शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

वेचताना... : मृगजळाची तळी

मनुष्यप्राण्याच्या इतिहासात त्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच असल्याने स्वयंसिद्ध होते.

मृगजळाची तळी

पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. मग मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली. जगातील बहुतेक जमाती, धर्म, वंश यांच्या परंपरेत देवाच्या जोडीला देवांकडून सतत पराभूत होणारा असा शत्रू आणून बसवण्यात आला. मग ज्यू/ख्रिश्चन परंपरेत सैतान आला, इस्लाममधे इब्लिस, शैतान आला, तर बौद्ध धर्मात मार उगवला. (या इथे दुर्गाबाईंच्या वेच्याच्या प्रस्तावनेतही हा मुद्दा आला आहे.) हिंदू परंपरेत तर अशा छोट्या रेघांची रेलचेल आहे, कारण इथे देवांची संख्या प्रचंड असल्याने त्यांचे शत्रूही महामूर.

ही आदिम जाणीव माणूस आजही पुढे घेऊन जातो आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठेही शेजारी लहान रेघ ओढल्याखेरीज आपली रेघ मोठी सिद्धच करता येत नाही इतकी श्रेष्ठत्वाची व्याख्या खुजी झाली आहे. इतिहास वा साहित्यही याला अपवाद नाही. 

आपल्या मते मूर्खपणाच्या असलेल्या, मारक असलेल्या एखाद्या निर्णयावर 'तुघलकी निर्णय' असा शिक्का मारून त्याची निंदा केली जाते, कारण महंमद बिन तुघलक हा मूर्खांचा शिरोमणी अशी आपली व्याख्या आहे. इथे 'वेचित चाललो' वरच कार्नाडांच्या 'तुघलक'चा एक वेचा शेअर केला आहे. या नाटकातला तुघलक वेगळाच दिसतो. ही दुसरी बाजू पाहण्याची तसदी घेणारे कार्नाडांसारखे एखादेच, बाकीचे सारे पूर्वग्रहांवर जगतात.

याच्या दुसर्‍या टोकाला काही जण जात, धर्म, गट याचा विचार करून आपल्या बाजूच्या, गटाच्या प्रत्येक नकारात्मक प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात एखादी व्यक्ती रोल मॉडेल आहे की आपला तुघलक आहे हे बव्हंशी वास्तवापेक्षा पूर्वग्रह नि आपल्या मतांना दामटण्याची सोय यावरच ठरते.

साहित्यामधे सर्वांतिसचा 'डॉन क्विक्झोट' हे पात्र याचे उत्तम उदाहरण ठरते. सर्वांतिसने त्याच्या या कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित केला तेव्हा हे पात्र 'तुघलक' म्हणून सामोरे आले. पूर्वग्रहदूषित विचार करणार्‍यांनी या व्यक्तीला तसेच पाहिले. सोळाव्या शतकात प्रकाशित झालेल्या या कादंबरीला समीक्षकांनी बिल्कुल महत्त्व दिले नाही. पण वाचकांनी मात्र तिला डोक्यावर घेतले, ते ही एक विनोदी कादंबरी म्हणूनच. 

पुढे एकोणिसाव्या शतकात ’क्विक्झोट'कडे हा एक वेगळेच व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. क्विक्झोट्च्या व्यक्तिमत्त्वात एखाद्या प्रेषिताची कळकळ नि हेतू सहज दिसतात. फक्त त्याला योग्य कृती अथवा विचार सापडले नाहीत, त्यामुळे त्याची कृती हास्यास्पद ठरली, तो लोकांच्या उपहासाचे, मनोरंजनाचे साधन ठरून गेला. थोडक्यात त्याच्याकडे एक 'अयशस्वी प्रेषित' म्हणून का पाहू नये असा एक विचार पुढे आला. 

इतकेच नव्हे तर त्याने जागतिक साहित्यात अनेक लेखकांना प्रेरणा दिली. 'क्विक्झॉटिझम' हा विचारच त्यातून पुढे आला. क्विझॉटिझम म्हणजे नक्की काय याची शाब्दिक व्याख्या प्रत्येकाने आपापल्या सोयीची केलेली असली तरी ढोबळमानाने 'सर्वेपि सुखिनः सन्तु' ही मूळ प्रेरणा आणि तसे घडावे म्हणून आपण आपली जबाबदारी उचलायला हवी हा विचार, पण त्याला आवश्यक असलेल्या वास्तवाच्या भानाचा किंवा बलाचा अभाव म्हणजे क्विक्झॉटिक व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. 

ही जी व्याख्या मी केली ती ढोबळ यासाठी म्हणतो, की यातील एखाद्या गुणाची (गुण या शब्दाला कोणतीही सकारात्मक, नकारात्मक छटा नाही!) छटा कमी अधिक गडद असू शकते, एखाद्याचा अभाव असू शकतो, तितपत धूसरता कोणत्याही व्याख्येत असतेच.

तर या क्विक्झॉटिझम ने साहित्यात आपले एक अढळ असे स्थान निर्माण केले. असे क्विक्झोटने जागतिक साहित्याच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखकांच्या लेखनात शिरकाव केलेला दिसतो. अनेकांनी जाहीरपणे हे ऋण मान्यही केले आहे. हा धागा घेऊन दोन जागतिक आणि दोन भारतीय लेखकांवरील क्विक्झोटचा प्रभाव शोधण्याचा प्रयत्न विजय पाडळकर यांनी आपल्या 'मृगजळाची तळी' या पुस्तकातून केला आहे. 

डोस्टोव्हस्कीच्या 'इडियट'मधला प्रिन्स मिश्किन, हिंदीमध्ये बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' मधला सदानंद, गुस्ताव फ्लॉबेरची प्रसिद्ध 'मादाम बोवारी' आणि जीएंच्या 'यात्रिक' मधे येणारा डॉन (जो खरंतर व्यक्ती म्हणूनही डॉन क्विझोटच आहे) यांच्यातील क्विक्झोट उलगडून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

थोडे शोधले तर इतर अनेक कथा, कादंबर्‍यातून अशी क्विक्झॉटिक पात्रे आढळून येतील. विश्राम गुप्ते यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'चेटूक' या कादंबरीतील राणी ही देखील साहित्य, चित्रपटाच्या जगातून घेतलेल्या आदर्श प्रेमाची, आदर्श जोडीदाराची आस घेऊन असते. पण वास्तवात तिच्या समोर येतो तोच आपल्याला हवा तसा जोडीदार आहे या भ्रमात ती वागू पाहते. फक्त क्विक्झोटप्रमाणे तिचा भ्रमनिरास फार उशीरा होत नाही, पण तिच्या स्वप्नाळू काळातील कृतीचे परिणाम तिला अखेरपर्यंत भेडसावत राहतातच.

पाडळकरांनी या सार्‍या लेखकांच्या लेखनातील क्विक्झॉटिक अस्तित्वाबाबत केलेले विवेचन सारे तुम्हा आम्हाला पटेल असे मुळीच नाही. अगदी इथे मी निवडलेल्या वेच्याबाबतही मला ते पुरेसे पटले आहे असे नाही. परंतु स्वतंत्रपणे पाहिले, तर त्यांचा हा 'आकान्ताचे वैफल्य' हा लेखच मला पुस्तकातील पाच लेखांत सर्वात अधिक भावला.

हा लेख बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' या कादंबरीबाबत आहे. यातील सदानंद हा मला स्वतःला क्विक्झोट कमी आणि ’पराभूत बुद्ध' अधिक दिसतो. किंबहुना मी ती कादंबरी वाचली तेव्हा त्याचे ते बुद्धाची छाया असणेच मला अधिक भावले होते. आजच्या जगात बुद्ध अवतरला तर त्याचे भागधेय देखील ’सदानंद'पेक्षा वेगळे नसेल याची मला जवळजवळ खात्रीच आहे. 'जो लोक कल्याणा, घेई करी प्राण, त्या सौख्य कैचे' हे खरे असले तरी आज त्याला जोडूनच 'त्या यश कैसे' असेही म्हणावे लागेल. 

वैयक्तिक स्वार्थ, माझ्या गटाचा स्वार्थ या क्रमाने प्राधान्यक्रम उतरत जात असताना आणि तो स्वार्थ, अहंकार जपण्यासाठी सोबत इतरांसाठी द्वेष जपणे महत्त्वाचे ठरत असताना ’सकलांचे कल्याण’ ही सर्वांनाच मूर्खपणाची कल्पना वाटत असते हे उघड आहे. अशा वातावरणात बुद्ध पराभूतच होत असतात. कारण बुद्धाचे श्रेष्ठत्व समजून घेण्याइतकी कुवत आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याची निर्लिप्तता केव्हाच अस्तंगत झालेली आहे.

हा लेख निवडला याचे कारण म्हणजे हा सदानंद एकांगी, सर्वगुणसंपन्न असा नाही हे! माणूस कितीही सद्भावना राखून असला तरी ती आचरणात आणण्याइतकी त्याची प्रेरणा किंवा कुवत पुरेशी प्रबळ असेलच असे नाही. तसे असले तरी त्याच्या त्या सद्भावनेचे महत्त्व कमी होत नाही. आणि म्हणून हा सदानंद आपल्यातलाच वाटतो. आणि जर तो क्विक्झॉटिक असेल, तर त्याच्यासोबत असताना आपल्या आतला क्विक्झोटही कदाचित सापडू शकतो.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: आकान्ताचे वैफल्य


हे वाचले का?

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आकान्ताचे वैफल्य

'मुजरिम हाजिर'चा नायक सदानंद चौधरीभोवती वर उल्लेख केलेली पात्रे फिरत असतात. घटनांचे केंद्रस्थान व लेखकाचे लक्ष्यही तेच आहे. ह्या सदानंदचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत जाते हा या कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा गुण-विशेष आहे. ज्या घटना घडतात, त्यांना महत्त्व आहे ते सदानंदाच्या संदर्भात. कारण शेवटी घटनांना सामोरे जाणारा माणूस, त्याच्यात होणारे परिवर्तन हे लेखकाच्या व वाचकाच्या दृष्टीने मोलाचे असते. सदानंदच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणार्‍या घटना पाहिल्या की त्यांच्यामधून सदानंदचे अत्यंत व्यामिश्र असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते. अगदी लहानपणापासून हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे. खेळात त्याला रस नाही. नाटकाबिटकात तो रमत नाही. त्याला फारसे मित्र नाहीत. एकटे फिरणे त्याला आवडते. आत्मकेंद्रित व्यक्तिमत्वाच्या या सार्‍या पाऊलखुणा. बाह्य अशी काहीच व्यवधाने नसल्यामुळे हा मुलगा मनाशीच विचार करू लागतो. आपल्याभोवती घडणार्‍या घटनांचा अर्थ जाणून घेण्याची त्याला गरज भासते आणि त्याला वेगळीच अशी बाजू दिसते. कपिल पायरापोडोने आत्महत्या का केली? 'कालीगंज की बहू' आपल्याकडे सारख्या चकरा का मारते? गरीबांना आपले वडील, आजोबा का छळतात? असे प्रश्न त्याच्या बालमनाला पडतात. आपण श्रीमंत व इतर गरीब का? माणसामाणसांत असा फरक का? तो कोणी केला? एक ना दोन. ह्या प्रश्नांचे ओझे त्याला सहन होत नाही. अत्यंत लाडात सुखवैभवात वाढणार्‍या मुलाच्या मनात हे असमाधानाचे बीज कोठून आले? आयुष्य अशा प्रश्नांचे उत्तर देत नाही. पण एवढे मात्र खरे की असे बीज ज्याच्या मनात पडते तो जगापासून तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला पडतो. त्याची एकाकीपणापासून सुटका नाही, असमाधानापासून सुटका नाही. वाडवडिलांच्या संपत्तीच्या पाठीमागे असलेल्या गुन्ह्यांची, पापांची जाणीव सदानंदला लहानपणीच होते व त्याचे बाल्य कोमेजते. ऐश्वर्यामुळे त्याचे डोळे बंद होत नाहीत; तर पुरते उघडतात. ह्या पापात आपणही सहभागी आहोत ही भावना त्याच्या मनात जन्म घेते. आयुष्य जसे आहे तसे निमूटपणे स्वीकारुन जगत राहणार्‍या माणसांच्या कळपात त्याला स्थान राहात नाही. एकदा प्रश्न मनात उमटू लागले की सतत नवनवे प्रश्न येतच राहतात आणि त्यांची उत्तरे शोधता शोधताच आयुष्य संपून जाते. हे अटळ भविष्य लहानपणीच सदानंदच्या भाळी लिहिले गेले आहे.

मृगजळाची तळी

लहानपणी मनावर ज्या गोष्टी कोरल्या जातात त्यांच्या खुणा मोठेपणीही मिटत नाहीत. उत्कटपणे जगणार्‍या माणसाच्या मनात तर त्या सतत जाग्याच असतात. सदानंद तरुण होतो तरी त्याच्या मनातले प्रश्न त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची ठाम उत्तरे उलट आता मिळालेली आहेत. पूर्वजांच्या जगातील अन्याय मानवनिर्मित आहे हे त्याला कळले आहे. पूर्वजांच्या पापात आपण सहभागी आहो हा त्याचा ठाम निष्कर्ष आहे. त्यामुळे संपत्तीबद्दलची त्याच्या मनातील आसक्ती हळूहळू कमी होत जाते. स्वतःजवळ सारे काही असल्यामुळेच व अधिक काही नको असल्यामुळे एक स्वार्थरहित अशी त्याची मनोवृत्ती तयार होते. जे आहे त्याचेच ओझे झाल्यामुळे आणखी काही मागण्याचा प्रश्नच नसतो. जगाविषयीची त्याची भूमिका आता पक्की होते. माणसाबद्दल त्याच्या मनात खोल सहानुभूती आहे. करुणा आहे, प्रेम आहे. माणुसकी व दया या मूल्यांवर त्याचा विश्वास आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता कुणासाठी काहीतरी करावे, इतरांची दु:खे दूर करावीत, त्यांना सुख मिळवून द्यावे अशा इच्छा त्याच्या मनात निर्माण होतात व येथेच त्याचे डॉन क्विक्झोटशी नाते जुळते.

सदानंदचे डॉन क्विक्झोटशी असलेले नाते थोडे विस्ताराने पाहण्यासारखे आहे. सर्वांतिसच्या ह्या झपाटलेल्या शिलेदारासारखेच सदानंदच्या हृदयात माणसाबद्दल प्रेम आहे. मनात एक स्वप्न आहे. डोक्यात एक वेड आहे. ह्या संदर्भात पहिला प्रश्न असा की आपला नायक डॉन क्विक्झोटवर बेतावा अशी बिमल मित्र यांची इच्छा होती का? कादंबरीतील सदानंदच्या संदर्भातील लेखकाचे भाष्य काळजीपूर्वक तपासले तर दिसून येते की त्यांनी एकदा गौतम बुद्धाचा व एकदा येशूचा उल्लेख केला आहे. 'ढाई हजार साल पहले दूसरे एक सदानंदका जन्म हुआ था | लेकिन इस सदानंद की तरह उस सदानंद का भी ऐश्वर्यसे जी नही भरा था | उसके भी मनमे यही प्रश्न जगा था, यह अन्याय है, यह पाप है| इस अन्याय, इस पाप का प्रतिकार होना चाहिए |

"आजसे एक हजार नौसो तिहत्तर साल पहले तब के मनुष्य की धरतीने जैसे दूसरे एक सदानंद को समसामायिक समाज ने बिल्कुल खत्म करके अपने आपको खतरे से खाली समझा था, उसके उतने दिनोंके बाद आज के मनुष्य की धरती भी उसके एक अन्य उत्तरसूरी मुजरिम को दंड देकर अपने को खतरेसे खाली समझकर निश्चिंत हो गयी|

गौतम बुद्धाप्रमाणेच आपले सारे वैभव, आपली पत्नी यांचा त्याग करुन सदानंद घराबाहेर पडला. येशू ख्रिस्ताप्रमाणेच त्याला अपराधी ठरवून मानवावर केलेल्या प्रेमाचे प्रायश्चित्त समाजाने भोगण्यास लावले. पण त्या महामानवांशी असलेले सदानंदचे साम्य तेथेच संपते. ते फारसे ताणता येत नाही. याची लेखकालाही जाणीव आहे. महामानवाचे चित्रण करणे हा या कादंबरीचा हेतू नाही. सामान्य माणसातून वर उठू पाहणार्‍या एका उत्कट जीवाची शोकांतिका लेखकाला रंगवायची आहे. आणि ह्या शोकांतिकेला भव्य पार्श्वभूमी आहे ती समाजाच्या रसातळाकडे जाणार्‍या महायात्रेची. सामाजिक अधःपतनाच्या काळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी चमकणारी क्षीण प्रकाशरेषा लेखकाला पकडावयाची आहे. म्हणून आपला नायक त्यांनी दैवी गुण वा सामर्थ्य असलेला निवडलेला नाही. त्याला न पेलणारे वर त्यांनी दिलेले नाहीत. सदानंद बुद्ध नाही, येशू नाही, कारण त्याच्याजवळ भक्कम असे तत्त्वज्ञान नाही. भोवतालच्या दु:खाने तो व्याकुळ होतो. सर्वांनी सुखी व्हावे ही शुभेच्छा त्याच्या ओठावर आहे. पण मानवजातीला दु:खातून सोडवण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. (अर्थात तो तसा बुद्धाला वा येशूला सापडला की नाही हा वादाचा प्रश्न आहेच.) असा सदानंद महामानव बनू शकत नाही याची कारणे त्याच्या स्वभावातच आहेत. हा माणूस ज्या वैभवात वाढला आहे त्या वैभवाचे गुण याचा त्याला तिटकारा आहे. त्याचा बाप म्हणतो, "लडकेमे यह भी क्षमता नही की खुद कमाकर गुजारा चलाएगा!" एक खानदानी रक्त त्याच्या धमन्यांतून वाहते आहे#. तो आपल्यासाठी पाणीदेखील शोधून पिऊ शकत नाही. त्याचा नोकर एकदा त्याला म्हणतोच, "आप ढूँढकर गिलास कैसे पाएंगे| आपने क्या कभी हातसे डालकर पानी लिया है?" हा माणूस घरून बाहेर पडतो, पण पुन्हा पुन्हा कुणाच्या तरी आश्रयालाच जातो, जेथे खाण्यापिण्याची तरी कमीत कमी सोय होईल. अन्यायाविरुद्ध तो बोलतो, त्याला चीड आहे, पण त्याविरुद्धच्या लढाईत तो स्वतःला झोकून देऊ शकत नाही. लढाईपासून तो हमेशा दूरच आहे. पण त्याचबरोबर हेही खरे की लढाई त्याच्या मनातच आहे. हा माणूस महामानव नाही म्हणूनच तो आपल्याला जवळचा वाटतो, त्याची सुखदु:खे जवळची वाटतात, आपली वाटतात.

सबंध मानवजातीच्या कल्याणाचे लक्ष्य सदानंदसमोर नाही. त्याला मानवाचे दु:ख दिसते. त्याच्या वेदना दिसतात. पण त्याची दृष्टी मर्यादित आहे. आपल्या वर्तुळापुरती सीमित आहे. आपल्या पूर्वजांचे पाप आपल्या शिरावर आहे हे तो मानतो व त्या पापाचे प्रायश्चित्त त्याला पुरेसे आहे. "मैं तुम्हारे पाप का भागीदार नहीं हूँ | सिर्फ मुझे तुम लोग छुटकारा दो |" असे तो म्हणतो. पण ह्या जीवनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर सुटणे एवढे सोपे नसते. सुटून जाणार कोठे? सर्वत्र तर हीच माणसे आहेत. चेहरे बदललेले पण आत्मे तेच. सर्वत्र हेच तर जीवन आहे. किडलेले, भ्रष्ट! ह्यापासून सुटका नाही. ह्या अशुभाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य सदानंदजवळ नाही

त्याच्याजवळ आहे ती फक्त शुभेच्छा, सर्वांचे भले व्हावे, सर्व सुखी व्हावे, ही. या संदर्भात मला डी. एच. लॉरेन्स'चे एक वाक्य आठवते. त्याने लिहिले आहे, "General goodwill is a form of egoism. It is always felt as insult by the mere object* of it."

- oOo -

*हा मुद्रणदोष असावा. बहुधा हा शब्द subject असा असावा.

---

पुस्तकः मृगजळाची तळी
लेखक: विजय पाडळकर
प्रकाशकः मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती पहिली (१९९९)
पृष्ठे: ६१-६४

---
संबंधित लेखन:
वेचताना... : मृगजळाची तळी >>
---


हे वाचले का?

रविवार, ९ एप्रिल, २०१७

मोठी रेघ - छोटी रेघ

"बाई, आता आपण पाप-पुण्य, स्वर्ग-नरकाबद्दल बोललो. त्याच संदर्भात एक प्रश्न मला विचारावासा वाटतो आहे. 'पैस' मधे तुम्ही अजिंठावर लेख लिहिला आहे. त्यामधे 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' असं नाव एक जर्मन माणसान दिलेल्या चित्राचं तुम्ही फार सुंदर वर्णन केलं आहे. या चित्रामध्ये गौतम बुद्धाला मोहात पाडण्याची पराकाष्ठा करणारा 'मार' दाखवलेला आहे. आता इथं मला आठवण होते ती 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' या कथेची. या दोन्हींची तुलना कशी कराल?"

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

"बौद्ध वाङमयामधे 'मार' ही व्यक्तिरेखा आहे, ती सैतानाची मूर्ती नाही. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममधे सैतान आहे. 'मार' हा त्या अर्थाने सैतान नाही. पण तो बुद्धाला, बौद्धांना मोहात पाडणारा आहे. तुमच्या मनात ऐहिक सुखासाठी लोभ-मोह उत्पन्न करणारा आहे; पण हा पापी नाही. 'संपत्ती पाहिजे? ये माझ्याकडे, मी देतो. बुद्धाकडे कशाला जातोस?' अशा पद्धतीचं त्याचं बोलणं असतं. 'बुद्धप्रलोभन' म्हणून मी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये हा मार बुद्धालाच मोहात पाडायचा प्रयत्न करतो त्याबद्दल मी लिहिलंय. तेच ते अजिंठा इथलं चित्र. फारच सुंदर चित्र आहे ते, की बुद्धासमोर मार येतो. अक्राळविक्राळ चेहर्‍याचा आहे तो मार. बुद्धाला भय दाखवतो, की मी मारेन तुला. मग त्याच्यासमोर आसन्नप्रसवा गर्भवती, सुंदर स्त्री उभी करतो, की ती बघून त्याला - बुद्धाला - आपल्या बायकोची, मुलाची आठवण यावी आणि त्याचा तपोभंग व्हावा. कारण गौतम आपल्या तान्ह्या मुलाला आणि तरुण, सुंदर पत्नीला सोडून आलेला असतो. पण गौतमाने आपला मार्ग सोडला नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, की गौतमाच्या वडिलांनी त्याला अगदी ऐषारामात ठेवलं होतं. दु:खाचा, दैन्याचा वारादेखील त्याला लागू नये म्हणून. पण गौतमाने जख्खड म्हातारा बघितला, रोगी माणूस बघितला, प्रेतयात्रा बघितली आणि मग वैराग्य येऊन त्यानं राजवाडा सोडला, आपला तान्हा मुलगा सोडला, तरुण, सुंदर पत्नीचाही त्याग केला. पण एक लक्षात घे, की गौतमाला हे वैराग्य मोठ्या वयातच आलं असं नव्हे, तर लहानपणापासून त्याची ती मूळ प्रवृत्तीच होती. एकदा छोटा गौतम पांढर्‍या जांबाच्या झाडाखाली बसला होता. तर तिथं बसल्या बसल्याच जांबाकडे बघून त्यानं ध्यान लावलं. तेव्हा तो ५-६ वर्षांचाच होता. त्याची ही वृत्ती बघूनच त्याच्या वडिलांनी त्याला हरप्रकारे दु:खापासून दूर ठेवलं होतं, ऐषारामात ठेवलं होतं. त्याला हा मार परत परत वैराग्यापासून, ज्ञानमार्गापासून, तपःसाधनेपासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो. पण बुद्ध मात्र आपल्या निश्चयापासून ढळत नाही. 'बुद्धिझम अ‍ॅन्ड मायथॉलॉजी ऑफ इव्हिल' नावाचं एक पुस्तक आहे, ते वाच. या मारबद्दल खूप माहिती मिळेल तुला. तशीच 'मेरी कॉरेली'ची 'सॉरोज् ऑफ सॅटान' नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये तिनं सैतानाचं दु:ख काय आहे ते मांडलंय. फार छान पुस्तक आहे ते."

"अगदी जरूर वाचेन ही पुस्तकं. आणखीही काही मिळाली तर वाचेन."

"आणि मग मला सांग; काय काय तुला मिळालं ते."

"सांगेन. पण आत्ता मला सांगा, की बौद्ध वाङमयातला मार आणि ख्रिश्चनांचा सैतान यांच्यामधला फरक, साम्य काय? 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' आणि 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' यांच्यामधे साम्य, फरक काय?"

"मार आणि सैतान हे दोघेही लोकांना मोहात पाडण्यासाठी धडपडणारे आहेत. ख्रिस्ताबद्दल असं म्हणतात, की माग्दालेना ही ख्रिस्ताचे पाय आपल्या अश्रूंनी धुते, आपल्या लांबसडक केसांनी ख्रिस्ताचे पाय पुसते. तेव्हा ख्रिस्त तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने बघत असतो. ते दृश्य पाहून लोकांना वाटतं, की ख्रिस्ताला माग्दालेनाचा मोह पडलेला आहे. पण वस्तुतः तिने जीझसचे पाय आपल्या अश्रूंनी धुवून, केसांनी पुसून स्वतःच्या पापांच क्षालन केलेलं आहे, असाही विचार मांडला जातो."

"बुद्ध आणि मार यांचं नातं वेगळंच आहे. बुद्धाने वैराग्याच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने जाऊ नये, सुखासीन आयुष्य जगावं, जगातले सगळे उपभोग घ्यावेत यासाठी मार त्याला कधी भीती दाखवतो, तर कधी मोहात पाडतो. कितीतरी प्रसंग असे आहेत, की बुद्ध मोहात पडू शकला असता; त्याच्या नकळतच. पण बुद्ध विचलित झाला नाही. म्हणून बुद्धाचं हे टेम्प्टेशन नाहीच आहे. कोणी कोणी विद्वान येतात आणि काहीतरी आख्यायिका शोधून काढून कशाशी तरी संबंध लावतात. खरं म्हणजे या चित्रामध्ये मार तिथे असला; तरी ते बुद्धाचं टेम्प्टेशन नाही; तर मार तिथे असूनही बुद्धाला झालेला परमसत्याचा साक्षात्कार आहे. म्हणूनच बुद्धाची नजर, त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, अंतर्मुख झालेले आहेत. बुद्ध स्वतःच कल्पना करतो, की मार मला कुठल्या पातळीपर्यंत जाऊन मोहात पाडायचा प्रयत्न करू शकतो. आणि त्या कल्पनेपासूनही बुद्ध स्वतःला सोडवून घेतो. ख्रिस्ताचं भांडण आहे ते प्रत्यक्षातल्या सैतानाशी.

"हिंदू धर्मामध्ये सैतानाची किंवा मारची कल्पना दिसत नाही ना?"

"नाही. हिंदू धर्मात सैतान किंवा मार नाही. त्याचं स्वरूप फार वेगळं आहे. एक महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला मोहात पाडायला, तपश्चर्येपासून विचलित करण्यासाठी दुसरा कोणी लागत नाही; तर माणसाच्या मनातच लोभ, मोह, माया, आसक्ती असते. माणूसच स्वतःचा शत्रू असतो. ही कल्पना हिंदू धर्मात आहे. म्हणूनच आपले साधू, संत, महात्मे नेहमी सांगत असतात, की माणसाने स्वतःच आसक्ती आणि मोहापासून दूर राहावे. हिंदू माणसाचा झगडा असतो तो सैतानाशी नसून स्वतःशीच असतो. पण दुष्टात्मा, भूतंप्रेतं, राक्षस ही कल्पना हिंदूंमध्ये आहे. पण या लोकांचं माणसाशी वैर असतं, ते इहलोकी मिळणार्‍या सुखदु:खांशी जोडलेलं आहे. आध्यात्मिक मार्गाने जाणार्‍याला स्वतःच्या मनाशीच झगडा करावा लागतो."

"पण आपल्याकडे अप्सरा वगैरे आहेतच; ऋषीमुनींना मोहात पाडण्यासाठी."

"आहेत ना. त्यांना इंद्र पाठवतो. किंवा इतर देवांना जेव्हा या ऋषीमुनींची भीती वाटते तेव्हा ते इंद्राकडे जातात, विष्णूकडे जातात. आणि मग ते देव मोहिनीचं रूप घेतात किंवा स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेला त्या ऋषीमुनींचा तपोभंग करण्यासाठी पाठवतात. त्यामागे हेतू असतो तो देवांच्या स्वार्थाचा. की अमुक ऋषीनं एवढं तप केलेलं आहे, की इंद्राला वाटतं त्याच्या तपामुळे माझं इंद्रपद जाईल; म्हणून तो अप्सरेला पाठवतो. किंवा ऋषी जेव्हा यज्ञयाग करायचे तेव्हा राक्षस येऊन त्यांचा यज्ञ उध्वस्त करून टाकायचे; कारण यज्ञ करून ऋषींना वर मिळतील, ते आपल्यापेक्षा वरचढ होतील म्हणून राक्षसांना भीती वाटायची. दुसरी एक गोष्ट आहे एका राक्षसाची, भस्मासुराची. त्यानं तपश्चर्येनं शंकराकडून वर मिळवला, की तो ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल ते ते लोक मरतील. शिवाय त्याला इतर कुणीही मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर त्याने पृथ्वीवर अगदी हैदोस घातला. ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याने मानवसंहार सुरू केला. तेव्हा सगळे लोक विष्णूला शरण गेले. मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि नाचता नाचता त्या राक्षसाला आपल्या नादी लावलं आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला. आता या गोष्टीत अध्यात्माचा किंवा ज्ञानमार्गाला जाणार्‍याचा काहीही संबंध नाही.मनुष्य, राक्षस, दुष्टात्मे आणि देव यांचं भांडण आहे ते सत्तेसाठी. परम कोटीला जाऊ पाहणार्‍या माणसाला अडवण्यासाठी देव आणि दानव कोणीही येत नाही. हा फरक आहे हिंदू धर्म आणि इतर धर्मांत; सैतानाच्या किंवा मारच्या संदर्भात." बाई म्हणाल्या.

- oOo -

पुस्तकः ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी
लेखक/संवादकः दुर्गा भागवत/प्रतिभा रानडे
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती पाचवी (२००५)
पृष्ठे: १२०-१२२.

---

टीपा:
१. तिरपा ठसा संवादक प्रतिभा रानडे यांच्या संभाषणासाठी.
२. या विषयासंबंधी दुर्गाबाईंनी सुचवलेली पुस्तके गोळा करून प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या आधारे– विशेषतः टी.ओ. लिंग लिखित 'बुद्धिझम अ‍ॅन्ड दि मायथॉलॉजी ऑफ इव्हिल'– या उतार्‍याला एक टिपण जोडून दिले आहे. ते आवर्जून वाचण्याजोगे.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी >>
---


हे वाचले का?

वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा' हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोला, त्याचे तर्क संपले, मुद्दा अंगाशी आला की तो हटकून आपल्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्याआड लपू पाहतो, किंवा स्वतःच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो.

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

हे जितकं सामान्य व्यक्तींबाबत खरं आहे, तितकच राजकारणी, कलाकार, विशिष्ट कौशल्य अंगीकृत केलेल्यांबाबतही. धर्मसंस्थेने किंवा स्वयंघोषित प्रेषितांनी त्यांच्या अनुयायांनीही हे तंत्र आपल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी यशस्वीपणे राबवले आहे. एखादी व्यक्ती 'कुणाला तरी हरवून जिंकली' आहे असं म्हटलं की जमावाच्या तिच्याबाबतचा आदर चटकन वाढतो आणि त्याचे म्हणणे जमाव आस्थेवाईकपणे ऐकतो. आता हे जिंकणे युद्धभूमीवरचे रक्तरंजित युद्ध असो किंवा बौद्धिक वितण्डाच्या स्वरूपातील. दोन्ही प्रकारात एक शत्रू हवा, त्याच्यावर मात करता यायला हवी.

पण हा जरा धोक्याचा मुद्दा आहे, कारण यात आपल्यालाही पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता असते. यावर शब्दपंडितांनी एक सुरक्षित उपाय शोधून काढला आणि तो म्हणजे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याच्यावर आपल्या प्रेषिताने, नेत्याने, देवाने, धर्मासारख्या व्यवस्थेने विजय मिळाल्याच्या कपोलकल्पित कथा प्रसृत करायच्या. यातून आपल्या नेत्याची 'विश्वासार्हता' वाढते आणि जमाव त्याच्या शब्दाला प्रमाण मानून चालण्याची शक्यता कित्येक पट वाढते.

जगातील बहुतेक सर्व धर्मांमधे देवाच्या जोडीला एक अँटि-गॉड असतो. त्याचा रोल, त्याची भूमिका ही या छोट्या रेघेसारखी असते. त्याच्या शेजारी उभे राहिलेला आपला नेता जमावाला उंच भासत असतो, आणि तो म्हणेल तिकडे त्याच्या मागोमाग जाण्यास ते एका पायावर तयार होत असतात. जगात सर्वाधिक प्रसार झालेल्या बिब्लिकल धर्मात सैतान, इब्लिस वगैरे असतात, बौद्ध धर्मात बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा 'मार' असतो, हिंदू धर्मात असा 'एकास एक' सामना नसला - याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मच अनेकेश्वरवादी आहे - तरी ऋषीमुनींचा तपोभंग करणार्‍या मायाविनी अप्सरा असतात, यज्ञसंस्कृतीच्या उपासकांचे यज्ञ उद्ध्वस्त करणारे असुर असतात. थोडक्यात श्रेष्ठत्वाचा मापदंडच मुळी 'शेजारच्या लहान रेघेहून मोठा' असा असतो.

आमच्या गणितात आवश्यक (Necessary) आणि पुरेशी(Sufficient) अशा दोन संबंधातून कार्य नि कारण यांच्यातील एकास-एक परस्परसंबंध सिद्ध केला जातो. वरील तर्काचा विचार केला तर शेजारची छोटी रेघ ही बर्‍याच अंशी आवश्यक गोष्ट होती, पण ती पुरेशी नसे. त्या पलीकडे जाऊन नेत्याचे, प्रेषिताचे श्रेष्ठत्व स्वतंत्रपणे सिद्ध करणारे कर्तृत्व समोर ठेवावेच लागे. परंतु स्पर्धा व्यवस्थेला यशाची गुरुकिल्ली म्हणून सादर करणारी भांडवलशाही अवतरली आणि श्रेष्ठ अथवा गुणवान असण्यापेक्षा इतर सर्व स्पर्धकांपेक्षा पुढे असणे यशस्वी होण्यास पुरेसे ठरू लागले. थोडक्यात छोट्या रेघेपेक्षा आपली रेघ मोठी असणे केवळ आवश्यक न राहता पुरेसेही ठरू लागले

एकदा हे घडले की छोटी रेघ मोठी झाली तर आपली रेघही कष्टाने मोठी करावी लागते हे ध्यानात आले तसतसे सोपा उपाय म्हणून छोटी रेघ आणखी छोटी करण्याचे उपाय शोधले जाऊ लागले. त्यासाठी माध्यमांचा यथास्थित वापर सुरू झाला.

आता थोडे मागे गेलो तर लक्षात येईल की धार्मिक आणि राजकीय इतिहास लेखकांनी तरी याहून वेगळे काय केले आहे? त्यांनी आपला प्रेषित, नेता, राजा, सम्राट श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या विरोधकांना अधिकाधिक काळ्या रंगात रंगवून वाचकांसमोर ठेवले नाही? आज गल्लोगल्ली उगवून आलेले इतिहासलेखकांचे एरंड तोच कित्ता गिरवत इतिहासाचे चक्र उलट दिशेने फिरवू पाहात नाहीत? गेलाबाजार राजकारणात प्रस्थापित होऊ पाहणारे प्रथम कुण्या लेखकाच्या, चित्रकाराच्या, नाटककारच्या डोक्यावर पाय देऊन त्याची रेघ छोटी म्हणून माझी मोठी हा दावा करत नाहीत? एकदा शिरकाव झाल्यावर राजकारणाची शिडी चढून जाताना, आपले कर्तृत्व वाढवत नेण्याऐवजी इतरांना खेचून खाली ढकलण्याचा सोपा मार्ग चोखाळत नाहीत?

ही सुमारांची सद्दी अधिकाधिक आक्रमक होत असताना एखाद्या व्यवस्थेवर, मुद्द्यावर, व्यक्तीवर, विचारव्यूहावर टीका करण्यासाठी आणि त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे असे समजणारे नि त्यासाठी आयुष्याचा मोठा भाग खर्ची घालणारे अभ्यासक ही जमात अस्तंगत होत जाताना दिसते यात नवल नाही.

महाराष्ट्रात मराठी भाषेमधे अर्वाचीन काळात 'विदुषी' हे विशेषण खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांच्या अभ्यासाचा आणि विचाराचा परीघ अतिशय विस्तृत होता. अभ्यासकांमधे बहुतेक वेळा विचाराची अथवा अभ्यासाची व्याप्ती अधिक असलेले किंवा (मोजक्याच विषयात) खोली अधिक असलेले असे दोन प्रकार दिसतात. पण एकाच वेळी धर्माचा, तत्त्वज्ञानाचा, साहित्याचा अभ्यास करत असतानाच अस्वल या एकाच प्राण्यासंदर्भातील विविध परंपरातील दंतकथा अथवा संकेतांचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तकच लिहिणार्‍या दुर्गाबाई एकाच वेळी या दोनही गटात बसतात.

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी अनुवादांवर अवलंबून न राहता पाली भाषा शिकून मूळ ग्रंथांच्या आधारे त्यांनी त्याचा अभ्यास केला. अभ्यासकाची इतकी तीव्र बांधिलकी आज दुर्मिळ झाली आहे. केवळ त्या एका धर्माचा अभ्यास करून न थांबता त्या अनुषंगाने त्याचा भारतातील समाजजीवनावर असलेला प्रभाव, हिंदू परंपरा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा परस्परसंघर्ष आणि सहकार्य, बौद्ध धर्मातून उगम पावलेल्या विविध परंपरा यांचा अभ्यास करताना त्या थेट डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्मापर्यंत पोहोचतात.

यातील कोणत्याच धर्माचा वा परंपरेचा एकांगी उदोउदो किंवा थेट चिरफाड करणे अशा टोकाच्या भूमिका त्या घेत नाहीत. आज ही विचक्षण दृष्टी दुर्मिळ आहे. धर्मसंस्थेबद्दल लिहायचे ते केवळ समर्थन करण्यासाठी किंवा त्यातील न्यून चव्हाट्यावर आणण्यासाठी इतकेच आपल्याला समजते. गल्लोगल्ली अभ्यासाविना झालेले अभ्यासक अशा तथाकथित वैचारिक लेखनाच्या काँग्रेस गवताची रुजवणूक करत आहेत. जे पटते त्याचे हातचे राखून न ठेवता कौतुक करायचे नि जे पटत नाही त्यावर निर्भिडपणे टीका करायची, अशी ताठ कण्याची भूमिका घेणार्‍या बाईंच्या इतका समतोल अभ्यास क्वचितच कुणी केला असेल.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्यांची मते तुम्हाला पटली पाहिजेत. (किंबहुना अनेकदा त्यातील आग्रहीपणा, ठामपणा, लवचिकतेचा अभाव खटकेलच!) खरं तर विचारपूर्वक भूमिका घेणार्‍याच्या बाबत उलट न पटण्याची शक्यताच अधिक कारण बहुसंख्या ही विचारापेक्षा बांधिलकीला (जातीय, धार्मिक, विभागीय, कौंटुंबिक, भाषिक इ.) अनुसरून निवड करणारीच असते.

कालानुरूप अभ्यासविषयाचे संदर्भही बदलतात. आज सर्वसामान्यांच्या मनात बौद्ध धर्म हा बुद्धापेक्षाही डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात अधिक निगडित आहे. त्याबरोबर त्याला अस्मितेचे अस्तरही चिकटले आहे. त्याचवेळी उधाणलेल्या तथाकथित हिंदुत्ववादाने हिंदू धर्माचे जणू अपहरण करून आपणच त्याचे ठेकेदार असल्याची द्वाही फिरवली आहे. अशा वेळी या दोन धर्मांचा साधकबाधक विचार करणे, त्यातील मूल्ये पडताळणे, तुलना करणे त्याबाबत काही भाष्य करणे हे शत्रू-मित्रांचे मोहोळ उठवणेच ठरते. या गदारोळात साक्षेपी अभ्यासक नावाची जमात केव्हाच परागंदा झालेली आहे.

पण केवळ अभ्यासक, विचारवंत यापलीकडे त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात व्यक्तिस्वातंत्र्याची पहिली गळचेपी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या आणिबाणीच्या विरोधात सर्वप्रथम जाहीरपणे रणशिंग फुंकणार्‍या रणरागिणी अशीही त्यांची ओळख आहे. आणिबाणी-विरोधातील त्यांच्या घणाघाती भाषणानंतरच महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत यांनी आणिबाणीच्या विरोधात जाहीर आणि मुख्य म्हणजे सक्रीय भूमिका घेतली त्याचे श्रेय निर्विवादपणे बाईंचेच.

अशा चतुरस्र अभ्यासकाशी होणार्‍या अनौपचारिक गप्पाही सुखद आणि माहितीप्रद असतात असा अनुभव अशा व्यक्तींच्या आसपास असणार्‍यांना येतच असतो. अनेकदा असं वाटतंही की अरे हे असं अनौपचारिक बोलणं कुठे तरी नोंदवून ठेवायला हवं. कारण या संवादात औपचारिकता नसते, विचाराची चौकट नसते, शब्दसंख्येची मर्यादा नसते, प्रतिक्रियेची अपेक्षा अथवा भीती नसते, काटेकोरपणाची आवश्यकता नसल्याने पुराव्याखेरीज एखाद्या तर्कसंगत शक्यतेबाबत बोलता येते, लिखित स्वरुपात समोर येणार्‍या विचारांप्रमाणे बंदिस्तपणा नसतो. आणि म्हणूनच अनेकदा हा संवाद अधिक आनंददायी आणि समाधान देणारा असतो. यातून मुलाखत हा एक प्रकार पुढे आला.

पण माध्यमांनी जसजसे जगण्यातील प्रत्येक गोष्टीचे वस्तुकरण आणि एकसाचीकरण सुरू केले तसतशा या मुलाखतींचा कार्यक्रम हास्यास्पद होत गेला. मुलाखत घेणार्‍याला जणू काही समज असायची गरजच नाही. एका चॅनेलवरील साहित्यासंबंधीच्या चर्चेत वृत्तनिवेदिकाच मुलाखतकार म्हणून समोर आलेली पाहून मी कपाळाला हात लावला होता. तिला त्या कार्यक्रमाबद्दल इतकी 'आस्था' होती की कार्यक्रम सुरु होण्यागोदर जेमतेम एक तास आधी तिने माझ्याशी संपर्क साधून आपण काय बोलू शकतो याची तब्बल अडीच मिनिटे 'चर्चा' केली.

नव्या जगात उगवलेल्या 'मॅनेजमेंट' नावाच्या विषयाने जगण्यातल्या सार्‍याच गोष्टी या आनंद घेण्यासाठी नव्हे तर 'मॅनेज करण्यासाठी' असतात, त्यांचा इव्हेंट करण्यासाठी असतात, त्या 'संपन्न करण्यासाठी' असतात ही धारणा पुरेपूर रुजवली आहे. सोबतच 'जागा भरण्यासाठी' अशा गोष्टी केल्या जात असल्याने मागणी भरपूर. त्यामुळे हल्ली या मुलाखती - संवाद नव्हे - म्हणजे सुमार मुलाखतकार (ज्यांच्याकडे बहुधा वट्ट दहा प्रश्नांची चेकलिस्ट असावी, जी ते प्रत्येक मुलाखतीसाठी वापरत असावेत) आणि सुमार 'विचारवंत/ कलाकार/ अभ्यासक' अशी स्थिती असते.

त्यातल्या त्यात हसतखेळत मुलाखत घेणारा ग्रेट मुलाखतकार (हा शब्दच बोचतो) मानला जातो, तो रोल मॉडेल म्हणून पाहिला जातो. अतिशय गंभीर विषयावरील नाटक अथवा सिनेमातही पहिली संधी मिळताच दात दाखवणार्‍या, 'सस्त्यात मनोरंजन हवे बुवा' म्हणणार्‍या बहुसंख्य समाजाच्या मानसिक स्थितीलाही ते मानवणारं असतं. अशा वेळी मुलाखत घेणार्‍याची त्या तज्ज्ञाशी, कलाकाराशी, विचारवंताशी, अभ्यासकाशी बोलण्यासाठी किमान काही पात्रता असायला हवी असं म्हटलं तर 'हे काय आणखी नवीन' अशी बहुतेकांची प्रतिक्रिया येईल. हे असं का म्हटलो हे समजण्यासाठीच 'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी' हे पुस्तक वाचायला हवे.

प्रतिभा रानडे यांची ज्या प्रकारे दुर्गाबाईंना बोलते केले आहे, प्रसंगी एखादा मुद्दा विस्तारपूर्वक यावा म्हणून स्वतःही नेमकी भर घातली आहे (चॅनेलवरच्या बोलभांड निवेदकाप्रमाणे आपली अक्कल न पाजळता), कुठे बाईंच्या चतुरस्र बुद्धिमत्तेमुळे भरकटणारा मुद्दा पुन्हा जागेवर घेऊन आल्या आहेत. हे पाहणे आनंददायी आहे. अशा संवादात त्यांचे स्थानही किती महत्त्वाचे आहे हे जाणवते. नेमके बोलू शकणारा मुलाखतकार/ संवादक त्या संवादाला कुठल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखन निव्वळ संवादापुरते मर्यादित नाही. अधेमधे दुर्गाबाईंनी दिलेले संदर्भ शोधून प्रतिभा रानडे यांनी त्याआधारे बाईंच्या मुद्द्यांचे जागोजागी विस्तार करून ते पुस्तकात समाविष्ट केल्याने त्या दस्तऐवजीकरणाला अधिकच परिपूर्णता येते आहे.

या दीर्घ संवादात बाईंनी संस्कृती, स्त्रीवाद, मिथ्यकथा, साहित्य, श्लील-अश्लील वाद (भाऊ पाध्ये यांच्यावर अश्लीलतेच्या झालेल्या आरोपांच्या वेळी बाईंनी श्लील-अश्लीलता ही संदर्भातच असते अशी त्यांच्या बाजूने सडेतोड भूमिका घेतली होती, ज्याबद्दल अत्रेंनी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती हे जाताजाता सांगायला हरकत नाही.), त्यांचा अभ्यासविषय असलेला बौद्ध धर्म, त्यांचे स्वतःचे साहित्य, मृत्यू इ. अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली आहेत. प्रतिभा रानडे यांनी त्यांना त्यावर अतिशय नेमके प्रश्न विचारत, कधी स्वतः संदर्भ पुरवत, कधी आपल्या माहितीची, मतांची जोड देत एक संग्राह्य दस्तऐवज या पुस्तक रूपात आपल्या समोर ठेवला आहे.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: मोठी रेघ - छोटी रेघ.


हे वाचले का?