मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

गेले... ते दिन गेले

वेगवेगळी फुले उमलली
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले गेले...
ते दिन गेले...

भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती तरी अद्भुत गाणी न् गोष्टी लाकूडतोड्याचा मुलगा त्या पाखराकडून ऐकत राहिला. मग त्याला वाटलं की, या पाखराला कायमचंच जवळ का नये ठेवू? त्यानं एक सुरेख पिंजरा बनवला, पण पाखरानं तो पिंजरा पाहिला मात्र, ते जे उडून गेलं, ते परत कधीच त्या मुलाला भेटलं नाही.

लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीतली अद्भुतता आणि सुंदरता आता उरलेली नाही मनात; पण वाटतं की, आपण माणसंही पुष्कळ वेळा त्या लाकूडतोड्याच्या मुलासारखी होतो. हातून निसटलेलं आयुष्य पकडून कायमचं जवळ ठेवण्याची तीव्र इच्छा करणारी, जुने निर्मळ आनंद साठवून हुरहुरणारी माणसं.

लोक आणि अभिजात

आमचे देव तरी आमच्यापेक्षा वेगळे कुठे आहेत ? भवभूतीचा ‘उत्तररामचरिता’मधला राम आठवतो का? वनवासातून रावणवधानंतर परतलेल्या रामसीतेनं अयोध्येचं राज्य स्वीकारलं आहे. वनात जाण्यापूर्वी ते अगदी किशोरवयीन होते. आता चौदा वर्षांनंतर ते पक्व तरुणपणात आले आहेत. कुणा एका चित्रकारानं काढलेली रामाच्या आयुष्याची चित्रकथा पाहताना अयोध्येतले जुने दिवस आठवून राम म्हणतो,

जीवत्सु तातपादेषु नवे दारपरिग्रहे
मातृभिश्चिंत्यमानानां ते हि नो दिवसा गताः।

वडील हयात होते आणि माता सर्व प्रकारची काळजी घेत होत्या. नुकताच विवाह झाला होता. ते दिवस गेले आता !

– रामाच्या मनातली ही खळबळ राम गणेश गडकऱ्यांनी किती सुंदर मराठीत उतरवली आहे, तुम्हाला माहीत असेल. ‘प्रेमसंन्यास’ या त्यांच्या नाटकातल्या लीलेच्या तोंडी घालण्यासाठी त्यांनी उत्तररामातल्या या श्लोकाचा कविताबद्ध भावानुवाद केला आहे. ते त्यांचं स्मृतिगीत फार गोड आहे.

आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा
बाळपणाचा, मुग्धपणाचा, निर्मळ भावाचा ?

तो मुग्धपणाचा काळ असा होता की, जेव्हा चिमुकल्या मनाचं पुरेसं उमलणं झालेलंच नव्हतं. आई-वडील काळजी घेत होते, मुलाचं बाळपण बघून स्वतःचं बाळपणही पुन्हा आठवत होते, पण बघता बघता गेलेच ते दिवस !

तू सीता ती, राम तोच मी, आज त्याच माता
परि जे गेले दिन ते आता येतिल का हाता ?

सुकल्या फुलाला सुगंध जसा पुन्हा यायचा नाही, तसे ते गेले दिवस पुन्हा यायचे नाहीत.

अगदी हाच भाव केशवसुतांच्या ‘हरपले श्रेय’ या कवितेत व्यक्त झाला आहे. लुटुपुटीचा संसार मांडणारी लहान, अजाण मुलगी असते. त्या लटक्या संसाराच्या खेळात जो आनंद, जे सुख ती अनुभवते, ते खऱ्या संसारातही तिला गवसत नाही आणि मग चुकचुकत राहतं मनात. बावरते वृत्ती. पण जे हरपतं ते गवसत नाही पुन्हा.

त्रिखंड हिंडुनि धुंडितसे
न परि हरपले ते गवसे

लहान मुलीचं अजाण, निष्पाप मन, त्या अजाणतेपणामुळेच जगातल्या दुःखांविषयीची, विपरीततेविषयीची, मोह-द्वेष-वंचनेविषयीची तिला मुळीच न लागलेली चाहूल, ते निश्चित, निर्भरपण आणि त्या लटक्या खेळापासून दूर असलेलल्या प्रत्यक्ष संसारातल्या अडीअडचणी. त्याचं अवघडपण– तसं आयुष्य पुन्हा नाहीच गवसत, मला वाटतं, जगभरच्या गायकानी कधी तरी कुठे तरी अशा हुरहुरीची गाणी गायली असतील, कवींनी आणि लेखकांनी कविता आणि लेख लिहिले असतील, चित्रपटांनी आणि नाटकांनी, वाद्यांनी आणि कुंचल्यांनी असे तरल क्षण अनेकदा पकडले असतील,

माणसाचं वाढतं वय आणि जगाच्या अनुभवांनी मरत जाणारं त्याच्यामधल निरागसपण यामुळे बाळपण आणि यौवन या दोन काळांविषयी त्याच्या मनात सदैव एक असोशी आहे. ‘डेज दॅट आर नो मोअर !’ यासारखे उद्‌गार प्रौढ माणूस मधूनमधून काढतच असतो. एखादा आंग्ल कवी आपल्या बाळपणाचं जणू प्रतीक बनलेल्या फरच्या उंचच्या उंच झाडांची आठवण करताना म्हणतो, ‘ती झाडे इतकी उच होती की, आभाळाला टेकली आहेत असं वाटायचं, तेव्हा तो आमचा मूल म्हणून भाबडेपणाचा विचार होता खरा, पण त्यात केवढा तरी आनंद भरलेला होता. आज मात्र तो आनंद उरलेला नाही. कारण त्या वेळी जसं आकाश जवळ होत, तसं ते आता मुळी उरलेलंच नाही.’

लोकांच्या नेहमीच्या बोलीत, म्हणींमध्ये, वाक्प्रचारांमध्ये आणि मनमोकळ्या गीतांमध्ये या भावनेचं प्रतिबिंब न पडतं तरच नवल. अभिजात कवींनी आणि लेखकांनी ज्या हृद्यपणे आणि सूक्ष्मपणे या भावनेला वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केलं आहे, त्यापेक्षा वेगळं आणि वास्तव, अधिक ठोस असं या भावनेचं रूप आपल्याला लोकपरंपरेत दिसतं.

एरवी साधं बोलताना सुद्धा घरातल्या आयाबाया मुलींना-लेकींना म्हणतात पहा, ‘खेळून घे बाई किंवा हासून घे बाई. एकदा नवऱ्याघरी गेलीस की मग या गोष्टी करू म्हटलं तरी करता येणार नाहीत’ किंवा कधी असंही कुणी काकू-मावश्या म्हणतात, ‘आता लहान आहात तोवर सगळं करून घ्या. नंतर मग आहेच आमच्यासारखं खस्ता खाणं.’

जाणारा काळ परत येत नाही तेव्हा तो मनमुराद उपभोगावा, हे दैनंदिन आयुष्यातलं सत्य गाथासप्तशतीमधल्या एका गाथेमधल्या कुणा बाईच्या तोंडून वदवलं गेलं आहे,

नदीच्या पुरासारखं असतं तरुणपण,
दिवस-रात्र गेले की नाहीच परतून यायचे.
मुली, का मग असे उभे जळायचे ?

यौवनाचा उपभोग घ्यायला नकार देऊन दुःखात चूर झालेल्या कुणा तरुण मुलीला तिच्या समंजस सखीनं किंवा कुणा प्रौढ अनुभवी नातलग स्त्रीनं केलेला हा उपदेश आहे; तिची काढलेली समजूत आहे. यामध्ये वाया जाणाऱ्या यौवनाबद्दलची हळहळ अधिक आहे. त्याबद्दलच्या सावधतेचा इशारा अधिक आहे.

ओरिसातल्या एका आदिवासी गाण्यात मात्र हाच भाव बिंबलेला दिसला, तरी त्यामध्ये आईच्या हृदयाचं लेकीविषयीच्या प्रेमाचं भरतं आणि तिच्याविषयीची आतड्याची माया अधिक आहे. एखाद्या आधुनिक कवितेलाही मागे सारील असं हे मुंडा करमा आदिवासींचं नृत्यगीत आहे. करमा हेच त्यांच्या नाचाचं नाव. तरुण-मुलामुलींच्या मनाचं प्रतीकच जणू! या गाण्यातली आई म्हणते आहे–

ग माझे बाई
तरुणपण आहे,
नाचून घे हा करमा नाच
नंतर संपून जाईल हे नाचणं
थांबेल नाच.
मग संसार मांडशील
अन् डाळभाताची काळजी करशील.
तेव्हा माझे बाई
हे गाण्याचे हसरे शब्द
दिवस-रात्र भरून टाकणारे,
कायमचे हरवतील.
किती दुःख करशील,
हळहळशील किती !
पण माझे बाई,
ही गेलेली पोरपणाची वर्षे
परत कशी येतील ?
कशी येतील ?

-oOo-

पुस्तक: लोक आणि अभिजात.
लेखक: अरूणा ढेरे.
प्रकाशक: मंजुल प्रकाशन.
आवृत्ती पहिली.
वर्ष: १९९३.
पृ. १२७-१३०.


हे वाचले का?

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर

त्यांनी ‘चिमुकलीच कविता’ शिकवायला घेतली ती या वर्षातील शेवटचीच कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती.

“यात एक ओळ फार झगझगीत आहे.” तातू हळूच म्हणाला. तो शेजारी बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता.

कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे. कच्च्या पोवळ्यांच्या चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे (नखे लाखिया, दात मोतिया, आणि स्तनाकार पेले... यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता मोठी झाल्यानंतरची) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो, मग कसलीच चाहूल न दाखवता ती ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो.

माणसेः अरभाट आणि चिल्लर

नंतर बऱ्याच वर्षांची गोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे, हे आपल्यापुरते सांगताना ए. ई. हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ आठवताच सारे अंग थरथरून येते. जर त्या वेळी मी दाढी करत असेन तर चेहऱ्यावरील केस एकदम ताठरतात. ही खूण त्याला पुरेशी आहे. Elfs and fairies shall dance no more... Brightness falls from the air, Queens have died young and fair...

एमिली डिकिन्सनला जाणवणारे लक्षण निराळे आहे : “खरी कविता वाचताना खोल कुठे तरी असा गारठा जाणवतो की विश्वातील सारी उष्णता जरी त्या क्षणी आपल्यात भरली, तरी तो नाहीसा होणार नाही असे वाटू लागते.”

तसल्या जातीचा एक लहान अनुभव मला आला, मास्तरांनी ती ओळ वाचली तेव्हा. गणितातील निर्जीव टिंबाला एका दशवर्षेच्या जीवनात निर्णायक रूप प्राप्त झाले. मास्तरांनी ती कविता अनेकदा शिकवली असेल, पण ते या ओळीवर थांबले. पुस्तकात बोट ठेवून ते खिडकीपाशी गेले, व तेथे किंचित रेंगाळून ते परतले. “या माणसाची भूकच वेगळी होती. त्याला एखादा पक्षी पाळायचा असता तर त्याला गरुड देखील निर्जीव वाटला असता, त्याने रूक पक्षीच मिळावायचा प्रयत्न केला असता !”

त्यानंतर मास्तर पुष्कळ बोलत राहिले. पण आता माझेच मन थाऱ्यावर नव्हते. दररोजच दिसणारा, खिडकीतून आलेला उन्हाचा पट्टा आज जास्तच का झळझळत आहे हे मला समजेना. पलीकडील ख्रिश्चन स्मशानभूमीतील झाडे स्तब्ध उभी होती खरी, पण त्यांचे सारे लक्ष माझ्याकडेच होते. कपाळाला एक लहान सुरकुती देऊन, मान किंचित वाकडी करून ब्रह्मदेव हे दशांश चिन्ह देऊन त्या मुलीचे भवितव्य ठरवण्याच्या विचारात आहे, आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहत एक तेजस्वी टिंब त्याच्यासमोर तरंगत आहे, असे चित्र समोर अस्पष्ट दिसू लागले.

नंतर बऱ्याच काळाने माझ्या ध्यानात आले की, ते टिंब म्हणजे तिच्या हनुवटीवरील तीळ नव्हता, तर ती एका गोंदण्याची खूण होती. म्हणजे ते टिंब कुठे द्यायचे, हे जरी ब्रह्मदेवाने ठरवले होते, तरी त्याने अर्जुनाप्रमाणे एका गोंदणकाराला नाममात्र केले होते !

“आणखी एक ओळ जाता जाता तसेच चेटुक करून जाणारी आहे,” जागा झाल्याप्रमाणे तातू म्हणाला, “कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही.”

ही किमया होती ती मुख्यत्वेकरून कवीची, पण मला ती दातार मास्तरांकडून मिळाली म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता होती.

दातार मास्तर मराठीप्रमाणे गणित देखील शिकवत. खरे म्हणजे शास्त्र आणि भूगोल सोडून सगळेच विषय त्यांनी केव्हा ना केव्हा तरी शिकवले होते. निरनिराळ्या रंगांच्या खडूंनी भरलेली पेटी उघडून भूमितीच्या तासाला ते हात चोळत फळ्यासमोर उभे राहिले की, आता येऊ दे समोर कोणतेही प्रमेय असा आवेश त्यांच्यात असे ! कधी तरी ते एक अजस्र लाकडी कंपास वर्गात आणत, व त्यात एका टोकात खडू अडकवून तो बाजूला ठेवून देत. इतक्या वर्षात त्यांनी तो वापरलेला मात्र आम्ही कधी पाहिला नाही. उलट हातात खडू धरून हात सैलपणे गोल फिरवून आपण सुरेख वर्तुळ काढू शकतो, असे ते आम्हांला अभिमानाने सांगत.

इतर सिध्दांत-प्रमेये सांगताना ते अनेकदा पायथागोरासच्या सिध्दांताचा उल्लेख करत. पण अनेक दिवस पायथागोरासची पाळी येईना. तो सिध्दांत बराच मोठा असल्यामुळे त्यासाठी दोन तास तरी सलग हवे असत. आमची उत्सुकता वाढतच गेली. पायथागोरास हा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता, व त्याचा पुनर्जन्मावर विश्वास होता. कदाचित तो भारतात देखील येऊन गेला असेल. पृथ्वी एका स्थिर बिंदूभोवती फिरते, असा त्याचा विश्वास होता. त्याची देखील एक शाळा होती. पण एखादा विद्यार्थी मध्येच त्याचे शिकवणे सोडून गेला, तर त्याने दिलेली फी समारंभपूर्वक त्याला परत केली जात असे. तो गेल्यानंतर मात्र त्याच्या बसण्याच्या जागेवर थडग्यावर ठेवतात त्याप्रमाणे त्याचे नाव असलेला एक दगड ठेवला जात असे.

अशा पुष्कळशा गोष्टी मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्याच्या नावावर असलेला सिध्दांत प्राचीन ईजिप्तमध्ये आधीच माहीत असावा. पण प्राचीन इतिहासात काही वेळा कुणाचे तरी श्रेय कुणाला तरीच दिले जाते. ज्याला आपण अरबी आकडे म्हणतो, ते खरे म्हणजे हिंदू आहेत(१). प्लेटो नावाच्या तत्वज्ञाने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश नाही, असे जाहीरच केले होते. आमच्यापैकी बहुतेकांना प्लेटोने आपल्या शाळेची पायरी देखील चढू दिली नसती, कारण गणित म्हणजे आकडेमोड, भूमिती म्हणजे रेघामोड, व सगळे मिळून एक असह्य मानमोड एवढीच आमची कल्पना होती.

अखेर वेळापत्रकात मास्तरांनी थोडा बदल करून घेतला, व दोन तास सलग मिळवले. त्यांनी लग्नातील नवरदेवाप्रमाणे झगझगीत पिवळ्या रंगाचा एक काटकोन त्रिकोण बोर्डावर काढला. त्याच्या कर्णावर जांभळ्या रंगाचा चौरस उभा राहिला. बाजूच्या दोन रेषांवरील चौकोन अद्याप कच्चे असल्याप्रमाणे हिरवट रंगाचे होते. मग पांढऱ्या खडूने रचना तयार झाली. संथ आत्मविश्वासाने एकेक पायरी दाखवत मास्तरांनी असे दाखवले की दोन हिरव्या चौरसांची बेरीज जांभळ्या चौरसाइतकी आहे.

यापूर्वी मास्तरांनी अनेक सिध्दांत शिकवले होते. जे सिध्द करायचे होते, ते स्वच्छपणे पटवून दिले होते. त्या QED मध्ये एक काम पार पाडल्याचे व्यवहारी समाधान होते. पावलापुढे पाऊल टाकून रस्ता निभावला होता इतकेच. पण पावलांना कधी पंख फुटून खालचा रस्ता खालीच राहिला नव्हता. Where Kingfishers Catch Fire... खंड्या पक्ष्याच्या पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळाळली नव्हती. कधी लोलकांतून पाहिल्याप्रमाणे कसल्याच रंगरेषा उमटल्या नव्हत्या. मास्तरांनी खडूचे हात झाडले व खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची डबी उघडली.

मी बोर्डाकडे पाहत होतो. त्या क्षणी काय झाले कुणास ठाऊक, हादरल्यासारखे होऊन सगळा वर्गच वितळल्यासारखा झाला. समोर एक भव्य काळा पडदा, त्यावर जांभळा व हिरवा असे दोन चौरस हळदी त्रिकोणाभोवती झळाळत उजळले. दोन लहान चौरस भिरभिरत जांभळ्या चौरसात मिळून गेले. मग मोठा जांभळा चौरस थरथरत चंद्रज्योतीप्रमाणे फुटला. आणि त्याचे दोन नवे लहान लहान चौरस झाले. ते आता रोखठोक स्वतःच्या स्वतंत्र सत्याने प्रकट झाले होते. म्हणजे म्हटले तर एक, किवा दोन आणि खरे म्हणजे दोन एकच व एकच दोन हे सारे एकेक पायरी समजावून घेत, सारे स्वच्छपणे समजावून घेण्यापेक्षा सर्वस्वी निराळे होते. हा एक अणुसाक्षात्कार होता.

झेन बुध्दवादातील Satori, साक्षात्कार या अर्थी वापरली जाणारी Epiphany ही कल्पना, एका देवदत्त क्षणी मी व इतर जग यांतील दुरावा जळून जाऊन मी आणि माझे जग, I and it जाऊन I and Thou, हे सारे नंतर खूप वर्षानी वाचनात आले. तसला अनुभव घेण्याचे मला भाग्य कधीच लाभले नाही. पावले धुळीतच रखडत ठेचाळत राहिली. राजहंस कधीच खाली उतरले नाहीत. पण त्यांचे एक झरझर प्रतिबिंब मात्र मानसजलावर क्षणभर सरकून गेले. त्या क्षणी अशा तर्‍हेचा अत्यंत दुर्मिळ, मूल्यवान व अगदी कणरूप अनुभव मला स्पर्श करून गेला हे मात्र खरे. घंटा झाली व मी भानावर आलो. मास्तर निघाले, पण जाता जाता ते म्हणाले, “काय भोपळेबुवा, डुलकी लागली होती वाटतं? मी दोन प्रश्न विचारले तुला.”

एरवी मला थोडी शरम वाटली असती, पण त्या क्षणी मात्र मी अगदी निर्विकार, अलिप्त होतो. पुढचा तास आपटे मास्तरांचा होता. मी पुस्तके घेऊन ख्रिश्चन स्मशानभूमीत आलो. तेथे कोपऱ्यात जी दोन थडगी होती. त्यांच्यावर सपाट गुळगुळीत अशी मोठी फरशी होती. तेथे स्टीफन माळी काही तरी करत होता. आता माझी त्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती. तो हसला व झाडणीने फरशीवर पडलेली वाळलेली पाने बाजूला करून तो दुसरीकडे गेला.

मी फरशीवर पसरलो. कसली बोच नाही, हाव नाही. हातमोजा उलटा केल्याप्रमाणे सगळेच वेगळे, उलटे झाले होते. त्या क्षणी देखील मनातील ती उत्कट नीरवता मला प्रकट करता आली नसती. इतक्या वर्षानंतर उरली आहे ती फक्त स्वतःलाच जाणवणारी आठवण.

अशा अनुभवाचा भव्यतेशी किंवा स्वतःच्या मोठेपणाशी काडीचाही संबंध नसतो. तसला अनुभव पॅसिफिक महासागर प्रथमच पाहिलेल्या कोर्टेझला (खरे म्हणजे बाल्बोआला) आला असेल. अणुबाँबचा पहिला चाचणी स्फोट पाहिल्यावर दशकोटी सूर्याची ओपेनहीमरला आठवण झाली व तो हरवून गेला. तर जेफरीसारख्या साध्या पत्रकाराला असला अनुभव तो एका टेकडीवरील उतरणीवर गवतात पसरला असता आला होता.

नंतर फार वर्षानंतरची गोष्ट आहे. एका महान साधकाची कॉलेजला भेट होती. स्टाफरूमसमोर गाडी थांबली. तेथेच एक रानझुडूप वाढले होते आणि जगण्याची ईर्षा दुर्दम्य असल्याप्रमाणे त्याला कोवळी, लालसर पाने फुटली होती. जवळून जाताना साधक एकदम थांबले. त्यांचे हातपाय थरथरू लागले व त्यांनी उपरणे तोंडावरून ओढून घेतले. ते समाधीत गेले होते. आम्ही त्यांच्या अशक्त देहाला उचलून पुन्हा गाडीत ठेवले, व गाडी थेट टोकापर्यंत नेली. थोड्या वेळाने ते परतले, तेव्हा पुन्हा ते झुडुपाजवळ आले. पण या वेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. आता त्याची काही गरज उरली नव्हती. एका क्षणी ओळख पटून गेली होती.

त्यानंतर मी पायथागोरासचा सिध्दांत दोन-चार मित्रांना समजावून सांगितला. माझ्याजवळ योग्य ते शब्दच नसावेत. त्यांनी माना डोलावल्या. पोस्ट ऑफिस पाच वाजता बंद होते, पूना मेल सहा वीसला येते, असलीच माहिती मी देत असल्याप्रमाणे ते निर्विकार राहिले. दोघांनी तर तो सिध्दांत आपल्याला समजला आहे असे सांगितले. पण समजणे निराळे, जाणणे निराळे. एक लाल पान खुडून कपाळावर चिकटवणे निराळे. आतून काही तरी उसळून सर्वांगाला लाल लाल पाने फुटल्याप्रमाणे वाटणे निराळे, कदाचित माझ्यातच हा उणेपणा असावा. खुद्द मास्तरांना देखील हाच अनुभव पुन्हा हुकूमेहुकूम देता येणार नाही; कारण असला क्षण म्हणजे स्थळ, काळ आणि दैवी इशारा यांचा एक अगम्य स्फोट असतो. त्यानंतर काय ? त्यानंतर काय ? काय ? तर काही नाही. केवळ निःशब्दता, मूकता. विटगेन्‌स्टीनने हे बरोबर ओळखले. त्याबद्दल तो स्तब्ध राहिला. तेथे शब्दांची मिजास संपते, तत्त्वचर्चेचा दिमाख बेगडी ठरतो, आणि वटवटणारी जीभ निरर्थक चुकचुकणाऱ्या पालीप्रमाणे वाटते.

असले काही तरी क्षणिक, किरकोळ प्रथमच मला अनुभवाला आले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले धूसर चित्र आणि हा क्षण यांत गणिताचाच स्पर्श होता. हनुवटीवरील दशांश चिन्ह भाग्य ठरविणारे होते, तर पायथागोरासच्या चौरसांनी एक नवीनच खिडकी किंचितकाल उघडली होती.

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. ४४-५०.

---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.

---
(१). या विधानाला ‘आपल्याकडील समजूत’ वा एक अस्मिताजन्य गृहितक या खेरीज कोणताही आधार नाही. हे केवळ जीएंचे विधान म्हणून घ्यायचे. या आकड्यांना आजही हिंदू-अरेबिक न्यूमरल्स असेच म्हटले जाते. - ब्लॉगलेखक.


हे वाचले का?

बुधवार, १७ जुलै, २०२४

नकार : एक दैवी गुण

जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून!

आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो.

मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करावयाचे मान्य करतो आणि एस.टी.चा प्रवास सोडून एक तासभर भाषण देण्याचा मूर्खपणा आपण का केला, म्हणून पश्चात्ताप पावतो. हे मी का बरे पुनःपुन्हा करतो? काय आहे त्यात ? ना प्रसिद्धी, ना वैभव, ना चैन, ना मिळकत! पंच्याऐंशी मैल जायचे, दोन दिवस घालवायचे, हजार-बाराशेच्या समुदायापुढे बडबडायचे आणि परत यायचे - हा एवढा उपद्व्याप कशासाठी?

आता नटाकडून लेख मागविणारे लोक, लेखकाने व्याख्यान द्यावे असे म्हणणारच; त्यांना काय दोष द्यावा? पण आपण त्यांच्या आग्रहाला का बळी पडावे?

पांढर्‍यावर काळे

मी नकार देतो, तो आपला दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि स्वतः त्रास भोगू नये, या विचाराने. एखाद्या ठिकाणी मी जातो; तेव्हा ते गाव, तो हॉल, समोर बसलेले श्रोते, अध्यक्ष आणि स्वत: आपण– या सर्वांचाच मला विलक्षण राग आलेला असतो. मला पक्के माहीत आहे की, मी काही चांगला वक्ता नाही. भाषणाला उभा राहिलो की, एकीकडून मी बुजलेला असतो आणि उद्धटही असतो. मी वाक्ये विसरतो, गोंधळतो, खोकतो, खाकरतो ‘आणि, व, मग’ या शब्दांचा उच्चार पुनःपुन्हा करतो. सांगण्यासारखे मौलिक असे माझ्यापाशी काही नसते. श्रोत्यांना हसविण्याच्या खटाटोपात मी स्वतःचेच हसे करून घेत असतो आणि मला हेही माहीत आहे की, जेव्हा-जेव्हा मी एखाद्या गावी भाषण करतो, तेव्हा-तेव्हा बहुधा माझ्या शंभर ते दीडशे वाचकांना मी कायमचा मुकतो.

याचे मला दुःख होत नाही. कारण मी वक्ता नाहीच. हां, आता श्रोत्यांना सांगण्यासारखे असे माझ्यापाशी काही असते, त्याच्या जोडीला उत्तम आवाज असता, भव्य व्यक्तिमत्त्व असते; तर मी टेबलाशी बसून लिहिण्यापेक्षा वक्ताच झालो नसतो का? पुढारी नसतो का झालो, किंवा रंगभूमीवर नट म्हणून नसतो का प्रसिद्धी पावलो?

मला निवांत जागा, थोडे कोरे कागद, बऱ्यापैकी पेन द्या आणि उत्तम काम घ्या, स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. मला हॉल, टेबल-खुर्ची, अध्यक्ष, मायक्रोफोन अन् श्रोतृसमुदाय द्या आणि माझे काम बघून स्वतःच्या तोंडात मारून घ्या; पश्चात्ताप पावा!

आता पूर्वीप्रमाणे लिहिताना आपण 'प्रिय वाचक', 'रसिक वाचकहो' वगैरे संबोधून लिहीत नाही. तरीसुद्धा लिहिताना आपल्या डोळ्यांपुढे प्रिय आणि रसिक वाचकवर्ग असतोच. तो आहे, हे आपल्याला ठाऊक असते. पण मी जेव्हा भाषणासाठी कुठे उभा राहतो, तिथे हा वाचकवर्ग मला दिसत नाही. ते कोणी वेगळेच लोक असतात. वेळ घालवायला दुसरी काही जागा नाही म्हणून जमलेले. या लेकाच्याची पच्ची कशी होते, ते पाहण्यासाठी आलेले. त्यांत आपण या वर्षीं नवा चेहरा मिळविला, एवढेच समाधान मिळवून, लांब चेहऱ्याने बसलेले कार्यवाह असतात. ‘काय बेटा बोलतोय!’ असे मनाशी म्हणणारे अध्यक्ष असतात.

सभेला सुरुवात होते. परिचय करून देणारे श्रोत्यांना सांगतात– आजच्या आपल्या पाहुण्यांचे मी फारसे काही वाचले नाही, पण ते लोकप्रिय लेखक आहेत आणि आज आपल्या कानांना तासभर उत्तम भाषणाची मेजवानी मिळणार आहे. मी फार वेळ घेत नाही. आपण उत्सुक आहात ते पाहुण्यांचे शब्द ऐकण्यासाठी वगैरे... आणि दुष्टपणे आपल्याकडे बघून हसून खाली बघतात.

मी उभा राहतो. टिंगलबाज कुजबुज, हसू कानांवर येते. आपल्याकडे रोखलेले हजार-बाराशे डोळे दिसतात आणि मी मनाशी प्रतिज्ञा उच्चारतो, ‘आता पुन्हा कधीही हा मूर्खपणा करणार नाही– ही शेवटची वेळ!’

समजा श्रोत्यांमध्ये काही खरोखरीच चांगले, अगत्यशील, ऐकून घेण्याच्या इच्छेने आलेले लोक असले; तरीसुद्धा त्यांना व्याख्यानरूपे सांगण्यासारखे माझ्यापाशी काही नसते. याच तेवढ्या लोकांना बाजूला घेऊन बसावे आणि गप्पा माराव्यात, असे मला वाटते. म्हणजे असे की, लोकांना माझ्यात रस नसला, तर आपण बोलून त्यांना का बेजार करावे, म्हणून मी नाउमेद असतो. एकूण, सगळा वैतागच असतो.

उत्तम वक्ता असला... माझ्या बरोबरीच्या लेखकांत दोघे-चौघे आहेत... की, तो स्वतःच्या व्यक्तित्वावर, आवाजावर खूश असतो. केवढ्या आत्मविश्वासाने तो उठून उभा राहतो. कसलेल्या योद्धाप्रमाणे एकवार श्रोत्यांवर नजर फिरवितो. पहिल्या दहा-पाच वाक्यांतच तो नाठाळ घोड्यावर स्वार व्हावे; तसा श्रोत्यांच्या मनावर स्वार होतो आणि मग सुखाने दऱ्या-खोरीसुद्धा फिरतो. तो स्वतः रंगतो, श्रोत्यांना रंगवितो. याउलट वाईट वक्ता उभा राहताना हैराणच असतो. त्याचा आवाज, डोळे, चेहरा– सगळेच असे असते की, पहिल्या पाच-दहा मिनिटांतच श्रोते हैराण होतात. सगळे अवघड आणि अशुद्ध होऊन जाते!

माझ्या मनात येते की, मी आणि माझ्यासारखेच दहा-बारा वाईट वक्ते तेवढे सहज मिळतील– यांनी जर मनावर घेतले व गावोगावी वाङ्मय मंडळे, साहित्य परिषदा, स्नेहसंमेलने गाजवून सोडली, तर एक-दोन वर्षांच्या आत या महाराष्ट्र देशात केवढा तरी दरारा निर्माण होईल! यापुढे कोणा लेखकाला कधी व्याख्यानाची म्हणून गळ घालायची नाही, असा निश्चय सर्व लोक करतील. समस्त लेखकांची एका वार्षिक आपत्तीतून सुटका होईल आणि असेच जर वर्षानुवर्षे चालू राहिले, तर ‘लेखकवक्ता’ ही जात नामशेष होऊन जाईल. सुख आणि शांततेचे राज्य सर्वत्र पसरेल. माझ्यासारखे अनेक लेखक आणि श्रोते समाधान पावतील. खरे तर माझ्या पूर्वीच्या पिढीतील लेखकांनी हे करायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, म्हणून मला दोन ठिकाणी जावेच लागणार होते. मी हे पांढऱ्यावर काळे केले, म्हणून काही ते लोक क्षमा करणार नाहीत. समारंभ रहित करणार नाहीत. मला जावेच लागेल. सुटका नाहीच!

समोर श्रोते असतील– प्राथमिक शाळेतील मुले, ट्रेनिंग कॉलेजच्या मुली, अध्यापक आणि अध्यापिका, पालक आणि प्रौढ आया असतील. परिचय करून देणारे काही तरी बोलतील. मी माझ्या खुर्चीत अवघडलेल्या अवस्थेत बसून असेन. मनातून भयंकर धास्तावलेला.

शेवटी मी उठेन... बोलू लागेन....

अरेरे! मी त्या दोन लोकांना होकार का दिला? मी अत्यंत निर्धाराने नाही का म्हणालो नाही?

‘चुकणे’ हा माणसाचा स्वभाव आहे आणि ‘नकार’ देणे, हा दैवी गुण आहे.

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ५८-६१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

बुधवार, १० जुलै, २०२४

लेखकजिज्ञासायोग

(आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...)

माणसेः अरभाट आणि चिल्लर

काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ?

तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्या पावलात एका भिल्लाने मारलेला बाण लवकरच शिरणार आहे अशा निद्रिस्त महापुरुषास– –या सगळ्यांना तू आधीच मारले आहेस. सामान्य माणसे मरतात, थोरांचा अवतार संपतो. पण दोघांनाही मृत्यू समान असतो. त्याला तूच जबाबदार आहेस. मग हे सारे निर्माण तरी कशासाठी केलेले ?

आम्हांला जन्माला न येण्याचे कधी स्वातंत्र्य होते का ? जगण्यातील पाप-पुण्याचे जे नियम तुला मान्य आहेत, त्यांची आम्हांला कसली तरी जाण होती का ? आणि शेवटी मरण तरी न स्वीकारण्याचे आम्हांला स्वातंत्र्य आहे का ?

“अर्जुना, तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे. तू नाममात्र हो.” एवढे अमर्याद सामर्थ्य असणाऱ्याला कोणाची तरी नाममात्र म्हणून का बरे गरज वाटावी ? आणखी एक गोष्ट आहे. प्रत्येक जीव जन्माला येत असतानाच आपल्या मृत्यूचे गाठोडे सोबत घेऊन येत असतो. तो जगत असतानाच एकेक कण मरत असतो. मग मी सगळ्यांना आधीच मारले आहे, ही शेखी कशासाठी ? जन्मलेल्या जिवाला मी मरणमुक्त केले आहे असे एखादे तुझे उदाहरण असेल तर ते प्रौढीने सांग. जे अटळ आहे, ते आपण घडवणार आहो, हे कसले सांगणे आहे ?

बरे, सगळेच जण नाममात्र असतील तर त्यांना श्रेय व दोष तरी का द्या ? मग पुण्य, पाप ठरवायचे ते तरी कशाच्या आधारावर ? त्यांत तरी काही सुसंगती आहे का ? अश्वत्थामा नाममात्र होता का ? तुझ्याच सांगण्यावर त्याने नारायणास्त्र एका अजात बालकाकडे वळवले, तर त्याला रक्तपिती झाली. का अगदी जवळची काही लाडकी माणसे तेवढीच नाममात्र म्हणून पाप-पुण्यमुक्त असतात, आणि नतद्रष्ट माणसे आपल्या कर्माची फळे भोगतात ?

नरो वा कुंजरोच्या वेळी धर्मराजाने वकिली चलाखीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली. कदाचित त्या वेळी देखील तुझीच सूचना असावी. त्या वेळी तो अप्रत्यक्षरीत्या का होईना, द्रोणाचार्याच्या मृत्यूला कारणीभूत झाला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले, ते कशाबद्दल ? तर खोटे बोलल्याबद्दल. आणि ते कसले ? तर त्याची करंगळी गळून पडली. एखाद्याने टाइम बाँब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशांची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे. द्रोणाचार्यानी आंगठा मागून एकलव्याला नामशेष केले, म्हणून कदाचित करंगळी देऊन धर्मराजाने अद्दल घडवली असेल ?

कोणत्याही कारणामुळे करंगळी गळून पडणे ही काय शिक्षा झाली ? एखाद्या खेडेगावातील शाळेत अगदी बिगर यत्तेत आलेल्या बुजऱ्या लहान मुलांखेरीज कुणाचेच करंगळीशिवाय काही अडत नाही. तो जर नाममात्र असेल, तर त्याला तेवढी देखील शिक्षा नको. नाममात्र नसेल तर त्याला याहून जास्त शिक्षा हवी. पार्शियालिटी अंपायर, पार्शियालिटी अंपायर...

जर आम्ही सगळेच नाममात्र आहोत, तर काचेच्या नळीतून सरकणाऱ्या पाऱ्याच्या थेंबाप्रमाणे आम्हांला निर्लेप जाऊ दे. मग पापाचे प्रायश्चित्त नको, आणि पुण्याचे कसले श्रेय नको. आणि जर तू साऱ्याचाच उद्भव आहेस, तर आम्ही असे सदोष आणि अपूर्णच जन्माला आलो हे तुला माहीत नाही का ? आणि आम्ही तसे तडकलेले, हिणकस झालो, याची जबाबदारी तुझीच नाही का ? तू केलेल्या बाहुल्या सगळ्या भेगाळलेल्या झाल्या म्हणून युगानुयुगे त्या बाहुल्याच का तू झोडपत राहणार ?

आकाश भेदून येणारा, ज्वालामुखीच्या स्फोटातून प्रकट होणारा, संतप्त सागरांच्या गर्जनेतून अवतरणारा भयंकारी विश्वशब्द इतका अतिमानवी असतो की तो आमच्यासारख्या क्षुद्रांना ऐकूच येत नाही, आम्हांला त्याचे व्याकरण कळत नाही, की त्याचा अर्थबोध होत नाही. तो शब्द भयचकित करणारा असतो, पण त्यात कशाचेही उत्तर असतं नाही.

“–तू अत्यंत उध्दट, मूढ आहेस. तू येथून चालता हो, येथे पाऊल टाकण्याची तुझी योग्यता नाही. तू बाहेर जा, तू चालता हो, चालता हो.”

योगेश्वरा, बाहेर हाकलला जाणे, चालता हो असे शब्द ऐकणे मला नवीन नाही. ते माझ्या अंगवळणी पडले आहे. जेथे विश्वरूप प्रकट होते, त्या ठिकाणी तर माझ्यासारख्या संस्कारहीन व्रात्याला थारा देखील मिळणार नाही, हे मला प्रथमपासूनच माहीत होते. तेव्हा येथून हाकलला जाण्यात मला आश्चर्य नाही, की वैषम्य नाही.

माझ्या रानगडद अज्ञानाकडे तू दुर्लक्ष कर. पण तू दिवस, महिना, वर्ष या मापनातील काळ आहेस, फसवणाऱ्यांमधील द्यूत आहेस. मग कदाचित तू माझ्या अज्ञानातील मध्यबिंदू असशील. जर तेथे तू असशील तर ते किती अमर्याद आहे, हे तुला माहीत असणारच. तू जर तेथे नसशील, तर तू जेथे नाहीस, असे ते एक अद्वितीय स्थान असेल. मग ते सर्वस्वी माझे असल्याने मला त्याविषयी विशेष ओढच असणार, नाही का ?

तू मला हाकलले आहेसच. मी जातोच, पण जाण्यापूर्वी एकच. हे अज्ञान आहे, म्हणूनच मी अस्तित्वात आहे. ज्ञानानंतर माझे मीपण राहणारच नाही. एक थेंब सागरात मिळून जावा त्याप्रमाणे ते नाहीसे होईल. आतापर्यंत तरी मला असले विसर्जन मोहवणारे वाटत आलेले नाही. म्हणून एकच प्रार्थना आहे. माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. “O Lord, Protect my doubt...”

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १२२-१२५.

---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.


हे वाचले का?

शुक्रवार, ३१ मे, २०२४

आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु

गाळीव इतिहास

मुकुंदराज

गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे.

मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे भाषा चालू होत्या. त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देत.

राक्षसी भाषेच्या पहिलीच्या पुस्तकात धडा होता :

Raakshasi Bhaashaa
मूळ पुस्तकातून साभार.

काका उठा
जबडा उघडा
हा रामा आला
त्याचा फडशा पाडा.

फडशा, जबडा, टांग, नरडे, गटागटा हे शब्द मराठीत राक्षसी भाषेतूनच आले. त्याशिवाय मग पैशाची भाषा सुरू झाल्यावर मोबदला, मानधन, अनुदान, पारितोषिके, परीक्षक, प्रश्नपत्रिका वगैरे शब्दांची भर पडली. त्या त्या अनुषंगाने संतापनिदर्शक शब्दांचीही भर पडली. वशिला, वजन, सरकारदरबार, गटबाजी, इ० इ०.

सगळीकडे मराठीच मराठी

एकदा सगळे कोश तयार झाल्यावर मग सगळीकडे मराठीच मराठी झाले. आणि एकदा इतके मराठी शब्द साचल्यावर ते मोकळे करणे प्राप्तच होते, म्हणून ग्रंथरचनेला सुरुवात झाली. काही दिवस सगळेच ग्रंथरचना करण्यात गढल्यामुळे घोटाळे होऊ लागले. म्हणून मग प्रत्येकाला निरनिराळी कामे नेमून दिली. ब्राह्मण, सोनार, न्हावी, कासार, लोहार, साळी, कोष्टी, शिंपी, सुतार वगैरे एकदा मराठीत तयार केले आणि मग त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाला जुंपले. पूर्वी शिंप्याकडे बाराबंदी शिवावयाला कुणी टाकत नसे. कारण 'बाराबंदी' हा शब्द मराठीत नव्हता. एकदा वस्त्रकोश तयार झाल्याबरोबर शिंपी भराभर शिवू लागले.(३) ब्राह्मण वगळले तर बाकीच्यांच्या मराठीची उत्तम सोय झाली. पण ब्राह्मण मात्र संस्कृतचे पंडित. त्यामुळे त्यांची मराठी संस्कृतभ्रष्ट किंवा धेडगुजरीसारखी 'धेडगीर्वाणी' असावयाची. इतरांचे प्यूअर मराठी असल्यामुळे त्यांच्यातले व्यवहार व्यवस्थित झाले. ब्राह्मणांचे वांधे आले. त्यांचे ते अधूनमधून मराठी घातलेले संस्कृत कुणाला बोललेले कळेना.

Kshaur Re Naapitaa
मूळ पुस्तकातून साभार.

एलिचपूरच्या एका पोथीत एक ब्राह्मण-नापित संवाद आहे :

ब्राह्मण : नापिता, क्षौर करावें एवं ईप्सा. (अपभ्रष्ट मराठी.)
नापित : काय म्हन्तोस रे बामना? तिच्यामारी. (४)
ब्राह्मण : (अभिनयें वर्तवीत) क्षौर रे नापिता.
नापित : हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबावा! च्या**... सरळ बोलायला काय हुतं रे *ड**... (पुढचे शब्द आपल्याला लागत नाहीत; पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील!)

वरील उदाहरणावरून स्पष्ट होईल की, मराठीच्या अज्ञानामुळे ब्राह्मण लोकांना गावगाड्यातल्या इतरांशी व्यवहार अवघड झाला. गावात गप्पा माराव्या म्हटले तर तीच तीच भटजी मंडळी. एका भूर्जपत्रावर पाचव्या शतकातल्या धोंडुभट्ट नामक ब्राह्मणाने स्पष्ट लिहिले आहे : “कस्मद्संगें वार्तालापावें इति अस्मद्...” पुढील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. तात्पर्य, बोलावयाला कोणी नाही, म्हणून ब्राह्मणांनी लिहावयाला सुरुवात केली आणि ह्यातून संस्कृत अपभ्रष्ट ग्रांथिक मराठी आणि चारचौघांची शुद्ध मराठी असे भेद पडले. इतर नुसते बोलत, त्यामुळे त्यांना वाचावयाची गरज नव्हती. हे लिहीत, त्यामुळे वाचावयाला शिकले. परिणामी लेखन-वाचन हे ब्राह्मणांकडे राहून इतर सर्व महत्त्वाची कामे इतरांकडे गेली. इतर शेती पिकवीत असताना ब्राह्मण शब्द पिकवीत होते. ते गवताचे भारे रचीत, हे कवितांचे भारे रचीत होते. त्यांतील बहुतेक ग्रंथ लिहिल्याचेच पुरावे आहेत, वाचल्याचे नाहीत. पण साहित्याच्या इतिहासात त्यांची नावे घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. नामस्मरणाचे आपल्या संस्कृतीत फार माहात्म्य आहे.

विवेकसिंधु

मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ काहीसा विवेकासंबंधी आहे आणि थोडासा सिंधूसंबंधी आहे. मुकुंदराजाला संस्कृत कळत असले तरी त्याच्या शारंगधर राजाची सेकंड लँग्वेज पाली किंवा अर्धमागधी असल्यामुळे हा ग्रंथ मराठीत लिहिला गेला. नाहीतर शारंगधर राजाच्या समाजकल्याण खात्याने तो बक्षीसपात्र ठरवला नसता. अर्थात मुकुंदराजाला त्याची पर्वा नव्हती. तसा तो विवेकी असल्यामुळे जयंतपाळ नावाच्या व्यापाऱ्याकडून त्याने आधीच रिसर्च-ग्रांट मिळवली होती. मुकुंदराजाने स्वच्छ लिहिले आहे, जयंतपाळाने पाळलेला मी लेखक आहे : “नृसिंहाचा बल्लाळू । तेयाचा कुमरू जयंतपाळू । तेणें करविला हो रोळू । ग्रंथरचनेचा ॥” त्या काळातले लेखक आपल्याला ग्रंथ लिहावयाला कोणे पैसे दिले हे स्पष्ट सांगत असत. हल्ली आपल्याला कोण पाळतो ते सांगत नाहीत. तेही एक बरेच. तात्पर्य काय, आश्रय हवा. मुकुंदराजाची एक समाधी जोगाईच्या आंब्यास दाखवितात आणि आणखी एक समाधी नागपूर प्रांतात बैतूलजवळ खेडले ह्या गावी दाखवितात. आपण दोन्हीही पाहाव्या. (दुसऱ्याच्या खर्चाने जमल्यास उत्तम.) त्यानंतर (म्हणजे ‘विवेकसिंधु’ लिहिल्यानंतर; दोन समाध्या घेतल्यानंतर नव्हे.) मुकुंदराजाने ‘परमामृत’, ‘पवनविजय’ आणि ‘मूलस्तंभ’ हे ग्रंथ लिहिले, असे काही विद्वानांचे मत आहे; आणि हे ग्रंथ त्याने लिहिले नाहीत असे इतर काही विद्वानांचे मत' आहे.

हेमाडपंत

मुकुंदराजानंतर हेमाडपंत नावाचा ग्रंथकार झाला. ह्या गृहस्थाला ग्रंथ लिहावयाला वेळ केव्हा मिळत असे कळत नाही. देवगिरीच्या शासकीय राजस्व मंत्रणालयात तो नोकरीला होता व चढत चढत ‘श्रीकरणाधिप’ म्हणजे राजस्वप्रसचिव किंवा सर्वसाधारण लोक ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात त्या हुद्द्यावर होता. ह्या गृहस्थाने मोडी शोधून काढून महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांतल्या पोरांच्या आणि इतिहासंशोधकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. एकदा मोडी गिरवावयाचे खर्डे काढकाढून पाठीच्या कण्याला आणि मांडीला रग लागल्यामुळे वैतागून परतणाऱ्या शाळेतल्या पोरांनी सचिवालयावर मोर्चा नेला आणि “मोडी मोडो, मोडी मोडो”, “हेमाडपंत खर्डाबाद, हेमाडपंत खर्डाबाद” अशा घोषणा दिल्या. हेमाडपंताला उपरती झाली. काम सुचेना. समोर फायलींवर फायली साचू लागल्या. त्यावरून त्याला कल्पना सुचली आणि दगडावर दगड रचून तो देवळे बांधीत सुटला. त्यांना हेमाडपंती देवळे म्हणतात. मोडी लिपीला ‘पिशाच्च लिपी’ म्हणत असत ते उगीच नाही. लिहावयास सोपे व वाचावयास अत्यंत तापदायक असे हे मोडी लेखन शाळाखात्याने बंद केले. स्वातंत्र्यानंतर सुखाची एवढीच एक झुळूक अंगावरून गेली. आता फक्त लिहावयाला सोपे आणि वाचावयाला मोडीसारखाच वैताग आणणारे म्हणजे वैताग-काव्य आणि सौंदर्यशास्त्रावरचे लेख. मोडी ही आधुनिक दुर्बोधतेची सख्खी आई नसली तरी खापरपणजी खास आहे!

त्या वेळी महाराष्ट्राची राजस्थानी देवगिरी ही होती. देवगिरीला कागदांचे व शाईचे कारखाने होते. काळ्या शाईला मषी म्हणत. हा म्हशीचा अपभ्रंश आहे. कागद व शाई स्वस्त असल्यामुळे तेथे घरोघरी ग्रंथलेखन होऊ लागले. साहित्यिकांना अनुदाने देता देता रामदेवराव यादव टेकीला आला व लवकरच राज्य बुडाले. तलवारी टाकून लेखण्या धरल्या की असे होते. “रामदेवरावाची राज्यसभा मराठी ग्रंथकारांनी गजबजलेली असे,” असे महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी लिहिले आहे. चालू राज्यकर्त्यांनी या परिस्थितीची दखल घेऊन, साहित्यिकांची बक्षिसे बंद केली आहेत, ती रूढी चालू ठेवावी. रामदेवराव यांनी साहित्यिकांचे जे फाजील लाड केले त्यामुळे साहित्यिक चढले आणि देवगिरी पडली. रामदेवराव मेले आणि अनेक पंत चढले. मेलेल्याला मारण्यात काही अर्थ नाही म्हणून हे प्रकरण आम्ही इथेच मिटवीत आहो.

---

लेखकाच्या टीपा:

(१). लेखकाला मोबदला काय मिळत होता ह्याविषयी कुठेही शिलालेख अगर भूर्जपत्र वगैरेचा काहीमात्र पुरावा नाही. कुठल्याशा शाहिराला दरबारात काव्यगायन केल्याबद्दल म्हणे शिवाजीमहाराजांनी सोन्याचा तोडा दिला होता. काव्यगायनवाले पहिल्यापासून वस्ताद. पैशाशिवाय तोंड नाय उघडायचे!

(२). बरोबर आहे म्हटले की प्रकरण अर्ध्या पानात खलास. पैसे पानावर ठरले आहेत. प्रिय कंपोझिटर, हे वाक्य जुळवताना शब्दांची आलटापालट करावी, म्हणजे अर्थ फक्त आमच्या जातवाल्यांक तितको कळतलो– समजलां मां? थ्याँक्यु.

(३). हल्ली मराठी कोश नसल्यामुळे प्रगती साफ खुंटली आहे, एकदाचा तो विश्वकोश झाला की आपण नवे विश्व उभारू शकू.

(४). हे यादवकालीन शुद्ध मराठी आहे.

(५). परीक्षेच्या पेपरात ह्यांपैकी कुठलेही मत लिहिले तरी तपासणारे विद्वान ज्या मताचे निघतील त्यावर काय ते मार्क पडणार. म्हणून उत्तराच्या सुरवातीला मुकुंदराजाने हे ग्रंथ लिहिले आहेत असे लिहावे आणि शेवटल्या परिच्छेदात लिहिले नाहीत असे लिहावे.

(६). पूर्वी म्हशीचासुद्धा अपभ्रंश करीत. हल्ली फक्त दिलीप चित्रे इंग्लिश वाङ्‌मयाचा करतात.

- oOo-

पुस्तक: मराठी वाङ्‌मयाचा गाळीव इतिहास
लेखक: पु. ल. देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली, चौदावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१६.
१०-१५.

---

लेखाचे मूळ शीर्षक: ग्रंथकर्तृत्वाची सुरुवात


हे वाचले का?