमाणे अद्याप टोकाची वाटणारी, पण त्याच्या मतानुसार व्यवस्था चालली, तर माझ्या मते अपरिहार्य असलेल्या भविष्याची कथा मांडली होती.

श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले, अक्षरश: मूठभरांकडे प्रचंड पैसा नि उरलेल्यांच्या किमान गरजाही भागत नाहीत अशी परिस्थिती उद्भवली, तर ही सामान्य माणसे सरळ टोळी करुन श्रीमंतावर चाल करुन त्यांची हत्या करतील, नि त्याची चीजवस्तू लुटून नेतील. बहुसंख्या जर दरिद्री असेल तर, ‘पैसे मिळवण्याचा हक्क’ श्रीमंतांना देणारी व्यवस्थाच कोलमडलेली असेल. त्या श्रीमंताला लुटणार्‍या, त्यांची हत्या करणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारणारी यंत्रणाच नसेल. कारण ही यंत्रणा प्रामुख्याने गरजेइतके वा त्याहून थोडे जास्त मिळवणार्‍या सामान्यांकडूनच राबवली जात असते. श्रीमंताने संरक्षणासाठी ठेवलेले हत्यारी संरक्षकही आर्थिकदृष्ट्या खालच्या गटातीलच असतील. जमाव त्यांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा कैकपट अधिक धन लुटलेल्या धनातून एकरकमी देऊ करुन त्यांना सहजपणे आपल्याकडे फितवून घेऊ शकेल.

‘तुझी हत्या किंवा तुला जिवंत सोडून वर अधिक धन’ या पर्यायामध्ये त्यांची निवड साहजिक जिवंत राहण्याच्या पर्यायाची असेल. तांत्रिक प्रगती नि प्रचंड पैसा वगैरे असलेल्या या मूठभरांचा जगण्याचा हक्क व्यवस्थेबरोबरच लयाला जाऊन ‘बळी तो कान पिळी’ या नैसर्गिक न्यायाकडे माणसांचे जगही झुकलेले असेल. या पुस्तकातील पहिल्या प्रसंगातील लांडग्यांची दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये माणसाचीही शिकार करण्याची तयारी झाली होती ती याच मानसिकतेमधून.

थोडक्यात व्यवस्था टिकायची असेल तर सामान्यांना, अप्रगत जीवांनाही त्यांच्या गरजेइतका वाटा मिळण्याची तरतूद तिच्यात शिल्लक राहायला हवी. अन्यथा त्यांचा उद्रेक होऊन अशी त्यांना गैरसोयीची व्यवस्था ते मोडून टाकतील. आणि व्यवस्था टिकली तरच अभिजनांचे अभिजन म्हणून जगण्याचे हक्क शाबूत राहतात, कारण हक्क नि कर्तव्ये ही दोन्ही नेहमीच व्यवस्थेशी संलग्न असतात.

निसर्गात ना हक्क असतात ना कर्तव्ये. तिथे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी शिकार नि पुनरुत्पादनासाठी जोडीदार शोधणे ही दोनच कार्ये शिल्लक राहतात. त्यांना हक्क म्हणावे की कर्तव्य याचा भाषिक निवाडा करण्यासाठी संदर्भ म्हणून कोणतीही व्यवस्थाच अस्तित्वात नसते... ‘व्हाईट फँग’च्या सुरुवातीलाच घडलेल्या या प्रसंगात भुकेल्या लांडग्यांनी माणसांचा केलेला पाठलाग मला आमच्या या चर्चेची आठवण देऊन गेला होता.

या प्रसंगात लांडग्यांच्या टोळीची ‘मार्गदर्शक’ असते एक लांडगी, खरेतर कुत्री. ही दुष्काळामुळे खाद्याच्या शोधात जंगलात परागंदा झालेली, पूर्वी माणसांसोबत राहिल्याने त्यांना न बुजणारी आणि त्यांच्या सवयींशी चांगली परिचित असणारी. या रानातच एका बछड्याला ती जन्म देते. या बछड्याचा जीवनप्रवास, त्याच्याच नजरेतून उलगडणारी ही ‘व्हाईट फँग’ ही कादंबरी ‘एमटी आयवा मारू’ या पिसाट कादंबरीचे लेखक अनंत सामंत यांनी ’लांडगा’ या शीर्षकाखाली मराठीत अनुवादित केली आहे.

अनुवाद इतका यथातथ्य उतरला आहे की प्रथम वाचनात ही कादंबरी अनुवादित आहे मला समजलेही नव्हते. सध्याच्या ‘मोले घातले अनुवादाया’च्या (किंवा ‘गुगल बसले अनुवादाया’च्या) काळात काही दशकांपूर्वीचे मोजके अनुवाद, अगदी प्राचीन मानावेत इतके अविश्वसनीय वाटतात. राम पटवर्धनांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंगच्या ‘यर्लिंग’चा ‘पाडस' हा अनुवाद हे आणखी एक उदाहरण.

’लांडगा’ची कथनशैली अनोखी आहे. सार्‍या घटना, प्रसंग, सारे तपशील त्या लांडग्या-कुत्र्याच्या दृष्टिकोनातून मांडले आहेत. पण तरीही निवेदन प्रथमपुरुषी नाही. कथानिवेदक त्या बछड्याला अथवा लांडग्याला काय वाटले, त्याने काय वा कसा विचार केला हे तुम्हाला सांगत जातो. या सरमिसळ पद्धतीने लेखकाला प्रथमपुरुषी निवेदनातून येणारी दृष्टीकोनाची मर्यादाही राहात नाही. कारण त्या लांडग्याच्या मनात डोकावून पाहात असताना, मध्येच त्यातून बाहेर येऊन निवेदक कथानक पुढे सरकवू शकतो. यातून आवश्यक तिथे इतर पात्रांचे संवादही अंतर्भूत करता येतात.

केवळ प्रथमपुरुषी निवेदन केले असते, तर त्यात लांडग्याच्या ग्रहणशक्तीच्या मर्यादा पाळाव्या लागल्या असत्या. उदाहरणार्थ, त्याच्या निवेदनात पैसा कुठे येऊ शकत नाही. कारण पैसा ही संकल्पनाच त्याच्या जाणिवेत नाही. दुसरे असे की माणसाची भाषाही त्याला अवगत नाही. त्यामुळे प्रथमपुरुषी निवेदनात माणसांचे संवाद अंतर्भूत करता आले नसते. किंबहुना माणसांच्या विविध कृतींचे त्याने त्याच्या बुद्धीच्या मर्यादेत त्याने केलेले आकलन हेच तर त्या कादंबरीचे वैशिष्ट्य अथवा U.S.P. आहे. त्यामुळेच आपण माणसाच्या नजरेने पाहात असलेले हे जग लांडग्याच्या बछड्याच्या, पुढे लांडग्याच्या नजरेतून अनुभवण्याची ही संधी चोखंदळ वाचकाने घ्यायलाच हवी. जी पुस्तके वाचल्याखेरीज वाचकाला मरायला परवानगी नाही असे मी गंमतीने म्हणतो त्या पुस्तकांच्या यादीत ‘लांडगा’चा समावेश आहे.

या बछड्याचा जन्म त्याची आई जंगलात परागंदा असताना झालेला. त्याने पहिली काही पावले टाकली, जगण्याचे पहिले संघर्ष पाहिले/अनुभवले ते तिथेच. मग आईचे शेपूट धरून तो माणसाच्या जगात परतून येतो, तेव्हा जगण्यातील दुसर्‍या टप्प्याला सामोरा जातो. जंगलात रानमांजरीशी, ससाण्याशी झालेल्या संघर्षातून त्याला जगण्यातील धोके समजले होते. पुढे माणसाच्या टोळीसोबत राहताना आपले स्थान मिळवण्यासाठी, राखण्यासाठी सजातीयांशी संघर्ष करावा लागतो याचे भान त्याला येत जाते. माणसांमध्येही सरसकट शत्रू वा मित्र नसतात, त्यांतही काळे-गोरे निवडावे लागतात हे स्वानुभवातून तो शिकत जातो.

पुढे शरीरातील लांडग्याचे रक्त, जंगलातील जगण्याने दिलेला सावधपणा यातून आत्मसात केलेल्या ज्ञान आणि कौशल्य यांच्या आधारे झुंजींच्या खेळातील अजेय कुत्रा म्हणून नावलौकिक मिळवून जातो. तर त्या शिखरावर असतानाच अक्षरश: क्षुद्र भासणार्‍या एका प्रतिस्पर्ध्याच्या अनपेक्षित डावापुढे हतबल होऊन पडण्याची शरणागत अवस्थाही अनुभवतो...

त्या लांडग्याच्या दृष्टीने जग पाहताना आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती एकांगी असतो, नि जगण्यातील आपल्या क्षुद्र समस्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने खडतर आयुष्य सामोरे जाणार्‍या प्राण्यांपेक्षा आपले जगणे किती सुसह्य आहे, हे वाचेवरून जाणिवेत उतरत जाते.

एरवी पुस्तक वा चित्रपटाबद्दल लिहिताना लेखकाची माहिती, चित्रपटातील अभिनेत्यांची, दिग्दर्शकाची माहिती वा इतिहास वगैरे फोलपटमसाला देणे मी टाळतो. त्याने पुस्तक वा चित्रपटाच्या आकलनात काही भर पडते असे मला वाटत नाही. उलट त्यावर इतिहासाचा एक अनावश्यक दबाव निर्माण होतो नि वाईटाला बरे वा चांगले किंवा उलट म्हणण्याचे अदृश्य बंधन जाणवू लागते. पण इथे मात्र त्याचा मोह अजिबात आवरत नाही. कारण या पुस्तकाची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की याचा एक वंशच तयार झाला आहे.

या ‘व्हाईट फँग’च्या जगण्याचे बोट धरुन जवळजवळ सतरा-अठरा चित्रपट तयार झालेले मला सापडले. पहिला चित्रपट १९२५ साली प्रदर्शित झाला, तर imdb.com सांगते की White Fang: At the Edge of the World नावाचा एक चित्रपट सध्या हॉलिवूडमध्ये तयार होतो आहे.

देशांचा विचार केला तर हॉलिवूडमुळे अमेरिका; त्याशिवाय इटली, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान, न्यूझीलंड, कॅनडा आदि देशांमध्ये हे चित्रपट तयार झाले आहेत. अनेक भाषांतून ते डब म्हणजे अनुवादितही केले गेले आहेत. व्हाईट फँगच्या आयुष्यातील चार टप्पे (जंगल, इंडियन टोळीतील जीवन, झुंजीचा कुत्रा आणि अखेरीस नागरी आयुष्य) विचारात घेतले तर त्यातील वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधारे पटकथा लिहून हे चित्रपट उभे आहेत.

यात सर्वात मोठा वाटा अर्थातच इंडियन टोळीसोबत असतानाचा आहे. कारण त्याला ‘गोल्ड रश’शी जोडून घेता आले नि त्यातून ‘वेस्टर्न’ प्रकारचे चित्रपट तयार करणे शक्य झाले. यात चार इटालियन वेस्टर्न अथवा ज्यांना ‘स्पागेती वेस्टर्न’ म्हणतात अशा चित्रपटांचा समावेश आहे.

या चित्रपटांमधून मुख्य पात्र कायम असले तरी लेखन/पटकथालेखनाने आपले स्वातंत्र्य घेतले आहे. मूळ कादंबरीशी तंतोतंत प्रामाणिक राहिलेले दोनच चित्रपट आहेत. पहिला १९४६ मध्ये रशियामध्ये तयार झालेला The White Fang आणि दुसरा जपानमध्ये तयार झालेला White Fang Story हा चलच्चित्रपट. या दोघांनीही कादंबरीच्या सुरुवातीचा लांडग्यांनी माणसांच्या केलेल्या पाठलागाचा प्रसंगही वगळलेला नाही. यात प्रसंगात खुद्द व्हाईट फॅंग नसल्यामुळे इतर बहुतेक चित्रपटांनी तो वगळला आहे.

जॅक लंडनने ‘कॉल ऑफ द वाईल्ड’ नावाचे आणखी एक पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक याच्या नेमक्या उलट प्रवासाचे आहे. बक नावाच्या एका कुत्र्याचा नागरी समाजाकडून जंगलाकडे झालेला प्रवास त्यात मांडला आहे. दुर्दैवाने त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध नाही. ही दोन पुस्तके नि जॅकचे आत्मचरित्र यांची सरमिसळ करत त्याला ‘गोल्ड रश’ची जोड देणार्‍या पटकथेआधारे ‘व्हाईट फँग’ याच नावाचा चित्रपट १९९१ चित्रपट प्रदर्शित झाला. या दुसर्‍या पुस्तकातील ‘बक’ या कुत्र्याच्या आयुष्याभोवतीही सुमारे दहा चित्रपट उभे राहिले आहेत.

व्हाईट फँग आणि बक या जोडगोळीने चित्रपटक्षेत्रात श्वान-वंशाला भक्कम स्थान निर्माण करुन दिले. पुढे सिल्व्हर वुल्फ, बाल्टो वगैरे अनेक कुत्र्यांनी ते बळकट करत नेले आहे..

- oOo -

‘लांडगा’मधील एक वेचा: करड्या बछड्याचे जग.


‘व्हाईट फँग’च्या कथेवर आधारित चित्रपटांची यादी:
(यातील काही चित्रपट यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.)

1. White Fang (1925)

2. White Fang (1936)

3. The White Fang (Belyy Klyk) (Russia) (1946): (True to book adaptation)
https://www.youtube.com/watch?v=oENiIrmZiaA (Russian)
https://www.youtube.com/watch?v=NzOPZIf7SFo (Russian)

4. White Fang (Zanna Bianca) (Italy) (1973)
https://www.youtube.com/watch?v=GYBuoluCIGs

5. Challenge to White Fang (Il ritorno di Zanna Bianca)(1974)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=1pafYsxcTLg

6. White Fang to the Rescue (Zanna Bianca alla riscossa)(1975)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=M2ajoF_Dgbk

7. White Fang and the Hunter (Zanna Bianca e il cacciatore solitario)(1975)(Italy)
https://www.youtube.com/watch?v=HmkAfMcVgNY

8. White Fang and the Gold Diggers (La spacconata)(1975)
https://www.youtube.com/watch?v=X20sNs0McIM(Italy)

9. White Fang Story (Shiroi kiba howaito fangu monogatari)(1982)(Japan)(Animation)(True to book adaptation)
https://www.youtube.com/watch?v=Aj6rQajdAGA (Russian)

10. (Run,) White Wolf (Hashire! Shiroi Õkami)(1990) (Japan)(Animation)
https://www.youtube.com/watch?v=rpuYG7XALJo

11. White Fang (1991) (Australia)(Animation)

12. White Fang 1991 Movie (Disney, USA)
https://www.youtube.com/watch?v=80euiba7uns(Spanish)

13. The Legend of White Fang (1992-94)(Canada)(Animation Series)
https://www.youtube.com/playlist?list=PLl4VRRDOhElNe2Bq0PXauDRwGZkqQHNzp (Blocked in India)
https://www.youtube.com/playlist?list=PLL1VjyxIslixZOngCWJE-pz9REivqreaa (Blocked in India)

14. White Fang 1993 TV Serial(Canada, France, New Zealand)
https://www.youtube.com/playlist?list=PLCiuBdaSY8ss0jM0uBuDD6oAGqMfTDb6i
https://www.youtube.com/playlist?list=PLC1xfqrHTOY7UEpEGNPiZmBluhUaeGo45

15. White Fang 2: Myth of the White Wolf (1994) (Disney, USA)

16. White Fang (1997)(Animation) (USA)
https://www.youtube.com/watch?v=lmy4dayV5vc

17. White Fang (2018) (Netflix, USA)(Animation)

18. White Fang: At the Edge of the World (Pre-production)

---

Audio Book: White Fang: https://www.youtube.com/watch?v=-odw4i_381w


हे वाचले का?

शुक्रवार, ७ मे, २०२१

वेचताना... : लांडगा आला रेऽ आला

(हा सुईदोर्‍याचा खेळ मोठा मजेशीर असतो. लहानपणी हा खेळ खेळताना एकाचा पाठलाग करत असताना दुसरा दोघांच्या मधून गेला की पहिल्याचा नाद सोडून त्याचा पाठलाग सुरु करावा लागे. ‘वेचित चाललो...’ वर अलिकडे असेच होऊ लागले आहे. ‘थँक यू, मि. ग्लाड’चा पाठलाग करत असताना ‘एक झुंज वार्‍याशी’ मध्ये घुसले नि आधी नंबर लावून गेले. आता अनंत सामंतांच्या ‘लांडगा’वर लिहिता लिहिता हा गोडबोलेंचा लांडगा मध्ये घुसला. तो लांडगाही येतोच आहे मागून.)

लांडगा आला रेऽ आला

संशोधनाचे काम रुक्ष असते, संशोधक म्हणजे अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, केस न विंचरलेला, जाड चष्मा लावून आपल्याच जगात हरवलेला असा प्राणी असतो, असा सार्वत्रिक समज आहे. त्यात वैज्ञानिक म्हटले की, आपल्या मनात रसायनशास्त्रज्ञच येतो. आणि तो कायम चित्रविचित्र आकाराच्या काचेच्या भांड्यातून ठेवलेल्या रंगीबेरंगी रसायनांसोबत, ‘कशात तरी काहीतरी घालावे, काहीतरी होईल’ अशा प्रवृत्तीचा मनुष्य असतो, हा समज चित्रपटांनी आपल्या मनात रुजवलेला असतो. या एका विज्ञानशाखेखेरीज इतर विज्ञानशाखा असतात, हे आपल्या गावीही नसते. फारतर भौतिकशास्त्र (की पदार्थविज्ञान?) आणि जीवशास्त्र हे दोन शालेय विषय तेवढे अंधुकसे आठवत असतात.

जीवशास्त्र म्हणजे वर्गीकरण, पृथक्करण, आकृत्या नि प्रयोगशाळेतील निरीक्षणे इतकाच आपला समज असतो. अप्रायोगिक निरीक्षणांचाही जीवशास्त्राच्या विकासात मोठा वाटा असतो, याचा शालेय विद्यार्थ्यांना सोडा, त्यांच्या शिक्षकांनाही पत्ता नसतो.

डार्विनच्या उत्क्रांतिवादाबद्दल आपण थोडेफार ऐकलेले असते. (‘तो खोटा आहे’, ‘देव/धर्मद्रोही आहे’ किंवा ‘आमचे दशावतार हीच उत्क्रांती’ वगैरे व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातले शिक्षणही आपण घेतलेले असते. ) पण त्याबद्दल साधकबाधक विचार करायचा तर पुस्तकी अभ्यासाला किमान अनुभवाची तरी जोड द्यायला हवी, हे आपल्या गावीही नसते. हजारो वर्षांपूर्वीच्या समजांना आजही ब्रह्मवाक्य समजून त्यानुसार वर्तन करणार्‍या बहुसंख्येच्या समाजात अनुभवसिद्धतेला फारसे महत्व नसते.

डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकताना, त्याच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज...’ या पुस्तकाचा ओझरता उल्लेख आपण ऐकलेला असतो. त्याच्या ‘व्हॉयेज ऑफ द बीगल’चे नाव मात्र काही लाखांत एखाद्यालाच ठाऊक असेल. आपल्या उत्क्रांतिवादाची मांडणी ज्या निरीक्षणांच्या आधारे डार्विनने केली, ती सारी निरीक्षणे, ते अनुभव ज्या बीगल जहाजाच्या सफरीदरम्यान त्याने घेतले, त्याचा दस्तऐवज म्हणून त्या पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

डार्विनप्रमाणेच जीवशास्त्रातील निरीक्षण-अभ्यासाला वाहून घेतलेल्या अनेकांनी आपले अनुभव ग्रथित केले आहेत. यात ठळकपणे नाव घ्यावे लागते ते जेन गुडाल, डायान फॉसी आणि बिरुटे गल्डिकास या तीन स्त्रियांचे. प्रायमेट्स अथवा वानरकुलातील अनुक्रमे चिंपांझी, गोरिला आणि ओरांग-उटान या तीन जमातींच्या अभ्यासाला वाहून घेतलेल्या या तिघींचे जीवन हे निरीक्षण-शास्त्रज्ञांच्या दृष्टीने मार्गदर्शक आहे.

पैकी चिंपांझी हे वानर जैविकदृष्ट्या मनुष्यप्राण्याला अधिक जवळचे असल्याने, आणि तिच्या निरीक्षणांतून त्या जमातीबरोबरच मानवी जीवनाबद्दललच्या जैविक अभ्यासाला आधार मिळाला म्हणून, जेन गुडालला तुलनेने बरीच प्रसिद्धी मिळाली. डायान फॉसीवर एक चित्रपट (माहितीपट नव्हे) निर्माण झालेला आहे. गोरिलाच्या शिकार्‍यांनी केलेल्या हत्येमुळे तिच्या आयुष्याला थोडे नाट्यमय शैलीत सादर करणे शक्य झाले असावे. बिरुटे मात्र तुलनेने (ती ब्रिटिश वा अमेरिकन नसल्याने आणि तिचे कार्यक्षेत्रही आशिया असल्याने?) दुर्लक्षित राहिली आहे. या नि अशा अनेक व्यक्तींच्या अथक परिश्रमामुळे आणि चिकाटीमुळे वर्तनविज्ञान (ethology) नावाची जीवशास्त्राची एक स्वतंत्र शाखाच उदयाला आली आहे.

दुर्दैवाने मराठीमध्ये सुनीताबाई देशपांडे यांनी या तिघींवर लिहिलेला लेख वगळता, यांच्यावर फारसे लिहिले गेलेले नाही. यांच्यापैकी कुणाचे लेखन अनुवादितही झालेले नाही. त्या तुलनेत लांडग्यांच्या अभ्यासासाठी गेलेल्या फर्ले मोवॅट सुदैवी म्हणावा लागेल.

फर्लेच्या लांडग्यांच्या अभ्यासाचे निमित्तकारण हे रोचक म्हणावे लागेल. कॅनडात शासकीय रोजगार करत असलेल्या या जीवशास्त्रज्ञाला ध्रुवीय लांडग्यांच्या अभ्यासासाठी पाठवले गेले, तेच मुळी त्या लांडग्यांनी केलेल्या कॅरिबूंच्या (ध्रुवीय हरणांच्या) लांडगेतोडीबद्दल प्रचंड गहजब झाला म्हणून. एका अर्थी हा सरकारी कारभार होता. पण फर्लेची प्रवृत्तीच खर्डेघाशी करण्याची नव्हती. त्याने आपल्या निरीक्षण-प्रवासाकडे निव्वळ नोंदींसाठी केलेला प्रवास म्हणून न पाहता, लांडग्यांच्या जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यातून नागरी समाजातील समजांना छेद देणारी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवली.

लांडग्यांपेक्षा कैकपट हत्या- त्याही अनेकदा शिकारीच्या षौकासाठी, करणार्‍या माणसांनाच कॅरिबूंच्या वेगाने घटत्या संख्येसाठी जबाबदार धरले गेले पाहिजे असा निष्कर्ष त्याच्या निरीक्षणातून निघत होता. अपेक्षेप्रमाणे नागरी समाजाच्या हिताच्या नि समजांच्या आड येणारे त्याचे निष्कर्ष काहींनी दुर्लक्षिले, तर काहींनी त्यांना ‘फेक न्यूज’ म्हटले.

तरीही त्याचे काही महत्वाचे निष्कर्ष पुढे रुजले. उदाहरणार्थ कॅरिबूंच्या उत्तरायणाच्या काळात, शिकार उपलब्ध नसताना, हे लांडगे जगतात कसे याचे त्याने शोधून काढलेले उत्तर धक्कादायक होते. या काळात लांडगे उंदरांवर ताव मारतात. यांना केवळ गुजराण करणे म्हणता येत नाही. कारण त्या काळात ते पूर्णपणे सुदृढ असतात. म्हणजे त्यांचे पोषण व्यवस्थित होत असले पाहिजे असा त्याने निष्कर्ष काढला. इतकेच नव्हे तर स्वत: काही काळ असा व्यतीत करुन त्याची खात्रीही करुन घेतली.

पुढे या ध्रुवीय लांडग्यांचे, कोल्ह्यांचे जमिनीखालील उंदीर तसंच बर्फाच्या थराखालील ससे वा तत्सम जिवांची शिकार करण्याचे व्हिडिओच तयार झाले. ज्यांनी फर्लेने नोंदवलेल्या उंदीर-शिकारीच्या पद्धतीवर शिक्कामोर्तब केले.

पुस्तकी शिक्षणातून तयार झालेल्या तज्ञांनी फर्लेचा अधिक्षेप केला. त्याचे एक कारण म्हणजे त्याच्या नोंदी कदाचित शास्त्रीय चौकटीत बसणार्‍या नाहीत. ती शिस्त त्याने पाळलेली नाही. त्याची मोहिम शासकीय असल्याने, एकुणातच शासकीय मोहिमांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल जगभर असलेला अविश्वासही त्याचे दुसरे कारण असू शकेल. तिसरे, आणि महत्वाचे कारण म्हणजे, फर्लेने आपले सारे लेखन हे ललित शैलीमध्ये केले आहे. रुक्ष शास्त्रीय मांडणीला झुगारून केलेले हे लेखन सामान्यांपर्यंत पोचल्यामुळे, लांडग्यासारख्या भीती असलेल्या प्राण्याबद्दल बरीच जागृती झाली असली, तरी शास्त्रीय बैठक नसल्याने त्याला वर्तनवैज्ञानिकांनी सुरुवातीला फार महत्व दिले नाही.

आणखी एक महत्वाची बाब अधोरेखित करायची म्हणजे फर्लेची विनोदबुद्धी. ज्याचे नावच ‘बॅरन लॅंड’ आहे अशा भकास प्रदेशात लांडग्यांच्या मागे एखाद्या भुतासारखे भटकताना, मानसिक संतुलन राखणे हीच जिथे मोठी कसरत आहे. त्याहीपुढे जाऊन विनोदबुद्धी शाबूत राखणे ही तर थोर गोष्ट आहे. त्याच्या लेखनातील या विनोदबुद्धीमुळेच त्याचे ‘नेव्हर क्राय वुल्फ’ वाचता वाचता आपण गुंगून जातो.

पुस्तक वाचून संपल्यावरच कदाचित आपल्या ध्यानात येते की, आपल्या नर्मविनोदी शैलीच्या आधारे फर्लेने लांडग्यांसंबंधी अनेक निरीक्षणे आपल्या गळी उतरवली आहेत. एरवी एखाद्या वैज्ञानिक निबंधातून ती वाचताना आपण कंटाळून गेलो असतो, ती सहजपणे आपण आत्मसात केली आहेत.

प्रत्यक्षातही लांडग्यांच्या एका कळपाजवळ राहात असताना त्याने थोडासा वात्रटपणा केला आहे. मूत्रपिचकारीने आपली हद्द आखणार्‍या लांडग्याला डिवचण्यासाठी त्यानेही तोच प्रयोग करुन पाहिला. पण ‘कमीत कमी श्रमात’ आपला प्रदेश पुन्हा मिळवून लांडगा-नायकाने त्याचे नाक कसे कापले, याचे वर्णन मजेशीर आहे. या ‘नेव्हर क्राय वुल्फ’चा ‘लांडगा आला रेऽ आला’ नावाने केलेला अनुवाद जगदीश गोडबोलेंनी त्या नर्मविनोदासहित यथातथ्य उतरवला आहे.

लांडग्यांच्या कुटुंबांचा एकच प्रकार नसतो असे फर्लेला त्याच्या निरीक्षणातून आढळून आले. कुठे केवळ एकटी जोडी, कुठे एकाहुन अधिक जोड्या, वृद्ध लांडगे आणि पिले असे मोठे बारदान, अशी अनेक प्रकारची लांडगा-कुटुंबे असतात असे त्याला दिसून आले. त्याने दीर्घकाळ निरीक्षण केलेल्या त्याच्या लांडगा-कुटुंबात जॉर्ज आणि अ‍ॅंजेलिन हे जोडपं, त्यांची चार पिल्ले आणि अल्बर्ट नावाचा एकटा लांडगा असे सात सदस्य होते.

यातील अल्बर्टला मादी जोडीदार नाही. मधमाश्यांमध्ये वा मुंग्यांमध्ये ज्याप्रमाणे राणीच्या पिलांचे संगोपन हेच जीवनकार्य असलेल्या कामकरी माश्या वा मुंग्या असतात, तद्वत हा अल्बर्टचाचा कुटुंबातला पोशिंदा आहे आणि पिलांची काळजी घेणाराही. अखेर एकदाचे जोडीदार मिळवण्याचे तो मनावर घेतो म्हणा, पण त्यासाठी फर्लेलाच थोडे प्रयत्न करावे लागतात. हा धमाल किस्सा ’वृकमंगल सावधाऽन’ इथे वाचता येईल. (Culture-vultures ऊर्फ संस्कृतीरक्षकांनो कृपया दूर राहा.)

१९८३ मध्ये या पुस्तकावर त्याच नावाचा एक चित्रपटही तयार करण्यात आला. पण त्यात फर्लेची भूमिका करणार्‍या चार्ल्स मार्टिन स्मिथला त्याचा नर्मविनोदी स्वभाव अजिबातच पकडता आलेला नाही.

- oOo -


हे वाचले का?

वृकमंगल सावधाऽन

गुहेची नवी जागा लांडग्यांना कितीही सोयीची असली तरी मला सोयीची नव्हती. दगडांच्या ढिगाऱ्यामुळे धड काही दिसायचं नाही. शिवाय कॅरिबूनी दक्षिणेकडे स्थलांतर करायला सुरुवात केल्याने लांडग्यांचे लक्ष शिकारीकडे असायचे. दिवसभर ते थकूनभागून झोपायचे. त्यामुळे विशेष काही घडायचं नाही. थोडक्यात मी भयंकर बोअर व्हायला लागलो होतो.

एवढ्यात एक मजा झाली- चाचा अल्बर्ट चक्क प्रेमात पडला !

लांडगा आला रेऽ आला

आमच्या पहिल्या भेटीनंतर माइक आपले सर्व कुत्रे घेऊन उत्तरेकडे चालता झाला होता. एकही कुत्रा मागे न ठेवण्याचं कारण, माझ्यावरचा अविश्वास असावं. शिवाय कुत्र्यांची पोटं भरायला त्यांना कॅरिबूमागे उत्तरेकडे नेणं भाग असावं. आता कॅरिबूच्या मागे तेही दक्षिणेकडे परतले होते.

एस्किमो लोकांकडचे कुत्रे लांडग्यांचीच धेडगुजरी अवलाद असते अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. पण ती चुकीची आहे. कदाचित दोघांचे वंशज एकच असले तरी ठेंगण्या, रुंद छातीच्या हस्कीमध्ये (एस्किमो कुत्रे) व लांडग्यांमध्ये दिसण्यात ठळक फरक आहे. मुख्य म्हणजे या हस्की कुत्र्यांच्या माद्या वर्षभरात केव्हाही माजावर येतात. माइककडचे कुत्रे तर अस्सल खानदानी कुत्रे होते.

माइक परतला तेव्हा त्याच्याकडची एक कुत्री माजावर आली होती आणि नेहमीप्रमाणे तमाम कुत्रेमंडळी तिच्याभोवती गोंडे घोळत होती. आपापसात भांडत होती. माइकचं डोकं त्यांनी अगदी फिरवून टाकलं होतं.

माझ्या डोक्यात सहज एक कल्पना आली. लांडग्यांच्या माद्या साधारणपणे मार्चमध्ये माजावर येतात. त्यामुळे मला अजूनपर्यंत लांडग्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल माहिती मिळाली नव्हती. मात्र लांडगा - कुत्रे यांचा आपापसात संबंध येऊ शकतो आणि कोणतीच पार्टी त्याचा विधिनिषेध मानत नाही ही अमोल माहिती माइक- उटेककडून समजली होती. कुत्रे बहुतांश वेळ बांधलेले असतात म्हणून हे घडत नाही एवढंच.

मी माइकला माझी कल्पना सांगितली आणि त्यालाही ती पसंत पडली. संकरातून निर्माण झालेला कुत्रा गाडी ओढायच्या कामाला किती उपयोगी पडत हे त्यालाही बघायचं होतं.

आता माझ्या शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टिकोणातून प्रयोग कसा आखायचा हाच एक प्रश्न होता, आम्ही टप्प्याटप्प्याने प्रयोग करायचं ठरवलं. पहिल्या प्रथम एका कुत्रीला लांडग्याच्या गुहेकडे नुसतं फिरायला घेऊन जायचं- तिची खबर लागावी म्हणून.

कुआ ( त्या कुत्रीचे नाव ) एका पायावर तयारी होती ! एका जागी लांडग्यांचा जरा वास लागल्यावर तर तिने लाजलज्जा सोडून मला साखळीसकट जवळजवळ फरपटत नेलं. जेमतेम मी तिला खोपटाकडे परत आणलं आणि साखळीने बांधून ठेवलं. आपली नाराजी तिने रात्रभर बोंबलून व्यक्त केली. हे ओरडणं केवळ नाराजी व्यक्त करण्यासाठी नसावं तर सादही असावी. कारण दुसऱ्या दिवशी अगदी खोपटापर्यंत, एका मोठ्या लांडग्याच्या पाऊलखुणा आढळल्या. केवळ मत्सरी कुत्रे-कंपनीशी हाणामारी व्हायला नको म्हणून त्याने प्रणयाचा मोह आवरून सन्माननीय माघार घेतली असावी.

लांडग्यांच्या गोटापर्यंत कुआची खबर इतक्या झटपट लागेल याची मलाही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही कुआला गुहेच्या दिशेने घेऊन गेलो. आम्ही घेऊन गेलो म्हणण्यापेक्षा, तीच आम्हाला त्या दिशेने फरफटत घेऊन गेली असं म्हणणं अधिक योग्य होईल. तंबूतून नीट दिसेल किंवा काही बरंवाईट झालं तर मदतीला जाता येईल, अशा बेताने आम्ही तिला लांबलचक दोरीने खडकाला बांधून ठेवलं. बांधली असली तरी तिला सर्व हालचाल करता येत होती.

कुआने आल्या आल्या झकासपैकी ताणून दिली. गुहेच्या अंगाला पिल्लं अधून-मधून दिसत असली तरी मोठ्या लांडग्याचा मागमूस नव्हता. साधारणतः रात्री साडेआठच्या सुमाराला लांडग्यांचे शिकारपूर्व समूहगान सुरू झालं. आवाज़ ऐकताक्षणीच कुआ ताडकन उठली आणि तिने आपला आवाज लावला. व्वा! काय सूर होते! आता लांडग्या-कुत्र्याचं रक्त माझ्या धमनीतून वाहात नसले तरी कुआच्या त्या मादक सुरांनी मलाही कसल्या कसल्या गुलाबी आठवणी यायला लागल्या !

लांडगे-मंडळींनी ताबडतोब या हाकेची दखल घेतली. आपलं गायन अर्ध्यावर थांबवून तिघेही टेकाडमाथ्यावर आले. कुआ आणि त्यांच्यामध्ये पावभर मैलाचं अंतर असलं तरी कुआ त्यांना स्पष्ट दिसली असावी.

जॉर्ज आणि अल्बर्ट दोघेही धावत निघाले.

जॉर्जची धाव मात्र जास्त टिकली नाही. कारण अँजेलिन त्याला मागे टाकून पुढे धावली आणि धावता धावता तिने जॉर्जला टांग मारली, असा मला संशय आला. कारण जॉर्ज जो कोलमडला, तो उठेपर्यंत त्याची कुआमधली दिलचस्पी पार उडून गेली होती ! जॉर्जच्या मनात काही पाप नसेलही. केवळ कलेसाठी कला किंवा आपल्या सरहद्दीमध्ये हा कोण आक्रमक आला म्हणून कदाचित तो पाहणी करायला निघाला असेल. काय असेल ते असो; तो आणि अँजेलिन, अल्बर्ट चाच्यावर सर्व जबाबदारी सोपवून माघारी फिरले आणि काय घडते ते पाहत राहिले.

हा अल्बर्ट चाचा किती काळ ब्रह्मचारी होता, मला नेमकं माहीत नव्हतं. पण प्रचंड काळ असावा असं त्याच्या एकंदरीत हालचालीवरून वाटत होतं. कारण पठ्ठ्या एवढा सुसाट निघाला की, आम्हालाच प्रतिस्पर्धी समजून तो थेट आमच्यावर तुटून पडतो की काय, असं क्षणभर वाटून गेलं.

कुआ आतुरतेने त्याचा इंतजार करत होतीच. तो तिच्या जवळपास पोचला आणि त्याचा अवतारच बदलला.

तो चक्क माकडच बनला ! आपले कान भुईसपाट करून शेपटीचा गोंडा घोळवत तो लहान पिल्लांसारखा वाकड्या-तिकड्या उड्या मारू लागला. कसले तरी चित्रविचित्र आवाज काढू लागला.

छे: ! स्वतः च्या इज्जतीचा त्याने पार फालुदा करून टाकला !

कुआही बिचारी गोंधळली. सिनेमे बघायची सवय नसल्याने असला प्रणय कधी तिने बघितला नव्हता. त्यामुळे आताचा नायक जवळ आला की, ती खेकसत दूर पळायची. कुआच्या नकाराने अल्बर्ट अजूनच पेटायचा, चेकाळायचा. जमिनीलगत सरपटत आणखी येडेपणा करायचा.

आता मात्र मला कुआसारखीच काळजी वाटायला लागली.

हा लांडगा पार पागल झाला की काय ? मी बंदूक उचलून कुआच्या मदतीला जाणार तोच उटेकने माझा हात धरला. तो मिश्किल हसत होता. 'घाबरू नकोस, लांडग्यांच्या दृष्टीने झकास प्रणय चाललाय.' त्याने दिलासा दिला.

मग अल्बर्टचा नूर परत झपाट्याने बदलला. सर्व पागलपण सोडून तो पूर्ववत झाला. मानेभोवतीची चंदेरी आयाळ फुलली. सफेद पोलादासारखे त्याचे शरीर ताठ झाले. कुत्र्याप्रमाणे त्याने शेपूट गुंडाळून घेतली. हळूवार पावले टाकत तो तिच्याजवळ सरकला.

कुआचा गोंधळ संपला असावा. आताचं वागणं तिच्या परिचयाचं असावं. अल्बर्ट जवळ येताच तिने प्रेमाने त्याच्या गालाचा चावा घेतला आणि त्याला पाठीशी घेतला...

-पुढचा सर्व तपशील मी सांगत नाही. कारण तो फारच तांत्रिक आणि शास्त्रीय आहे! एक मात्र सांगू शकतो अल्बर्टचाचा रतीक्रीडेत पूर्ण पारंगत होता ! असो.

माझी शास्त्रीय संशोधनाची भूक भागली असली तरी अल्बर्ट-चाच्याची खाज शमली नसल्याने मात्र वांधा झाला. कारण आम्ही तास-दोन तास वाट पाहिली तरी त्याची हटायची तयारी दिसेना आणि आम्हाला कुआला सोडून द्यायचं नव्हतं. शेवटी आम्ही प्रेमी युगुलांची ताटातूट करायचं ठरवलं.

आम्ही प्रेमिकांच्या अगदी बवळ पोहोचलो तरी अल्बर्टपठ्ठा हलला नाही. काही वेळ त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता आली पंचाईत ! आम्ही हस्तक्षेप केला तर अल्बर्टची काय प्रतिक्रिया होईल हे उटेकलाही सांगता येईना. शेवटी मीच, अल्बर्ट उभा होता त्याच्याजवळ जमिनीत गोळी घातली.

बंदुकीच्या आवाजासरशी अल्बर्टची प्रणय-धुंदी खाडकन उतरली. एक छलांग मारून तो दूर सरकला. पण परत त्याने आगेकूच सुरू केली. शेवटी विरही कुआला साखळीने ओढत उटेक पुढे आणि बंदुकीच्या धाकावर पिछाडी सांभाळत मी मागे अशा थाटात आम्ही परतलो. अल्बर्टने आगे-मागे, या बाजूला, त्या बाजूला जात आमचा पिच्छा पुरवलाच.

खोपटाजवळ आल्यावर परत एकवार मी बंदुकीची फैर झाडली. पण अल्बर्टवर विशेष परिणाम झाला नाही. आता कुआला आत खोपटात बांधण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण बाहेर कुत्र्यांमध्ये बांधली असती तर शाही लढाया झाल्या असत्या.

ती रात्र भयानक गेली. खोपटाचा दरवाजा लावला होता. अल्बर्टने ओरडून ओरडून आमची आय माय उद्धरायला सुरुवात केली. त्याने आमची आणि तमाम कुत्रेमंडळींनी अल्बर्टची ! त्यातच कुआने आपला आर्त विरही सूर त्यांच्यात मिळवला. व्वा, काय मैफिल होती !

सकाळी-सकाळी माइक फारच भडकला होता. शेवटी उटेकने परिस्थिती काबूत आणली. 'कुआला सोडून द्या, माज गेला की ती परत येईल. काही पळून-बिळून जाणार नाही. त्याने शहाणपणाचा सल्ला दिला.

नेहमीप्रमाणे उटेकचं खरं निघालं.

पुढचा आठवडाभर आम्ही सात स्वर्गात विहरणाऱ्या युगुलाला दुरून बघत होतो. ते खोपटाजवळ आले नाहीत की, गुहेजवळ गेले नाहीत. त्यांना आमची खबरबात नव्हती. पण नाही म्हटलं तरी मला थोडी काळजी होतीच. त्यामुळे एक दिवस कुआ बाहेरून परतली तेव्हा सुस्कारा सोडला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अल्बर्टही शिकारपूर्व समूहगानात सामील झाला. आता मात्र त्याचा आवाज शांत-तृप्त-आरपार समाधानी वाटत होता.

तृप्ती-बिप्ती ठीक आहे, पण लांडग्यात काय म्हणून?

नाही म्हटलं तरी माणसांच्या जिवाला काहीतरी वाटतंच; निदान माझ्यासारख्याच्या तरी !

- oOo -

पुस्तक: लांडगा आला रेऽ आला
लेखक/अनुवादक: फर्ले मोवॅट/जगदीश गोडबोले
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९८)
पृ. ८२-८६.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : लांडगा आला रेऽ आला >>
---


हे वाचले का?