शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)

<< पूर्वार्ध

शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही.

मंतरलेले बेट

ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.”

त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत.

कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या उतरून येई आणि बूटजोडी बांधा म्हणे. अशा गिऱ्हाइकाचे काम करण्यात शिलरना आनंद होई. एकीकडे हात चालत, दुसरीकडे तोंड चाले. जर्मनीमधल्या आपल्या बाळपणीच्या कितीतरी आठवणी त्यांनी मला सांगितल्या. या आठवणी सांगता-सांगता ते हसत, मीही हसे.

एके दिवशी त्यांनी मला कैसरच्या वेळी आपल्याला मिलिटरीत नोकरी कशी करावी लागली ते सांगितले, “मी एकटाच नव्हतो. सगळ्यांनाच भरती व्हावे लागे. तुम्हा अमेरिकेतल्या लोकांना ते माहीत नाही. जर्मनीतच काय युरोपमधल्या सगळ्या झार देशात मुलगा ठरावीक वयाचा झाला की, त्यानं मिलिटरीत भरती झालंच पाहिजे.”

“किती वर्ष?”

“तीन.”

“मग तुम्हाला पसंत नव्हतं?”

“हॅट.” शिलर ओरडले.

आणि हातांतला हातोडा त्यांनी असा जोराने आदळला की, त्याचा दांडाच मोडला.

हळूहळू मला कळले की, मिलिटरीच्या नोकरीचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आहे. सैनिकांची सगळी जात आणि सैन्यातले अधिकारी यांच्याबद्दल ते फार तिटकाऱ्याने बोलत. पुनःपुन्हा म्हणत, “साध्या शिपायांना तिथे डुकरापेक्षा जास्त वाईट वागवितात.”

“बरं मग ही नोकरी पुरी झाल्यावर तुम्ही काय केलं?”

“मग मी स्वतंत्र होतो. जवळ होते नव्हते ते सगळे पैसे खर्चून, हॅम्बर्गला गेलो आणि अमेरिकेचं तिकीट काढलं. जातो म्हणून सांगायला घरीसुद्धा गेलो नाही. म्हणालो, तुम्ही आणि तुमचा कैसर."

मिस्टर शिलर भलतेच रागाने बोलत. कैसरबद्दलसुद्धा. का ते मला कळावयाचे नाही. मी म्हणे, “पण कैसर भला माणूस आहे.”

“भला माणूस! हे वर्तमानपत्रांत वाचावं. डुक्कर आहे डुक्कर.”

मला धक्काच बसला. एखाद्या राज्यकर्त्याविषयी इतक्या अनादराने कोणी बोलताना मी प्रथमच ऐकत होतो. एखादा बूट बनविणारा आपल्या धंद्यात चांगला वाकबगार असला, तरी त्याला मुकुटधारी राज्यकर्त्याला अशा शिव्या देण्याचा हक्क असतो का, हे मला ठाऊक नव्हते.

“तुला ते कळायचे नाही. तू अमेरिकन मुलगा आहेस. माझ्या देशात कुणाला स्वातंत्र्य नाही; वाटतं ते बोलता येत नाही तिथे. प्रत्येकाची नोंद असते, मोजदाद असते. पोलिसांना, मिलिटरीला तुमच्याबद्दल सगळी माहिती असते. आणि तुमचा बाप अमुक होता, म्हणून तुम्ही अमुक असलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात ना, शेतकरी व्हा. तुमची आहे ही स्थिती कायम; तिच्यात सुधारणा अशक्य. आणि तुमची स्थिती कशीही असली तरी तुमच्यावर मालकी कैसरची. स्वातंत्र्य मुळीच नाही.”

राग नाहीसा झाला तसे मिस्टर शिलर अमेरिकेसंबंधी बोलू लागले. काम खूप करावं लागत असलं तरी त्यांना इथे मनासारखे वागता येत होते. पाहिजे तिथे जावे, वाटेल ते बोलावे. कुणी त्रास दिला नव्हता. योग्य वेळी त्यांना इथे लहानसे दुकानही थाटता आले होते, चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. मिस्टर शिलरनी बांधलेले बूट सगळ्या न्यूयॉर्कमध्ये उत्तम होते.


मिस्टर शिलर असे एखादे दिवशीच बोलत. एरवी वेगवेगळ्या विषयांवर बोलत. कधी माणूस आणि जीवनमूल्ये यावर बोलत. रोजच्या जीवनासंबंधी बोलत, माणसामाणसांतल्या नात्यासंबंधी बोलत. फार अवघड विषयांवर ते अगदी सोप्या शब्दांत बोलत. अशिक्षित असूनही त्यांना पुष्कळ समजत होते. फक्त एक गोष्ट त्यांना समजत नव्हती, मलाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांना समजत नव्हते की, त्यांच्यासारख्या कसबी कामसू माणसाची पिळवणूक बोस्टनमधल्या फॅक्टऱ्या का करतात? आपल्याला या असल्या एकच खिडकी असलेल्या तळघरात का राहावे लागते?

“शिक्षा झालेला कैदी असल्यासारखे वाटतं मला, पण तरीही मी स्वतंत्र आहे.”

तळघरातच दुकान घालून असलेल्या आणखी एका कसबी माणसाची ओळख होईपर्यंत मी शिलरकडे जात होतो. हा माणूस इंग्लिश होता, आणि त्याचे नाव होते मिस्टर कॉर्बेट.

शिलर आणि कॉर्बेट या दोघा दुकानदारांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते आणि तरीही ते वेगवेगळे होते. दोघेही तरुणवयात अमेरिकेस आले होते. एके काळी या दोघा कसबी कारागिरांना भाव होता आणि आता मात्र ते बाजूला पडले होते. शिलरना यंत्रामुळे बाजूला पडावे लागले होते आणि कॉर्बेटना आपल्या वयामुळे. शिलरची जागा यंत्राने घेतली होती. आणि ‘स्टाइनवे पियानो फॅक्टरी’त अनेक वर्षे काम केल्यानंतर वयाला पन्नास वर्षे झाली, म्हणून कॉर्बेटना काढून टाकून त्यांची जागा एका तरुण माणसाला देण्यात आली होती.

शिलरप्रमाणे कॉर्बेट बोलके नव्हते. जेव्हा बोलत तेव्हाही कल्पकता, तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा त्यांना गंध नाही असे दिसे. पण माणूस दयाळू होता; मैत्रीला चांगला होता. लाकडाच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यांचे उपयोग याविषयी त्यांनी मला कितीतरी माहिती दिली. केवळ वासावरून नवे तोडलेले लाकूड कसे ओळखावे हे शिकविले. आपली सगळी हत्यारे आणि त्यांचा उपयोग मला समजावून दिला. रंधा मारताना, तक्ते तयार करताना, जोडकाम करताना मला तासन् तास बघत बसू दिले. कॉर्बेटच्या रंध्याचा, हातोडीचा आवाज ऐकताना सुख होई; पण हे आवाज नेहमी नेहमी ऐकायला मिळत नसत.

कॉर्बेटना फार थोडे काम मिळे. कॉर्बेटच्या दुकानात बसून मला सुतारकामाबद्दल बरेच कळले. मिस्टर शिलरप्रमाणेच कॉर्बेटही बदलत्या काळाचे बळी आहेत, हेही कळले. ही केवळ दोन माणसे होती. असे इतर अनेक जण अमेरिकेत आले असतील. जिच्या शोधासाठी ते इथे आले, ती संधी त्यांना दिसली न दिसली तोवर काढून घेतली गेली असेल.

आपोआप संपण्याच्या अगोदरच ज्यांचे प्राण विझविले गेलेत, स्मशानभूमी नेमस्त न होताच ज्यांना आपली प्रेते उचलून चालावे लागत आहे, अशा या लोकांचा विचार येताच माझे मन व्यथित होई.


पण मिस्टर शिलर, कॉर्बेट आणि इतर हजारो लोक यांची ही स्थिती कुणाच्याच ध्यानात येत नव्हती असे नाही. वॉशिंग्टनमध्ये थिओडोर रुझवेल्ट प्रेसिडेन्ट होते. हे गृहस्थ बुद्धिमान होते. अमेरिकेपुढील समस्या त्यांना माहीत होत्या; ते काही इलाज करीत होते.

रुझवेल्ट प्रेसिडेन्ट झाले ते योगायोगाने. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध गाजवून परत आल्यावर १८९८ साली न्यूयॉर्क स्टेटचे ते गव्हर्नर म्हणून निवडले गेले; पण सहा महिनेच त्यांनी काम केले. राजकारणातील बड्या धेंडांना रुझवेल्ट हे प्रामाणिक आणि हट्टी वाटले. ते कुणाकडून हुकूम घेत नसत; आपण काम करणार ते लोककल्याणासाठीच असा त्यांचा आग्रह होता. साहजिकच बड्या धेंडांनी ठरविले की, त्यांचा ‘राजकीय खून’ करायचा. मग त्यांनी व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून रुझवेल्टना मॅकिन्लेबरोबर नेमून घेतले. व्हाइस प्रेसिडेन्ट केल्यामुळे रुझवेल्टच्या हाती काही अधिकार राहणार नाही आणि आपल्याला हवे ते कायदेकानून पास करून घेण्यात त्यांचा अडथळाही येणार नाही, असा त्यांचा डाव होता.

अशा तर्‍हेने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला थिओडोर रुझवेल्ट व्हाइस प्रेसिडेन्ट झाले, पण नंतर सहा महिन्यांनी बफेलो येथे प्रेसिडेन्ट मॅकिन्लेचा खून झाला आणि रुझवेल्ट युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेन्ट झाले. या वेळी त्यांचे वय बेचाळीस वर्षांचे होते.


प्रेसिडेन्ट रुझवेल्ट हे मोहक व्यक्तिमत्वाचे आणि उदंड ताकदीचे गृहस्थ होते. त्यांच्यापाशी उत्साह होता. लढा देण्याची त्यांना आवडच होती. सर्वसामान्य अमेरिकन माणसाच्या हक्कासाठी सुरुवातीपासून त्यांनी लढा दिला. ते लहान लोकांचे ‘उस्ताद’ बनले. लोकांनी अगदी सुरुवातीपासून त्यांच्यावर विश्वास टाकला; हा माणूस आपला आहे, हे त्यांना माहीत होते.

सामाजिक सुधारणा ही अमेरिकेची वाढती गरज आहे, हे थिओडोर रुझवेल्टनी पुरेपूर ओळखले. मोठे उद्योगधंदे, उद्योगपती आणि इतर करोडपती गुन्हेगार यांच्यावर दोषारोप करताना ते अगदी तुटून पडत.

काँग्रेसला दिलेल्या आपल्या पहिल्या संदेशात त्यांनी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना हक्क मिळावेत या गोष्टीचा कैवार घेतला आणि जनहिताविरुद्ध असलेल्या कॉर्पोरेशनना जोरदार तंबी दिली. हा पहिला सलामीचा तडाखा होता आणि त्या क्षणापासून सुधारणेविषयीची त्यांची जिद्द मंद झाली नाही, अमेरिकेतील मोठे उद्योगधंदे नामशेष व्हावेत, करावेत असा त्यांचा हेतू नव्हता; तर सर्व देशाला त्यांना फायद्यासाठी फक्त शिस्तीत आणावयाचे होते. कारण रुझवेल्टना स्वच्छ दिसत होते की, हे जर झाले नाही, तर उद्योगधंदे स्वतः नामशेष होतीलच, पण आपल्याबरोबर अमेरिकेलाही नामशेष करतील.

बेंड फोडणारे वाङ्मय प्रसिद्ध होण्याची जी लाट उसळली होती, तिने प्रेसिडेन्ट रुझवेल्टना राजकीय सुधारणेची प्रेरणा दिली. यू.एस. स्टील कॉर्पोरेशन, दि युनायटेड स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी, कोळसा खाणी, रेल्वे-रस्ते, मांसधंदे आणि इतर भानगडखोर यांच्यावर रुझवेल्टने खटले भरले, चौकशा केल्या. एकटी स्टॅन्डर्ड ऑइल कंपनी घेतली, तर तिला २९,०००,००० डॉलर्स दंड झाला.

प्रेसिडेन्टनी आहुती टाकून प्रदीप्त केलेला हा ‘दंडयज्ञ’ पुरा पेटला आणि देशातले अनेक जण अस्वस्थ झाले. वाममार्गाने मिळालेल्या सत्तेपैकी एक तनसडीसुद्धा देण्याची या लोकांची तयारी नव्हती, पावलापावलांवर त्यांनी रुझवेल्टशी लढा दिला, त्यांची बदनामी केली, पण अमेरिकन जनतेचे ते ‘टेढी रुझवेल्ट’च राहिले आणि १९०४मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने प्रेसिडेन्ट म्हणून निवडले गेले.

प्रेसिडेन्ट रुझवेल्ट यांच्या कारकिर्दीत देशाची नीतिमत्ता बळावली. लोकांना ते हवे होते. उद्योगधंदेवाले फार मोकळे सुटले होते. लोकांचे हित पाहण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करणे भाग पडले, ‘दि शेरमन अॅन्टीट्रस्ट अॅक्ट’ अमलात आला. निर्भेळ खाद्यपदार्थ आणि औषधे यासंबंधीचा कायदा पास झाला. फसवी लेबले डकवून भेसळयुक्त खाद्यपदार्थाचे बंद डबे विकण्यास कंपन्यांना आता मुभा नव्हती. मांसविक्रेते, औषधे तयार करणारे कारखाने यांनाही सक्त कायदेकानून लागू करण्यात आले. वाईट मांस आणि खोटी औषधे बाजारपेठेत येणार नाहीत, असा बंदोबस्त झाला, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती छापणे, हा गुन्हा मानला गेला.


एकूण हा काळ मोठा उलाढालीचा होता. काय चालले आहे, हे समजण्याइतपत मी कळता झालेलो होतो. सत्य काय हे बऱ्याच प्रमाणात मला समजले.

पण घडत असलेल्या गोष्टीचा खराखुरा अर्थ आणि महत्त्व कळून येण्यास आणखी काही काळ जावा लागला, इतिहास निकोप करणाऱ्या या घटना घडत असताना त्यांचे महत्व आम्हाला कळले नाही, आपल्या काव्यात घडून येणाऱ्या बदलाचा अर्थ समजण्यासाठी द्रष्टेपणा लागतो. आमच्यापैकी बहुतेक जणांना या बदलाची पुरेशी जाणीवच नव्हती.


हा काळ किती महत्त्वाचा होता, हे पुढे कळून आले. सर्वसामान्य अमेरिकन माणसाचे पाऊल पुढे पडले होते, ते याच काळात. त्यांच्यावतीने सरकार धावून आले. संरक्षक कायदेकानून झाले; हक्कांचे संरक्षण झाले ते याच काळात. सर्वसामान्य माणूस खरा स्वतंत्र झाला. हे मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा त्याने कधीही गमावले नाही आणि लोकशाही बळकट बनली.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ९३-९८.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
---


हे वाचले का?

रविवार, ७ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)

नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले.

मंतरलेले बेट

वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे.

‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुकानांतसुद्धा. अर्थातच हॅडले या गृहस्थांना सर्व प्रश्नांबद्दल काही बोलायचे असे. त्यांच्या बोलण्यावर आजोबा असे काही भडकत की, त्या दोघांचे वाद माझ्या कायमचे स्मरणात राहिले. बरे, त्या दोघांची खडाजंगी माझ्या पथ्यावरच पडली. या सर्व प्रश्नांबाबत माझ्या मनात अगत्य निर्माण झाले.

आता मजा अशी की, आजोबा आणि हॅडले या दोघांचे बहुतेक सर्व प्रश्नांबाबत एकमत होई. त्यांच्यात मतभेद होई, तो सुधारणा कोणत्या पद्धतीने व्हावी याबाबतीत. आठ-नऊ वर्षांच्या कोवळ्या मुलांनी कापडाच्या गिरणीत बारा तास मशीनशी काम करणे मुळीच योग्य नाही, हे आजोबांना मान्य होते. याहीपुढे जाऊन ते म्हणत की, अमेरिकेत लहान मुलांकडून असे कामच करून घेऊ नये. कामगार स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा असावा आणि लायक कामगारांना जीवनमानास आवश्यक इतके वेतन मिळाले पाहिजे, हेही त्यांना मान्य होते. अशा मुद्द्यांवर आजोबांचे आणि हॅडले यांचे एकमत होई. पण उपाययोजनेबाबत त्या दोघांच्यात मतभेद होई. आजोबा म्हणत, “उद्योगपतींना योग्य वेळी या समस्यांचे आकलन होईल, आणि ते आवश्यक त्या सुधारणा करतील.”

हॅडले या मुद्द्यावर वाद घालीत. ते म्हणत, “कामगार वर्ग संघटित होऊन त्यांची युनियन झाली तरच धडगत आहे. एरवी हे उद्योगपती जागे व्हायचे नाहीत, त्यांची मने हलायची नाहीत. संपत्तीच्या लोभाने आंधळे झालेले लोक हे! त्यांना काय? संघटनेची शक्ती त्यांना दाखविली पाहिजे. संघटनेशिवाय तरणोपाय नाही. संघटित होऊनच केवळ भागणार नाही, इंचाइंचावर लढा दिला पाहिजे, फार वर्ष जावी लागतील हे व्हायला.”

आणि काय चालले आहे याची जाणीव आजोबांना व्हावी, म्हणून हॅडलेसाहेब औद्योगिक क्रांतीवर बोलत. यंत्राच्या आगमनामुळे कामगार कसा उखडला गेला आहे, त्यामुळे काय समस्या उभ्या राहिल्या आहेत, याचे अत्यंत काळजीपूर्वक विवरण करीत. या समस्या लवकर सुटणाऱ्या नाहीत, कारण इथून पुढे तर यंत्रांना फार महत्त्व येणार आहे, असे सांगत. त्यांच्या मते उद्योगपती लोभी असले तरी त्यांना दोष देता येणार नाही. परिस्थितीचा फायदा कोणीही घेणारच. माणूसस्वभाव जमेला धरला तर मॉर्गन, रॉकफेलर्स, कार्नेजी आणि फ्रिक हे उद्योगपती खुशीने शरणागती पत्करणार नाहीत. कामगारांनी लढा हा दिलाच पाहिजे.

‘लढा’ हा शब्दप्रयोग आजोबांना पसंत नव्हता. कशाही परिस्थितीत शांतात राखलीच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

आता लढ्याबद्दल माझे मत वेगळे होते. शिवाय हॅडले बोलत, त्यापैकी बऱ्याच गोष्टी मला काही वावग्या वाटल्या नाहीत. मी आता कळता झालो होतो, हायस्कूलमध्ये जाऊ लागलो होतो. रोज सकाळी मला आठवण होई की, मला स्वतंत्र करील असे सत्य कुठे तरी दडलेले आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मी शोधू लागलो, पुष्कळ वाचन करू लागलो.

लहानपणी मला चित्रांची पुस्तके फार आवडत, डोरीची चित्रे असलेले डान्टेचे ‘इन्फर्नो’ होते, तसली. या पुस्तकातील मजकूर मी कधी वाचला नाही, पण नरकयातनांची चित्रे बघत तासन् तास घालिवले. उलट आता मी पुस्तकांतले शब्द वाचू लागलो. चित्रे असली तरी ती माझ्या कामाची नव्हती. माझ्या वाचनाला पद्धत अशी काही नव्हती. ‘हुकु चुचु टोला’ असे चाले. हाती पडेल ते सगळे मी वाचून काढी, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके – सगळे !

‘काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ शेवटी तळघरातून कसा निसटला, हे मी वाचले. आणि न्यूयॉर्कमधले घरकामाचे गडी महिन्याला सोळा डॉलर मिळवितात हेही माहीत करून घेतले. डॉन क्विक्झोट आणि यांकी यांच्यासमवेत आपल्या बायकांचे रक्षण करीत आणि पवनचक्क्यांवर हल्ले चढवीत, मी जुन्या स्पेनमधून प्रवास केला. शेरलॉक होम्सबरोबर मी रहस्यभेद केले, आणि जे गुल्ड व जिम फिस्क या दोन करोडपतींनी लबाडी करून सोनेबाजार आपल्या फायद्यासाठी कसा राबविला; आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत कशी घबराट निर्माण झाली हेही जाणून घेतले. अमेरिकेतील कामगार आपले कामाचे तास दहा, बारा किंवा जास्त तासांवरून आठ तासांवर आणण्यासाठी मागणी करीत आहेत यासंबंधी मी वाचन केले. कामगार कामावर असताना झालेल्या अपघाताबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही संघटना झगडत आहेत, यासंबंधीही वाचले. ‘ट्रेझर आयलंड’, ‘डॉक्टर जेकेल अँड हाइड’ आणि ‘दि कॉल ऑफ वाइल्ड’ ही पुस्तकेही मी वाचून काढली. बेकारी भत्ता आणि म्हातारपणाबद्दल पेन्शनची मागणी करणाऱ्या ‘एक्सट्रीमिस्ट्स’ संबंधी, कामगार संघटना करणाऱ्या ‘एजिटेटर्स’ संबंधी ‘क्रॅकपॉट्स’ आणि ‘होपलेस आयडियालिस्ट्स’ संबंधीही वाचन केले. मी ‘डेव्हिड हर्म’ वाचले आणि जे. पी. मॉर्गन या माणसाने सिव्हिल वॉरच्या वेळी दोष असलेल्या बंदुका सरकारला विकून नफा कसा मिळविला हेही वाचले.


मी माझ्या कल्पित कथांत सत्यकथा मिसळल्या. सगळ्यांतले थोडेथोडे वाचले आणि तरीही वाचण्याचे पुष्कळ बाकी राहिले. गाजलेल्या अशा जुन्या शेकडो पुस्तकांबरोबरच चालू अस्थिर काळाचे दर्शन घडविणारी रोज नवी-नवी अशी पुस्तके सारखी बाहेर पडत होतीच की. १९०१ मध्ये ‘हिस्टरी ऑफ टम्मानी हॉल’ हे न्यूयॉर्क सिटी पोलीसमधल्या अनाचाराला वाचा फोडणारे गुस्ताव मेयर्सचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्याच वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या फ्रॅन्क नोरीस नावाच्या एका तरुण लेखकाने ‘दि ऑक्टोपस’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. अमेरिकेतील रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांची नरडी कशी दाबली जात आहेत, याचा स्फोट या पुस्तकात केला होता. या पुस्तकामुळे रेल्वेची चौकशी सुरू झाली. १९०३ मध्ये याच लेखकाने ‘दि पिट्’ नावाचे पुस्तक लिहिले. शिकागो धान्य-बाजारात चाललेल्या लबाडीचा स्फोट या पुस्तकात केला होता. शिकागो धान्य बाजाराचीसुद्धा चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे मोठी खळबळ उडाली. चौकशीत बाहेर आलेल्या गोष्टीमुळे लोकांत विलक्षण घबराट झाली.

१९०४ साली इडा टरवेल नावाच्या बाईने ‘स्टँडर्ड ऑइल कंपनीचा इतिहास’ प्रसिद्ध केला. त्यातही कंपनीच्या कारभारात अनाचार कसा आहे, हे तिने लोकांपुढे मांडले. न्यूयॉर्कमधल्या लिंकन स्टीफन्स या तरुण पत्रकाराने ‘शेम ऑफ दि सिटीज’ हे पुस्तक लिहून सर्व देशभर असलेल्या नगरपालिकांतून कसा भ्रष्टाचार चालला आहे हे दाखवून दिले. १९०६ साली ‘द जंगल’ या पुस्तकाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अॅप्टन सिंक्लेअरने या पुस्तकात शिकागोमधल्या मांसधंद्यात चाललेला भ्रष्टाचार उघड केला होता. लगेच याही प्रकरणाची चौकशी झाली. देशाबाहेरच्या वर्तमानपत्रांतूनसुद्धा या चौकशीच्या बातम्या झळकल्या.

ही सगळीच पुस्तके मी काही वाचली नव्हती, पण त्याच्यासंबंधी वर्तमानपत्रांत आलेला मजकूर वाचला होता. शिवाय आमच्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस या पुस्तकांवर चर्चा करी– मिस्टर हॅडले आणि त्यांच्याबरोबर पोलीस, बंबवाले, इतर गिर्‍हाइकेही. नाना मते मांडली जात, अंत नसलेली चर्चा होई. छापलेल्या शब्दांत केवढे सामर्थ्य असते, याची जाणीव मला आयुष्यात प्रथमच होत होती.

पुढच्या काही वर्षात आणखी अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. कथालेखनाने लोकप्रियता मिळविलेल्या जॅक लंडन या लेखकाने १९०७ साली ‘दि आयर्न हिल’ हे पुस्तक लिहिले. पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षात अमेरिका कशी असेल याचे चित्रण त्याने या पुस्तकात केले होते. सगळा देश मक्तेदारीच्या कह्यात गेला आहे, लोकशाही संस्था आणि घटनेने दिलेली स्वातंत्र्ये धुडकावून लावली गेली आहेत, असे हे चित्र होते. या पुस्तकाचा लोकांच्या मनावर फार खोल ठसा उमटला; त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. परिस्थिती भीतीदायक होती.

१९१० मध्ये ‘हिस्टरी ऑफ दि ग्रेट फॉरच्युन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. गुस्तोव मेयर्सच्या या पुस्तकाने सेज, व्हेन्डरबिल्ट फ्रिक, कार्नेजी, हिल या नावांविषयी असलेल्या आदराच्या फाडून टिरगाण्या केल्या. पानापानांतून सत्यकथा देऊन या पुस्तकाने सिद्ध केले होते की अनाचार, बनवाबनवी, बेकायदेशीर कृत्ये, लबाडी केल्यामुळे यांचे नशीब फळफळले होते.

या पुस्तकांबरोबरच इतर पुस्तकेही प्रसिद्ध झाली. पण काळाचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकांबद्दलच लोक बोलत. अमेरिकन जीवनाचा एक हिडीस भाग या पुस्तकांनी लोकांना दाखविला होता. आता करोडपतींबद्दल आदर राहिला नव्हता. शंकास्पद मार्गांनी पैसा केलेल्या कॉर्नेजीसारख्या माणसाने ‘सार्वजनिक वाचनालया’ला देणगी म्हणून दिली, तर त्या गोष्टीकडे आम्ही संशयाने बघू लागलो. आम्हाला अमेरिका स्वतंत्र झालेली हवी होती. अमेरिकन जनतेची मालकी असलेली अमेरिका आम्हाला हवी होती. मूठभर लबाड लोकांची मालकी असलेली अमेरिका नव्हे.

पुस्तके लिहून अनाचाराला वाचा फोडणाऱ्या या काळात सत्ता हातात ठेवणाऱ्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या विरुद्ध लोकमत गेले होते. लोक आणि उद्योगधंदे या दोन्हींचे नाते जोडले जाईल, असे काही लोकांना हवे होते. अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधी लोकांच्या मनात असलेला आदर पार नाहीसा झाला. विश्वास उडाला तो उडालाच. मग काही मोठ्या धंदेवाल्यांनी जनता-संपर्क अधिकारी नेमले आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

या काळात कामगार अधिक स्पष्टवक्ते बनले. त्यांच्या संघटना निर्माण झाल्या. शक्तिशाली बनत गेल्या. या यंत्रयुगात आपल्याला कुठे जागा आहे, हे माणूस शोधत होता. उद्योगधंद्यांशी आपले चांगले नाते असावे, अशी त्याची धडपड होती. आर्थिक सत्ता बळकावून बसलेले लोक ती हातची सोडायला तयार नव्हते, त्यामुळे अनेक जोरदार झगडे झाले.


या सगळ्यामुळे आमचे आजोबा मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मते अशा चळवळींमुळे समाज बिघडतो. पण मिस्टर हॅडलेंचे मत उलटे होते. ते म्हणत, हे सगळे बऱ्यासाठीच चालले आहे. उद्योगधंदे, यंत्रे वाईट नाहीत; त्यांच्यामुळे माणूस रगडला जाणार नाही, एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे. माणसांनी जर यंत्रांना आपल्यावर स्वार होऊ दिले, तर भाषणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य यांचा उपयोग काय?

आजोबांना हे बोलणे मुळीच पसंत नव्हते, पण मला मात्र मिस्टर हॅडलेंचे म्हणणे पटे. कारण पुष्कळशा गोष्टी मी वाचल्या होत्या. शिवाय अगदी आमच्याच शेजारी स्वातंत्र्य गमावून बसलेली दोन माणसे माझ्या पाहण्यात आली. हे घडले ते आजोबांच्या पायामुळे.

- (पूर्वार्ध समाप्त) -

पुस्तक: मंतरलेले बेट.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
चवथी आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२३.
पृ. ८७-९१.

       << उत्तरार्ध

---
संबंधित लेखन:
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा >>
---


हे वाचले का?

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा

मंतरलेले बेट

मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ (पुन्हा एकदा ढापले गेल्याने) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले.

मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी (पुढे २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धराशायी झालेले सुप्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ जिथे उभे होते त्या) मॅनहटन बेटावरील एका लहान मुलाने आपल्या आयुष्यासंबंधी केलेल्या स्मरण-नोंदी (memoirs) असे त्याचे स्वरूप आहे.

सहज म्हणून वाचता वाचता असे ध्यानात आले की नोंद घेणार्‍याचे वय हा महत्त्वाचा, दखलपात्र मुद्दा आहे तसेच तो कालखंडही. हा कालखंड कालगणनेनुसार जसा एक महत्त्वाचा टप्पा आहे तसेच अमेरिकेच्या इतिहासाच्या दृष्टीनेही. सामाजिक, आर्थिक नि राजकीय अशा तीनही आघाड्यांवर या कालखंडात मोठी उलथापालथ घडून आली. त्या घटनेचा साक्षीदार असलेला हा मुलगा या बदलत्या काळाच्या नोंदी समोर ठेवतो आहे. लेखनाच्या वेळी वय नि अनुभवाने अधिक पुढे सरकलेल्या मॅन्युअलच्या भाषेचे नि दृष्टिकोनाचे अस्तर जरी त्याला चिकटलेले दिसत असले, तरी त्याने घेतलेल्या नोंदी नि त्यांची केलेली टिपणे महत्त्वपूर्ण अशीच आहेत.

एकोणीसावे शतक अस्तंगत होत असतानाचा हा काळ आहे. या शतकाच्या अखेरीस नियतीवादी, पारलौकिकवादी भयभीत होऊन जगबुडीच्या भाकितांचे हाकारे उठवत शिकारीच्या कळपासारखे स्वत:च भयभीत होऊन सैरावैरा धावत होते, इतरांच्याही मनात भीतीची रुजवणूक करत होते. दुसरीकडे औद्योगिक क्रांतीचा वेग वाढलेला असल्याने भौतिक आयुष्यात वेगाने बदल घडत होते. मेणबत्त्यांची जागा गॅसबत्त्यांनी घेतली होती, तारेमार्फत येणार्‍या विजेचे जाळे विणले जात होते. घोडागाड्या अस्तंगत होऊन मोटार कार्सचा बोलबाला सुरू झाल्याने रस्त्यावर घोड्याच्या लीदीऐवजी जाळलेल्या पेट्रोलियम इंधनांचा वास अधिक प्रकर्षाने जाणवू लागला होता.

राजकीय पातळीवर पाहिले तर क्यूबाच्या प्रश्नावर स्पेनने अमेरिकेशी संघर्ष उभा केला होता. आशिया, आफ्रिका खंडांतून स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रिटनच्या, चीनच्या, रशियाच्या राजेरजवाड्यांच्या साम्राज्यांना हादरे बसू लागले होते. अशा काळात, एका घटस्फोटित आई-बापांचा, न्यूयॉर्कमधील केवळ दुसर्‍याच वकील स्त्रीचा हा आठ-दहा वर्षांचा मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहताना अनुभवलेल्या या संक्रमणाचे आपल्या बुद्धीने झालेले आकलन नोंदवत जातो आहे.

मागील शतकात झालेल्या फ्रेंच क्रांतीनंतर ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना मूळ धरू लागली होती. जगण्यातील विविध पैलूंमध्ये तिचे प्रतिबिंब कसे पडते, तिची कोणती अनुषंगे प्रकर्षाने दिसतात याचा मागोवा घेतला जात होता. सैद्धांतिक पातळीवर जरी ‘कशापासून स्वातंत्र्य’ नि ’कशाचे स्वातंत्र्य’ या दोनच पैलूंचा विचार होत असला तरी व्यावहारिक पातळीवर तिचे अनेक पदर तपासले जात होते. राजकीय स्वातंत्र्य हस्तगत केलेल्या अमेरिकेमध्ये आता आर्थिक स्वातंत्र्याची वाट महामार्गाला येऊन मिळाली होती. ‘जुन्या वाटेवरचे सारेच पांथस्थ या महामार्गाची वाट चालू शकतात, की काही मूठभरांनी या महामार्गांवर टोल नाकी उभारून विकासाची गंगा केवळ आपल्याच वावरात वळवून नेली आहे?’ असा प्रश्न सामान्यांना पडू लागला होता.(हा प्रश्न सनातन आहे, तो कधीच कालबाह्य होणार नाही.)

या कादंबरीमध्ये ‘स्वातंत्र्य’ याच शीर्षकाचे एक प्रकरण आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचे माहेरघर मानल्या गेलेल्या देशातील व्यवस्थेला स्वार्थलोलुप भांडवलशहांनी बटीक केले असल्याचा हा काळ आहे. काही स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींनी चिकाटीने ही काळी बाजू प्रकाशात आणली होती. त्याच वेळी अमेरिकेला सामान्यांबद्दल कळकळ असलेला एक नेता लाभल्यामुळेच तिला ‘कम्युनिस्टांचा कावा’ अथवा ‘देशद्रोही लोकांचे कटकारस्थान’ म्हणून झटकून न टाकता त्या मोकाट भांडवलशाहीवर अंकुश निर्माण करण्यात आले. त्यातून कागदोपत्री असणारे आर्थिक स्वातंत्र्य सर्वसामान्यांच्या दारी येऊ शकले.

आज एकविसाव्या शतकात अमेरिकाच काय परंतु भारतासारख्या देशांतही अर्थव्यवस्था ही सामान्यांची काळजी करण्यापेक्षा उद्योगव्यावसायिकांचीच बटीक होऊन राहिली आहे. अमेरिकेला लाभला तसा रुझवेल्ट आपल्या देशात कुठे दिसत नाही. एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासाची व्याख्याही रुझवेल्टपेक्षा एखाद्या निक्सन, बुश वा ट्रूमनच्या व्याख्येशी अधिक मिळतीजुळती आहे.

माध्यमस्फोटानंतर जग जवळ आल्यानंतर सर्वसामान्य माणसेही मूलभूत गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था मागण्याऐवजी महासत्ता मागू लागली आहेत. नि ती देईन असे आश्वासन देणार्‍या कुण्याही हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यासमोर मान नि खांदे झुकवून उभी राहू लागली आहे. सामान्यांच्या गरजा कोणत्या हे ही भांडवलशाही माध्यमेच सांगू लागली आहेत. अर्धपोटी जनतेला आपल्या मेंदूवरचे अदृश्य साखळदंड जाणवतही नाहीत अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार नि निवारा या मूलभूत गरजांपेक्षा महासत्ता, धर्मवर्चस्व, वंशवाद हे जनतेच्या मनात अधिक प्रकर्षाने उमटणारे मुद्दे आहेत. तंत्रज्ञानामार्फत आलेली मनोरंजनाची भूल माणसाच्या विचाराला वास्तव पाहूच देत नाही अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थेला पवित्र (sacrosanct) न मानता तिला जाब विचारणार्‍यांची संख्या नगण्य आहे. जे आहेत ते समाजाच्या दृष्टीने शत्रू ठरत आहेत. व्यवस्था आपल्यासाठी आहे, आपण तिच्यासाठी नव्हे याचे भान हरवलेले लोक व्यवस्थेमार्फत काहीतरी अचाट चमत्कार घडून त्या मार्फत आपले सारे दैन्य दूर होईल अशा आशाळभूत आशेने तिच्यावर आंधळी निष्ठा ठेवून आहेत. तर धनदांडगे त्या व्यवस्थेला पायतळी ठेवून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे प्रकरण मुळातून वाचायला हवे.

- oOo -

मला खरेतर माझ्या नेहमीच्या पद्धतीने एक प्रातिनिधिक वेचा निवडण्याची इच्छा होती. परंतु त्याची व्याप्ती नि विषय ध्यानात घेता असा वेचा सापडू शकला नाही. मग उलट दिशेने ‘काय वगळता येईल?’ असा विचार करून पाहिला. त्यातही फारसे काही सापडले नाही. अगदी थोडा भाग वगळून शिल्लक राहिलेला लेख दोन भागांत पोस्ट करायचे ठरवले. एकाचे दोन भाग करताना आणखी काही भाग वगळता आला. आता हे दोन भाग मिळून एक दृष्टिकोन मांडतात असे मला वाटते.

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)


हे वाचले का?

बुधवार, १३ मार्च, २०२४

माझा बाप

देशपांडे मास्तर आरोग्यशास्त्र शिकवीत होते. पावसाळ्यात रात्री बेडूक ओरडावा तसा त्यांचा आवाज वाटत होता. मी पुस्तक पुढे धरून झोप घेत होतो.

देशपांडे मास्तर फारच गंभीर होते. क्वचित ते विनोद करीत, पण तोदेखील गंभीर असे. ते आरोग्यशास्त्र शिकवू लागले की, माझे डोळे जड होऊन मिटू लागत. मग पुस्तक पुढे धरून मी बसल्या बसल्या बैलासारखा झोप घेई. कधी कधी हे मास्तरांच्या ध्यानात येई. पुस्तक खाली ठेवून ते दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर चोळत आणि गंभीरपणे म्हणत,

“तेलीबुवा, उठा. डोळ्याला पाणी लावून या आणि मग बसा.”

मुले माझ्याकडे बघून हसत. मी मुकाट्याने उठून बाहेर जाई. शाळेच्या विहिरीतून बादलीभर पाणी काढी. तोंड धुऊन पुन्हा जाग्यावर येऊन बसे. पण हे क्वचित, मी एरवी झोपलो आहे हे ध्यानी येऊनही ते शांतपणे शिकवीत राहात. तास संपल्याचे टोले पडताच पुस्तक मिटून निघून जात.

आरोग्यशास्त्राच्या आड थोडा वेळ मला छान झोप लागली आणि एकाएकी देशपांडे मास्तरांनी विचारले,

“तेलीबुवा, तुम्ही टोचून घेतलं आहे का ?”

मी खडबडून जागा झालो. बावरून उभा राहिलो. देशपांडे मास्तरांनी प्रश्न पुन्हा विचारला, पण त्याचा रोख माझ्या ध्यानात आला नाही.

गंभीर आवाजात मास्तर पुन्हा म्हणाले,

“तुमच्या अंगरख्याच्या बाह्या वर करा.”

मला काही कळले नाही. पण मी बाह्या वर केल्या.

“देवी काढल्या आहेत का ?”

माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने उठून ‘नाही’ असे उत्तर दिले. मग मी मानेनं नकार दिला.

मुलं एकमेकांशी कुजबुजू लागली. बाह्या वर करून एकमेकांचे दंड बघू लागली.

मास्तरांनी आपले नाक गोंजारले आणि दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले. काही निर्णय घेण्याअगोदर ते बहुधा असे करीत. मग त्यांनी घड्याळात बघितले. तास संपायला थोडा अवकाश होता. टेबलापाशी बसून त्यांनी काही लिहिले आणि तो कागद माझ्या हाती देऊन सांगितले,

“आपल्या वडिलांना हे द्या!”

माणदेशी माणसं

शाळा सुटताच मी बरोबरीच्या मुलांशी न भांडता सरळ घराकडे निघाले. चार मैलांचे अंतर तोडून माझ्या खेड्यात आलो. घरात येताच तो कागद आईच्या हाती देऊन म्हणालो, “मास्तरांनी हे नानाला दिलं आहे!”

ती शेजारच्या खेड्यात तेल विकण्यासाठी जाण्याची तयारी करीत होती. गिऱ्हाइकांनी घाणे काढण्यासाठी दिलेल्या करड्यातून काही करडे, वेळूने विणलेल्या टोपलीत घालून त्यात पिवळ्याधमक तेलाच्या चरव्या ठेवल्या होत्या. मी गेलो तेव्हा चुंबळ डोक्यावर ठेवून पाटी उचलू लागायला कोणी मिळते का हे ती बघत होती.

तेलाने भरलेले आपले हात काळजीपूर्वक नेसत्या लुगड्याला पुसून तिने माझ्या हातातला कागद घेतला. तो उघडला. उलटापालटा केला. एखाद्या लहान मुलासारखा दिसणारा तिचा चेहरा चिंतातुर झाला. हलक्या आवाजात तिने विचारले, “काय सांगितलंय् हेच्यात ?”

“माझ्या हाताला टोचलं पाहिजे ? ”

“अग बाई ! कशासाठी रे माझ्या लेकरा ?”

“मास्तर सांगतात म्हणून. शाळेतल्या पोरांनी घेतलं आहे!” आईने मला आपल्याजवळ ओढून घेतले. माझ्या टाळूवरून, तोंडावरून हात फिरवला आणि समजावणीच्या स्वरात ती बोलली,

“शाळा शिकायची तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे. बाहेर गेलाय् तुझा बाप. आल्यावर दाखव त्याला !”

मग मी पाटीला हात लावला आणि माझी आई तेल विकण्यासाठी निघून गेली.

काही वेळाने माझा बाप आला. कमरेच्या धोतराखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचे अंग उन्हाने करपून गेले होते. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते. पण त्यांच्यावर टोचल्याचे वण नव्हते.

कोनाड्यातील चिलीम-तंबाखू घेऊन तो उंबऱ्यापाशी दोन पायांवर बसला आणि चिलीम भरत आपल्या राठ आवाजात बोलला,

“कधी आला रे तू शाळेतून ?”

मी काही न बोलता मास्तरांनी दिलेली चिठ्ठी त्याच्या हवाली केली. तेव्हा भरलेली चिलीम पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट यांमध्ये उभी धरून त्याने चिठ्ठी दोन्ही हातांनी उघडली. मास्तरांनी लिहिलेली अक्षरे लावायला त्याला बराच उशीर लागला.

श्री. नरसू तेली यांना
स. न. वि. वि.

आपला मुलगा चि. रामू याला देवीची लस टोचून घेतली नसल्याचे आज माझ्या ध्यानात आले. लहानपणी टोचून घेण्याचे काही कारणाने राहून गेले असावे. पण आता अवश्य घ्यावे. साथ आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतलेली बरी. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.

मग माझ्या बापाचा चेहरा थोडा गंभीर झाला. मला जवळ बोलावून त्याने अंगरख्याच्या गुंड्या काढायला लावल्या. माझ्या छातीला, गळ्याला हात लावून बघितला आणि मग ती चिठ्ठी फाडून टाकून तो गरजला,

“गाढव आहे तुझा मास्तर ! तुला काही सुद्धा झालं नाही. टोचायचं का म्हणून ? डॉक्टरचं घर भरायला आम्ही काय जहागिरदार लागून गेलोय्‌. सांग त्याला, मला धाड सुद्धा झाली नाही म्हणून !‍”

मी म्हणालो, “जे काय असंल ते लिहून द्या. ”

यावर डाफरून तो बोलला, “बरं देईन. जा विस्तू घेऊन ये आतला ! ”

मी उलथन्यावर विस्तू घेऊन आलो. तो चटकन् बोटांनी उचलून त्याने चिलमीवर ठेवला. त्याच्या हाताला पोळत कसे नाही हे कोडे मला नेहमीचेच होते. खमंग वास सुटला. नाकातोंडातून काळा करडा धूर सोडीत, कोंडल्या आवाजात त्याने मला पुन्हा सांगितले,

“मला दौत, टाक, कागद दे.”

माझा बाप लिहिण्यावाचण्यापुरते शिकला होता. लिहिण्याचे साहित्य देताच पालथी मांडी घालून त्याने बराच वेळ विचार केला, आणि मला विचारले,

“मास्तरला पत्र लिहिताना मायना काय लिहितात रे?”

तो अडल्यामुळे मला विचारतो आहे हे मला कळले. पण मलाही मायना येत नव्हता. मी ठोकून दिले,

“पण तो काही तुझा मास्तर नाही नाना, साधा मायना लिही!”

मग दौतीत टाक बुडवावा आणि काय लिहावे हे निश्चित करीपर्यंत तो वाळावा असे बरेच वेळा झाल्यावर वाकड्यातिकड्या अक्षरात त्याने खालील मजकूर लिहिला.

रा. रा. मास्तरसाहेब यांना वाकडेवाडीहून नरसू बाबाजी तेली याचा राम राम. लिहिण्यास कारण की, चिठ्ठी मुलानं दिली. आपण काळजी करण्याचे कारण नाही; आता त्याचे अंग गरम लागत नाही. आपला संशय आला तो ताप नसावा. टोचण्याचे कारण नाही.

नरसू बाबाजी तेली.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच ती चिठ्ठी मी देशपांडे मास्तरांपाशी दिली. ती वाचता वाचता त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. लगेच तळवे चोळून त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहिली.

श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.

आपला काही गैरसमज झालेला दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने लस टोचून घेणे आवश्यक आहे. मुलाचा शिक्षक या नात्याने मला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुळीच हयगय न करता टोचून घ्यावे. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.

ही चिठ्ठी घेऊन मी घरी आलो तेव्हा घराबाजूला रोवलेला आमचा घाणा चालला होता; डोळ्याला झापडे बांधलेला म्हातारा बैल गोल फिरत होता. आणि घाण्यावर कुणीच बसलेले नव्हते. मी जाऊन बसलो. गोल फिरताना पोटात खळगा पडतो आणि बरे वाटते. बाष्पाची लाट म्हशीसारखा आवाज करीत होती. पेंड खाण्यासाठी कावळे भराऱ्या मारीत होते.

लगेच नाना आला. नित्याप्रमाणे तो उघडाच, पण धोतराभोवती तरडाचा एक धडपा गुंडाळला होता.

घाण्यापाशी घेऊन त्याने लाट हलवली. अर्धवट ठेचलेले करडे हात घालून सारखे केले आणि तेलकट हात तरटाला पुसून म्हटले,

“हं, काय म्हणाला तुझा मास्तर ?”

मी उत्तरादाखल चिठ्ठी दिली. उन्हाच्या तिरपेला जाऊन तो ती लावू लागला. मी तेलाने चपचपलेली ती पेंड खात होतो आणि घाण्याबरोबर फिरत होतो.

चिठ्ठी वाचून होताच नानाने दंडाला धरून मला पुढे खेचले आणि बैलाला मारण्याचा आसुड माझ्या पाठीवर उडवला. तो म्हणाला,

“गाढवीच्या, शाळा नको म्हणून आजारी असल्याचं सोंग करतोस; मास्तरला फसवतोस ? हां ?”

मी ओय्‌ ओय्‌ करीत पळालो. चाबूक उगारून नानाही माझ्या मागे लागला. मी गल्लीबोळातून पळालो. बापाच्या पुढे पळण्याची माझी ताकद नव्हती, पण कावळे पेंड खातील म्हणून तो उलवकर परत फिरला.

मग मी उशीरा घरी परत आलो. गावच्या ओढ्याप्रमाणे नानाचा राग लवकर ओसरतो हे मला ठाऊक होते. शाळेला जायला निघताच त्याने दुसरी चिठ्ठी माझ्यापाशी दिली. तिच्यात खाली दिलेला मजकूर होता.

रा. रा. देशपांडे मास्तरसाहेब यांना नरसू तेल्याचा राम राम. लिहिण्यास कारण की, तुम्ही पुन्हा टोचण्यास लिहिले आहे. आपले रास्त आहे, शाळा चुकविण्यासाठी आपण आजारी आहो असे त्याने लबाड सांगितल्याचे दिसते. त्याबद्दल मी त्याला ठोकला आहे. पुन्हा तो काही बोलणार नाही. कळावे.

आपला,
नरसू बाबाजी तेली,
वाकडेवाडीकर.

हा घोटाळा आणखी किती काळ चालणार आहे असे वाटून मी फार पंचायतीत पडलो. माझा बाप फारच हेकेखोर माणूस होता. जन्माला आल्यापासून आजतागायत तो कधी आजारी पडला नव्हता. त्याने कधीही औषध घेतले नव्हते. मग तो पोराला टोचून कसा घेणार !

देशपांडे मास्तरांनी चिठ्ठी वाचली. आणि कधी नव्हे तो त्यांचा चेहरा रागेजला दिसू लागला. नेहमी ते मला अहो जाहो बोलवीत, पण आज म्हणाले,

“तुला काही अक्कल आहे का ?”

मी होय नाही अशी मान हलवली.

“मग बापाला नीट समजावले का नाही ! ”

“पण मलाही नीट समजले नाही !”

हे ऐकून नाक गोंजारीत मास्तर स्वतःशीच पुटपुटले,

“ साधी गोष्ट. मला कळत नाही की, तुम्ही लोक इतके अडाणी कसे. बरं मी पुन्हा चिठ्ठी लिहितो !”

त्या दिवशी देशपांडे मास्तर मला सारखे प्रश्न विचारीत होते. त्यांनी मला मुळीच झोपू दिले नाही. शाळा सुटताच सगळी मुले माझ्याभोवती गोळा झाली. माझ्या अंगरख्याच्या बाह्या वर करून त्यांनी वण आहेत का नाही ते बघितले, आणि ओरडा केला,

“ तेलीबुवा, तुम्ही टोचून घ्या, हुर्यो ! ” कुणीसे म्हटले.

“टोचून घ्या तेलीबुवा, नाही तर ठोक्याच्या तपेलीसारखे तोंड होईल!”

“ मेहेरबानी तेवढ्यावर निभावले तर, नाही तर जीवे मराल!”

मुलांनी माझी पाठपुरवणी केली. ती सगळी मुकाट सहन करून मी घरी आलो आणि चिठ्ठी नानाला दिली.

कडू तेलाच्या दिव्यापाशी बसून त्याने ती लावली.

श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.

आपला गैरसमज झालेला दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की, तुमचा मुलगा आता आजारी आहे. त्याने तशी बतावणीही माझ्यापाशी केली नाही. पण तालुक्यात देवीची साथ आहे. तिला आवर घालण्यासाठी टोचून घेणे आवश्यक आहे, म्हणून मी आग्रह धरला. माझ्या चिठ्ठया पुन्हा एकवार नीट वाचल्या तर ही गोष्ट तुमच्या नजरेस येईल. सरकारी दवाखान्यात मोफत टोचण्याची व्यवस्था आहे. फार त्रासही होणार नाही. मुलाचा शिक्षक या नात्याने मला ही खबरदारी घेणं आवश्यक वाटलं. आशा आहे की, झाला गैरसमज दूर होऊन आपण टोचून घेण्याची तजवीज कराल. कळावे.

आपला,
र. वि. देशपांडे.

चिठ्ठी वाचून होताच ती दिव्यावर धरून जाळीत नाना बोलला, “सुया होचून कुठं साथी जातात काय ? गाढव लोक ? मी कधीही काही टोचून घेतलं नाही. साथी आल्या अन् गेल्या. मी अजून जगलोय् ना ? माझा बाप, माझा आजा कुणी टोचलं नव्हतं. बाप अठ्याण्णव वर्षे जगला, आजा शंभर आणि वर तीन ! मास्तरला अक्कल नाही. सुयाबिया टोचणार असतील तर तू शाळेत जाऊ नकोस. आपला धंदा कर. ”

माझी आई इतका वेळ गप्प होती ती हळूच म्हणाली,

“पण चार यत्ता शिकू द्या त्याला. शाळा शिकायची, शहाणं व्हायचं तर टोचून घेतलं पाहिजे. मार सोसला पाहिजे. ”

त्यावर नाना ओरडला, “काय गरज नाही. कितवीत आहेस रे पोरा तू आता ?”

“मराठी चौथीत.”

“बास झालं. बापापेक्षा दोन पायऱ्या पुढं गेलास. आज मी चिठ्ठी देतो ती वाचूनही मास्तर टोचून घे म्हणाला तर पुन्हा शाळेची पायरी चढू नकोस.”

आणि त्यानं चिठ्ठी लिहिली.

राजमान्य राजश्री मास्तरसाहेब यांसी, राम राम.

पत्र लिहिण्यास कारण की, माझा गैरसमज झालेला नाही. मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही, आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्ती कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकविण्याचे करा. कळावे.

आपला,
नरसू तेली.

ही चिठ्ठी घेऊन जेव्हा मी शाळेला निघालो तेव्हा मला फार भीती वाटत होती. माझी शाळा खलास झाली असे वाटत होते. धुळीने भरलेल्या वाटेने जड दप्तर वागवीत चाललो असताना मी या विचाराने अगदी व्याकुळ झालो होतो. घाण्यावर बसण्यापेक्षा मला शाळेत बसणे जास्त आवडत होते.

आणि भरभर चालून दमगीर झालेली माझी आई डोक्यावर तेलाची पाटी घेऊन माझ्या मागून आली. ती निश्चयाने म्हणाली,

“ चल, आपण दवाखान्यात जाऊन टोचून घेऊ. तू कळ सोसशील का ?”

मी म्हणालो, “सोशीन, पण नानाला कळलं तर?”

“त्यांच्यादेखत विव्हळू नकोस.”

“ नाही. पण तो सुजलेला हात बघील. टोचल्यावर हात सुजतो.”

“ त्यांच्यादेखत उघडा होऊ नकोस. आणि एकदा टोचल्यावर काय करणार आहे तो ? चल.”

चिठ्ठी फाडून टाकून आम्ही दवाखान्यात गेलो. मात्र टोचताना आईने डोळे पदराने झाकून घेतले. मी तोंड फिरवून कळ सोसली.

माझ्या बापाला मी टोचून घेतल्याचे कळले नाही. साथ संपली तेव्हा तो फुशारकीने मला म्हणाला,

“ सांग तुझ्या मास्तरला मी अजून जिवंत आहे म्हणून आणि म्हणावं माझा बापही आहे. गाढव साले. देवाशपथ मी सांगतो, पोरा तुझा तो मास्तरच एके दिवशी साथीत पटकन् मरेल !”

यावर माझ्याकडे बघून आई गालात हसली.

- oOo -

पुस्तक: माणदेशी माणसं
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली,अकरावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २००८.
पृ. १२७ - १३४.


हे वाचले का?

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

स्वप्न-वास्तव-सत्ता(१)

“थोड्या वेळाने टोपलीवरील झाकण उघडले. तो क्षण दिव्य होता. ज्या क्षणी स्वप्न सत्य म्हणून जन्माला येते, आणि लालसेचा उगम म्हणजेच तृप्ती ठरते असा दुर्लभ क्षण ! मी पाहिलेली स्त्री शय्येवर राजवस्त्रांत होती. आणि तिच्या शरीरावर तर आता रत्नप्रकाशाचा उत्सव होता. आता तिने नागमुकुट कपाळावर ठेवला होता. तिच्या डोळ्यांत मात्र अथांग विषण्णता होती. पण तिचा गोरापान गळा व त्याच्याखालील रत्नमाला शोभणारा थोडा प्रदेश पूर्वीइतकाच उन्मादक, खुणावणारा होता. गळ्‍याशी धरून तिने मला धीटपणे उचलले, व आपल्या उरावर धरत मृदू शब्दांत म्हटले, ‘ये, आता तूच माझा सखा आहेस. एक देदिप्यमान साम्राज्य मावळत असता तूच त्याला आता निरोप दे.’

“त्यावर आयुष्यभर जपलेल्या वासनेने मी त्या गौर अंगावर दंश केला व पुन्हा पुन्हा दंश केले. त्या त्या ठिकाणी निळसर वर्तुळे पसरली, आणि अखेर शय्येवर पसरलेला राजवस्त्रांतील तिचा देह संपूर्णपणे सावळा होऊन ती पूर्णपणे माझी झाली. परिपूर्तीनंतर जी श्रांतता येते, सुख पूर्ण झाल्यावर जी आर्द्रता राहते, त्यांच्यामुळे मी इतका संथ झालो की येथे येईपर्यंत ऊन झगमगू लागले. पण हे अंधारे विवर, त्यातील सडलेली हवा, आणि त्यातच निर्जीवपणे जगणारे तुम्ही हे पाहिल्यावर माझ्यात सामर्थ्य आले. माझ्या सुखाला तुलना नाही इतके ते परिपूर्ण होतेच. पण तुमच्यासमोर आता त्यावर ईर्ष्येची झळाळी चढली आहे.”

सांजशकुन

जमलेल्या सापांत अस्वस्थ हालचाल झाली. कारण आता त्यांच्यात मत्सर निर्माण झाला होता. पण कोणीतरी बोलावे म्हणून त्यांनी तरुण सापास डिवचले. तो म्हणाला, “हा सारा तुझा भ्रम आहे, आणि त्या भरात तू असले काही असंबद्ध बडबडत आहेस. तूच काही एकटा बाहेर हिंडलेला नाहीस. मी देखील बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. या ठिकाणी नागमुकुट घालणारी कोणी स्त्री नाही हे मी स्वानुभवाने सांगू शकतो.”

त्याच्या शब्दांवर इतर सापांचा विश्वास बसला, व त्या भ्रमिष्टाने असल्या मूर्खपणाने आपणाला फसविण्याचा प्रयत्न करावा याचा त्यांना विलक्षण संताप आला. हे सगळे त्या वृद्ध प्रमुख सापाला जाणवले. तो म्हणाला, “माझे दीर्घ आयुष्य तर बहुतेक बाहेरच गेले. आताच मी शरीर थकल्यावर येथे बंदिस्त झालो आहे. अशा तर्‍हेची स्त्री तर नाहीच, एवढेच नव्हे, तर ती असणे देखील शक्य नाही. कोणती स्त्री सापाला उचलून आपल्या उराला दंश करून घेईल, विषाचा आनंदाने स्वीकार करेल ? असल्या कपटाला आपण काय प्रायश्चित देतो हे तर तुम्हाला माहीत आहेच.”

त्याच्या अनुमोदनाची वाटच पाहत असल्याप्रमाणे तरुण साप वेगाने पुढे आला, व स्वतःच्याच स्वप्नात तृप्त असलेल्या सापात दात रुतवून त्याने त्यास बाहेर काढले. त्याक्षणी इतर साप त्याच्यावर तुटून पडले, व थोड्याच वेळात तो साप दुर्बल होऊन निर्जीव झाला. त्या गर्दीत काहीच करायला न मिळालेला वीतभर असलेला एक लहान साप पुढे झाला, व त्याने मृत सापात दात रोवून फरफटत नेले, व दूरच्या त्या स्मशानात टाकून दिले.

सारे साप पुन्हा विसावल्यावर प्रमुख साप तरुण सापाला म्हणाला, “मला थोडा वेळ मोकळ्या हवेत जायचे आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल. आपण खडकाच्या टोकावर जाऊ. त्या ठिकाणी जाऊन मला किती तरी वर्षे झाली.” आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहता तो खडकाकडे सरकू लागला.

त्याच्या शब्दांनी तरुण साप भयचकित झाला. मागच्या बाजूचा खडक जणू जमिनीपासून वर उडून जाण्याच्या सतत प्रयत्नात असल्याप्रमाणे सरळ उंचच्या उंच गेला होता. तरुण सापाने नम्रपणे म्हटले, “पण खडकाच्या टोकापर्यंत जाणे या वयात तुम्हाला निभावेल का ? परत उतरताना तुमच्या वृद्ध शरीराला वजन तोलणार नाही.”

“तसा प्रसंग येणार नाही,” वृद्ध साप तुटकपणे म्हणाला.

वृद्ध साप अत्यंत कष्टाने वर चढून आला. पण त्याला इतके शिणल्यासारखे वाटत होते की काही काळ तो स्वस्थ पडून राहिला. या ठिकाणी वाऱ्याचा जोर विलक्षण होता, आणि सूर्य तर येथून हातभरच उंच दिसत होता. उन्हाच्या तापापासून वाचण्यासाठी त्यांनी एका पसरट झुडुपाचा आधार घेतला, आणि तरुण साप त्या जराग्रस्त शरीराकडे पाहत थांबला.

“आणखी एक भ्रमिष्ट आपल्यातून गेला हे बरे झाले. एका सुंदर स्त्रीने म्हणे त्याला उचलून घेतले, व त्याच्याकडून दंश करून घेतला,” तो तिरस्काराने म्हणाला.

“तो भ्रमिष्ट नव्हता, सुदैवी होता,” वृद्ध साप म्हणाला, “तिने स्वतः दंश करवून घेतला की नाही हे मला सांगता येणार नाही, पण त्याचे त्या स्त्रीचे वर्णन एवढे सत्य होते की ती गोष्टदेखील त्याने प्रत्यक्ष घडल्यामुळेच सांगितली असावी. तशी स्त्री असणे केवळ शक्यच नाही, तर ती प्रत्यक्षात अस्तित्वात होतीच. कारण मी तिला स्वतः पाहिले आहे.

“मला स्वतःला त्या महालातील प्रत्येक सुबक खांब, प्रत्येक खिडकी माहीत आहे; कारण मी माझे बरेचसे आयुष्य तेथेच घालवले आहे. ती स्त्री खरोखरच एक सम्राज्ञी आहे. मी तिला राजवस्त्रांत पाहिले आहे; त्याच आरशासमोर दासी तिच्या केसांचा शृंगार करताना; हंसाकृती नावेत ती नदीप्रवाहावर विहार करताना; ती शय्येवर शांतपणे अर्धवस्त्रात झोपली असताना, प्रथम दुधाने, नंतर सुगंधी पाण्याने विवस्त्र स्नान करताना– मी अनेकदा तिला पाहिले आहे. त्याने सांगितलेली तीच तापल्या तारेसारखी वासना माझ्यातही निर्माण झाली होती, आणि त्याच उत्कटतेने मीही ती जोपासली होती. हे बघ, माझे शरीर विकल झाले आहे. त्या वेळचा माझा जोम नाहीसा झाला, आणि दंशात देखील पूर्वीचा विखार राहिला नाही. त्यावेळची एकच एक गोष्ट पूर्वींच्याच धगीने राहिली. ती म्हणजे तिच्याविषयी वाटत आलेली ही आसक्ती !”

“पण तुम्हीच त्याची हत्या करण्याची सूचना केलीत ना ?” तरुण सापाने विस्मयाने विचारले.

“होय, मीच तशी सूचना केली,” वृद्ध साप शांतपणे म्हणाला, “आता मी तुला जे सांगितले ते आधी सांगून देखील मी तुला त्याची हत्याच करण्याचा सल्ला दिला असता. परंतु ते मला तुला सगळ्यांच्या समोर सांगायचे नव्हते, म्हणून तर मी तुला येथे आणले. मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घे. उद्या तू प्रमुख होशील. तुला त्या सापांवर सत्ता गाजवायची आहे. सत्ता आणि स्वप्ने एकत्र नांदू शकत नाहीत. अशा तर्‍हेने स्वप्न बाळगून राहणारा साप तुझ्या सत्तेखाली सौम्यपणे राहील असे का तुला वाटते? अशा तर्‍हेने मनाला पंख फुटले की ते संपत्ती काय, सत्ता काय, त्यांच्या जाळ्यात राहू शकत नाही. तेव्हा ज्या ज्या वेळी तुला अशा स्वप्नांची बीजे दिसू लागतील, त्या त्या वेळी तू सत्ताधारी या नात्याने ती निष्ठुरपणे ठेचून काढली पाहिजेस. या गोष्टीचा तू स्वतःला कधी विसर पडू देऊ नकोस.

“परंतु त्याच वेळी आणखी एक गोष्ट तू ध्यानात धरायला हवी. तू सत्ताधार्‍याप्रमाणेच एक व्यक्ती देखील आहेस, आणि अशा एखाद्या वेड्या, विलक्षण, दिवसाच्या आभाळात रात्रीच्या चांदण्या पाहणाऱ्या स्वप्नाखेरीज व्यक्तीच्या जीवनाला मात्र प्राण नाही. तेव्हा स्वतःच्या आयुष्यात मात्र तू असल्या स्वप्नाला फार कोवळेपणाने जपले पाहिजेस. लक्षात ठेव, असले स्वप्न सत्तेने किंवा बळाने निर्माण करता येत नाही. ज्याप्रमाणे असल्या स्वप्नावर कसली सत्ता चालत नाही, त्याप्रमाणे कोणी त्यांना अटकाव देखील करू शकत नाही. परंतु त्यांची देणगी भयंकर असते, मन सतत जळत राहते, रक्ताचे पाणी होते. जणू हे आधीच पुरेसे नसल्याप्रमाणे, असले स्वप्न येते, ते सोबत अशक्यतेची छाया घेऊनच. सहजासहजी प्राप्त होणाऱ्या, हात उंच करताच आवाक्यात येणाऱ्या स्वप्नांसारखे मलीन, क्षुद्र या जगात काहीच नसेल. जर असले एखादे स्वप्न तुझ्या आयुष्यात आलेच तर त्याचा ताप, त्याची अशक्यता, यांसह तू त्याचे आतल्या मनात कृतज्ञतेने स्वागतच कर; नाहीतर आपली निवड झाली नाही, असे स्वीकारून समजूतदारपणा दाखव.”

वृद्ध साप सरकत खडकाच्या अगदी कडेला आल्या, व दूरवर पाहत त्याने विचारलं, “तुला येथून काय दिसते?”

तरुण सापाने मागे राहूनच म्हटले, “समुद्राला मिळताना समुद्राएवढी झालेली नदी आता इतकी अरुंद दिसते, की माझ्या अंगाने मी ऐलतीर पैलतीर पसरू शकेन असे मला वाटते. शहरातील सारे भव्य प्रासाद आता खेळण्यांप्रमाणे दिसतात, आणि माझे घर तर मला येथून दिसतच नाही. ते इतके खाली दूर राहिले या विचाराने माझ्या मनाचा थरकाप होतो.”

“होय, तो देखील एक दृष्टिकोणच म्हणायचा, ” वृद्ध साप मान हलवत म्हणाला. “ती भूमी म्हणजे तर आपला आसरा आहे. आपला जन्म, मृत्यू, आपले आयुष्य सारे तिच्यावरच तिच्याखाली घडते. तरीदेखील जमिनीवर राहणाऱ्याने वर जाऊन ती कशी दिसते हे मधूनमधून पाहणे जरूर असते. आपले घर इतके खाली राहिले, असे म्हणण्याऐवजी आपण इतके उंच आलो असे देखील तुला म्हणता आले असते. म्हणजे एकंदरीने तुझ्या बाबतीत स्वप्नाबद्दल इशारा देण्याची फारशी गरज दिसत नाही. ती बाधा तुला होणार नाही. कारण त्याबाबतीत तू सुरक्षित दिसतोस. एखाद्या स्वप्नाने झपाटून जाण्याची आशा म्हण, अगर भीती म्हण तुला कधी त्रस्त करणार नाही. याला देखील एक प्रकारचे सुखच म्हणणारे प्राणी तुला भेटतीलही. तू आता खाली जा. इतर साप तुझी वाट पाहत असतील. ”

“आणि तुम्ही? तुम्हाला उतरताना तर विशेष मदत लागेल,” तरुण साप म्हणाला.

“नाही. कारण मी परतणार नाही,” वृद्ध सापाने निश्चयाने म्हटले, “माझे एकुलते एक स्वप्न आता भंगून अशक्यच झाले हे तू पाहिलेसच, आणि आज ना उद्या सत्ता देखील माझ्याकडून तुझ्याकडे जाणारच. सत्ता नाही आणि स्वप्नही नाही. तर मग मी कोण उरलो आहे? तर आता मी निव्वळ एक कात आहे, आणि टाकलेल्या कातेचे काय करायचे असते हे मला आणि तुला माहीत नाही, तर माहीत असणार कोणाला ?”

त्यावर तरुण साप काही बोलण्याआधीच वृद्ध साप पुढे सरकला, व त्याने आपले जीर्ण हताश शरीर उन्हाने धगधगलेल्या खालच्या खडकावर फेकून दिले.

- oOo -

पुस्तक: सांजशकुन
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, दुसरे पुनर्मुद्रण.
वर्ष १९९९. पृ. २५-३५.

---

(१). भासाच्या ‘स्वप्नवासवदत्ता’ या नाटकाच्या शीर्षकाशी अनायासे साधर्म्य दिसते आहे. परंतु कथाभाग सर्वस्वी भिन्न आहेत.


हे वाचले का?