शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

मलिका-ए-गझल

कॉलेजात पाऊल ठेवल्यावर कितीतरी वर्षांनी बेगम अख्तरचा आवाज अचानक ऐकायला आला तेव्हा ती नवी गझल एका बकाल वस्तीतल्या खरखरणाऱ्या रेडियोवर कानांत प्राण आणून ऐकली होती. स्तब्ध झालेल्या कोकिळेला पुन्हा कंठ फुटला होता. वसंत ऋतू पुन्हा बहरला होता. मग बेगम अख्तरचं गाणं रेडियोवर आणि रेकॉर्डवर पुष्कळ ऐकलं. पण प्रत्यक्ष तिची मैफल ऐकायला मिळाली ती कॉलेजजीवन संपून गेल्यावर चारपाच वर्षांनी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं धनवटे रंगमंदिरात आयोजित केलेला कार्यक्रम होता तो. पडद्यावर पाहिलेली अख्तरी आणि समोर बसलेली पंचेचाळीस वर्षांची प्रौढा बेगम अख्तर यांच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. तसं पाहिलं तर तिचा विशीतला अवखळ, चंचल आवाजही आता स्थिरावला होता. त्यात एकप्रकारची आकर्षक धीरगंभीरता आली होती. तिच्या तोंडून 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया' ही ओळ बाहेर पडली अन् चटकन डोळ्यांत पाणी आलं. साक्षात बेगम अख्तर आपल्या डोळ्यासमोर स्वत: गात आहे : जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया....तिचा तो दर्दभरा बुलंद स्वर वर चढत चढत किंचित फाटला की दु:खाची पराकाष्ठा होऊन काळीज फाटल्यासारखं वाटायचं. एक गझल तर अजून विसरायला झाली नाही :

ऐ मसीहा, कुछ तो बोलो क्या तुम्हारी राय है
छा गई काली घटा जिया मेरा लहराय है...
गीतयात्री

गालिब, दाग, मोमिन, जिगर, फैज, शकील, शमीम यांसारख्या अनेक उर्दू कवींच्या अनेकविध भावच्छटांना बोलकं करणारा तिचा तो स्वर मग पुढं अनेक मैफलीतून मनात खोल खोल उतरत गेला. 'तुम गा दो मेरा गान अमर हो जाये' या कवी बच्चनच्या ओळीतील भावना खरं म्हणजे अनेक हयात उर्दू कवीच्या मनात बेगम अख्तरच्या बाबतीत निर्माण झाली होती- कारण तिनं एखाद्या कवीची गझल गायली की त्याचं सगळीकडं नाव व्हायचं. 'दीवाना बनाना है' अख्तर गाय च्या अगोदर बहजाद लखनवी तरी कुणाला माहीत होता? गझलगायनाच्या एका नव्या स्वतंत्र शैलीलाच बेगम अख्तर जन्म दिला. त्यामुळं ती हिंदुस्तानची 'मलिका-ए-गझल' बनली. कवीच्या भावनेशी एकरूप होऊन शब्द, वाक्य आणि वाक्यांशातून दडलेले नवनवीन भाव व अर्थ श्रोत्यांना जाणवून देण्याचं विलक्षण सामर्थ्य होतं तिच्या गझलगायकीत. उर्दू शब्दांचे सुस्पष्ट, सुयोग्य उच्चार. त्यांच्याशी झोंबाझोंबी नाही, त्यांची कुठं मोडतोड नाही. "गझल जशी गायला हवी तशी बेगम अख्तरच गाते," असं तलतनं एकदा मला म्हटलं होतं.

बेगम अख्तर आपल्या मैफलीत आपल्या शिष्यांना तानपुरे घेऊन आपल्या पाठीमागं बसवायची. त्याही मधूनमधून तिच्याबरोबर सूर लावायच्या. बेगम अख्तरचा स्वत:चा पेटीवरून हात फिरायचा तो किती सफाईदारपणे. तबलेवाल्यानं लय वाढवली की ऐकणारा डोलायला लागायचा. बेगम अख्तरचा ख्यालगायकीचा पाया मजबूत असल्यामुळे ती स्वर-तालाला पक्की असावी. मन मोहून टाकणारी तिची ती गझल अजून मनात घोळते : इन होंठोंका आलम गुलाबी-गुलाबी... एका मैफलीत गायलेली गझल दुसऱ्या मैफलीत ती पुन्हा तशीच कधी गायची नाही. दरवेळी नवीन जागा, नव्या हरकती. गझलच्या बाबतीत तिच्यातील सर्जनशीलतेला तोड नव्हती. आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पूर्वी गझल गायला मनाई होती. बेगम अख्तर राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आकाशवाणीवर गेली तेव्हा तिला हे माहीत नव्हतं. गझल गायची नसेल तर आपण राष्ट्रीय कार्यक्रमात कधीच भाग घेणार नाही असं तिनं स्पष्टपणे सांगून टाकलं. त्या वेळच्या सूचना-प्रसारण खात्याच्या मंत्र्यांनी मनाई काढून टाकली तेव्हाच बेगम अख्तर राष्ट्रीय कार्यक्रमात गायली.

खरं म्हणजे केवळ गझलच नाही, तर ठुमरी, दादरा, चैती, कजरी वगैरे अर्धशास्त्रीय ललित गायनप्रकारांना बेगम अख्तरनंच सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. तिच्या तोंडून मैफिलीत ठुमरी ऐकण्याचा आनंद काही आगळाच असायचा. लखनौच्या नबाब वाजिदअली शाहनं शोधलेला हा गायन प्रकार त्यावरही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला बेगम अख्तरनं. परंपरा आणि नवता दोन्हींचा समावेश असायचा तिच्या गाण्यात. ठुमरी गाताना ती ऐकणाऱ्याचं बोट धरून स्वर आणि भावना यांच्या वळणावळणांच्या अनोळखी रस्त्यांवर दूरपर्यंत फिरवून पुन्हा सहजपणे पहिल्या ठिकाणी आणून सोडायची गझल असो की ठुमरी, दादरा असो की चैती, तिच्या गायनशैलीचा उगम तिच्या मूळच्या ख्यालगायकीतूनच झालेला असायचा. पूर्वी- अंगाच्या ठुमरीवर पंजाबी-अंगाची डूब देऊन एक नवी लखनवी शैली निर्माण केली होती बेगम अख्तरनं. ’अब के सावन घर आ' किंवा 'ननदिया काहे मारे नैना बान' यांसारख्या अतिअभिजात ठुमर्‍या विसरता आल्या नाहीत यात नवल नाही. पण ख्यालगायकोत पक्क्या असलेल्या बेगमनं मुळात अंतराच नसलेल्या ठुमर्‍यांतून असा काही भावनाविष्कार केला की त्यांनी मनाला कायमची हुरहूर लावली. चैन पडत नाही, राहून राहून जीव घाबरायला होतो : ’कल नाहीं आये, रह-रह जिया घबराये’ ही एकच ओळ तिनं अशी काही जीव ओतून म्हटली होती, को त्या सार्‍या मन.स्थितीची न सांगितलेली कहाणी तिच्या स्वरातून ऐकणार्‍यांना व्याकूळ करून गेली होती. अशीच एक विनाअंतऱ्याची ठुमरी काय गायली होती तो एकदा : "तेरे बिन बालम काटे ना कटे मोसो रतियॉं...’ एक विलक्षण वातावरण निर्माण केल होत तिनं. बेगम अख्तरचे दादरेही मैफिल रंगवायचे. 'सौतन के लेबे लंबे बाल, उलझमत जाना ओ राजाजी' यासारख्या ओळी इतक्या ढंगदारपणे म्हणायची ती की ऐकणार्‍यांना वेड लागायची पाळी यायची. वास्तविक दादरा, चैती, कजरी, होरी हे सारे लोकसंगीताचे प्रकार. गीते परंपरेनं चालत आलेली, तशाच त्यांच्या चालीही. पण त्यांना ही अभिजात संगीताचा हलकासा रंग देऊन बेगम रंगतदार करून टाकायची. मिश्र पिलुतला आपला प्रसिद्ध दादरा ती गायची तेव्हा अंगण झाडणाऱ्या ग्रामीण नवयुवतीचं सहजसुंदर चित्र डोळ्यापुढं उभं राहायचं:

निहुरे निहुरे बहारें अंगनवा
कंगना पहन गोरिया अंगना बुहारे
कि झुकि देखें नयनको...

मन मोहून टाकणारे सारं सारं विसरायला लावणार्‍या बेगम अख्तरचं गाणं ऐकता ऐकता काळ किती पुढे गेला, भोवतालचं जग किती बदलल याची आठवणच राहिली नाही. पण आपल्याला आठवण राहिली नाही तरी व्हायच्या गोष्टी कळतनकळत होतच असतात. बेगम अख्तरची अखेरची मैफल ऐकली ती छबिलदासमधे, त्या वेळी कतिल शिफाईची एक गझल दाद घेऊन गेली होती" तुम पूछो, मै न बताऊँ, ऐसे तो हालात नहीं...’ कार्यक्रम संपल्यावर सहज कुमुद मेहतांना विचारलं, "कसं काय वाटलं?" त्यांनी विलक्षण उत्तर दिलं, "या बाईबरोबर सती जावंसं वाटलं!"

३० ऑक्टोबर १९७४ रोजी अहमदाबादला बेगम आजार अचानक हृदयविकारानं गेली! तिथल्या मैफलीत ’जमुनाके तीर' ही तिनं म्हटलेली अखेरची भैरवी. खरं म्हणजे अलीकडं तिची प्रकृती बरो नसायची. गाण्याचे कार्यक्रम करू नयेत असा सला दिला होता सगळ्यांनी. त्यावर ती खूप हसली होती. म्हणालो होतो, "ये भी कोई मशवरा है? अगर गाते-गाते ही मेरी मौत हो जाय, तो इससे बढ़कर मेरी खुशकिस्मती और क्या होगी!"

हार्ट-अटॅक आल्यावर तिला अहमदाबादच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. पण तिला लखनौला जायचे होते. "मला लखनौला घेऊन जा." असे तो सारखं सांगत होती. पण ती लखनौला परतली नाही, तिचा आवाजही लखनौला परतला नाही. परतलं ते नश्वर शरीर. तेही इतमामाने नाही तर विटंबना सहन करून. अनेक सन्मान मिळवलेल्या गझल सम्राज्ञीच्या शवाचा प्रवास टॅक्सीच्या टपावरून का झाला? कशाला, कोण, का जबाबदार असतं याची चिकित्सा अखेर व्यर्थच ठरते. कशासाठी तरी, कुणासाठी तरी वेडं होण्याचा आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा काळच आता खूप मागे पडला आहे. उरले आहेत फक्त हिशेब. आणि मैफलीतल्या प्रत्येक जड वस्तूलासुद्धा आपला परवाना बनवणारी ती गझलची शमाही आता मालवली आहे:

मैं ढूँढ रहा हूँ मेरी वो शमा कहाँ है
जो बज़्म की हर चीज़ को परवाना बना दे
दीवाना बनाना है तो दीवाना बना दे

- oOo -

पुस्तक: गीतयात्री
लेखक: माधव मोहोळकर
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००४)
पृ. १८-२१.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा